Friday, February 28, 2014

धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!





  1. धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!

    भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले...तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ "आस्तिक" आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.

    खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला "ब्रह्म" हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.

    असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.
    दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. वैदिक सेश्वर तत्वज्ञानांना यांत तिलांजली दिली असल्याने ही अवैदिक तत्वज्ञाने होत यात शंका राहत नाही. त्यांचा वैदिकतेशी उत्तरकाळात आणलेला संबंध ओढून-ताणून आहे. तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.

    वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.

    या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.

    सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत...जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.

    काय आहे चार्वाक दर्शन?

    चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.

    १. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून "मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही." असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. "जे काही आहे ते याच लोकात" म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.

    २. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. "काम" आणि "अर्थ" (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व "स्वभाव" हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.

    ३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
    भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.

    ४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.

    ५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)

    ६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!

    ७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.

    ८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.

    ९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.

    १०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.

    पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.

    आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी...जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात "चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे." असे म्हटले आहे. यातच "चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही." असेही या ग्रंथात म्हटले आहे.

    चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला "मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार" म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.

    चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच "लोप" पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.

    या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
    हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.

    परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.

    "यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत" या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे "लोकायतिक हे अनीतिमान आहेत." हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.

    लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.

    इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.

    पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.

    लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.

    राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.

    आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला...तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.

    अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले...फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते

Wednesday, February 26, 2014

अनादि आणि अजरामर...!

माझे जीवनावर अपरंपार प्रेम आहे
जसे पावसाळ्यावर
जसा पाऊस असतो कधी स्नेहमय...
कधी क्रूर 
तर कधी फक्त वाट पहायला लावनारा...
जीवनही तसेच...

हवे वाटते तेंव्हा ते असतेच असे नाही...
असते तेंव्हा त्याचे मोल समजतेच असे नाही
ते जाते तेंव्हा हव्यासाचा आक्रोश 
ते ऐकतेच असेही नाही...

पाऊस असण्यात जेवढा पावसाळा आहे...
तेवढाच पावसाळा पाऊस नसण्यात आहे...
जेवढे जीवन जगण्यात आहे 
तेवढेच जीवन मरणात आहे...

माझ्या आत्मनांनो...
पावसाळा फक्त चिंब-भिजल्या मनांत असतो
जीवन फक्त मनसोक्त जगण्यात असते...

जगण्याची ही मोहक वाटचाल

अनादि आणि अजरामर...!

Tuesday, February 25, 2014

मनुष्य व्हावे!

वर्तमानात जगणारा माणुसच

इतिहास आणि भविष्याकडे

डोळसपणे पाहू शकतो...

आणि नेहमीच आनंदीही राहू शकतो....!

सर्वच विश्व असे आनंदमय व्हावे

प्रत्येकाच्या मनात कारुण्याचे

झरे फुटावेत

आणि

वेदनांवर...वर्चस्ववादावर

मात करण्याचे

सामर्थ्य फुलावे

येणारा एकेक क्षण अनमोल

प्रत्येकाने प्रत्येकाचा

श्वास व्हावे...

मनुष्य व्हावे!

Saturday, February 22, 2014

वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म ?


वैदिक धर्म म्हणजे काय?

मी वैदिक/अवैदिक अथवा वैदिक धर्म आणि शैवधर्म अशी मांडणी करत असतांना अनेक मित्रांनी मला या दोहोंतील नेमका भेद सांगण्याचे आवाहन केले होते. खरे तर खालील लेख माझ्या ब्लोगवर गेली दोन वर्ष होता. पण अधिक स्पष्टिकरणासाठी त्यातच नेमकी भर घालत त्याची माहिती देत आहे.

सनातन वैदिक धर्म म्हनजेच "हिंदु" धर्म आहे अशी सर्वसाधारण सामाजिक मान्यता आहे, पण ते वास्तव नाही. हिंदू धर्माची व्याख्या न होऊ शकण्याच्या कारणांत वैदिक तत्व आडवे आल्याने ती होऊ शकलेली नाही आणि वैदिकांना हिंदू म्हणवून घेतल्याखेरीज वैदिक धर्मसत्ताही राबवता येत नाही त्यामुळे गोंधळ झाला आहे. खरे काय आहे हे समजावुन घेण्यासाठी मुळात वैदिक धर्म म्हणजे नेमके काय आहे हे माहीत असायला हवे. कोणताही धर्म वेगळा आहे हे ओळखण्याचे साधन म्हनजे:

१. मान्य धर्मग्रंथ
२. धार्मिक कर्मकांड
३. धार्मिक श्रद्धा
४. परलोकजीवनाविशयक कल्पना
५. मान्य जीवन मुल्ये
६. संस्थापक.

वैदिक धर्माची वरील मुद्द्यांवर चर्चा करुयात.

१. ऋग्वेद हा वैदिक धर्मियांचा महत्वाचा धर्मग्रंथ आहे. या वेदात यज्ञप्रसंगी म्हणावयाचे मंत्र आहेत. वैदिकांचे सामाजिक, धार्मिक, विश्वोत्पत्तीशास्त्र यात सामाविष्ट आहे. त्याचबरोबर ब्राह्मणे, मनु ते अन्य स्मृती या धर्माचे नियमन करणारे धर्मग्रंथ आहेत. ऋग्वेदात काही सुक्तात इतिहासविषयकही अनेक ऋचा आहेत. सामवेद हा स्वतंत्र वेद नसुन ऋग्वेदातील ऋचा कशा गायच्या याचे दिग्दर्शन करणारा वेद आहे तर यजुर्वेद हा काही विशिश्ट यद्न्यांचे सांगोपांग वर्णन करणारा वेद आहे. अथर्ववेद हा चवथा वेद म्हणुन इ.स.पु. च्या ४थ्या शतकापर्यंत मान्य नव्हता. खरे तर अथर्ववेद हा मुळ वैदिक धर्माचा भाग नाही.

२. वैदिक धर्माचा उदय सरस्वती नदीच्या काठी राज्य करणार्या सुदास राजाच्या कारकिर्दीत झाला. त्याचा मुख्य प्रवर्तक म्हणजे वशिश्ठ होय. त्याचा काळ हा सरासरी इ.स.पु. १५०० वर्ष असा अंदाजिला गेला आहे. (माझ्या मते हा काळ इसपू आठवे ते नववे शतक एवढाच आहे.)

३. ऋग्वेदाची एकुण दहा मंडले असुन तो १० ऋषिकुळांतील ३५०च्या वर व्यक्तिंनी रचला आहे. ऋग्वेद रचना ही जवळपास २-३०० वर्ष सुरु होती. यात एकुण १०२८ सुक्ते आहेत.

४. यद्न्य हे वैदिक धर्माचे महत्वाचे कर्मकांड असुन यद्न्यात विविध द्रव्ये, मांस यांची आहुती देवुन इंद्र, मित्र, वरुण, नासत्यादि शेकडो देवतांना आवाहन करत त्यांच्याकडुन धन, पशुधन, दिर्घायुष्य, आरोग्यादिची मागणी करणार्या ऋचा म्हटल्या जातात. अनेक यद्न्य तर १२-१२ वर्ष चालणारे असत.

५. वैदिक धर्मियांच्या देवता अमर नसुन त्यांचे आयुष्य मानवापेक्षा खुप मोठे असते ही श्रद्धा. म्हणजे इंद्रसुद्ध मर्त्य्यच, कारण अमरतेची संकल्पना वैदिक धर्मात नाही. वैदिक देवता या बव्हंशी निसर्गाची प्रतीके आहेत. उदा. इंद्र हा पर्जन्याचे तर मित्र हा सुर्याचे प्रतीक आहे. परलोकाची संकल्पना वैदिक नाही.

६. वैदिक धर्मात मोक्षाची, आत्म्याची, पुनर्जन्माची संकल्पना नाही. तसेच संन्यास मान्य नाही. दीर्घायुरोग्य लाभो हीच अपेक्षा असंख्य ऋचांमधुन केली आहे. संततीहीण मनुष्य वैदिक समाजाला मान्य नव्हता...म्हणुनच संन्यासही मान्य नव्हता.

७. आश्रमव्यवस्था (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास) ऋग्वेदात नाही. ती प्रथा वैदिक नाही. असुर प्रल्हादाचा पुत्र कपिल मुनीने सर्वप्रथम आश्रम व्यवस्था प्रचलित केली. तिचा वैदिक धर्माशी संबंध नाही.

८. यद्न्यसंस्थेभोवतीच सारे वैदिक कर्मकांड फिरते.

९. वैदिक धर्मात मुर्ती वा मुर्तीपुजेला स्थान नाही. "पुजा" हा शब्द मुळचा द्राविड असुन त्याचा अर्थ होतो "माखणे", म्हणजे जल, तेल, सिंदुर वा प्रसंगी रक्ताने पुज्य मुर्तीला माखणे म्हनजे पुजा. पुढे तिचा अर्थ अधिक व्यापक झाला, पण पुजा ही वैदिक नाही.

१०. सोमरस प्राशण हा महत्वाचा धार्मिक विधी होय. ऋग्वेदाचे पहिले मंडल तर पुरेपुर सोमसुक्तांनी भरलेले आहे. सोम म्हनजे इफेड्रा ही नशा आननारी वनस्पती होते असे धर्मानंद कोसंबी यांनी म्हटले आहे. सोम म्हणजे भांगही असावी असेही एक मत आहे. सोमपान करुन नशा होत असे एवढे मात्र खरे.

