Showing posts with label वैदिक धर्म/संस्क्रुती. Show all posts
Showing posts with label वैदिक धर्म/संस्क्रुती. Show all posts

Wednesday, December 25, 2019

मनुस्मृती कोणासाठी?


MANUSMRITI (Hindi Edition) by [SHASTRI, TIKAKAR - DR. RAMCHANDRA VERMA]


मनुस्मृती हा वैदिक धर्मशास्त्रावरील प्रमुख ग्रंथ आहे. स्मृत्यांची संख्या जवळपास शंभरावर असली तरी मनुस्मृतीचे माहात्म्य व प्रामाण्य सर्वात मोठे मानले जाते. वेदांच्या खालोखाल भारतीय हिंदुंचा हा अत्यंत पूज्य आणि प्रमाणभूत ग्रंथ असून तो आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ ठरला आहे. भारताच्या ऐहिक व पारलौकीक जीवनाचे नियमन शतकानुशतके हा ग्रंथच करत आला आहे असेही मानण्याची पद्धत आहे. (भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृ. ७३३). एकीकडे मनुस्मृतीबद्दल एवढा पूज्यभाव असतांना डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी काही ब्राह्मण सहका-यांची मदत घेत मनुस्मृतीचे दहन केले. त्यानंतर प्रतिवर्षी हा मनुस्मृती दहन कार्यक्रम धार्मिक कर्मकांडाप्रमाणे दरवर्षी साजरा होत असतो. मनुस्मृती ही विषमता, अस्पृष्यता आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याने स्त्रीया व शूद्रातिशूद्र यांना हिंदु धर्मात गुलामीचे अन्याय्य जीवन जगावे लागले, म्हणून समता आणायची त्यर मनुस्मृती जाळली पाहिजे, म्हणजेच तिच्यातील विषमतामुलक तत्वांना तिलांजली दिली पाहिजे, यासाठी ते प्रतीकात्मक दहन होते. अर्थात ही प्रतिकात्मकता नंतर अनुयायांच्या दृष्टीतून अदृष्य होत जात नंतर मनुस्मृती जाळण्याला एक कर्मकांडाचे स्वरुप आले.

पण येथे पडनारा प्रश्न म्हणजे एकाच स्मृतीच्या बाबतीत एवढ्या टोकाची मते का असावीत? मनूस्मृती समस्त हिंदुंची पुज्य आचारसंहिता आहे असे मत व्यक्त करतांना नेमका काय आधार घेतला गेला? मनुस्मुतीचे संपुर्ण परिशिलन केले असता दिसणारे वास्तव वेगळेच आहे. किंबहुना संजय क्षीरसागरांचा या स्मृतीची संपुर्ण चिकित्सा करण्याचा हा आज्वरचा पहिलाच प्रयत्न आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खरे म्हणजे आजवर, मनुस्मृतीची प्रशंसा करणारे व तिचे दहन करणारे अशा उभय पक्षांनी मनुस्मृतीचा नीट अभ्यास न केल्याने व ती नेमकी कोणत्या धर्माच्या व्यावहारिक व पारलौकिक तत्वांचे दिग्दर्शन करते हे लक्षात न घेतल्याने हा गोंधळ झाला आहे हे संजय क्षीरसागरांचे प्रस्तूत पुस्तक वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईलच. खरे तर ही काही धर्मशास्त्राच्या अभ्यासकांसाठी भुषणास्पद बाब नव्हे. पण आपल्याकडे कोणत्याही बाबीच्या मुळाशी न जाताच मते देण्याची प्रथा आहे. असे मत देतांना आपण मुळ संहितेशी प्रतारणा करत आहोत याचेही भान त्यांना राहत नाही. खरे म्हणजे चिकित्सेचे हे काम खूप पुर्वीच व्हायला हवे होते, पण धर्माभिमानी आणि धर्मविरोधक यांनी मिळून आपापल्या भ्रमांतच राहने पसंत केल्याने मनुस्मृतीची वास्तव चिकित्सा झाली नाही. मी जानेवारी २०१६ मध्ये दै. पूण्यनगरीच्या रविवार पुरवणीत मनुस्मृतीविषयक दोन लेख लिहिले होते. संतप्त वाचकांचा येणारा पहिला प्रश्न असा असे कि, "बाबासाहेबांनी मग मनुस्मृती उगाचच जाळली का?" खरे म्हणजे हा प्रश्नच औद्धत्याचा आहे. वास्तव समजावून न घेता केलेली कोंणतीही कृती समाजाला योग्य दिशा देत नाही. उलट आजकाल "मनूवाद, मनुवादी" या संज्ञांचा एवढा विस्फोट झाला आहे कि काही राजकीय पक्षही त्यातून सुटलेले नाहीत. मनुवादाचे वास्तव काय आहे हे समजावून घेतले असते तर आजच्या अनेक सामाजिक समस्यांचे उत्तर तेंव्हाच सापदले असते. पण राजकीय म्हणा अथवा तत्काळ प्रसिद्धीलोलुपता म्हणा,
एकतर समजुनही सत्यदर्शन तरी केले गेले नाही अथवा घोषणांत रमत केवळ विरोध करत बसणे अनेकांनी पसंत केले. त्यामुळे मुख्य विषय बाजुला पदल्याचे आपल्या लक्षात येईल.

मनुस्मृतीबाबत बोलतांना ही समस्त हिंदू धर्मियांची आचारसंहिता होती असा समज दोन्ही पक्षांचा असतो. भारतीय संस्कृती कोशातुनही हेच मत अभिव्यक्त होते आणि नेमकी येथेच खरी समस्या सुरू होते. आता वेदांखालोखाल या स्मृतीचे प्रामाण्य आहे असेही विद्वानच म्हणतात. विद्वान नेमके येथेच जाळ्यात अडकायला सुरुवात होते.

वेद चार मानायची एक प्रथा आहे. इसपू दुसरे शतक ते इसचे दुसरे शतक या काळात किंवा याही नंतर मनुस्मृतीचे लेखन झाले असावे असेही मानले जाते. परंतू मनुस्मृती चार नव्हे तर फक्त तीनच वेद प्रमाण मानते. अथर्ववेदाला मनुस्मृतीच्या दृष्टीने काही स्थानच नाही. किंबहुना या चवथ्या वेदाचे स्थानच मनुस्मृतीने नाकारले आहे. म्हणजे अथर्ववेद मुलातील वैदिकांचा नव्हे याचे भान मनुस्मृतीकारांना होते काय? तसे असण्याची अधिक शक्यता आहे कारण मुलात अथर्ववेद हा यज्ञयाग करणा-यांसाठी नाहीच,. त्याची मुले शैवागमांत सापडतात हे एक वास्तव आहे. अथर्ववेदाची लोकप्रियता पाहून ऋग्वेदाचा काही भाग जोडत नंतरच्या काळात वैदिकांनी या वेदाचा "चवथा वेद" म्हणून स्विकार केला हे एक वास्तव आहे.

मनुस्मृती खुद्द त्या तीन वेदांचे प्रामाण्य तरी मानते काय, या प्रश्नाचे उत्तर स्पष्तपणे "नाही" असे आहे. कारण ऋग्वेदातील एक अत्यंत महत्वाचे युद्ध म्हणजे दाशराज्ञ युद्ध. या युद्धाचा महानायक होता तो पैजवन सुदास. या युद्धात सुदास हा वेद व यज्ञांचे विरोधक असलेल्या शत्रु-टोळ्यांशी लढला व जिंकलाही. वशिष्ठ हा त्याचा प्रमुख पुरोहित. आधीचा पुरोहित विश्वामित्राला काढून वशिष्ठाला नेमले म्हणून रागावलेला विश्वामित्र शत्रुपक्षाला जाऊन मिळाला असेही नंतरच्या वैदिक साहित्यात म्हटले गेलेले आहे. असे असतांना या वैदिक धर्माची पताका उंचावणा-या सुदासाची अवनती केवळ ब्राह्मणांचा कोप झाल्याने झाली असे मनुस्मृती सांगते. मुळात कोणत्याही वेदात या कथेला कसलाही आधारच नाही. किंबहुना वेदात वर्णव्यवस्थाही नाही. मग वेदप्रामाण्य या संज्ञेला काय आधार राहतो? एक प्रकारे ही वैदिक इतिहासाशी प्रतारणा आहे. निमी वगैरे राजांच्या अवनतीलाही ब्राह्मण-कोप हेच कारण दिले आहे. ब्रह्मपुराणातील निमीची मुळची कथा पाहता मनुस्मृतीने सोयिस्कर फेरबदल केलेले दिसतात. वेदाभ्यासकांना हे माहित नव्हते कि काय कि त्यांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष केले? या व अशा अनेक बाबी आहेत जेथे मनुने खुद्द वेदांनाही धाब्यावर बसवलेले आहे. ही गरज मनुला कोणत्या काळात वाटली असावी हे पाहणे गरजेचे होते जे झाले नाही. मनुस्मृतीतील विश्वोत्पत्तीची कथाही अशाच भोंगळ कथांचे असंबब्ध कथांचे मिश्रण आहे. मनुस्मृतीत परस्पर विसंगत विधानांची रेलचेल आहे. ते कसे हे पुस्तकात सविस्तर दिलेले आहेच. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे मनुस्मृतीच्व्ह्या हिंदी व मराठी अनुवादकांनी, विशेषत: विष्णूशास्त्री बापटांनी, सध्या उपलब्ध असलेल्या स्मृतीतील श्लोकांत जे शब्दच नाहीत ते पदरचे घालून अब्यासकांची गैरसोय तर केली आहेच मण मनुस्मृतीला सांप्रदायिक रुप आल्याने तिच्याबाबतचे गैरसमजही वाढवायची सोय केली आहे.

मनुस्मृती कोणत्यातरी विशिष्ट धर्माचे नियमन करणारी स्मृती आहे हे तर नक्कीच. या स्मृतीत "वेद हेच धर्माचा मुख्य स्त्रोत असून वेदविरोधी जेही काही आहे ते त्याज्ज्य आहे." असे वारंवार सांगितले आहे. किंबहुना या स्मृतीने धर्माची केलेली व्याख्या "वेद, स्मृती, सज्जनांचा आचार आणि स्वत:च्या आत्म्याचे समाधान या चतुर्विध बाबी साध्य करतो तो धर्म" अशी आहे. (मनू: २:१२). म्हणजेच वेद हा या धर्माचा प्रमुख आधार असल्याने त्याला आपण "वैदिक धर्म" असे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे. म्हणजे वेद मानणा-यांचा धर्म अस्तित्वात होता त्याच वेळीस वेदांशी कसलाही संबंध नसलेल्यांचाही धर्म होताच. नसता तर वेदमान्यतेचे प्रस्थ माजायचे काही कारणच नव्हते. मनुस्मृतीतही वारंवार वेदविरोधी तत्वज्ञाने व आचारसंहिता याबाबत विरोध दाखवला आहेच. म्हणजे वैदिक धर्माच्या समांतर वेद मान्य नसलेला एक (किंवा अनेक) धर्म सहास्तित्वात होता. शिवशक्तीप्रधान धर्म अगदी वेदांचीही निर्मिती झाली नव्हती त्या काळापासून, म्हणजे सिंधू काळापासून, भारतात अस्तित्वात होता हे प्रत्यक्ष पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. असे असतांना संपुर्ण भारतियांचे ऐहिक व पारलौकिक नियमन ही स्मृती कशी करेल? वेद न माननारे अथवा जे धर्म वेदांच्या आधारावर उभेच नव्हते ते धर्म या स्मृतींच्या आज्ञा मुळात का पाळतील? बरे, तसे सामाजिक वास्तव असल्याचेही इतिहासात दिसुन येत नाही. असे असतांना जेंव्हा विद्वान मनुस्मृतीला "आपल्या संस्कृतीचा, आचाराचा आणि व्यवहाराचा आधारस्तंभ" म्हणतात तेंव्हा या विधानाची सत्यता पाहिली पाहिजेच अन्यथा आपल्याला आपल्या संस्कृतीचेच यथास्थित आकलन होणार नाही.

बरे, वैदिक धर्माची निर्मिती नेमकी कधी झाली? कोठे झाली? वैदिक धर्माची सुरुवात होण्याआधी वैदिक धर्म निर्मात्यांचा धर्म कोणता होता अशा प्रश्नांकडेही मनुस्मृतीचे टीकाकार अथवा समर्थक लक्ष देत नाहीत. वैदिक धर्म आक्रमक आर्यांद्वारे भारतात आला असे मत आताआता पर्यंत प्रबळ होते. समजा हे मत ग्राह्य धरले तर आर्यांनी उत्तरेपासून दक्षीणेपर्यंत व पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपुर्ण भारत वैदिक धर्माच्या छत्रछायेत आणला व एतद्देशियांना तत्काळ शूद्र बनवत त्यांना गुलाम बनवले असेही आपल्याला गृहित धरावे लागते. खरे म्हणजे आर्य सिद्धांताचा हेतूही मुळात आक्रमक प्रबळ आर्य व एतद्देशिय दुर्बळ रानटी लोक यांच्यातील संघर्ष दाखवत अंती प्रबळ आर्यांचा विजय दाखवणे हा होता. या रानटी लोकांतील काही लोकांना क्षत्रीय व वैश्य वर्णात घेतले गेले व बाकीच्यांना चवथ्या वर्णात, म्हणजे शूद्रत्वात ढकलत त्यांच्यावर सेवेची जबाबदारी टाकली गेली. अशा रितीने चातुर्वर्ण्य आस्तित्वात आला असे मानले जाते. य शुद्रांच्या शिवादि देवतांना आर्यांनी पावन करुन घेतले हे मत अर्थातच जोडून येते. (वैदिक संस्कृतीचा इतिहास-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी).

आक्रमण सिद्धांत प्रत्यक्ष पुराव्यांअभावी अडचणीचा ठरू लागल्यानंतर पाश्चात्य विद्वानांनी "आर्य स्थलांतर" सिद्धांताला जन्म दिला. हाही गृहित धरला तर मुळात आर्यांनी स्थलांतर का केले याचे उत्तर हा सिद्धांत देत्य नाही. स्थलांतरित आर्यांची संख्या किती हेही विद्वान सांगत नाहीत. स्थलांतरित आर्यांनी एतद्देशिय विशाल भुभागावर धर्म लादायचा तर त्यासाठी वैदिकांची संख्याही तेवढीच अवाढव्य असली पाहिजे. बरे, ते महापराक्रमी होते, म्हणून कमी संख्या असली तरी ते देशभर पसरले, हेही समजा मान्य केले तर तशा एक तरी युद्धाचे वर्णन, किमान सूचन, वैदिक साहित्यात आढळायला हवे. खुद्द मनुस्मृतीतही ते येत नाही. शिवाय देशभर पसरण्यासाठी व तेथे स्थायिक होण्यासाठी त्यांना येथील भुगोलही चांगला माहित पाहिजे. समजा आक्रमक अथवा स्थलांतरितांची संख्या तेवढी नसेल तर धर्मांतराच्या राजमार्गाने आपली संख्या वाढवावी लागेल. मग धर्मांतर करणारे कोण होते? धर्मांतर करण्यापुर्वी त्यांचा धर्म कोणता होता? या धर्मांतरितांना नवीन धर्माचे प्रशिक्षण त्यांनी कसे दिले असेल? समजा वैदिक धर्माचा जन्म येथेच झाला हे गृहित धरले तरीही हेच प्रश्न कायम राहतात कारण कोठेतरी (कुरु-पांचाल परिसरात) या धर्माची निर्मिती झालीच व तो अन्यत्र पसरवण्यासाठी खटाटोप हा करावाच लागला हे तर नक्कीच आहे. (The Quest for the Origins of Vedic Culture- The Indo-Aryan Migration Debate : EDWIN BRYANT, OXFORD UNIVERSITY PRESS 2001) भारतातील बव्हंशी वैदिक हे धर्मांतरित आहेत हे उघड आहे. ते धर्मांतर घडवण्यसाठे कोणते २७ धर्मप्रसारक वेदव्यासांनी नेमले याची कथा विष्णू पुराणातच येते. पण या धर्मांतराचे प्रमाण मोठ्या स्वरुपात नव्हते. जे धर्मांतरित नव्हते त्यांना सरसकट शूद्र असे संबोधले गेले हे प्राकृत साहित्यावरुनही स्पष्ट होते. उदा. जैन माहाराष्ट्री भाषेतील "अंगविज्जा" या इसवी सनाच्या दुस-या शतकातील ग्रंथातही अनेक व्यवसायिक जाती तसेच तत्कालीन कुशाण व शक यांनाही शूद्र्च म्हटले गेलेले आहे. असे असतांनाही शुद्रांबाबत एवढा गोंधळ विद्वानांनी का घातला हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. 

