Friday, November 10, 2023
कृत्रिम बुद्धीमत्तेची भीती का?
Saturday, March 18, 2023
शिक्षण ज्ञानासाठी कि रोजगारासाठी?
शाळा-कॉलेजांत दिले जाणारे शिक्षण हे शिक्षण नसून काय शिकावे याचे विद्यार्थ्याला दिशादिग्दर्शन करणारे असते असे इमर्सन या शिक्षणतज्ञाने अठराव्या शतकात म्हटले होते. शिक्षणाचा हा मुलभूत पाया आपल्या शिक्षणव्यवस्थेतून पुरता दुर्लक्षिला गेलेला आहे. लिहा-वाचायला शिकणे ही शिक्षणाची पहिली पायरी असली तरी विद्यार्थ्याचा एकुण कल लक्षात न घेता पहिली ते दहावी अभासक्रमातील सारेच विषय सर्वच विद्यार्थ्यांवर सरसकट थोपलेले असतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्याने अधिकाधिक गूण मिळवावेत एवढीच माफक अपेक्षा आपली शिक्षणव्यवस्था ठेवून असते. सर्वच विषयांत प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच रस असणे शक्य नसते. ज्यात रस आहे त्यात अभ्यासक्रमाबाहेर जात कुतुहल दाखवणे विद्यार्थ्याला शक्य असले तरी आपली शिक्षणपद्धती तसे करू देत नाही. किंबहूना कुतुहल वाढवणे हाच अभ्यासक्रमाचा हेतू असतो हेच लक्षात घेतले जात नाही.
त्यामुळे रस नाही असे विषय विद्यार्थी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात व तो म्हणजे पाठांतर...! ज्यांची स्मरनशक्ती चांगली आहे असे विद्यार्थी चमकतात तर उर्वरीत घोकंपट्टीच्या आधारावर सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. यात बव्हंशी विद्यार्थी शिक्षणातील रस गमावून बसतात व उरते एक औपचारिक, शिक्षण नव्हे तर शिक्षा वाटणारी शिक्षणप्रक्रिया. जे शिकावे वाटते, ज्यात अधिक प्राविण्य मिळवावे वाटते ते विषय बालवयातच मागे पडतात व विद्यार्थी हा शिक्षणाला कंटाळलेला पण नाईलाज म्हणुन शिकणारा असा घटक बनत जातो. या प्रक्रियेत पदवीपर्यंत पोहोचेपर्यंत अगणित विद्यार्थी शेवटी गळुन पडतात. तोवर शिक्षणाबद्दलचे विद्यार्थ्याचे मत हे "रोजगारार्थ शिक्षण" असेच बनून गेले असल्याने सहविद्यार्थीही त्याचे रोजगाराच्या जीवघेण्या शर्यतीतील महत्वाचे स्पर्धक बनलेले असतात. यातून जी असामाजिक मानसिकता बनते त्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा असे वाटत नाही.
पास होणे व पुढे जाणे या प्रक्रियेत पास होण्याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ते शिक्षक, पालक ते समाजाकडून. नापास होणारा विद्यार्थी हा कुचकामी असतो, बुद्धीहीन असतो असा समज आपण करुन घेत असतो तेंव्हा "बुद्धी"च्या व्याख्येबद्दल आपला सनातन गैरसमज असतो. दरवर्षी दहावी-बारावीनंतर नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या आपल्या समाजमानसाच्या मानसिक असंतुलनाचा अपरिहार्य भाग आहे.
बरे, हे शिकलेले, पदवीधर, ज्या शाखांमद्धे शिकतात त्यात किती प्राविण्य मिळवलेले असतात? जगण्यासाठीचे असे कोणते कौशल्य त्यांनी शिक्षनपद्धतीमुळे आत्मसात केलेले असते? तज्ञांच्या मते अशिशिक्षित व्यक्ती या उलट सुशिक्षितांपेक्षा जगण्याची साधने प्राप्त करण्यात अधिक कुशल असतात. सुशिक्षित बेरोजगार अशी जशी एक व्यापक अवस्था आहे तशी अशिक्षित बेरोजगार मिळणे अवघड आहे कारण किमान अशिक्षिताला जगण्याची साधने मिळवण्यासाठी सामाजिक लाज वाटत नाही. आज कोट्यावधी शिक्षीत बेरोजगार आपल्या पारंपारिक व्यवसायात पडु इच्छित नाहीत. शेतक-यांची मुले शेतीवर राबण्यात, आहे त्या शेतीकामाला विकसीत करण्यात कमीपणा मानतात. हीच बाब अन्य पारंपारिक व्यवसायांची. मग नवीन संधी शोधणे, विकसीत करणे ही तर खुपच दुरची बाब झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण.
आणि यामुळेच आपली शिक्षणपद्धती ही निष्क्रीय, अनुत्पादक बेरोजगार निर्माण करणारी संस्था बनली आहे. कोणतीही व्यवस्था समस्त शिक्षीत समाजाला रोजगार देवू शकत नाही. रोजगार निर्माण करणारेही तेवढ्याच प्रमाणात (मग तो स्वयंरोजगार का असेना) कसे निर्माण होतील अशी शैक्षणिक रचना करावी लागते. श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा यांच्यात संतुलन साधावे लागते. ज्ञान तर नाहीच नाही आणि श्रमप्रतिष्ठाही नाही अशा विचित्र परिस्थितीत आपली शिक्षणव्यवस्था अडकलेली आहे.
याची परिणती पहायला हवी. केंद्रीय श्रममंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतीय एकुण रोजगार क्षेत्रात फक्त ७% रोजगार संघटित क्षेत्र देते तर ५% असंघटित क्षेत्र देते. उर्वरीत रोजगार हा अजुनही शेती, पशुपालन व मासेमारी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि हा रोजगार बव्हंशी अर्धवेळ स्वरुपाचा आहे. जरी सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरी त्याच वेळीस शासकीय नोक-या कमी होत आहेत. एकुणात जेवढ्या प्रमाणात शिक्षितांची संख्या वाढत आहे त्याच्या व्यस्त प्रमानात रोजगाराच्या संधी वाढत आहेत...म्हणजेच शेतीक्षेत्र हेच आजही रोजगाराचे प्रमूख माध्यम आहे.
ज्ञाननिष्ठा, तर्कनिष्ठा, कल्पनाशक्ती व निर्मितीक्षमता ही शिक्षणपद्धतीची चतु:सुत्री असायला हवी होती. आता तरी असायला हवी. पण दुर्दैव हे आहे कि आपले अगदी विज्ञानाचे शिक्षण आणि धर्मशिक्षण यात फरक उरलेला नाही. धर्मशिक्षक जसे शंका व्यक्त करण्यावर बंदी घालतात तसेच आमचे विज्ञानशिक्षकही विद्यार्थ्याला शंका विचारायला बंदी घालतात. नैसर्गिक कुतुहलाची हत्या ही अशी होते. ज्ञानाची वाढ थांबते ती अशामुळे. अगदी चित्रकला शिकवनारे शिक्षकही रेखाटने व रंगभरणाच्या तांत्रीक बाजुंनाच महत्व देतात, सृजनाला नाही. प्रयोगशीलतेला नाही. चित्रकारितेतही जेथे "कुशल कामगार" निर्माण केले जातात तेथे चित्रकारांची आणि कला-अविकसीत रसिकांची काय गत असेल?
प्रगल्भ समाज घडवण्याच्या कार्यात आपली शिक्षणपद्धती अत्यंत अपयशी ठरते आहे. डेसिडिरयस इ-यस्मस यांनी "शिक्षण हे ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव मिळवण्यासाठी दिले जावे..." असे म्हटले होते. युरोपात ज्ञानक्रांती झाली तिला आमचे एतद्देशीय विद्वान "भौतिक क्रांती म्हणुन त्याज्ज्य" असे आजही हीनवत असतात आणि आमच्या अस्तित्वात कधीही नसलेल्या आध्यात्मिक क्रांतीलाच सर्वोपरी मानत आपले मानसिक समाधान करुन घेत असतात.
