Friday, February 18, 2022

व्यापारी मार्ग- लुटालूट आणि वर्चस्वासाठी युद्धे!



प्राचीन व्यापारी मार्ग हे लोकवस्तीचा भाग सोडला तर अत्यंत प्राथमिक दर्जाचे होते. राजसत्तांना अजून व्यापाराचे महत्व न समजल्याने सुनियोजित, व्यवस्थित वाहतुकीस सोपे जावे असे रस्ते सत्तांनी त्यामुळेच बनवले नाहीत. काही तर अक्षरश: पायवाटा होत्या. त्यांची देखभाल व्यापारीच करत, पण तीही आपल्या सोयीपुरती. खिंडीतले रस्ते तर अत्यंत प्राथमिक आणि धोकेदायक होते. हिमालयातून मध्य आशियात जाणारे मार्ग तर जीवघेण्या संकटांनी भरलेले. शिवाय दिशादर्शक खुणांची सोय नसल्याने वाटाड्यांच्या मदतीशिवाय वांछित ठिकाणी पोचता येणे अशक्य व्हायचे. त्यामुळे “वाटाडे” हा व्यवसाय उदयाला आला. दुरचा प्रवास हा त्यांची सोबत घेऊनच व्हायचा. त्यामुळे या व्यवसायाला लवकरच बरकतही आली. अर्थात हा व्यवसायही कमी धोक्याचा नव्हता.

व्यापा-यांची दुसरी गरज होती ती रक्षणाची. व्यापारी तांडे लुटणे हाही काही भागांतील जमातींचा एक उद्योगाच बनून बसला. येथेही सुरुवातीला राजसत्तांनी आधी दुर्लक्षच केले. मग  व्यापा-यांनी त्यातूनही मार्ग काढला. त्यांनी स्वत:चीच रक्षकदले उभारायला सुरुवात केली. व्यापारी स्वत:ही लढवैय्ये असत. त्यामुळे लुटारू जमातींना तोंड देणे काही प्रमाणात का होईना शक्य होऊ लागले. व्यापारी तांड्यांवर झालेले हल्ले आणि त्यातून झालेली मनुष्यहानी हा राजकीय युद्धांपेक्षा रोमहर्षक इतिहास आहे. त्यात पश्चिम आशियात जायचे तर अफगाणिस्तान हा दुर्गम पर्वतरागानी भरलेला प्रदेश ओलांडावा लागायचा. हा प्रदेश प्रतिकूल हवामानामुळे तसा अविकसित होता. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय. या टोळ्या व्यापा-यांवर अचानक हल्ले करून त्यांना लुटत. ऋग्वेदात पणी (व्यापारी) जमातीचा आपल्याला जो तिरस्कार दिसतो तो एक ऐतिहासिक उदाहरण म्हणून घेतला पाहिजे कारण व्यापारी धनाढ्य होते आणि हे पशुपालक, तुलनेने खूपच गरीब वैदिक टोळ्याही दक्षिण अफगानिस्तानातच स्थायिक होत्या. असाच प्रकार आपल्याला उत्तरेच्या हिमालयातून जाणा-या व्यापारी मार्गांबाबत दिसतो. तिकडे हुंझा परिसरात राहणा-या टोळ्या तर फक्त वाटमारीसाठी कुप्रसिद्ध होत्या.

