Friday, September 30, 2022

भारताचे पुरातन नाव मेलुहा



जेंव्हा या देशाला भारत हे नाव पडले नव्हते, हिंदुस्तान आणि इंडिया ही नावेही आली नव्हती तेंव्हा भारताला ‘मेलुहा’ हे नाव होते असे पुरावे सुमेरियन दस्तावेजांनी आपल्याला लाभलेले आहेत. सुदैवाने आपल्या प्राकृत भाषांनीही हा पुरातन पुरावा जपून ठेवला आहे. पण मेलुहा (मेलुक्खा अथवा मिलिच्छ) या शब्दाचा अपभ्रष “म्लेंच्छ” असा करत वैदिक आर्यांनी त्या शब्दाचा अर्थच बदलवन्याचा प्रयत्न केल्याने हे मुळचे राष्ट्रनाम मागे पडले. त्यानंतर ऋषभनाथपुत्र चक्रवर्ती भरतावरून भारत हे नाव प्रचलित झाल्यानंतर तर ते विस्मरणातच गेले. चिकटून राहिले ते हिणार्थाने भारतातील मूळ रहिवाशांना. नंतर म्लेंच्छ ही सद्न्या विदेशी परधर्मीय/परभाषिक लोकांना बहाल केली गेली. अर्थात ही सांस्कृतिक उलथापालथ कशी झाली हेही आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे.

सुमेरियन दस्तावेजांनुसार मागन, दिल्मून या देशांप्रमाणेच मेलुहा हा त्यांचा मोठा व्यापारी भागीदार होता. मागन म्हणजे आताचा अरब अमिरात आणि ओमान हे देश होत. दिल्मून म्हणजे इराणचा काही भाग. मेलुहा येथून सागवानी लाकूड, मौल्यवान खनिजे, तांब्याच्या लगडी, शोभिवंत दगड, गोमेद, नीलमणी व त्यापासून केलेले अलंकार, हस्तिदंत, सोने, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंबरोबरच मोर, कोंबड्या, कुत्रे आदी प्राणी-पक्षीही मेलुहातून तेथे निर्यात केले जात असत. सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्राही तेथे सापडलेल्या आहेत. हा व्यापार समुद्रमार्गे तसेच खुश्कीच्या मार्गानेही होत असे.

दक्षिण सुमेरमध्ये मेलुहाच्या व्यापा-यांनी अनेक वसाहती वसवलेल्या असल्याचेही उल्लेख उपलब्ध आहेत. दक्षिण सुमेरमधील  गिर्सू या नगराराज्यातील गुआब्बा शहर हेच या वसाहतीचे एक स्थान होते असे मानले जाते. अक्काडीयन साम्राज्याच्या काळात सम्राट रीमुश याने इलम विभागात मेलुहाच्या सैन्याशी युद्ध केल्याची नोंदही उपलब्ध आहे. अक्काडचा एक सम्राट सार्गोनचा नातू नारम-सीन (इसपू २३३४-२२१८) यानेही आपले मेलुहाच्या सैन्याशी युद्ध झाल्याचे नोंदवून ठेवले आहे. एन्की आणि निन्हुर्स्ग या पुराकथेतही मेलुहा देशाचा उल्लेख आला आहे.

मेलुहा हे भारताचेच नाव होते हे बहुसंख्य विद्वानांनी मेलुहाहून सुमेरला आयात केल्या जाणा-या वस्तूंवरून निश्चित केले आहे. हे नाव फक्त सिंधू संस्कृतीच्या परीसरापुरते मर्यादित होते कि संपूर्ण देशाचे यावरही विस्तृत चर्चा झालेली असून त्याबद्दल मात्र काही विभिन्न मते आहेत. पण हे नाव संपूर्ण उपखंडाचे असावे हे दाखवणारे पुरावे प्राकृत भाषांनी व नंतर अपभ्रषित संस्कृतने राखून ठेवलेले आहेत. मायकेल विट्झेल यांनी स्पष्ट केले आहे कि संस्कृत म्लेंच्छ हा शब्द प्राकृत मिलीच्च्छ (पाली-मेलुखा) या शब्दाचा सुमेर्यान अपभ्रंश आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये (इसपू १००० किंवा ८००) म्लेंच्छ हा शब्द पहिल्यांदाच येतो. हा तोच काळ आहे जेंव्हा वैदिक भारतात प्रवेशले. म्लेंच्छ या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. किंबहुना हा इंडो-युरोपियन भाषेतीलही शब्द नाही. मग हा शब्द येथील लोकांना वैदिकांनी का वापरला हा प्रश्न जेंव्हा निर्माण झाला आणि मेलुहा हे नाव सुदूर सुमेरमध्ये वापरले गेल्याचे आढळले तेंव्हा म्लेंच्छ हा शब्द मेलुहा (सुमेरियन) किंवा मिलीच्छ (मेलुखा) या प्राकृत-पाली शब्दांशीच निगडीत असून हे भारतीय उपखंडाचे मुळचे नाव होते हे लक्षात आले.

वैदिक लोकांनी म्लेंच्छ हे नाव विदेशात राहणा-या भिन्नभाषी लोकांना दिलेले नाव नाही तर तेच नाव मुळचे येथील प्रदेशाचेही होते. भारतीय लोकांची भाषा मूळच्या वैदिक भाषेपेक्षा वेगळी असल्याने वैदिक आर्यांच्या दृष्टीने येथील लोकभाषा परक्या व आधी अनाकलनीय असल्याने फ्रेंचांची फ्रेंच तशीच मिलीच्ह लोकांची भाषा म्लेंच्छ असा बदल करत तो भाषावाचकही केला. वैदिक येथेच रुळल्यावर आणि येथील भाषा आपलीशी केल्यानंतर त्यांनी सरसकट परभाषिकांना म्लेंच्छ ही सद्न्या देऊन टाकली तर ते स्वत: ज्या प्रांतात वसले होते तेथील भाग आर्यावर्त व तेथे आर्य भाषा बोलणारे लोक राहतात अशा नोंदी त्यांच्या ग्रंथांत करून ठेवल्या.

हे येथेच मर्यादित राहिले नाही तर त्यांनी म्लेंच्छ (व शुद्रही)  हे संबोधन केवळ वैदिकेतर भारतीयांनाच नव्हे तर शक, हुंण, कुशाण, कम्बोज, किरात, बाह्लीक इत्यादींनाही बहाल करून टाकले. हा शब्द एखाद्या शिवीसारखा अवमानजनक अर्थाने वापरला जाऊ लागला व पुढे देशनाम म्हणून हा शब्द गायबच झाला. वैदिक आर्य ज्या भागात वसले त्या भागाला त्यांनी “आर्यावर्त” असे नाव दिल्याने तर आर्यावर्ताच्या बाहेर असलेले सारेच त्यांच्या दृष्टीने म्लेंछ ठरले. हाच शब्द त्यांनी वैदिकेतर शूद्र टोळीलाही आधी वापरून पुढे अन्य सर्वच प्रान्तांतील एतद्देशियांनाही उद्देशून वापरल्यामुळे शुद्र व म्लेंच्छ म्हणजे जेही कोणी वैदिक धर्मीय नाहीत ते येथील मुळचे रहिवासी असा या शब्दाचा अर्थविस्तार झाला. पुढे पुढे तर म्लेंच्छ (मिलीच्छ) आणि शुद्र (प्राकृत सुद्द) हे शब्द समानार्थी झाले.

यात वैदिकांचा दुराभिमान दिसून आला तरी त्यामुळे या देशातील मुळचे लोक स्वत:ला कोणत्या नावाने संबोधित होते हे मात्र जतन होऊन राहिले. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश म्हणजे मेलुहा व वैदिक अपभ्रंश म्हणजे म्लेंच्छ असा आहे असे अस्को पार्पोला, मायकेल विट्झेल, अहमद हसन दानी यांसारख्या जागतिक कीर्तीच्या विद्वानांनीही या मताची पुष्टी केलेली आहे.

म्हणजेच सनपूर्व २२०० मध्ये भारताचे नाव बाहेरच्या जगाला मेलुहा म्हणून माहित होते तर भारतीय स्वत:ला मिलीच्छ म्हणवत होते. मिलीच्छ या शब्दाचा सुमेरियन अपभ्रंश मेलुहा तर वैदिक भाषेतील अपभ्रंश म्लेंच्छ. हा शब्द वेदांमध्ये येत नाही कारण या देशाशी त्यांचा परिचय फक्त सिंधू नदीच्या खो-यापर्यंत सीमित होता. त्यांना येथील लोक आपल्या भूभागाला कोणत्या नावाने ओळखतात हे माहित असण्याचे कारण नव्हते. पण ते जसे भारतात आले. ते येथील लोकांना तुच्छच (अनार्य) समजत असल्याने म्लेंच्छ हे मुलनिवासींचे देशनामही पुढे शुद्र (खरे तर ही सिंध प्रांतातील अभिर, शिबी, किरात, गुर्जर इ. जमातींप्रमाणे एक ऐतिहासिक जमात होती) या टोळीनावाप्रमाणेच ‘हीण’ या अर्थाचे बनले.

पण आज आपल्या हाती जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून आपल्या देशाचे सर्वात आधीचे ज्ञात नाव मिलीच्छ (मेलुखा) होते व विदेशी लोक त्याला मेलुहा म्हणत असत हे आता सिद्ध झाले आहे. सिंधू संस्कृतीतील लोक व्यापाराच्या निमित्ताने तेथे जात असल्याने व वसाहतीही वसवल्या असल्याने त्यांना त्यांचे मूळ देशनाम माहित असणे स्वाभाविक असले तरी त्यांना या देशाचा पूर्ण विस्तार व येथे राहणा-या विविध जमाती माहित नव्हत्या असे आपण अन्दाजू शकतो.

पुढे मात्र मिलीच्छ हे देशनाम मागे पडले पण तो शब्द तेवढा मात्र “म्लेंच्छ” व “मेलुहा” या अपभ्रंशीत स्वरूपात जतन होऊन राहिला. पुढे ऋषभनाथपुत्र भरताने विनिय नगराचे राज्य विस्तारले त्यामुळे देशाला भारत असे नाव प्राप्त झाले. त्या इतिहासाची नोंद हिंदू व वैदिक पुराणांनीही करून ठेवली. विनिय नगराचेही नाव इतिहासात बदलत राहिले. ते पुढे इक्ष्वाकूनगर व साकेत झाले तर इसवी सनाच्या दुस-या शतकानंतर त्या नगराचे नाव अयोध्या असे रूढ होऊ लागले. जगभर देश व प्रांत (नगर व गावेही) नाव बदलत राहिल्याचा इतिहास आहे. कधी हे सांस्कृतिक उलथापालथी किंवा सत्ता बदलत गेल्यामुळे झालेले आहे.

-संजय सोनवणी

 

 

Thursday, September 29, 2022

“काव्य फुले”- वादाचे कारण कशासाठी?

 



सावित्रीबाई फुले यांच्या “काव्य फुले” काव्यसंग्रहाचे शिव-पार्वतीचे चित्र असलेले मुखपृष्ठ आणि आत एका कवितेत सरस्वतीचे आदरपूर्वकल घेतलेले नाव तसेच बहिणाबाई चौधरी यांनी सरसोती देवीला माय म्हटले यावरून वैदिकवाद्यांना जोर आलेला आहे. शिव-पार्वती या मुळात सर्जनाच्या पुरातन भारतीय (हिंदू) देवता असल्याने त्यांच्याबद्दल आदर-भक्तीभाव असणे हे स्वाभाविक आहे. वेदांमध्ये शिवाला शिस्नदेव म्हणून त्याज्ज्य ठरवले आहे हे वैदिकवाद्यांनाही माहित असले पाहिजे. किंबहुना प्रतिमा-मुर्तीपुजाच वैदिकांना त्याज्ज्य होती. भारतात आल्यावर त्यांनी त्यांचे वैदिकीकरण करत स्वीकारले असले तरी शिव-पार्वती वैदिक देवतासाम्भारातील दैवत नाही हे स्वयंस्पष्ट आहे. फारतर त्यांना येथील लोकसमूहाची श्रद्धा टाळणे अशक्य झाल्याने त्यांनी त्याचे वैदिकीकरण करत स्वीकारले असे म्हणता येईल.