बरे, आक्रमण सिद्धांत गृहित धरला (किंवा अगदी पर्यायी मानला जानारा आर्य स्थलांतर सिद्धांत गृहित धरला तरीही) तर मनुस्मृतीच या सिद्धांतकांच्या पायात खोडा घालते, कारण मनुस्मृतीच्याही पहिल्या पर्वातील भुगोल दक्षीण अफगाणिस्तान आहे तर दुस-या पर्वातील भूगोल कुरु-पांचाल परिसरातील आहे. नंतर महत्वाचा मुख्य टप्पा मगध प्रांतातील वैदिकांचे अस्तित्व व प्राबल्यही दाखवते. शरणार्थी ते मगधात स्थैर्य प्राप्त केलेल्या व स्थैर्यातुनच ज्या सामाजिक समस्या कोणत्याही अल्प समाजात उद्भवतात त्या सोडवण्याच्या प्रयत्नांचे चित्रणाने याने मनुस्मृतीचा अधिकांश भाग व्यापलेला आहे. पुस्तकात यावर सखोल चर्चा असल्याने मी येथे अधिक लिहित नाही. पण मगध, कुरु-पांचाल व काही फुटकळ प्रदेश वगळता उरलेला देश तिला माहितच नाही. विंध्याच्या दक्षीनेला कोण राहतात याबद्दल तर अज्ञानच आहे. मग जे लोक माहित नाहीत त्यांच्यासाठी कोण नियम लिहिल आणि कोण पाळेल हा साधा विचार या विद्वानांना ते धर्म-गौरव-भ्रमात असल्यानेच सुचला नाही हे उघड आहे. इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत या देशात ग्रीक, शक, हुण, कुशाणांसारख्या राजसत्ता प्रस्थापित झालेल्या होत्या. त्यांचे उल्लेख मनुस्मृतीत आहेतच. त्यांच्या धर्माचा उल्लेख मनुस्मृती करत नाही, पण त्यांना शूद्र, म्लेंच्छ अथवा कधी कधी यवन, चीन असे संबोधते, पण त्यांच्या सामाजिक जीवनाचे व श्रद्धांचे कसलेही उल्लेख करत नाही कारण त्यांच्या धर्माच्या नियमनासाठी मुळात स्मृती नाहीच.

 बरे, ही स्मृती समग्र हिंदुंच्या नियमनासाठी लिहिली गेली म्हणावी तर मनुस्मृतीच त्यात मोठा खोडा घालते. म्हणजे बघा, या स्मृतीत यज्ञ व तत्संबंधी कर्मकांड आहे. तीन वर्णांचे वेदोक्त संस्कार अत्यंत काळजीपुर्वक लिहिलेले आहेत. अगदी कोणत्या वर्णाच्या माणसाने काय गुन्हा केला तर काय शिक्षा द्यावी याबाबतही निर्देश दिले आहेत. त्याबाबत तथाकथित शूद्रांना वाटणारा संताप आपण जरा दूर ठेवुयात. प्रत्यक्षात स्मृतीच काय सांगते?

मनूस्मृतीच सांगते कि शुद्रांची राज्ये आहेत. काही शूद्र यज्ञही करवून घेतात व असे शुद्रांसाठी यज्ञ करनारे ब्राह्मण श्राद्धविधीत निषिद्ध आहेत.  देवपुजा करनारेही पुजारीही श्राद्धात निषिद्ध आहेत. मनुस्मृतीच्या सुरुवातीच्याच अध्यायांत हे सारे येत असता या व नंतरच्या अध्यायांत येणारी शूद्रविरोधी वचनेच तेवढी अवमानास्पद मानायची, मग या वचनांचे काय करायचे हाही प्रश्न उभयपक्षांना पडला नाही हेही एक नवलच होय. खरे म्हणजे वैदिक धर्मियांनी नियमन केले आणि न केलेले असे शूद्र नेमके कोण व हिंदू धर्माची वैदिकेतर व्याप्ती न समजल्याचा हा परिपाक आहे. मनुस्मृतीच्या आज्ञा ज्यांसाठी आहेत ते शूद्र कोण याचाही नीट अभ्यास झाला नाही. शूद्र म्हणजे समस्त भारतातील वैदिकेतर गुलाम लोक असाच साधारभ्ण समज सर्वांनी करुन घेतला हे एक दुर्दैवी वास्तव आहे. पण मनुस्मृतीच जे सांगते त्या राजांचे व धनाढ्यांचे काय करायचे? त्यांना मनुस्मृतीचे नियम का लागू नव्हते हा विचार न केल्याचा परिपाक म्हणजे आजचा हिंदू धर्मातील सावळा गोंधळ आहे.

प्रत्यक्षात इतिहासही सांगतो कि शिशूनाग वंशापासून भारतात शूद्र राजांची परंपरा सुरु होते. अगदी पहिला ज्ञात सम्राट चंद्रगुप्त मौर्यही शूद्र होता. सातवाहन, यादवादी असंख्य सत्ताही शुद्रांच्या होत्या. त्यामुळे मनू जर "शूद्रांच्या राज्यात निवास करु नये" अशा आज्ञा देत असेल तर त्यांचा ऐतिहासिक अन्वयार्थही समजावून घ्यायला हवा होता. ऐतिहासिक राजकुळांत एकही क्षत्रीय अथवा राजन्य नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शृंगांना तेवढे वैदिक ब्राह्मण समजायचा प्रघात आहे. त्याआधीच्या ज्ञानत इतिहासात एकही ब्राह्मण अथवा वैदिक राजा असल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे पुराणे म्हणतात म्हणून हैहय, यदू, इक्ष्वाकू आदि घराणी क्षत्रीय होती असे समजायची प्रथा आहे. परंतू प्रत्यक्षात या घराण्यांचे ऐतिहासिकत्वच मुळात अजून नक्की नाही. महाकाव्ये व पुराणे यांना ऐतिहासिक मूल्य काय हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. कारण या सर्वच साहित्यात घालघुसड, कल्पनाविलास व अनैतिहासिक अद्भुत गोष्टींची रेलचेल आहे. तरीही समजा पौराणिक व महाकाव्यांतील कथा ख-या मानायच्या झाल्या तर कृष्ण स्वत: असूर व असुरेतर संकरातून जन्माला आलेला आहे. कृष्णाच्या नातवानेही बाणासुराच्या कन्येशी विवाह करुन संकरच केला आहे. महाभारतातील व्यासापसुन ते सर्व कौरव व पांडव संकरीतच रक्ताचे आहेत. मनुस्मृतीप्रमाणे ते पाहिले तर कोणत्याही वर्णाच्या चौकटीत बसू शकत नाहीत. म्हणजेच ते वैदिक नाहीत. परंतू हे सत्य समोर असतांना त्याबाबत विद्वानांनी मौन पाळावे हे आश्चर्यकारक आहे.

महाराष्ट्राच्या दक्षीणेला म्हणाल तर इसवी सनाच्या तिस-या शतकापर्यंत तिकडे वैदिक धर्म पसरल्याचे वा गेल्याचे एकही सूचन नाही. यासाठी प्राचीन तमिळमधील संगम साहित्य हाच प्रबळ पुरावा आहे. महाराष्ट्रात हा धर्म पहिल्या शतकापर्यंत पोहोचला होता याचा संदर्भ मिळतो, पण महाराष्ट्रात त्याचा प्रचार-प्रसार झाल्याचे पुरावे मिळत नाहीत. मग या काळात वैदिक धर्म जेथे गेलाच नव्हता तेथील लोक काय धर्माशिवाय जगत होते कि काय? तसेही नाही कारण सातवाहन स्वत:ला "आगमान निलया" असे अभिमानाने म्हणवून घेतात. आगम म्हणजे अवैदिक तंत्रशास्त्रे तर निगम म्हणजे वेद.

सातवाहनांच्या काळात वैदिक धर्म येथे प्रवेशला असला तरी त्याचा प्रसार नव्हता याचे दर्शन हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतुनच मिळते. गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकरांना गाथा सप्तशतीत वैदिक देवतांची व यज्ञांचीच काय ती अवहेलना दिसते व शैव आणि भागवत धर्माचे प्राबल्य दिसते. शिवाय गाथ सप्तशतीत ब्राह्मणांचा उल्लेख एकदाही अलेला नसल्याने जोगळेकर असा तर्क काढतात कि त्या काळात ब्राह्मण अत्यल्पसंख्य असले पाहिजेत. (गाथा सप्तशती, प्रस्तावना, स. आ. जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन, पृ. २१८-२२०) याचा अर्थ एवढाच कि मगध सोदून हा धर्म अन्यत्र जायचाच होता. तरीही येथे महाबलाढ्य सम्राट-सामंत-जमीनदार व व्यापारी होतेच व त्यांचा धर्म वैदिक नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.

इसपू सहाव्या शतकापासून ते इसच्या दुस-या शतकापर्यंतची नाणी व शिलालेख यावर शिव, उमा, कार्तिकेय, बुद्ध यांच्या प्रतिमा व नांवे आढळून येतात. अगदी कनिष्काच्या सुदूर अफगाणिस्तानातील राबटक शिलालेखातही उमा व कुमार कार्तिकेयाचे नांव आढळते, एकाही वैदिक देवतेचे नांव आढळत नाही. Mukherjee, B.N., "The Great Kushana Testament", Indian Museum Bulletin, Calcutta, 1995) या कुशाणही स्मृतींनुसार जर शूद्रच तर इतर एतद्देशियांची काय कथा? मग वैदिक काळ होता तरी कोणता आणि कधी? मगध व आसपासचा काही भाग वगळता हा धर्म अन्यत्र नव्हताच असे स्पष्ट पुरावे दिसत असता हे स्मृती "संपुर्ण देशाचे नियमन करणारी" कशी? मनुस्मृती जर हिंदुंचे नियमन करणारे आहे अशी "श्रद्धा" आहे, तर संपुर्ण स्मृतीत एकाही हिंदू देवतेचे नाव नाही. अगदी शिव-पार्वतीचेही नांव येत नाही. त्यांचे पुजाविधान कोठे येत नाही. किंबहुना मुर्तीपुजेचा अप्रत्यक्ष निषेधच केला आहे कारण "देवपुजा-यांना" श्राद्धात प्रवेशच नाही. असे असतांना मनुस्मृतीला हिंदू धरमाचे नियमन करणारी संहिता कसे मानता येईल?

मनुस्मृती हिंदुंच्या या परमदैवतांबाबत पुर्ण मौन बाळगते. वेद व वेदाचाराबाबत मात्र संपुर्ण मनुस्मृती समस्त आस्थेने बोलते. म्हणजे वेदाधारित वैदिक धर्माचे नियमन करण्यासाठी, प्रसंगी वेद-विधानांनाही उल्लंघत नवीन प्रदेशात तगण्यासाठी व पसरण्यासाठी धर्ममाहात्म्य वाढवण्यासाठी कराव्या लागणा-या सर्व क्लुप्त्या या स्मृतीत आहेत. ही स्मृती हिंदुंसाठी नाही कारण एकही हिंदु (आगमिक) देवतेचे नांव ही स्मृती घेत नाही. स्मृती जसे घेत नाही तसेच वेदही एकाही हिंदू देवतेचे नांव घेत नाही. कारण हे दोन्ही धर्म वेगळे आहेत याचे भान स्मृतीकारांना आहे. स्मृतीकारांनाच नव्हे तर दोन्ही समाजांनाही त्याचे भान आहे. भान नाही ते नंतरच्या सुधारणावादी विद्वानांना. त्यांनीच घोळ घातल्याने हिंदू धर्माचे अक्षम्य असे नुकसान झाले आहे. मनुस्मृती हे नेहमीच वैदिक धर्मियांचे अंतर्गत नियमन करण्यासाठी होती. वर्णाश्रम धर्म हा वैदिक धर्माचा पाया. यातील तीनच वर्णांना वेदाध्ययनाचा अधिकार असल्याने साहजिकच तेच वैदिक ठरतात. याच धर्मात शूद्र हा एक वर्ण आहे. हा वर्ण वैदिक नसल्याने "चतुर्वर्ण्य" हा शब्द तारतम्याने घ्यायला हवा होता. मनुस्मृती अनेकदा तो घेते तर कधी कधी तिचीही गाडी घसरते. यांना वेदांचाच काय संपत्ती संचयनाचाही अधिकार नाही. यांच्यासाठी कायदे वेगळे आहेत. म्हणजेच यांचाही धर्म वेगळाच आहे. पण ते वैदिकाश्रयी शूद्र आहेत हे मनुस्मृतीच स्पष्ट करते. हे असे वेदाश्रयी लोक होते तरी किती आणि किती काळ याबाबत स्मृती मौन आहे. पण गुप्त कालोत्तर समाजात वैदिकाश्रयी शुद्रांचेही प्रमाण क्रमश: संपुष्टात येत गेलेले दिसते. पण वैदिकेतर जेही कोणी आहेत त्यांना शूद्र संबोधण्याची वैदिकांची सवय कायम राहिली. पण म्हणून इतरांनी स्वत:ला शूद्र म्हणवले याची अत्यातिअल्प उदाहरने मिळतात. हिंदू आपली ओळख जातीनामानेच देत राहिले व देतात.

शूद्र नामक पश्चिमोत्तर भारतात एक टोळीच होती. अभीरांसमवेत या टोळीचे नांव महाभारतात खुपदा येते तसेच पुराणांतही येते. अलेक्झांडरचे या टोळीशी युद्धही झाल्याचे उल्लेख ग्रीक इतिहासकारांनी करुन ठेवले आहेत. (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtis, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) भारतात आश्रयार्थ व धर्मप्रचारार्थ वैदिकांचा संबंध प्रथम आला तो या टोळीशी. या देशातील वैदिकेतर टोळ्यांना त्यांनी सरसकट शूद्र असेच संबोधले. मनुस्मृतीच्या शुद्रांविषयीच्या आज्ञा या वैदिकांच्या सेवेत असलेल्या शूद्र वर्गासाठी आहेत, देशात राहना-या अन्य समाजांसाठी नाहीत. समजा असत्या तरी अन्य धर्मीय त्या का म्हणून मान्य करतील? केलेल्याही नाहीत अन्यथा शूद्र राजे झाले नसते. वैदिकांना क्षत्रीय व वैश्य प्रकरण नंतरच्या काळात गुंडाळून ठेवावे लागले नसते, कारंण वैदिकांतला हाही वर्ग नंतर वैदिक धर्मातून बाहेर पडला हे नंद राजांच्या उदाहरणावरुनच स्पष्ट होते. परशुरामाची कथाही त्यासाठीच बनवण्यात आली.

मनुस्मृतीही कंबोज, यवन, शक, पारद, चीन या विदेशी समाजांना "पतीत क्षत्रीय" म्हणते (ते तसे नव्हते कारण मुळात त्यांचे धर्म वेगळे होते हे इतिहासानेच नोंदवुन ठेवले आहे.) तसेच औंड्र, दरद, किरात व द्रविड जातींनाही ती "पतीत क्षत्रीय" म्हणते. (मनू:- १०.४४) याच जमातींना ऐतरेय ब्राह्मण "शूद्र" म्हणते. पण मुळात औंड्रजातींच्या प्रदेशात पहिल्या शतकानंतर व द्रविड जातीच्या प्रदेशात तिस-या शतकानंतर जेथे प्रवेश व्हायला सुरुवात झाली तेथे तत्पुर्वीच काय नंतरही पतीत व्हायला का होईना क्षत्रीय असायला हवेत कि नकोत? हा केवळ अतिशयोक्ति व बढाईचा भाग होता एवढेच म्हणता येते. येथे मनुस्मृतीला पतीत क्षत्रीय म्हनजे "वैदिक धर्मीय नसलेले योद्ध्ये" असे म्हणायचे असेल असे दिसते, नाहीतर यवन, शकांसारख्या परकीय जमातींनाही पतीत क्षत्रीय म्हणण्याचे धाडस मनुस्मृती करने शक्य नाही हे उघड आहे. संदिग्धता व वैदिक माहात्म्य याची रेलचेल मनुस्मृतीत असने स्वाभाविक आहे. मुस्लिमही सारे जग ही आदमचीच प्रजा मानते तसेच हे. पण ते ऐतिहासिक वास्तव नव्हे. तसेच वैदिक धर्मियांनी सारे जग म्हणजे त्यांच्या वर्णव्यवस्थेत बांधल्याप्रमाने चालते असा समज असणे शक्य असले तरी ते ऐतिहासिक वास्तव नव्हे.

