Showing posts with label भाषेचा उदय. Show all posts
Showing posts with label भाषेचा उदय. Show all posts

Sunday, August 17, 2025

भाषाशिक्षण : समज, गैरसमज

 



भाषा ही मानवी संस्कृतीच्या विकासाची आद्य खूण आहे. भाषांच्या जन्माबाबत प्रत्येक भाषकाची स्वत:ची पुराणकथात्मक सिद्धांतने अथवा (गैर) समज आहेत. तरीही मुळात मानवालाच भाषा अवगत आहेत का आणि त्या कशा जन्माला आल्या याबाबत जागतिक भाषातज्ज्ञ आजही संभ्रमात आहेत. भाषा ही संप्रेषणाचे एक मध्यम आहे. केवळ मानवालाच भाषेद्वारे विचारांचे, भावनांचे संप्रेषण करता येते असा समज हीच एक अंधश्रद्धा आहे. प्राण्यांची भाषा आपल्याला समजत नाही म्हणून त्यांना भाषाच अवगत नाहीत असे मानता येत नाही; हे मी माझ्या ‘भाषांचा उगम’ या पुस्तकात सिद्ध करून दाखवले आहे.

 

भाषांचा उद्गम ईश्वरापासून आहे, अशी प्राचीन काळी मान्यता होती. बहुतेक धर्मग्रंथांनी भाषेचे महत्त्व व त्या भाषेतून धर्मग्रंथांत मांडलेले जीवनावश्यक तत्त्वज्ञान ओळखून त्यावेळच्या ज्ञानाच्या मर्यादेमुळे भाषेच्या अद्भुत शक्तीला ‘ईश्वराची निर्मिती’ असा समज असल्यास नवल नाही. असे असले तरी जगात मग एवढ्या संख्येने भाषा का, हाही प्रश्न निर्माण झाला आणि माणसाने उत्तर शोधले तेही तत्कालीन धर्मकल्पनांतून. उदा. पृथ्वीतलावर पहिले संभाषण अॅडम व इव्हने केले व नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर ‘टॉवर ऑफ बॅबेल’ येथे नौकेतून उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती, असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले, परिणामी त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मूळच्याच कोणा एका भाषेला जगभर विविध रूपांत नेले असा हा बायबलचा दावा.  ऋग्वेदाचा दावा आहे की, वाक्नामक देवता भाषेची (वाणीची) निर्माती आहे आणि तिच्या साहचर्याने ऋषींना मंत्र स्फुरतात आणि ते ब्राह्मण (म्हणजे मंत्रकर्ते) बनतात (ऋ. १०.१२५). यामुळे वाक् या देवतेला अत्यंत गूढरहस्यमय व अद्भुत शक्ती मानले गेले. तिच्या अस्तित्वामुळे श्रवणदृश्यसमज आणि भाषिक अभिव्यक्ती होत त्यांचे सत्य स्वरूप समजते अशीही कल्पना वैदिकांनी केली होती. थोडक्यात भाषांची निर्मिती दैवी आहे हा समज मध्ययुगापर्यंत प्रचलित होता.

     भाषांविषयीची शास्त्रीय चर्चा सुरु झाली ती प्रबोधन काळात. भाषांचा उदय कसा झाला असावा व त्यांच्या आजपर्यंतच्या प्रगतीचे टप्पे कोणते असावेत याबाबत सतराव्या शतकापासूनच तत्त्वज्ञांपासून तर भाषाकोविदांपर्यंतचे जाणकार चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढू लागल्यानंतर १८६६ मध्ये ‘लिंग्विस्टिक सोसायटी ओफ पॅरिस’ने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. आजही हिंदीच्या रूपाने भाषांचा विवाद टोकाला जातांना आपण पाहतो. हिंदी लादणे म्हणजे उत्तर भारतीय संस्कृती दक्षिण भारतावर लादण्याचा प्रयत्न आहे; ही वस्तुस्थिती आहे, कारण हा उपद्व्याप नवा नाही. त्याच वेळेस ‘संस्कृत भाषाच आधीची असून ती देववाणी असल्याने तिच्यापासून सर्व भाषा निर्माण झाल्या’ असे अशास्त्रीय मतही हिरिरीने  प्रचारित केले जाते, तेही आर्य अथवा वैदिक वर्चस्ववादाच्या भावनेपोटीच. थोडक्यात भाषांचे कुतूहल मुळात वर्चस्ववादी भावनांतूनच जन्माला आले आहे आणि त्यामुळेच भाषांचा प्रश्न सहजी सुटेल असे दिसत नाही.

     भाषांबाबत एवढ्या अंधश्रद्धा आहेत की, त्या अन्य कोणत्याही अंधश्रद्धेपेक्षाही भयंकर आहेत हे सहसा आमच्या लक्षात येत नाही. आधुनिक भाषातज्ज्ञही या अंधश्रद्धा नुसत्या जोपासत नाहीत तर त्यांना खतपाणी घालण्याकडेच अधिक लक्ष देतात. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्रिभाषिक सूत्र लादून मुलांना पहिलीपासून तीन भाषा शिकवायचे धोरण आणले व त्यात हिंदी भाषेचा समावेश केला होता. मुले लहान वयातच अधिक भाषा शिकू शकतात हे गृहीतकच अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही त्याआधारे त्रिभाषा सूत्राचे समर्थन करण्यात विशिष्ट वर्ग दंग झाला आहे. पण हे ‘क्रिटिकल पिरियड हायपोथेसिस’ हे केवळ भाषाच नव्हे तर अन्य क्षेत्रातही लागू पडते आणि भाषा हे त्यातील केवळ एक साधन आहे हे सोयीस्कररीत्या विसरले जाते. मुले अनेक भाषा शिकू शकतात तर मग हिंदी, इंग्रजीच का? तेलुगु, तमिळ, चीनी, पोर्तुगीज भाषा का नको? तीनच भाषा का? मग पाच किंवा दहा भाषा का नको हा प्रश्न कोणी धडपणे विचारला नाही आणि त्याचे उत्तरही असू शकत नाही.