 

काही दैवते जनसमुदायावर सत्ताधारी वर्ग अथवा प्रभावशाली वर्गही लादत असतो व प्रभाव निर्माण करत असतो. उदा. कुशाणकाळात पारशी देवता नना (ज्यावरून आपला नाणे हा शब्द सिद्ध झाला आहे.) ही देवता सर्व नाण्यांवर विराजमान असे. अनाहिता ही पारशी देवीही मोठ्या प्रमाणावर पुजली जायची. तिचीही मंदिरे होती. kushan सत्ता गेली आणि या देवताही गेल्या. सरस्वती, विष्णू यासारख्या काही वैदिक देवतांचा मोठ्या प्रमाणावर गवगवा केल्याने त्याही सर्व हिंदू समाजातही काही प्रमाणात का होईना कालौघात झिरपल्या यात काहीही नवल नाही.

सावित्रीबाई अथवा बहिणाबाई या संस्कृती-धर्माच्या चिकित्सक अभ्यासक नव्हत्या. त्यांच्यापुढचे प्रश्न वेगळे होते. ते सोडवण्यासाठी भावनिक दृष्ट्या ज्याही बाबी इष्ट ठरतील त्यांचा त्यांने स्वीकार केला. मुळात समाजावर वैदिक प्रभाव आजही तेवढा ओसरलेला नाही तर त्यांच्या काळात काय स्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो.

 

बहुजनवादी (हिंदू आणि अन्यधर्मीय) मात्र अशा गोष्टी समजावून न घेता आपल्या निरंकुश अडाणीपणातून धर्म-देवता या सर्वच बाबी नाकारतात. त्यासाठी तेही लबाड्या करतात. सावित्रीबाईंचे काव्यगुण हे यांच्या खिजगणतीत नसतात कारण त्यांच्या कवितासंग्रहावारेल शिव पार्वतीचे चित्र आडवे येते. हा सांस्कृतिक भोंगळपणा आहे.

 

दुसरीकडे उजवे (वैदिक) बेलगाम होत सोयीस्कर वेळी अशा बाबी बाहेर काढतात आणि या अनाभ्यासी पुरोगामी विचारवंतांची पंचाईत करून टाकतात. याचा अर्थ हा नव्हे कि त्यांचाही अभ्यास असतो.

 

अलीकडेच मुत्तुरामन कृष्णमूर्ती या गृहस्थांनी “कोणताही देव ब्राह्मण नव्हता...” किंवा कोणीतरी म्हत्ल्याप्रमाने “शिव हा तर अनुसूचित जमातीचा...” अशी विधाने करून वैदिकांना दोषमुक्त करण्याचा प्रयत्न केला. शिव-पार्वती या सृजनाची प्रतीके असलेल्या व प्रतीकरुपातच पुजल्या जाणा-या हिंदू देवता आहेत. त्यांना कोणत्याही जातीय वर्गवारीत बसवणे हे सांस्कृतिक गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. नामसाधर्म्याचा गैरफायदा घेत सांस्कृतिक पितृत्व घेण्याचा प्रयत्न तर वैदिकांचा लाडका छंदच आहे. थेम्स नदी हे तमसा या वैदिक नदीचा अपभ्रंश आहे असे अनेक उद्योग आपण पाहिलेलेच आहेत. रेणुका देवीचेही तसेच केले गेलेले आहे.

 

 

राहिले वैदिक धर्माचे, तर त्यांच्या सर्वच देवता या ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य वर्णात वाटल्या गेलेल्या आहेत. असे असतांनाही कोणताही वैदिक देव ब्राह्मण नाही हे विधान अज्ञानातून आलेले आहे हे उघड आहे. पण तो वैदिक धर्माचा आतला मामला आहे. हिंदूंना त्याच्याशी काही घेणे असण्याचे कारण नाही.

 

विद्येची देवी म्हणून मुळात नदी असलेल्या देवतेची प्रतिष्ठा वाढवल्यावर व प्रचार केल्यावर हिंदूंनीही सरस्वतीचा स्वीकार केला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्रभाव हे अनेक कारणानी पाडले जातात. सांस्कृतिक वर्चस्वतावाद त्यामागे असतोच. शेवटी कोणते दैवत कोणी भजावे अथवा मानावे हा ज्याच्या त्याच्या समजुतीन्चा वा श्रद्धेचा प्रश्न असतो. हिंदूंनी व वैदिकांनी तर पीरांनाही स्वीकारले आहे, भजले आहे. शेख मोहम्मदावर तर रामदासांनी आरती लिहिली होती. म्हणून रामदास हे मुस्लीम होत नाहीत. अनेक मुस्लीम संतकवींनी राम-कृष्ण-विठ्ठलावर काव्ये लिहिली आहेत. पण हिंदू देवता कोणी पुजल्या म्हणून ते हिंदू होत नाहीत आणि वैदिक देवतांना आपल्या काव्यात स्थान दिले म्हणून ते वैदिक समर्थक होत नाहीत. त्या त्या काळातील सांस्कृतिक प्रभावांचा हा परिपाक असतो. पण कोणते दैवत कोणाचे हे आंतरिक आकलन असणेही तेवढेच महत्वाचे.

 

सहज मनाने केला गेलेला कोणत्याही देवतेचा स्वीकार हा सांस्कृतिक समन्वयाकडे नेवू शकतो. पण त्यामागे सांस्कृतिक अतिक्रमणाचा हेतू असेल तर तो कोणत्याही सुजाण समाजाने हाणून पाडला पाहिजे. तुम्ही देव मानता कि नाही ही तुमची व्यक्तिगत भावना आहे. ती तुम्हालाही श्रद्धाळू समाजावर लादन्याचा अधिकार नाही. तुमचे काम चिकित्सा करणे, कोण कोणाचे हे तरी पक्के करणे हे आले पाहिजे व ते सांगत राहिले पाहिजे. लादने हा वैदिकांसारखाच सांस्कृतिक दहशतवाद होईल!

 

वैदिकांनीही कोणी एखाद्या हिंदूने (तुमच्या भाषेत बहुजनाने) कधीकाळी वैदिक देवता, वेद यांचे नाव घेतले होते म्हणजे “पहा पहा...तुमचेच अमुक ढमुक काय म्हणतात ते” असे खोडसाळ प्रश्न विचारून आपलेही दिवाळे निघाले असल्याचा प्रत्यय देवू नये. त्यामुळे हिंदू आणि वैदिक धर्म एक होत नाहीत!

 

हे सत्यच आहे कि वैदिक समाज अल्पसंख्यांक असला तरी गुप्त काळापासून तरी राजसत्ताच्या सोबत राहून भारतीय समाजावर त्याने प्रचंड वर्चस्व गाजवले आहे. वेदोक्त संस्कारांच्या स्तोमातून आजही बरेचशे लोक बाहेर पडलेले नाहीत. मध्ययुगात काय स्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता तरी हिंदूंनी या प्रभावातून मुक्त होत आपले पाळेमुळे स्वतंत्र केली पाहिजेत.

 

Friday, September 23, 2022

धनगरांच्या वैभवाचा ऐतेहासिक दुर्मिळ दस्ताऐवज



संजय सोनवणी लिखीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास" : धनगरांच्या वैभवाचा ऐतेहासिक दुर्मिळ दस्ताऐवज
--------------------------------------—-----------
सुप्रसिध्द साहित्यिक तथा इतिहास संशोधक संजय सोनवणी हे स्वतः अतिशय व्यक्तीगत कठीण प्रसंगातून जात असतांना हे पुस्तक लिहिले असे त्यांनी प्रस्तावनेतच नमूद केलेले आहे. तरीसुद्धा लेखनापासून तसूभरही विचलित न होता पुस्तक लेखनाचे काम अविरतपणे पूर्ण केले.
या पुस्तकाची प्रस्तावनाच एवढी जबरदस्त आहे की जणू लेखक सहज बोलत बोलत प्रचंड इतिहासाचा एकेक धागा उलगडत वाचकांना धनगरांच्या इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची जाण करून देतात.
198 पृष्ठात जेवढा सामावता येईल तेवढा अत्यंत परिश्रमाने धनगरांचा इतिहास लेखकाने एकूण बारा प्रकरणात गुंफलेला आहे.
पहिल्या प्रकरणात भारतीय प्राचीन संस्कृतीचा वेध घेतांना पुरातन काळातील सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती यांचा नेमका भेद ते स्पष्ट करत पशुपालकांच्या प्राचिन संस्कृतीच्या निर्मितीचे योग्य निर्देशन मांडतात. तद्वतच शैव धर्म व वैष्णव धर्म यातील भेद स्पष्ट करत वैदिक धर्माचे वेगळेपण अत्यंत स्पष्टपणे नमुद करतात.
इस पूर्व 1000 ते 3 -या शतकापर्यंत केवळ मगधापर्यंतच वैदिक धर्म प्रबळ होता . गुप्तकाळात वैदिक धर्माला राजश्रय प्राप्त झाल्यामुळे वैदिकांचा बोलबाला वाढला.हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केलेले आहे.
दुस-या प्रकरणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे विस्तृत विवेचन व संशोधनिय आकलन यांचा ससंदर्भ मेळ बसवत सोनवणी यांनी पंढरपूरचा पांडूरंग ज्याला विठ्ठल देखिल संबोधतात त्याच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेल्या वैदिकांच्या कपोलकल्पीत दंतकथांचा समाचार घेत त्या कथांची काजळी समुळ पुसत विठ्ठल म्हणजेच पांडूरंग हा पशुपालक धनगरातील वीर पुरूष तथा सम्राट होता आणि त्यांचे साम्राज्यही होते हे सिद्ध केलेले आहे. पौंड्रंक या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे पांडुरंग होय. नि पौंड्रांची राजधानी पौंड्रपूर व त्याचेच पुढे पंढरपूर झाले. ही अतिशय ताकदिची मांडणी लेखकाने केलेली आहे.
तिस-या प्रकरणात ' खंडोबा ' यांची मांडणी केलेली आहे.अगदी प्रस्तावनेतच सोनवणी यांनी पृष्ठक्रमांक 16 वर शेवटच्या परिच्छेदात विठ्ठल, खंडोबा, जोतीबा, धुळोबा, बिरोबा ही दैवते धनगरांचे पराक्रमी पूर्वजच होते असे स्पष्ट नोंदवत खंडोबाच्या विविध अंगांची अतिशय समर्पकपणे मांडणी करतात.
चौथ्या प्रकरणात अखंड भारताचा निर्माता " सम्राट चंद्रगुप्त मौर्य " यांची मांडणी करतांना ब-याच मतामतांतरांचे मोठ्या ताकदीने सोनवणी यांनी खंडण केलेले आहे. चंद्रगुप्ताच्या बालपणाच्या पूर्वपारंपारिक कथा , चाणक्य- चंद्रगुप्त बालपणीच्या भेटीच्या रंजक कथा , धनानंदाने चाणक्याचा अपमान करणे व चाणक्याने नंद राज्याचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा घेत शेंडीला गाठ बांधणे या आतापर्यंतच्या ऐकिव कल्पनांना लेखकाने पूर्णतः फाटा दिलेला आहे ." चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे." ( पृष्ठ क्र.53) असे सोनवणी यांचे म्हणने तथ्याला धरून आहे.
भारतावरील अलेक्झांडरचे आक्रमण चंद्रगुप्त व चाणक्य यांनी प्रखर देशप्रेमापोटी परतवून लावण्याचा संयुक्त स्वातंत्र्य लढा उभारला असे लेखकाने केलेले विधान सत्याच्या परामर्श घेणारे आहे. एवढेच नव्हे तर चंद्रगुप्त मौर्य हे घराणे पशुपालक धनगरच होते हे ते सप्रमाण सिद्ध करत ठासून सांगतात .
पाचव्या प्रकरणात आताच्या महाराष्ट्र राज्याची उभारणी करणा-या सातवाहनांचा इतिहास मांडलेला आहे. इ.स.पूर्व 230 मध्ये हे घराणे उदयाला आले. सिमुक (किंवा सिंधुक) हा या घराण्याचा संस्थापक होता. महाराष्ट्रासहित गुजरात, मध्यप्रदेश, दक्षिण भारत , कर्नाटक, गोवा आणि आंध्र एवढ्या प्रदीर्घ भूभागावर सातवाहनांचे साम्राज्य होते. हे साम्राज्य सुमारे 450 वर्षे टिकले. संजय सोनवणी एका बाजूने " भारतात एवढा प्रदीर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे कोणतेही घराणे झाले नाही ." हे नमुद करतात तर दुस-या बाजूने " शकांच्या पारतंत्र्यापासून महाराष्ट्राला मुक्त केले . आज महाराष्ट्र सातवाहनांचे उपकार विसरलेला आहे. हैद्राबाद येथे मात्र गौतमीपुत्र सातवहनाचा भव्य अश्वरूढ पुतळा आहे " याची जाणीवही करून देतात. सातवाहनांना अनेक इतिहासकारांनी ब्राम्हण घराणे ठरवण्याचा प्रयत्न केला; परंतू सातवाहऩ हे पशुपालक धनगर जमातीतील होते हे लेखकांनी अनेक दाखले देत सिद्ध केलेले आहे.
त्याबरोबरच पुढील काही प्रकरणात विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना करणारे हरिहर - बुक्क व देवगिरीचे यादव या धनगर राजघराण्यांचा वैशिष्ट्य पूर्ण इतिहासाची मांडणी केलेली आहे. तद्वतच होळकर राजवंशातील महाराणी अहिल्याई, आद्य स्वातंत्र्यवीर महाराज यशवंत, शहिद विठोजी ,तुळसाबाई, आद्य महिला स्वातंत्र्य विरांगणा भीमाई यांचाही रोमहर्षक इतिहास मांडत अनेक नाविण्यपूर्ण ऐतेहासिक बाबिंना लेखकाने उजाळा दिलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकांनी अभ्यासण्यासारखे आहे.
एकंदरीत " धनगरांचा गौरवशाली इतिहास " हे पुस्तक धनगरांच्या ऐतेहासिक वैभवाचा दुर्मिळ दस्ताऐवज असून धनगरांना ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता प्राप्तीच्या दिशेने घेऊन जाणारा दीपस्तंभ आहे.
धनगर जमातीत वाचन, लेखन व संशोधन संस्कृतीचा तथा विज्ञानवादी संस्काराचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे लेखकाचे प्रयत्न स्तुत्य आहे. एकीकडे धनगरांच्या इतिहासाचे विखूरलेले अवशेष एकत्रीत करत दुसरीकडे वैदिकांनी धनगर जमातीच्या इतिहासाच्या अनुषंगाने मन, मस्तिष्कावर लावलेली कपोलकल्पित दंतकथांची काजळी समूळ पुसण्याचा प्रयत्न या दोन्ही बाबी संजय सोनवणी सरांनी योग्य व तटस्थपणे या पुस्तकातून साधलेल्या आहेत.
होमेश भुजाडे
नागपूर
9422803273
पुस्तकाचे नाव: धनगरांचा गौरवशाली इतिहास
लेखक: संजय सोनवणी
एकूण पृष्ठं : 198
किंमत: 200/- रूपये
प्रकाशक: पुष्प प्रकाशन, पुणे.

