Wednesday, January 25, 2023

वज्रसूची आणि ब्राह्मण

  वर्णव्यवस्थेवर हल्ला चढवणारी पहिली कृती म्हणून वज्रसुचीचा उल्लेख करावा लागतो. वज्रसुची अश्वघोष या आद्य बौद्ध संस्कृत महाकवी अश्वघोशाच्या नावावर मोडत असली तरी त्याबद्दल विद्वान साशंक आहेत.   याचे कारण म्हणजे अश्वघोष हा वज्रसूचीचा कर्ता आहे ही माहिती फक्त "सूत्रालंकार" या असंग नामक पेशावर येथील बौद्ध विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात ७७ क्रमांकाच्या सुत्रात मिळते. परंतू तिबेटी, तंजावरी येथील साधनांत कोठेही अश्वघोषाच्या नांवावर ही कृती असल्याचे नमूद नाही. इ-त्सिंगनेही अश्वघोषाच्या लेखनात या कृतीचा समावेश केलेला नाही. सर्वात प्रथम ही कृती बौद्ध साहित्यात अवतरते ती त्रिपिटक-सूचीत. ही सूची सन ९७३ ते ९८१ च्या दरम्यान चिनी भाषेत अनुवादित झाली. पण या ग्रंथानुसार वज्रसूचीचा लेखक अश्वघोष नसून धर्मकिर्ती आहे असे दिसते.

दुसरा असाही प्रतिवाद केला जातो कि अनेक ब्राह्मण बौद्ध धर्मात आलेले असल्याने त्यांच्या मनातील वर्णश्रेष्ठत्व काढून टाकावे अशा मर्यादित हेतूने व बौद्ध धर्मप्रचारात होणारा ब्राह्मणांचा अडथळा तात्विक आधाराने दूर केला जावा या उद्देशाने प्रतिवादात्मक व ब्राह्मणी व्यवस्थेतीलच उदाहरणे देत वज्रसूचीची निर्मिती झाल्याने अश्वघोशाच्या साहित्यामध्ये तिचा समावेश केला गेला नाही. पण हे खरे मानले तर अश्वघोषही ब्राह्मणच असल्याने बुद्ध चरितात मोठ्या प्रमाणावर गौतम बुद्धाचे ब्राह्मणीकरण झाले असे जोहान्स ब्रोंकहोर्स्ट यांनी आपल्या “Buddhism in the Shadow of Brahmanism” या ग्रंथात म्हटले आहे. बुद्ध जन्मानंतर होणा-या सप्तर्षीकरवी होणारी भविष्यवाणी, ब्राह्मणांनी दृष्टांत सांगणे, शुद्धोदनाने ब्राह्मणांना धन देणे तसेच नंतर असित महर्षीचे तेथे अवतरणे व त्याची पाद्यपूजा शुद्दोदनाने करणे आदी भाग जो पूर्वीच्या पाली साहित्यात नव्हताच अशा ब्राह्मण वर्णाच्या महत्तेच्या कथा बुद्धचरितामध्ये सामाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. हाच लेखक वर्णव्यवस्थेचा डोलारा कोसळवणारे लेखन करेल काय अशी शंका येणेही स्वाभाविक आहे. अश्वघोष हा बौद्ध धर्माला नवे मतितार्थ देणारा पंडित होता असे मत लेव्ही यांनी व्यक्त केली असून तरीही वज्रसुची ही कृती फार नंतरची असून तिचे कर्तुत्व अश्वघोशाला देता येत नाही असे मत जे. के. नारायण यांनी “Literary History of Sanskrit Buddhism” या ग्रंथात  व्यक्त केले आहे. होब्सनच्या मते वज्रसूचीवर (अश्वघोषाची म्हणवली जाणारी) शैव तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. अश्वघोषाची वज्रसुची वाचली तर याचा पडताळा येवू शकतो. शिवाय या लेखनात संस्कृत समासांचा फार मोठा वापर असून दुस-या ते चवथ्या शतकातील अन्य कोणत्याही संस्कृत लेखनात ते अप्राप्य आहेत. त्यामुळे वज्रसूचीचे श्रेय अश्वघोषाला देता येणे अवघड आहे जरी त्याच्या वज्रसुचीचाच उपोद्घात मंजूघोषांचा शिष्य अश्वघोशाचाच लेखक म्हणून उल्लेख करत असली तरी. अर्थात आपले लेखन गतकाळातील कोणा न कोणा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर थोपन्याची प्रवृत्ती जी वैदिक पंडितांमध्ये दिसून येते तिचेच अनुकरण प्रस्तुत वज्रसूचीच्या लेखकाने केलेले दिसते.

दुसरी बाब अशी कि गौतम बुद्ध हे चातुर्वर्ण्य कर्मावर असतो असे सांगत असताना खतीय (अथवा क्षत्रीय) वर्ण शीर्षस्थानी ठेवत असताना वज्रसूचित मात्र ब्राह्मण हा श्रेष्ठ असून ब्राह्मण कोणास म्हणावे याचीच प्रामुख्याने चर्चा केलेली आहे. अन्य कोणत्याही वैदिक वर्णाचा त्यात उल्लेख नाही. अश्वघोशाच्या वज्रसूचित खालील गोष्टी प्रामुख्याने येतात.

१. वज्रसूचीत बौद्ध तत्वज्ञानाचा कोठेही मागमूस नाही.
२. वज्रसूचीने आपले मत सिद्ध करण्यासाठी वेद, मनूस्मृती, पुराणे व महाभारताचा आधार घेतला आहे.


३. शिव व पार्वतीचा स्पष्ट उल्लेखही अश्वघोषाच्या नांवावर असलेल्या आवृत्तीत मिळतो व तिचा अनुवाद बी. एच. होब्सन यांनी केला असून तो रॉयल एशियाटिक सोसायटीने १८३५ साली प्रसिद्ध केला आहे..
४. आत्मा, मोक्ष, जीव, ब्रह्म, इ. या बौद्ध तत्वज्ञानात नसलेल्या संज्ञा अश्वघोषाच्या म्हणुन प्रसिद्ध वज्रसूचीत येतात.
५. श्रेष्ठ ब्राह्मण कोण हे सांगणे हा वज्रसूचीचा अंतिम उद्देश आहे. 

