Monday, March 31, 2014

असूरवेद



(या कादंबरीचे प्रा. हरी नरके यांनी केलेले परिक्षण "देशोन्नती" मध्ये दिनांक २६ फेब्रुवारी २०११  रोजी  प्रसिद्ध झाले होते! तो लेख इथे आहे तसा देत आहे. )

असूरवेद, संजय सोनवणी आणि समाजदर्शन 


संजय सोनवणी हे मराठीतील ताज्या दमाचे प्रतीभवान साहित्यकार आहेत. त्यांनी विविध वाड:मय प्रकार हाताळले असून, दर्जेदार वैचारिक पाया आणि खोलवरचे सामाजिक भान यांच्यामुळे त्यांचे लेखन लक्षवेधी ठरले आहे. 'असुरवेद' ही त्यांची भारत बुक हाउसने प्रकाशित केलेली नवी कादंबरी म्हणजे आजवरच्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उध्वस्त करणारी स्फोटक थरार कथा आहे. एकूण वेद चार आहेत अशी लोकसमजूत आहे. तथापि जागतिक कीर्तीचे विद्वान प्रो. एफ. म्याक्सम्युलर यांच्या "हाइम्स ऑफ अथर्व वेद"  महाग्रंथात त्यांनी आठ वेद असून; असुरवेद, सर्पवेद, गंधर्ववेद आणि पिशाच्चवेद असे आणखी चार वेद आहेत अस्तित्वात होते हे दाखवून दिलेले आहे. भारताचा सांस्कृतिक इतिहास जसा सांगितला जातो, तसा तो नाही, त्यात फार मोठी झाकपाक आहे , दडवादडवी आहे. आणि हे अनेक संशोधकांनी सप्रमाण मांडलेले आहे.

यज्ञधर्मीय (वैदिक) हे मुळचे असुर समाजातील होते. जातीयता हा संपूर्ण भारतीय समाजाला पोखरणारा रोग आहे. धार्मिक वर्चस्वासाठी धर्मात विकृती निर्माण करण्यात आल्या. 'असूरवेद' ही असुर लोकांची महान निर्मिती होती. त्याला अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणात अथर्ववेदाचा उपवेद असे म्हटलेले आहे. इसवी सनापूर्वी सुमारे २,८०० वर्षापूर्वी तो लिहिला गेला असावा. सुरेश जोशी या इतिहास संशोधकाला त्याच्या जुनाट हस्तलिखिताची कोणत्याही क्षणी तुकडे पडतील इतके जीर्ण झालेल्या भूर्ज पत्रावरची प्रत मिळते. जोशी हे एका विद्यापीठाचे पुरातन-इतिहास विभागाचे प्रमुख असतात. ब्राह्मी लिपीतल्या पैशाची भाषेतील या वेदाचे हस्तलिखित नष्ट केले जाइल या भीतीने ते हा ठेवा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची स्कॅन प्रत इन्टरनेटवर टाकतात. पुढे त्यांचा खून होतो. त्यांच्या मुलाची हत्या होते. त्यांची कन्या सायली हि प्रसन्नतेचा अनंत शिडकावा करणारे मेधावी व्यक्तिमत्व असते. ती "वैष्णविझम and इट्स इम्प्याक्ट ऑन सोशल कॉन्शस्नेस" या विषयावर पी. एच. डी.चे संशोधन करीत असते. त्यासाठी ती तिरुपती बालाजी, पंढरपूर अशा ठिकाणी प्रवास करीत असते. त्या प्रवासात तिची गौतम कांबळेशी ओळख होते. तोही पी. एच. डी करीत असतो. भारतीय धर्मेतिहासावर त्याचे काम चालू असते. पुंडरीकाची समाधी, द्विभुज विठ्ठल, मल्लिकार्जुन, दिंडीरव, लखुबाई उर्फ रखमाई या सार्यातून त्याच्यापुढे काही प्रश्न निर्माण झालेले असतात. विठ्ठल लोकजनांचा लोकदेव होता, कि आणखी काहि ? पौन्ड्रिक, पुंडरिक, पांडुरंग असा प्रवास असावा काय ? पुंडलिकाची समाधी म्हणजे शिवालय आहे काय ? विठ्ठलाच्या मूर्तीवर ( छातीवर ) कुटमंत्र नाही आणि मस्तकावर शिवलिंग नाही. टोपालाच शिवलिंग समजावे अशी प्रथा आहे. मूळ मूर्ती माढ्याच्या विठ्ठलासारखी होती, असे डॉ. रा.चि. ढेरे यांचे मत आहे. हरी-हर ऐक्य साधण्यासाठी हे पांडुरंग महात्म्य तयार करण्यात आले काय ? अशा विविध प्रश्नांची ते चर्चा करतात. इतक्यात सायलीला तिच्या इतिहासकार वडिलांचा खून झाल्याचे समजते. ती तत्काळ गावी पोचते. तिचा मोठा भाऊ अमेरिकेतून निघालेला असतो. त्याच्यावरही विमानतळावर प्राणघातक हल्ला होतो. तिच्या दुसर्या भावाला हार्ट अट्याक येतो. कोण असतात खुनी ? ते का हल्ला करतात ? असुरवेदाचे हस्तलिखित पळवून नष्ट करण्याच्या प्रयत्नात काही वर्चस्ववादी संघटना असतात? त्यांना यश मिळते काय, सायली ही जोशींची धीराची मुलगी. गौतमच्या सहाय्याने वडिलांच्या खुन्यांचा शोध घेत राहते. प्राचीन मूर्तीच्या तस्करीतून जोशींची हत्या झ्याल्याची अफवा पोलीसामार्फ़त पसरवली जाते. पेपरब्याक मधील २८४ पानांची हि थरारकथा वाचकांना खिळवून टाकते. एकदा हातात घेतल्यावर वाचून पूर्ण होईपर्यंत थांबता येत नाही अशी विलक्षण वेगवान कथा आहे. प्रवाही भाषा आहे. बौद्ध नायक आणि ब्राह्मण नायिका त्यांच्या शोधातून शेवटी काय बाहेर येते ? चित्र शैलीतील हि मूळ कादंबरी वाचूनच समजून घेतलेले बरे !

मराठीत दर्जेदार वैचारिक लेखन आहे, ज्येष्ठ प्रतीचे ललित लेखन आहे, या दोहोंचा मेळ घालणारेही काही प्रयत्न या कादंबरीत झालेले आहेत. संजय सोनवणी यांची हि कादंबरी म्हणजे वाचनीयता, वैचारिकता, व्यामिश्र, समाजचित्रण आणि भारतीय जातीयतेची पाळेमुळे यांना गवसणी घालण्याचा लक्षणीय प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न उपेक्षित राहायचा नसेल,  वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे. कारण तो असुरवेद लोकांसमोर येऊ नये अशीच प्रस्थापिकांची इच्छा होती. त्याच्या अस्तित्वाने त्यांची आसने गडगडणार होती. तो मातीत गाडला तरच ती शाबूत राहणार होती. पिढ्यानपिढ्याचा दंभ अबाधित राहणार होता; मात्र तसं घडणार नव्हत ! "सत्य काही काळ दडपता येत, सर्वकाळ नाही " या सार्वकाल्पनिक नियमान सत्याच दर्शन होताच भयाकुळ झालेल्या प्रस्थापितांच्या हडकंपाची धारधार कहाणी म्हणजे "असुरवेद" आहे ! रहस्य कथेला तत्वज्ञान आणि विचारधारेची नवी उंची देणारी मराठीतील हि महत्वाची कादंबरी आहे. -----
भारत बुक हॉउस १७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे ४११०३० (फोन ९८५०७८४२४६/०२०-३२५४९०३२) कडून मागवून अवघ्या ९५ रुपये किमतीची हि कादंबरी प्रत्येकाने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशीच आहे. कल्पित आणि वास्तव यांचे भन्नाट रसायन या कादंबरीत आहे. संजय सोनवणी यांचे व्यक्तिचित्रण ठसठसित आहे. सामाजिक वास्तवाचे अनेक पदर त्यांनी चिमटीत पकडून उलगडून दाखवले आहेत.

प्रा. हरी नरके , महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ, पुणे-४११००७.

आदमी नही यहां भी वहां भी...!

चलो...
चलता हैं
आदमी हैं यहां भी
वहां भी....
यहां भी पत्थर फेंके जाते हैं
पत्थर फेंके जाते हैं वहां भी....
जख्मी...
लहूलुहान आदमी
यहां भी हैं
वहां भी...

मगर फिक्र न कर ऐ आदमी
आदमियत नहीं हैं
यहां भी
वहां भी
....
....
आदमी गया तो गया कहां?
...
...
ढूंढते रहो....
आदमी नही
यहां भी
वहां भी!

Saturday, March 29, 2014

गुढीपाडवा !

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली. "तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन" अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या "गाथा सप्तशती" सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, "लीलावई" सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या "प्राकृतप्रकाश" या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.

त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही.
संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.

आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सतवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याचे "कथा सरित्सागर", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे.

एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"

एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.

नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
दुसरे महत्वाचे असे कि "शालिवाहन शक" असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही "सालाहन" अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे "शालिवाहन" केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.

"साल" हा शब्द आपल्याकडे आला तो सनपुर्व दुस-या तिस-या शतकात. हा मुळचा पारशी भाषेतील शब्द. अनेक ब्यक्ट्रीयन, शक राजे पारशी धर्माचे होते, सम्राट कनिश्क तर पारशी धर्माचा अभिमनी होता. अहूर माझ्दाची भक्ती करत होता हे त्याच्या राबटक शिलालेखावरुनच सिद्ध होते. त्यामुळे साल हा शब्द आपल्याकडे इस्लामी राजवटीच्या काळात परिचित झाला या मतात अर्थ नाही.

खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.

Wednesday, March 26, 2014

राजसत्ता...धर्मसत्ता ....

राजसत्ता...धर्मसत्ता
नवविचारांना घाबरून असते
हे खरे आहे...
पण जेंव्हा आपण स्वत:च
(कधी आपल्याच)
विचारांना घाबरु लागतो
त्यावेळीस मात्र
आपण खरेच घाबरायला पाहिजे...
आपल्या दीन...कणाहीन झालेल्या
 स्वभावासाठी!

Tuesday, March 25, 2014

मित्रहो,


मित्रहो,
माझे विचार माझे नाहीत
ते गतकाळाचे संचित
वर्तमानाचे भान
आणि भवितव्याचा
आक्रोश आहेत...

म्हणून ते सर्वांचे आहेत!

