Saturday, July 25, 2026
पोरस म्हणजे पुरू?
Thursday, June 25, 2026
उड्डाणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे राईट बंधू
मागील लेखात आपण पाहिले की मानवी उड्डाणाचे स्वप्न प्राचीन काळापासून मानवाला सतावत होते. माणसाने नेहमीच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न केला आहे. उडता यावे हे स्वप्न तसे अशक्यप्राय वाटत असले तरी माणसाची अपार जिज्ञासा आणि तिच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करत राहण्याही वृत्ती यातून विमानाच्या प्रत्यक्ष शोधापर्यंतचा प्रवास मानवाने पूर्ण केला. विमानाच्या संकल्पनेचा इतिहास, प्राचीन पुराणकथांत मिळणारे उल्लेख, विमानसदृश्य सापडलेली प्राचीन खोदचित्रे असा पुढे जात लिओनार्डो दा विंची, जॉर्ज केली, ओटो लिलिएन्थल इत्यादींपासून पुढे तो राईट बंधूंपर्यंत येतो. या शोधपरंपरेत सातत्याने, अनेक अपयशे येउनही हार न मानता मानव उड्डानाचे प्रयत्न करत राहिला. त्याचा पुढील भाग म्हणून राईट बंधूंनी प्रत्यक्ष यशस्वी उड्डाण साध्य केले. तत्पूर्वी अपयशे येण्याचे कारण म्हणजे एक मूलभूत प्रश्न आणि तो म्हणजे माणूस आकाशात उडू शकेलही, पण तो हवेत प्रचालन कसे करणार? त्यामुळे सर्वांचे उड्डानाचे प्रयोग अयशस्वी होत होते.
पण नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन अमेरिकन बंधूंनी इतिहास घडवला. विल्बर आणि ऑर्व्हिल राईट हे ते बंधू. ते प्रत्यक्षात व्यावसायिक शास्त्रज्ञ नव्हते तर ते ओहायो राज्यातील डेटन येथे सायकली बनविण्याचा आणि दुरुस्त करण्याचा व्यवसाय करत होते. परंतु यंत्ररचनेची उत्तम जाण, निरीक्षणशक्ती आणि उपजत प्रयोगशील वृत्ती यांमुळे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या समस्येकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले.
यामागे एका दुर्दैवी अपघाताची पार्श्वभूमी आहे. माणूस तोवर ग्लायडर बनवून त्यातून उडायला शिकला असला तरी त्यात नियंत्रणाची साधने नव्हती. इंजिनही नव्हते. तरीही धाडसी लोक उद्दानाचे प्रयोग करतच असत. अशात १८९६ मध्ये जर्मन संशोधक ओटो लिलिएन्थल यांचा ग्लायडर अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने राईट बंधूंना धक्का बसला, पण त्याचबरोबर उड्डाणशास्त्राविषयी तीव्र उत्सुकताही निर्माण झाली. त्यांनी उपलब्ध साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्या अनेक संशोधकांचे लक्ष अधिक काळात विमान उडवू शकेल असे शक्तिशाली इंजिन तयार करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु राईट बंधूंना वाटले की खरा प्रश्न इंजिनाचा नसून नियंत्रणाचा आहे. त्यांनी मग नैसर्गिक रीत्या उडणार्या पक्षांवर आपले लक्ष आधी केंद्रित केले.
पक्ष्यांचे निरीक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. उडते पक्षी वळताना किंवा संतुलन राखताना पंखांच्या कोनात काही सूक्ष्म बदल करतात. त्या निरीक्षणावरून त्यांनी पंखांना किंचित झोक देऊन विमानाला वळविण्याची आणि दिशा देण्याची कल्पना विकसित केली. पुढे हीच पद्धत ‘विंग वॉर्पिंग’ म्हणून प्रसिद्ध झाली.
सन १८९९ मध्ये त्यांनी एका छोट्या पतंगावर हा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष ग्लायडर बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक हा समुद्रकिनारी भाग निवडला. येथे जोरदार वारे वाहत असत आणि जमिनीवर मऊ वाळू असल्याने जरी अपघात झाला तरी जीवितहानीची शक्यता कमी होती.
