Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Sunday, May 17, 2026

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

 महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची संतती होती आणि त्यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार केला हे साधारणता: सर्वमान्य आहे. पण इतिहास पाह्यला गेलो तर हे सत्य असल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत.

उदा. सम्राट अशोकाने स्वत:च्या शिलालेलेखात आपली द्वितीय पत्नी कारुवाकी (चारुवाकी) आणि पुत्र तिवर याचा सन्मानाने उल्लेख केला आहे, पण एकाही शिलालेखात महेंद्र व संघमित्राचा उल्लेख केलेला नाही. अशोकाच्या प्रयागराज (अलाहाबाद) येथील 'राणीच्या शिलालेखात' तीवर याचे नाव आल्यानंतर, मौर्य साम्राज्याच्या अधिकृत इतिहासातून आणि पुढील कोणत्याही शिलालेखांमधून त्याचे नाव अचानक आणि कायमचे गायब होते. शक्यता ही सांगितली जाते की त्याचा अकाली मृत्यू झाला असावा किंवा त्याने संन्यास घेतला असावा. पण अर्थात हे तर्कच आहेत. ठोस पुरावा काही नाही.
महेंद्र आणि संघमित्रा हे उल्लेख प्रथम येतात ते श्रीलंकेत लिहिले गेलेले बौद्ध ग्रंथ दीपवंस आणि महावंस यात, जे इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर लिहिले गेले. म्हणजे अशोकाच्या मृत्युनंतर जवळपास सातशे वर्षांनी. हे उल्लेख वगळता संघमित्रा आणि महेंद्र यांच्या ऐतिहासिकतेचे कोणतेही ठोस 'भारतांतर्गत' किंवा श्रीलंकेतील पुरातत्वीय पुरावे (उदा. अशोकाचे अथवा श्रीलंकेचा तत्कालीन राजा तिस्स याचे शिलालेख) उपलब्ध नाहीत.
महेंद्र या नावाचा एक स्थविर होता अशा अर्थाचे शिलालेख राजगला आणि मिहीन्तले येथील लेखांत मिळतात पण येथे फक्त महिंद्राचा उल्लेख आहे आणि तोही एक सामान्य स्थविर म्हणून. ही कोणीतरी समान नावाची व्यक्ती असू शकेल. यातही संघमित्रा हे नाव कोठेही मिळून येत नाही.
सातव्या शतकात भारतात आलेल्या चीनी प्रवासी ह्यु-एन-त्सांग याने लिहिलेल्या ऐकीव माहितीनुसार श्रीलंकेत बौद्ध धर्म पसरवणारा महिंद (महेंद्र) हा सम्राट अशोकाचा 'लहान भाऊ' (Younger Brother) होता, मुलगा नव्हता. पण यातही संघमित्रा नाव गायब आहे.
भारतातील हस्तलिखितांपेक्षाही जुना पुरावा चीनमध्ये मिळतो. इसवी सन ३०० मध्ये 'अँन फॅकिन' (An Faqin) नावाच्या विद्वानाने 'अशोकावदान'चा चिनी भाषेत अनुवाद केला, ज्याचे नाव 'अ-यु वांग चुआन' (A-yu wang chuan) असे आहे. यावरून सिद्ध होते की, इसवी सनाच्या ३ ऱ्या शतकापूर्वीच हा मजकूर भारतात पूर्णपणे लिहून तयार झाला होता
या अनुवादात महेंद्र किंवा संघमित्रा ही नावे अस्तित्वात नाहीत मात्र या ग्रंथामध्ये अशोकाचा एक लहान भाऊ दाखवला आहे, ज्याचे नाव 'वीताशोक' असे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मोहिमेचे आणि श्रीलंकेत बौद्ध धर्म नेण्याचे श्रेय श्रीलंकन ग्रंथ 'महेंद' (महेंद्र) याला देतात, तशाच प्रकारच्या धार्मिक प्रवासाचे किंवा भिक्षू बनण्याचे श्रेय हा चिनी/उत्तर भारतीय ग्रंथ अशोकाच्या भावाला (विताशोक) याला देतो. पण श्रीलंकन बौद्ध साहित्यातून ९आनि भारतीय इतिहासातून विताशोक हे नाव गायब आहे.
सन ३०० च्या या चिनी भाषांतरात महेंद्र-संघमित्राचे नाव नसणे हे सिद्ध करते की, अशोकाच्या मृत्यूनंतरच्या ५०० वर्षांपर्यंत उत्तर भारतात (मगध, मथुरा, उज्जैन) महेंद्र आणि संघमित्रा या नावांची कोणतीही मोठी ओळख किंवा कथा अस्तित्वात नव्हती कारण त्या ऐतिहासिक व्यक्ती नव्हत्या तर त्या बौद्ध भिक्षुंनी आपल्या धर्माला वलय देण्यासाठी निर्माण केल्या होत्या.
पुराणे किंवा प्राचीन बौद्ध साहित्यामाध्येही ही नावे कोठेही अवतरत नाहीत, अवतरतात ती सम्राट अशोकानंतर किमान सातशे वर्षांनी आणि तीही श्रीलंकेत लिहिल्या गेलेल्या ग्रंथात.