मी वैदिक धर्म व हिंदू धर्म याचे स्पष्ट वेगळे उल्लेख करतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. खरे तर तसे वाटायचे काहीएक कारण नाही. कारण अगदी एकोणिसाव्या शतकातील विद्वानही वैदिक धर्म वेगळा आहे असे स्पष्टपने नमूद करतात. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक बहुविध हिंदू समाजाला वैदिक धर्मीय धारेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते असे वसुधा दाल्मिया आपल्या "The Nationalism of Hindu Traditions" (१९९७, पृ. ३८३) या ग्रंथात म्हणतात. आर्य समाजाची स्थापना सर्वांनाच वैदिक धर्मात सामावून घ्यावे यासाठीच झाली होती असे नंदिनी गुप्ता म्हणतात. (The Urban Poor and Militant Hinduism in Early Twentieth Century, पृ. ८९५) महाराष्ट्रात लोकमान्य टिळक हे मात्र वैदिक धर्मात अन्यांना स्थान देण्याच्या विरोधात होते. उलट ते चित्पावन ब्राह्मणाचे वर्चस्व अन्यही ब्राह्म्णांवर कसे राहील याच प्रयत्नांत होते. ते लोकहितवादी आणि महात्मा फुलेंना "वैदिक धर्म-संस्कृती विध्वंसक" मानत तर प्रार्थना समाज व न्या. रानडे यांना "वैदिक धर्माचे" उद्धारक मानत. (Foundation of Tilak's Nationalism, प्रमिला व्ही. राव, पृ. १९) थो्डक्यात अनेक ब्राह्मण पुनरुज्जीवनवादी विद्वान वैदिक धर्माचाच आधार घेत होते. याचाच अर्थ असा कि सुधारणावादी असोत कि पुनरुज्जीवनवादी, सर्वच वैदिकवादी विद्वानांचा भर वैदिक धर्मावरच होता तर वैदिक व्यवस्थेलाच विरोध असना-या तत्कालीन बहुजनवादी विद्वानांचा भर वैदिक व्यवस्थेवर प्रहार करण्याचा होता. म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे व बहुजनांचा धर्म वेगळा आहे याची जाण ते जरी ब्रिटिशांकरवी कागदोपत्री "हिंदू" म्हणुनच संबोधले जात असले तरी, बाळगून होते.

डा. सुधाकर देशमूख म्हंणतात कि वैदिक धर्म हा स्वतंत्र असून आगमिक तंत्रमार्गी धर्म सिंधुकाळापासून अस्तित्वात आहे. दोन परंपरा सर्वस्वी पथक असून उलट अथर्ववेदावर तंत्रांची उघड छाप आहे. आजचा हिंदू धर्म ८५% तंत्रप्रभावित आहे. मध्ययुगात (निबंधकाळात) वैदिक धर्मियांनी पुन्हा उचल खात मुलतत्ववादाचा आश्रय घेत तंत्र व नाथसंप्रदायाने जी समतेचे झुळूक आणली होती तोला बाध आली. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा इतिहास : तंत्र, योग, आणि भक्ती-डा. सुधाकर देशमूख.) थोडक्यात वैदिक धर्म व आगमिक अथवा तंत्रोक्त धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वानांना होती व आहे. वैदिक धर्म वेगळा उल्लेखन्यात काही अकल्मित आहे असे नाही. या दोन धर्मात समन्वयाचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण वैदिक धुरिणांनी आपले लक्ष केवळ वैदिक अधिसत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी झाले असेच म्हणवे लागेल. त्यात आर्य सिद्धांताने धार्मिक विभेद हा वांशिक विभेदात बदलला गेला होता हाही इतिहास आहे. टिळकांचे आर्क्टिक होम इन वेदाज" या ग्रंथाने त्यात भरच घातली असे म्हणावे लागते.

जातिप्रथा व मनू

जातीव्यवस्था मनुने निर्माण केलेली नाही. जाती म्हणजे व्यवसाय. व्यवसाय बदलाचे स्वातंत्र्य किमान दहाव्या शतकापर्यंत होते हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवून दिले आहे. विषमता जी निर्माण झाली तिचे मुलकारण नंतर निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेतील विषम बलुते पद्धतीत आहे हेही मी स्पष्ट केले आहे. मनुस्मृतीचा त्याशी काही संबंध नाही. जाती या वर्ण-संकराने निर्माण झाल्या असे मानायची एक पद्धत आहे. पण वैदिक वर्ण संकराने निर्माण झालेल्या जाती कोणत्या हे पाहिले तर "वर्णसंकर भ्रम"ही दूर होतो. खरे तर वर्ण संकराची भिती वैदिकांतच किती होती हे मनुस्मृतीच नव्हे तर भग्वद्गीतेवरुनही स्पष्ट दिसते. आजही काही वैदिक विद्वान वर्णव्यवस्था कशी उत्तम व वर्णसंकर कसा वाईट हे अगदी भाविकतेने सांगत असतात.

मनुनुसार अनुलोम-प्रतिलोम स्वरुपाचे विवाह अथवा शरीरसंबंधातून निर्माण झालेल्या प्रजेला संकरज मानत वेगवेगळ्या संकरापासून आयोगव, धिग्वन, अंत्यज, पारशव, सूत, मागध इत्यादि जाती निर्माण होतात. पण या उल्लेखिलेल्या सर्वच संकरित जाती भारतात आजच काय पण गुप्तकालापासुनही प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. संकरज व्यक्ती असल्या तरे "जाती" बनण्याएवढी त्यांची संख्या असणे शक्य नाही. फार फार तर अशा काही व्यक्तींना त्या त्या संकरज जातीनामाने संबोधले जात असेल.

आणि ज्या जाती आज शूद्र मानल्या जातात त्यातील एकही जात "शूद्र" म्हणून मनुस्मृतीत उल्लेखलेली नाही. उदाहरणार्थ, देव-पितरांच्या कार्यात व श्राद्धात कोणाला प्रवेश नको याबाबत तिस-या अध्यायात आज्ञा असून शूद्र, मंदिरात पूजा करुन अर्जन करणारे, वैद्य, पशुपालक, मेंढपाळ, अभिनेते, नर्तक,  द्यूतगृहे चालवणारे, मांस व मद्य विक्रेते, सूत, तेली, शेतकरी, शिल्पी, दूतकार्य करणारे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारे वगैरे व्यवसाय करणारे त्याज्ज्य म्हटले आहेत. (अध्याय ३. १५२-१६६) . यात उल्लेखिलेल्या सर्व जाती व्यवसायाधिश्घ्ठित आहेत व त्यांना शूद्र म्हणलेले नाही. उलट शूद्र या संज्ञेचा स्वतंत्र उल्लेख आहे. या सर्वच जाती शूद्र असत्या तर त्यांना एकत्रीतपणे शूद्र असे उल्लेखिले असते. पण ते वास्तव नाही हे मनुस्मुतीवरुनच दिसते. डा. अजय मित्र शास्त्रीही म्हणतात कि "जाती अस्तित्वात येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय हेच होय. परंतू जातींना पारंपारिक सामाजिक संरचनेत कसे सामावून घ्यायचे या प्रश्नापोटी जातींच्या उत्पत्तीची वेगवेगळी स्पष्टिकरने तयार केली गेली."  येथे पारंपारिक संरचना म्हणजे वर्णव्यवस्था असा अर्थ अहे. ते पुढे म्हणतात, "धर्मशास्त्रकारांनी आंतरवर्णीय अनुलोम व प्रतिलोम असे विवाहाचे प्रकार गृहित धरुन त्यांना वर्ण सिद्धांताच्या चौकटीत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण या व्यावसायिक जातींनी स्वत:च आपले तत्कालीन कोरीव लेखांत केलेले उल्लेख पाहता हा प्रयत्न यशस्वी झाला नाही हेच स्पष्ट होते. (महाराष्ट्र ग्यझेटियर-इतिहास:प्राचीन काळ, खंड १) म्हणजेच त्या जाती संकरातून निर्मण झाक्लेल्याच नव्हत्या. तसेच एकाही जातीने आपल्याला कोठेही शूद्र म्हनवून घेतलेले नाही हेही येथे उल्लेखनिय आहे. पण प्रतिपाद्य मुद्दा असा कि अनुलोम-प्रतिलोम संततीमुळे निर्माण होना-या समस्या हे वास्तव असले व त्या संततींना वेगवेगळ्या जातीनांवांनी ओळखले जात असले तरी  या जाती समाज बनण्याएवढ्या संख्येच्या नव्हत्या हे उघड आहे. ज्याअर्थी या जातीच नंतर नाहिशा झाल्या त्याअर्थी ही व्यवस्था वैदिक धर्मातही टिकू शकली नाही. पुढे क्षत्रीय व वैश्य हे वर्णच वैदिक धर्मातून वजा झाल्यानंतर व वैदिकंच्या सेवेतील शूद्र वर्णही निघून गेल्यानंतर आंतरधर्मीय संकर झाले तरी त्याचे काय करायचे हाही प्रश्नच होता. थोडक्यात आज आहे त्या जातिसंस्थेचे कर्तुत्व मनुस्मृतीला देता येत नाही. संकरज वैदिक जाती कधीच नष्ट झाल्या असून आजच्या जाती या संकरज नव्हेत हे येथे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणजे, शूद्रांसाठीची बंधने ही नेमक्या कोणासाठी, कोणत्या धर्मासाठी हेच समजावून न घेतल्याने, विशेषत: ब्रिटिश काळात, मनुस्मृती (व अन्यही मिताक्षरासारख्या स्मृतींमुळे) नुसता सामाजिकच नव्हे तर राजकीय गोंधळ सुरु झाला. ते कसे हे समजावून घेणे गरजेचे आहे. तत्पुर्वी स्मृतीनुसार घातली गेलेली शुद्रांवरची बंधने अगदी मध्यकालातही कोणी पाळलेली दिसत नाहीत. मुळात हिंदुंसाठी ही स्मृती नव्हतीच याचे भान राज्यकर्त्याना, धर्मपंडितांना व समाजांना होतेच. भारतातील अवैदिक हिंदू समाज हे नेहमीच आपापल्या कुल (जाती)धर्मानुसार नियंत्रित झालेले आपल्याला दिसतात. त्यांचे नियमन केले ते त्यांच्या-त्यांच्या जातींनी, जात पंचायतींनी. जाती जोवर सैल होत्या (किमान दहाव्या शतकापर्यंत) त्यांचे नियमन त्या-त्या व्यवसायांच्या श्रेण्या करीत. श्रेणी व्यवस्था सर्वात पुरातन असून श्रेंणी धर्माचा उल्लेख मनुस्मृतीही करते. हा धर्म स्वतंत्र आहे असाच मनुस्मृतीचा अभिप्राय आहे. अवैदिक (म्हणजे हिंदुंच्या) स्मृत्या होत्या असाही उल्लेख मनुस्मृती करते, म्हणजे जातीनियम लिखित स्वरुपात असण्याचीही शक्यता आहेच. पण आज तरी आपल्याला लिखित स्वरुपात त्या आपल्याला उपलब्ध नाहीत.

पण साहित्य व ताम्रपटीय पुराव्यावरून दिसते कि समाज जीवन खुपच मोकळे होते. जातीभेद फारसा अस्तित्वात नव्हता. हिंदू स्त्रीयांना पुरेसे स्वातंत्र्य होते. विवाह मुले वयात आल्यानंतरच होत. ब्रिटिश राज्य आल्यावर संमती वयाचा जो प्रश्न उद्भवला तो वैदिकांबाबत, हिंदुंबद्दल नव्हे. वैदिक अनुकरणाने काही हिंदू जातींतही बालविवाह घुसला असला तरी त्याचे प्रमाण अल्प होते असेच आपल्याला दिसते. घटस्फोट, पुनर्विवाह, विधवा विवाह या बाबतीत प्रत्येक जातीचे स्वत:चे नियम असले तरी असे विवाह आता आता पर्यंत सर्रास होत असत. सैन्यदलांत व शासकीय सेवांत सर्वच जातीघटकांना प्रवेश होता. विविध जातींची आर्थिक स्थिती मंदिरे व बौद्ध विहारांना दान देण्याइतपत सुदृढ होती हेही कोरीव लेखांवरून स्पष्ट दिसते. मनुस्मृती त्यांना लागू असती तर त्यांना मुळात संपत्तीसंचयाचाच अधिकार नव्हता तर ते दान कोठून देणार? आणि अभिमानाने आपापल्या जातीचा (व्यवसायाचा) उल्लेख कसा करणार? आज अस्पृष्य मानले गेलेल्या समाजांतील काही पुरेसे धनाढ्य होते. पाटील, किल्लेदार ते सेनानी बनत होते याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. क्षीरसागरांनी प्रस्तूत पुस्तकात यावर पुरेसा प्रकाश टाकलेला आहेच.

मनुस्मृतीला सर्वच हिंदू समाजाची संहिता समजण्याची चूक भारतियांची नसून ब्रिटिशांची आहे हे आपण आधी लक्षात घ्यायला हवे. पाश्चात्य विद्वान संस्कृत भाषा व त्यातील साहित्याकडे आकृष्ठ झाले ते दोन कारणांनी. पहिले कारण निखळ स्वार्थाचे होते. वंशवादाने पिडलेल्या पाश्चिमात्यांनी संस्कृत भाषेला पुरा-इंडो-युरोपियन भाषा ठरवत आपला इतिहास मागे न्यायला सुरुवात केली. आर्य वंश वादाची सुरुवात तेथेच झाली. विल्यम जोन्सने सर्वात आधी, म्हणजे १७६४ मध्येच मनुस्मृतीचा इंग्रजीत अनुवाद केला. संस्कृतात जेही काही आहे ते ब्राह्मणांचे व ब्राह्मण हेच समग्र हिंदू धर्माचे नियामक असल्याच्या समजुतीतून सर्व स्मृतीही हिंदुंच्या नियमनासाठी लिहिल्या गेल्या हा त्यांचा समज झाला. प्रत्यक्षात वैष्णव वगळता शिव (व अन्य) मंदिरांचे पुजारी गुरव अथवा स्थानिक कोणत्याही जातीचे हिंदू असत. वैदिक समाजात मंदिर पुजा-यांना वैदिक धर्मव्यवस्थेत अत्यंत गौण स्थान आहे हेही येथे लक्षात घ्यावे लागते.

