Showing posts with label प्रश्नोपनिषद.... Show all posts
Showing posts with label प्रश्नोपनिषद.... Show all posts

Friday, June 23, 2023

सारे काही गरजांपोटीच?

  


 मनुष्याची प्रगती ही आजवर त्याच्या मानसिक व भौतिक गरजांशी जोडली गेलेली आहे. आपण म्हणतो, एकविसाव्या शतकात माणूस प्रगत अवस्थेत पोहोचला आहे, ज्ञान- विज्ञानाने आजवरचा कळस गाठला आहे आणि याहीपुढच्या क्षितीजापार त्याला धाव घ्यायची आहे. पुरातन मानव मात्र अविकसित होता असा दावा बिनदिक्कतपणे केला जातो. मनुष्याचा मेंदू उत्क्रांतीच्या नियमाने विकसित होत जात आज सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे असे मानून आदिमानवाच्या अविकसिततेशी त्याचे पुरेसे उत्क्रांत नसण्याशी संबंध लावला जातो. असे करत असताना आपण अनेक मुलभूत बाबींचा विचार केलेला नसतो हे उघड आहे. आजची वैद्न्यानिक प्रगती ही माणसाचा मेंदू उत्क्रांत झाला म्हणून झाली कि त्याच्या बदलत्या सामाजिक परिप्रेक्षात कालनिहाय निर्माण झालेल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी झाली हा खरा प्रश्न आहे.

जेंव्हा या धरतीवर मानव अस्तित्वात आला तेंव्हा त्याच्यापुढचे प्रश्न वेगळे होते. प्रकृती आणि अन्य प्राणी प्रजातीशी संघर्ष करत स्वत:चे अस्तित्व टिकवणे ही त्याची मुलभूत गरज होती. त्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्याने जे शोध लावले त्यांचा विचार केला तर आजचा मानव उलट अडाणी वाटू लागेल. आदिमानवाने निसर्गाने न दिलेली शस्त्रे आपल्या भवतालातील उपलब्ध साधनसामग्रीचा अभ्यास करून पाषाण, हाडे, लाकूड यापासून निर्माण केली. थंडी-उन-वा-यापासून रक्षण करण्यासाठी जनावराची कातडी ते लोकर/सुत यांना विणून वस्त्रांचा शोध लावला. अग्नीचा उपयोग संयतपणे करून जीवन सुधरवण्यासाठी कसा करायचा याचा मार्ग शोधला. सर्वात महत्वाचा शोध म्हणजे भाषेचा शोध! निसर्गाने दिलेल्या स्वरयंत्राचा उपयोग करून आपण निरनिराळे ध्वनी निर्माण करू शकतो आणि त्या ध्वनींचे क्रम ठरवू, त्यातून आपण अर्थपूर्ण ध्वनी (शब्द) निर्माण करू शकतो हा त्याचा शोध क्रांत्रीकारी नव्हता असे कोण म्हणेल? आज भाषा ही सर्वांना सहजसुलभ उपलब्धी वाटते कारण त्यात असलेले आदिमानवाचे योगदान पूर्ण विस्मरणात टाकले गेले आहे. पण भाषा ही त्याची गरज होती. धोक्याचे इशारे देणे, शिकार कोठे आहे हे सांगून त्यासाठी शिकार कशी करता येईल याबाबत निर्णय घेऊन सामुहिक हालचाल करणे, अन्य सामुहिक व व्यक्तिगत सुचना/आदेश देणे/घेणे यासाठी भाषेची त्याला नितांत गरज होती आणि ती त्याने प्रयत्नपूर्वक बनवली. जेंव्हा पहिल्यांदा एखादा शब्द कोणी बनवला असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे टोळीतील लोकांना शिकवणेही तेवढेच महत्वाचे होते. आद्य भाषा ही अर्थात गरजेपुरतीच मर्यादित असणार हेही उघड आहे. जसजसे मानवाने अधिक क्षेत्र व्यापले. बाह्य जगच नव्हे तर आंतरिक मानसिक जगातील कल्पना, भाव-भावनांनाही अर्थपूर्ण शब्द देण्याची गरज निर्माण झाली आणि त्यापोटी भाषाही प्रगत होत राहिली.

तेंव्हा मानवाची लोकसंख्या मुळात कमी होती. अन्य प्राणीविश्व मात्र धरतीवर राज्य करत होते. या विश्वापेक्षा आपले मानवी विश्व श्रेष्ठ आहे याची त्याला जसजशी कल्पना येऊ लागली तसतशी त्याने व्यवस्था बनवायला सुरुवात केली. आदिम धर्मही त्यातूनच तयार झाले. सामाजिक नीतीनियम असले पाहिजेत याची जाणीव त्याला झाली आणि आद्य नितीतत्वे व धर्म-नीती-तत्वे त्याने शोधली. नुसती शोधली नाहीत तर त्यांचा कटाक्षाने वापर करायला सुरुवात केली. जशी लोकसंख्या वाढली त्याने राज्य, गणराज्य या संकल्पना शोधून सामाजिक व्यवस्थेला राजसत्तेचेही अधिष्ठान दिले.

सामाजिक मानसिकतेची जी गरज तीच पूर्ण करण्यासाठी शोध लावले जातात. मृत्युनंतर काय हा प्रश्न भेडसावत असल्याने त्याने सुव्यवस्थित दफन पद्धती शोधल्या. इजिप्तमधील गगनचुंबी पि-यामिड्स, जे बांधणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही शक्य नाही ,ते बांधण्याची नुसती कला नव्हे तर शास्त्रही त्याने विकसित केले. ममीफिकेशनच्या तंत्राचा शोध लावला. पि-यामिड्स म्हणजे दफनस्थाने  ही तत्कालीन समाजाची मानसिक गरज होती आणि तिच्या पूर्ततेसाठी तो आवश्यक शोध लावत राहिला. आज ती गरज उरली नाही म्हणून तसे किंवा त्यापेक्षा अधिक वरचढ तंत्रज्ञान अस्तित्वात आले नाही, विकसित झाले नाही,. याचा अर्थ आजचा मानव अविकसित आहे असाही होत नाही. खरे तर आजचे बरेचसे तंत्रज्ञान हे प्राचीन तंत्रद्न्यानाचे सुधारित प्रारूप आहे असे म्हणावे लागते.

शेतीचा शोध हा तर मानवी इतिहासातील अजून एक महत्वाचा क्रांतीकारी टप्पा. या शोधाने मानवी जीवन समग्र बदलले. भटका मानव स्थिर झाला. शेतीच्या शोधामुळे शेतीउपयोगी साधनांचेही त्याने शोध लावले. उपयुक्त उत्पादने करण्यासाठी मुळात ती कशी आणि कशापासून तयार करायची यासाठी आवश्यक कल्पकता आणि बुद्धी त्याच्यात नसती तर हे झाले नसते. शेतीमुळे मानवी भाषा अधिक प्रगत झाल्या. हजारो नवे शब्द बनवावे लागले. त्याना अर्थ द्यावा लागला. वाक्याचा अर्थ थेट पोचवण्यासाठी आणि त्यात अर्थबदल होऊ नये यासाठी त्याने प्राथमिक का होईना व्याकरणाचा शोध लावला. शेतीमुळे जंगले क्रमश: नष्ट होत गेली आणि मानवी लोकसंख्या वाढत गेली हे एक वास्तव आहे. अन्य प्राणीविश्व या संघर्षात टिकू न शकल्याने त्यांचीही संख्या रोडावत गेली. असंख्य प्राणीप्रजाती कालौघात नष्ट झाल्या. ही मानवी प्रज्ञेची मोठी हार आहे असेही म्हणता येईल. पण मानवाने जेही काही केले ते तगून राहण्याच्या अनावर गरजेपोटी केले हे विसरता येत नाही.

औद्योगिक क्रांतीही गरजेपोटीच झाली. सारे शोध तत्कालीन युरोपियन मानसिक गरजाधारित झाले. अधिकाधिक उत्पादन, सर्वत्र विक्री, त्यातही मक्तेदारी ही भांडवलदारच नव्हे तर श्रमिकांचीही गरज बनली. या गरजेपोटी नवनव्या सामाजिक तत्वज्ञानांचाही जन्म होऊ लागला. सामाजिक संघर्षाची परिमाणे बदलली. आपापले वर्चस्व टिकवण्यासाठी नवे सामाजिक सिद्धांत जन्माला घातले जाऊ लागले कारण नव्या भांडवली आणि साम्राज्यशाही मनोवृत्तीची तीही गरज होती. आज नवे तंत्रज्ञान म्हणून जेही काही आपल्या माथ्यावर मारले जात आहे, तेही भांडवलशाही प्रवृत्तीतून. किंबहुना आमच्या प्रगल्भतेच्या व्याख्याच बदलून गेलेल्या आहेत. आता सामुहिक गरजांपेक्षा व्यक्तीकेंद्रित गरजांनाच प्राधान्य दिले जाते, किंबहुना व्यक्तिवादी असणे हीच एक गरज बनवली गेलेली आहे.

इतिहासात आदीमानवाने जे सर्वोपयोगी शोध लावले तसे शोध आज लावले जाण्याची शक्यता नाही. कारण आजच्या मानवाच्या गरजाच मुळात बदललेल्या आहेत. शोधही त्या गरजांच्या पूर्तीसाठी लावले जात आहेत. आज कोणाला कैलास लेणे बनवायची गरज वाटत नाही, मग त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कशाला शोधले जाईल? हो, गरजा निर्माण करण्यासाठी मात्र नवनवे शोध लावले जातील. तसे शोधही मानवी जगाची अपरिहार्य गरज बनून जाईल. त्यासाठीच आपल्याला नेमके काय हवे हे समजण्यासाठी आजच्या मानवाने मुळात आपल्याच गरजा निश्चित केल्या पाहिजेत!

-संजय सोनवणी 

Saturday, June 3, 2017

स्वतंत्रतावाद की समाजवाद?


Inline image 1


जागतिकीकरणाने जग जवळ येत असले तरी प्रत्येक राष्ट्राच्या, म्हणजेच राष्ट्रांतील उद्योगसमुहांच्या प्रेरणा अधिक स्पर्धाशील असल्याने जगात सर्वत्र एक प्रकारचे तुंबळ आर्थिक युद्ध सुरू असते. स्पर्धेमुळे उत्पादनांच्या किंमती कमी होत जातील व त्याचा फायदा ग्राहकांना, म्हणजेच जागतिक नागरिकांना होईल हा एक आशावाद होता तो सफल मात्र झाला असल्याचे दिसत नाही. याचे कारण म्हणजे एकाच प्रकारच्या उत्पादने करणा-या औद्योगिक संस्था सिंडिकेशन करतात आणि संगनमताने बाजारपेठेवर राज्य करतात असे एक चित्र आहे. सरकारांवरील त्यांचा प्रभावही त्यांना नफेखोरीसाठी मदतच करत असतो. आपण मागे एका लेखात कृत्रीम बुद्धीमत्ता आणि यंत्रमानवाचे संकट कसे गहिरे होत चालले आहे ते पाहिले. त्यातून आजच रोजगार कमी होतो आहे. भविष्यात काय स्थिती असेल?

खरे तर रोजगाराशिवाय लोकांच्या हाती खरेदीक्षमता येवू शकत नाही हे उघड आहे. जर खरेदीक्षमताच कमी झाली तर या उद्योगांची उत्पादने घेणार तरी कोण? त्यामुळे रोजगार कमी होणे हे ना राजसत्तेला परवडेल ना औद्योगिक जगाला. सध्याची बेरोजगारीची जागतिक परिस्थिती ही अल्पकालीन असेल असा अंदाज काही तज्ञ वर्तवतात. फार फार तर आज दृष्टीक्षेपात नसलेले नवे वेगळेच रोजगारही उत्पन्न होऊ शकतात. संगणक क्रांतीमुळे रोजगार कमी झाला नाही. उद्या जीही नवी तंत्रज्ञानातील क्रांती होईल ती नवा रोजगार निर्माण करेल. पण आपण भारतीय कृत्रीम बुद्धीमत्ता वा यंत्रमानव क्षेत्राशी तांत्रिक दृष्ट्या अद्याप तरी जोडलो गेलेलो नाही. किंबहुना आमच्या शिक्षणक्षेत्राच्या आवाक्यात अद्याप ही बाब आलेलीच नाही. यामुळे स्पर्धाशील जगात आम्ही येथेही मागेच राहणार की काय अशी रास्त शंका वाटणे स्वाभाविक आहे. 

आज राष्ट्रवाद हा अनेक कारणांनी बोथट झाला आहे. आर्थिक संस्थाने वेगाने राजकीय सत्तेला आपल्या कह्यात घेऊ लागली आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले. समाजवादी म्हणवणा-या देशांतही सामाजिक हित जपले जात नाही. शोषित वंचितांच्या संख्येत जेवढी घट गेल्या तीन दशकांत व्हायला हवी होती ती तर झाली नाहीच, उलट विषमता वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. म्हणजेच सर्वांगीण विकासाची भुमिका आता राजकीय सत्ता पार पाडतांना दिसत नाहीत. उलट नागरिकांवरची बंधने वाढत जात त्यांच्या स्वातंत्र्यावर आच येतांनाच आपल्याला दिसते. याचे कारण हे आहे की राजकीय सत्ता हती असणा-या व्यक्ती याही तेवढ्या स्वतंत्र राहिल्या नाहीत. अतिरेकी भांडवलशाहीत नागरिकांवरची बंधने वाढणे त्यांच्या हिताचे असते. समाजवाद/साम्यवाद त्याला अपवाद राहिलेले नाहीत. ते तर निरंकुशपणे नागरिकांवरची बंधने वाढवत नेतात. औद्योगिक संस्थाने या व्यवस्थेचे नकळत लाभार्थी होऊन जातात.

येथे हे लक्षात घेतले पाहिजे की राष्ट्रांची आर्थिक धोरणे नेमक्या कोणत्या तत्वप्रणालीवर चालतात त्यानुसार देश व देशातील नागरिकांची प्रगती अवलंबून असते. समाजवाद/साम्यवाद/भांडवलवाद वा त्यांचे कडबोळे करत आनली गेलेली मिश्र अर्थव्यवस्था हे सारे प्रकार जगभर वापरले जातात. भारताने समाजवाद आणत मिश्र अर्थव्यवस्थेला स्थान दिले. पण दोन्हींचे कडबोळे फसल्याने परमिट/लायसेंस राजमध्ये अडकलेल्या भारताचे एवढे आर्थिक दिवाळे निघाले होते की आपल्यावर सोने गहाण ठेवायची वेळ आली होती. भारतात खुले आर्थिक धोरण त्यामुळेच राबवावे लागले. ती आपली स्वेच्छा नव्हे तर अगतीकता होती. पण खुले धोरण राबवतांना उत्पादन उद्योगांना ज्या सवलती मिळाल्या त्या मुलभूत असलेल्या शेती/पशुपालन क्षेत्राला मिळाल्या नाही. त्यामुळे भारताचा पुन्हा एकदा पांगुळगाडा झाला आहे. आज भारतात कृषी क्षेत्रात जो आक्रोश उमटतो आहे तो याच धोरणांचे फलित आहे. 

महात्मा गांधींची आठवण येथे येणे क्रमप्राप्त आहे. समाजवादाचे ते कधीही समर्थक नव्हते. थोडक्यांच्या भांडवलशाहीलाही त्यांनी विरोधच केला. समाजवादात शासनाच्या हातात जास्त अधिकार जातात त्यामुळे नागरिकांवर अधिकाधिक बंधने घालणे सोपे जाते. महात्मा गांधी म्हणाले होते, "राज्याचे अतिरिक्त अधिकार व नागरिकांचे किमान स्वातंत्र्य ही बाब मी भयप्रद मानतो. राज्याला अधिक अधिकार असल्याने शोषण कमी झाल्यासारखे वाटेल पण यात व्यक्तिस्वातंत्र्याचा अपार संकोच होईल आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसेल. सरकारी नियंत्रणांमुळे भ्रष्टाचार तर वाढेलच पण सत्याची गळचेपीही सुरु होईल. काळाबाजार व कृत्रीम टंचाया वाढतील. एवढेच नव्हे तर व्यक्तीची स्व-सृजनप्रेरणाही यातून नष्ट होत तो स्वत:ला घ्याव्या लागणा-या मेहनतीपासूनही दूर पळेल. सर्वोच्च प्राधान्य हे व्यक्तीस्वातंत्र्याला असायला हवे त्याशिवाय सबळ समाजाचे उभारणी शक्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्य नाकारणे व शासन सर्वोपरी होणे हे मनुष्याच्या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध आहे. स्वत:चे "मन" नसलेला माणुस असून नसल्यासारखाच आहे....राज्याला शरण जाण्याएवढा व्यक्तिस्वातंत्र्याचा अनैतिक व अन्याय्य सौदा नसेल. मला कमी लोकांकडील अधिकतम अधिकार असलेले स्वराज नको आहे तर जेंव्हा नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होईल तेंव्हा सरकारचा विरोध करू शकण्याची सक्षमता असलेले नागरिक असतात तो देश हवा आहे." (३ नोव्हें. १९४७)

गांधीजींची समाजवादी नियंत्रणांबाबतची विधाने नंतर खरी झालेली आपल्याला पहायला मिळतील. भ्रष्टाचाराची एक जी व्यवस्था निर्माण झाली आहे ती सरकारच्या हाती असलेल्या अतिरिक्त अधिकारांमुळे व नको तेवढ्या हस्तक्षेपामुळे हे आपण सहज पाहू शकतो. व्यक्तीच्या आर्थिक प्रेरणा महत्वाच्या असून त्यांना वाव देणारी स्वतंत्रतावादी व्यवस्था असली पाहिजे नाहीतर मोजक्या औद्योगिक संस्थानांना बेलगाम विस्ताराच्या संध्या मिळतात पण नागरिकांच्या स्पर्धाक्षमता मारल्या जात नवभांडवलदार उदयाला येण्याची प्रक्रिया मंदावते. या अवस्थेत विषमता वाढणे, शोषित-वंचितांची संख्या वाढणे क्रमप्राप्त आहे. गांधीजींचा नेमका यालाच विरोध होता. भांडवलदार निर्मितीला पोषक वातावरण देत ते भांडवलाचे विश्वस्त म्हणून कसे वागतील यावर त्यांचा जोर होता. 

