Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Tuesday, August 4, 2026

सारनाथ: शैव, जैन आणि बौद्ध संस्कृतिसंगमाचे तीर्थस्थान!



शैव, जैन आणि बौद्ध धर्मांचा जेथे प्राचीन सांस्कृतिक संगम होता ते सारनाथ आता वैश्विक वारसास्थान म्हणून युनेस्कोने घोषित करून जागतिक पटलावर आणले आहे. येथे मिळालेले सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या स्तंभावरील सिंहशीर्ष भारत सरकारने राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलंले तर आहेच पण याच स्तंभावरील चोवीस आ-यांच्या चक्राला राष्ट्रध्वजावर स्थान दिले गेलेले आहे. भगवान बुद्धांनी येथेच आपले पहिले प्रवचन दिले त्याचे हे  धम्मप्रवर्तनचक्र प्रतीक असून याला बौद्ध धर्मात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. भारत सरकारने आपल्या सांस्कृतिक वारशाला दिलेली ही मानवंदना आहे. अर्थात सारनाथचा इतिहास पाहता हा केवळ बौद्ध धर्माचं वारसा सांगणारे स्थान नसून येथे शैव आणि जैन धर्माचाही प्राचीन इतिहासाचाही संगम झालेला आपल्याला दिसतो. त्याचा येथे थोडक्यात आढावा घेणे रोचक ठरेल.

सारनाथ हे नाव मुळात आले कोठून? त्याची उत्पत्ती सारंगनाथ या येथील शिवस्थानाच्या नावात दिली जाते. शिवाला हरीणांचा स्वामी म्हणूनही सारंगनाथ हे नाव आहे. या परिसरात प्राचीन काळापासून हरीणांचा अधिवास असल्याने येथील शिवाला सारंगनाथ असे म्हटले जाणे स्वाभाविक होते. शिवाय काशी (वाराणसी) या प्रसिद्ध शिवक्षेत्राच्या परिघातच सारनाथ आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. बौद्ध साहित्यातही या स्थानाचा उल्लेख “मृगदाव’ (हरीणांचे वसतीस्थान) असा आलेला आहे. सोबतच इसिपतन (योग्यांचे आराधनास्थान) असाही या स्थानाचा उल्लेख बौद्ध वाड्मयातील श्रीलंकेत इसपूच्या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या “धम्मपवत्तनसुत्त’ या ग्रंथात येतो. बोधी मिळाल्यानंतर येथेच गौतम बुद्धांनी आपले पहिले धम्म-प्रवचन दिले अशी मान्यता आहे. इसिपत्तन आणि मृगदाव ही स्थलनामे कालांतराने विस्मृतीत गेली असली तरी सारंगनाथ हे प्राचीन नाव सारनाथ या अपभ्रंशरुपात अस्तित्वात राहिले असल्याचे आपल्याला दिसते. म्हणजे सारनाथ हे स्थान मुळचे शैव स्थान होते  असे आपल्याला एकंदरीत इतिहासावर नजर टाकल्यावर लक्षात येते.

त्यानंतर जैनांच्या इतिहासात या स्थानाचे महत्व खूप आहे याचे कारण म्हणजे या स्थानापासून अवघ्या एक किलोमीटर दूर असलेल्या सिंहपुरी या गावात जैनांचे अकरावे तीर्थंकर श्रेयांसनाथ यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनातील पाचपैकी चार कल्याणक (म्हणजे गर्भ, जन्म, दीक्षा आणि केवलज्ञान) याच परिसरात झाले. त्यामुळे जैनांसाठीही हे अत्यंत पूजनीय क्षेत्र आहे. जैनांचे चीविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनीही वाराणसी आणि भोवतीच्या परिसरात प्रवचने दिली होती असे जैन इतिहासात नमूद आहे. सारनाथ हे वाराणसीपासून अगदी जवळ आहे आणि त्याच्या लगतच श्रेयांसनाथांची जन्मभूमी असल्याने त्यांनी सारनाथ येथेही प्रवचने दिली असल्याचा निष्कर्ष अनेक इतिहासकार काढतात.

महावीरांचे जवळपास समकालीन असलेले भगवान बौद्ध यांना बोधीगया येथे कठोर तपस्येनंतर सर्वोच्च ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतमचे गौतम बुद्ध झाले. ही ज्ञानप्राप्ती झाली, आता मानवजातीच्या परमहितासाठी हे ज्ञान लोकांना दिले पाहिजे असे वाटून ते आपल्या जुन्या शिष्यांच्या शोधात पायी चालत निघाले. सारनाथ हे शैव आणि समण योग्यांचे-मुनींचे आराधनास्थळ असल्याने तेथेच आपल्याला योग्य शिष्य भेटतील असे वाटले. ते सारनाथजवळच्याच हरीणबनात (मृगदाव) येथे आले. तेथे अनेक योग्यांसमवेतच कठोर आराधना करणारे त्यांचे कौंडिन्य, वप्प, भद्दिय, महानाम आणि अस्सजि हे जुने पाच शिष्य भेटले. या पाच शिष्यांना आणि इतरांना त्यांनी जे पहिले प्रवचन दिले त्यालाच धर्मचक्रप्रवर्तन सूत्र म्हणतात. हे प्रवचन “धम्मपवत्तनसुत्त” या श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात नमूद आहे.

या पहिल्याच प्रवचनात भगवान बुद्धांनी आपल्या तत्वज्ञानाचे प्रमुख सार सांगितले.  बुद्धांनी सांगितले की माणसाने शरीराला अति-कष्ट देणारी उग्र तपश्चर्याही करू नये आणि अति-विलासी जीवनही जगू नये. या दोन्हीच्या मधला 'मध्यम मार्ग' स्वीकारावा, जो मोक्षाकडे घेऊन जातो. यासाठी त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितला. योग्य दृष्टी, योग्य विचार, योग्य वाणी, योग्य कर्म इत्यादीचा त्यात समावेश होतो. येथेच भगवान बुद्धांनी चार आर्यसत्येही सांगितली. त्यात दुख्ख, दुख्खाचे कारण, त्याचे निवारण आणि हे निवारण करण्यासाठीचा मार्ग याचं समावेश होतो. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिले प्रवचन दिले त्याच ठिकाणावर सम्राट अशोकाच्या काळात “धमेक स्तूप”  उभारण्यात आला. सध्या आपण जो स्तूप पाहतो त्याची पुनर्निर्मिती पाचव्या शतकात म्हणजे गुप्त काळात करण्यात आलेली आहे. या स्तूपाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाप्रमाणेच याचे रचना दंडगोलाकार रुपात करण्यात आलेली आहे. सारंगनाथ शिवाच्या प्रभावात हे स्तूपाचे कार्य केले गेले असावे असे तज्ञ मानतात. भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेले सिंहशीर्ष (ज्यावरच अशोक चक्र आहे) या स्तुपाच्याच परिसरातच आढळले आहे.