आर्य आक्रमणवाद ब्रिटिशांच्या हाताशी असल्याने स्मृतींतील शूद्र हे आक्रमक आर्यांने हरवलेले दास-दस्य़ु होत असा त्यांचा समज झाला. त्यांच्या दृष्टीने स्मृती या सर्व हिंदुंची धर्मशास्त्रे होत. वर्ण व जाती या दोन अत्यंत वेगळ्या संकल्पना असतांनाही त्यांनी वर्ण व जातींना एकच समजत त्याचा अनुवाद सरसकट "कास्ट" (caste) असा केला. येथील कायदे बनवतांनाही त्यांनी मनुस्मृतीचाच विशेषकरुन आधार घेतला. म्ह्णजे जे हिंदू या स्मृतींच्या कक्षेबाहेर होते तेही कारण नसतांना त्या कक्षेत आणले गेले. भारतातील एवढ्या जाती व प्रत्येक जातीच्या प्रथा अभ्यासण्याएवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. "The Sanskrit pandits were hired to translate and sanction a new interpretation of customary laws created a curious Anglo-Brahmanical hybrid ...in which the pandits dutifullyu followed the demands made by their paymasters." असे मधु किश्वर म्हणतात ते योग्यच आहे. (मानुषी, भाग-१२०, ) वारेन हास्टिंग्जने १७७२ मध्येच काही ब्राह्मण पंडितांना नियुक्त करुन त्यांची हिंदू कायदे बनवण्यासाठी मदत घेतली. हे असे होऊ देणे त्यांच्याही राजकीय सोयीचे होते. हिंदू व्यक्तिगत कायदा या पद्धतीने बनवला गेला व स्वातंत्र्यानंतरही कही बदल करुन तोच चालू राहिला. त्याचा मुलाधार मनुस्मृतीच असल्याने व त्यातील सामाजिक विषमतेचे तत्वज्ञान, जे आधी वैदिक वगळता हिंदू धर्मात अस्तित्वात नव्हते, ते अस्तित्वात आणुन इंग्रजांना येथे राज्य करणे सोपे गेले. एतद्देशिय अडाणी जनतेच्या हे लक्षात आले नाही. "शास्त्रांमध्ये जे लिहिले आहे ते विवेकावर आधारित नसेल तर स्विकारता येणार नाही." व "वैश्विक नीति व सत्याशी द्रोह करणारे शास्त्रवचन स्विकारार्ह असू शकत नाही." असे महात्मा गांधी स्मृतींबद्दल म्हणाले होते. (The Collected Work of Mahatma Gandhi, Vol. LXII, p. 121).अर्थात त्यांचाही समज स्मृती या समग्र हिंदुंसाठीच अहेत असा गैरसमज होताच. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू कोड बिलानेही वादळ उठवले. परंतू ब्रिटिश राजवटीत भारतीय जातींचे परस्पर संबंध बदलले एवढे नक्की. जातींचे निर्मितीचे श्रेय बिनदिक्कतपणे स्मृत्यांना देण्यात आले. जवळपास दोनशे वर्षांच्या या काळात नवशिक्षित हिंदुंनाही जातींची निर्मिती मनुस्मृतीनेच केली असे वाटु लागले. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे बीज ब-यापैकी या समजुतीकडे जाते. मुळात वादाचा विषय दोन धर्मांना एक समजणे हा होता पण तिकडे मात्र सुधारणावाद्यांचे लक्ष गेले नाही हे भारताचे दुर्दैव होय

थोडक्यात, मनुस्मृती व त्याआधारित सर्वच स्मृत्या, ज्या केवळ आणि केवळ वैदिक धर्माच्या नियमनासाठी होत्या, त्याच सुधारित व आधुनिक स्वरुपात समग्र हिंदुंसाठी गृहित धरण्यात आल्या. ब्रिटिश काळातच मनुस्मृतीविरुद्ध आवाज उठू लागले कारण ब्रिटिश कायदेही हिंदुंना माहितही नसलेल्या स्मृती कायद्यांवर आधारित होते. सामाजिक चळवळींचा स्मृती हा एक आधार बनला असे म्हटले तरी वावगे हो्णार नाही. हिंदू कोड बिलावरही स्मृत्यांचा प्रभाव आहे हे अमान्य करता येत नाही. ब्रिटिशकाळाने लयाला गेलेल्या स्मृत्यांचे माहात्म्य अपरंपार वाढवले. तत्पुर्वी अगदी पेशवाईतही अन्य जातींचे निवाडे करतांना कधीही स्मृतींचा वापर करण्यात आला नाही असे क्षीरसागरांनी पुढे स्पष्ट केलेच आहे. मला वाटते ते विवेचन मुख्य मुद्दा स्पष्ट करायला पुरेसे आहे.

अस्पृश्यतेचा प्रश्न

अस्पृष्यतेचा प्रश्न हा अत्यंत जटिल आहे हे येथे मान्य केलेच पाहिजे. या प्रश्नावर मी व संजय क्षीरसागर गेली अनेक वर्ष डोकेफोड करत आहोत. मनुस्मृतीत काही संकरज जाती (उदा. अंत्यज, चांडाळ, श्व[अच, धिग्वन) अस्पृष्य मानल्या गेलेल्या आहेत. प्राकृत साहित्यावरुनही काही जातींना गांवात येतांना काही चिन्हे बाळगांवी लागत, गांवात राहणारे असले तर घरांवर काही चिन्हात्मक खुणा कराव्या लागत असे मोघम उल्लेख आढळतात. अस्पृष्यतेची कारणमिमांसा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केली असली तरी अद्याप तिचा समाधानकारक उलगडा झालेला नाही. आज अस्पृष्य मानल्या जातींपैकी एकाही जातीचा उल्लेख मनु व अन्य स्मृत्यांतंच काय पण पुराणंतही आढळत नाही. फक्त जैनांचा आदिपुराणात धोबी, सुतार व लोहारांना अस्पृष्य वर्गात घातलेले आढलते. पण यांना प्रत्यक्षात हिंदू अस्पृष्य मानत नाहीत. परंतू अस्पृष्यता वास्तवात होती हे एक वास्तव आहे.

उदा. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हणजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. या व अशा अस्पृष्य मानलेल्य गेलेल्या जाती व मनुस्मृती यांत काही संबंध आहे काय हे तपासता लक्षात येते कि अस्पृष्यतेची भावना मनुस्मृतीत दिसत असली तरी हिंदुंत अनुकरणाने आली कि तिची निर्मिती स्वतंत्रपणे झाली याचा उलगडा होत नाही. खरे तर तंत्र मार्गात, विशेषत: नाथ पंथात अस्पृश्यता हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचेही आपल्याला दिसते. पण वैदिक धर्माचे निकटचे साहचर्य एकमेकांत काही अनिष्ट प्रथा निर्माण व्हायला कारण ठरल्या हे निश्चित आहे. जैन धर्मात अन्यथा अस्पृष्य जातींचा उल्लेख येण्याचे अन्य कारण दिसत नाही. वैदिक धर्मात नसलेल्या जाती या हिंदुंमुळे जशा निर्माण झाल्या तसेच वर्णांतील उच्च-नीचतेच्या भावना उत्तर युगात हिंदू धर्मात प्रवेशल्याचेही आपल्याला दिसते. यावर अजुनही खूप संशोधन व्हायची गरज आहे हे मात्र निश्चित.

मनुस्मृतीतून प्रकट होनारी महत्वाची बाब म्हणजे एका समाजाच्या कालौघात झालेल्या स्थित्यंतरांचा, बदललेल्या विचारांचा, त्यांच्यासमोर आलेल्या समस्या व त्यासाठी त्यांनी शोधलेल्या मार्गांचा एक व्यापक आलेख यातून मिळतो. या दृष्टीने आजवर मनुस्मृतीचे परिशिलन झालेले नव्हते. या निमित्ताने ते व्हायला मदत होईल अशी आशा मला आहे.
संजय क्षीरसागरांच्या या अमोलिक ग्रंथामुळे भारतीय समाजावर अकारण पडलेले सावट दूर होत हिंदुंनी नकळत गेली काहिशे वर्ष जोपासलेली न्य़ुनगंडाची भावना दूर होण्यात नि:संशय मदत होणार आहे. आजवर मनुस्मृतीचा दुरुपयोग करत त्यातील समाजव्यवस्थेचे निर्देशन नेमके कोणासाठी आहे हे स्पष्ट केले गेले नव्हते. ब्रिटिश व एतद्देशिय तत्कालीन विद्वानांनी आपापली लौकिक सोय पाहिल्यामुळे समाजात एक तंणाव तर निर्माण झालाच पण शूद्र नसतांनाही अनेकांना शूद्र समजत व त्यांनाही ते शूद्रच आहेत असा समज निर्माण करवून देत जो न्युनगंड निर्माण केला गेला याची सामाजिक परिणती विकासशील न राहता परस्परविरोधाची, संघर्षाची होण्यात झाली. खरे तर बाबासाहेबांनंतर हे काम दुस-या पिढीच्या विद्वानांनी निकोपपणे पुढे न्यायला हवे होते. तसे न करता ते ब्राह्मणद्वेषाच्याच गर्तेत अडकल्याने त्यांच्याकडून मनुस्मृतीची समग्र चिकित्सा झाली नाही. संजय क्षीरसागरांनी ख-या संशोधकाच्या भुमिकेत जात तटस्थपणे मनुस्मृतीची जी चिकित्सा केली आहे ती मनुस्मृतीचे विरोधक व समर्थक या दोन्ही पक्षांना नवा दृष्टीकोण देण्यास समर्थ आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही.

पुस्तकात मनुस्मृतीतील श्लोकांचे संगतवार विश्लेशन आपल्याला मिळेल. खुद्द स्मृतीकारांनी कोठेकोठे विसंगत घोळ घातला आहे याचेही दर्शन आपल्याला होईल  व एका प्राचीन समाजाचे नियमन कसे करंण्याचे प्रयत्न होत होते, कशा अडचणी येत होत्या याचेही दिग्दर्शन होईल. आज "मनुवाद" हा कळीचा शब्द बनला आहे या काळात अशा पद्धतीने मनुस्मृतीची तटस्थ चिकित्सा होणे ही अपल्या एकंदरित समाजजीवनासाठी निश्चितच उपकारक आहे यात शंका नसावी. मनुस्मृती अथवा अन्य स्मृतींमुळे आमची अवनती झाली असे असंख्य सामाजिक चलवळींचे धुरीण गेले दीड शतक ओरडत आहेत, त्यांनाही या पुस्तकामुळे पुनर्विचार करणे भाग पडेल. मनुस्मृतीचे पाखंड निर्माण करण्यात या स्वत:ला "बहुजनीय" म्हनवणा-या विचारवंतांचा मोठा वाटा आहे हे नमूद करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.

धन्यवाद.

-संजय सोनवणी

Wednesday, November 28, 2018

वैदिक आर्यांचा धर्म भारतात कसा आला?


Image result for aryan migration


आर्यांच्या आक्रमणामुळे येथे वैदिक धर्म व त्यांच्या भाषा पसरल्या असे आतापर्यंत मानले जात होते. जातीव्यवस्थाही आक्रमक आर्यांनी एतद्देशियांवर लादली हे मत तर लोकप्रिय होते. परंतू प्रत्यक्षात वैदिक आर्य येथे आक्रमक म्हणून नव्हे तर शरणर्थी म्हणून आले, त्यांनी येथीलच भाषा स्विकाराव्या लागल्या व येथल्या समृद्ध संस्कृतीतील देव-देव्ताहे स्विकारावुया लागल्या हे इतिहासाच्या अभ्यासावरुन स्पष्ट होते. 

अफगाणिस्तानात एकाच असूर संस्कृतीतून झरथुस्ट्री आणि वैदिक धर्म निर्माण झाले आणि पुढे त्यांच्यात वैरही निर्माण झाले हे आपल्याला अवेस्ता व ऋग्वेदाच्या तुलनात्मक अभ्यासावरुन समजते. झरथुस्ट्री धर्म प्रेषित स्थापित असल्याने त्याला एक शिस्त होती. विश्तास्पासारखा राजा आश्रयदाता म्हणून मिळाल्याने झरथुस्ट्री धर्माची वाढ होत गेली. अर्थात तुराण्यांसारखे या धर्माचे शत्रुही होते. तुराणी वैदिकांचे कधी मित्र तर कधी शत्रू म्हणून ऋग्वेदात अवतरतात. खरे म्हणजे प्राचीन इराणच्या विस्तिर्ण भुभागात असंख्य टोळ्या होत्या आणि त्यांचे एकमेकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष होते. या संघर्षाला राजकीय परिमाण जसे होते तसेच धार्मिकही होते. वैदिक धर्म जोवर असूरकेंद्रित होता तोवर झरथुस्ट्री धर्माशी त्यांचे वैर निर्माण होण्याचे कारण नव्हते. पण पुढे मात्र दोन धर्मश्रद्धांत संघर्ष निर्माण झाल्याने असुरकेंद्रीत वैदिक धर्माने देवकेंद्रीत व्हायला सुरुवात केली. वैदिक धर्माचे आश्रयदातेही बदलत राहिले त्यामुळे ऋग्वेदात धर्मश्रद्धांतील बदल दिसुन येतात. ऋग्वेदातील प्रसिद्ध दाशराज्ञ युद्धाच्या वेळेस तुत्सु जमातीचा नायक सुदास हा या धर्माचा आश्रयदाता होता असे आपल्याला दिसते. या युद्धात वैदिक धर्म विरोधी दहा टोळ्यांनी सुदासाविरुद्ध आघाडी उघडली होती. हे युद्ध ऋग्वेदात अनेक वेळा उल्लेखले गेले असून ते युद्ध झरथुस्ट्राच्या मृत्युनंतर व ऋग्वेद रचनेच्या मध्यकाळी झाले असावे असे अनुमान अंतर्गत पुराव्यांवरुन करता येते. 

या युद्धात अनु, पख्त, भलानस, द्रह्यु, पुरु, शिव, विषाणिन, पर्शु इत्यादि टोळ्या सुदासाविरुद्ध एकवटल्या होत्या. पुरुंनाही येथे यज्ञ न करणारे, इंद्राला न मानणारे म्हटलेले आहे. याचाच अर्थ असा की पुरु सुद्धा वैदिकांपासुन दूर गेले होते. या युद्धाची जागा परुष्णी नदी दिली असून ही नदी म्हणजे भारतातील रावी असावी असे आजवर मानले जात होते. पण अन्य जमातींचा भुगोल निश्चित असल्याने अनु (पार्थिया) व पर्शु (पर्शिया) हे अतीदुर पश्चिमेतील जमाती एका युद्धासाठी सिंधू नदी ओलांडुन जवळपास आठशे मैल प्रवास करतील अशी शक्यता नसल्याने ही नदी दक्षीण अफगाणिस्तानात्वीलच कोणतीतरी नदी असावी असे आता मानले जाते. शिवाय सुदास हा परुष्णी, रावीच्या काठावर राहणारा असता तर त्याचे इतक्या दुरच्या जमातींशी वैरही निर्माण होण्याचे संयुक्तिक कारण नव्हते. शिवाय या युद्धानंतर सुदास लगोलग शत्रुचा पाठलाग करीत अनु टोळीच्या वस्त्यांवर चालून गेला आणि त्यांच्या सात तटबंद्या इंद्राच्या मदतीने फोडल्या आणि खंडनी वसून केली असाही उल्लेख येतो. रावी नदीपासुन पार्थियापर्यंत सुदासाने एवढा प्रदीर्घ पाठलाग करणेही अशक्य आहे. या युद्धात सहभागी झालेल्या टोळ्या अफगाणिस्तान व निकटच्या सीमावर्ती प्रदेशातील राजांमध्ये झाले हे त्यातील सहभागी टोळ्यांवरुनच स्पष्ट होते. दुसरे असे की रावी हा परुष्णी नदीचा अपभ्रंशही नाही हेही उघड आहे. आर्य भारतातीलच होते हे सिद्ध करण्याच्या नादात भारतीय विद्वानांनी गफलती केल्या आहेत हे उघड आहे. 

येथे महत्वाची बाब ही की पुर्वी वैदिक धर्माला सहाय्य करणारे आणि वैदिक धर्म स्विकारलेलेही या युद्ध काळात वैदिक धर्माला सोडुन गेले होते. या युद्धात या दहा टोळ्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचा नायनाट झाला नाही किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरही करण्यात आले नाही. म्हणजेच वैदिक धर्माची व्याप्ती या युद्ध काळात मर्यादित झालेली दिसते. द्रुह्यु, पर्शु आणि पुरु टोळ्या एके काळी वैदिक धर्माचे सहायक होते. या नंतर त्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला. नंतर ते पुन्हा वैदिक धर्मात आलेले दिसत नाही कारण नंतरच्या ऋग्वेद आणि वैदिक साहित्यातून यातील टोळ्यांचे उल्लेख गायब झाल्याचे तर दिसतातच पण खुद्द पुरुंबाबतही अनादरच व्यक्त करण्यात आला आहे. 

याचा अर्थ असा होतो की दाशराज्ञ युद्धानंतर विजय मिळुनही वैदिक धर्माचा विस्तार झालेला नाही. शत्रुत्व उत्पन्न झालेल्या टोळ्या पराजयानंतर गप्प बसल्या असतील असेही नाही. नंतरच्या काळात सुदासानंतर वैदिक धर्माचे केंद्र पुन्हा बदललेले दिसते. ऋग्वेदाचा उत्तरार्ध भाग रचला जात असतांना सहदेव व सोमक हे पिता-पुत्र राजे होते असे दिसते. तेही भरतवंशाचे होते असे मानले जात असले तरी यातील काहींचाच संबंध एका कुळाशी जोडता येतो. नंतरच्या काळात वैदिक ऋषींना ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनच दाने स्विकारायची वेळ आलेली दानस्तुतींवरुन दिसते. 

याच वेळीस झरथुस्ट्री धर्माचे काय चालले होते हेही पाहुयात. झरथुस्ट्राने बल्ख (अवेस्तन ’बक्सोई’) प्रांताचा राजा विश्तास्पाच्या आश्रयाखाली आपल्या धर्माचा विकास केला होता. तुरिया (वैदिक तुर्वश, म्हणजेच तुरानी) लोकांतील हेयोना टोळीने त्यामुळे विश्तास्पाशी वैर घेतले. त्याचीच परिणती झरथुस्ट्राच्या अग्नीमंदिरात जाळून हत्या होण्यात झाली. ऋग्वेदानेही ही नोंद करुन ठेवली आहे. या काळात वैदिकांचे मित्र असलेले तुराणी नंतर मात्र वैदिकांचे हाडवैरी झालेले दिसतात हे दाशराज्ञ युद्ध प्रकरनात त्यांनी सुदासाविरुद्ध उभे ठाकले यावरुन दिसून येते. 

