Monday, November 10, 2025

एका मृताची स्वगते...

 



 

     मला ते स्मशानात ताटीवर ठेऊन तसेच निघून गेले खरे पण शेवटची फुले वगैरे अर्पणकरून इन्सीनरेटरमध्ये किंवा चितेवर जाळले नाही. मला वाटलं जाळण्याआधी गेले असतील दारू प्यायला. येतील नंतर. तसेही मी मेलेलोच होतो तेव्हा आता काय आणि नंतर काय...काय फरक पडणार होता त्यांच्या दृष्टीने?

     पण मला पडत होता ना!

     हे स्मशानातील भयान वातावरण मला अक्षरश: खायला उठले होते. एवढी भयंकर ठार शांतता मी कधी अनुभवलीच नव्हती.

     पण जसा जरा त्या शांतीला मी सरावलो तशी मला स्मशानातील ती मृत शांती वेडावू लागली. खरे तर अशी शांती मला जिवंतपणी मिळाली असती तर मी कशाला मरायचे तरी कष्ट घेतले असते?

     आता ठार शांती होती, मी मेलेलो होतो, पण बघा ना, माझे खांदेकरी आणि सोबतचा प्रत्यक्ष ओळख-पाळख नसलेला गोतावळा गायब होता. जिवंत असताना कधी भेटायची त्यांना सवड झाली नसावी.

     वेळ जात होता पण मला जाळायला तेथे अजून कोणीही आलेले नव्हते. एव्हाना स्मशान घाट ओस पडलेला होता. प्रेते जाळणारे कर्मचारी कोठे लापता झाले होते हेही माहित पडले नाही. आधी जाळलेल्या प्रेताची थोडीशी धग जाणवत होती एवढेच. पण त्याचेही जवळचे कवटी फुटण्याचा आवाज ऐकून, प्रेताला तसेच जळते ठेऊन कधीच निघून गेलेले होते. प्रेत पूर्ण जळाले की नाही याने त्यंना काही फरक पडलेला दिसत नव्हता. तेही तसे ठीकच होते म्हणा. माणसाला काही कामधाम असते की नाही?

     पण मी मात्र जाळले जायची प्रतीक्षा करत होतो पण तेथे कोणीही नव्हते. जसे मला कोणीतरी तेथे सडण्यासाठी ठेवून पोबारा केलेला होता.

     प्रतीक्षा फार वाईट. आणि मला तर वाट पाहणे मुळीच आवडत नाही. कोणी भेटीच्या ठरलेल्या वेळी आले नाही की मी जास्तीत जास्त पाच मिनिटे फक्त वाट पाहून निघून जायचो आणि मग त्या भेट ठरवणार्याचा फोन आला की त्याला झाप झाप झापायचो. पुन्हा भेटायचेही टाळायचो. त्यामुळे माझी मित्रांची संख्या आपसूक कमी होत गेली. आणि ते माझ्या पथ्यावरच पडले.

     आयुष्यात तुम्ही सारं काही परत मिळवू शकता पण गेलेला वेळ नाही असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहेच आणि माझा त्या वचनावर नुसता विश्वासच नव्हता तर ते तत्व मी तंतोतंत पाळीत होतो. मी तत्वज्ञ नसेल लेकाचा पण खंदा तत्वपालक होतो!

     आणि आता येथे मला...मला जाळायला एवढा उशीर?

     काय अर्थ आहे याला?

     शक्य असते तर मी स्वताच उठून स्वत:ला जाळून घेतले असते.

     पण असहाय होतो मी.

     तरीही आता माझी सटकू लागली होते. मी त्यांना हाक मारण्यासाठी तोंडही उघडायचा प्रयत्न केला पण ते जडशीळ झालेले. साऱ्या शरीरासारखे. एवढे अगतिक मला कधीच वाटले नव्हते. 

     मनात एवढा उद्रेक होत असूनही मला लाकडी ओंडक्यासारके निपचित निर्जीव पडून राहावे लागत होते.

     हा कसला अन्याय?