सम्राट अशोकापूर्वी या भागात स्तूप अथवा विहार बांधले गेले नसले तरी उत्खननात अशोकपुर्व काळातील चुनारी तांबड्या पाषाणात घडवलेल्या काही तुटलेल्या मूर्तींचे अवशेष सापडले आहेत. त्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांच्या पाच शिष्यांची प्रतिमा कोरलेले एक प्राचीन शिल्प  समाविष्ट आहे, जे अशोकाच्या काळापूर्वीची मानली जाते. अशोकाच्या काळातही हे क्षेत्र मनुष्यवस्तीने गजबजलेले क्षेत्र नसून येथे तुरळक व्यक्ती ध्यान-धारणेसाठी राहत असत असे पुरातत्वीय पुराव्यांवरून दिसते. सारंगनाथ शिवलिंगाचा एक भाग प्राचीन असून हे शिवलिंग प्राचीन काळात उघड्यावर असले पाहिजे व कुशाण काळानंतर येथे त्यावर मंदिर बांधले गेले असावे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. स्कंद पुराणांतर्गत येणाऱ्या काशी खंडात या शैव स्थानाचा उल्लेख येतो. पुढे आदि शंकराचार्यांनीही या स्थानाला भेट देऊन अजून एक शिवलिंगाची स्थापना केली आणि दोन्ही शिवलिंगांची एकत्र पूजा करण्याची प्रथा सुरु झाली अशीही एक मान्यता आहे. सातव्या शतकात भारतात आलेल्या  ह्युएन श्वांग  या चिनी प्रवाशाने आपल्या काशीयात्रेच्या प्रवासवर्णनात सारनाथ येथील एका अत्यंत भव्य आणि प्राचीन शिव मंदिराचा उल्लेख केला होता, ते हेच असावे असा इतिहासकारांचा निष्कर्ष आहे.

जैन धर्मियांसाठीही हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे इसवी सनानंतरच्या कुशाण आणि गुप्त साम्राज्याच्या काळातील श्रेयांसनाथ आणि महावीर या जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, छत्र आणि आयागपट्ट (पूजा विधीच्या शिळा) सापडल्या आहेत. कुशाणकाळातील येथील मूर्तींच्या पृष्ठभागावर कोरलेल्या शिलालेखात कोणत्या जैन श्रावकाने आणि कधी याचे उल्लेख आले असल्याने या अवशेषांचा काळ निश्चित आहे. सध्या येथे श्रेयांसनाथ आणि महावीर यांची मंदिरे आहेत पण ती आधुनिक काळात बांधली गेलेली आहेत.

सम्राट अशोकाने या स्थानाला उदार राजाश्रय दिल्यामुळे हे क्षेत्र मात्र नामांकित बौद्ध क्षेत्र म्हणूनच विकसित झाले. येथे आज किमान तीन स्तुपांचे आणि पाच विहारांचे अवशेष मिळालेले आहेत. हे स्थान अशोकानंतर बौद्ध शिक्षणाचे एक महत्वाचे केंद्र म्हणून उदयाला आले. यातील मुलगंधकुटी विहार हे स्वत: भगवान बुद्ध वर्षावासासाठी (चातुर्मास) वापरत असत अशी मान्यता आहे.

थोडक्यात सारनाथ हे शैव, जैन आणि बौद्ध धर्मियांसाठी एक सांस्कृतिक मिलनस्थळ राहिले असून या तीनही धर्मांनी एकमेकांपासून काही ना काही घेतले आणि देशाची सांस्कृतिक धारा उन्नत व तेजस्वी बनवली. आता हे स्थान प्रामुख्याने बौद्ध स्थान म्हणून जागतिक वारसा स्थळात सामील झाले असले तरी सहिष्णू भारतीयांसाठी हे एक सामुहिक सहजीवनाचे आदर्श आहे. धार्मिक अस्मितांचा बडिवार न माजवता आपण तोच वारसा जपणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

 

-संजय सोनवणी

(महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित) 

 

Wednesday, July 29, 2026

पंडित नेहरू आणि व्याप्त काश्मीर...अक्साई चीन...

 पंडीत नेहरूंनी काश्मीर ताब्यात घ्यायला वेळ केला म्हणून अजूनही अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे असा आरोप केला जातो. पण आहे तो काश्मीर कोणी ताब्यात आणला हे आम्हाला बोलायचे नाही.

इंदिरा गांधींनी अवघ्या जगाला फाट्यावर मारून पाकिस्तानचे दोन तुकडे केले हे साफ विसरून जायचे पण त्यावेळची आणि खुद्द व्याप्त काश्मीरमधील स्थिती समजून न घेता व्याप्त काश्मीर ताब्यात का घेतला नाही याबद्दल बोंब मारायची.
भारत-चीन सीमा तेव्हाही गोंधळाची होती आणि आजही गोंधळाची आहे. सन १८३४ मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंगाचा सेनापती जोरावरसिंग याने लदाख पादाक्रांत करून तेथील नामग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आणली.
त्यानेच गिलगीट- बाल्टीस्तानही जिंकून घेऊन काश्मीर राज्याला जोडले. १८४१ मध्ये. त्याच्याआधी हजार वर्षापूर्वी काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तापीडाने लदाख जिंकला होता पण तो नंतर पुन्हां स्वतंत्र झाला होता हा इतिहास कोणी सांगायचा?




अक्साई चीन मधून एक व्यापारी मार्ग जात होता, पण हा साराच प्रदेश विषारी पाणी असलेली तळी आणि जेथे गवतही उगवू शकणार नाही अशी पांढरे वाळवंट सलेली पण अतिथंड वातावरण यामुळे कसलीही मनुष्य वस्ती नसलेला प्रदेश म्हणून कोणत्याही सत्तेने त्यावर आपली मालकी सांगितली नव्हती. यातील काही भाग चीनने व्यापारी रस्ता बनवण्यसाठी व्यापला तेव्हा देश दुर्बल असतानाही युद्ध करणारे नेहरूच होते हे मात्र विसरून जायचे. पण या भागाचा खरा इतिहास कोणी शोधायचा?

