Friday, June 24, 2022

आपण त्यांचेही ऐकायला हवे!




अनेकदा आपण राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नांकडे एकतर्फी पाहत असतो. मग ते पाहणे सकारात्मक असो कि नकारात्मक. आपल्याकडे येणा-या माहितीचा अर्थ आपण कशा रीतीने काढतो हे येणारी माहिती मुळात तटस्थ असते कि पूर्वग्रहदुषित कि विशिष्ट विचारांचे समर्थक पैदा करण्यासाठी यावर अवलंबून असते. मुळात माहिती देणारे लोक आणि ज्याच्याबद्दल किंवा ज्यांच्याबद्दल माहिती देण्यात येत असते त्यांचे स्वत:चे असे काही म्हणणे आहे कि नाही हे मात्र आपल्यापासून अज्ञात असते. किंबहुना असे काही म्हणणे असू शकते यावरच आपला विश्वास नसतो. आपला विश्वास किंवा अविश्वास हा आपल्यापर्यंत जी साधने माहिती पोचवतात त्यांच्यावरच असतो. आणि हे माहिती पुरवणारे घटक आहे त्या सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रश्नाचे आकलन करून घेण्यात खरोखर कितपत समर्थ आहेत याचे मात्र आपल्याला भान असतेच असे नाही. जेंव्हा काश्मीर किंवा उत्तर-पूर्व राज्यांतील समस्यांबाबत आपण हिरीरीने चर्चा करत असतो तेंव्हा तर हे भान आम्ही पुरेपूर गमावलेले असते. आमचे प्रेम, सहानुभूती अथवा द्वेषही वांझोटे होऊन जातात कारण आम्ही मुळात ज्यांच्याबद्दल प्रश्न आहे त्या लोकांनाच त्या प्रश्नाबाबत काय वाटते हे समजण्यात कमी पडलेलो असतो. स्वाभाविकपणेच आमचे कोणत्याही प्रश्नाचे आकलन तेवढेच वांझोटे होत जात निव्वळ प्रतिक्रियावादी बनत जाते ते त्यामुळेच. आणि प्रश्नाचे आकलन कमजोर पडले तर त्यावर शोधलेली अथवा प्रिय वाटलेली उत्तरेही निखालस दिशाहीन असतील हे सांगण्याची आवश्यकता नाही.
काश्मीर हा तसा गेली तीसेक वर्ष गाजत असलेला विषय. पंडितांचे हत्याकांड, स्थलांतर, तेथे उफाळून आलेला दहशतवाद, कलम ३७० बद्दलची परस्परविरोधी आकलने आणि शेवटी ते कलमच रद्द करण्यात येणे, सर्वत्र पसरलेला किंवा पसरवण्यात आलेला मुस्लीम द्वेष किंवा तेथील हिंसाचाराकडे पाहण्यातील विशिष्ट वर्गाचे बोटचेपे धोरण, पर्यटकांनीच पाठ फिरवल्याने तेथील कोसळलेली अर्थव्यवस्था, पाकिस्तानची भूमिका इत्यादी असंख्य बाबींची देशभरात हिरीरीने चर्चा झालेली आहे. अनेक मतमतांतरे आहेत. या सा-यात राहून गेलेली बाब म्हणजे खुद्द तेथील नागरीकांना, मग ते हिंदू असोत कि मुस्लीम, या सा-याबद्दल काय वाटते, ते या बाबींकडे कसे पाहतात, त्यांच्या भावविश्वावर याचा नेमका कसा परिणाम झालेला आहे आणि ते या सा-याकडे नेमके कसे पाहतात ही. त्यामुळे आपल्या आकलनात एकंदरीत एकतर्फीपणा आलेला असतो. आपली मते प्रभावित होतात ती त्रयस्थ लोकांच्या आकलनातून, ते थेट आकलन नसते.
स्थानिक लोकांचे साहित्य, चित्रपट, नाटक, गीत, काव्य यातून स्थानिकांची मानसिकता आणि भावविश्व प्रकट होत असते. काश्मीरमध्ये नाट्यगृहे अथवा चित्रपटगृहे १९९० पासून बंद असल्याने काश्मीरी लोकांना अभिव्यक्तीचा तो मार्ग बंदच आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. काश्मिरी साहित्य सहसा इतर भाषांमध्ये अनुवादितच होत नसल्याने तोही मार्ग तेथील लोकांची मनोवस्था व विचार समजावून घेण्यासाठी उपयुक्त नाही. सेन्सॉरमुळे किंवा राजकीय-दहशतवाद्यांच्या भयाने वृत्तपत्रीय लेखन अत्यंत सावध असल्याने त्यातूनही आपल्या हाती फारसे काही पडेल याची शक्यता नसते.
पण सरहद या संजय नहार यांच्या संघटनेने काश्मीरमध्ये शांती आणि सलोख्याचे काम करत ही कोंडी फोडायचा अपार प्रयत्न केलेला आहे. त्याच वेळी आपल्या चिनार प्रकाशनामार्फत काश्मीरचा इतिहास, तेथील साहित्य मराठी आणि इंग्रजी वाचकांसमोर आणण्याचे कार्य ते गेली तीसेक वर्ष करत आले आहेत. काश्मीरचा पुरातन इतिहास सांगणारे राजतरंगिणी असो, काश्मीरचा सम्राट ललितादित्य असो, काश्मीरचा श्रेष्ठ तत्वद्न्य अभिनवगुप्त असो कि काश्मीरचा गेल्या पाच हजार वर्षांचा इतिहास असो, या ग्रंथांचे अनुवाद अथवा मूळ संशोधन प्रसिद्ध तर केलेच पण प्रेम किशोर कौल यांनी लिहिलेल्या काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील “गुल, गुलशन, गुलफाम” या महाकाव्यसदृश्य कादम्बरीचा अनुवाद तसेच गुलाम महम्मद मेहजूर या प्रसिद्ध काश्मिरी कवीच्या कवितांचा अनुवादही प्रसिद्ध केला. काश्मीरमधील लेखकांची व काश्मीरवरील अन्य लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करत असतांना “उध्वस्त काश्मीर” सारखे स्वानुभवावरील पुस्तकही संजय नहार यांनी प्रसिद्ध केले.
पण आजच्या समाजावर चित्रपटाचा जेवढा प्रभाव पडतो तेवढा अन्य कशाचाही पडत नाही. काश्मीरची पार्श्वभूमी वापरणारे असंख्य चित्रपट प्रसिद्ध आहेत. तेथील स्वर्गीय निसर्गाची पार्श्वभूमी त्यात येत असली तरी काश्मीरचे खरे व्यक्तित्व त्यात झळकत नाही. अलीकडे या परंपरेला छेद देत काही चित्रपट काश्मीरच्याच लोकांना मुख्य स्थान देत काही चित्रपट बनवले गेले असले तरी ते तेथील दहशतवाद ते हेरगिरीसारख्या रंजक विषयासाठी काश्मीर ही स्फोटक पार्श्वभूमी होती म्हणून. त्यांचा हेतू व्यावसायिक होता. अलीकडेच प्रसिद्ध झालेले काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट तर अत्यंत एकांगी असल्याने त्यातही एकच बाजू आलेली होती.
यात काश्मिरी लोकांची काय बाजू आहे याचे दर्शन घडत नव्हते. काश्मीरमध्ये पूर्ण लांबीचे चित्रपट बनत नसले तरी अनेक निर्माते-दिग्दर्शक आपल्या खिशाला खार लावून केवल अभिव्यक्तीच्या अनावर उर्मीपोटी लघुपट, माहितीपट आणि संगीताची निर्मिती करत असतात. ते प्रदर्शित होण्याची शक्यता नसल्याने त्यातून काही कमाई होण्याचे शक्यता नसली तरी आपले काही म्हणणे आहे आणि ते मांडले पाहिजे ही उर्मी सर्व समस्या, भय, दहशत यावर मात कशी करते याचे हे अलौकिक उदाहरण आहे.
सरहदने या चित्रपटांना काश्मीरच्या खो-याबाहेर काढून जगासमोर आणण्यासाठी काश्मीरमध्ये बनलेल्या चित्रपटांसाठी जगातील पहिला जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे येथे आयोजित केला. या महोत्सवामध्ये भाग घेण्याचे आवाहन करताच आठवड्याभरात ८० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या. त्यातून चाळीस लघुपट निवडण्यात आले. ११ ते १५ जून २०२२ या काळात हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. काश्मीरीनी काश्मीरच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटांत जे एरवी आपल्यापर्यंत पोचत नाही असे वेगळेच लोकजीवन, संघर्ष, दहशतवादामुळे उध्वस्त होत असलेले भावविश्व आणि विपरीत स्थिती भोगत असतांना त्यांच्या मनात उसळणारे परस्परविरोधी भावनांचे कल्लोळ आणि त्यातही फुलत असलेले माणुसकीचे अजरामर बंध याचे विराट दर्शन या चित्रपटांमधून होत होते. “हे काश्मीर पाहिलेच नाही, मुस्लीम एवढे वाईट नसतात एवढेतरी आम्हाला कळाले, पंडितांच्या प्रश्नाची दुसरीही एक बाजू आहे हे या महोत्सवातील काही चित्रपटांमुळे समजायला मदत झाली” यासारख्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रेक्षक देत होते. ‘स्कॅटर्ड’, ‘द हिंदू बॉय’, “कंदील” यासारखे चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भेदक भाष्य करतात. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधांचा अभाव आणि चित्रीकरणासाठी अत्यावश्यक असणारी स्थैर्याची स्थिती नसतांनाही काश्मीरमध्ये होत असलेली सृजनात्मक निर्मिती अवाक करणारी आहे. काश्मीर किंवा आपल्याला तसे अज्ञात असलेले उत्तर-पूर्वेतील राज्यातील लोकजीवनावर तेथीलच लोकांनी निर्माण केलेले चित्रपट हे देशभर अशा महोत्सवांमधून दाखवले गेले तर आपल्याला दुसरीही बाजू समजावून घ्यायला मदत तर होईलच, आपले आकलनही एकतर्फी बनणार नाही. देश समजावून घ्यायचा तर हे अत्यावश्यक आहे.
साहित्य-चित्रपट हे कोणत्याही समाजाचा आरसा आहे असे मानले जाते. लोकांच्या भावना, आशा-आकांक्षा यांचे प्रतीबिंब त्यात पडलेले असते. ते न जाणता कोणतेही राज्य व तेथील लोक यांच्याबद्दल मत बनवणे ही स्वत:चीच दिशाभूल आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.
-संजय सोनवणी
(नवशक्ती मध्ये प्रकाशित))