Monday, March 24, 2014

तरच आपण स्वतंत्र असतो!

लोकांना आजही भाकडकथा सांगत,
कोणाचे तरी काल्पनिक भय दाखवत,
ठसवत,
प्रसंगी आक्रमक होत
वैचारिक गुलाम निर्माण करणा-या
संघटनांचे
आणि त्यांचे गुलाम असणा-या
कथित विचारवंतांचे
आज प्राबल्य वाढत आहे.

मित्रहो, काल्पनिक भयाने भयभित होऊ नका...
भयदायक असे संपुर्ण विश्वात काहीएक नाही
स्वत:ची स्वतंत्र बुद्धी वापरा...
संघटना बनवणे हाच मुळात गुलामीकडे जायचा
आणि इतरांनाही
वैचारिक गुलामीच्या गटारात
नेण्याचा मार्ग आहे
त्यापासून नेहमीच सावध रहा!

आदिमानवाने झुंडी बनवल्या
काल्पनिक भयापोटी
टोळ्या बनवल्या
तो टोळीवाद आजही जीवंत किती!

भेकड लोकच झुंडी बनवतात...टोळ्या बनवतात...
संघटना बनवतात...
भेकडांना अधिकच भेकड बनवतात
भेकडाची हिंसकता अधिकच भयावह असते
आणि यच्चयावत विश्वात
अशा भेकडांच्या यादीत जावू नका
स्वतंत्र व्हा
स्वत:चे विचार विकसनशील ठेवा
कोणाही गतकाळातील
वर्तमानातील
महापुरुषांना अंतिम मानू नका
विश्वात मुळात अंतिम असे
काहीएक नाही
पुढे चाला...
अग्रगामी व्हा...जसा काळ अग्रगामी असतो...

तरच आपण स्वतंत्र असतो.
तीच ख-या स्वातंत्र्याची महत्ता आहे! 

Friday, March 21, 2014

केसांत माळूनी चांद!

केसांत माळूनी चांद 
उभी ती रात्र
शिरशिर उरी...हुरहूर उरी
अन मोहोरलेले गात्र!


Wednesday, March 19, 2014

आदिवासी


Image result for nomadic tribes india dhangar

"आजच्या सर्वांचेच पुर्वज आदिम काळातील 

आदिवासी आहेत. शेतीच्या शोधाने माणूस स्थिर 

झाला आणि नागर संस्कृती आकाराला येवू लागली. 

नागर संस्कृतीत सामील होनारे बव्हंशी लोक हे 
इहवादी, भोगवादी आणि चंगळवादीही होते. परंतु याच समाजातील एक घटक असाही होता जो अरण्याशी, साध्या जगण्याशी असलेली नाळ तोडू इच्छित नव्हता. त्याने गहन अरण्यांतच निसर्गासोबत जगणे-राहणे व तल्लीन होणे पसंत केले. काही  पशुपालनाचे आदिम पेशे सांभाळत रानोमाळ भटकंती करत राहिले. धनगरादि काही पुरादिम जमातींना शासन एकीकडे भटके आदिवासी मानते, पण त्यांना आदिवासींच्या सोयी-सवलतींपासून वंचित ठेवते ही विसंगती आहे. ज्यांना दिल्यात त्याही त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीत. एकंदरीत अनास्थाच आहे.  

"नागरी संस्कृती ही मुळात कृत्रीमतेच्या पायावर 
उभी आहे. तिचे साहित्य-कलाविश्व हे नजाकतीने भरलेले असेल पण त्यात आदिवासींच्या कलांचा जोम आणि जोश नाही. नागर संस्कृतीचे जीवनविचार आणि आदिवासी संस्कृतीचे जीवनविचार यात फार अंतर राहणे स्वाभाविकच होते. परंतू अलीकडे आदिवासी संस्कृतीचेही नागरीकरण होत आहे. एकीकडे जगभर एक मतप्रवाह आहे कि आदिवासींच्या जीवनपद्धतीत आधुनिक नागरी संस्कृतीने हस्तक्षेप करु नये. आणि दुसरा मतप्रवाह आहे कि आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि राजव्यवस्था यात त्यांना सहभागी करून घेतलेच पाहिजे. आपल्या देशत यावर फारसा मुलगामी विचार झालेला नाही.

"दुसरे असे कि लोकसंख्या विस्फोटामुळे अरण्ये 
आकुंचित होत गेलेली आहेत. आदिवासींच्या नैसर्गिक अधिवासांना आकुंचित केले गेले आहे. खाणी, धरणे, तदनुषंगिक प्रकल्प यामुळे त्यांच्या जीवनकेंद्रांवरच नागरी संस्कृतीने घाला घातला आहे. आधुनिक वनकायद्यांमुळे अरण्य हेच हजारो वर्ष ज्यांच्या जीवनाचा आधार त्या आदिवासींचे मुलभूत अधिकारच नाकारले गेलेले आहेत. एकीकडे प्रशासन व दुसरीकडे नक्षलवादी या कचाट्यात आदिवासी सापडला आहे.

"आदिवासींबाबतच्या नागर समाजाच्या धारणा 

पोकळ व सिनेमाधारित असल्याने त्या अत्यंत खोट्या आहेत. मधुकर रामटेकेंचे "आम्ही माडिया" हे कथन वाचतांना ते प्रकर्षाने जाणवते. आदिवासी साहित्याचा पहिला उद्गार म्हणून वाल्मिकीकडे पाहिले जाते. आता असंख्य आदिवासी प्रतिभाशाली लोक लिहिताहेत...पण मुख्य प्रवाहात त्याची निरलस दखल घेतली जात नाही. खरे आदिवासी जीवन, त्यांचे जीवनविषयक विचार आम्हा नागरजनांना समजून घ्यावे वाटत नाहीत. डा. तुकाराम रोंगटे यांनी आदिवासी साहित्याचा चिंतनशील अभ्यास करून आम्हा नागरजनांसमोर एक जजळीत वास्तव मांडले आहे. त्याचे आम्ही स्वागत करायला हवे!"

- "आदिवासी साहित्य: चिंतन आणि चिकित्सा" या 


डा. तुकाराम रोंगटे लिखित ग्रंथाच्या प्रकाशन 

समारंभात मी मांडलेले काही मुद्दे. हा कार्यक्रम 

विद्यापीठात, नामदेव सभागृहात झाला. 

अध्यक्षस्थाने डा. नागनाथ कोतापल्ले होते. डा. 

श्रीपाल सबनिस, डा. अविनाश आवलगांवकर, डा. 

संजय लोहकरे यांचीही भाषणे या प्रसंगी झाली. 

Sunday, March 16, 2014

"आषाढातील एक दिवस"



 आताच मोहन राकेश यांचे ज्योती सुभाष यांनी अनुवादित केलेल्या आणि अतूल पेठेंनी दिग्दर्शित केलेल्या "आषाढातील एक दिवस" या अभिजात नाटकाचा प्रयोग पाहून आलो.

सारी माणसे आपापल्या परिस्थितीचे बळी असतात. भावनांच्या लाटांवर वाहवत जाणारे शहाणपण गमावत परिस्थितीचे गुलाम होतात आणि आपल्या चुकांची जाण जेंव्हा होते तेंव्हा काळ एवढा पुढे वाहत गेलेला असतो कि सारे काही दुरूस्तीच्या पार गेलेले असते. प्रतिभा असने आणि जगणे यातील सांधा कधी तुटतो हे समजतच नाही... कधीकधी व्यवहार प्रतिभेवरही मात करून प्रतिभावंताला गारद करतो...!

चिरकालिक सत्ये मांडनारी ही कलाकृती आहे. सर्वांनी एकदा तरी ती पहायला हवी. या नाटकातील महाकवी कालिदास, त्याची प्रेयसी मल्लिका, आई अंबिका, विलोम...सर्व पात्रे प्रातिनिधिक बनत जणू काही एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वात खोल कुहरात दडून बसलेली व्यक्तित्वे उलगडत जातात...आत्ममग्न करतात...व्यथित करतात आणि आपण आपलेच जगणे कसे हरपत जातो ते दर्शवितात.

थोडक्यात आपल्याच जगण्यावर चिंतन करायला भाग पाडणारी ही कलाकृती आहे.

मल्लिकाची भुमिका करणारी पर्ण पेठे एक विलक्षण अभिनेत्री आहे हे "सत्यशोधक" पाहतांनाच लक्षात आले होते. या नाटकातील अत्यंत वेगळी भुमिका तिने साकार केली आहे. कालिदासाची भावविभोर ते उध्वस्त रुपे समर्थपणे पेलणारा आलोक राजवाडे, कालिदासाच्या मित्राची किंचित खलनायकी छटा असलेल्या विलोमचे पात्र साकार करणारा ओम भुतकर आणि मल्लिकेची आई अंबिकेची भुमिका करणा-या ज्योती सुभाष यांनी आपापल्या अभिनयशक्तीच्या जोरावर संपुर्ण नाटकाला एका मनस्वी लयीत गुंफले आहे. अतूल पेठेंना नेहमी नवनवी आव्हाने घ्यायला आवडतात...एक मनस्वी दिग्दर्शक...त्यांना सलाम!

Monday, March 10, 2014

अश्रुंनी माझ्या...



अश्रुंनी माझ्या नेहमीच आनंद गावा
मन कोमल तरी प्रत्येक घाव झेलावा
थेंब थेंब रक्तातून उमलावे असले मळे
कि दिन उद्याचा माझी तुम्हा भेट व्हावा!

Friday, March 7, 2014

मराठ्यांना आरक्षण मिळनार?


मराठा आरक्षणाच्या मागणीचे वादळ गेली दोन वर्षे घोंगावत आहे. मराठा तरुण आरक्षणाकडे डोळे लावून बसला असून आरक्षण मिळाले कि आपल्या सर्वच समस्या दूर होतील या भ्रमात नेण्यात मराठा आरक्षणवादी नेते यशस्वी झाले आहेत. केंद्र सरकारने नुकतेच जाट समाजाला ओबीसींत घेऊन आरक्षण दिल्यामुळे मराठा तरुणांची आशा अजून पल्लवीत झालेली आहे. हे सारे खरे असले तरी वास्तव काय आहे? आरक्षणाच्या निमित्ताने मराठा तरुणांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे काय? किंबहुना मुस्लिमांसाठीही आरक्षण देण्याबाबतच्या चर्चा अधून मधून झडत असतात यामागे नेमकी राजकीय नेत्यांची रननीति नेमकी काय आहे? कोनत्याही समाजाचे आरक्षण बहाल केल्यानेच कल्याण होईल अशी जी भावना निर्माण झालेली आहे ती कितपत संयुक्तिक आहे? या प्रश्नांवर आपल्याला गांभिर्याने विचार केलाच पाहिजे. आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक यांच्या भुमिकाही नव्याने तपासून पाहिल्या पाहिजेत.