अवेस्त्याचा भुगोल नंतर बराच बदललेला दिसतो. झरथुस्ट्रानंतर जे अवेस्तन साहित्य आहे ते विपूल असले तरी इतिहाससुचक वर्णने त्यात नाहेत. परंतू त्यातील बदललेल्या भुगोलावरुन झरथुस्ट्री धर्माचा विस्तार समजून येतो. झामयाद यस्टमध्ये जो भुगोल विस्ताराने आला आहे तो सिस्टन प्रांताचा आहे. याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच एरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते त्याशिवाय अन्य अवेस्त्यात न येनारी एवढी सखोल माहिती आली नसती. पुढे झरथुस्ट्री धर्माची व्याप्ती पर्शियापर्यंत झालेली दिसते. 

वैदिक धर्माचा उगम सिस्टन प्रांतातच व सरस्वती (हरहवती/हेल्मंड) नदीच्या परिसरातच झाला. सरस्वतीचे अतोनात गुणगाण गायले जायचे कारणही तेच आहे. याच प्रांतात नंतर झरथुस्ट्री धर्माचा जोर वाढल्याचे, किंबहुना बल्ख प्रांत ओलांडत तो धर्त्म दक्षीणेतही प्रबळ झामयाद यस्टवरुन सूचित होते. मग यावेळेस वैदिकांची अवस्था नेमकी काय होती? वैदिकांनी असूर (अहूर माझ्दा) धर्माला कसे तोंड दिले?

वैदिक धर्माला या काळात उतरती कळा लागली हे आपल्याला ऋग्वेदावरुन कळते. इतके की ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनही दाने स्विकारावी लागली. (ऋ. ६.४५.३१-३२) प्रबळ राजाश्रयाच्या अभावात कोणत्याही धर्माला उतरती कळा लागणे स्वाभाविक आहे. उत्तर अफगाणिस्तानापर्यंत मर्यादित असलेला झरथुस्ट्राच्या काळातील धर्म नंतर दक्षीणेकडेही स्थिर होत असल्याचे आपण झामयाद यस्टवरुन पाहिले. येथे नेमके काय झाले किंवा कोणत्या टोळ्यांनी झरथुस्ट्री धर्माचा अंगीकार केला हे स्पष्ट लिहिले नसले तरी नंतर पर्शु व तुर्वशांसहित अनेक टोळ्या या धर्मात गेल्या असा अंदाज बांधता येतो. अवेस्त्याची नंतरची रचना पर्शियन भाषेतीलच आहे. पर्शुंनीही राजाश्रय दिल्याखेरीज हे घडणे शक्य नाही.

ब्राह्मण ग्रंथांत देवासुर युद्धांच्या अनेक पुराकथा येतात. त्यातील मिथकीय अंश जरी दूर केला तरी देव (वैदिक) विरुद्ध असूर (झरथुस्ट्री) यांच्यामधील संघर्षाचे प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते. शतपथ ब्राह्मणात एक कथा येते ती अशी- देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५). या कथेतील वैदिक शैलीतील मिथकीय अंश दूर काढला तर हे लक्षात येते की देवांना (म्हणजे वैदिकांना) पराभव स्विकारावा लागल्याने भुमीहीन व्हावे लागले होते, असुरांना नाही. या कथेतील उत्तरार्धातील भाग हा केवळ मलमपट्टी या स्वरुपाचा आहे. मुळात ही देवासूर युद्धे संपुर्ण काल्पनिक नसून देवकेंद्रीत धर्म आणि असूरकेंद्रीत धर्म यातील संघर्षाचे सूचन करतात हे उघड आहे. देवांनी, कपटाने का होईना, पण शेवटी विजयच मिळवला असे दर्शवले जात असले तरी वास्तव तसे सांगत नाही. कारण पुढचा इतिहास त्या जयाच्या कथेला पूरक ठरत नाही, एवतेव त्या काल्पनिक ठरतात.

काही वैदिकांना सरस्वती नदीचा प्रदेश सोडून हिंदुकुश ओलांडत भारतात कसे यावे लागले याचीही स्मृती एका पुराकथेच्या रुपाने शतपथ ब्राह्मणाने जपून ठेवली आहे. किंबहुना वैदिकांच्या स्थलांतराची ही एकमेव कथा वैदिक साहित्यात येते व ही बाब लक्षणीय आहे. शतपथ ब्राह्मणात (श. ब्रा. १.४.१, १४-१७) येणारी ही कथा अशी-

"सरस्वती नदीच्या तीरावर राहणा-या विदेघ माथवाच्या मुखातून अग्नी पडल्यावर तो अग्नी पृथ्वीला (अरण्यांना) व नद्यांना जाळीत (कोरड्या करत) पुर्वेकडे निघाला. विदेघ माथव व त्याचा पुरोहित गौतम राहुगन त्या अग्नीच्या पाठोपाठ निघाले. तो अग्नी शेवटी उत्तरगिरीतुन वाहणा-या सदानीरा नदीजवळ आला. अग्नी या नदीला सुकवू शकला नाही. ब्राह्मणांनी ही नदी कधीही पुर्वी ओलांडलेली नव्हती. विदेघाने अग्नीस विचारले की मी कोठे राहु? तर अग्नीने उत्तर दिले की या नदीच्या पुर्वेकडे रहा. तेंव्हा सदानीरेच्या पुर्वेची जमीन दलदलीची व लागवडीखाली नव्हती." ही कथा सांगून याच्या शेवटी विदेहाचा राजा माधवाशी विदेघ माथवाचा संबंध जोडण्यात आला आहे. असे असेल तर मुळातच विदेह माधव असे नांव न घेता विदेघ माथव असे घ्यायचे कारण काय हा प्रश्न निर्माण होतो. उत्तरकाळात विदेह प्रांताशी विदेघमाथवाचा ओढून ताणून संबंध जुळवण्यासाठी पुराकथेचा उपयोग केला गेला आहे हे निश्चित  आहे. यात विदेघ हे प्रांताचे नांव नसून खुद्द माथवाचे पहिले नांव आहे. त्या वेळीस माथव हीच एखादी टोळी असू शकते. माथव हा शब्द मधुवरुन आलेला नाही यामुळे माधव व माथव याचा काहीएक संबंध नाही. 

या कथेतील वैदिक पुराकथनात्मक शैली लक्षात घेता समोर येणारी बाब ही की सरस्वती (हरहवती) नदीच्या काठावर कोणी विदेघ माथव नांवाचा राजा अथवा टोळीप्रमुख रहात होता व गौतम राहुगन हा त्याचा पुरोहित होता. त्यांनी सपरिवार एके दिवशी (अथवा रात्री) सरस्वती नदीचा किनारा सोडला व हिंदुकुश पर्वत (उत्तरगिरी म्हणजे हिमालय नव्हे. गिरी हा शब्द कमी उंचीच्या पर्वतांसाठी वापरला जातो. हिमालयाचा उल्लेख प्राचीन साहित्यात हिमवत अथवा हिमवन असाच येतो.) ओलांडत सिंधू नदीच्या पार हे लोक एका नदीजवळ आले. हा प्रदेश उजाड व दलदलीचा होता. या नदीच्या पुर्वेला त्यांनी वस्ती केली. येथवर कधीही यज्ञ (वैदिक धर्मीय) आलेला नव्हता हे कथेतच स्पष्ट आहे. 

आर्य आक्रमणवादी विद्वानांनी या कथेतून वैदिक आर्यांचा पंजाबातून पुर्वेकडे (विदेहाकडे) विस्तार झाल्याचा अर्थ काढला आहे. सदानीरा नदी म्हनजेच गंडकी असाही अनेक विद्वानांचा तर्क आहे. त्यांचा एकंदरीत मतितार्थ असत्यो की पंजाबमध्ये वेदरचना पुर्ण झाल्यानंतर वैदिक आर्यांनी पुर्वेकडे विस्तार सुरु केला. पंण असे असते तर मग गांधार वगळता खुद्द पंजाबमधीलच तत्कालीन राज्ये तसेच केकय, कुरु, पांचाल, मगध, कोसलादि राज्यांचा उल्लेख ऋग्वेदात एकदाही येत नाही. येतात ते उत्तरकालीन साहित्यात. ऋग्वेदात येणा-या सर्वच जमाती पश्चिमोत्तर भारत व प्राचीन इराणमधील आहेत. म्हणजे ऋग्वेदाचा भुगोल वेगळा होता व अन्य वेद ते ब्राह्मण ग्रंथांचा भुगोल वेगळा होता. वैदिक धर्म नंतर बिहार (मगधात) व अन्य प्रदेशांतही नंतर गेला हे खरेच आहे. पण नोंदले गेलेले पहिले स्थलांतर शतपथ ब्राह्मणात आहे व तेही पुरातन स्मृतीस्वरुपात आलेले आहे. त्यामुळे विद्वानांच्या तर्क-वितर्कांना कसलाही ठोस आधार नाही.  

जो घोळ त्यांनी कारण नसता सरस्वती नदीच्या मुळ स्थानाबद्दल घातला आहे तसाच गोंधळ गंडकीबाबत केल्याचे आपल्याला दिसून येते.  मुळात बिहारमधून वाहणारी गंडकी म्हणजे सदानीरा नव्हे. अमरकोशाचा अमरसिंह म्हणतो की सदानीरा हे बहुदा बंगालमधील कर्तोया नदीचे नांव असावे. म्हणजे तोही ठाम नाही. महाभारतातील हकीकत पाहिली तर जे वर्णन मिळते त्यावरुन शरयु व गंडकीमधूनच्या परिसरातुन वाहणारी ही कोणतीतरी नदी असावी असे दिसते. हे तर्क सोडले तर या नांवाची एकही नदी उत्तर भारतात नाही. वैदिकांना पूज्य असलेल्या सरस्वती नदीचे नांव घग्गर कसे होऊ शकेल हा जसा प्रश्न आहे तसाच गंडकीचे नांव सदानीरा कसे बनले हाही प्रश्न आहे कारण याला कालौघात झालेला अपभ्रंशही म्हणता येत नाही. एवतेव विदेहाचा आणि विदेघ माथवाचाही संबंध नाही. सदानीरा म्हनजे सतत पाणी असलेली नदी. हे वर्णन कोणत्याही नदीला लागु पडते. निर्मनुष्य भागातील दलदलीच्या भागात वस्ती करणा-या विदेघ माथवाने त्या नदीचे तात्पुरते नामकरण केले आणि नंतर ते विस्मरणातही गेले एवढेच फारफारतर या संदर्भात म्हणता येईल. त्यामुळे हा पंजाबमधुन बिहारकडे (मगध/विदेहाकडे) झालेला विस्तार नसून सरस्वती (द. अफगाणिस्तान) ते सिंधू नदीचे खोरे असा हा प्रवास आहे. हा प्रवास त्यांना शहरी वस्त्या टाळत अरण्यातून अनेक नद्या ओलांडत एका निर्मनुष्य भागात वस्ती केली. हा भाग दलदलीचा असला तरी सुरक्षित असल्याने त्यांना तात्पुरते का होईना तेथे राहण्यावाचून इलाज नव्हता.

मगधादि पुर्वेचे प्रदेश सनपूर्व तीन हजारपासून वस्त्यांनी गजबजलेले होते. याचे पुरावे पुरातत्वीय उत्खननांतून मिळालेले आहेत. गंगा-यमुना संगमाजवळील झुसी येथे इसपू सहा हजार वर्षापासुन वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिंधू संस्कृती व गंगेच्या खो-यातील लोकांचचा संपर्क असून परस्पर देवाणघेवानही होत होती असे फुल्लेर यांनी दाखवून दिलेले आहे.  याचाच अर्थ असा की पंजाबच्या पुर्वेला वैदिकांनी पहिल्या वसाहती बनवल्या या मताला काहीही अर्थ नाही. आणि दुसरे म्हणजे विस्तार करीत असतांना कोनाशी त्यांचे युद्ध झाल्याचेही सूचन नाही. याचा अर्थ एवढाच की लोकवस्त्या टाळत वैदिकांनी प्रवास केला खरा पण तो पंजाबमधून पुर्वेकडे नव्हे तर अफगाणिस्तानातील सरस्वतीच्या पुर्वेकडे भारतीय उपखंडात, सिंधु नदीच्याही पुर्वेकडे. उत्तर भारतातील मर्यादित प्रदेश त्यांना नंतर क्रमाक्रमाने माहित होत गेले आणि त्याचेही सूचन आपल्याला शतपथ ब्राह्मणात मिळते. खरे तर मगधात खूप उशीरापर्यंत वैदिकांना प्रवेशच मिळालेला नव्हता असे शतपथ ब्राह्मणानेच नोंदवलेले असल्याने विदेघ माथवाच्या कथेतून काढलेले आर्य आक्रमणवादी सिद्धांताचा पायाच निघून जातो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

येथे हा प्रश्न निर्माण होतो की मुळात विदेघ माथव, त्याचा पुरोहित गौतम राहुगन आणि त्यांचा परिवार किंवा समस्त टोळी असे अचानक सरस्वती नदीच्या काठावरुन का निघाले असतील? या प्रश्नाचे उत्तर आपण अहुर माझ्द्याचा, म्हणजेच झरथुस्ट्र धर्माच्या विस्तारात पाहिले आहे. बव्हंशी वैदिक टोळ्यांनी स्वेच्छेने अथवा जबरदस्तीने झरथुस्ट्री धर्मात प्रवेश केला खरा पण जे कट्टर वैदिक होते त्यांनी मात्र धर्म जतनासाठी स्थलांतर करणे पसंत केले. अग्नी विदेघ माथवाच्या तोंडात होता (म्हणजे उघड नव्हता) हे शतपथ ब्राह्मणातील कथा हेच आपल्याला सांकेतीकपणे सांगते. म्हणजेच ही मंडळी झरथुस्ट्री लोकांपासुन लपून छ्पून अफगाणिस्तानातुन निघून गांधार (हिंदुकुश) ओलांडत भारतात आली हे यावरून सूचित होते. अशी कोणत्याही धर्माच्या आक्रमणानंतर अथवा छळानंतर धार्मिकांनी केलेली अनेक स्थलांतरे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. त्यामुळे याच स्थलांतराचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देव-असूर युद्धात पराजय झाला असला तरी आत्मगौरव/अस्मिता जपण्यासाठी विजयच कसा झाला हे सांगितले गेलेले असले तरी ते ऐतिहासिक वास्तव दिसत नाही.

शुद्रांच्या राज्यात

आता, जेथे त्यांनी वास्तव्य केले तो प्रदेश कोणाचा होता हेही आपण उपलब्ध पुराव्यानुसार पाहुयात. वैदिकांचा हा पहिला थांबा शुद्रांच्या राज्यात असल्याचे पुरावे आपल्याला सुदैवाने उपलब्ध आहेत. सिंधू नदीच्या पुर्व भागात शुद्र टोळीचे राज्य होते. हे राज्य केवळ पुराणकथीय नसून ते वास्तवात अस्तित्वात होते. शूद्र नांवाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. ५ सोद्राई हे नांव सुद्द ( नंतरचे संस्कृतीकरण शूद्र) शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांडरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, "शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होती याबाबत शंका नाही." 

महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापुर्वी उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळीप्रमुखाने नजराने दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुर्योधनाच्या बाजुने लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात कि अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात कि महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते.  शूद्र टोळीचे उल्लेख स्वतंत्रपणे मार्कंडेय व ब्रह्म पुराणातही आलेले आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नांव होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नांव असलेल्या अभिर, शिबीसारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नांवाने आपापल्या भुभागात भारतभर सुखनैव जगत होता. 

निर्मनुष्य भागात वस्ती केली असली तरी तो भाग कोणाच्या तरी राज्यात होता. शुद्र टोळीने त्यांना हाकलून लावायचा प्रयत्न केलेला दिसत नाही. शिवाय या राज्यात ते बराच काळ राहिले असावेत. ऋग्वेदाचा बराच भाग येथे आल्यावर रचला गेला. विदेघ माथवाने अज्ञातवासातील अनेक वैदिकांनाही तेथे बोलावले. यजुर्वेदासहित ऋग्वेदाची पुनर्रचना बव्हंशी येथेच झालेली दिसते. आसपास शुद्रच लोक असल्याने आणि त्यांच्याच मेहरबानीने जगावे लागत असल्याने शुद्र समाजाला आदरार्थी महत्व दिले जाणे स्वाभाविक होते. शूद्रांचा धर्म वेगळा आहे याचीही त्यांना जाणीव होती. असे असले तरी त्यांना खूष करायला त्यांच्यासाठीही यज्ञ केले गेल्याचे आपल्याला मनुस्मृतीवरुनच लक्षात येते. "ब्राह्मण देवांपासून उत्पन्न झाले तर शूद्र असुरांपासून निर्माण झाले" असे तैत्तिरिय ब्राह्मणाने (तै,. ब्रा. १-२.६.७) नोंदवून ठेवले. भारतातही असूर संस्कृती होतीच पण ती मुर्तीपुजकांची होती. 

