Sunday, February 26, 2023

ज्ञानभाषा मराठी: कधी आणि कशी?



ज्ञानभाषा मराठी: कधी आणि कशी?

मराठी भाषा किती प्राचीन आहे याचा उहापोह अनेकदा होत असतो. प्रत्यक्ष शिलालेखीय पुरावे पाहिले तर सर्वात जुने शिलालेख नाणेघाट, लोहगडवाडी आणि पाले येथे मिळालेले आहेत. नाणेघाट शिलालेख सातवाहन घराण्यातील नायानिकेने कोरवलेला असून तो सर्वात मोठा आहे. या लेखांचा काळ हा इसवीसनपूर्व दुसरे ते पहिले शतक असा ठरवण्यात आलेला आहे. सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसपू २२० ते इसवी सन २३० असे किमान साडेचारशे वर्ष राज्य केले. या काळातील सर्व शिलालेख माहाराष्ट्री प्राकृतात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या नाण्यांवरील मजकूरही प्राकृतात आहेत. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात लिहिला गेलेला व हाल सातवाहनाने संपादित केलेला गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा अमोलिक काव्यसंग्रह माहाराष्ट्री (म्हणजे आजच्या मराठी) चे संस्कृतीक वैभव आहे. वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपु २०० मधील. यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेलेला अंगविज्जा हा गद्य ग्रंथ तत्कालीन सामाजिक व धर्मस्थितीवर प्रकाश टाकतो. म्हणजे लिखित व शिलालेखीय पुराव्यांनुसार २२०० वर्षांपूर्वी माहाराष्ट्री प्राकृत ग्रंथ व राजभाषा बनलेली होती हे सिद्ध होते. ती त्याही पूर्वी किमान एक हजार वर्ष बोलण्यात होती याचे अनुमान आपल्याला करता येते. हीच माहाराष्ट्री कालौघात परिवर्तने स्वीकारत आपल्यापर्यंत आज पोहोचलेली आहे.

 

मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे असा मराठी भाषकांनी जपलेला एक भ्रम आहे. याचे कारण असे कि संस्कृत भाषेतील पहिला शिलालेख मिळतो तो इसवी सनाच्या दुस-या शतकातील. तत्पूर्वी भारतात मिळणारे सर्व लेखन हे विविध प्राकृत भाषांमधील आहेत. संस्कृतचे अस्तित्व दाखवता येईल असा एकही पुरावा मिळालेला नाही. शिवाय हा संस्कृत शिलालेख आहे शक नृपती रुद्रदामनचा. इसवी सनाच्या तिस-या शतकानंतर मात्र संस्कृत शिलालेखांची संख्या वाढत गेल्याचे दिसते. याचे कारण असे कि संस्कृत भाषा इसपूचे पहिले शतक ते दुसरे शतक या काळात ग्रांथिक कारणासाठी प्राकृतातून विकसित केली जात होती व तिचे विकसन झाल्यानंतर ती ग्रंथलेखनाची भाषा बनली. संस्कृतमधील सर्व शब्द हे मूळ प्राकृत शब्दांमध्ये किंचित ध्वनीबदल करून साधले गेलेले आहेत. जसे प्राकृत दुलह संस्कृत मध्ये दुर्लभ बनले. वुंदचे वृंद बनले. अशी अगणित उदाहरणे देता येतील. याचा अर्थ एवढाच कि संस्कृत भाषा ही प्राकृतोद्भाव आहे. उलटे झालेले नाहे कारण तो क्रम ऐतिहासिक पुराव्यांवर टिकत नाही.

 

संस्कृतचा उदय झाल्यानंतरही माहाराष्ट्री प्राकृतात असंख्य ग्रंथांची निर्मिती होतच राहिली. रावणवहो, गौडवहो, लीलावई,  विमलसूरिकृत पउमचिरिय अशी अजरामर महाकाव्ये जशी लिहिली गेली तशीच अगणित खंडकाव्ये, आख्याने व अद्भुतरम्य कथाही लिहिल्या गेल्या. आजची मराठी घडवण्यात तत्कालीन जैन विद्वानांचे योगदानही अमुल्य असेच आहे. हीच माहाराष्ट्री प्राकृत तेराव्या शतकापर्यंत ज्ञानदेव-नामदेवाच्या मराठीत परिवर्तीत होत पुढे बखरींच्या भाषेत बदलली. कालौघात परिवर्तने स्वीकारत विकासशील राहणे हे कोणत्याही जिवंत भाषेचे लक्षण असते. अवघ्या शंभर वर्षांपूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात तुलना केली तरी हे वास्तव लक्षात येईल.

 

मराठी भाषा हा महाराष्ट्रीतील जनतेचा सांस्कृतिक उद्गार आहे. मराठी भाषेतच ६२ पेक्षा अधिक प्रादेशिक बोलीभाषा आहेत. त्यातील शब्दकळा अनोखी व अर्थगर्भ असूनही आम्ही आज बोलीभाषांना तुच्छ लेखात त्या त्या बोली बोलणा-यांना न्यूनगंडात ढकलत एक घोर सामाजिक अन्याय करत असतो याचे आपल्याला भान नाही. शासकीय मराठी तर बव्हंशी संस्कृताळलेली असल्याने ती समजावून घ्यायला इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो.  प्रमाणभाषेचा डंका पिटणारे अशास्त्रीय लोक दुसरीकडून वेगळेच आक्रमण करत असतात. जगात कोणतीही भाषा प्रमाण नसते. इंग्रजी घेतली तरी ब्रिटीश इंग्रजी, अमेरिकन इंग्रजी, आफ्रिकान्स इंग्रजी ते आता भारतीय इंग्रजी असे प्रादेशिक भेद आहेत पण त्यांना कोणी त्यासाठी अमुकच प्रकारच्या इंग्रजीत लिहा असा आग्रह कोणी धरत नाही. पण हे स्तोम आपल्या भाषेतच का यावर जेवढा विचार व्हायला हवा तेवढाही होत नाही.

