Monday, February 22, 2021

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!


 

प्राचीन इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्याने वैदिक धर्माची पीछेहाट सुरु झाली. त्यामुळे विदेघ माथव आणि पुरोहित गौतम राहुगन या पुरोहिताच्या नेतृत्वाखाली स्थलांतर करत, हिंदुकुश पर्वत ओलांडत एका नदीच्या काठावर, दलद्लीच्या प्रदेशात वस्ती केली हा इतिहास आपण शतपथ ब्राह्मणाच्या आधारे पाहिला. या व्यतिरिक्त संपूर्ण वैदिक साहित्यात स्थलांतर अथवा आक्रमणाचे कसलेही उल्लेख येत नाहीत. खरे तर आर्य आक्रमण वा व्यापक स्थलांतर सिद्धांत येथेच बाद होतो. तरीही पाश्चात्य विद्वानांनी या सिद्धांताला गौरवीकरण करत एवढ गवागवा का केला याचीही कारणे तपासली पाहिजेत.

प्रबोधन काळाने युरोपियनांनी आधुनिक ज्ञान-विद्यानाची दारे उघडली. औद्योगीकरनामुळे त्यांना अन्यत्र वसाहती उभारत साम्राज्यवाद आणावा लागला. जगातील अन्य समाजांपेक्षा आपण पुढारलेलो आहोत ही जाणवून युरोपियनांचा आत्मविश्वास वाढला. पण युरोपचा इतिहास मात्र तुलनेने खुप अर्वाचीन. त्यामुळे आपला इतीहासही मागे नेण्याच्या प्रवृत्तीतून त्यांनी ऋग्वेदातील फक्त ३६ वेळा येणारी “आर्य” ही संज्ञा उचलुन आर्य पराक्रमी व बुद्धिशाली आर्यवंश अशी कल्पना करून आपले पुरातन पूर्वज कधीकाळी एकाच ठिकाणी वास्तव्याला होते आणि नंतर गटागटाने पसरत त्यांनी युरोप ते भारत या विशाल प्रदेशात आपली संस्कृती व भाषा पसरवली असा सिद्धांत जन्माला घातला. या सिद्धांताने वेळोवेळी अनेक वळणे घेतली असली तरी मुख्य गाभा मात्र कायमचं ठेवला गेला. यामुळे युरोपियनांचा इतिहास किमान सनपूर्व १५०० पर्यंत जात होता.

आर्य सिद्धांताची मोहिनी एवढी अचाट होती कि खुद्द येशू हा सेमेटिक वंशाचा आहे हे सहन न होऊ लागल्याने त्यांनी येशूलाही आर्य ठरवायचा प्रयत्न केला. तो एक वांशिक वर्चास्वतावादाचा एक वेगळाच विषय आहे. सिद्धांत मांडला खरा पण त्याला बळ देईल असे लिहित पुरावे मात्र ना ऋग्वेदात होते ना अवेस्त्यात. जो पुरावा आहे तो केवळ शतपथ ब्राह्मणात पण तो केवळ वैदिक धर्मी भारतीय उपखंडात अल्पसंख्येने गेल्याचा. यामुळे त्यांच्या सिद्धांताला बाधाच येत असल्याने अत्यंत सोयीने या पुराव्याकडे दुर्लक्ष केले गेले. असो.

मग विदेथ माथव व त्याचे अनुयायी भारतात सर्वप्रथम कोठे वसले? ऋग्वेदातील दशम मंडलात येणारे पुरुषसुक्त याबाबत दिशा दाखवते. ऋग्वेदाच्या उर्वरीत भागात तुर्वसा, पर्शु, पार्थव, भलानस, दास, दस्यू इत्यादी टोळ्यांची नावे वारंवार येतात. येत नाही ते फक्त शुद्र टोळीचे. ते फक्त येते ती ऋग्वेदाची सर्वात उशीरा रचना झालेल्या भागात. याचाच अर्थ अन्य टोळ्या मागे सुटल्या होत्या आणि आता ते नव्याच जमातीच्या सान्निध्यात आलेले होते. मॅक्समुलर  म्हणतो, “याच सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमध्ये  नाहीत व ऋग्वेदातही अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत.” म्हणजेच वैदिकांचा भूगोलही बदलला होता तेंव्हा या सुक्ताची रचना झाली.