अर्थात स्वतंत्र भारताने समाजवादी अर्थरचना स्विकारली. गांधीजींच्या विचारांना पहिली तिलांजली तेथेच दिली गेली. आज आपणच नव्हे, तर जेथे जेथे समाजवादी व्यवस्था आहेत तेथेही परिस्थिती वेगळी नाही. या व्यवस्थेत मानवी स्वातंत्र्याची होणारी गळचेपी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. उदाहरणार्थ आपली घटना आपल्याला संपत्तीचा अधिकार देते. पण घटनेच्या परिशिष्ट नऊ नुसार तो अधिकार हिरावुनही घेते. जीवनावश्यक वस्तुंच्या कायद्यानुसार शेतक-याचा स्वउत्पादित शेतमालाचा भाव ठरवण्याचाही अधिकार हिरावून घेते. जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही निर्बंध येतात ते याच तत्वांमुळे. नवा उद्योग काढायचा असला तर अनेक परवानग्या मिळवण्यातच धन व शक्ती खर्च होते. अनेक जण मधेच माघार घेतात ते व्यवस्थेतील अंगभूत दोषांमुळे. किंबहुना भांडवल आणि भांडवलदारांकडे पाहण्याची दुषित दृष्टी समाजवाद निर्माण करतो. आणि दुसरीकडे याच क्षेत्राने रोजगारही वाढवावेत, राष्ट्रीय उत्पादनही वाढवावे अशी अपेक्षाही निर्माण करतो. आपल्या मानसिकतेतच काहीतरी समस्या आहे. आहे त्या व्यवस्थेतच दोष आहेत हे आपल्याला मान्य नाही. नेत्यांच्या आश्वासनांवरच आपली मुख्य मदार असते. पण हे लक्षात घ्यावे लागेल की नागरिकांची खुली आर्थिक प्रगती होत ते स्वत: भांडवलदार बनत भांडवलाचे विकेंद्रीकरण करत विकास करतील अशी संभावना समाजवादी व्यवस्थेत निर्माण होत नाही. त्यामुळे व्यवस्थेतील फटींचा आणि त्यासाठीच बनवल्या गेलेल्या नियमांचा गैरमार्गाने अथवा राजरोसपणे फायदा उठवू शकणा-या मोजक्या भांडवलदारांना प्रगतीचे आणि नवशोषणाचे मुक्तद्वार मिळते आणि अन्य मात्र वंचितच राहतात हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

आपल्याला सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर आपल्याला कोणती व्यवस्था हिताची आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला अधिकाधिक बंधने हवीत की स्वातंत्र्य यात निवड करावी लागेल. त्याखेरीज आपला उद्या नेमका कसा असेल याचे नुसते स्वप्न पाहण्यात अर्थ नाही.

Saturday, April 9, 2016

क्यलिफोर्निया...मराठवाडा आणि दुष्काळ!



 (आटलेल्या नद्या-क्यलिफोर्निया)

क्यलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात गेली चार वर्ष भिषण दुष्काळ पडलेला आहे. जानेवारी २०१५ मद्ध्येच क्यलिफोर्नियाच्या गव्हर्नरांना दुष्काळी आणिबाणी जाहीर करावी लागली एवढी भिषण स्थिती सलग दुष्काळाने निर्माण झालेली आहे. ओसंडुन वाहणा-या नद्या प्रचंड आक्रसलेल्या आहेत. धरणांतील जलसाठेही सुकले आहेत. भूजलपातळी खालावल्याने खाजगी विहिरींनीही तळ गाठलेला आहे. यंदाही स्थिती उत्साहवर्धक नाही. खरे म्हणजे क्यलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शेतमाल-फळफळावळ उत्पादक राज्य आहे. आपणही कोकणचा क्यलिफोर्निया करु अशी स्वप्न पाहत होतो हे आठवत असेलच. आज तोच क्यलिफोर्निया भकास-ओसाड झाला आहे. प्यायच्या पाण्याचेही वांधे आहेत. थोडक्यात क्यलिफोर्नियाचा मराठवाडा झाला आहे. वन्य जीवनावरही या दुष्काळाने भयानक परिणाम केलेला आहे. क्यलिफोर्नियातील हा गेल्या चारशे वर्षातील सर्वात जीवघेणा दुष्काळ आहे असे तज्ञ म्हणतात. यंदाही दुष्काळ संपेलच याची आशा हवामानतज्ञांना नाही.

दुष्काळाशी संघर्ष करण्यासाठी अमेरिका काय मार्ग वापरत आहे हे पाहणे आपल्यालाही प्रबोधक ठरेल. त्यातील काही मार्ग आपल्याकडे आपल्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीमुळे उपयुक्त नाहीत. पण जे मार्ग आपण अनुसरू शकतो ते पाहुयात.



 १) सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीयोग्य बनवणे. क्यलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया करुन समुद्रात सोडण्यात येत होते, ते आता समुद्रात सोडून न देता शेतीकडे वळवण्यात येत आहे. आम्ही मुळात सांडपाण्यावर प्रक्रियाच करत नाही किंवा केली तरी ती तोंडदेखली असते. शेतीसाठी त्याच्व्हा वापर तर दूरची गोष्ट झाली. आपल्याला नदी-नाल्यांत सोडले जाणारे सांडपाणी शुद्धीकरण करावेच लागणार आहे.

२) पीकपद्धतीत बदल : कोणत्या प्रकारच्या पीकांना किती पाणी लागते याचा अभ्यास करून पाणीपिऊ पीके बंद करण्याचा अथवा क्षेत्रबंदीचा निर्णय. ज्यांना ही पीके घ्यायचीच आहेत त्यांच्यावर अवाढव्य जलकर लावण्यात आला आहे. क्यलिफोर्निया राज्य हे बदामांचे मोठे उत्पादक आहे. ही झाडे क्यलिफोर्नियातील उपलब्ध पाण्यापैकी १०% पाणी पितात. अशी काही इतर अनेक पीके आहेत. सर्वच पीकांचे नीट नियोजन करणे, काही पीके घेणे बंद करत पर्यायी पीकांकडे जाण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. नागरिकांनीही आपल्या खाद्य सवयीही बदलाव्यात यासाठी प्रबोधन केले जात आहे.

आपल्याकडे हे करावेच लागणार आहे. ७०% पाणी पिणा-या उसाबाबतच आमची भुमिका धड नाही. उसाला पर्याय असुनही ते वापरले जात नाहीत. द्राक्षे, मोसंबी ईत्यदिबद्दल तर भुमिकाच नाही. आम्हाला प्रत्येक विभाग, त्यातील पाण्याची एकंदरीत उपलब्धता याचा शास्त्रीय अंदाज घेतच पीकनियोजन करावे लागणार आहे.

३) हवेतील बाष्पापासून पाणी मिळवणे, कृत्रीम पाऊस पाडणे हेही उपाय केले जातात पण ते तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. उघड्या क्यनालमधून पाणी नेण्यापेक्षा बंद पाईपलाईनचा वापर करण्याचे प्रमाण मात्र वाढवण्यात येत आहे.

४) बाटलीबंद पाणी देणा-या कंपन्यांविरुद्ध कठोर उपाययोजना. नेस्लेसारखी क्यलिफोर्नियातील सर्वात अवाढव्य कंपनी आहे व तिच्या अनिर्बंध पाणीवापरावर (म्हणजेच पाणीचोरीवर) कोणी पुर्वी लक्ष देत नव्हते. आता मात्र कायद्याचा बडगा कठोर करण्यात आला आहे. बाटलीबंद पाण्यावरच निर्बंध आणले गेले आहेत.

विशेष म्हणजे नेस्लेनेही या निर्बंधांचे स्वागतच केले असून आम्ही मर्यादेत राहून आमच्या प्लांट्समद्धे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण किमन मर्यादेत राहू असे लेखी अभिवचन सरकारला दिलेले आहे. असे असले तरी नेस्लेचे राज्यातील सर्व प्लांट बंद करावेत यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे.

आपल्याकडेही अशा निर्बंधांची तातडीने गरज आहे. आणि जनतेचा दबाव काय असतो हे आम्हाला अशा कामांत समजत नाही. आमची आंदोलने राजकीय हेतुंनीच प्रभावित असतात नि म्हणूनच आमचे खरे प्रश्न सुटत नाहीत.

५)  घरगुती व घरबागेसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध, प्रतिमाणसी किती ग्यलन पाणी पुरवले जाईल याचा निश्चित आराखडा व त्याप्रमाणेच पुरवठा.

६) क्यलिफ़ोर्निया वाटर बोर्डाचा सर्वात महत्वाचा नागरिकांना सल्ला म्हणजे थेब थेंब पाणी वाचवा. पाण्याबाबतची आपली जीवनशैली प्रत्येकाने बदलावी यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे.

या सा-या प्रयत्नांमुळे २३.९% पाणी वाचवता आले (ध्येयापेक्षा फक्त १.१% मागे पडले) जे साठ लाख नागरिकांना वर्षभर पुरू शकते.

अमेरिका हे जगातील सर्वात तंत्रप्रगत राष्ट्र आहे. दुष्काळावर मात करण्याचे मार्ग म्हणजे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, सांडपाणी पुन्हा वापरात आणने हेच उपाय त्यांनाही महत्वाचे वाटतात. पाणी कृत्रीमरित्या तयार करता येत नाही. आम्ही आमच्या जीवनदायी पाण्याची बेपर्वा उधळपट्टी करण्यात मशगूल आहोत. क्यलिफोर्नियासारख्या अमेरिकेतील शेतीप्रगत राज्याला आज पाण्यानेच विकलांग केले आहे. पाणी काटकसरीने वापरायची बुद्धी त्यांना फार लवकर झाली. आमच्याकडे आजवर दुष्काळाच्या एवढ्या रांगा लागून गेल्यात पण आम्हाला पाण्याचे महत्व अजुनही समजलेले नाही.

आमचे कामच असे असते कि तहान लागली कि विहिर शोधायची. नियोजनाची गरजच मराठवाड्यात उरलेली नाही कारण नियोजनासाठी किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचे नेटके वितरण कसे करायचे हेच माहित नाही. ट्यंकर पाणी विकतात. ते कोठून पाणी आणतात? कोणते स्त्रोत वापरतात? तेथील साठ्यांची काय अवस्था आहे? त्या पाण्याच्या शुद्धीबाबत काही खात्री आहे काय? काही नाही.

क्यलिफोर्नियासारख्या जगातील सर्वात शेतीसधन राज्याची आजची अवस्था केविलवाणी आहे हे खरे, पण त्यांनी त्यावर कठोर उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असुनही आमचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. क्यलिफोर्नियासारखा सलग दुष्काळ आमच्या वाट्याला आला तर महाराष्ट्र ओस पडेल याची खात्री बाळगा. सावध व्हा. स्वत: पाणी नियंत्रणात तर वापराच पण व्यापक जलधोरण असलेच पाहिजे व ते पाणीमाफिया, उसमाफियांच्या कचाट्यात जाणार नाही याची काळजी घ्या. पाण्यचा गैरवापर करणारे खरे देशद्रोही आहेत हेही लक्षात घ्या.

यंदाचा मान्सून तरी चांगला जाईल या आशेवर बसणे मुर्खपणाचे आहे. पावसाळा चांगला जाओ कि वाईट...आम्हाला जणू दुष्काळच आहे असे समजत पाण्याचे नियोजन करावे लागेत तरच दुष्काळी वर्षेही आम्ही धडपणे निभाऊन नेवू शकू व आमचे जल-भविष्य सुखकर राहील.


Sunday, January 10, 2016

सहिष्णुता म्हणजे नेमके काय?

असहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्वाची संकल्पनाच मुळात बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. सहिष्णुतेचे जसे तत्वज्ञान असते तसेच असहिष्णुतेचेही असते. आपल्याला सर्वप्रथम असहिष्णुतेचे तत्वज्ञान समजावून घ्यावे लागेल, त्याशिवाय सहिष्णुतेचे महत्व समजणार नाही.

माझ्या घरातील लोक, माझे शेजारी, माझे सहकारी व समाजही मी ज्या विचारधारेला मानतो, ज्या जीवनशैलीला मानतो, ज्या धर्मश्रद्धा जोपासतो त्या विचारधारेने व धर्मश्रद्धा-जीवनशैलीनेच वागतील - वागावेत असा जो आग्रह धरतो, प्रसंगी जबरदस्ती करतो त्याला आपण असहिष्णू म्हणू शकतो. असहिष्णुपणात इतरांचा धर्म, जीवनविचार, आहारपद्धती ते वस्त्र-संस्कृती, राजकीय व स्वतंत्र आर्थिक विचार या बाबींना स्थानच नसते. किंबहुना "व्यक्ती स्वातंत्र्य" ही संकल्पनाच असहिष्णुपणात बसत नाही. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अशा लोकांना मान्य असण्याची शक्यता नसते. एक विचार, एक समान संस्कृती व एकसमान आचार-व्यवहार संहिता असलेला "समरस" समाज बनवणे अशा लोकांचे एकमात्र ध्येय असते व हे ध्येय साध्य करण्याचा मुख्य उद्देश अनिर्बंध राजकीय व सांस्कृतिक सत्ता गाजवता यावी हाच असतो. थोडक्यात लोकशाहीला या विचारपद्धतीत स्थान नसते.

हे तत्वज्ञान का जन्माला येते हे आपण समजावून घेण्यचा प्रयत्न करुयात. पहिली बाब म्हणजे हे तत्वज्ञान नवे नाही. पुरातन काळापासून कधी ना कधी, कोठे ना कोठे कोणत्या ना राजाने अथवा धर्मगुरुने या तत्वज्ञानाचा आधार घेत प्रचंड रक्तपात केले आहेत, मानवी समुदायांना दास्यात ठेवण्यासाठी करता येतील तेवढी क्रूर कृत्येही केलेली आहेत. जगभरातील बहुतेक धर्म हे मुळात असहिष्णुच असल्याचे ऐतिहासिक रक्तपातांच्या घटनांतून पहायला मिळते. खरे म्हणजे धर्मात मुळ काय आहे यापेक्षा धर्म हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन म्हणून वापरण्याच्या प्रयत्नांतून ही असहिष्णुता जास्त फोफावलेली असल्याचे आपल्या लक्षात येईल. या सत्ताकांक्षेला, रक्तपात व  दडपशाहीला समर्थन देवू शकेल असे तत्वज्ञान तुकड्या-तुकड्यांतुन शोधले तर सहज काढता येते, आणि समजा नसले तर शब्दार्थांची तोडमोड करत सोयिस्कर अर्थ काढण्यात येतात. त्यामुळेच धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता या दोहोंत संघर्षही पेटल्याचेही इतिहासात आपण पाहतो. पोपची अनिर्बंध राजसत्ता झुगारण्यासाठी युरोपने केलेला संघर्षही आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच वेळीस आपल्य धर्माला अनिर्बंध पसरवता यावे यासाठी धर्मांनी राजाश्रय मिळवण्यासाठी किती लटपटी-खटपटी केल्या व   अंतत: अपार यश मिळवले याचीही उदाहरणे आहेत. अन्य धर्मियांचा छळ तर बहुतेक सत्तांनी केला.

अठराव्या शतकात धर्माबरोबरच वंशवादानेही असहिष्णू तत्वज्ञानाचा अतोनात वापर केला. आर्य वंश हा श्रेष्ठ  तर अन्य वंशिय हे कमअस्सल या मांडणीतून सेमेटिक लोकांचा (विशेषत: ज्यु) छळ सर्व युरोपने केला. या वंशवादाचाच फायदा घेत हिटलर-मुसोलिनी सारखे सत्तेच्या वारुवर झटपट आरुढ होऊ पाहणारे फ्यसिस्ट जन्माला आले. काही काळ यशस्वीही झाले. लक्षावधी ज्युंची कत्तल केली गेली, छळ छावण्यांत त्यांना नराधम यातना देत संपवले गेले. विसाव्या शतकाचा इतिहास या क्रुरतेची परिसीमा पाहणा-या रक्तरंजित घटनांनी सुरु होतो. समाज-समाजांतील हे संघर्ष व राष्ट्रा-राष्ट्रातीलही संघर्ष हे कोठे ना कोठे असहिष्णुतेच्या तत्वज्ञानापाशी येवून ठेपतात. किंबहुना असहिष्णुतेचा मुळगर्भ जगभरच्या  संघर्षांमागे आहे असेही आपण अंदाजू शकतो.

असहिष्णुतेचे तत्वज्ञान हे दुस-यांवर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी जन्माला येते. या चारही बाबी या तत्वज्ञानात हातात हात घालून वावरत असतात. त्यांना वेगळे करता येत नाही. Theory of others हा या तत्वज्ञानाचा पहिला नियम असतो. हा नियम म्हणजे आपण (स्वधर्मीय वा विचारप्रणालीचे) व इतर  अशी विभागणी सर्वप्रथम काळजीपुर्वक केली जाते. आपले धर्म/तत्वज्ञान हे इतरांपेक्षा कसे पुढारलेले आहे, इश्वरप्रणित आहे, श्रेष्ठ आहे, पुरातन आहे, हे लिहिणे, सांगत राहणे, बिंबवने व त्यातुनच हाडाचे कट्टर अनुयायी तयार करणे ही स्वभावत:च पुढील पायरी असते. या प्रवसात सुरुवातीला जमतील ती सत्तास्थाने (आर्थिक/राजकीय) प्रप्त करत जात अंतिम उद्देश साध्य करायचा असतो सत्ता संपादनाचा. त्यासाठी शत्रू मानलेल्या वर्ग-गटांबाबत द्वेष पसरवत प्रसंगी हिंसक होण्याची त्यांची अर्थातच तयारी असते, कारण द्वेष केल्याखेरीज, त्यांच्याबाबत खोटे का होईना भय निर्माण केल्याखेरीज आपले लोक एका झेंड्याखाली राहणार नाहीत याची त्यांना खात्रीच असते. आपले अनुयायी स्वतंत्र विचार करणार नाहीत, एक साच्याचे बनतील यासाठी ते अपरंपार कष्ट घेत असतात. कोणी स्वतंत्र विचार मांडत असतील, त्यांच्या विचारांनी आपल्यला हवी तशी समाजरचना करण्यात अपयश येणार असेल, अडथळे येणार असतील तर त्यांना धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न होतात, एनकेन प्रकाराने अंधारात फेकले जाते व तेही जमणार नसेल तेंव्हा सरळ हत्या केल्या जातात. अमेरिकेतील कु-क्लक्स क्लान या गुप्त संघटननेने अनेक ज्यू व बायबलमधील तत्वज्ञानाविरोधी जाणा-या विचारवंतांची हत्या केली हा इतिहास आहे. भारतात अलीकडेच झालेल्या तीन विचारवंतांच्या हत्याही याच परिप्रेक्षात पहाव्या लागतात. आयसिसचा झालेला उदय याच तत्वज्ञानातून झाला आहे. किंबहुना सर्वच दहशतवादांमागेही हेच तत्वज्ञान व साध्य असते.

