मानवाने जेव्हा पहिल्यांदा उघड्या डोळ्यांनी रात्रीच्या गडद आकाशाकडे पाहिले असेल, तेव्हा त्याच्या मनात कौतुक, आश्चर्य आणि असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. ते चमकणारे तारे आणि नक्षत्रे काय आहेत? त्यांचे स्वरूप काय आहे? त्यांचेही स्थान बदलताना का दिसते? आकाशाच्या पलीकडे काय असेल? या प्रश्नांमधूनच आद्य खगोलशास्त्राची बीजे रोवली गेली. अर्थात हे शास्त्र आरंभीच्या काळात शुभ दिवस/मुहूर्त काढण्यासाठी आणि भविष्यकथनासाठी वापरले जाई. ग्रह-नक्षत्र-सूर्य यांना दैवतस्वरूप देत त्यांच्या भोवती शुभाशुभ कल्पनाही गुंफल्या गेल्या. मानवी इतिहासात काही लाख वर्ष तरी पृथ्वी सपाट आहे आणि आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत या संकल्पनेने राज्य केले. ग्रह-तारे हे ईश्वरी आदेशाने कार्यरत आहेत किंवा ते स्वत: देवतास्वरूप आहेत याही संकल्पनेने अधिराज्य गाजवले. प्राचीन पुराकथांमध्ये देव अंतरिक्षात स्वर्गीय रथावर स्वार होऊन संचार करतात अशा कल्पना आढळतात. मानवाच्या अंतराळप्रवासाच्या सर्वात मोठ्या स्वप्नाचा जन्म आपण या आद्य काळात झाला असेल याचं अंदाज बांधू शकतो. उदाहणार्थ जगातील सर्वात जुने महाकाव्य मानल्या जाणाऱ्या 'एपिक ऑफ गिल्गमेश' मध्ये देवांनी आकाशातून पृथ्वीवर अवतरल्याच्या आणि मानवाला आकाशात घेऊन गेल्याच्या कथा आढळतात. या काळातील सुमेरियन दंतकथांमधील 'एताना' हा राजा एका विशाल गरुडाच्या पाठीवर बसून स्वर्गाच्या म्हणजे आकाशाच्या दिशेने उड्डाण करतो आणि तो जसा वर जातो, तशी पृथ्वी लहान होत जाऊन एका लहान बिंदूसारखी दिसते. हे वर्णन आजच्या अंतराळवीरांच्या अनुभवाशी अवाक करणारे साम्य दाखवते. भारीय पुराणांतील देवताही आकाशगामी रथांतून यात्रा करतात अशी असंख्य वर्णने आहेत. सूर्यही सात घोड्यांच्या रथातून आपला मार्ग क्रमितो असे म्हटले जाते. अर्जुन इंद्राच्या आकाशगामी रथात बसून आकाशाची सफर करत असताना एका ताऱ्याजवळून जातो असे वर्णन महाभारतात येते.
अर्थात या मानवी कल्पनांना सत्यात येण्यासाठी प्रदीर्घ काळ लागला याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वी आणि अवकाशाच्या संदर्भातील तोकडे असणारे भौतिक ज्ञान. पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू नसून ती सूर्याभोवती फिरते हे कळायला जागतिक मानवाला कोपर्निकसच्या उदयाची वाट पहावी लागली. पृथ्वी सपाट नसून गोल आहे हे पूर्वीच ग्रीक खगोलवेत्ते आणि भारतात आर्यभटाने सिद्ध केले असले तरी विद्वानांना त्याचा सैद्धांतिक विकास करता आला नाही. पृथ्वी गोल आहे आणि ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्व हे प्रत्यक्षात कल्पनातीत विस्तीर्ण आहे हे ज्ञान जसे जसे होऊ लागले तसा माणसाचा आपण विश्वाचे केंद्रबिंदू आहोत आणि ईश्वराची एकमात्र संतान आहोत ही लाखो वर्ष जपलेली संकल्पना ढासळून पडायला सुरुवात झाली. अर्थात हे समजू लागायला कारण ठरले ते गॅलिलिओने दुर्बीनीचा उपयोग करून केलेले अवकाशातील ग्रह-तार्यांचे निरीक्षण आणि पुढे त्याला साथ मिळाली ती केप्लरच्या भौतिकशास्त्रीय नियमांची. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात शास्त्रीय सूत्रे शोधली. पृथ्वेभोवातीचे अनेक स्तरीय आणि जसे उंच जाऊ तसे विरळ होत जाणारे वातावरण आणि त्याच्या बाहेर असलेली अनेक प्रारणांनी भरलेली अंधकारमय निर्वात पोकळी हे जसे शास्त्रद्न्यांच्या लक्षात आले तशी नवीन संकल्पना मानवी मनात निर्माण होऊ लागली आणि ती म्हणजे अंतराळ प्रवासाची.