यजुर्वदेही अशीच नोंद करतो. “शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) हे विधान बळ देते. "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." असे यात स्पष्ट म्हटलेले आहे. आर्य व शुद्र हे दोन वेगळे समाज आहेत व त्यांचे निर्मिती स्वतंत्रपणे खालेली आहे याचे स्पष्ट भान वैदिकांना आहे. एवढेच नव्हे तर यजुर्वेदात शुद्रांच्या कल्यानासाठीही प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत. (यजुर्वेद १८.४८, २०.१७, २६.२) याचा अर्थच असा होतो कि आर्य (म्हणजे वैदिक धर्मीय) व शूद्र यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली, हे दोन्ही वेगळे आहेत. येथेही अन्य जमातींची नांवे येत नाहीत कारण या ऋचांची रचना शुद्रांच्याच राज्यात झालेली होती. त्यांच्याच मेहरबानीवर अवलंबून असल्याने ते वेगळे आहेत हे माहित असतांनाही त्यांच्याही कल्याणासाठी प्रार्थना करणे स्वाभाविक होते. अद्याप अन्य जमातींशी वैदिकांचा परिचय झाला नव्हता. किंबहुना सिंधु नदीच्या पलिकडे सारे हिंदू राहतात असा समज जसा प्रचलित होता तसाच समज वैदिकांचाही शुद्रांबाबत झाला असल्यास नवल नाही. त्यामुळे पुढे वैदिकांनी अवैदिक भारतीयांसाठी शूद्र हे नांव सरसकटपणे वापरल्याचे आपल्याला दिसते आणि त्यातुनच मोठा सांस्कृतीक गोंधळ झाला हे एक कटू वास्तव आहे. 

अर्थात येथवर शुद्र आणि वैदिक आर्य यांचे संबंध चांगलेच होते. वैदिकांनी या काळात वेदाचे संकलन, पुनर्रचना व अधिकची भर घालत यज्ञसंस्था बळकट तर केलीच पण त्यांचे स्वसामाजिक पुनर्गथणही केले. अफगाणिस्तानात असतांना आवश्यक न भासलेली वर्णव्यवस्था त्यांना येथे निर्माण करावी लागली. पुरुषसुक्ताची रचनाही येथेच झाली. समस्त समाज पुरुषाचे कल्पना करतांना शुद्रांना वगळणे त्यांना शक्य नव्हते. त्यासाठी पुरुषसूक्त हाच महत्वाचा पुरावा आहे. 

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत 

विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण झाले, बाहु हे क्षत्रीय झाले, मांड्या या वैश्य झाल्या तर शूद्र हे पायापासून जन्माला आले. येथे पाय हे शूद्र झालेले नाहीत. कारण ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे हिस्सेच नाहीत ही जाणीव त्यांना होती. त्यांची नोंद शेवटी केली गेली याचेही हेच कारण आहे. ज्या यज्ञात विराट पुरुषाचा बळी दिला तो उभा नव्हे तर आडवा. त्यामुळे शुद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन परके, वैधर्मी, पण महत्वाचे असा दिसतो. ते वैदिक समाजव्यवस्थेचे भाग नाहीत ही जाणीव असल्याने  पाय हे शूद्र बनले नाहीत. त्यांची उत्पत्ती स्वतंत्र आहे हे त्यांना माहित आहे. अन्य जमाती भारतात असुनही त्यांचे नांव येत नाही कारण त्या त्यांना माहितच नव्हत्या. मनुस्मृतीच्या काळापर्यंत त्यांना विंध्याच्या पलीकडे दक्षीनेत कोण रहाते हेही माहित नव्हते. किंबहुना अन्यत्र सर्व शुद्रच राहतात व शुद्रच राजे आहेत हा समज त्यांचा अगदी मनुस्मृतीच्या आरंभकाळापर्यंत होता हे मनुस्मृतीवरुनच स्पष्ट दिसते. 

म्हणजेच शूद्रांच्याच राज्यात त्यांच्याच आश्रयाखाली रहात असतांना आणि ते आपल्या धर्माचे/संस्कृतीचे नाहीत पण प्रभावी समाजघटक आहेत असे पुरुषसुक्तच सांगत असतांना याकडे मात्र वर्चस्वतावादी आणि हीनगंडवाद्यांनी दुर्लक्ष केले. यजुर्वेद व तैत्तिरिय ब्राह्मणामधील नोंदीही तपासायचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत. शिवाय ऋग्वेदात दास, दस्यू, पर्शु, पख्त, पार्थियन अशा जवळपास ४८ टोळ्यांची नांवे येत असतांना या सुक्तात त्यांचे समाजघटक म्हणून नांव न येता, तोही केवळ एकदाच, “शूद्र” हा शब्दच एक वर्ग म्हणून केवळ पुरुषसुक्तातच का अवतरतो याकडेही विद्वानांनी लक्ष दिले नाही. त्या ४८ टोळ्या पार मागे सुटुन गेल्या होत्या आणि आता ते शुद्रांच्या सन्निध्यात आले होते म्हणून त्यांचे नांव आले हे येथे लक्षात घ्यायला हवे.  

शुद्र जमातीच्या राज्यात वसाहती करून रहात असतांना त्यांना शेती, पशुपालनादि व्यवसाय चरितार्थासाठी करणे भाग होते. हे व्यवसाय करतांना मदतनीस म्हणून कर्मचा-यांची गरज भासने   स्वाभाविकच होते. आता कोण त्यांच्याकडे सेवक म्हणून राबनार? गरजू लोकांची समाजात कमतरता नसते. किंवा अधिक वेतनावर काम मिळनार असेल तर लोक सध्याचे उपजिविकेचे  साधन सोडून देतात. तसेच त्यांना जे सेववर्गातील लोक मिळाले ते स्वाभाविकच शूद्र जमातीतीलच गरजू लोक असनार. असा सेवकवर्ग वैदिक वसाहतींच्या जवळच स्वतंत्र वसाहतीत राहणार हे ओघाने आले. या काळात सेवकवर्गात नसलेल्या शुद्र राजासाठी अथवा शूद्र धनिकांसाठीही यज्ञ केले जात हेही महाभारत व मनुस्मृती नोंदवते. हे यज्ञ कृतज्ञतेपोटी अथवा दानदक्षीणेच्या प्राप्तीसाठी होत असत. नंतर शुद्रांसाठी यज्ञ करणा-या पुरोहितांना हीण लेखले जाऊ लागले. येथे त्या तपशिलात न जाता एवढेच सांगतो की ऋग्वेदाची उर्वरीत रचना व पुनर्मांडणी शुद्रांच्याच राज्यात झाली. यजुर्वेद व ब्राह्मण ग्रंथांची रचनेस येथेच सुरुवात झाली. नंतर मात्र वैदिक येथुनही पुढे सरकलेले दिसतात व तो प्रवास आपल्याला पुढीलप्रमाणे पहाता येतो. 

महत्वाची बाब म्हणजे शूद्र या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत भाषेत लागत नाही. किंबहुना शूद्र या शब्दाचा कोणताही अर्थ सापडत नाही. प्राकृत "सुद्द" या शब्दाचा हा वैदिक अपभ्रंश आहे हे उघड आहे. वैदिकांनी अनेक शब्दांचे असे अपभ्रंश केले आहेत. उदा. म्लेंछ हा शब्द "मेलुहा" या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे दानी आणि थापरांनी दाखवुन दिलेले आहे. ‘मेलुहा हे राष्ट्र म्हणून वैदिकांना परकीयच होते. पुढे हा शब्द भारताबाहेरच्या परकीयांसाठी कायम राहिला असे आपल्याला दिसते. शिवाय ऋग्वेदाच्या भाषेवर नंतरही वारंवार संस्कार करण्यात आले. मुळची अवेस्त्याच्या निकट जाणारी भाषा बदलण्याच्या प्रयत्नांत मुळ पर्शियन नांवांचेही अपभ्रंश झाले. उदाहणार्थ अरजास्पचे वैदिक नामांतर ध्वनीबदल करत ऋजाश्व असे करण्यात आले. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे वैदिक भाषा ही शुद्ध आहे वगैरे समज बाळगण्याचे काही कारण नाही. 
 
विदेघ माथवाच्या पुरोहिताने स्मरणात आहे तेवढा वेद सोबत आणला खरा पण सर्व त्यालाही माहित नव्हता कारण अनेक ऋषीकुलांत वेद विभाजला गेलेला होता. सर्वच ऋषीकुळात मैत्रीचे संबंध नव्हते. उदाहणार्थ विश्वामित्र व वसिष्ठाच्या घराण्यात वितुष्ट होते. या दोन ऋषी कुटुंबाच्या नांवाने दोन महत्वाची मंडले आहेत. ते एकमेकांची मंडले पाठ ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण संकलन आवश्यक असल्याने विदेघ माथव अथवा त्याच्या वंशजांनी प्रयत्नपूर्वक मिळेल तसा वेद गोळा केला. त्याची मंडले/सुक्ते यात विभागणी केली व जेथेही रिक्त जागा होत्या तेथे स्मरणातून भर घातली. दहावे मंडल हे सर्वात अर्वाचीन समजले जाते. ऋग्वेदातील नदीसूक्त व पुरुषसूक्त हे अर्वाचीन समजले जाते. असे असले तरी नदीसुक्ताआधी पुरुषसुक्ताची निर्मिती झाली हे उघड आहे. याचे कारण म्हणजे या सुक्तात शुद्रांचा जसा उल्लेख येतो तसेच दुसरा वर्ण म्हणजे राजन्याचा उल्लेख येतो. पुढे मात्र राजन्य हा वर्ण पुर्ण गळालेला दिसतो व क्षत्रीय हा दुसरा वर्ण समजण्याची प्रथा निर्माण झालेली दिसते. नदीसुक्तात भारतातील गंगा-यमुनेसारख्या पुर्वेकडील नद्यांची नांवे येतात म्हणजेच तोवर त्यांना ऐकून का होईना त्या नद्या माहित झालेल्या होत्या. ऋग्वेदात अन्यत्र कोठेही या नद्यांचा उल्लेख येत नाही कारण तेंव्हा ते भारतात प्रवेशलेलेच नव्हते. केवळ या सुक्तावरुन वैदिक आर्य हे मुळचे भारतातीलच होते हे मत टिकत नाही, कारण अन्यत्रच्या त्यांच्या अनुल्लेखाचे दुसरे कोनतेही स्पष्टीकरण विद्वानांकडे नाही. 

शिवाय येथे ऋग्वेदाची मुळची अवेस्ता सदृष्य भाषाही प्राकृत वळणे घेतांना दिसते. या भाषेवर शुद्रांच्या राज्यात बोलल्या जाणा-या प्राकृतचा प्रभाव आहे असे म्हटले तरी वावगे व अनैतिहासिक होणार नाही. ऋग्वेदातील मुळच्या रचनेत ध्वनीबदल केला गेल्याने वैदिक छंदही बदलले. उदाहरणार्थ म्यक्समुल्लर म्हणतो, "या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमद्ध्ये नाहीत व ऋग्वेदातही अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे."  थोडक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंडलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.तत्कालीन शुद्रांमध्ये प्रचलित असलेल्या तंत्रांचाही प्रभाव पडल्यामुळे विवाह, अंत्यसंस्कार, मरणोत्तर गती अशा संकल्पनाही ऋग्वेदात घुसल्या ज्या तत्पुर्वीच्या सुक्तांत पुर्णतया अदृष्य आहेत. ऋग्वेदाची पायाभूत भाषा प्राकृत असल्याची तर अनेक उदाहरणे आहेत. अवेस्ता-सदृष्य भाषेपासून वैदिकांना फारकत घेणे आवश्यक होते कारण त्यांना येथील भाषा-पर्यावरणात धर्म पसरवायचा होता. त्यामुळे वैदिक आधी व प्राकृत नंतर या भ्रमातून आजच्याही विद्वानांनी येणे आवश्यक आहे. 

लोहित. लभ, काल, लक्ष्मी, आज्य, विजय, एवम हे नवे शब्द दहाव्या मंडलात येतात. देवास:, सत्यास: अशा संस्कृत बहुवचनांऐवजी देवा:, सत्या: असे बहुवचनी प्रयोग अधिक वेळा यात आले आहेत. अनेक नवीन देवता या मंडलात अवतरतात त्या, उदा. मन्यू, श्रद्धा, लक्ष्मी, तार्क्ष्य ई., ऋग्वेदात या मंडलात अवतरतात. १० या देवता शुद्रांकडून वैदिकांनी उधार घेतल्या असल्याची शक्यताच अधिक आहे. भाषाप्रयोगासाहितचे हे त्या शूद्र टोळीचे वैदिकांवरील ऋण आहे. उलट वैदिकांचे घोर अज्ञान हे की तेंव्हा तोवर तरी उत्तर भारतात अजून कोणत्या टोळ्या रहात होत्या याचे भान अथवा ज्ञान नव्हते. ब्राह्मण ग्रंथांत मात्र क्रमश: त्यांचे भारताचे भौगोलिक ज्ञान काही प्रमाणात वाढलेले दिसते आणि इतर जमातींचीही नांवे येवू लागतात. 

शूद्र हे नांव त्यांनी भारतातीलच सर्व जमातींना सरसकट वापरल्याने व धर्मांतरितांनाच वैदिक वर्ण दिल्याने मोठा गोंधळ झाला असला तरी यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी. ११
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." वि. का. राजवाडॆ. १२  
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर. १३ 

अंगविज्जा या पहिल्या शतकातील माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथातही त्रैवर्णिकांनाच आर्य धर्माचे म्हटले असून शुद्र, यवन, शक, कुशाण वगरे गट हे म्लेंच्छ होत असे म्हटलेले आहे.  मनुस्मृती व पातंजली महाभाष्यही (२.४.१०) अशीच मांडणी करते. याचा अर्थ स्पष्ट आहे की ती शुद्र टोळी व नंतर ज्यांनाही वैदिकांनी सरसकटपणे शूद्र म्हटले त्यांचा धर्म आर्य अथवा वैदिक अथवा सनातन धर्म नव्हता तर तंत्राधारित शिव-शक्तीप्रधान मुर्तीपूजकांचा धर्म होता. 

वैदिक विस्ताराची सुरुवात

वैदिकांचा भारतातील पहिला थांबा कुरु प्रदेश असावा व त्यांचा राजाश्रय त्यांना मिळाला असावा असे ग्रिफिथ सुचवतो. उपलब्ध पुरावे पाहता असलाच तर तो दुसरा थांबा होता. दोन -तीन पिढ्यानंतर शुद्रांच्या राज्यातून वैदिक धर्मीय पुर्वेकडे सरकू लागले. या दरम्यानच्या काळातच त्यांचा व्रात्यांशीही संपर्क आला असावा. याच काळात अनेक शूद्र ते व्रात्यही वैदिक धर्मात प्रवेशलेले दिसतात. त्यामुळेच काही नव्या देवतांचा समावेश ऋग्वेदाच्या अंतिम भागात झालेला दिसतो. कुरुंचा राजाश्रय मिळाल्याने त्यांना आपले ग्रांथिक कार्य पुर्ण करीत धर्माला शिस्तबद्ध स्वरुप देण्यास मदत झाली. येथे त्यांनी धर्मप्रसाराची मोहिम हाती घेण्यासाठी प्रसारकांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. भागवत व ब्रह्मांड पुराणात येणा-या कथांवरुन ही प्रक्रिया समजून घेता येते. या प्रक्रियेलाच वैदिक शाखा निर्मिती असे म्हणतात. सर्वात आधी पैल, मग इंद्रप्रमती व बाष्कल, सत्याश्रव, सत्यहित वगैरे २७ मुख्य प्रचारक (शाखा) निर्माण झाले व त्यांनी उत्तरेतील विविध भागांत धर्मांतराची मोहिम सुरु केली. दक्षीणेत जाणारा अगस्ती हा त्यांचा शेवटचा मुख्य प्रचारक. ऋग्वेदातील ऋचाकर्ता अगस्ती व हा अगस्ती एकच नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असे असले तरी अगस्तीवर तंत्रांचाही प्रभाव असावा असे दाक्षिणात्य परंपरेवरुन दिसते. तमिळ पुराकथांनी त्याला शिवाशी आणि श्रीविद्या तंत्रपरंपरेशी जोडले आहे.  

