Wednesday, August 12, 2026

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

 जैनांचे मराठी भाषेतील योगदान

संजय सोनवणी

चिनार पब्लिशर्स

 लेखकाचे मनोगत

      “जैनांचे मराठी भाषेतील योगदानहे पुस्तक लिहितांना मी प्राचीन काळच्या मराठीपासून ते आधुनिक काळातील मराठीमध्ये जैनांनी लिहिलेल्या अफाट साहित्याचे परिशीलन करताना त्यात गुंगून गेलो होतो. जैनेतरांनी जेवढे मराठी भाषेला योगदान दिले नाही तेवढे जैनांनी दिले ही ऐतिहासिक बाब या संशोधनात सामोरी आली. गेल्या दोन हजार वर्षातील या भाषेच्या विकासाचे जे महत्वाचे तीन टप्पे गणले जातात या तीनही टप्प्यात जैन साहित्यिकांनी आपल्या कल्पनाशक्तीने आणि भाषाप्रभुत्वाने जे योगदान दिले ते तर विस्मित करणारे आहे. आद्य रामकथा महाकाव्यस्वरूपात सर्वात आधी मराठीत लिहिली गेली आणि तीही विमलसुरि या जैन आचार्याकडून हे ऐतिहासिक सत्य मला हे पुस्तक लिहित असताना लक्षात आले. मी त्यावर इंग्रजीत शोधप्रबंधही लिहिला असून तो जागतिक विद्वानांसमोर चर्चेसाठी ठेवलेला आहे व त्याला मान्यताही मिळू लागलेली आहे ही समाधानाची बाब.

      कोणतीही भाषा आकाशातून पडत नाही तर ती भाषा बोलली जाते तेथील भूभागाचे संदर्भ त्या भाषेला अपरिहार्यरित्या असतात. सातवाहन सम्राटांनी जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांचे साम्राज्य गुजरात, मध्य प्रदेश, आजचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकाच्या ब-याच मोठ्या भूभागावर पसरले होते. मराठी ही त्यांची राजभाषा असल्याने आणि या भाषेत मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती होऊ लागल्याने या भाषेचे प्रभावक्षेत्र महाराष्ट्राबाहेरही विस्तारले आणि अमराठी व्यक्तीही मराठी शिकून त्यात लेखन करू लागल्या. जैनांना सातवाहन राजांनी राजाश्रय दिल्यामुळे महाराष्ट्रात जैन धर्म वाढत गेला. तसा महाराष्ट्रात जैन धर्म आला तो चंद्रगुप्त मौर्याच्या काळात. जैन सम्राट संप्रति मौर्यामुळे महाराष्ट्रात इसपू तिस-या शतकातच या धर्माची भक्कम पायाभरणी झालेली होती. नंतर सातवाहन, राष्ट्रकुट आणि यादव सम्राटांच्या काळात हा महाराष्ट्रातील एक प्रमुख धर्म बनला हे ऐतिहासिक तथ्य आहे व त्याच्या पुरातत्वीय व शिलालेखीय खाणाखुणा सर्वत्र विखुरल्या आहेत.

      जैनांनी आपले धर्मशास्त्र प्राचीन ते अर्वाचीन मराठीत तर लिहिलेच पण त्यासोबतच अद्वितीय अशा जागतिक दर्जाच्या साहित्यकृती रचल्या आणि मराठी भाषा समृद्ध करण्यात योगदान दिले. ‘पउमचरिय हे विमलसुरि लिखित रामावरचे आद्य महाकाव्य सातवाहन काळात लिहिले गेले. पादलिप्ताचार्याने तंरंगवईसारखी उद्दात्त प्रेमकथाही हाल सातवाहनाच्या काळात लिहिली. पादलिप्त हा हालाचा दरबारी कवी होता आणि त्याच्या अनेक नितांतसुंदर गाथा हाल सातवाहनाने संपादित केलेल्या गाहा सतसइ या अनमोल काव्यग्रंथात समाविष्ट आहेत. हा साहित्याचा ओघ पुढेही वाहतच राहिला.

      आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न होताहेत. जैनांनी लिहिलेल्या श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यकृती पाहिल्या तर मराठी अभिजात आहे याची कोणालाही खात्री पटेल. तथापि आजच्या मराठी अभ्यासकांनी या साहित्याकडे दुर्लक्षच केले आहे असे दुर्दैवाने दिसून येईल. मराठी वाचकांना त्यांच्या भाषेचे श्रेष्ठत्व कोठे आहे हे विचारले तर निश्चितच जैनांनी लिहिलेल्या अपार संख्येच्या जैन साहित्याकडे वळावे लागेल. यात महाकाव्ये आहेत, कथाख्याने आहेत, अद्भुतरम्य कथा, लोककथा, प्रेमकथा, सूडकथा, शोधकथा, प्रवासवर्णने आहेत. थोडक्यात साहित्याचे सर्व प्रकार जैनांनी हाताळले आहेत. इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून ते आजपर्यंत हा साहित्यप्रवाह वाहतच आलेला आहे.

      मराठी भाषेबद्दल प्रचंड आस्था आणि सक्रीय कार्य करणारे सरहदचे संजय नहार यांनी मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केले. घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते प्रेरणास्त्रोत होते. असेच साहित्य संमेलन दिल्ली येथे व्हावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मराठी आणि जैनांचा काय संबंध असा कुत्सित प्रश्न विचारणा-यांना जैनांचे प्राचीन काळा पासून मराठीला असलेले अनमोल योगदान माहित नसते हे त्यांचे अज्ञान आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर तो या कलात्मक उंचीच्या साहित्यामुळे हे विसरता कामा नये.

      मी संजय नहार यांचा, त्यांच्या सरहद या गेली साडे-तीन दशके राष्ट्रकार्य करणा-या संस्थेचा व चिनार पब्लिशर्स या प्रकाशन संस्थेचा आभारी आहे. शिक्षणतज्ञ शैलेश पगारिया, प्रख्यात चित्रपट निर्माते निलेश नवलखा, आम्हा सर्वांचे सुहृद मित्र इंद्रकुमार छाजेड आणि अन्य सहका-यांचेही मी मन:पूर्वक आभार मानतो.

      धन्यवाद,

      संजय सोनवणी

      १९.०४.२०२४


 

 

प्रकरण १

प्राक्कथन

 

      मराठी भाषेची उत्पत्ती या महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणा-या भागात मनुष्य जात येथे स्थिरावली तेंव्हापासूनच सुरु झाली. महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूरचना, भूगर्भीय ताण-तणाव, खनिज वितरण यामुळे महाराष्ट्रात राहना-या लोकांची विशिष्ट सामुहिक मानसिकता बनत गेली. भाषा हे एकुणातील समाजमानसिकतेचे प्रकटन असते. शब्द-संपत्ती, व्याकरण, ध्वनिशास्त्र कोणत्या व कशा प्रकारे घडणार हे बव्हंशी या भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. किंबहुना संस्कृतीच या भूशास्त्रीय घटकांमुळे बनलेल्या सामुहिक मानसिकतेचे प्रकटन असते. महाराष्ट्रातही विभागांनुसार मराठी भाषा व शब्दसंपत्ती वेगवेगळी रूपे धारण करतांना दिसते हे त्यामुळेच. किंबहुना जगभरातील सर्व भाषा व संस्कृती त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्राने घडवलेल्या मानसिकतेचे प्रकट रूप आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. (भाषांचा उगम ले. संजय सोनवणी, प्राजक्त प्रकाशन.) त्यामुळे कोणतीही भाषा किती प्राचीन याचा विचार करायचा असल्यास तेथे मनुष्य कधीपासून रहिवास करू लागला या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.

      जगात आज भाषेच्या उत्पत्तीबाबत अनेक सिद्धांत आहेत. इंडो-युरोपियन म्हणवल्या जाणा-या भाषागट सिद्धांताचा सध्या मोठा प्रभाव आहे. या सिद्धांतानुसार पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे कधीतरी मध्य आशियात एकत्र राहत होते व काही कारणांनी ते आशिया ते युरोपमध्ये विस्थापित झाले आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली आजच्या आधुनिक इंडो-युरोपियन भाषांचा जन्म झाला. या सिद्धांतामुळे प्रादेशिक भाषांची या गटांमध्ये विभागणी केली गेली आणि अर्थातच स्थानिक भाषांना दुय्यम स्थान दिले गेले. परंतु भाषिक मानसिकता कशी निर्माण होते आणि तिचा भाषेवर काय प्रभाव पडतो याचा किंचितही विचार या सिद्धांतात केला गेला नाही. त्यामुळे अनेक भाषाशास्त्रीय गोधळ निर्माण झालेले आहेत. मी माझ्या भाषांचा उगमया पुस्तकात यावर सविस्तर चर्चा केलेली असल्याने प्रस्तुत पुस्तकाच्या विषयाकडे वळतो.

      मराठी भाषेचा जन्म किमान ८० हजार वर्ष इतका मागे जाऊ शकतो कारण तेव्हा येथे स्थिर झालेल्या मानवी अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे मिळालेले आहेत. अर्थात त्यावेळेस मराठी भाषा अत्यंत प्राथमिक स्वरूपाची, गरजेपुरत्या शब्दसंग्रहाची व व्याकरणाची आवश्यकता नसलेली असणार हे उघड आहे. पण मानवी गरजा या स्वत:च्या भौगोलिक पर्यावरणातून पूर्ण कराव्या लागत असल्याने स्वाभाविकच शब्दनिर्मितीही त्याच गरजापुर्तीच्या आदिम भावनांतून होणे स्वाभाविक आहे. अर्थात आपल्याकडे तेव्हाच्या जगभराच्या भाषास्वरूपाचे व शब्दांचे कसलेही पुरावे नाहीत, पण तर्काने हे अनुमानु शकतो. मानवी टोळ्यांचा परस्पर संवाद, संघर्ष यातून भाषिक देवान-घेवाण होणेही तेवढेच स्वाभाविक असते आणि ती तशी झालेलीही आहे. अगदी नवे शोध, ज्ञान, पुराकथा यांचीही देवान-घेवाण झालेली आहे. परंतु मनुष्य काही घेतांना आपल्या भौगोलिक मानासिकतेप्रमाणे उच्चारपद्धती, अर्थबदल आणि अर्थविस्तार करतच बाहेरचे काही स्वीकारतो. त्यामुळे काही भाषांमधील शब्द समान असले तरी त्यांचा अभिप्रेत अर्थ नेमका कसा बदलतो हे मानवी भौगोलिक पर्यावरणावर अवलंबून आहे. मराठी भाषाही कालौघात विकसित होत राहिली. मराठी माणूस पशुपालक-शिकारी अवस्थेतून बाहेर पडला आणि शेतीचा शोध लागल्याने स्थिर झाला. भाषिक उत्क्रांतीच्या विस्फोटाचां हा दुसरा टप्पा होय. या टप्प्यात भाषेत अनेक नवे शब्द बनवावे लागले, शब्दसंग्रह वाढल्याने प्राथमिक व्याकरणही मुलभूत प्रेरणांनी आकाराला आले. लिपीचा शोध लागला तसे ते लिहिलेही गेले असेल पण लेखनासाठी लाकडे फळ्या ते झाडांची पाने वापरल्यामुळे ती काही पिढ्यांच्या वर जतन झाली नाहीत. होऊही शकत नाहीत. त्यामुळे पुराव्याचा अभाव हे पुरावा नसण्याचे कारण ठरू शकत नाही. अर्थात जेव्हा अन्य सर्व भाषा लिखित स्वरूपात पुरावे ठेवू लागतात तेव्हा एखाद्याच भाषेचे मात्र लिखित पुरावे मिळत नसतील तर ती भाषा अस्तित्वात नसण्याचीच शक्यता अधिक आहे. संस्कृत भाषेच्या अस्तित्वाचा इसवी सनाच्या दुस-या शतकाआधीचा एकही लिखित पुरावा मिळत नाही आणि तरीही ती भाषा अतिप्राचीन आहे असे कोणत्या आधारावर सांगितले गेले आणि आम्ही ते मान्य केले हा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

      भाषांचा उदय

        आज जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक) भाषा आहेत. अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची उपजत गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईडने नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही. भाषा ही मुलभूत गरज आहे पण ती माणसातच का, अन्य प्राण्यांत का नाही हा प्रतिप्रश्न आजवर अनेकांनी उपस्थित केला आहे. हा प्रतिप्रश्न अज्ञानातून आलेला आहे. प्राण्यांना, पक्षांना अथवा जलचरांचे कोणती भाषाच नसते असे मानणे अज्ञतेचे लक्षण आहे. भले प्राण्यांच्या भाषा गरजेपुरत्याच विकसित झाल्या असतील, पण अगदी प्राथमिक भाषा असलीच पाहिजे कारण कारण सर्व जीव अभिव्यक्त होत असतात. श्राव्य ध्वनी वा अश्राव्य ध्वनीलहरीनिर्मिती, गंधनिर्मिती याद्वारे संदेशवहन अथवा अभिव्यक्ती केली जाते. अभिव्यक्त होणे ही फक्त मानवाची गरज आहे हा समज खरा नाही. प्राणी-पक्षांची भाषा माणसाला समजत नाही ही माणसाची मर्यादा आहे. त्याला जीवसृष्टीतील मनुष्येतर जीवसृष्टीच्या मेंदूची व स्वरयंत्राची अविकसित संरचनाही जबाबदार आहे. पण ती मर्यादा अन्य प्राणीजगताने ध्वनीच्या वारंवारीता बदलून इष्ट संदेश संवादित करण्याचे कौशल्य प्राप्तही केलेले असू शकेल. भाषेची उपजत (innate) गरज फक्त मनुष्यप्राण्यात आहे असे मानणे गैर आहे. मानवी भाषा वैशिष्ट्यपूर्ण असून स्थानिक भूगर्भशास्त्र, मृदेतील खनिज वितरण व पर्यावरण यांवर अवलंबून असतात. प्रदेशनिहाय भूगर्भशास्त्रीय विशिष्टतेनुसार बदलत्या दिसतात. मानवी स्थलांतर किंवा आक्रमणे यामुळे प्रादेशिक भाषा मुळ स्वरूप हरपू शकत नाहीत. त्यामुळे कोणतीही भाषा अमुक एका भाषेतून निर्माण झाली असे दावे अशास्त्रीय आहेत. भाषेची निर्मिती हीच मुळात अभिव्यक्ती करण्याच्या उपजत गरजेमुळे निर्माण झाली. भाषांच्या उदयाचा इतिहास मानव प्रजातीच्या उदयाइतकाच पुरातन आहे. प्रादेशिक भूवैशिष्ट्यांच्या वाविध्यातून अनेक प्रकारच्या भाषा उदयाला आल्या आहेत.

      भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अॅडम व इव्हने केले व नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टॉवर ऑफ बाबेल येथे नौकेतुन उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.-) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) भाषा एकाच ठिकाणी जन्मली आणि मग अन्यत्र वेगवेगळ्या रुपात पसरली या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे. विज्ञानावरही धर्मशास्त्रीय मिथके कशी पगडा टाकत असतात याचे हे एक उदाहरण आहे.

      भाषेच्या निर्मितीबाबत जगातील सर्वच खंडांत आणि भाषात काही ना काही पुराकथा आहेतच, त्यावरुन माणसाला स्वत:लाच आपल्यातील भाषाकौशल्याबद्दल अनावर कुतुहल असून ती दैवी देणगीच असल्याचा ठाम विश्वास दिसून येतो. अन्य प्राणीजगताला मनुष्य हा स्वाभाविक अहंकारी वृत्तीतून दुय्यमच मानत आला असल्याने तो त्यांच्याही अभिव्यक्तीच्या उपजत प्रेरणांकडे दुर्लक्ष करत आला आहे. असे असले तरी त्यांनाही भाषा असते याची जाणीव माणसाला नव्हतीच असेही म्हणता येणार नाही. अनेक पुराकथा दैवी कृपा झालेल्या मनुष्याला पशु-पक्षांची भाषा समजत असल्याच्या कथा आलेल्या आहेत. हा कल्पनाशक्तीचा आविष्कार असला तरी अन्य सृष्टीलाही भाषा असू शकते ही जाणीव माणसाला नव्हतीच असे दिसत नाही. पण मानवाने सैद्धांतिक विचार केला आहे तो केवळ मानवी भाषा उत्पत्तीचा. आधुनिक काळातही भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. यातील क्रमविकासवादी सिद्धांत असो कि क्रमखंडवादी सिद्धांत, हे दोन्ही सिद्धांत सर्वमान्यतेच्या कसोटीवर टिकलेले नाहीत. नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने गृहीत धरले होते. अनेकाही उपसिद्धांत भाषानिर्मितीसाठी निर्माण झाले. किंबहुना भाषा हेच भाषिक युद्धांचे कारण झाले कि काय असे वाटावी अशी स्थिती आहे. मुळात भाषेच्या उत्पत्तीचे कारण अन्यत्रही पाहिले पाहिजे याचे भान भाषाविदांना येणे आवश्यक आहे. बहुशाखीय संशोधनपद्धतीचा फारसा वापर न केल्याने असे झाले असावे. पण भाषा व भूगर्भशास्त्र आणि माणसाची जैवरासायनिक संरचना विविध भाषा निर्मितीशी निकटचा संबंध आहे हे मात्र लक्षात घेतले गेलेले नाही. भाषा वर्चस्वतावादासाठी वापरण्याचा प्रयत्न मात्र अशास्त्रीय आणि निषेधार्ह आहे हे निश्चित!

      संस्कृत भाषा मुळची समजून भाषातज्ञानी जे विवेचन केले आहे तेच मुळात अशास्त्रीय आहे. वा. वि. मिराशी आपल्या सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप या ग्रंथात म्हणतात कि, “सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती.... आर्य लोक भारतात आले तेंव्हा त्यांची भाषा वैदिक पद्धतीची संस्कृत होती यात संशय नाही. पण तिच्यातील क्रियापदांचे दहा प्रकार, तीन भुतकाळ, दोन भविष्यकाळ, नाम-सर्वनामांची विविध प्रकारची विभक्ति-प्रत्ययांत रुपे इत्यादि बारकावे त्यांच्याशी व्यवहारात संबंध आलेल्या आर्येतरांना पेलने शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातील संस्कृत भाषेत परिवर्तन होऊन प्राकृत भाषा अस्तित्वात आल्या. आर्यांनाही त्यांच्याशी व्यवहारात त्यांचा उपयोग करावा लागला." हे विधान अशास्त्रीय अशासाठी आहे कि वैदिक लोक भारतात येण्याआधी भारतीयांची कोणतीही प्रादेशिक भाषा नव्हती असा हास्यास्पद दावा या विधानातून केला जातो. आणि हेच मिराशी याच ग्रंथात  इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना, एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." एवढेच नाही तर वैदिक धर्माभिमानी म्हणून गाजवल्या गेलेल्या श्रुंग राजांनीही कधी संस्कृत भाषेचा वापर केला नाही. ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा शृंगांच्या दरबारी इसपू ११० मद्धे होता. त्याचा शॄंगांची तत्कालीन राजधानी विदिशेजवळ एक गरुडस्तंभ आहे. त्याने तो पांचरात्र संप्रदायातील तत्कालीन पूज्य देवता वासुदेवाला अर्पण करण्यासाठी उभारला. या स्तंभावर त्याने एक लेख कोरवला असून तो सर्वस्वी प्राकृतात आहे. एक परकीय राजदूत लेख कोरवून घेतांना प्राकृत भाषा वापरत होता ही संस्कृत भाषेची सर्वस्वी अनुपस्थिती दर्शवते.

      असे असूनही संस्कृत भाषा प्राचीन आहे या भाषिक वर्चस्वतावादी भूमिकेतून विद्वानांनी भाषाप्रश्नाची सरळ उत्तरे जाणीवपूर्वक गुंतागुंतीची करून टाकली असल्याचे आपल्याला दिसून येईल.

      ज्या भाषेला आपण उशिरा निर्माण झालेल्या संस्कृतच्या प्रभावात माहाराष्ट्री प्राकृतअसा शब्दप्रयोग वापरतो तो प्रत्यक्षात मरहठ्ठी पाईअअथवा महारठी पाअडआणि प्रागतिक मराठीत आठव्या शतकात ध्वनीबदल झालेला मरहठ्ठ पाइयअसा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख या भाषेतील प्राचीन लेखकांनी करून ठेवलेले आहेत. पाइय म्हणजे पायाखालची, म्हणजेच भूमीची भाषा होय तर पाअड म्हणजे प्रकट. मुळ शब्दांचे कृत्रिम संस्कृतकरण करण्याच्या नादात मूळ शब्द हरपून बसतात हे मात्र लक्षात घेतले जात नाही. या प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या पुस्तकात मी फारच प्रचलित झाला असल्याने माहाराष्ट्री प्राकृत अशीच शब्दयोजना केली असली तरी तेथे सर्वांनी मरहठ्ठ पाइयअसेच वाचावे अशी माझी नम्र विनंती आहे.

शास्त्रीय संशोधन

      माहाराष्ट्री प्राकृताबाबत अनेक देशी-विदेशी भाषाशास्त्रज्ञानी मोलाचे कार्य करून ठेवले आहे. वूल्नर, जे. ब्लॉख इत्यादी विद्वानानी प्राकृत (आणि त्यातही मराठी) साठी मोलाचे काम केले आहे,  पण मला येथे आवर्जून विशेष उल्लेख करायचा आहे तो पाइअ- सद्द- महनणओ” (प्राकृत शब्द महार्णव) हा शब्दकोश मोठ्या विद्वत्तेने आणि कष्टाने सिद्ध केलेला ग्रंथ. हे कार्य करणारे विद्वान भाषातज्ञ म्हणजे पंडीत हरगोविंददास त्रिकमचंद सेठ. हा शब्दकोश तयार करण्यासाठी त्यांनी देशभरात प्रवास करून प्रकाशीत व अप्रसिद्ध हस्तलिखित ग्रंथातून शब्द निवडत त्यांचे अर्थ हिंदी व संस्कृतमध्ये दिले. यामुळे प्राकृत साहित्य अभ्यासकांची फार मोठी सोय झाली. हा शब्दकोश  १९२६ साली कलकत्त्याहून प्रकाशित झाला. पुढे या शब्दकोशाच्या आवृत्त्या मोतीलाल बनारसीदास या दिल्ली येथील प्रकाशन संस्थेने प्रकाशित केल्या.

       या शब्दकोशाला त्यांनी प्राकृत भाषांविषयक जी अभ्यासपूर्ण ६४ पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे ती आजही प्रत्येक अभ्यासकाला मोलाचे मार्गदर्शन करणारी आहे. त्यांच्या काळात आर्य भाषा गट सिद्धांत जागतिक पातळीवर प्रबळ असतानाही त्यांनी संस्कृतपासून प्राकृत भाषा निर्माण झाल्याचा मान्य सिद्धांत सेठ यांनी अभ्यासपूर्वक फेटाळून लावला. वेदकाळाच्याही पूर्वीपासून, म्हणजे इसपू २००० पासून, देशातील सर्वच प्राकृत भाषा (म्हणजे माहाराष्ट्री, शूरसेनी, मागधी, अर्धमागधी, गांधारी, पैशाची इ.) ध्वनी-व्यंजनातील नवे बदल स्वीकारत स्वतंत्र रित्या वाढत होत्या हा त्यांचा निष्कर्ष भाषाशास्त्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. प्राकृत भाषांचे तीनही स्तर हे स्वतंत्र रीत्या विकसित झालेले असून त्यांच्याशी संस्कृतचा कोणताही संबंध नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. वैदिक संस्कृतही तत्कालीन बोलल्या जाणा-या प्राकृतातूनच विकसित झाले आणि नंतरची संस्कृत भाषाही प्राकृतोद्भ्वव आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. (पृष्ठ ५७) थोडक्यात प्राकृतातूनच प्राकृत विकसित होत राहिली आणि आजच्या स्थितीला आली असा त्यांच्या विवेचनाचा मतितार्थ. प्रस्तुत पुस्तकात मी त्यांच्या ग्रंथातील अनेक उद्घ्रुते दिलेली आहेत, त्यावरूनही त्यांच्या महान पांडित्याचा परिचय होईल.

 

मरहठ्ठ देश: संस्कृती संगमाची भूमी

 

      भारतीय उपखंडात महारठ्ठ तथा मरहठ्ठ देशाचे (महाराष्ट्राचे) स्थान मध्यवर्ती असल्याने उत्तर भारत व दक्षिण भारत यांच्यामधील तो एक सांस्कृतिक पूलही बनला. महाराष्ट्राच्या दैवत कल्पना, पुराकथा या सर्वस्वी स्वतंत्र आहेत. विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, तुळजाई इ. आणि गावोगावीच्या ग्रामदेवता ही अस्सल मराठी दैवते महाराष्ट्राच्या लोकधर्माचे आविष्कार होत. पण त्यांच्यावर दहाव्या शतकानंतर उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे त्यांचे मूळ स्वरूप मराठी माणसाच्या स्मरणातून गेले. असे असले तरी याच देवता महाराष्ट्रीय संस्कृतीचे आजही अविभाज्य भाग आहेत. त्यांना त्यांचे मूळ स्वरूपही प्राप्त करून देणे हे मराठी माणसापुढचे एक आव्हान आहे.

            संघटीत धर्म ही कल्पना इसपू सहाव्या शतकाच्या आसपास भारतात निर्माण झाली आणि तीही उत्तर भारतात. त्याला कारण झाले भारतात झालेले वैदिक धर्माचे स्थलांतर. त्याआधी भारतात लोकधर्म आणि वैचारिक व अध्यात्मिक क्रांती करणा-या समण संस्कृतीचे सर्वत्र अस्तित्व होते. सर्वांचा उद्देश सर्वांचे समान भावनेने हित करणे हाच असल्याने ते आपापले तत्वज्ञान बनवत, लोकांना सांगत, पण त्यामागे धर्मस्थापनेची प्रेरणा असण्याचे काही कारणही नव्हते. “माझेच खरेहे सांगण्याचा हेकाही कोणी धरलेला नव्हता. त्यामुळे संघटीत धर्माची आवश्यकताही नव्हती. पण वैदिक धर्म आणि त्यांचे वेगळेच यज्ञप्रधान कर्मकांड यामुळे जैनांचे चोविसावे तीर्थंकर महावीर, मंस्खली गोशाल आणि गौतम बुद्ध यांनी त्यांच्या विचारपरंपरेला सुसंघटीत रूप द्यायला सुरुवात केली. एक प्राचीन समण परंपरा तीन धर्मात विभागली गेली. गोशालाने स्थापित केलेला आजीवक धर्म पुढे टिकू शकला नाही. बौद्ध धर्म जरी टिकून राहिला असला तरी आठव्या शतकापर्यंत बुद्धाला जिनअसेच संबोधले जात होते असे डॉ. नेमीचंद्र शास्त्री आपल्या हरिभद्र के प्राकृत कथा-साहित्य का आलोचनात्मक परिशीलनया ग्रंथात म्हणतात. बाराव्या शतकात कल्हणद्वारा रचित राजतरंगिणी या ग्रंथातही अशीच विशेषण-योजना केलेली आहे. स्वत:वर विजय मिळवणे हे जिनविचाराचे मुख्य तत्व असल्याने हे संबोधन स्वीकारण्यास कोणाची अडचण नव्हती. या विचाराचे प्रवर्तक व प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ सनपूर्व २७०० मध्ये झाले. त्यामुळे समण तत्वधारेचे पर्यायी नाव जैन झाले असल्यास आश्चर्य नाही.

      चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यकाळात उत्तर भारतात द्वादश वर्षीय मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळेस जैन आचार्य व सम्राट चंद्रगुप्ताचे गुरु आचार्य भद्रबाहू आपल्या अनुयायांसहित (आणि अनेक इतिहासकारांच्या मते सम्राट चंद्रगुप्तासहित) दक्षिणेस जायला निघाले. अर्थात हा त्यांचा प्रवास महाराष्ट्र मार्गे झाला. अनेक जैन साधू आणि श्रावक महाराष्ट्रात थांबले. संप्रति मौर्याने भारतभरात जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात पसारा केला त्यात महाराष्ट्रही होता. सातवाहन काळातील पाले (मावळ) आणि लोहगडवाडी येथील इसपूच्या पहिल्या शतकातील जैन लेणी व शिलालेख आपल्याला मिळतात. महाराष्ट्राला एकसंघ साम्राज्याच्या कक्षेत आणणारे सातवाहन घराणे त्यावेळेस जुन्नर व नंतर पैठण येथून राज्य करत होते. त्यांनी जैन व बौद्ध धर्मियांना उदार आश्रय दिला. माहाराष्ट्री प्राकृतला (म्हणजे आजच्या मराठीची पूर्वज, मरहठ्ठ पाइय) त्यांच्या काळात साहित्यिक भाषा म्हणून देशव्यापी स्थान मिळाले. जैन आचार्यांनी मराठीच्या वैभवात अपार भर घातली. पादलिप्ताचार्यासारखे तरंगवइहे कथाकाव्य लिहिणारे महाकवी हाल सातवाहनाच्या काळात झाले. इसवी सन ४ मध्ये (बहुदा हाल सातवाहन राज्य करत असण्याच्या काळातच) “पउमचरियहे रामावरील आद्य महाकाव्य माहाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिले गेले.   अंगविज्जासारख्या गद्य ग्रंथातून तत्कालीन समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब आपल्यासमोर उभे राहते. आजची जातीव्यवस्था,वैदिकांची वर्णव्यवस्था ते दैनंदिन जीवनाचे रूप त्यातून उभे तर राहतेच पण कुवलयमालाकहासारख्या उद्योतन सुरीने आठव्या शतकात लिहिलेल्या ग्रंथातुनही आठशे वर्षात महाराष्ट्र व देशात कोणती परिवर्तने झाली याचा तुलनात्मक अभ्यास करायला ती महत्वाची साधने ठरतात. जैनानी सातत्याने मराठीच्या वैभवात मोलाची भर टाकली, हे त्यांचे एक महाराष्ट्रावरील ऋण आहे हे कसलीही संदिग्धता न ठेवता मान्य करावे लागते कारण तेवढे अफाट साहित्यकार्य त्यांनी केलेले आहे.