१९०० ते १९०२ या काळात त्यांनी तीन वेगवेगळे ग्लायडर तयार केले. शेकडो उड्डाणे केली. अनेक वेळा अपयश आले. तरीही त्यांनी हार न मानता आपले प्रयोग झपाटल्यासारखे सुरूच ठेवले. हे प्रयोग करताना प्रत्येक अपयशाच्या वेळेस ते अपयश का आले असावे याचा अभ्यास करत. आपल्या काळातील उपलब्ध वायुगतिकीय आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहुतेक संशोधकांनी एवढी अपयशे आल्यानंतर प्रयोग सोडून दिले असते, पण राईट बंधूंनी उलट स्वतःच संशोधन करण्याचे ठरवले.
त्यांनी एक लहान ‘विंड टनेल’ तयार केला. विविध आकारांच्या शेकडो पंखांची चाचणी घेण्यात आली. आजच्या दृष्टीने हा प्रयोग साधा वाटेल; परंतु त्यातून मिळालेली माहिती त्या काळातील कोणत्याही उपलब्ध माहितीपेक्षा अधिक अचूक होती. उचलशक्ती, वायुरोध, पंखांचा कोन आणि आकार यांचे प्रत्यक्ष मोजमाप करून त्यांनी विमानरचनेचे नवे तंत्रज्ञान विकसित केले.
१९०२ चा त्यांचा ग्लायडर हा खऱ्या अर्थाने पहिला पूर्णपणे नियंत्रित ग्लायडर ठरला. त्यात पंखांचे वळण, उभा रडर आणि पुढील नियंत्रण ठेवण्यासाठीचा पृष्ठभाग यांचा समन्वय साधण्यात आला. आजच्या आधुनिक विमानांतील नियंत्रण व्यवस्थेची बीजे याच रचनेत दिसून येतात.
यानंतर उरला तो इंजिनाचा प्रश्न. बाजारात उपलब्ध इंजिने अतिशय जड होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे इंजिन बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यशाळेतील चार्ली टेलर या कुशल मेकॅनिकने त्यांना मदत केली. अवघ्या काही महिन्यांत हलके पण सक्षम पेट्रोल इंजिन तयार झाले.
विमानाच्या प्रचालनासाठी लागणार्या पंख्यांची समस्या त्याहून कठीण होती. त्या काळी पंख्यांचे शास्त्र जवळजवळ अस्तित्वातच नव्हते. त्यांनी तयार केलेले प्रचालक पंखे (प्रोपेलर) त्या काळातील कोणत्याही रचनेपेक्षा अधिक कार्यक्षम ठरले.
अखेर सर्व तयारी पूर्ण झाली. १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉकजवळील किल डेव्हिल हिल्स येथे इतिहास घडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ऑर्व्हिल राईट विमानात आडवे झाले. विमानाने लाकडी रूळांवरून वेग घेतला आणि अचानक जमिनीपासून वर उचलले गेले. ते केवळ १२ सेकंद हवेत राहिले आणि सुमारे १२० फूट अंतर पार केले. परंतु मानवाच्या इतिहासातील तो क्षण अनमोल होता.
त्या दिवशी एकूण चार उड्डाणे झाली. शेवटच्या उड्डाणात विल्बर राईट जवळजवळ एक मिनिट हवेत राहिले आणि ८५० फूटांहून अधिक अंतर पार केले. त्यानंतर जोरदार वाऱ्याने विमानाचे नुकसान झाले आणि त्या दिवसाचे प्रयोग थांबले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी जगाने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. काही वृत्तपत्रांनी ती बातमी छापलीही नाही. अनेकांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु पुढील काही वर्षांत राईट बंधूंनी आपल्या विमानात सातत्याने सुधारणा केल्या आणि अखेर संपूर्ण जगाला त्यांच्या यशाची दखल घ्यावी लागली.
राईट बंधूंचे मोठेपण केवळ त्यांनी पहिले उड्डाण केले म्हणून नाही. त्यांनी संशोधनातील प्रत्येक अडचण वैज्ञानिक पद्धतीने सोडवली. उपलब्ध माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः प्रयोग केले. अपयशाला घाबरले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या यशाने आधुनिक विमानयुगाचा पाया घातला.
