Sunday, May 17, 2026

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

 महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची संतती होती आणि त्यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला हे साधारणता: सर्वमान्य आहे. पण इतिहास पाह्यला गेलो तर हे सत्य असल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.

उदा. सम्राट अशोकाने स्वत:च्या शिलालेलेखात आपली द्वितीय पत्नी कारुवाकी (चारुवाकी) आणि पुत्र तिवर याचा सन्मानाने उल्लेख केला आहे, पण एकाही शिलालेखात महेंद्र व संघमित्राचा उल्लेख केलेला नाही. अशोकाच्या प्रयागराज (अलाहाबाद) येथील 'राणीच्या शिलालेखात' तीवर याचे नाव आल्यानंतर, मौर्य साम्राज्याच्या अधिकृत इतिहासातून आणि पुढील कोणत्याही शिलालेखांमधून त्याचे नाव अचानक आणि कायमचे गायब होते. शक्यता ही सांगितली जाते की त्याचा अकाली मृत्यू झाला असावा किंवा त्याने संन्यास घेतला असावा. पण अर्थात हे तर्कच आहेत. ठोस पुरावा काही नाही.
महेंद्र आणि संघमित्रा हे उल्लेख प्रथम येतात ते श्रीलंकेत लिहिले गेलेले बौद्ध ग्रंथ दीपवंस आणि महावंस यात, जे इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर लिहिले गेले. म्हणजे अशोकाच्या मृत्युनंतर जवळपास सातशे वर्षांनी. हे उल्लेख वगळता संघमित्रा आणि महेंद्र यांच्या ऐतिहासिकतेचे कोणतेही ठोस 'भारतांतर्गत' किंवा श्रीलंकेतील पुरातत्वीय पुरावे (उदा. अशोकाचे अथवा श्रीलंकेचा तत्कालीन राजा तिस्स याचे शिलालेख) उपलब्ध नाहीत.
महेंद्र या नावाचा एक स्थविर होता अशा अर्थाचे शिलालेख राजगला आणि मिहीन्तले येथील लेखांत मिळतात पण येथे फक्त महिंद्राचा उल्लेख आहे आणि तोही एक सामान्य स्थविर म्हणून. ही कोणीतरी समान नावाची व्यक्ती असू शकेल. यातही संघमित्रा हे नाव कोठेही मिळून येत नाही.
सातव्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्यु-एन-त्सांग याने लिहिलेल्या ऐकीव माहितीनुसार श्रीलंकेत बौद्ध धर्म पसरवणारा महिंद (महेंद्र) हा सम्राट अशोकाचा 'लहान भाऊ' (Younger Brother) होता, मुलगा नव्हता. पण यातही संघमित्रा नाव गायब आहे.
भारतातील हस्तलिखितांपेक्षाही जुना पुरावा चीनमध्ये मिळतो. इसवी सन ३०० मध्ये 'अँन फॅकिन' (An Faqin) नावाच्या विद्वानाने 'अशोकावदान'चा चिनी भाषेत अनुवाद केला, ज्याचे नाव 'अ-यु वांग चुआन' (A-yu wang chuan) असे आहे. यावरून सिद्ध होते की, इसवी सनाच्या ३ ऱ्या शतकापूर्वीच हा मजकूर भारतात पूर्णपणे लिहून तयार झाला होता
या अनुवादात महेंद्र किंवा संघमित्रा ही नावे अस्तित्वात नाहीत मात्र या ग्रंथामध्ये अशोकाचा एक लहान भाऊ दाखवला आहे, ज्याचे नाव 'वीताशोक' असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मोहिमेचे आणि श्रीलंकेत बौद्ध धर्म नेण्याचे श्रेय श्रीलंकन ग्रंथ 'महेंद' (महेंद्र) याला देतात, तशाच प्रकारच्या धार्मिक प्रवासाचे किंवा भिक्षू बनण्याचे श्रेय हा चिनी/उत्तर भारतीय ग्रंथ अशोकाच्या भावाला (विताशोक) याला देतो. पण श्रीलंकन बौद्ध साहित्यातून ९आनि भारतीय इतिहासातून विताशोक हे नाव गायब आहे.
सन ३०० च्या या चिनी भाषांतरात महेंद्र-संघमित्राचे नाव नसणे हे सिद्ध करते की, अशोकाच्या मृत्यूनंतरच्या ५०० वर्षांपर्यंत उत्तर भारतात (मगध, मथुरा, उज्जैन) महेंद्र आणि संघमित्रा या नावांची कोणतीही मोठी ओळख किंवा कथा अस्तित्वात नव्हती कारण त्या ऐतिहासिक व्यक्ती नव्हत्या तर त्या बौद्ध भिक्षुंनी आपल्या धर्माला वलय देण्यासाठी निर्माण केल्या होत्या.
पुराणे किंवा प्राचीन बौद्ध साहित्यामाध्येही ही नावे कोठेही अवतरत नाहीत, अवतरतात ती सम्राट अशोकानंतर किमान सातशे वर्षांनी आणि तीही श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात.

हे इथेच थांबत नाही. सोळाव्या-सतराव्या शतकातील (इ.स. १६०८) प्रसिद्ध तिबेटी बौद्ध इतिहासकार लामा तारानाथ यांनी आपल्या 'भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास' (History of Buddhism in India) या ग्रंथात महेंद्र आणि संघमित्रा या दोघांचा साधा उल्लेखही केलेला नाही. श्रीलंकेला बौद्ध धर्म नेण्याच्या संपूर्ण मोहिमेचे श्रेय तारानाथ यांनी अशोकाच्या कोणत्याही अपत्याला दिलेले नाही. एवढेच नाही तर  श्रीलंकेव्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही बौद्ध परंपरेला (चिनी असो, तिबेटी असो वा उत्तर भारतीय) हे माहीतच नाही की 'महेंद्र आणि संघमित्रा' नावाची अशोकाची संतती श्रीलंकेत गेली होती.   तारानाथ यांच्यासारखा कट्टर बौद्ध इतिहासकार, ज्याने भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाची पानं न् पानं गोळा केली, तो जर सम्राटाच्या श्रीलंकेत गेलेल्या धर्मप्रचारक मुला-मुलीचे नाव लिहीत नसेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की 'महेंद्र-संघमित्रा हे अशोकाचे अपत्य होते' हा नॅरेटिव्ह केवळ आणि केवळ श्रीलंकेपुरताच मर्यादित आणि तिथल्याच भिक्षूंनी तयार केलेला धार्मिक प्रचार  होता.

यावरून इतिहासकारांचा हा संशय अधिक गडद होतो की, महेंद्र आणि संघमित्रा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे 'श्रीलंकन बौद्ध भिक्षूंनी' स्वतःच्या देशातील बौद्ध धर्माचे महत्त्व वाढवण्यासाठी तयार केले असावे. आणि भारतात हे जवळपास सर्वच धर्मांनी केलेले आहे. अनेक राजे क्षत्रीय नसतांना त्यांना उगाच आपल्या धर्माचे दाखवण्यासाठी बळजबरीने क्षत्रीय घोषित केले आहे. अनेकांचे बाप नष्ट करून टाकलेत, जे नव्हतेच त्यांना गुरुपदी बसवले तसेच हे आहे एवढेच!

इतिहास अजब असतो हेच खरे. चाणक्य जो अस्तित्वातच नव्हता तो जसा एक प्रत्यक्षातील व्यक्ती म्हणून मानला गेला तसेच महेंद्र-संघमित्रेचे झाले हे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही.
-संजय सोनवणी

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

  महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची सं...