      माहाराष्ट्री प्राकृत ही तीत असलेल्या साहित्यामुळे सर्व प्राकृतांत अत्यंत महत्वाची भाषा बनलेली आहे. हिचे शिलालेखीय व नाणकीय पुरावे इसपू तिस-या शतकापासुन मिळून येतात. स्वत: कवी असलेल्या हाल सातवाहनाने गाथा सप्तशती हा इसपु पहिल्या शतकात संकलित केलेला मुक्तकसंग्रह हा जागतिक वाड्मयातील एक मोलाचा ठेवा आहे. यातही जैन आचार्य पालित्त (पादलिप्ताचार्य) यांनी अनेक गाथा लिहून या काव्यसंग्रहाच्या प्रतिष्ठेत भर घातलेली आहे. मराठीच्या श्रेष्ठत्वाबाबत काव्यादर्शमध्ये दंडीही म्हणतो,

 

      "महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदु

      सागर सुक्तिरत्नाना सेतुबंधादि यन्मयम"

 

      माहाराष्ट्री प्राकृत ही गीतांसाठी उत्कृष्ठ भाषा मानली गेली असल्याने संस्कृत नाटकांतील पद्यही माहाराष्ट्री प्राकृतातच असावे हा संकेत नाटककारांनी पाळलेला आढळून येतो. माहाराष्ट्री प्राकृताचे उत्कृष्ठ नमुने सातवाहनांच्या असंख्य शिलालेखांतही  आलेले आहेत. आजच्या मराठीशी नाळ जोडणारे अगणित शब्दप्रयोग गाथा सप्तशती (गाहा सतसई), अंगविज्जा, वसुदेव हिंडीसारखा अमोलिक कथाग्रंथ व आद्य प्रवासवर्णन आणि अनेक ग्रंथ व शिलालेखांत आले आहेत. इसपु तिस-या शतकात लिहिलेल्या वररुचीच्या पाअड लख्खन सुत्तया प्राकृत व्याकरण ग्रंथात माहाराष्ट्रीचेच व्याकरण प्रामुख्याने आलेले आहे. आज या व्याकरणावर भामहाने केलेली टीकाच काय ती उपलब्ध आहे. मुळ व्याकरण ग्रंथ आज अप्राप्य आहे. जणांच्या मराठी साहित्यावर किंचित अर्धमागधीची छाप  आहे, त्यामुळे मराठी भाषा प्राचीन काळापासूनच अन्य भाषांबद्दल कशी स्वागतशील होती याचे दर्शन होते.

      संस्कृत भाषेबद्दल उद्योतनसुरि म्हणतो, “संस्कृत भाषा अनेक पद, समास, निपात, उपसर्ग, विभक्ति, लिंग, परिकल्पना, कुविकल्प, इत्यादी बाबीमुळे दुर्गम दुर्जनाएवढीच विषमतेने ग्रसित आहे. (कुवलयमाला ७१.) यावारुन संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही पाइय मरहठ्ठीमध्ये या महाकवीने एवढे महत्वाचे काव्य का लिहिले याचा उलगडा होईल. संस्कृतमधुन मराठी निघाली असती तर या दोन्ही भाषेत एवढे भाषिक वैधर्म्य आले नसते हेही लक्षात घ्यायला हवे. संस्कृत आणि मराठीचा संबंध काही शब्दाच्या उसनवारीपुरताच मर्यादित आहे तर मराठीतून (आणि अन्य प्राकृत भाषांतून) अनेक शब्द ध्वनिसंस्कार करून संस्कृतने कृत्रिमरीत्या तयार केलेले आहेत आणि आपण अज्ञानापोटी त्यांनाच मुळचे शब्द समजत असतो.

        वुल्नर म्हणतात की संस्कृतमधून प्राकृत भाषांचा उगम झालेला नाही. संस्कृत म्हणवल्या जाणा-या नाटकांचे मुळ प्राकृत आहे हे त्यातील प्राकृत संवादांच्या विपुलतेवरुन लक्षात येते. पुराणे आणि महाकाव्यांची मुळेही प्राकृतात आहेत असे ते पार्गिटरचा हवाला देऊन म्हणतात. बृहत्कथा पैशाची प्राकृतात लिहिली गेली होती हे इतिहासाने नोंदवले आहे. हर्टेलने चर्चा केल्याप्रमाणे पंचतंत्र मुळात प्राकृतातच लिहिले गेले होते. नंतर या साहित्याचा अनुवाद संस्कृतात झाला. जयदेवाचे गीतगोविंदही मुळात प्राकृतात होते. महाभारत आणि पुराणांनी वापरलेले छंद आणि व्याकरणही हे साहित्य प्राकृतमधुन अनुवादित केले गेले आहे असेच निर्देशित करतात. संस्कृतमध्ये अवतीर्ण होण्यापुर्वी महाकाव्यादि साहित्य हे प्राकृत भाषांमध्ये लोकप्रिय असले पाहिजेत. एखादे काव्य जेवढे जुने तेवढेच ते मुळात पुराप्राकृतात असण्याचीच शक्यता अधिक आहे. पुराप्राकृताचे संस्कृतकरण करुन ही पुराणे-महाकाव्ये लिहिली गेल्याने काव्य-संस्कृतही एक वेगळीच भाषा तयार झाली.”    मुळ प्राकृत ग्रंथांचे हे सारे अनुवाद झालेत ते संस्कृत विकसित होऊ लागल्यानंतर. ही मुळ प्राकृत काव्येच प्राचीन असून ती नंतर आर्ष भाषेत आणि काही पाणिनीचे व्याकरण आल्यानंतर अभिजात संस्कृतमध्ये अनुवादित झाली हे वास्तव आहे. वर उल्लेखित विद्वानांसोबतच हर्टेलसारख्या विद्वानांनीही या जनप्रिय साहित्याचे मुळ प्राकृतात आहे असे स्पष्ट करुनही पुढे संस्कृत आधी आणि प्राकृत नंतर हा अशास्त्रीय प्रवाद प्रचलित झाला. त्यामुळे विद्वानांनी ही काव्ये मुळात संस्कृतमध्येच होती हे मत रेटायला सुरुवात केली आणि हा समज आजतागायत कायम राहिला. त्यासाठी भाषांची कालरेखाही कृत्रीमपणे बदलली.

      पण वास्तव हे आहे की जी भाषाच अस्तित्वात नाही त्यात कोणतीही रचना होऊच कशी शकेल या मुलभुत प्रश्नाकडे मात्र कोणी वळाले नाही. वेदांवर आणि सर्वच पुराण/नाट्यादि महाकाव्यांवर प्राकृतचे ऋण आहे.

      प्राचीन काळात जन्माला आलेल्या माहाराष्ट्री प्राकृताचा सकस प्रवाह आजच्या मराठीपर्यंत वाहत आला आहे. त्याचे प्रत्यक्ष पुरावे इसपू तिस-या शतकापासून उपलब्ध आहेत. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेजया पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. तीवर अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य प्राकृत भाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती आजच्या मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.

      जगातील निसर्गत: निर्माण झालेल्या सर्व भाषांना प्रादेशिक अथवा जमातीय संदर्भ आहेत. उदा. मराठी, गुजराती, बंगाली ते फ्रेंच, इंग्लिश, जर्मन इ. संस्कृत ही अशी भाषा आहे जिला कसलेही भौगोलिक अथवा जमातीय संदर्भ नाहीत. याचे कारण म्हणजे ही भाषा इसवीसनपूर्व पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात क्रमश: ग्रांथिक व धार्मिक कारणासाठी कृत्रिमरीत्या तयारकेली जात होती. तिस-या शतकात झालेल्या पाणिनीने या भाषेचे व्याकरण लिहिले. संस्कृत ही उशीराची निर्मिती आहे व तिच्यापासून मराठीच काय जगातील कोणतीही भाषा तयार झालेली नाही हे आता भाषातज्ञ मान्य करतात. उलट प्राकृत व द्राविड भाषांतल्या निवडक शब्दांवरच ध्वनीसंस्कार करून ही भाषा तयार करण्यात आली. ही भाषा कोणाचीही कधीही मातृभाषा नव्हती असे डॉ. माधव देशपांडे आपल्या संस्कृत आणि प्राकृत भाषा: व्यवहार, नियमन, आणि शास्त्रचर्चा” (शुभदा-सारस्वत प्रकाशन, १९९५या  ग्रंथात म्हणतात. तसेच सर्व प्राकृत भाषा कालौघात बदल स्वीकारत बदलत आलेल्या आहेत पण संस्कृत कृत्रिम भाषा असल्याने व ती कोणाचीही बोली भाषा नसल्याने असे परिवर्त्तन या भाषेत झालेले दिसून येत नाही. त्यामुळे मराठी किंवा अन्य कोणतीही भाषा संस्कृतोद्भव आहे या मताला काहीही अर्थ नाही, पण अभिनिवेशी प्रचारामुळे आजही लोक या भ्रमजालात आहेत हे दुर्दैव आहे.

      मराठी ही स्वतंत्ररीत्या विकसित झालेली भाषा आहे. मराठी एके काळी ज्ञानभाषाही होती. आताही ती पुन्हा ज्ञानभाषा बनवण्याची आवश्यकता आहे. सर्व क्षेत्रातील मराठी माणसे विविधांगी लिहू लागतील तर असे होणे अशक्य नाही. जैनांनी मराठीच नव्हे तर शौरसेनी आणि अर्धमागधी साहित्यात भर तर घातलीच पण संस्कृत भाषेलाही मोलाचे योगदान दिले आहे. जैन हा एके काळी राष्ट्रव्यापी व बहुसंख्येचा धर्म होता. आजही त्यांची संख्या घटलेली असली तरी त्यांचे अस्तित्व देशव्यापी आहे. त्यांचे अर्थव्यवस्थेला जेवढे मोठे योगदान आहे तेवढेच प्राकृत व द्रविड भाषांनाही आहे. जैन तत्वज्ञानाने जैनेतर लोकांवरही फार मोठा प्रभाव टाकलेला आहे.

 

राजाश्रय आणि लोकाश्रय: ऐतिहासिक आढावा

     

      राजकीय दृष्ट्या स्थिर आणि सहिष्णू व्यवस्था असली तर आर्थिक उन्नती तर होतेच पण मानवी प्रतिभेलाही सर्वांगीण भर येतो. सातवाहन हे महाराष्ट्राचा ज्ञात पहिले घराणे. इसपू २२० ते इसवी सन २३० या साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी सत्ता गाजवली. देश-विदेशचा व्यापार वाढवला. महाराष्ट्रातील किल्ले व लेणीनिर्मिती याच काळात सुरु झाली. महाराष्ट्रात त्यांनी आधीच स्थायिक झालेल्या जैनांना आणि नंतर प्रवेशलेल्या बौद्धांना उदार राजाश्रय दिला. पण बौद्धांनी साहित्य निर्मितीत अथवा महाराष्ट्री प्राकृतात काही लेखन केलेले दिसत नाही. जैनांनी मात्र माहाराष्ट्री भाषेचा अंगीकार तर केलाच पण अपार साहित्यसंपदाही निर्माण केली. सातवाहन काळातच आद्य रामकथेवरील महाकाव्य लिहिले जावे हा योगायोग नाहीशाहदा येथील प्राचीन जैन गुंफा. २२००-२३०० वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्याची निर्मिती जैन आचार्य भद्रबाहुंच्या प्रभावात झाली असावी. मग जैन समुदाय तेथून सरकत सरकत ते सांगली-कोल्हापूर या भागातून  श्रवणबेळगोळला जावून थांबला आणि काही लोक अजुन दक्षिणेकडे गेले.       म्हणजे दक्षिणेकडे जातांना जैन धर्म पहिल्यांदा आला तो महाराष्ट्रात. सम्राट सम्प्रतीने या धर्माला येथे उत्तेजन दिले सातवाहन काळातील राजांनीही  जैनांना राजाश्रय दिला. त्यामुळे लोकाश्रयही मिळणे सुलभ गेले. हा अहिंसाप्रिय समाज मराठी जीवनात मिसळून गेला. पाले व लोहगडवाडीजवळ जैन गुंफात शिलालेखही सापडले आहेत. हे शिलालेख सापडले म्हणून त्या जैन गुंफा आहेत हे सिध्द झाले, नाहीतर तेही झालं नसते. असे शिलालेख   नसलेल्या जैन गुंफा किती असतील याचा आपण अंदाजही बांधू शकत नाही. लोहगड व पालेचा इ..पूर्व दुसर्‍या शतकातला शिलालेख अरिहंतांना नमस्कार करून, म्हणजे “‘णमो अरिहंताणं’” अशी सुरूवात करून लिहिलेला आहे, त्यामुळे या शिलालेखाविषयी कोणाच्या मनात शंका येण्याच कारणच नाही. सातवाहनांचा पाठींबा होता आणि येथे आलेले जैन पुरते मराठी बनलेले होते म्हणून हे घडू शकले. पैठण हे या काळात जैन आचार्यांचे महत्वाचे केंद्र बनले.  पैठणला बाराव्या शतकातपैठण प्रशस्तीनावाचं एका जैनांनीच लिहिलेला ग्रंथ आहे, त्यात सातवाहनांनी पैठण आणि आसपासच्या परिसरात जैनांसाठी मठ कसे निर्माण केले याचे सविस्तर वर्णन करून ठेवले आहे.

      नंतर येतो तो राष्ट्रकुट काळ. अनेक राष्ट्रकुट राजे स्वत: जैनधर्मीय होते. सांगली, कोल्हापूर, जिंतूर (मुळचे नाव जिनपूर), ते खानदेश हा या काळात जैन प्रभावात आला. जैन समाजधर्मही बनला. यवतमाळ जिल्ह्यात वाई नावाचे गाव आहे. या वाईला शेतात अक्षरश: विखुरलेली, भग्न झालेली उध्वस्थ अवस्थेतील अनेक जैन मंदिरे सापडलेली आहेत, तिथेही एक शिलालेख सापडला. तो शिलालेख राष्ट्रकूटांच्या काळातला आहे. राष्ट्रकूटांचा जो महामात्य होता भरत. त्याने कोरवलेल्या लेखात स्वाभाविकपणे भारताच नाव भारत का पडलेयाचा उल्लेख मिळतो. ऋषभनाथपुत्र चक्रवर्ती भरतामुळे या देशाचे नाव भारत पडले. हा लेखही माहाराष्ट्री प्राकृतात असून महाकवी पुष्पदंताच्या लेखनशैलीचा त्यावर मोठा प्रभाव आहे.  तसाच उल्लेख हाथीगुंफा येथील इ..पूर्व दुसर्‍या शतकातल्या जैन सम्राट खारवेलचा एक शिलालेख आहे  त्यातही भारताचे नाव चक्रवर्ती भरतावरून पडलेले आहेअशी नोंद आहे. देशनाम भारताची नोंद  असलेला हा पहिला शिलालेख. जैनांचे शिलालेख एकुणातच केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या इतिहासावरही मोठा प्रकाश टाकतात. राष्ट्रकुट काळात किमान चाळीस टक्के समाज जैन धर्मी बनला होता असे प्रबल अंदाज वर्तवले जातात व जैनांची प्रभावक्षेत्रे अवशेषांतून पाहून ते खरे असू शकण्याची ग्वाही मिळते.

      चालुक्य काळ हा तसा धामधुमीचा काळ होता. यानंतरचा उल्लेखनीय काळ हा यादवकाळ होय. देवगिरी ही यादवांची राजधानी. या वंशाचे अनेक राजे जैन धर्मीय अथवा त्या धर्माचे समर्थक-सहायक होते. या राजवंशाचा संस्थापक दृढप्रहार हा जैन होता असे बाराव्या शतकातील आचार्य जिनप्रभसुरि यांनी आपल्या नासिक्यकल्पया ग्रंथात नमूद केलेले आहे. सेउण चंद्र , सेउण चंद्र द्वितीय,  भिल्लम (प्रथम), भिल्लम (पंचम), जैत्रपाल, कृष्ण, रामचंद्र, महादेव हे यादव राजे जैन धर्माचे अनुयायी होते. आजच्या मराठीला प्रगत आकार आला तो यादव काळात. कोरोनाच्या काळामध्ये २०२० साली औरंगाबादजवळ असलेल्या देवगिरी किल्ल्यावर साफसफाई करताना झाडा-झुडुपांखाली अदृष्य झालेल्या सात गुंफा सापडल्या. त्यातील एक गुंफा पावसाने किंवा नैसर्गिक-प्राकृतिक कारणाने कोसळलेली आहे. परंतु त्या गुंफा या जैन गुंफा आहेत हे त्यात असलेल्या जैन तीर्थंकरांच्या मूर्तीमुळे सिध्द झाले त्याबाबतची बातमी फक्त एकादिव्य मराठीया वृत्तपत्रात आली होतीअसे असले तरीही यादव काळातच या गुंफा खोदल्या गेल्या हेही सिद्ध झाले. देवगिरी किल्ल्यावर एके काळी ७० जैन मंदिरे होती असा अंदाज काही इतिहासकारांनी वर्तवलेला आहे. खुद्द देवगिरीच्या पायथ्याशी अनेक जैन मंदिरांचे अवशेषही मिळालेत. यादव काळातही जैन साहित्य निर्मिती थांबली नाही. यादव राजवटही किमान साडेतीनशे वर्ष टिकली. याचाच अर्थ राजसत्ता स्थिर असली तर कला-कौशल्य, साहित्य आणि उद्योग-व्यापाराला बहर येतो.  

      कोकणातील शिलाहार राजवटीत जैन धर्म व्यापकरीत्या विस्तारला. अनेक अवशेष त्याचे साक्षीदार आहेत. पण कोंकणातील जैन धर्मावर फारसा अभ्यास झालेला नाही किंवा कोकणातील कोणा जैन वा जैनेतर साहित्यकृतीची अद्याप नोंद झालेली नाही. त्यावरही शोध घेत राहणे आवश्यक आहे असे मला वाटते. प्रसिद्ध पत्रकार आणि संशोधक संतोष शेणई यांनी कोकणातील जैन अवशेष सामोरे आणून अनेक लेख लिहून जनजागरण करण्याबाबतीत उल्लेखनीय कार्य केले आहे याचीही आपण आवर्जून नोंद घेतली पाहिजे.

      यादवांच्या अस्तानंतर अस्थिर राजकीय स्थितीने महाराष्ट्राच्या मनोभूमिकेत व्यापक उलथा-पालथ झाली. जैन धर्माचा संकोच सुरु झाला. त्यानंतर एकोणीसाव्या शतकापर्यंत मराठीत जैन तर सोडाच पण अन्य साहित्यही अभावानेच दिसते. त्यानंतर ब्रिटीश प्रभावात ललित साहित्य लिहिले जाऊ लागले. त्यात जैनही मागे राहिले नाहीत. नवीन जैन विद्वान आपापल्या आकलनानुसार इतिहास व कुवतीनुसार साहित्य लिहित राहिले. इतिहास लेखनात अनेक महान विद्वान महाराष्ट्रात उदयाला आले. महात्मा गांधींचे

वैचारिक गुरु श्रीमद राजचंद्र गांधी आणि शिकांगोच्या पहिल्या धर्मसंसदेत जैन व भारतीय धर्मांची बाजू मांडणारे विरचंद गांधी त्यातीलच अत्यंत महत्वाचे विद्वान व कृतीशील विचारवंत. हे मुळचे मराठी नव्हते, पण महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी व विचारभूमी बनला, त्याला किमान दोन हजार वर्षाची प्रगल्भ विचारपरंपरा होती हे महत्वाचे आहे.

आज आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. आपल्या देशाच्या सर्व वैचारिक, साहित्यिक, आध्यात्मिक परंपरा कसलाही अभिनिवेश अथवा द्वेष न बाळगता आपण समजावून घेतल्या पाहिजेत. जैनांचे मराठी भाषेतील योगदान खूप मोठे आहे याची जाण आणि भान सर्वांना असले पाहिजे तसेच त्याचे सर्वांगीण नव्याने अध्ययन व विश्लेशन झाले पाहिजे.

·          

संदर्भ-

. पाइअ सद्द महनणवो,(Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-Hindi Dictionary), पंडीत हरगोविंद सेठ, (पहिली आवृत्ती-१९२८) नवीन आवृत्त्यांचे प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, पुनर्मुद्रण १९८६.

. Introduction to Prakrit by Alfred C. Woolner, University of the Punjab, Lahore, 1917, पृ. , ७८-७९.

 


 

 

प्रकरण २

 

जैनांनी लिहिलेले माहाराष्ट्री प्राकृतातील साहित्य

 

      जैनांनी शौरसेनी अर्धमागधीप्रमाणेच जैनांनी माहाराष्ट्री भाषेत मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती करुन त्यात मोलाची भर घातलेली आहे हे खालील साहित्याच्या माहितीवरुनच लक्षात येईल. प्राकृत साहित्य संस्कृतमध्ये नंतर अनुवादित केले गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. जैनांनी परंपरेने आपल्या साहित्याबाबतची माहिती जिवंत तरी ठेवली परंतु अन्य अवैदिक लेखकांच्या कृती जरी आज संस्कृतमध्ये आणल्या गेल्या असल्या तरी मूळ प्राकृत ग्रंथ अप्राप्य आहेत. संस्कृत अनुवादकांनी मुळच्या लेखकांची नावे इतिहासातून गायब तरी केली आहेत अथवा त्यांचा इतिहास बदललेला आहे. रामायण-महाभारतही मुळात प्राकृतातच लिहिले गेले होते असे विंटरनित्झसारखे विद्वान म्हणतात. या संस्कृत लेखकांच्या साहित्यिक अपप्रवृत्तीमुळे मुळच्या साहित्यात नेमके काय होते हे मात्र आज समजायला मार्ग नाही. असे असले तरी उपलब्ध असलेल्या साहित्याचा परीघ विशाल आहे हे केवळ यादी पाहूनच आपल्या लक्षात येईल. जैनांनी दिलेले मराठीचे योगदान एवढे मोठे आहे कि त्यांनी लिहिलेल्या साहित्याला जैन माहाराष्ट्रीअसे सार्थ संबोधन जगभरच्या भाषातज्ञांनी दिलेले आहे.

      प्राचीन कालापासून मराठी भाषेत जैनांनी लिहिलेल्या साहित्याची यादी व त्या पुस्तकांचे थोडक्यात साहित्यिक महत्व या प्रकरणात सांगण्यात आलेले असून यातील निवडक आणि प्रभावी साहित्यकृतींवर सविस्तर माहिती पुढील प्रकरणांमध्ये देण्यात आली आहे.

 

      माहाराष्ट्री साहित्य

 

       महाकाव्ये, खंडकाव्ये, चरितकाव्ये मुक्तक काव्ये, स्तोत्रे, गद्य चरिते असे विविध प्रकारचे साहित्य माहाराष्ट्री भाषेत निर्माण झालेले आहे. जैनांनी त्यात घातलेली भर अशी-

 

      महाकाव्ये

 

      विमल सुरी विरचित पउमचरिय”  हे अत्यंत महत्वाचे महाकाव्य जगातील पहिले रामकथेवरील महाकाव्य आहे. याचे विवेचन मी स्वतंत्र प्रकरणात केले आहे ते वाचावे. त्यानंतर उल्लेखनीय महाकाव्य म्हणजे सम्राट कुमारपाल याच्या जीवनावरील कुमारवालचरियअथवा द्याश्रवकाव्य. हे काव्य बाराव्या शतकात हेमचंद्र मुनींनी रचले असून या काव्याचे अंतिम आठ सर्ग माहाराष्ट्री प्राकृतात लिहिलेले आहेत. हेमचंद्रांनी प्राकृत भाषांचे व्याकरणही लिहिलेले आहे. हे काव्य लिहून हेमचंद्राने दोन हेतू साध्य केले आहेत : सिद्धहेम ह्या आपल्या व्याकरण ग्रंथातील नियम समजावून सांगणे हा एक आणि जैनधर्मोपासक राजा कुमारपाल ह्याचे चरित्र कथन करणे, हा दुसरा. ह्या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागात (संस्कृत) सिद्धहेमातील संस्कृतव्याकरणाचे नियम समजावून सांगत असताना सोळंकी राजवंशातील मूलराजापासून कुमारपालापर्यंत इतिहास सांगितला आहे. दुसऱ्या भागात प्राकृत व्याकरण नियमांचे स्पष्टीकरण देत असताना राजा कुमारपालाचे युद्ध इत्यादींचे वर्णन आहे.

   कोऊहल अथवा कोहल (कौतूहल) हा पैठणचा रहिवासी व महाकाव्य लीलावईचा कर्ता. प्रतिष्ठानचा राजा सातवाहन आणि सिंहल देशाची राजकन्या लीलावती ह्यांची प्रेमकथा त्याने लीलावईत सांगितली आहे. हे एक उत्कृष्ठ अद्भुतरम्य प्रेमाख्यान असून इतिहासात घडून गेलेल्या सम्राटावर लिहिलेले हे एकमेव प्राचीन प्रेम-कथा काव्य असावे.

 

      चरितकाव्ये व गद्यपद्यमिश्रित चरित 

 

      धनेश्वराने सुरसुंदरीचरिय (अकरावे शतक) रचिले. त्याचे १६ परिच्छेद असून प्रत्येक परिच्छेदात २५० पद्ये आहेत. ही एक प्रदीर्घ प्रेमकथा आहे.

      चंद्रप्रभ महत्तराने सिरि विजयचंद केवलिचरिय (अकरावे शतक-सं. रूप श्रीविजयचंद्र केवलिचरित) ह्या नावाने, पूजेच्या अष्टविध द्रव्यांवर आठ कथांचा संग्रह लिहिला आणि त्याला पार्श्वभूमिदाखल ह्या केवलिचे थोडेसे चरित्र दिले आहे.    

      वर्धमानसूरीकृत आदिनाहचरिय (आदिनाथ चरित्र, अकरावे शतक), हेमचंद्राचे गुरू देव सूरी ह्यांचे संतिनाहचरिय (शांतिनाथचरित), मलधारी हेमचंद्रकृत नमिनाहचरिय (नेमिनाथचरित), त्याचा शिष्य श्रीचंद्रसूरी ह्याने लिहिलेले मुणिसुव्वयसामिचरिय (मुनिसुव्रत स्वामिचरित), श्रीचंद्राचा गुरूबंधू लक्ष्मणगणी ह्याचे सुपासनाहचरिय (सुपार्श्वनाथचरित बारावे शतक), श्रीचंद्रसूरीचा शिष्य वाटगच्छीय हरिभद्र ह्याने लिहिलेली चन्दप्पहचरिय (चंद्रप्रभचरित), मल्लीनाहचरिय (मल्लिनाथचरित) व नेमिनाहचरिय (नेमिनाथचरित) ही चरिते, सोमप्रभसूरीचे सुमतिनाहचरिय (सुमतिनाथचरित) मुनिभद्राचे संतिनाहचरिय (शांतिनाथचरित) . अन्य चरितेही उल्लेखनीय आहेत.

      ह्या चरितांचा एक वैशिष्ट्यपूर्ण साचा आहे. ह्यात चरित्रनायकाच्या पूर्वजन्माचे वर्णन उपाख्याने व धार्मिक प्रवचने नायकाचे चरित्रवर्णन (नायकाच्या जन्मनगरीचे सौंदर्य, मातापितरांचे वैभव, जन्मादी पंचकल्याण, नायकाची कठोर तपस्या, केवलज्ञानोत्पत्ती, समवरणरचना, धर्मोपदेश, देशविहार, निर्वाण) ह्यांचा समावेश होतो.

      गद्यपद्यमिश्रित अशी चरितेही आहेत. शीलांकाचार्याने (ह्याला शीलाचार्यही म्हणतात) चोपन्न शलाका महापुरूषांचे जीवन चउपन्न महापुरिस चरिय(नववे शतक) वर्णिले आहे. जैन परंपरेतील शेवटच्या केवलीचे (केवलज्ञान प्राप्त झालेल्या मुनींचे) – जंबूस्वामीचे चरित्र जंबूचरियात सांगितले आहे. ह्या ग्रंथातील भाषा ओघवती असून तीत अधूनमधून जैन धर्मोपदेशही केलेला आहे.

      गुणचंद्राच्या महावीरचरियाचे आठ प्रस्ताव आहेत. त्यात अधूनमधून संस्कृत श्लोकही उद्‌धृत केलेले आहेत तसेच ह्यांतील अनेक पद्ये अवहट्ट भाषेत लिहिलेली असून त्यांवर गुजरातच्या नागर अपभ्रंश भाषेचा परिणाम दिसून येतो.   

      गुणचंद्राने पासनाहचरियाचीही (पार्श्वनाथचरित) रचना केली. नेमिचंद्राच्या रयणचूडरायचरियावर (रत्नचूडराजचरित-बारावे शतक) संस्कृताचा प्रभाव आहे.

      बृहदगच्छीय नेमिचंद्राने भगवान महावीरांचे केवलज्ञानप्राप्तीपर्यंतचे एक चरित्र लिहिले आहे (महावीरचरिय, अकरावे शतक). हे मात्र पद्यमय आहे.

 

      स्तोत्रे : संस्कृतातील स्तोत्रवाङ्‌मयाप्रमाणेच माहाराष्टीतील स्तोत्र वाड्मय हे भक्तिपरिप्लुत असून भाषाशैलीच्या आणि विचारांच्या दृष्टीने सुंदर आहे. ही स्तोत्रपंरपरा इ. . १००० पूर्वीची असल्याचे दिसते. जैनांचे याही साहित्यप्रकारातील योगदान असे-

      कवी योगींद्रदेव किंवा योगींदू वा जोइंदूकृत निजात्माष्टक, नंदिषेणाचे (नववे शतक) ‘अजिय-संतिथव’ (अजितशांतिस्तव), भद्रबाहूने रचिलेले उवसग्गहर’ (उपसर्गहर), देवेंद्रसूरीचे शाश्वत चैत्यास्तव, दिगंबर जैनांचे प्रमाणभूत स्तोत्र निर्वाणकांडह्यांसारखी अनेक स्तोत्रे आहेत. ‘निजात्माष्टकाचा कर्ता जोइंदू हा परमप्पयासूची रचना करणारा जोइंदू असल्यास इ. . ६०० ते १००० हा ह्या स्तोत्राचा काळ असावा. ह्यात आठ गाथा आहेत. ‘अजियसंतिथवात भिन्न भिन्न अशा २५ छंदांची योजना करण्यात आली आहे. ‘उवसग्गहरहे स्तोत्र पार्श्वनाथस्तुतिपर असून त्याच्या पठणाने सर्व अधि-व्याधी नाहीशा होऊन सुखप्राप्ती होते, असे मानतात. ‘शाश्वतचैत्यावस्तवात जैनांच्या भूगोलविषयक कल्पना ग्रथित केलेल्या आहेत, तर निर्वाणकांडातजैनांची तीर्थस्थाने दिली आहेत.