दुसरीकडे  १०८ उपनिषदांच्या सूचीत (मुक्तिका उपनिषद) "वज्रसूचिका उपनिषद" या नांवाने वज्रसूची अवतरते. हे उपनिषद सामवेदाशी संबंधित आहे असेही नमूद आहे. या उपनिषदाचा कर्ता अज्ञात असला तरी त्याचे कर्तुत्व आदि शंकराचार्यांचे असल्याचे व हे शैव उपनिषद असल्याचे काही उल्लेख मिळतात. परंतु ब्रह्मसूत्रभाष्यात चातुर्वर्ण्य आणि ब्राह्मण श्रेष्ठतेचा पाठ देणारे शंकराचार्य याचे लेखक असण्याची शक्यता नाही. हे उपनिषद बाराव्या ते चवदाव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले असावे असे काही विद्वानांचे मत आहे. उपनिषदांतर्गत वज्रसुचिका उपनिषद म्हणुन जी आवृत्ती प्रसिद्ध आहे तिचा गाभा व अश्वघोषाच्या नांवावर आढळना-या आव्रुत्तीचा ढांचा समसमान आहे. काही ठिकाणी उदाहरणे विस्त्रुत आहेत तर कोठे कमी. परंतु अर्थबदल होत नाही

या दोन्ही वज्रसुचीचे लेखक कोण आणि नेमके कधी झाले हे निश्चयाने सांगता येईल अशी स्थिती नाही. शिवाय दोन्ही वज्रसूचींमध्ये आश्चर्यकारक रीत्या साम्य असल्याने कोणती आधीची व कोणती नंतरची हे ठरवता येणे येणे मात्र तेवढे अवघड नाही. त्रिपिटक-सूचीत (सन ९७३ ते ९८१) वज्रसूचीचे नाव आहे पण ती धर्मकीर्तीच्या नावावर नोंदलेली आहे. म्हणजे मूळ बौद्ध वज्रसूची किमान आठव्या शतकात उपलब्ध होती असे म्हणावे लागते.

पाश्चात्यांना मात्र वज्रसूचित वर्णनिषेध जाणवला असल्याने त्याचा अनुवाद एकोणीसाव्या शतकाच्या प्रथमार्धातच झाल्याचे आपल्याला दिसून येईल. विल्किन्सन यांचाही अनुवाद महत्वाचा असून त्यांनी १८३९ मध्ये प्रसिद्ध केला होता. याच ग्रंथात त्यांनी सुबाजी बापू यांनी वज्रसूचीतील विवेचनाचा प्रतिवाद करणारे संस्कृत लेखन त्यांच्या विनंतीवरून प्रसिद्ध केले असून त्यात वज्रसूचीतील ब्राह्मण कोणास म्हणावे याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाना दिलेले उत्तरही प्रसिद्ध केलेले आहे.

दोन्ही वज्रसुचीचा मुख्य गाभा हा ‘ब्राह्मण कोणास म्हणावे?” हा आहे. यात अनेक जन्माने ब्राह्मण नसले अथवा गैर रीतीने जन्माला आले असले तरी ब्राह्मण झाले याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. दोन्ही वज्रसूचित यज्ञसंस्थेचे पावित्र्यही गृहीत धरण्यात आले आहे. पण ‘ब्राह्मण’ या वर्णाचे वा शब्दाचे एवढे उदात्तीकरण का याचे उत्तर मात्र दोन्ही वज्रसूची देत नाहीत. श्रेष्ठ मनुष्य कोणास म्हणावे या ऐवजी ब्राह्मण कोणास म्हणावे व त्याच्यात काय गुण असले पाहिजेत यावरच जास्त भर आहे.

संत बहिणाबाइंनी सतराव्या शतकात अभंगरूपाने वज्रसुचीचा अनुवाद केला अथवा त्यावर आधारित अभंगांची रचना केली असे मत महाराष्ट्रातील विद्वज्जनात प्रचलित आहे. विश्वनाथ कोल्हारकर यांनी १९२६ साली संत बहिणाबाईंची गाथा प्रसिद्ध केली होती. त्यात वज्रसूचीवर आधारित आहेत असे मानले जाणारे अभंग सामाविष्ट आहेत.

संत बहिणाबाई या गंगाधरपंत यांच्या द्वितीय पत्नी असून त्यांच्या तापट स्वभावाने त्यांना गांजले होते, आणि त्या पुढे संत तुकारामांच्या शिष्या बनून तुकाराम महाराजांच्या नउ टाळक-यांपैकी एक झाल्या असा अल्प परीचयही त्यांनी दिला आहे. वज्रसूचीचा अनुवाद अथवा भावांतर करण्याचे कार्य तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर सोपवले किंवा रामदासी पंचायतनातील जयरामस्वामी यांच्याकडून संत बहिणाबाई यांना वज्रसुची माहित झाली असेही एक मत आहे. त्या विवादात न पडता बहिणाबाई यांच्या अभंगांकडे एक नजर टाकणे योग्य ठरेल.

जयराम स्वामी यांच्याशी त्यांचा पूर्वपरिचय असावा असा एक अभंग आहे.

जयराम समर्थ ज्ञानाचा सागर ।
साक्ष तें अंतर त्याचें तया ॥ १ ॥
बोलाविलें तेणें हिरंभटाप्रती ।
माझी तया स्थिती पुसीयेली ॥ २ ॥
सांगितला तेणें वृत्तान्त सर्वही ।
वर्तला जो कांहीं गृहीं त्याचें ॥ ३ ॥
स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपें ।
स्वप्नींचिये कृपें बोध केला ॥ ४ ॥

आणि

कृपा उपजली जयराम स्वामीसी ।
आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥
देखोनी तयासी आनंद वाटला ।
कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥

बहिणाबाईंचे अनेक अभंग आत्मवृत्तपर आहेत. या अभंगातून भावस्थिती आणि वास्तव याची सरमिसळ आहे हे सहज लक्षात येईल. आता आपण त्यांच्या वज्रसूचीवर आधारित आहेत अशी मान्यता असलेल्या अभंगांकडे वळूयात.