११. वैदिक समाज हा पित्रुसत्ताक पद्धतीचा होता. स्त्रींयांना यद्न्यात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. एकही वैदिक मंत्र स्त्रीच्या नांवे नाही हे येथे नमुद केलेच पाहिजे.

१२. वैदिक धर्मात वर्णांतर सहज शक्य होते. म्हनजे क्षत्रिय ब्रह्मकर्म करु शके तर वैश्यही क्षत्र कर्म करु शके. याचे महत्वाचे कारण म्हणजे "ब्रम्ह" या शब्दाची ऋग्वैदिक व्याख्या. ऋग्वेदानुसार "ब्रह्म" म्हणजे "मंत्र". जोही मंत्र रचतो तो ब्राह्मण अशी अत्यंत सुट्सुटीत व्याख्या आहे ही. थोडक्यात मुळ ऋग्वेदात वर्णव्यवस्था जन्माधारित नव्हती. पुरुष सुक्त हे प्रक्षिप्त आणि वर्णव्यवस्था सुद्ड्रुढ झाल्याच्या काळात ऋग्वेदात घुसवण्यात आलेले आहे.

१३. अहिंसेच्या व अपरिग्रहाच्या तत्वद्न्यानाला वैदिक धर्माची मान्यता नाही. किंबहुना यद्न्यांचा पाया हा हिंसा हाच होता व आहे.

१४. संस्कार हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. गौतम धर्मसुत्रानुसार ४८ संस्कार दिले असले तरी ऋग्वेदात फक्त ३ संस्कार आहेत. पुढे वैदिक धर्मात फक्त १६ संस्कार महत्वाचे मानले जावु लागले ते असे-
गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्न्यन, जातकर्म, नामकरण, निष्क्रम, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नी स्वीकार व दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या ३ अग्नींचा संग्रह...म्हणजे अग्निहोत्र.

१५. कुलदैवत/देवता वैदिक धर्माला मान्य नाहीत. गोत्र/प्रवर या त्यांच्या संकल्पना.  शिव, पार्वती, गणपती, मारुती वा त्या परिवारातील मुर्ती-तांदळा स्वरुपात पुजल्या जाणा-या देवता अवैदिक असुन यद्न्यप्रसंगी या देवतांनी विघ्न आणु नयेत अशा अनेक प्रार्थना ऋग्वेदातच आहेत. शिवास "शिस्नदेव" असे हीणवण्यात आले असुन त्याला "स्मरारि" (म्हणजे यद्न्याचा विध्वंसक) अशी संद्न्या आहे. विनायक तथा गणपतीस तर यद्न्यात विघ्न आणु नये म्हणुन "विनायक शांती" प्रथम करुन त्याला दुर जाण्याच्या प्रर्थना आहेत. त्यामुळे वैदिक धर्मियांसाठी विनायक हा "विघ्नकर्ता" होता...विघ्नहर्ता नव्हे. वैदिक धर्मात नसलेल्यांना "अयाजक" (यद्न्य न करणारे) असे संबोधुन त्यांची हेटाळणी केली आहे. तसेच वैखानस, समन, यती, संन्यासी अशा अवैदिक पंथीयांचीही निंदा केली आहे.

१६. या धर्माचा मुळ संस्थापक वशिष्ठ ऋषि असुन त्याच्या सोबतची अन्य ९ ऋषिकुले सहसंस्थापक मानता येतात. ही सारी ऋषिकुले सुदासाच्या काळात होती व जोवर सुदासाचा वंश चालु राहीला तोवर ऋग्वेद व अन्य वेदांची रचना होत राहीली.

१७. वेद हे मौखिक परंपरेने जतन करण्यात आले अशी एक श्रद्धा आहे. परंतु त्याबाबत शंका आहे. वेद विस्म्रुत झाले म्हणून अवशिष्ट वेद एकत्रीत करुन मग त्या संहितेचे वेदव्यासांनी चार भागांत विभाजन केले असे परंपरेने मानले जाते. हे वेदव्यास म्हणके महाभारतकार व्यास नव्हेत. मुळ वेद नेमके कोणत्या भाषेत होते यावर आता संशोधन सुरु आहे. मुळ वेदांची भाषा ही संस्क्रुत असणे शक्य नाही असे माझे मत आहे आणि त्याबाबत विपुल पुरावे सामोरे येत आहेत.

१८. गोत्र ही संकल्पना सर्वस्वी वैदिक धर्मियांची आहे.

१९. ऋग्वेदातील ऋचांमधून संततीची मागणी १३७ वेळा, अन्नाची २३७ वेळा, संरक्षणाची ४५० वेळा तर धनाची मागणी ७९० वेळा आली आहे. परलोकजीवनासाठी अथवा स्वर्गप्राप्तीसाठी एकही मागणी नाही. वैदिक धर्म सर्वस्वी इहवादी आहे.

२०. ओंकार हा ऋग्वेदात अथवा कोणत्याही वैदिक साहित्यात येत नाही. ऒंकाराला (जो आपण शिवासाठी वापरतो) जन्म शैवांनीच दिला आहे.
वरील माहिती अत्यंत थोडक्यात असुन महत्वाचे मुद्दे तेवढे दिले आहेत. सखोल माहिती ज्यांस हवी आहे त्यांनी मुळात वेद वाचलेलेच बरे.

आता वैदिक धर्म आणि आपल्या शैवप्रधान धर्मात जमीन आस्मानाचा फरक असल्याचे आपल्या लक्षात येईल. आजचा हिंदू धर्म हा वेदाधारितच नसल्याने वैदिक महत्ता, वेदमान्यता, स्मृतीमान्यता हे दांभिकतेचे स्तोम असल्याचे आपल्या लक्षात येईल.

पण तरीही हा धर्म आज पृथक रित्या अस्तित्वात आहे हे वास्तवही समजावून घ्यायला हवे. ते कसे हे थोडक्यात पाहुयात.

१. वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मुख्य अंग आहे. तीन वर्ण वगळता जेही बाकीचे आहेत ते शुद्र-अतिशुद्र असून वैदिक धर्मियांच्या दृष्टीतून व धर्मवचनांतून वेदबाह्य समाज अथवा विद्वानांच्याच मतांनुसार अनार्य आहेत.

२. जेही वर्णव्यवस्था पाळतात, वर्णाचे जन्मजात अधिकार भोगतात व त्यानुसार सामाजिक उतरंड ठरवतात ते वैदिक आहेत..

३. ज्यांनाही जन्मजात वेदांचा व वेदोक्त संस्कारांचा अधिकार आहे व जेही ते वेदोक्त संस्कार (उपनयनादि) करवुन घेण्यास जन्माधारित पात्र आहेत वा करवून घेतात ते वैदिक आहेत.

३. जेही समाज वैदिक धर्माचार्यांची पुर्वांपार मान्यता नसतांनाही स्वत:ला ब्राह्मण, क्षत्रीय अथवा वैश्य समजतात व वर्णव्यवस्थेची पाठराखन करतात ते छद्म-वैदिक धर्मिय आहेत.

४. पोटार्थी म्हणुन वैदिक असुनही शैव देवतांचे पौरोहित्य करतात ते द्वैधर्मिय (म्हणजे दोन धर्मांचे आणि म्हनून पाखंडी) असतात. हे लोक हिंदू धर्माला जास्त धोकेदायक आहेत. वैदिक धर्माला मुर्तीपूजा मान्य नाही आणि ते शिवपरिवाराच्या देवतांचे ऋग्वेदकालापासून ते पौराणिक काळापर्यंतचे कट्टर विरोधक होते.

५. उपनिषदे वैदिक धर्माचे अंग नाही. किंबहुना उपनिषदे ही वेद व यज्ञविरोधी आहेत...ती शिव-शक्तीचे महिमान गातात त्यामुळे  औपनिषदिक तत्वज्ञान वैदिक तर नाहीच पण  सांख्य, वैशेषिक आणि न्यायदर्शनेही वैदिक नाहीत.

६. तरीही वैदिक समाज या तत्वज्ञानावरही मालकी सांगतो आणि त्याच आधारावर आपला वर्चस्वतावाद निर्माण करतो या मुळे हिंदू धर्मात विषमतेची आणि न्युनगंडाची विषारी बीजे पेरली गेलेली आहेत. पण सर्व तत्वज्ञाने वैदिक नाहीत...ती शैव तत्वज्ञाने आहेत हे वास्तव समजावून घ्यायला हवे आणि आपल्या जन्मजात न्य़ुनगंडातून बाहेर यायला हवे.

७. समता हा शैव तत्वज्ञानाचा मुलाधार असून समतेचे तत्व पाळेल तोच शैव अथवा हिंदू...बाकी सारे वैदिक. मग तो जन्माने असो कि विचारांनी असो!

Thursday, February 20, 2014

या एल्गाराचा दाहक स्फोट .....!

काल फ्यंड्री पाहिला. पाहिला म्हणजे खरे तर पडद्यात घुसून पात्रांपैकी एक पात्र होऊन अनुभवला. कारण मुळात हा चित्रपट नाही. कोणत्याही संवेदनशील मानसाच्या अंतर्मनाच्या डोहात डुबलेल्या व्यथावेदनांचा हा विस्फोट आहे. हा चित्रपट नाही. हजारो मिती असलेला, वास्तव असुनही प्रतिकात्मक असलेला म्हणुन सर्वांचा अनुभवपट आहे.