      ह्यांशिवाय धनपालाने (दहावे शतक) रचिलेले ऋषभपंचाशिकाआणि जिनवल्लभसूरीचे लघुअजितसंतिथव’ (लध्वजितशांतिस्तव) ह्यांचा उल्लेख आवश्यक आहे. ‘ऋषभपंचाशिकेत ऋषभनाथांची स्तुती आहे लधुअदितसंतिथवहे नावाप्रमाणेच लघु असून त्यात १७ गाथा आहेत.

 

      चंपूकाव्य: माहाराष्ट्रीतील श्रेष्ठ चंपू-कथाकाव्य हे कुवलयमाला (७७९) होय. उद्योतनसूरीकृत ह्या चंपूकाव्यात क्रोध इ. विकारांचे परिणाम दाखविणाऱ्या कथांची गुंफण केली आहे.

 

      कथासाहित्य (गद्य-पद्य) : माहाराष्ट्रीतील गद्यसाहित्य मुख्यतः कथनपर आहे. ह्या कथावाङ्‌मयामागील प्रमुख प्रेरणा धर्मतत्वे विषद करणे ही असले तरी त्यातील कथा या मानवी भावभावना, निसर्ग आणि समाजाला कवेत घेणारी असल्याने ती साहित्यिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची व एकूणच समाजमानसिकतेला भुरळ घालणारी आहेत.

      पादलिप्तसूरीकृत (सातवाहन काल. बहुदा हाल सातवाहनाचा समकालीन.) रंगवइकहा (तरंगवतीकथा) ही एकूण प्राकृत साहित्यातील सर्वात प्राचीन कथा माहाराष्ट्रीत आहे. किंबहुना मराठी कथा साहित्याचा जन्म या कथेपासून झाला असल्याचे मानले जाते. ही कथा आज तिच्या मूळ स्वरूपात उपलब्ध नसली, तरी तरंगलोला ह्या नावाने तिचा केलेला एक संक्षेप उपलब्ध आहे. त्यावरून मूळ कथेची कल्पना येऊ शकते आणि ती एक वैराग्यप्रवर्तक प्रेमकथा होती, हे लक्षात येते. यावर वेगळे विश्लेशन पुढे केलेलेच आहे.

      वसुदेवहिंडी हा कथाग्रंथही उल्लेखनीय आहे. ‘वसुदेवहिंडीम्हणजे कृष्णपिता वसुदेव ह्याचे भ्रमण (हिंडी). ह्या भ्रमणाच्या कथेच्या अंतर्गत अन्य अनेक कथा आहेत. एका अर्थाने हे आद्य प्रवासवर्णन आहे. मुख्यतः गद्यात्मक समासान्त पदावलित लिहिलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून अधूनमधून पद्याचा वापरही केलेला आहे. पहिल्या शतकातील गुणाढ्यकृत  बड्‌डकहा (बृहत्कथा) ह्या कथाग्रंथाची वसुदेवहिंडीची तुलना केली जाते, एवढे या कथाग्रंथाचे मोल आहे.  ह्या ग्रंथाचे दोन खंड असून पहिल्या खंडाचा कर्ता संघदासगणी वाचक,तर दुसऱ्याचा धर्मसेनगणी आहे. . . दुसरे ते तिसरे शतक हा संघदासगणी लेखकाचा काळ असावा असे मानले जाते. पण महाभारतातही न आलेल्या कथा यात आलेल्या असल्याने वसुदेवाहिंडीचा लेखनकाळ त्याही पुर्वीचा असण्याची शक्यता आहे. या ग्रंथाचेही सविस्तर विश्लेषण पुढे या पुस्तकात करण्यात आलेले आहे.

      हरिभद्रसूरिकृत (आठवे शतकधुत्तख्खान  (धूर्ताख्यान) ब्राम्हणी पुराणांतील अविश्वसनीय कथांचा विडंबनात्मक उपहास करण्यासाठी लिहिले गेले आहे. ह्याच हरिभद्राने समराइच्‍चकहा (समरादित्यकथा) ह्या नावाचा एनितांतसुंदर कथाग्रंथही लिहिला आहे. हरिभद्राने याशिवाय विपुल कथा आणि धार्मिक साहित्य लिहिले. त्या अर्थाने हा आठव्या शतकातील अतिप्रतिभासंपन्न साहित्यिक होता हे मान्य करावे लागते. ह्या कथाग्रंथाचा पद्यभाग आर्याछंदात रचिलेला आहे. याचेही स्वतंत्र विवेचन पुढे केलेले आहे.

      श्वेतांबर आचार्य जिनेश्वरसूरी ह्याने १०५२ मध्ये कहाणयकोस (‘कथा कोष प्रकरणह्या नावानेही प्रसिद्ध) लिहिला. कहाणयकोसात ३० गाथा असून त्यांवरील टीकेत ३६ मुख्य आणि ४५ अवांतर कथा आलेल्या आहेत. ह्या ग्रंथातील कथांतून तत्कालीन समाज. आचारविचार, राजनीती इत्यादींचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

      संवेगभावाचे प्रतिपादन करण्यासाठी जिनचंद्रसूरीने ११६८ मध्ये संवेगरंगसाला (संवेगरंगशाळा) हा कथात्मक ग्रंथ लिहिला, तर महेश्वसूरीने णाणपंचमीकहा (ज्ञानपंचमीकथा) ह्या ग्रंथात ज्ञानपंचमीचे (कार्तिक शु. पंचमीचे) महात्म्य सांगणाऱ्या दहा कथा लिहिल्या. त्या २००० गाथांत गुंफिलेल्या आहेत.

      देवभद्रसूरीने कहारयणकोस (कथारत्नकोश) रचिला (११०१). अनेक लौकिक कथा ह्यात अंतर्भूत आहेत. एकूण ५० गद्य पद्य कथा ह्यात असून संस्कृत तसेच अपभ्रंश भाषेचा उपयोगही केलेला आहे.

      सन ११३४ मध्ये नेमिचंद्रसूरी यांनी लिहिलेला अक्‌खाणमणिकोस (आख्यानमणिकोश) हा कथाग्रंथच होय. हा ग्रंथ पद्यात आहे. पद्यचंद्रसूरीच्या एका अज्ञातनाम शिष्याने विक्कमसेणचरिय (विक्रमसेनचरित) नावाचा कथाग्रंथ रला होता. त्यात आलेल्या चौदा कथांपैकी बारा कथा पाइअकहासंग्रहात (प्राकृतकथासंग्रह) आहेत. ह्या संग्रहात दानशील, तप, भावना, सभ्यक्‌त्व, अनित्यता इ. विषयांशी संबंधित अशा कथा आहेत.

      सन ११३० मध्ये महेंद्रसूरीने नम्मयासुंदरीकहा (नर्मदासुंदरीकथा) रचिली. ही कथा गद्य-पद्यमय असून तीत पद्याचा भाग अधिक आहे. परदेशात कपटाने वेश्यागृहात आणल्या गेलेल्या नर्मदासुंरी ह्या विवाहित स्त्रीची ही कहाणी आहे. आपले शील टिकविण्यासाठी नर्मदासुंदरीने जो छळ सोसला आणि खंबीरपणा दाखविला तो ह्या कहाणीत प्रभावीपणे चित्रित केलेला आहे.

      सौमप्रभसूरीने ११८४ मध्ये कुमारवालपडिबोह (कुमारपालप्रतिबोध) लिहिला. हेमचंद्रने गुजरातचा राजा कुमारपाल ह्याला धर्मबोध करण्यासाठी सांगितलेल्या कथा, अशा पार्श्वभूमीवर सोमप्रभसूरीने ५४ कथा ह्यात गुंफल्या आहेत. ह्या ग्रंथातील काही भाग संस्कृतात आणि काही भाग विकसित माहाराष्ट्रीत आहे.

      सुमतिसूरीचे गद्यपद्यात्मक जिनदत्ताख्यानही उल्लेखनीय आहे. जिनदत्त नावाच्या नायकाची ही कहाणी. जिनदत्त चार स्त्रियांशी विवाह करतो आयुष्यात विविध प्रकारचे अनुभव घेतो आणि अखेरीस दीक्षा ग्रहण करतो.

      चौदाव्या पंधराव्या शतकांतही माहाराष्ट्री प्राकृतात कथारचना होतच होती. उदा., रत्नशेखरसूरीकृत सिरिवालकहा (श्रीपालकथा) आणि जिनहर्षगणीकृत रयणसेहरीकहा (रत्नशेखरी कथा). ह्या दोन ग्रंथापैकी पहिला चौदाव्या शतकातला, तर दुसरा पंधराव्या शतकातला आहे. श्रीपालकथेत एकूण १,३४२ पद्ये असून ती मुख्यतः आर्या छंदात आहेत. श्रीपालाच्या कथेतून सिद्धचक्राचे माहात्म्य सांगण्यात आले आहे. पर्व आणि तिथी ह्यांचे माहात्म्य रत्नशेखरी कथेत सांगितलेले आहे. हा ग्रंथ गद्यपद्यमय आहे.

 

प्रागतिक माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील साहित्य

 

      संस्कृत मिश्रीत प्राकृत भाषांचा उच्चारभ्रंश होऊन ज्या भाषा निर्माण झाल्या त्या अपभ्रंश भाषा आहेत असा एक अपसमज एके काळी प्रचलित होता. पतंजलीने आपल्या महाभाष्यात संस्कृतमधील गौ शब्दाचा प्राकृत शब्द गावी, गोणी आदि शब्दभ्रष्ट रुपबदल म्हणजे अपभ्रंश असे म्हटले होते, पण हेमचंद्रांनी हेच शब्द प्राकृत व्याकरणानुसार सिद्ध करुन दाखवले होते. प्राचीन जैन सुत्रांत असे शब्द आढळून येतात. किंबहुना संस्कृतव्यतिरिक्त सर्व भाषा अपभ्रंश आहेत असे मानण्याकडे संस्कृत व्याकरणकारांचा कल होता. पण हरगोविंददास टी. सेठ यांच्या मते बोलीभाषांचे बदलते रुप ज्यात आले आहे अशा प्राचीन ते मध्ययुगीन ग्रंथातील तथाकथित अपभ्रंश भाषा म्हटल्या जातात. वस्तुत: या भाषा अपभ्रष्ट भाषा म्हणता येत नाहीत. या प्रागतिक प्राकृताच्या अवस्था होत हे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. प्रवाही भाषा ही कालौघात समाजमानसिकतेच्या प्रभावात बदलतच असते. शेक्सपियरकालीन इंग्रजी आधुनिक इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या लोकांनाही समजत नाही याचे कारण हेच आहे. पण आपले भाषा तज्ञ काही

 कारणांमुळे या भाषाशास्त्रीय वास्तवाकडे दुर्लक्ष करत असतात.

      काही अभ्यासक १००० ते १२०० च्या दरम्यान आढळून येणाऱ्‍या एका साहित्यिक भाषेला अपभ्रंशहे नाव देतात. अपभ्रंश हा शब्द शिष्ट-भाषेशी (म्हणजे संस्कृतशी) न जुळणाऱ्‍या अशुद्ध भाषिकरूपांना उद्देशून पतंजलीनेही वापरला आहे (‘पूर्वनिपातेऽपभ्रंशो रक्ष्य:’ ··२१). ‘शास्त्रेषु संस्कृतादन्यत्अशी दंडी त्याची व्याख्या करतो, तर वाग्भटालंकारकर्ता वाग्भट (बारावे शतक) ‘प्रादेशीय शुद्ध रूपअसे त्याचे वर्णन करतो (अपभ्रंशस्तु यच्छुद्धं तत्तद्देशेषु भाषितम्). खरे  तर जुने प्राकृत व आधुनिक भाषा यांना जोडणा-या कालखंडातील परिवर्तीत रुपे दाखवणारी ही एक भाषिक अवस्था आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

      जे. ब्लॉख याच्या मते अपभ्रंश ही एक भाषिक अवस्था नसून, नव-भाषांच्या प्रारंभी वापरण्यात येणारी, प्राकृताचे अनुकरण करणारी, कधी संस्कृत रुपांनाही वाव देणारी एक लेखनशैली आहे. हेमचंद्राच्या सिद्धहेमचंद्र  या ग्रंथाच्या आठव्या अध्यायाच्या चौथ्या पादाची ३२९ ते ४४६ ही सूत्रे अपभ्रंशाची लक्षणे देतात. त्यांत आलेली अपभ्रंश काव्यातील केवळ काही उदाहरणे पाहिल्यास या भाषेचे निदान लेखनातले संमिश्र स्वरूप लक्षात येईल. पुढे याच संमिश्र स्वरुपाने प्रागतिक पायरी गाठली असल्याचे आपल्या लक्षात येईल. अन्यथा ती ग्रंथभाषा बनली नसती हे उघड आहे.

      आठव्या-नवव्या शतकापर्यंत वापरली जाणारी ग्रांथिक प्राकृत आणि जनसामान्यांच्या बोलीतील प्राकृत यात बराच फरक पडत चालला होता. नंतरच्या साहित्तिकांनी आपले साहित्य जनभाषेशी निकट आणण्यासाठी प्राकृतांचीच पुढची अवस्था असलेल्या समाजाच्या बोलण्यातील प्रागतिक भाषा वापरात आणल्या. या भाषांना त्यामुळे "अपभ्रंश" हे नांव देणे संयुक्तिक नाही तर त्यांना "प्रागतिक प्राकृत" म्हटले पाहिजे. या भाषेच्या रूपविचाराकडे लक्ष दिल्यास ही अवस्था प्राकृतच्या मानाने जरा पुढे गेल्याचे आणि आधुनिक प्राकृतांच्या जवळ आल्याचे दिसते. म्हणजेच प्रवाही प्राकृतातील या प्रागतिक प्राकृत भाषेचा टप्पा आजच्या बोली/साहित्यातील प्राकृतांशी जोडला गेला असल्याचे आपल्याला दिसेल.

      जुनी प्राकृत ते नवी प्राकृत यातील हा टप्पा भारतीय भाषांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा आहे. माहाराष्ट्री प्राकृताचे म्हणाल तर यादवकाळातच मराठीने जुने प्राकृत (सातारा येथे सापडलेला सन ७३९ च्या ताम्रपटावरील भाषा) ते चक्रधर-मुकुंदराज-ज्ञानेश्वरांचे प्राकृत  हा भाषिक बदल पाहिलापुढेही हे बदल होत जात मराठी नित्य नवी अभिनव रुपे घेत पुढे जाईल.

 

प्रागतिक माहाराष्ट्री प्राकृतातील जैनांचे साहित्य

     

      या अपभ्रंश म्हणवल्या गेलेल्या प्रागतिक मराठीचे श्रेयही नि:संशयपणे जैनांकडे जाते. या मराठे भाषेतील वाङ्‌मयनिर्मिती इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर सुरु झाल्याचे दिसते. आज उपलब्ध प्रागतिक मराठीतील (अपभ्रंश) साहित्य जैनांच्या ग्रंथ -भांडारातील असून, जैनेतरांची बरीचशी अपभ्रंशरचना कालौघात लुप्त झालेली आहे किंवा ती लिहिली गेलेलीच नाही.

      उपलब्ध अपभ्रंश ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आजही अप्रकाशित आहेत. बहुतेक अपभ्रंश वाङ्‌मय पद्यात रचलेले आहे. त्यात कथात्मक प्रबंध, खंडकाव्य व मुक्तक असे तीन रचनाप्रकार आहेत. त्यांतील कथात्मक प्रबंधांत पुराण आणि धार्मिक व लौकिक चरिते यांचा समावेश होतो.

      कथात्मक प्रबंध : अपभ्रंश कथाकाव्याचे रचनातंत्र सामान्यत: पुढीलप्रमाणे असते : () मंगलाचरण, () आत्मपरिचय, () विनयप्रकटन, () सज्जनदुर्जन वर्णन, () कथानिरूपण  व () प्रशस्तिपर उपसंहार. तत्कालीन अभिरुचीप्रमाणे प्रबंधकारांनी अक्षरवृत्तांऐवजी मात्रावृत्तांचा उपयोग केलेला असून पद्धडिया, द्विपदी व चतुष्पदी अशी  गेय छंदरचना प्रबंधांत आढळते. त्यांत लोकगीतांच्या चालीची कडवके आहेत. अभंग, ओवी, चौपाई व धवळे या छंदप्रकारांची पूर्वरूपेही प्रबंधरचनेत दिसतात.

      अपभ्रंश भाषेतील पहिला महाकवी चतुर्मुख  हा होय पण त्याचे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत.

      लौकिक चरितांच्या विभागात पुष्पदंताच्या णायकुमारचरिउ  (नामकुमारचरित) व जसहरचरिउ  (यशोधरचरित) या दहाव्या शतकातील रचनांचा अंतर्भाव होतो. त्यातील काव्यात्मकता व भाषासौंदर्य हे गुण उल्लेखनीय आहेत. वैश्यकुमार नायक असलेली व श्रुतपंचमीचे माहात्म्य वर्णन करणारी धनपालाची  (दहावे शतक) भविसयत्तकहा  (भविष्यदत्तकथा) अत्यंत काव्यमय रचना आहे.

      अकराव्या शतकात कनकामराने करकंडचरिउ (करकंडचरित) रचले. बौद्ध व जैन धर्मीयांचा राजर्षी करकंडू यावर ते रचलेले आहे. महाराष्ट्री-अपभ्रंशात ते लिहलेले असून त्यास उस्मानाबाद जवळील तेरच्या लेण्यांची पार्श्वभूमी आहे. या काव्यातील रचनाकौशल्य करकंडू राजाची अद्भुतरम्य कथा व नऊ उपकथा यांच्या चातुर्यपूर्ण गुंफणीवरून स्पष्ट दिसते.

      बाराव्या शतकात धाहिल याने पउमसिरिचरिउ  (पद्मश्री-चरित) लिहिले. प्रस्तुत काव्यही कर्मसिद्धांत व धर्ममाहात्म्य पटविणारी एक अद्भूतरम्य प्रेमकथा आहे. हरिभद्राने नैमिनाथचरित  (११५८) रचले. त्यातील सनत्कुमारचरित  हा एक भाग हेर्मान याकोबी ह्याने १९२१ मध्ये प्रसिद्ध केला. श्रेष्ठ काव्यगुणांच्या दृष्टीने हे काव्य उल्लेखनीय आहे.

       . . बाराशेनंतर अर्वाचीन भारतीय उदय झाल्यानंतरही अपभ्रंश भाषेत चरितकाव्ये लिहिण्यात आली. अपभ्रंशकाळाच्या शेवटी लिहिलेले चरितग्रंथ, विद्यापतिकृत कीर्त्तिलतेसारखे ग्रंथ व रासो आणि चरिते यांत भाषा, रचना, छंद इ. बाबतींत इतके साम्य आढळते, की अर्वाचीन भारतीय भाषांच्या नव्या कालखंडात आपण शिरत असल्याची जाणीवही होत नाही. भाषांचा प्रवाह हा कालसुसंगत पण सलग वाहता असतो हेच यावरुन सिद्ध होते.

      दोहे- अध्यात्मवादी जैन कवींत  जोइंदु  (६०० ते १००० च्या दरम्यान) हा बहुधा पहिला असून त्याचे  परमप्पपयासु (परमात्मप्रकाश) व योगसार  हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांत परमात्म -साक्षात्काराची चर्चा असून त्यांतील काही कल्पना शैव व बौद्ध गूढवाद्यांच्या कल्पनांशी जुळणाऱ्‍या आहेत.

      मुनी रामसिंहाच्या (सु. १० वे शतक) पाहुड-दोहा (दोहा-प्राभृत) ग्रंथात २२२ दोहे असून त्यात निवृत्तिमार्गाचा उपदेश आढळतो. रामसिंहाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी शैव, योग व तंत्र मतांशी त्याचा परिचय असावा, असे दिसते. एका दोह्यात, शक्तीशिवाय शिव व शिवाविना शक्ती काहीही करू शकत नाही, असा विचार त्याने व्यक्त केला आहे.

      सावयधम्मदोहा (श्रावकधर्मदोहा) या संग्रहात श्रावकधर्माचे वर्णन आढळते. दिगंबर- पंथीय जैन कवी देवसेन याने प्रस्तुत ग्रंथ ९३२ मध्ये रचला, असे या ग्रंथाचे संपादक हिरालाल जैन यांचे मत आहे. डॉ. . ने. उपाध्ये यांच्या मते लक्ष्मीचंद्र हा त्याचा कर्ता असावा.

      सुप्रभकृतवैराग्यसार  (१३ वे शतक) या ग्रंथाची रचना दोह्यातच केलेली आहे. प्रस्तुत ग्रंथातील प्रत्येक दोह्यात सुप्पउ भणइ’ (सुप्रभ म्हणे—) अशा स्वत:च्या नाममुद्रिकेची योजना कवीने केली आहे. हिंदी भाषेत रूढ असलेल्या काही वाक्प्रचारांचा उपयोगही कवीने केलेला दिसतो.

आधुनिक मराठीती आणि जैन

आधुनिक मराठीचा उगम दहाव्या शतकातच होऊ लागला होता. साहित्यिक भाषा आणि जनभाषा यात मोठा फरक पडू लागला होता. अक्षी व श्रवणबेळगोळ येथील शिलालेख आधुनिक मराठीचा पहिले अवतार मानले जातात. हे शिलालेख अनुक्रमे इसवी सन १०१७ व १११६-१७ मधील मानले जातात. श्रवणबेळगोळ येथील शिलालेख जैन धर्मियांचा असून त्या शिलालेखात खालील ओळी आहेत-

      “श्री चामुंड राये करवियले

      श्री गंगाराये सुत्ताले करवियले II”

      त्यापूर्वी शंभर वर्षापूर्वीच्या अक्षी (कोकण) शिलालेखातील भाषा अशी आहे-

      “गीं सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
      मुद्राधिपती । स्री कोंकणा चक्री-
      वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
      न भईर्जू सेणुई तसीमीनी काले
      प्रव्रतमने । सकु संवतु: ९३४ प्रधा-
      वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ-
      लु । भईजुवे तथा बोडणा तथा नऊ
      कुवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
      मीची वआण । लुनया कचली ज-“

      आठव्या शतकातील साहित्यिक मराठी जनभाषेत कशी उच्चार-सुलभत्व धारण करत झपाट्याने बदलत चालली होती याचे हे दर्शन भाषाशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासाने महत्वाचे आहे.

      थोडक्यात प्राचीन प्राकृत ते आजच्या प्राकृताला (मराठीला) जोडणारी ही भाषा आणि त्यातही जैनांचे महत्वाचे योगदान आहे हे फार महत्वाचे आहे हे मी येथे आवर्जून नमूद करून ठेवतो. जैन हे मराठीच्या विकासाचे नुसते साक्षीदार नाहीत तर या भाषिक विकासातील महत्वाचे भागीदारही आहेत याची जाणीव मराठी माणसाने ठेवली पाहिजे. आधुनिक मराठीतील जैनांच्या योगदानासाठी शेवटचे प्रकरण पहावे.

      वर उल्लेखिल्या गेलेल्या साहित्यदृष्ट्या आणि समाजशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या साहित्य ग्रंथांची मी पुढे विस्तृत माहिती दिली असून त्यात धार्मिक साहित्य मात्र पूर्णपणे वगळलेले आहे. या साहित्यग्रंथांनी मराठी मानसिकता घडवण्यात महत्वाचे योगदान दिले तर आहेच पण मराठी भाषेचा प्राचीन मरह्ठ्ठी ते आजची मराठी हा प्रवास कसा झाला असेल याचेही दिग्दर्शन करेल.

·          

संदर्भ-

. Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-hindi Dictionary) by Pandit Hargovind Das T, sheth, पुनर्मुद्रण- १९८६. पृष्ठ ५३.

. Formation of the Marathi Language, J. Bloch, Motilal Banarsidass Publ., 1970.

 

प्रकरण तीन

पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

      भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्मिकीला आदिकवी मानण्याचा प्रघात आहे. रामायण हे वाल्मिकीरचित महाकाव्य नेमके कधी लिहिले गेले याबाबत मात्र विद्वानांत अनेक मतांतरे आहेत. शिवाय हे पहिले रामकाव्य आहे काय याबाबत साधार शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत. वाल्मिकीरचित संस्कृत भाषेतील रामायण आणि विमल सुरी रचित पउमचरिय” (संस्कृत- पद्मचरित) हे माहाराष्ट्री प्राकृतातील महाकाव्य यात आधीचे कोणते आणि पहिले महाकाव्य लिहिणारा महाकवी वाल्मिकी कि विमल सुरी या प्रश्नाची ग्रंथांतर्गत येणा-या पुराव्यानुसार मराठी भाषेच्या पुरातन वैभवाबाबत निश्चिती करण्यासाठी चर्चा करणे महत्वाचे ठरते. या काव्यात येणा-या कथांचे मूळ स्त्रोत कोणते हेही या निमित्ताने तपासून पहायचे आहे. त्यासाठी संस्कृत भाषेचा उदय नेमका कधी झाला हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. मराठी भाषेची प्राचीनता आणि त्या भाषेला असणारे जैनांचे योगदान समजावून घेण्यासाठी आणि एका महत्वाच्या, भारतीय मानसिकतेवर व्यापक परिणाम करणा-या रामावरील आद्य महाकाव्य कोणते हे तपासण्यासाठीही या चर्चेचा उपयोग होऊ शकतो, म्हणून मी ही चर्चा विस्ताराने केली आहे.

      पाश्चात्य विद्वान एकोणीसाव्या शतकातच रामकथेकडे वळाले असले तरी रामकथेबाबत शिस्तबद्ध संशोधने व्हायला १९५० नंतर वेग आला. रामायणाच्या जैन, बौद्ध अशा विविध धर्मीय आणि भाषिक आवृत्यांचाही तुलनात्मक अभ्यास सुरु झाला. जैन रामायणाबाबत जे. डब्ल्यू. डी-जोंग यांनी जर्नल ऑफ ओरीएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोडात तीन टिपणे लिहिली. जैन रामायणाच्या जुन्या प्रतीवरील जे. सी. जैन यांचे संशोधनात्मक लेख १९७५ साली जर्नल ऑफ ओरीएंटल इन्स्टिट्यूट ऑफ बरोडाने प्रकाशित केले होते. बौद्ध साहित्यात येणा-या रामकथांबाबत मात्र तुलनात्मक अभ्यास करण्यात  किंचित दुर्लक्षच झाले असे म्हणावे लागेल. अपवाद फक्त डी. सी. सरकार यांनी लिहिलेल्या आणि १९७६ साली “The Ramayana and Dasharatha Jataka” या प्रकाशित केलेल्या प्रदीर्घ लेखाचा. वाल्मिकी रामायणाचा उत्तरकालीन रामकथांवरील प्रभावावरही विपुल लेखन झाले असले तरी रामकथेचे रहस्य उलगडले आहे असे नाही. वाल्मिकी रामायणातील धर्म, नीती, समाजव्यवस्था, भूगोल, सैनिकी व्यवस्था, नगररचना, काव्यातील विसंगती इ. बाबतही विपुल लेखन झालेले आहे. पुरातत्वीय अंगानेही रामायणाचे विश्लेषण केले गेलेले आहे.  सांस्कृतिक आणि सामाजिक समस्यांच्या आणि नैतिकतेच्या संदर्भातही विविधांगी चर्चा झालेली असून रामकथा नकळत सामाजिक संघर्षांनाही जन्म देत आलेली आपल्याला दिसते. आपल्याला या निबंधात कोणते महाकाव्य आधीचे यावर चर्चा करायची असून परंपरागत मान्यता अनेकदा भावनिक आणि अनुमानित कालरेखेच्या बंधनात अडकून कशी चुकते याचाही आढावा घ्यायचा आहे.

      या विषयाची चिकित्सा येथे महत्वाची यासाठी आहे कि संस्कृतने प्राकृत भाषांचे रास्त श्रेय हिरावून घेतले कसे याची नोंदही होणे आवश्यक आहे. रामाबर कितवेही असले तरी महाकाव्य मराठीत प्राचीन काळीच लिहिले गेले होते हे अभिमानाचे असले तरी पहिलेपण हिरावले गेलेले आहे ही दुर्दैवाची बाब आहे. मराठी भाषा अभिजात आहे कारण त्यात पहिले महाकाव्य लिहिले गेलेले आहे यावरही अभ्यासपूर्ण शिक्का-मोर्तब होणे आवश्यक आहे.

      खरे तर ज्याचे श्रेय त्याला दिले गेले पाहिजे, याचे भान संस्कृत-समर्थकांनी न ठेवल्याने प्राकृत भाषांवर जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे. एकंदरीत भारतीय विचारविश्वच विकारांनी प्रदूषित असल्याने आपले श्रेय आपण मिळवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात त्याला नाईलाज आहे. त्यामुळे आपण आधी आद्यम्हटल्या जाणा-या वाल्मिकी रामायणाचे वास्तव समजावून घेऊ आणि मग महाकवी विमल सुरींकडे वळू.

      पण विमल सुरींचे रामायण हे महाराष्ट्री प्राकृतातील एक अनुपम लेणे आहे हे मात्र आवर्जून नमूद करू इच्छितो.