त्यात अनेक भागांत युद्धाची अथवा युद्धजन्य स्थिती असे. मध्य आणि पश्चिम आशियात दीडेकशे तरी वेगवेगळ्या मानवी टोळ्या होत्या. संस्कृती आकार घेत असली तरी राजकीय आणि वर्चास्वतावाद यातून त्यांच्यात रक्तरंजित युद्धाची रेलचेल असे. त्यामुळे प्रवास अशक्यप्राय होऊन जाई. व्यापाराची (आणि कलांचीही) वृद्धी शांततेच्या काळात होते. युद्धांत आपल्या भागातून जाणारा प्रत्येक परकीय हा शत्रू मानला जाई. त्यांची कत्तल अनिवार्य होऊन जायची. स्थिती शांत होईपर्यंत व्यापार स्थगित करणे भाग पडायचे. चीन ते युरोपपर्यंत जाणा-या रेशीममार्गाची चेंगीझखानाच्या काळात व अन्य काही वेळा अशी स्थिती आलेली होती. भारत ते इराक (मेसोपोटेमिया) या मार्गावरही अनेकदा अशे स्थिती आलेली आहे. इसपू १८०० मध्ये मेसोपोटेमियात प्रचंड युद्धे सुरु झाल्याने त्यांच्याशी होणारा सिंधू संस्कृतीचा व्यापारच दीर्घ काळ ठप्प झाला होता हे सर्वात जुने उदाहरण आहे. मी माझ्या “फराओचा संदेश” या कादंबरीत इसपू २२०० मधील भारतातून असिरीयात जाणा-या व्यापारी तांड्यांची , त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांची आणि एकंदरीतच त्यांचे प्रवासातले हलाखीचे जीवन यावर वास्तवपूर्ण प्रकाश टाकला आहे.

पण एवढी प्राकृतिक आणि मानवनिर्मित संकटे असतांनाही, आपण परत येऊ कि नाही याची खात्री नसतांना व्यापा-यांनी आपले तांडे नेणे, व्यापार करणे थांबवले नाही. पुढे राजकीय व्यवस्था जरा स्थिर होऊ लागल्यानंतर राजांना व्यापाराचे महत्व समजले. व्यापारी हे त्यांच्या दृष्टीने माहितीचा खजिना तर होतेच पण कधी न पाहिलेल्या, आपल्या भागात न होणा-या वस्तू पाहून तेहे अचंबित होऊ लागले. व्यापारामुळे आपल्या प्रजेचेही आर्थिक हित होते हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राजसत्तांनी व्यापार वाढावा यासाठी सुविधा निर्माण करायचे धोरण हळूहळू का होईना सुरु केले. त्यात रस्त्यांची देखभाल आणि सैनिकी सुरक्षा या महत्वाच्या होत्या. त्यामुळे व्यापा-यांनीही त्यांना कर देणे सुरु केले. त्यातून राजांच्या खाजीन्याताही भर पडू लागली.

इसापू २००० पर्यंत पूर्वीपेक्षा बरी व्यवस्था आल्याने आशियातली व्यापारी मार्गांवरची अनेक शहरे समृद्धीला पोचली. समरकंद, यारकंद, बल्ख, तक्षशिला, बनारस, दामिश्क, काश्गर, बुखारा इत्यादी शहरांचा प्रचंड विकास होऊ शकला तो केवळ व्यापारामुळे. एव्हाना सागरी मार्गानेही व्यापार सुरु झाला असल्याने बंदरांची शहरेही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. लोथल हे अतिप्राचीन बंदर तसेच चेऊल, भडोच, देबल, भडोच, कल्याणसारखी बंदरे जेथे होते तेथे व्यापाराने कळस गाठला. दहाव्या शतकात आलेला अल मसुदी नावाचा अरब प्रवासी आपल्या प्रवासवर्णनात म्हणतो कि चेउल (चौल) बंदरावर शेकडो जहाजे येत. दहा हजार बैलांवर लादून आणलेला माल त्याने तेथे पाहिला आणि भारताच्या वैभवाबद्दल तो अचंबित झाला. पुढे मग तो इतर बंदरावरही गेला.

संपत्तीसोबत लुटारुही पैदा होतात. समुद्री व्यापार त्याला अपवाद राहिला नाही. समुद्री  चाचे जगभर पैदा होऊ लागले. भर समुद्रात व्यापारी जहाजे गाठून त्यांना लुटणे हा एक मोठा धंदा झाला. अनेकदा राजसत्ताही शत्रूचे आर्थिक कंबरडे मोडावे यासाठी शत्रूराष्ट्रातील व्यापारी जहाजे लुटण्यासाठी या चाच्यांना नेमत हाही इतिहास आपण इंग्लंड-स्पेन बाबत पाहू शकतो.