     बालवयात अनेक भाषा शिकण्याचे समर्थन करणारे हेच लोक याच सिद्धांताला खोडून काढणाऱ्या आणि जगाने पारखून घेतलेल्या सिद्धांताकडे मात्र दुर्लक्ष करतात. हा सिद्धांत सांगतो की, मुलांच्या आकलन, अभिव्यक्ती आणि तुलनात्मक विचारबुद्धीच्या विकासासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिकविणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुले मातृभाषा लहानपणापासून ऐकतात आणि बोलतात, त्यामुळे ती त्यांच्या मेंदूसाठी सर्वात परिचित आणि नैसर्गिक माध्यम असते. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने मुलांना संकल्पना समजणे, विचार करणे आणि व्यक्त करणे सोपे जाते. उदा., UNESCO, 2003; Cummins, 2000 मधील संशोधन  दर्शवते की मातृभाषेत शिक्षण घेतल्याने मुलांचा संज्ञानात्मक विकास (Cognitive Development) जलद आणि प्रभावी होतो; कारण त्यांना नवीन संकल्पना शिकण्यासाठी (अन्य भाषेतून शिक्षण घेतांना होतो तसा) भाषेच्या अडथळ्याचा सामना करावा लागत नाही. शिवाय जेव्हा मुले मातृभाषेत शिकतात, तेव्हा त्यांना विषय समजण्यासाठी कमी वेळ लागतो आणि ते अधिक आत्मविश्वासाने शिकतात. यामुळे त्यांचे शैक्षणिक यश सुधारते. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासात (Heugh, 2006) असे दिसून आले की, मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुलांनी गणित आणि विज्ञान विषयांत परदेशी भाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.

 

हे येथेच मर्यादित राहत नाही. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांना त्यांच्या संस्कृतीशी आणि भाषिक वारशाशी जोडलेले राहता येते. यामुळे त्यांचा आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यास मदत होते. तसेच स्थानिक भाषा आणि संस्कृतींचे जतन होते  जे जागतिकीकरणाच्या युगात विशेष महत्त्वाचे आहे.

 

कोणत्याही विद्यार्थ्याच्या मातृभाषेतून बोलणे, वाचणे, लिहिणे अशा क्षमतांचा पाया पक्का असेल तर त्याची दुसरी भाषा शिकण्याची क्षमता सहजतेने वाढते. मातृभाषेचा असा मजबूत पाया तयार झाल्यास मुले दुसऱ्या भाषा (जसे इंग्रजी, हिंदी) अधिक सहजतेने आणि प्रभावीपणे शिकू शकतात. याला ‘भाषिक परस्परावलंबन’  असे म्हणतात (Cummins, 1979). मातृभाषेवरील चांगले प्रभुत्व दुसऱ्या भाषेवरही प्रभुत्व मिळवण्यास साहाय्यक ठरू शकते. आता या सिद्ध झालेल्या तत्त्वाचा - सिद्धांताचा अवलंब करण्याऐवजी केवळ भाषिक व सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाला कसे स्वीकारता येईल? म्हणजेच पहिलीपासून तीन भाषा शिकणे सक्तीचे करणे, हा निर्णय अशास्त्रीय आहे. अशाप्रकारे पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हे मुलांचे बौद्धिक अध:पतन घडवण्यास कारण ठरणार आहे.

 

मुळात कोणतीही भाषा ही त्या त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या सामूहिक मानसशास्त्राची उपज असते. त्यामुळे भाषेचेही एक पर्यावरण आपसूक तयार होते. भाषा देव बनवत नसतात तर आपला भूगोल बनवत असतो. जेथील प्रदेशाची भूशास्त्रीय वैशिष्ट्ये वेगळी तेथील भाषा वेगळी. म्हणूनच जगात आजमितीला ६८०९ भाषा आहेत. दुसऱ्या प्रदेशातील भाषिक पर्यावरणच वेगळे असल्याने त्या भाषा येथील भाषिक पर्यावरणात उपऱ्या ठरतात. त्या भाषेतील शब्द स्वीकारले तरी त्यात स्वानुकुल उच्चार व व्याकरणीय बदल करून घेतले जातात, कारण प्रत्येक भाषेची भाषिक प्रवृत्ती वेगळी असते. 

 

जगातील एखादी भाषा श्रेष्ठ आहे असे म्हणता येईल अशीही स्थिती नाही. सर्वच भाषा बरोबरीच्या आहेत. इंग्रजी ज्ञानभाषा झाली, कारण तिने जगभरचे वाङ्मय आपल्या भाषेत आणले. त्याला त्यांचे अर्ध्या जगावरील राज्यही कारणीभूत होते. पण असे असले तरी, खुद्द इंग्रजीतही अनेक भाषाभेद झाले. आफ्रिकन, अमेरिकन, इंडियन, लॅटिन अमेरिकन, व्हल्गर असे इंग्रजीचेच अनेक उपप्रकार पडले, ते त्या त्या भागातील भूशास्त्रीय वेगळेपणात इंग्रजी भाषा लोकांनी आपल्या सामूहिक मानसशास्त्राने घडवली. हे सामूहिक मानसशास्त्र कोणाचीही पाठ सोडत नाही. भाषिक पर्यावरण आणि भाषिक मानसशास्त्र हे निसर्गत: आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातही समान भूशास्त्रीय स्थितीत जेथे किरकोळ बदल आहेत तेथे तेथे प्रदेशनिहाय बोलीभाषा निर्माण झालेल्या आहेत. पण एकूणातील मराठीची प्रवृत्ती एकच आहे. 

 

अन्य भाषांतील ज्ञान स्वभाषेत आणायला आम्हाला कोणी रोखले आहे? पण भाषिक गुलामीची सवय लागलेले वा ती लादू पाहणारे हा विचार करीत नाहीत, हेही दुर्दैवी आहे. मराठीलाच ज्ञानभाषा करण्यासाठी सरकारने असे काही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. पण वर्चस्ववादी समुदायांना भाषिक अंधश्रद्धा निर्माण करणे सोयीचे जात असते. पूर्वीचे आणि सध्याचे हिंदुत्ववादी (वैदिकवादी) सरकार आधी संस्कृतलाच राष्ट्रभाषा करायला पुढे सरसावले होते. कारण ती म्हणे सर्वात प्राचीन भाषा आणि तिच्यातूनच अन्य भाषा जन्माला आल्या. हा भाषिक दहशतवाद भारतीयांचा आत्मसन्मान हिरावून घेण्यास कारण झाला आहे.

 

खरे तर संस्कृत ही नैसर्गिक भाषा नाही. प्राचीन तर नाहीच नाही. त्यामुळेच या भाषेला कोणतेही प्रादेशिक संदर्भ नाहीत जसे अन्य नैसर्गिक भाषांना आहेत. जसे गुजराती, तेलुगु किंवा मराठी अशा भाषांना त्या त्या भाषेच्या भूगोलातून नाव आलेले आहे तसे संस्कृत (आणि हिंदी) भाषेचे नाही. संस्कृत आणि हिंदी या भाषांना ना प्रदेशनामाचा संदर्भ आहे, ना कोणत्या समूहनामाचा. या भाषा अन्य भाषांतून उसनवारी करून निर्माण केल्या गेलेल्या कृत्रिम आणि अगदी अर्वाचीन भाषा आहेत. हिंदी भाषा अठराव्या शतकात मुख्यत: खडी बोली, ब्रज, भोजपुरी वगैरे भाषांतील शब्द आणि संस्कृतचे व्याकरण घेऊन सिद्ध झाली. भाजप सरकारला संस्कृत आणि हिंदीचे एवढे आकर्षण का? की त्यांना मुळात कृत्रिमतेचा सोस आहे म्हणून असे अशास्त्रीय निर्णय लादण्याचे प्रयत्न होतात?