सहिष्णुता

या पार्श्वभुमीवर आपल्याला सहिष्णुतेच्या तत्वज्ञानाकडे पहावे लागेल.  सर्वांना स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा, विचार करण्याचा व आपले विचार निर्भयपणे मांडण्याचा, आपापले धर्म (उपद्रव न निर्माण करता) पाळण्याचा, राजकीय हवे ते विचार बाळगण्याचा अधिकार सहिष्णुता सर्वप्रथम मान्य करते. मानवी सहजीवन हे एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांचे अधिकार मान्य करत संविधानाच्या चौकटीत जीवन जगण्याचे स्वातंत्र्य घेणे व देणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुतेचे तत्वज्ञान मानवाचा मुलभूत व्यक्तिस्वातंत्र्याच्या सन्मानाच्या संकल्पनेवर उभे आहे. महात्मा गांधी जे म्हणत, "मला केवळ भारताचे नव्हे तर भुतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे." ही उदात्त भुमिका सहिष्णुतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वातंत्र्य इतरांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी नाही याचे भान प्रत्येक सहिष्णू ठेवत असतो. आपले राष्ट्र "सेक्युलर" राष्ट्र आहे. हा सेक्युलरिझम बहुतेक विद्वान फक्त "धर्म-निरपेक्ष" या शब्दाशी जोडतात, जे चुकीचे आहे. सेक्युलर या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ खूप व्यापक आहे. केवळ धर्मांपुरता नव्हे तर तो सर्वच जीवनव्यवहारांशी निगडित आहे. तो मानवाच्या (नागरिकांच्या) सौहार्दमय सहजीवनाशी निगडित आहे. प्रत्येकाला आपले स्वतंत्र विचार करण्याचा, जीवन जगण्याचा, धर्म, अर्थविषयक श्रद्धा-विचार ठेवण्याचा, आपापली खाद्य ते जीवनसंस्कृती (अन्य कोणालाही उपद्रव होणार नाही व वर्तन कायद्यांच्या चौकटीत असेल या पद्धतीने) जपण्याचा अधिकार आहे. ही बाब सहिष्णुता मान्य करते. ज्याक्षणी सहजीवनाची संकल्पना हद्दपार होऊ लागते तत्क्षणी ते ते समाज असहिष्णू होत जातात असे म्हणावे लागेल.

थोडक्यात सहिष्णुता ही संकल्पना मानवाच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे. कोणतेही शासनही ज्यावेळीस अशा स्वातंत्र्याचा विविध अन्याय्य कायदे करत संकोच करू पाहते ते शासनही असहिष्णू आहे असे सहज म्हणता येते. सहिष्णू नागरिकच  नव्हेत तर  सरकारेही असली पाहिजेत. म्हणजेच सरकारांची विचारसरणीही सहिष्णू असली पाहिजे, अंतत: आपल्या नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य कसे देता येईल हे पाहणारी असली पाहिजे. स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी सरकारे नसतात.

Thursday, December 24, 2015

बदलायचे आहे कि नाही?

आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, मस्खरी गोशालांदिचा विचार पुरातन कालातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मिती कारण हे इश्वरी तत्वात नसुन विभिन्न भौतिक मुलतत्वांत आहे हा सांख्य विचारही कधीच फेटाळला. आमच्या पुर्वजांनी, त्यात सगळ्यांच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे तत्वद्न्यान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या बेड्यांत जखडले. त्या बेड्यांत असण्यातच आमची सुरक्षीतता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती.

आताही आम्ही तेच करत आहोत. आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे असते. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मनांना तर कोणी बौद्धांना. पण मुळात ही सर्वच भारतियांची दांभिक आणि पराजित फसवेपनाच्या मानसिकतेचे एकुणातील फलित आहे यावर आम्ही कधी विचार करणार? आजही जर आम्ही "आम्हाला याने फसवले...त्याने घात केला" असे गळे काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो कि हा समाजच षंढांचा आहे.

जात्युच्छेदनाच्या चळवळी तर एक फार्स झाल्या आहेत. जातीअंत करायचा म्हणायचे आणि वक्त्यांच्या जाती जाहीरपणे सांगायच्या, कोणत्या जातींचे लोक जमलेत याचा उद्घोष करत टि-या बडवून घ्यायच्या. संघाचे लोकही असेच. आम्ही जातीपाती पाळत नाही म्हणतात आणि सर्वांच्या जातींची व्यवस्थित खबर ठेवतात. मंचावरुनही तसे उल्लेख करतात. जातीचे राजकारण नको असे मोठ्या तोंडाने लोक बोलतात आणि जातीच राजकारण करत आपल्याच जातीच्या नालायकांमागे ठाम उभे राहतात. महाराष्ट्रातून चळवळ मेली आहे हे मी ५ वर्षापुर्वीच घोषित केले होते. असल्या भाकड मनोवृत्तीचे नागरिक कसलीही सामाजिक चळवळ चालवू शकत नाहीत. यांना आजही जगण्यासाठी जातीचा आणि तिच्या खोट्या, वांझ अहंकारांचा व इतिहासाचा आधार लागतो. माणसाचे माणुसपण नेमके कशात आहे हे समजावून घेण्याची कुवत ज्या देशात नसते तो देश रसातळाला जाणार हे उघड आहे.

जाती तत्काळ नष्ट करता येत नाहीत तर किमान सर्व जातींना समान मानत त्यांचा सन्मान करायला काय हरकत आहे? प्रत्येक जात ही व्यवसायाने पडली आहे. प्रत्येकजातीने देशाच्या सांस्कृतिक व आर्थिक इतिहासात मोलाचे योगदान दिलेले आहे. या सर्वच जातींच्या सुकृतामुळे आज आम्ही येथवर आलो आहोत. आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा?

फुले-शाहू-आंबेडकरांचे नांव घेत जे चाललेय ते काही केल्या भुषणास्पद नाही. त्यांचे कार्य व विचार कणमात्रही पुढे नेता आले नाहीत कि त्यात भर घालता आलेली नाही. आजही सांस्कृतिक इतिहासाचे आकलन बालीश आहे. आजही तथाकथित चळवळीतले नेते "आर्य वंशीय बाहेरुनच आलेत." असे समजून त्यांच्या रणनित्या आखतात. समजा बाहेरुन आले तरी पाच हजार वर्षापुर्वी...एवढ्या जुन्या कालात्र समजा आले भारतात म्हटले तरी ते कोणत्या अंगाने परके/बाहेरचे राहतात याचा साधा विचार करायची अक्कल यांना कशी येत नाही?

संघवादी विद्वान हा तर वर्चस्वतावादाचा दांभिक व अज्ञानाचा कळस आहे. सिंधू संस्कृती वैदिक संस्कृती कशी यावर अचाट/बेफाट आणि कास्लेही अकलेचे तारे तोडत त्यांचे काम चालू असते. आता तर पुरातत्व विभागही त्यांच्याच अखत्यारीत असल्याने उद्या काय "चमत्कार" ते घडवून आणतील याचा नेम नाही. बामसेफ/ब्रिगेडच्या ब्राह्मण द्वेष्ट्या भुमिकेने ब्राह्मण संघटित होत परशुरामाला "हिरो" बनवत वांझ शड्डू ठोकतात. तेही द्वेषाची धार वाढवायचाच प्रयत्न करतात. सनातनवाल्यांचा आचरट धार्मिक आणि खुनशीपणा कशातून येतो? या सर्वांवर कठोर अंकुश समाजाच असला पाहिजे...पण तो कोठे आहे?

वास्तवपुर्ण, तथ्यपुर्ण दृष्टीने आम्हाला जीवनाकडे पहायला कोणी शिकवलेच नाही. वांझ हरलेल्यापणाच्या गाथा सांगत कोणाचा तरी द्वेष करणारे एकीकडे बेफाम आहेत तर दुसरीकडे संस्कृतीच्या प्राचीन वैदिकपणाच्या अचाट काल्पनिककथा सांगत बसणारे जोमात आहेत. यांना जातीजातीत सोडा, पोटजातींतही समता आणता आलेली नाही. हे काय वैचारिक आणि आर्थिक प्रगती साधणार? अशांचे भवितव्य कशाच्या ना कशाच्या गुलामीत राहणे हेच असते.

खोटे अहंकार बाळगत कोणीही बदलू शकत नाही. उद्याचे सूर्य यांना अप्राप्यच राहणार. माणसांचे मुडदे पडत राहणार. दुस-या जातीत लग्न केले म्हणून कोवळ्या पोरांचे छळ होतच राहणार...ठारही मारले जाणार. वाळीत टाकण्याची एक जुनी पद्धत होती, ती आताहे वेगवेगळ्या थरांत , अगदी वैचारिक - साहित्यिक क्षेत्रातही कटाक्षाने पाळली जाते. अघोषित बंद्या पालल्या जातात. हा समाज निघृण आहे हे वास्तव मान्य करत जे काही थोडके लोक उरलेत त्यांना नैराश्य येत तेही हार मानतील अथवा परिस्थितीशरण होतील असे वातावरण आहे.

बदलायचे आहे कि नाही? 

हे कोठवर चालणार?




अण्णाभाऊ साठे हे वंचितांच्या मूक अश्रूंना वादळी थैमानात बदलणारे, व्यवस्थेला झंझोडून काढणारे शाहीर, थोर साहित्यिक आणि विचारवंत. महाराष्ट्रावर त्यांचे अपरंपार ऋण आहे. पण ते मान्य करण्याइतकी कृतज्ञता महाराष्ट्रात नाही. त्यांची पणती सुवर्णा साठे ही ठाणे ग्रामीण पोलिसांत ड्युटीवर होती. वय वर्ष २३. ती ड्युटीवरुनच सुमारे दहा महिन्यंपुर्वी बेपत्ता झाली. तिची आई लीलाबाई यांना वाळवा येथील इस्पितळातून फोन आला कि त्यांची मुलगी वाळव्यात रस्त्यावर ८०% जळालेल्या अवस्थेत सापडली. तिच्या जगण्याचे चांसेस कमी असल्याने तातडीने येवून तिला भेटा असा निरोप मिळाला. त्या व अन्य नातेवाईक वाळव्याला पोहोचेपर्यंत सुवर्णाचे अंत्यविधीही पार पडले होते.

एकही नातेवाईक उपस्थित नसतांना अंत्यविधी कसे केले गेले हा प्रश्न शंकर कांबळे या साठे कुटुंबच्या मित्राने केला. त्यांना हाती मिळाले ते डेथ सर्टिफिकेट. मुलीच्या खुनामुळे धक्का बसलेले सुवर्णाचे वडील आणी आजी एकापाठोपाठ मरण पावले.

सुवर्णा ठाण्यावरून सुनील इंगळे नामक वाळवा येथील  एका तरुणासोबत वाळवा येथे आली होती. या दोघांचे प्रेमसंबंध असावेत व लग्नाच्या आश्वासनामुळेच ती वाळव्याला गेली असावी असे कांबळे म्हणतात. त्यांचा व लीलाबाइंचा संशय ईंगळेवर आहे. पण या प्रकरणतील दुर्दैव असे आहे कि पोलिसांनीच कसलाही तपास केला नाही. ठाण्याची एक मुलगी वाळव्याला जळालेल्या अवस्थेत कशी मिळाली? तिला कोणी जाळले? पोलिसांनी तिचे प्रेत नातेवाईकांकडे सुपुर्त का केले नाही? तपास निष्कर्ष न काढता कसा संपवला? लीलाबाई अलीकडेच थेट मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागायला गेल्या होत्या. पण आश्वासनाखेरीज पदरी काही पडलेले नाही.

एका महिला पोलिसाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू होतो आणि पोलिसच त्याचा तपास करत नसतील तर ही केवढी मोठी गंभीर बाब आहे हे आम्हाला समजायला हवे. या प्रकरणाचा तपास करण्यात वाळवा पोलिसांचे स्वारस्य नाही तर मग हे प्रकरण सीआयडीकडे सोपवावे. सुवर्णा ठाण्यावरून वाळव्याला कशी, कोणासोबत आली, नेमक्या कोणी व का तिला जाळले हे तपासातून समोर आलेच पाहिजे. दोषी कोणीही असो, त्याला जेरबंद केलेच पाहिजे. लिलाबाई म्हणतात कि सुनील इंगळे त्यांनाही धमक्या देत आहे. असे असेल तर पोलिस त्याच्यावर अद्याप कारवाई का करत नाहीत?

एक महिला पोलिस, त्यात अण्णाभाऊ साठेंची पणती....
तिच्या खून होतो...दहा महिने उलटुन जातात....कसलाही तपास नाही, कसलाही निष्कर्ष नाही....
हे उभ्या महाराष्ट्राला...पोलिस खात्याला शरमेने मान खाली घालावी असे कृत्य नव्हे काय?

Saturday, August 29, 2015

कोणती शहरे "स्मार्ट" करत आहात?



"स्मार्ट सिटी" म्हणजे आधीच गजबजलेल्या, नागरी सुविधांवर ताण आलेल्या, सामाजिक प्रश्नांनी थैमान घातलेल्या, जवळपास चाळीस टक्के नागरिक झोपडपट्ट्यांतच राहणा-या शहरांना अजून अधिक बजबजपुरेत ढकलणे नव्हे. केंद्र सरकारने देशभरातील ज्या प्रस्तावित ९८ शहरांची घोषणा केली आहे हे पाहता या शहरांना "स्मार्ट" करण्यास काय वाव आहे हा प्रश्न पडेल. महाराष्ट्रातील या प्रस्तावित शहरांओऐकी काही शहरांत पाणीपुरवठ्यापासुनचा ताण आताच वाढला अहे. पुणे-मुंबई ठाणे सारख्या शहरांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन धरणे बांधायला जागाच उपलब्ध नाही. शेतीसाठी पाणी कि शहरांतील नागरिक-उद्योगव्यवसायांसाठी पाणी हा पेच आजच खडा आहे. पुण्यासारख्या शहरात रस्ता-रुंदीकरणासाठीच स्पेस उपलब्ध नाही तर खेळाची मैदाने-बागा व सांस्कृतिक-समाजकेंद्रांसाठी कोठून असणार? 

दुसरीकडे खानदेश, मराठवाडा, कोकण व विदर्भ य भागातील लोक उपजिविकेसाठी याच शहरांकडे धावत आहेत. नको ती शहरे स्मार्ट करण्याचा डाव घतला तर हा विस्थापनाचा वेग अजून वाढेल. घरांच्या किंमती आताच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. ती न परवडल्याने झोपडपट्ट्यांत जी वाढ होईल त्याचा विचर केलेला दिसत नाहे. म्हणजे एकीकडे विस्थापनामुळे प्रदेश बकाल होताहेत तर दुसरेकडे अतिरिक्त लोकसंख्येचा ताण वाढत असल्याने विद्रूप बकालपणा वाढत आहे. गरज असो अथवा नसो, धनाढ्य माणूस कोणत्याही भागातील असो, येथे एक तरी सदनिका घेऊन ठेवण्याच्या नादात आहे. कारण त्यांच्या भागांत विकासच नसल्याने त्यांना स्वाभाविकपणे पुण्या-मुंबईचे आकर्षन आहे.  हे आकर्षन आम्ही विकेंद्रित करण्यासाठी काय करत आहोत? 

भारताने विकेंद्रित विकासाची संकल्पना कधी राबवली नाही. मराठवाडा-विदर्भात रस्ते-रेल्वेचे जाळे उभारत त्या भागांत उद्योगधंदे कसे वाढतील यावर भर दिला नाही. त्यामुळे ना स्थानिक रोजगार आहे ना उद्योजकतेच्या संध्या. त्यामुळे हे भाग बकाल पडत चालले आहेत. 

खरी गरज आहे ती या अविकसित भागांतेल शहरे स्मार्ट करण्याची. स्मार्ट म्हणजे फक्त दिसायला देखणी शहरे नव्हेत तर त्यांच्या आसपासच उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराच्या संध्या देणारी नवी शहरे. त्यासाठी आवश्यकता आहे ती या शहरांना वेगवान वाहतुकीने जोडण्याची. २४ तास वीजेची हमी देण्याची. तरच मोठे उद्योग इकडे येतील हे उघड आहे. लोकांना स्थानिक रोजगार मिळाला तर विस्थापनाचा दर कमी होईल. संतूलित विकास झाल्याने आताच डोईजड झालेल्या पुण्या-मुंबईसारख्या सहरांवर रोज वाढणारा ताण कमी होईल. अविकसित शहरांना विकसीत "स्मार्ट" करण्यासाठी येणारा खर्च पुणे-मुंबईला स्मार्ट करण्याचा आणि ते प्रयत्न अयशस्वी होण्यच्याच शक्यतांपेक्षा अंबेजोगाई, सिल्लोड, धुळे, परभणी, कोकणातील समुद्रालगतची निवडक शहरे अशा अविकसित भागांतील शहरांना स्मार्ट करण्यासाठी भांडवली खर्चही कमी होईल. जोडणारे रस्ते बीओटी तत्वावर बांधुण घेता येतील.

यामुळे या नव्या विकसित नगरांभोवतीच्या खेड्यांनाही स्मार्ट बनवण्याच्या संध्या उपलब्ध होतील. घरे पुण्या-मुंबईच्या तुलनेने स्वस्त मिळतील तर उद्योगधंद्यांचीही (जमीनीचे भाव कमी असल्याने) भांडवली गुंतवणूक कमे असेल. पण त्यासाठी मुळात चांगल्या वाहतुक व्यवस्थेची गरज आहे. हे नेटवर्क प्रस्थापित करणे अशक्य नाही. खरे तर हे पुर्वीच व्हायला हवे होते. राजकीय नेत्यांचे इच्छाशक्ती व दूरदृष्टी कमी पडली हेच काय ते खरे. आता आधीच कोलमडायला लागलेल्या शहरांना स्मार्ट करण्याच्या उद्योगालाही अदूरदृष्टीचेच म्हणावे लागेल. 