व्यापारी थांबा शाहीदुल्लाची कहानी!



दौलत बेग ओल्डी या लेह-यारकंद मार्गावरील पुरातन थांबा घेऊन व्यापारी काराकोरम खिंड ओलांडत असत. त्यानंतर त्यांना अजून गाठायची असे ती कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंड. सांजू खिंडीअगोदर अजून एक अत्यंत महत्वाचे थांब्याचे ठिकाण होते व ते म्हणजे शाहीदुल्ला (झाय्दुल्ला). येथे लदाख, काश्गर, खोतान आणि पामीर येथून येणारे व्यापारी मार्ग मिळत असत. लदाखला जोडणारा चांग-चेन्मो हा मार्गही येथूनच फुटे. त्यामुळे येथे कोणतेही गाव नसले तरी या जागेला एक व्यापारी व राजकीय महत्व आलेले होते. हे ठिकाण अक्साई चीनमध्ये उगम पावना-या काराकाश नदीच्या खो-यात असले तरी या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून १२ हजार फुट एवढी होती. हा भाग जवळपास निर्मनुष्य होता. उन्हाळ्यात बर्फ वितळले कि येथे तात्पुरते शेती करायला हुंझा (गिलगीट) भागातील कुन्जाईट आणि तुर्कस्तानातील किरगीझ लोक येत असत. त्या लोकांचे शे-दीडशे मोसमी तंबू सोडले तर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या भागात पक्क्या घरांचे अस्तित्व नव्हते.
खोतान राज्यात येणा-या या भागाचा इतिहास पुरातन आहे. अनेक मार्ग एकत्र येण्याचे , तारीम खो-यातून जाणा-या रेशीम मार्गावरचे हे मुख्य स्थान असल्याने याचे राजकीय-लष्करी महत्व पुरातन आहे. तक्षशिला आणि चीनमधून आलेल्या लोकांनी खोतान हे नगर वसवले असे प्राचीन दंतकथा आणि कागदोपत्री पुरावे सांगतात. इसपूच्या पहिल्या शतकात काश्मीर आणि खोतानचे संयुक्त राज्य होते. पुढे काश्मीर कनिश्काच्या अखत्यारीत गेला तर खोतान हे चीनच्या कब्जात गेले. पंधराव्या शतकात मिर्झा अबू बकर दुघ्लत याने मोगल खानातीपासून फुटून स्वत:च्या दुघ्लक घराण्याची सत्ता आणून खोतान व काश्गर भाग आपल्या अखत्यारीत आणले. त्याला सन १५१० मध्ये सुलतान सैद खान याने पदच्युत केले. तो लद्दाखला पळून जात असतांना त्याचा पाठलाग करून त्याला वाटेतच अडवून शाहीदुल्लाजवळ ठार मारण्यात आले. आता त्याची कबर शाहीदुल्लापासून २० मैलांवर आहे.
मध्य आशिया आणि भारतीय बाजूची राज्ये यांचा पुरातन काळापासून निकटचा संबंध आहे. या मार्गांवरून व्यापार तर होत होताच पण राजकीय संपर्कही मोठ्या प्रमाणावर होता. सांस्कृतिक संपर्कही अपरिहार्यपने होत होता. काराकोरम आणि कून-लुन पर्वतराजीमधील विस्तीर्ण प्रदेश दुर्गम होता. यारकंद आणि काराकाश नदीचे खोरे सोडले तर कोठे लोकवस्ती नव्हतीच. कोणत्याही मोठ्या साम्राज्याच्या अंकित नसल्याने येथील स्थानिक सत्ता वारंवार बदलत असत. पण त्यांना व्यापारामुळे येणा-या सुबत्तेची जाणीव होती. यारकंद आणि खोतान सुबत्तेला पोचले ते केवळ या व्यापारामुळे. या भागात इस्लाम येण्याआधी भारतातून आलेला बौद्ध धर्म प्रभावशाली होता. त्यामुळे तुलनात्मक शांतीही होती जे व्यापारवृद्धीसाठी आवश्यक असते. तत्कालीन राजवटी व्यापा-यांना शक्यतो सर्व सुविधा आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे, लदाखला जाणारे अथवा येणारे व्यापारी त्यांचे मालवाहू घोडे अथवा खेचरे मेली तर त्यांच्यावर लादलेला माल आहे तेथेच सोडून देत व पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर घेऊन जात. या मधल्या काळात आपला माल होता तेथे सुरक्षित राहील याची व्यापा-यांना खात्री असे.