वाल्मिकी रामायणाचा काळ

      खुद्द रामायणात कवीने लेखनाचा काळ नोंदला नसल्याने हे काव्य कधी लिहिले गेले याबाबत अनेक विवादास्पद मते आहेत. या काव्याचा कर्ता वाल्मिकी, काव्यनायकाच्या, म्हणजे रामाचा समकालीन दाखवला गेला असल्याने वाल्मिकीही त्रेतायुगातीलच हे असे गृहीत धरूनही कालनिश्चिती केली गेली आहे. पण ही कालनिश्चिती कल्पोपकल्पित असल्याने व तर्काच्या आधारावर मुळीच टिकत नसल्याने आता ती कोणताही विद्वान स्वीकारत नाही. रामायणातील अंतर्गत पुराव्यानुसार इसवी सन पूर्व पाचवे शतक ते इसवी सनाचे सहावे शतक असे विविध काळ रामायणाच्या लेखनाचे दिले गेले आहे. बहुतेक अभ्यासकानी आपापली कालनिश्चिती करताना रामायणातील विविध संदर्भांचा उपयोग केलेला आहे, पण त्यावर काही गैर-मान्यताचा अमिट प्रभाव असल्याने त्याच संदर्भांचा उपयोग करून यथायोग्य कालनिश्चिती करण्यात त्यांना अपयश आले आहे. पारंपारिक कर्मठ मतांचा अधिक प्रभाव असणारे अभ्यासक रामायण लेखनाचा काळ जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न करतात तर काही तटस्थ संशोधक रामायण काळ सांगितला जातो तेवढा प्राचीन नसल्याचे पुरावे रामायणातीलच आलेल्या अनेक उत्तरकालीन संदर्भानुसार देतात. त्याच वेळेस रामायणात आलेले यवन, शक, दिनार वगैरे उल्लेख हे रामायणातील प्रक्षेप मानून पारंपारिक मताचे संशोधक ती मते फेटाळून लावतात. थोडक्यात रामायणाची तारीख विवादांच्या भोव-यात आहे. पण काही सज्जड पुरावे असे आहेत जे आजवर फारसे विचारात घेतले गेले नसले तरी रामायण लेखनाची कालनिश्चिती करण्यास ते उपयुक्त आहेत.

      सध्या जे रामायण उपलब्ध आहे त्यातील बालकांड आणि उत्तरकांड हे मूळ पाच कांडांच्या रामायणाला फार नंतर जोडले गेले आहे असे आता सर्वमान्य मत असले तरी बालकांड आणि उत्तरकांडातील काही भाग तरी मूळ लेखकाचा असला पाहिजे असेही मत अनेकांनी व्यक्त केलेले आहे. या कांडांतील भाषा शैली, रचना पद्धती उर्वरीत कांडांपेक्षा वेगळी आणि काव्यदृष्ट्या सामान्य आहे. अर्थात मुळची मानली गेलेली कांडेही प्रक्षेपांपासून अलिप्त नाहीत. अन्य अनेक अनाम कवींनी त्यात कालौघात घाल-घुसड केलेली आहे. हे प्रक्षेप कोणत्या शतकात केले गेले असावेत याबाबतही एकमत नाही.

      रामायण लिहिण्यामागील उद्देश आर्य (वैदिक) धर्माचा आणि संस्कृतीचा दक्षिण भारतासह श्रीलंकेत करणे हा होता असे मत वेबर यांनी व्यक्त केलेले आहे. किंबहुना प्राचीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या धर्ममताचे समर्थन करण्यासाठी लिहिला जात असल्याने वाल्मिकी रामायणाबाबत तसेच घडणेही स्वाभाविक आहे. रामायणाचे कथासूत्र वाल्मिकीने प्राचीन व लोकप्रिय वीरगीते व लोककथांमधून घेतली व हे काव्य रचले असे त्यांचे कथन आहे. याचाच अर्थ वाल्मिकीपूर्वीच रामकथा वेगवेगळ्या स्वरूपात व कथानकात ब-यापैकी प्रसिद्ध होती, पण तिची रूपे कथानकांसहित स्थानपरत्वे बदललेली होती. पण वाल्मिकीने हे काव्य रचले कधी? विंटरनिट्झसारखे विद्वान म्हणतात की आताचे रामायण हे वाल्मीकीने सनपुर्व तिनशेमध्ये पुरातन लोकगीतांचा आधार घेत रचले. रामायण लिहिण्यासाठी लोकगीतांचा आधार घेतला हे त्यांचे म्हणणे योग्य असले तरी इसपू तिसरे शतकच का याचा त्यांनी उलगडा केलेला नाही. रामायण इसवीपूर्व काळातील असणे शक्य नाही हे अनेक पुराव्यांवरून दाखवता येते.

      बौद्ध जातककथातील दशरथ जातकात (सुत्तपिटक, खुद्दक निकाय, ४६१) येणारी रामकथा अत्यंत वेगळ्या स्वरूपाची असून आज आपल्याला माहित असलेल्या रामकथेपेक्षा तिचे स्वरूप अत्यंत वेगळे आहे. रामायणामुळे लोकप्रिय झालेल्या रामकथेपेक्षा अत्यंत वेगळे व विसंगत रूप यात येते. प्रो. कामिल बुल्के यांनी त्यांच्या 'रामकथा का इतिहास' या पुस्तकात लिहिले आहे. रामकथेचा पहिला उल्लेख 'दशरथ जातक कथा' मध्ये आढळतो. जे ख्रिस्ताच्या 400 वर्षांपूर्वी (आतापासून 2600 वर्षे) लिहिले गेले होते. या कथेनुसार दशरथ हा अयोद्ध्येचा नव्हे तर वाराणसीसा राजा होता आणि यात राम, लक्ष्मण व सीता भाऊ-बहिण असल्याचे दाखवले गेलेले आहे. एकंदरीत रचना पाहता बौद्ध काळात जर वाल्मिकी रामायण उपलब्ध असते तर कथेत एवढा विरोधाभास आला नसता.

      जातककथा इसपूच्या पहिल्या शतकापर्यंत पाली भाषेत लिखित स्वरूपात आल्या होत्या. आज त्या उपलब्ध नसून पाचव्या शतकात श्रीलंकेत सिंहली भाषेतून पुन्हा पालीत झालेल्या अनुवादावरून आपल्याला माहित आहेत. पण आज उपलब्ध झालेले जातक हे मूळ स्वरूपाचे असले पाहिजे, कारण त्यावर वाल्मिकी रामायणाचा यत्किंचितही प्रभाव नाही, त्यामुळे जातककथांचे संस्करण करणा-या लेखकाला वाल्मिकीरचित रामकथा महित नव्हती असे आपण स्पष्ट म्हणू शकतो कारण तेव्हा वाल्मिकी रामायण सिद्ध झालेले नव्हते. यातून दिसणारी दुसरी बाब अशी कि बुद्ध-महावीर काळापासून ते इसपूच्या पहिल्या शतकानंतरही बराच काळ रामकथेत एकवाक्यता नसून तिची अनेक परस्परविरोधी रूपे प्रचलित होती.

      त्यामुळे वाल्मिकीने आपले काव्य लिहिताना कच्चा माल म्हणून नेमक्या कोणत्या स्त्रोतांचा अथवा रूपांचा उपयोग केला आणि त्यातून आपली कथावस्तुनिर्माण करण्यासाठी काय बदल केले हे सांगता येणे अवघड आहे. शिवाय वाल्मिकी रामायणाच्या भिन्न प्रादेशिक पाठांत असलेले विभेदही खूप असल्याने मूळचे रामायण नेमके कोणत्या स्वरूपाचे असेल याबाबत तर्कच बांधावे लागतात. त्यातल्या त्यात दाक्षिणात्य आवृत्त्या मुळ रचनेशी अधिक जवळ जाणा-या आहेत असे मत हर्मान याकोबीसारख्या विद्वानाने व्यक्त केले आहे.

      महाभारत जसे इतिहासया संज्ञेने प्रसिद्ध आहे तसे रामायणाचे नाही. ते काव्यआहे. परंतु प्राचीन काळी रामायणाला इतिहास किंवा पुराण म्हणण्याची पद्धत होती. असे असले तरी महाकाव्य शैलीचा प्रारंभ रामायणापासून सुरु झाला असेही सर्वसाधारण मत आहे. चवदाव्या शतकात विश्वनाथाने रामायणाला आर्ष महाकाव्य असे संबोधले. असे असले तरी महाकाव्याची समीक्षकांनी वर्णन केलेली रचनापद्धती साधारणपणे रामायण पाळते. अश्वघोषाच्या बुद्धचरित या महाकाव्यांवर रामायणाचा प्रभाव आहे, तसेच अभिधर्मविभाषाशास्त्र या इसवी सनाच्या तिस-या शतकातील ग्रंथात रामकथांचा उल्लेख आहे असे कौशिक म्हणतात. पण हा ग्रंथ रामकथा उल्लेखात असला तरी वाल्मिकी रामायणाचा उल्लेख करत नाही. अश्वघोषाच्या रचनेवर रामायणाचा प्रभाव आहे हे मतही सबळ पुराव्यांअभावी टिकणारे नाही. रामाची कथा अन्य स्त्रोतांतून माहित असणे आणि वाल्मिकी रामायण अस्तित्वात असणे यात फरक आहे. रामायण हे पारंपारिक वीरगीतांतून व लोककथांतून सामुग्री गोळा करून लिहिलेले आहे असे मत सर्वच विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. म्हणजेच रामाच्या ज्या विविध प्रकारच्या काव्यमय कथा आधीच प्रसिद्ध होत्या त्यातील आपल्या कथावस्तूला साजेशा सोयीच्या कथा कथा निवडून व त्यात कलात्मक बदल करून त्यांना काव्यदृष्ट्या सुसंगत प्रवाही रूप देत वाल्मिकीने रामायण लिहिले गेले असे म्हणता येईल.     रामकथा वेगवेगळया अस्तित्वात असल्या पाहिजेत कारण तिस-या ते चवथ्या शतकात ब-यापैकी अंतिम स्वरूप प्राप्त खालेल्या पुराणांनीही रामकथा देतांना परस्पर विसंगत माहिती दिलेली आहे. त्यांनीही वाल्मिकी रामायण पाहिले होते कि नाही, किंवा पुराणे रचली गेली तेव्हा वाल्मिकी रामायण उपलब्ध होते कि नाही हे खात्रीशीर सांगता येत नाही, कारण वाल्मिकी रामायणाने वापरलेले मुलस्त्रोत वेगळे आहेत तर पुराणे आणि विमल सुरीने आपले म,अहाकाव्य लिहिताना वापरलेले मुलस्त्रोत वेगळे आहेत, त्यामुळे हि विसंगती निर्माण झाली आहे असे मात्र आपल्याला म्हणता येईल. उदा. वाल्मिकी रामायणात जनकाला सीता व उर्मिला या दोन कन्या असल्याचे दिसते. (वा.रा. . ७३.२६,३०) पउमचरीयनुसार मात्र जनकाला वैदेही नामक पत्नीपासून सीता आणि भामंडल नामक जुळे कन्या व पुत्र झाले. भामंडल जनकाकडून हरवला होता जो नंतर चंद्रगतीने दत्तक  घेऊन त्याला वाढवले. विष्णू व वायू पुराणानुसार सीतेच्या पित्याचे नाव जनक नाही तर शिरध्वज असे आहे. (वि.पु. ...३० व वा.पु. .२८.१८कालिका पुराण मात्र जनकाला दोन पुत्र आणि एक कन्या असल्याचे म्हणते. (का.पु. ३८.११, १२, १३) वैदिक पुराणांमध्येही या अशा अनेक विसंगती आहेत ज्या वाल्मिकी रामायणाच्या कथनाशी जुळत नाहीत, कारण सर्वांची सूत्रे वेगवेगळी आहेत हेच त्यावरून स्पष्ट होते. सीतेच्या जन्माबाबतही दोन वेगळे मतप्रवाह आहेत. पउमचरियनुसार ती जनकाला वैदेहीपासून झाली तर वाल्मीकी रामायणानुसार ती जनकाला शेत नांगरताना सापडली. (वा. रा. .६६.१३-१४) याचाच अर्थ असा कि रामकथेचे वेगवेगळे स्त्रोत होते व आपापल्या आवडीने ते विकसित केले गेलेले होते. त्यांच्यात एकवाक्यता नव्हती.

      पुराणांना तिस-या ते चवथ्या शतकात अंतिम रूप मिळाले हे लक्षात घेतले तर तोवर वाल्मिकी रामायण अस्तित्वात आलेले नव्हते असे आपल्याला अंदाजिता येते. कारण वाल्मिकी रामायण तेव्हा उपलब्ध असते व ते मानले जाते तसे आदिकाव्य असते व तेच या माहितीचा स्त्रोत असते तर अशा विसंगती निर्माण झाल्या नसत्या.

      महत्वाचा पुरावा असा कि या काव्याचा संबंध स्मृती आणि वेदांशी जोडलेला असून हे काव्य वेदांतून निघालेले असून हा हे काव्य म्हणजे वेदविस्तार आहे असेही काव्यात नमूद करण्यात आलेले आहे. यातून दोन महत्वाचे अर्थ निघतात. रामायण हे वैदिक धर्माला लोकप्रिय करण्याच्या हेतूने व त्या धर्माचा व धर्मतत्वांच्या प्रचारासाठी लिहिले गेलेले आहे. रामायणात येणारी नीती, कर्मकांड, आचारधर्म आणि समाजरचना वैदिक धर्मतत्वांना अनुसरुन आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यात तीन वेदांचा प्रत्यक्ष आणि अथर्ववेदाचा अप्रत्यक्ष संकेत मिळतो. वैदिक धर्मात आधी तीनच वेद मान्य असून दुस-या शतकापर्यंत अंतिम स्वरूप मिळालेली मनुस्मृतीही ऋक, साम, यजुस या वेदत्रयीचाच उल्लेख करते, चवथा वेद अथर्ववेदाचा पुसटसा उल्लेखही करत नाही. अथर्ववेद सर्वात शेवटी लिहिला गेला अशीही मान्यता आहे. वैदिक धर्मियांनी अथर्ववेदाला प्रतिष्ठा दिली ती मनुस्मृतीचे अंतिम रूप क्रमश: सिद्ध झाल्यानंतर. इसवी सनाच्या दुस-या शतकापूर्वी संस्कृत भाषेच्या अस्तित्वाचे शिलालेखीय अथवा नाणकीय लेखांचे अन्य पुरावे उपलब्ध नसल्यामुळे तीही इसवीसनापूर्वीची नाही हे स्पष्ट आहेया वैदिक धर्माचे नियमन करणा-या ग्रंथात शक, काम्बोज, यवन, चीन, इत्यादी जमातींचा उल्लेख असल्याने मनुस्मृतीच्या लेखकाना या जमाती नुसत्या माहितच नव्हत्या तर त्यांचे समाजजीवनातील अस्तित्वही दखलपात्र बनलेले होते, त्यामुळेच धार्मिक स्मृतीत त्यांचा उल्लेख अनिवार्य झालेले दिसते. हा काळ निश्चयाने इसवी सनाच्या दुस-या शतकानंतरचा आहे. या काळापर्यंत तरी अथर्ववेदाला वैदिक धर्मियांनी वेद म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मनुस्मृतीच्या काळानंतर पुढील शंभरेक वर्षात अथर्ववेदाला मान्यता मिळण्यास वैदिक धर्मीय अनुकूल झाले आणि पुढे ती मान्यता कायम झाली. रामायणाचे लेखन या संधी काळातील, म्हणजे इसवी सनाचे तिसरे शतक ते पाचवे शतक, असणे सहज शक्य आहे. म्हणजे मनुस्मृतीला अंतिम रूप मिळाल्यानंतर, म्हणजे तिस-या शतकात अथर्ववेदाला चवथा वेद म्हणून मान्यता मिळाल्यानंतर परंतू कालिदासाच्या अनुमानित काळापूर्वी (म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकापूर्वी) वाल्मिकी रामायण लिहिले गेले असे निश्चयाने म्हणता येईल. रामायणाच्या लेखनकाळाबाबत पी. सी. सेन गुप्ताही रामायणात अवतरणा-या बुद्ध, तथागत, चैत्य, भिक्षु, श्रमण या शब्दांवरून हेच मत नोंदवतात. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतर वैदिकांनी त्यांचा हिरीरीने विरोध सुरु केला हे ऐतिहासिक वास्तव आहे. गुप्त काळात राजाश्रय मिळाल्यामुळे साहित्यातून हिरीरीने बुद्धनिंदा व्हायला सुरुवात झाली. रामायणातील यथा हि चोर: तथा हि बुद्धव बुद्धाला नास्तिक म्हणणारा श्लोक आपल्याला ही रचना गुप्तकाळातील असल्याचेच दर्शवते. चिं. वि. वैद्य रामायणात येणा-या ग्रह-राशींच्या आधारावर रामायण लेखनाचा काळ इसपू पहिल्या शतकाच्या पार जाऊ शकत नाही असे विधान करतात आणि आत्ताचे उपलब्ध रामायण मात्र महाभारताच्या रचनेनंतर त्यातील सभापर्वातील भाग जसाच्या तसा अयोध्याकांडातील एका सर्गात घेऊन सिद्ध केले गेले व हा प्रक्षेप उत्तरकालीन आहे असेही त्यांचे विवेचन आहे.  

      भवभूतीच्या उत्तररामचरितवरून उपलब्ध होणारा पुरावा असा कि त्याच्या काळात उपलब्ध असणारे रामायण सर्गांत विभागले गेलेले नव्हते तर अध्यायांत विभागलेले होते. भवभूतीचा काळ हा साधारणपणे सन ७०० ते ७४० असा मानला जातो. थोडक्यात मूळ लेखनापासून वाल्मिकी रामायणात रचनेच्या बाबतीतही बदल केले गेले व त्यात भरही पडत राहिली. भवभूतीच्या काळापर्यंत बालकांड व उत्तरकांडही रामायणाला जोडले गेले होतेरामायणातीलच विसंगत आणि अनेक परस्परविरोधी माहितीवरून रामायण ही एका व्यक्तीची रचना नसावी अशी शंकाही वैद्य यांनी व्यक्त केलेली आहे. रामायणकर्ता वाल्मिकी नामक कवी खरेच झाला असेल तर त्याने लिहिलेले मूळ काव्य हे संक्षिप्त स्वरूपाचे, सलग आणि कोणतीही अंतर्गत विसंगती ठेवणारे नसले पाहिजे असे अनुमानही आपण काढू शकतो. मूळ रचनेत अन्यही लोकप्रिय काव्यांचा श्लोकबद्ध समावेश करत रामायणात भर घातली गेल्याने आताच्या रामायणात विसंगती उत्पन्न झाल्या असाव्यात असा अर्थही आपण वैद्यांच्या विवेचनावरून काढू शकतोपण ही भर घालायला दीर्घ काळ लागला असावा या म्हणण्यात फारसा अर्थ नाही, कारण गुप्त काळात रामायणाचा उपयोग एका धार्मिक आणि सांस्कृतिक शस्त्रासारखा करून दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करणे हाच उद्देश असल्याने हे मुळ रामायणात भर घालण्याचे कार्य मुळ लेखन झाल्यानंतर अवघ्या शतकभरात व घाईत करण्यात आले. या घाईमुळेच वाल्मिकी रामायणात अनेक अक्षम्य विसंगती व पुनरावृत्त्या असे दोष निर्माण झाले आहेत असेही आपल्या लक्षात येईल.

      रघुवंश लिहिणा-या कालिदासाला रामायण महाकाव्य माहित नव्हते असे मत कुन्हन राजा या संशोधकाने व्यक्त केलेले आहे त्यामुळे वाल्मिकी हा कालोदासोत्तर काळातील, म्हणजे पाचव्या शतकानंतर झाला असावा असा मतितार्थ निघतो.  शिवाय रघुवंशात रामाची राजधानी अयोध्येचा नव्हे तर साकेतचा उल्लेख आहे.(रघुवंश- १३,६२). परंतु राजा गंभीर चूक करत आहेत. याचे कारण म्हणजे कालिदास साकेत व अयोध्या या दोन्ही नावांचा उल्लेख करतो, त्यामुळे रामायण त्याच्या आधीचे नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. कालिदासाने साकेत या मुळच्या नावाचा उपयोग अयोध्येच्या सोबत केला तर वाल्मिकीने त्याच्या काळातील प्रचलित फक्त अयोध्या या नावाचा उपयोग केला असे म्हणावे लागेल. चिं. वि. वैद्य मात्र कालीदासासमोर निश्चितपणे वाल्मिकीरचित रामायण होते असे म्हणतात. त्यांच्या मताप्रमाणे कालिदासाने काही वेळा रघुवंशात रामायणातील श्लोकार्ध जसेच्या तसे वापरले आहेत. कोणता श्लोक आधी कोणी लिहिला याचे पौर्वापपौर्य ठरवता येणे अवघड आहे. फार फार तर अयोध्येचे प्राचीन नाव साकेत आहे याचे ज्ञान त्याला असेल. वाल्मिकीने मात्र गुप्त राजाश्रयामुळे वर्तमानकालीन प्रचलित व लोकप्रसिद्ध अयोध्या हेच नाव साकेतऐवजी वापरले असण्याची शक्यता आहे.

      रघुवंशात रामायणात मुळातच नसलेली अनेक वर्णने आलेली आहेत त्यामुळे वाल्मिकीने न वापरलेल्या कथासूत्रांचा आधार घेत कालिदासाने आपल्या कल्पनाशक्तीने आपले काव्य सिद्ध केलेले असू शकेल. थोडक्यात इसपू पाचवे शतक ते इसवी सनाचे सहावे शतक असे रामायणाचे वेगवेगळे काळ  अनुमानित केले गेले असले तरी बव्हंशी संशोधकांचे मत रामायण लिहिण्याचा काळ इसवी सनाचे तिसरे शतक ते पाचवे शतक असावे असे आहेआणि ते उपलब्ध पुराव्यांनुसार सत्याच्या जवळपास जाणारे आहे.

      वैदिक लेखकांप्रमाणेच हिंदू लेखकांतही आपल्या साहित्याला वेदमान्यता आहे हे दाखवण्याची प्रवृत्ती भारतात सरासरी गुप्तकाळात निर्माण झाली. किंबहुना सांस्कृतिक वर्चस्ववादी भूमिकेतून ही बंधने निर्माण केली गेली कारण वेदमान्यता दर्शवल्याशिवाय कोणत्याही साहित्याला प्रतिष्ठा मिळेनासे होऊ लागले होते. वेद मान्य न करणारे पण ईश्वर मानणारेही नास्तिक ही वैचारिक संकल्पना गुप्त काळात वैदिक धर्माला राजमान्यता मिळल्यानंतर निर्माण झाली. त्यामुळे बहुतेक साहित्यिक आपल्या लेखनाचा उगम वेदांतूनच झाला असे दाखवण्याचा हिरीरीने प्रयत्न करत. प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणातील राम-रावण-सीता ही पात्रे कोठेही कोणत्याही वेदांत रामायणातील पार्श्वभूमीनिशी अवतरत नसली तरी वैदिक ऋषींना रामाच्या समकालीन दाखवण्याची रामायणात वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती दिसते. ही कवीची कल्पकता असली तरी त्यामागील धार्मिक अभिनिवेश लपण्यासारखा नाही. त्यामुळे कालनिश्चिती करायलाही मदत होते हे वेगळेच.

      साकेत कि अयोध्या?

      वाल्मिकी रामायणात कोसल राज्याची राजधानी अयोध्या दिलेली आहे, हे आपण पाहिले आहे. पण मुळात अयोध्या हे नाव प्राचीन नव्हे हे मात्र रामायणाची कालनिश्चिती करताना फारसे लक्षात घेतले गेलेले नाही. . अयोध्या नगराचे मुळचे नाव विनिय अथवा विनिता हे होते आणि या नगरीचे स्थापना आद्य जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांनी केली अशी जम्बुद्दीवपन्नतीया इसपु तिस-या शतकातील जैन ग्रंथातून माहिती मिळते. पुढे याच नगरीला इक्ख्खागु हेही नाव मिळाले. त्यानंतर इसपू सहाव्या शतकापूर्वी साकेत (सागेय व साएय) हे नाव कायम झाले. १० तत्कालीन बौद्ध व जैन साहित्यात साकेत हेच नाव प्रामुख्याने आलेले आहे, अयोध्या नव्हे हेही येथे लक्षणीय आहे.

      “संयुक्तनिकायया बौद्ध साहित्यातील चवथ्या अध्यायात आपल्याला अयोध्येचा उल्लेख मिळतो, पण ही अयोध्या शरयूच्या तीरावरील नसून गंगेच्या तीरावरील आहे. पाली त्रिपिटक आणि अठ्ठकथेतही अयोध्या हे नाव आले असून ते शरयू काठचे नव्हे तर गंगा नदीकाठचे छोटे नगर होते असे नमूद करण्यात आले आहे. भगवान गौतम येथे गेले होते असा उल्लेख आलेला आहे. बुद्धाने साकेत नगरीला मात्र कधी भेट दिली असल्याचे विवरण या ग्रंथात मिळत नाही. महत्वाची दुसरी बाब अशी कि सहाव्या शतकात भारतात आलेल्या चीनी भिक्षु ह्यु-एन-त्संगनेही आपण गंगा नदी ओलांडून अयोध्येत प्रवेश केला असे नमूद केले आहे.११

      याचा अर्थ एकच होऊ शकतो तो असा कि गंगातीरी असलेली अयोध्या हे एक वेगळेच शहर होते तर शरयूतिरी असलेले साकेत हे वेगळे स्वतंत्र शहर होते. या दोन शहरांचा काहीही संबंध नाही. गंगातीरीची अयोध्या नेमकी कोठे होते व तिचे काय झाले हे आज आपल्याला माहित नसले तरी साकेत या शहराचे पर्यायी नाव अयोध्या असे किमान गुप्तकाळापर्यंत तरी अस्तित्वात आलेले नव्हते. उलट अयोध्या शहर गंगातीरी असल्याचा आणि साकेत हे नगर वेगळे असून त्यात चैत्य व विहार असल्याचा उल्लेख संयुक्त निकायमध्ये आलेला आहे. याचाच अर्थ बुद्धकाळात साकेत व अयोध्या ही वेगळ्या ठिकाणची वेगळी नगरे होती. १२

      आजच्या अयोध्येसाठी साकेत याच नावाचा उल्लेख प्राचीन जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्यात येतो. पउमचरिय महाकाव्यातही साकेत असाच उल्लेख आहे, अयोध्या नाही. पण पुढे साकेत हे नाव पूर्णपणे व्यवहारातून बाद होत अयोध्या हेच नाव कायम झाले ते गुप्तकाळात गुप्तांनी हे नगर अयोध्या नाव देत कोसल प्रांताची राजधानी केली तेव्हा. पुढे गुप्त साम्राज्याचे सम्राट कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त यांनी पाटलीपुत्रहून अयोध्येला गुप्त साम्राज्याची राजधानी हलवली तेव्हा अयोध्येचे साकेत हे मुळचे नाव मागे पडत अयोध्या नावाला प्रतिष्ठा आली. १३  सम्राट नरसिंहगुप्ताच्या काळात (इसवी सनाचे सहावे शतक) हुणांच्या स्वा-यामुळे अयोध्या ही राजधानी बदलून कनौज येथे हलवण्यात आली आणि अयोध्येचे राजकीय महत्व पुन्हा कमी झाले. वाल्मिकी बहुदा अयोध्या ही गुप्त साम्राज्याची प्रांतिक राजधानी असताना आणि गुप्तांचा वैदिक धर्माला राजाश्रय असताना झाला असावा. त्यामुळेच त्याने अयोध्या हे समकालीन प्रचलित नाव वापरले असे म्हणता येते. असे असेल तर वाल्मिकीचा काळही चवथे ते पाचवे शतक असा येईल.

      गुप्त काळात वैदिक धर्माचा जोर वाढला आणि सर्वत्र प्रसाराची मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असे मानले जाते. आणि वाल्मिकी रामायणाचाही हेतू वैदिक धर्माचा प्रसार करणे हाच असल्याने याच वैदिक धर्माच्या उत्कर्षकाळात वाल्मिकीला या महाकाव्याची प्रेरणा मिळाली असणे शक्य आहे. त्यामुळे वाल्मिकी रामायणाची रचना सन तिसरे शतक (मूळ गाभा) ते पाचवे शतक (विस्तारित आवृत्ती) या काळातच झाली असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

      थोडक्यात इसपू सहावे शतक ते इसवी सनाचे तिसरे शतक या काळात साकेत हेच नाव लोकप्रिय होते. समांतररित्या अयोध्या हेही नाव अस्तित्वात असले तरी ते वेगळ्या ठिकाणावरचे दुय्यम शहर होते, साकेत आणि अयोध्येचा काही संबंध दिसून येत नाही. पातंजलीही  आपल्या महाभाष्य' मध्ये इसपु दुस-या शतकातील ग्रीक आक्रमणाच्या संदर्भात  'अरुणत् यवनः साकेतम्, अरुणत् यवनः माध्यमिकाम्,' असे उल्लेखतो. तोही अयोध्येचा उल्लेख करत नाही. काही विद्वान म्हणतात त्याप्रमाणे साकेत जर त्यावेळी उजाड झालेल्या अयोध्येचे उपनगर असते तर ही चूक झाली नसती. शिवाय कालिदासानेही रघुवंशात साकेतचाच उल्लेख रघुवंशाची राजधानी म्हणून केला असून अयोध्येचा उल्लेख तुरळक केला आहे. म्हणजे पाचव्या शतकापर्यंत अयोध्येपेक्षा प्राचीन नाव साकेत हेच विद्वतवर्तुळात वापरले जात होते.

      कुशाण सम्राट कनिष्कानेही राबटक शिलालेखात आपली सत्ता कोणत्या कोणत्या प्रांतावर आहे हे सांगताना त्या यादीत येणा-या नगरांची नावे नोंदवलेली आहेत. त्यातही अयोध्या नव्हे तर साकेत हेच नाव आलेले आहे. हा राबटक शिलालेख दुस-या शतकातील असून त्यातील चवथ्या ते सहाव्या ओळीतील हा उल्लेख महत्वाचा आहे.