संजय सोनवणी सरांचे आभार
——————————————
आदरणिय ,
सोनवणी सर
नमस्कार
जय यशवंत...
सर,आपल्या असामान्य प्रतिभेतुन अत्यंत मौलिक असा आम्हा वाचकांना ज्ञानवृद्धीगंत करणारा खजिना आपण वेळोवेळी देत आला आहात,पुढे ही देत रहाल यात शंका नाही.
आजच्या जमान्यात नवनविन ऐतिहासिक विषयावर अनेक संशोधनपर साहित्य येत आहे पण ती तटस्थपणे,किंवा नाण्याच्या तिसर्या बाजुने विचार उलगडत मांडलेले असतेच असे खात्रीशिर म्हणता येत नाही,त्यास कोणता तरी वास लागलेला असतो,पण आपण मात्र तो कुठल्याही दुर्गंधीला थारा न देता हा किल्ला आपल्यातील प्रामाणिक प्रतिभेच्या जोरावर लढवतआहात हे नक्की.
एका अस्सल पुराव्याच्या आधाराने आपण सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर पानिपतावरील प्रस्थापित इतिहासकारांनी केलेला खोटा आरोप कसा निराधार आहे हे उजेडात आणुन त्या योद्ध्यावरील आरोप खोडुन काढत आम्हा वाचकांना सत्य इतिहास माहीत करुन दिला त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
यशवंतराव होळकर हे लुटेरे नसुन ते एकाच वेळी वैश्विक महासत्तेला व भारतीय सत्तेला आपल्या पराक्रमाच्या जोरावर ललकारणारे ,आधुनिक युध्द कौशल्य निपुन आद्य स्वातंत्र्यवीर होते.हे आपणामुळे माहीत झाले.आजच्या व पुढील अनेकपिढ्यांना महाराजा यशवंत होळकर यांचे चरीत्र स्फुर्तीदायी , प्रेरणादायी व उर्जादायी ठरणार आहे.यात शंका नाही.
नुकतेच आपण "धनगरांचा गौरवशाली इतिहास"हे पुस्तक वाचकांच्या हाती दिले.हा इतिहास आपण का लिहला याचे विवेचन आपण प्रस्तावनेत दिले आहे.यातुन आपली वंचित समाजा विषयी असलेली तळमळ व त्याच बरोबर आपला उदात्तदृष्टीकोन लपत नाही.खरे तर याच दृष्टीकोनातुन मागेच इतिहास बाहेर आला असता तर ,या समाजा मध्ये आजच्या विषमतेला स्वाभिमानाने तोंड देण्याचे धैर्य निर्माण होत तसेच त्या समाजातील न्युनगंडात्मक भावनेचा र्हास होवुन या समाजात एतिहासिक प्रेरणेने अन्याया विरुद्ध लढण्याची उर्मी केव्हाच संचारली असती.आणि कदाचित या समाजाचे चित्र आजच्या पेक्षा वेगळे असते.

इच्छामरणातील आजच्या नैतिक बाजू!

 


मानवी जीवनव्यवहारांना सर्वच पातळ्यांवर व्यापून वावरत असलेला मृत्यू हा नेहमीच तत्वज्ञ-संशोधकांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. जगातील सर्वच धर्म अंतत: मृत्यूविषयीच्या भयातून निर्माण झालेले आपण पाहू शकतो. मृत्युनंतर काय याबाबत मार्गदर्शन नाही असे जगात अपवादात्मक धर्म आहेत. बव्हंशी तत्वज्ञाने अंतत: मृत्यूभयावर विजय मिळवत, असुरक्षित जीवनाला आध्यात्मिक पातळीवर सुरक्षिततेचा आभास कसा मिळु शकेल हे दर्शवण्यासाठी तत्वज्ञांचे बव्हंशी लेखन झाले आहे हेही आपल्या लक्षात येईल. किंबहुना नीतिशास्त्राचीच उपज ही आदिम मानवी भयावर मात करण्यासाठी झाली आहे. विज्ञानही मनुष्य अमर जरी नसला तरी त्याचे एकुनातील आयुष्य कसे वाढेल या प्रयत्नांत आहे. स्वत: अमर नसलो तरी देवता अमर्त्य आहेत ही श्रद्धा बव्हंशी धर्म व्यक्त करतात व त्यांच्या साधना, पूजा-प्रार्थनांनी अंतिम मोक्ष, साल्वेशन, निब्बाण इ. प्राप्त होइल अशी आशाही दाखवतात.
म्रुत्यू कोणाला सहसा नको असतो. किंबहुना तो कसा लांबविता येईल असाच प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रतिक्षणी मनुष्य कोणा-न-कोणा जीवाला मरतांना पाहत असतो...पण आपण स्वत: मात्र मरणार नाही यावर त्याची श्रद्धा असते. पण वर्तमान जगात मात्र उतारवयात जगणे असह्य व्हावे व मृत्य हाच श्रेय:स्कर अथवा प्रेय वाटावा असेही जगणे अनेकांच्या वाट्याला येत असते. त्यांना मृत्यूची दया नव्हे तर अधिकार हवा असतो. दयामरण हे मानसिक क्रिया विस्कळीत झालेल्या व कितीही प्रयत्न केले तरी पूर्ववत जगणे अशक्य असलेल्या व्यक्तींबाबत असले पाहीजे. भविष्य अनिश्चित असल्याने कोणतीही व्यक्ती मानसिक संतुलित अवस्था असताना अशा बाबींची कल्पना करून स्वेच्छामरणाचे मृत्युपत्र करेल याची संभावना नाही.
मृत्यू ही अपरिहार्य घटना नैसर्गिक वृद्धापकाळाने जशी घडुन येते तशीच ती युद्धांत, नैसर्गिक प्रकोपांत, अपघातांत, खूनादी घटनांतही घडुन येते. किंबहुना अनिश्चित असणे हेच मृत्युचे भय वाटण्याचे मोठे कारण असते. असे असले तरी भावनोद्रेकात आत्महत्याही घडत असतात. ऐहीक वा मानसिक कारणांनी स्वत:चे जीवन स्वत: संपवणे हा नुसता कायदेशीर नव्हे तर नैतीक/धार्मिक गुन्हा मानला जातो. जन्माला आल्यानंतर व्यक्ति ही स्वतंत्र उरत नसून ती एकुणातील समाजाशी उत्तरदायी असते असा भाव त्यामागे आहे. शिवाय जगण्याचा अधिकार हे तत्व आपल्या राज्यघटनेत कलम २१ अन्वये सामाविष्ट आहे. पण मरण्याचा अधिकार नाही. अलीकडेच विशिष्ट स्थितीत दया मरणाला सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली असली तरी ती प्रक्रिया किचकट आहे. इच्छा मरणाबाबत अजूनही समाज मौन आहे असे म्हणता येईल. जगण्याचा अधिकार आहे तर जगणेच निरर्थक अथवा यातनादायी झाले तर मरण्याची अनुमती का नको हा प्रश्न यामागे आहे.
स्वेच्छामरण हा पुरातन काळापासून चालत आलेला एक मार्ग आहे. स्वेच्छेने देवतांना बळी जाणे, बळी म्हणुन विकले जाणे याबरोबरच जीवंत समाधी घेणे, स्वत:ला पेटवून घेणे अथवा जलसमाधी घेणे असे अनेक मार्ग अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपल्याला पहायला मिळतात. इच्छामरणाचे वरदान वगैरे भाकड भाग बाजुला काढला तरी भीष्मांनी स्वत:च मृत्यू स्वीकारला. द्रोणानेही तसेच केले. गांधारी, कुंती व धृतराष्ट्र यांनीही वणव्यात स्वत:ला जाळुन घेतले. यांतील सत्य अथवा रुपकात्मता काहीही असो, स्वेच्छामरणाचे आकर्षण समाजांत या ना त्या पातळीवर वावरत होते एवढे तरी आपण निश्चयाने म्हणू शकतो आणि धार्मिक भावनांनी प्रेरित स्वेच्छा मरण (आत्महत्या नव्हे) सामाजिक/सांस्कृतीक विरोध असल्याचे दिसत नाही.
"आपले जीवन तृप्त झाले आहे अथवा आपले लौकिक कार्य संपले आहे या भावनांनी विचारपूर्वक केलेला निर्णय व त्याची अंमलबजावणी म्हणजे स्वेच्छामरण" असे आपण वरकरणी म्हणु शकतो. पण तृप्तता अथवा लौकिक कार्य हे शब्द फसवे असून केवळ भावनिक असू शकतात हेही उघड आहे. अनेक साधू-संतांनी आपले लौकिक कार्य संपले असे घोषित करुन तरुण वयातही समाधी घेतली. पण नैतिकतेच्या व्याख्या व समाजस्थिती बदलत असते. शारीरिक दृष्ट्या विकलांग झालेल्या, असह्य यातना भोगणा-या व्यक्तीला जगवत ठेवायचे व जगायचे हे अनैतिक आहे त्यामुळे त्यांना तरी दयामरणाचा अधिकार असला पाहिजे व विशिष्ट स्थितीत व्यक्तीच्या इच्छेचाही समावेश असला पाहिजे. पण आधुनिक काळात “जगण्याचा अधिकार” सर्वोपरी झाल्याने शारीरिक व्याधींमुळे यातना भोगत असलेल्या किंवा जगण्यातील अर्थच हरपून बसलेल्या परावलंबी व्यक्तींना व्यक्तींनाही दया-मरण अथवा इच्छा-मरणाचा अधिकार नाही.. आताही प्रक्रिया किचकट करूनच दयामरणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. इच्छामरण मान्य होणे ही तर अजून फार दूरची बाब आहे. “लिव्हिंग विल” हा सर्वोच्च न्यायालयाने वापरलेला शब्द तर अनेकांच्या बाबतीत निरर्थक ठरतो याचेही भान नाही.
गेल्या शतकापासून एकुणातील स्थिर समाजव्यवस्थाच ढवळुन निघाली असून मानवी नातेसंबंध नवीन मिती धारण करत आहे व त्यातील गतीशास्त्रही विस्मित करनारे आहे. समाजशास्त्रही त्यावर फारसा सुखकर तोडगा काढू शकलेले नाही हे आपण रोजच पाहतो. काळ बदलला नसून माणसे बदलली आहेत कारण काळ घडवणारी मुळात माणसेच आहेत. असे असले तरी जीवनातील व्यामिश्रता आता समाजकेंद्रीत न होता व्यक्तिकेंद्रीत झाल्याने एक भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनमान वाढले आहे हे खरे आहे पण ते आरोग्यदायी असतेच असे नाही. शारीरव्याधी ते दोन पिढ्यांतील संघर्षांमुळे उतारकाळ हा तृप्त नव्हे तर वेदनादायक (शारीर आणि मानसिक पातळीवर) बनत चालला आहे. एकाकीपणा, थकलेली वा व्याधीग्रस्त गात्रे, भावनिक आधारांची कमतरता तर कोठे होणारा शारीरिक व मानसिक छळ यातून खुप मोठा वर्ग आज चालला आहे. मे २०१३ मध्ये गुजराथमधील एका मराठी दांपत्याने मुलगा व सुनेकडून होणा-या छळाला कंटाळून जिल्हाधिका-याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. अशी असंख्य प्रकट-अप्रकट प्रकरणे नित्यश: घडत असतात. याचा निर्वाह नेमका काय हा आपल्या समाजशास्त्रज्ञांसमोरील मुख्य प्रश्न असला पाहिजे. दयामरण आणि स्वेच्छामरण हे दोन्ही एकाच पातळीवर आणले जायला हवे व त्यांना मान्यता असायला हवी.
व्याधीग्रस्त, दुर्लक्षित अवस्थेत, सृजनशीलतेचा अस्त झाल्यानंतर अपमानित जीवन अन्यांच्या मेहरबानीवर जगणे व तसे जगायला नैतिक व कायद्याचा विचार करून भाग पाडणे हीच अनैतिकता आहे असे म्हणता येते. कोणत्याही सामाजिक संस्था अशा समस्या पुर्णपणे हाताळू शकत नाहीत कारण अशा घटनांचा विस्फोट होत आहे हे आपल्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत इच्छामरणाचा निर्णय विचारपुर्वक घेतला जात असेल तर त्याची अंमलबजावणी होण्यास काय हरकत असावी?
इच्छामरण आणि दयामरण या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत. उतारवयात व्यक्ती शारिरीक दृष्ट्या विकलांग अथवा निर्णय घेण्यास अक्षम नसला तरीही मानसिक यातनांना तोंड देणे अशक्य झालेल्यांनाही मरणाची अनुमती मिळणे म्हणजे इच्छामरण. दयामरणासाठीची कायदेशीर व नैतिक स्थिती अगदी उलटी आहे. असे असले तरी अनावश्यक जगून समाजावर भार बनण्यापेक्षा जीवनातून मुक्ती मिळवण्याचा, म्हणजे जगण्याचा अधिकार जसा आहे तसाच सन्माननीय मरणाचाही अधिकार आहे हे मान्य झाले पाहिजे. अशी परवानगी कोणत्या स्थितीत देता येऊ शकते याची विधीसंहिता बनवता येऊ शकते. काळाप्रमाणे सामाजिक नीती बदलली पाहिजे. आत्महत्येचा निर्णय हा क्षणिक भावनिकतेतून घेतले जातात. इच्छामरणाचे तसे नाही. सुदृढ समाजासाठी यावर आपल्याला नव्याने चिंतन करायला हवे.
-संजय सोनवणी