     मी मेलो म्हणून बोलु शकत नाही, संतापाने ओरडूही शकत नाही हा माझ्यावर अन्याय नव्हता तर काय होते? म्हणे मृतांच्या जगात न्याय केला जातो. पापी कोण, पुण्यवान कोण हेही ठरवले जाते...एवढेच नाही तर मृतांच्या पाप-पुण्याची पार प्रतवारीही केली जाते. त्यानुसार त्याच्या जागा ठरवल्या जातात. पण त्यासाठी मला जाळावे तरी लागणार होते की नाही? पण ते काही करण्याऐवजी मला असे जाळल्याशिवाय येथे स्मशानात ठेवणे काय माझ्यावरचा अन्याय नव्हता की काय?

     एकदा मी जिवंत होतो तेव्हा माझ्यावरही एक अन्याय झाला होता. म्हणजे तसे अन्याय तर खूप झाले पण जी चूक मी केलीच नव्हती त्या चुकीचा आळ माझ्यावर आला आणि तो घोर अन्याय समजून मी सारे ऑफिस डोक्यावर घेतले होते. तोड-फोड केली होती. सर्वांना धमक्या दिल्या होत्या आणि जेव्हा खरा दोषी सापडला तेव्हा त्याला कुत्र्यासारखे बडवले होते. रक्ताने पार लडबडला होता तो. लोकांना वाटले तो मेलाबिला कि काय? पण असले हरामखोर इतक्या सहजपणे कसे मरतील? सडून मारावे हीच त्यांची लायकी!

     कण्हत-कुथत तो बसला उठून आणि धरले माझे पाय. मागितली माफी.

     पण मी का करावे माफ त्याला? मी काय साधू-संत होतो की काय?

     तेव्हा मी काही बोललो नाही आणि वाटत होते तशी नोकरीही गेली नाही. मग मी मला संधी मिळेल तेव्हां मी त्याला त्रास द्यायचा काही सोडला नाही. त्याचे जिणे हराम केले मी. शेवटी मी चीफ अकाउंटट होतो कंपनीच्या तालुका ब्रान्चचा.

     शेवटी त्याने कोणाचा तरी सल्ला घेतला. आणि चक्क तो मला पार्टी द्यायची आहे म्हणत माझ्याकडे आला आणि गयावया करू लागला. मी त्याला दाखवता येईल तेवढी तुच्छता दाखवत शेवटी हो म्हणालो. शरण आलेल्याला तात्पुरते का होईना अभय द्यावे ही रीत नव्हती की काय?

     शेवटी फुकट आणि तीही रुबाबात प्यायला मिळत असेल तर माझे काय जाणार होते?

     त्याने जो अन्याय माझ्यावर केला होता त्याची भरपाई एक-दोन क्वार्टर दारू थोडीच करू शकणार होती?

     पण मी गेलो त्याने सांगितलेल्या बारमध्ये. मी खरे तर कधी महागड्या दारूचा सोस धरला नव्हता कारण मला परवडायला तर हवे होते? मी प्यायचो ती नंबर वन व्हिस्की. गरीबांची स्कॉच. एक क्वार्टर मला स्वर्गीय नशा द्यायची. पण आज मात्र मी मला माहित असलेली एक महागडी सिग्नेचर व्हिस्की माझा ब्रांड आहे म्हणून सांगितले. त्याने विनातक्रार माझी ऑर्डर प्लेस केली आणि स्वत:ला मात्र ओल्ड मंक रम मागवली.

     पहिला पेग उत्साहात किरकोळ गप्पा मारण्यात गेला आणि जरा सैल होताच मी थोडा खाजगी झालो. किंबहुना मलाच ती खुमखुमी आली. मी त्याला ऑफिसमधली कोण आवडते असे सहजपणे विचारले. आणि तो जसा लाजत लाजत राधिकाम्हणाला आणि तिच्या रुपाची तारीफ करू लागला तशी माझी पुन्हा सटकली.