भारताला विकेंद्रित विकासाची गरज आहे. त्यासाठी अविकसित भागांतील शहरे विकसित करण्याची गरज आहे. तरच उद्योगधंदेही तेथे येतील हे वास्तव आहे. अन्यथा हा असंतुलित, केंद्रीभुत विकास भविष्यात अनेक सामाजिक संकटांना निमंत्रण देईल. अविकसित भागांत आजही मोठ्य प्रमाणावर असंतोष आहे. त्याचा भविष्यात उद्रेक करत सामाजिक संतुलन बिघडण्याच्या शक्यता अधिक आहेत. 

स्मार्ट शहर म्हणजे नेमके काय हे सरकारी धोरणात स्पष्ट नाही. स्मार्ट शहर म्हणजे सामान्यांनाही परवडन्याजोगे निवारे, उपजिविकेची मुबलक साधने आपल्याच परिसरात उपलब्ध करून देत नागरी सुविधांची रेलचेल असेल अशी शहरे ही माझी व्याख्या आहे. आज शासनाने जी महाराष्ट्रातील प्रस्तावित स्मार्ट शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात या बाबींना वाव नाही हे उघड आहे. लोकसंख्येचा या शहरांत आधीच एवढा विस्फोट झाला आहे कि नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी पुण्याच्या साठ किलोमीटर परिसरातही जागा उपलब्ध होत नाही हे कटू वास्तव लक्षात घेतले तर तुम्हे पुणे-मुंबईला काय आणि कसे स्मार्ट कराल हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या शहरांसाठी नागरी सुविधांचे काही प्रकल्प केवळ जागांअभावी बसकन मारुन बसले आहेत. तुम्ही यासाठी जागा उत्पन्न करणार कशा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. या शहरांतील बिल्डर लोबीला उलट मोकळे रान, जे आहेच, ते जास्तच मिळेल आणि "आहे रे" व "नाही रे" यातील दरी वाढत जाईल. हा धोका आजच गंभीर झाला आहे. त्यात तेल ओतण्याचे काम शासनाने करु नये.

त्यामुळे विकासाचा समतोल राखण्यासाठी विकेंद्रीकरणाची कास धरत अविकसील प्रदेशांतील शहरांनाच उद्योगधंद्यांसह स्मार्ट करण्याचा सर्वांनी चंग बांधने अधिक संयुक्तिक राहील याबाबत मराठी मनात शंका असता कामा नये.

Friday, October 18, 2013

फक्त सत्ताकेंद्रे टिकवण्यासाठी मराठा आरक्षण?



मराठा आरक्षणाच्या मागणीवरून रण पेटले आहे. शासनाने राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असतांनाही नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली याबाबत शिफारशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. राणे समिती जेथेजेथे जात आहे तेथे तेथे मराठा संघटना व व्यक्ति मोठ्या प्रमाणावर निवेदने देत आहेत. मराठा समाजाचे निवेदने जेवड्या मोठ्या प्रमाणावर जात आहेत त्या प्रमाणात मात्र ज्यांचा या आरक्षणाला विरोध आहे त्यांची निवेदने मात्र जात नाहीत याची खंत व संताप काही ओबीसी विचारवंतांत आहे. मुळात ही मागणी न्याय्य आहे काय? घटनेच्या चौकटीत बसू शकते काय? आरक्षणाचे गाजर मराठा तरुणांना दाखवत त्यांची भावनिक फसवणूक करत मतपेट्या फुगवण्याची तर ही चाल नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात व त्यांवर तारतम्याने विचार केला पाहिजे. 

मराठा समाजात आता बेरोजगारीमुळे व शेतीचे पिढ्यानुपिढ्या तुकडीकरण होत आल्याने दारिद्र्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे आहे. शिक्षनात हा समाज मोठ्या प्रमाणावर मागे राहिला आहे हेही खरे आहे.राजकीय क्षेत्रात मात्र या समाजाकडे आज जवळपास ७०% वाटा आहे हेही एक वास्तव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षणसम्राटही याच समाजातून आले असून पतसंस्था, सहकारी ब्यंका, साखर कारखाने, सूतगिरण्या आदिंच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नाड्याही याच समाजाच्या हातात आहेत. ओबीसींच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतींवरील सत्ता मात्र कमी होत चालली आहे. या समाजाची नेमकी खंत काय आहे? शिक्षण-रोजगारातील वाटा कमी होतोय ही कि सत्तेत वाटेकरी निर्माण झालेत ही?

मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यासाठी मराठा व कुणबी हे एकच असा दावा करण्यात येत आहे. खुद्द कुणबी समाजाचा याला विरोध आहे कारण बेटीव्यवहाराच्या वेळीस मराठा व कुणबी यांच्यात साम्य मानले जात नाही हे एक सामाजिक वास्तव आहे. "आम्हाला राजकीय आरक्षण नको...फक्त शिक्षण व नोक-यांत हवे" ते "आम्हाला ओबीसींच्या कोट्याला कसलाही धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्या" अशा स्वरुपाच्या मागण्या कधी हिरीरीने तर कधी दडपशाहीच्या जोरावर होत आहेत. मराठा आरक्षण याच विषयावर आमदार बनलेले विनायक मेटे निवडणुका जवळ आल्या कि मराठा आरक्षनाचा विषय पेटवतात असा आता मराठा समाजानेच आरोप करणे सुरू केले आहे. "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. मराठ्यांना एक टक्काही वेगंए आरक्षण दिले जावू नये कारण त्यामुळे खुला प्रवर्गाची, ज्यावर सर्वांचाच अधिकार असतो, टक्केवारी घटणार आहे असे ओबीसी विचारवंतांचे म्हणने आहे. आपण जरा या सर्वच बाजू तपासून पहायला हव्यात.

पहिली बाब म्हणजे घटनेप्रमाने फक्त शिक्षण व नोक-यांत आरक्षण देता  येत नाही. आरक्षण हेच मुळात राजकीय प्रतिनिधित्वासाठी असून शिक्षण व नोक-या हे त्याचे उपविभाग आहेत. ते एक प्यकेज आहे व तोडून देता येत नाही. द्यायचे झाले तर सर्वात आधी घटनादुरुस्ती करावी लागेल याचेही भान कोणाला नाही. आरक्षन हे गरीबी हटावचा कार्यक्रम राबवण्यासाठी नसून सर्व उपेक्षित व मागास समाजघटकांना शासकीय व राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी व समतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी आहे. राजकीय सत्तेत मराठा समाज त्यांच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक असल्याने ही मागणी कशी मान्य होणार हा प्रश्न मेटेंना का पडला नाही? केवळ मराठ्यांना घटनात्मक तरतुदींमुळेच आरक्षण मिळू शकत नाही असे प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी वारंवार स्पष्ट केल्यानंतर व्यक्तिगत शत्रू असल्याप्रमाने नरकेंवर व्यक्तिगत हल्ले करत त्यांना मराठाद्वेष्टा ठरवण्याचा प्रयत्न मेटेंनी वारंवार केला आहे, हे कोणत्या लोकशाहीत बसते?

दुसरी बाब म्हणजे आरक्षण हा मुळात गरीबी हटावचा कार्यक्रम नसल्याने "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार कसे म्हणतात हे त्यांनाच ठाऊक. आर्थिक आधारावर आरक्षनाची घटनात्मक तरतूद नाही. गरीबी हटावसाठी अनेक शासकीय योजना खूप आधीपासूनच अस्तित्वात आहेत. शिक्षणात आर्थिक मागासांना फी माफीची तरतूद आहे. 

तिसरी सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मराठा आरक्षनाच्या मागणीमुळे आजवर ओबीसी ज्या समाजाला थोरल्या भावाप्रमाणे मानत होते ते मराठ्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. समाजातील ही उभी फूट किती धोकेदायक आहे हे आरक्षणवादी मराठा नेत्यांना समजत नाही कि काय? याचे परिनाम दीर्घ काळात सामाजिक विद्वेष वाढण्यात होनार नाही याची काय हमी आहे? 

नारायण राणे समिती बेकायदेशीर आहे कारण राज्य मागास वर्ग अस्तित्वात असतांना अशी समांतर समिती नेमता येत नाही असा दावा ओबीसी नेते करत असले तरी राज्य शासनाने या समितीच्या अध्यादेशात शब्दात न अडकण्याची दक्षता घेतलेली आहे. राणे समितीचे कार्य मराठा समाजाचे सर्वेक्षण करणे व शिफारशी करण्याइतपत मर्यादित आहे. प्रत्यक्षात राणे फक्त निवेदने स्वीकारण्यातच व्यस्त दिसत आहेत. मराठा समाजात राजकीय जागृती ओबीसींपेक्षा अधिक असल्याने साहजिकच मराठ्यांचे आरक्षण समर्थक अर्ज अधिक येत आहेत हे उघड आहे. निवडणुकीच्या तोंडावर राणे समिती आपल्या शिफारशी जाहीर करून पुन्हा सत्तेत येण्यासाठीचा मार्ग खूला करण्याच्या प्रयत्नांत असले तरी ओबीसी मोठ्या प्रमाणावर सध्याच्या सरकारविरोधात जातील आणि मतपेट्यांतून आपला रोष व्यक्त करतील हा धोका नाही काय? शिवाय ५२% ही आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नसल्याने समजा असे अधिकचे आरक्षण राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडत दिले तरी ते उच्च न्यायालयात तरी टिकणार आहे काय? यावर "नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल" असा सल्ला एका ओबीसी विचारवंताने दिला आहे. तसे केले तर आरक्षनाची मर्यादा वाढवता येईल हेही खरे आहे पण त्यामुळे आरक्षनाच्या मुलतत्वालाच धक्का लागनार असल्याने नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारत नाही व स्वीकारण्याची शक्यताही नाही. 

आजवरच्या सर्वच राज्य मागासवर्ग आयोगांनी व उच्च न्यायालयांनीही मराठ्यांना कोणत्याही निकषावर आरक्षण देता येत नाही म्हणुन मराठा आरक्षनाची मागणी फेटाळली आहे हे वास्तव आरक्षणवादी मराठा नेत्यांना माहित नाही असे नाही. परंतू तरुणांच्या भावना गैरवाजवी मागण्यांच्या मार्फत भडकावण्यात हे नेते व्यस्त आहेत.  

गेल्या काही निवडणुकांपासून मराठा समाजातील अनेक नेत्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्रे मिळविण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांच्या निवडणुका या बोगसगिरीमुळे बाद झालेल्या आहेत. पण असे केल्याने ख-या ओबीसींच्या नैसर्गिक व घटनात्मक अधिकारांवर आपण अतिक्रमण करत आहोत याचे भान मराठा नेत्यांनी ठेवलेले नाही. सर्वत्र अशी प्रमानपत्रे मिळणे आता अडचणीचे झाल्याने मराठा आरक्षण हा पर्याय पुढे आला आहे हे वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे. शिक्षण व नोक-या हे वरकरणीचे कारण आहे. असे आरक्षण मिळू शकत नाही, मिळाले तर ते राजकीय प्रतिनिधित्वासह असेल हे आरक्षणवाद्यांना चांगलेच माहित आहे. याबाबतीतील घटनादुरुस्ती शक्य नाही हेही वास्तव आहे. राजकीय प्रक्रियेत आत्ता कोठे प्रवेशू लागलेल्या ओबीसींना हा धोका चांगलाच माहित असल्याने आरक्षनाला विरोध होतो आहे याचे भान ठेवले जायला हवे. आणि मराठा समाजाचे सत्तेबद्दलचे पराकोटीचे आकर्षन अन्य समाजघटकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच या आरक्षणाच्या मागण्या करत आहे हे एक छुपे असले तरी वास्तव आहे. शिक्षण व नोक-यांतील आरक्षण ही फक्त मराठा तरुणांची व अन्य समाजांची दिशाभूल करनारी मागणी आहे.

मराठा समाजात दारिद्र्य वाढत आहे व शिक्षणाचे प्रमाणही साधारण आहे. या वास्तवामुळे आरक्षनाच्या मागणीबाबत मराठा तरुण आक्रमक करता येणे सोपे आहे हे आरक्षनवादी नेते जाणतात. परंतू असे आरक्षण मिळू शकत नाही हे सत्य मात्र ते सातत्याने लपवत आले असल्याने मराठा तरुणांची जी भावनिक फसवणुक केली जात आहे ती नक्कीच निषेधार्ह आहे.

एक बाब आरक्षणवादी विसरत आहेत ती ही कि मुळात आरक्षणाने एकाही समाजाचे नीट भले केलेले नाही. आजवर एस.सी./एस.टी
समाजघटक देशात जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक असुनही आजवर शासकीय नोक-या मिळाल्यात २५ लाखाच्या आसपास. ओबीसींना २७% आरक्षण असुनही प्रत्यक्षात आजवर ४.८% एवढेच ते वापरले गेले आहे. अनुशेषाचे प्रमाण अवाढव्य वाढलेले आहे. याचे कारण म्हणजे सरकार जागतिकीकरणामुळे एकमागोमाग एक क्षेत्रातून काढता पाय घेत आहे. नवीन भरत्या कमी झालेल्या आहेत. शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरनही वेगाने वाढत चालले असून अनुदानेही कमी करण्याच्या मागे सरकार आहे. त्यामुळे शिक्षण हे दिवसेंदिवस महागच होत जाणार आहे. सध्याची शिक्षणपद्धती फक्त बेरोजगार निर्माण करणारे अवाढव्य कारखाने होऊन बसले आहेत. आज बेरोजगारी हा सर्वच समाजांपुढे प्रश्नचिन्ह बनून उभी आहे. आरक्षण शिक्षण व नोक-यांचे प्रश्न सोडवू शकेल हा एक भ्रम आहे. आरक्षनाने प्रश्न सोडविण्याऐवजी अनेक प्रश्न उभे केले असून आरक्षण लवकरात लवकर संपावे असे मतप्रवाह ओबीसी व एस.सी. समाजांतील काही विचारवंत निर्माण करत असतांना मराठा आरक्षनाच्या जोर पकडत चाललेल्या मागण्यांमुळे त्या दिशेने समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे हेही एक कटू वास्तव आहे. आरक्षनाने फायदा विशेष नसला तरी आपल्या आडातले (नसलेले) पाणी दुसरा पळवून नेईल या असुरक्षित भावनेचा जन्म ओबीसींच्या मनात झालेला आहे व त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी अशी अवांछनीय फूट समाजात पडली आहे.  ती सर्वस्वी चुकीची आहे. अशी फुट निर्माण होऊ नये यासाठी जाणत्या नेत्यांनी तरी प्रयत्न केले पाहिजेत. 

खरे तर आपल्याला नेमके कशावर लक्ष केंद्रीत करायला हवे हेच कोनाला समजेना झाले आहे. सर्वात प्रथम आपली शिक्षनपद्धती बदलावी लागनार आहे. जगण्याचे कसलेही कौशल्य अथवा कोणत्याही एका विषयातील तज्ञता न देणारी आपली शिक्षनपद्धतीच समूळ बदलवण्याची गरज असतांना त्याबाबतचे प्रबोधन करण्याऐवजी त्यात आरक्षण मागत जाणे हे सामाजिक आरोग्याचे चांगले लक्षण नाही. आज भारतात हाताला काम मागणा-यांचीच संख्या अवाढव्य आहे...काम देनारे हात वाढवण्यासाठ्दी मात्र कसलेही प्रयत्न होत नाहीत...हे कसले विचित्र चित्र आहे?
   
खरे तर बळावत चाललेली जातिव्यवस्था हे आपल्या समाजासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जातिआधारीत आरक्षणाला संपुर्ण नकार देत व्यापक आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी जी इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते तिचा भारतीय समाजात आणि म्हणुनच राजकीय नेतृत्वात पुरेपुर अभाव आहे हे स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील एक कीड मानली जाणारी जातिव्यवस्था समूळ नष्ट करत सशक्त, स्वाभिमानी आणि समतेच्या एकाकार तत्वावर उभारलेला बलशाली भारत निर्माण करण्याचे स्वप्न हे स्वप्नच उरले. देशाचा काही प्रमाणात विकास झाला परंतू तो आपल्या बळावर नव्हे तर परकीय भांडवलावर व परकीय कंपन्यांच्या जीवावर केला जातो आहे. सर्वच रोख आरक्षणावर ठेवल्याने विकासाच्या इतरही पर्यायांवर व्यापक चर्चा घडवुन आणत वंचितांचे आर्थिक व सामाजिक उत्थान घडवण्यासाठी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करता येणे शक्य होते, पण ते झालेले नाही. आता जे झाले नाही त्याबाबत उरबडवेपणा करण्यात अर्थ नसून आज आम्ही कोणत्या दिशेने जाण्यासाठी कटिबद्ध असायला हवे यावर चर्चा करायला नको काय? तसे न करता तरुणांची दिशाभूल करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणे, समाजात फूट पाडणे कोणत्या सुज्ञपणाचे लक्षण आहे? 

खरे तर सर्वच समाजांनी सत्ता ते रोजगार याबाबत परस्पर सहाय्यक होत आरक्षनाच्या कुबड्यांना फेकून देण्याची वेळ आली आहे. आज ओबीसींना फक्त आरक्षनामुळेच सत्तेत थोडाफार तरी वाटा मिळू लागला आहे. तो आरक्षनाशिवायच दिला गेला असता तर आज सौहार्दमय सामाजिक चित्र दिसले असते. सत्ताकेंद्रे आपल्या हातातून निसटू नयेत यासाठीचा हा आटापिटा आहे....मराठा तरुणांना खरोखर शिक्षण व नोक-यांत अधिक संध्या मिळाव्यात यासाठी नाही हेही या निमित्ताने समजावून घ्यावे लागणार आहे. 

Sunday, September 1, 2013

सांस्कृतिक अध:पतन; आमची जबाबदारी?

जागतिकीकरणाची सुरुवात होण्यापुर्वीचा भारत आणि नंतरचा भारत याची नुसती वरवर जरी तुलना केली तरी दोन्ही कालखंड सांस्कृतीकदृष्ट्या पुर्णतया विरोधाभासी आहेत हे सहज लक्षात येईल. १९९२ नंतर भारतीय जीवनाचे आर्थिक व सांस्कृतीक संदर्भ वेगात बदलले गेले. आता त्याची गती भोवळ आणेल एवढी वाढलेली आहे. अलीकडेच झालेली नरेंद्र दाभोळकरांची हत्या, महिला पत्रकारावरील व मतीमंद मुलींवर झालेले बलात्कार आणि आता संत म्हणवणा-या आसारामबापुला अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याबद्दल झालेली कोठडी आणि आसारामबापुच्या भक्तांनी घातलेला हैदोस आपल्या सांस्कृतीक पातळीने केवढा रसातळ गाठला आहे याचे हे विदारक चित्र आहे.