आजची महाकाय प्रवासी विमाने, ध्वनिवेगापेक्षा जलद जेट विमाने आणि अवकाश संशोधन यांची सुरुवात त्या बारा सेकंदांच्या उड्डाणातून झाली होती. मानवी जिद्द, वैज्ञानिक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही प्रत्यक्षात उतरू शकतात, याचा राईट बंधूंचा इतिहास हे सर्वोत्तम उदाहरण आहे. राईट बंधूंनी केवळ विमान शोधले नाही तर त्यांनी उड्डाण नियंत्रित करण्याची समस्या सोडवली आणि माणसाचे हवेत उडता येण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
· संजय सोनवणी
Sunday, May 17, 2026
महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य
महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची संतती होती आणि त्यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला हे साधारणता: सर्वमान्य आहे. पण इतिहास पाह्यला गेलो तर हे सत्य असल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.
यावरून इतिहासकारांचा हा संशय अधिक गडद होतो की, महेंद्र आणि संघमित्रा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे 'श्रीलंकन बौद्ध भिक्षूंनी' स्वतःच्या देशातील बौद्ध धर्माचे महत्त्व वाढवण्यासाठी तयार केले असावे. आणि भारतात हे जवळपास सर्वच धर्मांनी केलेले आहे. अनेक राजे क्षत्रीय नसतांना त्यांना उगाच आपल्या धर्माचे दाखवण्यासाठी बळजबरीने क्षत्रीय घोषित केले आहे. अनेकांचे बाप नष्ट करून टाकलेत, जे नव्हतेच त्यांना गुरुपदी बसवले तसेच हे आहे एवढेच!
Saturday, May 16, 2026
शोध दारूगोळ्याचा!
माणसाने जीवन सुसह्य करण्यासाठी कालौघात अनेक शोध लावले असले तरी शत्रूवर आक्रमण किंवा शत्रूपासुन संरक्षण यासाठीही अनेक शोध लावले. तलवारी, भाले, बर्च्या., गदा, धनुष्यबाण असे मानवी शक्तीवर अवलंबून असलेले शोध लावत युद्धतंत्रात बदल घडवत नेले. पण दारूगोळ्याच्या शोधाने युद्धांतील विध्वन्सकता कैक पटींनी वाढली. पण दारूगोळ्याचा शोध ठरवून लावला गेला नाही. तो हेतूही नव्हता तर अत्यंत अपघाताने हा शोध लागला.
चीनमधील ताओ पंथीय अमरत्वाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत असत. असा द्रव बनवायचा की ज्यायोगे मनुष्य अमर होईल असा या किमयागारांचा प्रयत्न होता. यातूनच सोरा, गंधक आणि कोळशाची पूड मिश्रण केल्यानंतर स्फोटक दारू (गनपावडर) तयार होते असा शोध लागला. अर्थात आधी हे मिश्रण नेमके किती प्रमाणात करायचे याचं अंदाज नसल्याने याकडे खेळकर वृत्तीने पाहण्यात आले. इतिहासकारांनुसार, बंदुकीच्या दारूशी साम्य असणाऱ्या पदार्थाचा जगातील सर्वात पहिला ढोबळ उल्लेख इ.स. १४२ मध्ये ईस्टर्न हान राजवंशाच्या काळातील किमयागार वेई बोयांग यांनी केला होता. त्यांना 'चिनी किमयाशास्त्राचे जनक' मानले जाते. त्यांनी आपल्या 'कानतोंग की') या ग्रंथात लिहिले होते की, "तीन पावडरींचे असे एक मिश्रण आहे, जे एकत्र केल्यावर अत्यंत हिंसकपणे 'हवेत उडते आणि नाचते'
आधी या शोधाकडे मौजेने पाहिले गेले असले तरी टांग राजवटीच्या काळात मात्र या शोधाकडे गाम्भिर्याने पाहिले गेले. कारण घडले एक स्फोट आणि त्यातून झालेला विध्वंस. किमयागारांनी औषध बनवण्यासाठी सोरा ( पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि लोणारी कोळशाची पावडर एका विशिष्ट प्रमाणात एकत्र केली आणि हे मिश्रण प्रखर आचेवर गरम करताच प्रयोगशाळेत प्रचंड मोठा स्फोट झाला. यात किमयागारांचे चेहरे आणि हात भाजले, तसेच त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. ताओवादी एवढे घाबून गेले की त्यांनी हे मिश्रण चुकुनही गरम करू नका अन्यथा अमरत्व राहिले दूर, मरायची वेळ येईल असे सांगायला सुरुवात केली. पण दहाव्या शतकाच्या आसपास चीनी संशोधकांच्या लक्षात आले की शत्रूचा खात्मा करण्यासाठी या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रथम या मिश्रणाचे स्फोट करून शत्रूच्या घोड्यांना घाबरवून पळून जाण्यासाठी याचा उपयोग केला गेला. सोंग राजवंशाच्या काळात, इ.स. १०४४ मधील 'वूजिंग झॉंग्याओ' या चिनी लष्करी पुस्तकात गनपावडर बनवण्याचा जगातील पहिला अचूक आणि स्पष्ट रासायनिक फॉर्म्युला अधिकृतपणे नोंदवला गेला.