हे इथेच थांबत नाही. सोळाव्या-सतराव्या शतकातील (इ.स. १६०८) प्रसिद्ध तिबेटी बौद्ध इतिहासकार लामा तारानाथ यांनी आपल्या 'भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास' (History of Buddhism in India) या ग्रंथात महेंद्र आणि संघमित्रा या दोघांचा साधा उल्लेखही केलेला नाही. श्रीलंकेला बौद्ध धर्म नेण्याच्या संपूर्ण मोहिमेचे श्रेय तारानाथ यांनी अशोकाच्या कोणत्याही अपत्याला दिलेले नाही. एवढेच नाही तर  श्रीलंकेव्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही बौद्ध परंपरेला (चिनी असो, तिबेटी असो वा उत्तर भारतीय) हे माहीतच नाही की 'महेंद्र आणि संघमित्रा' नावाची अशोकाची संतती श्रीलंकेत गेली होती.   तारानाथ यांच्यासारखा कट्टर बौद्ध इतिहासकार, ज्याने भारतातील बौद्ध धर्माच्या इतिहासाची पानं न् पानं गोळा केली, तो जर सम्राटाच्या श्रीलंकेत गेलेल्या धर्मप्रचारक मुला-मुलीचे नाव लिहीत नसेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की 'महेंद्र-संघमित्रा हे अशोकाचे अपत्य होते' हा नॅरेटिव्ह केवळ आणि केवळ श्रीलंकेपुरताच मर्यादित आणि तिथल्याच भिक्षूंनी तयार केलेला धार्मिक प्रचार  होता.

यावरून इतिहासकारांचा हा संशय अधिक गडद होतो की, महेंद्र आणि संघमित्रा हे नॅरेटिव्ह पूर्णपणे 'श्रीलंकन बौद्ध भिक्षूंनी' स्वतःच्या देशातील बौद्ध धर्माचे महत्त्व वाढवण्यासाठी तयार केले असावे. आणि भारतात हे जवळपास सर्वच धर्मांनी केलेले आहे. अनेक राजे क्षत्रीय नसतांना त्यांना उगाच आपल्या धर्माचे दाखवण्यासाठी बळजबरीने क्षत्रीय घोषित केले आहे. अनेकांचे बाप नष्ट करून टाकलेत, जे नव्हतेच त्यांना गुरुपदी बसवले तसेच हे आहे एवढेच!

इतिहास अजब असतो हेच खरे. चाणक्य जो अस्तित्वातच नव्हता तो जसा एक प्रत्यक्षातील व्यक्ती म्हणून मानला गेला तसेच महेंद्र-संघमित्रेचे झाले हे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही.
-संजय सोनवणी

Saturday, May 16, 2026

शोध दारूगोळ्याचा!



 

 

माणसाने जीवन सुसह्य करण्यासाठी कालौघात अनेक शोध लावले असले तरी शत्रूवर आक्रमण किंवा शत्रूपासुन संरक्षण यासाठीही अनेक शोध लावले. तलवारी, भाले, बर्च्या., गदा, धनुष्यबाण असे मानवी शक्तीवर अवलंबून असलेले शोध लावत युद्धतंत्रात बदल घडवत नेले. पण दारूगोळ्याच्या शोधाने युद्धांतील विध्वन्सकता कैक पटींनी वाढली. पण दारूगोळ्याचा शोध ठरवून लावला गेला नाही. तो हेतूही नव्हता तर अत्यंत अपघाताने हा शोध लागला.