धर्म हा मानवी जीवनाला एक मानसिक आधार देणारा पुरातन काळापासुनचा अपरिहार्य घटक आहे. श्रद्धेने आपण संकटांतून तारून जावू असा विश्वास नाही अशी माणसे भुतलावर अत्यंत अल्पच असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक अत्यंत धुसर सीमारेषा असते हेही आपल्या सहज लक्षात येईल. असे असले तरी श्रद्धांचे अवडंबर माजवले जावू लागले कि त्या भिषण अंधश्रद्धांत बदलतात आणि तेथेच धर्म नामक संकल्पनेचे अध:पतन सुरु होते. जागतिकीकरणाच्या विज्ञाननिष्ठ काळात सहजीवनाचे, सहिष्णुतेचे आणि जातीभेदातीत जागतिक समाजाचे जे विचारवंतांचे स्वप्न होते ते इतके कोसळत गेले कि १९९२ पुर्वीचा भारत गरीब व आधुनिक तंत्रज्ञानांपासून दूर असला तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक बलशाली होता असेच म्हणायची वेळ आलेली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत मी खेड्यातच राहिलो आहे. तेंव्हा जातीभेद असले तरी सामाजिक जीवन बव्हंशी सहिष्णुच होते. एकमेकांच्या मदतीला धावून जायची प्रवृत्ती होती. इर्जिकी होत असत. आजचे ग्रामीण वास्तव एवढे बदलले आहे कि जातीच्या कुबड्यांखेरीज उभे राहणे जवळपआस अशक्य झाले आहे. जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी बळकट व अत्यंत असहिष्णू झाली आहे असे चित्र आपल्याला दिसते.

बुवा-बापू-प्रवचनकार-किर्तनकार तेंव्हा नव्हते असे नाही. परंतू त्यांना ब-याच प्रमाणात नैतिकतेची चाड होती. सामाजिक ददपणही त्याला कारणीभूत होते. अगदी शिक्षकही खरोखरच निष्ठेने आपला पेशा व त्याची प्रतिष्ठा जपत असत. परंतू आताचे वास्तव पाहिले तर बुवा-बापुंचा आध्यात्मिक धंदा पुर्णतया अर्थनिष्ठ बनलेला आहे. तो एक अवाढव्य उद्योग बनलेला आहे. आध्यात्मिकतेची जागा स्वैराचार आणि नैतिक भ्रष्टाचाराने घेतली आहे. हे धर्मसम्स्कृतीचे अध:पतन नव्हे काय? आणि याला जबाबदार कोण आहेत?

"धर्म ही अफुची गोळी आहे..." असे विधान कार्ल मार्क्सने केले होते. धर्मच नव्हे तर विज्ञान व अर्थसत्ताही जेंव्हा अफुच्या गोळ्या बनू लागत मानवी जीवनाला पुरते नशेत ढकलतात तेंव्हा नैतिकतेचे मापदंड बदलणे अपरिहार्यच होते. ज्या इश्वराने विश्व बनवले असे अध्यात्मवादी-धर्मवादी मानतात त्यालाच सोन्या-चांदीचे मुकुट-सिंहासने अर्पण करणारे, दान-देणग्या देणारे वायफळ भक्त जेंव्हा निर्माण होतात तेंव्हा श्रद्धेचेच मुलार्थ बदललेले असतात. परमेश्वरालाच भिकारी करून टाकणारी हे धर्मव्यवस्था आणि भक्ती सर्वस्वी त्याज्ज्य आहे हे अशा अगणित भक्तांच्या लक्षातही येत नाही. या देवांचे प्रतिनिधी म्हणवना-यांच्या पायी आपले शील  व संपत्ती अर्पण करु पाहणा-यांतच जेंव्हा स्पर्धा निर्माण होते तेंव्हा अशा बुवा-बापुंचे अनैतिक सआहस वाढतच जाणार व त्यातून आसारामबापुकडून घदले तसे प्रकार वाढण्याची संभावनाही बळावणार हे या अंध भक्तांच्या कधीही लक्षात येत नाही. खरे तर असे भक्त हे धर्मांचे व अध्यात्मांचे मारेकरी असतात हे लक्षात घ्यायला हवे.

आधुनिकतेच्या काळात आपला समाज नैतिक भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे असे चित्र दिसते. आपल्या संवेदनाही बोथट होत गेल्या आहेत असेही दिसते. याचे कारण म्हणजे अर्थप्राप्तीचे मार्ग नैतीक प्रेरणांनी प्रभावित नसून गैरमार्गांचाच अवलंब वाढलेला आहे. भ्रष्टाचा-यांना आणि अनीतिमानांना आता सामाजिक प्रतिष्ठा आहे. अशी अप्रतिष्ठा करुन घेतलेल्या समाजाला अधिकाधिक हाव असल्याने त्यासाठी अथवा आपले भ्रष्टाचार उघडकीस येवू नये यासाठी अशा बुवा-बापुंची व दैवतश्रद्धांची अधिकची निकड भासते. असे भक्तच मुळात अनीतिमान असल्याने त्यांचे आध्यात्मिक गुरुही त्याहुन अनैतिक असले-बनले तरी आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. आपल्या सामाजिक अध:पतनाचे ते एक प्रकट रुप आहे एवढेच.

अशी अध:पतने थांबवण्यासाठी जेंव्हा दाभोळकरांसारखे अविरत प्रयत्न करीत असतात त्यांची हत्या होणे अथवा हत्येच्या धमक्या मिळनेही तेवढेच क्रमप्राप्त होऊन जाते. प्रा. हरी नरकेंना व अण्णा हजारेंनाही "तुमचा दाभोळकर करून टाकू" अशा धमक्या अलीकडेच मिळालेल्या आहेत यावरून काय ते लक्षात घ्यावे. म्हणजे विचारांनाच मारून टाकायचा हा हिंसक उद्योग फोफावला आहे असे नाही काय? ज्या देशात गुन्हेगार सुरक्षित आहेत पण विचारवंत सुरक्षित नाहीत त्या देशाचे आणि त्या देशातील समाजांचे काय भवितव्य असणार आहे?

विचारांचा विरोध विचारांनी करावा असे म्हणने सोपे अहे परंतू जेंव्हा समाजातुन विचारच हद्दपार होतो तेंव्हा हत्येसारखी वरकरणी सोपी वाटनारी उत्तरे शोधली जातात. विचारकलहातुनच समाज अग्रगामी राहत असतो, प्रागतिक होत असतो आणि वारंवार स्वत:ला तपासत असतो. नवीन पुराव्यांच्या, संशोधनांच्या प्रकाशात आपली मते बदलत जात असतो. सामाजिक सुधारणा समाजस्वास्थ्यासाठी घडवून आणत असतो. परंतू आपली अवस्था वेगळीच आहे. जाती नष्ट व्हाव्यात असे म्हनणारेच स्वजातीच्या संघटना बांधतात. गतकाळातील स्वजातीय महनियाला पुढे आणीत आपसूक प्रस्थापित महनियांपेक्षा आमचीच महनिये कशी श्रेष्ठ होती याचे हिरीरीने दावे केले जातात. प्रसंगी इतिहासाची तोडमोडही केली जाते. स्वजातीय महनियांची चिकित्सा नाकारली जाते. असा समाज कधीही विवेकी आणि विज्ञाननिष्ठ होवू शकत नाही हे उघड आहे. अशा समाजअत बनतात त्या झुंडी. आज आपण अशा असंख्य झुंडींच्या विळख्यात सापडलेलो आहोत आणि त्याचे निराकरण कसे करायचे असा भयभीत प्रश्न यामुळे निर्माण होतो.

पण स्वजातशक्तीच्याच बळावर जेंव्हा न्याय्य हक्क मिळवावे लागतात आणि मिळतात असे वास्तव बनले असेल तर जातीय संघटनांना तरी कसा विरोध करायचा? मुळात आपली राजकीय व्यवस्था समतेच्या तत्वाचा सिद्धांत पाळते काय? न्याय्य प्रश्नांची उत्तरे जी व्यवस्था देत नाही त्या व्यवस्थेत द्वेषाचे आणि हिंसकतेचे स्तोम माजू लागले कि एक नवी अंधश्रद्धा तयार होवू लागते आणि तिचे निराकरंण करण्यासाठी राजकीय शक्तींनी जेवढे समानतेचे धोरण ठेवायला हवे ते ठेवले नाही कि जातीय अंधश्रद्धा फोफावणे स्वाभाविकच आहे. तिची परिणती अनेकदा हिंसकतेत झालेली आहे हे आपण आजवरच्या विविध सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनांत पाहिली आहे.

आम्ही अर्थसत्ता आणन्यासाठी अविरत धडपडत आहोत. राजकीय सत्तेतील सहभागाचे महत्व आता नव-जागृत जाती-समाज घटकांना
समजू लागले आहे. आपल्याला एकुनातीलच व्यवस्थेत डावलले जात आहे याचेही भान येवू लागले आहे. ही अस्वस्थता कधी उद्रेकात बदलेल याचा नेम नाही. परंतू साकल्याने विचार करून कायदे करत बसण्यापेक्षा न्याय्य वाटपाचे तत्वच अवलंबले तर किती प्रश्न सुटतील? परंतू शक्य तेवढे दमनच करायचे, शक्य तेवढे शोषणच करायचे अशा प्रवृत्ती बळावल्या आहेत हे आपले एक दुर्दैवी वास्तव आहे.

एकुणात आपण सर्वच घटनांकडे तुकड्यातुकड्यात न पाहता त्यांचे समग्र आकलन करून घ्यायला हवे. आसाराम बापुला अटक झाली अथवा कोठल्या तरी बलात्कार घटनेतले आरोपी पकडले...त्यांना फासावर लटकवा वगैरे मागण्या करून आपली सामाजिक भुमिका व जबाबदारी पार पडत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आपणा सर्वांनाच आपली विवेकशक्ती वाढवावी लागेल. एकुणातीलच समाजाचे सामाजिक भान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धर्म आणि निखळ धर्मश्रद्धा कोनाच्याही विरोधाचे विषय नाहीत. धर्माच्याच अंगाने पाहिले तरी या सर्वच घटना धर्मांनीच त्याज्ज्य ठरवलेल्या आहेत, अनीतिमान ठरवल्या आहेत हे धार्मिकांनीही लक्षात घ्यावे लागेल. ईश्वराचा कोणीही दूत, माध्यम अथवा प्रतिनिधी नसतो. असू शकत नाही. मनुष्य आणि परमेश्वर यांच्यात थेट संवाद असू शकतो...मध्यस्थाची गर नाही...असे मध्यस्थ हे भोंदूच असतात याचे भान धार्मिकांनी ठेवायला हवे. नैतीकतेचा उद्धार झाल्याखेरीज तुमच्या धर्माचा कसा उद्धार होवू शकतो?  

यावर प्रकट आणि खुल्या मनाने सर्वांनीच चिंतन केले पाहिजे अन्यथा आमच्याच पुढच्या पिढ्या सर्वार्थाने विनाशपथ चालतील याबाबत शंका बाळगायचे कारण नाही.

Thursday, August 29, 2013

आम्ही अर्थभान कसे विसरलो?

आम्ही अर्थभान कसे विसरलो?


भारताची जागतिकीकरणाची सुरुवातच मुळात अगतिकतेतून सुरू झाली होती. भारताला परकीय गंगाजळी संपली म्हणून सोने गहान ठेवावे लागले होते हा इतिहास आपल्या लक्षात असेलच. कै. नरसिंहरावांनी ढासळलेल्या, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला तारण्यासाठी अर्थव्यवस्था खुली करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे अर्थव्यवस्था तरली आहे असे चित्र जरी सुरुवातीला दिसले असले तरी तिचा पाया पोकळ आहे हे आपल्या अर्थतज्ञांनी लक्षात घेतले नाही. बदलत्या व्यवस्थेचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदाच घेणा-यांची संख्या आपल्या देशात अधिकची निघाली. आज आपण त्याचे परिणाम आर्थिक आणि सांस्कृतीक पडझडीच्या रुपात भोगत आहोत.
खरे तर भांडवलबाजार हा देशाच्या ख-या अर्थस्थितीचे प्रतीक नसतो. भांडवलबाजारातील चढ-उतार आणि अर्थव्यवस्थेतील चढउतार यांचा फारच कमी संबंध असतो. किंबहुना भागभांडवल बाजारातील गुंतवणुक ही नेहमीच जुगाराच्या पातळीवर वावरत असते. आयपीओ अथवा कर्जरोख्यांच्या रुपात एखादी कंपनीच उत्पादक कार्यासाठी भांडवल उभारते तेंव्हाची बाब सोडली तर एरवीची भांडवलबाजारातील गुंतवणूक ही ख-या उत्पादकतेशी कधीच जोडलेली नसते.तो पैसा कधीही कंपन्यांकडे उत्पादकतेसाठीए जात नाही तर दलालांच्या साखळेतून फिरत राहतो. भांडवलबाजार खरे तर भावनिक लाटांवर चालणारा शासनमान्य जुगार असतो. परंतू हे लक्षात न घेतल्याने हर्षद मेहता ते केतन पारेख जन्माला आले. लक्षावधी गुंतवणुकदारांना देशोधडीला लावू शकले. आजही आपला भांडवलबाजार नेमका कशासाठी आहे याचे भान आपल्याला नाही. जी गुंतवणूक प्रत्यक्ष वस्तूउत्पादन अथवा सेवांउत्पादनात जाणार नाही तिला गुंतवणूक कसे म्हणता येईल हा विचार आमच्या अर्थतज्ञांना शिवला नाही. तसे प्रबोधनही केले गेले नाही.
परकीय भांडवल जे शेयर मार्केटमद्ध्ये येते ते मुळात स्थायी गुंतवणूक या स्वरुपात नसल्याने ते कधीही काढून घेतले जाऊ शकते हा विचार का केला गेला नाही? आपला भांडवलबाजार अचानक चढतो काय, कोसळतो काय याचा वास्तव अर्थव्यवस्थेशी काय संबंध असतो? विदेशी गुंतवणूकही बव्हंशी स्थायी पायाभुत संपत्तीत गुंतवली गेलेली नसून परताव्यांच्या अपेक्षांत आभासी समभागांत गुंतवली गेलेली आहे याचे भान आपण ठेवलेले नाही. या गुंतवणूकीचा देशी उत्पादकता वाढवण्यासाठी काहीही उपयोग नाही याचे भान आम्ही ठेवायला हवे.
या गुंतवणुकीमुळे भारताच्या एकुण सकल उत्पादनांवर कसलाही फरक पडणार नाही कारण मुळात ती उत्पादक कार्यात गुंतवली गेलेली नाही. अशा गुंतवणुकी होतात आणि काढुनही घेतल्या जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेवर तिचा सकारात्मक परिणाम होत नसून ती केवळ कृत्रीम फुगवटा निर्माण करीत असते. मग ही गुंतवणूक देशांतर्गतची असो कि परकीय चलनातून होणारी. परंतू नव्या अर्थव्यवस्थेच्या गारुडात अडकत जात आम्ही अर्थभान विसरलो.
आपली पडझड येथेच थांबत नाही. आम्ही जागतिकीकरणच मुळात अगतिकतेतून स्वीकारले असल्याने समान पातळीवरील जागतिक व्यवहार करण्याच्या अवस्थेत आम्ही कधीच नव्हतो. आपली आधीचे बंदिस्त अर्थव्यवस्था लायसेन्स राजच्या जर्जर रोगाने पछाडलेली होती हे वास्तव मान्य केलेच पाहिजे. आणि म्हणुनच ती अत्यंत चुकीचीही होती.
परंतू ती चूक दुरुस्त करण्यासाठी आत्मघातकी पर्याय निवडला गेला. खरे तर आधी देशांतर्गत खुली अर्थव्यवस्था निर्माण केली जायला हवी होती. देशांतर्गत स्पर्धा निर्माण करत देशी उद्योगांना स्पर्धेची सवय लावायला हवी होती. देशांतर्गत लायसेन्सराज संपवत अर्थव्यवस्था खुली करत देशी उद्योगांना स्पर्धेच्या वातावरनात आधी आणने गरजेचे होते. लायसेन्सराजमुळे अत्यंत आळशी बनलेल्या, संशोधन व विकासाकडे सर्वस्वी पाठ फिरवलेल्या, प्रतिगामी उद्योजकांना त्या सुस्ताईतून आधी बाहेर काढण्यासाठी हे अत्यावश्यकच होते. भारतात भांडवलाची चणचण नसून काळ्या पैशांच्या ओझ्याखाली दबलेली आपली अर्थव्यवस्था वरकरणी दरिद्र स्वरूप दाखवत आहे हेही आपल्या लक्षात आले नाही. अर्थव्यवस्था एकाएकी खुली केली गेल्याने अनैतिक मनोवृत्तीच्या उद्योजकांनी लाभाचे नवे मार्ग बनवले. विदेशी तंत्रज्ञान आयात करण्याची, संयुक्त उद्योग उभारण्याची होड लागली. फक्त कागदावरचे असंख्य उद्योग अस्तित्वात आले आणि भांडवलबाजारातून त्यासाठी (बुडवण्यासाठी) पैसेही उभारले गेले. कायदे दिवसेंदिवस कडक करावे लागले तरीही आजही प्रत्यक्ष परिस्थितीत फरक पडलेला नाही.
गरज नसलेल्या गरजा वाढवणे व गरजांपेक्षा अधिक उत्पादन करणे हा नव्या अर्थव्यवस्थेचा मूलमंत्र आहे. भारतात वाहिन्या आल्या त्या मुळात या देशाला सुसंस्कृत-प्रगल्भ करायला नव्हे तर एक नवी कर्जाधारीत संस्कृती निर्माण करण्यासाठी. मानवी जीवनाचे नसलेले अवास्तव रुप आजच्या असंख्य वाहिन्यांवरील अगणित कार्यक्रम दाखवत असतात. भारतीय समाजाची एकुणातील मानसिकताच बदलवायला या वाहिन्यांनी हातभार लावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ही मानसिकता सकारात्मकतेत बदलवण्याऐवजी ती अवास्तव स्वप्ने पहायला भाग पाडत निष्क्रीय जीवन जगायला प्रेरीत करणारी, नैतीक प्रेरणांचे हनन करणारी आणि इझी मनीच्या जोखडात गुंतवणारी बनू लागली. या नव-अर्थव्यवस्थेचा घोंघाव एवढ्या वेगाने झाला कि त्या चकाचौंधीने व तात्पुरत्या दिसलेल्या फायद्यांनी आपण चुकीची वाट पकडली आहे हेच आपल्या लक्षात आलेले नाही.
शाश्वत अर्थव्यवस्थेचा मुलभूत नियम असतो तो म्हणजे गरजांवर नियंत्रण आणि अनुत्पादक कर्जांपासून पूर्ण फारकत. परंतू आपला समाज या लाटेत एवढा सापडला आहे कि त्यामुळे आपलीच अर्थव्यवस्था आपण पोखरत आहोत याचे भान उरले नाही. एवढेच नव्हे तर यामुळे आपण एकुणातील समाजमानसिकतेचेही नुकसान करत आहोत हेही लक्षात आले नाही. त्याचे केवळ आर्थिकच नव्हेत तर सामाजिक दु:ष्परिनाम आपण आता भोगू लागलो आहोत. आपल्या ब्यंका अशा अनुत्पादक अतिरेकी कर्जांचे विशिष्ट समुहांना वाटप केल्याने खरे तर कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. ज्या कर्जांच्या परतफेडींची कसलीही शक्यता नाही अशी बुडित कर्जांची रक्कम पाहिली तर भोवळ येइल. साडेसहा लाख कोटी एवढी रक्कम आज बुडित आहे. यात खरेच व्यवसाय अडचणेत आल्याने बुडित कर्जांचे रक्कम अर्थातच कमी आहे. या लबाड्यांना वाव देणारी आपली अर्थव्यवस्था आहे.
नैतीक मूल्ये आभाळातून पडत नसतात अथवा शिकवून येत नसतात. अर्थव्यवस्था ज्या प्रेरणांना जन्म देते त्याचे अपरिहार्य प्रतिबिंब सामाजिक मानसिकतेवर प्डणे अपरिहार्य असते. संयमाचा कडेलोट, सहिष्णुतेचा व विवेकवादाचा अंत आणि मानवी नातेसंबंधांत येणारा अंतराय आपल्या अर्थव्यवस्थेचाच एक अपरिहार्य भाग आहे हे वास्तव आम्ही आता तरी लक्षात घ्यायला हवे. अलीकडीलच हत्याकांडे असोत, बलात्कार असोत, अब्जावधी रुपयांचे आर्थिक गुन्हे असोत, ब्रष्टाचाराला असलेले जनसमर्थन असो...दिवसेंदिवस समाजमन बधीर करणा-या घटनांमागील मानसिकतेचा विचार करून पहा, म्हणजे मला काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल. जी अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारली आहे तीच मुळात भारतीय मानसिकतेच्या विपरित आहे. तिचा पाया हा बव्हंशी "मागणा-यांच्या" बाजुचा आहे...देणा-यांच्या नव्हे. आता जेही अर्थव्यवस्थेशी निगडित कायदे येवू घातले आहेत ते बाहेरील गुंतवणूक मागण्यासाठी आहेत...देण्यासाठी नव्हेत. देशांतर्गत उद्योजकता वाढावी यासाठी आमचे काय प्रयत्न आहेत? बाहेरच्या कुबड्यांनी राष्ट्राची खरी व शाश्वत प्रगती होत नसते हे आपल्या लक्षात आलेले नाही. आपण जागतीक अर्थव्यवस्थांबरोबर बरोबरीच्या नात्याने व्यवहार जोवर करू शकण्याच्या स्थितीत येत नाही तोवर अशा निर्णयांचे दुरगामी अनिष्टच परिणाम होणार याबाबत शंका बाळगू नये.
भारताला पुन्हा शाश्वत अर्थव्यवस्थेची कास धरावी लागणार आहे. अमर्याद गरजा कृत्रीमपणे निर्माण करत जात विक्र्या वाढवत फोफावते आहे असे दिसणारी आणि म्हणुणच आकर्षित करनारी अर्थव्यवस्था ही एक मृगजळ आहे. त्यातून जी तथाकथित प्रगती साधली जाते आहे तीतून कोणत्या मानवी प्रेरणांचे विकसन होणार आहे हा आपल्या समोरचा ज्वलंत प्रश्न आहे. समाज-सांस्कृतीक समस्यांचे मूळ अर्थविषयक प्रेरणांत असते...अर्थव्यवस्थेत असते. तिच्या जगड्व्याळ चक्रातून जे समाज घटक अपरिहार्यपणे दूर ढकलले जातात त्यांना येणारे वैफल्य कोणत्या घटनांतून प्रकट होतेय याचे चित्र आपण रोजच्याच निराशच करणा-या वृत्तांतून पाहू शकतो.
आपल्याला पुन्हा एकदा आपल्या अर्थप्रेरणा तपासून पहायला हव्यात. शाश्वत अर्थव्यवस्थाच चिरंतन असते हे लक्षात घ्यायला हवे. आम्हाला अर्थभान हरपून चालणार नाही.