 

मुळात शिक्षण या संकल्पनेचा उपयोग सांस्कृतिक वर्चस्वाच्या कारणांसाठी केला जातो आणि त्यासाठी भाषा हे तर फारच सोयीचे साधन ठरते. जगभर असेच होत आलेले आहे. आर्यभाषा गट सिद्धांतही एकोणविसाव्या शतकात आणला गेला तो युरोपियन लोकांचे भाषिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, हे आज सारे जाणतात. त्याचाच आधार घेत येथील स्वत:ला ‘आर्य’ समजणाऱ्या वैदिक लोकांनी संस्कृत हीच सर्व भाषांची जननी असे मानायला सुरुवात केली. पण हे होत असतांना अवघे जग याच अंधश्रद्धेने लडबडलेले होते, हा तर अगदी अलीकडचा इतिहास आहे.

 

खरे तर संवादाची उपजत नैसर्गिक निकड, हेच तत्त्व मानवी भाषिक क्षमतेला विकसित करणारे कारण झाले. त्याला जोड मिळाली ती एका नैसर्गिक वैशिष्ट्याची आणि ते म्हणजे त्याला विविध व गुंतागुंतीचे आवाज काढता येतील असे स्वरयंत्र लाभलेले आहे. त्यामुळेच तो विविध ध्वनींना क्रम देत प्राथमिक शब्द बनवू शकला. जसे त्याचे विश्व विस्तारत गेले तसे त्याचे बदलत्या स्थितीमुळे भाषाविश्वही समृद्ध होत गेले. जेथे जीवन कमी गुंतागुंतीचे होते तेथील भाषांचा विकास हा त्यांच्या गरजेपुरताच मर्यादित राहिला.

 

या निकडीची तीव्रता जेवढी अधिक तेवढीच भाषेची विकसनशीलताही अधिक. याचाच अर्थ असा की, भाषा या मानवजातीच्या निर्मितीकाळापासून जन्माला आलेल्या आहेत. इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत सांगतो त्याप्रमाणे तो फक्त पाच-सहा हजार वर्ष जुना नाही. तसे मानणे हीच फार मोठी भाषिक अंधश्रद्धा आहे. खरे तर साधारणपणे एकाच कोणत्यातरी आदिम काळात वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या माणसांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दाला त्या प्रादेशिक मानसिकतेच्या लोकांनी सामूहिक अर्थ दिला, जतन केला तेथेच भाषेचा जन्म झाला. भाषा ही सामूहिक मानसाची निर्मिती आहे. त्यामुळेच एका भागात राहणाऱ्या लोकांना तेथील भाषा समजते, संवाद करता येतो. अन्य भाषा प्रयत्नाने शिकाव्या लागतात कारण त्या आपल्या भाषिक पर्यावरणाला साजेशा नसतात. पण स्वभाषेचे ज्ञान मात्र समान पर्यावरणामुळे सहज प्राप्त होते, त्या सहज शिकल्या जातात आणि शब्द-व्याकरणही समृद्ध होत जाते. प्रमुख जनसमूहांपासून अलग राहणाऱ्या लोकांची भाषा मात्र तेवढी विकसित होत नाही कारण त्यांचे जीवनही तेवढे गुंतागुंतीचे नसते. कोणातरी एखाद्या मानवी गटाने श्रेष्ठ भाषा निर्माण केली आणि ती इतरांवर लादली, ही मते आता कालबाह्य झाली आहेत. या मतांमागे केवळ वर्चस्वतावादी भावना होत्या. भाषा या जागतिक सामूहिक मानसिकतेतून व आपापल्या प्रादेशिक भूशास्त्रीय प्रभावातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत. म्हणून जगात भाषांचे प्रमाणही मोठे आहे.

 

कोणत्याही भाषेचा अभिमान असणे आणि भाषाश्रेष्ठत्वाचा अहंकार बाळगणे यात फार मोठा फरक आहे. भाषा हे मानवी संस्कृतीचे संचित असल्याने त्याबद्दल अभिमान बाळगणे स्वाभाविक आहे. पण भाषेचा अहंकार बाळगत अमुक एकच भाषा श्रेष्ठ मानणे आणि ती इतरांवर लादणे हे अमानवीय आहे. भाषा हे संवादाचे, अभिव्यक्तीचे मोलाचे साधन आहे आणि भाषेमुळेच आपण ‘माणूस’ ठरतो हे विसरता कामा नये. त्यामुळे मातृभाषा हेच शिक्षणाचे मध्यम असले पाहिजे. परभाषा नंतर स्वत:च्या आवडीने शिकता येऊ शकतात. उलट स्वत:ची भाषा पक्की असेल तर नवी भाषा शिकणे सोपे जाते.

 

म्हणूनच हिंदी, संस्कृतच काय पण इंग्रजी भाषाही सहावीपासून शिकवली गेली पाहिजे. द्विभाषा किंवा त्रिभाषा सूत्र आणण्यापेक्षा एक भाषा सूत्र आणि तेही ‘मातृभाषा सूत्र’ आणले गेले पाहिजे. हीच आपली मागणी असली पाहिजे. भावी पिढ्या सशक्त बुद्धीच्या व्हायच्या असतील तर भाषांबाबतच्या अंधश्रद्धेतून प्रथम बाहेर पडले पाहिजे.

 

-संजय सोनवणी 



Thursday, May 9, 2024

Classical Language Status: Marathi

 Why the Marathi language should get Classical Language Status?

 

The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining regions for the time immemorial. It is evidenced that this language has prominently been used for independent secular and religious literature since the last 2100 years. The Marathi language fulfills the criteria of classical languages as prescribed by the central government. The report prepared by the experts was submitted to the Central Government in the year 2013; however, the demand still is pending.

The following points will clarify the position of the Marathi language.

1.     Marathi has been evolved independently from local early primordial dialects and is not offshoot of any other language like Sanskrit. This has been proven beyond doubt by eminent linguistics like Pandit Hargovind T Seth, J. Bloch, Alfred Woolner and many others.

2.     The evidenced age of Marathi is calculated from the inscriptions. Earliest inscriptions in Marathi (called as Maharashtri Prakrit) belong to the first century BC.