भारतातही बिहार, बंगाल, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांत नैसर्गिक सोऱ्याच्या खाणी आहेत. बांबूच्या नळीत सोऱ्याबरोबर गंधक आणि कोळशाची पूड भरली की त्यातून अग्निबाणासारखी शत्रे दूरवर मारा करण्यासाठी फेकता येतात असा शोध भारतात बंगाल किंवा आसाममध्ये लागला असेही मानले जाते. आसाम आणि चीन या भागात प्राचीन व्यापारी मार्गांवरून दळणवळण असल्याने हा शोध भारतातून चीनमध्ये गेला की चीनमधून भारतात आला याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. पण उपयुक्त शोध सर्वत्र झपाट्याने पसरतात हा इतिहास असल्याने पहिलेपणाचे श्रेय कोणीही ठामपणे घेऊ शकत नाही. पण युद्धासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला चीनने सुरुवात केली यात शंका नाही.
हा शोध जरी चीन-भारतात लागला असला तरी या तंत्राचा शास्त्रीय वापर केला तो युरोपने. तेराव्या शतकात तुर्क–मोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश प्रक्षेपकांतून बाण फेकीत असत. चवदाव्या शतकात यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला गेला.
द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला अशी नोंद मिळत असली तरी तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच तोफा, अग्निबाण, हातबॉम्ब, बंदुका, पिस्तुले इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला.
सोळाव्या–सतराव्या शतकांत जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत गारगोटीच्या चापाची योजना करण्यात आली. बारा ते पंधरा किलो वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीचा वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले.
इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या रॉकेट्सची कल्पना पश्चिमी देशांत नेली. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौ–काया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०–१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला. पुढे यात नवीन शोधांची भर पडत राहिली. आता प्रचंड संहारक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इराण-इझ्राएल-गाझा आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात आपण याचे भयानक संहारकता पाहिली आहेच. माणूस अमरतेसाठी दैवी रसायन शोधात होता पण त्याच्या हाती लागला तो असा विध्वंसक शोध!
-संजय सोनवणी
Friday, January 2, 2026
यशवंतराव होळकर आणि मी....
गोपीचंद पडळकर, महाराजा
Sunday, September 28, 2025
बायजाबाई शिंदे
दौलतराव शिंदे ह्याची पत्नी बायजाबाई यांची बरीचशी महिती प्रसंगोपात्त दिलेली आहेच. दौलतरावाच्या मृत्युनंतर या महाराणीला कोणत्या प्रसंगांतून जावे लागले याची थोडक्यात माहिती या प्रकरणात देत आहे. शिंदेशाहीतील ही एक अत्यंत थोर नावाजलेली महिला होती. दौलतरावाची इच्छा तिनेच राज्य सांभाळावे अशी होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आह्यर्स्त याचीही इच्छा बायजाबाईने शिंदेने संस्थानाचा कारभार पहावा अशीच होती व तसे त्याने शिंदे दरबाराला लिहिलेही. पण वैदिक धर्मशास्त्राचे खूळ घेउन बसलेल्या तिच्या दरबारी लोकांनी तिने दत्तक घेतलाच पाहिजे असा हेका धरणे सुरु केले.