१८६५ मध्ये ब्रिटीश सर्व्हेयर डब्ल्यू. एच. जॉन्सन याला लडाखच्या चीनी सीमेपर्यन्तच्या भूभागाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमले गेले. त्याने लडाखची सीमा शाहीदुल्लाच्या उत्तरेकडे असलेल्या कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंडीपर्यंत रेखाटली. यामुळे काराकाश नदीचे खोरेही लडाखमध्ये गृहीत धरले गेले. पण पुढे डग्लस फोरसिथ आणि हेन्री ट्रोटरने केलेल्या सर्वेक्षणात मात्र शाहीदुल्ला लडाखच्या क्षेत्रात गृहीत धरले गेले नाही.
मुळात सीमारेशाच वादग्रस्त झाली ती ब्रिटिशांमुळे आणि भारताने प्राचीन काळापासून भारताची कोणतीही सीमारेषा कधी ठरवलेलीच नव्हती. आज जोही भारत आहे तो ब्रिटीश भारत आहे हे वास्तब कटू वाटले तरी स्वीकारावे लागते.
नेहरूंच्या काळात झालेले पहिले भारत चीन युद्ध का झाले?
प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे हा चीनचा सुरुवातीपासून प्रधान हेतू असल्याने त्यांनी तारींम खो-यातील येन्चेंग शहर ते ल्हासा येथवर जाणा-या रस्त्याचे काम सुरु केले. हा रस्ता भारताच्या अधिकृत भूभाग असलेल्या अक्साई चीनमधून तयार करायला सुरुवात झाल्यानंतर भारत-चीन संघर्षाची ठिणगी पडली. एवढा दूरचा दुर्गम परिसर असूनही भारताने स्वत: दुर्बल असतांनाही युद्ध छेडले. खरे तर अक्साई चीन कोणाचा प्रदेश यावबाबत आधी वादच नव्हता कारण अक्साई चीन म्हणजे रोगट पांढरे वाळवंट हा तत्कालीन सर्व व्यापार्यांचाही अनुभव होता. तरीही भारतीय सैन्याने दौलत बेग ओल्डी राखले. सियाचीन हिमनदीही राखली.
पण आता एकविसाव्या शतकातील भारताने मोदीन्च्या नेतृत्वाखाली चीनला अधिकचा प्रदेश सहज जिंकू दिला. अर्ध्याच्या वर Pangong सरोवर चीनच्या ताब्यात गेले आहे. गल्वान खोरे आज आपल्या ताब्यात उरलेले नाही. हॉट स्प्रिंगचा भाग आज कोणाच्या ताब्यात आहे हे भारतीय नागरिक आज ठामपणे सांगू शकत नाहीत.
हे कोनाच्या कार्यकालात घडले?
नेहरूंच्या?

मोदी नेहमीच आपली अपयशे झाकण्यासाठी नेहरुंचा वापर का करतात?
जो भागच माहित नाही त्याबद्दल शड्डू ठोकायला कोणाचे काही जात नाही. तेथून जे पुरातन व्यापारी मार्ग जात होते त्यावर संशोधन करायला एकही भारतीय पुढे आला नाही. गावगप्पा म्हणजे इतिहास नसतो.
मुळात “अखंड भारत” ही संकल्पना कधीही अस्र्तीत्वात नव्हती. मुळात राष्ट्र ही कल्पनाच आपण उधार घेतलेली आहे. भारत आज आहे ते घटनात्मक संघराज्य आहे आणि म्हणून आहे ती एकता तरी आहे. पण संघी लोक संघराज्य ही कल्पनाच नाकारतात. त्यांना काय हवे आहे ते त्यांनाच माहित पण ते राष्ट्राच्या हिताचे नाही एवढे मात्र निश्चित.
म. गांधी, पंडीत नेहरू, बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संस्थापक स्तंभ आहेत. त्यांच्यावर सर्व दोषांचे खापर फोडून आज आपल्याला सुखाने जगता येईल ही कल्पना करणारे मूर्खांच्या नंदवनात वावरत आहेत एवढे मात्र निश्चित.
खरे तर मागील पिढ्यांनी जेही बरे वाईट केले त्यात सकारात्मक भर घालणे हे नव्या पिढ्यांचे कर्तव्य असते.
पण स्वत: काही दिवे लावायचे नाहीत आणि आपल्या पराभूततेची आणि शरणागततेची जाणीव झाली की गेल्या पिढ्यांवर दुगाण्या झाडण्यात वांझ आनंद मिळवायचा ही वृत्ती घृणास्पद आहे.
नेहरूंनी हा देश शुन्यातून उभा केला हे वास्तव आहे आणि आपण त्यासाठी कृतद्न्य राहिले पाहिजे.
-संजय सोनवणी

शोध यंत्रमानवाचा!





निसर्गाने माणसाला बुद्धी दिली, त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर त्याने आकाशात उड्डाण भरायला सुरुवात केली आणि खोल गंभीर सागरतळावरून प्रवास करण्यासाठी पाणबुडीही शोधली. विश्वात अन्यत्र कोठे मानव-सदृश्य सृष्टी आहे काय याचाही अविरत शोध त्याने घेतला. त्याच वेळेस त्याला आपलीच प्रतिकृती असेल असा बुद्धिमान पण आज्ञाधारक आणि न थकणारा 'कृत्रिम माणूस' तयार करण्याची ओढ प्राचीन काळापासूनच लागून राहिली होती. मानवाची कल्पनासृष्टी आणि शक्ती अजब आहे. ती कल्पनेतून एखादा आविष्कार घडवते आणि मग त्याला सत्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करते. हा प्रवास सोपा नसतो. तो असंख्य अपयशांनी भरलेला असतो. पण मानवाचे मुलभूत वैशिष्ट्य हे की तो आपले प्रयत्न सोडून देत नाही आणि हळूहळू मानवी कल्पना सत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. यंत्रमानव म्हणजे रोबो ही अशीच एक संकल्पना मानवी मनाला प्राचीन काळापासून आकर्षित करत राहिली. आहे. आज आपण ज्याला 'रोबोट' किंवा यंत्रमानव म्हणतो, ती संकल्पना संपूर्णपणे विसाव्या शतकातील पाश्चात्त्य देणगी आहे असा अनेकांचा समज असतो. परंतु रोबोचा इतिहास शेकडो-हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी कल्पकतेत, पुराकथांमध्ये आणि थक्क करणाऱ्या रेखाटनांमध्ये पेरला गेला होता. असे म्हणतात की मानव तसा आळशी प्राणी आहे आणि आपले श्रम कमी करण्यासाठी तो आपल्याच प्रमाणे श्रमाचे किंवा वारंवार यांत्रिकपणे कराव्या लागणारे काम करून घेण्यासाठी कृत्रिम साधन साधन कधीतरी शोधणार हे उघड होते. आणि तसे झालेही प्राथमिक यंत्रमानव तर बनू लागले आणि आता मानवाप्रमाणे बुद्धीमान यंत्रमानव बनवण्यासाठी आजचे विज्ञान झगडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता त्याच्या आता हाताशी आहे. जगात चीन-अमेरिकेसारखे देश कामगारांची जागा यंत्रमानवांना देत आहेत. यामुळे मानवी रोजगाराचे काय होणार हा भयंकर प्रश्न तत्वचिंतकाना भेडसावू लागला आहे हे आपण पाहतोच.