‘दाक्षिणात्यांनी वैदिक अगस्त्याचे हिंदुकरण कसे केले हे याचे एक वेगळेच उदाहरण आहे. असे असले तरी अगस्त्याने दक्षीणेत वैदिक धर्म व वर्णसंस्था पोहोचवण्यात यश मिळवले. दक्षीणेतील अगस्त्याचे आगमन हे इसपूच्या पहिल्या ते इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या दरम्यानचे आहे हे आपल्याला संगम साहित्यात तोवर कोठेही वैदिक तत्वही आढळत नसल्याने निश्चयाने म्हणता येते. 
वैदिक धर्म हिंसेने नव्हे तर काही घटकांतच अणि तोही प्रचार व धर्मांतराने पसरला. उपनयन विधी हा मुलचा धर्मांतराचा विधी होता असे स्पश्झ्ट आहे कारण हा विधी ऋग्वेदात कोठेही येत नाही. हा काळ सरासरी इसपू हजारच्या आसपासचा असावा असा अंदाज विद्वानांनी व्यक्त केला आहे. येथे हेही लक्षात घ्यायला हवे की कुरु-पांचालादि राज्यांमधे तेंव्हा महाभारतात येणा-या राजांचे दुरचे वंशज राज्य करीत होते. भारत कथा (म्हणजे युद्धादि प्रकरण) येथवर लोककाव्यांतच जीवंत होते. कुरु वंशाची वंशावळ धुसर झाल्याने फार पुढे वैदिकांनी महाभारताचे वैदिकीकरण करतांना अनेक वैदिक व्यक्तींची नांवे विस्मृत झालेल्या राजांच्या जागी टाकुन दिली त्यामुळे महाभारतात येणारी वंशावळ ही बरीच बनावट असल्याचेही आपल्याला दिसून येते. 

वैदिक धर्माचा प्राणगाभा म्हणजे यज्ञ होय. ब्राह्मण ग्रंथांनी आपल्या धर्माचे आकर्षण वाढवण्यासाठी यज्ञपद्धती अत्यंत काटेकोर व सामुहिक पद्धतीने चालणारी बनवली. यात काही यज्ञ तर बारा वर्षही चालत.  भारतातील भक्ती संकल्पनेशी परिचय झाल्याने मुर्तीपूजा जरी वैदिकांना त्याज्ज्य असली तरी त्यंनी अग्निचयन विधीच्या रुपाने अग्नीलाच काल्पनिक पुरुषरुपात पहायला व श्येन पक्ष्याच्या आकारात बनवायला सुरुवात केली. स्थानिकांच्या श्रद्धांचे असे वैदिकीकरण केल्याखेरीज धर्म प्रचार अशक्यच होता हे उघड आहे. तोवर विदेहापर्यंत पोहोचलेल्या वैदिक प्रचारकांना सामना करावा लागला तो प्रगल्भ व परिणत स्थितीत पोहोचलेल्या सांख्य विचारांचा. भारतीय सहिष्णुच असल्याने नव्या कल्पना न धिक्कारता त्यांच्याशी चर्चा करण्याचा, समजावून घेण्याचा प्रयत्न असे. विदेहात यज्ञ की ब्रह्म (वैदिक अर्थ मंत्र तर विश्वनिर्मितीचे गुढ तत्व हा औपनिषदिक अर्थ, यक्ष शब्दाचा पर्यायी शब्द.) या चर्चांतून अनेक उपनिषदे निर्माण झाली. ही वैदिकांनी नव्हे तर हिंदुंनी निर्माण केली. त्यात दोन तत्वांचा समेट करण्याचाही प्रयत्न दिसून येतो. वैदिकांनीही वेदमाहात्म्य सांगणारी उपनिषदे लिहिणे स्वाभाविक होते. आपल्याकडे ख्रिस्त्यांनी "ख्रिस्तपुराण" लिहिले तसेच हे होते. यात वैदिक धर्माचा विजय झाल्याचे दिसत नाही. उलट त्यांना अनेक अवैदिक तत्वधारांना स्विकारावे लागले. येथेच मुळचा वैदिक धर्म आणि नंतरचा वैदिक धर्म यात फरक पडायला सुरुवात झाली. 

मगध प्रांतात वैदिकांना दिर्घकाळ प्रवेश नव्हता हे आपण आधी पाहिलेलेच आहे. पण पुढे मात्र मगधातील प्रबळ राजांनी जरी वैदिकांना राजाश्रय दिला नसला तरी स्थानिक पुरोहित, धनाढ्य व्यक्ती व जमीनदारांत हा धर्म ब-यापैकी पसरल्याचे आपल्याला दिसते. सामुहिकपणे चालणारे व गुढतेचे वलय दिल्याने यज्ञ व वैदिकांची दैवी बनवली गेलेली वर्ण व्यवस्था याचा प्रभाव काही घटकांवर पडणे स्वाभाविक होते. राजा-रजवाड्यांनाही धर्म बदलला नसला तरी यज्ञही करवून घेण्यात व वैदिक पुरोहितांना दान-दक्षीणा देण्यात हात आखडता घेतला नाही. पण वैदिक देवतांची पुजाही स्विकारली नाही. भारतीय असुर राजांनी हिंदू देवी-देवतांचीच काय ती पूजा चालू ठेवली. पुजा व तंत्रेही व्यक्तीगत होती. सार्वजनिक मंदिरे बांधण्याची प्रथा आली नव्हती. घरातील देव्हारे एवढीच त्यांची पुजास्थळे होती. त्यामुळे हे यज्ञ एक प्रकारे आकर्षणाचा विषय बनल्यास नवल नाही. यज्ञांचे स्तोम मात्र फार वाढलेले दिसते. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून जैन, बौद्ध व चार्वाक परंपरा वैदिक व्यवस्थेला ठामपणे विरोध करायला अवतरली. वैदिकांना विरोध मगधातुनच सुरु झाला कारण अन्यत्र या धर्माचे अस्तित्वच नव्हते. मागधी जनता प्रथमपासून धर्मांच्या बाबतीत सहिष्णू असल्याने या विरोधी परंपराही त्यांनी समजावून घेतल्या आणि वैदिक धर्माचा तेथुन जवळपास जो अस्त झाला तो पार शुंगांची अल्पकालीन का होईना सत्ता येईपर्यंत टिकून राहिला. नंतर काही प्रमानात काण्वांनी या धर्माला आश्रय दिला. दक्षीणेत सातवाहनांसाठी काही यज्ञ केले खरे पण सातवाहनांनी त्या धर्माला राजाश्रय दिला नाही. त्यांनी बौद्धांना जशी मदत केली तशीच वैदिकांनाही. त्यामुळे महाराष्ट्रातही वैदिक धर्माला हातपाय पसरायला बराच वेळ लागला. बलाढ्य गुप्तांनी चवथ्या शतकात मात्र संपुर्ण राजाश्रय दिल्याने या धर्माचा बोलबाला तर वाढलाच या धर्मात जाणा-या हिंदुंची संख्याही वाढली. 

 भारतातील वैदिक धर्मियांचा प्रवेश ते नंतर उत्तरेत झालेला विस्तार याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. वैदिक येण्यापुर्वीच हिंदुंचे तत्वज्ञान व धर्म पुर्ण स्थिरस्थावर होते. रामायण-महाभारताच्या कथा वैदिक येथे प्रवेशण्यापुर्वीच घडून गेल्या होत्या. सांख्य-वैशेषिक तत्वज्ञान परिणत अवस्थेस पोहोचले होते. मुर्तीपुजा व तांत्रिक विधीविधान व साधनापद्धती सर्वत्र स्थिर होती. मगधात यक्षपुजकांची संस्कृती असल्याने जैन व बौद्ध धर्मातही ती अपरिहार्यपणे आली. वैदिकांनी मात्र यक्षपुजेचा, किंबहुना यक्षांचाच निषेध केला तो केवळ धार्मिक द्वेषातून हे उघड आहे.  अगदी पहिल्या शतकातील गाथा सप्तशती व अंगविज्जेवरुन शिव, उमा, कार्तिकेय, वासुदेव, संकर्षण या देवतांची तत्कालीन लोकप्रियता दिसून येते. कनिष्काच्या राबटक शिलालेखातही त्याने अफगाणी युद्धदेवता "नाना" मुळे आपल्याला साम्राज्य मिळाले आहे असे नमूद करत उमा, अहूर माझ्दा, माझ्ज्दुन, कुमार (कार्तिकेय), महासेन, विशाख आणि मिहिर यांचाही आदरपुर्वक उल्लेख केला आहे. १८ इसपुच्व्हे सहावे शतक ते इसवी सनाच्या जवळपास दुस-या शतकापर्यंत भारतभर जी नाणी मिळालेली आहेत त्यावर तांत्रिक प्रतीक चिन्हे, शिव, गणेश ाणि मैत्रेय बुद्धाच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. एकही वैदिक देवता साधी उल्लेखलीही गेली नाही. अपवाद फक्त इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट शिलालेख व अयोध्य येथील शुंगांचा शिलालेख आहे. नाणेघाट शिलालेखात सर्वात आधी पांचरात्र या तांत्रिक संप्रदायाच्या देवतांनाच प्रथम अभिवादन केलेले आहे. त्यामुळे सातवाहनांनी काही यज्ञ करवून घेतले (किंवा वैदिकांनी स्वत:हुन त्याच्यासाठी यज्ञ केले) असले तरी वासुदेव, संकर्षणास आणि कार्तिकेयास सर्वप्रथम अभिवादन केले असल्याने सातवाहनांनी वैदिक धर्म स्विकारलेला नव्हता हे स्वयंस्पष्ट आहे.

म्हणजेच आधी आश्रीत म्हणून आलेले वैदिक, शुद्रांच्या राज्यातच बरेचसे वेदसंकलन, लेखन करणारे वैदिक आणि म्हणूनच शुद्रांना ते वेगळे आहेत हे माहित असुनही त्यांना महत्वाचे स्थान देणारे वैदिक हा प्रवास होत असतांना भारतात सर्वत्र तंत्राधारित शैवप्रधान धर्माचे प्राबल्य होते. हे प्राबल्य आजेही टिकून राहिलेले आहे. फरक एवढाच पडलाय की वेद हेच हिंदु धर्माचे मुख्य स्रोत आहेत हे मानण्याचा चुकीचा प्रघात पडलेला आहे. वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगळा असल्याचे भानही हरपले आहे. वैदिकांमुळेच नंतर हिंदूमध्ये कसे गैरसमज पसरत गेले हा आपल्या सांस्कृतीक इतिहासाचा काळाकुट्ट टप्पा आहे. वैदिक वर्चस्वातुन बाहेर पडायला हवे पण ते हा इतिहास समजून घेतल्याखेरीज शक्य नाही. वैदिक येथे आले ते जेते म्हणून नव्हे तर शरणार्थी म्हणून आणि धर्म पसरला तो धर्मप्रचार व धर्मांतराने हे वास्तव समजावून घ्यायला हवे.
-संजय सोनवणी

(Publishd in Prutha Dwali issue)

Monday, July 16, 2018

वर्चस्ववादाला आव्हान!



मागच्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी परीक्षक होतो. त्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाला मी पुरस्कार दिला. त्यावेळी  विश्वंभर चौधरी नावाच्या एका विदुषकाने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे म्हणणे होते की, एका हिंदुत्त्ववाद्याच्या पुस्तकाला पुरस्कार दिलाच कसा? हे पुस्तक वाचायचीही त्यांना गरज वाटली नव्हती. शेवडेंनी लिहिलंय ना? मग त्यात काय वाचायचं? असा काहीसा सूर होता. असाच प्रकार मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्याबाबतही  सातत्यानं घडतोय. सोनवणी यांनी लिहिलंय ना? मग ते केवळ हिंदू धर्मात फूट पाडायचंच काम करतात. त्यांचं या विषयावरील लेखन कशाला वाचायचं असा अपप्रचार केला जातो.

हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे संजय सोनवणी यांचं ‘हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास’ हे पुस्तक नुकतंच पुण्यातील ‘प्राजक्त प्रकाशन’ने प्रकाशित केलंय. या पुस्तकात त्यांनी जे लिहिलंय त्यावर मोठी चर्चा होऊ शकते! किंबहुना तशी चर्चा व्हायला हवी. लोकमान्य टिळक यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक रथीमहारथींचे सिद्धांत संजय सोनवणी यांनी सप्रमाण खोडून काढले आहेत. हिंदू आणि वैदिक यांच्यातील फरक माहीत नसणार्‍यांना किंवा जाणीवपूर्वक ते दुर्लक्षित ठेऊ इच्छिणार्‍यांना हे पटणारे नाही. मात्र ज्यांना अभ्यास करायचाय, ज्ञान मिळवायचंय, सत्य शोधायचंय त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं.

आद्य शंकराचार्यही वैदिक नाहीत हे सोनवणी यांनी यात मांडलं आहे. आपला इतिहास पुराणकथांनी गढूळ झालेला असताना आणि आपण जे ऐकत आलोय तेच सत्य मानणार्‍यांना कदाचित हे रूचणार नाही; पण सत्यापासून फारकत का घ्यावी? सोनवणी यांच्यावर तोंडसुख घेणारे काही महाभाग त्यांच्या मुद्यांचा प्रतिवाद करून ते खोडून काढू शकत नाहीत आणि हे सत्यही स्वीकारत नाहीत. पुराणातली वाणगी (वांगी नव्हे!) पुराणात म्हणून काहीजण दुर्लक्षही करतील; पण याच्या तळाशी जाऊन चिकित्सा करायलाच हवी. 

यापूर्वी त्यांनी ‘जातीसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तकही लिहिले. ‘चपराक’ने प्रकाशित केलेले ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकही सिद्धीस नेले. घग्गर नदीलाच सरस्वती नदी समजणार्‍यांना सणसणीत चपराक दिली. या सर्व पुस्तकांचा सार म्हणजे प्रस्तुत पुस्तक आहे. आपल्याकडे संस्कृतलाच आद्य भाषा, देवभाषा समजून आपण मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. यावर ‘जिच्यावर संस्कार झाले ती संस्कृत’ इतकी साधी सोपी व्याख्या करून सोनवणी यांनी प्रकाश टाकला आहे. जर संस्कृत ही आद्य भाषा असती तर आपल्या खेड्यापाड्यातील म्हातारी-कोतारी लोक संस्कृतच बोलली नसती का? असा बिनतोड सवालही ते करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं नौटंकी करणार्‍या चमकोछाप लोकांनी हे समजून घ्यायला हवं.

आर्यवंश श्रेष्ठत्ववादाचा जन्म म्हणजे काळीकुट्ट किनार, हे मत ते ठामपणे मांडतात. रामायण-महाभारताचा काळ हा वैदिक भारतात येण्यापूर्वीचा हेही ठासून सांगतात. हे कुणाला पटेल किंवा पटणार नाही पण आपल्याला सत्य स्वीकारावेच लागेल. भारतीय संस्कृतीचा धावता आढावा, असूर संस्कृती, वेदपूर्व भारतीय असूर संस्कृती, वेदपूर्व तत्त्वज्ञान व विकास, वैदिक धर्माची स्थापना कोठे झाली?, सिंधू-घग्गर संस्कृतीची भाषा, बौद्ध-जैन ते सातवाहन काळ, वैदिक भाषा, पाणिनी, मनुस्मृती आणि कौटिल्याचा काळ, श्रेणी संस्था, विकास, उत्कर्ष, अधःपतन आणि वैदिक वर्चस्वाची सुरूवात आणि ब्रिटीश काळ - वैदिक वर्चस्वावर अधिकृत शिक्कामोर्तब अशा 11 प्रकरणातून त्यांनी हा व्यापक विषय अत्यंत अभ्यासपूर्ण रीतिने मांडला आहे. हिंदू धर्मावर होणारे आक्रमण, वैदिकांचा वर्चस्ववाद याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यामुळे वेदप्रामाण्याच्या नावावर काहीही ठोकून देणारे आपोआप उघडे पडले आहेत. 