3.     Grammar of Marathi (Maharashtri Prakrit) “paaad Lakkhan Sutta” was written in 2nd century BC by famous grammarian Vararuchi.

4. The tradition of independent literature goes back to the first century BC. “Gaha Satsai”, a world-famous collection of anthology compiled by King Hal Satvahana belongs to this period.

5.     The first epic on Rama’s life “Paumchariya” was written in Maharashtri Prakrit (today known as Marathi) by Vimal Suri is dated to 4 AD.

6.     Marathi was the official language of the Satvahana dynasty. The subsequent rulers and dynasties like Yadavas and Shivaji Maharaj followed the tradition uninterruptedly.

7.     From the second century BC to this date Maharashtri Prakrit, like a living language, has flowed to the present times with adjusting with the time. In every century prominent and independent literary works have been written in the Maharashtri language that have attracted the attention of the global audience.

8.     The available literature belonging to every century since 2nd century BC to this date shows the progressive nature of the Marathi language and its uninterrupted and independent tradition.

From above it will be clear the Marathi Language deserves to receive the status of the classical language for its being independent and proven to be having the rich literary tradition of 2200 years. 

Monday, February 26, 2024

मराठी भाषेचे प्राचीनत्व!

 मराठी भाषेचे प्राचीनत्व!

-संजय सोनवणी

 

लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान २२०० वर्ष जुना जातो. प्राचीन माहाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण बोलतो-लिहितो ती मराठी. वररुचीने या आद्य माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपू २००च्या आसपासच लिहिले होते, याचा अर्थ त्याआधीही कैक शतके ही भाषा बोलीभाषा म्हणून प्रचलित होती. इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट, पाले आणि लोहगड येथील शिलालेख या प्राचीन मराठीचे लिखित रूप दर्शवतात. महाराष्ट्रात जैन धर्म किती प्राचीन काळातच पोचला होता याचेही पाले व लोहगड येथील शिलालेख निदर्शक आहेत. यानंतर सातवाहन काळातील बौद्ध विहारांतील असंख्य शिलालेख आज उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साहित्य, काव्य आणि महाकाव्यांचा इतिहासही इतकाच मागे जातो. हाल सातवाहन राजाने संकलित केलेल्या ७०० गाथांचा समावेश असलेले गाथा सप्तशती तर आज काव्यरसिकांना चांगलेच माहित आहे. पण आद्य रामकाव्य हेही माहाराष्ट्री प्राकृतातच लिहिले गेले होते तर वाल्मीकीचे रामायण इसवी सनाच्या तिस-या शतकानंतर लिहिले गेले. आद्य रामकाव्य लिहिण्याचा मान प्राचीन मराठीकडे जातो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे आद्य रामकाव्य म्हणजे पउमचरीय. हे लिहिले विमल सुरी यांनी इसवी सन ४ मध्ये, म्हणजे जैन तीर्थंकर महावीर यांच्या निर्वाणानंतर ५३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आपल्या काव्यातच विमल सुरी यांनी हे वर्ष दिले आहे. यातील रामकथेचे मुलस्त्रोत हे पूर्णतया स्वतंत्र असून जैन जीवनदृष्टीचा या काव्यावर फार मोठा प्रभाव आहे. याच काळातील अंगाविज्जा हा तत्कालीन समाजजीवन व संस्कृतीचे दर्शन घडवणारा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ लिहिला गेला. चवथ्या शतकातील संघदास गणी यांनीही वासुदेव हिंडी हे महाकाव्य लिहिले. माहाराष्ट्री प्राकृतावर जैन साहित्यिकांचे मोठे ऋण आहे त्यांनी माहाराष्ट्री प्राकृतात अपार ग्रंथसंपदा लिहिली, परंतु त्यांचे योगदान आजचे मराठी भाषक विसरल्यासारखे दिसते. याशिवायही माहाराश्त्री प्राकृतात विपुल म्हणता येईल अशी रचना झालेली आहे. पण आपला भाषाभिमान बेतास बात असल्याने आपले या साहित्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही हेही दुर्दैवी आहे.

संस्कृतमधून मराठी भाषेचा उगम झाला हे जुने मत आता मान्य होणार नाही एवढे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. संकरीत संस्कृतातील एकमेव मिळणारा प्राचीन पुरावा म्हणजे इसवी सन १६० चा राजा रुद्रदामनचा शिलालेख. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व दाखवणारा एकही शिलालेखीय अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाही. माहाराष्ट्री प्राकृताचे शिलालेखीय पुरावे मात्र त्यापेक्षा प्राचीन तर आहेतच पण विपुल प्रमाणात आहेत. मराठी हीच महाराष्ट्राची आद्य भाषा होती, स्वतंत्र होती व आहे ही मराठी माणसाला अभिमानाची बाब वाटायला हवी. आणि त्यासाठी अनेक पुरावे आहेत. वैदिक भाषा आणि संस्कृत भाषा या एकच मानण्याच्या प्रवृत्तीतून हा गैरसमज जोपासला गेला त्यामुळे आज मराठी ही दुय्यम भाषा आहे असा समज निर्माण झाला. खरे तर वैदिक भाषेवरही प्राकृत भाषांचा मोठा प्रभाव आहे हे अनेक विद्वानांनी साधार सिद्ध केले आहे.

 जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५)अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनीमागधीअर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेतपण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. माहाराष्ट्री प्राकृत भाषा तिस-या शतकात मध्य आशियातील निया शहरापर्यंत पोहोचली होती, तेथिल राजादेश लिहिलेल्या लाकडी पाट्या सापडल्या असून त्यात “महानुराया लिहती” सारख्या आजही मराठी भाषेत प्रचलित असलेली वाक्ये मिळून येतात. यावरून प्राचीन काळी झालेला मराठीचा प्रसार आपल्या लक्षात येतो.

खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुरमिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंदवृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:सत्यास: ऐवजी देवा:सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. भाषेचा उगम’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिकशिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथशिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते, परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.