 

मराठी ज्ञानभाषा होऊ शकते काय हा उद्दाम प्रश्न अनेकदा काही लोक विचारात असतात. इंग्रजी मान्य भाषा होण्यापूर्वी तीही गावढ्याची भाषा म्हणूनच ओळखली जात होती आणि समाजातील वरिष्ठ लोक फ्रेंच किंवा ल्याटिन भाषेत बोलण्यात आणि शिकण्यात धन्यता मानत असत. प्रबोधनकाळात इंग्रजीत अवाढव्य ग्रंथ निर्मिती तर झालीच पण जिज्ञासू लेखक-संशोधाकांनी जगभराच्या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करून घेतले व प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. त्यामुळे ब्रिटीश लोकाचे ज्ञानविश्व विस्तारले. इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात जागतिक भाषा बनू लागली कारण तीच्यात उपलब्ध असलेले जागतिक साहित्य. इंग्रजीने जगभरच्या भाषांमधून अगणित शब्द स्वीकारले व पचवले आणि त्या त्या शब्दांचा अर्थविस्तार करत इंग्रजी भाषेला एक अर्थगर्भता प्राप्त करून दिली.

मराठीत प्राचीन काळापासून काव्य, शास्त्र, भूगोल, सौंदर्यशास्त्र, अध्यात्म, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, व्याकरण इ. विषयांवर विपुल साहित्य लिहिले गेले. आज जवळपास ९०% ग्रंथांचे सुचीकरनही झालेले नाही. आजच्या मराठीत अनुवाद तर दूरच. आपला मराठी विश्वकोश गेली जवळपास ५० वर्ष रखडत रखडत पूर्णत्वाकडे जात आहे. पूर्वी प्रकाशित झालेल्या खंडांतील नोंदी आज कालबाह्य झाल्यात पण त्यांचे नुतनीकरण करून पुन्हा प्रसिद्ध करण्याची बाब दूरच राहिली. आधुनिक विज्ञान ते जागतिक साहित्य मराठीत आणण्याचे एक परंपरा मराठीत होती, पण आता ती केवळ लोकप्रिय साहित्यापुरती मर्यादित झाली आहे. सशक्त बालसाहित्य आणि कुमार साहित्य मराठीत एवढ्या अभावाने आहे कि नवे वाचक तयार करण्याची परंपरा कुंठीत झालेली आहे.

 

मराठी ज्ञानभाषा कधी होऊ शकेल? जेंव्हा विद्यापीठीय पातळीवर होणारी संशोधने सुद्धा मराठीत लिहिली जातील. जागतिक आधुनिक तत्वज्ञान, विज्ञान ते दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारे उत्तम दर्जाचे लेखन मराठीत विपुल संख्येने उपलब्ध केले जाईल. त्यावर प्रदीर्घ अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिल्या जातील तेंव्हा! पण आज यात जोखीम पत्करून का होईना कार्य करू इच्छिणारे अभावानेच आहेत. सामाजिक पातळीवर अशा लेखन-अनुवादांना सहाय्य करणा-या संस्थाची तर उणीवच आहे. शिवाय इतिहाससंशोधनेही जाती-धर्मनिष्ठीत बनल्याने त्यात खोट्या अस्मिताचा बडिवारच अधिक. ज्ञान-विज्ञान हे विषय अभावानेच लिहिले जातात व तेही कॉपी-पेस्ट स्वरूपाचे. आणि याचमुळे मराठीचा वाचकही घटत चालला आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. मुले अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठीने ग्रस्त असल्याने त्यांचा बौद्धिक विकासही कोठेतरी अडखळून पडला आहे.

 

मराठी राजभाषा दिनी सर्वांना मायमराठीची आठवण येते. गतकाळातील कवींच्या मराठीप्रेमाची महती गाना-या कवितांची अवतरणे टाकली कि त्यांना तेवढ्यातच धन्यता वाटते. हे बेगडी मराठी प्रेम झाले. ती ज्ञानभाषा व्हायची असेल तर त्या भाषेत तेवढेच सखोल आणि मूलगामी लेखन सातत्याने होत राहिले पाहिजे आणि जागतिक ज्ञान मराठीतच उपलब्ध झाले पाहिजे तर ख-या अर्थाने या प्राचीन भाषेचा गौरव होईल. अन्यथा महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा जशा वेगाने –हास पावत चालल्या आहेत तशीच मायमराठीही एक दिवस शेवटचे आचके देईल. पण वि. का. राजवाडे एकदा उद्वेगाने म्हणाले होते तसे, जर मराठीत अजून धुगधुगी असेल तर तिच्यात प्राण भरा. आणि ती मरणारच असेल तर आत्ताच तिचे अंतिम संस्कार करून अंघोळ करा! आपल्याला मराठीत पुन्हा एकदा प्राण भरले पाहिजेत. किमान अडीच हजार वर्षांचा ऐतिहासिक अस्तित्व असलेल्या या भाषेला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर पोहोचवले पाहिजे!

-संजय सोनवणी 

Tuesday, February 21, 2023

“भारत” राष्ट्राचा नेमका पाया कोणता?


राष्ट्र-राज्य ही तशी फार अलीकडे, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयाला आलेली संकल्पना आहे. राज्य, गणराज्य, नगरराज्य, साम्राज्य या संकल्पनांनंतरची विकसित जगाने निर्माण केलेली ही संकल्पना समजावून घ्यायचे असेल तर आपल्याला राष्ट्र संकल्पनेच्या विविध व्याख्याही तपासल्या पाहिजेत.

१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)

२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."