     मी अर्धवट उठत त्याचे गचांडी पकडली आणि त्याला ओरडत म्हणालो,

     भाडखाऊ, राधिका माझी आयटम आहे. आज ना उद्या हो म्हणेल ती मला...तिच्याकडे आता तू नुस्ते पाहिलेस जरी ना तरी त्या दिवसासारखा बडवेन मी तुला...” आणि संतापाने तेथून निघून आलो.

     माझा जिच्यावर डोळा होता तिच्याचकडे तो आकर्षित झाला होता...

     साला, हाही माझ्यावरचा एक अन्यायच नव्हता की काय?

     म्हणजे मी अविवाहित होतो असेही नाही. लग्न झाल्रे होते की माझे. पण रोज रात्री तीनदा तिचा कार्यक्रम करूनही तिने माझ्यावर घटस्फोटाचा दावा लावला आणि जिंकली की ती.

     का तर तिचा आरोप होता की मी नंपुसक आहे आणि तिला पुरेसेसांसारिक सुख देऊ शकत नाही आणि तिचा पैशांसाठी छळ करतो.

     स्साली रांड...आता काय तिच्याशी दिवस-रात्र सेक्स करत रहायचे होती की काय? तरच मला मर्द ठरवणार होती ती?

     कोर्टही असले बेईमान आणि स्त्रियांच्या म्हणण्याला ब्रह्मवाक्य समजणारे, त्याने पुरेसेम्हणजे नेमके काय याची कसलीही व्याख्या न करता मी पत्नीच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यात कमी पडलो असा निष्कर्ष काढत दिला की घटस्फोट तिला आणि माझा अर्धा पगार पोटगी म्हणून!

     हा घोर अन्याय नव्हता का?

     पण मी तसे लक्ष ठेवून असतो.

     ती आजकाल धंदा करते असे ऐकिवात आहे.

     सूड घेण्यासाठी तिला कॉलगर्ल म्हणून दलालामार्फत बोलावून पुन्हा उपभोगायची फार इच्छा होती माझी...

     पण ते राहूनच गेले.

     स्साला हा मृत्यू नको तेव्हाच का आणला मी?

     आणि हे भोसडीचे खांदेकरी कोठे गायब झाले?

     कोठे गेले सरण रचणारे माझे अंतिम मारेकरी?

     कोठे गेला जो मला मुखाग्नी देणारा माझा मानसपुत्र म्हणवणारा तो हरामी?

     की तीही निव्वळ तोंडची बात?

     वेळ चालला आहे...

     की मेलेल्यांच्या जगात वेळही मरतो?

     कायमचा?

     मग माझा वेळ चालला आहे ही जाणीव तरी कशी होतेय मला?

     हे का त्या हरामी पुराणकारांनी किवा सृष्टीचे रहस्य उलगडले असे तोंड फाडून सांगणाऱ्या शास्त्रज्ञांनी का नाही सांगितले?

     की वेळ ही संकल्पनाच खोटी आहे?

     की वेळ-काळ वगैरे आहेही आणि नाहीही!

     बस एक भ्रम आहे सर्व भ्रमित लोकांनी मिर्माण केलेला?

     आणि माझा मानसपुत्र...की तोही भ्रमच? लेकाचा आपल्या झोपडपट्टी संवेदनांना जागून ऐन मोक्याच्या वेळेस का गायब झाला? तू कोणाची औलाद होता साला ते तुझी आईही सांगू शकणार नाही कदाचीत जसा मीही सांगू शकत नाही, कोट्यावधी संकर होत आलेत. या जगात आपण शुद्ध रक्ताचे आहोत असं ठामपणे म्हणायची कोणाची हिम्मत नाही. तरीही भ्रमात जगतातच ना स्साले!

     जन्मदाखल्यावर बापाचे नाव म्हणून आले म्हणजे तोच माझा बाप असे तर मीही खात्रीशीर म्हणू शकत नाही.

     पण हरामखोरा, माझ्या एलआयसीत तुलाच नॉमिनेट केलेय ना मी?

     माझे जेही घरात आहे ते सामान-सुमान तुलाच दिलेय ना मी?

     मला जाळल्यावरच कळेल ना ते तुला?