मराठी भाषा ही प्राचीन काळापासून साहित्य व्यवहाराची भाषा राहिलेली आहे. स्त्रियांनीही या भाषेत काव्यलेखन केलेले आहे. एकट्या गाथा सप्तशतीमध्ये २८ कवयित्रीनी आपले काव्य-योगदान दिलेले आहे. ही सातवाहनकाळापासून राजभाषाही राहिलेली आहे. संस्कृतअभिमानी मानतात तशी ही ग्राम्य लोकांची भाषा असती तर असे झाले नसते. विमल सुरीन्च्या आद्य महाकाव्यात येणारी नुसती रामकथाच नव्हे तर त्यात येणारे समाजजीवनही वास्तवपूर्ण आहे. वासुदेव हिंडी तर जगातील अतिप्राचीन प्रवासवर्णन असल्याचे मत पाश्चात्य अभ्यासकांनीही व्यक्त केले आहे. प्राचीन महाराष्ट्री प्राकृत विकसित होत, कालौघात बदल स्वीकारत मुकुंदराज-ज्ञानेश्वरांच्या माराठीपर्यंत आले. शिवकालीन पत्रव्यवहारातील मराठी, तुकोबारायांच्या अभंगातील मराठी इंग्रजकाळात आधुनिकतेचा स्पर्श होत अजून बदलत आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील भाषेपर्यंत आलेली आहे. प्राचीन मराठीतील असंख्य शब्द आजही आपल्या नित्य बोलण्यात असतात. आणि हे शब्द संस्कृतात सापडून येत नाहीत हे विशेष. जी भाषा जिवंत असते तीच कालानुसार परिवर्तने स्वीकारत असते. नवीन शब्द शोधणे वा अन्य भाषांतून उधार घेणे, अभिव्यक्तीचे व्याकरण बदलणे आणि नव्या जोमाने व्यक्त होण्यातून भाषेचा आणि त्या सोबतच मानवी संस्कृतीचाही विकास करणे हे जिवंत भाषांचे वैशिष्ट्य असते आणि मराठी या निकषावर पूर्णपणे टिकते. मराठी ही एक जिवंत भाषा आहे. तिला आज पुन्हा एकदा ज्ञानभाषा बनवण्याची तेवढीच आवश्यकता आहे. मराठीचा नव्याने जागर करत तिला पुन्हा प्राचीन वैभव प्राप्त करून देण्याची आपली जबाबदारी आहे.


वररुचीने प्राकृतात रचलेल्या पाअड-लख्खन-सुत्तहे प्राकृत (पाअड) भाषांचे व्याकरण सांगणारे मुळ पुस्तक आज उपलब्ध नाही. आज आहे ते भामहाने लिहिलेली या ग्रंथकाराची संस्कृत भाषेतील टीका जिला स्वत: भामहानेच मनोरमा अथवा चंद्रिकाअसे नाव दिलेले आहे. यात प्राकृताचे नियम संस्कृतमध्ये सांगितलेले आहेत.

संस्कृतमधूनच प्राकृत निघाली असती तर तिचे व्याकरण संस्कृतमध्येही अनुवादित करत त्यावर स्पष्टीकरण देणारी टीका लिहायचे कारण नव्हते.

भामहाने या व्याकरणावर टीका (भाष्य) संस्कृतमध्ये लिहायचे कारण म्हणजे प्राकृत ग्रंथ समजावून घ्यायचे तर त्या भाषेचे व्याकरण माहित व्हावे म्हणून! संस्कृतमधून प्राकृत भाषा निघाल्या असत्या तर हा उपद्व्याप संस्कृत भाषिक विद्वानांना करावा लागला नसता.

असे असतांनाही मराठी अभिजात भाषा व्हावी असे वाटणा-या विद्वानांनी भामहरचित प्राकृत प्रकाशमूळ वररुची रचित प्राकृत व्याकरण ग्रंथावरची टीका आहे, वररुचीचा मुळ ग्रंथ नाही याचे भान ठेवलेले दिसत नाही. किंबहुना हे त्यांना आजही समजलेले नाही. त्यामुळे त्यांची अभिजात मराठीची आक्रंदने व्यर्थच जाणार हे उघड आहे!

-संजय सोनवणी


-संजय सोनवणी 


Saturday, March 4, 2023

विचार आणि भाषा!

 विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत.


पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषा ही कृत्रीम अवस्था आहे. मनुष्याने ती गरजेसाठी पुराकाळापासून विकसीत केलेली आहे. त्याची, पुराकाळातील माणसाची, अभिव्यक्ती आपण आजच्या परिप्रेक्षात समजावून घेऊ शकण्यात तोकडे पडतो ते त्यामुळेच. पुरातन मानव मिथ्गकांतुनच जगाकडे पहात होता. शब्दांत (भाषेत) उतरलेली मिथके आणि त्याला अभिप्रेत मिथके यात पुरेसे साम्य असण्याची शक्यता नाही, कारण कोणत्या शब्दाने त्याला काय अभिप्रेत होते हे आपण नीट समजावून घेऊ शकत नाही, घ्यायचे झाले तर खुप प्रयास करावे लागतात, थोडे आदिम बनावे लागते. कारण आपले विचार, आजचे, वरकरणी भाषेत झाले आहेत असे वाटले तरी अगणित विचार भाषाविहिन असतात, आणि त्यांना आपण सुप्त पण परिणामकारक (व्यक्तित्वावर) विचार म्हणतो.

भाषा ही माणसाची नैसर्गिक आणि मुलभूत गरज आणि उपज आहे असे मानशास्त्रज्ञही मानतात. भाषेचा प्रवास हा विलक्षण आहे. तो प्रत्येक काळात, प्र्तत्येक मानवी समुहाच्या आणि व्यक्तीकेंद्रित संस्कृतीचा उद्गार आहे. एक उदाहरण देतो, कारस्थान हा शब्द एकोणिसाव्या शतकापर्यंत, खटपटी-लटपटी करुन बुद्धीमानता दाखवत यश मिळवणारा/री यंना उद्देशुन वापरला जाइ. आता मी कोणाला कारस्थानी म्हटले तर तो माझा गळाच आवळायला धावेल.

इतिहासात अनेक शब्द आणि संज्ञांचे असे झाले आहे, याला कारण शब्द हे काळाप्रमाणे, त्या काळच्या सांस्कृतिक गरजांप्रमाणे अर्थ बदलत जातात, वेगवेगळ्या छटा धारण करत जातात किंवा भाषेतुनच बाद होत जातात. जसे जाते, उंबरा, उखळ ई अनेक शब्द मराठीतुन बाद होत चालले आहेत. किंवा उद्या हे शब्द राहतीलही कदाचित पण त्या शब्दांनी निर्दिष्ट होणारे अर्थ वेगळे असतील.
हा भाषेचा प्रवास पिढी-दर-पिढी बदलत जातो, आणि तीच भाषेची गंमत आहे. आता आपण प्राचीन काळात जाऊ. गो, म्हणजे गाय, या शब्दातुन गाय, आकाश, ढग, नदी, झरे ई अनेक अर्थ परिस्थितीजन्य भेद दाखवतात. यात त्या काळच्या माणसाने कशी कल्पना केली असेल हे आपण (समजायचे असेल तरच) समजु शकतो. पण पर्यायी शब्दांची अडचणही एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायची सवय लावत असेल असेही आहे.