३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ.) "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेल्या व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब.) "सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क.) समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."

४. विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionary.)

५.  राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."


६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.

७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.

अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो,

१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो.  भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात विविध भाषा, वंश व संस्कृतींचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्क्रुतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. पण संपूर्ण युरोपचे असे एक राष्ट्र बनू शकले नाही. प्रादेशिक अस्मिता व त्यांचा स्वतंत्र इतिहास हाच युरोपीय राष्ट्रांच्या अस्तित्वाचे कारण बनला. पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश संकल्पना राबवता आलेली नाही.

२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुणच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या वा आयात झाल्या त्या कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृतीचे अवशेष शोधावे लागतात. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर ब-यापैकी बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर)  आहे. थोडक्यात संस्कृती या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पडत नाही. ‘आसेतुहिमाचल पसरलेल्या ह्या देशाला एकत्र बांधून ठेवणारे काही विशेष सांस्कृतिक तत्त्व आहे असे भारतीय संदर्भात जेंव्हा कोणे बालिश विधाने करते तेंव्हा कीव वाटते. ‘काही विशेष’ हा शब्दच भोंगळ आणि दिशाभूल करणारा आहे.



३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म प्रस्थापित करण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हणजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत.

धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरणांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म-एक वंश" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घतल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.

४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. लोकांवर प्रामुख्याने राज्य करतो तो इतिहास प्रिय मिथकांनी बनलेला असतो त्या अर्थाने असा इतिहास खोताच असतो असे म्हणायला हरकत नाही. यातून समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा आमच्या दृष्टीने समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लॉर्ड ऍक्टन म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." अशात भाजपा सरकारने तर भारताचा गेल्या बारा हजार वर्षाचा इतिहास नव्याने लिहून काढण्याचा चंग बांधलेला आहे. धादांत खोट्या इतिहासाने भविष्य अंधकारमय होणार हे वेगळे सांगायची गरज नाही. 

इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय, समाजनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.

या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वाल्ड स्पेंग्लर म्हणतो ते विचारात घ्यावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक जाणीवपूर्वक जोपासलेली काल्पनिक भावना आहे. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रप्रेम शिकवावे लागते कारण ती एक काल्पनिक कृत्रिम बाब आहे असाही एक विचारप्रवाह आहे आणि तोही सत्य नाही असे म्हणता येणार नाही. पण या अशा काल्पनिक राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भडकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.

 

या पार्श्वभूमीवर आपल्याला “भारत” या संकल्पनेचा विचार करायचा आहे. अखंड भारत वगैरे वल्गना करणारे फॅसिस्ट सध्या जोरावर असताना तर ही चर्चा अधिक महत्वाची होऊन जाते. राष्ट्र संकल्पनेच्या वरील सर्व चर्चा पाहिल्या तर आपल्या लक्षात येइल कि भारत देश या व्याख्यांमध्ये पूर्णता: बसतो असे नाही. हिंदू धर्माच्या वर्चस्वाखाली अध्यात्मिक व राजकीय सत्तेखाली प्रशासन केले जाणारे राष्ट्र म्हणजे भारत असावे असे दिनदयाळ उपाध्याय यांनी “एकात्म मानव” मध्ये सुचवले होते. यातील भोंगळपणा उघड आहे कारण मुळात “हिंदू” म्हणजे काय याचीच सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही. “हिंदू ही जीवनशैली आहे” ही व्याख्या कामाला येत नाही कारण विशिष्ट जीवनशैली नाही असा एकही समुदाय जगात अस्तित्वात नाही. तथाकथित हिंदू म्हणवणा-या समुदायांच्या जीवनशैलीत साम्य नाही. संस्कृतीबद्दल म्हणावे तर भारतीय संस्कृती ही शेकडो प्रादेशिक, जातीय, धार्मिक घटकांच्या स्वतंत्र संस्कृतींचे एक कडबोळे आहे. त्यामुळे एक विशिष्ट समाजघटकाची प्रदेशाधारीत संस्कृती म्हणजे राष्ट्रीय संस्कृती म्हणता येत नाही. बरे, त्याही इतिहासात वारंवार बदलत राहिलेल्या आहेत. आपापसात आजही संघर्षांयमान आहेत. भाषांचेही तसेच आहे.

धर्म हा भारताला राष्ट्र बनवणारा घटक बनला तो हिंदू-मुस्लीम संघर्षामुळे. हिंदू bahul आणि मुस्लीमबहुल अशा दोन भागांमध्ये राष्ट्र वाटले गेले. पण जे वाटले गेले ते ब्रिटीश प्रभूसत्तेखालचे उपनिवेशीय राजकीय राष्ट्र होते. त्याला इतिहासाची पूर्वपीठिका नव्हती. किंबहुना संपूर्ण भारतीय उपखंड हा एकाच एका साम्राज्याचाही, अपवादात्मक काळ वगळला तर, भाग नव्हते. भारतीउ जनतेत राष्ट्रभावना रुजवण्याचे कार्य केले ते महात्मा गांधींनी. त्यांनी सुरु केलेले अभिनव आंदोलन हे राष्ट्रीय म्हणता येईल असे आंदोलन होते. भावनिक दृष्ट्या उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम एकत्र आणण्याचे अत्यंत अशक्यप्राय कार्य त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखालील कवी-तत्वद्न्य-विद्वानांनीही “राष्ट्र” संकल्पनेची नव्याने मांडणी करायला सुरुवात केली. ब्रिटीश इंडिया जो भारत स्वतंत्र होताक्षणीच असंख्य घटकांमध्ये विखंडीत होऊ शकला असता त्याला भावनिक आणि राजकीय पायावर सर्वसमावेशक राष्ट्र बनवण्याची दिशा मिळाली.