खरे तर माणसाला प्रगल्भ बनवत, जगण्यासाठी सक्षम बनवत, संध्या निर्माण करत प्रत्येक क्षेत्रात अग्रगामी राहनारा समाजच खरा आध्यात्मिक असतो हे लक्षात घ्यायला हवे.
याउलट आमची समाजरचना ही लबाड, ढोंगी आणि पथभ्रष्टांची कशी आहे याचे चित्र शिक्षणव्यवस्थेतीलच (आर्थिक ते नैतीक) अपार भ्रष्टाचारातुन सहज पाहता येते...इतर क्षेत्रांबद्दल मग काय बोलावे? ज्या समाजात विद्यार्थी आणि शिक्षकही भ्रष्ट असतात, ज्यांच्या शिक्षणप्रेरणा या ज्ञानप्रेरणा नसून शैक्षणिक अडाणीपनातुन व पोटभरु वृत्तीतून निर्माण होतात त्या समाजाचे भवितव्य काय असू शकते?
पोट भरण्यासाठी व इतरांचेही पोट भरण्यासाठी सक्षम बनवणे, स्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच...किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. तसे आम्ही करत नाही आहोत. एका अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखाददुसरी उदाहरणे वगळता जागतीक ज्ञानसंपदेत भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही.
मग स्वत:चे व्यक्तिगत भवितव्य हे जर एका फक्त रोजगाराभिमुख स्पर्धकाचे असेल तर आम्ही कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करतो? महासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते कारण अर्थोत्पादन ही ज्ञानाचीच तार्किक व अंतिम परिणती असते. तिची परिमाणे वेगवेगळी असू शकतात. बापजाद्यांच्या जमीनी विकून अथवा दुस-यांच्या हडपुन अर्थोत्पादन होत नसते. देशी नैसर्गिक साधनसामग्री उध्वस्त करुन, म्हणजे बाहेर विकून, अर्थोत्पादन होत नसते. उसशेती ज्याप्रमाने इतर शेती उत्पादनांसाठी न्याय्य वाटा न देता जलसंपत्ती उधळते...तसे करुनही शाश्वत अर्थोत्पादन होत नसते. आपल्याला "अर्थ" कळाला नाही कारण आपली शिक्षणपद्धतीच मुळात अर्थाला समजण्यात अपेशी ठरलेली आहे!
आपल्याला आपल्या शिक्षणविचारांच्या दिशा बदलाव्या लागतील!
संजय सोनवणी
(दै. नवशक्तीमध्ये प्रकाशित)
Friday, April 29, 2022
शिक्षण: ज्ञानयुगाकडे कि अंधारयुगाकडे नेण्याचे साधन?
शिक्षण हे भावी पिढी सक्षम आणि प्रगल्भ होण्याचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. पण अनेक विचारधारा हे मान्य करत नाही. शिक्षण हे आपल्याला सोयीच्या विचारांची बनवणे हे त्यांना शिक्षणाचे उद्दिष्ट वाटते. त्यामुळे अभ्यासक्रमांवर ज्या विचारधारेचे राज्य असते त्या विचारधारेचा प्रभाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो हे आपण आजवर पाहिले आहे. त्यासाठी इतिहास असो कि पार विज्ञान, यातही फेरफार करून हवे ते अंश विद्यार्थ्यांना शिकवायला भाग पाडले जाते. कोवळ्या वयातच हे होत असल्याने विद्यार्थीही नकळत त्या पद्धतीच्या शिक्षणाच्या-विचारधारेच्या प्रभावात जातो हे एक वास्तव आहे. पालक सहसा कधीही आपल्या मुलांना काय शिकवले जात आहे यात रस घेत नसल्याने ते आपल्या पाल्याला काय चुकीचे आणि काय बरोबर हे सांगण्याच्या स्थितीत नसतात. आणि “जिज्ञासा” निर्माण करणे हा शिक्षणाचा एक महत्वाचा हेतूच आपल्या शिक्षणपद्धतीतून समूळ सुटला असल्याने विद्यार्थीही प्रश्न विचारण्याच्या फंदात न पडता “परीक्षेत येणा-या प्रश्नांना परीक्षकाला हवी वाटतील अशीच उत्तरे लिहून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे?” या प्रश्नानेच अधिक भेडसावलेले असतात. त्यामुळे भविष्यात पुढेही काय शिकवले, काय बरोबर, काय चूक याची पडताळणी करून पाहत नाहीत. कारण “मार्क म्हणजेच मेरीट” अशा समजाचे सारे शिकार झालेले आहेत. जिज्ञासा-चिकित्सा हे विषय तर बादच आहेत!
अलीकडेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसइ) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमातून शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावादी चळवळ, आफ्रिका आणि आशियातील काही देशांत झालेला इस्लामी साम्राज्यांचा उदय, मुघलकालीन न्यायव्यवस्था अशा इतिहासाला कात्री लावली आहे तर दहावीच्या अभ्यासक्रमातून अन्नसुरक्षेबाबतचा संपूर्ण धडाच काढून टाकला आहे. उर्दूतील प्रसिद्ध कवी फैज अहंमद फैजयांच्या दोन कवितांचे अंशही काढून टाकण्यात आले आहेत. जे वगळले आहे ते बव्हंशी नेमके नेहरू आणि इस्लामच्या संदर्भातील आहे. विद्यमान सरकार हे उजव्या विचारसरणीचे व पुनरुज्जीवनवादी असल्याने हे घडले आहे हे सहज कोणाच्याही लक्षात येईल.
२०१४ साली जेंव्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांना
रा. स्व. संघाचे शिक्षणपद्धतीतील तज्ज्ञ विद्या भारती प्रत्यक्ष भेटले होते.
त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला
हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन
खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात
वेद-उपनिषदं, प्राचीन हिंदू भारतीयांचे विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा
यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आणि तसे निर्देश
अधिकार्यांना दिले गेले होते. त्यानंतर अभ्यासक्रमांत वेळोवेळी हस्तक्षेप केला
गेला याची यादी मोठी जाईल.
आता तर भाजप
सरकारने गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी समिती नेमली आहे. त्या
समितीत केवळ उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत. विशेष म्हणजे ते सर्व संघ विचारांचे
आहेत. वेदकाळ प्राचीन ठरवणे, रामायण-महाभारत खरेच घडले होते हे सिद्ध करणे आणि
महत्वाचे म्हणजे सिंधु संस्कृतीचे जनक वैदिक धर्मीयच होते हे दाखवणे आणि हेच वैदिक
आर्य जगभर पसरत इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे वाहक कसे झाले हे दाखवणे हा या
समितीचा इतिहासलेखनामगील हेतू आहे. यात द्रविड संस्कृती, जैन-बौद्ध
संस्कृती, उत्तरपूर्वेची
संस्कृती याला स्थानच नाही कारण या समितीत यातील एकालाही प्रतिनिधित्व नाही.
प्राकृत पाली भाषा त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. आणि विशेष म्हणजे हा नवा
इतिहास २०२४ पासून अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्याचे सुतोवाच सांस्कृतिक व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले आहे.
इतिहासाचे शास्त्र ज्यांना समजत नाही अशा उजव्या
लोकांना या बदलांचे अप्रूप वाटेल खरे, पण कोणाचाही इतिहास, मग तो प्रांत-देश असो
कि व्यक्ती, तुकड्यामध्ये वाटता येत नाही. नकळतपणे तो इतिहास हा समग्र समाजाचा
बनून जात असतो व त्या त्या समाजातील एकाच वेळेस सहअस्तित्वात
असणा-या इतिहासांचे प्रतिनिधित्व करत असतो. इतिहासाचे तत्वज्ञानही असते. आम्ही
जेंव्हा इतिहासाचा प्रवाह सैद्धांतिक चौकटीत अथवा आमच्या तर्कनिष्ठ चाकोरीत बसवू
पाहतो तेंव्हा इतिहास आम्हाला हसू लागतो. आमचे इतिहासाचे सामान्यीकरण विनाशक ठरू
लागते. इतिहास आमच्या नियमांनी कधीच चालत नाही.