वरकरणी दाहक असला आणि जातीव्यवस्थेचे भिषण वास्तव मांडणारा हा चित्रपट असला तरी तो त्याहीपार जातो. त्यामुळे तो वैश्विकही बनतो. मानवाची चिरंतन वेदना ज्या पद्धतीने साकार होते तिला तोड नाही.

आपल्या समाजातील "आजकाल कोठे राहिलीय जातपात?" असे मुखंडांसारखे विचारणा-यांनी आपल्या मनातील अदृष्य पण सतत वावरणा-या जातीयवादाला प्रथम प्रश्न करावा. वैदिक धर्माने हिंदूत घुसवलेली उच्च-नीच्च भावना कोणत्या थराला जावून पोचली आहे याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारावा आणि मग वैदिक संस्कृतीचे गोडवे गावेत. या चित्रपटात मराठे वैदिक उच्चवर्णीयतेचे प्रतिनिधित्व करतात. पण हा चित्रपट जातीयवादाबद्दल पात्रांच्या मुखातून क्वचितच बोलतो. तो दाखवतो. पण जातीयवादाच्या तीव्रतेपेक्षा या चित्रपतातील प्रतिकात्मकता अधिक महत्वाची आहे.

फ्यंड्री म्हनजे कैकाडी भाषेत डुक्कर. जवळपास ३०% चित्रपट हा गांवातील माजलेले डुक्कर जब्याचे कुटुंबिय कसे पकडतात हे विभिन्न दृष्टीकोनांतुन दाखवतो. हे डुक्कर एक प्रतीक बनते. म्हणजे देवाच्या पालखीला भर मिरवणुकीत मुसंडी मारून पाडनारे हे डुक्कर मुळात मानवी श्रद्धा या केवढ्या तकलादू आणि कामचलावू असतात हे दाखवते. डुक्कराचा मैत्रीनीला स्पर्श झाला म्हणून तिच्यावर गोमुत्रशिंपण ते आंघोळ घालायला लावणारी शालु डुक्कर पकडण्याचा धंदा असणा-या जब्याची होऊ शकत नाही हे एक सामाजिक वास्तव...पण देवाची पालखी मात्र डुक्कराने पाडूनही देव मात्र पवित्र...पालखी तशीच पुढे निघते हे एक वास्तव.

याच संपुर्ण प्रसंगात शालुचे लक्ष वेधण्यासाठी बेभान हलगी वाजवनारा...नाचनारा जब्या उर्फ जांबुवंत आणि बाप सांगतो म्हनून शेवटी मस्तकावर मिरवणुकीला उजेडासाठी ग्यसबत्त्या घेनारा अश्रुपुर्ण जब्या...मानहानी...सर्वत्र मानहानी...

आणि मानाच्या...आत्मसन्मानाच्या निरंतर शोधात असलेले हे कैकाडी कुटुंबिय...आणि त्यांचाच नव्या पिढीचा, सजग पण हतबल प्रतिनिधी हा जब्या.

जब्या प्रेमात पडलाय कोणाच्या? एका उच्चवर्णीय मुलीच्या कि प्रत्येक माणुस पडतो त्या सुखद...आल्हाददायक पण अप्राप्य अशा भवितव्याच्या? शालू या चित्रपटात जब्याशी एकदाही बोलत नाही. त्याने लिहिलेली असंख्य प्रेमपत्रे तिच्यापर्यंत कधीच पोचत नाहीत. किंबहुना तिच्याकडे पाहण्याचीही अनुमती त्याला नाही. शालुही एक प्रतीक बनून जाते ते त्यामुळेच!

प्रत्येक मानसाचा आपल्या भवितव्याशी असाच संघर्ष सुरू असतो. पण तरीही भवितव्य एवढे निर्दय असते कि ते कोणालाही संपुर्ण प्राप्तीचे सुख उपभोगू देत नाही.

गांवात इतिहासाचे भरपूर अवशेष आहेत. पडके वाडे...भुयारे..देवड्या...या इतिहासाची या, सर्वच गांवात दिसनारी बाब, म्हनजे या हगनदा-या आहेत. इतिहास हगनदारी आहे हे दाखवणा-या दिग्दर्शकाला सलामच केला पाहिजे. आणि याच हगनदारीत रानवट डुक्करही पकडायचे आहे. "तमस" या भिष्म साहनींच्या कादंबरीची सुरुवातच एक डुक्कर पकडण्याच्या अंगावर काटे फुलवणा-या प्रसंगाने सुरू होते. येथेही तसेच अंगावर काटे फुलवनारे...

आणि तमाशाई विद्यार्थी ते गांवातल्या प्रौढांचे विविध ढंगी...उपहासात्मक प्रतिक्रियांचे...

का पकडायचे आहे ते डुक्कर? देवाची पालखी पाडली म्हनून कि कोणाच्या हगत्या ढुंगनाला त्या डुक्कराने चावा घेतला म्हनून?  उत्तर अनिर्णित आहे पण डुक्कर पकडले गेलेच पाहिजे. आणि कचरू माने (जब्याचा बाप) ती कामगिरी घेतो कारण मुलीच्या लग्नाला हुंड्याचे पैसे कमी पडत आहेत...येथे मिळतील म्हनून. त्याची डुक्कर पकडने हा पेशापेक्षा जगण्याची अपरिहार्यता आहे. सारे कुटुंबिय त्याने या डुक्कर पकडण्याच्या मोहिमेत घेतले आहेत.

जब्याला ते अपरिहार्यपने मान्य करावे लागले तरी त्याचे मन त्यात नाही. त्याचे सारे लक्ष शालुकडे आहे. तिने तरी हे दृष्य पाहू नये यासाठीचा पराकोटीचा प्रयत्न आहे. डुक्कराच्या स्पर्शाबाबत तिची घृणा त्याला माहित आहे. त्याच वेळीस डुक्कर पकडण्याची गरजही त्याला माहित आहे. तथाकथित असभ्य व्यवसाय सोडून मेहताची कोक-कुल्फी सायकलवरून विकण्याचा अयशस्वी उद्योगही त्याने करून पाहिलेला आहे. या अपयशाचे कारण म्हणजे "काळ्या चिमणी"चा शोध!

त्याच्याच प्रौढ मित्राने सांगितलेला हा तोडगा. काळ्या चिमनीला मारून तिला जाळूण तिची राख शालुवर टाकती कि शालू त्याची होईल. येथे दिग्दर्शक एक नवी पुराकथा...मिथक तयार करतो. कोणाचे तरी बलिदान दिल्याखेरीज यश नाही हाच तो अर्थ! याला अर्थातच भारतीय अंधश्रद्धेचे पदर असले तरी मिथक तेच राहते.

काळी चिमणी आणि तिचा शोध चित्रपटाचा पुर्वार्ध व्यापतो. सोबत गांवजीवन आहेच.

डुक्कर पकडायचा प्रसंग! सारे कुटुंबिय सामील. हगनदारीत सदणा-या इतिहासातील जीवघेणी धामधूम. जब्याचे लक्ष शालुकडे. डुक्कर पकडण्यात त्याला रस नाही...कुटुंबाची अपरिहार्यता असली तरी.

आणि कच-या साकारणा-या किशोर कदमला सलाम. एकच प्रसंग. शाळेत राष्ट्रगीत सुरु होते...जब्या बाजुलाच...तो ताट्‍ह उभा राहतो...बापालाही नाईलाजाने उभे रहावे लागते...डुक्कर अगदी आटोक्यात...सहज पकडता येईल असे...आणि राष्ट्रगीत सुरु असल्याने हलताही येत नाही...ती तगमग...तो आविर्भाव...ती जीवघेणी तडफड किशोर कदमांनी ज्या पद्धतीने अभिव्यक्त केली आहे केवळ तेवढ्याच साठी त्यांना ओस्कर मिळाले पाहिजे!

ते डुक्कर...म्हनजे सामाजिक व्यवस्थेची कीड मानली गेलेले द्रव्य, सर्व सामाजिक आघात उरावर घेत ते पकडतात.  शालुने जब्याला डुक्कर पकडतांना पाहिले आहे. तिच्या दृष्टीने तो मनोरंजनाचा खेळ आहे...कारण तिचे असे जब्यावर प्रेमच नाही...पण जब्याच्या (सोमनाथ अवघडे) दृष्टीने ती सर्वस्व आहे. एकमेव वांच्छित स्वप्न आहे.

आता ते स्वप्न साकार होणे असंभाव्य आहे याची विषण्ण करणारी जाणीव आणि स्वत:च्या बहिणीबाबत उद्गारले गेलेले असभ्य उद्गार...

याचा कडेलोट जब्या एक पत्थर फेकतो आणि तेथेच होतो आणि आपल्याला उत्तर मिळते.