      "In the year one, it has been proclaimed unto India, unto the whole realm of the governing class including Koonadeano (Kaundinya< Kundina) and the city of Ozeno (Ozene, Ujjain) and the city of Zageda (Saketa) and the city of Kozambo (Kausambi) and the city of Palabotro (Pataliputra) and so long unto (i.e. as far as) the city of Ziri-tambo (Sri-Champa)."
      म्हणजे महावीर-बुद्ध काळ ते कनिश्क काळात साकेत या नावानेच आजच्या अयोध्येला ओळखले जात होते. दुस-या शतकातील महाकवी अश्वघोष हाही साकेत नगराचा रहिवासी होता. अयोध्या नाव तेव्हाही अस्तित्वात आलेले दिसत नाही. साकेत राजकीय दृष्ट्याही महत्वाची नगरी होती. वाल्मिकी या काळात कधीही झाला असता तर त्याने रामायण लिहित असताना साकेत या नावाचाच उपयोग केला असता, अयोध्या नव्हे. दशरथ जातकात तर वाराणसी ही दशरथाची राजधानी दर्शवलेली आहे, साकेत अथवा अयोध्या नाही. रामायणातील रामकथा जर त्या काळात लोकप्रिय असती तर जातककथांत असा विरोधाभासी भाग आला नसता. त्या काळात राम या व्यक्तीभोवतीच्या दंतकथा प्रसिद्ध असल्या तरी प्रत्येक भागात रामाची राजधानी वेगळी दाखवली जाणे हे स्थानिकांच्या अहंकाराला सुखावणारे असणार. रामायणातून रामाची राजधानी अयोध्या एवढे मात्र ठळक रीत्या ठसवले गेले. पण मुळात आज जी अयोध्या म्हटली जाते तिचे आधीचे नाव साकेत होते आणि त्याही पूर्वी या नगरीला विनिता म्हणून ओळखले जात होते याचे स्मरण नंतरच्या काळात विलुप्त झालेले दिसते.

      अयोध्या हे नाव आले कोठून?

      अयोध्या हे नाव सर्वात आधी येते ते अथर्ववेदात. अष्टचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या। तस्यां हिरण्ययः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः।। हा अयोध्या शब्दाचा रूपकात्मक उल्लेख अथर्ववेदात येतो. येथे पृथ्वीवरील मानवी नगर अभिप्रेत नाही. या नावाने नंतर गंगा तीरावर याच नावाचे शहर वसवले गेले असले तरी ते बहुदा परकीय आक्रमणात नष्ट झाले असावे अथवा लोकांनी राहणे सोडल्याने ओसाड पडले असावे व लोकस्मृतीतून गायब झाले असावे. साकेतचे नाव पूर्वीपासून अयोध्या असल्याचे संकेत कोठेहे मिळून येत नाहीत. हान्स बेकर यांच्या मते  इसवी सनाच्या चवथ्या शतकात स्कंदगुप्ताची कारकीर्द असताना साकेत या शहराला राजधानी बनवताना या संदर्भाचा उपयोग केला असावा आणि साकेतचे नाव अयोध्या केले असावे. १४

     देवालये व चैत्य

      याबाबत महत्वाचा पुरावा म्हणजे अयोध्या कांडात (सर्ग ७१, श्लोक ४०, ४२-४३) देवालय आणि चैत्य यांचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात सार्वजनिक मंदिरे बांधण्याची प्रथा इसवी सन पूर्व दुस-या शतकापर्यंत आली असली भव्य मंदिरे उभारण्याची सुरुवात झाली ती गुप्तकाळात. वैदिक धर्मियांनी या काळात मुर्तीपुजाही सुरु केली होती व त्याचे निर्देशही उपरोल्लेखित श्लोकात आला आहे. सन तिस-या शतकातील कौटील्याच्या अर्थशास्त्रात अनेक नगरमंदिरांची वर्णने आहेत. (अर्थशास्त्र, ..१७-१८जैन व बौद्ध धर्माच्या प्राबल्यामुळे चैत्यांची संख्याही फार मोठी होती. चैत्य आणि मंदिरांचे उल्लेखही वाल्मिकी रामायण ही गुप्त कालीन रचना असल्याचे निर्देश देतात, कारण तत्पूर्वी ते क्वचित-वास्तव होते, त्यांची विपुलता नव्हती.

      रामायण लेखनाच्या काळाबाबत अजून एक महत्वाचा पुरावा दिला जातो व तो म्हणजे म्हणजे रामायणात असलेल्या लग्न-ग्रह-राशीचा. वाल्मिकीनुसार, श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथी आणि पुनर्वसु नक्षत्र या दिवशी झाला जेव्हा पाच ग्रह त्यांच्या उच्च स्थानावर होते. अशा प्रकारे सूर्य मेष राशीमध्ये 10 अंशांवर, मंगळ राशीमध्ये 28 अंशांवर, गुरू कर्क राशीमध्ये 5 अंशांवर, शुक्र मीनमध्ये 27 अंशांवर आणि शनि तूळ राशीमध्ये 20 अंशांवर होता. (बाल कांड 18/श्लोक 8, 9). भारतियांनी राशी व ग्रह हे ग्रीकांकडून घेतले हे आता सिद्ध झालेले आहे. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना आहे. ग्रहाधारित पंचांग प्रथम "यवनजातक" या अनुवादित पुस्तकातून प्रथम आपल्याकडे आले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. रामायणातीत तिथी ही ग्रह-नक्षत्राधारित आहे. भारतियांना ग्रह-राशीच इसवी सनापुर्वी माहित नव्हत्या तर रामजन्म "पाच ग्रह उच्चस्थानी असता..." झाला हा उल्लेखच खूप उत्तरकालीन आहे, ग्रीकांशी संपर्क आल्यानंतरचा आहे हे स्पष्ट होते. यवनजातकाचा अनुमानित काळ डेव्हिड पिंग्री यांनी इसवी सन १५० असा दिलेला आहे. काही विद्वानांनी या ग्रंथाला अजून उशीराची रचना मानली आहे. १५  म्हणजेच ही ग्रह-राशीआधारित अचूक ग्रह-स्थाने असलेली तिथी दुस-या शतकाआधीची कदापि असू शकत नाही, सबब रामायणाची रचनाही तत्पूर्वीची असू शकत नाही. यवनजातकाचा प्रसार व्हायला किमान एक शतकाचा काळ लागलेला असू शकतो हे जर गृहीत धरले तरी रामायणाची रचना तिस-या शतकानंतरची आहे हे स्पष्ट होईल. बालकांड जरी प्रक्षिप्त मानले गेले असले तरी त्यातील कथाभाग वाल्मिकीवरूनच घेत या कांडाची रचना केली गेलेली आहे असे अनेक विद्वान मानतात, कारण बालकांडातील रामजन्म व त्याचे अयोध्येतील प्रशिक्षण हा आवश्यक गाभा असल्याखेरीज रामायणाला पूर्णता येत नाही. वाल्मिकीने लिहिलेल्या बालकांडाच्या काही भागावर पुढे अजूनही काही संप्रदायात्मक संस्कार करून घाईने काही कथा जोडून शतकभरात नव्याने रचले गेले असावे.

      संस्कृत भाषेचा प्रश्न

      लिखित संस्कृतचा सर्वात पहिला पुरावाही राजा रुद्रदामनच्या गिरिनार शिलालेखात आला आहे. हा लेख सन १६५चा आहे असे मानले जाते. तत्पूर्वी संस्कृत म्हणता येईल असा एक पुरावा सनपूर्व दुस-या ते सनपूर्व पहिल्या शतकातील हाथीबाडा घोसुंडी शिलालेखाचा आहे. घोसुंडी शिलालेख भग्न झालेला असून अनेक शब्द नष्ट झालेले आहेत. त्यावरून काही प्राकृतमिश्रीत संस्कृत शब्द वाचता आलेले आहेत. इसपू तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या चारशे वर्षातील शिलालेखीय व नाणकिय पुराव्यांवरून प्राकृत भाषांतून संस्कृत भाषा क्रमश: विकसित होत होती असे दिसते. १६  दुस-या शतकात मात्र प्राथमिक संस्कृत प्राकृताचे संस्कार बाळगत विकसित झाली व तिचा साहित्यिक वापरही सुरु झाला. तत्पूर्वी संस्कृत भाषा अस्तित्वात होती असे म्हणणे पुराव्यांच्या अभावात भाषातिहासावर अन्याय करणारे आहे. ते कितीही अप्रिय वाटले तरी वास्तव नाही.

      पंडित हरगोविंददास टी. सेठ म्हणतात, "संस्कृत भाषेची निर्मिती वैदिक भाषेतून झालेली नसून ती मध्यदेशातील प्राकृतांपासुन बनली. वैदिक भाषेवरही याच भागातील प्राकृतांचा प्रभाव आहे. प्राकृतातील तद्भव शब्द संस्कृतमधुन प्राकृतात आले नसुन प्राचीन प्राकृतातुनच क्रमश: बदलत आले आहेत आणि संस्कृतमध्ये ते तसेच्या तसे घेतले गेले आहेत. या भागातील अनेक देश्य शब्द संस्कृतात सामाविष्ट नाहीत ही बाबही संस्कृत भाषा प्राकृतनिर्मित आहे असे सिद्ध करते." १७ आर्ष संस्कृतानंतर पाणिनीचे व्याकरण आले व अभिजात संस्कृतची निर्मिती झाली.

 

      विंटर्निट्झ यांनीही या मताला दुजोरा दिला आहे. ते म्हणतात की बुल्हेरच्या मते शिलालेखीय पुराव्यांवरुन व्याकरणकारांनी संस्कृत भाषा ही उत्तर भारतातील प्राकृतात सुधारणा करुन बनवली आणि मग ती सावकाश भारतभर पसरली असे मानायला जागा आहे.... महाकाव्य व पुराणांची भाषा (आर्ष) जनभाषांवर किरकोळ संस्कार करुन बनलेली होती. खरे तर अभिजात संस्कृत भाषेत महाकाव्येच लिहिली गेलेली नाहीत. त्यामुळे अनेक विद्वानांनी रामायण, महाभारत व पुराणे ही मुळात प्राकृतात लिहिली गेली असुन नंतर त्यांचा सामान्य संस्कृतमध्ये अनुवाद केला असे मानले आहे. १८  रामायण-महाभारत मुळात प्राकृतात लिहिले गेले आणि मग ते अर्धविकसित संस्कृतमध्ये अनुवादित केले गेले हे म्हणणे मात्र अतिरंजित आहे. प्राकृतात उपलब्ध असलेल्या लोकप्रिय काव्य, पुराणकथा, लोककथा, दंतकथा, वीरगीते, यांचा आधार घेत विकसित होऊ पाहणा-या संस्कृतमध्ये वैदिक धर्माची तत्वे मिसळत ही महाकाव्ये निर्माण केली गेली असे म्हणणे सत्याच्या जवळ जाणारे असेल. थोडक्यात भाषाशास्त्रीय दृष्ट्याही रामायण लेखनाचा काळ हा तिसरे ते पाचवे शतक या काळाच्या दरम्यान येतो.

      वरील विवेचनावरून हे लक्षात येईल कि कसल्याही स्थितीत वाल्मिकी रामायणाचा काळ तिस-या शतकाच्या पूर्वी जाऊ शकत नाही हे तर निश्चित आहे. रामायण हे तिसरे शतक ते पाचवे शतक या दरम्यान लिहिले गेले असून ते कसल्याही स्थितीत सनपूर्व काळातील असू शकत नाही. रामायण हे कितीही पुरातन मानले जात असले तरी त्या मानण्याला निव्वळ समजूत याशिवाय आपण दुसरी सद्न्या देऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर आपण विमल सुरी लिखित माहाराष्ट्री प्राकृतातील पउमचरिय या महाकाव्याच्या लेखनकाळाचा विचार करून आदि-रामकाव्य कोणते याचा धांडोळा घायचा आहे.

विमलसुरि-विरचित पउमचरिय

      ‘पउमचरियहे माहाराष्ट्री प्राकृतातील काव्य आहे. हे काव्य लिहिले ते विमल सुरी यांनी. वाल्मिकीचा उद्देश्य वैदिक धर्माचा प्रसार हा आहे तसाच पउमचरियचा उद्देश जैन (समण) संस्कृती आणि तत्वद्न्यानाच्या प्रसार हा आहे. वाल्मिकी रामायण आणि पउमचरियच्या कथावस्तुत लक्षणीय फरक आहे. प्राकृत काव्यामध्ये लिहिलेल्या कृतीचा काळ देण्याची काही प्रमाणात का होईना प्रथा आहे व हे महाकाव्यही त्याला अपवाद नाही. या काव्याचे महाकवी विमल सुरी यांनी स्वत:च हे लेखन कधी केले याचा महावीर संवतकाळ दिला असल्याने या महाकाव्याची काळनिश्चिती होणे फारच सोपे आहे व त्यामुळे निश्चयाने आद्य राम महाकाव्य पउमचरियहेच आहे, वाल्मिकीरचित रामायण नव्हे हे ठरवता येते. य काव्यावर जैन समण संस्कृतीचा प्रभाव असून यातील कथासूत्रे विमल सुरी यांनी स्वतंत्रपणे मौखिक परंपरेतून घेतलेली आहेत असे या काव्यातच नमूद करण्यात आले आहे.

      राम आणि लक्ष्मण ह्यांची गणना जैन आपल्या शलाकापुरुषांत (महापुरुषांत) करतात. त्यांच्या दृष्टीने राम अणि लक्ष्मण हे आठवे बलदेव-वासुदेव होत. राजा श्रेणिक व गौतम गणधर यांच्या संवादाच्या पार्श्वभूमीवर विमलसूरीने जैनमतानुसार आपली रामकथा मांडलेली आहे. विविध रामकथा  अनेक विपरीत आणि असंभवनीय अशा गोष्टींनी भरलेले आहे, अशी विमलसूरीची भूमिका आहे. उदा., रावण हा राक्षस असून तो मांस खात असे, इंद्राचा पराभव करून रावणाने त्याला शृंखलाबद्ध अवस्थेत लंकेस आणिले इत्यादी. रावणास दशानन म्हटले जाते, त्याचे कारण ह्या महाकाव्यात दिले आहे. रावणाच्या आईने त्याच्या गळ्यात नवरत्‍नांचा सुंदर हार घातला होता. त्या हारातील प्रत्येक रत्‍नात एक, अशी रावणमुखाची नऊ प्रतिबिंबे पडत असत. ही नऊ प्रतिबिंबे आणि रावणाचे प्रत्यक्ष मुख मिळून तो दशानन झाला. भीमारण्यात जाऊन त्याने अनेक विद्यांचा अभ्यास केला होता. तो जिनेंद्राचा भक्त होता अनेक जिन मंदिरे त्याने उभारली होती. दंडकारण्यात राहत असताना लक्ष्मणाने रावणाची बहीण चंद्रनखा हिच्या शंबूकनामक पुत्राला ठार केले होते. तिचे दुःख पाहून रावण आपल्या पुष्पक विमानात बसून आला व सीतेला त्याने पळवून नेले. एका मुनीकडे रावणाने परदारात्यागाचे व्रतही घेतले होते. सीतेला संतुष्ट करून तिच्या पूर्ण संमतीनेच तिला प्राप्त करून घेण्याचा रावणाचा निश्चय होता. पुढे जे युद्ध झाले, त्यात रावण रामाकडून नव्हे, तर लक्ष्मणाकडून मारला गेला असे त्यात म्हटले आहे. स्वतःविषयीचा संशय नष्ट करण्यासाठी सीतेने अग्‍निदिव्य केले; परंतु त्यातून यशस्वीपणे बाहेर आल्यानंतर तिने जैन धर्माची दीक्षा घेतली. लवण व अंकुशानेही दीक्षा घेतली. रामाने तपाचरण करून निर्वाणपद मिळविले.    सातव्या शतकात दिगंबर जैन आचार्य रविषेण ह्याने संस्कृतात लिहिलेल्या पद्मपुराणावर विमलसूरीचा प्रभाव आहे. ह्या महाकाव्याची हेर्मान याकोबीने संपादिलेली प्रत १९१४ मध्ये प्रसिद्ध झाली असली तरी तिचा फारसा प्रसार न केला गेल्याने हे महाकाव्य दुर्लक्षित राहिले असे म्हणावे लागेल.

      प्राकृत साहित्य हे संस्कृत साहित्यापेक्षा पुरातन असून त्याची विपुलताही लक्षणीय आहे. पउमचरिय लिहिले गेले त्यावेळेस श्वेतांबर व दिगंबर हा भेद ठळक व काटेकोर झालेला नव्हता कारण या काव्यात कोणताही पंथाभिनिवेश आढळून येत नाही. या काव्यातील जैन माहाराष्ट्री प्राकृत पुरातन  शैलीतील असून ती व्याकरणीय दृष्ट्या पूर्ण विकसित झालेली नाही असे मत हरमान याकोबी यांनी व्यक्त केले आहे. १९  प्रस्तूत काव्य लिहिण्यासाठी आपण मौखिक परंपरेने चालत आलेल्या नामावलीसारख्या लोकसाहित्याचा आधार घेतला आहे आणि गाथा छंदात हे काव्य रचले असे स्वत: कवीच म्हणतो. (पउमचरिय, अध्याय पहिला.) याचा अर्थ त्यावेळेस अन्य कोणतेही लिखित काव्य अथवा महाकाव्य अस्तित्वात नव्हते. म्हणजेच वाल्मिकी रामायणही तोवर लिहिले गेलेले नव्हते, पण लोककथांत रामकथेची वेगवेगळी रूपे मात्र प्रचलित होती. किंबहुना रामकथांवर पउमचरियच्या आधी कोणतेही (प्राकृत अथवा संस्कृत) महाकाव्य लिहिले गेले नव्हते.

      हे काव्य कधी लिहिले याबाबत कवी लिहितो,

      “पचेव य वाससया दुसमाए तीस वरिस संजुत्ता I

      वीरे सिद्धिं उवगवे, तओ निबद्ध इम चरियं II” (पउमचरिय)

      म्हणजे महावीरांच्या निर्वाणानंतर ५३० वर्षांनी हे काव्य लिहिले असे विमल सुरीने स्वत: नोंदवून ठेवले आहे. महावीरांचे निर्वाण इसपू ५२६ मध्ये झाले असे मानले जाते. त्यात वीर संवताचे ५३० वर्ष मिळवले तर साधारणपणे इसवी सन ४ हे वर्ष पउमचरियच्या लेखनाचे आहे असे मानावे लागते. याकोबी यांच्या मते महावीरांचे निर्वाण इसपू ४६७ मधले आहे. हा अंदाज मान्य केला तर पउमचरियचा लेखनकाळ इसवी सन ६४ असा येतो. लिउमान यांनी इसवी सन ४ हे वर्ष मान्य केले आहे तर विंटरनित्झ हे सन ६४ हे वर्ष मान्य करतात. २० पंडित हरगोविंद सेठ ही रचना इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे असे प्रतिपादन करतात. २१       पंडित प्रेमी यांनीही विमल सुरी यांनी दिलेला वीर संवत ५३० म्हणजे इसवी सन ४ हा काळ बरोबर असल्याचे सविस्तर विवेचन करून सांगितले आहे. २२

      शिवाय या काव्यात श्वेतांबर-दिगंबर हे पंथ निर्माण होऊन कट्टरतेने वेगळे होण्याच्या काळाआधीच हे काव्य लिहिले गेले आहे कारण या काव्यात दोन्ही पंथांच्या मान्यताचा व वैशिष्ट्यांचा समावेश आहे.२३ यावरूनही इसवी सनाचे पहिले शतक हा काळ बरोबर आहे असे दिसते.

      पउमचरियमध्ये दिली गेलेली इक्ष्वाकू वंशावळी वाल्मिकी रामायणापासून भिन्न आहे. मात्र ती पुराणांतील वंशावळीशी जुळते. याचाच अर्थ असा होतो कि पउमचरीय लिहिले गेले तेंव्हा विमल सुरी यांच्यासमोर वाल्मिकीरचित रामायण अस्तित्वात नव्हते तर परंपरेने चालत आलेला इतिहास होता असेच दिसते.२४  पउमचरियमध्येही हनुमानाच्या जन्मासंदर्भात ग्रह-लग्न-राशीचा एकदा उल्लेख आलेला आहे त्यामुळे हे काव्यही तिस-या शतकानंतरचे असले पाहिजे असेही मत याकोबीसारख्या काही विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. याकोबी यांच्या मते काही ग्रह हे पउमचरियमध्ये ग्रीक नावांनी अवतरतात. ग्रीक ज्योतिषाशी भारतीयांचा परिचय झाल्यानंतर, म्हणजे तिस-या शतकानंतर हे काव्य लिहिले गेले असले पाहिजे.” (Modern Review, १९१४) पण हा युक्तिवाद टिकत नाही कारण पउमचरियमध्ये आलेली ग्रह-राशींची माहितीच मुळात ऐकीव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या चुकीची आहे. उदा. प्रा. अभ्यंकर हनुमंताच्या कुंडलीबाबत म्हणतात, “या काव्यग्रंथात येणारी  ग्रहराशींची माहिती चुकीची आहे. ती खरी मानली तर कवीचे ज्योतिषज्ञान आश्चर्यकारकरित्या कमी दर्जाचे आहे असे म्हणावे लागेल कारण कवीने सूर्यापासून शुक्र आणि बुधातील अंतर अनुक्रमे ६० आणि १२० अंश दर्शवले आहे. २५ या म्हणण्याचा मतितार्थ असा कि दुस-या शतकातील यवनजातक ग्रंथ कवीसमोर नव्हता तर केवळ ग्रह-राशींबद्दलची ऐकीव माहिती विमल सुरींजवळ होती व त्यांनी केवळ नवेपणाच्या आकर्षणापोटी त्या ऐकीव माहितीचा उपयोग केला असावा किंवा अनेक विद्वान म्हणतात त्याप्रमाणे हा एखाद्या नवशिक्याकडून झालेला प्रक्षेप असावा, त्यामुळे त्यात अचूकता असणे शक्य नव्हते. पण माझ्या मते ही प्रत बनवणा-याकडून झालेली नसून ती मूळ कवीचीच आहे. कारण चूक अनवधानाने झाली असती व कोणाच्याही लक्षात आली असती तर ही चूक दुरुस्त केली गेली असती. पण तसे झालेले नाही, कारण यवनजातक तेव्हा उपलब्धच नसल्याने चूक कि बरोबर हे ठरवण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता.

      पण हनुमंताच्या कुंडलीबाबत केली गेलेली ही विमल सुरींची चूक मात्र सातव्या शतकातील रविसेनाच्या पद्मपुराणात दुरुस्त केली गेलेली आहे. याचा अर्थ एवढाच कि विमल सुरीन्च्या काळात ग्रीक ग्रह-राशीचे ऐकीव ज्ञान रवीसेनाच्या काळापर्यंत ग्रंथरुपात उपलब्ध झालेले होते. पद्मपुराण हे पउमचरियलाच आधार घेत संस्कृत भाषेत लिहिले गेलेले आहे हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. शिवाय रवीसेनाने यज्ञसंस्था आणि वैदिक विश्वोत्पत्तीशास्त्रावर मात्र जोरदार हल्ले चढवलेले आहेत कारण त्याच्या काळात वैदिक धर्माने जोर पकडलेला होता, त्यामुळे विधर्मी प्रचाराचा प्रतिवाद करणे त्याला आवश्यक वाटले असले पाहिजे. विमल सुरीच्या काळात मात्र ही धार्मिक संघर्षाची स्थिती नव्हती कारण तेव्हा वैदिक धर्म हा एकंदरीत दुय्यम स्थानावर होता असे समकालीन प्राकृत साहित्यावरून दिसते. हालाच्या गाथासप्तशतीतही वैदिक ब्राह्मणांचा उल्लेख नाही. या बाबतीत गाथा सप्तशतीचे संपादक स.. जोगळेकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ....गाथा सप्तशतीत ब्राह्मणांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.....त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र या वर्गाचा वा वर्णाचा गाथा सप्तशतीमध्ये मागमूसही आढळत नाही. समाजात व्यवसाय आहेत पण त्याचे जातीत वर्गीकरण झालेले नाही.....आर्य संस्कृतीचा मुलाधार मानलेल्या यज्ञसंस्थेची येथे हेटाळनी केलेली आहे....कदाचित सातवाहनांच्या राज्यात ब्राह्मण अत्यल्प असावेत...” २६ माहाराष्ट्री प्राकृतात रचल्या गेलेल्या गाथा सप्तशतीची रचना इसपू पहिले शतक ते सन पहिले शतक या दरम्यानची आहे. पउमचरिय हेही पहिल्या शतकातील महाकाव्य असून तत्कालीन सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब या महाकाव्यात पडणे स्वाभाविक आहे. शिवाय हालाच्या गाथा सप्तशतीप्रमाणे याही काव्यात गाथा वृत्ताचा उपयोग केला गेला आहे हेही येथे लक्षणीय आहे. तत्कालीन समाजस्थितीचे दिग्दर्शन या दोन्ही काव्यांवरून व्हायला हरकत नाही.

      यवन, सुरंग हे ग्रीक शब्द पउमचरिय काव्यातही आलेले आहेत, त्या आधारावरही कवीने दिलेले लेखन वर्ष चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण यवन (योन) हे सम्राट अशोकाच्या (इसपू तिसरे शतक) शिलालेखात उल्लेखले गेले आहेत. अलेक्झांडरचे आक्रमण चन्द्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीत (इसपू चवथे शतक) झालेले होते. त्यामुळे यवन भारतीयांना माहीतच होते. हीच बाब दिनार या नाण्याची. दिनार नाण्याचे उल्लेख मौर्यकालीन शिलालेखात, विशेषता: सांचीच्या एका शिलालेखात, आलेला आहे. त्यामुळे पउमचरीय ही चवथ्या शतकाच्या उत्तरार्धातील रचना असावी असे जे मत डॉ. के. आर. चंद्रा व्यक्त करतात ते मान्य करता येत नाही. २७  

      तसेच यवन (योन) व सुरंग हे शब्द पहिल्या शतकातल्या पउमचरियमध्ये किंवा तीस-या शतकानंतरच्या वाल्मिकी रामायणात आले म्हणून दचकून जाण्याचे कारण नाही. वायव्य भारतात ग्रीकांचे उपनिवेश काही शतके तरी होते तसेच अलेक्झांड्रीया नावाची अफगाणिस्तानप्रमाणे वायव्य भारतात नगरेही वसवलेली होती. सम्राट चंद्रगुप्ताचा दरबारात मेगास्थेनीज हा ग्रीक वकील तर होताच पण खुद्द चंद्रगुप्ताचा विवाह सेल्युकस निकेटर याच्या हेलन नावाच्या कन्येशी झाला होता. थोडक्यात इसपु चवथ्या शतकातच उत्तर भारतीयांचा ग्रीक संस्कृतीशी घनिष्ठ नसला तरी ब-यापैकी परिचय झालेला होता. एतद्देशीय सत्तांशी राजनैतिक संबंधही प्रस्थापित झालेले होते. त्यामुळे यवनांचा उल्लेख या ग्रंथाचा काळ दुस-या शतकानंतरचा ठरवता येणार नाही. दिनार या शब्दाबद्दलही असेच म्हणावे लागेल कारण कुशाणकाळातील अंगविज्जाया ग्रंथात नुसती दिनारादी ग्रीक नाण्यांची माहिती येत नाही तर व ऐरोदिती (एफ्रोडीटी) सारख्या ग्रीक देवतांचे मंदिरेही उत्तर भारतात निर्माण झाल्याची माहिती आलेली आहे. मथुरा येथील उत्खननात कुशाणकालीन अनेक जैन प्रतिमा व शिलालेख मिळालेले आहेत, पण वैदिक देवताचे अस्तित्व आढळून येत नाही. पहिल्या शतकात थोड्याफार फरकाने हीच स्थिती असली पाहिजे. कुशाणकाळात वैदिक धर्माचे अस्तित्व असले तरी प्रस्थ नव्हते याचे पुरावे आपल्याला राबटक शिलालेखात उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे, काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत, पण एकाही वैदिक देवतेची प्रतिमा नाही. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता किंवा हा धर्मच तेव्हा दुय्यम होता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता व समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

      ही रचना सातवाहनकाळात झाली असणार कारण ही तीच वेळ होती जेव्हा माहाराष्ट्री प्राकृत एक प्रतिष्ठेची भाषा बनली होती आणि अन्य प्राकृतभाषी प्रतीभावंतही या भाषेत लेखन करू लागले होते. याच काळातील अंगविज्जा हा ग्रंथ महाराष्ट्रात लिहिला गेला नसला तरी तो माहाराष्ट्री प्राकृतात लिहिला गेला हे येथे नमूद करणे महत्वाचे आहे.

      पहिल्या शतकात यज्ञसंस्थेवर वैदिक धर्मश्रद्धांविरोधात हल्ले करण्याचे पउमचरीयमध्ये टाळले गेलेले आहे याचे कारण त्या काळात वैदिक धर्माचे स्थान दुय्यम होते. जर वाल्मीकीचे रामायण त्यावेळेस अस्तित्वात असते तर त्यात प्रामुख्याने आलेल्या यज्ञसंस्था व वैदिक धर्माच्या मुल्यप्रसाराचा प्रतिवाद निश्चित केला गेला असता. परंतु पउमचरियमध्ये हिंसक यज्ञाचा निषेध एकाच अपवादात्मक प्रसंगात दिसतो. त्यात यज्ञातील प्राणीहिंसेचा निषेध एवढा भाग सोडला तर यज्ञकर्त्या ब्राह्मणांबाबत अभिनिवेशी व शत्रुत्व भावना जाणवत नाही. गुप्तकाळात मात्र वैदिक धर्म राजाश्रयामुळे फोफाऊ लागला आणि यज्ञांचे प्रमाण वाढत गेले. तत्पूर्वीचे यज्ञाबाबतचे दोन शिलालेख आहेत. सातवाहनकालीन इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट शिलालेख प्राकृत भाषेत आहे तर धनदेवचा अयोध्या शिलालेख अर्धविकसित संस्कृतमध्ये असून तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. वैदिक यज्ञांचे वर्णन करणारे शिलालेखही प्राकृत व प्राकृत प्रभावातील संस्कृतात आहेत. याचा अर्थ तोवर वैदिक धर्म दखलपात्र तर नव्हताच पण संस्कृत भाषाही पूर्ण विकसित झालेली नव्हती. त्यामुळे या काळापर्यंत संस्कृत भाषेत महाकाव्यसदृश्य रचना झाली होती असे म्हणणे अतार्किक होऊन जाते.