पण आम्ही जेंव्हा इतिहासाबाबत
स्वनिर्मित नियम बनवतो ते मानवी दोषांनी लिप्त असतात म्हणून आम्ही सांगत असलेला
इतिहास हा इतिहास नसून इतिहासाबाबतच्या राजकीय भावनांनी प्रेरित सुसज्जित कल्पना
असतात. त्याकडे साशंकतेने पहायलाच हवे. आणि शोधायला गेले तर सर्वच
देशांचा इतिहास आरंभापासून आजपर्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पदच होता असे मानण्याची
स्थिती नाही.
पण यापारही जो सत्य इतिहास असतो
तोही आम्हाला पसंत पडतोच असे नाही. आजवर दिसणारे वास्तव पचवायची शक्ती वाढवायला
हवी कारण ते वास्तवही वास्तव असेलच असे नाही. कारण शेवटी इतिहास ख-या अर्थाने
आपल्या हाती लागत नाही. आपल्या हाती लागतात ते केवळ समज जे कधीही बदलू शकतात. हीच
बाब सातत्याने विकसित होत असणा-या विज्ञानालाही लागू पडते आणि काहीच अंतिम नाही
किंवा आता पर्यंत हाती आले ते संपूर्ण सत्यही नाही हे विद्यार्थ्याना समजावून
सांगत त्याला पुढील संशोधनाच्या दिशा देणे हे शिक्षणाचे कार्य आहे.
पण तसे होत नाही. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांवर “आपल्या सोयीचे” इतिहास लादले जातात. विज्ञानाच्या नावाखाली वैदिक
विमान, कॉस्मेटिक सर्जरी असले अवैज्ञानिक विषय किंवा विशिष्ट धर्माचा द्वेष वाटतो
म्हणून त्यांचा इतिहास वगळणे यातून एकंदरीत शिक्षणाची तर हत्या होतेच पण भावी
पिढीही मानसिक दृष्ट्या अर्धवट, पंगु आणि म्हणूनच राष्ट्राच्या विकासासाठी नालायक
अशी जन्माला येते. यातूनच एकांगी वैचारिक अतिरेकी जन्माला यायचा धोका निर्माण
होतो. मध्ययुगात नेमके असेच घडायचे. राजसत्ता व धर्मसत्ता शिक्षणावर अंकुश ठेवून
असायच्या. आपली शक्ती वाढावी यासाठी प्रसंगी प्राणार्पण करणारे राजनिष्ठ सैनिक व
धर्मनिष्ठ नागरिक हवेत म्हणून “युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल” किंवा “हे
धर्मयुद्ध आहे, त्यात भाग घेणे हे तुझे कर्तव्य आहे.” हे जिहादी तत्वज्ञान ते अगदी
गीतेचेही सार ठसवले जायचे. किंबहुना तेंव्हाच्या शिक्षणाचा तो गाभाच होता. बाकीचे
शिक्षण या तत्वाला पूरक असेच असायचे. फ्रेंच प्रबोधनाने अनिर्बंध राजसत्ता आणि
धर्मसत्तेला आव्हान दिले आणि कलेपासून विद्न्यानापर्यंत असलेला त्यांचा अंकुश
झिडकारून लावला तेंव्हा कोठे ख-या विज्ञाननिष्ठ पिढ्या निर्माण व्हायला सुरुवात
झाली. आज आपण त्या आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखतो आहोत. रोजगार मिळवतो आहोत. पण
आपले शिक्षण मात्र क्रमश: आपल्याला प्रबोधनपूर्व अंधारयुगात ढकलत नेते आहे याचे
भान दुर्दैवाने आम्हाला अद्याप आलेले नाही. विज्ञानातील नवे शोध लावावेत,
इतिहासाकडे पहायाची दृष्टी व्यापक करत नेत त्यातही निकोप संशोधन करावे असे
विद्यार्थी घडवण्याकडे आमचा कल नाही.
अंधारयुगाकडे होत जाणारी ही वाटचाल कशी थांबेल हे पाहणे
आमचे कर्तव्य आहे.
-संजय सोनवणी
Friday, December 27, 2019
शैक्षणिक मानसशास्त्र (२)
एखाद्या मुलाला का शिकावे वाटते आणि एखाद्याला का शिकावे वाटत नाही? एखाद्या विद्यार्थ्याला एका विषयात गती असते तर अन्य विषयांत प्रयत्नपुर्वक का खुरडावे लागते? एखादा विद्यार्थी सर्वच विषयांत प्रवीण का होतो? एखाद्या वर्षातील सर्व-विषय प्राविण्यात सातत्य का राहत नाही? विशिष्ट विद्याशाखा निवडण्यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा कार्यरत असतात? आवड, सामाजिक लाट की कौटुंबिक दबाव? प्रतिभासंपन्न (म्हणजे आपल्या ज्ञानविषयात अधिकची भर घालण्याची क्षमता असणारे) नेहमीच अल्प का असतात? यात काही उपजत अथवा श्रद्धाळू समजतात तशा दैवी प्रेरणा कार्यरत असतात काय?
या सर्व प्रश्नांचा एकत्रीत विचार केला तर असे लक्षात येईल की विद्यार्थ्याचे व्यक्तिगत मानसशास्त्र आणि सामाजिक मानसशास्त्र यांच्या परस्पर प्रभावांतून वरील बाबी जन्माला येतात. मुळात कशासाठी शिकायचे आणि काय शिकायचे याची आपंण अत्यंत ढोबळ मांडणी केलेली असल्याने आपले अभ्यासक्रमही ढोबळ असतात. त्यात बाल, किशोर आणि युवा मानसशास्त्राचा विचार केला गेलेला असतोच असे नाही. एका अर्थाने सामाजिक मानसशास्त्रातुन अभ्यासक्रम जन्माला येत असल्याने ते ढोबळ असणे स्वाभाविक होऊन जाते. व्यक्तिगत मानसशास्त्र मात्र वेगवेगळे कल दाखवत असते. शिक्षणात आस्था असणे आणि नसणे याचा संबंधही थेट मानसशास्त्राशी येऊन पोहोचतो. एखाद्याला शिक्षणात आस्था नाही याचे कारण अनेकदा दिलेल्या अभ्यासक्रमात आकर्षित करेल असे काहीच नाही असे असण्यात असू शकते. अभासक्रमात/शालेय वातावरणात रस नाही म्हणजे त्याला काहीच शिकण्याची आवड नाही असे असू शकत नाही कारण मुळात शिकणे हीच एक उपजत व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व्यवहारातुनही शिक्षण मिळतच असते. शाळा-महाविद्यालये शिस्तबद्ध शिक्षण देतात एवढेच पण त्यातही शास्त्रशुद्धपणा व मानसशास्त्राचा विचार केला जात नसल्याने शिस्तबद्ध शिक्षण हे मुलांन खुले आकाश देत ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याची संधी देण्यापेक्षा त्याला विचारबंदिस्त करते असे आपल्या लक्षात येइल.
नैसर्गिक कल असलेल्या विषयात विद्यार्थी चमक दाखवू शकतो पण अन्य विषयही सक्तीचे असल्याने तो त्यात रखडती वाटचाल करतो. एखादा विद्यार्थी सर्व विषयात विशिष्ट काळापर्यंत प्रवीण आहे असे दिसत असले व त्याला हुशारांच्या यादीत टाकले जात असले तरी ते सातत्य टिकून राहतेच असे नाही. शिक्षण प्रेरणा बदलत गेल्या तर असे होतांना आपल्याला अनेकदा दिसते पण समजत नाही. विद्यशाखा निवडत असतांना अनेकदा त्या क्षेत्रातील आपल्या कलापेक्षा किंवा आवडीपेक्षा त्या क्षेत्रात उपलब्ध असणा-या संधी महत्वाचा प्रभाव टाकतात आणि त्या विद्यार्थ्याची अवस्था प्रवाहपतीतासारखी होत जाते. यात सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीगत मानसशास्त्रावर मात करते. पंण यातुनच विद्यार्थ्याची मानसिकता अस्थिर होत जाते हे आपण लक्षात घ्यायला हवे.