पण या शोधाचा इतिहास पहायला आपल्याला प्राचीन काळात जावे लागते. भारतीय वाङ्मयाचा अभ्यास केला, तर यंत्रमानवाची संकल्पना भारतात मध्ययुगातच अवतरली होती हे आपण बाराव्या शतकातील बौद्ध ग्रंथ 'लोकपन्नती' मध्ये आणि भोजाच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथात पाहू शकतो. लोकपन्नती ग्रंथात आलेल्या कथेनुसार  प्राचीन काळी 'रोम' (यवनपूर) मध्ये अजिबात न थकणाऱ्या आणि अद्भूत कामे करणाऱ्या 'यंत्रपुतळ्यां'चे गुप्त तंत्रज्ञान होते. रोमचे राजे या तंत्रज्ञानाबाबत कमालीचे सावध होते आणि ते इतर देशांत जाणार नाही याची काळजी घेत असत. परंतु, पाटलीपुत्र येथील एका कल्पक तरुणाने या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी गुप्तहेरासारखा रोममध्ये प्रवेश केला आणि तिथल्या यंत्रकाराची मुलगी आणि त्याच्या कलेशी जवळीक साधून, त्याने ते यंत्र बनवण्याचे रहस्य आणि आराखडे आत्मसात केले. पण ही वार्ता फुटली. हे तंत्रज्ञान चोरून भारतात निघत असताना रोमच्या गुप्तहेरांनी त्याचा पाठलाग केला. पकडले जाण्याच्या भीतीने त्या तरुणाने ते रेखाटने आणि साचे स्वतःच्या मांडीत कापून लपवले. त्याचा यात प्राण गेला असला तरी त्याचा मुलगा ते गुपित भारतात घेऊन येण्यात यशस्वी ठरला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सम्राट अजातशत्रू आणि नंतर सम्राट अशोकाच्या काळात, भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे रक्षण करण्यासाठी विशेष 'यंत्र सैनिक' तैनात करण्यात आले होते. हातात नग्न तलवारी घेऊन अहोरात्र फिरणाऱ्या या स्वयंचलित यंत्रांना त्या काळी 'भूत वाहन' असे नाव दिले गेले होते. समरांगण सूत्रधारमध्ये यंत्रशास्त्रविषयक प्रकरणात लाकुड किंवा  धातूने यांत्रिक बाहुल्या किंवा पक्षी कसे बनवावेत, याचे सविस्तर वर्णन दिले आहे. यामध्ये मानवी आणि प्राण्यांच्या आकाराचे कारंजे, तेल भरणाऱ्या बाहुल्या, नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या बाहुल्यांचा उल्लेख आढळतो.

इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील चिनी ग्रंथांमध्येही राजा मु आणि यान शी  या यांत्रिक अभियंत्याने बनवलेल्या मानवाकृती यंत्राची कथा आढळते. अर्थात ही मानवी काम करू शकणारी यंत्रे खरेच अस्तित्वात होती याचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.

मध्ययुगात या कल्पनेला गती दिली ती अरब शास्त्रज्ञांनी. १२ व्या शतकात होऊन गेलेला बदी अल-जझारी हा इस्लामिक सुवर्णकाळातील एक अफाट कल्पक इंजिनिअर आणि मेकॅनिक होता. त्याला 'फादर ऑफ रोबोटिक्स' म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अल-जझारीने केवळ कल्पना केल्या नाहीत, तर 'द बुक ऑफ नॉलेज ऑफ इंजिनिअर्स मेकॅनिकल डिव्हाइसेस' या पुस्तकात शेकडो स्वयंचलित यंत्रांची हुबेहूब रंगीत रेखाटने आणि ब्ल्यूप्रिंट्स तयार केल्या. त्याने पाण्याचा दाब, कप्प्या आणि फिरणाऱ्या चक्रांच्या सहाय्याने चक्क एका नौकेमध्ये वाद्ये वाजवणारे कृत्रिम 'बँड वादक'  तयार केले होते. पाणी जसे जसे पुढे सरकायचे, तसे हे यांत्रिक बाहुले अचूक तालात ड्रम आणि सनई वाजवायचे. राजमहालात राजाच्या करमणुकीसाठी आणि हात धुण्यासाठी पाणी ओतणारे यांत्रिक नोकरही त्याने बनवले होते.

त्यानंतर १४९५ च्या सुमारास, जगप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक लिओनार्डो दा विंची याने आपल्या डायरीत एका यांत्रिक सैनिकाचे सविस्तर रेखाटन केले. अंतर्गत दोऱ्या आणि चक्रांच्या साहाय्याने हा लोखंडी सैनिक उठू शकत होता, हात हलवू शकत होता आणि आपले हेल्मेट उघड-बंद करू शकत होता.

गंमत म्हणजे, विज्ञानाने प्रत्यक्षात असा यंत्रमानव बनवण्यापूर्वी 'रोबोट' हा शब्द एका नाटकामुळे प्रचारात आला. १९२० मध्ये झेक प्रजासत्ताकचे लेखक कारेल चापेक याने ‘आर.यु. आर’  नावाचे एक विज्ञान-नाटक लिहिले. झेक भाषेत 'रोबोटा' म्हणजे 'सक्तीचे श्रम' किंवा 'वेठबिगारी' या नाटकात त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कृत्रिम यंत्र-मजुरांना पहिल्यांदा 'रोबोट' म्हटले आणि हा शब्द जगभर कायमचा रूढ झाला. पुढे १९५४ मध्ये जॉर्ज डेव्होल या अमेरिकन संशोधकाने 'युनिमेट' नावाचा जगातील पहिला औद्योगिक रोबोट प्रत्यक्षात तयार केला आणि तो कारखान्यात धोक्याच्या जागी जड लोखंड उचलण्याचे काम करू लागला.

पुराकथांतील रोमहर्षक 'भूत वाहने' आणि अल-जझारीच्या पाण्याच्या रेखाटनांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जपानच्या 'असिमो' पासून थेट 'सोफिया' या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटपर्यंत येऊन पोहोचला आहे. चीन मध्ये सैनिकी काम करणारे रोबो शोधण्याचा वेगाने प्रयत्न होतो आहे. युद्धत होणारी मानवी सैनिकांची जीवितहानी यामुळे तर थांबेलच पण सैनिकी शक्ती कितीतरी पटीने वाढलेली असेल.उद्या माणसाची जागा बुद्धीमान यंत्रमानवाने घेतली तर मानवाचे काय होईल आणि जगातील सारे सैन्य रोबोजनी रिप्लेस केले तर युद्धांचे अंतिम परिणाम किती भयंकर असतील यावर अनेक काल्पनिका आल्या आहेत. मानवी शोधांनी मानवाची अद्भुत कल्पकता सिद्ध केली असले तरी त्यातून मानवजातीवरच संकटे कोसळण्याची भीती आहेच. पाहूयात मानव आता या संभाव्य संकटावर आय मार्ग काढतो?