व्यवस्था विरुद्ध एक माणूस याचा हा अंत नसुन आरंभ आहे. खरे तर हा चित्रपट जेथे संपतो तेथेच याची सुरुवात आहे. व्यवस्थेवर नव्हे तर आपल्या मनातील विषमतेच्या घाणीवर फेकलेला तो पत्थर आहे. तो पत्थर वैश्विक यासाठी आहे कि आपले समग्र वैश्विक मानवी जीवन हे उदार हृदयी गांधीवादाकडे जात नसून पराकोटीच्या विषमतावादी जागतिकीकरणाकडे जात आहे. सामान्य माणसांची जीवनविषयक स्वप्ने अपूर्णच राहण्याचा अभिशाप घेत उद्ध्वस्ततेकडे वाटचाल करत आहेत. आपण स्वत:च डुक्कर, म्हणजे डुक्करांच्या व्यवस्थेचे भाग आणि डुक्कर पकडत डुक्करांनाच (तथाकथित मानवांना) अभय देणारे आपण...माणसाच्या देवतांनाही धुत्कारनारी डुक्करे आणि त्या डुक्करांनाच घाबरणारी मानवी जमात...डुक्करांचा स्पर्श विटाळ माननारी मानवी ही जमात....तेही कोणत्या? रानवट आक्रमक डुक्करांना घाबरनारी ही मानवी जमात...

आपलीच नव्हे, वैश्विक समाजव्यवस्था अशा स्वार्थनिपूण डुक्करांनी भरलेली आहे. काळी चिमणी अस्तित्वात नाही. शालू मिळुच शकत नाही. सारे शेवटी स्वप्न! रानटी डुक्करांना पकडणारे पायतळी तुडवण्यासाठीच असतात. या डुक्करांच्या जगात!

पण तेही एल्गार करतात!

या एल्गाराचा दाहक स्फोट म्हणजे जब्याने हाणलेला पत्थर!

मी दिग्दर्शक नागराजजी मंजुळे यांना विनम्र मानाचा मुजरा घालतो. जब्या साकार करणारा सोमनाथ अवघडे हा जब-याच. या चित्रपटातील सर्वच स्त्रीया जगातील अद्वितीय सुंदर महिला तर आहेतच पण त्यांना त्यांच्या सहज अभिनयासाठी सलाम. किशोर कदमांना...जो बाप त्यांनी साकार केला...बाप माणुस...ओस्कर मिळायलाच हवे असा महान कलावंत...

मित्रांनो, या चित्रपटाचे एवढेच नाहीत...प्रत्येक नजरेतून उमगतील असे अगणित पैलू आहेत. मी फोटोग्राफी, पार्श्वसंगीत...याबद्दल लिहिले नाही...ते या अनुभवपटाचे सहज भाग म्हणून येतात...

सा-या टीमला विनम्र अभिवादन...मला माझे जग पुन्हा उलगडून दाखवल्याबद्दल!


Wednesday, February 19, 2014

राजीवजींचे मारेकरी!

राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचे अत्यंत दुर्दैवी असे राजकारण सुरू झाले आहे. द्रवीड वंशवादाची राजीवजींची हत्या ते त्यांच्या हत्याकटात सहभागी आरोपींची सुटका ही अपरिहार्य परिणती असली तरी याला खरे जबाबदार आर्यवंशवाद सुरु करणारे होत. बोप्प ते म्यक्समुल्लरने या वादाची सुरुवात केली. खरे तर म्यक्समुल्लरला आर्य हा वंश म्हनून अभिप्रेत नसून एक भाषागट म्हणून अभिप्रेत होता व त्याने ते स्पष्टही केले. पण लो. टिळकांसारख्या तत्कालीन राष्ट्रीय मान्यता असलेले नेते व विद्वान यांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" सारखा ग्रंथ लिहून आर्य सिद्धांतावर व ते आद्य आक्रमक असल्याबद्दल सिद्धांतन करून वांशिक अअर्य विरिद्ध द्रविड आणि आर्य विरुद्ध मुलनिवासी या भयंकर संघर्षाची बीजे रोवली. आक्रमक आर्यांनी सिंधू खो-यातून द्रविडांना हाकलले व दक्षीणेत आश्रय घ्यायला भाग पाडले या समजाने पुर्वी कधीच अस्तित्वात नसलेली द्रविड अस्मिता खळबळून जागी झाली. स्वतंत्र द्राविडीस्तान मागेपर्यंत मजल गेली. त्यांनी उत्तरेतील कथित आर्य भाषाही नाकारल्या. पारपोलासारख्या सिंधू लिपीचे कथित वाचन करणा-या विदेशी संशोधकालाही जवळ केले कारण त्याने सिंधू लिपीचे वाचन पुरातन द्राविड भाषांच्या अनुषंगाने केले. त्या वाचनाला अर्थात जागतिक विद्वानांची मान्यता नाही. असे असले तरी आर्य विरुद्ध द्रविड ही मांडणी आज बहुतेक चळवळी आणि विचारवंत गृहित धरतात.

याचाच विस्फोट म्हणजे दक्षीणेत आर्यवाद्यांबद्दलचा असलेला पराकोटीचा वांशिक द्वेष. यातून कै. नरसिंह रावही सुटलेले नव्हते. रामायणांच्या दाक्षिणात्य आवृत्त्यांना ते प्राधान्य देत. आणि या वादाला भारतात तात्विक/संशोधकीय अधिष्ठान मिळवून देणारे लो. टिळक! राजीव गांधींची हत्या ही त्याच वांशिक द्वेषाची अपरिहार्य परिणती होती. आज तमिळ सरकार सर्व आरोपींना सोडण्यासाठी एका पावलावर उभे आहे त्याचाही अर्थ हाच आहे. म्हनजेच आजच्या द्राविड वंशवादाला प्रोत्साहन/समर्थन देणारे नेते/विद्वान म्हनून टिळकच जबाबदार ठरतात हे विसरून चालणार नाही.

वंशवाद निरर्थक व अशास्त्रीय असून तो भारतीय समाजातून जोवर नष्ट केला जात नाही तोवर हा संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत! 

Tuesday, February 18, 2014

परिवर्तनाचे तत्वज्ञान...आणि आपण!


परिवर्तन हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो...बोलत असतो. एका अर्थाने अतिपरिचयाचा झालेला हा शब्द आहे. आहे त्या स्थितीत बदल घडवून आनणे म्हणजे परिवर्तन असा आपण परिवर्तनाचा ढोबळमानाने अर्थ घेतो. वरकरणी तो अर्थ बरोबरही वाटेल. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे. बदल म्हणजे नेमका कशात, कसा आणि बदलाचे उद्दिष्ट काय याचे तर्कसंगत भान असेल तर परिवर्तन हा शब्द यथार्थ रित्या अभिव्यक्त होऊ शकतो. थोडक्यात परिवर्तनाचे तत्वज्ञान असावेच लागते. परिवर्तन हे केवळ प्रतिक्रियास्वरुप असेल तर ते परिवर्तन योग्य असेलच असे नाही. 

बदल हा सृष्टीचाच नियम आहे. मानवजात या पृथ्वीतलावर अवतरली तेंव्हापासून ती परिवर्तीत होत राहिलेली आहे. हे परिवर्तन बाह्य जसे होते तसे मानसिकही होते. आदिम समाजव्यवस्था, धर्म, राजव्यवस्था व अर्थव्यवस्था या परिवर्तनातूनच साकारत गेल्या. कालानुसार बदलत राहिल्या. हे बदल आजही घडत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी नवनवी साधने आजही मानवजात शोधते आहे. म्हनजेच सातत्याने परिवर्तनाची प्रक्रिया सुरु आहे. किंबहुना परिवर्तन हा आपल्या जगाचा स्थायिभाव आहे. आपली इच्छा असो अथवा नसो, आपण परिवर्तनाच्या जगड्व्याळ प्रक्रियेत अपरिहार्यपणे सामील असतो.

परंतू आपण जेंव्हा परिवर्तनाबाबत बोलतो तेंव्हा आपल्याला आहे त्या स्थितीपेक्षा अधिक वेगळी, चांगली स्थिती हवी असते. म्हणजे परिवर्तनाच्या प्रक्रियेत तटस्थ भागिदार म्हणून न राहता त्याचा प्रेरक हिस्सा होण्याची भावना असते. ती नेता म्हणून असेल वा पाठीराखा म्हणून असेल. जगभर या रीतीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक परिवर्तने झाली आहेत व भविष्यातही होत राहतील. 

परिवर्तनासाठी मुलभूत तत्वज्ञानाची गरज असते. तत्वज्ञानाच्या अभावात परिवर्तन होत नसते. नवीन तत्वज्ञान हे जुन्या तत्वज्ञानाला बदलवून, आधुनिक संदर्भातील आशय देऊन तरी बदलत असते अथवा जुन्या तत्वज्ञानाचा समूळ पाया उखडवून टाकत बदलत असते. उदाहरणच द्यायचे झाले तर भांडवलशाहीवादी तत्वज्ञानाला समूळ नष्ट करण्यासाठी साम्यवादी तत्वप्रणालीचा उदय घडवला गेला. अनियंत्रित राजेशाही अथवा हुकूमशाहीला संपवण्यासाठी लोकशाहीच्या तत्वज्ञानाचा उदय झाला. भविष्यात अजून वेगळी राज्यसंस्थेची प्रारुपे शोधली जातील. कारण कालसुसंगत परिवर्तन हे नेहमीच आवष्यक असते. उदा. मी आधुनिक राष्ट्रवादाकडुन सर्व राष्ट्रांचे विलिनिकरण होत एक जग:एक राष्ट्र ही संकल्पना कशी रुजेल याचे विचार मांडतो. आज हे स्वप्नवत वाटले, अशक्यप्राय वाटले तरी उद्या ते तसेच होणार नाही असे नाही. जगभर ईश्वरदत्त राजेशाहीची जागा लोकशाही घेईल असे तरी कोणाला वाटले होते?