ज्ञानप्रेरणा उपजत किंवा दैवी असतात व त्यामुळेच प्रतिभावंत घडतात असा एक सार्वत्रिक समज आहे. प्रतिभावंतांची संख्या कमी दिसत असल्याने हा समज बळावला असणे स्वाभाविक आहे. पण आपण त्यावर पुढील भागात चर्चा करुयात.
(क्रमश:)
Sunday, December 8, 2019
शैक्षणिक मानसशास्त्र (1)
मुलाचे शिक्षण जन्माला आल्यापासून सुरु होते. भारतीय "गर्भसंस्कार"वाले ते मातेच्या उदरातच सुरु होते असे मानतात. खरे तर बालकाच्या जनुकांतच त्याच्या पितृ-मातृ परंपरेचे अंश विद्यमान असल्यामुळे "गर्भातही मुलावर संस्कार" करता येतात ही बाब अवैज्ञानिक झाली. गर्भाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातेलाच आहार-विहारादि काळजी घ्यायला लावणे हा वेगळा व्यावहारिक पण महत्वाचा भाग झाला. पण गर्भात असतांना गर्भावर कसल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाहीत.
पण चक्रव्यूह कसा भेदायचा हे ज्ञान अभिमन्युला गर्भातच बहेरचे बोलणे ऐकून झाले हे मानणे जेवढे अवैज्ञानिक तेवढेच गर्भसंस्कारात्मक संज्ञाही अवैज्ञानिक.
शैक्षणिक मानसशास्त्र हे नंतर येते, सर्वप्रथम येते ते जन्माला आल्यानंतर व्यावहारिक जगात प्रवेश केल्यानंतर विकसित होऊ लागलेले अपत्याचे मानसशास्त्र. किंबहुना काय शिकायचे आणि काय नाही, काय स्विकारायचे आणि काय त्यागायचे हे सारे त्याचे मानसशास्त्र जन्माला आल्यापासून ठरवू लागते. जसजशी त्याची वाढ होऊ लागते तसतसे भवतालाचे प्रभाव, संस्कार आणि दाखवली जाणारी स्वप्ने, कशाचा विरोध/तिरस्कार करायचा याबाबत होणारे परस्परविरोधी असले तरी उपदेशांचे मारे, येणारे अनुभव याच्या एकुणातील परिपाकातून शाळेत जायच्या आधीच मुला-मुलीचे विशिष्ट मानसशास्त्र तयार केले जात असते. या घडणीत शास्त्रशुद्धपणा असण्याचे कारण नाही.
याच वयात खरे तर आई-बाप आपली अपुरी स्वप्ने अपत्यावर लादण्याच्या प्रयत्नांत असतात. मुलगा व मुलगीने कसे वागावे याचेही भेदात्मक भाव याच वयात निर्माण केले जातात. याच वयात वर्चस्वतावादी अथव न्यूनगंडात्मक भावनांचा उदय निर्माण करायला हातभार लावला जातो. कोणात खेळायचे, कोणात नाही याच्याही सीमारेषा याच वयात निश्चित केल्या जातात.
याचाच अर्थ असा की शिक्षण सुरु व्हायच्या खूप आधीच शिक्षण सुरु झालेले असते. आई-बाप, नातेवाईक आणि वय काहीसे वाढते तेंव्हा भवतालचा समाज हे शिक्षण देत असतो. मुलाची मानसिकता जन्मल्या दिवसापासून घडवली जाते ती अशी.
शाळेत गेल्यानंतर या संस्कारात्मक मानसिकतेचा प्रभाव मुलांवर एवढा निर्माण झालेला असत कि त्यातून बाहेर पडणे अनेकांना नंतर अवघड जाते. अपत्यांचे आरोग्यदायी संगोपन हा विषय आजकाल महत्वाचा बनला असला तरी मुळात मुलाचे मानसशास्त्रीय संगोपन हा विषय जागतीक पातळीवरही आजही दुर्लक्षित राहिलेला आहे.
याची फळे भावी नागरिकांना आणि म्हणून समाजाला चाखावी लागतात. खरे तर शिक्षणात हाही एक विषय असलाच पाहिजे. पण ते अजुनही जागतीक समुदायाला सुचलेले नाही. किंबहुना हा विषय मानवी भावनात्मक-काव्यात्मक विषय बनवला जातो. आई-बाप हेच पहिले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिक्षक असले तरी त्यांनाच मुळात प्रशिक्षण नसल्याने ते अगदी वाईट शिक्षक बनून जातात. अपवाद क्वचितच असतात. जाणीवांचा सकारात्मक विस्तार कसा करावा हे आई-बापाला क्वचितच माहित असते. अनेक पुर्वग्रह, मग ते अंधश्रद्धात्मक असोत, लैंगिक जाणीवांबद्दल असोत कि सामाजिक भेदात्मक असोत, या पुर्वशालेय वयातच घट्ट बनवायचे प्रयत्न या विस्कळीत शिक्षणातून झालेले असतात आणि त्याचे अपरिहार्य बळी ठरते ते बालक.
पुर्वशालेय काळातच मुलांचे मानसशास्त्र पक्के व्हायला सुरुवात होते. यासाठी खरे तर शिक्षणातच हा विषय अंतर्भुत व्हायला हवा. पुर्वशालेय शिक्षण आणि मानसशास्त्र याचे अनेक पैलू आहेत. आपण त्यांचा विचार करत राहू.
Tuesday, December 3, 2019
सामाजिक न्यूनगंड आणि शिक्षण
मनोवैज्ञानिक कारणांमुळे काही मुलांमध्ये जे अनेक मानसिक आजार उद्भवू शकतात त्यात न्य़ुनगंडही असतो. मानसोपचारांनी त्यावर मातही करता येऊ शकते. पण सामाजिक न्य़ुनगंडावर आपल्याला अद्याप प्रभावी उपाययोजना सापडलेली नाही. हा न्य़ुनगंड सार्वत्रिक रोगासारखा पसरलेला असून भारतातील जवळपास ८०% समाज या रोगाने ग्रस्त आहेत. शाळेत येणारे विद्यार्थीही साहजिकपणेच या रोगाचे शिकार होतात. आत्मविश्वासाचा अभाव, आकलनातील गोंधळ, कमजोर अभिव्यक्ती, दबलेपणाची-दुर्लक्षितपणाची भावना इत्यादी त्याचे दृष्य़ परिणाम असतात. यातून जेही काही शिक्षण घेतले जाते अथवा असेच विद्यार्थी जेंव्हा स्वत:च शिक्षक-प्राध्यापकाच्या वा अन्य राजकीय वा प्रशासनीय भूमिकेत जातात तेंव्हा हीच न्युनगंडात्मक भावना त्यांचा पाठलाग करत राहते. त्यात सर्जनात्मकता, विकासात्मकता व परिपूर्ण अभिव्यक्ती राहत नाही. यातुनच संपुर्ण समाजाची म्हणून एकुणातल्या अभिव्यक्तीचा दर्जा कोसळलेला असतो. पण आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या तत्वज्ञानात हा विचार केल्याचेही दिसून येणार नाही, तेंव्हा उपाययोजना करणे तर दूरच!