कोल्हारकर यांनी हे अभंग “ब्रह्मकर्मपर अभंग” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेले असून ते अभंग क्रमांक ४०४ ते ४५२ अभंगामध्ये सामाविष्ट केलेले आहेत. या अभंगांत “ब्राह्मण कोणास म्हणावे”” हा मुख्य प्रश्न चर्चेत आहे. डॉ. रा. चि. ढेरे यांनी या ३९ अभंगांमधील १८ अभंग वज्रसुचीकोपनिषदाचा अनुवाद होय असे जाणवल्याने ते व्यवस्थित लावले आणि अभ्यासकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध केले. परंतु ब्रह्मकर्मपर अभंगात इतरही अनेक अभंग आहेत त्याटील काहींवर एक नजर टाकली पाहिजे.

उलट –

“ब्रम्हत्वाची खूण जप गायत्रीचा । जो सर्व वेदाचा मूळमंत्र ॥१॥ तयाहून परते आहेसे सांगती जाणाव ते मतिमंद हीन ॥ २॥ गुणसाम्य ऐसी म्हणती मूळमाया । गायत्री ते जया बम्हरूप ॥ ३॥ अकार उकार मकाराष्ये बज । ओंकाराचें निज उन्मनी हे ॥ ४ ॥ इजपासुनीया जाले वेदविद । गायत्री प्रसिद्ध वेदमाता ॥ ५ ॥ बहिणी म्हण जया गायत्रीचा जप । तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा ॥ ६॥

किंवा-

वर्णाश्रम धर्म शुद्ध आचरावा । भगवंत घरावा एका भावें ॥ १ ॥ ऐसे जो न करी ब्राम्हणाचा तो धर्म । जाणावा अधम पापदेहा ॥ २॥ आघीं स्नान- संध्या गायत्रीचा जप । करावा निष्पाप अष्टोत्तरशत ॥ ३ ॥ त्यावरी मग तर्पण करावें । धर्म हा स्वभावें विप्रालागीं ॥ ४॥

अशांसारखे अभंग वेद, गायत्रीनिष्ठा अशा काही वैदिक वर्णाश्रमसंस्थेचा पाया असलेल्या तत्वांशी फारकत घेताना दिसत नाही. एका अभंगात त्या म्हणतात-

“पिंडब्रम्हांडासी करोनिया ऐक्य । मनी महावाक्य बोघ झाला ॥१॥ तयासी ब्राह्मण बोलिजे साचार । बह्मसाक्षात्कार प्रत्यक्ष हा ॥२॥ मी-तू पणाचा सबलांश सांडिला । जीव शिव केला ऐक्य ज्ञानें ॥ ३ ।। महाकारणदि देह चार पाहें । शोधानियां जाये तूर्यपदा ॥ ४ ॥ सोह हंस मंत्र अखंड उच्चार । समाधि साचार अखंडत्व ॥ ५ ।॥। बाहिणा म्हणे ब्रह्मवेत्त हे ब्राह्मण । यांचिया दर्शन मुक्ति जोडे ॥ ६ ॥ हे आणि असे काही अभंग पाहिले तर बहिणाबाई ब्राह्मण कोणास म्हणावे याची तत्वचर्चा करत असून ती चर्चा तत्कालीन वैदिक दृष्टीतून आहे हे लक्षात येईल.

वज्रसूची आणि बहिणाबाईंचे ब्राह्मणसंबंधी अभंग हे “ब्राह्मण कोणास म्हणावे?” या प्रश्नाशी निगडीत असल्याने बहिणाबाईंचे अभंग वज्रसूचीचा अनुवाद अथवा त्याधारित असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु प्रत्यक्षात बहिणाबाई मुळ वज्रसुचीतील ( मग ती वैदिक असो कि बौद्ध) उदाहरणे एखादा अपवाद सोडला तर देत नाहीत. उदा,

आतां वर्ण हाची ब्राम्हण म्हणावा । तरी तो अनुभवा नये कांहीं ॥ १॥ ब्राम्हण वेगळा वर्णही अतीत । पहातां निश्चित भासतसे ॥ २॥ श्वेत तो ब्राम्हण क्षत्रिय आरक्त । वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ॥३॥ कृष्ण वर्ण शुद्र नाहीं ऐेसा भेद । आयुष्याचा बांध सारखाची ॥ ४ ॥ बहिणी म्हणे वर्ण ब्राम्हण तो नव्हे । विवे- चूनि पाहे मनामाजीं ॥ ५ ॥

हे आणि असे काही वज्रसूचीवर आधारित अभंग वगळता अन्य ३१ अभंग पाहिले तर बहिणाबाई ब्राह्मण कोणास म्हणावे याची तत्वचर्चा करत असून ती चर्चा स्वतंत्रपणे केली आहे हे लक्षात येईल. “ब्राह्मण” नेमके कोण? या प्रश्नातून हे चिंतन पुढे आले असावे. या प्रश्नातूनच त्यांना वज्रसूचीही प्राप्त होऊन त्यातील गाभ्याचा त्यांनी अनुवाद केल्याचे दिसते.

वज्रसुचीतील विवेचनाचा अनुवाद म्हणून खालील अभंगाकडे पाहता येते.