      पउमचरियचा उद्देश जैन धर्माची, तत्वज्ञानाची महती अधोरेखित करणे हा आहे. वाल्मिकी रामायणाचा हेतू वैदिक धर्माचे तत्वज्ञान व मुल्यांची महती गाण्याचा आहे. त्या अर्थाने दोन्ही महाकाव्ये धार्मिक प्रेरणांनी लिहिली गेलेली आहेत. एका जैन धर्मियाने रामकथांचा उपयोग प्रतिस्पर्धी जैन तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केला तसाच आपण वैदिक धर्मप्रसारासाठी करावा असे वाटल्याने वाल्मिकीने रामायण लिहिले असावे अशी शंका यावी असे दोन्ही महाकाव्ये वाचल्यानंतर वाटणे स्वाभाविक आहे.

      पउमचरिय ११८ अध्यायांचे काव्य आहे. राम, लक्ष्मण व रावण यातील समतुल्य व्यक्तिरेखा असून ते जैन तत्वज्ञानाच्या परंपरेशी निकटचे नाते दर्शवतात. विमल सुरीच्या काळात प्रचलित असलेल्या विविध रामकथा व रामकाव्यांतील विसंगत्या दूर करण्याच्या हेतूने हे रामकाव्य लिहिलेले आहे असे कवी श्रेणिक व गौतम गणधरामधील तिस-या अध्यायातील संवादातून सुरुवातीलाच स्पष्ट करतो. तो येथे एका महाकाव्यातील विसंगती म्हणत नाही तर प्रचलित विविध कथा-काव्यांना उद्देशून प्रतिकूल मत व्यक्त करतो हे अनेकवचनी विधानातून येते हे येथे लक्षणीय आहे. विविध प्रकारच्या परस्परविरोधी आणि काही अतार्किक कथा वा अविश्वसनीय व्यक्तीविशेष सांगितल्या जाणा-या कथांना सुसंगत व पटेल असे वळण द्यावे असे एखाद्या प्रतिभावंताला वाटणे स्वाभाविक म्हणता येईल.

      विमल सुरीची रामकथा आणि वाल्मिकीची रामकथा यात काही अंश सारखा असला तरी विभेद मात्र जास्त आहेत. दशरथाचा कैकयीशी झालेला विवाह आणि नंतर तिला दिलेले वरदान ही कथा वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळी आहे. बिभिषणाने दशरथाच्या हत्येचा आखलेला कट आणि दशरथाने आपल्या शय्येवर पुतळा ठेवून तो कट विफल केला, सीतेने रामाला का वरले आणि त्या धनुष्याची कथाही अत्यंत वेगळी असून रोचक आहे. रामाचा आणि त्याच्या भावांच्या जन्माचीही कोणतीही दैवी कथा विमल सुरीने जोडलेली नाही जशी वाल्मिकीने जोडली आहे. विमल सुरीने रामाचा चेहरा कमलाप्रमाणे असल्याने त्याला पद्महे नाव दिले गेले असे सांगितले आहे. हनुमंताच्या जन्माची आणि कार्यकर्तुत्वाची कथाही वेगळी आहे. विमल सुरीकडे रामकथेबद्दल अधिक प्रामाणिक स्त्रोत होते असे बहुतेक विद्वान मान्य करतात.

      रावणाला नायकत्व बहाल करण्याचे आद्य श्रेयही विमल सुरीलाच द्यावे लागेल. विमल सुरीचा दृष्टीकोन हा अधिक उदार व सहृदयी आहे. आर्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे या ध्येयाने पछाडलेल्या वाल्मिकीने वानर, यक्ष व रावणादी राक्षसांकडे (म्हणजे अनार्यांना) पूर्वग्रहदुषित दृष्टीने पाहणे स्वाभाविक आहे. पण समण या एतद्देशीय उदात्त संस्कृतीतून आलेल्या विमल सुरीला या सर्वांकडे शत्रूभावाने पाहण्याचे कारण नसल्याने त्याचे चित्रण जैन पुराकथांचे लेप सोडले तर अत्यंत वास्तवदर्शी आहे असे म्हणावे लागेल. वाल्मिकीने समण संस्कृतीकडेही निंदाव्यंजक दृष्टीने पाहिले असल्याचे आपल्याला वाल्मिकी रामायणावरून दिसेल. राम पुरातन व्यक्तिरेखा आहे हे दर्शवण्यासाठी वाल्मिकीने वेदांत उल्लेखित ऋषींना रामाच्या समकालीन आणून ठेवले आहे. देशात सर्वत्र वैदिक धर्म पसरला असल्याचे दाखवण्यासाठी त्याने या वैदिक ऋषींचे आश्रम सर्वत्र विखुरलेले असल्याचेही दाखवले आहे. एका काव्याच्या माध्यामातून धर्मप्रभुत्व निर्माण करणे हा उदेश असल्याने ते स्वाभाविकही म्हणता येईल. विमल सुरीचाही प्राथमिक उद्देश जैन धर्माची महती राम-लक्ष्मण-रावण या व्यक्तीरेखांच्या माध्यमातून दाखवायची आहे.

      देवकुले (मंदिर नव्हे) व चैत्यांच्या वर्णनांवरूनही पउमचरियची प्राचीनता सिद्ध होते. पउमचरियमध्ये चैत्यांचे व देवकुलांचे (घरातील देव्हा-यांचे) विपुल उल्लेख आहेत. यज्ञाचे वर्णन केवळ दोनेकदा आलेले आहे. हिंदू तेव्हा सहसा सार्वजनिक मंदिरे बांधत नसत. ती सुरुवात झाली ती गुप्तकाळाच्या आसपास. वाल्मिकी रामायणात येणारे मंदिरांचे उल्लेख ती रचना उत्तरकालीन असल्याचे दर्शवतात हे आपण पाहिलेलेच आहे. सातवाहन काळात मात्र छोटी देवळे असल्याचे उल्लेखही आले आहेत. इसपु दुसरे शतक ते पहिले शतक या काळातील लोकधर्मातील देवतांची काही प्रमाणात सार्वजनिक देवळे बनू लागली असली तरी त्यांचे आकार छोटे असत. इसपू दुस-या शतकातील कुनिंद नाण्यावर एका अशाच छोट्या शिवमंदिराची प्रतिमा अंकित केली गेलेली आहे. लोक सर्वसाधारणपणे घरातच किंवा उघड्यावर वृक्षाखाली इष्ट देवतांची मूर्तीपूजा करत असत. वैदिक धर्मीयांची यज्ञगृहेही घरगुती असतगुप्तकाळात मात्र स्थिती वेगळी होती. नगरात नगरदेवतेच्या मंदिरासहित दिक्पाल देवतांचीही मंदिरे असत. वैष्णव मंदिरांचीही रेलचेल वाढू लागली होती. रामायणातील नगररचना व मंदिर-चैत्यांचे उल्लेख वाल्मिकीच्या समकालीन वास्तवाची जाणीव करून देतात.

      पउमचरियची कथावस्तू पाहता हे काव्य कथासूत्राच्या धाग्यांची प्राचीन व स्वतंत्र परंपरा जपते. उत्तरकालीन जैन साहित्यात मनुचे उल्लेख येत असले तरी जैन धर्मीयांची मुळची कुलकर ही संज्ञा या काव्यात वापरली गेलेली आहे. जैनांच्या धर्मशास्त्रानुसार कुलकर म्हणजे ज्यांनी मानव जातीला बुद्धीवैभवाने जगण्याचे नवे मार्ग शिकवले ते. कुलकर शब्दप्रयोगही पउमचरियची प्राचीनता दर्शवतो.

      काव्याची प्राचीनता ठरवताना आपण साकेत कि अयोध्या या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे. पउमचरियमध्ये साकेत, साकेतपुरी (साएय) हे प्राचीन नाव आणि विनितापुरी हे नगर स्थापनेवेळचे अतिप्राचीन नाव वापरलेले आहे. उदा. पहा पउमचरिय, अध्याय ४, गाथा ५४ व   अध्याय २४ गाथा ३४.  म्हणजेच गुप्तकाळात अयोध्या हे नामकरण होण्याच्या खूप आधीच हे काव्य लिहिले गेले हे स्पष्ट आहे.

      वरील विवेचानावरून दिसून येईल कि इसवी सनाच्या चार साली रचले गेलेले जैन माहाराष्ट्री प्राकृतातील पउमचरिय हे रामावरील आद्य महाकाव्य असून त्या अर्थाने विमल सुरी आदिकवी आहेत तर हे काव्य आजच्या मराठीच्या पूर्वज भाषेत म्हणजे माहाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिले गेलेले आहे. वाल्मिकी रामायण हे इसवी सनाच्या तिस-या ते पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले असून ते काव्यदृष्ट्या सरस असले तरी त्याला आदिमहाकाव्याचे स्थान प्राप्त होऊ शकत नाही. असे असले तरी ही गफलत का झाली याची कारणेही समजाऊन घेतली पाहिजेत.

      जे जे संस्कृतमध्ये आहे ते पुरातन मानण्याची वैदिक विचारवंतांची व अभ्यासकांची सुरुवातीपासूनच पद्धत बनून गेली आहे. राम आणि वाल्मिकी समकालीन आहेत असा समज खुद्द रामायणानेच करून दिल्यामुळे  वाल्मिकीही रामाइतकाच पुरातन असला पाहिजे अशी अतार्किक कल्पना करून घेतली गेली. रामायणात वैदिक ऋषींचा वावर असल्याने राम, वाल्मिकी व हे काव्य वेदकालीन असल्याचे समज दृढ होत गेले. पुढे संशोधकांनी आधीच्या मतांतील फोलपणा ओळखला असला तरी, रामायण त्रेतायुगात लिहिले गेले नसले तरी तो काळ निश्चित बुद्धपूर्व आहे असे गृहीतक मांडायला सुरुवात केली व याही मताला छेद देणारे पुरावे खुद्द रामायणातीलच असले तरी त्यांना प्रक्षेप मानले जाऊ लागले. रामायणात रचनेचा काळच दिला गेला नसल्याने कालनिश्चिती करतांना वास्तव तर्कांचा व पुराव्यांचा विचार न करता अक्षरश: काल्पनिक गृहीतकांवर अवलंबून राहिले गेले. संस्कृत ही पुरातन भाषा हे एक मिथकीय गृहीतक निरलसपणे वापरले गेले व रामायणही पुरातन गटात टाकले गेले. प्राकृत भाषा संस्कृतोद्भव आहेत हेही चुकीचे गृहीतक धरले गेले. त्यामुळे वाल्मिकी रामायण प्राचीन आणि पउमचरिय अर्वाचीन अशी चुकीची गृहीतके आधाराला घेतली गेली. त्यामुळे आद्य राम-महाकाव्य प्राकृतात कसे असेल? ते संस्कृतातच असले पाहिजे असा अभिनिवेश विद्वानांच्या मनोव्यापारावरही प्रभाव टाकून गेला. वास्तव मात्र वेगळे आहे याचा त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न केला नाही. मराठी भाषकांनीही या वास्तवाकडे डोळेझाक केली. खरे तर  संस्कृत भाषा ही प्राकृतातून विकास होत होत इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत प्राथमिक अवस्थेत लिखित स्वरूपात अवतरू लागली याचेच सज्जड पुरावे उपलब्ध आहेत पण त्यांचा आधार न घेण्याची कृपणता दाखवली गेली. प्रत्यक्षात संस्कृत शिलालेख आणि साहित्य हे दुस-या शतकानंतरच अवतरू लागते हेही लक्षात घेतले गेले नाही. इसवी सनाच्या तिस-या शतकात पाणिनीने अष्टाध्यायीहे व्याकरण लिहिल्यानंतरच अभिजात संस्कृतमधील साहित्य अवतरू लागले. रामायणाची भाषा ही या अशा संक्रमणकाळातील आहे ज्यावर प्राकृत प्रभावातील अर्धविकसित संस्कृत आणि प्रगल्भ संस्कृत या दोहोंचे संमिश्र प्रभाव आहेत. शिवाय वाल्मिकी रामायण हेच प्राचीन काव्य मानत त्यातील अयोध्येच्या उल्लेखामुळे अयोध्या हेच प्राचीन नाव असून साकेत हे नंतरचे नाव आहे असेही चुकीचे गृहीतक घेतले गेले त्यामुळे आपण विपर्यास करत आहोत हे कोणाही विद्वानाने लक्षात घेतले नाही ही भारतीय साहित्याच्या इतिहासातील मोठीच चूक होय असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

      दोन्ही काव्यग्रंथ आपापल्या धर्माच्या प्रसारासाठी लिहिले गेले असले तरी वाल्मिकी रामायणावर (व महाभारतावरही) मात्र तसा दुरान्वयानेही कोणी आरोप करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही, कारण पारंपारिक मान्यतांचा प्रभाव सहजी झुगारला जात नाही. पण रामायण हे सर्वस्वी वैदिक धर्मतत्वांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी लिहिले गेलेले आहे हे रामायणावरून सिद्ध होते. केवळ याच अभिनिवेशी प्रवृत्तीमुळे आद्य काव्याचा दर्जा मिळण्यापासून पउमचरिय वंचित राहिले असे म्हणावे लागेल.

थोडक्यात या लेखाचा निष्कर्ष असा सांगता येईल कि पउमचरिय हे रामावरील आद्य महाकाव्य आहे तर वाल्मिकी रामायण हे काही शतकांनंतर लिहिले गेलेले महाकाव्य आहे. माराय्ठी भाषेला दिलेले जैन महाकवीचे हे सर्वात मोठे योगदान आहे.

·           

संदर्भ-

. The Society of the Ramayana by Anand Guruge, Abhinav Publications, 1991, p. 7,8.

. The History of Indian Literature, by A. Weber, Kegan Paul, Trench, Trubner & Co, 1904,  p.192.

. A History of Indian Literature, Volume 1 By Moriz Winternitz, University of Calcutta, 1927, p. 476, 517.

. रामकथा और लोकसाहित्य, ले. जय नारायण कौशिक, हिंदी बुक सेंटर, नवी दिल्ली, १९९६, पान ८.

. The Rāmāyaṇa of Vālmīki: An Epic of Ancient India.,Goldman, Robert  P (1984). Princeton University Press. pp  20-22)  J. L. Brockington (1998). The Sanskrit Epics BRILL. pp. 379.

. The Rāmāyaṇa of Vālmīki: An Epic of Ancient India by Robert Goldman, Princeton University Press, 1984,  pp 20-22 and J. L. Brockington (1998). The Sanskrit Epics,  BRILL, pp. 379.

.     The Riddle of the Ramayana, C.V. Vaidya, Meharchand Lachhmandas, 1972, pp. 21-23.

.     तत्रैव पृष्ठ ५

. The Society of the Ramayana by Anand Guruge, Abhinav Publications, 1991

१०. Buddhist India, by T. W. Rhys Davids, Motilal Banarasidass Publishers, 1997, p. 39.

११.  On Yuan Chwang’s Travels in India, 629 – 645 AD, Vol. 1, by Thomas Watters, London Royal Asiatic Society, 1904, p. 354.

१२. सुत्तपिटक का संयुत्त निकाय, पहला भाग, अनुवादक भिक्षु जगदीश काश्यप, महाबोधी सभा, सारनाथ, १९५४, पृष्ठ १३.

१३. Ayodhya Revisited by Kishore Kunal, Ocean Books Pvt. Ltd, 2016, p. 7-9.

१४. Ayodhya, part 1, Hans Bakker, Pub. E. Forsten, 1986, page 12.

१५. The Date and Nature of Sphujidhvaja's Yavanajātaka Reconsidered in the Light of Some Newly Discovered Materials Bill M. Mak Kyoto University.

१६.  प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास, संजय सोनवणी, प्रकाशक-चिनार पब्लिशर्स, २०२०.

१७.पाइअ सद्द महनणवो,(Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-Hindi Dictionary), पंडीत हरगोविंद सेठ, (पहिली आवृत्ती-१९२८) नवीन आवृत्त्यांचे प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, पुनर्मुद्रण १९८६, पृष्ठ ५७.

१८. A History Of Indian Literature, vol.1, by Winternitz, M., 1927, Univercity of Calcutta, pp. 15, 44.

१९. “Some Ancient Jaina Works”, By Hermann Jakobi in Modern Review, December 1914.

२०. A History Of Indian Literature,vol.1, by Winternitz, M., पान ५१४ आणि Vol. , पान ४७८, 1927, University of Calcutta.

२१. पाइअ सद्द महनणवो,(Paia-sadda-mahannavo (A Comprehensive Prakrit-Hindi Dictionary), पंडीत हरगोविंद सेठ, (पहिली आवृत्ती-१९२८) नवीन आवृत्त्यांचे प्रकाशक- मोतीलाल बनारसीदास, पुनर्मुद्रण १९८६.

२२. जैन साहित्य और इतिहास, पंडीत नाथुराम प्रेमी, हिंदी ग्रंथ रत्नाकर, मुंबई, १९५६. पान- ८७, ९१.

२३. Paumchariy, edited by Shri S. C. Upadhyaya, R.P. Kothari & Co., 1934, p-21-22.

२४. A Critical Study of Paumchariyam by Dr. K.R. Chandra, Research Institute of Prakrit Jainology & Ahimsa, Vaishali, 1970, पृष्ठ १६.

२५. तत्रैव, पृष्ठ २८.

२६. हाल सातवाहनाची गाथासप्तशती, संपादक- . . जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२.

२७. A Critical Study of Paumchariyam by Dr. K.R. Chandra, Research Institute of Prakrit Jainology & Ahimsa, Vaishali, 1970, पृष्ठ १६.

 

प्रकरण चार

पादलिप्ताचार्यकृत तरंगवई

      “ज्याच्या मुखातून निर्झराप्रमाणे तरंगवती सारखी अप्रतीम काव्यनदी प्रवाहित झाली त्या पालित्ताला (पादलिप्ताला) मृत्यू देणा-या यमाचे मस्तक का छिन्न-भिन्न झाले नाही?” असा उद्विग्न प्रश्न विचारून उद्योतनसुरि म्हणतो, “तरंगवइ म्हणजे चक्रवाक-युगलाप्रमाणे शोभित असलेली, राजहंसांना प्रमोदित करणारी, हिमालयातून प्रवाहित झालेल्या गंगेसारखी आहे जी पादलिप्ताच्या मुखातून वाहिली.” 

      पालित्त (संस्कृत पादलिप्त) हा सातवाहनकालीन थोर कवी. याच्या अनेक गाथा हालाने संपादित केलेल्या गाथा सप्तशतीमध्ये सामाविष्ट आहेत. आज तरंगवइ (तरंगवती) हे काव्य उपलब्ध नसले तरी या काव्यातील अनेक उद्धरणे उत्तरकालीन साहित्यात दिलेली आहेत त्यावरुनही तरंगवतीमधील प्राकृत भाषेच्या सौंदर्याचा अंदाज येतो. निशिथ चुर्नी आणि विषेशावष्यक भाष्यामध्येही या मूळ काव्याची उद्धरणे आलेली आहेत. या कथाग्रंथाची प्रशंसा प्रभावक चरित लिहिणा-या प्रभाचंद्र सुरि यानेही केलेली आहे. यावरून या काव्याची ख्याती किती मोठी होती याची कल्पना येते. एक लोकोत्तर कथा म्हणून या कथेची ख्याती मोठी आहे. एका अर्थाने मराठीतील हे पहिले प्रेमकथात्मक साहित्य आहे असे म्हणता येईल.

      हे काव्य कालौघात नष्ट झाले असले तरी या कथा-काव्याचा संक्षित अनुवाद तरंगलोलाया नावाने केला असून संक्षेपकर्त्याचे नाव नेमिचंद्र गणी (यश) असे आहे. हा संक्षेपच छापील सव्वाशे पानांचा असून त्यावरून मुळची रचना किती मोठी असेल याची कल्पना येते.

      पादलिप्तसुरि यांचा इतिहास आपल्याला त्यांच्याबाबतीत प्रचलित असलेल्या दंतकथांमधून माहित होतो. त्यानुसार राजा हाल सातवाहनाच्या दरबारातील ते एक प्रतिष्ठित कवी होते. बृहत्कथेचा लेखक गुणाढ्य त्यांच्या समकालीन होता. बृहत्कथा आज उपलब्ध नसली तरी तिचा प्रभाव जागतिक साहित्यावर फार मोठा आहे. तरंगवई ही भारतात लिहिली गेलेली आद्य प्रेमकथा त्यामुळे तिचे हे स्थानही महत्वाचे आहे. किंबहुना या अद्भुतरम्य कथाख्यानाचा प्रभाव उत्तर कालीन भारतीय लेखकांवर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. पण तरंगवईचेही दुर्भाग्य असे कि आज ती मूळ स्वरुपात उपलब्ध नाही. दोन्ही कृती नंतर झालेल्या संस्कृत रुपांतर अथवा संक्षेपामुळे आज आपल्याला माहित आहेत.

      दुस-या एका दंतकथेनुसार पादलिप्त कुशाण सम्राट कनिश्काच्या मुरुंड नामक सुभेदाराचा मित्र होता. असे असेल तर पादलिप्ताचा काळ साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या अंतिम उत्तरार्धात येईल. परंतू हाल सातवाहनाचा काळ त्याहूनही किमान ५०  ते ७५ वर्ष जुना असल्याने आणि गाथा सप्तशतीत पादलिप्ताच्या अनेक गाथा सामाविष्ट केल्या गेलेल्या असल्याने पादलिप्त हा सम्राट हाल सातवाहनाच्या समकालीन होता हे मान्य करावे लागते. हालाने आपल्या दरबारात अनेक साहित्यिक-कलावंतांना स्थान दिले होते. “तरंगवईची रचनाही त्याच्याच काळात झाली असणे अगदीच संभवनीय आहे.

      प्रबंध चिंतामणी वरून मिळणा-या माहितीनुसार पादलिप्तसुरि हे प्राचीन भारतीय रसायनज्ञ नागार्जुन (तिसरे) यांचे गुरु होते. नागार्जुन हे तंत्रशास्त्राचे उपासक होते व त्यांना रसायनविद्या आणि हलक्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची मायुरी विद्या एका तपस्व्याकडून प्राप्त झाली होती. भारतातील खनिजांपासून विविध रसायने आणि धातुपाषाणांपासून (खनिजांपासून) शुद्ध धातू तयार करण्याच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. पारा व इतर धातू यांपासून अनेक पारदमेले (पारा आणि त्या त्या धातू यांच्या संमिश्रधातू) त्यांनी बनविली. नागार्जुन यांनी रसरत्नाकर या नावाचा एक ग्रंथ लिहिला त्यात अनेक रासायनिक प्रक्रिया आणि प्रायोगिक उपकरणे यांसंबंधी माहिती आहे. सुश्रुतसंहिता ह्या ग्रंथाचे संपादन पुन्हा झाले असावे व ते नागार्जुन यांनी केले असावे, असे विद्वानांचे मत आहे. असे बा. मो. कानिटकर व य. त्र्यं. भालेराव मराठी विश्वकोशामध्ये म्हणतात

      तरंगवई ही एक उदात्त प्रेमकथा आहे. जन्म-मरण चक्रातील घटनांच्या स्मृतीबोधाचा कथात्मक उपयोग करून घेण्याची सुरुवात करणारा हा सर्वात पहिला ग्रंथ आहे अशी विद्वानांची मान्यता आहे. कर्मसिद्धांताशी हे जीवनचक्र संबद्ध असल्याने जैन तत्वज्ञानाचे सारही त्यातून अभिव्यक्त होते.

      त्याग, समर्पण, आत्मशोध, जीवनातील चढउतार, शोक, संघर्ष, करुणा, सहिष्णुता आणि समर्पण अशासारख्या मानवी भावनांनी ओतप्रोत असलेली ही कथा अत्यंत चित्रशैलीत लिहिली गेलेली आहे. त्या वेळचे सामाजिक जीवन यातून येते. तेव्हा चोरांचीही चोरपल्ली सारखी गावे असत असे या कथेतून दिसते. सार्थवाह (व्यापारी तांड्याचा प्रमुख) कशा रीतीने त्या काळात व्यापार करत, त्यांना कोणती अरिष्टे येत, राजरक्षक कसे वर्तन करत याचेही वास्तवपूर्ण चित्रण या कथेत आहे. कात्यायनी सारख्या देवतेला नरबळी कसे दिले जात याचेही अंगावर काटा आणणारे वर्णन  या कथेत येते.

      तरंगवई ही या कथेची नायिका. भारतातील आद्य कथासाहित्याची नायिका एक युवती असावी आणि तिच्या धैर्याचा सहानुभूतीपूर्वक पण वास्तव आलेख या कथेत यावा हे एक या कथेचे मोठे वैशिष्ट्य आहे. तत्कालीन समाजात स्त्रियांचे स्थान किती महत्वाचे होते हेही या काव्यावरून अधोरेखित होते. तणाव व संघर्षाची स्थिती अनेक ठिकाणी कलात्मक दृष्टीने करणे हेही कौशल्य पादलिप्ताने साधले आहे.  ही कथा एका अर्थाने साहसी शोधकथाही आहे. नायिकेच्या चरित्र चित्रणात या कथा-काव्याला मोठी सफलता प्राप्त झाली आहे. किंबहुना आधुनिक कथा साहित्याचे अनेक पैलू या काव्यात दिसून येतात. त्या दृष्टीनेही हे कथाकाव्य उल्लेखनीय आहे. या काव्यकथेला भारतातील आद्य स्त्रीवादी कथा-काव्य म्हटले तरी त्यात किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. अर्थात मूळ माहाराष्ट्री प्राकृत तरंगवई मात्र आज उपलब्ध नसावी हे मोठेच दुर्दैव आहे. ती उपलब्ध असती तर भाषेची सौंदर्येही आपल्याला अनुभवता आली असती

      या कथेचा (संस्कृत संक्षेप तरंगलोलाचा) हिंदी अनुवाद प्रीतम संघवी यांनी केलेला असून तो पार्श्व इंटरनेशनल शैक्षणिक और शोधनिष्ठ प्रतिष्ठान या अहमदाबाद येथील संस्थेने १९९९ साली प्रकाशित केला होता

·          


 

प्रकरण पाच

अंगविज्जा

       रूढ अर्थाने हा साहित्य ग्रंथ नाही. शरीरलक्षणावरून भविष्य कसे कथन करावे हा या ग्रंथाचा उद्देश्य. परंतु या निमित्ताने भारतातील पहिल्या व दुस-या शतकाच्या दरम्यानची सामाजिक परिस्थिती समजावून घ्यायला हा ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे त्यामुळे मी प्रस्तुत ग्रंथ चर्चेसाठी घेतलेला आहे. हा ग्रंथही प्राचीन मराठीत असून तत्कालीन भाषेचे प्रभाव आजच्याही भाषेवर कसे दिसतात हे पाहण्यासाठी हा ग्रंथ मोलाचा आहे कारण हा ग्रंथ पद्यात नसून गद्यात आहे. काव्यातील भाषा ही लालित्यपूर्ण असल्याने व छंदात बांधावी लागत असल्याने तिच्यावरून जनभाषेचे स्वरूप समजण्यात अडचण येते. हा ग्रंथ गद्यात असलेला प्राचीन मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, त्यामुळे या ग्रंथाचे स्थान मराठी भाषेच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे आहे.     

      आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे, पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात जैन लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनविषयक मजकूर टाळून आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.
      अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गहवइ” (संस्कृत गृहपती) या संज्ञेने हिंदू धर्मातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) कृषी व व्यापार क्षेत्रात असलेल्या प्रतिष्ठित वर्गाची ओळख मिळते. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समण (श्रमण) म्हणत असत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्र, यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाही, म्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच एक प्राचीन नांव होय.
      त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र त्या काळात सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही होता व त्यात सर्वच भाग घेत असत असे अंगविज्जावरुन दिसते.  काही लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत, पण ही वैदिक दैवते फारशी प्रतिष्ठित नव्हती.

      आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. या काळात जैन धर्मियांचेही स्तूप असत. सम्राट कनिश्क एकदा चुकून बौद्ध स्तूप समजून जैन स्तूपात गेला होता अशी आख्याइका प्रसिद्ध आहे. यावरून दोन्ही धर्माच्या स्तूपात आश्चर्यकारक रीत्या साम्य असावे. पुढे जैनांनी स्तूपरचना सोडून दिली. पण वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

      त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती.

      जैनांच्या देवता द्वीपकुमारी दिशा कुमारी यांचे उत्सव होत तर जैन धर्मीय, वैदिक वगळता, अन्य धर्मीयांप्रमाणे नागपूजाही मणियार नागाच्या रुपाने करत असत. बहुतेक सर्वांच्याच घरात देवघराप्रमाणे नागघरही असे. बौद्ध स्तुपांचीही त्या काळात महत्ता होती हे सामाजिक वास्तव अंगविज्जामधील स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. यज्ञघरे (यज्ञशाला) मात्र अपवादानेच असत.

      अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांची सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे.

      कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.  कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दिनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासक, अर्धमासक, ररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लस ऑफ अरेथ्रीयन सी (सन ७८) या ग्रंथातही येतात आणि आपल्याला तत्कालीन स्थितीचे वास्तव चित्र उभे राहते. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.   

      अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज उद्योग व व्यापारी श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.
      या ग्रंथातील असंख्य शब्द मराठीत आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) तट्टक (ताट), चम्मक्खील्ल (चामखीळ), पल्ल्हथी (पालथी) इत्यादि आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच पण "कारूकम्म" (कारुकर्म) हा तेंव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही "कारू" जातसमुहासाठी वापरला जातो. असे असंख्य शब्द आहेत जे थोडे ध्वनीबदल करून आपण आजही मराठीत दैनंदिन जीवनात वापरत असतो.
      अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही या शास्त्राच्या अनावर आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने एरवी अन्य जैन, बौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.

·           

 

संदर्भ:

१.      The Indus Civilization, by A. H. Dani and B. K. Thapar, युनेस्को. page 274,

२.      अंगविज्जा, संपादक मुनी श्री पुण्याविजयजी, प्राकृत टेक्स्ट सोसायटी, बनारस, १९५७.