एकोणीसाव्या शतकातील राजकीय घडामोडी फार महत्वाच्या आहेत. शीख साम्राज्याचा अंकित गुलाबसिंगच्या जोरावरसिंग या सेनापतीने १८३४ मध्ये लडाख जिंकून घेतला. तो तेथेच थांबला नाही तर थेट शाहीदुल्ला या स्थानापर्यंत आला. ती महत्वाचे व्यापारी जागा त्याने आपल्या ताब्यात घेउन त्याने तेथे एक किल्लाही बांधला आणि काही सैनिक तेथे रक्षणासाठी ठेवले कारण त्या काळात या भागात व्यापा-यांची लुटमार होण्याचे प्रमाण वाढलेले होते. चीनने या नव्या मालकीहक्काला विरोध केला नाही कारण ते तेंव्हा कून-लुन पर्वतराजीची उत्तर बाजू आपली सीमा मानत होते. आणि खोतानचा राजा काश्मीरचा मित्र असल्याने त्याच्याही आक्षेपाचा प्रश्न नव्हता. पण १८४६ नंतर पुन्हा राजकीय स्थिती पालटली. गुलाबसिंगने काश्मीर विकत घेऊन ब्रिटीशांचे स्वामित्व स्वीकारले. काराकोरम पर्वतराजी हीच काश्मीरची सीमा आहे असे ब्रिटीश मानु लागल्याने शाहीदुल्ला विवादाच्या भोव-यात सापडले. पण गुलाबसिंगच्या दृष्टीने व्यापारातून मिळणारे उत्पन्न महत्वाचे असल्याने त्याने शाहीदुल्लावरील ताबा सोडला नाही. उलट त्याला शाहीदुल्ला भागात चाललेली लुटमार आणि त्यामुळे पसरलेल्या घबराटीवर नियंत्रण आणणे महत्वाचे वाटले. १८६४ मध्ये जेंव्हा तुर्कस्तानच्या लोकांनी याकुब बेगच्या नेतुत्वाखाली त्या भागातील चीनी सत्ता उलथून लावली तेंव्हा लडाख भागातील डोग्रा प्रशासकाने येथे २५ सैनिकांची तुकडी रक्षणासाठी ठेवली होती.

याच दरम्यान १८६५ मध्ये ब्रिटीश सर्व्हेयर डब्ल्यू. एच. जॉन्सन याला लडाखच्या चीनी सीमेपर्यन्तच्या भूभागाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमले गेले. त्या वेलीस त्याला खोतानचा राजा हबिबुल्ला याचे निमंत्रण मिळाले. खोतान येथे काही आठवडे घालवल्यानंतर तो शाहीदुल्ला येथेही आला होता. त्याने लडाखाची सीमा शाहीदुल्लाच्या उत्तरेकडे असलेल्या कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंडीपर्यंत रेखाटली. यामुळे काराकाश नदीचे खोरेही लडाखमध्ये गृहीत धरले गेले. पण पुढे डग्लस फोरसिथ आणि हेन्री ट्रोटरने केलेल्या सर्वेक्षणात मात्र शाहीदुल्ला लडाखच्या क्षेत्रात गृहीत धरले गेले नाही. असे असले तरी चीनने या शाहीदुल्ला भागावर कसलाच दावा केला नाही. तरीही ब्रिटीशांनी हा भाग रशियन आक्रमणाला निमंत्रण देऊ शकतो हे लक्षात घेऊन हा भाग चीनने ताब्यात घ्यावा असे सुचवत राहिले.
१८६८ साली रॉबर्ट बर्कले याच्या नोंदीनुसार त्याला शाहीदुल्लाच्या किल्ल्यात कैद करून ठेवण्यात आले होते. यारकंदचे लोक शाहीदुल्ला भागात एकत्र आल्याने येथील काश्मीरचे सैन्य काढून घेण्यात आले असे त्याने नमूद केले होते. पुढे त्याचाच पुतण्या यंगहजबंड १८८९ मध्ये शाहीदुल्ला येथे भेट देण्यास आला असता त्याने लिहिले कि “आता या किल्ल्याचे अवशेषच काय ते पहायला मिळतात.” काश्मीरने येथील सैन्य काढून घेतले असले तरी त्यावरील मालकी मात्र सोडलेली नव्हती.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विस्तारवादी बनलेल्या चीनने मात्र आपल्या झिन्झीयांग परगण्यात काराकाश खोरे आणि शाहीदुल्ला ठाणे सामील केले. खरे तर भारत-चीन सीमावादाला तेथेच प्रारंभ झाला असला तरी ब्रिटीश शाहीदुल्लाबाबत मुळात उत्सुक नसल्याने त्याला संघर्षाचे रूप आले नाही. प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे हा चीनचा सुरुवातीपासून प्रधान हेतू असल्याने त्यांनी तारीं खो-यातील येन्चेंग शहर ते ल्हासा येथवर जाणा-या रस्त्याचे काम सुरु केले. हा रस्ता अर्थातच शाहीदुल्ला येथून जातो. हाच रस्ता भारताच्या अधिकृत भूभाग असलेल्या अक्साई चीनमधून तयार करायला सुरुवात झाल्यानंतर भारत-चीन संघर्षाची ठिणगी पडली. हा रस्ता आता पूर्ण झाला आहे तर शाहीदुल्ला हे एक महत्वाचे शहर बनले आहे.
कसलीही लोकवस्तीच नसलेल्या या दुर्गमातीदुर्गम भागातून प्राचीन काळापासून भारत ते मध्य आशिया व्यापार तर होत होताच पण सांस्कृतीक दळण-वळणही होत होते. या भागावर काश्मीर व त्याआधी लडाखच्या नामग्याल राजांची सत्ता होती. शाहीदुल्ला ही आपली सीमा मानून येथे किल्ला बांधला तो काश्मीरच्या राजाने. चीनचे खरे तर मध्य आशियावर कोणतेही वर्चस्व नव्हते. पण एकोणिसावे आणि विसावे शतक मात्र मध्य आशियासाठी विपदाकारक ठरले. चीनने या भागातील स्थानिक सत्ता चिरडून टाकल्या आणि आपल्या झिन्झीयांग परगण्यात विलीन केल्या. तिबेटचेही तसेच झाले. आता डोळा आहे तो उर्वरीत लडाखवर.
-संजय सोनवणी