-संजय सोनवणी 

Saturday, July 25, 2026

पोरस म्हणजे पुरू?

 


मायकेल वित्झेल (Michael Witzel) आणि हेमचंद्र रायचौधुरी (Hemchandra Raychaudhuri) यांसारख्या विद्वानांनी 'पोरस'ची ओळख ऋग्वेदात उल्लेख असलेल्या प्राचीन पुरु (पौरव) वंशाशी जोडली आहे, विशेषतः 'दाशराज्ञ युद्धाच्या' (दहा राजांच्या युद्धाच्या) संदर्भात. मात्र, हे दहा राजांचे युद्ध सिंधू संस्कृतीच्या किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यात झालेले नव्हते. शिवाय हे युद्ध अतिप्राचीन (इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या) काळातील आहे. त्यामुळे, अलेक्झांडरला ज्या पोरसचा सामना करावा लागला, तो त्या प्राचीन युद्धात पराभूत झालेल्या पुरु वंशाचा वंशज असणे अजिबात शक्य नाही.
शिवाय, अनेक इतिहासकारांनी गृहीत धरल्याप्रमाणे 'पोरस' (ग्रीक: Pôros) हे 'पुरु' किंवा 'पौरव' या शब्दाचे ग्रीक रूप नाही. त्याऐवजी, ते 'पौरुशस्प' (Pourushaspa) या मूळ पर्शियन (इराणी) नावाचे ग्रीक लोकांनी केलेले अपभ्रंशित रूप असण्याची दाट शक्यता आहे. पौरुशस्प या नावाचा अर्थ 'राखाडी रंगाच्या घोड्यांचा स्वामी' असा होतो. अ्वेस्ता (Avesta) ग्रंथात हे नाव झरथुष्ट्राचे (Zoroaster) वडील म्हणून येते; आणि तत्कालीन पर्शियन/झोराष्ट्रियन संस्कृतीत हे अत्यंत प्रतिष्ठेचे नाव असून सरदार व खानदानी लोकांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरले जाई. ज्याप्रमाणे ग्रीक लोकांनी 'चंद्रगुप्त'चे 'सँड्रोकोटस' (Sandrocottus) आणि 'पाटलीपुत्र'चे 'पालिबोथ्रा' (Palibothra) केले, त्याचप्रमाणे ते क्लिष्ट पर्शियन आणि भारतीय नावांचे संक्षिप्त किंवा स्वतःच्या उच्चाराला सोयीचे असे रूपांतर करत असत.
वायव्य भारत (आजचा पाकिस्तान आणि पंजाबचा भाग) हा प्रदेश जवळजवळ दोन शतके हखामनी (Achaemenid) पर्शियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे, 'पौरुशस्प' (किंवा त्यासदृश पर्शियन नावाचा) कोणीतरी स्थानिक क्षत्रप (सत्राप/गव्हर्नर) किंवा उप-क्षत्रप पर्शियन साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून पंजाबच्या काही भागावर शासन करत असण्याची शक्यता पूर्णपणे तार्किक वाटते. स्थानिक लोकांसाठी तो जरी 'राजा' असला, तरी प्रत्यक्षात तो पर्शियन प्रशासकीय चौकटीचाच एक भाग म्हणून काम करत होता.
या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पोरस आणि त्याच्या राज्याविषयीची एकमेव समकालीन माहिती फक्त ग्रीक स्रोतांमध्येच मिळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही भारतीय वाङ्मयीन किंवा शिलालेखांमध्ये पोरसचा कुठेही उल्लेख आढळत नाही. युद्धातील पराभवानंतर अलेक्झांडरने पोरसला पुन्हा आपल्या साम्राज्याचा 'क्षत्रप' (सत्राप) म्हणूनच नियुक्त केले. ही गोष्ट स्पष्टपणे दर्शवते की, पोरस हा वैदिक परंपरेतील कोणताही स्वतंत्र स्थानिक राजा नसून, आधीपासून अस्तित्वात असलेल्या पर्शियन धर्तीच्या प्रशासकीय व्यवस्थेचाच एक भाग होता. अलेक्झांडरने अखामेनी साम्राज्याचा नाश करण्याचे ठरवले होते, त्यानूसारच त्याचे हे आक्रमण होते. त्याने स्वारी केली तेव्हा पंजाबपर्यंत अखामेनी सत्ता पसरलेली होती हेही लक्षात घ्यावे लागते. थोडक्यात पोरस हा पर्शियन होता, कोणी वैदिक वंशातील राजा नव्हे.

-संजय सोनवणी

Thursday, June 25, 2026

उड्डाणाचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे राईट बंधू


मागील लेखात आपण पाहिले की मानवी उड्डाणाचे स्वप्न प्राचीन काळापासून मानवाला सतावत होते. माणसाने नेहमीच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न केला आहे. उडता यावे हे स्वप्न तसे अशक्यप्राय वाटत असले तरी माणसाची अपार जिज्ञासा आणि तिच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करत राहण्याही वृत्ती यातून विमानाच्या प्रत्यक्ष शोधापर्यंतचा प्रवास मानवाने पूर्ण केला. विमानाच्या संकल्पनेचा इतिहास, प्राचीन पुराणकथांत मिळणारे उल्लेख, विमानसदृश्य सापडलेली प्राचीन खोदचित्रे असा पुढे जात लिओनार्डो दा विंची, जॉर्ज केली, ओटो लिलिएन्थल इत्यादींपासून पुढे तो राईट बंधूंपर्यंत येतो. या शोधपरंपरेत सातत्याने, अनेक अपयशे येउनही हार न मानता मानव उड्डानाचे प्रयत्न करत राहिला. त्याचा पुढील भाग म्हणून राईट बंधूंनी प्रत्यक्ष यशस्वी उड्डाण साध्य केले. तत्पूर्वी अपयशे येण्याचे कारण म्हणजे एक मूलभूत प्रश्न आणि तो म्हणजे माणूस आकाशात उडू शकेलही, पण तो हवेत प्रचालन कसे करणार? त्यामुळे सर्वांचे उड्डानाचे प्रयोग अयशस्वी होत होते.

पण नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन अमेरिकन बंधूंनी इतिहास घडवला. विल्बर आणि ऑर्व्हिल राईट हे ते बंधू. ते प्रत्यक्षात व्यावसायिक शास्त्रज्ञ नव्हते तर ते ओहायो राज्यातील डेटन येथे सायकली बनविण्याचा आणि दुरुस्त करण्याचा व्यवसाय करत होते. परंतु यंत्ररचनेची उत्तम जाण, निरीक्षणशक्ती आणि उपजत प्रयोगशील वृत्ती यांमुळे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या समस्येकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले.