हा सामाजिक न्यूनगंड निर्माण करणारी आपल्याकडे अनेक साधने आहेत. ही साधने कधी नकळत तर कधी अत्यंत पद्धतशीरपणे वापरली जात असतात. भाषा, जात, धर्म आणि वर्चस्वतावादी प्रवृत्ती यामागील काही कारणे झाली. भाषेने निर्माण केलेला न्युनगंड आपण आधी चर्चेला घेऊ. खेड्यातील किंवा खालच्या जातीतील मानल्या गेलेल्या बव्हंशी वर्गावर हा न्युनगंड बव्हंशी प्रभाव टाकतांना आपल्याला दिसते. "ण ला ण म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला..." अशा उपहासात्मक वर्चस्वतावादी विधानांमुळे नकळत या न्युनगंडाच्या संवर्धनात कशी भर टाकली जाते हे आपण अगदी वर्तमानातही पाहू शकतो. बोलीभाषा विरुद्ध प्रमाणभाषा या कृत्रीम संघर्षात बालवयापासून मुलांना गोवले जाते व भाषिक न्युनगंड निर्माण व्हायला सुरुवात होते. पण शिक्षणशआस्त्रानुसार विद्यार्थ्याचे आकलन आणि त्याची नैसर्गिक अभिव्यक्ती प्रमाण मानायला हवी असता तसे होत नाही.
उदा. खानदेशातील एका शाळेत नवशिक्षक पाठ घेत असतांना पृथ्वी स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत समजावून सांगतांना "पिरथी ठायके न ठायके फिरस" असे त्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत म्हणाला. पर्यवेक्षकाने त्याला झाड झाड झाडले. खरे तर तो जे म्हणाला ते विद्यार्थ्यांना अधिक सहजतेने समजलेले होते. ती त्यांची भाषा होती. पण प्रमाणभाषेच्या न्युनगंडात्मक अभिनिवेशात गेलेल्या पर्यवेक्षकाला ते समजणे शक्य नव्हते कारण शिक्षणशास्त्राने त्याला हे शिकवलेले नव्हते. यामुळेच ग्रामीण विद्यार्थी शिकतात व अधिक शिकायला महानगरांत येतात तेंव्हाच त्यांच्यावर आपली भाषा अशी, कोण काय म्हणेल, त्यांच्याशी कसे बोलायचे अशा निरुपयोगी विवंचनांत गढलेला असतो. क्लासरुममध्ये प्रश्न विचारायला अथव उत्तरे द्यायलाही संकोच केला जातो. नवी कल्पना सुचली तरी ती व्यक्त करायची भिती वाटू लागते. सर्जकता बळी जायला अशी सुरुवात होते. त्यांचा भाषिक आत्मविश्वासच गमावला जातो...मग अभिव्यक्तीचाही बळी जाणार हे ओघाने आले.
जात, आर्थिक स्थिती हे न्युनगंडौत्पत्तीचे अवाढव्य कारखाने आहेत. "आपण हलके आहोत, आपल्याला काय कळते" आणि आपली आर्थिक स्थिती अशी, आपण कशी काय स्पर्धा करणार?" या न्युनगंडात्मक भावना जाती आणि आर्थिक स्थिती उत्पन्न करतात. आर्थिक स्थिती ही आपल्याकडे बव्हंशी जातीसंस्थेशी निगडित असल्याने दोहो बाबींचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यवस्था तर अधिकच कठोर बनत जाते आणि न्युनगंडातून सुटका होत नाही हे वेगळेच. म्हणजे, विद्यार्थी आपल्या गाववाल्यांचे, जातीचे आणि आर्थिक स्थितीचे गट बनवू लागतात. ही गटबाजी प्रचलित व्यवस्थेवर मात करण्यास सर्वस्वी असमर्थ असते. ते केवळ भावनीक संरक्षणात्मक कवच असते. मानसिक, बौद्धिक प्रगतीत ते सहाय्यभूत ठरत नाही. ही या वयात लागलेली सवय पुढेही सुरु राहते. आपण प्रशासकीय कर्मचारी ते अधिकारी यांचा विचार केला तरी आपापली स्वजातीय टोळी व दबावात्मक फळी निर्माण केल्या जात असल्याचे आपल्याला दुसीन येईल. अगदी विद्यापीठीय पातळीवर या जातीय फळ्या कशा बनतात हे त्या क्षेत्रातील लोकच सांगू शकतील. पण अशा फळ्या बनतात त्यांच्याच जे लोक त्या स्तरापर्यंत बहुसंख्येने पोहोचलेले असतात. अत्यल्प किंवा शून्य स्थान असलेले आपल्याच न्युनगंडाच्या कोशात अडकून राहतात. झुंड ज्यांची बनते ते न्युनगंडातील वर्चस्वतावाद या तत्वावर काम करत राहतात. पण यातून ज्ञान किंवा उत्कृष्ठ प्रशासकीय/औद्योगिक/व्यावसायिक कामगि-या पुढे येण्याऐवजी पुन्हा नवे जातीय संघ निर्माण होत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न राहतात. आपल्या व्यवस्थेचे अपयश यातच आहे.
आणि ही सुरुवात आपल्या शिक्षणव्यवस्थेपासून बळावायला लागते. आधीच समाजव्यवस्थेतील मान्य-राबवल्या जाणा-या, प्रचारित केल्या जाणा-या सामाजिक तत्वज्ञान, विधी-निषेध, पायरीची जाणीव याची सुरुवात मुलाला कळायला लागते तेंव्हापासुनच सुरु झालेली असते. शिक्षण हे या जाणीवांवरील उतारा असायला हवा. पण प्रत्यक्षात तसे चित्र नाही. बौद्धिक व आर्थिक बरोबरी करायला जेही तरुण सज्ज होतात त्यांना तुमचे हे काम नाही हे बजावणारे घटक आयतेच तयार असतात. उदा. जेंव्हा माझी शून्य महाभारत ही तत्वज्ञानात्मक कादंबरी प्रकाशित झाली होती तेंव्हा एक ज्ञान-साहित्याचा ठेका आपल्याकडे आहे असे समजणा-या वर्गातील एक व्यक्ती मला भेटायला आली होती. "...आता तुमच्यातही असे लेखन करणारे येऊ लागलेत..." असे ती व्यक्ती मला म्हणाली. म्हणजेच आमच्यात (श्रेष्ठांत) आणि तुमच्यांत (म्हणजे कनिष्ठांत) फरक आहे आणि बरोबरी केली जात आहे याची ही केवळ खंत नव्हती तर काहीही झाले तरी तुम्ही न्य़ुनच आहात हे नकळतपणे का होईना बजावणे त्या व्यक्तीला महत्वाचे वाटले. मला खात्री आहे की असा असंख्यांचा अनुभव असेल. या अशा सवयीमुळे अनेक विषय, वैज्ञानिक, व्यावसायिक कल्पना जरी एखाद्याला सुचल्या तरी त्या प्रसवल्याच जात नाहीत. गर्भातच हत्या होते.
अभिजन-बहुजन ही मांडणीच मुळात मोठ्या वर्गात न्य़ुनगंड निर्माण करणारी आहे हे दुर्दैवाने आपल्या विचारवंतांच्या लक्षात आलेले नाही. कारण त्यांचे शिक्षणच झालेले नाही. शिक्षणाने हीच मांडणी शास्त्रशुद्ध करायला हवी होती पण तसेही झालेले नाही. राज्यघटना जर समतेच्या मूल्याचा उद्घोष करते तर मुळात ही विषमतामुलक सामाजिक मांडणी करणे घटनेशी द्रोह आहे हे घटनेचा रोज उद्घोष करत असलेल्यांनाही समजत नाही कारण ज्या शिक्षणव्यवस्थेतून ते आलेत ती व्यवस्थाच अवैज्ञानिक आणि असामाजिक आहे. अशा व्यवस्थेतून न्युनगंडाने ओथंबलेले भविष्यातील नागरिक-नेते पैदा होणार हे उघड आहे.
