Showing posts with label मानवी. Show all posts
Showing posts with label मानवी. Show all posts

Thursday, January 23, 2025

कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेले भय किती खरे?

 



मानवी इतिहासात पूर्ण क्रांती घडवणारे अत्यंत महत्वाचे शोध लागले आहेत. शेतीच्या शोधाने मानवी जीवनात क्रांतीकारी बदल घडवला होता. भटका समाज त्यामुळे स्थिर होऊ लागला. पण हा बदल पचवणे ज्यांना अन्नाच्या शोधासाठी भटकंती करायची हजारो वर्ष सवय होती त्यांना केवढे जड गेले असणार याची आपण कल्पना करू शकतो. पण बदल न स्वीकाणारे मागे फेकले जातात. शेतीमुळे मानवी संस्कृती बहरली. कोणतेही नवे तंत्रज्ञान आपल्यासोबत काही साईड इफेक्ट्सही आणत असते. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचे काय करायचे हा प्रश्न जसा उपस्थित झाला व त्यातून व्यापाराचा शोध लावला गेला असला तरी अतिरिक्त शेतीउत्पादन साठवण्याच्या पद्धतीमुळे अनेक नव्या रोगांचा जन्म झाला. या रोगांसाठी प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अनेक पिढ्या गेल्या, यात कोट्यावधी लोकांचे मृत्यूही झाले. व्यापारामुळे रोगरायाही दूर दूर पर्यंत पसरवण्यास हातभार लागला. ज्या जनजाती या शेतीप्रधान मानवापासून दूर राहून आदिम जीवन जगत होत्या त्या जेंव्हाही या कृषीमानवाच्या साहचर्यात गेल्या तेंव्हा ते या जीवाणू-विषाणूशी कधी लढलेच नसल्यामुळे त्यांचे शिरकाण झाले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात युरोपियन गेले तेच ही "जैविक अस्त्रे" सोबत घेऊन आणि जरी त्यांची स्वत:ची प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली असली तरी तेथील मूळ रहिवाशांचे तसे नव्हते. त्यामुळे एकार्थाने हा वंशसंहारच होता. त्याच वेळीस मानवी भाषेत बहुरंगी भर पडत गेली. दैवत संकल्पना ते नितीतत्वांमध्ये अमुलाग्र बदल झाला. ही मोठी उलथापालथ होती. 


त्यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे यंत्रांचा. यंत्रयुगाने पारंपारिक व्यवसाय-धंद्यांची वाताहत केली. यंत्रयुगाला विरोध करणारे मानवशास्त्रज्ञही वाढले आणि ते शाश्वत जीवनपद्धतीचा पुरस्कार करू लागले. अशाही लोकांनी अपार प्रसिद्धी मिळवली असली तरी यंत्रयुगाने मानवी जीवनाला व्यापून टाकले. अर्थव्यवस्थेचे नियम बदलले. या युगाला आनुषंगिक नवी नितीशास्त्रे जन्माला आली. जगण्याच्या पद्धती बदलल्या. एका धावेमाःगुण दुसर्या अधिक जीवघेण्या दहावी सुरु झाल्या. पण यंत्रयुग टाळता आले नाही कारत त्यात तोट्यांपेक्षा फायदेच अधिक होते. जगणे अधिक सोयीस्कर झाले. अर्थात विषमतेचाही विस्फोट झाला. ती कशे टाळता येईल याविषयी चिंतन झाले असले तरी ते सरकारी पातळीवरील उपाययोजना एवढ्यापुरतेच मार्त्याडीत राहिले. जीवनाचे प्रश्न बदलले. नंतर संगणक युग आले. त्यानेही भीतीची लाट निर्माण केली. रोजगार जातील या भीतीने मानवजाताच गळाठून गेली. पण तसे झाले नाही. उलट लाखो नव्या नोकऱ्या जन्माला आल्या. पुन्हा समाजजीवनात नवी उलथापालथ झाली. मानवी नाते संबंध बदलू लागले. जग जवळ येऊ लागले पण मानवी मने मात्र दूर गेली असे या स्थितीचे वर्णन केले जाते. 


आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय) आणि यंत्रमानव (रोबोटिक्स) तंत्रज्ञानाने जगातील असंख्य लोकांची झोप उडवलेली आहे. ही नवी क्रांती आहे असे मानले जाते. उद्याच्या जागातील सामाजिक आणि अर्थजीवनावर याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत हे सांगू पाहणा-या विचारवंतांची दाटी सध्या वाढलेली दिसते. अलीकडेच लंडन येथे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात शिखर परिषद झाली व दोन दिवसाच्या चर्चेनंतर ए.आय. मध्ये गंभीर, विनाशक आणि नुकसानदायक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे उपस्थित होऊ शकतात कारण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात अशा अपायकारक संभावना आहेत असे घोषित केले गेले. या घोषणापत्रावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीनसारख्या अठ्ठाविस देशांनी सह्या केल्या असून नवीन निर्बंधांना तयार करून लागू करण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे.


कोणतेही नवे तंत्रज्ञान आले कि त्याच्या दुरुपयोगाबद्दल शंका घेऊन त्याला घाबरून जाणे हे आपल्या जगाला नवे नाही. समाजविघातक प्रवृत्तींची जगात वानवा नाही हे तर अजून एक दुर्दैवी वास्तव आहे. दहशतवादी संघटनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विनाशक गोष्टी करवू शकतात. विकृतबुद्धी लोक ए.आय. वापरून बनावट व्हिडिओ बनवून बेमालूमपणे ते खरेच आहेत असे वाटतील या पद्धतीने प्रसारित करून कोणालाही बदनाम करू शकतात. सायबर गुन्हेगारी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन आर्थिक ते खाजगी माहितीचा अपहार करू शकतात. आधीही हे होतच होते पण आता त्याचा वेग वाढेल अशी चिन्हेही दिसू लागलेली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता खरे तर अजून बाल्यावस्थेत आहे, पण तिच्यात प्रतिक्षणी वेगाने सुधारणा केली जाते आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे वरील तोटे जरी असले तरी कामाच्या व निर्णयक्षमतेच्या वेगात व अचूक हाताळणीच्या बाबतीत ए. आय. अत्यंत यशस्वी ठरत असल्याने ते बलाढ्य कॉर्पोरेटसाठी आणि साध्यासोप्या दैनंदिन सोयींसाठी सर्वसामान्यांना फायद्याचे ठरते आहे हेही एक वास्तव आहे.


मनुष्य ज्या गोष्टींना सरावलेला असतो अशाच वैचारिक पर्यावरणात राहणे पसंत करतो. नवे ज्ञान हे जुने परिचित पर्यावरण नष्ट करत असल्याने त्याची भिती वाटणेही स्वाभाविक आहे. त्या भीतीत फार काही वावगे असते असेही नाही. नव्या ज्ञानाला जग नेहमीच घाबरते तर चतुर लोक त्याचा आधी फायदा घेऊन प्रगती करतात. आता “माणसाचे काय?” हा गंभीर प्रश्न जगभर चर्चेत नेहमीच येत असतो. आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाला आव्हान द्यायला उभे ठाकलेले आहेत. उद्या आताचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन क्वांटम प्रणालीवर चालणारे संगणक येतील तेंव्हा त्यांच्या अचाट क्षमतेमुळे आताचे संगणक बाद होऊन नवी अतिशक्तीशाली प्रणाली येईल तेव्हाही आज होते आहे तशीच चर्चा हिरीरीने केली जाईल. सामाजिक आणि नैतिक प्रश्न उठवले जातील यात शंका नाही.

पण मानवी प्रवृत्ती हीच नवेनवे शोध घेण्याची आहे. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज आहे त्यापेक्षा नवे, वेगळे आणि अधिक क्षमतेचे कसे निर्माण करायचे हा ध्यास त्याला नैसर्गिकपणे जडलेला आहे. जुनी नीती रद्दबातल ठरवून नवी नीतीमुल्ये जन्माला घालणेही त्यातच आले. 


माणसाला अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ आणि कल्पक बनवणे हे प्रत्येक नव्या तंत्रद्न्यानाचे उद्दिष्ट असते. मानवी जीवन सुखकर व्हावे व साधी दैनंदिन कामे करण्यात वेळ न घालवता अधिकाधिक सर्जनशील कार्याकडे मानव जातीला कसे वळवता येईल हे पाहणे तंत्रज्ञानाचे ध्येय असते. आताची कृत्रिम बुद्धीमत्ता नेमकी काय आहे आणि मग तिचे भविष्य काय असणार आहे याचा विचार आपण पुढील लेखात करूयात. हे तंत्रज्ञान माणसाला खरेच घातक ठरणार आहे काय? तिच्यात असलेली सामर्थ्ये आणि मर्यादा यावर चर्चा करूयात. 