त्यामुळे शेवटी बायजाबाईने फारसे आढेवेढे न घेता कण्हेरखेड
येथील चांगजी शिंदे शाखेतील पाटलोजीचा मुकुटराव हा १०-१२
वर्षाचा मुलगा सर्वसंमतीने दत्तकविधानासाठी निवडला व त्याला जनकोजी (दुसरा) हे नाव देऊन त्याला
दत्तक घेण्यात आले. बायजाबाईने त्यास
नात-जावईही करून घेतले. शिंदे
घराण्याचा नवा वारस अशा रीतीने गादीवर आला.
जनकोजी वयाने अजून लहान असल्याने बायजाबाई आपला
बंधू हिंदुराव घाटगे याच्या मदतीने दौलतीचा कारभार पाहू लागली. तिने जुन्या-जाणत्या
सेवकांचा व अधिकार्यांचा उचित सन्मान तर ठेवलाच पण प्रजाहिताचेही अनेक निर्णय
घेतले. आपल्या पित्याची म्हणजे सर्जेराव घाटगे याची
हत्या झाल्याचे तिला दु:ख असले तरी तिने त्याबाबत
कसलाही त्रागा केला नव्हता. तिला आपल्या बापाची
योग्यता काय आहे हे मनोमन माहित होतेच.
इंग्रजांनी बायजाबाईची स्वायत्तता मान्य केले
असली तरी त्यांच्या मनात नेहमीच एक धूर्त राजकारण खेळत असायचे. सुर्जी-अंजनगावला केलेल्या
तहातील कलमे त्यांनी एकामागून एक रद्द करण्याचा घाट घातला. दक्षिणेतील
शिंदेच्या ताब्यात असलेली इनामे गावे सोडून देण्याचा प्रस्ताव इंग्रजांनी सादर केला व
बायजाबाईवर त्यावर सही करण्यासाठी दडपण आणले जाऊ लागले. बायजाबाईने
या प्रस्तावास खंबीरपणे विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनी
अजूनच दडपण वाढवले. संघर्षाची स्थिती
निर्माण झाली. अखेरीस अनेक
वाटाघाटी करून काही गावे सोडून देऊन बायजाबाईने सर्वनाशे समुत्पन्ने या न्यायाने
बरीच गावे वाचवली.
बायजाबाईने राज्यातील चोर-दरोडेखोरांचा
उपद्रवही बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात यश मिळवले त्यामुळे ती प्रजेताही लोकप्रिय
झाली. मध्य भारतातील तो काळ अत्यंत अंदाधुंदीचा होता
आणि अशा संक्रमणाच्या काळात राज्य चालवणे सोपे नसताना बायजाबाईने आपल्या सैन्याचे
नव्याने व्यवस्थापन करत अत्यंत कुशलतेने आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली.
बायजाबाईला उत्तम अश्वारोहण येत असे. शस्त्र चालवण्यातही ती कुशल होती. ती सुंदर तर इतकी होती कि तिला दक्षिणेची
सौंदर्यलतिका असे सार्थ बिरूद दिले गेले होते. बोलण्यातही
ती चतुर होती. देशात चाललेले
राजकारण तिला चांगले समजत असे. त्याचा उपयोग इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा करताना तिला
होत असे. ती कडक अवश्य होती पण क्रूरबुद्धीचे नव्हती असे
इंग्रजांनीही तत्कालीन गॅझेटमध्ये
लिहिलेले आहे.
१८३३ पर्यंत तिने प्रत्यक्ष कारभार पाहिला पण जनकोजीने
केलेल्या बंडामुळे तो आता जनकोजीच्या हाती गेला आणि येथेच बायजाबाईवर दुर्दैवे
ओढवायला सुरुवात झाली. या
बंडाची कहाणी अशी. अजाणता जनकोजी बायजाबीशी
कधीच चांगले वागत नसे. तिच्याशी उद्धट
वर्तन करत असे. बायजाबाईने त्याला
राज्यकारभाराचे शिक्षण न दिल्याने आणि तिची सत्ता सोडण्याची इच्छा नसल्याने जनकोजी
वाह्यात झाला व मनमानी करू लागला असे काही इतिहासकार म्हणतात पण पारसनीस यांच्या
मते त्यात तथ्य नाही. जनकोजी मुळात अत्यंत
नीच दर्जाच्या लोकांच्या संगतीत गेल्याने व कुसल्ले मिळाल्याने तो बायजाबाईशी
चुकीचे वर्तन करू लागला असा त्यांचा अभिप्राय आहे. हे
योग्यही आहे कारण दौलतरावानेच दत्तक घेण्याऐवजी बायजाबाईनेच दौलतीचा कारभार पहावा
अशी इच्छा व्यक्त केली होती तरीही बायजाबीने दरबाराच्या सल्ल्यानेच दत्तक घेतला
होता व ज्या दिवशी जन्कोजीला दत्तक घेतले त्याच दिवशी तिला हे माहित असणार की आपली
सत्ता कमी काळ चालेल.