आधी आपण मराठा आरक्षणाबाबतचा इतिहास पहायला हवा. खरे तर कोणत्या जातीला कोणत्या गटात घ्यायचे, किती टक्के आरक्षण द्यायचे या बाबी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अखत्यारीत येतात. मराठा आरक्षणाची मागणी जुनी असून आजतागायत सहा वेळा राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशीच भुमिका घेतली आहे. तरीही मराठा आरक्षणवादी विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी, प्रसंगी आक्रमक होत, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका घेतली. त्याची फलश्रुती म्हणजे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाहणी समिती नेमली गेली. या समितीने नुकताच आपला अहवालही सादर केला आणि तो अहवाल स्वीकारण्यापुर्वी राज्य मागासवर्ग आयोग आणि कायदेतज्ञांकडे मत मागवण्यासाठी सोपवला गेला. इतक्या अल्पावधीत अहवालाचा सखोल अभ्यास करून दोन्हीकडून मत नोंदवले जाण्याची शक्यता नाही हे मंत्रीमंडळाला माहित असलेच पाहिजे. आता आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतीतील निर्णय लोकसभा निवडणुकींनंतरच लागू शकेल...आणि तो काय असेल याचे भाकित वर्तवण्याआधी आपण मराठा आरक्षनाचे इतर पैलू पाहुयात.

घटनाकारांनी आरक्षण अशाच समाजघटकांना दिले आहे जे सामाजिक व्यवस्थेत एकुणात दुर्लक्षित, शोषित आणि वंचीत घटक आहेत.   ज्यांना राजकीय व्यवस्थेत निर्णयप्रक्रियेत कधीही स्थान मिळालेले नाही व आरक्षनाखेरीज ते मिळणेही शक्य नाही. त्यामुळे शिक्षण, नोक-या आणि राजकीय प्रतिनिधित्व असे एकत्रीत प्यकेज आरक्षणात सामाविष्ट केले गेलेले आहे. यात मराठा समाज कोठे बसतो हे आपण बघितले तर लक्षात येईल कि मराठा समाज कोठे गरीब असेल पण तो कधीही शोषित, वंचित आणि दुर्लक्षित समाज नव्हता व नाही. किंबहुना गांवगाड्यातील प्रतिष्ठित असाच हा वर्ग होता व आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळे आरक्षनाचे मुलतत्वच या समाजाला लागू पडत नाही व त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागासवर्गीय मानण्यास नकार दिला होता हे वास्तव मराठा तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व. राणे समितीच्या मते मराठा समाज ३०% आहे. समजा जरा वेळ ते खरे मानले तरी राजकीय प्रनिनिधित्वात या समाजाचा वाटा हा ६५% आहे. म्हनजेच लोकसंख्येच्या दुप्पटीपेक्षा अधिक प्रतिनिधित्व हा समाज उपभोगतो आहे. यावरील युक्तिवाद असा कि काही विशिष्ट घराणीच हे प्रतिनिधित्व राखून आहेत. परंतू हा युक्तिवाद कामाला येत नाही कारण ग्राह्य धरली जाते ती प्रतिनिधित्वाची आकडेवारी. विशिष्ट घराण्यांच्या हाती सत्ता एकवटली असेल तर तो दोष घटनेचा नसून समाजाचा आहे. याशिवाय आजची ग्रामीण अर्थव्यवस्था व शिक्षणव्यवस्था (साखर कारखाने, सुतगिरण्या, पतसंस्था, जिल्हा सहकारी ब्यंका, शिक्षनसंस्थामुळे) यावर प्राबल्य मराठा समाजाचेच आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. 

पण एकुनात या बाबींचा विचार न करता आरक्षणवादी नेत्यांनी मग दुसरी मागणी पुढे रेटायला सुरुवात केली कि आम्हाला राजकीय आरक्षण नको...फक्त शिक्षण आणि नोक-यांत द्या. यातील लबाडी अशी आहे कि फक्त शिक्षण आणि नोक-यांत आरक्षण देता येत नाही. आरक्षण हे प्यकेज आहे. ते तोडून द्यायचे तर घटनादुरुस्तीच करावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारने समजा फक्त शिक्षण व नोक-यांत आरक्षण दिले तर कोणीही मराठा सर्वोच्च न्यायालयात जाऊन सहजपणे राजकीय आरक्षणही पदरात पाडून घेऊ शकेल. हे आरक्षणवादी नेत्यांना माहित आहे. तरीही महत्वाचा प्रश्न असा उरतो कि मुळात मराठ्यांना आरक्षण देता येईल का, हा. 

मराठा तरुण शिक्षणात मागास असून गरीबीत आहे असा दावा सुरुवातीपासून केला जात आहे. या दाव्यात तथ्य नसेल असे नाही. गरीबी ही सापेक्ष संकल्पना असून त्या दृष्टीने सर्वच समाजांत गरीब आहेतच. ज्यांना आरक्षण आहे अशा समाजघतकांतही आजही गरीबी मोठ्या प्रमानात आहेच तसेच उच्चवर्णीय म्हनवल्या जाणा-या ब्राह्मणादि समाजातही गरीबी आहे. परंतू मुळात आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीबी दूर करण्यासाठी अन्य असंख्य शासकीय योजना आहेत व त्याचे लाभार्थी कमी नाहीत. शिक्षणातही फीमद्धे गरीबांना सवलतीची सोय आहेच. त्यामुळे मराठा समाजात गरीबी आहे हा मुद्दा कोणत्याही तत्वावर आरक्षनासाठी टिकत नाही.  

दुसरा मुद्दा आहे तो आरक्षनावरील ४९% मर्यादेचा. राणे समिती तमिळनाडुच्या धरतीवर आरक्षनाची मर्यादा वाढवता येऊ शकते असे म्हनते. वास्तव हे आहे कि तमिळनाडू सरकारचा अधिक आरक्षण देण्याचा निर्णय मंडल आयोग लागू करण्याआधीचा होता. सर्वोच्च न्यायालयाने ती अपवादात्मक बाब असल्याचे सांगत ४९% हीच आरक्षणाची मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेही मराठ्यांना आरक्षण दिल्याने ४९% ची मर्यादा ओलांडली जानार असल्याने घटनादुरुस्ती केल्याखेरीज हे आरक्षण प्रत्यक्षात येणे शक्य नाही हे उघड आहे. राज्य सरकारने असे आरक्षण जरी दिले तरी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल हेही सुर्यप्रकाशाइतके उघड आहे. अशा स्थितीत हा घाट का घातला जात आहे यावर आपण विचार करायला हवा.

मराठा व्होट ब्यंक पक्की करण्यासाठी आरक्षणाचा हा घाट कोंग्रेस/राष्ट्रवादीने घातला आहे असा जो आरोप होतो तो वास्तवच आहे. निवडणुकीच्या तोंडावरच आजवर मराठा आरक्षनाचा विषय रेटला जातो व थातुर-मातुर प्रयत्न केल्याची नाटके केली जातात हेही लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकींनंतर आम्ही आरक्षण देवू असे सांगत लोकसभेचे रणमैदान सर करण्यासाठी राणे समितीचा अहवाल वापरला जाईल हे उघड आहे. किंबहुना महाराष्ट्रातील कोंग्रेस/राष्ट्रवादीचा प्रचार आरक्षणकेंद्रित असेल असे दिसते. परंतू हा प्रकार त्यांच्याच अंगलट येण्याची तेवढीच शक्यता आहे.

याचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी व मराठा समाजात संघर्ष सुरु झाला हे एक सामाजिक वास्तव आहे. ओबीसी कोट्याला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल असे राणे समिती जरी म्हणत असली तरी यातून आधीच्या आरक्षित घटकांचे नुकसानच आहे. याचा अर्थ नीट समजावून घ्यायला हवा. आरक्षण ५०% च्या मर्यादेत असले तरी आरक्षित घटक खुल्या जागांतुनही शिक्षण-नोक-यांत प्रवेश घेऊ शकतात. नव्हे तो त्यांचा अधिकारच असतो. त्यामुळे उर्वरीत ५०% खुल्या गटातुनही निवडून जाण्याची संधी उपलब्ध असते. मराठ्यांना समजा शिक्षण व नोक-यांत अधिकचे २०% आरक्षण दिले तर ओबीसींचा खुल्या गटाचा पर्याय ३०% वर घसरेल. याचा फटका केवळ ओबीसी व अन्य एस.सी./एस.टी या आरक्षण असलेल्या घटकांनाच नव्हे तर जे पुर्वीच खुल्या गटांत आहेत अशा ब्राह्मणादि सर्वच घटकांना संधी नाकारली जाण्याची परिस्थिती निर्माण होईल. यातून जो रोष निर्माण होईल त्यामुळे मराठा व्होटब्यंक जरी मजबूत करता आली तरी बाकीचे समाजघटक कोंग्रेस/राष्ट्रवादीपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होईल. म्हनजेच मराठा आरक्षणाच्या निमित्ताने कोंग्रेस/राष्ट्रवादी एका परीने मोठ्या धोक्याला आमंत्रित करत आहेत. तेही जे आरक्षण ते देऊच शकत नाहीत, दिले तरी टिकनार नाही अशा कारणासाठी! पण यामुळे सामाजिक सद्भावाला तडा पाडन्याचे काम सुरु झाले आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी व राज-वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. 

मुळात आरक्षण हाच कोणत्याही घटकाचा सामाजिक विकासाचा एकमेव पर्याय वाटावा यातच आपले धोरणात्मक अपयश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.  राजकीय नेत्यांनी केवळ स्वार्थासाठी आरक्षण हे हत्यार वापरले आहे हे उघड आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाट समाजाला ओबीसींमद्धे प्रवेश देत केंद्र सरकारने राजकारणच साधले आहे. मुस्लिम/ब्राह्मण/जैन अशा समाजांनाही आरक्षण देण्याच्या चर्चा अधून-मधुन झडत असतात. जणु काही आरक्षण दिल्याखेरीज कोणत्याही समाजाचे भले होऊ शकत नाही अशी मानसिकता रुजवण्यामद्धे राजकारण्यांनी हातभार लावला आहे असे आपल्या लक्षात येईल. यामुळे आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले असे दोन गट उभ्या देशात पडले असून त्यांच्यातील सुप्त-जागृत संघर्ष हा एकुणातील समाजाचे स्वास्थ घालवत आहे हे वास्तव का दुर्लक्षिले जाते? यातून सामाजिक ऐक्याची भावना न बळावता समाजविघातकता वाढेल हा धोका वारंवार का पत्करला जातो?