Thursday, June 23, 2022

आम्हाला इतिहास आहे?

 खोटा गौरव निर्माण करणारा इतिहास लिहित बसण्यापेक्षा आहे तोच इतिहास नि:पक्षपणे लिहिला असता तर जास्त गौरवशाली गोष्टी सहज सापडल्या असत्या. सोमनाथाचा प्रथम जीर्णोद्धार करणारा व नंतर जैन झालेला कुमारपाल जसा सर्वांना माहित झाला असता तसा काश्मीरचा सम्राट ललितादित्यही. इतिहासातील अनेक व्यक्ती आजही प्रकाशात यायची वाट पाहत तिष्ठत राहिल्या नसत्या. सामाजिक इतिहासही शुद्ध स्वरूपात लिहिला गेला असता. अहिल्याबाई होळकर केवळ एका धार्मिक महिलेच्या रुपात पुढे केली गेली नसती. सातवाहन ते राष्ट्रकुट काळातही समाज वैदिक धर्मशास्त्रांनुसारच चालत होता अशी ते सामाजिक वास्तव नसतानाही बेताल संदर्भहीन विधाने केली गेली नसती. राजांसाठी भाटांनी लिहून ठेवलेली काव्ये आणि स्वत:चा गौरव करून घेणा-या प्रशस्तीन्ना इतिहासाचे महत्वाचे साधन मानले गेले नसते. केवळ संस्कृत साधनांनाच तेवढे महत्व देत प्राकृत-द्रविड साधनांना दुय्यम व दुर्लक्षनीय मानले नसते. जैन-आजीवक व बौद्धान्चाही वास्तव इतिहास कारण नसतांना वैदिक भ्रामक इतिहासाशी जोडला गेला नसता. भारतीय मानस आपल्याच गतकाळाबाबत गोंधळयुक्त आहे कारण जो पुनरुज्जीवनवादी इतिहास लिहिण्याचा अपार खटाटोप गेली दोनेकशे वर्ष सुरु आहे त्याचा हा परिपाक आहे. आता तर त्याने कळस गाठायचा चंग बांधलेला आहे. कारण या इतिहासाचा पायाच ऐतिहासिक आहे तेही तथ्य विकृत करत जाणे हा आहे.

वैदिक काळात असे होते तसे होते...सामाजिक व्यवस्था अशी होती तशी होती अशी वर्णने एकजात सर्व वैदिक विद्वान करतात पण ते कधीही वैदिक काळ नेमका कधी होता? किती शतके होता? होता तर त्या काळाचे कसलेही भौतिक पुरावे का मिळत नाहीत आणि असले तर ते नेमके काय आहेत याबाबत ते मौन असतात, पण वर्णनेच एवढ्या श्रद्धाभावाने करतात कि इतिहास लेखनात श्रद्धेला स्थान नसते, पुरावे लागतात हे मात्र साफ विसरून गेलेले असतात. प्रतिपक्ष मुळात अनाभ्यासी असल्याने त्यांचे फारच जास्त फावते हेही खरे. पण अडाण्याला अधिक अडाणी करणे हा विद्वानाचा जीवनहेतू नसतो तर लोकांना शहाणे आणि विचारी करणे हा असतो याचे भान भारतीय इतिहासकारांना कधीच आलेले नाही. पण महाराष्ट्र ग्याझेटीयर (इतिहास-प्राचीन काळ) सारख्या सरकारद्वारा प्रकाशित ग्रंथातही अशा त्रुटी केवळ वृथाभिमानाच्या भावनेपोटी आणि इतिहासाच्या खुनासाठी आणल्या जातात तेंव्हा काळजी वाटली पाहिजे.
यामुळे आपला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आणि राजकीय इतिहास विकृत झालेला आहे. बरे, खोटे वर्चस्व प्रस्थापित करण्यापलीकडे त्याचा विशेष उपयोगही नाही. यात “इतिहास” मात्र झाकोळला गेलेला आहे. खूप इतिहास तर अंधारात ठेवला गेलेला आहे. गैरसोयीच्या इतिहासाला झाकून टाकल्याने अथवा अंधारात ठेवल्याने आपल्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाच्या बाजू उजळून निघतील ही भ्रामक कल्पना आहे.
अस्मितांचा सोस हवाहवासा वाटला तरी तो घातक असतो हे सर्वच भारतीय समाजाला समजायला हवे व तथ्यात्मक सर्वांगीण इतिहासाकडे सर्वांनी वळायला हवे. इतिहासात राहून गेलेली कृष्णविवरे, मग ती कटू असोत कि गौरवास्पद, उजेडात आणायला पाहिजेत.
इतिहास आम्हाला गतकाळाकडे पहायची व्यापक दृष्टी जेंव्हा देतो तेंव्हाच आपला भविष्यकाळ उज्ज्वल असतो.
भारताला आज तरी ख-या अर्थाने लिहिला गेलेलेला इतिहासच नाही मग भविष्य काय असणार हा प्रश्न निर्माण झाला तर तो दोष कोणाचा?

Saturday, June 18, 2022

विद्रोहाची संकल्पना का फसली?

