Monday, May 31, 2021

समाजकेंद्री प्रशासिका

 समाजकेंद्री प्रशासिका

(मधुरिमा पुरवणी, दिव्य मराठी)
अहिल्यादेवींचे राष्ट्रनिर्मितीचे कार्य आजही प्रेरक आहे. काळाच्या पुढची दृष्टी असलेल्या आणि तशी ठाम पावले टाकणाऱ्या मध्ययुगातील त्या एकमेव शासिका होत्या. ज्या काळात राजे-रजवाडे आपल्या क्षेत्राच्या बाहेरील प्रजेचा साधा विचारही करत नसत, त्या काळात अहिल्यादेवींनी देशभरात हजारो लोकोपयोगी कामे केली. त्या कामांतून कारागीर व श्रमिकांना रोजगार पुरवला. देशातील लोकांना जोडत त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागवली. काल (३१ मे) अहिल्यादेवींची जयंती झाली. त्या औचित्याने त्यांच्या लोककल्याणकारी, दूरदर्शी आणि आजही आदर्शवत असलेल्या कारभाराचे हे स्मरण...
अ हिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील जगामधील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील हिंदू-मुस्लिम सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यांनी उभारलेली असंख्य मंदिरे तत्कालीन मुस्लिम शासकांच्या राज्यात होती यावरून त्यांचा प्रभाव व महिमा लक्षात यावा. त्यांचे अलौकिक व्यक्तित्व त्यांच्या काळातच जनमानसात ठसलेले असल्यामुळे इंदूर संस्थानाबाहेरच्या देशभरातील कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही. म्हैसूर आता सिल्क सिटी म्हणून ओळखले जाते. अहिल्यादेवींनी त्या वेळी दिलेली प्रेरणा यामागे आहे.
अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नव्हे तर समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रिक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच; पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल व मनाप्रमाणे आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावता येईल, असे कायदे बनवले. इतर रजवाड्यांनाही तसे कायदे बनवण्याची प्रेरणा दिली. निपुत्रिक विधवांना हा फार मोठा आधार होता. ही एक सामाजिक क्रांती होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या काळात महिलांना गोषातच राहावे लागे, शिक्षणावर बंदी होती, त्या काळात मल्हाररावांसारख्या खऱ्या पुरोगाम्याने आपली सून अहिल्येला शिकवले. भारतीय राजनीतीमध्ये प्रवीण केले. अहिल्यादेवी भालाफेकीतही इतक्या तरबेज झाल्या की त्या देशात त्यासाठी नावाजल्या गेल्या होत्या. स्त्रिया स्वावलंबी झाल्या पाहिजेत, हे त्यांचे ध्येय होते. प्रजा आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि सक्षम असली पाहिजे म्हणून रोजगार, व्यापार आणि उद्योगावर त्यांचा विशेष भर होता. त्या काळात देशात असा विचार करणारा कोणताही शासक नव्हता.
अहिल्यादेवींनी महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना लष्करी शिक्षण देणारे जगातील पहिले प्रशिक्षण केंद्र काढले. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रिया प्रशिक्षित झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० लढवय्या महिलांचे पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच लष्करी पथक! स्त्री सबलीकरणाचा हा उत्कृष्ट आविष्कार होय. याच सैन्याच्या बळावर त्यांनी त्यांचे राज्य घशात घालायला ससैन्य आलेल्या राघोबादादाला परत जायला भाग पाडले होते.