१८३० साली जनकोजीला विवाहात दिलेली बायजाबाईची
नात मरण पावली त्यामुळे जनकोजीने दुसरा विवाह केला. बायजाबाईशी
त्याचे उडणारे खटके इंग्रज सरकारपर्यंत पोचले व त्यांनी अल्पज्ञानी जनकोजीची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला पण जनकोजी त्यांच्याशीही असभ्यपणे बोलला. बायजाबाईच्या ताब्यात राहूनच काम करा असा
इशाराही इंग्रजांनी त्याला दिला होता. पण जनकोजीवर त्याचा
काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे बायजाबाईला
खूप मन:स्ताप झाला.
सन १८२७ ते १८३२ पर्यंत बायजाबाईने अत्यंत धोरणी
पद्धतीने राज्याचा विकास केला. व्यापार-उदीम वाढवला. इंग्रजांशीही
अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. राज्यातील ठग आणि
पेंढारी यांचाही बंदोबस्त केली. महसुली व्यवस्था
सुरळीत केली.
पण काही दुष्ट लोकांच्या मदतीने तिला कळू न देता
जनकोजीने सैन्यातच फुट पाडली आणि १० जुलै १८३३ रोजी बंड केले. बायजाबाईने
ते थोपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याच रात्री
जनकोजीला सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला आणि महालात घुसून दोन सैनिकांनी बायजाबाईस
कैद करण्याचा प्रयत्न केला. पण बायजाबाईने या
अभेद्य वेढ्यातून सुटून जाण्याचे कौशल्य दाखवले व इंग्रज रेसिडेंटच्या निवासस्थान
गाठले. एक तंबू
टाकून त्यात राहण्याची तिच्यावर वेळ आली.
पण कसेही करून बायजाबाईला पकडायचा निश्चय
केलेल्या जनकोजीने १३ जुलै रोजी रेसिडेंटच्या निवासस्थानावरच हल्ला करून बायजाबाईस
पकडायचे ठरवले. पण रेसिडेंट
कॅव्हिंडोश याने बायजाबाईला ग्वाल्हेर सोडायचा सल्ला दिला. जणू
इंग्रजांनीही तिची साथ सोडली होती याचेच हे निदर्शक होते. किंबहुना
चाणाक्ष बायजाबाईपेक्षा पोरगेलासा जनकोजी आपल्याला जास्त उपयुक्त ठरेल असा
इंग्रजांचा होरा असावा. बायजाबाई नाईलाजाने
ग्वाल्हेरहून निघाली आणि मजल-दरमजल करत आग्रा
येथे पोहोचली. हा प्रवास खूप कष्ट
आँई त्रासाचा तर होताच पण धोक्यांनी भरलेला होता.
बायजाबाई गेल्यानंतर इंग्रजांनी जनकोजीला
राज्याधिकार दिले ब अलीजाबहादर ही महादजी शिंदेने अतुल पराक्रम गाजवत प्राप्त
केलेली पदवीही वापरण्यास मुभा दिली. पण जनकोजीने
राज्यकारभार हाती घेताच राज्यात बेबंदशाहीची परिस्थिती निर्माण झाली. लष्करी लोकांचेच तर हे राज्य नव्हे ना असे वाटावे
अशी स्थिती आली. जनकोजीने
बायजाबाईच्या काळात नेमलेल्या विश्वासू लोकांना पदमुक्त केले आणि चुकीचे लोक
कारभारासाठी निवडले याचा हा परिपाक होता.