 विद्रोहाची संकल्पना फसली कारण विद्रोह नेमका कोणाविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध कि व्यवस्थेतील अन्याय्य विषमतामुलक तत्वज्ञानाविरुद्ध याचे भानच उरले नाही. जातींविरुद्धचा संघर्ष एका जातीविरुद्ध एकवटण्याचा द्वेषमुलक प्रयत्न सुरु झाला येथेच विद्रोहाच्या नाशाची बीजे होती. ब्राह्मण आणि हिंदू देवतांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामीपणा अशी काहीतरी विचित्र पुरोगामीपणाची संकल्पना हिरीरीने स्वीकारली गेली. असे करत असतांना आपण आपल्याही जातीच्या बेड्या घट्ट करत चाललो आहोत याचेही भान राहिले नाही.

विद्रोह हा आवश्यकच असतो...पण तो विषमतामुलक तत्वज्ञानांना तिलांजली देण्यासाठी...मग ही विषमता जातीय असो कि आर्थिक-सांस्कृतिक!
आमचे विद्वान समतेबद्दल नेहमीच हिरिरीने बोलत असतात. पण त्यांना नेमकी कोणती समता अपेक्षित असते? उच्च वर्णीय, निम्न वर्णीय हे शब्द सातत्याने वापरत असतांना समतेचे अधिष्ठाण कसे येईल याचा कसा विसर पडला? वर्ण शब्द वापरतांना आपण वैदिक विषमतेची वर्णव्यवस्था स्विकारतो आहोत, म्हणजे समतेच्या मुलतत्वालाच सुरूग लावतो आहोत याचे भान कसे सुटले?
मी अंबेजोगाई येथे एका भाषणात म्हणालो होतो, बहुजनांना ज्ञानात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक उत्थान करून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम ब्राह्मणातील "ब्र" काढणेही बंद करावे. त्यांना शिव्या देवून तुमची पोटे भरणार नाहीत. ते जातीसंस्थेचे निर्माते नाहीत. पुरोहित या नात्याने त्यांनी शोषण केले असेल तर त्यांना पुरोहित म्हणून बोलवणे थांबवा...स्वत:च सारी कर्मकांडे करा...शिव्या देत बसून काय साधणार आहे? त्यापेक्षा आपले ज्ञान, अर्थ आणि आजच्या जगाशी सुसंगत अशी सुसंवादी संस्कृतीचे नवनिर्माण कसे करता येईल यासाठी उभे ठाका!
अर्थात विद्रोही म्हणवणा-या चळवळीने झटपट प्रसिद्धी मिळते, टाळ्यांचे गजर होतात म्हणून शिवीसत्राला बांध घालणे सोडले नाही. जातींत स्वत:च कोंबून टाकलेले महापुरुष आपल्या चळवळीचे प्रतीक निवडले, पण जातीपार असलेले महात्मा गांधी यांना स्विकारणे तर दुरच, पण त्यांनाही शिव्या घालत बसण्याचा मार्ग निवडला.
विद्रोही चळवळीने नवे सामाजिक ज्ञान व भान निर्माण केले नाही. सामाजिक ऐक्याची संकल्पना पुढे रेटण्याऐवजी विभक्तीकरणालाच ते कारणीभूत झाले. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र कधी प्रतिगामी झाला हे समजलेच नाही. जातीय विद्वेषाचे विष उतरलेच नाही...उलट वाढत गेले.
आज समाजव्यवस्था मोठ्या संक्रमणातून जात आहे. जागतिकीकरण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली नवी मुल्ये, वाढत्या आशा-आकांक्षा, नव्य जीवनशैलीचे अनिवार आकर्षण आणि त्याच वेळीस उपलब्ध अत्यल्प साधनस्त्रोत या कचाट्यात सर्वच सापडले आहेत. व्यवस्थेचा फायदा अत्यल्प लोकांना होत आहे तर बहुसंख्य लोक वंचित होत चालले आहेत. आरक्षण हवेच यासाठी जसे नवनवे समाजघटक आक्रमकपणे पुढे येत आहेत तसेच यांना आरक्षण का असे जोमाने विचारणारेही पुढे येत आहेत. आरक्षणाची आवश्यकता भासणे म्हणजे अजुनही आम्ही आर्थिक दृष्ट्या मुर्दाड आहोत, आमची मानसिकता ज्ञानात्मक होत प्रगती साधण्याकडे नाही हेच सिद्ध करते. आणि जातीय संघर्षाला आरक्षण हेही एक महत्वाचे कारण आहे याचे भान पुरोगाम्यांना आले नाही. सर्वांत गोड रहायचे, सर्वप्रिय (किमान आपल्या जातगटात तरी) व्हायचे अशी खाज लागलेल्यांकडून परखड बोलीची अपेक्षा तरी कशी करायची?
साधनसंपत्तीचे नुसते फेरवाटप करून काही होत नसते. मुळात उपलब्ध साधनसंपत्तीचा विनियोग कसा करायचा याचीच अक्कल नसेल तर आहे तीही साधनसामग्री वाया जानार. उदा. भारतात आजही ३०% शेतमाल वाया जातो. शेतमालावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण २% पेक्षाही कमी आहे. म्हणजे आपण त्यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सर्वत्र सुरु करत शकलो नसू, वाया जाना-या साधनसंपत्तीचा विनियोग करु शकलो नसू तर आपण मागास म्हनवण्याच्याच योग्यतेचे नव्हेत काय?
आहे त्या आर्थिक, ज्ञानात्मक व सांस्कृतिकतेकडून जो पुढे जात राहतो, गुणात्मक प्रगती साधत असतो, त्याला पुरोगामी म्हणतात. प्रस्थापितांना शिवीगाळ करत बसलेल्यांना नाही याची नोंद घ्यायला हवी.

Friday, June 10, 2022

दौलत बेग ओल्डी हे नाव कसे पडले?

  


काराकोरम खिंडीच्या जरा आधीच लेह-यारकंद मार्गावरील हिवाळी आणि उन्हाळी व्यापारी मार्ग एकत्र येत. ही जागा खिंडीतून वर येणा-या अथवा खाली जाणा-या व्यापा-यांच्या थांब्याचे ठिकाण होते. त्याचे नाव दौलत बेग ओल्डी कसे पडले याचा इतिहास पाहणे रंजक ठरेल.