यामागे एका दुर्दैवी अपघाताची पार्श्वभूमी आहे. माणूस तोवर ग्लायडर बनवून त्यातून उडायला शिकला असला तरी त्यात नियंत्रणाची साधने नव्हती. इंजिनही नव्हते. तरीही धाडसी लोक उद्दानाचे प्रयोग करतच असत. अशात १८९६ मध्ये जर्मन संशोधक ओटो लिलिएन्थल यांचा ग्लायडर अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने राईट बंधूंना धक्का बसला, पण त्याचबरोबर उड्डाणशास्त्राविषयी तीव्र उत्सुकताही निर्माण झाली. त्यांनी उपलब्ध साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्या अनेक संशोधकांचे लक्ष अधिक काळात विमान उडवू शकेल असे शक्तिशाली इंजिन तयार करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु राईट बंधूंना वाटले की खरा प्रश्न इंजिनाचा नसून नियंत्रणाचा आहे. त्यांनी मग नैसर्गिक रीत्या उडणार्या पक्षांवर आपले लक्ष आधी केंद्रित केले.

पक्ष्यांचे निरीक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. उडते पक्षी वळताना किंवा संतुलन राखताना पंखांच्या कोनात काही सूक्ष्म बदल करतात. त्या निरीक्षणावरून त्यांनी पंखांना किंचित झोक देऊन विमानाला वळविण्याची आणि दिशा देण्याची कल्पना विकसित केली. पुढे हीच पद्धत विंग वॉर्पिंगम्हणून प्रसिद्ध झाली.

सन १८९९ मध्ये त्यांनी एका छोट्या पतंगावर हा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष ग्लायडर बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक हा समुद्रकिनारी भाग निवडला. येथे जोरदार वारे वाहत असत आणि जमिनीवर मऊ वाळू असल्याने जरी अपघात झाला तरी जीवितहानीची शक्यता कमी होती.

१९०० ते १९०२ या काळात त्यांनी तीन वेगवेगळे ग्लायडर तयार केले. शेकडो उड्डाणे केली. अनेक वेळा अपयश आले. तरीही त्यांनी हार न मानता आपले प्रयोग झपाटल्यासारखे सुरूच ठेवले. हे प्रयोग करताना प्रत्येक अपयशाच्या वेळेस ते अपयश का आले असावे याचा अभ्यास करत. आपल्या काळातील उपलब्ध वायुगतिकीय आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहुतेक संशोधकांनी एवढी अपयशे आल्यानंतर प्रयोग सोडून दिले असते, पण राईट बंधूंनी उलट स्वतःच संशोधन करण्याचे ठरवले.

त्यांनी एक लहान विंड टनेलतयार केला. विविध आकारांच्या शेकडो पंखांची चाचणी घेण्यात आली. आजच्या दृष्टीने हा प्रयोग साधा वाटेल; परंतु त्यातून मिळालेली माहिती त्या काळातील कोणत्याही उपलब्ध माहितीपेक्षा अधिक अचूक होती. उचलशक्ती, वायुरोध, पंखांचा कोन आणि आकार यांचे प्रत्यक्ष मोजमाप करून त्यांनी विमानरचनेचे नवे तंत्रज्ञान विकसित केले.

१९०२ चा त्यांचा ग्लायडर हा खऱ्या अर्थाने पहिला पूर्णपणे नियंत्रित ग्लायडर ठरला. त्यात पंखांचे वळण, उभा रडर आणि पुढील नियंत्रण ठेवण्यासाठीचा पृष्ठभाग यांचा समन्वय साधण्यात आला. आजच्या आधुनिक विमानांतील नियंत्रण व्यवस्थेची बीजे याच रचनेत दिसून येतात.

यानंतर उरला तो इंजिनाचा प्रश्न. बाजारात उपलब्ध इंजिने अतिशय जड होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे इंजिन बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यशाळेतील चार्ली टेलर या कुशल मेकॅनिकने त्यांना मदत केली. अवघ्या काही महिन्यांत हलके पण सक्षम पेट्रोल इंजिन तयार झाले.

विमानाच्या प्रचालनासाठी लागणार्या पंख्यांची समस्या त्याहून कठीण होती. त्या काळी पंख्यांचे शास्त्र जवळजवळ अस्तित्वातच नव्हते. त्यांनी तयार केलेले प्रचालक पंखे (प्रोपेलर) त्या काळातील कोणत्याही रचनेपेक्षा अधिक कार्यक्षम ठरले.

अखेर सर्व तयारी पूर्ण झाली. १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉकजवळील किल डेव्हिल हिल्स येथे इतिहास घडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ऑर्व्हिल राईट विमानात आडवे झाले. विमानाने लाकडी रूळांवरून वेग घेतला आणि अचानक जमिनीपासून वर उचलले गेले. ते केवळ १२ सेकंद हवेत राहिले आणि सुमारे १२० फूट अंतर पार केले. परंतु मानवाच्या इतिहासातील तो क्षण अनमोल होता.

त्या दिवशी एकूण चार उड्डाणे झाली. शेवटच्या उड्डाणात विल्बर राईट जवळजवळ एक मिनिट हवेत राहिले आणि ८५० फूटांहून अधिक अंतर पार केले. त्यानंतर जोरदार वाऱ्याने विमानाचे नुकसान झाले आणि त्या दिवसाचे प्रयोग थांबले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी जगाने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. काही वृत्तपत्रांनी ती बातमी छापलीही नाही. अनेकांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु पुढील काही वर्षांत राईट बंधूंनी आपल्या विमानात सातत्याने सुधारणा केल्या आणि अखेर संपूर्ण जगाला त्यांच्या यशाची दखल घ्यावी लागली.

राईट बंधूंचे मोठेपण केवळ त्यांनी पहिले उड्डाण केले म्हणून नाही. त्यांनी संशोधनातील प्रत्येक अडचण वैज्ञानिक पद्धतीने सोडवली. उपलब्ध माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः प्रयोग केले. अपयशाला घाबरले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या यशाने आधुनिक विमानयुगाचा पाया घातला.

आजची महाकाय प्रवासी विमाने, ध्वनिवेगापेक्षा जलद जेट विमाने आणि अवकाश संशोधन यांची सुरुवात त्या बारा सेकंदांच्या उड्डाणातून झाली होती. मानवी जिद्द, वैज्ञानिक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही प्रत्यक्षात उतरू शकतात, याचा राईट बंधूंचा इतिहास हे सर्वोत्तम उदाहरण आहे. राईट बंधूंनी केवळ विमान शोधले नाही तर त्यांनी उड्डाण नियंत्रित करण्याची समस्या सोडवली आणि माणसाचे हवेत उडता येण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

·         संजय सोनवणी

Sunday, May 17, 2026

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

 महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची संतती होती आणि त्यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला हे साधारणता: सर्वमान्य आहे. पण इतिहास पाह्यला गेलो तर हे सत्य असल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.