चीनमधील ताओ पंथीय अमरत्वाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत असत. असा द्रव बनवायचा की ज्यायोगे मनुष्य अमर होईल असा या किमयागारांचा प्रयत्न होता. यातूनच सोरा, गंधक आणि कोळशाची पूड मिश्रण केल्यानंतर स्फोटक दारू (गनपावडर) तयार होते असा शोध लागला. अर्थात आधी हे मिश्रण नेमके किती प्रमाणात करायचे याचं अंदाज नसल्याने याकडे खेळकर वृत्तीने पाहण्यात आले. इतिहासकारांनुसार, बंदुकीच्या दारूशी साम्य असणाऱ्या पदार्थाचा जगातील सर्वात पहिला ढोबळ उल्लेख इ.स. १४२ मध्ये ईस्टर्न हान राजवंशाच्या काळातील किमयागार वेई बोयांग  यांनी केला होता. त्यांना 'चिनी किमयाशास्त्राचे जनक' मानले जाते. त्यांनी आपल्या 'कानतोंग की') या ग्रंथात लिहिले होते की, "तीन पावडरींचे असे एक मिश्रण आहे, जे एकत्र केल्यावर अत्यंत हिंसकपणे 'हवेत उडते आणि नाचते'

आधी या शोधाकडे मौजेने पाहिले गेले असले तरी टांग राजवटीच्या काळात मात्र या शोधाकडे गाम्भिर्याने पाहिले गेले. कारण घडले एक स्फोट आणि त्यातून झालेला विध्वंस. किमयागारांनी औषध बनवण्यासाठी सोरा ( पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि लोणारी कोळशाची पावडर एका विशिष्ट प्रमाणात एकत्र केली आणि हे मिश्रण प्रखर आचेवर गरम करताच प्रयोगशाळेत प्रचंड मोठा स्फोट झाला. यात किमयागारांचे चेहरे आणि हात भाजले, तसेच त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. ताओवादी एवढे घाबून गेले की त्यांनी हे मिश्रण चुकुनही गरम करू नका अन्यथा अमरत्व राहिले दूर, मरायची वेळ येईल असे सांगायला सुरुवात केली. पण दहाव्या शतकाच्या आसपास चीनी संशोधकांच्या लक्षात आले की शत्रूचा खात्मा करण्यासाठी या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रथम या मिश्रणाचे स्फोट करून शत्रूच्या घोड्यांना घाबरवून पळून जाण्यासाठी याचा उपयोग केला गेला. सोंग राजवंशाच्या काळात, इ.स. १०४४ मधील 'वूजिंग झॉंग्याओ' या चिनी लष्करी पुस्तकात गनपावडर बनवण्याचा जगातील पहिला अचूक आणि स्पष्ट रासायनिक फॉर्म्युला अधिकृतपणे नोंदवला गेला.

भारतातही बिहार, बंगाल, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांत नैसर्गिक सोऱ्याच्या खाणी आहेत. बांबूच्या नळीत सोऱ्याबरोबर गंधक आणि कोळशाची पूड भरली की त्यातून अग्निबाणासारखी शत्रे दूरवर मारा करण्यासाठी फेकता येतात असा शोध भारतात बंगाल किंवा आसाममध्ये लागला असेही मानले जाते. आसाम आणि चीन या भागात प्राचीन व्यापारी मार्गांवरून दळणवळण असल्याने हा शोध भारतातून चीनमध्ये गेला की चीनमधून भारतात आला याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. पण उपयुक्त शोध सर्वत्र झपाट्याने पसरतात हा इतिहास असल्याने पहिलेपणाचे श्रेय कोणीही ठामपणे घेऊ शकत नाही. पण युद्धासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला चीनने सुरुवात केली यात शंका नाही.

हा शोध जरी चीन-भारतात लागला असला तरी या तंत्राचा शास्त्रीय वापर केला तो युरोपने. तेराव्या शतकात तुर्कमोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश प्रक्षेपकांतून बाण फेकीत असत. चवदाव्या शतकात यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला गेला.

द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला अशी नोंद मिळत असली तरी तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच तोफा, अग्निबाण, हातबॉम्ब, बंदुका, पिस्तुले इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला.

सोळाव्यासतराव्या शतकांत जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत गारगोटीच्या चापाची योजना करण्यात आली. बारा ते पंधरा किलो वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीचा वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले.

इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या रॉकेट्सची कल्पना पश्चिमी देशांत नेली. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौकाया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला. पुढे यात नवीन शोधांची भर पडत राहिली. आता प्रचंड संहारक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इराण-इझ्राएल-गाझा आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात आपण याचे भयानक संहारकता पाहिली आहेच. माणूस अमरतेसाठी दैवी रसायन शोधात होता पण त्याच्या हाती लागला तो असा विध्वंसक शोध!