कोणत्त्याही समाजाच्या प्रगतीतील मुख्य अडसर असतो तो म्हणजे कोणताही गंड. जो समाज वर्चस्वतावाद आणि न्युनगंड या दोहो गंडांपासून मूक्त असतो तोच समाज प्रागतिक होऊ शकतो. कला-कौशल्य, विज्ञान ते सर्व क्षेत्रांत पुढे सरसावू शकतो. पण हे गंड काढण्याचे काम प्राथमिक शालेय काळापासून निरंतरपणे झाले पाहिजे. खरे तर यावर धडे असले पाहिजेत. प्रतेक जातीच्या संतांचे अथवा महापुरुषांचे धडे अभ्यासक्रमात टाकल्यामुळे जातीय गंड दूर होणार नाहीत याचे भान आमच्या शिक्षणव्यवस्थेला यायला पाहिजे.
Friday, November 29, 2019
शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन
शिक्षण हे प्रगल्भ, विवेकी, कल्पक, उद्यमी आणि भविष्यवेधी नागरिक घडवण्यासाठी असते. मानवाच्या जीवनातील शारिरिक कष्ट कमी करुन त्याचे जीवन अधिकाधिक सुखकर कसे बनेल यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणारे व त्यातून संपत्तीनिर्मिती व अर्थार्जन करणारे नागरिक निर्माण व्हावेत हा शिक्षणाचा व्यावहारिक उद्देश्य झाला. तो महत्वाचा आहेच. प्रत्येक व्यक्ती ही अंतत: भांडवलदारच असते. श्रम, बौद्धिक क्षमता, कल्पकता, ज्ञाननिर्मितीच्या क्षमता हे त्याचे प्राधान्यक्रमाचे भांडवल असते. या अमूर्त भांडवलाला प्रत्यक्ष म्हणजेच मुर्त भांडवलाची आवश्यकता असते हे काही प्रमाणातच खरे असते. मुर्त भांडवलाच्या अभावात अथवा कमतरतेतही ते निर्माण करता येऊ शकते. पण अमूर्त भांडवलाच्या अभावात मूर्त भांडवल उभे राहत नाही. भांडवल त्यालाच म्हणायचे जे अधिकाधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी पायाभूत ठरते. हे व्यावहारिक उद्देश्य झाले. पण त्याहीपलीकडॆ ज्यामुळे मानवी ज्ञानाच्या, विचारांच्या आणि जाणीवांच्या कक्षा रुंदावतील अशी निर्मिती करण्याची योग्यता असलेले नागरिकही निर्माण करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू झाला.
साधनस्त्रोत वा आर्थिक भांडवल व त्याची निर्मिती हे दुय्यम असते हे प्रथम आपण लक्षात घ्यायला हवे. प्रगल्भ नागरिकांच्या अभावात आर्थिक भांडवल अथवा साधनसंपत्ती कितीही असली तरी संपत्तीची निर्मिती होणार नाही. संपत्ती येथे पुन्हा मूर्त आणि अमूर्त या आधारावर मोजली पाहिजे. ते मोजण्याचे मापदंड अथवा त्याचे (व्यवहारात निरुपयोगी असले तरी) एक चलन असले पाहिजे. त्याखेरीज आपण कोठे आहोत याचे भान येणार नाही हे निश्चयाने समजावून घ्यावे लागणार आहे.
आज जग पुढे आहे अथवा विकसीत आहे असे आपण मानतो ते आपल्या व्यावहारिक ज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे. पण या व्यावहारिक ज्ञानाचा जरी विचार केला तर त्यामागे मुलभूत ज्ञानाने/विज्ञानाने पुरवलेल्या भरभक्कम पायाचा आधार आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. शिवाय त्या मुलभूत ज्ञानाला उपयोजित ज्ञानात बदलवणा-या आणि मानवी जीवन सुखकर करणा-या असंख्य व्यक्तींनी योगदान दिले आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. व्यापारी/उद्यमी/सेवक वर्गाने ते सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान उपयुक्त स्वरुपात पोहोचवले त्याचेही योगदान विसरता येणार नाही.
या सर्वांनी मिळून आजची व्यवस्था बनवली आहे. राज्यव्यवस्था त्यात कधी प्रोत्साहनात्मक तर कधी अवरोधात्मक भूमिका बजावते. किंबहुना भांडवल निर्मिती होणार की नाही हे शासकीय धोरण ठरवते. शासन कोणती विचारधारा पाळते यावर ते अवलंबून असते. म्हणजे शासनही कधी भांडवलदार बनून जाते तर कधी भांडवल निर्मितीला खिळ घालते.
पण प्रत्येक व्यक्ती भांडवलदार आहे आणि त्याची निर्मिती हे त्याच्या भांडवलाची उपज आहे हा विचार आम्हाला सुचलेला नाही. शिक्षण हे व्यक्तीच्या भांडवलात भर घालणारे असले पाहिजे हे आम्ही समजावून घेतलेले नाही. मूर्त भांडवल हेच श्रेष्ठ भांडवल आहे हे आम्ही ओळखलेले नाही. भांडवलाची अधिकाधिक निर्मिती प्रत्येक भांडवलदार म्हणजे प्रत्येक व्यक्ती करू शकते याची जाणीव नसल्याने आमची शिक्षणाची रचना फसलेली आहे.
मानवाच्या मनाच्या जाणीवा, विचार, ज्ञानाच्या कक्षा आणि दिशा रुंदावणारे नवे ज्ञान निर्माण करणारे, मूळ भांडवलाचे श्रोत निर्माण करणारे, व्यवहारात त्यांच्या निर्मितीला तसे दुय्यम स्थान असणारे दिशादर्ही, नवदिशानिर्माते समाजाला आवश्यक असतात. आज आम्ही ही निर्मिती समाजावरच ऐच्छिकपणे सोडून दिली आहे. भारतात तत्वज्ञान हा विषय सर्व महाविद्यालयांत शिकवला जातो. पण आम्ही किती नवतत्वज्ञान सांगणारे अथवा जुन्याच तत्वज्ञानाचा नवीन दिशादर्शी विकास करणारे तत्वज्ञ निर्माण केले हे पाहिले तर निराशाच पदरी येईल. तीच बाब शास्त्राची. तीच साहित्याची आणि कलांची. उलट अनेक जुन्या कला मरत चालल्या आहेत. नवीन निर्माण करने दुरच!
मानवी मन सृजनात्मक होण्याची प्रक्रिया जेथे अडखळू लागते, थांबते तेथे समाजाचा मृत्यू जवळ आलेला असतो. समाज झोंबीप्रमाणे उथळ भावनोद्रेकांत व्यस्त होऊ लागतो. येथेच मुर्त - अमूर्त भांडवलाची निर्मिती खुंटते आणि तो समाज वेगाने दिवाळखोरीकडॆ वाटचाल करू लागतो.
प्रत्येक व्यक्तीत एक विशिष्ट भांडवल दडलेले असते. ते बाहेर काढणे व त्यालाच विकसनशील बनवत त्यातील उच्च दशा गाठायला सहाय्य करणे हा शिक्षणचा मुलभूत उद्देश हवा. ज्या देशात अशा भांडवलदारांची अधिकाधिक निर्मिती होते तोच देश अथवा समाज ऐहिक आणि मानसिक भांडवलाने ख-या अर्थाने समृद्ध आणि प्रगत होऊ शकतो. आज जगात असा एकही देश नाही. काही बरे तर काही वाईट म्हणता येईल. पण आपण बौद्धिक भांडवलाचे चलनच बनवले नसल्याने ही भावनाही केवळ भावनात्म आहे असे म्हणता येईल. याची अनेक उदाहरणे देता येतील.