Monday, August 19, 2013

सांस्कृतिक धोरणाचे काय झाले?

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण प्रकाशन

ज्या समाजाची संस्कृती प्रगल्भतेच्या व अधिकाधिक समृद्धीच्या वाटेवर असते तोच समाज सुसंस्कृततेचे मानदंड गाठण्यास व प्रगतीशील राहण्यास योग्य समजला जातो. संस्कृती ही विविध मानवी प्रतिभेच्या विविध व समर्थ अभिव्यक्तींतून आकाराला येत असते. भाषा, साहित्य, नाट्य, संगीत, शिल्पकला, चित्रकला, राजनीति ते नगररचनाशास्त्रातून संस्कृतीचा एकुणातील आविष्कार होत असते. ती प्रगतीशील रहावी, नवविचारांचे-संकल्पनांचे सृजन करणारी व सर्वसमावेशक असावी असे प्रयत्न होण्याची गरज असते. महाराष्ट्र राज्य हे देशातील एक पुरोगामी राज्य मानले जात होते. परंतू अलीकडे महाराष्ट्राचा एकुणातील संस्कृती विकासाचा वेग इतर राज्यांपेक्षा कमी झाला आहे असा आरोप अनेक विचारवंतही करू लागले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे असे सांस्कृतिक धोरण असावे कि ज्यायोगे संस्कृती विकसनाची गती वाढेल आणि त्यात सर्वसमावेशकता येईल यासाठी २००९ मध्ये राज्य शासनाने डा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने अभ्यास करुन व जनतेकडुनही सूचना मागवून आराखडा निश्चित केला आणि राज्य शासनास सोपवला. या अहवालाचे प्रकाशन ७ जून २०१० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याला आता तीन वर्ष होऊन गेली आहेत. अद्याप या अहवालातील कोणत्याही  शिफारशींवर घोषणांच्या पलीकडे आणि काही फुटकळ प्रशासकीय सूचनांवरील अंमलबजावणीपलीकडे काहीही काम झालेले दिसत नाही.  विचारवंत-साहित्यिकांना खूष करण्यासाठी समित्या नेमायच्या आणि त्यांच्या शिफारशींवर कोणतेही पाऊल उचलायचे नाही ही आपली शासकीय संस्कृती योग्य नाही. सांस्कृतिक संवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे कार्य शासनाला पार पाडावेच लागते मात्र त्याचे भान हरपलेल्या राजकीय संस्कृतीमुळे आपले शासनकर्ते विसरले आहेत कि काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

डा. साळुंखे समितीने सांस्कृतिक धोरणामागील भुमिका स्पष्ट करतांना नमूद केले आहे कि, हे धोरण १. भारतीय संविधानाची मूळ उद्दिष्टे साध्य होतील, अशा रितीने आखण्यात आले आहे. २. सर्व समाजघटकांना आपापल्या विधायक सांस्कृतिक जीवनमूल्यांची जपणूक करण्यासाठी स्वातंत्र्य देणारे व साहाय्य करणारे आहे परंतु त्याबरोबरच आपल्यापेक्षा वेगळी सांस्कृतिक मूल्ये मानणाऱ्या समाजघटकांशी सुसंवाद साधणे आणि त्यांना समजावून घेणे हे स्वतःला अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, ही जाणीव वृद्धिंगत करणारे आहे. ३. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक अंगांना सामावून घेणारे आहे. ४. सर्व उपक्रमांमध्ये शासनाचे प्रोत्साहन, साहाय्य इत्यादी देताना समाजाच्या विविध घटकांना आणि त्या त्या घटकांतील महिलांना उपक्रमांच्या स्वरूपानुसार यथोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी बांधील आहे. ५. राज्याच्या सर्व भागांतील जनतेला लाभदायक ठरणारे आहे. ६. समाजाच्या सर्व घटकांतील आणि संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांतील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी व विकास साधण्यासाठी यथोचित उपक्रम राबविणारे आहे. ७. सर्वांना आत्माविष्काराच्या सुयोग्य संधी देणारे आहे. ८. महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील विविध सांस्कृतिक घटकांबरोबरची नाळ तुटू न देता समग्र भारतीय संस्कृतीबरोबरचे नाते दृढ करणारे आहे. ९. जागतिकीकरणाचा वेध घेत, भारताबाहेरील समाजांच्या संस्कृतींशी आदानप्रदान करीत विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी विचारांवर भर देणारे आहे. १०. महाराष्ट्राच्या परंपरेतील सध्याच्या काळात अभिमानास्पद ठरणाऱ्या उज्ज्वल वारशाची जोपासना करणारे, तसेच नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे आहे. ११. व्यक्तीचे स्वातंत्र्य व समाजाचे हित यांच्यामध्ये संतुलन साधून त्यांना परस्परपूरक बनविणारे आहे. १२. केवळ नियम/कायदे करण्यावर विसंबून राहण्यापेक्षा समाजात इष्ट परिवर्तन व विकास घडविण्याचे उद्दिष्ट बाळगून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्यावर भर देणारे आहे. १३. राज्यशासन सध्या राबवीत असलेले व विद्यमान काळाशी सुसंगत असे उपक्रम अधिक परिणामकारकरीत्या कसे राबविता येतील आणि वरील सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी या उपक्रमांमध्ये समन्वय कसा साधता येईल, याचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. तसेच, विविध उपक्रमांची नव्याने भरही घालण्यात आली आहे. १४. हे धोरण योग्‍य त्‍या क्रमाने व टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने राबविण्‍यात येईल.

वरील भुमिका अत्यंत स्वागतार्ह आणि मराठी संस्कृतीच्या रक्षणास, विकसनास, आणि सर्व सामाजिक घटकांच्या सांस्कृतिक उद्गारांस सबल बनवत सांस्कृतिक एकोप्याकडे नेणारी आहे याच्याशी कोणीही सुजाण नागरिक सहमत होईल. या समितीने केलेल्या प्रशासकीय शिफारशी मी येथे देत नसून महत्वाच्या सांस्कृतिक शिफारशी खालीलप्रमाणे देत आहे...

१. दक्षिण आशिया संशोधन संस्था -' गेल्या ५० वर्षांत केंद्र शासनाच्या साहाय्याने अन्य काही राज्यांत प्रगत संशोधन संस्था निर्माण झाल्या असल्या, तरी महाराष्ट्रात अशा संस्था निर्माण झालेल्या नाहीत, हे वास्तव ध्यानात घेऊन दक्षिण आशिया मधील (‘सार्क’ राष्ट्रांचा) विविधांगी अभ्यास करणारी एखादी संस्था महाराष्ट्रात निर्माण करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल आणि अशी संस्था स्थापन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
२. प्रमाण भाषा कोश - मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. अशा प्रकारचा प्रमाण भाषा कोश तयार करण्यासाठी 'प्रमाण भाषा कोश मंडळ' स्थापन करण्यात येईल. मराठी प्रमाण भाषेच्या समृद्धीसाठी मराठी प्रमाण भाषेमध्ये प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषांसह मराठी भाषेच्या विविध बोलींतील निवडक शब्दांचाही आवर्जून समावेश करण्यात येईल. याशिवाय भारतातील अन्य भाषांतून आणि विदेशी भाषांतून स्वीकारण्यात आलेले आणि आता मराठीत रुळलेले शब्दही विचारात घेतले जातील.
३. मराठी बोली अकादमी - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणाऱ्या कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र ‘मराठी बोली अकादमी’ स्थापन करण्यात येईल. .
४. लेखनपद्धती/वाक्प्रयोग-पुनर्विचार - गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि अधिक लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहांचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटामार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच, मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्प्रयोग इत्यादींचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनर्विचार केला जाईल.
५. कलासंकुल - प्रयोगात्म व दृश्यात्मक कलांच्या संवर्धनासाठी विभागीय पातळीवर प्रत्येक महसुली विभागात 'कलासंकुल' उभारण्यात येईल. या संकुलांमध्ये नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, लोककला, आदिवासी लोककला, हस्तकला इत्यादींसाठी प्रशिक्षण, तालीम आणि सादरीकरण इ. साठी सोयी असतील. या सोयी भाडेतत्त्वावर कलाकार आणि सांस्कृतिक संस्था यांना उपलब्ध असतील. अशी संकुले उभारण्यासाठी शासन प्रत्येक विभागीय महसूल आयुक्तालयाला निधी उपलब्ध करून देईल.
६. खुले नाट्यगृह -प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह (ऍम्फी थिएटर) आणि जिल्हा पातळीवर एक छोटेखानी, सुमारे ३५० ते ५०० आसनक्षमतेचे नाट्यगृह खाजगी सहभागाने बांधण्यात येईल. ते मुख्यत्वे सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जाईल.
७. शास्‍त्रीय संगीतासाठी प्रोत्‍साहन योजना - मराठी रंगभूमी आणि लोककला यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने अलिकडेच दोन स्वतंत्र प्रोत्‍साहन योजना (पॅकेज) जाहीर केल्या आहेत. त्‍याच धर्तीवर शास्‍त्रीय संगीतासाठी अनेक उपक्रमांचा समावेश असलेली शास्त्रीय संगीत प्रोत्‍साहन योजना अमलात आणली जाईल. शिष्‍यवृत्‍ती, सन्‍मानवृत्‍ती, जीवन गौरव पुरस्‍कार, संगीतसभांना (‘म्‍युझिक सर्कल्‍स’ना) अनुदान, महाविद्यालयीन पातळीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्‍यासाठी अर्थसाहाय्य इ. उपक्रमांचा या योजनेत समावेश असेल.
८. ललित कला अकादमी – केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दृश्यात्मक कलेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ललित कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात येईल. अकादमीच्या अंतर्गत सुयोग्य ठिकाणी कलाग्राम स्‍थापन करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये पुढील सुविधा असतील- धातू ओतशाळा (मेटल फाउंड्री), ग्राफिक्‍स स्‍टुडिओ, सिरॅमिक फाउंड्री, प्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा (वर्कशॉप शेड), भाडेतत्त्वावर आवश्यक तितके स्‍टुडिओ, खुले नाट्यगृह (ऍम्‍फी थिएटर), अतिथिगृह इत्यादी.
९. संतपीठ - पैठण येथे स्‍थापन झालेल्‍या संतपीठाचे कार्य तांत्रिक अडचणी दूर झाल्‍यानंतर त्‍वरित सुरू करण्‍यात येईल. हे संतपीठ सर्व धर्मांतील व जातींतील मानवतावादाचा पुरस्‍कार करणाऱ्या संतांच्‍या विचारांचे व कार्याचे अध्‍ययन आणि अभ्‍यास करणारे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍यात येईल. शिक्षक व अन्‍य शासकीय कर्मचारी, तसेच सर्वसामान्‍य जिज्ञासू यांच्‍यासाठी लघुमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमांचे केंद्र, संतांच्‍या विचारांवर संशोधन करणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्‍यांसाठी संदर्भालय आणि विविध धर्मांतील व जातींतील संतांच्‍या विचारांचा/कार्याचा तुलनात्‍मक अभ्‍यास करण्‍यासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सदर संतपीठ विकसित करण्‍यात येईल.
१०. परदेशात अध्यासने - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात (अमेरिकेत) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात (ब्रिटनमध्ये) अध्यासन निर्माण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. ही अध्यासने शासनाच्या आर्थिक सहभागाबरोबरच त्‍या दोन्‍ही देशांतील तसेच आपल्‍या देशातील लोकांच्‍या सहकार्यातून निर्माण करण्‍याचे प्रयत्न करण्यात येतील.
११. सहजीवन शिक्षण -'स्त्री-पुरुषांनी परस्परांना नीट समजावून घ्यावे, त्यांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी पोषक ठरावे, असे सहजीवनाविषयीचे प्रबोधनात्मक शिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात येईल. यासाठी मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ व परिपक्व व्यक्तींकडून/शिक्षकांकडून असे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

या धोरणात अजुनही अनेक बाबींचा समावेश करणे आवश्यक होते. उदा. प्रशासकीय मराठी ही सामान्यांच्या आकलनापलीकडील व इंग्रजीची मदत घेतल्याखेरीज न समजण्यासारखी आहे. प्रशासकीय भाषा सोपी असावी यासाठीचा आग्रह धरणेही संयुक्तिक झाले असते. दुसरे म्हणजे जुन्या दुर्मीळ मराठी ग्रंथांचे डिजिटायझेशन. मल्हारराव होळकरांचे १८९३ साली प्रसिद्ध झालेले मुरलीधर अत्रेकृत मराठी चरित्र मला टोरोंटो विद्यापीठाने डिजिटायझेशन केले असल्याने उपलब्ध झाले. जे कार्य विदेशे विद्यापीठ करू शकते ते आपले महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही?  सर्वात महत्वाचे म्हनजे मराठीतील गाथा सप्तशतीपासून ते आधुनिक काळातील साहित्यिकांच्या निवडक श्रेष्ठ कलाकृतींचे इंग्रजी अनुवाद करून ते जगभरच्या विद्यापीठांच्या ग्रंथालयांत उपलब्ध करणे तेवढेच आवश्यक आहे. ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा हीच मागणी गेली अनेक वर्ष सातत्याने करत आले आहेत. परंतू त्याबाबत काही झालेले नाही. असे असले तरी मुळात डा. साळुंखे समितीच्याच शिफारशी धूळ खात पडून आहेत तेथे या नव्या मागण्या शासन कोठुन मान्य करणार आणि मान्य झाल्या तरी त्यावर कोण अंमलबजावणी करणार? त्यासाठी जनमताचाच रेटा वाढवावा लागेल हे निश्चित आहे. सर्वांनीच त्यासाठी आपला आवाज उठवला पाहिजे. मराठी संस्कृतीच्या वृद्धीसाठी ते आवश्यक आहे.