 

-संजय सोनवणी 


Friday, January 2, 2026

यशवंतराव होळकर आणि मी....

 गोपीचंद पडळकर, महाराजा




आज माझे बंधुतुल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी श्री. गोपीचंद पडळकर यांनी “अनसंग हिरो ऑफ इंडिया- महाराजा यशवंतराव होळकर” या मी इंग्रजीत लिहिलेल्या आणि सहा जानेवारी २०२१ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी झालेल्या प्रकाशन समारंभात कोणीही मागणी अथवा विनंती केली नसतांना पडळकर यांनी प्रकाशनासाठी आलेला रु. १.२५ laakh खर्च आपण देतो असे जाहीर केले होते. माझे मित्र प्रकाश खाडे यांनी आपल्या अत्यंत अडचणीच्या स्थितीत पुस्तकाची छपाई, संपादन इत्यादी कामाला अपार खर्च केलेला होता. मी किमान आठ महिने हे पुस्तक कोणत्याही मोबदल्याशिवाय लिहिले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाचे अनावर आकर्षण आणि त्यांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे केलेली माझ्या मनाला मोह पाडणारी झंझावाती रुजुवात यापोटी मी कधीही आर्थिक विचार केलेला नव्हता व नाही. मी त्यांच्या जीवनावर “झंझावात” ही कादंबरीही लिहिली व ती योगेश दशरथ यांनी स्टोरीटेलच्या श्राव्य माध्यमातून जगासमोर नेली. हा यशवंतरावांचा त्यांच्याच समाजाला न समजलेला महिमा आहे कारण ही कादंबरी हजारो लोकांनी ऐकली त्यात हा समाज किती असेल हा संशोधनाचा विषय आहे. २०११ साली माझे महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरचे चरित्र प्रकाशित झाले. त्याआधी प्रकाश खाडे आणि मी यशवंतरावांचे जन्मस्थान हुडकून वाफगाव येथे गेलो. पुढे मी त्यांच्या राज्याभिषेकाची तारीखही शोधून काढली. त्यांचा जन्मोत्सव आणि राज्याभिषेक दिन साजरा करायची सुरुवात मी आणे श्री. खाडे यांनी केली. आज ही प्रथा राज्यभर पसरलेली आहे. फक्त एकच आहे कि त्याचे श्रेय आम्हाला कोणी देत नाही आणि ती अपेक्षाही नाही. असो.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे जीवन इंग्रजीच्या माध्यमातून जगासमोर जावे हे माझे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले केळुस्करगुरुजी लिखित इंग्रजीतील चरित्र जगासमोर जावे यासाठी तुकोजीराजे होळकर यांनी त्या काळातील २५००० रुपयांची देणगी दिली होती व ते चरित्र जगभरच्या विद्यापीठांतील ग्रंथालयांमध्ये पाठवले होते. आता हे असे करायला कोणी पुढे येणार नाही हे वास्तव माहित असलेले श्री. खाडे यांनी आपले काही मित्र तयार केले होईते जे या प्रती विकत घेऊन भारतातील व जगभरच्या विद्यापीठांत प्रती पाठवणार होते. सुमारे अडीचशे प्रती तरी सुरुवातीला पाठवता येतील असा त्यांचा होरा होता. पण प्रकाशन समारंभात पडळकर यांनी केलेल्या घोषणेमुळे व त्याप्रमाणे पैसे खाडे यांना मिळाले आहेत या समजुतीमुळे हेही लोक बाजुला सरले. कार्यक्रमानंतर महिनाभरात पडळकर यांनी खाडे यांना फोन करून त्यांच्या सांगली जिल्ह्यातील जरे गावी बोलावले. माझ्या पाठीच्या वेदना तेंव्हा तीव्र असूनही खाडे यांच्या आग्रहामुळे मी तेथे गेलो. तेथे हे नव्हतेच. त्या दिवशी ते येणारच नव्हते. आम्ही अन्यत्र मुक्काम करून पुण्यास परत आलो.