“आतां वर्ण हाची ब्राम्हण म्हणावा । तरी तो अनुभवा न ये कांहीं ॥ १॥ ब्राम्हण वेगळा वर्णही अतीत । पहातां निश्चित भासतसे ॥ २॥ श्वेत तो ब्राम्हण क्षत्रिय आरक्त । वैश्य वर्ण पीत नाही ऐसे ॥३॥ कृष्ण वर्ण शुद्र नाहीं ऐेसा भेद । आयुष्याचा बांध सारखाची ॥ ४ ॥ बहिणी म्हणे वर्ण ब्राम्हण तो नव्हे । विवे- चूनि पाहे मनामाजीं ॥ ५ ॥“

भारतीय मानसिकतेवर पडलेले वर्णसंस्थेचे अपार गारुड आणि ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्ण मानला गेल्यामुळे अहंकाराची लागण या वर्णातील समुदायाला होणे स्वाभाविकच होते. जी. एस. घुर्ये यांनी तर पाचव्या ते सातव्या शतकातील ताम्रपटांचा अभ्यास करून प्रतिपादित केले आहे कि गुप्तकाळानंतर ब्राह्मण वर्णात वैदिकेतरांनी शिरण्याची लाटच आली होती आणि त्यासाठी अनेक बोगस गोत्रेही बनवण्यात आली. (Caste and Race by GS Ghurye) घुर्ये यांनी एपिग्राफिका इंडिका या ग्रंथात प्रकाशित दिडशे दानपत्रे (ताम्रपट व शिलालेख) यांचे विश्लेशन जे केलेय ते महत्वाचे आहे. या पटांत एकूण  ३१६१ ब्राह्मणांचा उल्लेख आहे ज्यांना जमीनी दान केल्या गेल्या. यात आसाम, राजस्थान व मध्यप्रदेश धरून उत्तर भारत, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू प्रांतांत दिल्या गेलेल्या दानपत्रांचा समावेश आहे. हे ताम्रपट/लेख इ.स. पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा काळातील आहेत. यात असंख्य अन्यत्र अस्तित्वात नसलेली गोत्रेही कशी बनवली गेली आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला असून हे new recruits होते असेही प्रतिपादित केले आहे. वर्णसंस्थेचे असे लोक कडवे अभिमानी बनले असेही त्यांचे प्रतिपादन आहे.

अनेक बनावट पुराकथांनीही ब्राह्मणश्रेष्ठत्व वाढवण्यासाठी हातभारच लावला हे आपण रामायण-महाभारत ते पुराणांतील असंख्य उदाहरणांवरून आपण पाहू शकतो.

भारतीय विचारविश्वाचा याला निर्माण केला गेलेला दोषही म्हणता येईल कारण “ब्राह्मण” या शब्दाला त्यामुळे दिव्यत्वच प्राप्त झाले आहे असे दिसून येईल. ब्राह्मण हा शब्द एक श्रेष्ठ वर्ण, जाती किंवा समाजघटक मानत त्याभोवतीच भारतीय विचारविश्व फिरत राहिले. नाईलाजाने मग “ब्राह्मण कोणास म्हणावे?” याची चर्चा सुरु झाली. वज्रसुचीतही परंपरा ज्यांना ब्राह्मण मानते ते ब्राह्मण नसून “ब्राह्मण” तत्व हे विशिष्ट गोष्टींवर अवलंबून नाही यावर भर दिला गेला आहे. चातुर्वर्ण्याऐवजी एकच वर्ण अभिप्रेत असल्याचेही सूचन वज्रसूचीतून मिळते पण यातून वर्णव्यवस्था आणि तिचा वैदिक आणि वैदिकेतरांवर जो पगडा आहे त्याचे निराकरण होत नाही कारण त्याचा बौद्धिक तत्वचर्चेशिवाय व्यवहारात काही उपयोग नाही. आणि हे गेल्या किमान एक हजार वर्षांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे.

असे असले तरी चातुर्वर्ण्याचाच आभास होईल असा “ब्राह्मण” शब्द का हाही प्रश्न विचारात घेतला गेला पाहिजे.

महाभारतात युधिष्ठिरालाही हाच प्रश्न विचारला गेला होता तेंव्हा त्याने " ज्याच्या अंगी ज्ञान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यज्ञकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय." पण वैदिक धर्माचा मुख्य आधारस्तंभ जो ऋग्वेद त्याची व्याख्या पाहिली तर “जो वैदिक मंत्र रचतो तोच ब्राह्मण.” अशी व्याख्या आहे. औपनिषदिक व्याख्या पाहिली तर “जो ब्रह्म जाणतो तो (कोणीही असला तरी) ब्राह्मण असतो.” तसे पाहिले तर मुळात आज जगात कोणीही ब्राह्मण असू शकत नाही. जर ब्राह्मण हेच अस्तित्वात नसतील तर आपण कोणत्या “ब्राह्मणत्वा”ची चर्चा करत असतो आणि वर्तमानातील सामाजिक व्युहरचना ठरवत असतो यावर साकल्याने विचार केला पाहिजे. “ब्राह्मण” या शब्दाचेच अलौकिकरण टाळले पाहिजे. वज्रसुची अथवा बहिणाबाईंचे अभंग त्या शब्दालाच वेगवेगळ्या अंगाने प्रतिष्ठा देत असतील तर त्याचाही साकल्याने विचार केला पाहिजे. जे ब्राह्मण आहेत त्यांतील सुबाजी बापूसारख्या व्यक्तीने आधुनिक काळातही “वज्रसूची टंक” लिहून वज्रसूचीतील मतेही खोडून काढायचा प्रयत्न केला हेही येथे विसरता येत नाही. ब्राह्मण या शब्दाची चर्चा आली कि ती सकारात्मक असो कि नकारात्मक, वर्णसंस्थेची चर्चा अपरिहार्य असते आणि त्यात ब्राह्मणमहत्ता आपोआप अधोरेखित केली जात असते. खरे तर ही वैदिक धर्माची अंतर्गत बाब आहे. चातुर्वर्ण्य हा वैदिक धर्माचा पाया आहे. लोकधर्मातून आलेल्या लोकांनी त्याची चर्चा करत ती संस्था आपल्यावर ओढवून घेण्यात अर्थ नाही. मुळात ब्राह्मण या शब्दाला एवढे वलय प्राप्त होण्याचे कारण काय याचेही चिंतन व्हायला हवे ते आजही होते आहे असे दिसत नाही.