व्यापारामुळे राज्याचे हितच होते हे लक्षात आल्यानंतर सुरु झाला एक काळा अध्याय. व्यापारी मार्गांवर कब्जा असणे म्हणजे जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणे हा एक नवाच सिद्धांत जन्माला आला. साम्राज्यवाद हा राजकीय वा धार्मिक सत्तेसाठी उदयाला आलेला नाही तर आर्थिक सत्ता निर्माण करण्यासाठी आला हे जगाच्या युद्धांच्या इतिहासातील एक वास्तव आहे. व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठी झालेली युद्धे इसपु पाचव्या शतकापासून नोंदली गेलेली आहेत. अलेक्झांडर भारतावर चालून आला तो तेथवर येणा-या मार्गांवर आणि येथील सुबत्तेवर कब्जा करण्यासाठी. चीनने इसपू दुस-या शतकापासून मध्य आशियातून जाणा-या व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी अगणित युद्धे केली. चंद्रगुप्त मौर्याने बल्खवर ताबा मिळवला तो व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठीच. पुढे कनिश्क आणि आठव्या शतकातील लालीतादित्याने मध्य आशियावर स्वा-या केल्या तेही व्यापारी मार्ग ताब्यात घेऊन जागतिक व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठीच. किंबहुना भारत चीन युद्ध झाले ते अक्साई चीनमधून जाणारा व्यापारी मार्गावरत चीनने कब्जा केल्यामुळेच. पूर्वोत्तर भागातून (आसाम, मेघालय इ) जाणारे व्यापारी मार्गही युद्धाचे कारण बनले. व्यापारी मार्गामुळेच सैन्याची वेगवान हालचाल करता येणे शक्य झालेले होते हेही विशेष. थोडक्यात इतिहास हा व्यापार केंद्रे व मार्ग आपल्या कब्जात ठेवण्यासाठी झाली.  ज्या मार्गांनी संस्कृतीवर्धनाला हातभार लावला तेच मार्ग हिंसेचेही कारण झाले हा मानवी इतिहासातील एक दुर्दैवाचा भाग होय.

-संजय सोनवणी

 

 

 

 

Friday, February 4, 2022

अफगाणिस्तान-सुमेरमध्ये भारतीय व्यापार वसाहती!


  


नौकानयनाने सागरी व्यापार सुरु होण्याच्या फार पूर्वीपासून खुश्कीच्या मार्गाने दीर्घ पल्ल्याचा व्यापार होत होता. आज प्रदीर्घ लांबीचा रेशीम मार्ग सर्वात प्राचीन म्हणून ओळखला जात असला तरी तो इसपु पहिल्या शतकापासून वापरात येऊ लागला. हा रेशीम मार्ग चीन ते सिरीया एवढा प्रदीर्घ लांबीचा होता. या मार्गाने जागतिक संस्कृतीत उत्थान व पतन या दोन्ही अर्थाने मोठा हातभार लावलेला आहे. पण आज उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जगातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग सिंधू संस्कृतीच्या लोकांनी शोधला. इसपू सात हजार हा त्याचा काळ आहे.

 