शिक्षण-नोक-यांत आरक्षनाची मुळात गरज वाटते ती मुळात सीट कमी आणि दावे करणारे जास्त यामुळे. शिक्षण ही संपुर्नतया शासनाची जबाबदारी असुनही शिक्षणाचे अत्यंत वेगाने खाजगीकरण केले जात आहे. शिक्षणाच्या दर्जात गुणात्मक वाढ तर नाहीच पण ते दिवसेंदिवस महागडे होत चालले आहे. खाजगीकरनाच्या धोरणामुळे सरकार बहुतेक उद्योगांतुन हात काढून घेत असल्याने सरकारी नोक-या घटल्या तर आहेच, पण पुढे त्या दुर्मिळ होत जानार आहेत. शासकीय कर्मचा-यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता वाढवल्याने त्याचाही नवीन नोक-या निर्माण होण्यावर मर्यादा येणार आहेत. अशा परिस्थितीत किमान शिक्षणाचे खाजगीकरण करू नये, ते सरकारच्याच अखत्यारीत असावे आणि सर्वांना उपलब्ध असावे ही मागणी मात्र कोणीही करतांना दिसत नाही. कारण ती राजकारण्यांनाच अडचणीची आहे. बहुतेक शैक्षणिक संस्थानांची मालकी आज त्यांच्याचकडे आहे हे वास्तव आहे.

आपली शिक्षणव्यवस्था मुळातच बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने आहेत. पदवीधर साक्षर होतो खरा पण जगण्याचे कसलेही कौशल्य विकसीत करू शकत नाही अशी आपली मागासलेली शिक्षणरचना आहे. येथून रोजगार मागनारेच व तेही व्हाईट-कोलर रोजगार मागणारे उत्पन्न केले जातात. रोजगार देण्याची क्षमता असनारे शिक्षित मात्र अत्यल्प असतात. श्रमप्रतिष्ठा, उद्यमकौशल्याचा विकास करण्यात आपण पुर्णतया अयशस्वी झालेलो आहोत. याबाबत विचारपुर्वक दिर्घकालीन धोरण आखत त्याची अंमलबजावणी व्हावी असा सूर कोठुनही उमतत नाही. आरक्षण हे जादुची कांडी वाटते व त्यामुळेच सर्व समाजांचे कल्याण होणार आहे असे चित्र राजकारणी/समाजकारणी/चळवळे उभे करत असतील तर आपण विनाशाकडे वाटचाल करत आहोत असेच म्हनावे लागेल.

आरक्षनामुळे वाटतो तेवढा लाभ आजवर आरक्षित घटकांनाही झालेला नाही हे एक वास्तव आहे. ओबीसींना २७% आरक्षण असले तरी लाभार्थी फक्त ४.८% एवढेच आहेत. एससी/एसटी घटकांबाबतही चित्र वेगळे नाही. ८०% भटक्या-विमुक्तांना (भटकेपनामुळे) मुळात शिक्षणाची मुलभूत सोयच नसल्याने तेही आरक्षण असुनही त्याचा पुरेसा लाभ उठवू शकलेले नाहीत. त्यामुळे आरक्षण हे वंचित समाजांना उत्थानाचे एक साधन असले तरी ते एकमेव आणि अंतिम असू शकत नाही, आपल्याला मुळातच आर्थिक/शैक्षणिक धोरणात्मक व्यापक बदल घडवायला हवेत हे लक्षात घ्यावे लागणार आहे. 

ज्ञान म्हणजे काय? (४)


आपण ज्ञानाची चर्चा करतांना माहितीचे "संहितीकरण" हा शब्द वापरला होता हे आपल्या लक्षात असेल. या संहितीकरणावर जरा विचार करुयात...समजावून घेऊयात.

आपल्याकडे माहिती येते ती सलग क्रमाने व सातत्याने येत नसते. माहिती ही नेहमीच खंडित व क्रमविरहित असते. म्हणजे माहिती कोणत्या क्रमाने हाती येईल याचा अंदाज अभ्यासकांनाही नसतो. जी हवी ती माहिती कोठेतरी उपलब्ध असली तरी ती अभ्यासकाला मिळेलच याची ग्वाही देता येत नाही. अनेक प्रकारच्या जुन्या माहित्या या त्रुटित स्वरुपात उपलब्ध असल्याने मुळात संपुर्ण काय होते हे समजायचाही मार्ग नसतो. प्रत्येक अभ्यासक जगातील यच्चयावत भाषा व लिप्यांचा तज्ञ असू शकत नाही हे अद्याहृत असल्याने भाषांतरे हेच एक साधन बनून जाते. भाषांतरांतही एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही.

माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेखांच्या वाचनांतच अनेक विवाद आहेत. मग पुरातन भाषांबाबत बोलायलाच नको. त्यात सिंधू लिपीसहित अशा काही लिप्या आहेत ज्यांचे वाचन अद्याप झालेलेच नाही. शिवाय अनेक साधनांची कालनिश्चिती ही अक्षरश: अंदाजाने केलेली असते व त्यातही वाद असतात. उदा. वेदांचा आणि अवेस्ताचा काळ नेमका कोनता याबाबत हजारो वर्षांचा फरक पडेल एवढे विद्वानांचेच अंदाज आहेत. ही उदाहरणे अशासाठी दिली कि माहिती क्रमाने तर कधी खंडित तर कधी त्रुटित अशा स्वरुपात आपल्याकडे येत असते, याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी. आणि शिवाय माहितीत निर्विवाद परिपुर्णता असेल याची ग्वाहीही देता येत नाही.

उदाहरणार्थ आर्यभटाने पृथ्वी स्थिर नसून स्वत:भोवती फिरते असे निर्विवाद पहिले सिद्धांतन केले हे सिद्धांतनही निर्विवाद नाही. अलीकडे मी आणि डा. आनंद दाबक यांनी मिळून याबाबत जरी स्पष्टीकरणात्मक लिहिले असले तरी ते सर्वमान्य नाही. म्हनजे माहितीत त्रुटी आहे की आकलनात त्रुटी आहे? आर्यभटाने पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणाचा सिद्धांत प्रथम मांडला हे आकलन पुर्वग्रहदोषांमुळे दुर्लक्षिले जाते काय? परमादीश्वर ते नंतरच्या सर्वच भौतिकविदांनी त्याकडे पुर्वग्रहरहित आकलनाच्या अभावात दुर्लक्ष केले कि स्थिर पृथ्वी सिद्धांतच सोयीचा वाटत असल्याने आर्यभटाच्याच माहितीचे स्वत:च्या सिद्धांताला सोयिस्कर होतील असेच अर्थ घेतले?

म्हणजे माहितीच्या संहितीकरणातील ही त्रुटी नव्हे काय?

आपल्याला यावर गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. हाती येणारी प्रत्येक माहिती निरपेक्षपणे, कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता त्या माहितीचे आकलन करणे ही ज्ञानाची पहिली पायरी असेल आणि अनेक विद्वान या पहिल्या पायरीवरच स्वहस्ते गारद होत असतील तर त्यांच्या माहितीच्या संहितीकरनाला आणि नंतरच्या सिद्धांतनाला काय अर्थ राहतो? ते सिद्धांतन कसल्याही स्थितीत विशिष्टज्ञान या अवस्थेलाही आलेले नसणार हे उघड आहे. ज्ञानाची तर गोष्टच वेगळी!

माहितीचे संहितीकरण निरपेक्ष आकलनाच्या अभावात प्रामाणिकपणे होणे शक्य नाही हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. स्वत: आदी शंकराचार्यांवर आरोप आहे कि त्यांनी आपल्या ईश्वर आणि ब्रह्म या दोहोंत भेद आहे या त्यांच्या सिद्धांतनाला त्यांनी जरी उपनिषदांचाच वापर केला असला तरी मुळात खुद्द उपनिषदांतच त्याला काही आधार नाही. पण आपले सिद्धांतन निर्विवाद आहे असे भासवण्यासाठी अनेक विद्वान आपल्या कथित माहितीचे संहितीकरण करतांना इतरांच्या अज्ञानाचा उपयोग करून घेतात, हेही एक वास्तव आहे. त्यापेक्षा आपले सिद्धांतन स्वत:चेच आहे, नव्य आहे हे सांगण्यात ते आपली बुद्धी खर्च का करत नाहीत? ही लबाडी नव्हे काय?

त्यामुळे आपण दोन प्रश्नांशी येऊन भिडतो. माहितीचा प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि माहितीचे पुर्वग्रहदोषामुळे करुन घेतले जाणारे आकलन उपयुक्त ठरु शकते काय हे ते दोन मुलभूत प्रश्न होत!
आणि या प्रश्नांची उत्तरे आपण जोवर शोधत नाही तोवर आपण ज्याला आजवरचे उपलब्ध ज्ञान आहे असे म्हणतो ते तरी कितपत खरे आहे हे समजणार नाही.

पुर्वग्रहदुषित माहितीचे पुर्वग्रहदुषित मनांचे आकलन हे सर्वच क्षेत्रांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग ते कायदेशास्त्र अथवा विज्ञान का असेना. त्यामुळे होणारी अभिव्यक्ती ही अज्ञानपुर्ण असून अगदी विशिष्ट-ज्ञानाचीही पायरी ते गाठू शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या सिद्धांतनाच्या अनिवार प्रेमात पडून सारी घटिते त्याच सिद्धांतनाच्या चौकटीतून पाहिल्याने काय अनर्थ होऊ शकतात हे आपण भौतिकी शास्त्राच्याच क्षेत्रात पाहत आहोत.

हा मानवी गूण आहे कि दुर्गूण?

कि त्याचेही सिद्धांतन करणे आवश्यक आहे?

यावरही आपल्याला विचार करने आवश्यक आहे. आपण माहितीकडे जोवर निरपेक्षपणे पाहत नाही, जोवर आपण सोयीची माहिती घेत गैरसोयीची माहिती अकारण टाळतो आणि सोयीच्या माहितीच्या आधारे तिचे संहीतीकरण करत कोणतेही सिद्धांतन करतो ते "विशिष्ट-ज्ञान" या पातळीलाही कधीही येवू शकनार नाही.
मग ज्ञान काय हे समजणे तर लांबची गोष्ट राहिली.