 


 

 

 

प्रकरण सहा

संघदासगणीविरचित वसुदेवहिंडी

 

      वसुदेवहिंडी हे संघदासगणी यांनी लिहिलेला, अनेक कथांमधून वासुदेवाची भ्रमणगाथा सांगणारा हा अत्यंत महत्वाचा आणि उत्तरकालीन लेखकांवर मोठा प्रभाव असलेला विशाल कथाग्रंथ. जागतिक कथा साहित्यावरही या ग्रंथाचा मोठा प्रभाव आहे. हा ग्रंथ अत्यंत सुंदर आणि ओघवत्या शैलीतील असून माहाराष्ट्री प्राकृत भाषेचेही वैभव या ग्रंथातून अभिव्यक्त होते. या ग्रंथाचे दोन भाग असून संघदासगणी हे पहिल्या भागाचे लेखक आहेत तर दुस-या भागाचे लेखक धर्मदासगणी हे आहेत. कदाचित मृत्यूमुळे संघदासगणी यांचे अपूर्ण लेखन नंतर धर्मदासगणी यांनी पूर्ण केले असावे

      या ग्रंथाचा लेखनकाळ नेमका काय असावा याबाबतही विद्वानांमध्ये एकमत नाही. आवश्यक चुर्नीमध्ये या ग्रंथाचा उल्लेख असल्याने हा ग्रंथ इसवी सनाच्या सहाव्या शतकाआधी लिहिला गेला याबद्दल शंका नाही. स्वत: लेखकाने या ग्रंथाचे लेखन वर्ष ५३० असे दिले आहे पण ते कोणत्या कालगणनेनुसार याचा मात्र उल्लेख नाही. हे विक्रम संवतचे वर्ष असेल तर सन ४७३ हे वर्ष येते. जे. सी. जैन हे या ग्रंथलेखनाचा काळ तिस-या शतकाचा अंतिम भाग गृहीत धरतात. विद्वानांतील हा वाद गृहीत धरला तरी वसुदेवहिंडीचा लेखन काळ इसवी सनाचे पाचवे शतक अथवा तत्पुर्वीचा असावा हे मानायला हरकत नसावी.

      लेखकाने या ग्रंथात म्हटले आहे कि वसुदेवाची भ्रमणकथा सर्वप्रथम महावीरांचे शिष्य सुधर्मन याने जंबू या आपल्या अनुयायाला सांगितली होती. ही कथा नंतर पिढ्यानुपिढ्या मौखिक परंपरेने चालत आपल्यापर्यंत पोहोचली व आपण त्याचे रसिकांसाठी लेखन करीत आहोत.

      संघदासगणी यांनी लिहिलेला भाग अपूर्ण राहिला नसून त्याच धर्तीवर धर्मदासगणीने नवीन लेखन केले व ते वसुदेवहिंडीच्या खुंटीला लटकावले असेही काही विद्वान म्हणतात. ते काहीही असले तरी दोन्ही भाग हे कथादृष्ट्या सरस असून कथासाहित्याचा अनुपम आविष्कार आहे. डॉ. लुड्‍विग् आल्सडॉर्फसारखा एखादा विद्वान ही रचना गुणाढ्याच्या बृहत्कथेवर अवलंबून आहे असे म्हणत असला तरी त्याला सहसा कोणाची सहमती नाही याचे कारण बृहत्कथा आणि वसुदेवहिंडीच्या कथावस्तूच्या स्वरूपात किंचित उद्देश्यसाम्य असले तरी तत्संबंधी कथांत कसलेही साम्य नाही. तुलना करायची म्हटले तरी मूळ बृहत्कथा आज उपलब्ध नसून सोमदेवकृत कथासरित्सागर आणि क्षेमेंद्रकृत बृहत्कथामंजिरी हे सरासरी दहाव्या शतकाच्या आसपास काश्मीरमध्ये लिहिले गेलेले संस्कृत ग्रंथ बृहत्कथेच्या मूळ स्वरुपाशी किती प्रामाणिक आहे हे ठरवता येणे कठीण कर्म आहे.

 

      या वसुदेवहिंडी या कथासंग्रहात सुट्या कथा असल्या तरी त्या परस्पराशी मोठ्या  कुशलतेने जोडलेल्या आहेत. यात सुरुवातीलाच सांगितले गेले आहे कि सत्यभामापुत्र सुभानसाठी १०८ युवती एकत्र केल्या गेल्या होत्या, परंतु त्यांचा विवाह रुक्मिणीपुत्र सांबाशी लावला गेला. यावर प्रद्युम्न वसूदेवाला म्हणाला कि, “पहा, सांबाने घरी बसल्या बसल्या १०८ वधू प्राप्त केल्या आणि तुम्ही मात्र शंभर वर्ष भ्रमंती करत राहिलात.” यावर वसुदेव म्हणाला कि, “सांब तर विहिरीतील बेडूक आहे. अगदी सहज मिळालेल्या सुखाने संतुष्ट झाला. मी शंभर वर्ष भ्रमंती करून, कोणी भोगली नसतील एवढी सुख-दु:ख भोगून स्त्रिया प्राप्त केल्या आहेत.” आणि येथून कथाप्रवेश होतो.

      कृष्णपिता वसुदेव हा अंधकवृष्णीचा लहान मुलगा. वसुदेवाचा वडीलभाऊ समुद्रविजय गादीवर आल्यानंतर त्याने पाहिले, की वसुदेवाचे सौंदर्य व कलाप्रेम यांमुळे राजधानीमध्ये तरुण स्त्रिया अस्वस्थ होत आहेत. त्यामुळे मत्सर निर्माण होऊन त्याने वसुदेवाला स्थानबद्ध केले. तथापि वसुदेव अतिशय गुप्तपणे कैदेतून निसटला व १०० वर्षे देशोदेशी भ्रमंती करीत राहिला. या भ्रमंतीमध्ये त्याला पडलेले कष्ट, प्रतिवर्षी होत गेलेली त्याची लग्ने व इतर रोमहर्षक घटना वर्णन करताना शलाका-पुरुषकथा, केवलीकथा इ. विविध कथा व उपकथा या ग्रंथामध्ये रंगविल्या आहेत. कथोत्पत्ती या अधिकारानंतर वस्तुतः मूळ ग्रंथाशी संबंध नसलेले धम्मिलहिंडीनामक प्रकरणही समाविष्ट करून त्याचा मूळ कथेशी संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला आहे.  अर्थात धम्मिलहिंडी वासुदेवाच्या भ्रमणगाथेएवढीच रोमहर्षक आहे.

      धम्मिल हा एक सार्थवाहपुत्र असून त्यानेही देश-विदेशात हिंडून ३२ विवाह केले होते. या प्रकरणातील सर्व पार्श्वभूमी सार्थवाहांच्या जीवनाशी निगडीत आहेत. व्यापारी तांड्यातील विविध व्यापारी देशोदेशी व्यापार करीत असत. ही प्रवासवर्णने अत्यंत जिवंत उतरले असून भूगोलाची किती विस्तृत आणि सखोल माहिती संघदासगणीला होती याचे कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटते. किंबहुना प्राचीन व्यापारी मार्गांची एवढी सखोल माहिती कोणत्याही अन्य भारतीय साहित्यात आलेली नाही. अगदी हुंझा या हिमालयीन भागातून मध्य आशियात जाणा-या जगातील सर्वात कठीण व्यापारी मार्गाचेही वर्णन व विवरण या कथाग्रंथात आलेले आहे. त्या दृष्टीने व तत्कालीन व्यापाराबाबतची वास्तवदर्शी माहिती प्राप्त करायलाही हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे

      कृष्णपिता वसुदेव याची ही भ्रमणगाथा म्हणजे आद्य थरारक प्रवासवर्णन असे म्हणायलाही हरकत नाही. संघदासगणी ह्याने माहाराष्ट्री-पाकृतमध्ये ह्या ग्रंथाची रचना केली. जैनांच्या आगमबाह्य वाङ्‍मयातील हा सर्वांत प्राचीन व त्यामुळे उत्तरकालीन लेखकांचे स्फूर्तिस्थान असलेला कथासंग्रह. भाषा, साहित्य व इतिहास या दृष्टींनी तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूस्वरूपाच्या या ग्रंथाचे २९ लंभक (लंबक’ = अध्याय- ११,००० श्लोकप्रमाण) आहेत. ह्या २९ लंभकांपैकी १९ व २० हे अनुपलब्ध आहेत २८ वा लंभक अपूर्ण आहे. या कथेचे एकंदर सहा विभाग (अधिकार) आहेत. ते असे : () कहुप्पत्ति (कथोत्पत्ती), () पीढिया (पिठिका), () मुह (मुख), () पडिमुह (प्रतिमुख), () सरीर (शरीर), () उवसंहार (उपसंहार).

      वसुदेवहिंडी हा ग्रंथ मुख्यतः समासप्रचुर गद्यात लिहिला असून मधूनमधून येणारे खुसखुशीत संवाद, पद्यरचना व सुभाषिते त्यामध्ये विपुल आहेत. भाषा प्रसन्न व ओघवती आहे. चरित, कथा आणि पुराण या तिन्हींचे मिश्रण त्यात आढळते. अगडदत्त-चरित, जंबूचरित, समरादित्य इ. कथा उत्तरकालीन लेखकांनी या ग्रंथापासून घेतल्या. यातील कथा सरस असून अरेबियन नाइट्समधील कथांपेक्षाही अद्‍भुत वाटतात.

      या ग्रंथाची खालील वैशिष्ट्ये सांगता येतील-

१.      लोककथेच्या तत्वांवर आधारित सुंदर विवेचन.

२.      मनोरंजनाची सर्व तत्वे विद्यमान असणे.

३.      अद्भुत युवती आणि त्यांचे साहसी प्रेमी यातून निर्माण होणा-या अद्भुतरम्य कथा, राजा आणि सार्थवाहांची कपट-कारस्थाने, राजतंत्र, विनोद-उपहास, युद्ध, पिशाच्च, पशु-पक्षांना सामाविष्ट करत निर्माण केलेल्या अजोड कथायात आहेत. यातून मनोरंजन तर होतेच पण कुतूहल शमवणारे ज्ञानवर्धक तत्वही यात विद्यमान आहे.

४.      सरळ आणि अकृत्रिम पद्धतीने भाषेचे सौंदर्य व सौष्ठव यातून दिसते.

५.      निष्काम प्रेमाचेही हृद्य चित्रण यात येते.

६.      या कथाग्रंथात सामान्यातिसामान्य, तिरस्करणीय वाटतील अशा  पात्रांनाही महत्वाचे स्थान मिळालेले आहे. उदा. चोर, विट, वेश्या, धूर्त, कपटी, ठग, लुच्चे,आणि बदमाशांचेही चित्रण यात असल्याने तत्कालीन समाजस्थितीचे मनोज्ञ दर्शन घडते. जनसामान्यांची मराठी भाषा कशी होती  याचेही ज्ञान आपल्याला या ग्रंथातून होते. एका अर्थाने ही सामाजिक कादंबरीची सर्व मुलतत्वे पाळत साहित्यिक उंची गाठते.

७.      प्राचीन सागरी आणि खुश्कीच्या व्यापारी मार्गांची वास्तवपूर्ण माहिती या ग्रंथातून तर मिळतेच पण व्यापा-यांना त्या काळात करावी लागणारी साहसे समजतात. तत्कालीन अर्थजीवनाची व व्यापारव्यवस्थेचेही सखोल दर्शन या ग्रंथातून घडते.

 

      ह्या ग्रंथाचे संपादन मुनी पुण्यविजयजी ह्यांनी केले असून (१९३०) त्याचा गुजराती अनुवाद प्रा. सांडेसरा ह्यांनी केला आहे (१९४६).धर्मसेनगणी ह्या ग्रंथकाराने वसुदेवहिंडीचा जणू उर्वरित भाग असल्याप्रमाणे ३० ते १०० लंभक (१७,००० श्लोकप्रमाण) लिहून आपली ही रचना मूळच्या १ ते २९ लंभकांच्या संघदासगणीकृत वसुदेवहिंडीला कौशल्याने जोडण्याचा प्रयत्‍न केलेला दिसतो. तथापि हे ३० ते १०० लंभक वेगळे काढण्यात आले असून ते अद्याप प्रकाशित करण्यात आलेले नाहीत.  

    माहाराष्ट्री प्राकृत साहित्याचा हा कथाग्रंथ मेरुमणी असून चवथ्या-पाचव्या शतकातील सामाजिक जीवनाचे दर्शन यातून घडते. यातील भूगोलाची व व्यापारी मार्गांची माहितीही  महत्वाची असून त्यावेळेस सामाजिक व्यवहार कसे चालत याचे ज्ञान आज आपल्याला होऊ शकते. वसुदेवहिंडीची तुलना बृहत्कथेसारख्या जगप्रसिद्ध ग्रंथाशी होत असते यातच या ग्रंथाचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे.

·          


 

प्रकरण सात

आचार्य हरिभद्रविरचित

समरादित्यकथा व धुर्ताख्यान

      हरिभद्र या आठव्या शतकातील आचार्याने लिहिलेली समराइच्चकहा  (समरादित्यकथा) ही एक प्रसिद्ध कथा आहे. याच लेखकाने धुत्तख्खान” (धुर्ताख्यान) या उपहासकथेचीही रचना केली असून त्याशिवाय अनेक कथा आणि अनेक धर्मग्रंथही त्याच्या नावावर आहेत. आठव्या शतकात माहाराष्ट्री प्राकृतात एवढे विपुल लेखन करणारा अन्य साहित्यिक झाला नाही.

       हा श्र्वेतांबर जैन पंथीय ग्रंथकार होता. ह्याचा काळ आठव्या शतकाचा उत्तरार्ध-काहींच्या मते ८०० ते ८३० पर्यंत मानला जातो. जैन आगमांवर त्याने अनेक संस्कृत टीका, भाष्ये लिहिली आहेत. हरिभद्र यांच्या काळाला साहित्यिकदृष्ट्या संघात काळअसेही म्हटले जाते. प्राकृत भाषा व साहित्य शैलीने या काळात विलक्षण वेगळी रूपे धारण करायला सुरुवात केलेली होती आणि हरिभद्र या काळाचे अध्वर्यू होते. या काळात कथासाहित्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. तत्पूर्वीच्या आठशे वर्षाच्या माहाराष्ट्री प्राकृतातील कथांचा आशय व उद्देश्य बदलण्याची आवश्यकता निर्माण झालेली होती. देशाच्या वायव्य भागात अरब आक्रमणे होत होती. वैदिक धर्मात प्रचंड उलथापालथ होऊन नवी सामाजिक तत्वज्ञानाची निर्मिती होत समाजव्यवस्थाही नवी दिशा पकडू लागली होती. गुप्त काळाचा अंत होऊन सामंतशाहीचा जोर वाढलेला होता. श्रेणी संस्थेचा अपकर्ष काळ सुरु झालेला होता, त्यामुळे पुरातन समृद्धी कशी आणता येईल यावर फार कमी विद्वान विचार करत होते. अशा स्थितीत मूल्यव्यवस्था कोसळण्याचा मोठा धोका असतो, पण हरिभद्र सुरी यांनी ते शिवधनुष्य पेलायचा निश्चयाने माहाराष्ट्री प्राकृतमध्ये विपुल साहित्य रचना तर केलीच पण आगम ग्रंथांवरही टीकासाहित्य लिहिले. संस्कृत भाषेचाही वापर केला. एका अर्थाने तत्वज्ञानासोबतच कथा लेखन करून मनोरंजन व जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश होता.

      कथासाहित्याचा जेवढा व्यवस्थामुलक प्रयोग जेवढा या काळाने केला तेवढा अन्य काळात झालेला दिसून येणार नाही. या प्रयोगामुळे प्रौढ प्रेमाख्यानांना गती मिळाली. मानवी विकारांचा कथावस्तुत सूक्ष्म उपयोग करण्याची प्रवृत्ती बळावली. ही एका अर्थाने मराठी प्रतिभेने घेतलेली नवी झेप होती. एका अर्थाने तरंगवई कथाख्यानाने जी तत्वे पेरून ठेवली होती त्यांचा परिस्फोट हरिभद्राच्या साहित्यातून झालेला दिसून येतो.

      जैन साहित्यपरंपरेत हरिभद्र नावाचे अनेक साहित्यिक व जैन आचार्य झालेले आहेत. यातील समराईच्चकहा आणि धुत्तख्खान लिहिणारे आचार्य हरिभद्र  हे सर्वात प्राचीन होत. कुवलयमाला लिहिणारा उद्योतनसुरि त्यांचा शिष्य होता. त्यांचा काळ इसवी सन ७३० ते ८३० या दरम्यानचा असावा असा अंदाज बहुतेक विद्वानांनी केला आहे व त्यासाठी अनेक प्रमाणांवर विस्तृत चर्चा केलेली आहे.

       हरिभद्र श्वेतांबर संप्रदायातील विद्याधर गच्छचे  शिष्य होते. हे मुळचे चितोड येथील. ते नंतर गुजरात येथे आले. ते बालपणीपासून प्रतिभासंपन्न असून त्यांचा सर्वधर्मीय शास्त्रांचा चांगला अभ्यास होता. त्यांचे संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. आगम ग्रंथांवर संस्कृत भाषेत टीका लिहिण्याचा प्रारंभ त्यांनी केला असे जैनशास्त्राच्या अभ्यासकांचे मत आहे. प्रभावकचरितमध्येही यांची जीवनकथा येते. त्यांनी आपल्या जीवनात शंभरपेक्षा अधिक ग्रंथ लिहिल्याची मान्यता आहे. अनेकांतवादाचे ते फार मोठे भाष्यकार होते हे त्यांच्या अनेकांतवाद प्रवेश, अनेकांत सिद्धीसारख्या ग्रंथांवरूनही लक्षात येते.

       तथापि असे गंभीर लेखन करणाऱ्या हरिभद्राने समराइच्च्कहा  (समरादित्य कथा) ही कादंबरीकथाही लिहिली आहे. ह्या कथेत उज्जैनचा राजा समरादित्य आणि त्याचा सूड घेण्यास प्रवृत्त झालेला अग्निशर्मा ह्यांच्या नऊ जन्मांची कथा आहे.

      कथासूत्र

      पूर्वजन्मात समरादित्य राजकुमार गुणसेन असताना त्याच्या वडिलांच्या राजपुरोहिताचा पुत्र अग्निशर्मा ह्याच्या कुरूपपणाची थट्टा करीत असे आणि त्याला अपमानकारक पद्धतीने वागवत असे. त्यामुळे वैतागून अग्निशर्म्याने गाव सोडले आणि कौंडिन्यनामक एका तापस कुलपतीच्या आश्रमात जाऊन तपश्र्चर्या करू लागला. पुढे गुणसेन हा राजा झाल्यावर अग्निशर्मा हा महातपस्वी झाल्याचे त्याला कळले. तो अग्निशर्म्याच्या दर्शनास गेला. पूर्वी जे घडले, त्याबद्दल अग्निशर्म्याची क्षमा मागून मासोपवासाचे पारणे फेडण्यासाठी त्याने अग्निशर्म्याला राजवाडयावर येण्याचे निमंत्रण दिले, पण राजवाड्यावर अग्निशर्म्याची उपेक्षाच झाली,  त्यामुळे तो उपाशीच निघून गेला. असे तीन वेळा घडले. मात्र गुणसेनाचा तसा हेतू नव्हता. त्यामुळे आताही राजा आपली थट्टाच करील असा अग्निशर्म्याचा समज होऊन त्याने पुढील जन्मी राजाचा सूड घेण्याचे ठरविले. पुढला जन्म मिळण्यासाठी आमरण उपोषण केले. असे त्याचे आणि गुणसेनाचे नऊ जन्म झाले. प्रत्येक जन्मातील कथा स्वतंत्र असून लेखकाचे रचना कौशल्य त्यात दिसून येते. नवव्या जन्मात अग्निशर्मा हा गिरिसेन नामक चांडाळ होता, तर गुणसेन हा समरादित्य नावाचा राजा होता. गिरिसेनाने समरादित्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अयशस्वी झाला आणि शेवटी नरकास गेला. गुणसेन (म्हणजेच समरादित्य) मात्र मोक्षास गेला, अशी थोडक्यात जन्मजन्मांतरी सुरु राहिलेली ही सुडकथा.

      हरिभद्राने ग्रंथाच्या प्रस्तावनेत कथेबद्दलच्या ज्या आठ संगही गाथा उद्‌धृत केल्या आहेत, त्यावरून ही कथा परंपरागत असावी, असे वाटते , तथापि हरिभद्राने आपल्या प्रतिभेने तिला कलाकृतीचे रूप दिले आहे. लोककथांतून आपली कथाबीजे निवडून त्यावर आपल्या प्रतिभेचे साज चढवणे आणि उत्कृष्ठ कलाकृतीची निर्मिती करणे हे अनेक जागतिक कीर्तीच्या साहित्यिकांनी वापरलेले मार्ग आहेत. हरिभद्र अत्यंत यशस्वी साहित्यिक ठरले असे म्हणावेसे वाटते.

      ह्या कथेतून वर्णिलेल्या प्रसंगांमधून तत्कालीन जीवन-विशेषत: सर्वसामान्यांचे जीवन- कसे होते, याची स्पष्ट कल्पना येते. ही कथा साध्या, ओघवत्या अशा गदय शैलीत लिहिलेली आहे. क्वचित गाथा छंदातली व्दिपदा, विपुला असे छंदही वापरले आहेत, पदयेही आहेत. हेर्मान याकोबी यांनी ही कथा संपादिली आहे (१९१६).

      सुडाची व घृणेची भावना वेगवेगळ्या पद्धतीने केंद्रीभूत धरत या कथेची रचना केलेली आहे व त्यानुरूप प्रसंग आणि भावनांची उधळण केली आहे त्यामुळे ही एक सामान्य कथा न राहता उच्च दर्जाच्या साहित्यकृतीचे स्वरूप प्राप्त करते.

 

      या कथेचा नंतर श्रीप्रद्युम्नाचार्यांनी संस्कृत भाषेतही संक्षिप्त रुपांतर केले होते ते समरादित्यसंक्षेप:” या नावाने. संवत १३२१ (इसवी सन १२६४) मध्ये ते लेखन पूर्ण झाले. हरमान याकोबी यांनी या संस्कृत संक्षिप्त रुपांतराची हस्तलिखिते प्राप्त करून संपादित करून ते १९०६ साली अहमदाबाद येथून प्रकाशित केले.

      हरमान याकोबी हे जर्मन असून भारतविद्याशास्त्राचे मोठे विद्वान अभ्यासक होते. त्यांनी जैन धर्म व लौकिक साहित्यावर प्रभुत्व मिळवले. असंख्य ग्रंथांचे अनुवाद केले वा त्यांना प्रदीर्घ विद्वत्तापूर्वक प्रस्तावना लिहिल्या. त्यांनी अनेक ग्रंथांच्या दुर्मिळ प्रती शोधल्या व तुलनात्मक अभ्यास करून त्यांचे संपादन केले. जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे हे सिद्द करणारे ते पहिले पाश्चात्य विद्वान. त्यांच्यामुळे आज अनेक ग्रंथ पाश्चात्य भाषांत अनुवादित होऊन अभ्यासकांची फार मोठी सोय झाली. त्यांचे हे ऋण मराठी माणसावर तर आहेच पण जैन धर्मीय अभ्यासकांवरही आहे.

 

धुर्ताख्यान

            धुत्तख्खान (धुर्ताख्यान) ही भारतातीय भाषांत उपहासकथेचे दालन उघडणारी पहिले आणि आधुनिक काळ सुरु होण्याआधीचे माहाराष्ट्री प्राकृतातील एकमेव कथाख्यान आहे. या आख्यानाने पुराणकथांतील विसंगत, अतिशयोक्ती करणा-या व अविश्वसनीय आणि तरीही श्रद्धेने मान्य केल्या जाणा-या गोष्टींवर उपहासात्मक व विडंबनात्मक पद्धतीने प्रखर प्रकाश टाकला आहे.       हरिभद्रसुरिसारख्या गंभीर प्रवृत्तीच्या विद्वान साहित्यीकातील ही उपहास व विडंबन दृष्टी महत्वाची आहे जी आजच्या आधुनिक लेखकांतही सहसा पहायला मिळत नाही. ही उपहासकथा लिहितांना त्यांनी जी पार्श्वभूमी व कथानायक निवडले आहेत तेही सामाजिक दर्जात अत्यंत हीन अवस्थेतील आहेत. असे असूनही या कथेत एक श्री नायिका मात्र पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिवैभव दाखवते हा स्त्री-सन्मानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे.

      कथासूत्र

      उज्जैनीजवळच्या एका मनोरम उद्यानात पाच धूर्त आपापल्या पाचशे धूर्त अनुयायांना घेऊन पोहोचले. या पाच धुर्तांत मुलदेव, कंडरीक, एलाशाढ व शाश हे पुरुष धूर्त तर खंडपाना ही महिला धूर्त होती. ही मंडळी उद्यानात पोहोचली तेव्हा घनघोर वर्षा होऊ लागली. पावसामुळे अन्न कमवायची संधी नाही आणि पावसाने वाजणा-या थंडीत हे सारे भुकेने कासावीस झाले. शेवटी एकमेकात बोलत असताना त्यांनी एक मार्ग काढला तो असा. प्रत्येकाने एकेक गोष्ट सांगायची आणि ती असत्य आहे असे जो धूर्त सिद्ध करेल त्याने सर्वांना भोजन देण्याची व्यवस्था करायची आणि जो धूर्त ती कथा सत्य आहे हे सिद्ध करेल त्याला धूर्तराज म्हणून मान्यता दिली जाईल.

      यानंतर मुलदेवापासून सुरुवात होते. तो एक असंभवनीय कथा सांगतो. कंडरीक ती कथा विश्वसनीय आहे हे सिद्ध करण्यासाठी रामायण, महाभारत आणि पुराणांतील तशाच व त्याहूनही असंभवनीय कथा सांगतो. उदा. ब्रह्मदेवाच्या मस्तकातून ब्राह्मण, बाहुंतून क्षत्रीय, मांड्यातून वैश्य आणि पायापासून शुद्र निर्माण होतात तर, “जर वेद-पुराणांतील कथा जर ख-या आहेत तर मुलदेवाचेही अशक्य वाटणारे म्हणणे खरे आहेअसे सिद्ध करतो.

      अशाच प्रकारे बाकीचेही असंभवनीय कथा सांगत जातात आणि दुसरा त्या ख-या असल्याचे पुराणांतील कथांवरूनच सिद्ध करत जातो. आता उरते खंडपाना. सर्वांना जेवण आपल्यालाच द्यावे लागणार याची तिला जाणीव होते. मग ती पुढे होऊन आपले बुद्धीचातुर्य वापरत एक अशी कथा सांगते ती सत्य आहे म्हटले तरी समस्या आणि असत्य म्हटले तरी समस्या. तीही अंगलट येणारी. ते गप्प बसतात. खंडपाना त्यांची दया येऊन अन्नशोधासाठी अजून एक युक्ती करते. ती स्मशानभूमीत जाऊन एक पुरलेले नवजात अर्भक बाहेर काढते आणि त्याला स्नान घालून उज्जैनी शहरात एका व्यापारी पेढीवर जाते आणि आजारी बाळासाठी कर्ज मागते. सावकार अर्थात तिला पैसे देत नाही. ती पावसात रस्त्यावर येते आणि आधीच मृत असलेल्या त्या अर्भकाला छातीशी कवटाळून सावकारामुळे आपले बाळ मेले असा आकांत करू लागते. सावकार यामुळे अस्वस्थ होतो. तो ती ब्याद हटवण्यासाठी तिला सोन्याची एक अंगठी  देतो आणि तिला तेथून जायला सांगतो. ती तेथून काढता पाय घेते, मृत अर्भकाला टाकून देते आणि बाजारात ती अंगठी विकते आणि सर्व धुर्तांसाठी भोजनाची व्यवस्था करते. सारे धूर्त तिच्या पुरुषांपेक्षा सरस बुद्धी कौशल्याची आणि उदारपणाची स्तुती करतात

      या कथेतून अद्भुतरम्य कथानकांतील अतिशायोकी आणि तरीही त्यावरील अतार्किक श्रद्धा याचे दर्शन, तेही धुर्तांच्या माध्यमातून घडवत हरिभद्राने नेमका कोण खरा धूर्त हा महत्वाचा प्रश्नही नकळत उपस्थित केला आहे. त्यात एक स्त्री ही पुरुषांपेक्षा बुद्धीमान, साहसी आणि तिच्या धूर्तपणाच्या मर्यादेत उदारही कशी असू शकते याचे मनोज्ञ दर्शन घडवले आहे. साहित्यिक दृष्ट्या ही कृती अत्युच्च दर्जा गाठते. पाश्चात्य देशात असा प्रकारचे विडंबनात्मक पद्धतीने जीवनदर्शन एवढ्या प्राचीन काळात झाल्याचे एकही उदाहरण नाही.

      या संवादात्मक कथेतून धर्माच्या नावाखाली अशक्यप्राय गोष्टीही कशा स्वीकारल्या जातात हे दाखवून धर्माच्या तिजोरीदारांवरही नकळत कठोर प्रहार झालेले आहेत. वर्ण उत्पत्तीच्या सिद्धांतालाच उपहासाचा तार्किक विषय बनवून सामाजिक विषमतेवरही प्रहार केले आहेत. त्या दृष्टीने ही कलाकृती विद्रोही साहित्याचा आरंभ असेही म्हणता येईल.

      या कथेचे संस्कृत आणि प्राचीन गुजराथी भाषेतही अनुवाद झालेले आहेत. महाराष्ट्रात जे समतेच्या तत्वावर आधारित सामाजिक नाथ-सिद्ध संप्रदाय निघाले त्यांच्यावरील या कथेचा प्रभाव मोठा आहे. जीवनाकडे अद्भूतरम्य दृष्टीने न पाहता वास्तविक दृष्टीने पहावे व जगण्यासाठी आपली बुद्धीमत्ता वापरावी असाही संदेश ही कथा देते.

      लघुकथा  

      मराठीत लघुकथा हा साहित्यप्रकार पाश्चात्यांमुळे एकोणीसाव्या शतकात आला असा आपला एक सार्वत्रिक समज आहे. माहाराष्ट्री प्राकृतातील साहित्याचे अनुशिलन न केल्याने असा गैरसमज झालेला आहे. पण हरिभद्रसुरीने आठव्या शतकातच जवळपास ७० लघुकथा लिहून कथासाहित्याची परंपरा सुरु केली हे आपणास माहितही नसते.