सिंधू नदीच्या खो-यात “शुद्र” नावाची जमात खरेच अस्तित्वात होती. महाभारतात या जमातीचे उल्लेख शिबी, अहिरांसोबत तर केले गेले आहेतच पण पुरानांतही या जमातीचे उल्लेख आलेले आहेत. इतकेच काय अलेक्झांडरने केलेला पश्चिमोत्तर भारतावरील आक्रमणात त्याचे “सोद्राई” जमातीशी युद्ध झाल्याचे उलेख त्याच्या दायोदोरस या इतिहासकाराने करून ठेवलेत. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, “शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याबाबत शंका नाही.” ऋग्वेदात भारतात पश्चिमोत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात इतर असंख्य टोळ्या असतांनाही याच टोळीचे नाव येते व तिला वैदिक समाज रचनेत स्थान देते म्हणजे वैदिक लोक भारतात जे सर्वप्रथम स्थायिक झाले ते शूद्रांच्या राज्यात, व या सर्व भूप्रदेशात शूद्रच राहतात असा त्यांचा समाज झाला. भारतीय उपखंडातील अन्य समाजांशी व भूगोलाशी त्यांचा परिचय नंतर झाला व त्याचे प्रतिबिंब मनुस्मृतीतही पडलेले आपल्याला दिसते.

आधीच सांगितल्याप्रमाणे प्राकृत शब्दांवर ध्वनीसंस्कार केल्याची असंख्य उदाहरणे ऋग्वेदात आहेत. शुद्र हा मुळचा “सुद्द” हा प्राकृत शब्द. या सुद्द जमातीचे अवशेष आजही सिंध-पंजाब प्रांतात मिळतात. सोधा वा सूद समाज या प्राचीन सुद्द जमातीचे वंशज असावेत असा निष्कर्ष अनेक विद्वानांनी काढला आहे. पुढे वैदिकांनी जोही कोणी तीन वर्णाचा नाही, म्हणजे वैदिक नाही तो शुद्र अशी व्याख्या बदलली. मनुस्मृती शक, हूण, कुशाण अशा विदेशी राजांनाही शूद्र म्हणते. अंगविज्जा या दुस-या शतकातील महाराष्ट्री प्राकृतात रचल्या गेलेल्या ग्रंथातही कुशाण व शकांनाही शूद्र म्हणण्यात आले आहे. जेही वैदिक धर्मीय नाहीत ते सर्वच वैदिकांच्या दृष्टीने शूद्र होते. म्हणजेच वैदिकांचा धर्म वेगळा व शुद्रांचा धर्म वेगळा हे वैदिकांना माहित होते तसेच अन्यांनाही. 

शूद्रांच्या राज्यातच ऋग्वेदाची पहिली पुनर्रचना केली गेली. यानंतर वैदिक पुढे कुरु प्रांतात सरकले. धर्मप्रसाराची सुरुवात वाटेतच झालेले होती. पंजाब-हरियाणा प्रांतातील व्रात्य लोकांना वैदिक धर्मात घेण्यासाठी व्रात्यस्तोम  विधीचा जन्म येथेच झाला. कुरु प्रांतात आल्यावत मात्र वेदांची पुन्हा नव्याने आखणी केली गेली. सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक (शाखा) निर्माण झाले व त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. 

विदेघ माथवाचे भारतात आगमन झाले तेंव्हा सिंधू संस्कृती नागर संस्कृतीकडून ग्रामीण संस्कृतीकडे गेली होती. विदेश व्यापार थांबला होता. गंगा यमुनेच्या प्रदेशात मात्र या काळात नागर संस्कृतीने पाय रोवलेले होते. हा काल उत्खनीत पुराव्यांवरून सरासरी इसपूचे बारावे ते इसपुचे आठवे शतक हा आहे. म्हणजे इसपू बाराशेनंतर कधीतरी पण निश्चयाने इसपू आठव्या शतकाअगोदर वैदिक धर्मीय (आर्य वंश म्हणून नव्हे) प्रवेशले आणि नंतरच्या काळात धर्मप्रसाराने आपला धर्म कुरु-पांचाल प्रदेशात वाढवला. त्यांना आधी बिहार-ओडीसा-बंगाल या राज्यात प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता, पण नंतर तिकडेही प्रवेश मिळाला. म्हणजे आज भारतात जे बव्हंशी वैदिकधर्मी आहेत ते मुळचे येथीलच असून मुळ आलेले लोक येथल्या वैदिक धर्मांतरीतांत मिसळून गेले आहेत. त्यामुळे मूलनिवासी विरुद्ध युरेशियन आर्य ही जे आज राजकीय/सामाजिक विभागणी केली जाते ती चुकीची आहे. उलट याच धर्मांतरीतांमुळे वैदिक धर्माला येथील अनेक देवता व तत्वद्न्याने फेरबदल करून का होईना स्वीकारावी लागली.