उदा. सम्राट अशोकाने स्वत:च्या शिलालेलेखात आपली द्वितीय पत्नी कारुवाकी (चारुवाकी) आणि पुत्र तिवर याचा सन्मानाने उल्लेख केला आहे, पण एकाही शिलालेखात महेंद्र व संघमित्राचा उल्लेख केलेला नाही. अशोकाच्या प्रयागराज (अलाहाबाद) येथील 'राणीच्या शिलालेखात' तीवर याचे नाव आल्यानंतर, मौर्य साम्राज्याच्या अधिकृत इतिहासातून आणि पुढील कोणत्याही शिलालेखांमधून त्याचे नाव अचानक आणि कायमचे गायब होते. शक्यता ही सांगितली जाते की त्याचा अकाली मृत्यू झाला असावा किंवा त्याने संन्यास घेतला असावा. पण अर्थात हे तर्कच आहेत. ठोस पुरावा काही नाही.
महेंद्र आणि संघमित्रा हे उल्लेख प्रथम येतात ते श्रीलंकेत लिहिले गेलेले बौद्ध ग्रंथ दीपवंस आणि महावंस यात, जे इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर लिहिले गेले. म्हणजे अशोकाच्या मृत्युनंतर जवळपास सातशे वर्षांनी. हे उल्लेख वगळता संघमित्रा आणि महेंद्र यांच्या ऐतिहासिकतेचे कोणतेही ठोस 'भारतांतर्गत' किंवा श्रीलंकेतील पुरातत्वीय पुरावे (उदा. अशोकाचे अथवा श्रीलंकेचा तत्कालीन राजा तिस्स याचे शिलालेख) उपलब्ध नाहीत.
महेंद्र या नावाचा एक स्थविर होता अशा अर्थाचे शिलालेख राजगला आणि मिहीन्तले येथील लेखांत मिळतात पण येथे फक्त महिंद्राचा उल्लेख आहे आणि तोही एक सामान्य स्थविर म्हणून. ही कोणीतरी समान नावाची व्यक्ती असू शकेल. यातही संघमित्रा हे नाव कोठेही मिळून येत नाही.
सातव्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्यु-एन-त्सांग याने लिहिलेल्या ऐकीव माहितीनुसार श्रीलंकेत बौद्ध धर्म पसरवणारा महिंद (महेंद्र) हा सम्राट अशोकाचा 'लहान भाऊ' (Younger Brother) होता, मुलगा नव्हता. पण यातही संघमित्रा नाव गायब आहे.
भारतातील हस्तलिखितांपेक्षाही जुना पुरावा चीनमध्ये मिळतो. इसवी सन ३०० मध्ये 'अँन फॅकिन' (An Faqin) नावाच्या विद्वानाने 'अशोकावदान'चा चिनी भाषेत अनुवाद केला, ज्याचे नाव 'अ-यु वांग चुआन' (A-yu wang chuan) असे आहे. यावरून सिद्ध होते की, इसवी सनाच्या ३ ऱ्या शतकापूर्वीच हा मजकूर भारतात पूर्णपणे लिहून तयार झाला होता
या अनुवादात महेंद्र किंवा संघमित्रा ही नावे अस्तित्वात नाहीत मात्र या ग्रंथामध्ये अशोकाचा एक लहान भाऊ दाखवला आहे, ज्याचे नाव 'वीताशोक' असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मोहिमेचे आणि श्रीलंकेत बौद्ध धर्म नेण्याचे श्रेय श्रीलंकन ग्रंथ 'महेंद' (महेंद्र) याला देतात, तशाच प्रकारच्या धार्मिक प्रवासाचे किंवा भिक्षू बनण्याचे श्रेय हा चिनी/उत्तर भारतीय ग्रंथ अशोकाच्या भावाला (विताशोक) याला देतो. पण श्रीलंकन बौद्ध साहित्यातून ९आनि भारतीय इतिहासातून विताशोक हे नाव गायब आहे.
सन ३०० च्या या चिनी भाषांतरात महेंद्र-संघमित्राचे नाव नसणे हे सिद्ध करते की, अशोकाच्या मृत्यूनंतरच्या ५०० वर्षांपर्यंत उत्तर भारतात (मगध, मथुरा, उज्जैन) महेंद्र आणि संघमित्रा या नावांची कोणतीही मोठी ओळख किंवा कथा अस्तित्वात नव्हती कारण त्या ऐतिहासिक व्यक्ती नव्हत्या तर त्या बौद्ध भिक्षुंनी आपल्या धर्माला वलय देण्यासाठी निर्माण केल्या होत्या.
पुराणे किंवा प्राचीन बौद्ध साहित्यामाध्येही ही नावे कोठेही अवतरत नाहीत, अवतरतात ती सम्राट अशोकानंतर किमान सातशे वर्षांनी आणि तीही श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात.

हे इथेच थांबत नाही. सोळाव्या-सतराव्या शतकातील (इ.स. १६०८) प्रसिद्ध तिबेटी बौद्ध इतिहासकार लामा तारानाथ यांनी आपल्या 'भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास' (History of Buddhism in India) या ग्रंथात महेंद्र आणि संघमित्रा या दोघांचा साधा उल्लेखही केलेला नाही. श्रीलंकेला बौद्ध धर्म नेण्याच्या संपूर्ण मोहिमेचे श्रेय तारानाथ यांनी अशोकाच्या कोणत्याही अपत्याला दिलेले नाही. एवढेच नाही तर  श्रीलंकेव्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही बौद्ध परंपरेला (चिनी असो, तिबेटी असो वा उत्तर भारतीय) हे माहीतच नाही की 'महेंद्र आणि संघमित्रा' नावाची अशोकाची संतती श्रीलंकेत गेली होती.   तारानाथ यांच्यासारखा कट्टर बौद्ध इतिहासकार, ज्याने भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाची पानं न् पानं गोळा केली, तो जर सम्राटाच्या श्रीलंकेत गेलेल्या धर्मप्रचारक मुला-मुलीचे नाव लिहीत नसेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की 'महेंद्र-संघमित्रा हे अशोकाचे अपत्य होते' हा नॅरेटिव्ह केवळ आणि केवळ श्रीलंकेपुरताच मर्यादित आणि तिथल्याच भिक्षूंनी तयार केलेला धार्मिक प्रचार  होता.