(क्रमश:)



स्काय डिटरमाईन्स...

तू असशील...नसशील
हे आकाश ठरवते
मातीच्या गर्भात
तुझे मग अस्तित्व उगवते...
(वा मावळते...!)

(स्काय डिटरमाईन्स...माझे एक चित्र..!)



Thursday, March 6, 2014

ज्ञान म्हणजे काय? (३)

विश्व कोणत्यातरी एकाच द्रव्यातून बनले. म्हणजे आज जे आपल्याला जेवढी भौतिक अस्तित्वे दिसतात ती एकाच मुलद्रव्यापासून (माझ्या मते अवकाशापासून) बनली असा सध्याचा भौतिकशास्त्राचा सिद्धांत आहे. समजा हे गृहितक घेऊन पुढे गेलो तर सर्व ज्ञानशाखांचे मुलकारण/निर्मितीकारण एकमेवाद्वितिय अशा "ज्ञान" या संकल्पनेत असले पाहिजे, पण जसे विश्वनिर्मितीचे एकमेव मुलद्रव्य कोणते हे आपणास माहित नाही तसेच "ज्ञान" या संकल्पनेचे मुलवास्तव कदाचित अद्याप तरी आपणास माहित झालेले नाही असे म्हणावे लागेल.

माहिती, पृथक्करन, संहितीकरन, सिद्धांतन व प्रकटीकरन हे सध्या आपल्या हातातील ज्ञानाकडे जायचे मार्ग आहेत. सिद्धांतन व प्रकटीकरणाला "ज्ञान" म्हणता येईल का यावर आपण मागील भागात चर्चा केली आहे.

सिद्धांतन हे ज्ञान नसून त्याला आपण "विशिष्ट्ज्ञान" अशी संज्ञा देवु शकतो. म्हणजे एका ज्ञानशाखेतील विश्झिष्ट काळातील ज्ञानाचा एक टप्पा, पण संपुर्ण ज्ञान नव्हे. बरे एकाच क्षेत्रात असे एकाच वेळीस बहुमूख असे अनेक टप्पे असू शकतात. ते परस्परविरोधीही असू शकतात. त्यांतील प्रत्येकाला आव्हानही दिले जावू शकते. नव्हे दिले जातेच. ते आपण प्रत्यही पहात असतो. एका परीने मतांच्या गलबल्यातूनच आपण पुढे जात असतो. असे असते म्हणून ज्ञानाचे टप्पे गाठायचेच नाही असे होऊ शकत नाही.

धर्मवादी ज्ञान हे बंदिस्त असते. किंबहूना विश्वातील सर्वच ज्ञान पुर्वीच्या प्रेषित/धर्मग्रंथ/अवतारांनी सांगुनच ठेवले असल्याने त्याबाहेर काहीही नाही असे बजावण्याचे कार्य धर्मवादी करत असतात. किंबहूना उपलब्ध माहिती व तिच्या सिद्धांतनावर, म्हणजे विशिष्ट-ज्ञानावर जोवर बुद्धीवादी संशय घेतला जात नाही, शंका घेतली जात नाही तोवर नवीन दृष्टीकोनातून नवे आकलन/सिद्धांतन व प्रकटीकरण होऊ शकत नाही हे उघड आहे. किंबहुना संशयवादच विशिष्ट ज्ञानवादाला कारण ठरतो. पण धर्मवादी मात्र संशयवादाचे कट्टर विरोधक असल्याचे आपल्याला चित्र दिसते. विश्वास/श्रद्धा यावर त्यंचा भर असल्याने नवीन सिद्धांतनाची शक्यता मावळली जाते. त्यातुनच्ज नवे बंडखोर तयार होत्रात...नवे धर्म/पंथ स्थापन होतात व तेही पुन्हा तोच जुनाकित्ता गिरवु लागतात हे सर्व धर्म/पंथांच्या इतिहासात घडलेले आहे. कोण खरी मुक्ती आणि किती झटपट देवु शकतो याच्या प्रचारकी बळावरच यांची वाढ होत असल्याने अगदी धर्मज्ञानही अजुन मागास आदिम टप्प्यावरच थांबले आहे हेही आपल्या लक्षात येईल. मुळात मुक्ती ही संक्सल्पना आहे कि वास्तव हे कोणत्याही पातळीवर सिद्ध झालेले नाही.

तर, संशयवाद हाच ज्ञानवादाचा पाया आहे असे म्हनता येईल. संशय म्हणजे रुढार्थाने आपण वापरतो तो संशय नव्हे. आता उपलब्ध असलेले ज्ञानच अंतिम न मानता स्वयंप्रेरणेने, नव्या माहितीमुळे अथवा जाणीवेमुळे उपलब्ध विशिष्ट ज्ञानालाही आव्हान देत त्यांचेही पृथक्करन करत नवे सिद्धांतन करायचे तर आधीच्या सिद्धांतनाच्या अंतिमतेवर संशय/शंका घेणे भाग आहे. आणि संशयास्पद नाही, प्रश्नचिन्हांकित नाही असे कोणतेही सिद्धांतन असू शकत नाही हे किमान आजवरच्या ज्ञानप्रवासावरून सिद्ध झालेली बाब आहे.

वरील थोडक्यातील चर्चेवरून आपण असे म्हणू शकतो कि आज आपल्याला उपलब्ध असणारे, पुढे जात असणारे प्रत्येकाचे ज्ञान हे "काल-निबद्ध-विशिष्ट-ज्ञान" आहे, ज्ञान नाही. यातून आपण फारतर विशिष्टज्ञानवादाची संरचना करू शकतो व त्या आधारावर ज्ञानाचे अधिक पृथक्करन/विश्लेशन करू शकतो.

ज्ञान याचा शब्दार्थच पाहिला तर "ज्ञात करून घेणे म्हनजे ज्ञान आणि ज्याचे आपण ज्ञान करुन घेतो ते म्हणजे ज्ञेय," असे साधारणपणे म्हणता येईल. विश्वात ज्ञेये अगणित असल्याने (किंवा अज्ञाते असंख्य असल्याने) ज्ञानाचा परिसरही तेवढाच अवाढव्य असल्याचे आपल्या लक्षात येईल. शिवाय प्रत्येक शब्द जेंव्हा जन्माला आला आणि तेंव्हा जो अर्थ त्या शब्दासाठी अभिप्रेत होता त्याला कालौघात असंख्य अर्थछटा चिकटत गेल्याने शब्द (भाषा) हे ज्ञान (संकल्पना/सिद्धांतन) व्यक्त करण्यासाठी साधन म्हणून ब-याचदा कुचकामी ठरते. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यामुळेच यदाकदाचितही अर्थबदल होऊ शकणार नाही अशा गणिती भाषेचा (समीकरणांचा) उपयोग त्यामुळेच सुरु झाला.  त्यामुळे गणीताच्याही अनेक ज्ञानशाखा वाढल्या हा इतिहास आहे.

असे असले तरी अर्थ हा मनात असतो. अभिव्यक्तीच्या व आकलनाच्या मर्यादा भाषेमुळे येतात, मग ती गणिती भाषा का असेना. कारण आकलन अथवा अभिव्यक्ती शेवटी बाह्य साधनांच्या मदतीखेरीज होऊ शकत नाही. E=MC2 या समीकरणातून जो अर्थ मला जाणवेल तसाच्या तसा अर्थ सर्वांना जाणवेलच असे नाही. या समीकरणाच्या निर्मात्याला तो जेवढा आणि जसा समजला व त्यामागे जी विचारप्रक्रिया होती ती आपल्याला कधीही माहित होऊ शकत नाही. आपण त्याच्या चिंतन/विचारांचे उत्पादस्वरूप जे समीकरण आहे ते घेऊन पुढे जात असतो.

याचे कारण माणसावर निसर्गत: असलेल्या मर्यादांत आहे कि अजून सर्वांना एकसारखी वाटेल, प्रत्येक शब्दात एकच एक अर्थछटा राहील...जी अंतिम असेल...अशी भाषाच आपल्याला अजून गवसलेली नाही. "ईश्वर अव्याख्येय आहे" हे विधान धर्मवाद्यांसाठी ठीक असेल पण "जे अव्याख्येय आहे ते विशिष्ट-ज्ञान अथवा ज्ञान असू शकत नाही." असे मला म्हणावेसे वाटते.

आपल्या काळात व तत्पुर्वीही जे ज्ञान-सिद्धांतन झाले आहे, होत आहे व होणार आहे ते "विशिष्ट-ज्ञान" असून विशिष्टज्ञानवादाकडुनच ज्ञानाकडे वाटचाल होत असते असे आपण या प्रकरणात स्पष्ट केले आहे.

अर्थात या मार्गात लबाडांची संख्या कमी नसते. आकलनातून/पृथक्करणातून नव्हे तर पुर्वग्रहदोषमंडित मिथ्या-ज्ञान मांडत सोयीचे सिद्धांतन स्वीकारणारे वा त्याला बळ देनारे नवीन सिद्धांतन करणारे यच्चयावत पृथ्वीतलावर अधिक लोक होते आणि आहेत हेही सरळ विचार केला तर आपल्या लक्षात येईल. पुर्वजपरंपरांचा अतिरेकी अभिमान, वंशाभिमान, धर्माभिमान, जातीअभिमान इत्यादितुन अशा लबाड्या घडत असतात. त्यावर विश्वास ठेवनारे बहुसंख्येने लोक असतात कारण संशय घेणे, प्रश्न विचारने, उत्तर शोधणे ही जी मुलभूत प्रक्रिया आहे तिची त्यांना गरजच भासू नये अशी व्यवस्था दुराभिमानवादी लोक करण्यात जगभर मग्न असतात. ज्ञानवादातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. असो.

आपला मुख्य उद्देश आहे तो ज्ञानाचे ज्ञान समजावून घेण्याचा. येथवर आपण "विशिष्ट-ज्ञान" या संकल्पनेपर्यंत आलो आहोत जी सध्याची वास्तव स्थिती आहे. जी स्थिती आहे ती ज्ञानात्मक नसून ज्ञानाकडे जाण्याच्या अगणित टप्प्यांतीतल काही टप्प्यांची स्थिती आहे.

पण अंतत: ज्ञेय काय आहे जे एकमेवाद्वितीय आहे? जे जाणल्याने जाणण्यासारखे काहीही उरणार नाही असे कोणते अज्ञात आहे? असे काय आहे कि जे जाणने हाच ज्ञानाचा अंतिम थांबा असून ज्ञान संकल्पनेत कसलीही अधिकची भर घालण्याची गरज उरणार नाही? ज्ञानाचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत "ज्ञान" या संकल्पनेला कितपत परिपुर्ण म्हणता येईल असा प्रश्नही उद्भवेल.