वैदिक येथे येण्यापूर्वी (व आताही) एतद्देशियांत शिवप्रधान मूर्ती व प्रतीकपुजा, वृक्ष, यक्ष, नदी, पर्वत, पूर्वजपूजा हे मुख्य कर्मकांड असलेला सुफलन विधीवर आहारीत तंत्राधारित धर्म सिंधू काळापासून सर्वत्र प्रचलित होता. या धर्माला समांतरपणे त्याग, अहिंसा, अपरिग्रह इत्यादी महनीय मुल्यांवर आधारित समन संस्कृतीसुद्धा प्रचलित होती. तिचे जिन, यती, मुनी, आजीवक, व्रात्य, असे अनेक वैचारिक पंथही होते. या समनांची वैचारिक दृष्टी वेगवेगळी असली तरी त्यातील साधर्म्य म्हणजे अहिंसा हे मुलतत्व. लोक आवडतील त्या धर्मकल्पनांकडे सहज वळत, चर्चाही करत पण विद्वेषाची भावना असल्याचे आपल्याला महावीर-बुद्ध काळातही आढळत नाही. बव्हंशी समाज हा सर्व विचारप्रवाहांचा आदर करत असला तरी त्याचे दैनंदिन जीवन हे व्यक्तिगत मूर्तीपूजेने व्यापलेले होते.

थोडक्यात, भारतावर आर्य नावाच्या कोणा वंशाने आक्रमण केलेले नाही किंवा त्यांचे व्यापक स्थलांतरसुद्धा झालेले नाही. तसे पुरावे उपलब्ध नाहीत. वैदिक धर्म येथे प्रचाराने काही प्रमाणात पसरला. पण वैदिकांना भारतिय संस्कृतीचे जनकत्व बहाल करण्याचा जो प्रयत्न संघपरिवार करतो आहे त्यातून सांस्कृतिक संघर्ष वाढेल, कमी होणार नाही, हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. वैदिक धर्म आणि शिवप्रधान मुर्तीपुजकांचा हिंदू धर्म वेगळा आहे हे भान आले तरी पुरेसे आहे.

 -संजय सोनवणी

(दै. पुण्यनगरीमध्ये प्रकाशित. दि. २१.२.२०२१)

Sunday, February 7, 2021

आर्य हे आक्रमक, स्थलांतरित कि शरणार्थी?

 



मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आर्य वंशाच्या पराक्रमी आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेल्या लोकांनी गटागटाने बाहेर पडत भारत ते युरोप असा अवाढव्य मुलुख व्यापला, त्यांनी स्थानिकांवर विजय मिळवून त्यांच्यावर आपली पुरा-इंडो-युरोपियन भाषा व संस्कृती लादली असा सिद्धांत गेली पावनेदोनशे वर्ष जागतिक पातळीवर नुसत्या चर्चेत नाही तर त्या सिद्धांताने हिटलरसारख्या कृरकर्म्यालाही जन्माला घातले आहे. त्यानंतर आर्य हा शब्द “वंश” म्हणून वापरायचे बंद झाले असले तरी आर्यभाषागट सिद्धांत या नावाने तो आजही चर्चेत असतो. संस्कृत भाषेचे जन्मदाते आर्य असून भारतातील (व आशिया ते युरोपमधील) भाषा या आर्यभाषा प्रभावीत आहेत असे हिरीरीने सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या सिद्धांतात आक्रमण, स्थलांतर असे अनेक बदल केले गेले असले तरी मुळ सिद्धांत कि आर्य हेच सर्व संस्कृतीचे जन्मदाते आहेत कथनात मात्र बदल केला जात नाही. फार फार तर आर्यांनी स्थानिकांवर सत्ता गाजवणे सोपे जावे यासाठी त्यांच्याकडून काही सांस्कृतिक उधा-या केल्या असे सांगितले जाते. उदा. अनार्यांचा सहवास उपयुक्त वाटला म्हणून एतद्देशियान्चा शिव आर्यांनी स्वीकारला व त्याला पावन करून घेतले असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या “वैदिक संस्कृतीचा विकास” या ग्रंथात म्हटले आहे.