सामाजिक कुप्रथांबद्दलही त्या जागरूक होत्या. त्या काळात बालविवाहाचेी प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करून आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे, तर जो तरुण माळव्यातील दरोडेखोरांचा उपद्रव नष्ट करेल, अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन, असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते. महिलांना सक्षम करणे म्हणजे काय असते, हे त्यांनी अठराव्या शतकात फक्त कायदे करून नव्हे, तर कृतीतून दाखवले. कुणाच्या हातून काही काढून घेतले, तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्या काळात यात्रेकरूंना लुटून उपजीविका चालवत. ते असे का करतात, याची माहिती घेऊन अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरूंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. यात्रेकरूंकडून भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. त्यांना कसायला जमिनीही दिल्या. आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपरिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. अहिल्यादेवी आजही प्रासंगिक आणि आदर्श ठरतात, ते त्यामुळेच. प्रजेने त्यांना उत्स्फूर्तपणे ‘पुण्यश्लोक’ पदवी दिली ती उगाच नाही.
सामाजिक अर्थविचाराच्या पुरस्कर्त्या
अहिल्याबाईंनी इंदूरमागोमाग महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. देशभरातील विणकरांना महेश्वरला यायचे आमंत्रण दिले. त्यांच्यासाठी वसाहती बांधल्या. त्या दूरदृष्टीमुळेच आज इंदूर मध्य प्रदेशचे मोठे औद्योगिक शहर आहे, तर महेश्वर माहेश्वरी साड्यांसाठी जगद्विख्यात आहे. रोजगाराची उपलब्धता, व्यापार आणि उद्योगाची सुलभता यातूनच प्रजेचे हित होते, हा सामाजिक अर्थविचार अमलात आणणाऱ्या त्या महान शासक होत्या.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्त्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेत आपली कररचना केली. तत्पूर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. रजवाडेच धनिकांना लुटत असल्याने श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जीवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येकाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत. गुंतागुंतीचे विषय न्याय खात्याकडे स्वत: पाठवत. न्याय होईपर्यंत मातेच्या वात्सल्याने पाठपुरावा करत. प्रसंगी कठोरही होत. चंडीचा अवतार धारण करून भल्याभल्यांचा नक्षा उतरवत.
रामपुऱ्याच्या चंद्रावत बंधूंनी, “एका महिलेला कोण कर देणार?’ असा उद्दामपणा दाखवत कर द्यायला टाळाटाळ केली, तेव्हा त्यांच्यावर स्वारी करून सोभागसिंग राणावतची युद्धात हत्या केली.
युरोपात एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रिया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्रीस्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या, तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना सर जॉन माल्कममुळे अहिल्यादेवी माहीत झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते, तर त्यांनी अहिल्यादेवींमध्ये आपले आदर्श पाहिले. इतके की जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, “तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशीर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी. आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात… खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले… एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्त्वाची ती अहिल्या!”
अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असताना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते, हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. अहिल्यादेवी केवळ शिवभक्त नव्हत्या. प्रजेतच त्यांनी शिव पाहिला. त्या कोमल मनाच्या होत्या तशाच कठोरही. त्यांनी स्वत: भाग घेत तीन युद्धे केली आणि जिंकली. पुण्यात त्यांच्या सन्मानार्थ विशेष दरबारही भरवण्यात आला. “ही तर दुर्गा आहे...”असे उद्गार नाना फडणीसांनी काढले होते.
स्त्रियांसाठी त्यांच्या स्वातंत्र्याचा पहिला उद्गार असलेल्या महान साध्वीला विनम्र अभिवादन!
{ संपर्क : ९८६०९९१२०५
{मधुरिमा स्पेशल
{संजय सोनवणी
समाजकेंद्री प्रशासिका