मी हे वरील विचार अत्यंत व्यापक परिप्रेक्षात मांडले आहेत. परिवर्तनाचा नियम जसा वैश्विक आहे तसाच तो समाजघटकांतर्गतही आहे. भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात तर हा नियम अत्यंत जटील होऊन जातो. याचे कारण म्हनजे भारतात राजकीय लोकशाही जरी अवतरली असली तरी सामाजिक लोकशाही अद्याप अवतरलेली नाही. 

सामाजिक लोकशाही म्हणजे राजकीय व्यवस्था, सत्तेतील राजकीय पक्ष कोणीही असो, पण सर्व समाजघटकांना राजकीय, आर्थिक, सामाजिक असा समान न्याय हे ते सामाजिक लोकशाहीचे तत्व होय. भारतात सर्वाधिक असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म होय. या धर्माची गंमत अशी आहे कि हा धर्म दोन धर्मांचे कडबोळे आहे. ते दोन धर्म म्हणजे वैदिक आणि शैवप्रधान हिंदु. दोन धर्मांचे सम्मिलन समान पायावर झाले असते तर ते स्वागतार्हच होते. परंतू वास्तव हे आहे कि वैदिक धर्म उर्वरित शैवप्रधान धर्मावर वर्चस्व गाजवून आहे. वैदिक धर्माशी वाकडे असण्याचे कारण नाही, परंतु जन्मजात जातींवरून विषमता...उतरंड आणि उतरत्या क्रमाने हीनभाव हा वैदिक तत्वज्ञानाचा स्थायिभाव आहे. आणि गेल्या किमान हजार वर्षांच्या वैदिक धर्माच्या निकटच्या परिस्थितीजन्य सहवासाने समतेच्या असलेल्या शैवप्रधान हिंदुंच्या जीवनाचाही तो अपरिहार्य भाग बनला आहे. 

यामुळे एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. सामाजिक विषमता आहे हे एक वास्तव आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. आता सामाजिक विषमताच आहे म्हटल्यावर सामाजिक लोकशाही कशी अस्तित्वात येणार? आणि सामाजिक लोकशाहीच नसेल तर राजकीय लोकशाही कोठून येणार? आमची आजची लोकशाही ही सरंजामदारीच्या नांवाखाली अस्तित्वात आलेली लोकशाही आहे. येथे वैदिक धर्मानुसार जे खालचे आहेत, हीण आहेत त्यांना निर्णयप्रक्रियेत सोडा पण प्रशासनातही बरोबरीचे स्थान नाही. आरक्षणामुळे काही अल्पांश लोकांना सत्ता व प्रशासकीय निर्णयप्रक्रियेतील भागीदारी मिळाल्याचे वरकरणी चित्र दिसत असले तरी वरचष्मा मात्र वैदिकांनी मानलेल्या उच्च जातींचाच असतो हेही एक वास्तव आहे. उतरंडीतील जातींचे प्रशासकीय अधिकारी काय अथवा राजकीय नेते काय, अंतिम सामाजिक निर्णयांतही दुय्यम ठरतात हे आपण पाहतो ते यामुळेच!

यात त्यातल्या त्यात बाजी मारुन जाणारे काही उतरंडीतील समाजही आहेत. ते अत्यल्प आहेत. पण त्यांची बाजी कोठवर मारली जाते? त्यांच्या जाती/समाजातील महापुरुषांच्या स्मारकांच्या जागा, एखाददुसरे पद...एवढ्यापुरतीच. पण तेही सहजी होत नाही. झुंडशाही केली तरच तेही मिळते. अन्यथा तेही व्यवस्थेचा भाग म्हणून सहजी मिळण्याची शक्यता नाही. आणि अशा अत्यल्प समाजांनाही अशाच वरवरच्या विजयांमद्धे भावनिक आनंद असतो. यात कोणते परिवर्तन आहे?

याच देशातील असंख्य पण उतरंडीतले समाज असे आहेत कि ते झुंडशाही कधी करत नाहीत, किंबहुना तो त्यांच्या जीवनशैलीचा भागच आहे, त्यांच्याकडे कोण लक्ष देतो? ते आपल्या न्याय्य मागण्या वेळोवेळी मांडत असतात. पण त्यांच्याकडे लक्षही दिले जात नाही कारण राजकीय लोकशाहीत ते बसत नाही आणि सामाजिक लोकशाही तर आणायचीच नाही!

म्हणजे आपली लोकशाही ही अजुनही वैदिक उतरंडीच्या जीवावर जगते. सार्वभौम लोकशाहीची मुलतत्वे अद्याप ख-या अर्थाने रुजलेली नाहीत. म्हणजेच वरकरणी लोकशाहीचे परिवर्तन आले असले, त्याचा छोटा-मोठा फायदा सर्वांनाच होत असला तरी राष्ट्रीय विकासाच्या फायद्याचे समान वाटेकरी म्हणून असंख्य समाजगट नाकारले गेलेले आहेत असेच चित्र भारतीय लोकशाहीचे आहे.

येथे आपण काही समाज वानगीदाखल घेऊयात. महाराष्ट्रात धनगर समाज हा किमान १०% आहे. जातनिहाय गणना झालेली नाही म्हणून हा किमान अंदाज दिला आहे. ही संख्या जास्तीचीही असू शकेल. म्हणजे किमान एक कोटी दहा हजार एवढी धनगरांची संख्या आहे. हा समाज पुरातन काळापासून निमभटका, पशुपालनात अग्रणी असा समाज आहे. या समाजातून सातवाहन ते मध्ययुगातील मल्हारराव असे थोर राजघरानी ते योद्ध्ये होऊन गेले. स्त्री-पुरुष समता मानणारा हा समाज. इंग्रजकाळात चरावूकुरणांचे सरकारीकरण केले गेल्याने हतबल झालेला हा समाज शेती/शेतमजुरी ते सामान्य चाक-या यात अडकला. आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याती अग्रणी नेत्यांनीही या समाजाच्या हलाखीकडॆ लक्ष दिले नाही. स्वातंत्र्य मिळून आज ६७ वर्ष उलटलीत...पण आमच्या आधुनिक राजकारण्यांनाही त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज वाटत नाही. त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न करणे, राजकीय/प्रशासकीय प्रतिनिधित्व 
न देणे आणि त्यांचे उरले सुरले उपजिविकेचे साधनही हिरावने हा उद्योग २६ जानेवारी १९५० साली अस्तित्वात आलेल्या लोकशाही सरकारने केला. असाच अन्याय ढोर-चर्मकार समाज असो कि वडार, कैकाडी असो कि रामोशी...अशा अल्पसंख्य समाजांबाबतही केला. म्हणजे पुरातन कालापासून ज्यांनी भारतीय अर्थव्यवस्था/कलाव्यवस्था सांभाळली तेच सगळ्यात जास्त दुर्लक्षणीय घटक बनले.

म्हणजे भारतात वरकरणी झालेले समानतेचे परिवर्तन हे खरे परिवर्तन मानताच येत नाही. कसे असेल हे परिवर्तन? ते नाही कारण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत, हात देत वर घेत समान संधी देण्याचे धोरण शासनाचे जसे नाही तसेच ते एकुणातील समाजाचेही नाही. कारण जो समाज वर्चस्वतावादाचे वैदिक मुलतत्वे जपतो तो सत्ताधारी समाज, मग पक्ष कोणताही असो, डोक्यावर बसलेला आहे.

म्हणजेच परिवर्तन झालेले नाही. परिवर्तन सामाजिक / राजकीय व्यवहारातीलच नसते...केवळ स्वार्थी गरजांपोटी झालेले नसते तर 
तर परिवर्तन या मानवतेच्या समतेच्या सहृदय भावनेवर झालेले असते. समतेची, मानवतेची भावना अजून भारतात तरी जागी झालेली नसल्याने आणि अजुनही लोकशाहीप्रधान निवडणूकांतही "जात" भावनाच प्रबळ राहत असेल तर आम्ही लोकशाहीलाच नालायक आहोत असे नव्हे काय?

म्हणजे पुण्याचा खासदार मातंग...धनगर किंवा एखादा शिंपी व्हावा यासाठी तिकिट तसे का दिले जात नाही? पुण्यात त्यांचे मतदान कमी आहे! म्हणजे मतदान जात भावनेवरच होते असा विश्वास जर प्रत्येक पक्षात असेल तर परिवर्तन कसे होणार? समता कशी येणार? जातीय समीकरणे लोकशाहीला मारक आहेत...तारक नव्हेत. 

पण राजकीय पक्ष परिवर्तनाला तयार नाहीत. जनताही त्यासाठी तयार नाही. तसेही एकवेळ चालेल पण नेते तरी मग सर्वच जातीयांच्या अखिल कल्यानासाठी प्रतिबद्ध आहेत काय? 

तर तसेही नाही. जातभावना आरक्षनाने नव्हे तर जातीधारित मतदानाच्या अपेक्षांनी वाढवली आहे.

सर्व जातींना खूष करण्यासाठी जातीय महामंडले त्याचीच उपज आहे.

पण हे परिवर्तन नव्हे. हा पुरोगामीपणाही नव्हे. उलट हा सर्वच समाजांना अंतत: रसातळाला नेणारा मार्ग आहे. रहाटाची चाके उलट दिशेने फिरवण्याचा प्रकार आहे. 