पण म्हणून प्रश्न सुटले असे नव्हे. अनेक प्रान्तांचे स्वातंत्र्यासाठी स्वप्न राहिलेच. पंजाब, द्रविडस्तान, काश्मीर, उत्तर-पुर्वेतील काही राज्ये (अथवा त्या राज्यातील काही घटक) त्या भावनेचे वाहक नाहीत असे म्हणता येणार नाही. १९८० च्या दशकात एका विद्वानाने महाराष्ट्राचे स्वतंत्र राष्ट्र व्हावे या आशयाचा प्रदीर्घ लेख लिहिला होता. स्वातंत्र्याच्या उर्मी वर्तमान राष्ट्रभावनेवर मात करत स्वतंत्र राष्ट्राची स्वपोने पाहतात आणि जगात हे नवीन नाही. भारत आज भावनिक दृष्टीने तरी एक राष्ट्र म्हणून उभे आहे काय या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी येते. राष्ट्रीय प्रश्न म्हणून आपण ज्याबद्दल बोलत असतो ते बव्हंशी प्रादेशिक प्रश्नच असतात. देशाचा नकाशा आमच्या डोळ्यासमोर असतो पण आमचे किती प्रदेशांशी भावनिक नाळ जुळलेली आहे हा प्रश्न विचारला तर पंचाईत होऊन जाईल. इतिहासाचेही तसेच आहे. प्रत्येक प्रदेशातील लोक आपापल्या प्रादेशिक इतिहासांनाच महत्व देतात व अगदी शेजारच्या प्रदेशांचा इतिहास दुर्लक्षित करतात वा तोंडी लावण्यापुरता घेतात हे आपल्या लक्षात येईल.  किंबहुना प्रादेशिक मानसिकता या तेथील भू-पर्यावरण वैशिष्ट्यांनी बनलेल्या असल्याने असे घडणे स्वाभाविक आहे असेही म्हणता येईल. मग जेंव्हा आपण भारताची संकल्पना विचारात घेतो तेंव्हा आपल्याला नेमके काय अभिप्रेत असते? त्याच वेळेस अखंड हिंदुस्तानचे नारे लावणारे भारतीय समाजात जो एक दुभंग माजवत असतात त्याचे स्थान काय उरते?

खरे तर भारत हे राष्ट्र समान संस्कृती, समान इतिहास, समान भाषा, समान वंश, समान धर्म इत्यादी पायांवर उभे नाही तर ते घटनेने एकत्र बांधलेले राजकीय राष्ट्र-राज्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने फार विचारपूर्वक भारतीय संघराज्याची स्थापना केलेली आहे. राज्यांना प्रसंगी विशेषाधिकार बहाल करण्याचीही त्यात तरतूद आहे. घटनेमुळे एरवी जी राज्ये कोणत्याही तत्वावर भारतात राहू शकली नसती तीही काही कुरबुरी करत का होईना, आज भारतात आहेत. राज्य आणि केंद्र यातील संबंध कसे असतील याचीही मार्गदर्शक तत्वे त्यात आहेत. सशक्त केंद्राच्या अखत्यारीतील कसलेही अधिकार नसलेली राज्ये असे त्याचे स्वरूप नाही. त्यामुळे भारत एक राष्ट्र म्हणून उभे आहे हे विसरता येत नाही. पण अलीकडे केंद्राला सबळ करत नेत राज्यांना हळूहळू कमजोर करत नेण्याचे कृत्य संघप्रणीत भाजप करत आहे. याचे भविष्यातील परिणाम भारताच्या “राष्ट्र” या संकल्पनेलाच हादरा पोचवतील अशी लक्षणे दिसत आहेत. याचे मूळ दीनदयाळ उपाध्यायांच्या विवेचनात आहे. “धारणा धर्माने होते व धर्म सर्वप्रभुतासंपन्न आहे एवतेव घटनाही धर्मधारणेवर हवी व अन्य सर्व संस्था, सत्ता त्यापासून शक्ती ग्रहण करतील.” असे ते एकात्म मानवमध्ये म्हणतात. ते पुढे म्हणतात कि   भारतीय संविधान संघात्मक नको तर ते एकात्मक पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांचे काही कारण नाही कारण त्यामुळे प्रादेशिक अस्मिता निर्माण होतात. थोडक्यात संघाला भारताने स्वीकारलेली “स्वत:प्रत अर्पण केलेली” घटना मान्य नाही. त्यांना राज्यांचेच स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. संघाला धर्मावर आधारित असलेली धर्मतत्वे प्रधान असलेली घटना हवी आहे. पण यातही गोंधळ असा आहे कि वैदिक धर्मतत्वे कि हिंदू या लोकधर्मातील विविध पंथांनी वेळोवेळी बदल करत मानलेली वेगवेगळी धर्मतत्वे? अर्थात संघाला वैदिक धर्मातील एकचालकानुवर्ती, पुरुषसत्ता प्रधान असलेली व राजेशाहीच्या निकट जाणारी तत्वे निश्चित करणारी घटना हवी आहे हे आजवरच्या संघ आणि भाजपाच्या वाटचालीवरून दिसतेच आहे. पण यामुळे भारत आहे तो तरी अखंड राहील काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.