Monday, May 17, 2021

“सकारात्मक”

 केंद्र सरकार क्रूर, अमानुष, हिंस्त्र आहे

असे म्हणून कशाला शिव्याशाप देत
आपली जुबान खराब करता आहात?
आपल्या असकारात्मक अक्कलेचे
दिवाळे कशाला काढत आहात?
बेड नाही, ऑक्सिजन नाही, औषधे नाहीत
किंवा लस नाही म्हणून कशाला
स्वत:ला व्यर्थ त्रास करून घेता आहात?
रोजगार रोज जाताहेत
जमा पुंजी व्यवस्थेच्या जबड्यात
जगण्यासाठी घालवली जाते आहे
अर्थव्यवस्था अखेरचे आचके देते आहे
स्वप्नांचे महाल डोळ्यादेखत उध्वस्त होताहेत
म्हणून कशाला चिंतीत होता?
हा कसला मनोरोग झालाय तुम्हाला?
अरे, हे बघा,
किती भाग्यवान आहात तुम्ही माहिताय?
अजून तुमचे नाव मेलेल्यांच्या यादीत गेलेले नाही
तुमचे प्रेत नदीत, खड्ड्यात किंवा खाईत भिरकावले गेलेले नाही
किंवा अंत्य संस्काराच्या लायनीत स्मशानाबाहेर
पडलेले नाही
बघा कि जरा डोळे उघडून
पाउस अजून तरी नियमाने पडतोय
म्हणजे पीक येणारच आहे
जनावरासाठी चाराछावण्या काढाव्या लागणार नाहीत
कि सध्या किमान पाण्याचे टेंकर बोलवावे लागणार नाहीत
दयाळू लोकांनी तुमच्यासाठी अन्नछत्रांची व्यवस्थाही केलेली आहेच
म्हणजेच तुम्ही श्वास कोंडून तडफडून जर मेले नाहीत
तर तुम्ही किमान तहान-भुकेने तरी मरणार नाही आहात...
खात्रीने सांगतो!
आणि किती मरतात अखेर?
६ कि ७ टक्के फक्त
आणि तेही कोरोना झालेल्यांपैकी
...हो कि नाही?
अरे, म्हंजे तुम्ही अजून तरी चक्क नशीबवान
९४% मध्ये आहात !
कोणी सुरक्षित बाहेर तर
कोणी काठावर, किंवा कोणी मध्यात किंवा कोणी मरणाच्या सीमेवर...
पण आहात तर जिवंतच ना?
आणि तरी तुम्हाला
“सकारात्मक”
कसे राहता येत नाही म्हणतो मी?
महान नेत्याचे साधे एवढेही ऐकता येत नाही?
देशद्रोही कोठले!
-संजय सोनवणी

Saturday, May 15, 2021

"अंगविज्जा" - कुशाणकालीन समाजव्यवस्था

 



भारतीय संस्कृतीचा इतिहास शोधत असतांना आपल्या इतिहासकारांनी वैदिक साधने हीच प्रमाण मानून सामाजिक इतिहासाचे चित्रण केले आहे. त्यामुळे त्या इतिहासात प्रचंड विरोधाभास आहे. वास्तव व काल्पनिकतेची सरमिसळ आहे.  पण प्राकृत-पाली साधने वापरली तर तुलनात्मक अभ्यास करून सत्यापर्यंत जायला मदत होते. वैदिक साधनांत येणारा इतिहास स्वाभाविकपणेच वैदिक संस्कृतीचा असल्याने व अन्य संस्कृतींना त्यात दुय्यम आणि कधी तिरस्करणीय मानले असल्याने त्याची जीही माहिती येते ती बव्हंशी दुषित असते.

 

कुशाणकाळात (इसवी सनाच्या पहिल्या शतकात) लिहिला गेलेला “अंगविज्जा” नावाचा तत्कालीन सामाजिक स्थितीबाबत माहिती देणारा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.


अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही किंवा व्यवसाय जन्माधारित होते असे कोठे सुचवतसुद्धा नाही. जन्माधारित व्यवस्थेचे समर्थक वैदिक. त्यांच्या ग्रंथांत मात्र सर्वत्र तशीच समाजव्यवस्था होती असे ठासून लिहिलेले असते.  अंगविज्जेत "गृहपती" (प्राकृत- गहवई) या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशती या त्याच काळातील काव्यग्रंथात गहवई (गृहपती) ही उपाधी वारंवार येते. वैदिक विद्वानांनी या उपाधीचा नेमका अर्थ काय यावर काथ्याकुट केला आहे कारण ही उपाधी वैदिक साहित्यातून गायब आहे. शुद्रांत प्रतिष्ठित वर्ग असायचा हेच वैदिकांना अमान्य होते याचे हे लक्षण.