वैदिक व्याख्यांनुसारच “ब्राह्मण” हेच अस्तित्वात नसतील तर आपण कोणत्या “ब्राह्मणत्वा”ची चर्चा करत असतो आणि वर्तमानातील सामाजिक व्युहरचना ठरवत असतो यावर साकल्याने विचार केला पाहिजे. “ब्राह्मण” या शब्दाचेच अलौकिकरण टाळले पाहिजे. वज्रसुची अथवा बहिणाबाईंचे अभंग त्या शब्दालाच वेगवेगळ्या अंगाने प्रतिष्ठा देत असतील तर त्याचाही गंभीरपणे विचार केला पाहिजे. ब्राह्मण या शब्दाची चर्चा आली कि ती सकारात्मक असो कि नकारात्मक, वर्णसंस्थेची चर्चा अपरिहार्य असते आणि जी वैदिक धर्माची अंतर्गत बाब आहे. लोकधर्मातून आलेल्या लोकांनी ती करण्यात अर्थ नाही. वज्रसुचीनेसुद्धा एक प्रकारे ब्राह्मण माहात्म्य वाढवायला हातभार लावला आहे.

-संजय सोनवणी


(ज्ञानबा-तुकाराम २०२३ च्या वार्षिकात बहिणाबाई विशेषांकात प्रकाशित झालेला लेख. संपादा- डॉ. श्रीरंग गायकवाड)

Sunday, January 22, 2023

हिंदू धर्म

 "निगम म्हणजे वेद व आगम म्हणजे तंत्रविद्या होय. आधुनिक हिंदुधर्मातील देवता व कर्मकांडे वैदिक धर्मापेक्षा कितीतरी भिन्न आहेत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता तांत्रिक धर्म हा वैदिक धर्मापेक्षाही प्राचीन असल्याचे समजते. आगम धर्मात शिवाला प्रमुख स्थान आहे. तंत्रांची रचना त्यानेच केली असे मानतात. वेदकालीन आर्यांनी तांत्रिक धर्माला दूर ठेवण्याचा व त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला, पण भारतातील फार मोठ्या वैदिकेतर समाजाचा तो लोकधर्म असल्याने वैदिकांना त्यांना दूर ठेवणे शक्य झाले नाही.कालांतराने तांत्रिक धर्मातील काही गोष्टींचा वैदिक धर्मात अंतर्भाव करणे त्यांना भाग पडले."

-भारतीय संस्कृती कोश, खंड १, पृष्ठ-५८०-५८१)

संपादक- पं. महादेवशास्त्री जोशी.

"तत्व आणि मंत्र यांनी युक्त अशा व्यापक अर्थाचा विस्तार करणरे आणि साधकांचे साधनेद्वारे परित्राण करणारे जे शास्त्र, त्याला तंत्र असे नांव आहे. तंत्रालाच आगम असे दुसरे नांव आहे."- कामिकागम.

 

आगम म्हणजे आधीचे तर निगम म्हणजे नंतरचे. वैदिक धर्म हा नंतरचा म्हणून वेदांना निगम म्हणतात तर तंत्रांना आगम. दोन धर्म पूर्णपणे स्वतंत्र आहेत. हिंदू (तांत्रिक) धर्मातील कर्मकांडे पूर्णतया स्वतंत्र आहेत आणि आपण आजही ती पाळतो. वैदिकाश्रयी होणे हे हिन्दिउन्ना विघातक आहे.

 

-संजय सोनवणी 

Saturday, January 14, 2023

सावरकर

 सावरकर ही एक स्वत:च स्वत:त गोंधळलेली व्यक्ती होती. त्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे कधीही समजले नाही. सुटका करून घेण्यासाठी माफीनामें लिहिले हे एक वेळ समजता येते पण सुटका झाल्यानंतरचे त्यांचे जीवन आदर्श होते असे त्यांचे भक्तही म्हणणार नाहीत. त्यांनी उलट होता त्या गोंधळात भर घालण्याचेच कार्य केले.

गांधीजींनी त्यांच्या अनुपस्थितीत जी राष्ट्रानिर्माण करणारा नेता म्हणून झेप घेतली त्याबद्दल त्यांनी आजीवन असूया बाळगली. ते गांधीद्वेष करत राहणार हे अटळ होते आणि तो तसा त्यांनी केलाही.
त्यांनी अखंड राष्ट्राचे गुणगान गाताना राष्ट्र विभाजित कसे होईल याचेच प्रयत्न केले. त्यांना हिंदू कधीच अभिप्रेत नव्हते तर त्यांना गोळवलकरांप्रमाणे एक वैदिक राष्ट्र हवे होते. मग ते राष्ट्र तुकड्यांतील का असेना!
त्यांनी एक कवी म्हणून मातृभूमीचे गुणगान हृद्य काव्यात केले खरे पण त्यांच्या गद्य लेखनात नेहमीच पितृसत्त्ताकतेचे महिमान गाणारी पितृभूमीच डोकावत राहिली. कवी आणि कविह्रुदयाचा विचारवंत त्यांच्या गद्य लेखनात आढळत नाही तो त्यामुळेच.
त्यांनी ओजस्वी ज्वलंत लेखन केले पण त्यांचे प्रत्यक्ष आचरण मात्र एखाद्या दिवाभीतासारखे राहिले आणि तेही बहुदा त्यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारशी केलेल्या समझौत्यामुळे असे म्हणता येते.
त्यांनी अंदमान सुटकेनंतर मुस्लीम द्वेष केला पण मुस्लीम लीगशी युत्या करताना त्यांना कसलाही संकोच वाटला नाही. त्यांचे सहा सोनेरी पाने ही सहा विखारी पाने आहेत हे त्यांच्या भक्तांनीही कधी लक्षात घेतले नाही. लेखनात ते नेहमीच विरोधाभासी राहिले. प्रसंगी खोट्याचाही निरलसपणे आधार घेतला. आपल्या वैचारिक आणि नैतिक मर्यादा त्यांनी कधीही लक्षात घेतल्या नाहीत.
खरे तर सावरकर हे भारतीय इतिहासातील एक तत्वशुन्य व्यक्तित्व आहे. त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली असेल तर ती “तुम्ही हत्या करा...मी पडद्यामागे लपलेला आहे” अशी.
इतिहासात अनेक असे पुरुष गाजवले गेलेले आहेत. पण गाजवले गेले म्हणून ते महान होत नाहीत आणि त्याला कसलाही तात्विक आधार नाही.
-संजय सोनवणी

Saturday, January 7, 2023

काश्मीरच्या अस्वस्थतेत दडलेल्या आर्थिक कारणांचा शोध

 

काश्मीरच्या अस्वस्थतेत दडलेल्या आर्थिक कारणांचा शोध

०६ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


काश्मीरकडे पहायचा दृष्टिकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झालाय. हे आपण समजून घ्यायला हवं.

जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेलं  कलम ३७० आणि ३५-अ ५ ऑगस्ट २०१९ला रद्द करण्यात आलं. एवढंच नाही तर जम्मू-काश्मीर आणि लदाख अशी विभागणी करून त्यांना केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं. यामुळे काश्मीरमधला दहशतवाद संपेल आणि त्या विभागाचा सर्वांगीण विकास होईल असा दावा केंद्र सरकारने केला होता.

काश्मीरमधे गुंतवणूक करावी यासाठी देशात आणि जगभरातल्या उद्योजकांना आवाहनं करण्यात आली होती. अनेक शिक्षणसंस्था ते उद्योजकांनी काश्मीरमधे आपण रचनात्मक काम करू अशा घोषणाही केल्या होत्या. काश्मीरमधला दहशतवाद संपला असल्याच्या आणि अनेक जिल्हे 'दहशतवाद मुक्त' झाल्याच्याही बातम्या येत होत्या.

याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे टाळेबंदी घोषित झाल्यानं काश्मीरच नाही तर अवघ्या देशातलीअर्थव्यवस्था धोक्यात आली. त्या भीतीच्या लाटेत काश्मीरमधल्या बातम्या आपसूक दबल्या गेल्या. तिथं सगळं आलबेल आहे आणि आता काश्मीर उंच भरारी घेण्याच्या तयारीत आहे या स्वप्नात लोक मशगुल राहिले.

नंतर आला 'काश्मीर फाईल्स' हा बहुचर्चित आणि वादग्रस्त सिनेमा. १९८९ला काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरं सोडावं लागलं, हिंसाचार झाला याचं एकतर्फी आणि अतिरंजित चित्रण असलेल्या या सिनेमाने काश्मीर चर्चेत आला खरा पण ती चर्चा सकारात्मक अंगाने नेण्यात अपयश आलं. कोणतीही परिस्थिती बहुअंगीय दृष्टीने पहावी लागते याचं भान सुटलं. त्यामुळे काश्मीर नेमका काय आहे आणि तिथं असं का घडतं याबाबतची चर्चा पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम अशी धर्माच्या अंगानेच झुकलेली राहिली. याच परिस्थितीत काश्मीरमधला दहशतवाद आहे किंवा संपला आहे असे दावे फोल असल्याचंही पुढे आलं.

काश्मीर पुन्हा एकदा धुमसतोय

ऑक्टोबर २०२१ महिना हा काश्मीरसाठी पुन्हा रक्तरंजित ठरला. या महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एकूण ४४ लोक ठार झाले. त्यात १२ सुरक्षा दलाचे सैनिक, काश्मिरी पंडितांसह १३ सामान्य नागरिक आणि १९ दहशतवाद्यांचा समावेश होता. फुटीरतावाद्यांचे समर्थक आहात या आरोपाखाली शेकडो नागरिकांना जरबंद करण्यात आले. त्यानंतर अतिरेक्यांनी नागरिकांना वेचून मारण्याची पद्धत अवलंबली.

एका काश्मिरी पंडिताची हत्या झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या भीतीने ऑक्टोबर २०२२ मधे शोपिया जिल्ह्यातल्या दहा पंडितांच्या परिवारांनी खोऱ्यातून जम्मूमधे स्थलांतर केलं. राजौरी जिल्ह्यातल्या डांगरी गावात दहशतवाद्यांनी गोळीबार करून हिंदू परिवारातल्या सहा व्यक्तींची निघृण हत्या केली तर सात व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्या.

या हत्याकांडाच्या विरोधात शांतीमोर्चा काढला गेला तेव्हा बॉम्बस्फोटही करण्यात आला. या अशा विविध घटनांमागे आयएसआय किंवा लष्करे-तय्यबा या संघटनाचा हात आहे असे दावे सरकारकडून केले जात आहेत. एकंदरीत पुन्हा एकदा काश्मीर धुमसू लागला आहे याची ही दुश्चिन्हं आहेत.

हिंदू-मुस्लीम संघर्षाची परिमाणं

कोणत्याही समाजाच्या वर्तमानाची बीजं इतिहासात दडलेली असतात. काश्मीरकडे पहायचा दृष्टीकोन केवळ एक 'पर्यटन स्थळ' किंवा 'हिंदू-मुस्लीम संघर्षाचं केंद्र' आणि पाकिस्तानचा डोळा असलेला भूप्रदेश एवढ्या मर्यादित दृष्टीकोनातून पाहून चालत नाही. काश्मीरचा इतिहास स्वातंत्र्यानंतर सुरु होत नाही. काश्मिरी पंडित आणि मुस्लीम यांच्यातला संघर्ष हा धार्मिकतेपेक्षा जास्त आर्थिक प्रश्नांभोवती केंद्रित झाला आहे याचं आकलन योजनाकारांना झाल्याचं दिसून येत नाही.

डोग्रा राजवट हिंदू असल्यामुळे काश्मीरी पंडितांचा प्रशासनात सर्वार्थाने प्रभाव होता. सर वाल्टर लॉरेन्स यांनी डोग्रा काळात काश्मिरी मुस्लीम कारागीर आणि शेतकऱ्यांचं किती भयंकर शोषण केलं याचा अहवालच सादर केला होता. त्यानुसार 'काही पंडित अधिकारी व्यक्तीगत स्तरावर दयाळू आणि सभ्य असले तरी जेव्हा एकत्रित येत तेव्हा ते क्रूर आणि दमनकारी बनून जात.' गवाशानाथ कौल यांनी आपल्या 'काश्मीर देन एंड नाऊ' या पुस्तकात म्हटलंय कि '९० टक्के मुस्लीम घरं ही पंडित सावकारांकडे गहाण आहेत. सरकारमधे मुस्लिमांचं प्रमाण नगण्य तर होतंच पण त्यांना सैन्यातही अधिकारपदं उपलब्ध केली गेली नव्हती.'