मुळात राज्यघटना म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. घटना म्हणजे त्या देशांतील नागरिकांनी आपले एकमेकांशी कसे संबंध राहतील याबाबत केलेला एक सामाजिक करार आहे आणि तो लोकांच्या वतीने प्रतिनिधी स्वाक्षरी करुन अंमलात आणत असतात. हा करार जनतेच्या वतीने व सहमतीने केला जात असल्यामुळे त्याला लोकशाहीत्मक अर्थ असतो. हुकुमशाही राष्ट्रांच्याही घटना असतात पण त्यांना "सामाजिक करार" म्हणता येत नाही कारण त्यात समाजाच्या मान्यतेचे काही स्थानच नसते. भारताने २६ जानेवारी १९५० रोजी घटना स्विकारली आणि भारत सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या दिवशी भारताने घटना स्विकारुन आधीच्या सरंजामशाहीवादी समाजव्यवस्थेला तिलांजली दिली. भारतीय राज्यघटना हा आपला पहिला सामाजिक करार होय. घटनेने संसदीय लोकशाही आणि संघराज्याचा ढाचा टिकवण्यात पायाभुत कार्य केले. भारतीय लोकांना ख-या अर्थाने समता या तत्वाच्या आधारावर समान पातळीवर आणले. घटनेच्या समाजवादी रचनेमुळे वंचित-दुर्लक्षित समाजघटकांच्या उत्थानाची सोय झाली. इहवादी (सेक्युलर) तत्वामुळे लोकांना धर्म असू शकेल पण सरकार मात्र कोणत्याही धर्माचे नसेल याची ग्वाही मिळाली. घटनेमुळे भारत ख-या अर्थाने आधुनिक बनला असे आपल्याला सहज म्हणता येते. त्यामुळे स्वातंत्र्याच्या उर्मी असलेल्या लोकांना अथवा प्रदेशांनाही आपल्यालाही अधिकार आहेत आणि आपलेही ऐकले जाईल याची ग्वाही मिळाली. भारत एकात्म राहण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे पायाभूत योगदान आहेत आणि त्यासाठी घटनाकारांचे भारताने ऋणी राहिले पाहिजे.

धर्मराज्य वर्तमान युगात यशस्वी होऊ शकत नाही. मग धर्म कोणताही असो. आजचा काळ हा वैश्विकीकरणाचा आहे. लोकशाहीचा आहे. इहवादाचा आहे, धर्मवादाचा नाही. राज्याने फक्त इहवादी प्रगतीकडे लक्ष ठेवावे व केवळ तशीच धोरणे राबवावीत हे यात अनुस्युत आहे. धर्म ही बाब व्यक्तीच्या अखत्यारीतील आहे. दुस-यांना त्रास अथवा उपद्रव होणार नाही या बेताने व्यक्तीने कोणताही धर्म/परंपरा पाळायला राज्याची हरकत नाही. कोणताही धर्म मानायचा नसेल तर तसेही करायला मोकळीक आहे. व्यक्ती स्वातंत्र्य ही जागतिक समुदायाने मानवतेचे महनीय मूल्य म्हणून स्विकारलेली ही बाब आहे. धर्मराज्यात या बाबी येत नाहीत. धर्मराज्य हेच मुळात व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि म्हणुनच विकासाचा संकोच करणारी बाब ठरते. ईसिस, तालिबान जगात तिरस्करणीय झालेत कारण ते धर्मराज्य आणु इच्छितात व त्यासाठी क्रौर्याची पातळी ओलांडतात यासाठी. तिरस्काराच्या आणि हिंसेच्या पायावर कोणाचीही प्रगती होत नाही हा जागतिक इतिहास आहे. मानवी स्वातंत्र्याचे अपहरण म्हणजे राष्ट्राच्या आत्म्याचेच अपहरण हे आम्हा भारतियांना समजून घ्यायला हवे व आज आहे त्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य आमच्या नागरिकांना कसे मिळेल यासाठी प्रयत्नरत रहायला हवे. भारतीय नागरिक म्हणून परंपरांचे मिथ्या ओझे झुगारत मानवी जगातील एक आदर्श बनत शाश्वत ऐहिक व बौद्धिक प्रगती साधत एक नवी वैश्विक संस्कृती बनवत जगाला आदर्शभूत व अनुकरणीय असा हा देश व्हावा असेच सर्वांना वाटायला हवे. धर्म, धर्मराज्य व धर्माचे प्रादेशिकीकरण भारताला मुळीच हितकारक नाही हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

पितृभू, पुण्यभू यासारख्या भावनिक सद्न्या कोणतेही राष्ट्र कधीही उभारू शकलेल्या नाहीत. गतकाळातील महान परंपरा कोणाला काय वाटाव्यात याचे स्वातंत्र्य सर्वाना घटनेनेच दिलेले आहे पण त्या संकल्पना सर्वांवर लादने मात्र घटनेला मान्य नाही. काय खावे काय प्यावे, वस्त्रप्रावरणे काय असावीत हे ठरवण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहे. पण अलीकडे त्यावरही “संस्कृती रक्षणाच्या” नावाखाली बंधने आणली जात आहेत हे घटनात्मक व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारी अघटनात्मक बाब आहे हे भारतीय नागरिक म्हणून लक्षात घेतले गेले पाहिजे. एखाद्या राज्याचे विशेषाधिकार तेथे केवळ एखादा धर्म प्रबळ आहे म्हणून हेतुत: काढून घेणे हे घटनेच्याच विरोधात जाणारे कृत्य आहे. आपला देश मुळात घटनेमुळे एकाकार राहिलेला आहे हे विसरून चालणार नाही. अन्यथा भारत एक राष्ट्र म्हणून अन्य कोणत्याही व्याख्येनुसार उभे राहिले नसते. त्याचे विखंडन होणे नियत होते. त्यामुळे घटना बदलू, राज्ये नकोत, धर्मराज्य हवे इत्यादी संघी वल्गना आपल्या राष्ट्राचा घटनात्मक साचा उध्वस्त करून टाकतील. पूर्वी भारत जसा सीमा बदलत्या आपापसात संघर्षरत स्वतंत्र राज्यांनी व्यापला होता तशीच स्थिती पुन्हा आपल्यावर येईल. तसे व्हायला नको असेल तर आपल्या राष्ट्राला व त्यातील सर्व लोकांना एकत्र ठेवणा-या घटनेचा मुलगाभा आम्हाला जपावा लागेल. भ्रमित करणा-या कोणत्याही सिद्धांतापासून दूर रहावे लागेल.