‘सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच’ या सिद्धांताला संजय सोनवणी यांनी तडा दिला आहे. वैदिक व पाश्‍चात्य विद्वानांच्याच मतांवर अवलंबून असलेल्यांनी सत्य कधी पुढे येऊच दिले नाही. आपल्या नसलेल्या अस्मिता आणि खोटा अहंकार कुरवाळत त्यांनी हिंदू आणि वैदिक यांच्यात मोठी गल्लत केली. हा सगळा मामला काय हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचण्यावाचून गत्यंतर नाही. मनुस्मृती नेमकी का आणि कुणासाठी याबाबतचेही विवेचन या पुस्तकात आले आहे. सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भाषिक स्थित्यंतराचा एक मोठा पट उलगडून दाखवणे तसे जिकिरीचे काम. त्यातही पुस्तकाच्या केवळ 320 पानांत हे मांडणे म्हणजे तर शिवधनुष्यच! पण ते आव्हान संजय सोनवणी नावाच्या प्रतिभेच्या जागृत ज्वालामुखीने लिलया स्वीकारलं आणि ते इतिहासाशी, प्रामाणिकपणाशी तडजोड न करता, त्याच्याशी प्रतारणा न करता पूर्णत्वासही नेलं. आपल्या संस्कृतीची पाळंमुळं समजून घ्यायची असतील तर कोणतेही पूर्वग्रह न बाळगता हे पुस्तक तटस्थपणे वाचायला हवं, त्यावर चिंतन करायला हवं. 

हिंदू आणि वैदिक हे दोन्ही धर्म वेगळे कसे आहेत याचा पुरातन काळापासूनचा त्यांनी घेतलेला धांडोळा कुणालाही अचंबित करणारा आणि अभ्यासकांना व्यापक दृष्टी देणारा आहे. वैदिक धर्माचा आणि हिंदू धर्माचा काळ यातील तफावतही त्यांनी अधोरेखित केली आहे.  सूर आणि असूर संस्कृतीतील फरक सांगितला आहे. पौराणिक कथामधून सत्याशी घेतलेली फारकत दाखवून दिली आहे. दोन्ही धर्मातील श्रद्धा, अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी परंपरा, आचार-विचार, संस्कृती, संघर्ष या सर्वाची नेटकी आणि नेमकी मांडणी त्यांनी या पुस्तकात केलीय. तंत्र-मंत्र, देवादिकांच्या प्रतिमांचे पूजन, त्यातून बनवली गेलेली मिथके यावरही त्यांनी प्रभावी भाष्य केलंय. भाषा गटांचे प्रश्‍न मांडलेत. या भाषांचे जाळे कसे निर्माण झाले, प्रांतिक भाषा कशा विस्तारत गेल्या हेही साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. 

‘विषमतेचे तत्त्वज्ञान असलेले वैदिक धर्मतत्त्व की समतेचे स्वतंत्रतावादी तत्त्वज्ञान असलेले हिंदू धर्मतत्त्व ही निवड हिंदुंना डोळस व नीटपणे करावी लागेल. वैदिकांनाही आपल्याच धर्माचा पुनर्विचार करणे आवश्यक बनून जाते’ असे मत संजय सोनवणी या पुस्तकातून मांडतात. त्यावर प्रत्येकानं विचार केलाच पाहिजे.

हिंदू धर्म आपल्या कृषी संस्कृतीतून जन्माला आलाय आणि अफगाणिस्तानात स्थापन झालेला व विस्थापितांच्या माध्यमातून धर्मप्रसारासाठी आलेला वैदिक धर्म आपल्याकडे नंतर स्थिरावलाय याकडं ते लक्ष वेधतात. या पुस्तकाचा गाभाच हा असल्यानं या दोन्ही धर्मधारांची चिकित्सा त्यांनी या पुस्तकाद्वारे केलीय. वैदिकांचा वर्चस्ववाद कसा वाढत गेला आणि त्यात हिंदू धर्म कसा अडकत गेला हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. धर्मइतिहासावर सुस्पष्ट प्रकाश टाकतानाच वर्चस्ववाद झुगारून देण्याचं मोठं धाडस संजय सोनवणी यांनी या पुस्तकाद्वारे दाखवलं आहे. वैदिक-अवैदिक या विषयाचा ध्यास घेऊन, अहोरात्र अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक साकारलं आहे. आम्ही मित्रमंडळी त्यांना गंमतीनं ‘वैदिक धर्माचे शंकराचार्य’ म्हणत असलो तरी या विषयाची व्याप्ती आणि त्यांचा त्यातील व्यासंग किती मोठा आहे ते हे पुस्तक वाचल्यावर समजते. त्यांच्या भावी लेखन प्रवासाला आणि साहित्यातील संशोधनाला आमच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक 'पुण्य नगरी, १५ जुलै २०१८)

Monday, March 19, 2018

आर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र


आर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र

(महाराष्ट्र प्रबोधिनी आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र इतिहास परिषदेत मांडलेले विचार.)

मिथक निर्मिती आणि तिचा वापर भारतीयच करतात असे नाही. युरोपनेही प्रबोधन काळत एक वंशवादी मिथक बनवले. ते म्हणजे आर्य मिथक. आणि ते का निर्माण केले तर केवळ युरोपियनांचा तुलनेने अर्वाचीन असलेला इतिहास पार मागे नेण्यासाठी आणि आम्ही संस्कृतीचे निर्माते आहोत हे जगावर बजावण्यासाठी! या कार्यासाठी युरोपियन विद्वानांच्या पिढ्यामागून पिढ्या खपल्या. आर्य सिद्धांत वांशिक आधारावर नसला तरी भाषिक आधारावर जीवंत ठेवलेला आहे तो आहेच. या वंशिक आणि श्रेष्ठतावादात भारतातीलही तथाकथित "आर्य" अतिउत्साहाने उतरले होते आणि त्या वैदिक आर्यांचे मूळ पार आर्क्टिक प्रदेशात शोधू लागले होते. त्यातुनच मग द्रविड वंश/भाषा गट आणि मुलनिवासी हे नवी मिथके जन्माला घातली गेली. हेतू अर्थात एकच....श्रेष्ठत्वतावाद आणि वर्चस्ववाद!

प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्ट किनार आहे व ती म्हणजे आर्यवंश श्रेष्ठत्वता वादाचा जन्म. हितलरने याच सिद्धांताचा गैरफायदा घेत लक्षावधी ज्युंची कत्तल केल्यानंतर हाच वाद नव्या नांवाने आणला गेला व तो म्हणजे पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचा गट व त्यांची विस्थापने. केवळ नांव बदलले तरी अर्थ तोच राहिला.

याचे कारण म्हणजे युरोपियनांना सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्या सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने "गोरेतर सारेच हीण आहेत" असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच आर्यांची मुळभुमी आहे असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता अशी मांडणी केली. (वर्तक अथवा ओक काही फक्त भारतातच नसतात!) रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला.

पण पुढे भारत ही आर्यांची मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. याला कारण ठरला आर्य संकल्पनेला वंश सिद्धांताची जोड देणारा म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणारे आणि बंडातील शिपाई हे आर्य कसे असु शकतील असा प्रश्न उपस्थित केला. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. मूळ सिद्धांताचा गाभा मात्र तोच राहिला.

भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला. महात्मा फुलेंनी आर्यभट आद्य आक्रमक व त्यांनी बळीस्थानावर (भारतावर) आक्रमण केले अशी मांडनी करुन प्रतिक्रांतीचा पहिला धक्का दिला.

मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. किंबहुना वंश सिद्धांतच अशास्त्रीय आहे असे जगातील सर्वच मानव आनुवांशिकी शास्त्रज्ञ मानतात. युनेस्कोने १९५२ साली जागतीक मानववंश शास्त्रज्ञांची बैठक घेऊन एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात पृथ्वीवरील समस्त मानवजाती ही होमो सेपियन या एकाच उत्क्रांत मानवी प्रजातीचे वंशज आहेत व जेही स्थानिक रंगादि भेद दिसतात ते पर्यावरणीय कारनांनी हे स्पष्ट केले. तरीही वंश सिद्धांत आर्य भाषागट सिद्धांताच्या माध्यमातून जीवंत ठेवला गेला तो आजतागायत. पण हा इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. भाषांच्या वितरणासाठी मानवी स्थलांतरांचीच आवश्यकता नसते तर भुशास्त्रीय कारणेही समान भाषा निर्मितीचे कारण असू शकतात. तरीही स्टीव्ह फार्मरसारखे विद्वान आजही आर्य स्थलांतर सिद्धांताचा पाठपुरावा करीत असतात. भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली.

याची मिथकीय प्रतिक्रिया म्हणजे आधी "आक्रमक आर्य" म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य हे मुळचे भारतातलेच हे सांगून लागले. सिंधू संस्कृतीचे विध्वंसक वैदिक आर्यच ते सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य असे कोलांटउडी सिद्धांत भारतात हिरिरीने जन्माला घातले जाऊ लागले. आर्य भारतातुनच (हरियानातून) पश्चिमेकडे गेले व युरोपपर्यंत जात भाषा आणि संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा भारतातील धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच...त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. याही मिथकाला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता तर जे पुरावे आक्रमण सिद्धांतासाठी वापरले जात होते तेच पुरावे प्रसंगी तोडमोड करत अथवा त्या पुराव्यांनाच नवा अर्थ देत "भारताबाहेर" हा सिद्धांत बनवण्यात आला.

या आर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जनक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच वैदिकेतरांनी ) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म त्यातुनच झाला. एका मिथकातून किती मिथके निर्माण होतात त्याची ही फार छोटी झलक आहे. यात ज्ञान, विज्ञान, इतिहासाचे अन्वेषन व त्या आधारित मांडनीची आवश्यकता नसते हे उघड आहे. किंबहुना छद्म विज्ञानाचाच उद्रेक यात होत जातो. मिथके मानवी भावनांना कुरवाळण्यासाठी सहायक ठरली तरी त्यांचा अतिरेक विनाशकच असतो याचे भान मानवी समाजाला आलेले आहे असे नाही. भिमा कोरेगांव सारख्या मिथकांतून आत्मभान मिळवून देणे हा हेतू असला तरी आत्मभानाची जागा सामाजिक तिढ्याने व विद्वेषाने घेतली असल्याचे आपल्याला दिसेल. मानवी वंशाचा इतिहास अर्थातच या अभिनिवेषी मिथकांतच हरवला जाणे स्वाभाविक होते! बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात हा वांशिक नव्हे तर धार्मिक विभेदाचा संघर्ष आहे असे लक्षात आले असले तरी त्यांनी नंतर या सिद्धांताचा पाठपुरावा केला नाही.

पण वास्तव हे आहे की वैदिक धर्म भारतात येण्यापुर्वीही सिंधु काळापासुन भारतात स्वतंत्र सुफलनविधी युक्त तंत्राधारित प्रतिमापुजकांचा शैवप्रधान धर्म होताच. त्याचे विपूल पुरावे उपलब्ध आहेत. आजही हिंदू हाच धर्म पाळतात. त्यांच्या धर्माचरनावर कसलाही वैदिक प्रभाव नाही. त्यांचा धर्म जसा होता तशीच समाजव्यवस्था व राज्यव्यवस्थाही होती. विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या मुठभर वैदिक आश्रीतांच्या येथील व्यापक संस्कृतीचा ताबा घेणे शक्यच नव्हते. भारतात आलेल्या या वैदिकांना प्रथम सिंधु नदीकाठच्या शूद्र टोळीने आश्रय दिला. या टोळीचे उल्लेख महाभारत, विष्णुपुराण ते डायोडोरससारखा अलेक्झांडरचा इतिहासकारही करतो. पुढे वैदिकांनी एका प्रथम भेटलेल्या टोळीच्या नावावरुन समस्त भारतातील जमातींना सरसकट शूद्र संबोधले. प्रत्यक्षात भारतात त्यावेळी असंख्य टोळ्या वावरत होत्या. याचे पुरावे मनुस्मृती जशी देते तसेच अंगविज्जा हा कुशानकालीन ग्रंथही देतो. जेही वैदिक धर्माचे नव्हते त्यांना शूद्र अथवा म्लेंछ म्हणायची पद्धत वैदिकांनी रुढ केली. त्यांच्या दृष्टीने शक, हुण, कुशाणही शुद्रच होते. म्हणजेच जेही वैदिक नव्हते ते शुद्र होते. म्हणजेच शुद्रांचा धर्म वेगळा होता. तो आजही आहे. यज्ञ प्रधान वैदिक धर्म येथे काही प्रमानात धर्मांतराने पसरला. दक्षीण भारतात दुस-या शतकापर्यंत या धर्माला स्थानही नव्हते. मनुस्मृती मुळात वैदिकांच्या अंतर्गत व्यवहारांचे नियमन करण्यासाठी इसपु आठवे शतक ते इसवी सनाचे चवथे शतक या विस्तृत काळात लिहिली गेली. याच काळात असंख्य शुद्र (म्हणजे वैदिकेतर हिंदू) राजे झाले. ही स्मृती लागु असती तर असे कसे झाले असते हा साधा प्रश्न आमच्या विद्वानांना पडला नाही. पण तरीही मनुस्मृती समस्त हिंदुंसाठी लिहिली हे अजुन एक मिथक ब्रिटिश काळात जन्माला आले आणि त्याचे बळी आधुनिक हिंदू ठरले.

वर्ण ही वैदिक धर्माची व्यवस्था. ही व्यवस्था उतरंडीची व कठोर होती. जाती या मुळच्या व्यवसायाधिष्ठीत. सैल आणि परिवर्तनीय. लोखंडाचा शोध लागत नाही तर लोहार येणार कोठुन? हाच प्रश्न सर्व जातींबाबत लागु आहे. दहाव्या शतकापर्यंत तरी जातीबदल सहज होता. तो नंतर अनेक कारणांनी कठीण झाला तरी अशक्य नव्हता. वर्ण आणि जाती यांच्यात काहीएक संबंध नसता तो जोडल्यामुळे अजुन एक गोंधळ निर्माण झाला आणि हिंदुंमध्ये नव्या न्युनगंडाची सोय लावण्यात आली. हिंदू धर्माचा जो पाया त्या समताधिष्ठित तंत्रांना बदनाम करण्यात आले. सांख्यादि तत्वज्ञानावर वैदिक कलमे करीत त्यांना हिंदुंपासुन दूर नेले. आणि हे काम वैदिक धर्मात घुसलेल्या धर्मांतरीत हिंदुंनीच केले हे अधिक वाईट झाले. हिंदुंनी या धार्मिक आक्रमनाला प्रबळ विरोध केला नाही याला हे धर्मांतरीत लोक कारण आहेत.

आज बहुजनवादी चळवळी अपयशी ठरत आहेत कारण त्याही मिथकांत मग्न आहेत. जातीसंस्थेचे जन्मदाते, संस्कृतची निर्मिती, भारतीय संस्कृतीचे मुलस्त्रोत वगैरे महत्वाच्या बाबीच मुळात वैदिक आर्य श्रेष्ठत्वतावादी मिथकांच्या गडद धुक्यात हरवलेल्या आहेत आणि त्यामुळे अज्ञानमुलक वादांची आपल्याकडे कमतरता नाही. खोटे भ्रम. खोटे वर्चस्ववाद आणि खोटे न्युनगंड यांचीच आपल्या समाजव्यवस्थेत चलती असल्याने चळवळी आधुनिक काळात एकाही सामाजिक समस्येचे ख-या अर्थाने निर्दालन करू शकलेल्या नाहीत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर अथवा आर्य-अनार्य हा वाद नसून तो सर्वस्वी धार्मिक भेदातून निर्माण झालेला वाद आहे. वैदिकांसाठी वेदोक्त आणि हिंदुंसाठी (शुद्रांसाठी) पुराणोक्त हे धार्मिक विभाजन स्पष्ट आणि उघड आहे असे असुनही दोन धर्मांना एकच समजल्याने असंख्य सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुळात दोन धर्म व त्यांचे सामाजिक विचार वेगळे आहेत हे समजावून घेणे ही तातडीची गरज आहे.

आर्यवाद हा भारतीयांसाठी खरे तर वैदिक वाद आहे. तो एक स्वतंत्र धर्म आहे. हा संघर्ष वांशिक नाही आणि जातीयही नाही. वेदपुर्व कालापासून चालत आलेला हिंदू धर्म आणि वैदिक धर्म यातील हा संघर्ष आहे. आणि त्याचे निराकरण धार्मिक वास्तव समजावून घेण्यानेच होईल. वर्ण व जातींचा काहीएक संबंध नसल्याने सर्व जाती समान आहेत आणि त्यांचा समतेनेच सन्मान करणे हिंदुंसाठी आवश्यक आहे. आज बहुजनीय चळवळींना आपल्या तत्वज्ञानाचा मुळापासुनच विचार करावा लागणार आहे तो यामुळेच.

-संजय सोनवणी

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...