Showing posts with label नाट्य...महानाट्य. Show all posts
Showing posts with label नाट्य...महानाट्य. Show all posts

Friday, June 8, 2018

एका निरपराधाची ससेहोलपट : "जमानत"


भारतातील न्याय व्यवस्था ही एक चिंतेची बाब बनून गेलेली आहे. वर्षानुवर्ष पेंडींग असलेल्या कोट्यावधी केसेस, कमी जज, वकीलांनी केलेला कालापव्यय यामुळे न्यायव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. त्यात राजकीय व पोलीस यंत्रणेतील दोषांमुळे निरपराधही भरडले जातात. अनेक सामान्य आणि गरीब गुन्हेगार केवळ जामीन न मिळाल्यामुळे अथवा जामीनाची पुर्तता करता येत नसल्याने अपराध सिद्ध होऊन जेवढी शिक्षा झाली असती त्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात राहतात. असे भारतात साडेपाच लाखांहुनही अधिक कच्चे कैदी आहेत. त्यांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर सारे समान हे तत्व लागू केले जात नाही. मानवी हक्कांची ही पायमल्ली न्याययंत्रणेकडुनच केली जावी ही बाब भारतीय समाजाला शोभा देणारी नाही.

या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी "जमानत" या लघुपटाचा जन्म झाला. एक सामान्य अपंग मेंढपा्ळाला कसलाही संबंध नसतांना केवळ एका दरोड्यात आरोपी मिळत नसल्याने आणि अटक तर दाखवणे भाग असल्याने अटक केली जाते. त्याची दुर्दशा आणि करुण अंत, एका तरुण वकीलाने त्याच्या सुटकेसाठी केलेला प्रयत्न आणि त्याचीही होणारी हार आपले भेदक समाज वास्तव दाखवते.

य लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन संजय सोनवणी यांनी केले. निकिता ओंबासे आणि मयुर लोणकर यांनी मुख्य भुमिका निभावल्या तर न्यायस्थितीसमोर हार मानलेल्या सिनिअर वकीलाची भुमिका स्वत: संजय सोनवणी यांनी केली. मेंढपाळाची भुमिका वास्तव जीवनातही मेंढपाळच असलेल्या आनंद कोकरे यांनी केली. त्यांचा मूक अभिनय मूक समाजाचे प्रतिनिधित्व करते. या लघुपटाला मोठ्या प्रमानात यु ट्युबवर प्रेक्षक मिळत असून लवकरच ही फिल्म आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्येही दाखवली जाणार आहे. या लघुपटाची निर्मिती पेशाने पत्रकार असलेले शरद लोणकर यांनी केली आहे.


Friday, June 3, 2016

लक्षवेधी ‘असूरवेद’!

संजय डहाळे

राज्य नाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून अनेक दर्जेदार नाटके, अभिनेते, तंत्रज्ञ गेले आहेत. खर्‍या अर्थाने एक ‘प्रयोगशाळा’ म्हणून ही स्पर्धा आजही रंगकर्मींना खुणावतेय. नवनवीन संहिता अन् त्याचे हटके सादरीकरण त्यात दरवर्षी बघायला मिळते. यंदाही ‘असूरवेद’ या नाटकाने रसिकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. केवळ ‘प्रथम क्रमांक विजेते नाटक’ इतपतच त्याची ओळख शिल्लक उरणार नाही तर धर्म-अधर्म, पुराणकाळ-भविष्यकाळ, सत्य-असत्य यावर प्रभावी नाट्यमय भाष्य करणारी नाट्यकृती आकाराला आली आहे. आता या नाटकाचे काही प्रयोग हे आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे रसिकांना ‘असूरवेद’चे दर्शन होत आहे ही समाधानाची बाब. नाहीतर केवळ नाट्यस्पर्धेपुरते हे नाट्य उरले असते, पण ‘कलासाधना’ने रसिकांपर्यंत नाट्य पोहोचविण्याची धडपड केली. जी कौतुकास्पद म्हणावी लागेल.