      अग्निशर्मा आणि तापस, धन आणि चांडाळ, परिव्राजक आणि राजा, अशा कथांमधून सामाजिक स्थितीचे लोभसवाणे वर्णन करून नीतीमत्तेचे महत्व त्यांनी प्रस्थापित केले. या कथा संवादात्मक तर आहेतच पण पात्रांच्या मनोवस्थेचेही सखोल दर्शन या कथांमधून होते. आधुनिक लघुकथाकार याच तत्वांवर आपले साहित्यलेखन करत असतात. हरिभद्र सुरिच्या साहित्याचे आधुनिक परिप्रेक्षात नव्याने संशोधन होणे ही आजच्या साहित्यिकांसाठी मोठी पर्वणी असेल

·          

       

संदर्भ-

. धुर्ताख्यान, डॉ. आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये, मुख्य संपादक- श्री जिन विजय मुनी, प्रकाशक- भारतीय विद्या भवन, मुंबई, 1944

. हरिभद्र के प्राकृत कथा साहित्य का आलोचनात्मक परिशीलन, ले. डॉ. नेमिचंद्र शास्त्री, प्रकाशक- Research Institute of Prakrit, Jainology, & Ahimsa, Vaishali, 1965)     


 

प्रकरण आठ

उद्योतनसुरिविरचित

कुवलयमाला कहा

      उद्योतनसुरिरचित कुवलयमालाही माहाराष्ट्री कथासाहित्यातील एक श्रेष्ठ दर्जाची कथा आहे. आठव्या शतकातील केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवणारा तत्कालीन एकही ग्रंथ नाही, त्यामुळे विद्वतजगतात या ग्रंथाची विविध कारणांनी चर्चा होत असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून याही कथाग्रंथातील उद्घ्रुते देण्यात आलेली आहेत. या ग्रंथातील ऐतिहासिक संदर्भांमुळे त्याला अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकणारा कथा ग्रंथही मानले जाते. भारत व बृहदभारताचे यात अनेक संदर्भ तर येतातच पण पुर्वसुरीच्या साहित्याचेही उल्लेख असल्याने त्यातील काय उपलब्ध आहे आणि काय नाही याचा शोध घेणेही सुकर होऊन जाते. तसेच उपलब्ध साहित्याचा काळ ठरवण्यासाठीही त्याचा मोठा उपयोग गोतो.

      कुवलयमालेचे लेखन आपण शके सातशे (इसवी सन ७७८) मध्ये पूर्ण केले असे लेखकाने स्वत:च नमूद करून ठेवलेले असल्याने या ग्रंथलेखनाचा अचूक काळ आपल्याला मिळतो. माहाराष्ट्री प्राकृताने आठव्या शतकात कोणता टप्पा गाठला होता याचे भाषाशास्त्रीय दर्शन आपल्याला या ग्रंथातून तर घडतेच पण सर्वसामन्य लोकांची बोलीभाषा कशा प्रकारची होती हेही आपल्याला समजते. आधुनिक मराठीच्या विकासातील हा मधला टप्पा म्हणायला हरकत नाही.

      उद्योतनसुरि हे हरिभद्राचे शिष्य होते. जालौर येथील ऋषभ जिनेश्वर मंदिराच्या ओसरीत बसून ही काव्य रचना आपण पूर्ण केली असे त्याने म्हटलेले आहे. राजस्थानी माणसाने महाराष्ट्री प्राकृतात कथारचना केली याचे मराठी माणसाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, कारण सातवाहनकाळापासून माहाराष्ट्री प्राकृत ही विद्वान व साहित्यिकांची मुख्य भाषा बनून गेली होती. शिवाय या भाषेला मोठा वाचक व श्रोता असल्याने लेखकांनी ही भाषा निवडली हेही आपण अनुमानु शकतो. मराठी भाषेचा हा विस्तार विस्मित करणारा आहे हे निश्चित महत्वाचे आहे.

      कुवलयमालेच्या सुरुवातीलाच आपण या ग्रंथाची भाषा पाइय मरहठ्ठ (माहाराष्ट्री प्राकृत) वापरणार आहोत हे उद्योतनसुरिने स्पष्ट केले आहे.

      “पाइय-भासा-रइया-मरहठ्ठय-देसि-वन्नय-निबद्धा (कुव. ४११.)

      हीच भाषा वापरण्याचे कारण देतांना उद्योतन म्हणतो की याच भाषेत सर्व कलांचे विचाररुपी तरंग मनात उपस्थित असतात. लोकवृत्तांतरुपी महासागरातून मंथन करून अमृत काढावे तशाप्रकारे हे साहित्य आहे. या भाषेबरोबरच मागधी, पैशाची, आणि मिश्र प्राकृत भाषांचाही आवश्यकता पडेल तेथे वापर करण्याचे सुतोवाच केले आहे.

      कुवलयमाला हा काव्य-कथाग्रंथ गद्य-पद्य मिश्रीत आहे. एखादा कुशल कलाकार जशी आपल्या कथावस्तूची आधी आखणी करतो आणि त्यातील उतार-चढाव, त्यानुकुल घटना आणि मनोदशा दर्शवत कथेला उत्कर्षबिंदूकडे घेऊन जातो तशीच कलात्मक योजना या कथेत केली गेलेली आहे. लोककथांचाही चपखल उपयोग कुवलयमालेमध्ये केला गेला आहे. या कथेवर अन्य जैन साहित्यकारांप्रमाणे जैन तत्वज्ञानाचाही प्रभाव आहे. वैदिक कथाकार ज्याप्रमाणे आपल्या साहित्यात वैदिक तत्वज्ञानाची पेरणी करत असतात, अथवा ग्रीक साहित्यकार जसे ग्रीक पुराकथा व तत्वज्ञानाची पेरणी करत असतात त्याप्रमाणेच जैन साहित्यिकाच्या लेखनावर त्याचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. किंबहुना धर्मसंस्कृतीचा प्रभाव कोणताही साहित्यिक सहसा वगळू शकत नाही.

      कथासूत्र

     

      जंबूद्विपावरील भारत देशात वैताध्य पर्वताच्या दक्षिण भागातील मध्य देशात विनिता (आजची अयोध्या) नगरी होती. येथे दृढवर्मन नावाचा राजा राज्य करत होता व प्रियंगुश्यामा ही त्याची राणी होती. त्यांना पुत्र नसल्याने राणी दुख्खी असायची. आपल्याला पुत्र व्हावा म्हणून राणीच्या आग्रहाने त्याने कुलदेवता राजलक्ष्मीची आराधना सुरु केली. दोन दिवसानंतरही देवी प्रसन्न झाली नाही म्हणून तो प्राणत्याग करायला निघाला.आणि देवी प्रकट झाली आणि त्याला पुत्राचे वरदान दिले. या वरदानातून राजाला पुत्र झाला आणि त्याचे नाव कुवलयचंद्र ठेवले गेले.

     

      मोठा झाल्यावर कुवलयचंद्र आपल्या समुद्रकल्लोळ नामक घोड्यावरून रपेट करत असताना त्याला त्याचा घोडा दूर अरण्यात घेऊन जातो जेथे घोडा मरतो. आकाशवाणी होऊन त्याला दक्षिणेकडे जायची सुचना मिळते. दक्षिणेकडे जात असता तो विंध्यारण्यात येतो जेथे एक ध्यानस्थ मुनीचे त्याला दर्शन होते. मुनी त्याचे स्वागत करतो आणि कुवलयचंद्र तेथे कसा आला हे समजल्यावर त्याला म्हणतो कि, “विश्वात भ्रमण करण्याचे कारण मोह, लोभ, क्रोध, माया आणि मान आहे.” आणि तो कुवलयचंद्राला या पाचही तत्वांचे कथात्मक विवेचन करतो. चंडसोम, मानभट, मायादित्य, लोभदेव, मोहदत्त या देशाच्या विविध भागातील व वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरील व्यक्तींचे माध्यम या कथांसाठी वापरले जाते व रूपककथेचा एक आदर्श निर्माण केला जातो.

      या पात्रांनी आता कोठे जन्म घेतला आहे असे विचारल्यावर मुनी त्याला सांगतात कि चंडसोम आता पद्मचंद्र म्हणून जन्माला आला आहे तर मानभट अयोध्या येथे कुवलयचंद्र म्हणून जन्माला आला आहे तर मायादित्याने आता विजयानगरीचा राजा महासेनची कन्या  कुवलयमाला म्हणून जन्माला आलेली आहे.

      मग त्या मुनीच्या सल्ल्यानुसार कुवलयचंद्र विजयानगरीस जाऊन तेथील राजकन्या कुवलयमाला हिची समस्यापूर्ती करून तिचे हृदय जिंकतो. ह्याच सुमारास त्याच्या शोधात असलेला त्याचा मानलेला वडील भाऊ महेंद्र तेथे पोहोचतो. तो कुवलयचंद्राचा कुवलयमालेच्या मातापित्यांशी परिचय करून देतो. कुवलयचंद्र आणि कुवलयमाला ह्यांचा विवाह होतो. वृद्धापकाळी आत्मकल्याणार्थ ते संसारनिवृत्त होतात. अशी या काव्याची संक्षिप्त कथा. कथेत मात्र समाज आणि देशाच्या भूगोलाचे प्रत्ययकारी दर्शन घडते. महाराष्ट्र त्या काळात मरहठ्ठदेश म्हणून प्रसिद्ध होता हेही आपल्याला या ग्रंथावरून समजते.

      या ग्रंथात पईठ्ठाण” (आताचे पैठण) नगरीचा उल्लेख आला आहे. (कुवलयमाला ५७.२८ २९) एकाच भाषेत शब्दोच्चार कसे कालौघात बदलतात याचे हे उदाहरण आहे. पैठण हे नाव प्रतिष्ठानवरून आलेले नाही, तर ते पइठ्ठाण या मूळ नावाचे कृत्रिम संस्कृतकरण आहे. हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. हे नगर आठव्या शतकातही व्यापाराचे मुख्य केंद्र होते. बनारसपासून पैठणला येतांना विशाल अरण्य पार करावे लागायचे. त्यात चोरांची फार मोठी भीती असायची. मराठी व्यापारी दिन्नले” (दिले) ‘गहिल्ले” (घेतले) म्हणत देवाण-घेवाण करीत असत असेही उल्लेखिले आहे

      या काव्यात वैदिक धर्मांतर्गत येणा-या वर्गांचा उल्लेख असला तरी शुद्र वर्णाचा उल्लेख एकदाच आला आहे. तक्षशिलेत शुद्र जातीचा धनदेव नावाचा सार्थवाहपुत्र राहत होता. (हा शब्द बहुदा त्याच भागात सिकंदराच्या काळात असलेल्या शुद्र तथा सोद्राई जमातीचाही असू शकेल) शुद्र वर्ण वैदिक धर्मांतर्गत येत नव्हता आणि त्यांच्यावर स्मृतींची बंधने लागू नव्हती हे यावरून दिसून येते. सार्थवाह म्हणजे व्यापारी. स्मृतींनी नंतरच्या काळात सामाजिक समतेच्या वास्तवाला जन्माधारित वर्ण मानून आणि शुद्र वर्ण लादून एक प्रकारे सामाजिक गोंधळ उत्पन्न केला याचा हा एक समाजशास्त्रीय पुरावा आहे.  तत्कालीन सामाजिक स्थितीचे विवेचन पाहता समाजावर वैदिक स्मृत्यांचा प्रभाव किमान आठव्या शतकापर्यंत नव्हता असे दिसते.

     

      ह्या काव्यात आश्वास, सर्ग यांसारखे विभाग नाहीत. हे काव्य महाराष्ट्री प्राकृतात असले, तरी संस्कृत, पैशाची, अपभ्रंश इ. भाषांचाही अधूनमधून वापर केलेला आढळतो. भारतातील विविध प्रदेशांत राहणारे लोक आणि त्यांच्या बोली ह्यांची वैशिष्ट्येही प्रसंगोपात्त आलेली आहेत. समासप्रचुर, प्रौढ पण ओघवती गद्यरचना, काव्योचित संवाद, तसेच भावतरल, नादमधूर, लयबद्ध शैली ही कुवलयमालेची वैशिष्ट्ये आहेत. अनेक सुंदर सुभाषिते, मार्मिक प्रश्नोत्तरे व प्रहेलिका ह्यांनी ह्या ग्रंथाची गोडी वाढविली आहे. मध्ययुगीन भारताच्या समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीनेही हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.

 

·           

 

संदर्भ-

 

१.      कुवलयमाला का सांस्कृतिक अध्ययन ले. डॉ. प्रेम सुमन जैन, प्राकृत-जैन-शास्त्र एवं अहिंसा शोध संस्थान, वैशाली., १९७५.

 

 

 


 

प्रकरण नऊ

कौतूहलविरचित लीलावई

      हरिभद्रसुरि यांची समरादित्य कथेप्रमाणेच कोहल तथा कौतूहल कवीने लीलावई ही तरलसुंदर प्रेमकथा लिहिली. एखाद्या अद्भुतरम्य कादंबरीप्रमाणेच यातील कथासूत्र उत्कंठावर्धक असल्याने अनेकदा बाणभट्टाच्या कादंबरीशी या काव्याची तुलना केली जाते, पण ही एक स्वतंत्र कथा असून हिच्या कथासूत्राची नक्कल करत पद्मावत हे प्रेमकाव्य नंतर लिहिले गेले होतेपाईअ कथासाहित्याच्या विकासाचा एक उच्च मापदंड या काव्याने प्रस्थापित केला असे म्हटले तरी ते फार अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ही कथा वाचली तर विरही जनांचे दु:ख हरण होईल असे कवी आत्मविश्वासाने म्हणतो. महाकवी पुष्पदन्ताने महाकवी कालिदासाच्या बरोबरीने कोहल (कौतूहल) कवीचे नाव घेतले आहे, यावरून त्याच्या काव्यप्रतिभेची जाणीव व्हावी.

      आठव्या शतकात झालेला हा कवी पैठण येथीलच राहणारा होता. पैठण ही सातवाहनांची राजधानी आणि कवींना उदार आश्रय देणारा हाल सातवाहन स्वाभाविकपणेच अनेकांच्या काव्याचा नायक बनला असल्यास नवल नाही. या कथाकाव्यात हाल सातवाहन आणि सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रेमाची अद्भुतरम्य कथा सांगितली गेलेली आहे.

कथासूत्र

      एके दिवशी लीलावतीने हाल सातवाहनाचे चित्र पाहिले. ती त्याच्यावर मोहित झाली. तिला त्याची स्वप्नेही पडू लागली. प्रेमाकुल लीलावती शेवटी आई-वडिलांची अनुमती घेऊन सातवाहनाच्या शोधात निघाली. ती शेवटी गोदातीरी पोहोचली. तेथे तिची आपल्या मावसबहिणीशी, महानुमतिशी भेट झाली. महानुमतीचाही प्रियतम तिच्यापासून हिरावला गेला होता. त्याच काळात राज्यविस्तारासाठी सातवाहन सिंहलद्वीपावर आक्रमण करण्याचा विचार करत होता, पण सेनापतीने त्याला सिंहलनरेशाशी स्नेह ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर सातवाहनराजाने आपला दूत पाठवायचे ठरवले. नदीतून जात असता दूताची नौका तुटल्यामुळे त्याला गोदातटी मुक्काम करावा लागला. तेथे त्याला कळाले कि सिंहलनरेशाची कन्या लीलावती तेथेच उतरलेली आहे. त्याने हा वृत्तांत सातवाहन राजाला जाऊन सांगितला. सातवाहन तेथे आला आणि लीलावातीच्या सौंदर्यावर मुग्ध होऊन तिच्याशी विवाहाची इच्छा प्रकट केली, पण लीलावतीने अट घातली कि पाताळात कैद असलेला महानुमतीचा प्रियकर सोडवला जात नाही आणि त्यांचा विवाह होत नाही तोवर ती विवाह करणार नाही.

      राजाने ते आव्हान स्वीकारून पाताळ गाठले आणि युद्ध करून माधवनीलला सोडवून आणले. मग लीलावती व हाल सातवाहनाचा विवाह संपन्न झाला अशी ही अद्भुतरम्य प्रेमकथा,

      या कथेत दिव्यलोक आणि मनुष्यलोकांतील पात्रे असल्याने ही एखाद्या अद्भुतरम्य कादंबरीप्रमाणे वेगाने पुढे जाते. प्रेमाचे अत्यंत संतुलित वर्णन केले असल्याने या कथेत कोमल-मधुर भावनांचा उत्कृष्ठ आविष्कार दिसून येतो. प्राकृतिक दृश्यांचे वर्णन काव्यात्मक व हृद्यग्राहक उतरले आहे. जिज्ञासा आणि कुतूहल सातत्याने जागृत ठेवण्यात कवी सफल होतो.

      सातवाहनचे जसे मूळ संक्षिप्त रूप सालाहन होते व सालाहनचे कृत्रिम संस्कृत रुपांतर शालिवाहन केले गेले तसेच कोहलचे कौतूहल करण्यात आलेले आहे. या संस्कृत नामबदलांमुळे भारतीय इतिहासात मोठाच संभ्रम निर्माण केला गेला आहे.

      प्राकृत जैन साहित्यिकांनी मराठीत किती मोलाची भर घातली आहे हे मी विवेचीत केलेल्या निवडक साहित्यावरून लक्षात येईल. धनेश्वर सुरी यांनी लिहिलेले सूरसुंदरीचरित”, जिनेश्वर सुरीरचित निर्वाण लीलावती व कथाकोशप्रकरण यासारखे श्रेष्ठतम साहित्य दहाव्या शतकानंतरही निर्माण होतच राहिले.

      याच काळात मराठीनेही आपले रूप बदललेयादवकाळाच्या अस्ताच्या सुमारास आधुनिक मराठेत प्राकृत मराठी बदलू लागली. सामाजिक उलथापालथ व दुष्कर झालेले अर्थजीवनही या बदलाला जबाबदार होते. पण मराठीतील सर्व बदलांत सहभागी होत साहित्यनिर्मिती करणारा जैन येथेही मागे राहिला नाही. मराठी संतांवरील जैन तत्वद्न्यानाचा प्रभाव पडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे समकालीन मराठीतही जैनांनी साहित्य निर्मिती सुरूच ठेवली.

·          


 

प्रकरण दहा

आधुनिक मराठीतीत जैनांचे साहित्य

      डॉ. सुभाष अक्कोळे, विद्याधर जोहरापूरकर, गोमटेश्वर पाटील, प्रा. भागचंद जैन भास्कर व इतर अनेक अभ्यासकांनी पंधराव्या शतकानंतरच्या मराठीत लिहिणा-या जैन साहित्यिकांवर मोठे संशोधनात्मक काम केलेले आहे. महाकवी पुष्पदंताने दहाव्या शतकात राष्ट्रकुट काळात प्रागतिक मराठीत जैन महाकाव्ये लिहिली. ती धर्मप्रधान असल्याने मी त्यावर विवेचन केलेले नसले तरी काव्यदृष्ट्या पुष्पदंत एक श्रेष्ठ महाकवी होते यात शंका राहत नाही. पण राष्ट्रकुटकाळानंतर वैदिक धर्मियांचे फार मोठ्या प्रमाणावर जैन धर्मावर आक्रमण सुरु झाल्याने मधल्या काळात फारशी साहित्यनिर्मिती झाली नाही. तरीही पुष्पदंताचे महापुराण, णायकुमारचरिऊ, जसहरचरिऊ सारखे ग्रंथ साहित्याच्या क्षेत्रातील शिखरे मानली जातात. मी दुस-या प्रकरणात या अनेक ग्रंथांची चर्चा पूर्वीच केलेली असल्याने मी आधुनिक मराठीतील जैन साहित्याकडे वळतो.

      अकराव्या शतकात विवेकसिंधुच्या रुपात प्रागतिक मराठी व आधुनिक मराठीच्या संक्रमणकाळाचे दर्शन घडवणा-या मराठीचे दर्शन जगाला घडवले. मराठी साहित्य या काळात प्राय: अध्यात्मवादी होऊ लागले ज्याचा आविष्कार आपल्याला संत साहित्यात दिसून येतो. या अध्यात्माच्या वैष्णव लाटेत जैन तत्वज्ञान बसने तेवढे सोपे नव्हते. वैष्णव संतांनी जैन-बौद्धांची अहिंसा, शाकाहार, भूतद्या, सर्वधर्म समभाव  इ. महनीय तत्वे स्वीकारली असली तरी त्यांचा भर भक्तीमार्गावर होता हे नाकारता येत नाही. शिवाय या काळात साहित्याची शैलीही बदललेली होती.

      इसवी सन १४५० मध्ये झालेल्या कवी ब्रह्म गुणदास था गुनाकीर्ती हे आधुनिक मराठीतील पहिले जैन साहित्यिक होत. त्यांनी श्रेणिकचरित्र, क्षमागीत अशा काही ग्रंथांची निर्मिती केली. पुढे त्यांनीच आचार्य पदावर प्रतिष्ठित झाल्यानंतर पद्मपुराण, धर्मामृत, रुक्मिणीहरण अशा अनेक ग्रंथांची रचना आधुनिक मराठीत केली. त्यांच्या मराठीचा नमुना देणे येथे उद्भोधक ठरेल. क्षमाभावाबाबत ते म्हणतात,

      “इया गीतालागी चित्त द्यावे दुजे, आता अबोलणे न राहिजे I

      ब्रह्मगुणदास म्हणे साहाजे, आता प्रेमरसे मन भिजे ओ II

      सन १४९३ मधील जिनदास हे एक महाकवी होत. त्यांनी हरीवंशपुराण हा उच्च कोटीचा काव्यग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे ५५ अध्याय त्यांनी लिहिले. ग्रंथ अपूर्ण राहिला तो नंतर २०० वर्षांनी उर्वरीत १२ अध्याय लिहून पुण्यसागर यांनी पूर्ण केला. जिनदासांनी गुजराथी भाषेतही रचना केल्याचे दिसून येते.

      सोळाव्या शतकातील पंडित मेघराज हे एक महत्वाचे साहित्यिक आहेत. खरे तर ते मुळचे गुजराथी, पण त्यांचे इतिहासातील अन्य जैन साहित्यीकांप्रमाणेच मराठीवर प्रभुत्व होते. जसोधरदास हा त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ आचारप्रधान तत्वज्ञानाची महती गातो याच शतकातील आकोट (अकोला जिल्हा) येथील नागो आया हा अजून एक महत्वाचा साहित्यिक. याने यशोधर आणि चंद्र्मतीच्या प्रसिद्ध कथानकावर आधारित यशोधरचरित्रहे आख्यानकाव्य लिहिले.

      सतराव्या शतकात विदर्भ व मराठवाड्यात भट्टारक परंपरेचा उदय झाला. या परंपरेनेही मराठी जैन साहित्यावर प्रभाव टाकला. अभयकीर्ती हे या परंपरेतील कवी. वीरदास तथा पासकीर्ती याने सुदर्शनचरित, नवकार मंत्र प्रवृत्ती अशा काही रचना केल्या. सुदर्शनचरित हे ब्रह्मजिनदास यांच्या कृतीवर आधारित आहे. याच शतकातील दामा पंडित याने जंबूस्वामीचरित्र आणि दान-शील-तप भावना हे ग्रंथ मराठीत लिहिले. दयासागर याने सम्यक्व कौमुदी हा दीर्घ ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अनेक लोककथा, चातुर्यकथा आणि उपदेशकथा एकत्र केल्या गेलेल्या आहेत.

      अठरावे शतक जैन साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. ललित साहित्याकडून धर्मसाहित्याकडे पंधराव्या शतकापासूनच जे मार्गकरमण होत होते ते या शतकात अजूनच गतिमान झाले.

      देवेंद्रकीर्ती याने कालिकापुराण हा ग्रंथ लिहिला. यातील कालिका म्हणजेच पद्मावती देवी. हा ग्रंथ पुराणशैलीत लिहिला गेला असला तरी मध्य युगातील जैनांची सामाजिक स्थितीवर हा ग्रंथ बराच प्रकाश टाकतो. मुस्लीम आक्रमणामुले दक्षिणेतील कारागीर आणि व्यापारी वर्ग किती त्रस्त झाला होता याचे चित्र पहायला तर मिळतेच पण दक्षिणेतील लिंगायत समाज आणि जैन समाजात सुरु झालेल्या संघर्षाचेही दर्शन घडते. तत्कालीन सामाजिक संघर्षांचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ मोलाचा आहे.

      जैन धर्मातही व्रतांचे महत्व सांगणारी मराठी पुस्तके लिहिली जाऊ लागली होती. स्तोत्ररचनेचे व आरत्यांचे प्रमाणही वाढलेले होते. व्रताच्या निमित्ताने करायचे विधी आणि त्यांचे फल काय हे सांगणे हे या पोथ्यांचे वैशिष्ट्य. अनंतकीर्ती यानेही असेच दशलाक्षणिक व्रत नावाची पोथी लिहिली. (सन १७७५) याच काळातील जनार्दन याने मात्र श्रेणिक चरित्र नामक ग्रंथ लिहिला व नव्या परंपरेला फाटा दिला. परंतु दहाव्या शतकाआधी जैन साहित्यिकांनी जी उंची गाठली होती ती या काळात अभावानेच दिसते. अर्थात याची कारणे झपाट्याने बदललेल्या सामाजिक आणि राजकीय स्थितीत आहेत.

      एकोणीसाव्या शतकात महतीसागर याने लिहिलेले महती काव्य कुंजहा काव्यसंग्रह खूप लोकप्रिय झाला होता. त्याने इतरही अनेक धार्मिक रचना केल्या. रत्नकीर्ती याने उपदेशरत्नमाला नामक एक बृहदग्रंथ लिहिला. हा विदर्भातील कवी होता. दिलसुख याने मात्र स्वात्मविचारनावाची स्वतंत्र रचना केली व जैन तत्वज्ञानावर भाष्य केले. बोपकवीने तीर्थकरांची भूपाली लिहिली.

      या काळातील मराठी संत व आख्यानकाव्य लिहिणा-या संत-पंत आणि तंतांचे प्राबल्य होते. त्यांच्यावरही जैन तत्वज्ञानाचा ठसा सोडण्यात जैन लेखकांना यश आले असले तरी या काळात स्वतंत्र अशी मोठी साहित्यकृती अभावानेच निर्माण झाल्याचे दिसून येते. तथापि या काळातील समाजजीवनाचे व जातीवास्तवाचे आणि धर्मसंघर्षाची माहिती मिळवायला या कालाय्तील साहित्य अत्यंत उपयुक्त आहे. जैनांचे या काळात मोठ्या प्रमाणावर वैदिकीकरण झाल्याने अनेक वैदिक संस्कार विधी जैनही करू लागले असेही दिसते. हरिवंशपुराणात यासंदर्भात विस्तृत माहिती मिळते.

      विसाव्या शतकात मात्र ही क्षीण होत गेलेली परंपरा नव्या सृजनशक्तीने झेपावताना दिसते. सामाजिक बदलांच्या वा-यापासून जैन साहित्यिक अलिप्त राहू शकत नव्हते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्था सुरु करून महाराष्ट्राचा शैक्षणिक चेहरा बदलवला हे तर फार मोठे सामाजिक कार्य होते. भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन व स्वातंत्र्य हे महत्वाचे टप्पेही याच शतकात पार पडले. भारतीय साहित्यावर इंग्रजी शैलीचा प्रभाव पडायला तशी अठराव्या शतकापासूनच सुरुवात झाली असली तरी या शतकात त्या प्रभावाने उत्कर्ष गाठला.  मुद्रणकला सर्वत्र पसरू लागल्याने वृत्तपत्रांपासून ते पुस्तक छपाई होऊ लागल्याने समाजच नव्या विचारांच्या लाटेवर आरूढ झाला.

      कवी रणदिवे, कादंबरीकार वा. ना. शहा, प्रदीप शहा, निर्मलकुमार फडकुले, यांसारखे आधुनिक जैन साहित्यिक व विचारवंत या काळात उदयाला आले. सुमती शहा व सुलोचना भोकरे यांच्या साहित्यिक नेतृत्वाखाली स्त्रियाही लेखनात आपला सहभाग नोंदवू लागल्या. पंडिता सुमती शहा यांनी मराठीत सुमारे १५ पुस्तके लिहिली त्यात त्यांचे आत्मचरित्रही आहे. वासंती शहा यांनी ऐतिहासिक लेखन केले त्यात सम्राट चंद्रगुप्त मौर्य महत्वाचे मानले जाते. सुरेखा शहा यांनी कथा, कादंबरी, एकांकिका असे सर्व साहित्यप्रकार यशस्वीरीत्या हाताळले. कर्मकांड कि तत्वज्ञान अशा चर्चाही सुरु तर झाल्याच पण प्राचीन प्राकृत साहित्याची पुनर्मुद्रणे करण्याचाही आणि ते साहित्य जतन करण्याचाही मोठा उपक्रम हाती घेतला गेला. त्यासाठी अनेक संस्थाही स्थापन केल्या गेल्या. पुण्यातील श्रुतभवन असेल किंवा जैन सिद्धांत संरक्षणी संघ (सोलापूर) असेल, यांनी आगम साहित्याच्या जतनासाठी प्रशंसनीय उपक्रम हाती घेतले. प्राचीन मराठीतील साहित्य ग्रंथही आजच्या मराठीत अनुवाद केले गेले पाहिजेत, तरच जैनांचे मराठीसाठी काय योगदान आहे हे अधिक जाणून घ्यायला मदत होईल यात शंका नाही. या मराठीचे भविष्यातील विकासाचे कार्यही जैनांना करावे लागेल हेही या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल.

·           

संदर्भ-

१.      मराठी जैन साहित्य और संस्कृती, प्रोफेसर भागचंद जैन भास्कर, प्रकाशक- जैन संस्कृती संरक्षक संघ, सोलापूर.

२.      मराठी जैन साहित्य: १८५० ते २०००, गोमटेश्वर सातगोंडा पाटील.

 

      

जैनांचे मराठी भाषेतील योगदान

  जैनांचे मराठी भाषेतील योगदान संजय सोनवणी चिनार पब्लिशर्स   लेखकाचे मनोगत       “ जैनांचे मराठी भाषेतील योगदान ” हे पुस्तक लिहितांन...