-संजय सोनवणी

Thursday, January 9, 2025

मानवी भविष्याचा विचार का आणि कशासाठी?





भविष्यात काय दडून बसलेय हे कधी कोणाला पक्केपणे सांगता आलेले नाही. माणसाने कितीही योजना आखल्या तरी त्या तशाच सुरळीतपणे पार पाडल्या जातील असेही नाही. आपले सरकारही पूर्वी पंचवार्षिक योजना सादर करत असे. या योजना म्हनजे पुढील पाच वर्षात साध्य करायच्या बाबी व त्यासाठीच्या तरतुदी या स्वरुपाच्या असायच्या. पण त्याही १००% कधी पार पाडल्या गेल्याचे उदाहरण नाही, कारण अनपेक्षीत घटना घडतात आणि अंदाजपत्रके कोसळत जातात. असे असले तरी त्यांचे महत्व कमी होत नाही. कारण अशा शास्त्रशुद्ध अंदाजांची जाणत्या प्रगतीशील आणि प्रगत समाजांना नेहमीच गरज असते.

पण हे झाले आर्थिक/औद्योगिक/संरचनात्मक कार्यांबद्दल. आपण एकुणातील मानवी समाजाच्या भवितव्याचे अंदाजपत्रक कधी बनवत नाही. काही समाजशास्त्रज्ञ हे आपापल्या ज्ञानशाखेनुसार आपापल्या स्तरांवर करत असतात. भविष्यवेधी कादंबरीकारही भयावह स्वरुपात का होईना भविष्यातील मानव आणि त्याचे जीवन कसे असेल यांचे रंजक चित्रण करत असतात. भविष्यवेधी लेखनाची आपल्याकडे तशी वानवाच असली तरी पुढील पंचवीस वर्षानंतरच्या भविष्याचे वास्तवदर्शी चित्रण मी “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत केलेले आहे. यात मी भविष्यातील ज्ञानयंत्रणा, अर्थव्यवस्था, तंत्र आणि शेतीव्यवस्था ते दहशतवादाची रूपे भविष्यात कशी असतील आणि या सर्वांचा एकंदरीत मानवी मानसिकता आणि समाजरचनेवर कसा प्रभाव पडेल याचे विदारक चित्रण केलेले आहे.

खरे म्हणजे भारतीय माणूस इतिहासात जास्त रमणारा. रोजचे राशी भविष्य किंवा जोतिषाकडून भविष्य पहायची सवय भारतात प्रचंड आहे. मुळात माणसाला भूत-भविष्य जाणून घेण्याचा छंद आहे. याला वैज्ञानिकही अपवाद नाहीत. तेही विश्वाची सुरुवात कशी होती आणि शेवट कसा असू शकेल याची भाकिते करत असतात. पण ते फक्त गणिती शक्यता वर्तवतात...फलज्योतिषकारांसारखी शुभाशुभ-शकुनात्मक भाकिते करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भाकितांना काही अर्थ तरी असतो. पण आम्ही मानवी समाजाचे वास्तवदर्शी भविष्य काय असावे, ते काय असेल आणि हवे तसे भविष्य घडवण्यासाठी नेमके काय करावे लागेल याबाबत मात्र आम्ही सहसा विचार करण्याच्या फंदात पडत नाही. किंबहुना आम्हाला भ्रामक इतिहासात जसे रमायला आवडते तसेच काल्पनिक सुख-रंजनात्मक भविष्यात रमायला आवडते. अशात पाश्चात्य जगात कोणी नोआल युवा हरारीसारखा लेखक उत्पन्न होतो आणि तो एखाद्या तंत्रज्ञानाच्या भयावहतेचा ढोल बडवू लागतो आणि मानवी समाजात चलबिचल निर्माण करत लोकप्रियतेच्या लाटांवर आरूढ होतो. मागे अल्विन टॉफ्लर या लेखकाने ‘थर्ड वेव्ह’ नावाचे पुस्तक लिहून जगभरात अशीच खळबळ माजवली होती. असे होत राहणार. भविष्यातही असे लेखक उत्पन्न होणार आणि मागच्यांना विसरून जाणार. पण असे का होते याचा मुलगर्भात जाऊन विचार करणे भाग पडते.