प्रा. हरिभाऊ मी आठवीत असल्यापासून माझ्या सर्व सुख-दु:खाचे साक्षीदार आहेत. या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते मुख्य अतिथी होते. पडळकर यांनी कोणेही मागणी न करता दिलेले जाहीर आश्वासनही माहित होते. त्यांनी ते पाळले नाही. ती जागा पुढा-याप्रमाणे पोकळ आश्वासने देण्याचीही नव्हती. त्यांने तरीही “वचनं किं दरिद्रता” या न्यायाने आश्वासन दिले असेल पण त्यामुळे पुढे काय अनर्थ कोसळला याची त्यांना पर्वाही नसेल. एक वर्ष उलटले तेंव्हा त्यांची भेट हरीभाउन्शी झाली. त्यांनाही असेच थातूर मातुर उत्तर देऊन पडळकर यांनी बाजू सावरली. बरे, हा एकच अनुभव नाही, इतर नेत्यांबाबतही असे अनुभव अनेक आहेत आणि ते हरीभाउन्ना माहित आहेत कारण ते त्या क्षणांचे साक्षीदार आहेत.
अर्थात माझा अनुभवाने या लोकांवर विश्वास नव्हताच. छापील चरित्र विकण्यात आणि जगभरच्या ग्रंथालयांमध्ये नेण्यात अडचणी आहेत हे लक्षात घेऊन मी अव्यावहारिक निर्णय घेतला व तो म्हणजे अकेडमिया आणि रिसर्चगेट या अभ्यासकांसाठी असलेल्या साईटवर मोफत उपलब्ध करून देण्याचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या दोन्ही साईट्सवरून गेल्या वर्षभरात ६५००० पेक्षा जास्त प्रती डाउनलोड झालेल्या आहेत. दर आठवड्याला आजही किमान ३०० प्रती डाउनलोड होतात. अर्थात या प्रती मोफत आहेत. याचा फायदा असला तर एकच, अभ्यासकांपर्यंत तरी महाराजा यशवंतराव होळकर पोचत आहेत.
पण दुर्दैव हे आहे कि महाराजा यशवंतरावांचे नाव घेत, त्यांच्या नावाने आणाभाका घेणारे तथाकथित नेते मात्र यापासून अलिप्त आहेत. इंग्रजी सोडा, मराठी चरित्रही यांनी वाचलेले नाही कि “झंझावात” ही त्यांनी कधी ऐकलेले नाही. आणि हे लोक समाजाचे नेते बनतात. सरधोपट थापा मारतात. अब्यासक म्हनवनारेही बिनधास्त थापा मारतात. ही सुभेदार मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्याशीच केलेली कृतघ्नता नाही असे कोण म्हणेल? पण तेही असो. महाराजा यशवंतराव तळपते सूर्य होते आणि ते वर्तमानातही तळपतच राहणार. त्यासाठी माझीही मुळीच गरज नाही. मी जे केले ते केवळ प्रेमापोटी. मी कधी महाकाव्य लिहिले तर ते केवळ महाराजा यशवंतरावांवर असे मी म्हणतो ती पोकळ गोष्ट नाही.
आज दु:ख याचे वाटले कि काही मला म्हणाले, हरीभाउन्नी ही पोस्ट केली ही तुमच्या सांगण्यावरून. हा अत्यंत उद्धट आणि बेमुर्वतखोर आरोप आहे. मुळात मी हरीभौन्ना काही सांगेल ही माझी प्राज्ञा नाहीये. मलाही कोणी एखादी पोस्ट टाका असा आदेश देऊ शकत नाही. आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत. किंबहुना त्यामुळेच आमचे मैत्रही अजरामर झालेले आहे. असले फालतू आरोपो करणारे मनोविकृत आहेत एवढेच काय ते मी म्हणू शकेल.
राहिले पडळकर किंवा तशाच प्रकारच्या अन्य नेत्यांबद्दल, जर हे कार्य त्यांच्या मेहरबानीने सुरूच जर झालेले नव्हते तर ते त्यांच्या बेमुर्वतखोरीमुळे थांबेल असा भ्रम कोणीही करून घेण्याचे कारण नाही.
- संजय सोनवणी
Like
Comment
Share