शब्द किंवा भाषा ही नेहमीच तोट्की असते. नवीन शब्द निर्माण करण्यात आजचा आधुनिक माणूस कमी पडतो असे म्हटले जाते., व्याकरणाची मोडतोड करत व्यामिश्र नि गुंतागुंतीचा, विद्यमान भाषेत न मांडता येणारा विचार, मांडायचा तर भाषेला आहे तशी वापरुन ते साध्य करता येत नाही.

थोडक्यात विचार भाषेत येत नसून भाषा हे विचारांचे माध्यम आहे. म्हणजेच आपण नकळत विचार भाषेत अनुवाद करुन मांडतो. नि म्हणूनच विचार हे मुलार्थाने कधीही मांडता येत नाहीत, तीच भाषेची सर्वात मोठी अडचण आहे. भाषेच्या उपयुक्ततेसहित ही सर्वात मोठी असलेली भाषेची अडचण समजावून घेता आली पाहिजे, रुढ व्याकरण अथवा शब्दमाला यापार जात व्यक्त व्हायला हवे!

- संजय सोनवणी

Saturday, February 18, 2023

मराठी भाषा अभिजातच!


 

 


 

मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे असे मानण्याचा प्रघात असल्यानेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकलेला नाही. पण वास्तव काय आहे हे तपासून पहायला हवे.

 

महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे म्हणजे सातवाहन. सातवाहनांचा काळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे. सातवाहनांनी सनपूर्व २३० ते इसवी सनाच्या २३० असे ४६० वर्ष राज्य केले. एवढा प्रदिर्घ काळ राज्य केले एवढ्यापुरतेच या राजवंशाचे महत्व नाही तर धार्मिक, सामाजिक आणि साहित्यसंस्कृतीच्या क्षेत्रातही या घराण्याचे प्रत्यक्ष योगदान आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

सातवाहन हे प्राकृत भाषेचे आश्रयदाते होते व त्यांनी राजस्त्रीयांनाही प्राकृतातच बोलण्याचा नियम घातला होता असे वा. वि. मिराशी म्हणतात. याचाच अर्थ अन्य कोणतीतरी (संस्कृत वा अन्य) भाषा अस्तित्वात असल्याचा ते अस्पष्ट संकेत देतात परंतु त्यासाठी प्रमाण मात्र देत नाहीत. कथासरित्सागरातील सातवाहन राजाच्या एका पत्नीला संस्कृत येत होते व तिने चिडवल्यामुळे सातवाहन राजा संस्कृत शिकला अशी एक कथा गुणाढ्याच्या संदर्भात येते. पण कथासरित्सागरातीक्ल हा कथापीठ लंबक मुळचा गुणाढ्याचा नाही. तो उतरकाळात (नवव्या शतकानंतर) गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा का रचली याचे स्पष्टिकरण देण्यासाठी बनवली हे उघड आहे. सातवाहन साम्राज्यात सन २०० च्या आसपास एकच मिश्र-संस्कृत (हायब्रीड) शिलालेख मिळतो आणि तोही सातवाहन राणी व शक नृपती रुद्रदामनची कन्या हिचा आहे.  रुद्रदामननेच गिरनार येथे कोरवलेला सन १६५ मधील  संस्कृत शिलालेख सोडला तर तत्पूर्वीच्या काळात देशभरातील सर्व शिलालेख व नाण्यांवरील मजकूर प्राकृत भाषेतच लिहिलेले आहेत. अगदी वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा म्हणून ओळखला जाणारा पुष्यमित्र श्रुंग व त्याच्या वंशजाचेही शिलालेख प्राकृतातच आहेत.

 

शिवाय मिराशी आपल्या "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात म्हणतात कि "सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." एका बलाढ्य राजघराण्याच्या नाण्यांवरील मजकूर आणि शिलालेख ते तत्कालिन साहित्य प्राकृतातच असावे हे संस्कृतविदांना खटकणारे होते. वा. वि. मिराशी इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना, एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." जी भाषा अस्तित्वातच नाही ती प्रचारात कशी असेल? त्या भाषेत लेख कसे असू शकतील?

 

इस्पुचे पहिले ते दुसरे शतक या काळात प्राकृत भाषेतून हळूहळू शब्द संस्कारित होतांना दिसत असली तरी गाभा प्राकृतचाच आहे. सातवाहनकालीन शिलालेखांत हा प्रवास टिपता येतो. म्हणजेच संस्कृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकात विकसीत होऊ पाहत होती...ती अस्तित्वात नव्हती.

 

सातवाहन काळात उत्तर भारताप्रमाणे फक्त सामान्यांचीच नव्हे तर राजभाषाही प्राकृत होती. सातवाहनांच्या चारशे साठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्व नाण्यांवरील मजकुर प्राकृत भाषेतील आहे. सर्व शिलालेख प्राकृत भाषेतील आहेत. पण या प्राकृत भाषेत क्रमशा: झालेली परिवर्तनेही आपल्याला दिसुन येतात. याला आपण भाषिक उत्क्रांती म्हणतो. आणि एवढ्या प्रदिर्घ काळात ती तशी होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही जीवंत भाषेचा तो एक महत्वाचा निकष असतो.

वररुचीने माहाराष्ट्री प्राकृताचे "प्राकृत प्रकाश" हे व्याकरण लिहिले. प्रत्यक्षात आपल्याला वररुचीचे मूळ व्याकरण उपलब्ध नसून भामहाने केलेला त्या व्याकरणाची सहाव्या शतकातील संस्कृत अनुवाद/टीका उपलब्ध आहे. माहाराष्ट्री प्राकृत हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शौरसेनी, मागधी ई. प्राकृत भाषांचे व्याकरण देतांना "शेष माहाराष्ट्रीवत" असे वररुची म्हणतो. प्रत्यक्षात प्राकृत शब्द हा मुळचा "पाअड" (प्रकट) या शब्दाचे संस्कृतीकरण आहे. त्यामुळे आपण सोयीसाठी "प्राकृत" हा शब्द वापरत असलो तरी तो ‘पाअड’ भाषानिदर्शक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

माहाराष्ट्री प्राकृत अथवा पाअड श्रेष्ठ का मानली जात होती? कवि दंडी तिला "प्रकृष्टं प्राकृत" म्हणजे उत्कृष्ठ प्राकृत म्हणतो. काव्यरचना माहाराष्ट्री प्राक्रुतातच करावी असा आग्रह धरला जात असे. (साहित्यदर्पण) याचे उत्तर सातवाहनांच्या प्रदिर्घ स्थिर सत्ताकाळामुळे त्या भाषेत मौलिक ग्रंथरचना होत राहिली या वास्तवात आहे. स्थिर शासनाच्या अंमलाखाली कला-संस्कृती बहरत असते आणि सातवाहनांमुळे महाराष्ट्रात नेमके तेच झाले.