     पण जालेपर्यंत तरी येथे थांबावे एवढाही संयम नाही का रे भोसडीच्या?

     आता मी मृत्युपत्र बदलू शकत नाही याची काय बेद्ना होतेय मला भडव्या हे कसे कळणार तुला?

     मेलेल्यांचे जग आणि जीवन्तांचे जग यात अशी भरभक्कम तटबंदी कोणा मुर्खाने घातली? जरा मागे जाऊन बदलता आले असते मृत्यूपत्र तर जगावर असा कोणता कहर कोसळणार होता?

     आता लाव काय विल्हेवाट लावायची ती मी दिलेल्या संपत्तीची ..पण भडव्या, तुला ती मिळणार ती मी जाळला गेल्यावरच ना?

     पण कसे माहित असणार हे तुला? मी कधी तुला त्याबद्दल सांगितलेच नव्हते ना? पण मी जी माया केली किंवा दाखवली तुझ्यावर ती तरी तू कशी विसरलास?

     की माया नावाच्या गोष्टीशी माझ्यासारखाच तुझाही परिचय कधीच झाला नव्हता?

     कोणत्या जातीवर गेलास रे तू?

     पण साला, तो माझ्या जातीचा आहे की नाही याची तरी चौकशी मी कोठे केली होती? आणि त्या वेळी मला काय घेणे होते त्याचे? कोणीतरी सोबत हवे म्हणून तुला आणला घरी. म्हटलं, तेवढीच जीवंत सोबत.

     पण लेका एखादा कुत्रा जरी पाळला असता ना मी, तर बरं झालं असत असे का वाटायला लावतो आहेस तू?

     जात...

     पण जात जन्माआधीही असते की जन्मानंतर?

     मग मेल्यानंतरही जात राहत असेल?

     काय माहित. असेलही तसे. जन्मण्याआधी जात, जन्मानंतर जात आणि मेल्यानंतरही जात...

     मग तो ईश्वरही कोणत्या ना कोणत्या जातीचा असेलच की!

     की देवांनाही जात नसली तरी वेगवेगळा धर्म असतो? असेल. कारण ख्रिस्त्यांचे देव वेगळे...हिंदूंचे वेगळे. मेल्यानंतर काय होणार याचे विचारही वेगळे.

     म्हणजे मेल्यानंतर काय याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाहीच कारण कोणत्याही मेलेल्या माणसाने कधी धर्मग्रंथच लिहिलेला नाही.

     मग आत्म्याला जात कशी असेल? आणि धर्मही असण्याचे कारणच काय? ते सारे जिवंत असतानाचे चोचले.

     मुळात आत्मा आहे हाही एक भ्रम आहे की काय? मुळात ज्याची व्याख्याच नाही ते अस्तित्वात असेल तरी कसे?

     पण कोणीतरी म्हटले होते की हे जग भ्रम आहे आणि ब्रह्म म्हणजेच एकमेव सत्य आहे!

     असे असेल तर मी मेलोय हाही एक भ्रम का नसेल?

     कारण जर मी मेलोय तरी विचार नेमक्या कशामुळे करू शकतोय?

     आताही तोच संताप, रोष आणि आठवणी का आणि कशामुळे येताहेत मला?

     छे...जगणे आणि मरणे ...दोन्हीही भ्रम कसे असू शकतील? जीबंत चिंतक मात्र नक्कीच भ्रमिष्ठ असले पाहिजेत म्हणून त्यांना जे आहे तो भ्रम वाटतो आणि जे दिसत नाही, कधी अनुभवाला येत नाही ते मात्र सत्य वाटतेय!

     आणि या साल्यांनी मला न जाळता का ठेवलेय असेच ताटीवर येथे असे, एखाद्या  बहिश्कृतासारखे?

     असे म्हणतात की प्रेतात्मे दाही दिशांनी पाहू शकतात. मग मलाच माझे खांदेकरी कोठे गेले आणि काय झक मारताहेत हे का दिसत नाही?

     की मीच कोणी वेगळा अलौकिक शापित आहे?

     निर्दय...पापी...