यावरून इतिहासकारांचा हा संशय अधिक गडद होतो की, महेंद्र आणि संघमित्रा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे 'श्रीलंकन बौद्ध भिक्षूंनी' स्वतःच्या देशातील बौद्ध धर्माचे महत्त्व वाढवण्यासाठी तयार केले असावे. आणि भारतात हे जवळपास सर्वच धर्मांनी केलेले आहे. अनेक राजे क्षत्रीय नसतांना त्यांना उगाच आपल्या धर्माचे दाखवण्यासाठी बळजबरीने क्षत्रीय घोषित केले आहे. अनेकांचे बाप नष्ट करून टाकलेत, जे नव्हतेच त्यांना गुरुपदी बसवले तसेच हे आहे एवढेच!

इतिहास अजब असतो हेच खरे. चाणक्य जो अस्तित्वातच नव्हता तो जसा एक प्रत्यक्षातील व्यक्ती म्हणून मानला गेला तसेच महेंद्र-संघमित्रेचे झाले हे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही.
-संजय सोनवणी

Saturday, May 16, 2026

शोध दारूगोळ्याचा!



 

 

माणसाने जीवन सुसह्य करण्यासाठी कालौघात अनेक शोध लावले असले तरी शत्रूवर आक्रमण किंवा शत्रूपासुन संरक्षण यासाठीही अनेक शोध लावले. तलवारी, भाले, बर्च्या., गदा, धनुष्यबाण असे मानवी शक्तीवर अवलंबून असलेले शोध लावत युद्धतंत्रात बदल घडवत नेले. पण दारूगोळ्याच्या शोधाने युद्धांतील विध्वन्सकता कैक पटींनी वाढली. पण दारूगोळ्याचा शोध ठरवून लावला गेला नाही. तो हेतूही नव्हता तर अत्यंत अपघाताने हा शोध लागला.

चीनमधील ताओ पंथीय अमरत्वाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत असत. असा द्रव बनवायचा की ज्यायोगे मनुष्य अमर होईल असा या किमयागारांचा प्रयत्न होता. यातूनच सोरा, गंधक आणि कोळशाची पूड मिश्रण केल्यानंतर स्फोटक दारू (गनपावडर) तयार होते असा शोध लागला. अर्थात आधी हे मिश्रण नेमके किती प्रमाणात करायचे याचं अंदाज नसल्याने याकडे खेळकर वृत्तीने पाहण्यात आले. इतिहासकारांनुसार, बंदुकीच्या दारूशी साम्य असणाऱ्या पदार्थाचा जगातील सर्वात पहिला ढोबळ उल्लेख इ.स. १४२ मध्ये ईस्टर्न हान राजवंशाच्या काळातील किमयागार वेई बोयांग  यांनी केला होता. त्यांना 'चिनी किमयाशास्त्राचे जनक' मानले जाते. त्यांनी आपल्या 'कानतोंग की') या ग्रंथात लिहिले होते की, "तीन पावडरींचे असे एक मिश्रण आहे, जे एकत्र केल्यावर अत्यंत हिंसकपणे 'हवेत उडते आणि नाचते'

आधी या शोधाकडे मौजेने पाहिले गेले असले तरी टांग राजवटीच्या काळात मात्र या शोधाकडे गाम्भिर्याने पाहिले गेले. कारण घडले एक स्फोट आणि त्यातून झालेला विध्वंस. किमयागारांनी औषध बनवण्यासाठी सोरा ( पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि लोणारी कोळशाची पावडर एका विशिष्ट प्रमाणात एकत्र केली आणि हे मिश्रण प्रखर आचेवर गरम करताच प्रयोगशाळेत प्रचंड मोठा स्फोट झाला. यात किमयागारांचे चेहरे आणि हात भाजले, तसेच त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. ताओवादी एवढे घाबून गेले की त्यांनी हे मिश्रण चुकुनही गरम करू नका अन्यथा अमरत्व राहिले दूर, मरायची वेळ येईल असे सांगायला सुरुवात केली. पण दहाव्या शतकाच्या आसपास चीनी संशोधकांच्या लक्षात आले की शत्रूचा खात्मा करण्यासाठी या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रथम या मिश्रणाचे स्फोट करून शत्रूच्या घोड्यांना घाबरवून पळून जाण्यासाठी याचा उपयोग केला गेला. सोंग राजवंशाच्या काळात, इ.स. १०४४ मधील 'वूजिंग झॉंग्याओ' या चिनी लष्करी पुस्तकात गनपावडर बनवण्याचा जगातील पहिला अचूक आणि स्पष्ट रासायनिक फॉर्म्युला अधिकृतपणे नोंदवला गेला.

भारतातही बिहार, बंगाल, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांत नैसर्गिक सोऱ्याच्या खाणी आहेत. बांबूच्या नळीत सोऱ्याबरोबर गंधक आणि कोळशाची पूड भरली की त्यातून अग्निबाणासारखी शत्रे दूरवर मारा करण्यासाठी फेकता येतात असा शोध भारतात बंगाल किंवा आसाममध्ये लागला असेही मानले जाते. आसाम आणि चीन या भागात प्राचीन व्यापारी मार्गांवरून दळणवळण असल्याने हा शोध भारतातून चीनमध्ये गेला की चीनमधून भारतात आला याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. पण उपयुक्त शोध सर्वत्र झपाट्याने पसरतात हा इतिहास असल्याने पहिलेपणाचे श्रेय कोणीही ठामपणे घेऊ शकत नाही. पण युद्धासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला चीनने सुरुवात केली यात शंका नाही.

हा शोध जरी चीन-भारतात लागला असला तरी या तंत्राचा शास्त्रीय वापर केला तो युरोपने. तेराव्या शतकात तुर्कमोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश प्रक्षेपकांतून बाण फेकीत असत. चवदाव्या शतकात यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला गेला.

द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला अशी नोंद मिळत असली तरी तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच तोफा, अग्निबाण, हातबॉम्ब, बंदुका, पिस्तुले इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला.

सोळाव्यासतराव्या शतकांत जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत गारगोटीच्या चापाची योजना करण्यात आली. बारा ते पंधरा किलो वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीचा वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले.

इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या रॉकेट्सची कल्पना पश्चिमी देशांत नेली. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौकाया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला. पुढे यात नवीन शोधांची भर पडत राहिली. आता प्रचंड संहारक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इराण-इझ्राएल-गाझा आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात आपण याचे भयानक संहारकता पाहिली आहेच. माणूस अमरतेसाठी दैवी रसायन शोधात होता पण त्याच्या हाती लागला तो असा विध्वंसक शोध!

 

-संजय सोनवणी 


जैनांचे मराठी भाषेतील योगदान

  जैनांचे मराठी भाषेतील योगदान संजय सोनवणी चिनार पब्लिशर्स   लेखकाचे मनोगत       “ जैनांचे मराठी भाषेतील योगदान ” हे पुस्तक लिहितांन...