 

प्राकृत भाषेचा व्याकरणकार वररुची नेमका कधी झाला याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. हालाची "गाथा सतसइ" वररुचीचे नियम कटाक्षाने पाळते. व्यंजनांचे द्वित्व व त्यांचा लोप हे वररुचीच्या माहाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणातील महत्वाचा नियम होय. गाथा सप्तशतीतील रचना हा नियम पाळतात. हाल हा सातवाहन वंशातील अठरावा राजा होय. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या पुर्वी सहाव्या (किंवा पाचव्या) पिढीत होऊन गेला अशी मान्यता आहे. गौतमीपूत्र सातकर्णी इसवी सनाचा पहिल्या शतकात होऊन गेला. सरासरी इसवी सनाच्या साठ साली त्याचे राज्यारोहन झाले असा तर्क आहे. तो काही वर्ष मागे-पुढे होऊ शकतो हे गृहित धरले तरी हाल सातवाहन इसपु च्या पहिल्या शतकातील उत्तरार्धात झाला असे अनुमान करता येते. म्हणजे इसपूच्या पहिल्या शतकात हालाने गाथा संग्रह सुरु केला हे आपल्याला निश्चयाने म्हणता येते. वररुचीचे व्याकरण या काळात कवि-साहित्यकारांत प्रचलित झाले होते हे वररुचीच्या व्याकरणाचे नियम गाथा सत्तसई व अन्य ग्रंथ पाळतात त्यावरुन सिद्ध होते. कोणतेही व्याकरण प्रचलित व्हायला तत्कालीन प्रचार-प्रसारावरील मर्यादा लक्षात घेता किमान शंभरेक वर्ष लागु शकतात. म्हणजेच प्राकृत प्रकाशकार वररुची हा इसवी सनापुर्वीचा दुस-या शतकातील किंवा तत्पुर्वीचा असावा असा तर्क बांधता येतो. इतिहासात अनेक वररुची नांवाच्या व्यक्ति झाल्या आहेत, पण पाअड भाषांचे व्याकरण रचणारा वररुची ही स्वतंत्र व्यक्ति होय.

 

असे असले तरी शिलालेखीय प्राकृतात मात्र वररुचीच्या व्याकरणाचा द्विस्तर व्यंजन लोप या नियमाचा वापर केला गेलेला नाही. शिलालेखीय गद्य भाषा आणि ग्रांथिक काव्य-भाषा यांतील भेदामुळे गद्यात व्याकरणीय नियम कटाक्षाने पाळले न जाणे स्वाभाविक आहे.

 

तत्कालीन प्राकृतात येणारे बहुतेक शब्द उच्चारबदल होत का होईना आजही वापरात आहेत. संस्कृत भाषेत सर्वच प्राकृत शब्द संस्कारित न केले गेल्याने अशा शब्दांना देशीम्हणण्याचा प्रघात असला तरी संस्कृतमधील सर्वच शब्द मुळचे प्राकृतच आहेत. व्याकरण मात्र अत्यंत तर्कनिष्ठ आणि अर्थबदल न होऊ देणारे असल्याने ग्रंथांसाठीच ही भाषा विकसित केली गेली हे स्पष्ट आहे. ती बोलीभाषा किंवा मातृभाषा कधीही नव्हती असे भाषातद्न्य माधव देशपांडेही स्पष्ट करतात. आणि प्राकृतमधून संस्कृतचा विकास कोण्याएका मानवी समुहाने केला नसून त्या विकासात बौद्ध, जैन आणि तांत्रिक विद्वानांनीही मोठा हातभार लावला हे सनपूर्व २०० पासून मिळणा-या बुद्धिष्ट आणि जैन ग्रंथातील भाषिक उत्क्रांतीमुळे स्पष्ट होते.

 

आजची मराठी ही माहाराष्ट्री प्राकृतातूनच विकसित होत आलेली आहे. ती संस्कृतोद्भव असण्याचा प्रश्नच येत नाही कारण संस्कृत भाषेचा ती आधी अस्तित्वात होती हे दाखवणारा एकही पुरावा नाही. तरीही मराठी भाषेचे मातृत्व अज्ञानाने फार नंतर जन्माला आलेल्या संस्कृतला दिले जाते आणि मराठी भाषेचे अभिजातत्व नाकारले जाते हे खरेच दुर्दैव होय!

 -संजय सोनवणी

Saturday, December 3, 2022

भाषेचा जन्म कसा झाला?


 


जगात भाषेद्वारा अभिव्यक्त होणारा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य होय. किंबहुना त्याला भाषा येणे हेच त्याला अन्य प्राणीविश्वापेक्षा वेगळे पाडते. असे असले तरी भाषेचा जन्म कसा झाला याबाबत अजूनही सर्वसंमत सिद्धांत जन्माला आलेला नाही. जगातील सर्व मानवी जमाती भाषेच्या जन्माचे श्रेय निशंकपणे परमेश्वराला देत असतात. परमेश्वरानेच भाषा निर्माण केली म्हटले कि पुढील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नसते. पण आधुनिक काळात मात्र भाषेच्या जन्माबाबत काही सिद्धांत जन्माला आले आणि त्यावर हिरीरीने चर्चाही होत असतात. याचे करण म्हणजे कोणती भाषा श्रेष्ठ हा उपप्रश्न ओघाने निर्माण होतो आणि आपापल्या भाषेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाषेचाच उपयोग करायचा असतो किंबहुना त्यासाठीच भाषेचा उदय कसा झाला असावा व तिच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. आजही भाषांचा विवाद कधी कधी टोकाला जातांना आपण पाहतो. “संस्कृत भाषाच आधीची असून तिच्यापासून सर्व भाषा निर्माण झाल्या” असे अशास्त्रीय मतही हिरीरेने प्रचारित केले जाते तेही वर्चस्ववादाच्या भावनेपोटीच. पण मुल प्रश्न अनुत्तरीतच राहतो तो हा कि मुळात भाषेचा जन्म कसा झाला ती क्षमता मनुष्यप्राण्यातच का?

जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक)  भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असुन काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.