Sunday, September 28, 2025

बायजाबाई शिंदे




दौलतराव शिंदे ह्याची पत्नी बायजाबाई यांची बरीचशी महिती प्रसंगोपात्त दिलेली आहेच. दौलतरावाच्या मृत्युनंतर या महाराणीला कोणत्या प्रसंगांतून जावे लागले याची थोडक्यात माहिती या प्रकरणात देत आहे. शिंदेशाहीतील ही एक अत्यंत थोर नावाजलेली महिला होती. दौलतरावाची इच्छा तिनेच राज्य सांभाळावे अशी होती. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड आह्यर्स्त याचीही इच्छा बायजाबाईने शिंदेने संस्थानाचा कारभार पहावा अशीच होती व तसे त्याने शिंदे दरबाराला लिहिलेही. पण वैदिक धर्मशास्त्राचे खूळ घेउन बसलेल्या तिच्या दरबारी लोकांनी तिने दत्तक घेतलाच पाहिजे असा हेका धरणे सुरु केले.

     त्यामुळे शेवटी बायजाबाईने फारसे आढेवेढे न घेता कण्हेरखेड येथील चांगजी शिंदे शाखेतील पाटलोजीचा मुकुटराव हा १०-१२ वर्षाचा मुलगा सर्वसंमतीने दत्तकविधानासाठी निवडला व त्याला जनकोजी (दुसरा) हे नाव देऊन त्याला दत्तक घेण्यात आले. बायजाबाईने त्यास नात-जावईही करून घेतले. शिंदे घराण्याचा नवा वारस अशा रीतीने गादीवर आला.  

     जनकोजी वयाने अजून लहान असल्याने बायजाबाई आपला बंधू हिंदुराव घाटगे याच्या मदतीने दौलतीचा कारभार पाहू लागली. तिने जुन्या-जाणत्या सेवकांचा व अधिकार्यांचा उचित सन्मान तर ठेवलाच पण प्रजाहिताचेही अनेक निर्णय घेतले. आपल्या पित्याची म्हणजे सर्जेराव घाटगे याची हत्या झाल्याचे तिला दु:ख असले तरी तिने त्याबाबत कसलाही त्रागा केला नव्हता. तिला आपल्या बापाची योग्यता काय आहे हे मनोमन माहित होतेच.

     इंग्रजांनी बायजाबाईची स्वायत्तता मान्य केले असली तरी त्यांच्या मनात नेहमीच एक धूर्त राजकारण खेळत असायचे. सुर्जी-अंजनगावला केलेल्या तहातील कलमे त्यांनी एकामागून एक रद्द करण्याचा घाट घातला. दक्षिणेतील शिंदेच्या ताब्यात असलेली इनामे गावे  सोडून देण्याचा प्रस्ताव इंग्रजांनी सादर केला व बायजाबाईवर त्यावर सही करण्यासाठी दडपण आणले जाऊ लागले. बायजाबाईने या प्रस्तावास खंबीरपणे विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनी अजूनच दडपण वाढवले. संघर्षाची स्थिती निर्माण झाली. अखेरीस अनेक वाटाघाटी करून काही गावे सोडून देऊन बायजाबाईने सर्वनाशे समुत्पन्ने या न्यायाने बरीच गावे वाचवली.

     बायजाबाईने राज्यातील चोर-दरोडेखोरांचा उपद्रवही बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात यश मिळवले त्यामुळे ती प्रजेताही लोकप्रिय झाली. मध्य भारतातील तो काळ अत्यंत अंदाधुंदीचा होता आणि अशा संक्रमणाच्या काळात राज्य चालवणे सोपे नसताना बायजाबाईने आपल्या सैन्याचे नव्याने व्यवस्थापन करत अत्यंत कुशलतेने आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली.

     बायजाबाईला उत्तम अश्वारोहण येत असे. शस्त्र चालवण्यातही ती कुशल होती. ती सुंदर तर इतकी होती कि तिला दक्षिणेची सौंदर्यलतिका असे सार्थ बिरूद दिले गेले होते. बोलण्यातही ती चतुर होती. देशात चाललेले राजकारण तिला चांगले समजत असे. त्याचा  उपयोग इंग्रज अधिकाऱ्याशी चर्चा करताना तिला होत असे. ती कडक अवश्य होती पण क्रूरबुद्धीचे नव्हती असे इंग्रजांनीही तत्कालीन गॅझेटमध्ये लिहिलेले आहे.   