     पण म्हणजे मी कधी दयाळू कृत्ये केलीच नव्हती की काय? 

     केली ना. खूप केली. हायस्कूलला असतांना कॉपी करायला माझ्या निर्बुद्ध मित्रांना नव्हती केली मी मदत? पोचवल्या नव्हत्या त्यांच्याप्रेमळचिठ्या त्यांच्या लाईन न देणाऱ्या आयटम्सना? दोनदा-तीनदा तर कानफाडही फोडून घेतले नव्हते त्यांच्या नाजूक वासमार्या चपलांनी?

     ही माझी माझ्या मित्रांसाठी केलेली पुण्याची कामे नव्हती काय?

     आणि पाप म्हणाल तर ते केले तरी कधी मी?

     दहावीत असताना माझा बाप आईला कुत्र्यासारखा मारत होता म्हणून मी रागाने तूळईला आधार देणाऱ्या मेढ्यावर संतापाने लाथ मारली होती.

     सटकले ते मेढे आणि आदळले माझ्या बापाच्या टाळक्यात.

     गेला तो जागीच.

     आता त्याला मी काय करणार? हेतू थोडाच होता त्याला जित्ता मारायचा?

     खरे तर ते पुण्यकर्मच होते. आई सुटली तरी त्याच्या जाचातून.

     पण काही महिन्यातच गावात झाला बभ्रा. आई चक्क ग्राम-गणिका झाली होती. म्हणजे रांड झाली होती. घरात राजरोस परके पुरुष येत. आई मला गोडीगुलाबीने आधीच बाहेर खेळायला पाठवून देई. समजा मी जरा आधीच आलो तर दर बंद असायचे आणि आतून विचित्र कामुक आवाज येत असायचे.

     याचा अर्थ न समजण्याएवढा निर्बुद्ध तर मी नव्हतो.

     त्यात गावातील लोकांची माझ्याकडे पहायची नजर बदलली. त्यात एक घृणा आणि उपहास असायचा. आई रस्त्याने जाऊ लागली की अश्लील शेरे आणि भुकेल्या नजरा तीचा पाठ्लाग करत राहायच्या.

     गावातली एरवी सुखद वाटणारी हवा आता विषारी झाली होती.

     मला लोकांचा ...आईचा संताप येई. सारे गाव बेचिराख करावे एवढा संताप उमदळून यायचा.

     पण खरा राग होता आईवर.

     पण तिला जीवे मारावे वाटले तरी कसे मारावे हे मला कळत नव्हते. मी कोणाचे तरी ऐकून कन्हेरीचा पाला ठेचून, संधी साधून, भाजीत घातला. त्या दिवशी मी पोट दुखत असल्याचे सांगून जेवण टाळले. आईला जेवताना पाहुन मला वाटले सुद्धा...तिला थांबवावे. तिला वाचवावे. मनात अक्षरश: कल्लोळ उठला. पण मी पाहत राहिलो. ती तृप्त चेहऱ्याने जेवत होती. आपले काम झाले याचा एकीकडे आनंद होता तर दुसरीकडे तिच्या होणार असलेल्या अंताबाबत मनात दु:ख दाटून आलेले होते.

     रात्री तिला ढाळ-वांत्या झाल्या. मी आनंदलो. पण तो आनंद टिकू देईल अशी कोणती शक्तीही नव्हती.

     नशिबच खोटे. ती मेली नाही. अशक्त झाली, पण मेली नाही. काही दिवसात ती ठीक झाली आणि तिच्या पैसे फेकणाऱ्या यारांशी मस्तीत मशगुल झाली.

     म्हणजे, आज विचार केला तर, तिचा खून करण्याचे पातक माझ्या वाट्याला मुळात आलेच नाही.

     मी पाप केले असे म्हणण्याचे धाडस तो चित्रगुप्त की काय कसे करू शकणार आहे?

     कारण ती माझ्यामुळे मेलीच नाही. मेली ती, नंतर, गुप्तरोगांनी जर्जर होऊन. ती गेल्याचे कोणालाही वाईट वाटले नाही. मलाही नाही.