बायजाबाई आग्र्यास पोचल्यानंतर तिने इंग्रजांशी आपले
राज्य परत मिळावे यासाठी अर्ज-विनंत्यांचा सपाटा
लावला पण इंग्रजांनी तिकडे साफ दुर्लक्ष केले. उलट
त्यांना काशीस किंवा दक्षिणेत जावे असा हुकुम काढून एक महिन्याची मुदत दिली. हा हुकुम पाळणे मनी स्वतंत्र बुद्धीच्या बायजाबाईस
शक्य नव्हते. मग इंग्रजांनी कॅप्टन रॉसच्या सैन्याला तिला
अलाहाबाद येथे आणण्यास फर्मावले. रॉसने आदेश पाळला व
बायजाबाईची ही अप्रत्यक्ष कैद सुरु झाली. या काळात तिच्या
अनंत हालअपेष्टा झाल्या.
नंतर १८४० साली इंग्रजांनी तिला नाशिक येथे
निवासास पाठवून तिची सालाना चार लाख रुपये पेन्शन चालू केली.
७ फेब्रुवारी १८४३ रोजी जनकोजीचा मृत्यू झाला. त्यासही औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी
जनकोजीच्या अल्पवयीन पत्नी ताराबाई हिच्या मांडीवर शिंदे घराण्यातील एक मुलगा
निवडून त्याचे नाव जयाजीराव ठेवत त्याला दत्तक घ्यायला अनुमती दिली. पण याचाही काळ अशांतीचा होता. इंग्रजांशी त्याने वैर घेतले. ते इतके टोकाला गेले की इंग्रज सैन्य
ग्वाल्हेरकडे चालून यायला लागले. शिंदे आणि इंग्रजात
महाराजपूर येथे युद्ध झाले त्यात जयाजीरावच्या सैन्याचा पराभव झाला.
या युद्धामुळे त्याला ग्वाल्हेर संस्थानचा काही
प्रांत इंग्रजांना द्यावा लागला. १८५३ पर्यंत
मंत्रीमंडळच राज्याचा कारभार पाहत होते, पण आता जयाजी वयात
आल्याने त्याच्या हाती ग्वाल्हेर संस्थानाची मुखत्यारी आली.
बायजाबाई तोवर नाशिक येथेच होती. तिने या काळात विशेष राजकीय हालचाली केल्या
नसल्या तरी या काळात काही घाट व मंदिरांची निर्मिती केली. जयाजी
शिंदेशाहीच्या गादीवर आरूढ होताच तिने ग्वाल्हेर गाठले. जयाजीने
तिला मात्र अत्यंत सन्मानपूर्वक वागवले.
१८५७ साली झालेल्या बंडात ग्वाल्हेर संस्थानाने
सामील होण्यास नकार दिला. बायजाबाईस हे कोणी
नेता नसलेले बंड यशस्वी होईल यावर विश्वास नव्हता. पण
सैन्यात मात्र बंडाची लागण झालेली होती त्यामुळे बहुतेक सैन्य जयाजीला सोडून गेले. इंग्रजांना त्याचा या बंडात सहभाग असावा असा संशय
होता पण तो निर्मुल होता. तात्या टोपेने
ग्वाल्हेर ताब्यात घेताच जयाजी आणि बायजाबाईने इंग्रजांचे संरक्षण मागितले. त्यांनी ग्वाल्हेर सोडले.
ग्वाल्हेर सरासरी १० दिवस बंडवाल्यांच्या
अखत्यारीत राहिले पण त्यांनाही ग्वाल्हेर खाली करावे लागले.
हा बायजाबाईचा वृद्धापकाळ होता. तिने दौलतरावाच्या उत्कर्षात अनमोल सहाय्य केले
होते. तिला जीवनात एखाद्या शोकांतिकेत शोभतील अशा
घटनाही पहाव्या आणि भोगाव्या लागल्या. तरीही तिने स्वत: १८२७ ते १८३३ पर्यंत अत्यंत कुशलतेने राज्य
चालवले. हयातीतच ती एक दंतकथा बनून गेली. तिच्या कार्यकाळाचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी करून ठेवले आहे. शिंदे घराण्यातील स्व-कर्तुत्वावर
गाजलेली ही पहिली महिला.
तिचा मृत्यू २७ जून १८६३ रोजी ग्वाल्हेर येथे
झाला.
·
पोरस म्हणजे पुरू?
मायकेल वित्झेल (Michael Witzel) आणि हेमचंद्र रायचौधुरी (Hemchandra Raychaudhuri) यांसारख्या विद्वानांनी 'पोरस'ची ओळख ऋग्वेदात उल्ल...
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