खरे तर आर्य या टोळीपरत्वे अर्थ बदलत्या सज्ञेखाली वावरणारे अनेक गट मध्य आशियात होते हे सत्य आहे. ते अवेस्ता आणि ऋग्वेद या ग्रंथात येणा-या असंख्य उल्लेखांवरून स्पष्टही होते. याच भागातील किमान ४० टोळ्यांचा उल्लेख दोन्ही ग्रंथात येतो. शत्रू टोळ्यांना ते अनार्य घोषित करत. उदा दाशराद्न्य युद्धात जेंव्हा ऋग्वेदातील महत्वाची पुरू टोळी शत्रू गटात गेली तेंव्हा तिची संभावना अयज्जू (यज्ञ न करणारे) व अनार्य म्हणून केली गेली. झरथुस्ट्र तर एकाच वेळीस स्वत:ला दस्यूही म्हणे आणि आर्यही. म्हणजे प्रत्येक टोळी अथवा धर्माने आर्य, अनार्य, दास-अस्यु या संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या असे दिसून येईल.

आजकाल संघपुरस्कृत विद्वान वैदिक धर्माचे निर्माते भारतीय मुळाचेच आहेत असे सांगण्याचा हिरीरीने प्रयत्न करत असतात. सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच असे प्रतिपादन करून आपले सांस्कृतिक वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याला खुद्द ऋग्वेद व त्याच्याच समकालीन लिहिला गेलेला अवेस्ता कसलेही समर्थन पुरवत नाहीत. याचे कारण म्हणजे अवेस्ता आणि ऋग्वेदात येणारा भूगोल समान असून टोळ्यांची नावेही समान आहेत. आर्य, परशु, पार्थ, तुरीया (तुर्वसा) पख्त, भलानस यासारख्या टोळ्यांचे प्रदेश आपण अरिया, पर्शिया, पार्थिया, तुराण, पख्तुनीस्तान, बोलन खिंडीचा प्रदेश या नावावरून सहज ओळखू शकतो. याचाच अर्थ ऋग्वेद व अवेस्त्याचा भूगोल हा मध्य आशिया आणि आजचा अफगाणिस्तान आहे. ऋग्वेदात जशी सरस्वती आहे तशीच ती अवेस्त्यानेही हरेवेती या नावाने उल्लेखलेली आहे. ही नदी आजही सिस्तान खो-यातून वाहते व तिचे आधुनिक नाव हेलमंड आहे.

या दोन्ही धर्मात अग्नी हाच केंद्रबिंदू असून पारशी धर्माचा यस्न आणि वैदिक धर्माच्या यज्ञात कर्मकांडात्मक काही फरक असला तरी मूळ गाभ्यात काही फरक नाही. नोढस गौतम हा ऋग्वैदिक ऋषी पारशी धर्माचा संस्थापक झरथुस्ट्राशी विवाद करायला गेला होता हा उल्लेख अवेस्त्यात आला आहे. या दोन धर्मात (व अन्यही टोळीधर्मांत) वर्चस्वासाठी संघर्ष होतेच. झरथुस्ट्राचा धर्म असुरकेंद्रित असल्याने ऋग्वेदात जे देव-असुर संघर्षाचे उल्लेख येतात ते या दोन धर्मातील संघर्षांचे रुपकमय विवरण होय असे विद्वान मानतात.  

झरथुस्ट्री धर्माला आधी विश्तास्पासारखा राजा आश्रयदाता म्हणून मिळाल्याने धर्माची वाढ होत गेली. हा राजाही ईश्ताश्व या नावाने ऋग्वेदात अवतरतो. इतकेच काय झरथुस्ट्राचा अंत अग्नीमंदिरात जळून झाला या घटनेचा उल्लेखही तीनदा ऋग्वेदात आला आहे.

अवेस्त्याची भाषा आणि ऋग्वेदाची भाषाही बरेच साम्य दाखवते. पुढे भारतात आल्यावर येथील प्राकृत भाषांचा संस्कार होऊन एक वेगळीच संकरीत भाषा निर्माण झाली. मागील लेखात याबाबत आपण चर्चा केलेलीच आहे. भाषिक, भौगोलिक व ऐतिहासिक घटनांमधील साम्ये पाहता वैदिक धर्माचा जन्म भारतात झाला असल्याची सुतराम शक्यता नाही हे उघड आहे. मग हा धर्म आणि त्या धर्माचे मुळ लोक भारतात कसे आले? आक्रमक म्हणून कि शरणार्थी म्हणून? या दोन प्रश्नांवर आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे.