Like
Comment
Share

ईशान्य भारतातून पूर्वेला जोडणारे मार्ग!

 

 


 काश्मीर व लेहमधून हिमालयीन पर्वतराजीतून जाणा-या प्राचीन व्यापारीमार्गांची माहिती आपण घेतली. ईशान्य भारतातुनही तिबेट, चीन ते दक्षिण-पूर्व आशिया खंडातील राष्ट्रांशी जोडणारे अनेक मार्ग प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. येथून केवळ व्यापाराच नव्हे तर अनेक मानवी स्थलांतरेही झालेली आहेत. सांस्कृतिक बाबींची जशी देवान-घेवाण झाली तशीच उत्पादन व पीकपद्धतीचीही झाली. इशान्य भारताचे विशिष लोकजीवन बनले आहे ते या सान्निध्यामुळे. तेथील लोकजीवन समजावून घ्यायचे असेल तर त्या भागातून जाणा-या व्यापारी मार्गांवर काय काय घडामोडी घडल्या याचाही अभ्यास आवश्यक बनून जातो. 

 इतिहासकाळात उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार तेराव्या शतकातील खिलजी घराण्याच्या मुहम्मद बख्तियार या बंगालच्या मुस्लीम शासकाने तिबेटवर आक्रमण केले होते. त्यासाठी त्याने आसाममधील गुवाहटीजवळील हाजोपासून निघणारा, त्सोना नदीच्या किना-याने झेदांग येथे गेला व तेथून ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिणेच्या बाजूने ल्हासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. हा मार्ग पूर्वेकडे तसाच पुढे जात तत्कालीन चीनी राजधानी चेंगडूपर्यंत जात असे. बख्तियार तिबेटमधील चुंबी खो-यापर्यंत पोचू शकला. तिबेटी सैन्याने गनिमी काव्याने त्याची वाट तेथेच अडवली आणि घनघोर युद्धात बख्तियारचा पराभव केला. बख्तियार परत फिरला तेंव्हा त्याच्या बरोबर फक्त शंभराच्या आसपास सैनिक उरलेले होते. तो थकलेल्या आणि आजारी अवस्थेत देवकोट येथे आला असता त्याच्याच घराण्यातील अली मर्दन खिलजीने त्याचा खून केला. बख्तियार हा इतिहासात कुप्रसिद्ध असून त्यानेच बिहार स्वारीच्या दरम्यान विक्रमशिला, ओदांतपुरा या विद्यापीठांना उध्वस्त केले तर नालंदा विद्यापीठ पुरेपूर नष्ट केले. असे असले तरी त्याची तिबेट स्वारी इतिहासात प्रसिद्ध आहे कारण त्याने रूढ मार्ग टाळून तुलनेने अपरिचित अशा प्राचीन व्यापारी मार्गाचा वापर स्वारीसाठी केला होता.

 पेरिप्लस ऑफ एरिथ्रेयन सी या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या एका ग्रीको-रोमन हस्तलिखितात इशान्य भारतातील धीस हे स्थान व बेसाते नावाच्या जमातीचा तेजपत्ता या मसाल्याचा व्यापार करत असल्याबाबत उल्लेख आहे. धीस म्हणजे प्राग्ज्योतीषपूर तर बेसाते म्हणजे भुतिया जमात होय असा विद्वानांनी निर्वाळा दिला आहे. भुतिया जमातीने आसाम, तिबेट, चीन व बंगालशी पुरातन काळापासून व्यापारी संबंध ठेवला होता असे यावरून दिसते.

 चीनमधील युनान प्रांत अरुणाचल प्रदेशाला तसा सर्वात जवळचा. बिहारआसामम्यानमार युनान ते थेट थायलंडकंबोडिया व्हिएटनामपर्यंत जाणारे मोठे किमान तीन मार्ग तरी इसवी सनपुर्व दुस-या शतकापासून वापरात होते. अन्यही कमी अंतराचे पण चीनला जोडनारे चार मार्ग ऐतिहासिकदृष्ट्या नोंदवले गेलेले आहेत. उदाहणार्थ आसाममधून सिचुआनला जाणा-या एकमेव मार्गाची नोंद जरी अरबांनी करून ठेवली असली तरी भारतात मात्र त्याबाबत फारशी माहिती लिहून ठेवलेली मिळत नाही. हा मार्ग फार दुर्गम होता. या मार्गाने सिचुआनला पोचायला दोन महिने लागत आणि हा मार्ग रानटी चिन्यांनी वसाहती केलेला असून विषारी दमटपणाने भरलेला, जीवघेणे साप आणि विषारी झाडाझुडुपांनी भरलेला असल्याचेही नोंदीत म्हटले आहे. याचाच अर्थ अशाही स्थितीत प्राचीन काळापासून हा मार्ग वापरात होता व धाडसी व्यापारी व्यापार करत होते हे सिद्ध होते. म्यानमार-आसाम मार्गाबाबतही अनेकदा चर्चा झालेली असली तरी पुरातन मार्गांचे पुनरुज्जीवन आपल्याला अजून नीटसे साधलेले नाही हे उघड आहे.

 खरे म्हणजे हे मार्ग उत्तरेतील मध्य आशियाला जोडणा-या मार्गांइतकेच केवळ व्यापारच नव्हे तर सामरिक दृष्ट्यासुद्धा महत्वाचे आहेत. १९६२ च्या युद्धानंतर चाळीस वर्ष बंद झालेला नथु-ला खिंडीतील मार्ग व्यापारासाठी पुन्हा वापरात येऊ लागला होता पण डोकलाम वादानंतर पुन्हा त्यात खिळ बसली आहे. चीनने एकीकडे प्राचीन रेशीम मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत "वन बेल्ट वन रोड" हा महाकाय प्रकल्प नवा रेशीम मार्ग बनवण्यासाठी हाती घेतलेला आहे. एके प्रकारची भारताची कोंडी करण्याचा हा चीनचा प्रयत्न स्वत:ची मार्ग बांधणी ते इशान्य भारतातुन येणा-या मार्गांची अडवणुक यातून दिसतो. वन बेल्ट वन रोड प्रकल्पात भारत सहभागी झालेला नाही याचाही राग चीनला आहेच.

 आजवर पश्चिमेकडेच डोळा असलेल्या भारताने मध्य आशिया व पुर्वेकडील राष्ट्रांकडे व्यापार व सामरिक दृष्ट्या विशेष लक्ष दिले नाही. प्राचीन मार्ग आज वापरात राहिलेले नसल्याने ते लोक-स्मृतीतही फारसे राहिलेले नाहीत. प्राचीन मार्गांचे पुनरुज्जीवन करत चीनला टाळत पुर्वेकडील देशांशी खुष्कीच्या मार्गाने दळणवळण वाढवायला हवे होते. १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी "पुर्वेकडे पहा" अशी हाळी दिली होती. त्याचा परिपाक म्हणून इंग्रजांनी दुस-या महायुद्ध काळात आखलेल्या "स्टिलवेल" प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे घाटले होते. स्टिलवेल प्रकल्पानुसार ब्रह्मपुत्रा खो-यातून जाणा-या पुरातन व्यापारी मार्गाची पुनर्बांधणी करीत म्यानमार ते थायलंड आणि मलेशिया जोडायचे घाटत होते. या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे नरसिंह रावांनी ठरवले. म्यानमारनेही यात रस घेतला होता. अन्यही राष्ट्रांशी बोलणी सुरु होती. या धोरणानुसार म्यानमारफिलिपाइन्सकंबोडिया वगैरे पुर्वेकडील देशांशी व्यापारी आणि लष्करी संबंध दृढ करणे हा हेतू होता आणि या देशांना जोडणा-या रस्त्यामुळे त्याला मोठीच मदत होणार होती. शिवाय याचे सामरिक व राजकीय लाभही भारताला होणार होते.