एकंदरीत हिंदू डोग्रा राजवटीने काश्मिरी पंडितांच्या मदतीने तिथं मुस्लिमांचं दमनच केलं. या काळात असंख्य मुस्लिमांनी पंजाब आणि नजीकच्या राज्यांमधे स्थलांतर करणं पसंत केलं. १९३१चा उठाव डोग्रा राजवटीच्या विरोधात झाला. शेख अब्दुल्लांचं नेतृत्व यातूनच पुढे आलं. 


ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४७ला जम्मू-काश्मीर तेव्हा भारतात सामील झालेलं नव्हतं तेंव्हा हिंदू आणि शीख जहाल गटांनी डोग्रा राजांच्या पाठबळावर दंगे केले ज्यात हजारो मुस्लीम ठार झाले. आकडेवारी निश्चित नाही पण किमान २०,००० ते एक लाख असल्याचे विविध अंदाज आहेत. अनेक मुस्लीम पंजाबात पळून गेले. हिंदू-मुस्लीम यांच्यातल्या संघर्षाला अनेक परिमाणं आहेत पण ती भारतीय माध्यमांनी कधी विचारात घेतली नाहीत.


राजकीय मंडळींचा भाबडा आशावाद

नागरिकांच्या असंतोषाला आर्थिक कारणं असतात हा जागतिक पातळीवर अनुभवाला येणारा सिद्धांत आहे. ज्या ३७० कलमाबाबत संघवादी नेहमीच आक्रमक राहिले होते त्यावरही जरा नजर फिरवली पाहिजे. काश्मीरचा राजा हरीसिंग आणि शेख अब्दुल्ला याच्या हट्टामुळे सामीलनाम्याच्या करारातल्या तरतुदींनुसार कलम ३७० अस्तित्वात आलं. हा करार झाला १९४८चा तर घटना अस्तित्वात आली ती १९५० साली. या दोन वर्षाचा मधला काळ सोडला तर १९५० सालापासूनच भारत सरकारने शांत पण ठामपणे कलम ३७० दुर्बळ करायला सुरवात केली.

केंद्र-राज्य संबंध ठरवताना जवळपास ९७ बाबी केंद्राच्या अखत्यारीत येतात. त्यापैकी केवळ चार बाबींबाबत ३७० नुसार केंद्राला अधिकार मिळालेले होते. पण १९५०ला भारत सरकारने राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार वापरत या वर्षीच केंद्र-राज्य संबंधांपैकी कायदे करण्याचे अजून ३८ अधिकार भारत सरकारने आपल्या अखत्यारीत घेतले. यासाठी राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार वापरण्यात आला तर जम्मू-कश्मीरमधल्या सरकारला तो मंजूर करायला भाग पाडण्यात आलं.

हेच १९५२ आणि ५४ला करून कलम ३७० चे दात काढण्याचं काम करण्यात आलं. ३७० रद्द करण्याच्या आधी केंद्राने ३७० मधले फक्त तीन अधिकार काश्मीरच्या हाती राहिले तर काश्मीरचे ३७०मुळे अस्तित्वात आलेले ९४ अधिकार केंद्राने पूर्वीच आपल्या ताब्यात घेतलेले होते. म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ला भाजप सरकारने काश्मीरच्या अखत्यारीत उरलेले फक्त तीन अधिकार रद्दबातल ठरवले.

घोषणा नको, काम हवं

३७० आणि ३५-अ रद्द झाल्यामुळे काश्मीर शांतीमय होईल हा आशावाद भ्रामक असल्याचं अलीकडच्या हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून स्पष्ट होतंय. यात स्थानिक दहशतवादी सामील आहेत की पाकपुरस्कृत हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. पण काश्मीर आणि लदाखमधे ३७० रद्द केल्यापासून किती जमिनी बाहेरच्या लोकांनी विकत घेतल्या? किती उद्योगांची पायाभरणी झाली? हे प्रश्न विचारलं गेलं तर त्याबाबत काहीही उत्तर सरकारकडे नाही.

खरं तर काश्मीरी शेतमाल, फळं, स्थानिक उत्पादनं यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत काश्मिरी जनतेची आर्थिक स्थिती उन्नत करावी यासाठी सरकारने अद्यापही ठोस पावलं उचललेली नाहीत. सरहद संस्थेचे संजय नहार याबद्दल सातत्याने काम करत राहिले असले तरी असे व्यक्तीगत प्रयत्न तोकडे पडणार हे उघड आहे.

पर्यटन आणि इतर उत्पादन उद्योगाला संजीवनी देण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेत ‘घोषणा नको, काम हवं’ या पद्धतीने काही केलं तरच काश्मीरमधे पुन्हा डोकं वर काढू लागलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पायबंद घालण्यात यश येण्याची शक्यता आहे. काश्मीरमधला मागचा आणि आजचाही संघर्ष आर्थिक शोषण आणि स्थिती याच पायावर आहे. बेरोजगार हात शस्त्र हाती घेण्यात पुढे असतात हे तत्व लक्षात घेतलं पाहिजे. काश्मिरी लोकांची अर्थस्थिती आणि तिथला दहशतवाद यात अन्योन्य संबंध आहे हे सत्य समजावून घ्यावं लागेल.


-संजय सोनवणी

https://kolaj.in/published_article.php?v=What-are-the-issues-in-Jammu-and-KashmirEX9922347



Friday, January 6, 2023

सम्मेद शिखरजी आणि जैन धर्मीयांतील अस्वस्थता

 




पार्श्वनाथ पर्वतरांगेतील सम्मेद शिखरजी हे सर्वात उंच ठिकाण आहे. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेला असलेले हे शिखर सध्या झारखंड राज्यात मोडते. सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून याच पर्वतावर जैनांच्या चोवीस तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकरांना निर्वाण प्राप्त झाले अशी मान्यता आहे. यातील तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ फार महत्वाचे आहेत कारण ते एक ऐतिहासिक व्यक्ती होते हे इतिहासकारांनीही सिद्ध केलेले आहे. या शिखरावर भगवान पार्श्वनाथांसहित सर्व तीर्थकर व अनेक महान मुनींची प्राचीन मंदिरे आहेत. या “शाश्वत तीर्थ”स्थानाला भेट देण्यासाठी जगभरातून जैन धर्मीय आणि जैन तत्वद्न्यानाबाबत आस्था असलेले असंख्य भाविक येत असतात. 