     बारावी झाली आणि मी तालुक्याची वाट धरली. ऑफिसबॉयच्या नोकरीपासून सुरुवात करत, रात्रशाळेत शिकून मी पदवीधर झालो. चांगली नोकरीही मिळवली.
    
खरे तर माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलाने रात्रीचा दिवस करत कष्ट घेत ही प्रगती केली त्याबद्दल वर्तमानपत्रांचे रकाने भरायला हवे होते. पण मी बहुदा त्यांच्या अग्रक्रमावर असलेल्या वरच्या-मधल्या किंवा खालच्या जातक्रमात बसत नव्हतो म्हणून माझे अलौकिक यश झाकोळले गेले. याचे दु:ख मला सोडले तर कोणालाही होण्याची शक्यता नाही कारण मी माझी जीवनयात्रा कधी कोणालाच सांगितली नाही.

     सांगितली असती तरी मुळात ऐकायला होतेच कोण?

     आता या स्मशानात तरी ऐकायला आहे कोण?

     आता मात्र माझा संताप संताप होतोय. कोणीही येत नाहीहे. स्मशानघाटावर मी एकाकी पडलो आहे. मेलेलो आहे. आणि हा एकाकीपणा मला कधी नव्हे एवढा भयकारी वाटतो आहे.

     उद्रेकतो आहे मी पण माझ्या आत्म्याचा आवाजही कोणापर्यंतही पोहोचू शकत नाहीहे.

     सालं, यालाच मरण म्हणतात की काय?

     की काही दुसरे कारण आहे याला?

     शेवटी म्हणतात ना की कारणाशिवाय काहीच घडत नाही म्हणून?

     काय कारण असेल? का मी येथे एकाकी आहे? जाळल्यानंतर एकाकी झालो असतो तर ठीक होते,

     पण आत्ताच?

     का?

     की या जीवघेण्या विसंगतीतही काही सुसंगती आहे?

     म्हणजे ते कोठेही गेलेले नाहीत. त्यांनी मला कधीच जाळून टाकले आहे आणि मी जिवंत आहे असा भ्रम अजूनही माझ्या मनात आहे?

     म्हणजे मी मरूनही जिवंत आहे की काय?

     मनात नुसता गोंधळ.

     ते काहीही असो. मी अजून ताटीवर आहे याची मला खात्री आहे. मी आत्महत्या केली होती आणि ती मीच स्वत: आत्महत्या केलेली असल्याने मी मेलो आहे याबाबत माझ्या मनात कोणताही संशय नाही.

     तेव्हा मी मेलेलोच आहे.

     पण आत्मा जर अजरामर आहे असे म्हणतात...तर जी मी केली ती आत्महत्या नव्हे तर स्वहत्या होईल. ती आत्महत्या कशी असू शकते?

     की जिवंत लोकाच्या जगातील सारी तत्वज्ञाने एकजात बोगस आहेत? कसलाही अनुभव...अगदी मरणाचाही न घेता त्यांनी लिहिले हे उघड आहे कारण मी आता त्यांच्या बोगसपणाचा साक्षीदार आहे.

     पण मेलेले लोक जीवन्तांच्या जगात कोठे आणि कोणासमोर साक्ष देणार?

     या तत्वज्ञ म्हणवणाऱ्या जिवंत जगात महामानव अथवा देव मानणाऱ्या भ्रमित लोकांनी उर्वरित लोकांना केवळ तात्कालिक संतोष देण्यासाठी केलेली ती बौद्धिक चलाखी तर नव्हे ना?

     मी आत्महत्या केली. धारदार ब्लेडने उजव्या मनगटाच्या शिरा कापून. त्याने वेदना होत नाहीत असे कोणीतरी सांगितले होते. पण नस कापण्याची अनावर इच्छा असली तरी ते तेवढे सोपे नसते हे जाणवले की मला!

     माझीच काय पण आताच्या जगात माणसाचीच गरज उरलेली नाही हे अनुभवाला येत असले तरी आहे ते जग सोडून जाण्याचे धैर्य अगदी माझ्यातही नाही हे मी मनगटावर ब्लेड टेकवून थोडे रोवले तेव्हाच लक्षात आले.