 आजही आपला पश्चीमीतील देशांशी व्यापार व राजनैतिक संबंध सातत्याने येत असले तरी आपला पुर्वेकडील देशांशी होणारा व्यापार नगण्य आहे. सांस्कृतिक व राजनैतिक बाबींपासून भारतीय शक्यतो अलिप्त राहतात आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे पूर्वेकडील देश निकट असले तरी तिकडे पाहण्याची आपली दृष्टी संकुचित आहे. याचा दुष्परिणाम असा कि व्यापारवृद्धीसाठी स्थानिकांनी जे प्रयत्न करायला हवेत तेही केले जात नाहीत. याचा नकळत झालेला दुष्परिणाम असा कि पूर्वेकडील राष्ट्रांतील महत्वाची कंत्राटे चीनच्याच घशात जात आहेत. भारत एक प्रबळ व्यापारी प्रतिस्पर्धी म्हणून पुढे न येण्याला दळनवळनातील सुलभता नसणे हे महत्वाचे कारण आहे. किमान हा रस्ता जर बनला तर या देशांतील अंतर खूप कमी होणार आहे. त्यामुळे व्यापारात व सेवा पुरवण्यात आज आहे त्यापेक्षा अनेक पट आघाडी घेता येणे शक्य आहे. म्यानमारमधील तेल आणि वायुच्या साठ्यांचा उपयोग मध्यपुर्वेवर असलेले सध्याचे अवलंबित्व कमी करण्यातही उपयुक्त ठरनार आहे. शिवाय सामरिक हालचालींसाठी सुद्धा या रस्त्याचा उपयोग होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 पण एकंदरीत अनास्थेमुळे प्रत्यक्षात या प्रकल्पाला फारसे पुढे नेता आले नाही. यात चीननेही खूप खोडे घातले. नंतर अटलबिहारी वाजपेयींनी पुर्वेकडे पहा या धोरणाला उचलून धरले पण प्रत्यक्षात काही व्यापार करार होण्यापलीकडे रस्त्याचे काम काही पुढे सरकले नाही. त्यानंतर तर या विषयाला विस्मरनातच टाकले गेले. खरे तर चीनला शह देण्यासाठी अशा मार्गांची नितांत गरज होती व आहे. आपण सध्या फक्त सीमाभागात रस्ते बांधण्यावरच जोर दिला आहे. पण हे पुरेसे नाही हे भारताने लक्षात घेण्याची गरज आहे. आपली सामरिक व आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी उत्तरव उत्तरपुर्वेकडील पुरातन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे. चीनला शह द्यायचा असेल आणि भारताचा व्यापार-उदीम वाढवायचा असेल तर  बासणात बांधुन ठेवलेले "पुर्वेकडे पहा" हे धोरण पुन्हा नव्याने राबवणे आवश्यक ठरते.

 -संजय सोनवणी

 

Monday, September 19, 2022

आदमची गोष्ट


 

पुर्वेने नवा दिवस उगवल्याची घोषणा केलीआतापर्यंत अंधाराशी हातमिळवणी करून एकाकार झालेले जंगल त्या धुसर उजेडाने आपले स्वतंत्र अस्तित्व टोकदारपणे दाखवू लागले. निराकाराला आकार येवू लागला आणि प्रगाढ शांततेवर पक्षांच्या किलकिलाटीच्या बुट्ट्याही उमटू  लागल्या. पलिकडच्या पहाडाआडुन सुर्याने जसे डोके वर काढले तसा अभेदातील भेद अधिक ठळक झाला. ्घनदाट वृक्षराजींचे शेंडे सोनेरी प्रकाशात उजळुन निघाले. ही वेळ आली कि आदम अरण्यातून झिरपणा-या या किरणांना अलगद तुडवत आपल्या कामगिरीवर निघे. त्याला घाई अशी कधी नसे. निसर्ग हर क्षणाला बदलत असे आणि ते परिवर्तन आपल्या निरागस डोळ्यांत साठवत, चिरपरिचित असलेल्या हरीण-पाडसांशी, खारोट्यांशी, हुप्प्यांशी गप्पा मारत आदम निगुतीत आपले मार्गक्रमण करे

 

हा त्याचा दिनक्रमच होता जसा. दिस माथ्यावरून ढळेपर्यंत तो जळणासाठी लाकडे तोडे. आजवर त्याने जीवंत झाडांवर कु-हाड चालवली नव्हती. वठलेली मरू घातलेली अनेक झाडे अरण्यात होती. तो त्यातल्याच एखाद्या झाडाची लाकडे तोडे. स्वत:ला पेलता येईल एवढा भारा झाला कि मग तो वेलींनी शिस्तीत बांधुन तो खांद्यावर घेई व अरण्यापार एका टेकडीच्या मागे असलेल्या गो-यांच्या वसाहतीकडे त्याच निगुतीत चालू लागे. संध्याकाळर्यंत तो आरामात ते अंतर चाले. घनदाट राईतुन विरळ झाडी व डोंगराळ मार्ग आला कि त्याला नको असलेल्या जगात प्रवेशल्यासारखे वाटे. शेवटचा डोंगर ओलांडला कि गो-यांची वसाहत येई. तो त्या वसाहतीमधून कधीच गेला नव्हता. तिला वळसा घालुनच तो जाई. या वसाहतेच्या टोकाला, झाडीत, एखाद्य वाळीत टाकलेल्या काळ्या माणसासारखी एक लाकडाची वखार अंग चोरुन वसलेली होती. सरळसोट लाकडांचे ओंडके आणि त्याच्याच काढलेल्या फळ्यांचे ढीग वखारीचे आवार भरून होते. वखारीत घुसले कि पायाखाली भुसा व लाकडांचे तुकडे. एक वेगळाच वास येथे भरलेला असे. शवागारात यावा तसा. मृत झाडांचा. त्याला हे नकोसे वाटे. जेवढ्या लवकर आपले ओझे विकता येईल तेवढ्या वेगाने, त्या दिवशी मिळेल त्या किंमतीला तो विके आणि वेगात बाहेर पडे. आजुबाजुला तर त्याने कधीच लक्ष दिले नव्हते. अगदी सायंकाळी बाहेर फिरायला पडलेल्या नटव्या सुंद-यांकडेही त्याचे लक्ष नसे. किंबहुना हे जगच त्याच्या समजुतीबाहेरचे होते आणि समजून घ्यायची गरजही त्याला कधी वाटली नव्हती.

 

त्याची रोजची कमाई एकसारखी नसे. घासाघिस करणेही त्याच्या स्वभावात नव्हते. किंबहुना तो बोलेच इतका कमी कि अनेकांना तो मुका वाटे. आज किती पेनी मिळाल्यात यावर तो काय खरेदी करायची हे ठरवे. गो-यांची वसाहत सोडली कि उजव्या बाजुला चढावर काळ्यांची जुनी-पुरातन, जीव हरवलेल्या वठलेल्या झुडुपांप्रमाणे पसरलेली वस्ती होती. त्याची खरेदी तेथेच होई. कधी काळा पाव, पावटा, भात आणि मीठ घ्यायला परवडतील एवढे पैसे असत किंवा ब-याचदा त्यातही कटौती करावी लागे. पण त्याचीही त्याला खंत नसे. खरेदी झाली कि ती पाठंगुळीला टाकून तो अरण्यातील आपल्या झोपडीकडे संथपणे चालू लागे. दिवस जेंव्हा अंधाराची गळाभेट घेण्याच्या तयारीत असे तेंव्हा तो थकल्या पावलांनी आपल्या झोपडीत परते.

 

अरण्यात त्याची झोपडी एका छोट्या तळ्याकाठच्या मोकळ्या जागेत होती. येथे तो आपल्या मंदबुद्धी बायकोच्या सहवासात कितीतरी वर्ष रहात होता. त्याच्या गांवातील लोक तर आता त्याच्या या एकाकी ठिकाणी जंगलात राहण्याच्या निर्णयावरून चिडवायचेही विसरून गेले होते आणि आदमलाही आपण गांवात ...गांव कसले...काळ्यांचा घेट्टोच तो... का राहत नाही हा प्रश्नच पडत नसे. पण जसा तो परततांना अरण्यात पुन्हा प्रवेशे त्याचा थकवा कोठल्या कोठे पळून जाई. अरण्याचा गंध त्याला मत्त करी. अंधारात अरण्याचा हवेच्या झोतांवर होणारा सळसळाट, पक्षांचा रात्रनाद आणि द-याखो-यांतील हिंस्त्र प्राण्यांच्या डरकाळ्या कानावर पडल्या कि त्याला घरी आल्याचा आभास मिळे. त्याच्या एरवी एक रेषही न हलणा-या चेह-यावर आत्मतृप्तीचे मंद हसू विखरे. त्याची चाल परत संथ होई...ती हे अंधारी निबीड रोमांचक अरण्य आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी.

 

जेंव्हा पावसाचे वादळी तडाखे बसत तेंव्हा तो हातातील काम सोडुन देई. एखाद्या खडकावर वा ओंडक्यावर पाऊस झेलत अनावर कुतुहलाने चिंब निथळत्या, वादळांना शरणागत होत पुन्हा ताठ होण्याचा प्रयत्न करणा-या अरण्याकडे अथवा दुथडी भरून वाहणा-या ताम्री नदीकडे पहात बसे. त्याची लोखंडाच्या कांबीसारखी काळीशार मजबुत शरीरयष्टी निसर्गाचे सारेच आघात कृतज्ञतामय आनंदात झेलण्यात धन्यता मानत असे. मग ती शरीर गोठवणारी थंडी का असेना. या उघड्या-वागड्या पण एका स्वर्गीय लयीत जगणा-या जगात त्याचे जग पुर्ण समर्पण भावनेने मिसळून गेले होते. अरण्य त्याच्याच देहाचा-मनाचा अविभाज्य भाग होता जसा.

 

 आदम जेंव्हा पोरगेलासा होता नि घेट्टोत रहात होता तेंव्हा शेकोटीजवळ बसून दारू पीत त्याचा आज्जा त्याला त्याच्या तरुणपणाच्या गोष्टी रंगवून सांगत असे. त्याचे खोल गेलेले निस्तेज डोळे त्या गोष्टी सांगतांना जीवंत होत. चंदेरी रात्री एखाद्या हरणाचा अथवा सिंहाचा पाठलाग करत असतांनाच्या गोष्टी सांगे तेंव्हा त्याचा आवाज सभोवतीच्या अंधाराला जणू ललका-या देईत्याची सांगायची शैलीही अशी होती कि आदमला वाटे तोही जणू त्या अरण्यातून प्रवास करतोय...धोकेदायक गुंफांत प्रवेशतोय...अशक्यप्राय वाटा तुडवतोय. आदमला वाटे या गोष्टी कधी संपुच नयेत. पण आज्जा गोष्ट सांगता सांगता पीतही भरपूर असल्याने त्याची जीभ जडावू लागे, सिंहाच्या जागी हरीण तर हरणाचे माकड कधी होई याचा पत्ता लागायचा नाही. शेकोटीही विझत आलेली असे नि आज्जा तसाच कलंडुन गाढ झोपी जाई. आदम स्वत:च अरण्य बनलेला असे. त्यातून फिरत असे. झेपावणारे हिंस्त्र प्राणी त्याच्या रक्तात्न निवांत शांतपणे वाहत असत. त्याला लवकर झोप लागायची नाही. अरण्य साद द्यायचे. उद्या पुन्हा दुसरी गोष्ट आज्जाकडून ऐकायची असा निर्धार करत डोळे मिटुन तो मन अरण्यात झेपावत राही.