-संजय सोनवणी 

(Published in Sarvankash, Oct.-Nov-Dec. 2022 special issue)

Monday, February 20, 2023

असूरवेद

 " #असूरवेद "

❤️🌿✨


















वेद म्हणजे काय तर, वेद म्हणजे ज्ञानाच भंडार !
-----------------------------------*-----------------------------------
पुस्तकाचं नुसतं शीर्षक पाहून पुस्तकाच्या शैलीबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ शकतो. साहजिकच आहे ते.
तुम्हाला जर विचारलं की, एकूण वेद किती आहेत ? तर तुम्हा सगळ्यांचं हमखास उत्तर ४ हेच असणार. हो ना ! कारण आपण सगळेच जण आत्तापर्यंत आर्यांच्या सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद हेच ४ वेद बद्दल ऐकत आणि वाचत आलो आहोत.
कधी कोणाच्या मनात हा प्रश्न उपस्थित नाही झाला का, की खरंच वेद हे फक्त ४ च आहेत का किंवा ४ च होते का ?
तर एकुण वेद हे ४ नसून, ८ होते !
उर्वरित अनार्यांची ४ वेद म्हणजेच सर्पवेद, गंधर्ववेद, असूरवेद, पिशाच्चवेद ही होय. अनार्यांची ही ४ वेद आर्यांच्या ४ वेदांच्याही आधीची आहेत असं मानलं जातं. परंतु त्या काळात आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये झालेल्या युद्धांमुळे ही उर्वरित अनार्यांची ४ वेद विस्मृतीत गेले, की कालौघात ते नष्ट करण्यात आले, की दडपण्यात आले याचं उत्तर तुम्हाला या पुस्तकात समजेल.
ही उर्वरित अनार्यांची ४ वेद खरंच अस्तित्वात होती का, आणि हे ४ वेद खरचं नष्ट झाली की मुद्दाम नष्ट करण्यात आली ? आणि जर नष्ट केलं असेल तर कोणी, का आणि कशासाठी नष्ट केली असावी ?
-----------------------------------*-----------------------------------
पैशाच्ची भाषेत लिहिलेलं एक महत्त्वाचं हस्तलिखित औरंगाबाद येथील सुरेश जोशी नावाच्या एका प्रसिध्द इतिहास संशोधकाच्या हाती लागतं. काही अंशी त्यांना त्यामागचं ज्ञान ही अवगत होतंच. त्यांना संपूर्ण जगाला या महत्त्वाच्या शोधाबद्दल सांगायचे ही असते परंतु, ही माहिती त्यांच्याकडून जगासमोर येण्याआधीच धार्मिक संघटनांकडून त्यांची हत्या होते. त्यांच्या मृत्यूसोबत ते महत्त्वाचं हस्तलिखित ही गायब होऊन जातं. यादरम्यान त्यांची मुलगी सायली जोशी ही वैष्णविझमच्या phd च्या अभ्यासासाठी त्याच्या संशोधनासाठी पंढरपूरला आलेली असते. तिथेच तिची ओळख बौद्धिक धर्माच्या गौतम कांबळे नामक संशोधकासोबत होते. या कथेत पंढरपूर बद्दल अनेक विचार मांडले आहेत, जे वाचुन मलाच खूप नवल वाटतं होतं कारण काही गोष्टी खरंच खूप धक्कादायक आहेत. ज्याबद्दल आपल्याला आत्तापर्यंत फारसं काही माहितीच नव्हतं.
दरम्यान पोलिसांचा तपास सुरू होतो. तपासादरम्यान सुरेश जोशींवर मूर्ती तस्कराचा आरोप केला जातो, कारण त्यांच्या घरातून असूर वरून नावाची एक मूर्ती गायब झालेली असते आणि मूर्ती तस्करामुळेच त्यांचा खून केला गेला असावा असा निकष काढला जातो. वडिलांवर केल्या गेलेल्या या सर्व आरोपांना त्यांची मुलगी सायली जोशी धुडकावून लावते. सायली आणि गौतम या दोघांनाही धार्मिक संघटनांकडून धोका असतो. परंतु कशालाही न जुमानता ती गौतमच्या मदतीने वडिलांच्या मृत्यूचा आणि त्या हस्तलिखित चा तपास सुरू ठेवते.
दरम्यान अनेक घटना घडतात. सुरेश जोशींचा एक मुलगा परदेशी अमेरिकेत रहात असतो. वडीलांच्या मृत्यूबाबत समजल्यानंतर तो भारतात येण्यासाठी निघतो. या प्रवासामध्येच त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला होतो. दुसरा मुलगा भरतातच असतो, पण तो ही हृदयविकाराच्या झटक्याने क्रिटिकल होतो व रुग्णालयातच दाखल असतो. सायली जेव्हा पंढरपूर मध्ये असते तेव्हा तिचा आणि गौतम चा जो संवाद होतो त्यातून अनेक प्रश्न आपल्या डोक्यात घर करून राहतात. जसे, पंढरपूरला पंढरपूर हे नावं विठ्ठला मुळे मिळालेलं असतं की पुंडलिक मुळे ? पुंडलिक नेमका कोण होता ? पुंडलिक च्या समाधी मध्ये शिवलिंग का म्हणून आहे ? सूर असुर म्हणजे नक्की काय ? कैक प्रश्न आहेत..
-----------------------------------*-----------------------------------
हे सर्व वाचून तुमच्या मनात नक्कीच असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. असं जरी असलं तरी मला कथेचं अजिबात स्पाॅयलर देयचं नाहिये. तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कादंबरीतच वाचून मिळतील. तसेच हे पुस्तक तुम्हाला सखोल विचार करण्यास ही नक्कीच भाग पाडेल. जसं की, पुरातत्त्व विद्या बद्दल तसेच आपल्या ग्रंथाचं मुल स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा तुमच्यात तयार होईल. या उर्वरित अनार्यांच्या ४ वेदांप्रमाणेच आणखीन कितीतरी ग्रंथ त्या काळी अस्तित्वात असतील ज्यांचा नाश केला गेला असेल. तो का, कोणी आणि कशासाठी केला असेल ?
काही जणांना हे पुस्तक ब्राह्मणविरोधी किंवा तथाकथित हिंदुत्ववादी पुस्तक वाटू शकतं. पण असं अजिबात नाहिये. लेखकाने हि कादंबरी लिहिण्यासाठी अनेक खऱ्या, अस्तित्वात असलेल्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. आपल्या सर्वांना नक्कीच इतिहास माहीत असतो पण त्याबद्दल संपूर्णपणे सखोल माहीत नसते. आपल्याला जेवढं पण काही माहीत असतं ते कमी जास्त प्रमाणात किंवा तुकड्यांच्या स्वरूपात माहीत असतं.
आपल्या इतिहासाला आणखीन एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तकं जरुर वाचावं.
-----------------------------------*-----------------------------------
-डॉ.अक्षया पवार.👩‍⚕️✍️