सिंधू संस्कृतीचा व्यापार पश्चिम आशियाशी सुरु झाला तो जेन मेकिंटोष या पुरात्वविदाच्या मते आजपासून नउ हजार वर्षांपूर्वी. भारतातील माल पश्चिम आशिया (इराण) मध्ये पाठवला जायचा तर मौल्यवान खनिजे तिकडून आयात केली जायची. उत्तर अफगाणिस्तानातून लापिझ लाझुली (नीलस्फटिक) आयात केले जायचे. त्याचा कच्चा माल म्हणून उपयोग करून त्यापासून शोभिवंत दागिने बनवले जायचे.  हे दागीने संपूर्ण आशियात प्रसिद्ध होते. सुमेरपर्यंत भारतातून जाणा-या मौल्यवान वस्तूंत नीलस्फातीकापासून केलेल्या दागिन्यांचाही समावेश होता. या मालाच्या आयातीचा आणि निर्यातीचा प्राचीन मार्ग  काची मैदान, बोलन खिंड ते क्वेटा-मुन्दिगाक (कंदाहार विभाग) आणि नंतर तेथून हिंदूकुश पर्वतातील खिंडीतून बाल्ख येथवर जात होता. बाल्ख प्रांतातील आमु दरिया (ऑक्सस) नदीजवळ लापिझ लाझुलीच्या खाणी होत्या. आधे तेथून कच्चा माल आणला जायचा. पण पुढे या दागिन्यांचे मागणी वाढली तशी सिंधू संस्कृतीच्या लोकांनी या भागातच आपली वसाहत स्थापन केली. १९७५ साली झालेल्या उत्खननात ऑक्सस नदीकाठावरील शोर्तुगाई येथे ही वसाहत सापडली. तेथील बांधकामात वापरलेल्या विटा, सिंधू संस्कृतीच्या मुद्रा आणि अन्य सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये जतन करणा-या असंख्य वस्तू तेथे सापडल्याने ही व्यापारी वसाहत सिंधू संस्कृतीच्याच लोकांनी वसवली होती हे निश्चित झाले. या वसाहतीचा काळ इसपू २२०० असा ठरवण्यात आला आहे. सिंधू संस्कृतीचे लोक या नीलस्फटिकावर प्रक्रिया करून शोभिवंत अलंकार बनवायचे आणि ते पुन्हा पश्चिम आशियात, सुदूर मेसोपोटेमियापर्यंत निर्यात करायचे. भारतीय संस्कृतीच्या प्राचीन खुणा या प्रदेशांत झालेल्या उत्खननांमध्ये सापडल्यात. 

 

कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या सुलभतेसाठी तेथेच वसाहती स्थापन करण्याची सुरुवात प्राचीन भारतीयांनी केली असे म्हणता येते. कारण अशीच आणि तेवढीच प्राचीन सिंधूजनांची एखाद्या नगरासारखी अवाढव्य वसाहत  मुन्दिगाक (कंदाहार विभाग) येथे उत्खननात सापडली. हे मुख्यत्वे व्यापाराचे केंद्र होते.

भारतीय व्यापार पार सुमेर पर्यंत चालायचा हे आपण पाहिले आहे. हा मार्ग बाल्खहून पश्चिमेकडे फुटायचा आणि थेट सुमेर, अक्काड, इलम (आजचा इराक) पर्यंत जायचा. पुढे समुद्रमार्गानेही सिंधू संस्कृतीच्या लोकांनी इजिप्त सहित या प्रदेशाशी व्यापार काही हजार वर्ष चालू ठेवला. येथेही भारतीयांनी आपल्या व्यापारी वसाहती वसवल्याचे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. सुमेरियन दस्तावेजांनुसार मागन, दिल्मून या देशांप्रमाणेच मेलुहा हा त्यांचा मोठा व्यापारी भागीदार देश होता. मागन म्हणजे आताचा अरब अमिरात आणि ओमान हे देश होत. दिल्मून म्हणजे इराणचा काही भाग. मेलुहा येथून सागवानी लाकूड, मौल्यवान खनिजे, शोभिवंत दगड, गोमेद, नीलमणी व त्यापासून केलेले अलंकार, हस्तिदंत, सोने, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंबरोबरच मोर, कोंबड्या, कुत्रे आदी प्राणी-पक्षीही मेलुहातून तेथे निर्यात केले जात असत. सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्राही तेथे सापडलेल्या आहेत. हा व्यापार समुद्रमार्गे तसेच खुश्कीच्या मार्गानेही होत असे.

दक्षिण सुमेरमध्ये मेलुहाच्या व्यापा-यांनी अनेक वसाहती वसवलेल्या असल्याचेही उल्लेख उपलब्ध आहेत. दक्षिण सुमेरमधील  गिर्सू या नगराराज्यातील गुआब्बा शहर हेच या वसाहतीचे एक स्थान होते असे मानले जाते. अक्काडीयन साम्राज्याच्या काळात सम्राट रीमुश याने इलम विभागात मेलुहाच्या सैन्याशी युद्ध केल्याची नोंदही उपलब्ध आहे. अक्काडचा एक सम्राट सार्गोनचा नातू नारम-सीन (इसपू २२५४-२२१८) यानेही आपले मेलुहाच्या सैन्याशी युद्ध झाल्याचे नोंदवून ठेवले आहे.