 

गो-यांसोबतही आज्जा अनेकदा शिकारीला गेलेला. ते किस्से सांगतांना आज्जाच्य स्वरात तिरस्कार असे. उपहास असे. या गो-यांना कोणत्या प्राण्याला कसे मारायचे याची अक्कल कशी नाही हे तो उदाहरणे देवून सांगे. त्यांच्याकडे बंदुकी होत्या. भेकडाचे शस्त्र...आज्जा म्हणे. धनुष्यबाण आणि भाल्याने शिकार करण्यात जे शौर्य आहे ते हाकारे काढत बंदुकीतून गोळी झाडण्यात होते? अरे हाड...आज्जा जाळात थुंके नि मग भांडे पुन्हा तोंडाला लावे. पण त्या बंदुकीनेच त्यांचाही घात केला होता. पाहता पाहता ते गुलाम झाले होते.

 

आदमही एकताच अरण्यात भटकायला निघून जाई. ताम्री नदीच्या काठावर तासन्तास बसे. आज्जाने सांगितलेल्या कथा आठवत. तो स्वत:शी हसे. मी नाही शिकारी बनणार...तो म्हणे. अरण्यातील प्राणी मारण्यात काय अर्थ? हा- एखादा सिंह अंगावर आला तर गोष्ट वेगळी. त्यापेक्श्ढा त्याला ताम्रीच्या अविरत वाहणा-या प्रवाहाकडे ओपाहत बसणे किंवा झाडाखाली बसून वेगवेगळे पक्षी व माकडांच्या गंमती पाहण्यात जास्त मजा वाटे.  

 

आदम तरुणावस्थेत जसजसा प्रवेशत गेला तसतसे त्याचे बोलणेही कमी होत गेले. त्याला कोणी दिलखुलास हसलेलेही पाहिले नाही. नवख्या लोकांना तर तो मुकाच आहे असे वाटे. गो-यांनी काळ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी घेट्ट्त शाळाही उघडलेली होती. काळ्यांना प्रभुप्राप्ती व्हावी, त्यांनी त्यांचे रानटी देव विसरून जावे म्हणून त्यांचे धर्मांतरही केलेले होते. घेट्टोचे स्वत:चे असे काळ्यांसाठीचे चर्चही होते. खरे तर चर्च आधी आले. शाळा नंतर. त्याला त्याच्या बापाने शाळेत घातले होते. पण आदमचा जीव रमला नाही. अक्षरे त्याला निरर्थक वातल्याने ती शिकायचा-लक्षात ठेवायचा त्याने किंचितही प्रयत्न केला नाही. बायबलमधील उतारे घोकायचे तर त्याच्या जीवावर येई. तोंडातल्या तोंडात गुळमुळीत लापशी चघळावी तशी ती गो-यांची भाषा. उलट आपली भाषा भाल्यासारखी टोकदार आणि कलिंगडासारखी गोडकोणी मित्र त्याच्याशी इंग्रजीत बोलू लागला कि तो जणू ती भाषा आपल्याला समजतच नाही असे दाखवे व निघून जाई. जेत्यांची भाषा आपली भाषा कशी होऊ शकते? त्याला प्रश्न पडे. पण तो विरोधही करत नसे. त्याचा विद्रोह अबोल होता. किंबहूना आपण विद्रोही आहोत हेही त्याला माहित नव्हते. पण त्याच्या मानवी आसमंतात जे घडत होते ते त्याचे मन अजाणतेपणे टिपत चालले होते.

 

आपल्या पणजोबा-खापर पणजोबांवर किती अन्याय झाले याच्या दबक्या आवाजात सांगितल्या गेलेल्या कथा त्याने ऐकल्या होत्या. आजही त्यात फरक पडला नव्हता. ते काळे होते. गो-यांच्या दृष्टीने आदिवासी होते. मुर्ख आणि मतिमंद होते. त्यांना संस्कृतीच नव्हती. ते त्यांचे मत होते आणि ते बलावर काळ्यांवर लादत होते. हे कोण उपटसुंभ? ते तर परके होते आणि एखाद्या शापासारखे या भुमीवर येऊन आदळले होते. या भागावर आपल्याच पुर्वजांचे राज्य गोंमर्की देव जन्माला आला तेंव्हापासून होते. आता गोंमर्की देवाचे पर्वतावरचे स्थानही नष्ट झाले होते. आकाशातील बापाचे चर्च गांवात होते. काळे आता गुलाम होते. लहानपणी अनेकांना साखळदंडांत बांधून फटके मारत नेतांना त्यांनेही पाहिले होते. कोठे नेतात याचा कोणालाच अंदाज नव्हता. जग केवढे आहे आणि हे गोरे लोक कोठले हे आता आता समजू लागले होते. ही समज गुलामीतून येत होती हे त्यातील दुर्दैव. पण काय गरज आहे जग माहित असण्याची? येथलेच आसपासचे जग समजायला जन्म जातो. आदमला वाटे.

 

गो-यांनी फसवून आणि बंदुकीच्या जीवावर आपल्याला गुलाम बनवले ही खंत होतीच. आता काही बंधने सुधारणेच्या नांवाखाली हटली असले तरी काळे हे गुलामच होते व त्यांना घेट्टोतच रहावे लागे. गतकाळातील अत्याचाराच्या कथा मात्र म्हाता-या-कोता-यांच्या शरीरावरील जखमांच्या व्रणांच्या रुपात अजुनही सांगितल्या जात. आताचे हे अर्धवट स्वातंत्र्य भक्षाच्या शरीरातील सर्व रक्त शोषून झाल्यावर त्याला मरायला सोडुन देण्याप्रमाणे होते. त्यांचा मुळचा स्वतंत्र श्वास लुबाडला गेला होता. नवे जग बनत होते पण ते त्यांचे नव्हते. काळे आता पाटलोनी-शर्ट घालू लागले होते आणि आपल्याच जुन्या वेशभुषा आणि सवयींची कुचेष्टा करू लागले होते. धर्म तर कधीच बदलला गेला होता. इंग्रजीत बोलता येण्याला अपार प्रतिष्ठा मिळाली होती. जुने उत्सव, ढोलांच्या दनदनाटावरील बेफाम नृत्याकडॆ आज ते उपहासाने पाहत...ते करु पाहणा-यांना गावंढे म्हणत. जणू जुने जग हे कधी अस्तित्वातच नव्हते. ते झपाट्याने बदलत होते...इतके कि आदम पार मागे फेकला गेला होता जसा. त्याला या काळाशी..मनांशी जुळवून घेता येत नव्हते हा जणू दोषच बनला होता जसा.

 

 

आदमचे मुकेपण गहिरे होत चालले होते.

 

त्याचा बाप काळ्यांसाठी असलेल्या चर्चमद्ध्ये अटेंडंटचे काम करे. त्याने आदमचे लग्न करायचे ठरवले. आदम मुलींबाबत फार म्हणजे फारच बुजरा. मुली आजुबाजुला असल्या कि तो संकोचून जाई. उलट वस्तीवरच्या मुली फारच मोकळ्या ढाकळ्या. तसेही त्यांच्या जमातीत मुला-मुलींमद्ध्ये खुलेपणाचेच वातावरण असे. पण आदमला त्या वातावरणाचा फायदा घेण्याचीही कधी इच्छा झाली नाही. खरे तर त्याला जीवनाबद्दलच आकर्षण उरले नव्हते तर मुलींचे कोठून असणार? त्याने बापाच्या प्रस्तावाला विरोधही केला नाही कि स्विकृतीही दिली नाही. मुकच राहिला. बापाने धावपळ करून शेजारच्या वस्तीवरील एक मुलगी त्याच्यासाठी शोधली. तीही मतीमंद वाटावी अशीच. आदमचे लग्न पार पडले. आदमच्या व्यक्तिगत इच्छेचा प्रश्न नव्हता. त्यांची पहिली रात्र एकार्थाने भयंकर होती. हा बेडवर चिडीचूप शुन्यात पहात बसलेला तर बायको हा पुढाकार घेईल या अनिवार इच्छेने वाट पहातेय. ती जंभया देवू लागली. तरीही आदम बसलेलाच. शेवटी ती म्हणाली, "मी झोपते आता. तुला एकच सांगते...अजुनही मी कुमारिकाच आहे...म्हणजे तुला काही संशय येत असेल तर..."

 

अनोलखी स्त्रीशी कसे वागावे या संभ्रमात तो होता. तिच्या शब्दांनी त्याला धीर दिला पण साहस नाही. असे  नाही कि तारुण्यसुलभ भावनांचा ज्वालामुखी त्याच्यात उसळत नव्हता. पण अशा वेळीस वागायचे कसे हे कोठे त्याला माहित होते? शेवटी बायकोनेच पुढाकार घेतला नि मग सारे ठीक झाले.

 

तो तेंव्हा जगण्यासाठी वखारीवरच काम करे. त्याच्या सभोवती ओंडक्यांचे ढीग असत. त्याचे काम होते ते ओंडके उचलून आणायचे आणि राक्षसी यांत्रिकी करवतीसमोर ठेवायचे. ती करवत सफाईने ओंडक्याच्या चिरफळ्या उडवत जाई. संपुर्ण ओंडक्याच्या फळ्या निघाल्या कि दुसरा ओंडका. मेहनत खूप होती. त्याला त्याचे काही विशेष वातत नव्हते. वाटे ती खिन्नता. त्या चिरफळणा-या ओंडक्यांकडे पाहून त्याला वेदना होत. अरण्यात आपल्या मस्तीत वाढलेली झाडे तोडून आणली जात. हे ओंडके त्याला मेलेल्या नग्न पुरुषांसारखे दिसत. वखार झाडीतच विसावलेली होती. एकीकडे कत्तल करून आणलेल्या झाडांचे ओंडके चिरफाळत असतांना ती झाडे हवेवर डोलत...सळसळत जणू काही निरागस बोलू पाहत तेंव्हा त्याला अपराधी वाटे. जणु तोच या विनाशाला-हव्यासाला जबाबदार होता. "हे मी काय करतो आहे?" त्याला प्रश्न पडे. "मी माझ्या सगेवाल्यांना असा चिरफाळू शकेल?"

     

तो अशा प्रश्नांत बुडुन जात जरा स्तब्ध झाला कि गोरा सुपरवायझर त्याच्या अंगावर धाऊन येत म्हणे -"डुकरा, तुला यासाठी पगार देतो का? चल उठ....कामाला लाग नाहीतर गांडीवर लाथ मारील..." तो निमुटपणे उठे. दुसरा ओंडका उचलून आणायला निघे. त्याला रागही येत नसे वा भितीही नव्हती कि खंतही. किमान तो ती दाखवत नव्हता. जीवन आहे तसे त्याने स्विकारले होते.   

 

पण कधीतरी याचाही कंटाळा येतोच. किंवा त्याच्या मूक मनाने काही अव्यक्त विचार केला असेल. पण आजकाल रात्री झोपतांना त्याच्या मनात विचार उगवू लागले. हे आपण का झेलतो आहोत? या वातावरणात आपण रुजू शकत नाही तर त्यात का राहतो आहोत? आपल्याला आपल्याच आत्म्याच्या चिरफळ्या करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? जर तो स्वतंत्र असेल, म्हणजे, खरेच स्वतंत्र असेल तर आपल्याला जे आतून वाटते तसे आपण का वागू शकत नाही?

 

कामाची वेळ संपल्यावर तो अन्यमनस्कपणे इतस्तत: फिरत बसे. आपल्या आत सहजगत उगवलेल्या प्रश्नांनी ज्वालामुखीचे रुप कसे घेतले हे त्यालाच समजले नाही. पण बापाला आपल्याला काय वाटते हे कसे सांगावे? आज्जा तर मृतांच्या राज्यात कधीच निघून गेलेला. आपण जे बोलू ते बायकोला कितपत समजेल ही आशंका. मुळात आपण बोलतच नाही. कोणाशीच नाही. स्वत:शी तरी आपण बोलतो का? पण आता हा आतील बोलण्याचा निनाद विस्फोटत चालला आहे. मस्तक फुटेल असे वाटतेय. रविवारी तो जंगलात जाई. झाडांशी, ताम्रीच्या वाहत्या पाण्याशी बोलण्याचा प्रयत्न करे. पण शब्दही बेईमान. आपल्याकडे शब्दही नाहीत कि काय?