याबाबतही मतांतरे असू शकतात...किंवा "मी कोण?" आहे व हे "विश्व कशासाठी बनले?" हे निर्विवादपणे समजणे म्हणजे अंतिम ज्ञान यावर एकमतही होऊ शकते...

प्रत्येक व्यक्तीची जिज्ञासा अंतिम ज्ञेयाबाबत वेगळी असते हे तर वास्तव आहे. म्हणजे अज्ञेयांबाबतही एकमत होणार नाही. समग्र मानवजातीचे एकत्रीत ज्ञानविश्व म्हणजे ज्ञान म्हणता येईल एकवेळ, पण व्यक्तीच्या ज्ञानाचे काय? त्या अर्थाने व्यक्ती ज्ञा्नी होऊ शकते काय हाही एक प्रश्न उपस्थित होईल.

पण ते खरेच तसे आहे काय?

आपली ज्ञानाकडुनची अपेक्षाच समूळ चुकीची आहे कि काय? व्यक्तीवाद कि जागतिक समुहवाद, व्यक्तीज्ञान कि जागतिक सामुहिक ज्ञान यावरही आपल्याला चिंतन करावे लागेल.

आणि महत्वाचा पुन्हा उद्भवत जाणारा प्रश्न....ज्ञान नेमके आहे तरी काय?

(क्रमश:)

ज्ञान म्हणजे काय? (२)


 ज्ञान हे सर्वच ज्ञानशाखांचा गाभा असल्याने ज्ञानाचे तत्वज्ञान हे स्वतंत्रपणे मांडले जायला हवे. ज्ञानाचे शाखाकरण होऊ शकते काय कि ज्ञान हे फक्त शुद्ध ज्ञान असून कथित ज्ञानशाखांतून मिळणारे ज्ञान हे छद्मज्ञान (आभासी ज्ञान) असते यावरही आपल्याला विचार करायला हवा. ज्ञानाची व्याख्या करण्याचे प्रयत्न प्लेटोपासून सुरु आहेत. वेद ह शब्द ज्ञानाच्या समानार्थी आहे असे मानण्याची आपल्याकडे परंपरा आहे, पण वेद हा शब्द "विद्या" या शब्दार्थाशी अधिक जवळीक साधतो. त्यामुळे वेद हा शब्द ज्ञानात्मक नसून विद्यात्मक आहे असे आपल्या लक्षात येईल. भारतीय दर्शनांतही ज्ञानाबाबत विविध समजुती आढळतात. बौद्ध व मीमांसकांच्या मते ज्ञान ही एक क्रिया असून वस्तुवर (जडावर) मनाची क्रिया होऊन वस्तुचे स्वरुप समजणे म्हणजे ज्ञान. पण ज्ञान हे कर्म होऊ शकते काय हाच एक मुलभूत प्रश्न आहे. उपनिषदे व अन्य नंतरचे तत्वज्ञ मात्र ज्ञान हे जाणीवरूप, अनुभवरूप असते व जे अज्ञान आहे ते जाणल्याने ज्ञान होते असे म्हणतात. अधिककरून भारतीय ज्ञानाचा विचार आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाच्याच क्षेत्रात अधिक झाला असून "आध्यात्मिक ज्ञान" याबाबत चर्चा करतांना आपण या विचारांचा परामर्श घेऊच! पण लोकायतीक लोकांनी मात्र प्रत्यक्षप्रमाणाला महत्व दिल्याचे आढळते.

ज्ञान अथवा Knowledge हे शब्द "माहित असणे/अनुभवातून अथवा शिक्षणातून माहिती करून घेणे, जाणने, व्यक्तिगत अनुभूतीतून एखाद्या तत्वाची प्राप्ती होणे" वगैरे वापरले जातात. असे असले तरे ज्ञानाची विज्ञानात्मक परिपूर्ण (अविवादास्पद) व्याख्या अजून झालेली नाही.

ज्ञान किंवा Knowledge हे शब्द आपण वापरतो तेंव्हा त्याला संदर्भाप्रमाने विविध छटा प्राप्त झालेल्या असतात. जाणने म्हणजे ज्ञान असे आपण म्हणलो तर प्रश्न उपस्थित होतात ते हे कि "जाणले" या शब्दाला प्रत्यक्ष प्रमाण काय? कि जाणीव ही केवळ मानसिक/भावनिक आहे? ती सिद्ध करता येईल काय? सिद्ध करता येऊ शकते ती जाणीव म्हनजे ज्ञान काय? आणि जे जाणले ते मूर्त आहे कि अमूर्त? म्हणजे ते वस्तुचे व तिच्या क्रियांचे जाणने आहे कि तिच्या अस्तित्वाचे व्यक्तिविशेष जाणने आहे? कि ज्ञान म्हणजे अन्य काहीएक नसून व्यक्तिगत व सामाजिक जाणीवांचा विस्तार आहे?

म्हणजे येथे आपण अगदी प्राथमिक विचार करत आहोत. तरीही आपल्याला पुढे जाण्यासाठी या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. अधिकाधिक माहितीचा संग्रह ज्याच्याकडे आहे, त्या माहितीचे पृथक्करन करून..तिचे संहितीकरन करून स्वस्त:च्या आकलनाने व तर्कबुद्धीने सिद्धांतन करून एखादी गोष्ट जी व्यक्ती सिद्ध करून दाखवू शकते तिला त्या विशिष्ट बाबीचे ज्ञान आहे असे आपण सर्वसाधारणपने समजत असतो. थोडक्यात ती व्यक्ती आपल्या जाणीवांच्या महत्तम कक्षेपर्यंत जाऊन उपलब्ध आकलनात भर घालत असते. त्या मर्यादेपर्यंतच ज्ञानाचीही मर्यादा असते काय?

येथे एक उदाहरण घेऊ. आईन्स्टाईन यांचा साधारण सापेक्षतावाद हा आधी गणिती तर्कबुद्धीच्या जोरावर सिद्ध केला गेला होता. प्रकाश हा प्रबळ गुरुत्वीय क्षेत्रात वाकतो हा त्यांचा एक सिद्धांत नंतर अनेक वर्षांनी पडलेल्या सुर्यग्रहणाच्या वेळी प्रत्यक्षानुमानाने सिद्धही झाला. परंतु वेगवेगळ्या संदर्भ व्युहांतील प्रयोगांत हे सिद्धांतन सिद्ध होत नाही असेही नंतर लक्षात आले व मुळात प्रकाशाचेच खरे रूप काय याकडे पुढील विद्वान वळाले.
आता येथे आपल्याला एक विधान करता येईल ते म्हनजे आईन्स्टाईन यांनी उपलब्ध माहिती अथवा ज्ञानाच्या कक्षा अजून पुढे नेल्या, वेगवेगळ्या संभावनांना जन्म दिला. पण आईन्स्टाईन यांना "ज्ञान झाले" असे विधान करता येईल काय? कि ते भविष्यातील ज्ञानाचे "पथदर्शक" झाले असे म्हनता येईल?

याचा अर्थ समजावून घ्या. इतरांनी जे जाणले नव्हते ते जाणले अथवा त्यांना विशिष्ट माहितीचा अभाव होता त्या माहितीत भर घातली म्हनजे ज्ञान ही ज्ञानाची परिपूर्ण व्याख्या होऊ शकत नाही अथवा ती ज्ञानदर्शक स्थितीही नाही. प्रत्यक्ष प्रमाणांनी सिद्ध होते ते ज्ञान हेसुद्धा येथे म्हनता येत नाही कारण एका संदर्भ चौकटीत जे सिद्ध होते ते दुस-या संदर्भ चौकटीत सिद्ध होईल असे नाही. जी बाब आपल्या चुमितीय जगात सिद्ध होऊ शकते ती मितीहीन विश्वात सिद्ध होऊ शकत नाही. कृष्णविवराच्या (आत्यंतिक गुरुत्वाकर्षनाच्या) परिस्थितीत गणिताचे व भुमितीचे सारेच नियम कोसळून पडतात असे भौतिकशास्त्र सांगत होते. मग प्रत्यक्षप्रमाण हा ज्ञानाचा विषय होऊ शकतो काय हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. हे आत्यंतिक उदाहरण वाटले तरी ते अनेक संदर्भ चौकटींत तपासून पाहता येईल व प्रत्यक्षप्रमाण हे सर्वच संदर्भचौकटींत सिद्ध होईलच असे नसल्याने त्याला फारतर मर्यादित ज्ञान म्हणता येईल. ज्ञान नव्हे.

उपलब्ध माहितीचे सिद्धांतनात रुपांतर होणे व ते अभिव्यक्त होणे ही ज्ञानाची एक पायरी मानली जाते. मग हे सिद्धांतन कोणत्याही क्षेत्रातील असो. इतिहास असो कि अवकाशभौतिकी, कायदेशास्त्र असो कि नीतिशास्त्र अथवा धर्मशास्त्र. आपण सिद्धांतनाचा अगदी पुरातन कालापासून आजतागायतचा जरी आढावा घेतला तरी निर्विवाद सिद्धांतन कोणत्याही शाखेत झालेले नाही असे आपल्या लक्षात येईल. किंबहुना निर्विवाद सिद्धांतनाच्या अभावामुळे सातत्याने नवनवी सिद्धांतने पुढे आल्याचे व आजही येत असल्याचे आपल्या लक्षात येईल. अध्यात्मवाद्यांच्या दृष्टीने अनुभुती हेच ज्ञानाचे गमक असले तरी ती प्राप्त करण्याचे मार्ग कोणते याबाबतही वेगवेगळे सिद्धांतन झाले आहे. धर्मांची तर गोष्टच वेगळी.

यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो कि माहिती पुढे जात आहे कि ज्ञान? आपण माहितीलाच ज्ञान समजण्याची चूक तर करत नाही आहोत ना? माझ्या मते ज्ञानाकडे व्यक्तीसापेक्ष अथवा समाजसापेक्ष दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही. आज आपल्याकडे अगणित संवादी आणि विसंवादी माहितीत हरेक क्षणी भर पडत आहे. या माहितीचे कितीही पृथक्करण केले, संहितीकरण केले व सिद्धांतन केले तरी सिद्धांतनही माहितीच्याच पातळीवर वावरत असल्याने सिद्धांतनांना ज्ञान म्हणता येणार नाही. त्यांना माहितीचे-जाणीवांचे प्रागतिक/संस्कारित प्रकटीकरण असे फार तर म्हणता येईल. मानव जातीला मानसिक, बौद्धिक आणि भौतिक सुख-अथवा दु:ख अथवा बौद्धिक मनोरंजन त्यातून होत असले तरी ज्ञान त्यापासून दुरच राहते असे म्हनावे लागेल.