त्या काळात कोणतेही धर्म वाढत ते राजाश्रयाने किंवा युद्धात विजय मिळवून आपला धर्म लादल्यामुळे. दाशराद्न्य युद्धाचा मुळ हेतूही धर्मप्रसार होता. या युद्धात वैदिक सुदास राजा विजयी झाला असला तरी वैदिक धर्माला मात्र नंतरच्या काळात उतरती कळा लागली. द्रुह्यु, पर्शु आणि पुरु टोळ्या एके काळी वैदिक धर्माचे सहायक होते. नंतर त्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला. नंतरच्या ऋग्वेद आणि वैदिक साहित्यातून यातील टोळ्यांचे उल्लेख गायब झाल्याचे तर दिसतातच पण खुद्द पुरुंबाबतही अनादरच व्यक्त करण्यात आला आहे. सुदासाच्या काळात वैदिक धर्माचा –हास झाल्याने नंतरच्या वैदिक साहित्यातून त्याचीही उचलबांगडी करण्यात आली. मनुस्मृती तर त्याला तिरस्काराने “शुद्र” (म्हणजे अनार्य) म्हणते. या युद्धानंतर वैदिकांवर एवढी अवनती कोसळली कि नंतरच्या काळात वैदिक ऋषींना ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनच दाने स्विकारायची वेळ आलेली दानस्तुतींवरुन दिसते. 

 

पण याच काळात झरथुस्ट्री धर्म मात्र वाढत्या राजाश्रयाने पसरत चालला होता. झामयाद यस्टमध्ये जो भुगोल विस्ताराने आला आहे तो सिस्टन प्रांताचा आहे. याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच अरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते त्याशिवाय अन्य अवेस्त्यात न येनारी एवढी सखोल माहिती आली नसती. पुढे झरथुस्ट्री धर्माची व्याप्ती पर्शियापर्यंत झालेली दिसते. 

म्हणजेच वैदिकांचे मुळ स्थानही आता झरथुस्ट्री धर्माने व्यापले होते. अनेकांनी त्या धर्मात प्रवेश केला तर जे वैदिकाभिमानी होते त्यांनी मूळ स्थान सोडायला सुरुवात केली. शतपथ ब्राह्मणाने (श. ब्रा. १.४.१, १४-१७) नोंदवले आहे कि विदेघ माथव या राजाने आपल्या गौतम राहूगण  या पुरोहितासह सरस्वती (हेलमंड) नदी सोबत अग्नी घेऊन सोडली आणि हिंदुकुश पर्वत (उत्तरगिरी) पार करून सिंधू नदीच्या पार हे लोक एका नदीजवळ आले. या नदीच्या पुर्वेला उजाड व दलदलीच्या प्रदेशात त्यांनी वस्ती केली. ही कथा वैदिक धर्मीय भारतात कसे आले याची कथा रूपकात्मक वैदिक शैलीत सांगते. 

सरासरी इसपू बाराशेच्या आसपास ही घटना घडली असे अन्दाजीता येते. वैदिक धर्मीय आपली संस्कृती घेऊन येथे आले ते आक्रमक म्हणून नव्हे तर शरणार्थी म्हणून. नंतर इस्लामी आक्रमणामुळे झरथुस्ट्री धर्माच्या अनुयांनाही जसा भारतात आश्रय घ्यावा लागला तसेच प्राचीन काळी वैदिक धर्मियांबाबत घडले होते आणि त्याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करून वैदिकांना सर्वसमर्थ ठरवण्यासाठी आर्य हा वंश नसतांनाही त्यांना आर्यवंशी ठरवायचा प्रयत्न करत येथील भाषा व संस्कृती ही वैदिकोद्भव आहे असे सांगण्याचा जो प्रयत्न होतो तो इतिहास या सज्ञेचाच अवमान करणारा आहे. यामुळे भारताचे सांस्कृतिक आकलनच दुषित झालेले आहे. हा धर्म भारतात कसा पसरला आणि वैदिक येथे येण्यापूर्वी देशातील धार्मिक व सांस्कृतिक स्थिती काय होती याची चर्चा आपण पुढील लेखात करू.

-संजय सोनवणी

 

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...