मेलुहा हे भारताचेच नाव होते हे बहुसंख्य विद्वानांनी मेलुहाहून आयात केल्या जाणा-या वस्तूंवरून निश्चित केले आहे. दुसरे असे कि व्यापारावरून होणारी युद्धे तसेच व्यापा-यांचा आपल्याला हवा तसा अनुकूल धोरणे ठरवणारा सत्ताधीश असावा यासाठी असणारा आग्रह एवढ्या जुन्या काळातही होता आणि भारतीयही त्याला अपवाद नव्हते एवढेच.

भारताने पश्चिम आशिया प्रमाणेच मध्य आणि पूर्व आशीयाशीही मोठा व्यापार प्राचीन काळापासूनच सुरु ठेवला होता. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करूच. अलंघ्य पर्वतांतून मानवाने जायचे मार्ग कसे शोधले हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण आधीच म्हटल्याप्रमाणे बहुतेक प्राचीन मार्ग हे नदीकाठाने जायचे. खिंडीही मानवाने शोधल्या त्या नदी प्रवाहांमुळे निर्माण केलेल्या नैसर्गिक उतारांच्या मार्गांमुळे. आणि हे शोध घेणारे आद्य लोक होते पशुपालक (विशेषता: मेंढपाळ) महाराष्ट्रातीलही बहुतेक खिंडी धनगरांनीच शोधल्याचा इतिहास आपण वाचत असतो. जगभर अगदी असेच घडले. अफगाणिस्तानात हिंदुकुश ओलांडून जायचे तर आज खैबर, कुर्रम, टोची, गुमल व बोलन या खिंडी आहेत आणि या खिंडी काबूल नदीप्रमाणेच कुर्रम, टोची, गुमल, बोलन या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन पर्वत ओलांडत पाकिस्तानात सिंधूला मिळतात त्या नद्यांच्या प्रवाहांनी बनवलेल्या आहेत. भटक्या पशुपालकांनी सर्वप्रथम या मार्गांचा वापर केल्याने त्या खिंडी शोधाचेही श्रेय त्यांना देण्यात येते.

या खिंडी जशा व्यापार वृद्धीला सहायक झाल्या तशाच सांस्कृतिक देवान-घेवाणीलाही. आशिया खंडात भारतीय उत्पादने, पुराकथा, बैलगाडीचा शोध, मोजमापाची साधने व संज्ञा, शोभिवंत वस्तू ते सागासारखी मजबूत लाकडे ते पार मोर-हत्ती-कुत्रे पसरले ते या संपर्कामुळे. अफगाणिस्तानमार्गे गुलामांचा व्यापारही पुरातन असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. भाषिक देवानघेवानही स्वाभाविकपणेच झाली. आपणही असंख्य वस्तू तिकडून आयात केल्या. भारतातही (आज पुरावे उपलब्ध नसले तरी) मेसोपोटेमियाच्या व्यापा-यांच्या वसाहती येथेही असणे शक्य आहे. या व्यापारी मार्गांवरून आशिया खंडात भारतीय धर्मही पसरले. भारतात अनेक भटक्या जमाती येऊन स्थायिक झाल्या त्याही याच मार्गांनी. आक्रमणेही त्याला अपवाद नाहीत. पण व्यापारी मार्गांनी भारताचे हितच जास्त केले आहे असे प्राचीन इतिहास पाहता लक्षात येते. जोवर हा व्यापार होता तोवर भारत समृद्ध होता. भारतावरील अनेक आक्रमणे ही केवळ व्यापारी मार्गांवर स्वामित्व असावे यासाठी झाली. भारतीय व्यापा-यांनी सुदूर सुमेरमध्ये युद्धे केली तीही व्यापारी सवलतींसाठी. किंबहुना जागतिक युद्धांचा इतिहास आणि व्यापारी मार्गांचा इतिहास हातात हात घालून जातो कारण अर्थसत्ता ही नेहमीच महत्वाची असते. पश्चिमोत्तर भागातून जाणारे व्यापारी मार्ग ऐतिहासिक दृष्ट्या समजावून घेणे महत्वाचे आहे ते यासाठीच!

-संजय सोनवणी 

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...