श्रम हे भांडवल आहेच पण त्या भांडवलाचीही बौद्धिक भांडवलासारखीच दशा आहे. त्याचे मूल्य काय आणि ते कसे ठरवायचे याचे उत्तर उपयोगितेनुसार दिले जाते. किंबहुना उपयोगितेचा सिद्धांत पुन्हा एकदा तपासून पाहिला पाहिजे. त्याच वेळीस श्रमिकाला त्याच्या भांडवलाचे उन्नयन करण्यात कोणत्या सामाजिक/राजकीय/शैक्षणिक अडचणी आहेत यावर विचार झाला पाहिजे. उदाहणार्थ शेती-कामगारही श्रम-ज्ञान भांडवल वृद्धींगत करू शकतो. त्याला शाळेतच जायला पाहिजे याची आवश्यकता नाही. पण तशीही व्यवस्था आमच्या शिक्षणपद्धतीत आहे काय हा एक प्रश्नच आहे. शिक्षणाच्या आणि दृष्टीकोनाच्या अभावात कोणतेही कौशल्य आणि व्यक्तीच्या भांडवलात भर पडणार नाही, याची उत्पाकता आणि उत्पन्न वाढणार नाही. त्याचे उपजत भांडवल, कोणत्याही क्षेत्रातील असले तरी ते अनुत्पादक किंवा तोट्याचे ठरणार हे उघड आहे. म्हणजेच व्यक्तीचे उपजत भांडवल वाढवत नाही, किंबहुना त्याचा संकोच करत शेवटी मारून टाकते ती शिक्षणव्यवस्था कुचकामी आहे हे उघड आहे.
यावर आपण विविधांगांनी चर्चा करणार आहोत. आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
Friday, March 2, 2018
शिक्षणाचे तत्वज्ञान
एकंदरीत मुलांचा कच्चा माल म्हणून राष्ट्र व विविध विचारधारा करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच मुलांच्या नैसर्गिक आवडी-निवडींना त्यात विशेष स्थान नसून त्यांच्या नैसर्गिक गुणांना कोणत्या ना कोणत्या भावी गरजेच्या आपुर्तीसाठी विशिष्ट दिशेला नेण्यासाठी शिक्षण व्यवस्था ते समाजव्यवस्था प्रयत्न करीत असते. यात समाजाचा स्वार्थ निहित असतो हे ओघाने आलेच. शिवाय या समाज-गरजेतुनच रोजगारही निर्माण होणार असल्याने इच्छाधारित शिक्षण नव्हे तर गरजाधारित शिक्षण हे केंद्रीभूत होणे मग अपरिहार्य ठरते. त्यामुळे "भविष्यातील समाजाच्या गरजांची आपूर्ती करण्यासाठी शिक्षण" अशी शिक्षणाची एक व्याख्या नकळतपणे बनून जाते. या गरजापोटींच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांतच एक स्पर्धा लागून जाते आणि ती स्पर्धा नैसर्गिकच राहील याची मात्र खात्री देता येत नाही.
विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण महत्वाचे हे मानण्याचा काळ प्लेटोपासुनच सुरु होतो. पण नीति म्हणजे काय यावर अजवर एवढी चर्चा होऊनही नैतिक प्रश्न व त्यांचे निर्वाह होण्याची सोय अद्याप लागलेली नाही. किंबहुना नीतिनेच मुलांचे मानसीक बळ वाढेल असे मानले जात होते. प्लेटो म्हणत असे की ज्ञान हे उपजत असते आणि अनुभव आणि समजेच्या वाढीबरोबर ते अधिकाधिक प्रकट होऊ लागते. नंतर शैक्षणिक मानसशास्त्रात बरेच काम झाले असले तरी शिक्षण हे वर्तन, समज, समस्यांची उकल करण्यातील प्राविण्य, स्मृती आणि प्रेरणा इत्यादि बाबींभोवतीच घुटमळत राहिल्याचे आपल्या लक्षात येईल. मुलात या सर्वाचा उद्देश एवढाच की अधिकाधिक सुयोग्य नागरिक (समाजाच्या गरजेप्रमाणे) घडवता येतील अशी व्यवस्था निर्माण करणे व शिक्षणपद्धतीत तसा बदल घडवून आणने. कमजोर विद्यार्थ्यांनाही सक्षम कसे बनवता येईल याचाही विचार यात अद्याहृत आहे.
एकंदरीत आपण आजचा शिक्षण विचार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मुलांना स्वत: जगण्यासाठी, समाजाची गरजही भागवण्यासाठी आणि समाजालाही सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षणाची रचना केली जाते. हे योग्य आहे काय याबद्दल मला शंका आहे. कारण यात मुलांचे नैसर्गिक कल व त्यांना हवे असनारे शिक्षण मात्र दुर्लक्षित राहते. शिवाय कोनते शिक्षण भविष्यात समाजाची गरज भागवू शकेल आणि कोणते कालबाह्य होईल याचा आगावू आदमास लावता आलेला असतोच असे नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया गेलेले असते. अभ्यासक्रमातून शिकावे लागणारे अनेक विषय विद्यार्थ्याला खरेच उपयुक्त आहेत की तो किती बौद्धिक ओझे वाहू शकतो याची चाचपणी करण्यासाठी आहेत याचे उत्तर शिकवणा-यांकडेही असतातच असे नाही. किंबहुना नसतातच. उपयुक्ततावाद शिक्षणात अनाठायी आहे हे मान्य केले तरी मुलाला काय हवे आहे याची तपासनी न करता त्याच्यावर अनेक व तेही आम्हाला ते आवश्यक वाटतात म्हणून, विषय लादणे हे ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात हे उघड आहे.
शिक्षणाचा उद्देश माहिती गोळा करने हा आहे की ज्ञान मिळवणे हा आहे याचे उत्तर "ज्ञान" असे दिले जाते. पण भारतातील शिक्षणपद्धतीत मुळात ज्ञान म्हणजे नेमके काय आणि ते कसे मिळवले जाते आणि त्यातून अधिक प्रगल्भ ज्ञानाची निर्मिती करावी लागते हेच शिकवण्याचा पुरेपूर अभाव आहे असे आपल्या लक्षात येईल. शिक्षणाचे मानसशास्त्र जसे आहे त्यापेक्षा शिक्षणाचे तत्वज्ञान महत्वाचे आहे. आमच्याकडे असे काही तत्वज्ञान कधीही अस्तित्वात नव्हते. आताही ते तयार करण्याची गरज आहे याची जानीव आमच्या शिक्षण धुरीणांना आहे असे दिसत नाही. आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांच्या स्मरणशक्तीचीच काय ती चाचणी घेत आहोत, आकलन व अभिव्यक्तीची नाही ही बाब माझ्या मते चिंता करावी अशीच आहे. आकलन समृद्धता वाढेल, आकलित ज्ञान/माहितीचे स्वतंत्र प्रकटीकरण होईल अशी संधी आम्ही नाकारतो. पाश्चात्य शिक्षण पद्धतीही या बाबतीत परिपुर्ण आहेत असा दावा करता येत नाही. पण शिक्षण पद्धतीचा उद्देश मात्र बदलण्याची गरज आहे यावर किमान एकमत व्हायला हरकत नाही.
समाजाच्या भावी गरजांचा विचार समाज नेहमी स्वार्थीपनातून करीत असतो. सरकारे त्याच दृष्टीने आपल्याला हवे तशा विचारांचे नागरिक घडवायचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच आम्ही मुलांचा मेंदू आम्हाला हवा तसा घडवत नेण्याच्या प्रयत्नात असतो. पण त्यातही हवे तेवढे यश लाभत नाही हे आपण पाहतोच. कारण विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. या दोन पद्धतींत सुसंगती नसते आणि त्यामुळे मुले आपापले मार्ग या प्रभावांच्या रेट्यात कोणत्या ना कोणत्या बाजुला झुकत चालत जातात आणि या झुकण्यातही प्रत्येक मुल हे स्वतंत्र व्यक्तित्व असल्यामुळे एकवाक्यता नसते.