सुलतान सैद खान हा यारकंद-खोतान येथील सन १५१४ ते १५३३ या काळात मोगल खानातीचा राजा होता तर दुघ्लक जमातीचा अमीर मिर्झा मोहम्मद हैदर हा त्याचा मुख्य सेनानी होता मिर्झा भारतात मुघल राजवट आणणा-या बाबरचा मामेभाऊ होता व तो इतिहासकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याने लिहून ठेवल्यानुसार सुलतान सैद खानाचा काळ सुबत्ता आणि शांततेचा होता. सन १५३२मध्ये सुलतान सैद खानने काश्मीर आणि तिबेटला लुटण्यासाठी एक मोहीम काढली. मिर्झा हैदरला सोबत घेऊन तो ससैन्य निघाला. पण काराकोरम खिंड पार करताच तेथील उंचीमुळे विरळ असलेल्या प्राणवायुमुळे व कडाक्याच्या थंडीमुळे तो श्वसनाच्या आजाराने त्रस्त झाला.  बरे होण्यासाठी त्याला  तेथेच काही काळ मुक्काम ठोकावा लागला. बारा झाल्यावर तो पुढे निघाला आणि नुब्रा खोरे त्याने उध्वस्त केले. पुढे सुलतान कारगीलवरून बाल्टीस्तानकडे जायला निघाला तर झोजीला खिंड जिंकून मिर्झा काश्मीरकडे निघाला. बाल्टीस्थानमध्ये वेळीस इस्लामचाच प्रभाव होता. तेथील लोकांनी सुलतानाचे स्वागत केले पण ते होते शिया पंथीय. सुलतान तर कडवा सुन्नी. त्यामुळे त्याने तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. अनेकांना ठार मारले तर हजारो नागरीकांना गुलाम केले.

दरम्यान मिर्झा हैदर द्रास जिंकून झोजीला खिंड उतरून काश्मीरमध्ये प्रवेशला. तेथील राजाने त्याचे चांगले स्वागत केले. तात्पुरते मांडलिकत्व मान्य करत राजाने सुलतान सैद खानाच्या नावाने नाणीही पाडली. नंतर दोघे परत फिरले व लडाखमध्ये त्यांची भेट झाली. सुलतानाने मिर्झा हैदरला तिबेटवर आक्रमण करण्याची सुचना दिली आणि तो यारकंदला परत जायला निघाला. परत जात असता त्याला पुन्हा श्वसनाच्या आजाराने त्रस्त केले. काराकोरम खिंडीजवळच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला. त्याला तेथेच पुरण्यात आले. ते स्थान म्हणजेच दौलत बेग ओल्डी. दौलत हा शब्द “दुघ्लक” या जमातनावाचा तर ओल्डी हा ‘उल्डी’ या उघूर शब्दाचा अपभ्रंश असून मिर्झा हैदरनेच या ठिकाणाचे नाव दुघ्लक बेग उल्डी असे केले होते. “जेथे श्रेष्ठ व धनाढ्य लोक मरतात अशी जागा” असाही या शब्दाचा उघूर भाषेत अर्थ होतो. पुढे ते दौलत बेग ओल्डी असे कायम झाले.

सुलतान सैद खानाचा मृत्यू झाल्यावर यारकंद मध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला. अब्दुर रशीद खान हा सुलतान सैद खानाचा मुलगा स्पर्धकांची हत्या करून नवा सुलतान बनला. त्याने मिर्झा हैदरला तिबेटहून परत यायचा आदेश पाठवला. तिबेटमध्ये हैदरची सेना विशेष पराक्रम गाजवू शकली नाही. निरोप आल्यावर तो परत फिरला खरे पण यारकंदला येईपर्यंत त्याच्याजवळ फक्त पंधरा-वीस सैनिक उरले होते. या अपयशामुळे त्याला अज्ञातवासात जावे लागले. त्याला बदक्षण (पूर्वोत्तर अफगाणिस्तान) येथील त्याच्या मामीने आश्रय दिला. येथे मात्र त्याला मोगल साम्राज्याने सामील करून घेतले आणि त्याचे उन्नती झाली. सन १५४० मध्ये बाबरपुत्र हुमायुनच्या आदेशाने त्याने पुन्हा काश्मीरवर स्वारी केली. तेथील सत्तेचा पराजय करून त्याने नाजूकशाह याला सुलतानपदी आरूढ केले. पुढे हुमायूनने काबुल जिंकल्यानंतर मिर्झा हैदरने नाजूकशाहला हटवले आणि मुघल सम्राटाच्या नावे नाणी पाडायला सुरुवात केली. येथेच त्याने ‘तारीख-इ-रशिदी’ हा आठवणी व इतिहास सांगणारा ग्रंथ लिहिला. पुढे काश्मिरी लोकांनी केलेल्या विद्रोहात झालेल्या युद्धात त्याचा १५५० मध्ये मृत्यू झाला. त्याचे दफन श्रीनगर येथेच केले गेले.

भारतावर फक्त खैबर खिंडीतून आक्रमणे झाली असे मानले जाते पण ते खरे नाही. हिमालयीन भागातून येणा-या दुष्कर मार्गांवरूनही आक्रमणे झालेली आहेत. इतिहासात नोंदले गेलेले हे एक आक्रमण. हिमालयीन प्रदेशांतील घडामोडी मुख्य भूमीवरच्या लोकांना अज्ञातच राहत असल्याने असंख्य आक्रमणे व स्वा-या इतिहासाला अद्न्यातच आहेत असे म्हणावे लागते.

या स्थळावर अजून एक विलक्षण घटना नोंदली गेलेली आहे. एकोणीसाव्या शतकात ब्रिटीश व्यापारी व हेर एन्ड्रू दाल्ग्लीश हा या मार्गावरून व्यापार करत असे. त्याने दाद मोहम्मद या क्वेट्टा येथील पठाण व्यापा-याला काही कर्ज दिलेले होते. पण दाद मोहम्मदचे दिवाळे निघाले. यारकंदहून लेहला जात असतांना दाल्ग्लीश आणि मोहम्मदची दौलत बेग ओल्डी येथे भेट झाली. तेथे दोघांत भांडण झाले आणि या भांडणाची परिणती दाल्ग्लीशच्या खुनात झाली. पुढे ह्यमिल्टन बोवर या ब्रिटीश लष्करी अधिका-याने दाल्ग्लीशच्या खुन्याचा शोध घेत घेत त्याला शेवटी समरकंद येथे अटक केली पण १८९० साली दादने कोठडीतच आत्महत्या केली.  दौलत बेग ओल्डी येथे या एन्ड्रू दाल्ग्लीशची संगमरवरी स्मृतीशिला लावलेली आहे. असे कैक संघर्ष, खून, लुटपाट या मार्गांनी पाहिले असतील.