मग नेमके ज्ञान तरी काय आहे?

(क्रमश:)

To read previous article pls click here...http://sanjaysonawani.blogspot.in/2014/03/blog-post_2824.html

Wednesday, March 5, 2014

ज्ञान म्हणजे काय? (१)


ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे संहितीकरण, आत्मसातीकरण, स्वानुभुती आणि तिचे एकुणातील प्रकटन अशी सर्वसाधारण व्याख्या करता येईल. असे असले तरी नेमके ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञानाची पुर्णावस्था मानसाला गाठता येवू शकते काय हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. ज्ञानाची केवळ संकल्पनात्मक व्याख्या करता येणार नाही. यासाठी आपण वरील व्याखेत नमूद केलेले घटक विचारांत घेऊ.

जन्मता:च कोणी ज्ञानी नसतो. संस्कारात्मक माहिती, शिक्षनातून व अन्य अनुभवादि स्त्रोतांतून येणारी माहिती ही कोणाचीही पहिली पायरी असते. असे असले तरी "जन्मजात ज्ञानी" या संकल्पनेचा प्रभाव अध्यात्मवाद्यांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमानावर दिसतो. अवतार ही कल्पना याच संकल्पनेची उपज आहे. अमूक कोणी खुद्द परमेश्वराचाच अवतार असल्याने त्याला सर्वच माहित असतेच कारण तोच निर्माता आहे त्यामुळे त्याचे जन्मत:च ज्ञानी असणे स्वाभाविक आहे असा समज धार्मिक बाळगत असतात, श्रद्धाही ठेवत असतात. कारण हीसुद्धा त्यांच्या दृष्टीने "माहिती" असते. आणि या माहितीवर त्यांची श्रद्धा असते. ज्ञानामद्धे श्रद्धेचे तत्व नसावे असे नितीविद जरी म्हनत असले तरी अंतत: जेही काही "ज्ञान" म्हणून पदरात पडते ते "ज्ञान" आहे यावर श्रद्धा/विश्वास असल्याखेरीज ते ज्ञान कसे हाही प्रश्न उपस्थित होतो. जर अमुक माहित होणे म्हनजे ज्ञान आहे कि नाही याबाबत साशंकता असेल तर ज्ञानाच्याच अस्तित्वावर गदा येणार नाही काय? म्हनजेच ज्ञानाच्या अस्तित्वावर किंवा जे ज्ञात झालेले आहे त्यावर विश्वास श्रद्धा एकार्थाने अपरिहार्य होत जातात. पण ते तसे खरेच असते काय?

आपल्यावर विविध प्रकारची माहिती आदळत असते. किंबहुना वर्तमान काळात आपण माहितीच्या गोंगाटात जगत आहोत असा आपला अनुभव आहे. माहितीची संसाधने प्रचंड प्रमानात वाढली आहेत. पण या माहित्यांची सत्यासत्यता थोडावेळ दूर ठेवून असा विचार करुयात कि आपण व्यक्तीपरत्वे कोणत्या माहितीत रस घेतो? कोणती माहिती घेतो? अर्थात हे व्यक्तीगत कुतुहल, आवड आणि गरज यावर अवलंबून असेल हे उघड आहे. हे कसे ठरते? म्हणजे आपल्याला अमुकचीच आवड का आणि तमुकचीच का नाही हे आपण कसे ठरवतो?

नैसर्गिक निवड हे तत्व येथे कामाला येते काय? म्हणजे आवडी-निवडी या नैसर्गिक असून त्याच माणसाचा माहिती घेण्यातील एकुणातील कल ठरवतात असे वरकरणी जरी म्हनता आले तरी सामाजिक-सांस्कृतिक संस्कारही यात मोठा हातभार लावतात हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मनुष्य निसर्गत: जसा जन्माला आला तो समाजात वाढतांना तसाच रहात नाही. कारण त्याच्यासमोर त्याच्या वर्तमानात अस्तित्वात असलेले विषय, तत्संबंधीची माहिती आणि तत्सबंधी समाजातच एकुनात असलेले कुतुहल अथवा अनास्था याचा त्यावर परिणाम होतो कि नाही? अनेकांच्या बाबतीत तो सर्वस्वी तर काहींच्या बाबतीत तो काही प्रमानात होतो असे म्हनावे लागेल. कारण समाजाच्या धारणांच्या सहास्तित्वात आणि त्या-त्या समाजाला त्या-त्या काळाच्या चौकटीच्या व माहितीच्याही मर्यादा त्याचे कुतुहलाचे विषय बदलू शकतात असे म्हनावे लागेल. म्हनजेच नैसर्गिक निवडीचे तत्वही सापेक्ष आहे.

आता मनुष्य माहितींच्या रेट्यात माहितीचे (आवडीच्या क्षेत्रातीलही) आकलन कसे करतो हा एक प्रश्न आहे. माहिती ही निरपेक्ष आणि निखळ कोरडी बाब नसते तर ती ज्या स्त्रोतांतुन येते त्या-त्या स्त्रोतांच्या आकलनाचे रंग त्या माहितीला लागलेले असतात हेही लक्षात घ्यायला हवे. कोणतीही माहिती सर्वस्वी निरपेक्ष स्त्रोतातून मिळत नाही हे आपण विश्वकोशांतील कोरड्या वाटना-या माहितीबद्दलही म्हणू शकतो. म्हणजे येणारी माहिती ही सर्वस्वी निर्लिप्त असत नाही.

मग मनुष्य येणा-या माहितीचे काय करतो? ज्ञानाची पुढील पायरी म्हणजे माहितीचे संहितीकरण. हे संहितीकरण मानसिक असते. म्हणजे मिळणा-या माहितीचे तो आपापल्या वकुबानुसार पृथक्करन करीत त्याची क्रमवारी ठरवत असतो. त्यातील कच्चे दुवे, ते दुवे जुळवण्यासाठी अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे अथवा चिंतनातून त्याची जुळवणी करणे ही पुढची पायरी आहे असे आपल्याला वरील व्याख्या सुचवते. किंबहुना माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्यातील ही महत्वाची पायरी आहे. एकाच प्रकारची माहिती वेगवेगळे लोक घेत असले तरी ही पुढील पायरीच प्रत्येकाचे व्यक्तीसापेक्ष संहितीकरण करनार असल्याने दोन व्यक्तींचे समान विषयातील, समान माहितीवरचे आकलन (पाठांतराधारित शालेय नव्हे) वेगळे होत जाते. उदा. एकाच गीतेचे आदी शंकराचार्य, ज्ञानेश्वर, महात्मा गांधी आणि टिळकांचे आकलन भिन्न आहे हे आपल्याला माहितच आहे. हे मानसिक संहितीकरण/आकलन भिन्न असेल तर मग ज्ञानाचे स्थान काय राहते आणि ज्ञानाचे व्यक्तीपरत्वे भिन्न असणे हाच ज्ञानाचा पाया आहे काय हाही ज्ञानाच्या क्षेत्रातील सैद्धांतिक प्रश्न आहे असे आपल्याला म्हनावे लागेल.

माहितीची ज्ञानात्मक अनुभुती ही जशी मानसिक बाब आहे तशीच ती भौतिकही आहे. सुर्याभोवती पृथ्वी फिरते या तत्कालीन ज्ञानाला आव्हान देत ते तसे नसून त्याच्या अगदी उलट, म्हनजे पृथ्वीच सुर्याभोवती फिरते, असे आहे. ही सर्वस्वी नवी माहिती आहे जी जुन्या माहितीला आव्हान देते, त्याज्ज्य ठरवते. ही माहिती गतकालातील काही विद्वानांना कशी झाली? या माहितीचा प्रत्यक्षानुभव घेण्याची कसलीही सोय नसतांना? तर्क, गणित आणि कुतुहल या तीन बाबींच्या एकत्रीकरनातून ही नवीन माहिती समोर आली असे म्हणता येईल. प्रश्न पडणे, कुतुहल निर्माण होणे आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी उपलब्ध माहिती आणि साधने वापरणे यातून ज्ञान पुढे जाते असे म्हनता येईल...पण तरीही त्याला सर्वस्वी "ज्ञान" हा शब्द सर्वकशपणे वापरता येईल का?

जे पुर्ण नाही ते ज्ञान कसे असू शकेल हा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो. येथे आपल्याला सोक्रेटिसच्या "मला काहीच ज्ञान नाही याचे ज्ञान होणे म्हणजे ज्ञान..." या जगविख्यात उक्तीची आठवण होणे स्वाभाविक आहे. भारतात एके काळी अज्ञानवादी पंथ होता. भगवान महावीरांनी या पंथाचे वर्नण करुन ठेवल्याने या पुरातन पंथाची आपल्याला माहिती होते. या पंथाची विचारसरणी अशी होती कि दोन व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते, दोन व्यक्तींनी ज्ञानविषयक चर्चा/वाद केले कि मने कलुषित होतात, ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात आणि त्यातून जी कर्मे घडतात त्यातुन दु:खच वाढते आणि त्याचे निराकरण ज्ञान करू शकत नाही, पुन्हा खरे ज्ञान कोनते हा प्रश्न शिल्लक राहतोच, म्हणून मुमुक्षूने ज्ञान मिळवायच्या फंदात पडू नये...! (या अज्ञानवादाचे भारतात ६७ उपपंथ होते ही बाबही लक्षणीय आहे. त्यावर वेगळा विचार करावा लागेल)

म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानाची उपलब्धी व त्याची व्याप्ती याबाबत पुर्वीही खूप चिंतन झाले आहे हे उघड आहे. पण आपल्या चर्चेचा तो विषय नसून ज्ञानाचा नेमका अर्थ समजावून घेणे हा आहे.