     १८३३ पर्यंत तिने प्रत्यक्ष कारभार पाहिला पण जनकोजीने केलेल्या बंडामुळे तो आता जनकोजीच्या हाती गेला आणि येथेच बायजाबाईवर दुर्दैवे ओढवायला सुरुवात झाली.  या बंडाची कहाणी अशी. अजाणता जनकोजी बायजाबीशी कधीच चांगले वागत नसे. तिच्याशी उद्धट वर्तन करत असे. बायजाबाईने त्याला राज्यकारभाराचे शिक्षण न दिल्याने आणि तिची सत्ता सोडण्याची इच्छा नसल्याने जनकोजी वाह्यात झाला व मनमानी करू लागला असे काही इतिहासकार म्हणतात पण पारसनीस यांच्या मते त्यात तथ्य नाही. जनकोजी मुळात अत्यंत नीच दर्जाच्या लोकांच्या संगतीत गेल्याने व कुसल्ले मिळाल्याने तो बायजाबाईशी चुकीचे वर्तन करू लागला असा त्यांचा अभिप्राय आहे. हे योग्यही आहे कारण दौलतरावानेच दत्तक घेण्याऐवजी बायजाबाईनेच दौलतीचा कारभार पहावा अशी इच्छा व्यक्त केली होती तरीही बायजाबीने दरबाराच्या सल्ल्यानेच दत्तक घेतला होता व ज्या दिवशी जन्कोजीला दत्तक घेतले त्याच दिवशी तिला हे माहित असणार की आपली सत्ता कमी काळ चालेल.

     १८३० साली जनकोजीला विवाहात दिलेली बायजाबाईची नात मरण पावली त्यामुळे जनकोजीने दुसरा विवाह केला. बायजाबाईशी त्याचे उडणारे खटके इंग्रज सरकारपर्यंत पोचले व त्यांनी अल्पज्ञानी जनकोजीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण जनकोजी त्यांच्याशीही असभ्यपणे बोलला. बायजाबाईच्या ताब्यात राहूनच काम करा असा इशाराही इंग्रजांनी त्याला दिला होता. पण जनकोजीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे बायजाबाईला खूप मन:स्ताप झाला.

     सन १८२७ ते १८३२ पर्यंत बायजाबाईने अत्यंत धोरणी पद्धतीने राज्याचा विकास केला. व्यापार-उदीम वाढवला. इंग्रजांशीही अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. राज्यातील ठग आणि पेंढारी यांचाही बंदोबस्त केली. महसुली व्यवस्था सुरळीत केली.

     पण काही दुष्ट लोकांच्या मदतीने तिला कळू न देता जनकोजीने सैन्यातच फुट पाडली आणि १० जुलै १८३३ रोजी बंड केले. बायजाबाईने ते थोपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याच रात्री जनकोजीला सैनिकांनी किल्ल्यास वेढा घातला आणि महालात घुसून दोन सैनिकांनी बायजाबाईस कैद करण्याचा प्रयत्न केला. पण बायजाबाईने या अभेद्य वेढ्यातून सुटून जाण्याचे कौशल्य दाखवले व इंग्रज रेसिडेंटच्या निवासस्थान गाठले.  एक तंबू टाकून त्यात राहण्याची तिच्यावर वेळ आली.  

     पण कसेही करून बायजाबाईला पकडायचा निश्चय केलेल्या जनकोजीने १३ जुलै रोजी रेसिडेंटच्या निवासस्थानावरच हल्ला करून बायजाबाईस पकडायचे ठरवले. पण रेसिडेंट कॅव्हिंडोश याने बायजाबाईला ग्वाल्हेर सोडायचा सल्ला दिला. जणू इंग्रजांनीही तिची साथ सोडली होती याचेच हे निदर्शक होते. किंबहुना चाणाक्ष बायजाबाईपेक्षा पोरगेलासा जनकोजी आपल्याला जास्त उपयुक्त ठरेल असा इंग्रजांचा होरा असावा. बायजाबाई नाईलाजाने ग्वाल्हेरहून निघाली आणि मजल-दरमजल करत आग्रा येथे पोहोचली. हा प्रवास खूप कष्ट आँई त्रासाचा तर होताच पण धोक्यांनी भरलेला होता.

     बायजाबाई गेल्यानंतर इंग्रजांनी जनकोजीला राज्याधिकार दिले ब अलीजाबहादर ही महादजी शिंदेने अतुल पराक्रम गाजवत प्राप्त केलेली पदवीही वापरण्यास मुभा दिली. पण जनकोजीने राज्यकारभार हाती घेताच राज्यात बेबंदशाहीची परिस्थिती निर्माण झाली. लष्करी लोकांचेच तर हे राज्य नव्हे ना असे वाटावे अशी स्थिती आली. जनकोजीने बायजाबाईच्या काळात नेमलेल्या विश्वासू लोकांना पदमुक्त केले आणि चुकीचे लोक कारभारासाठी निवडले याचा हा परिपाक होता.