येथून प्राचीन व्यापारी मार्ग जायचे एवढेच या जागेचे महत्व नाही तर दौलत बेग ओल्डी ही भारताच्या दृष्टीने सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची जागा आहे. येथून आता अक्साई चीन (पांढरे वाळवंट) हा चीनच्या ताब्यात असलेला भाग अवघ्या नउ किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यात येथे तापमान उणे ५५ डिग्री इतके खाली जाते. बर्फाळ वादळे ही नित्याची बाब आहे. येथे ना कसले वन्य जीव आहेत ना वनस्पती.

चीनने झिंझियांग-ल्हासा हा मार्ग अक्साई चीनमधून बांधायला सुरुवात केल्याने भारत-चीन सीमावाद सुरु झाला. युद्धही झाले. १९६० साली दौलत बेग ओल्डी येथे भारतीतीय सैन्याने चौकी बनवली. १९६२ साली याचे लष्करी तळात रुपांतर करण्यात आले. या स्थानाचे चीनला शह देण्यातले महत्व ओळखून भारत सरकारने या स्थानाचा लष्करी विकास सुरु केला. जगातील सर्वात अधिक उंचीवरची धावपट्टीही येथे तेंव्हाच बनवली गेली.  भुकंपामुळे येथील धावपट्टी निरुपयोगी झाली होती पण ४३ वर्षांच्या अंतराळानंतर 2008 सालापासून येथे पुन्हा विमाने उतरायला लागली.

लष्करी हालचालीसाठी जुनेच दुष्कर मार्ग वापरावे लागत. यात जीवित’हानीचा धोका जसा असे तसाच तेथवर जाण्यातला विलंब आणि सामुग्री नेण्यात अडथळेही येत. त्यामुळे २००१ साली भारत सरकारने लेह ते दौलत बेग ओल्डी आधुनिक रस्त्याचे काम जुन्या हिवाळी मार्गावरून सुरु केले आणि ते २०१९ साली पूर्ण झाले. तेरा ते सोळा हजार फुट उंचीवरून हा मार्ग जातो. पण या मार्गामुळे लष्करी दळणवळण सुलभ झाले आहे.

मुळच्या व्यापारी मार्गावरील एक थांब्याचे स्थान म्हणून या जागेचे महत्व मात्र संपले आहे. मध्य आशियातील बहुतेक भाग आता चीनच्या ताब्यात गेल्याने १९२० नंतर या लेह-यारकंद मार्गावरील व्यापार पूर्ण थांबला आहे. पण १९१३-१४ मध्ये या मार्गावरून गेलेला अन्वेक्षक फिलीप्पो फिलिपी म्हणतो कि, “या मार्गावरील माल वाहतूक करणारे व्यापारी तांडे संख्येने फार मोठे आहेत. प्रवासाला कठीण असलेल्या देस्पांग पठारावरून हे तांडे एकतीस मैलांचे (५० किमी) अंतर दुष्कर ह्वामानात व बिकट भौगोलिक स्थितीतही एका दिवसात पार करतात हे फारच विशेष आहे.”

-संजय सोनवणी 

जर पुरोगामित्व बदनाम केले जात असेल तर जबाबदार कोण?


 

पुरोगामी हा शब्द फुर्रोगामी असा वापरत त्या शब्दाला जाणीवपूर्वक बदनाम केले जाते आहे. सेक्युलर हा शब्द फेक्युलर असा उच्चारून सेक्युलरीझमला हेतुपुरस्सर बदनाम केले जाते आहे. एकंदरीत या प्रतिगामी झुंडी आपल्या ट्रोलशक्तीच्या आधाराने पुरोगाम्यांना नामोहरम करायचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला जातो. या संदर्भात अनेक वादळी चर्चाही केल्या जातात. या प्रतीगाम्यांना प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात पुरोगामीही तेवढ्याच जोमाने प्रतिगामी गटांवर फॅसिस्ट अथवा भक्त हा शिक्का मारत त्यांना बदनाम करत बसतात, एकुणातच पुरोगामीही झुंडी बनवत पुरोगामित्वाचे मुख्य लक्षणच हरपून बसतांना दिसतात.

 

येथे मुद्दा हा आहे कि पुरोगामीपणा म्हणजे नेमके काय? सेक्युलरिझम म्हणजे नेमके काय? या प्रश्नांची उत्तरे विचारायला गेले तर कथित पुरोगामी आणि प्रतीगामीही उघडे पडतात कारण त्यांना या संज्ञाचा अर्थ नीटपणे माहित असतोच असे नाही. पुरोगामी सर्व मानव समान आहेत, माणसात परिवर्तन होत असते हे जाणून त्या मानवतावादी परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक कार्य लेखन, वक्तृत्व व आपल्या वर्तनातून करत असतात. पुरोगामीपणा जीवनाची सारी अंगे स्पर्शतो. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला पुरोगामी म्हणता येते. तो सार्वजनिक जीवनात कोणत्याही धर्माचे अवडंबर माजवत नसल्याने वा कोणत्याही धर्मावर द्वेशापायी तुटून पडत नसल्याने तो इहवादी, म्हणजेच सेक्युलर आहे असे मानले जाते.

 

 पुरोगामी हा परिवर्तनवादी असतो हे ओघानेच आले. स्वत:सोबतच समाज आणि एकुणातील शोषणकारी  व्यवस्था यात बदल घडवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. सर्व समाजच एका व्यापक ध्येयाकडे वाटचाल करेल अशी आशा तो बाळगून असतो. त्यात द्वेष, विखार यांचा लवलेशही नसतो. समाज पुरोगामी, परिवर्तनवादी बनावा असा प्रयत्न करणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे असे विवेकी लोक मानतात. याउलट अतिरेकी राष्ट्रवादाची/धर्मवादाची निर्मिती करत लोकांना एकव्युहात आक्रमकपणे सामावून घेण्याचा प्रयत्न करत, अर्थवाद, वंशवाद अथवा धर्मवादाला आधारास घेत जी सामाजिक व राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला फॅसिझम म्हणतात व या तत्वज्ञानाच्या एकनिष्ठ पाईकास फॅसिस्ट असे म्हणतात. यात मानवी स्वातंत्र्य, मानवता, विचारांचा खुलेपणा याला स्थान नसते. फॅसिझम कोणत्यातरी तत्वाला, धर्माला वा अर्थरचनासिद्धांताला टार्गेट करत त्याला शत्रू घोषित करत असतो. आपली सारी व्युहरचना त्या वास्तविक अथवा काल्पनिक शत्रुच्या नायनाटासाठी वापरत समाजात संघर्ष निर्माण करत वर्चस्वतावादाला जिंकण्यासाठी मदत करत असतो. 