 एके गहि-या रात्री त्याला राहवले नाही. एकाएकी बाजुलाच गाढ झोपलेल्या बायकोला त्याने हलवून जागे केले आणि आवेगी स्वरात म्हणाला -"मी नाही राहू शकत येथे. घुसमटतोय मी. आपण जंगलात रहायला जावूयात. वखारीवर काम करायची माझी तीळमात्र इच्छा नाही. या माणसांत रहायची इच्छा नाही. हे बघ...आपण दोघे जाऊ. तू काळजी करू नकोस. तू आज जशी जगतेहेस तशीच...त्याहीपेक्षा जास्त सुखात ठेवेल मी तुला."

 तीने डोळे फडफडवत तो काय म्हणतोय ते त्या अर्धझोपेत समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तो अनिवार आशेने ती काय म्हणतेय याची वाट पहात होता.

 त्याची बायको खरेच मतीमंद होती की नाही, काय माहित पण ती हलक्या स्वरात म्हणाली, "तुला तसे वाटत असेल तर तसे. मी तयार आहे. जंगलात राहणे ही मजाच असेल कदाचित!"

 आदमला हे अनपेक्षीत होते. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याला आपल्या मनात बायकोची छ्बी उंचावल्यासारखे वाटले. त्याने तिला असोशीने जवळ घेतले आणि चुंबनांच्या मा-यात तिला गुदमरवून टाकले. आजची रात्र ख-या मधुचंद्राची होती.

 बायकोमुळे त्याचे धैर्य वाढले होते. सकाळी तो बापाला सामोरा गेला. तो तेंव्हा डुकराची भाजलेली बरगडी खात बांबुच्या खुर्चीवर बसला होता. बापाला त्याने कसली प्रास्तविक न क्लरता आपला निर्णय सांगितला. बापाच्या हातातील डुकराची बरगडी पडता पडता वाचली. तो डोळे विस्फारून आपल्या वाया गेलेल्या मुलाकडे पाहू लागला. याला नक्कीच वेड लागले असले पाहिजे. त्याने सावरत आदमचा निर्णय मुर्खाप्रमाणे असल्याचे घोषित केले आणि आपल्या झातातील खाद्याकडे लक्ष केंद्रेत केले. पण आदम त्याच ठाम स्वरात म्हणाल्यावर बाप पिसाळला. आक्खे घर डोक्यावर घेतले. धमक्यांचा व शिव्यांचा पाऊस पादला. आदम मुकपणे निर्विकार उभा होता. त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीसं बघून बापच हतबल झाला. पुन्हा आपल्या खुर्चीवर बसला. म्हणाला-

 " का अशी अवदसा सुचतेय तुला मुला?" त्याने खचलेल्या स्वरात विचारले. "अरे, असा विचार करणेही मुर्खपणा आहे. आपल्या नातलगांत, गांववाल्यांत रहावे, प्रगती करावी, गोंडस नातवे द्यावीत नि त्यांचे भविष्य या लोकांपेक्षा मोठे घडेल हे सारे करण्याऐवजी जंगलात रहायला जाण्याचा विचार पाखंड नाही काय? गो-यांएवढेच...किंबहुना त्यांच्यापेक्षा श्रीमंत व्हावे अशी स्वप्ने तुला पडतच नाहीत काय? ज्या वखारीत आज तू मजूर आहेस तोच एक दिवस विकत घ्यायचे नुसते स्वप्न पाहिले असतेस किंवा ज्या जमीनी आपल्या होत्या...ज्यावर आपल्या बापदाद्यांनी घाम गाळला त्या पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तरी मला धन्य वाटले असते. असले कोणते भूत तुझ्यावर स्वार झालेय कि माझ्या स्वप्नांवर थुंकतो आहेस तु? अरे...जरा शहाणा हो..." त्याचा बाप थकल्या स्वरात म्हणाला.

 काही क्षण आदम आपल्या बापाकडे त्याच स्थिर...निर्विकार नजरेने पहात राहिला. मग म्हणाला-

 "पा, मला मुळात काही नकोच आहे. असं नाही कि मला माझ्या काही इच्छा नाहीत. आहेत. नक्की आहेत. पण येथे माझा जीव घुसमटतोय. माझ्या मनावर येथे रोज अत्याचार होताहेत. मला या घुसमटींपासून स्वातंत्र्य हवे आहे. खरे स्वातंत्र्य. ही माझी इच्छा आहे पा. मला खोटी स्वप्ने भुलवत नाहीत. आपण हरलो आहोत. आपण किती चांगले इंग्रजी बोलू शकलो तरी माझ्यासाठी ती जितांची भाषा आहे. माझी रांगडी पण अनवट भाषा मला प्रिय आहे. अरण्य मला प्रिय आहे. मला माणसांचा सहवासच नकोय. कंटाळलोय मी त्याला. मी लढु शकत नाही. खरे तर मी शरण चाललोय निसर्गाला. माझ्या आत्म्याची वसती जेथे आहे तेथेच मी राहणे हे माझे स्वातंत्र्य आहे. माझ्या उध्वस्त जीवनाचे विखुरलेले तुकडे मला पुन्हा गोळा करायचेत पा. जे आयुष्य आपल्याला मुळात समजतच नाही ते निमुटपणे जगत राहणे हे पाप होईल. मला ते करायचे नाही. आजचे जगणे मला समजत नाही. लोकांना जे स्वातंत्र्य वाटते ते स्वातंत्र्यही मला समजत नाही. वैभवाच्या आजच्या बललेल्या संकल्पनाही मला समजत नाहीत. तसाही मी मतिमंदच आहे. मला जाऊद्या पा....प्लीज..."

 आतापर्यंत मुक्यात जमा झालेला आपला पोरगा एवढे बोलल्याचे पाहून बापाला आश्चर्य वाटले. जणू आजवरच्या जगण्यातले मुकेपण एवढ्यातच बोलून गेला होता. तो मागे रेलला. त्याला कसलाच काही अर्थ लागत नव्हता.

 "गोरे दयाळू आहेत आदम. समजत नाही का तुला? त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. हे जग काय आहे, ज्ञान आणि विज्ञान काय आहे हे त्यांच्यामुळेच आपल्याला समजलं. नाहेतर काय होतो आपण? रानटी! होय...रानटी होतो आपण...मागासलेले. कसलीही अक्कल नसलेले. आता स्वातंत्र्य आलंय. का नाही त्याचा वापर करत त्यांच्याशीच स्पर्धा करत त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती करायची? का नाही? त्यांच्या कला शिकून त्यांना पराजित करायची स्वप्न पहा मुला. असले अभद्र विचार करू नकोस."

 बाप म्हणाला व प्रतिक्रियेसाठी मुलाकडे टक लाऊन आशेने पाहु लागला. आदमचा चेहरा अजुनही निर्विकारच होता. जणु त्याच्यावर काहीही प्रभाव टाकु शकणार नव्हते.

 बराच वेळ गेल्यावर आदम पुर्ववत स्वरात म्हणाला,

 "पा, आपण त्यांच्यासारखे होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांच्यासारखेच होऊ शकणार नाही. एका मातीतील रोप दुस-या मातीत त्याच उल्ल्हासाने रुजत नाही. ते त्यांच्या जगात श्रेष्ठच राहतील कारण काय श्रेष्ठ हे ठरवण्याची साधनेही त्यांच्याकडेच असतील. त्यांची नीति व आपली नीति वेगळी. आपल्या जगण्याचे मार्ग नि त्यांचे मार्ग यात कसलेही साम्य नाही. नक्कल करुन काय साध्य होणार? धड आपलेही नाही नि धड त्यांचेही....असले वेडपट जगणे का म्हणून लादून घ्यायचे? त्यांच्या कला शिकल्याने आपण त्यांच्यासारखे नाही होऊ शकत. आपले पुर्वज मुर्ख नि येडचाप होते एवढेच त्यातून आपण सिद्ध करु...बस्स! त्यांनी आपल्याला हरवले...गुलाम केले कारण त्यांची साधने व शक्ती आपल्याकडे नव्हती. आपण हजारो वर्ष शांतीत जगलो कारण आपण सुसंस्कृत होतो. पण या सुसंस्कृतपणात एक दुबळेपणही असते. सुसंस्कृतांवर कधी ना कधी रानटी बर्बर आक्रमण करतात...पराभव होतो...गुलामी वाट्याला येते. म्हणून जिंकणारे सुसंस्कृत ठरत नाहीत. आणि मुळात कोण पुढारलेला आणि कोण मागास हे ठरवण्याचे नेमके कोणते मापदंड आहेत? ते कोणी ठरवायचे? ठरवणा-यांना ते केवळ जेते आहेत म्हणून हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो काय? गोरे आज आपल्यावर राज्य करताहेत म्हणजे ते पुढारलेले आहेत असे कसे असेल?

 "मला वेडपट स्वप्ने पडत नाहीत. मला असंस्कृतांशी स्पर्धाही करायची नाही. कोणी करावी कि न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी क्रांतीकारक नाही. मला माझे असे जीवनाबाबतचे विचार आहेत. तेच आहेत जे माझ्या पणजाचे नि खापरपणजोबाचे होते. ही क्रांती नाही. कोणता नवा विचारही नाही. मला येथले जगणे आवडत नाही...जगण्याची ही पद्धतही आवडत नाही नि या जगाची स्वप्ने मला स्पर्शतही नाहीत. जेथे माझी स्वप्ने आहेत तेथे मात्र मी गेलेच पाहिजे. स्वातंत्र्य असेल तर ते स्वातंत्र्य आहे. पा...मी जाणार."

 आदमचा आवाज आता किंचित चढला होता. चेह-यावरील नसा टरटरुन फुगल्या होत्या. आपण लढाई हरलो आहोत हे बापाच्या लक्षात आले. तो पुन्हा मागे झुकला. खांदे पडले. डोळ्यांत एक अपार दुबळेपण दाटून आले. काहीच होणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते. हळुहळू त्याच्या डोळ्यांत पाणी तरळु लागले नि पाहता पाहता तो हमसून हमसून रडू लागला. आदम काही क्षण थांबून तेथून निघून गेला.

 

 

*

 

आदमने उत्तरेकडच्या घनदाट अरण्यातील तळ्याकाठची एक जागा हेरून ठेवली होती. इकडे आजकाल माणसंचुकुनहे फिरकत नसत. अशीच जागा त्याला हवी होती. तेथे त्याने साताठ दिवस राबून एक झोपडी उभारली. कुंपनही घातले. मग एके दिवशी गरजेपुरते सामान घेऊन त्याने बायकोसह आपल्या स्वप्नातेल जागेकडे प्रस्थान ठेवले. बापाचा आक्रोश, सगेवाल्यांचा शेवटचा त्याचे मन वळवायचा प्रयत्न...त्याच्यावर कशाचाच परिणाम झाला नाही. जगण्यासाठी तो शिकारीचा मार्गही सहज निवडू शकत होता. पण त्याने तसे काही केले नाही. खरे तर त्याने तोही विचार करून ठेवला होता. अरण्यात वठलेली अथवा वादळवा-यात उन्मळलेली झाडे अथवा फांद्यांची कमतरता नव्हती. त्याने स्वत:चा दिनक्रम आखून घेतला होता. रोज सकाळी तो दिवस उगवला कि कु-हाड खांद्यावर टाकुन निघे. भवतालच्या नित्य बदलांची नोंद घेत अरण्य श्वासांत भरून घेत निवांतपणे हेरुन ठेवलेल्या एखाद्या वठलेल्या व कधीकाळी उन्मळून पडलेल्या झाडाकडे जाई. लाकुडतोड्याचा हा व्यवसाय जगण्यापुरते उत्पन्न देणारा होईल याची त्याला खात्री होती. कधीकधी त्याच्या क्रमात निसर्गाचा झंझावात अथवा पाऊस खंड पाडे. काम थांबवून तो एकतर ताम्री नदीचा किनारा गाठत वाहत्या प्रवाहाकडे पाहत राही वा झोपडीकडे परते.