ते असो. येथे आपल्याला विचार करायचाय तो पुढील ५० वर्षांत आमचे जग कोठे आणि कसे असेल याचा. आम्ही भारतीय म्हणून या नव्या वेगाने बदलत्या जगात कोठे असू? कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे खरेच मानवजात संकटात स्पडणार आहे काय? नव्या जगात आमचे स्थान काय असेल? आम्ही कोठे असू? या आणि याशी निगडीत प्रश्नांवर विचार करणे आवश्यक आहे. यात मानवी जगाला घेरून बसलेल्या तंत्रज्ञानांचे पुढे काय होईल, अजून कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्यामुळे मानवी जगात अजून कोणती क्रांतीकारी परिवर्तने होतील याचा विचार जसा अभिप्रेत आहे तसाच शेतीचे नेमके काय होईल, तिला कोणते रूप मिळेल यावरही विचार अभिप्रेत आहे. जगात कोणत्या नव्या अर्थव्यवस्थेची प्रारूपे जन्माला येतील, राष्ट्र या संकल्पनेचे ब्नेमाके काय होणार आहे, धर्म आणि तत्वज्ञान कोणते नवे दिशा पकडू शकते आणि दहशतवादाची रूपे कशी बदलतील यावरही विचार व्यक्त करणे आवश्यक आहे.

मी "आम्ही" असा शब्द वापरतो तेंव्हा त्यात आम्ही "भारतीय" म्हणून जसे येतो तसेच एक जागतीक समुदाय म्हणूनही येतो. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य हे मानवजातीच्या भवितव्याशीच निगडित असते. आपले पुढील भविष्य हे आजवरचा आपला प्रवास, वर्तमान आणि भविष्यात यशस्वी अथवा अयशस्वी होऊ शकतील अशा सर्वच क्षेत्रांतील शोधांवर आणि मानवी जगण्याच्या सध्याच्या नित्यनेमाने बदलत असलेल्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. कोणताही वर्तमान इतिहासाच्या छायांनी झाकोळलेला असतो हा आपला आजवरचा मानवी इतिहास असल्याने अगदी काटेकोर नसला तरी सत्याच्या किमान जवळ जाईल असे भविष्याबाबतचे विवेचन आपण करू शकू.

अर्थात हे चिंतन सामुहिक असेल, माझ्यासोबत सर्वांनीच ते आपापल्या वकुबाप्रमाणे करावे लागेल. आपण भारतीय मुळात मिथ्या इतिहासात रमणारे प्राणी आहोत. भारतात भविष्यकथन करणा-यांची रेलचेल असली तरी वास्तवदर्शी पायावर आम्ही उद्या कोठे असायला हवे आणि ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे याबाबत मात्र आमचे विचारवंत मूक असतात. बदलत्या जगात स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल, वर्तमानातच आर्थिक व सामाजिक प्रगती करायची असेल तर आम्हाला आमच्या उथळ झालेल्या राजकीय विचारांवर मात देत ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती आधी करावी लागेल. अर्थात वर्तमानात ती कोणत्या प्रकारे आणि कशी करायची याचीही योजना आपल्याकडे आजही नाही. सरकारे येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. हा प्रवाह ध्येयहीन दिशाहीन व्हावा किंवा होतो असे नाही तर अनेकदा भरकटलेल्या मानवी प्रेरणाच आपल्या भविष्याचा नाश करत असतात. आमच्याकडे मुळात ती दृष्टी आज आहे काय याचाच आधी विचार केला नाही तर भविष्य काय असणार हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. जगाचा प्रवाह हा नेहमीच पुढे जात राहणार आहे. त्यात आमचे काही सकारात्मक आणि सर्जनशील योगदान असणार आहे काय याचाही विचार आपल्याला करायचा आहे. हा प्रवाह ध्येय ठरवून त्या दिशेने फार वेगाने गेला नाही तरी चालेल, संथपणे का होईना त्या दिशेने वाटचाल करेल यासाठी मात्र निश्चित धोरणे असावी लागतात. आपल्या देशातील नागरिकांच्या मानसिकता, क्षमता आणि त्यांची स्वप्ने यांचे वास्तवदर्शी भान असावे लागते. ते आपल्याकडे आहे काय याचा विचार प्रत्येकजण स्वतंत्रपणे करू शकतो. भविष्यात जग आणि भारत कोठे आणि कसा असेल आणि कोठे असायला हवा यावर आपल्याला विचार करत भविष्यातील जग कोठे असणार आहे यावर या लेखमालिकेत चर्चा करत जायचे आहे.

-संजय सोनवणी

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...