तर आपण ज्ञान हे सर्वकश/सर्वव्यापी असे असते काय यावर चर्चा करत होतो. माहितीची जमावट, आकलन, पृथ:क्करन, संहितीकरन आणि प्रकटीकरण या बाबी ज्ञानाकडे जाणाच्या पाय-या आहेत, ज्ञान नव्हे असे म्हनावे लागते. कारण संपुर्ण मानवी समाजाच्या उपलब्ध माहितीचे कितीही अंगाने पृथक्करन केले तरी हरेक क्षणी माहितीत होत जानारी वाढ पाहता ज्ञानाकडे जाणा-या पाय-या वाढत आहेत आणि ज्ञान हुलकावनी देत आहे असे आपल्याला दिसून येईल. कोणतीही ज्ञानशाखा सर्वस्वी परिपुर्ण आहे असे विधान आपल्याला करता येत नाही. शिवाय निखळ ज्ञान आणि उपयुक्ततावीदी ज्ञानांचीही सीमारेखा समजावून घ्यावी लागेल. विगतातील सर्वज्ञ, अंतिम ज्ञान, ज्ञाता, अवतार वगैरे बाबी या निव्वळ समजुती असून माणसाने प्रश्नांना न भिडण्यासाठी, कुतुहल शमवण्याचे प्रयत्न न करण्यासाठी निवडलेली एक अंधश्रद्ध पळवाट आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

पुढील भागात ज्ञानाचे अन्य पैलूही आपण तपासून पाहुयात.

(Pls click here to read next part: http://sanjaysonawani.blogspot.in/2014/03/blog-post_6.html

व्यक्तीकेंद्रित लोकशाही कि सामाजिक लोकशाही?


सत्तेचे केंद्रीकरण कि विकेंद्रीकरण हा आपल्या देशात तरी आज कळीचा मुद्दा बनलेला आहे. या निवडणुकीत राहूल गांधींनी तो मुद्दा बनवला असला तरी त्याकडे गांभिर्याने कोणी पहात नाही हेही खरे आहे. त्यामुळे एका महत्वाच्या मुद्द्याची सर्वकश चर्चा होत नाही. बहुदा मुद्दा काय आहे यापेक्षा तो कोणी मांडला यालाच व्यक्तीकेंद्रीत व्यवस्थेत महत्व आल्याने असे झाले असावे. असो. पण मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही..तसे करणे आपल्या हिताचेही नाही.

राजकीय सत्तेचे असो कि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण अनेक राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांना जन्म देते हा जगाचा अनुभव आहे. भारतानेही आणिबाणीचा काळ सत्तेच्या पराकोटीच्या केंद्रीकरणामुळे अनुभवला आहे. सत्तेचे केंद्रीकरण दोन स्तरांवरचे असते. म्हणजे कागदोपत्री सत्ता विभाजित वाटत असली तरी ती राबवण्याची शक्ती मोजक्या लोकांच्या हाती तरी जात असते किंवा ती इतरांच्या हातातील शक्ती काढून घेत एकाच व्यक्तीच्या हाती एकवटत जात असते. म्हणजे लोकशाहीचे मुलतत्व म्हणजे सत्तेचे वितरण, पाळण्याऐवजी एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीकडे जात असते.

भारत हा लोकशाही देश आहे. लोकशाही देशात सत्तेचे विकेंद्रीकरण अपेक्षित असते. म्हणजे सर्वोच्च पातळी ते शेवटचा घटक म्हणजे गांवपातळी येथेवर सत्तेचे क्षेत्र झिरपू द्यावे लागते. सत्ता म्हनजे अधिकार. अधिकारांखेरीज कोठलीही विकासात्मक प्रक्रिया राबवता येणे शक्य नसते. पंचायत राजमुळे ग्रामपंचायतींच्या हाती काही अधिकार आले असले तरी ते पुरेसे नाहीत. हीच बाब पंचायत समित्या-जिल्हा परिषदांबाबत म्हनता येईल. मुख्य अधिकार आजही राज्य मंत्रीमंडळे व केंद्रीय मंत्रीमंडळाच्याच अखत्यारीत आहेत. यामुळे निर्णयांना होनारा विलंब अपरिहार्य होत जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करता येत नाही, योजना राबवता येत नाहीत हे एक वास्तव आहे. प्रत्येक वेळीस वर प्रस्ताव पाठवणे, पाठपुरावा करणे आणि प्रस्ताव मंजूर करुन घेणे यातच शक्ती वाया जाते आणि त्यात होना-या विलंबामुळे नुकसान वाढते ही बाब वेगळीच. त्यामुळे सत्तेचेच अधिकाधिक विकेंद्रीकरण करत राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय अधिकार कमी करत त्यांच्यावरील बोजा हटवणे आवश्यकच आहे. यामुळे सर्वोच्च अधिकार केंद्रकांना मर्यादित बाबींवर लक्ष केंद्रीत करत द्रूदगतीने निर्णय घेता येतील.

आजकाल धोरणलकवा अथवा निर्नयांतील अक्षम्य विलंब याबाबत चर्चा होत असते. परंतू या आजाराचे मूळ सत्तेचे वाटप योग्य रित्या न केल्याने केंद्रीभूत झालेल्या अधिकारांत व त्यामुळेच अपरिहार्य अशा दिरंगाईत आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे अधिकाधिक लोकांच्या हाती सत्तेचे वितरण करने हा भारताच्या विकासाचा भविष्यातील पाया असू शकतो.

हीच बाब काही मोजक्या घराण्यांच्या हाती एकवटत असलेल्या सत्ता केंद्रांचीही आहे. महाराष्ट्रात मराठा समाज सत्तेत ६५% असला तरी ही सत्ता मोजक्या घराण्यांनी बळकावलेली आहे. आमचे हित आमचेच नेते करत नाहीत ही मराठा तरुणांची व्यथा रास्तच आहे असे म्हणावे लागेल. नवी नेतृत्वे आपल्या भागात उभारू नयेत यासाठी कोणत्याही थराला जावून प्रस्थापित राजकारण्यांकडून प्रयत्न केले जातात ही बाब लपून राहिलेली नाही. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत हीच नांवे पुन्हा पुन्हा निश्चित केली जातात. सत्तेचे हे केंद्रीकरणही विघातक आहे. राहूल गांधी याबाबत एकाकी बोलत असले तरी ते स्वत:च एका घराण्याचे प्रतिनिधी असल्याने त्यांनीच घराणेशाहीबद्दल बोलणे हा विनोद वाटला तरी तो बाजुला ठेवून घराणेशाहींच्या बाबत जनतेलाच आपली भुमिका ठरवावी लागनार आहे. म्हणजे एकाच घराण्याला जर तिकीट मिळत असेल तर, पक्ष कोणताही असो, त्या विरोधातच मतदान करावे लागनार आहे. त्याशिवाय सत्तेची ही केंद्रके उध्वस्त होणार नाहीत याचे भान आपल्यालाच आणावे लागणार आहे.

एकुणातच सत्तेचे केंद्रीकरण, जे अत्यंत धोकेदायक पातळीवर पोहोचले आहे, ते आपल्यालाच थांबवावे लागनार आहे. त्याच वेळीस सत्तेचे वाटप वरपासून खालपर्यंत, केंद्रापासून ते ग्रामपंचायतींपर्यंत सक्षमपणे वितरीत व्हायलाच हवे या साठी आग्रही रहावे लागेल. सर्वच पक्षांच्या त्या बाबतीतील भूमिका तपासून पहाव्या लागतील.

सत्तेचे केंद्रीकरण आपल्याला हुकूमशाहीकडे नेवू शकते. व्यक्तीकेंद्रित लोकशाही कि सामाजिक लोकशाही याचा निर्णय आपल्यालाच अत्यंत गांभिर्याने घ्यायचा आहे. कारण कोणती व्यवस्था आपल्या भावी पिढ्यांसाठी योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार बजावण्याची संधी जवळ आली आहे.


Sunday, March 2, 2014

मंदिरांतील पुरूषसूक्ताचे पठण बंद करा!


भारतीय समाजात उच्च-नीचतेचे परिमाण रुजवणारी हिडिस व्यवस्था निर्माण या सूक्तापासून झाली. हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणारे सूक्त असून त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्ताच्या सर्वच मुळ ऋचा आणि त्यांचा खालील अनुवाद पहा.

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्।स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥ १०.०९०.०१
अर्थ: पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.


पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥ १०.०९०.०२
अर्थ: पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, ते अद्भुत त्याचे आहे, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.

एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः।पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥ १०.०९०.०३
अर्थ:ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.

त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः।ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि॥ १०.०९०.०
४अर्थ:तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.

तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः।स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः॥ १०.०९०.०
५अर्थ:त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत।वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः॥ १०.०९०.०
६अर्थ:देवतांनी पुरुषाला यद्न्यात बळी दिले. त्यात (यद्न्यात) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः।तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥ १०.०९०.०७अर्थ:पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम्।पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥ १०.०९०.०८
अर्थ:या वैश्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातुन पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे।छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥ १०.०९०.०९
अर्थ:या वैश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची आणि छंदांची निर्मिती झाली.

तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः।गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥ १०.०९०.
१०अर्थ:त्यातुनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥ १०.०९०.११
अर्थ: देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥ १०.०९०.१२
अर्थ: तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापसुन उत्पन्न झाले.

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत।मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥ १०.०९०.१३अर्थ:चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासुन सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासुन तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले.

नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत।पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥ १०.०९०.१४
अर्थ:त्याच्या बेंबीपासुन हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून प्रुथ्वी, त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.

सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः।देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम्॥ १०.०९०.१५
अर्थ:देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधुन (यद्न्यीय पशु मानुन) बळी दिला.

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः॥ १०.०९०.१६
अर्थ:हा आद्य यद्न्य व बळी होता. या देवतारुप शक्तींनी आकाश व्यापले...त्यांचे आम्ही महिमान गातो...कोठे आहेत पुर्वीचे साध्यस आणि देवता?

हे असे आहे पुरूषसूक्त. याचा शिव, विठ्ठल आणि अन्य सर्वच मुळात अवैदिक असलेल्या हिंदू देवतांच्या पुजेचा काय संबंध आहे? तरीही वैदिक धर्मिय हिंदू धर्मात घुसून देवदेवतांच्या पुजेच्या वेळीस हे सूक्त म्हनतात. एकापरीने हिंदू देवतांचा आणि हिंदुंचा अपमान करतात. हे सूक्त वैदिकांनी त्यांच्या यज्ञांत खुशाल म्हनावे...मुलात याची निर्मितीही यज्ञाशीच सम्बंधित आहे. हिंदुंच्या मुर्तीपुजेशी त्याचा दुरान्वयानेही काहीएक संबंध नाही. अशा स्थितीत या सूक्तावर व पुजा प्रसंगी म्हटल्या जाणा-या काही फुटकळ ऋचांवर बंदी घातली पाहिजे. हे वैदिक मंत्र हिंदुंच्या पुजेत म्हटले जाण्याला सर्वांनीच विरोध केला पाहिजे. 


In Unison!






वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...