 बरे, त्याची बायकोही कामसू होती. झोपडीचा परिसर तिने राबून शेतीचा एक तुकडाच बनवला होता. भाजीपाला तर लावेच पण एका कोप-यात डुक्करं पाळण्यासाठी छान जागा केली होती. जरा थोड्या पेन्या अजून साठल्या कि डुकरांची पैदास करण्याचा तिचा विचार होता. अनेक वर्ष गेली पण ते काही झाले नाही. आदमच्या कमाईत अन्नधान्य-मीठ निघे. बस्स. अजून काय हवे होते. तिचा वेळही चांगला जाई. ते पैसेवाले बनू शकत नव्हते पण भुकेने मरणारही नव्हते.

 आजही आदम घनदाट अरण्यात शिरला. जंगलाचा चिरपरिचित वास अजून दडद झाला. त्याने तो फुफुसांत भरून घेतला. जणू काही तो प्रथमच या अरण्यात आक्ला असावा त्या अनिवार कुतुहलाने झांडांचे बुंधे, लपेटलेल्या वेलींच्या जाळ्या, रानफुले एखाद्या फांदीआडून दिसणारे आकाशाचे तुकडे पाहत चालू लागला. आपल्याहे पायांना मुळे फुटून आपण असेच झाडासारखे या जमीनीत पाय रोवून स्थिर का नाही हाही प्रश्न त्याला पडला. रानपक्षाचे थवे त्याला अचंबित करत होते. अनंतकाळचा विसावा म्हणजे हे अरण्य असे त्याला नेहमीच वाटे. हे त्याचे खरे घर होते. सतत बदलणारे घर. प्रतिक्षणी बदलणारा हा निसर्ग. अंकुरणारी नवी झुडुपे, वेली अवचित दिसत. झाडांची कधी पानगळ तर कधी तरारून फुटणारी नवी पालवी. झाडांच्या बुंध्यावर कधी हिरवे ताजे शेवाळ तर कधी ढोल्यांतुन नवजात पिल्लांचा कोलाहल. झाडांची सुकली गळालेली पाने जमीनीत मिसळून जात...अस्तित्व न ठेवता...पुन्हा गगनचुंबी वृक्षांच्या नव्या पालवीतून जीवंत होण्यासाठी हा. हे सारे प्रतिक्षण नवीन होते. त्याला एक सहजसुंदर लय होती. हे असे संगीत होते जे परमात्म्याखेरीज कोण गाणार?

 

कोठे थबकत, कोठे धीम्या गतीने, ओहोळांशी खेळत, लहान निरागस मुलासारखा त्या जंगलाचाच एक हिस्सा असल्यासारखा मंद्र सुरावटीप्रमाणे चालत राहिला.

 मग तो आपल्या आजच्या ध्ययस्थानाजवळ पोहोचला. तेथे एक आतुन पोखरलेला निष्प्राण वृक्ष कसाबसा कधीही कोसळेल या अवस्थेत उभा होता. त्याने आता बाजुलाच वेलीआडून पाहणा-या तुर्रेबाज सरड्याकडे दुर्लक्ष केले. त्या मृत झाडाच्या पलीकडे जमीन हुंगत फिरणा-या पाडसाकडे त्याने कौतुकाने पाहिले. झाडी येथे एवढी दाट होती कि आभाळ नसावेच असे वाटले. तो त्या वठलेल्या झाडाजवळ गेला. बुंध्याचा आदमास घेतला. कु-हाड सावरली आणि एक पहिला घाव घालायला ती उंचावली नि त्याच्या कानावर अरण्याच्या गहन शांततेला तडे देणारा मानवी कोलाहल पडला. त्याचा उंचावलेला हात सावकाश खाली आला. तो दचकला होता. बावरला होता. इतकी वर्ष गेली. असे कधी झाले नव्हते. तो मागे सरकला. त्या गडद सावल्याही त्याला सुरक्षित वाटेना. आतापर्यंत निवांत हिंडणारे पादसही कान टवकारत झेपावत आडोशाला निघून गेले होते. तो धपापत्या उराने एका वेलींच्या दाटीआड दडला आणि कानोस घेऊ लागला.

 

पुन्हा अधुन मधून आवाज-आरोळ्या येवू लागल्या. हा काय गोंधळ आहे हे त्याच्या लक्षात आले आणि तो पुरता धास्ताऊन गेला. उरातील धडधड पिसाट झाली. श्वास फुलला. अतीव भयाने तो कोमेजुनही गेला. जरा वेळ तो स्वत:चा आक्रोश नि भय काबुत आणत राहिला. मग येणा-या आवाजांचा माग काढत, दबकत झाडी-वेलींतुन वाट काढत निघाला. त्याला एका उतारावरून येणार एक गोरा आणि पाचसहा रंगाचे डबे घेतलेले काळे दिसले. ते शिकारीच्या मोहिमेवर नव्हते. गोरा सांगेल त्या जातीच्या झाडावर ते काळे दिसेल अशी खूण करत. हे कशासाठी चालले आहे हे त्याच्या लक्षात आले. वेदनांनी चेहरा पिळवटून निघाला. हातातील कु-हाडीवरची पकड सुटली. शरीर झंझावातातील वृक्षांसारखे कापले. ते दुष्ट हेतुने अरण्यात आले होते. रानटी. ते मार्किंग करत करत सावल्यांतून पुढे निघून गेले. त्यांचा आवाजही विरत गेला. अरण्याने भेदल्या गेलेल्या अथांग शांतीशी पुन्हा जुळवून घेतले. तो उठला. तो मृत वृक्ष तोडण्याची त्याची इच्छा मेली होती. त्याकडे लक्षही न देता तो अरण्यातून आपल्या झोपडीकडे सुसाट धावत सुटला.

 तो इतक्या लवकर आणि असा आलेला पाहून शेतीच्या तुकड्यात काम करणारी त्याची बायको चकित झाली. त्याच्या चेह-यावरचे भुताळ भाव पाहून तीही भयभीत झाली. तिने काय झाल्याचे विचारले ओपण धपापता उर घेऊन श्वास नियंत्रित करू पाहणारा आदम मुकच राहिला. काय घडले असावे याचा अंदाज करत बायकोने मस्तक शिणवायचा प्रयत्न केला पण तिला काहीच सुचले नाही.

 

सूर्य मावळला. अंधाराची गच्च दाटी झाली. अरण्य अंधारात हरवून गेले. एकाएकी तो गुढग्यावर कोपर टेकवून ओंजळीत चेहरा लपवून हमसून हमसून रडू लागला.

 त्याची बायको पुतळ्यासारखी स्तब्ध उभी, मंद दिवटीच्या प्रकाशात त्याच्याकडे पहात राहिली. कोणती वेदना छळते आहे माझ्या आदमला? एकाच प्रश्नाने तिच्या मनात कहूर केले होते. रात्रीने पहाटेची ज्या अनिवारपणे वाट पहावी ती त्याचा आवेग शांत होण्याची वाट पहात होती.

 खूप वेळाने त्याने चेह-यावरचे हात काढले. अश्रुंनी भिजलेला चेहरा त्या प्रकाशात अंधारातून कोरुन काढलेल्या कातळासारखा दिसला. त्याने बायकोकडे पाहिले. मग एकाएकी आवेगाने म्हणाला-

 

"हे अरण्यही आता नष्ट केले जाईल! जमीनीची सावली जाईल...ती भेगाळेल. वाहती ताम्री एक दिवस वहायची थांबेल. ते दुष्ट हेतुने या अरण्याला नष्ट करण्यासाठी घुसलेत. त्यांची पापी नजर याही अरण्यावर पडलीय. आज त्यांने किंमती झाडे निवडलीत. उद्या सर्वच. ही झाडे म्हणजे त्यांच्या लेखी चलन आहे. कत्तलखोरांच्या आवेशात ते या माझ्या झाडांची कत्तल करतील.  हे माझे घरच नष्ट करायला निघालेत. नीच. यांचे राक्षसी मन कसे भरत नाही? यांना थोडीही दयामाया का नाही? या अरण्यातील पशू-पाखरे कोठे जातील हा साधा विचार यांना शिवत कसा नाही? हलकट. डुक्करं जशी. हैवान!"

 तो त्याच्या गहन वेदनायुक्त संतापात बोलत राहिला. त्याच्या आक्रोशाला सीमा नव्हती. संताप तर असा कि  शक्य असते तर त्याने त्यांचीच कत्तल उडवली असती. स्वत:च्या असहायतेवर प्रथमच त्याला चिरड आली. अश्रुंची एक सर भळाळत वाहिली.

 

त्याची बायको मुकपणे त्याचा आक्रोश ऐकत राहिली. हा केवळ झाडे तोडली जाणार म्हणून का रडतो आहे? या परिसरातला गेली कित्तेक दशके हाच मुख्य धंदा नव्हता का? काळ्यांचे पोट हाच धंदा भरे. गोरे मालामाल होत ते वेगळे. पण तसेही ही झाडे काही काळ्यांनी स्वत: लावून जोपासलेली नव्हती. ती त्यामुळे लुटही नव्हती. मग ही वेदना कशाला?

 तिच्या मनात प्रश्न येत होते खरे, पण शब्दांत ते कसे मांडायचे हे थोडीच तिला माहित होते? तिचा नवरा दु:खात होता. आक्रोशत होता. त्याने काही विचार केला असेलच कि! ती त्याच्या वेदनांत साकळत गेली. तिच्याही नजरेसमोर वृक्षरहित वैराण नि भकास आसमंत तरळू लागला. कसे जगणार आपण या वैराणीत? तिलाही प्रश्न पडला. नव-याच्या वेदनांवर फुंकर घालावी असे वाटले ...पण कशी? तिला काही उमजेना.

 ती अवचित पुढे सरली. त्याच्यासमोर बसली नि चेह-यावरून हात फिरवला. त्याने तिच्याकडे नि:ष्प्राण डोळ्यांनी पाहिले. तिच्याही डोळ्यांत पाणी तरळले.

 "बरे झाले आपल्याला मुलं नाहीत!" ती एकाएकी म्हणाली. त्याने घनघोर अंधारातही आपल्या आदिम स्वरात हेलकावणा-या अरण्यसागरावर एक नजर टाकली. मग बायकोकडे पाहिले. ही झाडे म्हणजे देव तर त्यातील प्राणी-पक्षी म्हणजे त्याची लेकरं. एक दिवस हे अरण्यही राहणार नाही. त्याने सुस्कारा सोडला. बायको त्याच्याकडे अनिवार आशेने पहात होती.

 "बरे झाले आपल्याला मुलं नाहीत!" तोही म्हणाला. मग एकाएकी प्रपातासारखा, बायकोलाही चकीत करत म्हणाला, "नाही. त्यांचे या धरतीवर स्वागत नाही. बरे झाले आपल्याला मुलं नाहीत. त्यांना हे सैतानी तांडव तरी पहायला मिळणार नाही. पण आपल्याला जगले पाहिजे. इलाज नसला तरी हे क्रौर्य पाहिलेच पाहिजे. आपल्याला जगले पाहिजे हे भोगण्यासाठी ....यातला आत्मविनाशी मुर्खपणा पाहण्यासाठी. ही जमीन भकास होत आपल्यालाही पोटात घेईपर्यंत तरी आपल्याला जगलेच पाहिजे."

 त्याने बायकोला आपल्या खिन्न मिठीत घेतले आणि हुंदके देऊ लागला. भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे समजतच नसलेले अरण्य त्याच्या सनातन उद्गारांनी हुंकारत राहिले. कड्या-कपा-यांतून संचारणारी प्राणीसृष्टी जगण्याचा संघर्ष करत विचरत राहिले. वेळ पुढे जात राहिला. दिवस फटफटला. दिवसाचे नवे चक्र पक्षी आपल्या ललका-यांनी घोषित करत त्या अरण्याला नवा अर्थ देत राहिले. जगण्याचे संगीत पानापानांतून गायले जात राहिले...आपला मृत्यू नजिक आला आहे हेही न समजता.

 एक मतीमंद म्हणून ओळखला जाणारा आदम आपल्या तेवढ्याच मंदबुद्धी बायकोच्या खांद्यावर मस्तक ठेऊन भकासपणे अरण्याकडे पहात बसला.

 

* * *

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...