पण यातून राहुन जाणारी बाब म्हणजे ज्ञान. कौशल्यांबद्दल आपण कितीही चर्चा केली तरी शिकवली जाणारी कौशल्ये कालसुसंगत असतात असे नाही. त्यामुळे तीही पास होण्याच्या प्रेरणेतून शिकली गेली तरी त्यांचाहे उपयोग लगोलग समाजासाठी (आणि त्याच्या जगण्यासाठीही) होईलच असे नाही. आज आपण शिकतो ते अनुकरनाच्या प्रेरणांतून व शिकले नाही तर काळामागे जाऊ किंवा भविष्यात प्रगती नाही या भितीमुळे. शिकवले जाते ते सरधोपट. ज्ञानप्राप्तीसाठी जी जिज्ञासा लागते त्याची वृद्धी करण्याची आमच्व्ह्याकडे सोय तर नाहीच पण आहे तीही जिज्ञासा कशी मारली जाईल याचीच काटेकोर काळजी व्यवस्था घेते. यातुन ज्ञानप्रेरणा वाढणे शक्य नाही हे उघड आहे. शिवाय यात व्यक्तीस्वातंत्र्यही संकुचित केले जाते. म्हणजेच समाजाच्या (किंवा राष्ट्राच्या) भावी गरजांची पुर्ती करण्यासाठी वाढवले गेलेले मशीन असे स्वरुप मुलांना दिले जाते. ही मानवीयता आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. आपल्याला आधी शिक्षणाचे तत्वज्ञानच बनवावे लागेल व ते मानवी प्रेरणांचे वैभव वाढवणारे असायला हवे.
Thursday, September 28, 2017
वैदिक विमानांवर आरूढ होणारे शिक्षण!
केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून आपले मानव संसाधन खाते हे देशाच्या एकूण बौद्धिक व कौशल्य संपदेत भर घालण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी आपला वैदिक अजेंडा रेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाच्या विद्याभारतीतील शिक्षण पद्धतीतील काही तज्ज्ञ प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी मोदींना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणी यांनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन विज्ञान, सामाजिकशास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली व तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेही. अर्थात, यावर प्रचंड वादळ उठले व हा वैदिक कार्यक्रम थोडा मागे टाकावा लागला. दरम्यान, दस्तुरखुद्द मोदींनीच पुरातन काळात भारतात प्लास्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्राचे तंत्र कसे प्रगत होते हे गणपती व कर्णाचे उदाहरण देऊन मुंबईत एका भाषणात सांगितलेे. जगभर हसू झालेली ही माहिती त्यांना अर्थात दीनानाथ बात्रांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळाली असावी!
स्मृती इराणी यांच्यानंतरचे आताचे मानव संसाधनमंत्री सत्यपाल सिंग यांनी तीच री ओढत नुकतेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना म्हटले की विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण राइट बंधूंनी नव्हे, तर त्यांच्याही आठ वर्षे आधी शिवकर बापूजी तळपदे यांनी केले होते व हा इतिहास आता आयआयटीच्या विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे! रामायणातील पुष्पक विमानाबद्दलही ते भरभरून बोलले. एकंदरीत संघप्रभावाखालील या सरकारच्या एकुणातीलच बौद्धिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या या बाबींकडे आपण अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. पण आपण आधी त्यांच्या दाव्यातील तथ्यही तपासून पाहूयात.
भारतच नव्हे, तर चिनी, बॅबिलोनियन, ग्रीक व इजिप्शियन पुराणकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक विमान सर्वांना माहीतच आहे. आकाशात पक्ष्याप्रमाणे उडता यावे ही माणसाची पुरातन आकांक्षा त्याच्या पुराणकथांतून येते. ती खरोखरीच अस्तित्वात होती हे जगातील कोणताही देश समजत नाही. समरांगन सूत्रधार या भोजाच्या (११ वे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णन करताना लाकडापासून ते पाऱ्याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचलित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो, पण त्यात कसलीही तांत्रिक माहिती येत नाही. तो एक कल्पनाविलास आहे हे उघड आहे. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते ‘वैमानिकशास्त्र’ हे पुस्तक पुरातन नसून १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात ‘बृहदविमानशास्त्र’ हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारित (कसे ते माहीत नाही. कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारित १८९५ मध्ये शिवकर बापू तळपदेंनी ‘मरुत्सखा’ नामक विमान बनवून दादर चौपाटीवर उड्डाणाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. पण या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. खुद्द ‘केसरी’तही असले कोणतेही वृत्त प्रसिद्ध झालेले नव्हते.
१९७४ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (बंगळुरू) डॉ. एच. एस. मुकुंदा व अन्य तीन शास्त्रज्ञांनी या दोन्ही ग्रंथांचे अध्ययन करून आपली निरीक्षणे ‘सायंटिफिक ओपिनियन’च्या अंकात नोंदवली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की विमानोड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही. विमानासाठी जी भौमितिक रचना या पुस्तकांत गृहीत धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेन्शन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत. त्यात सातत्य नाही. विमानाचे प्रचालन व नेव्हिगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही. प्रत्यक्ष उड्डाणासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करून प्रात्यक्षिक घेता येणार नाही. डायमेन्शन्स देताना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाणे वापरली आहेत. त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही आणि दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही. या विषयातील तज्ज्ञ जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता. एका काल्पनिकेपलीकडे त्याला महत्त्व देता येत नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधूंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.
विमानाबद्दल हे वास्तव असताना व प्लास्टिक सर्जरी व जनुकीय शास्त्रांबद्दलची मोदींची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असताना हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकेदायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे. आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो की निखळ सैद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअरमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो, पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली बनवू शकलेले नाही. कारण आमची शिक्षण व्यवस्था, जी आज केवळ बेरोजगार निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनलेली आहे.
मानव संसाधनमंत्र्यांचे काम हे असते की, देशतील एकुणातील बौद्धिक व कौशल्यांनी सक्षम विद्यार्थी घडवता येतील या दिशेने एकुणातील शिक्षण व्यवस्था नेणे व भविष्यातील सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. याऐवजी आमचे मंत्री मात्र जे सिद्धच झालेले नाही अथवा सिद्ध होण्याचीही शक्यता नाही अशा गोष्टी शिक्षणक्रमात आणण्याचे सूतोवाच करतात. भारतात पुरातन काळी ज्ञान होतेच असा दावा असेल तर ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्यायला वेगळी यंत्रणा असायला एक वेळ हरकत नाही. भारतात ज्ञानशून्य लोक राहत होते असेही कोणी म्हणत नाही. पण जे काही ज्ञान होते ते बीजरूपात अथवा संकल्पना स्वरूपात होते, त्याचा जो पुढचा तार्किक विकास व्हायला हवा होता तो न झाल्याने आज ते कुचकामी आहे हे समजत नसेल तर मंत्र्यांच्या बौद्धिक पातळीवर शंका घेणे स्वाभाविक आहे.
आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे हे आव्हान आहे. बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघु ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक/व्यावसायिकही निर्माण करायचे आहेत. आपले समाजविज्ञान आजही थोडे थोडके नव्हे, तर पन्नास-साठ वर्षे मागे रेंगाळते आहे. त्यामुळे आपल्याला अजूनही अनेक सामाजिक प्रश्नांवरची उत्तरे सापडलेली नाहीत. आपल्याला नवप्रेरणांनी भारलेली पिढी घडवायची तर ती आधुनिक शिक्षणातूनच घडू शकते. आजचे शिक्षण पद्धती दोषांनी परिपूर्ण आहेच, पण ती बदलायची म्हणून दीनानाथ बात्राप्रणीत करून चालणार नाही. शिक्षण पद्धतीला आकलनाधारित करत ती जागतिक दर्जाच्या आधुनिक शिक्षणमूल्यांनाही पुढे नेणारी असावी लागेल. हे जमत नसेल तर मानव संसाधनमंत्र्यांनी पुढच्या पिढ्यांना किमान मध्ययुगात न्यायचा प्रयत्न करू नये!
Saturday, April 1, 2017
पुरातन ज्ञानासक्ति कोठे गेली?
Sunday, March 26, 2017
जातजाणीवा आणि आपले शिक्षण
व्रात्य कोण होते?
हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...