या कल्पनांचा साहित्यात प्रभावी उपयोग सर्वात आधी केला तो एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्युल्स व्हर्न आणि एच. जी. वेल्स या कल्पक लेखकांनी. त्यांनी आपल्या साहित्यातून या कल्पनाविलासाला आधुनिक रूप दिले. 'पृथ्वीवरून चंद्रावर जाणे', मंगळावर माणूस असणे, धुमकेतूच्या पाठीवरून अंतराळ प्रवास करणे अशा रंजक पण शास्त्रीय ज्ञानाचा पाया असलेल्या संकल्पना त्यांनी कल्पनेच्या पातळीवर मांडल्या. या कल्पनेला विज्ञानाची भक्कम साथ मिळाली ती गॅलिलिओच्या दुर्बिणीमुळे, केप्लरच्या नियमांची आणि सर आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची. या शोधांमुळे मानवाला अंतराळात जाण्याचे गणित स्पष्ट झाले आणि अंतराळप्रवास खरेच शक्य आहे याचं त्याला विश्वास वाटू लागला.
पण यात खडतर आव्हानेही खूप होती. अगदी अशक्यप्राय वाटतील अशी. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि वातावरण भेदाने हे सर्वात मोठे आव्हान होते. युद्धांतील गरजांमुळे रॉकेटचा शोध लागला असा तरी त्यांची मर्यादाही होती. पृथ्वीचे वातावरण ओलांडून निर्वात अवकाशात प्रवेश करणेही सोपे नव्हते. पण विज्ञान आणि कल्पना जेव्हा एकत्र येतात तेव्हा असाध्यही साध्य होऊ शकते हे आपण या प्रवासावरून पाहू शकतो. शास्त्रद्न्यानी पृथ्वीचे प्रचंड गुरुत्वाकर्षण भेदण्यासाठी ताशी सुमारे ४०,००० किमीचा वेग गाठणारे 'मल्टी-स्टेज रॉकेट्स' विकसित केले. अवकाशात हवा आणि वायुमंडलीय दाब नसतो त्यावर उपाय म्हणून विशेष 'प्रेशराइज्ड कॅप्सूल' आणि ऑक्सिजन व शारीरिक दाब नियंत्रित ठेवणारे 'स्पेससूट' तयार केले गेले. सूर्याचा तीव्र प्रकाश (१५०° से. पेक्षा जास्त) आणि अंतराळातील गोठवणारी थंडी, शिवाय घातक वैश्विक किरणांपासून वाचण्यासाठी यानाला 'थर्मल शिल्डिंग' बसवण्यात आले. अवकाशातून पुन्हा पृथ्वीवर येताना हवेच्या घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या ३०००° से. उष्णतेपासून यानाला वाचवण्यासाठी 'हीट शिल्ड' चे तंत्रज्ञान शोधण्यात आले. अर्थात हे एका रात्रीत झाले नाही. अनेक अपयशे झेलत जिद्दीने हा प्रवास चालूच राहिला.
दुसऱ्या महायुद्धानंतर तंत्रज्ञानाने मोठी कूस बदलली. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत रशियाने जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह 'स्पुटनिक-१' अंतराळात सोडला आणि खऱ्या अर्थाने अंतराळ युग सुरु झाले. यानंतर १२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत युनियनचे युरी गागारिन हे अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले. अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना ते उद्गारले—"पृथ्वी निळी आणि अत्यंत सुंदर दिसते आहे!" या घटनेनंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात 'स्पेस रेस' सुरू झाली.
स्पर्धेचा भाग म्हणून मग अमेरिकेने चंद्रावर मानव पाठवण्याचे धाडसी उद्दिष्ट ठेवले आणि शेवटी २० जुलै १९६९ रोजी 'अपोलो ११' मोहिमेअंतर्गत निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवले. "मानवाचे हे एक लहान पाऊल, संपूर्ण मानवजातीसाठी एक खूप मोठी झेप आहे!" त्यांचे हे उद्गार अजरामर झाले.
चंद्रावर उतरल्यानंतर मानवाची पावले थांबली नाहीत. अंतराळात दीर्घकाळ राहून संशोधन करण्यासाठी 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन' उभारण्यात आले. या संपूर्ण प्रवासात भारताचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. १९८४ मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. पुढे जाऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०१४ मध्ये 'मंगलयान' द्वारे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचून, तर २०२३ मध्ये 'चंद्रयान-३' च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनून इतिहास रचला.
आज अंतराळप्रवासाचे स्वरूप बदलत आहे. 'स्पेसएक्स' आणि 'ब्लू ओरिजिन' यांसारख्या खासगी कंपन्यांमुळे 'स्पेस टुरिझम' प्रत्यक्षात येत आहे. भविष्यात मानव खरेच अवकाशात स्पेस स्टेशन्सवर अथवा अन्य ग्रहांवर वसती करण्याची शक्यता खरेच वास्तवात येणार यात शंका नाही.
-संजय सोनवणी