Tuesday, August 13, 2013

समाजव्यवस्थेला पंगू करणारे अन्नसुरक्षा विधेयक!



अन्न सुरक्षा विधेयक अनेक कारणांनी गाजते आहे. त्यात सामाजिक कारणे किती आणि राजकीय कारणे किती हा भाग अलाहिदा, परंतू स्वातंत्र्यानंतर आता ६६ वर्ष उलटून गेल्यानंतरही भारतात कुपोषणाचा प्रश्न भेडसावत असेल आणि त्यासाठी केवळ लोकप्रियतेसाठी निवडणुकांवर डोळा ठेवत असे विधेयक मांडले जात असेल तर आपल्याला या विधेयकाच्या अन्य काळ्या बाजुही तेवढ्याच प्रखरतेने पहायला हव्यात. सध्या सरकार शेतक-यांच्या हिताचे आहे कि अहिताचे आहे हा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीने उलट-सुलट निर्णय घेत आहे. येवू घातलेला नवीन भुमी अधिग्रहण कायदा, कमाल भूधारणा कायदा आणि अन्नसुरक्षा विधेयक ही अंतत: शेतक-यांचेच अस्थित्व संपवतील...मग अन्न सुरक्षा विधेयक राबवायला अन्न कोठून आणनार हा प्रश्न निर्माण होतो.

प्रत्येकाला सकस अन्न मिळायलाच हवे याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. किंबहुना तो मुलभूत मानवी अधिकार आहे व याची जाण आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. एकीकडे भारत महासत्ता म्हणुन पुढे येण्याचे स्वप्न पहात व दाखवत असतांना भारतात कुपोषनाचे प्रमाण प्रचंड आहे. मुले व स्त्रीया कुपोषणाच्या सर्वाधिक बळी ठरत आहेत. मेळघाटासारख्या आदिवासी भागात कुपोषणाने होणा-या बालमृत्युंचे प्रमाण शेकडो कोटींच्या योजना जाहीर करुनही कमी होत नाहीय. दुसरीकडे शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी होण्याचे नांव घेत नाहीय. शाळांत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे व त्यात सातत्यही रहावे म्हणून माध्यान्ह भोजनाची योजना चालुच आहे. एकार्थाने शाळा या भोजनघरे बनलेल्या आहेत. यामुळे शिक्षितांचे प्रमाण खरोखर किती वाढनार आहे हा एक वेगळाच प्रश्न आहे व त्याचे समाजशास्त्रीय अध्ययन अद्यापतरी झालेले दिसत नाही. पण जीही काही निरिक्षणे समोर येताहेत त्यावरुन विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण त्यांना पाचवी होवूनही साधी बाराखडी येवू नये इतके निकस बनले आहे हेही उघड आहे. थोडक्यात शासकीय योजना जनतेच्या व भावी पिढ्यांच्या हितासाठी आहेत कि त्यांचे अपरंपार नुकसान करण्यासाठी यावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

अन्न हा मानवाचा मुलभूत अधिकार आहे हे खरे आहे. परंतू यासाठी शासनाने महागात अन्न खरेदी करुन नगण्य किंमतीत दारिद्र्यरेषेखालील लोकांना वाटावे कि दारिद्र्यरेषेचाच नायनाट होईल यासाठी दीर्घमुदतीच्या योजना आखाव्यात व राबवाव्यात आणि बाजारभावाने हवे ते अन्न खरेदी करण्यासाठी त्याला सक्षम करावे हा आहे. हा फरक नीट लक्षात घेतला पाहिजे. आज सरकारे आकडेवा-या काहीही सांगत असल्या तरी दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या किमान ३५ कोटी एवढी अवाढव्य आहे. ही संख्या थोडकी नाही. सर्वच नसले तरी यातील किमान २० कोटी जनसंख्या कुपोषित आहे. या २० कोटींत बव्हंशी स्त्रीया आणि मुले आहेत. गर्भवती स्त्रीयांना पोषक आहार मिळत नसल्याने त्याचा परिणाम साहजिकच बालकांच्या आरोग्यावर होणे अपरिहार्य आहे. अन्नसुरक्षा विधेयकात गर्भवती स्त्रीयांसाठी योजना आहे हे खरे आहे पण त्यामुळे कुपोषण थांबेल काय हा कळीचा मुद्दा आहे.

दारिद्र्य रेषेखाली येणारे समाजघटक पाहिले तर त्यात अल्पभुधारक व कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर, भटके-विमुक्त असे वर्ग मोडतात. अजुनही अनेक विखुरलेले वर्ग आहेतच. आज अन्नधान्याचे उत्पादन करणारे बव्हंशी शेतकरीच दारिद्र्यरेषेखाली आहेत. अन्न १ ते ३ रुपये किलोच्या दराने सहज मिळू लागले तर ते अन्नधान्य पीकांची तुलनेनी महागडी जाणारी लागवड करतील काय हा खरा प्रश्न आहे. ते अन्य पीकांकडे वळण्याचीच शक्यता अधिक आहे. याचे कारण म्हणजे सरकार हमीभावाने जरी अन्नधान्याची खरेदी करत असले तरीही वाढत्या उत्पादन खर्चांमुळे छोट्या शेतक-यांना ते परवडत नाही. याचा एकुणातच अन्न-धान्य उत्पादनांवर किती परिणाम होणार आहे याचा अभ्यास झाला आहे असे दिसून येत नाही. परंतू अन्नधान्य उत्पादन ब-यापैकी कमी होण्याचा व नाईलाजाने आयात करण्याचा धोका यातून उभा राहू शकतो यावर पुरेशा गांभिर्याने विचार करण्याची निकड आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे (वितरणव्यवस्थेत त्रुटी राहणार नाहीत हे गृहित धरले तरी) स्वस्तात मिळनारे हे अन्न-धान्य कितपत सुपोषण करू शकेल हा आहे. रेशनवर सध्या उपलब्ध मालाचा दर्जा पाहता हा प्रश्न पडने स्वाभाविक आहे. योग्य व शास्त्रीय साठवणक्षमतेच्या अभावामुळे अन्न-धान्याचा दर्जा घसरत जातो. तेच अन्न-धान्य शेवटच्या गरजवंतापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या दर्जात होणा-या हानीचा विचार केला तर ते कितपत सकस राहील हा प्रश्नच आहे. त्यात अपेक्षितच असलेल्या लांड्या-लबाड्या-चो-या व भ्रष्टाचाराचा विचार केला तर ही अन्नसुरक्षा योजना बाबुशाहीला "आर्थिक सुपोषित" करण्यासाठीच वापरली जाईल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

सर्वांना पुरेसे अन्न मिळावे व तेही स्वस्तात हा मानवतावादी दृष्टीकोण झाला. तो बाळगणे वावगे म्हणता येणार नाही. परंतू त्याचे पुढचे समाजमानसशास्त्रीय तोटेही समजावून घेतले पाहिजेत. सध्याच्या एकुंणातीलच समाजपरिस्थितीत श्रमसंस्कृती लयाला जाऊ घातलेली आहे. अर्धशिक्षित तरुणांना आधीच शेतीत रस नाही पण जगण्याचे अन्य साधन नाही म्हणुन तो शेती करतो. आहे त्या उत्पन्नातून तो बाजारभावाने अन्न-धान्य विकत घेतो अथवा स्वत:च्या शेतीत पिकलेलेच अन्नधान्य वापरतो. अन्नसुरक्षा विधेयकामुळे जगणे स्वस्त झाले तर कष्ट करण्याच्या प्रवृत्तीही कमी होणार नाहीत याची हमी कोणीही देवू शकनार नाही. त्यासाठी शासनाची कोणती पर्यायी योजना आहे? शिवाय अन्नसुरक्षा विधेयकामुळे खरेदीदार (मग तो गरीब का असेना) आपले निवडस्वातंत्र्य कसे वापरणार? उपलब्ध आहे तो आणि त्याच दर्जाचा माल घेणे त्याच्यावर नकळतपने बंधनकारक होणार नाही काय? हा त्याच्या मुलभूत स्वातंत्र्याचा संकोच नव्हे काय? 

इंदिराजींनी गरीबी हटावचा नारा देऊन आता अनेक दशके उलटुन गेली आहेत. किंबहुना गरीबी हाच प्रत्येक निवडणुकीतील कळीचा मुद्दा राहिलेला आहे. तरीही आज अन्नसुरक्षा द्यावी लागण्याचा अर्थ गरीबी हटलेली नाही एवढाच होतो. प्रत्येक नागरिकाची क्रयशक्ती वाढत नाही तोवर अर्थव्यवस्था सबल होऊ शकत नाही हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. आज एवढ्या अवाढव्य लोकसंख्येची क्रयशक्ती अन्न-धान्यही विकत घेता येत नाही एवढी खालावलेली असेल तर सरकारने आपल्या शासनक्षमतेवर शरम बाळगली पाहिजे. गरीबीची व्याख्या काय आणि कोणाला दारिद्रयरेषेखालील मानावे याबाबतचे निकष (आणि अनेकांनी या संदर्भात तोडलेले तारे) वगळले तरी दारिद्र्य आहे आणि ते भिषण आहे हे वास्तव समजावून घ्यायलाच हवे. त्यासाठी सामान्यांची क्रयशक्ती वाढावी व या अवाढव्य श्रमशक्तीचे निर्मितीक्षमतेत कसे परिवर्तन करावे याबाबत आपले अर्थतज्ञ काय करत आहेत? त्यासाठी जर त्यांच्याकडे मनरेगासारख्या कुचकामी योजना असतील तर त्यांच्या तज्ञतेबाबतच शंका घ्यायला पुरेसा वाव आहे. या विधेयकामुळे अर्थव्यवस्थेवर काय ताण पडेल हाही प्रश्न आहे. त्याची भरपाई कोठुन करनार याचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. पण ताण पडायचाच असेल तर तो अधिक उपयुक्त पद्धतीने पडला तर त्यात वावगे वाटनार नाही. निरर्थक ताण हा अर्थव्यवस्थेला मारकच ठरेल हेही आपल्याला लक्षात घेतले पाहिजे.

खरा प्रश्न आहे तो अन्न-धान्य स्वस्तात देण्याचा नसून लोकांची एकुणातील क्रयशक्ती कशी वाढवायचा हा आहे, होता आणि पुढेही राहील. ख-या प्रश्नांना सोडवण्यात अपयश आले कि त्यावर सोपी पण तकलादू उत्तरे फेकून त्यांचे मतांत रुपांतर करण्यात सर्वच राजकारणी तरबेज झालेले आहेत. अन्नसुरक्षा विधेयक हा त्यातीलच एक भाग आहे. यामुळे कुपोषण कमी होईल हा तर निखळ भ्रम आहे. एक तर आपल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्रीयांचे स्थान दुय्यम असल्याने व तिच्याकडुन पुरुषापेक्षाही अधिकची राबवणुक करुन घेण्याची प्रवृत्ती असल्याने अगदी फुकटात मिळाला तरी तिच्या वाट्याला पुरेसा पोषक आहार येण्याची हमी कोणीही घेऊ शकत नाही. गर्भावस्थेच्या काळात तिला मोफत भोजन पुरवले म्हणजे सक्षम अपत्ये जन्माला येतील हाही अवैज्ञानिक भ्रम आहे कारण तिची शारीरस्थिती ही आधीपासुनच दुर्बल बनलेली असेल तर या सहा-नऊ महिन्यांच्या भोजनाने त्यात कितीसा फरक पडणार आहे?  मला वाटते यावरही विचार करण्याची गरज आहे. आणि यावरील उत्तर हे समाजव्यवस्थेच्याच मुळात आहे व ते बदलवण्याचे कार्य अन्नसुरक्षा विधेयक कसे करू शकणार आहे?

प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. त्याला रोजगाराचा हक्क आहे. रोजगार हक्क वाढवत...त्याचे मूल्य वाढवत त्यातून अधिक मुल्यवर्धकतेची कामे करून घेत प्रत्येकाची क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी योजनांची गरज आहे. त्या सक्षमतेने राबविण्याची गरज आहे. त्यातुनच त्याच्या निवडस्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे रक्षण होईल. आजही असंख्य सामाजिक घटक हे आपल्या एकुणातील अर्थव्यवस्थेच्या परिघाबाहेर आहेत. भटक्या-विमुक्तांचा यात लक्षनीय समावेश आहे. त्यांच्याकडे तर साधी राशनकार्डेही नाहीत. त्यांच्यासाठीच आजतागायत जे सरकार काहीच करू शकले नाही, ज्यांना साधी सामाजिक सुरक्षा नाही, ज्यांना नागरिक म्हणुन ओळखले जात नाही...त्यांचे काय करायचे? जेथे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे ते बाजूला ठेवत लोकप्रियतेच्या लाटांवर वाहून जायचा ज्यांचा मानस आहे त्यांना एक प्रश्न विचारायला हवा तो हा कि आजवर अनेक राज्यांत प्रादेशिक पक्ष स्वस्त धान्याच्या घोषणा देत निवडुन आलेले आहेत...त्यांच्या या घोषणांचे काय झाले? किती लोक अन्नसुरक्षा प्राप्त करू शकले?

अन्नसुरक्षा विधेयक हे समाजाला व अर्थव्यवस्थेला पंगू करणारे ठरेल त्यामुळे त्याचा गांभिर्याने विरोध झाला पाहिजे व अधिक सक्षम पर्याय पुढे आणला गेला पाहिजे.


Thursday, August 1, 2013

मग इच्छामरण का नको?


मानवी जीवनव्यवहारांना सर्वच पातळ्यांवर व्यापून वावरत असलेला मृत्यू हा नेहमीच तत्वज्ञ-संशोधकांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. जगातील सर्वच धर्म अंतत: मृत्यूविषयीच्या भयातून निर्माण झालेले आपण पाहू शकतो. मृत्युनंतर काय याबाबत मार्गदर्शन नाही असे जगात अपवादात्मक धर्म आहेत. बव्हंशी तत्वज्ञाने अंतत: मृत्यूभयावर विजय मिळवत, असुरक्षित जीवनाला आध्यात्मिक पातळीवर सुरक्षिततेचा आभास कसा मिळु शकेल हे दर्शवण्यासाठी तत्वज्ञांचे बव्हंशी लेखन झाले आहे हेही आपल्या लक्षात येईल. किंबहुना नीतिशास्त्राचीच उपज ही आदिम मानवी भयावर मात करण्यासाठी झाली आहे. विज्ञानही मनुष्य अमर जरी नसला तरी त्याचे एकुनातील आयुष्य कसे वाढेल या प्रयत्नांत आहे. स्वत: अमर नसलो तरी देवता अमर्त्य आहेत ही श्रद्धा बव्हंशी धर्म व्यक्त करतात व त्यांच्या पूजा-प्रार्थनांनी अंतिम मोक्ष, साल्वेशन, निब्बाण इ. प्राप्त होइल अशी आशाही दाखवतात.

म्रुत्यू कोणाला सहसा नको असतो. किंबहुना तो कसा लांबविता येईल असाच प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. महाभारतात यक्षप्रश्नांत यक्ष युधिष्ठिराला विचारतो कि "यच्चयावत विश्वात सर्वात मोठा विनोद कोणता आहे?" यावर युधिष्ठिर जे उत्तर देतो ते खूप मार्मिक आहे. तो म्हणतो, "प्रतिक्षणी मनुष्य कोणा-न-कोणा जीवाला मरतांना पाहत असतो...पण आपण स्वत: मात्र मरणार नाही यावर त्याचे श्रद्धा असते...आणि हाच सर्वात मोठा विनोद आहे."

जीवांच्या जैविक प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू असे आपण मानतो. ही अपरिहार्य घटना नैसर्गिक वृद्धापकालाने जशे घडुन येते तशीच ती युद्धांत, नैसर्गिक प्रकोपांत, अपघातांत, खूनादि घटनांतही घडुन येते. किंबहुना अनिश्चित असणे हेच मृत्युचे भय वाटण्याचे मोठे कारण असते. फाशीची शिक्षा झालेल्यालाही आपण नेमके कधी टांगले जाणार आहोत हे माहित नसते. काहीतरी चमत्कार घडेल आणि आपण वाचू ही अजरामर आशा प्रत्येकाच्याच मनात जीवित असते. मृत्युच्या छायेखाले जगणा-यांचे जीवन भयचकित करते. अना फ्र्यंकची (Anna Franc) डायरी हादरवून सोडते ती यामुळेच.

असे असले तरी आत्महत्याही घडत असतात. स्वत:चे जीवन स्वत: संपवणे हा नुसता कायदेशीर नव्हे तर नैतीक/धार्मिक गुन्हा मानला जातो. जन्माला आल्यानंतर व्यक्ति ही स्वतंत्र उरत नसून ती एकुणातील समाजाशी उत्तरदायि असते असा भाव त्यामागे आहे. व्यक्तीवर समाज गुंतवणुक करत असतो. त्यात शिक्षण ते साधनसामग्रीतील त्याच्यावर खर्च होणारा हिस्सा त्याने आपल्या परीने भर घालत चुकता करावा अशीच "लेन-देन" भावना त्यामागे असते. त्याला नैतिक अधिष्ठाण चिकटवले जाते हा भाग मानवी व्यावहारिकतेशी सुसंगतच आहे.

असे असले तरी स्वेच्छामरण हा पुरातन काळापासून चालत आलेला एक मार्ग आहे. स्वेच्छेने देवतांना बळी जाणे, बळी म्हणुन विकले जाणे याबरोबरच जीवंत समाधी घेणे, स्वत:ला पेटवून घेणे अथवा जलसमाधी घेणे असे अनेक मार्ग अगदी अलीकडच्या कालापर्यंत आपल्याला पहायला मिळतात. सती प्रथेतही अनेक स्त्रीयांनी स्वेच्छेने सती जाणे स्वीकारले आहे हेही एक वास्तव आहे. पुरातन काळी आपण अशा अगणित घटना पाहू शकतो. इच्छामरणाचे वरदान वगैरे भाकड भाग बाजुला काढला तरी भीष्मांनी स्वत:च मृत्यू स्वीकारला. द्रोणानेही तसेच केले. गांधारी, कुंती व धृतराष्ट्र यांनीही वणव्यात स्वत:ला जाळुन घेतले. कृष्णाचा मृत्युही जवळपास याच श्रेणीत जातो. यांतील सत्य अथवा रुपकात्मता काहीही असो, स्वेच्छामरणाचे आकर्षण समाजांत या ना त्या पातळीवर वावरत होते एवढे तरी आपण निश्चयाने म्हणू शकतो आणि स्वेच्छामरणांना (आत्महत्या नव्हे) सामाजिक/सांस्कृतीक विरोध असल्याचे दिसत नाही.