 

लोकधर्म (वैदिक शुद्र अथवा अनार्य म्हणत त्यांचा धर्म) हा विस्तृत असून ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांच्या धर्माला त्या काळात एकत्रितरीत्या आर्य धर्म म्हणत. हा छोटा व एकूण समाजात नगण्य धर्म होता. इसपू सहाव्या शतकातील भगवान महावीर व बुद्ध काळातील साहित्यातही हा धर्म प्रबळ असल्याचे चित्रण येत नाही. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तत्कालीन चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र (अनार्य) अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. अर्थात हीन स्थान देवून. परधार्मियांबाबत हा दृष्टीकोन बव्हंशी धर्म ठेवत असल्याने यात नवल वाटायचे काही कारण नाही. महत्वाची बाब म्हणजे वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व अनार्य शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. असे असूनही आज वैदिक आणि हिंदू हे धर्म एकत्रच समजले जातात यामागे सांस्कृतिक अज्ञान हे एकमेव कारण आहे.


त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असत. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते.  वैदिक लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत. त्यांच्या घरगुती यज्ञशाळाही असत. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. एकही वैदिक प्रतिमा नाही. खरे तर इसपुच्या सहाव्या शतकापासून सापडणा-या एकाही नाण्यावर अथवा शिलालेखात वैदिक प्रतिमा येत नाही. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता. समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या भारतात एके काळी “वैदिक काळ” होता असे विधान कोणत्या आधारावर केले जाते हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

तत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच बहुजन (शुद्र) शिवमह तर वैदिक धर्मीय रुद्रमह आणि इंद्रमह हे उत्सव साजरे करत. सर्वांच्या उत्सवांत सारेच सामील होत. वैदिक रुद्र व हिंदू शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते. गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता: ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वेस्सवनाची (वैश्रवण) पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना उच्चयोनीत गणले गेलेले आहे. सातवाहनांच्या काळातील “पिशाच्चभद्रकी” नावाचे एक शेतच दान दिल्याचा लेख उपलब्ध आहे. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती.  असूर-राक्षसांची प्रतिमा जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध होते. वैदिक साहित्यात असुर-राक्षस विपरीत रंगवले गेलेले आहेत. पण समाज तसे मानत नव्हता.

अंगविज्जात येणारा समाज हा गाथा सप्तशतीतील समाजाप्रमाणेच मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज व्यावसायिक श्रेणींच्या (गिल्ड्स) माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. अनार्यांच्या लोकधर्माबरोबरच जैन धर्माप्रमाणे बौद्ध धर्मही या काळात सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. म्हणजेच वैदिक धर्म हा त्या काळातही समाजावर वर्चस्व ठेवून होता आणि वैदिकेतर त्यांनी दिलेल्या स्मृतींवर आधारित धर्मादेशांवर चालत होते असा जो समज वैदिक इतिहासकारांनी करून दिलेला आहे तो केवढा चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल.

 

थोडक्यात केवळ वैदिक साहित्यातून  मिळणा-या एकांगी माहितीतून सर्वांचीच दिशाभूल झालेली आहे. प्राकृत-पाली साहित्याकडे नवीन दृष्टीकोनातून पाहत त्या भाषांतील साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता त्यामुळेच प्रतीत होते. संस्कृत आधी आणि प्राकृत नंतर या गैरसमजातून आम्हाला बाहेर पडावे लागेल. प्राकृत साहित्याचे परिशीलन करावे लागेल. तरच आम्हाला आमचा खरा सांस्कृतिक इतिहास समजायला मदत होईल.


-
संजय सोनवणी

(दै. पुण्यनगरीत प्रसिद्ध)

Saturday, May 1, 2021

शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !

 शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !

- प्रभाकर ढगे



घनदाट अशा निबिड अरण्यात हरवलेल्या वाटसरूला इच्छित स्थळी जाण्यासाठी जी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तोच कष्टप्रद अनुभव अपरिचित इतिहासाचा धांडोळा घेणाऱ्या इतिहास अभ्यासकालाही पावलोपावली येत असतो. घडून गेलेल्या कुठल्याही काळाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रशासकीय, धार्मिक, आर्थिक या सर्वांगीण बाजूंचा तपशिलात घेतलेला शोधच असतो. म्हणूनच बहुधा इतिहासकार ई. एच. कार यांनी, 'भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय', अशी व्याख्या केली आहे. बर्कहार्ड यांनी हेच वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या मते, 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'
व्याख्या म्हणून हे सर्व ठीक असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र भलतेच विपरीत असते हा अनुभव इतिहास लेखनाबाबत सगळीकडे सारखाच आहे. इतिहास जेव्हा पूर्वग्रहदूषित, एकांगी, विशिष्ट हेतूने, जात, वर्ण, वंश, धर्म वर्चस्वाच्या अभिनिवेशातून जाणीवपूर्वक लिहिला जातो, तेव्हा तो निखळ सत्यावर अन्याय करणाराच ठरतो. जागतिक आणि भारतीय पातळीवर अशा सदोष इतिहासाची भीषण कृष्णविवरे ठायी ठायी आढळून येतात. अशा हरवून गेलेल्या वा मुद्दाम गाडलेल्या इतिहासाच्या खोल अंधाऱ्या गुहेत शिरून खऱ्या वस्तुस्थितीचे विखुरलेले कवडसे गोळा करणारे जे काही मोजके इतिहास संशोधक महाराष्ट्रात आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांचा समावेश होतो.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक हाती येईपर्यंत मला ललितादित्य नावाचा कोणी सम्राट काश्मीरमध्ये होऊन गेला, याची गंधवार्ता देखील नव्हती.
काश्मीर म्हणजे इतिहास नसलेले, विशिष्ट धर्मियांच्या मूलतत्त्ववादी वेडाने झाकोळून गेलेले, देशाची डोकेदुखी बनलेले, भारत- पाकिस्तानातील अपयशी व खूनशी राज्यकर्त्यांनी वेठीस धरलेले, असे एक उपद्रवी राज्य असल्याचा माझाही इतरांप्रमाणे बराच काळ समज होता. २०१२ साली हौशी पर्यटकासारखा मीही काश्मीरचा बर्फ, सफरचंदाच्या बागा, टुलीपचा बगीचा, केशराची शेती, शिकाऱ्यातील सहली, हे काश्मिरी सौंदर्य पहायला गेलो होतो. मिळालाच एखादा पाकिस्तानी दहशतवादी तर त्याची मुलाखत घेण्याचीही तयारी होती. पण बिनडोक प्रसार माध्यमातून कळलेला काश्मीर आणि प्रत्यक्षातील काश्मीर यात प्रचंड तफावत असल्याचे धक्के बसत गेले. पदव्युत्तर पदवी मिळवूनही टॕक्सी चालक म्हणून काम करावे लागत असलेल्या युसूफसारख्या अनेक युवकांशी, आजमसारख्या शिकारा चालकाशी, रोहित पंडितसारख्या शिक्षकांशी, फौजीभाई नरेश यादवशी, सफाई कामगार सुनील परमारशी आणि नावाप्रमाणेच काश्मिरी कली असलेल्या अनेक महाविद्यालयीन अनारकलींशी झालेल्या चर्चेतून खरा काश्मीर कळला तेव्हा माझी मला भारतीय असल्याची प्रथमच लाज वाटली होती. मध्यपूर्व आशिया आणि चीनला बौध्द धम्म निर्यात करणारा, शैव, सुफी आणि जैन संस्कृतीला सारख्याच मायेने सांभाळणारा, कलासंपन्न, सांस्कृतिक वैविध्याचे आगर असलेला काश्मीर असा शापित भूमी का बनला, याची उत्तरे मात्र त्यावेळी मिळाली नाही.