     पण मी लक्षात आणले, बजावले स्वत:ला....

     साल्या तू मेलेलाच आहेस...जिवंत असून मेलेला!

     नोकरीला लागला तेव्हा टाईपराय्टर आणि एक भला थोरला कॅल्क्युलेटर होता. तेच भारी वाटायचे. पाढे आठवायची गरजच नव्हती. हाताने खरडायची गरज नव्हती. काय वेगाने शानमध्ये काम व्हायचे. शिस्तीत टाईप केलेले आर्थिक रिपोर्ट बघून बॉस खुश व्हायचा. मीही त्याचे कौतुक ऐकत अभिमानाने छाती फुगवायचो.

     मग येऊ लागले संगणक. अगदी प्राथमिक बरं का. पण काय ह्ल्लकल्लोळ उडाला होता तेव्हा. आमच्या कंपनीने संगणक नाकारले कारण त्यावर त्यांचा विश्वासच नव्हता आणि आम्ही  नाकारले कारण नवीन काही शिकायची आता इच्छाच उरली नव्हती! ज्याला सरावलो होतो तेच आम्हाला श्रेष्ठ वाटत होते. मग कशाला वेळ घालवा?

     पण मला आतून कळत होते. वापरा की न वापरा, पण हे शिकावेच लागणार आहे आणि मी संध्याकाळचा एक कोर्स लावून तेही शिकून घेतलं. जोवर माझी कंपनीने आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे ठरवले तोवर संगणक अजून प्रगत होत गेले आणि तो वेग गाठणे मलाही अशक्य होत गेले,.

     तोवर मी पन्नाशी ओलांडली होती. खरे तर काम तेच होते. आकडेवारी तीच होती. निर्णयही कमोबेश तेच होते. चेहरे बदलले होते, साधन आणि साध्य तेच होते. माणसांची गरजही तीच होती.

     पण ते साध्य करण्याची साधने वेगाने बदलत होती. आता तर अशी वेळ आली होती की माणसांची गरजच संपली होती. ते कृत्रिम बुद्धीमत्ता नावाचे वादळ सर्व जगाचा ग्रास घेत चालले होते. आमच्या तालुक्या]पर्यंतच्या ओफिसांत ते लवकरच येणार होतं. मी घाबरून गेलो होतो.

     मानवी बुद्धीओला जाही स्थानच नसेल तर सालं जगावं तरी का हा प्रश्न भेडसावत होता.

     आणि तेव्हाच मला चांगलीच जाणीव झाली की आपण आता कालबाह्य झालो आहोत! आता नवीन पुन्हा पुन्हा नवीन काही शिकायची उर्मीच आटलेली होती.

     मग अशा लोकांनी काय करायचे?

     जेथे अर्जित बुद्धीला अर्थ राहिलेला नाही, नवीन बुद्धी जन्माला घालता येत नाही आणि या वातावरणात तुमची काही उपयोगिताही उरलेली नाही अशा जगात जगण्याची शिक्षा मी का भोगावी?

     मी आधी तसाही निराश होतोच.

     मी ज्या ज्यावर प्रेम करत होतो ते वेगाने बदलले होते, भोवळ यावी एवढ्या वेगाने. सुख दु:खही मोबाईल किंवा फेसबुकवरून सांगायची वेळ आली होती.

     आपल्याला आजीबात ओळखत नसलेल्यांना!

     पण मी मोबाईल टाळला. एका गरीब तरुणाला मनोमन आपला मुलगा मानत त्याच्याशी संपर्क वाढवला., त्याला हे नवे जग परवडनारे नव्हतेच म्हनुन् तो मुक्त बोलू तरी शकत होता. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधू शकत होता, आपल्या दु:खांनी मनापासून रडू शकत होता आणि किरकोळ आनंदानेही मुक्त हसू शकत होता.

     निरागस स्वप्ने पाहू तरी शकत होता.