     बायजाबाई आग्र्यास पोचल्यानंतर तिने इंग्रजांशी आपले राज्य परत मिळावे यासाठी अर्ज-विनंत्यांचा सपाटा लावला पण इंग्रजांनी तिकडे साफ दुर्लक्ष केले. उलट त्यांना काशीस किंवा दक्षिणेत जावे असा हुकुम काढून एक महिन्याची मुदत दिली. हा हुकुम पाळणे मनी स्वतंत्र बुद्धीच्या बायजाबाईस शक्य नव्हते. मग इंग्रजांनी कॅप्टन रॉसच्या सैन्याला तिला अलाहाबाद येथे आणण्यास फर्मावले. रॉसने आदेश पाळला व बायजाबाईची ही अप्रत्यक्ष कैद सुरु झाली. या काळात तिच्या अनंत हालअपेष्टा झाल्या.

     नंतर १८४० साली इंग्रजांनी तिला नाशिक येथे निवासास पाठवून तिची सालाना चार लाख रुपये पेन्शन चालू केली.

     ७ फेब्रुवारी १८४३ रोजी जनकोजीचा मृत्यू झाला. त्यासही औरस संतती नसल्यामुळे इंग्रजांनी जनकोजीच्या अल्पवयीन पत्नी ताराबाई हिच्या मांडीवर शिंदे घराण्यातील एक मुलगा निवडून त्याचे नाव जयाजीराव ठेवत त्याला दत्तक घ्यायला अनुमती दिली. पण याचाही काळ अशांतीचा होता. इंग्रजांशी त्याने वैर घेतले. ते इतके टोकाला गेले की इंग्रज सैन्य ग्वाल्हेरकडे चालून यायला लागले. शिंदे आणि इंग्रजात महाराजपूर येथे युद्ध झाले त्यात जयाजीरावच्या सैन्याचा पराभव झाला.

     या युद्धामुळे त्याला ग्वाल्हेर संस्थानचा काही प्रांत इंग्रजांना द्यावा लागला. १८५३ पर्यंत मंत्रीमंडळच राज्याचा कारभार पाहत होते, पण आता जयाजी वयात आल्याने त्याच्या हाती ग्वाल्हेर संस्थानाची मुखत्यारी आली.

     बायजाबाई तोवर नाशिक येथेच होती. तिने या काळात विशेष राजकीय हालचाली केल्या नसल्या तरी या काळात काही घाट व मंदिरांची निर्मिती केली. जयाजी शिंदेशाहीच्या गादीवर आरूढ होताच तिने ग्वाल्हेर गाठले. जयाजीने तिला मात्र अत्यंत सन्मानपूर्वक वागवले.

     १८५७ साली झालेल्या बंडात ग्वाल्हेर संस्थानाने सामील होण्यास नकार दिला. बायजाबाईस हे कोणी नेता नसलेले बंड यशस्वी होईल यावर विश्वास नव्हता. पण सैन्यात मात्र बंडाची लागण झालेली होती त्यामुळे बहुतेक सैन्य जयाजीला सोडून गेले. इंग्रजांना त्याचा या बंडात सहभाग असावा असा संशय होता पण तो निर्मुल होता. तात्या टोपेने ग्वाल्हेर ताब्यात घेताच जयाजी आणि बायजाबाईने इंग्रजांचे संरक्षण मागितले. त्यांनी ग्वाल्हेर सोडले. ग्वाल्हेर सरासरी १० दिवस  बंडवाल्यांच्या अखत्यारीत राहिले पण त्यांनाही ग्वाल्हेर खाली करावे लागले.

     हा बायजाबाईचा वृद्धापकाळ होता. तिने दौलतरावाच्या उत्कर्षात अनमोल सहाय्य केले होते. तिला जीवनात एखाद्या शोकांतिकेत शोभतील अशा घटनाही पहाव्या आणि भोगाव्या लागल्या. तरीही तिने स्वत: १८२७ ते १८३३ पर्यंत अत्यंत कुशलतेने राज्य चालवले. हयातीतच ती एक दंतकथा बनून गेली. तिच्या कार्यकाळाचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी करून ठेवले आहे. शिंदे घराण्यातील स्व-कर्तुत्वावर गाजलेली ही पहिली महिला.

     तिचा मृत्यू २७ जून १८६३ रोजी ग्वाल्हेर येथे झाला.

·             

होय...हा फुकट्यांचा देश झाला आहे!

ज्या देशात आजही ८० कोटी नागरिक मोफत धान्यावर गुजराण करतात, ज्या देशात लाडकी बहीण, लेक लाडकीसारख्या सरकारी तिजोरीवर भार टाकणार्या योजना आखून ...