मी वैदिक धर्म व हिंदू धर्म याचे स्पष्ट वेगळे उल्लेख करतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. खरे तर तसे वाटायचे काहीएक कारण नाही. कारण अगदी एकोणिसाव्या शतकातील विद्वानही वैदिक धर्म वेगळा आहे असे स्पष्टपने नमूद करतात.
एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक बहुविध हिंदू समाजाला वैदिक धर्मीय धारेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते असे वसुधा दाल्मिया आपल्या "The Nationalism of Hindu Traditions" (१९९७, पृ. ३८३) या ग्रंथात म्हणतात.
आर्य समाजाची स्थापना सर्वांनाच वैदिक धर्मात सामावून घ्यावे यासाठीच झाली होती असे नंदिनी गुप्ता म्हणतात. (The Urban Poor and Militant Hinduism in Early Twentieth Century, पृ. ८९५)
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक हे मात्र वैदिक धर्मात अन्यांना स्थान देण्याच्या विरोधात होते. उलट ते चित्पावन ब्राह्मणाचे वर्चस्व अन्यही ब्राह्म्णांवर कसे राहील याच प्रयत्नांत होते. ते लोकहितवादी आणि महात्मा फुलेंना "वैदिक धर्म-संस्कृती विध्वंसक" मानत तर प्रार्थना समाज व न्या. रानडे यांना "वैदिक धर्माचे" उद्धारक मानत. (Foundation of Tilak's Nationalism, प्रमिला व्ही. राव, पृ. १९)
थो्डक्यात अनेक ब्राह्मण पुनरुज्जीवनवादी विद्वान वैदिक धर्माचाच आधार घेत होते. याचाच अर्थ असा कि सुधारणावादी असोत कि पुनरुज्जीवनवादी, सर्वच वैदिकवादी विद्वानांचा भर वैदिक धर्मावरच होता तर वैदिक व्यवस्थेलाच विरोध असना-या तत्कालीन बहुजनवादी विद्वानांचा भर वैदिक व्यवस्थेवर प्रहार करण्याचा होता. म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे व बहुजनांचा धर्म वेगळा आहे याची जाण ते जरी ब्रिटिशांकरवी कागदोपत्री "हिंदू" म्हणुनच संबोधले जात असले तरी, बाळगून होते.
डा. सुधाकर देशमूख म्हंणतात कि वैदिक धर्म हा स्वतंत्र असून आगमिक तंत्रमार्गी धर्म सिंधुकाळापासून अस्तित्वात आहे. दोन परंपरा सर्वस्वी पृथक असून उलट अथर्ववेदावर तंत्रांची उघड छाप आहे. काही वर्ग वगळता आजचा हिंदू धर्म तंत्रप्रभावित आहे. मध्ययुगात (निबंधकाळात) वैदिक धर्मियांनी पुन्हा उचल खात मुलतत्ववादाचा आश्रय घेत तंत्र व नाथसंप्रदायाने जी समतेचे झुळूक आणली होती तोला बाध आली. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा इतिहास : तंत्र, योग, आणि भक्ती-डा. सुधाकर देशमूख.)
थोडक्यात वैदिक धर्म व आगमिक अथवा तंत्रोक्त धर्म (म्हणजे हिंदू धर्म) वेगळे आहेत याची जाण विद्वानांना होती व आहे. वैदिक धर्म वेगळा उल्लेखन्यात काही अकल्मित आहे असे नाही. या दोन धर्मात समन्वयाचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण वैदिक धुरिणांनी आपले लक्ष केवळ वैदिक अधिसत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले असेच म्हणवे लागेल.
त्यात आर्य सिद्धांताने धार्मिक विभेद हा वांशिक विभेदात बदलला गेला होता हाही इतिहास आहे. टिळकांचे आर्क्टिक होम इन वेदाज" या ग्रंथाने त्यात भरच घातली असे म्हणावे लागते. भारतातील मुलनिवासीवाद विरुद्ध युरेशियन आर्य या संघर्षाचे जनक आर्यवादी वैदिकच आहेत आणि वैदिक धर्मियांनी आता "आर्य भारतातीलच!" असे आता सांगायला सुरुवात केली असली तरी त्यांचा "आर्य गंड" अद्यापही गेलेला नाही हीच बाब सिद्ध करते