Saturday, February 18, 2023

मराठी भाषा अभिजातच!


 

 


 

मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे असे मानण्याचा प्रघात असल्यानेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकलेला नाही. पण वास्तव काय आहे हे तपासून पहायला हवे.

 

महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे म्हणजे सातवाहन. सातवाहनांचा काळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे. सातवाहनांनी सनपूर्व २३० ते इसवी सनाच्या २३० असे ४६० वर्ष राज्य केले. एवढा प्रदिर्घ काळ राज्य केले एवढ्यापुरतेच या राजवंशाचे महत्व नाही तर धार्मिक, सामाजिक आणि साहित्यसंस्कृतीच्या क्षेत्रातही या घराण्याचे प्रत्यक्ष योगदान आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

सातवाहन हे प्राकृत भाषेचे आश्रयदाते होते व त्यांनी राजस्त्रीयांनाही प्राकृतातच बोलण्याचा नियम घातला होता असे वा. वि. मिराशी म्हणतात. याचाच अर्थ अन्य कोणतीतरी (संस्कृत वा अन्य) भाषा अस्तित्वात असल्याचा ते अस्पष्ट संकेत देतात परंतु त्यासाठी प्रमाण मात्र देत नाहीत. कथासरित्सागरातील सातवाहन राजाच्या एका पत्नीला संस्कृत येत होते व तिने चिडवल्यामुळे सातवाहन राजा संस्कृत शिकला अशी एक कथा गुणाढ्याच्या संदर्भात येते. पण कथासरित्सागरातीक्ल हा कथापीठ लंबक मुळचा गुणाढ्याचा नाही. तो उतरकाळात (नवव्या शतकानंतर) गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा का रचली याचे स्पष्टिकरण देण्यासाठी बनवली हे उघड आहे. सातवाहन साम्राज्यात सन २०० च्या आसपास एकच मिश्र-संस्कृत (हायब्रीड) शिलालेख मिळतो आणि तोही सातवाहन राणी व शक नृपती रुद्रदामनची कन्या हिचा आहे.  रुद्रदामननेच गिरनार येथे कोरवलेला सन १६५ मधील  संस्कृत शिलालेख सोडला तर तत्पूर्वीच्या काळात देशभरातील सर्व शिलालेख व नाण्यांवरील मजकूर प्राकृत भाषेतच लिहिलेले आहेत. अगदी वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा म्हणून ओळखला जाणारा पुष्यमित्र श्रुंग व त्याच्या वंशजाचेही शिलालेख प्राकृतातच आहेत.

 

शिवाय मिराशी आपल्या "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात म्हणतात कि "सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." एका बलाढ्य राजघराण्याच्या नाण्यांवरील मजकूर आणि शिलालेख ते तत्कालिन साहित्य प्राकृतातच असावे हे संस्कृतविदांना खटकणारे होते. वा. वि. मिराशी इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना, एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." जी भाषा अस्तित्वातच नाही ती प्रचारात कशी असेल? त्या भाषेत लेख कसे असू शकतील?

 

इस्पुचे पहिले ते दुसरे शतक या काळात प्राकृत भाषेतून हळूहळू शब्द संस्कारित होतांना दिसत असली तरी गाभा प्राकृतचाच आहे. सातवाहनकालीन शिलालेखांत हा प्रवास टिपता येतो. म्हणजेच संस्कृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकात विकसीत होऊ पाहत होती...ती अस्तित्वात नव्हती.

 

सातवाहन काळात उत्तर भारताप्रमाणे फक्त सामान्यांचीच नव्हे तर राजभाषाही प्राकृत होती. सातवाहनांच्या चारशे साठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्व नाण्यांवरील मजकुर प्राकृत भाषेतील आहे. सर्व शिलालेख प्राकृत भाषेतील आहेत. पण या प्राकृत भाषेत क्रमशा: झालेली परिवर्तनेही आपल्याला दिसुन येतात. याला आपण भाषिक उत्क्रांती म्हणतो. आणि एवढ्या प्रदिर्घ काळात ती तशी होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही जीवंत भाषेचा तो एक महत्वाचा निकष असतो.