याचे कारण म्हणजे हे सर्वच सामाजिक/राजकीय दृष्ट्या शोषित समाज आता थोडे का होईना डोळे उघडू लागले आहेत. त्यांना फार नसले तरी किमान आताच्या लोकशाहीतील आपले नंगेपण, वंचितपण समजू लागले आहे. किंबहुना परिवर्तनाची गरज अन्य समाजांपेक्षा या समाजांना अधिक जानवू लागली आहे. 

आणि काय आहे हे परिवर्तन?

१. सामाजिक समान दर्जा आणि आत्मभान.
२. राजकीय/प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत समान वाटा.
३. समान विकासाच्या संध्या.

किमान या तीन गोष्टी साध्य झाल्या तर, अथवा त्या दिशेने वाटचाल सुरू झाली तर आम्ही ख-या परिवर्तनाच्या दिशेने निघु. या परिवर्तनात "माझ्या जातीचे हित" ही नव्हे तर स्रवच शोषितांचे हित हा मुख्य गाभा असला पाहिजे. म्हणजे धनगरांवर अन्यय होत असेल तर आगरी कोळींसकट सर्व समाज त्यांच्या मागे निस्वार्थीपणे उभ्या राहिल्या पाहिजेत आणि महादेव कोळ्यांवर अथवा कोनाही आदिवासी समाजांवर अन्याय होत असेल तर उरवरीत शोषित समाज त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजेत. यालाच सामाजिक लोकशाही म्हणतात! 

आपल्याला परिवर्तन पाहिजेच आहे. हे परिवर्तन विनाशक/हिंसक पायावर टिकणार नाही तर सृजनात्मक/रचनात्मक पायावर कायमचे टिकेल. जाती सोडा अथवा धरा तो आता मुद्दा नसून सर्वांचे सकल हित हाच मुद्दा आहे. जे शोषक आहेत ते (काही अप्वाद वगळता) आपली भुमिका सोडणार नाहीत. 

आणि जेंव्हा शोषक आपली भुमिका सोडण्याच्या भुमिकेत नसतो तेंव्हा शोषितांनी सकारात्मक भुमिकेतून परिवर्तनाचे आंदोलन छेडले पाहिजे. 

तेंव्हाच ते मुलगामी, कालजेयी आणि सर्वांनाच (शोषकांनाही) हितकारी असे होऊ शकेल! 

Sunday, February 9, 2014

The Flight!


Lonely Path


संस्कृतीचे मापदंड?

परंपरा म्हणजे संस्कृती असे काही लोक मानतात. त्या आधारावरच संस्कृतीचे मापदंड ठरवतात व थोर-उज्वल परंपरांचा अभिमान बाळगतात. आपल्या देशाच्या परंपरांचा अभिमान बाळगण्याची आपण तर अधिकृत प्रतिज्ञाच करत असतो. पण परंपरा म्हणजे संस्कृती नसून परंपरा सांस्कृतीक जीवनाच्या एक भाग आहेत. नवीन परंपरा निर्माण होणे, जुन्या नष्ट होणे अथवा सुसंगत दृष्ट्या बदलवने हे सातत्याने घडत असते. हे ओघ एवढे व्यामिश्र असतात कि एका विशिष्ट "क्ष" काळातील संस्कृती म्हणजे नेमके काय हेसुद्धा ठरवता येणे अशक्य होऊन जाते. काही मापदंडांवरुन कोणत्याही "क्ष" काळच्या सम्स्कृतीचे मुल्यमापन करता येत नाही ते त्यामुळेच. कारण नोंदले न जानारे बोध आणि अबोध प्रवाह तेवढेच प्रभावी ठरतात. उदा. आपल्यकडे आर्थिक इतिहास लिहिलाच न गेल्याने अर्थसंस्कृतीबद्दल तर्क करण्यापलीकडे फारसे आपल्या हाती राहत नाही. तसेच निर्माणकर्ते घटक संस्कृतीनिर्मितीत हातभार लावत असले तरी त्यांचे विश्लेशन व योगदान निश्चित करायला सामग्री सापडत नाही. हे जुन्या काळातच नव्हे तर आताही घडते. धार्मिक संस्कृती आणि राजकीय संस्कृतीबद्दलही आपल्याहाती जी सामग्री येते ती कितपत तटस्थ आहे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जुन्या काळाच्या संस्कृतीबद्दल बोलतांना तथ्यांपेक्षा भ्रम हाच अनेकदा त्याचा आधार असतो. त्यामुळेही संस्कृतींचे यथार्थ मूल्यमापन होत नाही...किंवा करता येत नाही. अशा भ्रमांच्या आधारावर निर्माण करु पाहणारी नव्य संस्कृती एक भ्रम बनू शकते ती यामुळेच!

शिवाय संस्कृतीच्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे मापदंड तरी कोणते असतात? जी सम्स्कृती अधिकाधिक समाज-सुसंगत, हार्मोनियस, एकमय आणि प्रागतिक आहे ती संस्कृती चांगली असे फार तर म्हणता येईल...तरीही श्रेष्ठ-कनिष्ठतेचे (दु)र्गूण तिला चिकटवणे योग्य ठरणार नाही.

या पार्श्वभुमीवर भारतीय संस्कृतीकडे पाहिले तर ती कधीच हार्मोनियस आणि समाजसुसंगत नव्हती असे म्हणावे लागते. भारतात विविध भाषा व प्रादेशिक संस्कृत्या स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्याने एकमयता शक्य दिसत नाही. परस्पर प्रभावांत संस्कृत्या वाढतात हे सत्य मान्य केले तरी त्याचे प्रभावक्षेत्र किती हाही प्रश्न आहेच. परंपरांचे म्हणाल तर असंख्य परंपरा कालौघात आपणच टाकून दिलेल्या आहेत. उदा. वसंतोत्सव/मदनोत्सव हे प्रेमिकांसाठी असलेले उत्सव. आज त्यांची जागा व्ह्यलेंटाईन डे घेते म्हटल्यावर तथाकथित "अ"सांस्कृतिक रक्षकांचा जळफळाट का होतो? वैदिक लोकांचा "इंद्रमह" नांवाचा एक उत्सव असे...त्याचीही परंपरा कधीच लुप्त झाली. अनेक पंथ आले आणि गेले. पांचरात्र संप्रदायाचे तर आज कोणाला नांवही आठवत नाही. आपल्या भाषा जशा मूळ रुपात होत्या तशाच त्या आता राहिलेल्या नाहीत. व्याकरणेही तीच राहिली नाहीत. त्या सातत्याने बदलत्या राहिल्या आहेत. भविष्यातील मराठी कशी असेल याचा अंदाज आपण आज बांधू शकत नाही तो त्यामुळेच!

म्हणजे परंपरा अक्षय्य असू शकत नाहीत. किंबहुना त्या तशा नसाव्यातही. कालसुसंगत नवीन परंपरा निर्माण होणे हा संस्कृती विकसनाचा अपरिहार्य भाग असतो. परिवर्तन हा संस्कृतीचा महत्वाचा निकष आहे. प्रागतिकता...अग्रगामीपणा हा संस्कृत्यांचा मुलाधार आहे. जी संस्कृती स्थितीस्थापक होते तिचा विनाश होऊन नवीन सम्स्कृत्यांनी त्यावर कब्जा करणे हे ओघाने आलेच!

सम्स्कृती धर्म-राजकीय इतिहासावर मुल्यांकित करणे हा आपला मोठा दोष आहे. अर्थसंस्कृती ही धर्म/राजकारणापेक्षा मोठा प्रभाव संस्कृती विकसनावर टाकत असते. १०२२ नंतर भारतात सुरु झालेले भिषण दु:ष्काळ, आक्रमणे व त्यामुळे ठप्प झालेल्या विदेश व देशांतर्गतच्या व्यापाराने आलेले आर्थिक दारिद्र्य यातून भारतीय सम्स्कृतीत जी उलथापालथ झाली तिला जागतिक इतिहासात तोड नाही. आजही आपण नवीन अर्थसंस्कृती निर्माण करण्यात अपेशी ठरलो असून आपली मदार बव्हंशी पाश्चात्त्य अर्थसम्स्कृतीतून उधा-या करण्यावर आहे.

त्यामुळे संस्कृतींच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेवर भाष्य न करता, गतकाळातील महान परंपरांचा अभिमान बाळगत बसण्यापेक्षा नवे सृजन जी करू शकते तीच सम्स्कृती होय...अन्यथा आपल्याला सम्स्कृती आहे अथवा होती हे म्हणण्याला काही अर्थ राहत नाही!  

Sunday, February 2, 2014

सातवाहन: प्राकृत आणि संस्कृत! (२)


"सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." असे विधान करुन वा. वि. मिराशी "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात पुढे म्हणतात कि, "आर्य लोक भारतात आले तेंव्हा त्यांची भाषा वैदिक पद्धतीची संस्कृत होती यात संशय नाही. पण तिच्यातील क्रियापदांचे दहा प्रकार, तीन भुतकाळ, दोन भविष्यकाळ, नाम-सर्वनामांची विविध प्रकारची विभक्ति-प्रत्ययांत रुपे इत्यादि बारकावे त्यांच्याशी व्यवहारात संबंध आलेल्या आर्येतरांना पेलने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील संस्कृत भाषेत परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या. आर्यांनाही त्यांच्याशी व्यवहारात त्यांचा उपयोग करावा लागला."