माणसाचे नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे त्याला विविध व गुंतागुंतीचे आवाज काढता येतील असे स्वरयंत्र लाभलेले आहे. तो निसर्गातील अनेक आवाजांची नक्कलही करू शकतो. भाषेच्या जन्माच्या आणि विकासाच्या इतिहासात स्वरयंत्राने मोलाची कामगिरी बजावलेली आहे. पण केवळ आवाज काढता येतात तेवढ्याने भाषेचा जन्म होऊ शकत नाही. मानवी उत्क्रांतीच्या कोणत्यातरी टप्प्यावर भाषा अचानक अवतरली असे काही विद्वान मानतात.  नोआम चोम्स्की या मताचा पुरस्कर्त्ता असून या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवी शरीरातीलविशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे. अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. किंबहुना माणसात भाषेची गुणसूत्रे उपजतच असतात असा एकूण या म्हणण्याचा मतितार्थ आहे.

अलीकडेच टेकुमेश फिच यांनी "मातृभाषा" सिद्धांत डार्विनच्या नाते-निवड सिद्धांताचा आधार घेत मांडला होता. या सिद्धांतानुसार आई आणि मुल यांच्यातील संवादाच्या निकडीतुन भाषेचा उदय झाला असावा.  हीच पद्धत निकटच्या नातेवाईकांसाठीही वापरली गेल्याने भाषेच विस्तारही झाला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. अर्थात या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले. कारण अपत्याशी संवाद अन्य प्राणीजगतही साधायचा प्रयत्न करतेचपण त्यातून भाषेचा उगम झालेला नाही हे एक वास्तव आहे.

मानवी मेंदू आणि भाषा यात निकटचा संबंध असावा असे वाटून काही शास्त्रद्न्य मेंदुच्याच अंतरंगाचा अधिक अभ्यास करु लागले. मानवी मेंदूतील ब्रोका आणि वेर्निक क्षेत्र हे भाषेच्या क्षमतेवर परिणाम करतात हे लक्षात आले असले तरी भाषेचा जन्म कोठून होतो या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अन्य प्राण्यांमध्येही अत्यंत मर्यादित का होईना पण काही भाषा असते. ती काही शब्द व हावभाव यापुरती मर्यादित असते हा अनुभव आहेच. म्हणजे अभिव्यक्तीची मुलभूत प्रेरणा आणि भाषेच्या जन्माचा जवळचा संबंध असला पाहिजे हे तर निश्चित आहे.  आदिम काळातील भयजनक आणि आनंदाचीही स्थिती त्याला अभिव्यक्तीसाठी प्रेरित करत त्यातून जगभरच्या मानवी समुदायांमध्ये भाषेचा जन्म झाला असावा.

मानवाचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. तो भावनाशील प्राणी आहे. निसर्गाने त्याला स्वरक्षणासाठी अन्य नैसर्गिक हत्यारे न दिल्यामुळे समूह करून राहणे त्याला भाग होते. या सामुहिक निकडीतून परस्पर संवादासाठी अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती करत आदिम शब्दसंग्रह तयार झाला असावा. हे आदिम शब्द हेच भाषेचे निर्मितीकारण ठरले. त्यातून प्राथमिक बाबी, उदा. भूक, तहान, झोप, शत्रू, धोकेदायक आणि मित्र प्राणी यांचे निर्देश करता येणे सोपे झाले आणि उपयुक्ततेमुळे तिचा जाणीवपुर्वकही विकास सुरु केला. आपापसातील टोळ्यांच्या सहचर्यातून शब्दांची देवान-घेवाण करत शब्दसंग्रहही वाढत गेले. टोळीजीवनातून मनुष्य बाहेर पडल्यावर नव्या जीवनाशी जुळवून घेण्यासाठी त्याला अधिक शब्दांची गरज पडली आणि त्यातूनच प्राथमिक व्याकरणही निर्माण झाले. जीवनातील जटीलता जशी वाढते तशी भाषाही नवनव्या शब्दांची निर्मिती करत अर्थवाहकता निर्माण करण्यासाठी काटेकोर व्याकरणाची निर्मिती करते. मानवी भावनिक आंदोलने टिपण्याच्या उर्मीतुनही भाषा प्रगल्भ होत जाते. मानवी जीवनातील शेतीचा शोध हा जेवढा महत्वाचा टप्पा आहे तेवढाच हा टप्पा भाषेच्या विकासात मोठा हातभार लावणारा टप्पा आहे. भाषा आणि मानवी संस्कृती हातात हात घालूनच चालत आलेली आहे.

थोडक्यात संवादाची निकड हेच मानवी भाषिक क्षमतेला विकसित करणारे कारण झाले. या निकडीची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच भाषेची विकसनशीलताही जास्त. खरे तर साधारणपणे एकाच कोणत्यातरी आदीम काळात कोणातरी माणसाच्या तोंडातून निघणा-या शब्दाला सामुहिक मनाने अर्थ दिला, जतन केला तेथेच भाषेचा जन्म झाला. भाषा ही सामुहिक मनाची निर्मिती आहे. त्यामुळेच एका भागात राहणा-या लोकांना तेथील भाषा समजते, संवाद करता येतो. अन्य भाषा शिकल्या जातात आणि शब्द-व्याकरणही समृद्ध होत जाते. प्रमुख जनसमुहांपासून अलग राहणा-या लोकांची भाषा मात्र तेवढी विकसित होत नाही कारण त्यांचे जीवनही तेवढे गुंतागुंतीचे नसते. कोणातरी एखाद्या मानवी गटाने श्रेष्ठ भाषा निर्माण केली आणि ती इतरांवर लादली ही मते आता कालबाह्य झाली आहेत. या मतांमागे केवळ वर्चस्वतावादी भावना होत्या. भाषा या जागतिक सामुहिक मानसिकतेतून व आपापल्या प्रादेशिक भूगर्भशास्त्रीय प्रभावातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत. म्हणून जगात भाषांचे प्रमाणही मोठे आहे. पण जसजसे जग अजून जवळ येत जाईल तसतसे भाषांची संख्याही कमी होत जाईल आणि सध्याच्या भाषांमधूनच एकच एक वैश्विक भाषेची निर्मिती होईल.

कोणत्याही भाषेचा अभिमान असणे आणि भाषाश्रेष्ठत्वाचा अहंकार असणे यात फार मोठा फरक आहे. भाषा हे मानवी संस्कृतीचे संचित असल्याने त्याबद्दल अभिमान बाळगणे योग्यच. पण भाषेचा अहंकार बाळगत अमुक एकच भाषा श्रेष्ठ मानणे अमानवीय आहे. जगातील एकही भाषा आज पूर्णपणे स्वतंत्र राहिलेली नाही एवढा अन्य भाषिक प्रभाव सर्वच भाषांनी तिच्या निर्मिती काळापासून पचवलेले आहेत. भाषा हे संवादाचे, अभिव्यक्तीचे मोलाचे साधन आहे आणि भाषेमुळेच आपण “माणूस” ठरतो हे विसरता कामा नये.

-संजय सोनवणी


ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...