वररुचीने माहाराष्ट्री प्राकृताचे "प्राकृत प्रकाश" हे व्याकरण लिहिले. प्रत्यक्षात आपल्याला वररुचीचे मूळ व्याकरण उपलब्ध नसून भामहाने केलेला त्या व्याकरणाची सहाव्या शतकातील संस्कृत अनुवाद/टीका उपलब्ध आहे. माहाराष्ट्री प्राकृत हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शौरसेनी, मागधी ई. प्राकृत भाषांचे व्याकरण देतांना "शेष माहाराष्ट्रीवत" असे वररुची म्हणतो. प्रत्यक्षात प्राकृत शब्द हा मुळचा "पाअड" (प्रकट) या शब्दाचे संस्कृतीकरण आहे. त्यामुळे आपण सोयीसाठी "प्राकृत" हा शब्द वापरत असलो तरी तो ‘पाअड’ भाषानिदर्शक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

माहाराष्ट्री प्राकृत अथवा पाअड श्रेष्ठ का मानली जात होती? कवि दंडी तिला "प्रकृष्टं प्राकृत" म्हणजे उत्कृष्ठ प्राकृत म्हणतो. काव्यरचना माहाराष्ट्री प्राक्रुतातच करावी असा आग्रह धरला जात असे. (साहित्यदर्पण) याचे उत्तर सातवाहनांच्या प्रदिर्घ स्थिर सत्ताकाळामुळे त्या भाषेत मौलिक ग्रंथरचना होत राहिली या वास्तवात आहे. स्थिर शासनाच्या अंमलाखाली कला-संस्कृती बहरत असते आणि सातवाहनांमुळे महाराष्ट्रात नेमके तेच झाले.

 

प्राकृत भाषेचा व्याकरणकार वररुची नेमका कधी झाला याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. हालाची "गाथा सतसइ" वररुचीचे नियम कटाक्षाने पाळते. व्यंजनांचे द्वित्व व त्यांचा लोप हे वररुचीच्या माहाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणातील महत्वाचा नियम होय. गाथा सप्तशतीतील रचना हा नियम पाळतात. हाल हा सातवाहन वंशातील अठरावा राजा होय. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या पुर्वी सहाव्या (किंवा पाचव्या) पिढीत होऊन गेला अशी मान्यता आहे. गौतमीपूत्र सातकर्णी इसवी सनाचा पहिल्या शतकात होऊन गेला. सरासरी इसवी सनाच्या साठ साली त्याचे राज्यारोहन झाले असा तर्क आहे. तो काही वर्ष मागे-पुढे होऊ शकतो हे गृहित धरले तरी हाल सातवाहन इसपु च्या पहिल्या शतकातील उत्तरार्धात झाला असे अनुमान करता येते. म्हणजे इसपूच्या पहिल्या शतकात हालाने गाथा संग्रह सुरु केला हे आपल्याला निश्चयाने म्हणता येते. वररुचीचे व्याकरण या काळात कवि-साहित्यकारांत प्रचलित झाले होते हे वररुचीच्या व्याकरणाचे नियम गाथा सत्तसई व अन्य ग्रंथ पाळतात त्यावरुन सिद्ध होते. कोणतेही व्याकरण प्रचलित व्हायला तत्कालीन प्रचार-प्रसारावरील मर्यादा लक्षात घेता किमान शंभरेक वर्ष लागु शकतात. म्हणजेच प्राकृत प्रकाशकार वररुची हा इसवी सनापुर्वीचा दुस-या शतकातील किंवा तत्पुर्वीचा असावा असा तर्क बांधता येतो. इतिहासात अनेक वररुची नांवाच्या व्यक्ति झाल्या आहेत, पण पाअड भाषांचे व्याकरण रचणारा वररुची ही स्वतंत्र व्यक्ति होय.

 

असे असले तरी शिलालेखीय प्राकृतात मात्र वररुचीच्या व्याकरणाचा द्विस्तर व्यंजन लोप या नियमाचा वापर केला गेलेला नाही. शिलालेखीय गद्य भाषा आणि ग्रांथिक काव्य-भाषा यांतील भेदामुळे गद्यात व्याकरणीय नियम कटाक्षाने पाळले न जाणे स्वाभाविक आहे.

 

तत्कालीन प्राकृतात येणारे बहुतेक शब्द उच्चारबदल होत का होईना आजही वापरात आहेत. संस्कृत भाषेत सर्वच प्राकृत शब्द संस्कारित न केले गेल्याने अशा शब्दांना देशीम्हणण्याचा प्रघात असला तरी संस्कृतमधील सर्वच शब्द मुळचे प्राकृतच आहेत. व्याकरण मात्र अत्यंत तर्कनिष्ठ आणि अर्थबदल न होऊ देणारे असल्याने ग्रंथांसाठीच ही भाषा विकसित केली गेली हे स्पष्ट आहे. ती बोलीभाषा किंवा मातृभाषा कधीही नव्हती असे भाषातद्न्य माधव देशपांडेही स्पष्ट करतात. आणि प्राकृतमधून संस्कृतचा विकास कोण्याएका मानवी समुहाने केला नसून त्या विकासात बौद्ध, जैन आणि तांत्रिक विद्वानांनीही मोठा हातभार लावला हे सनपूर्व २०० पासून मिळणा-या बुद्धिष्ट आणि जैन ग्रंथातील भाषिक उत्क्रांतीमुळे स्पष्ट होते.

 

आजची मराठी ही माहाराष्ट्री प्राकृतातूनच विकसित होत आलेली आहे. ती संस्कृतोद्भव असण्याचा प्रश्नच येत नाही कारण संस्कृत भाषेचा ती आधी अस्तित्वात होती हे दाखवणारा एकही पुरावा नाही. तरीही मराठी भाषेचे मातृत्व अज्ञानाने फार नंतर जन्माला आलेल्या संस्कृतला दिले जाते आणि मराठी भाषेचे अभिजातत्व नाकारले जाते हे खरेच दुर्दैव होय!

 -संजय सोनवणी

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...