सम्राट अशोकानंतर भारतात त्याच तोलामोलाचे साम्राज्य निर्माण करणारा, आक्रमक अरबांना पराजित करून तोखारीस्तान जिंकून घेणारा, बलाढ्य तिबेटचा वारंवार पराभव करणारा, आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग ताब्यात घेणारा, चिनी सम्राटांना शह देणारा, सम्राट यशोवर्मनला पराभूत करून बंगाल - ओडिशापर्यंत राज्यविस्तार करणारा आठव्या शतकातील सम्राट ललितादित्य भारतीय इतिहासकारांनी का दुर्लक्षित ठेवला असेल, एका शूर सम्राटाला हा करंटा देश का विसरला असेल, हे प्रश्न आपला पिच्छा करू लागतात, तेव्हा संजय सोनवणी यांचे संशोधन मार्गदर्शक ठरू लागते.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक जसजसे वाचत जातो तसतसे आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अडाणीपणाचे धक्के आपल्यालाच बसू लागतात. दिग्विजयी मोहिमेत पश्चिमोत्तर भारत पादाक्रांत करत मध्य व पूर्व भारतासह हिमालय ओलांडून चीन, अफगाणिस्तान, इराण आणि रशियाच्या सीमेपर्यंत काश्मीरचा विस्तार करणारा हा पराक्रमी सम्राट भारतीय इतिहासाने सहजपणे विसरावा, ही केवढी मोठी घोडचूक? भारताचे खरेखुरे स्वर्ग असणारे काश्मीर आजही उभ्या आडव्या भारताला नीटपणे समजून घेता येत नाही, या मूर्खपणाची मूळे याच ऐतिहासिक चुकांमध्ये दडलेली असावी, हा साक्षात्कारही 'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' वाचताना होत राहतो.
'राजतरंगिणी', 'नीलमतपुराण', 'गौडवहो', 'प्रभावकचरित्र', 'प्रबंधकोश', ' बाप्पापट्टी सुचरिते', या भारतीय ग्रंथांच्या तसेच चिनी, तिबेटी व अरबी इतिहास साधनांच्या आधारे इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी सर्वधर्मसमभावी सम्राट ललितादित्य मुक्तापीड याचे उभे केलेले देदिप्यमान चरित्र म्हणजे अथांग समुद्रात बुडी घेऊन वेचलेल्या माणिक मोत्यांची डोळे दिपवून टाकणारी रास आहे.
सम्राट केवळ भौगोलिक प्रदेश जिंकत नाही. तो त्याच तोलामोलाची भव्य दिव्य निर्मितीही करत असतो. ललितादित्याने काश्मीरमध्ये उभे केलेले परिहासपूर हे नगर, भव्य राजप्रासाद, गोवर्धन, मार्तंड, परिहासाकेशव ही महाकाय मंदिरे, चैत्यगृह, स्तूप, विशालकाय बुध्द मूर्ती हे सारे त्याच्या संवेदनाक्षम सृजनशीलतेची साक्ष देणारी ऐतिहासिक प्रतिके होत.
काश्मीर साम्राज्याचा आणखी विस्तार करण्यासाठी नगरजन व आप्तांवर राज्यकारभार सोपवून पराक्रमी ललितादित्य शेवटच्या मोहिमेवर निघतो तेव्हा त्याचा हा प्रवास दिगंताकडे जाणाराच ठरतो. आपल्या साम्राज्याचा जेवढा विस्तार करता येईल तेवढा करण्यासाठी हा सम्राट पश्चिमेकडे अज्ञात देश-प्रदेश जिंकत पुढे पुढे जात राहतो आणि तिकडेच नाहीसा होतो, हा त्याचा अभूतपूर्व शेवट आणखी धक्का देऊन जातो. काश्मीरात दीर्घकाळ पराक्रम गाजवलेल्या कर्कोटक घराण्याचाच जिथे इतिहासाला विसर पडला आहे तिथे या भारतीय अलेक्झांडरचा अखेरचा प्रवास कुठे थांबला, याची नोंद कुठे सापडायची?
इतिहासात राहून गेलेल्या मोकळ्या जागा भरण्याचे नवे प्रमाणशास्त्र मांडणारे इतिहासकार संजय सोनवणी हेच कदाचित त्याचे उत्तर देऊ शकतील.
'काश्मीरचा सम्राट ललितादित्य' हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा या विषयाचे महत्त्व पाहता त्याचे प्रकाशन वा चर्चासत्र गोव्यात व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा मित्रवर्य संजय सोनवणी यांनी लगेचच या पुस्तकाच्या काही प्रती पाठवून दिल्या. माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्यासह अनेक दिग्गजांनी या पुस्तक प्रकाशनाला/ चर्चासत्राला यायचे कबूल केले. त्यानंतर तारीख नक्की करत असतानाच करोना टाळेबंदी लागली अन् हा कार्यक्रम आजपर्यंत राहून गेला.
तो योग कधी येतो, बघू या !
- प्रभाकर ढगे

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...