मिराशींनाच नव्हे तर गेल्या शतकातील सर्वच विद्वानांनी आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत हे केंद्रीय ग्रुहितक ग्राह्य धरलेले आहे. १९ व्या शतकापासून "आर्य" वंश संकल्पनेने अकल्पित विस्तार केला. या संकल्पनेचा जन्मदाता म्यक्समुल्लरने "आर्य हा कोणी वंश मानतो तो मोठेच पाप करतो..." असे म्हणुनही या संकल्पनेने नाझीवाद आणि फ्यसिस्ट विचारांना जन्म घातला. यामागे वंशश्रेष्ठ्त्वाची भावना होती हे उघड आहे. भारतही या विचारांपासून अलिप्त राहिला नाही. "आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथ लिहून टिळकांनी त्यात भरच घातली. उत्तरेतील आर्य व आर्यभाषा व दक्षीणेतील द्राविड व द्राविडभाषा यात सांस्कृतिक व राजकीयही संघर्ष पेटला. आजही त्याचे निराकरण झालेले नाही. वंशवादी लोकांनी आजही "मुलनिवासी विरुद्ध आक्रमक युरेशियन" अशी मांडणी कायम ठेवली आहे व त्याचे प्रतिबिंब दोन्ही बाजुंच्या वैचारिक साहित्य, संशोधने व ललित लेखनांवर पडलेले आढळून येते. त्यामुळे सत्याप्रत जाण्याचे मार्ग दोन्ही बाजुंनी बंद करून ठेवले आहेत असे म्हणने क्रमप्राप्त आहे.

या वादात न शिरता जिनेव्हा (युनेस्को) येथे मानववंश शास्त्रज्ञ आणि जनुकीय शास्त्रज्ञ यांनी जुन १९५१ मद्धे एक मताने जारी केलेल्या निवेदनापासून या प्रश्नाकडे पाहुयात. संदर्भ: The Race Question in Modern Science: The Race Conceipt- Results of an Inquiry, युनेस्को प्रकाशन)

खाली या निवेदनातील मुद्दे थोडक्यात दिलेले आहेत.

१. संपुर्ण मानवजात होमो सेपियन या एकच एक मानवगटातून विकसीत झालेली आहे. एकाच गटातील माणसांचे जगभर वितरण नेमके कधी आणि कसे झाले हे मात्र सांगता येणार नाही.
२. मानवी समाजांत आज दिसनारे शारीरीक (रंग/जबड्यांची ठेवण इ,.) अनुवांशिकी घटना आणि विविध भुभागांतील पर्यावरणीय स्थानिक वैशिष्ट्यांमुळे दिसतात.
३. राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक, आणि सांस्कृतिक विभेदांचा व वेगळ्या वंशाचे असण्याचा काही संबंध नाही.
४. आजवर वंशशास्त्रज्ञांनी शरीरमान/रंगाच्या आधारे कितीही गट पाडले असले वा कल्पिले असले तरी एका विशिष्ट शरीरलक्षणावरून (उदा. रंग) एक गट दुस-या गटापेक्षा वेगळा आहे असे नाही. या गटांत वांशिकी कारणावरून एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ (Superior) आहे अशी जी सध्याची लोकप्रिय संकल्पना आहे ती निराधार आहे.
५. बहुतेक वंशशास्त्रज्ञ मानवी गटांची विभागणी करतांना बौद्धिक क्षमतेचा त्यात अंतर्भाव करत नाहीत. मानवाच्या (कोणत्याही कथित वंशाचा असला तरी) बौद्धिक क्षमता या जन्मजात व तो ज्या समाजव्यवस्थेत राहतो (मानवी पर्यावरण) त्यावर अवलंबून असतात. मानसिक क्षमतेवरून दोन गट पडत नाहीत.
६. संस्कृती आणि सांस्कृतिक उपलब्धी ही जनुकीय फरकांवर अवलंबून नसते.
७. "शुद्ध रक्ताचा वंश" ही संकल्पना सिद्ध करणारा एकही पुरावा पुढे आलेला नाही.

यानंतर आपण Center for Cellular & Molecular Biology  हैदराबाद, University of Tartu, इस्टोनिया,  Chettinad Academy of Research and Education, चेन्नई आणि बनारस हिंदू विद्यापीठाने भारतातील जनसंख्येचे जे व्यापक जनुकीय सर्वेक्षण केले त्यांच्या निष्कर्षाकडे वळुयात.

या निष्कर्षाप्रमाने गेल्या किमान साडेतीन हजार वर्षांपासून भारतात युरेशियन जनुकीय प्रवेश आढळुन येत नाही. भारतातील जनुकीय वैविध्य हे युरेशियापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. युरेशियातून आर्य अथवा आर्यभाषा बोलणारे लोक कधीकाळी आले मत हे जनुकीय पुराव्यांवर टिकत नाही.  "It is high time we re-write India's prehistory based on scientific evidence. There is no genetic evidence that Indo-Aryans invaded or migrated to India or even something such as Aryans existed". असे मत  डा. लालजी सिंग यांनी व्यक्त केले असून ते Center for Cellular & Molecular Biology  चे संचालक होते. हा अहवाल २०११ मद्धे प्रसिद्ध झाला.

वरील बाबींवरून दोन बाबी सिद्ध होतात.

१) आर्य नांवाचा वंश अस्तित्वात नव्हता, हे वंशशास्त्रज्ञांच्या व आताच्या जनुकीय संशोधनाने सिद्ध केले आहे. सध्याच्या ऋग्वेदात १०१२८ ऋचांपैकी फक्त ३४ ऋचांत आर्य हा शब्द ३६ वेळा येतो. हे आदरार्थी संबोधन असून हे संबोधन विशेषता: सुदास राजाला आणि इंद्रादि देवतांना वापरलेले आहे, वंश म्हणून नाही.
२) आर्य अथवा कोणी युरेशियन मानव गट भारतात प्रवेशला हे पारंपारिक मत कोणत्याही आधारावर टिकत नाही.

या नवीन शास्त्रशुद्ध संशोधनांनंतर टिळक, वा. वि. मिराशी ते सर्वच भारतीय विद्वानांची आर्यांविषकची मते बाद होतात हे ओघाने आले. जर आर्य अस्तित्वात नव्हते तर त्यांची संस्कृत भाषा आर्येतरांना पेलत नव्हती म्हणून अशुद्ध झाली आणि  त्यातून प्राकृत भाषा जन्माला आल्या हे मिराशींचे वरचे मतही बाद ठरते. उलट मिराशी येथे अजून एक अत्यंत मोठा विरोधाभास जन्माला घालत आहेत. तो म्हणजे "उच्च थरांमधील लोकांमद्धेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." हे त्यांचे उपरोम्क्त ग्रंथातील विधान. येथे मिराशींना उच्च थर म्हनजे "त्रैवर्णिक" म्हणायचे आहे हे उघड आहे. मिराशी येथे हे विसरले आहेत कि वैदिक धर्मात तिन्ही वर्णांत वेद/वेदांगे/शिक्षा/व्याकरण इ. गुरुगृही जावून शिकणे अनिवार्य आहे. जर वेद संस्कृतात असतील तर स्वाभाविकपणेच या तिन्ही वर्णातील लोकांना संस्कृत येणे अनिवार्य आहे. शिवाय सातवाहन हे ब्राह्मण होते, तत्पुर्वीचे शृंग व काण्व ही राजघरानीही ब्राह्मण होती असे त्यांचेच दावे आहेत. सातवाहनांनी केलेल्या श्रौत यज्ञांचे वर्णन त्यांनी संस्कृतात लिहिण्याऐवजी प्राकृतात लिहिल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलेले आहे. डा. अजय मित्र शास्त्री यांनी "महाराष्ट्र ग्यझेटियर: इतिहास: प्राचीन काळ" मद्धेही असेच वर्णन केले आहे. एकीकडे प्राकृत ही सामान्य जनांची भाषा होती आणि हालाच्या गाथा सप्तशतीतील गाथा ही जनसामान्यांची काव्ये होत असे विधान करतांना अगदी स. आ. जोगळेकर (गाथा सप्तशतीचे संपादक) विसरतात कि गाथा सप्तशतीतील हाल, आढ्यराज, प्रवरसेन ई. हे गाथा रचनाकार राजे व सामंत होते. जनसामान्य नव्हते.

या विवेचनाचा संक्षिप्त अर्थ एवढाच निघतो कि संस्कृतातून आर्येतरांना झेपली नाही म्हणुन प्राकृत निर्माण झाली हे मत चुकीचे आहे कारण कोणताही युरेशियन मानवगट भारतात संस्कृत वा तत्सम भाषा घेऊन आला होता हे मतच मुळात निराधार आहे. त्याला कसलेही (अगदी ऋग्वेदांतर्गतही) पुरावे उपलब्ध नाहीत.

आणि दुसरी बाब म्हनजे तथाकथित उच्च थरही प्राकृतच बोलत होता कारण अन्य भाषा अस्तित्वात नव्हती. त्रैवर्णिक जेही वेद शिकत होते ते आता आहेत त्या संस्कृत भाषेत असणे शक्य नाही कारण तसे असते तर संस्कृतचा पुरेपूर अभाव आपल्या चर्चेत असलेल्या प्रदिर्घ काळात दिसला नसता. उलट सातवाहनांच्या लेखांत ४६० वर्षांच्या कालावधीत प्राकृत संस्कृतात उत्क्रांत होत असल्याचे संकेत कसे मिळतात हे पुढील लेखात पाहु.