"आपले जीवन तृप्त झाले आहे अथवा आपले लौकिक कार्य संपले आहे या भावनांनी विचारपूर्वक केलेला निर्णय व त्याची अंमलबजावणी म्हणजे स्वेच्छामरण" असे आपण वरकरणी म्हणु शकतो. पण त्रुप्तता अथवा लौकिक कार्य हे शब्द फसवे असून केवळ भावनिक असू शकतात हेही उघड आहे. ज्ञानेश्वरांनी आपले लौकिक कार्य संपले असे घोषित करुन समाधी घेतली हे आपण जाणतो. आपले लौकिक कार्य संपले आहे हे वयाच्या चोविसाव्या (त्यांच्या समाधीसमयीच्या वयाबाबत गोंधळ आहे...पण ते तरुणच होते एवढे स्पष्ट दिसते.) वर्षी ठरविणे म्हणजे स्वार्थाचा भाग आहे कि आध्यात्मिक त्रुप्तीतून आलेला तो निर्णय आहे? आपण त्याबाबत भाष्य करू शकत नाही. पण इच्छामरण हे सर्वच स्थितीत योग्यच असते असे सरसकट म्हणता येणार नाही.

प्रायोपवेशन, संथारा हेही मार्ग इच्छामरणासाठी वापरले जातात. सावरकरांनी प्रायोपवेशन करून आपले जीवन संपवले होते. जैन धर्मात आजही वृद्धापकाळी संथारा घेत जीवन संपवले जाते. यासाठी तरी कायद्याचा अडसर दिसून येत नाही. परंतू दुस-यांच्या मदतीने पण स्वेच्छेने मरण स्वीकारणे याला कायद्यात मान्यता नाही. हा एक विरोधाभास आहे असे मला वाटते.

गेल्या शतकापासून मानवी जीवन अत्यंत गतीमान झालेले असून प्राचीन नैतिक जाणीवा पराकोटीच्या बदललेल्या आहेत. एकुणातील स्थिर समाजव्यवस्थाच ढवळुन निघाली असून मानवी नातेसंबंध नवीन मित्या धारण करत आहे व त्यातील गतीशास्त्रही विस्मित करनारे आहे. कुटुंबपद्धती पासून ते स्त्री-पुरुषसंबंधांत नवे ताण-तणाव प्रत्यही निर्माण होत असून कायदा अथवा समाजशास्त्रही त्यावर फारसा सुखकर तोडगा काढू शकलेले नाही हे आपण रोजच पाहतो. काळ बदलला नसून माणसे बदलली आहेत कारण काळ घडवणारी मुळात माणसेच आहेत. असे असले तरी जीवनातील व्यामिश्रता आता समाजकेंद्रीत न होता व्यक्तिकेंद्रीत झाल्याने एक भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

आधुनिक विज्ञानाने मानवी जीवनमान वाढले आहे हे खरे आहे पण ते आरोग्यदायी असतेच असे नाही. शारीर व्याधी ते दोन पिढ्यांतील संघर्षमुळे उतारकाळ हा त्रूप्त नव्हे तर वेदनादायक (शारीर आणि मानसिक पातळीवर) बनत चालला आहे. एकाकीपणा, थकलेली वा व्याधीग्रस्त गात्रे, भावनिक आधारांची कमतरता तर कोठे होणारा छळ यातून खुप मोठा वर्ग आज चालला आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत असली तरी ती पुरेशी नाही. ती व्यवस्था व उपचार परवडु न शकणारा तर फार मोठा वर्ग आज अस्तित्वात आहे. अलीकडेच (मे १३) गुजराथमधील एका मराठी दांपत्याने मुलगा व सुनेकडून होणा-या छळाला कंटाळून जिल्हाधिका-याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. अशी असंख्य प्रकट-अप्रकट प्रकरणे नित्यश: घडत असतात. याचा निर्वाह नेमका काय हा आपल्या समाजशास्त्रज्ञांसमोरील मुख्य प्रश्न असला पाहिजे.

व्याधीग्रस्त, दुर्लक्षित अवस्थेत, सृजनशीलतेचा अस्त झाल्यानंतर अपमानित जीवन अन्यांच्या मेहरबानीवर जगणे व तसे जगायला नैतिक व कायद्याचा विचार करून भाग पाडणे हीच अनैतिकता आहे असे म्हणता येते.  कोणत्याही सामाजिक संस्था अशा समस्या पुर्णपणे हाताळू शकत नाहीत कारण अशा घटनांचा विस्फोट होत आहे हे आपल्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत इच्छामरणाचा निर्णय विचारपुर्वक घेतला जात असेल तर त्याची अंमलबजावणी होण्यास काय हरकत असावी?

इच्छामरण घेऊ इच्छिणा-यावर दडपण आणून असे निर्णय घ्यायला भाग पाडले जाऊ शकते असा एक आक्षेप यावर घेतला जातो. मला वाटते त्याची आधी शहानिशा करत अशा निर्णयांना अपवाद म्हणुन मान्यता द्यायला हवी. किंबहुना भविष्यात ती द्यावीच लागेल.  आत्महत्येचा निर्णय हा क्षणिक भावनिकांतून घेतले जातात. इच्छामरणाचे तसे नाही. आत्महत्या करण्याचे धैर्य सर्वांत नसते. त्यांना वैद्यकीय सहायतेने शांत मरण देता यायला काय हरकत आहे? एखाद्याला तो यातनांतून जात असतांनाही जगायला भाग पाडणे हेच खरे अनैतिक आहे. त्यावर आपल्याला नव्याने चिंतन करायला हवे...

Tuesday, July 23, 2013

कशा कशावर बंदी घालणार?



महाराष्ट्र शासनाने डांसबारवर बंदी आणली होती. २००६ मद्धे उच्च न्यायाल्याने व आता सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. महाराष्ट्र शासन मात्र डांसबार बंदीबाबत आग्रही असून नवे विधेयक आणुन त्यामार्फत बंदी पुढे व्यापक पायावर चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. हे पुरेसे नव्हते म्हणून कि काय गुटखा-पानमसाला बंदीनंतर आता खर्रा, खैनी, सुगंधी तंबाखू, मावा आदि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. जनतेच्या नैतिक आणि शारीर आरोग्याची एवढी चिंता शासनाला आहे हे वरकरणी समाधानकारक वाटत असले तरी शासनांना असे बंदी आणण्याचे नैतीक अधिकार आहेत काय हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

शासकीय कारभार घटनात्मक चौकटीत चालावा हे बरोबर आहे. त्यासाठी घटनात्मक चौकटीत राहून कायदेही बनवता येतात व त्यांची अंमलबजावणीही करता येते हेही खरे आहे, परंतू कायद्यांना मानवी चेहरा देण्याचे कार्य कायदे बनवणा-यांना करावे लागते. सवंग लोकप्रियतेसाठी घेतले जाणारे निर्णय शेवटी जनतेच्याच हिताविरोधात जाणार असतील आणि संभाव्य अहित रोखण्याची कोणतीही योजनाच शासनाकडॆ नसेल तर या निर्णयांकडे वेगळ्या नजरेने पाहणे आवश्यक आहे.

तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ, दारू, गांजा, गर्द ते कोकेनादि द्रव्ये नशील्या पदार्थांच्या यादीत येतात. नशेची तीव्रता कमी-अधिक असली तरी अंतता: ही द्रव्ये मानवी आरोग्यास कमी-अधिक प्रमाणात घातकच आहेत याबाबत विवाद असण्याचे कारण नाही. मानवी आरोग्याला घातक असणारे पदार्थ (जरी ते नशील्या पदार्थांच्या यादीत नसले तरी) अगणित आहेत. पण आपण त्यावर नंतर बोलू. अंमली पदार्थांच्या यादीत तंबाखू, नार्कोटिक ते अल्कोहोल येत असतांना शासन बंदी घालतांनाही कसा दुजाभाव करत आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. या बंदी आदेशात कच्च्या तंबाखुचा समावेश नाही. प्रक्रिया केलेल्या तंबाखुवर मात्र आहे. कच्ची तंबाखू ही गोरगरीबांची चैन मानली जाते. प्रक्रियाकृत तंबाखुपेक्षा कच्च्या तंबाखुपासून आरोग्याला होणारा धोका मोठा आहे. असे असुनही त्यावर मात्र बंदी घालण्याचे साहस सरकार दाखवू शकत नाही. क्रमाक्रमाने सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य उत्पादनांवर बंदी घातली जाऊ शकेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जातो...पण "बंदी" चे अंतिम मतितार्थ व फलितेही पहायला हवीत.

गुटखा बंदी येवूनही महाराष्ट्रात चोरमार्गाने गुटखा मोठ्या प्रमाणात येतो. अनेकदा काही चोरटा माल पकडलाही गेला आहे. किती सोडला गेला याची आकडेवारी प्रशासन कधीही देणार नाही हेही उघड आहे. मावा-खर्रा बनवणे हा हस्तोद्योग असल्याने व त्याचा कच्चा माल बंदी नसल्याने बाजारात सर्रास उपलब्ध असल्याने त्यावरील बंदी ही केवळ धूळफेक आहे. टप-यांवर मावा उपलब्ध झाला नाही तरी घरी व्यसनी मनुष्य तो अत्यल्प श्रमात बनवू शकतो. त्यामुळे बंदीचा मतितार्थ काय हे लक्षात यायला हरकत नाही. प्यकबंद सुगंधी तंबाखू, खैनी ई. गुटख्याप्रमाणेच मुबलकपणे काळ्या बाजारात मिळु लागतील हेही वेगळे सांगायची गरज नाही. मग साध्य नेमके काय होणार आहे?

बंदीच घालायची तर तंबाखुपासुनच सुरुवात करायला हवी. सिगारेट, बिड्या या सर्वांवरच बंदी आणायला हवी. अर्थातच तंबाखूजन्य उत्पादने करणा-या लघु ते मोठ्या उद्योगांवर बंदी आणायला हवी. त्याशिवाय सर्वच नागरिकांचे स्वास्थ्य सुरक्षित राहणार नाही आणि नागरिकांच्या स्वास्थ्याची नैतीक जबाबदारी शासनावर असल्याने अशी बंदी काही काळ व्यसनींसाठी तापदायक ठरली तरी दिर्घ काळात तिचे सद्परिणाम दिसनार असल्याने तेही शासनाला धन्यवादच देतील.  परंतू शासन दुजाभाव करते. समतेचे तत्व पाळत नाही. म्हणजेच घटनात्मक तरतुदींचेच उल्लंघन करते. डांसबारबाबतही शासनाने नेमके असेच दुजाभावाचे धोरण राबवले होते. बंदी बेकायदा ठरवायला अनेक कारणंपैके हेही एक कारण होते. थ्री स्टार ते त्यावरील होटेलांत डांसबारला बंदी नाही. ती सामान्यांच्या बार्समद्धे. जणु जनसामान्यांची नैतिकता आणि उच्चवर्गीयांची नतिकता यात मुलभूत फरक आहे असाच सम्देश शासनाने दिला होता.

तंबाखुजन्य पदार्थांबाबतही नेमके तसेच होत आहे. सुट्ती/कच्ची तंबाखू ही जनसामान्यांची आहे तर प्रक्रिया केलेली तंबाखू व अन्य तत्जन्य उत्पादने ही तुलनेने वरच्या वर्गांत लोकप्रिय आहेत. शासनाला सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या आरोग्याशी काहीही घेणेदेणे नसून उच्चवर्गीय नागरिकांच्याच आरोग्याची काळजी आहे कि काय असा एक अर्थ त्यातून निघु शकतो. पण ते तसेही नाही. कारण दारू, बिडी व सिगारेटवर मात्र बंदी आलेली नाही. भविष्यात आणता येईल, सध्याची बंदी हा एक टप्पा आहे असे म्हनावे तर ते शक्य नाही हे पुढील विवेचनावरून लक्षात येईल.

आजमितीला तंबाखू उद्योगाने जवळपास ऐंशी लाख रोजगार निर्माण केला आहे व दिवसेंदिवस त्यात भरच पडत चालली आहे. प्रत्येक बजेटमद्धे वित्तीय तूट भरून काढण्यासाठी बिड्या-सिगारेट/दारू/तंबाखुवर कर वाढवण्याचा अत्यंत सोपा मार्ग वापरला गेला आहे.  सरकारी तर्कशास्त्र अजब असते असे म्हणतात ते खोटे नाहीय. उदा. बिड्यांवरील कर दरहजारी ९८ रुपयांनी वाढवला तर सरकारला ३६.९ अब्ज रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळेल व १५.५ लाख मृत्यू वाचतील असा दावा २००४-५ मद्धे एका केंद्रीय अहवालात केला गेला होता. सिगारेटबाबतही असेच अंदाज दिले गेले होते. म्हणजे एकीकडे सरकारला बिडी-सिगारेटमुळे लक्षावधी लोक मरतात हे मान्य आहे...कर वाढवल्यामुळे मृत्यू कमी होतील असा अंदाज करायलाही ते चुकत नाही. मग कर वाढवण्याऐवजी ती उत्पादनेच पुर्णपणे का बंद करत नाही असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही. कारण हा प्रश्न वरकरणी दिसतो तेवढा तो सोपा नाही.

सरकारला एवढा मोठा रोजगार घालवता येणे परवडणार नाही. त्यातून येणा-या अवाढव्य कररुपी उत्पन्नावर तुळशीपत्र ठेवायलाही ते तयार होणार नाही. त्यामुळे मद्य ते तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांवर संपुर्ण बंदी कधीही घालणार नाही. तंबाखुच्या व्यसनींना पर्याय मिळणे यामुळे बंद होणार नाही हे उघड आहे. म्हणजेच सरकारी गल्ल्यात येणारे कररुपी उत्पन्न कमीही होणार नाही. आरोग्याचा धोका, ज्याची शासनाला एवढी काळजी वाटते त्याबद्दल कौतूक होईल हे खरे आहे, कदाचित निवडनूकीत त्याचा फायदाही मिळेल...पण मूळ उद्देश्य साध्य होनार नाही.

बंदीचा अर्थ भारतात नव्या भ्रष्ट मार्गांना वाव देणे असा असतो. १९६१ पासून गुजरातमद्धे संपुर्ण दारुबंदी आहे. गुजरातमद्धे मिळत नाही असा दारुचा ब्रंड सांगा म्हटले तर कदाचित आजच्या लोकप्रिय नेत्याचीही पंचाईत होईल. चोरट्या दारुचा धंदा हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा एक समांतर भाग आहे. एवढेच नव्हे तर तळागाळातल्या लोकांची गरज भागवायला हूच नांवाचे गावठी मद्य बनवायचे हजारो कुटीरोद्योग आहेत. २००९ मद्धे ही दारू पिऊन १३६ लोकांचा मृत्यू झाला होता. नंतरही तुरळक घटना होत आल्या आहेत. या हुचमुळे आरोग्याचे वाटोळे लक्षावधींचे झालेले असनार आणि होत राहनार हे उघड आहे. महाराष्ट्रातही वर्धा, गडचिरोलीतील दारुबंदी कशी केवळ कागदोपत्री आहे व अधिका-यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन आहे हे सर्वज्ञात आहेच.

महाराष्ट्रात बंदीकाळात डांसबार सर्वस्वी बंद होते हे खरे नाही.  गेल्या सात वर्षाच्या डांसबारबंदी काळात महाराष्ट्राची नैतिकता वाढली असा एकही इंडिकेटर नाही त्यामुळे भविष्यात सर्वच बार (पंचतारांकितही) बंद ठेवल्याने नैतिकता वाढणार आहे असेही नाही. तंबाखूजन्य उत्पादनांवरील बंदीमुळे महाराष्ट्राच्या एकुणातील आरोग्यात भर पडलेली नाही हे लोकांनीच गुटख्याला/पानमसाल्याला शोधलेल्या पर्यायांमुळे सिद्ध होते. आता या पर्यायांवरही बंदी घातली तरी मुळ तंबाखूवरच बंदी नसल्याने नवे पर्याय शोधायच्या मागे आमची कल्पक प्रजा लागलेली असनार याबाबत शासनाने कसलीही शंका बाळगू नये.

बंदी हे समाजस्वास्थ्य वाढवण्याचे साधन आहे या भ्रमातून शासनाने बाहेर यायला पाहिजे. सामाजिक नैतिकतेचा झेंडा उचलायचा असेल तर कायदे करणा-यांनाही नैतीकतेचे मग तेवढेच भान असले पाहिजे. व्यसने दूर करण्यासाठी व्यसन निर्माण करणारे पदार्थ बंदच करायचे तर ते मग सर्वस्वी बंद तरी केले पाहिजेत. त्यात दुजाभाव करने न्याय्य असू शकत नाही याचेही भान सरकारने ठेवले पाहिजे. निवडक उत्पादनांवर बंदी घटली कि त्या मुळ पदार्थांपेक्षा विघातक पर्यायांकडे लोक वळतात हे समजले पाहिजे. दुर्दैवाने आपले प्रशासन बरबटलेले असल्याने  या बंद्याही तशा पोकळच राहतात याचेही भान असले पाहिजे. परंतू विधीमंडळ ते प्रशासनच जेंव्हा अनैतिकतेच्या डोसाच्या जीवावर नैतिकतेच्या व समाजस्वास्थ्याच्या पोकळ बाता करू लागतात तेंव्हा त्यांचे हेतू तपासून घेण्याचे काम सुजाण नागरिकांनी केले पाहिजे. कशाकशावर बंद्या आणल्या म्हणजे आमचे नेते व प्रशासनाचे मानसिक आणि शारीरीक (आणि आर्थिक) आरोग्य सुधारणार आहे आणि जनसामान्यांचे बिघडणार आहे याची चिंता आता आपल्यालाच करावी लागनार आहे.

कशावरही बंदी घालणे हे उत्तर नसते...उलट ते प्रश्नच वाढवत नेते...कठीण प्रश्नांची सोपी उत्तरे शोधणे राज्यकर्त्यांना नेहमीच सोयीचे असते...प्रश्नाच्या मुळावरच घाव घालणे आपल्याच मुळावर येईल असे तर त्यांना वाटत नसावे?

-संजय सोनवणी

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...