 

प्रत्यक्षात आजकाल पुरोगामीपणाची व्याख्या बव्हंशी प्रतीगामीपणात विरघळून गेली आहे असे आपल्याला वास्तव जीवनात डोकावून पाहिले तरी सहज लक्षात येईल. यातून पुरोगामीपणा राहिलाच कोठे हा प्रश्न निर्माण झाल्यास आश्चर्य नाही.

 

धर्मांध जसे नेहमीच टोळीवादाचा आश्रय घेतात तसेच जर पुरोगामी म्हणवनारे गटही टोळीवादालाच शरण जात आपापल्या अवांच्छणीय अज्ञानातून जन्मलेल्या स्वार्थांना साध्य करण्यासाठी झटत असतील तर त्याला पुरोगामी कसे म्हणता येईल? अशाने प्रतिगामित्व अथवा फॅसिझम संपणार नाही तर तो दुप्पट गतीने वाढत सर्वांनाच आपल्या विळख्यात घेत सर्वनाश करेल यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही.  झुंडशाही ही पुरोगामीपनात/परिवर्तनतावादात बसत नाही याचे भान आपल्याला यायला हवे. प्रतिगामी जे करतात तेच पुरोगामी करत असतील तर दोघेही प्रतिगामीच राहतील आणि परिवर्तनाची शक्यताच संपुन जाईल हे आपल्याला समजायला हवे. “अमुक जातीचे/धर्माचे लोक कधीच बदलू शकत नाही” हा विश्वास जेंव्हा सामाजिक चळवळीतील विचारवंत व्यक्त करतात तेंव्हा त्यांचा परिवर्तनाच्या सिद्धांतावरच विश्वास नाही हे स्पष्ट होते. उजवे आणि डावे यातील भेद येथेच गळून पडतो आणि सारे वेगळ्या प्रकारे फॅसिस्टच आहेत असे म्हणावे लागते. कारण परिवर्तनवाद यात कोठेच रहाणार नाही आणि सारेच एका अपरिवर्तनीय आणि म्हणूनच अनैसर्गिक विचारकोठडीत बंदिस्त होऊन जातील.

 

माणुस हाच कोणत्याही सर्जनशील विचारकाचा केंद्रबिंदु असतो. फॅसिस्ट लोकही माणसे असतात. कोणी फॅसिस्ट म्हणून जन्माला येत नाही. मनुष्य प्रवाहपतित होत जेंव्हा एखाद्या विचारधारेचा टोकाचा समर्थक बनतो तेंव्हा तो आपसूक फॅसिस्ट बनलेला असतो. पुरोगामी म्हणवनारेही याच व्याख्येत येतात. मुळात विषय परिवर्तनाचा असतो. मनुष्य एखाद्या विचारधारेच्या टोकाशी जात असेल तर त्याची मानसिकता समजावून घेण्याची जबाबदारी व त्याला बदलवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ख-या परिवर्तनवाद्यावर येते. कोणालाही मानवतावादी, स्वतन्त्रतावादी अर्थाने बदलवण्याचा प्रयत्न न करता त्याला सरळ वाळीत टाकने, त्यांना काहितरी लेबल चिकटवून अस्पृश्य मानणे किंवा जी व्यक्ती ज्या आता पटत नसलेल्या गोटातून वा विचारव्युहातून बाहेर पडू इच्छिते तिला झुंडशाही वापरत पुन्हा मुळच्याच गोटात वा विचारव्युहात अमानवीपणे ढकलणे आणि गोटबंदिस्त व विचारबंदिस्त होऊन विरोधकांनाही तसेच करायला भाग पाडणे हा एकविसाव्या शतकातील गंभीर वैचारिक व नैतिक गुन्हा आहे हे आपण समजावून घ्यायला हवे. परिवर्तनाची शक्यताच यामुळे मावळून जाते हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

आपलाच गोट वा विचारव्यूह सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उभा आहे हा गर्व बाळगत आज कथित प्रतीगामी आणि पुरोगामी एकाच स्तरावर आले आहेत कि काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

खरे तर सर्वच वैचारिक झुंडी एका परीने फॅसिस्टच झालेल्या आहेत असे म्हनायला प्रत्यवाय नाही. विचारांचा कडवेपणा हे फॅसिस्ट असल्याचे लक्षण असेल तर पुरोगामी म्हनवनारे लोकही फॅसिस्टच होत आहेत असे म्हणता येईल.

 

याचे कारण म्हणजे आजकाल सर्व विचारधारा, डाव्या असोत कि उजव्या, त्यांच्यात शेवटी फॅसिस्ट गट बनतांना दिसतात. सारे आपापल्या गटाचे अलिखित संकेत पाळतात व ते म्हणजे गट-विचाराशी "गद्दारी" करायची नाही. अशा गद्दारांना सामाजिक माध्यमांतुन "नारळ देणे" ही नित्याची बाब असते. एवढेच नाही तर कोणत्या ना कोणत्या झुंडीत नुसता प्रवेश मिळवायचा नाहीय तर त्या गटाचे वैचारिक (?) नेतृत्वही करायचे या आकांक्षेने पछाडलेले अनेक तथाकथित विचारवंतही जीवाचा आटापिटा करतांना दिसतात. हा आटापिटा अनेकदा कीव येण्याच्या पातळीवर जातो. ते आपण आपापल्या गटाशी निष्ठावंत राहण्याचा वा आपण आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतातच पण सर्वांपेक्षा जास्त उग्र भाषा वापरली तरच आपले नेतृत्व उंचावेल असा त्यांचा भ्रम असतो. कोणतीही झुंड शेवटी उग्र होत जात शेवटी फॅसिस्ट बनते ती अशी. यात पुरोगामीपण आणि सेक्युलरिझम कोठे राहतो? आणि सारेच जर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रतीगामीच होत गेले तर आपले सामाजिक भविष्य काय?

 

यामुळेच जर पुरोगामीपणा आजकाल बदनाम केला जात असेल तर पुरोगामी म्हणवणा-या प्रत्येकाने आपले कोठे चुकते आहे याचे आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या विचारांना तपासून घेत नवी मांडणी केली पाहिजे. गतकाळातील महनीयांच्याच विचारांना अर्धवट पद्धतीने अंधपणाने शिरोधार्य मानत विचारांत नवी कोणतीही मौलिक भर न घालता भविष्याकडे पाहणे हेही प्रतीगामीपणाचेच लक्षण आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

 

-संजय सोनवणी

Published in Navshakti

Saturday, June 4, 2022

Allah is giver- Saint Tukaram

 Allah is giver

Who teaches us to give
Allah is all-curing medicine
And He is the Allah
Who feeds the living being…!
Who else could be so mighty
Other than Him?
Since he is everything and
Nothing can take place without his
Sacred will!
(Saint Tukaram)
(Translated by Sanjay Sonawani)

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...