अलीकडेच सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थल घोषित करणारी अधिसूचना जारी झाली आणि त्यामुळे जैन धर्मियांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ठिकठीकाणी आंदोलने होत असून नउ दिवसांच्या उपोषणानंतर मुनी सुज्ञयसागर यांचे निधन झाले आहे. सम्मेद शिखर तीर्थक्षेत्र असताना त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढून या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात येईल अशी भीती जैन बांधवांना वाटते. सर्वच पर्यटन स्थळांची सध्याची अनवस्था पाहता ही भीती गैरलागू आहे अशातील भाग नाही.


या तीर्थस्थळाला अगदी राजपूत व मुघल सत्तांनीही सहकार्यच केले असल्याचे इतिहासात डोकावता दिसते. पृथ्वीराज चौहानाच्या काळात या तीर्थस्थळाचा सर्व कर माफ केला गेला होता. नंतर सन १५९२ मध्ये एका फर्मानाने बादशहा अकबराने शत्रुंजय (पालीताना), अबू, राजगिर आणि सम्मेद शिखरजी या पवित्र ठिकाणी कोणत्याही प्राण्याच्या हत्येस प्रतिबंध करण्यात आला होता. शिवाय करमाफीची जुनी योजना तशीच कायम करण्यात आली होती. त्यावेळचे प्रसिद्ध जैन जगद्गुरू आचार्य हिरविजय सुरीश्वरजी महाराज यांच्या विनंतीवरून अकबराने हे फर्मान जारी केले होते. १६९८ मध्ये जहांगीराचा द्वितीय पुत्र आलमगीरने शिखरजी हे स्थान जैन तीर्थयात्रीसाठी करमुक्त केले होते. परधर्मियांबाबत अनास्था न ठेवता मोगल सत्तेने या तीर्थस्थळाचे जनमाणसातील स्थान मान्य करून हे निर्णय घेतले होते.


१७६० मध्ये ब्रिटीश काळात मात्र बंगाल सुभ्याचा सुभेदार नबाब अहमदशहा बहादूरने सम्मेद शिखरजी पर्वतावरील जैनांच्या ताब्यात असलेली जमीन मुर्शिदाबादच्या जगत शेठ या धनाढ्यास विकली. जगत शेठने पालगंजच्या राजाला एका पत्रान्वये सम्मेद शिखरजी पर्वताचा केअरटेकर म्हणून नेमले. ब्रिटीश सरकारने याच पत्राचा आधार घेत पालगंजच्या राजाला या जमीनीचे सर्वाधिकार दिले. राजाने तीर्थस्थानाचा खर्च करावा पण त्या बदल्यात तीर्थक्षेत्राला मिळणा-या उत्पन्नात त्याला भागीदारीही दिली. राजाने याच अधिकाराचा वापर करत या पर्वतावरच्या जमीनीपैकी दोन हजार एकर जमीन चहाच्या मळ्यासाठी एका इंग्रजाला भाडेपट्ट्याने दिली आणि नव्या मालकाने १८८८ साली तेथे डुक्करांचा कत्तलखानाही काढला. 


थोडक्यात पूर्वीच्या सत्तांनी दिलेले परंपरागत मालकी व वहिवाट हक्क तर डावलण्यात आलेच पण सम्मेद शिखरजीचे पावित्र्यही डागाळले गेले. त्यामुळे जैन धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. त्या वेळेस हा कत्तलखाना बंद करून मुळ पावित्र्याची आणि अहिंसेच्या मुलतत्वाची उद्घोषणा करण्यासाठी उभे ठाकले प्रसिद्ध प्रज्ञावंत व जैन तत्वद्न्य बॅरिस्टर वीरचंद गांधी. त्यांनी खुद्द पालगंजचा राजा आणि त्या इंग्रजाविरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात केस गुदरली. प्राचीन आज्ञापत्रे व फर्माने पुराव्यादाखल पुढे ठेवली. इंग्रज न्यायालयाने ते पुरावे ग्राह्य धरून सम्मेद शिखरवरील कत्तलखाना बंद करण्याचा आदेश तर दिलाच पण तो बेकायदा भाडेपट्टाही रद्द केला. तेंव्हापासून आता सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करेपर्यंत येथील शांतता व पावित्र्य अढळ राहिले.


जे पूर्वीच्या हिंदू, मुघल आणि ब्रिटीश सत्तांनी तत्व पाळले त्याला आता मात्र छेद मिळाला आहे. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा या मागणीकडे कानाडोळा करून या स्थळाला पर्यटन स्थल म्हणून घोषित करणे हा प्रकार या स्थळाचे पुरातन पावित्र्य धोक्यात आणण्याचा प्रकार आहे अशी भावना समस्त जैनांची झाली असल्यास नवल नाही. हे स्थळ त्या भागात राहणा-या बहुसंख्य आदिवासी जनतेलाही सरकारचे हे कृत्य आवडलेले नाही कारण असे म्हणतात कि पार्श्वनाथ यांचे असंख्य अनुयायी गोंड, संथाल या आदिवासी समाजांपैकी होते.  येथे केवळ पर्यटनाच्या हेतूने गर्दी वाढली व पर्यटकांच्या सोयीसाठी सरकारने या पर्वताचे मुळचे सौंदर्य डागाळणारी बांधकामे केली तर येथे शांतीच्या शोधात येणा-या भाविकांचे येथे वावरणे कठीण होऊन जाईल. सरकारने झारखंडमध्ये पर्यटनस्थळे म्हणून विकास करावीत अशी इतर असंख्य स्थळे असताना सम्मेद शिखरकडे आपले नजर वळवावी हे अनाकलनीय आहे असेच एकंदरीत स्थिती पाहून म्हणता येते. जैन समाजाला पुन्हा एकदा बॅरिस्टर वीरचंद गांधीसारख्या झुंझार प्रज्ञावंताची गरज आहे हे यातून अधोरेखित होते.


-संजय सोनवणी

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...