(क्रमश:)

Saturday, February 1, 2014

आणि हीच नेमकी.....

जगणे हे महत्वाचे असते
हे जगणा-याला कधीच समजत नाही
समजणारही नाही
कारण
जगणारा जगत जातो
आपल्या मस्तीत
पण
कोणाचे जगणे महत्वाचे हे
नेहमी आजवर मेलेलेच ठरवत आलेत!


आणि हीच नेमकी जगणा-यांची शोकांतिका आहे!

पुष्यमित्र शृंग आणि त्यांची भाषा!


                                                    (Brahmi Inscription on Heliodorus' pillar)


मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याची हत्या करुन त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग इसपु १८४ मद्धे सत्तेवर आला. मौर्य घराण्याचे तत्पुर्वीचे सारे लेख प्राकृतात आहेत हे आपण पाहिले. शृंग घराणे हे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे मानले जाते. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहिली गेली तसेच त्याने दोन अश्वमेध यज्ञ केले असे म्हटले जाते. अशोकानंतरचे मौर्य राजे हे बौद्ध धर्मीय असल्याने त्यांचे शिलालेख प्राकृतात होते असे जरी गृहित धरले तर मग वैदिक धर्माचा समर्थक आणि प्रोत्साहनकर्ता आणि बौद्ध धर्माचा विरोधक पुष्य़मित्र शृंगाने तरी संस्कृताचा आश्रय घेतला असता. पण तसे दिसत नाही.

शृंग घराण्याने इसपू १८४ ते इसपु ७३ या कालात (जवळपास १११ वर्ष) राज्य केले. सम्राट अशोकाच्या निधनानंतर अवघ्या ५० वर्षात शृग घराणे सत्तेत आले. शृंग नेमके कोणत्या वंशाचे/जातीचे/वर्णाचे याबातचा तिढा विवादास्पद असला तरी भारतीय विद्वानांचे हे घराने ब्राह्मण होते असे साधारण मत दिसते. प्रस्तूत विषयाशी अर्थात त्याचा संबंध नसल्याने या विषयात फारसे जाण्याचे हशील नाही. परंतू अशोकानंतर अवघ्या ५० वर्षांत सत्तेवर आलेले आणि बौद्धधर्म विरोधी असलेल्या शृंग घराण्याच्या कालात किमान शृंगांनी जर अस्तित्वात असती तर संस्कृत भाषेचा उपयोग केला असता हे उघड आहे, मग जनभाषा काहीही असो.

येथे एक लक्षात घ्यायला हवे कि छ. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर आपल्या नाण्यांवर संस्कृतला स्थान दिले. एवढेच नव्हे तर राज्य व्यवहार कोशही संस्कृतात बनवून घेतला. प्रस्थापित फारसीला राजकीय दृष्ट्या नाकारले. शृंग बौद्धधर्मविरोधी असल्याने  व वैदिकाभिमानी असल्याने त्यांची राजभाषा वैदिक संस्कृत असायला हवी होती. पुष्यमित्र शृंगाच्या कालात नसली तरी पुढील अग्नीमित्रापासुनच्या पिढीत तरी संस्कृत अवतरायला हवी होती. पण तसा एकही पुरावा मिळत नाही.

पुष्यमित्राच्या अश्वमेधांची माहिती मिलते ती अयोध्या येथे   आणि पुराणांत. त्याने कोनतीही नाणी पाडलेली दिसत नाहीत कारण बहुदा त्याने राज्याभिषेक न करता आपले मुळची "सेनापती" हीच पदवी कायम ठेवली म्हणून.

पुष्यमित्रानंतर मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या प्रसिद्ध नाटकाचा नायक अग्नीमित्र सत्तेवर आला. मथुरा विभागात त्याची नाणी सापडलेली आहेत. त्याची नाणी सर्वस्वी प्राकृत भाषेत असून त्यावर "अग्गीमितासा" असे अग्नीमित्राचे मुळचे नांव पंच केलेले आहे. हेही संस्कृतचे अस्तित्व नसल्याचा पुरावा आहे. कारण भाषा कोणतीही असो...नांवात कोणी बदल करत नाही अथवा नांवाचे भिन्नभाषित रुपांतरे वापरत नाही कारण लिपी एकच आहे व ती म्हनजे ब्राम्ही. ब्राह्मीत नंतरच्या काळात संस्कृत लेखही ब्राह्मी लिपीतच लिहिले गेलेले आहेत. म्हनजे ब्राह्मी लिपी व्यक्तिनांवाचे मूळ रुप (जे आपल्याला आज संस्कृतच मुळचे वाटते) लिपीबद्ध करायला कोणतीच अडचण नव्हती.

थोडक्यात "अग्गीमित" हेच मुळचे नांव असून अग्नीमित्र हे नंतरचे संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. पुष्यमित्राचेही अयोद्ध्या लेखात नांव "पुस्समित सूग" असे आहे व त्याच्या वंशाला "सुगाना" असे म्हटले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. (कनिंगह्यम : Coins of India).  शृंगांच्या काळातील असंख्य शिलालेख उपलब्ध झालेले आहेत, परंतू ते सर्व प्राकृतात आहेत. काही शब्द मात्र प्राकृताकदून संस्कारित होतांना दिसतात. उदा. अधित्थावना या प्राकृत शब्दाचे रुप अधिष्ठापना. अशी अनेक अर्ध-संस्कृत ते संस्कृत शब्दरुपे या कालात भारहूत, सांची येथील शूंगांच्या अखत्यारीत असलेल्या भागांत पहायला मिलतात...परंतु लेख प्राकृतात आहेत. (Epigraphical Hybrid Sanskrit: Th Damsteegt.)

दानभूती हा शृंग वंशातील राजा मानला जातो. कनिंगह्यमच्या मते तो शृंगांचा सामंत असावा. भारहूत येथे एका दानलेखात त्याचेच नांव "वच्छीपुत दानभूती" असे कोरलेले आहे. हे प्राकृतात आहे हे उघड आहे. भारहूत येथीलच एका लेखात "सुगाना राजे" असा शृंगांचा उल्लेख आहे.

या काळात संस्कृत राजभाषेतही होती याचा एकही पुरावा नाही. उदा. ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा शृंगांच्या दरबारी इसपू ११० मद्धे होता. त्याचा शॄंगांची तत्कालीन राजधानी विदिशेजवळ एक गरुडस्तंभ आहे. त्याने तो पांचरात्र संप्रदायातील तत्कालीन पूज्य देवता वासुदेवाला अर्पण करण्यासाठी उभारला. (पहा: पांचरात्र संप्रदाय) या स्तंभावर त्याने लेख कोरवला असून तो सर्वस्वी प्राकृतात आहे. एक परकीय राजदूत लेख कोरवून घेतांना प्राकृत भाषा वापरत होता ही संस्कृत भाषेची सर्वस्वी अनुपस्थिती दर्शवते.

या लेखात "गरुडध्वजो" व "देवदेवासा" हे अर्ध-संस्कृत रुपांतर सोडता अन्य मजकुर सर्वस्वी प्राकृतात आहे. म्हनजेच काही शब्द सोयीसाठी (देवदेवस्य ऐवजी देवदेवासा) संक्रमनावस्थेत होते. शृंगांच्या कालातही संस्कृत अस्तित्वात नसून ती बनत होती. शब्दांची सुलभ रुपांतरे होऊ लागली होती. अस्तित्वात असती तर अशी मिश्र रुपांतरे न मिळता शुद्ध रुपांतरे दिसली असती.

शृंग घराणे वैदिकाभिमानी असल्याने (वा तसा समज असल्याने) त्यांच्या १११ वर्षांच्या राजवटीत कोठेतरी, एकतरी शुद्ध अथवा वैदिक संस्कृतातील लेख मिळायला हवा होता. (कारण वेद मुलता:च वैदिक सम्स्कृतात लिहिले गेले असा सर्वसामान्य समज आहे म्हनून) परंतु प्रत्यक्षात शृंग कालात विकसीत होनारी...संस्कृत बनू पाहनारी प्राकृत व तीही काही शब्दरुपे मिलतात. शुद्ध सम्स्कृत म्हनता येईल असा लेख सोडा एखाद-दुसरा शब्दही मिळत नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.

सर्वात महत्वाचे असे कि पुष्यमित्र शृंगाने दोन अश्वमेध केले हे प्राकृतातील लेखानेच नव्हे तर कालिदासाच्या नातकाने व पुराणांनीही सांगितले आहे. अश्वमेध यज्ञविधी यजुर्वेदांतर्गत येत असून सध्या हा वेद वैदिक सम्स्कृतात आहे. प्रश्न असा आहे कि वैदिक सम्स्कृत अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा शृंग घराण्याच्या व तत्पुर्वीच्या कालातील एकाही नानक-अथवा शिलालेखात मिळत नाही तर वेद त्या काळी नेमके कोणत्या भाषेत होते?


 (हेलिओडोरसचा गरुडस्तंभ "खांबबाबा" म्हणुन विशेषत: कोळ्यांकडुन पुजला गेलेला आहे.)

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...