संस्कृतीविषयक संशोधन करणारे संजय सोनवणी यांची ‘असूरवेद’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीवर आधारित नाट्यरूपांतर सुनील हरिश्‍चंद्र यांनी केले. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. कादंबरीचा आवाका मोठा. त्याचे नाट्यरूपांतर करताना परिश्रम घेतल्याचे जाणवते. स्वत: सुनील हरिश्‍चंद्र हे कल्पक रंगकर्मी असल्याने ही किमया त्यांनी केली. विषय तसा गंभीर व चक्रावून सोडणारा, पण त्यातही एक गूढता, उत्कंठा तसंच कुतूहल असल्याने विषय डोईजड होत नाही. रहस्यप्रधान नाट्य बघत असल्याचा अनुभव मिळतो.

संशोधक सुरेश जोशी यांचा अचानक खून होतो. पेशानं प्राध्यापकी करणारे जोशी यांचे तसे कुणी शत्रू नसतात. तरीही त्यांच्यावर हल्ला होतो. त्यात ते जातात. ऐतिहासिक मूर्तींमागे शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. संस्कृतीविषयक प्रदीर्घ अभ्यासानंतर आपले काही महत्त्वाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार असतो, तेवढ्यात त्यांचा झालेला खून. असूर वरुणाची मूर्ती त्यात गायब होते.

प्रा. जोशी हे मूर्ती तस्करी करणारे म्हणूनही चर्चा सुरू होते. एक रहस्यकथाच सुरू होते आणि मग त्याचा शोध प्रा. जोशी यांची कन्या सायली तसेच तिचा मित्र गौतम कांबळे हे सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांचे पीएचडीचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. मुणगेवार हे आहेत. सायली-गौतम हे दोघेही संशोधकच. आणि या शोधाचा मागोवा म्हणजे हे नाट्य. त्यात हिंदू-मुस्लिमांवर भाष्य आहे, इतिहास आहे. संस्कृती रक्षणासाठी व वर्चस्वासाठी होणारा संघर्ष आहे. एका क्षणी या नाट्यातील थ्रिल-गूढता संपते आणि वैचारिक स्तरावर पोहचते.

संस्कृतीच्या अस्तित्वासाठी काही कर्मठांनी जुन्या संहिता लपविल्या, बाद ठरविल्या आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण आपला भूतकाळ, पुराणकाळ तपासून घ्यावयास हवा. त्याचा शोध घेणे जरुरीचे आहे असं काहीदा एकूण कथानकातून मांडण्याचा प्रयत्न आहे. यातील वैचारिक संवाद काहीदा भडक व टोकाचे ठरतातः तर काहीदा हे एक ‘थ्रिल’नाट्य म्हणूनही वाटते, पण दोन अंकात खिळवून ठेवणारे प्रायोगिक वैचारिक नाट्य म्हणून निश्‍चितच त्यात ताकद आहे.

मृणाल वरणकर यांनी सायलीची भूमिका समजून केली आहे. अभिनयाचं उत्तम अंग त्यांना आहे. प्रायोगिक रंगभूमीवरून आलेला नव्या पिढीचा अभ्यासू रंगकर्मी सुशील इनामदार याने गौतमची भूमिका सुरेख केली. मृणाल व सुशीलचं ट्यूनिंग चांगलं आहे. गौरव मालवणकर (प्रा. मुणगेकर), सुभाष लोखंडे (द्विवेदी), रवी बनकर (डीसीपी) यांच्याही भूमिका नाट्याला पूरक ठरतात. आशीष पाथरे यांनी शेवटच्या क्षणी प्रा. जोशी म्हणून लावलेली हजेरी लक्षात राहण्याजोगी. तांत्रिक अंगे नाट्याला साथसोबत करणारी. एकूणच टीमवर्क सर्वांगसुंदर, काहीसा जड विषयही दिग्दर्शक-लेखकाने कल्पकतेनं पेलला आहे. त्याला एक गती आहे.