     पण मी मात्र असे करू शकत नव्हतो. नव्या जगाचे नियम भीती वाटावी एवढे बदलले होते. आसपासचे जग वेगाने बदलत होते. नाते संबंध तर धुळीला मिळालेले होते. कृत्रिम बुद्धीमत्ता मानवतेच्या उरल्या सुरल्या ढिगाऱ्यावर धडका देऊ लागली होती. माणसे घाबरलेली होती, बावरलेली होती आणि तरीही तेवढ्याच वेगाने बदलत होती. नवे आनंद शोधात होती. मी त्यात नवे नाते निर्माण केले.

     आणि मी त्याला संवाद साधायला सर्वात योग्य तरुण म्हणून माझ्या घरी रहायला आणले. खरे तर त्याच्याशी बोलताना आपण विश्वाशी संवाद साधत होत असे वाटत राहायचे. पण त्यालाही जगायची साधने हवी होती. त्याला मी एके ठिकाणी हेल्पर म्हणून चिकटवलेदेखील. आणि तिसर्याच महिन्यात पाहतो तर काय त्याच्या हातात मोबाईल! तोही हप्त्याने घेतलेला.  तो रील्स पाहत टाईमपास करताना दिसू दिसला. घरात असो की रस्त्याने चालताना असो...हातात मोबाईल. घरात आला की मोबाईल. ज्या उद्देशाने त्याला मी आणला होता तो उद्देश्याच माझ्या डोळ्यादेखत कोसळून पडला. एकदा मी झाड झाड झाडले त्याला. तो मोबाईलवरची दृष्टी न हटवता म्हणाला, “तुम्हाला जग बदलले आहे हेच समजत नाही, तुम्ही आउटडेटेड  झाला आहात!”

     स्वहत्या करायला यापेक्षा दुसरे मोठे कारण काय हवे होते?

     पण जेव्हा मी ब्लेडचे धारदार पाते मनगटात घुसवत होतो तेव्हा त्या वेदनांना घाबरून आहे ते जीवन वाईट कसे? जगून पहायला काय हरकत आहे? की आपण हे जगणे झेपत नाही, पेलवत नाही, म्हणून मरतोय?”   असा विचार मनाल उसळला.

     जगात प्रेम आधीही नव्हते आणि आताही नाही. आधी किमान त्याचा आभास तरी होता. आता तोही उरलेला नाही. आणि आजच ऑफिसने आत तुमची गरज नाहीअसे सांगून आपल्याला आणि इतरांना कार्यमुक्त केलेय. मला कसलाही धक्का बसला नाही. मी निमूट बाहेर पडलो.

     जगावे कशासाठी असे काही दिसत नाही. काही ध्येय नाही आणि या जगात नवे ध्येय निर्माण करायला जागाही उरलेली नाही.

     त्या भावनांच्या आवेगात मी ब्लेड खुपसले नसेत. रक्ताची चिळकांडी उडाली, वेदना वगैरे काही झाली नाही. ‘स्वचा अंत करणे एवढे सोपे असेल असे मला वाटले नव्हते. रक्त वाह्त राहिले. माझे त्राण जात राहिले. मी कणाकणाने मेलोही.

     आणि आता मी ताटीवर आहे.

     स्मशानात घोर अंधार पसरलेला जाणवतोय मला. मला येथे आणणारे अजून उगवलेले नाहीत.

     लोक जगण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी धडपडतात म्हणे...

     जिवंत असताना एकाकी आणि मेल्यावरही एकाकी असलेला मी आता मरणाचा अर्थ समजून घेण्यासाठी तडफडतोय!

     शेवटी अर्थ शोधत बसायची ही मानवी वृत्ती कधी कोणाची पाठच सोडत नाही की काय?

 

-संजय सोनवणी


(साहित्य चपराकच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा)

एका मृताची स्वगते...

         मला ते स्मशानात ताटीवर ठेऊन तसेच निघून गेले खरे पण शेवटची फुले वगैरे “ अर्पण ” करून इन्सीनरेटरमध्ये किंवा चितेवर जाळले नाही . म...