महाराष्ट्रात बुद्धिवंतांच्या झालेल्या हत्यांशी या नाटकाचा संदर्भ कदाचित काही मंडळी लावतील, पण त्यात अर्थ नाही. एकूणच नाट्यातील विषयाची मांडणी व एक परिणामकारक नाट्य म्हणून असलेले सादरीकरण हे महत्त्वाचे आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदी पोहचलेले नाट्य म्हणून लक्षवेधी ठरत आहे.
असूरवेद
मूळ कादंबरी – संजय सोनवणी
नाट्य रूपांतर/दिग्दर्शन – सुनील हरिश्‍चंद्र
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – राजेश पंडित/प्रशांत सावंत
संगीत – विशाल गोळे/कल्पेश पाटील
रंगभूषा – उदयराज तांगडी
वेशभूषा – समीर पेणकर
निर्मिती – महानगरपालिका कर्मचारी संघटना
संस्था – कलासाधना -

(दै. सामनामधील परिक्षण)

Sunday, March 16, 2014

"आषाढातील एक दिवस"



 आताच मोहन राकेश यांचे ज्योती सुभाष यांनी अनुवादित केलेल्या आणि अतूल पेठेंनी दिग्दर्शित केलेल्या "आषाढातील एक दिवस" या अभिजात नाटकाचा प्रयोग पाहून आलो.

सारी माणसे आपापल्या परिस्थितीचे बळी असतात. भावनांच्या लाटांवर वाहवत जाणारे शहाणपण गमावत परिस्थितीचे गुलाम होतात आणि आपल्या चुकांची जाण जेंव्हा होते तेंव्हा काळ एवढा पुढे वाहत गेलेला असतो कि सारे काही दुरूस्तीच्या पार गेलेले असते. प्रतिभा असने आणि जगणे यातील सांधा कधी तुटतो हे समजतच नाही... कधीकधी व्यवहार प्रतिभेवरही मात करून प्रतिभावंताला गारद करतो...!

चिरकालिक सत्ये मांडनारी ही कलाकृती आहे. सर्वांनी एकदा तरी ती पहायला हवी. या नाटकातील महाकवी कालिदास, त्याची प्रेयसी मल्लिका, आई अंबिका, विलोम...सर्व पात्रे प्रातिनिधिक बनत जणू काही एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वात खोल कुहरात दडून बसलेली व्यक्तित्वे उलगडत जातात...आत्ममग्न करतात...व्यथित करतात आणि आपण आपलेच जगणे कसे हरपत जातो ते दर्शवितात.

थोडक्यात आपल्याच जगण्यावर चिंतन करायला भाग पाडणारी ही कलाकृती आहे.

मल्लिकाची भुमिका करणारी पर्ण पेठे एक विलक्षण अभिनेत्री आहे हे "सत्यशोधक" पाहतांनाच लक्षात आले होते. या नाटकातील अत्यंत वेगळी भुमिका तिने साकार केली आहे. कालिदासाची भावविभोर ते उध्वस्त रुपे समर्थपणे पेलणारा आलोक राजवाडे, कालिदासाच्या मित्राची किंचित खलनायकी छटा असलेल्या विलोमचे पात्र साकार करणारा ओम भुतकर आणि मल्लिकेची आई अंबिकेची भुमिका करणा-या ज्योती सुभाष यांनी आपापल्या अभिनयशक्तीच्या जोरावर संपुर्ण नाटकाला एका मनस्वी लयीत गुंफले आहे. अतूल पेठेंना नेहमी नवनवी आव्हाने घ्यायला आवडतात...एक मनस्वी दिग्दर्शक...त्यांना सलाम!

Monday, July 16, 2012

पुन्हा "सत्यशोधक"!




"परिवर्तनाचा वाटसरु" या नियतकालिकातील "गोपुविरचित "सत्यशोधक": ऐसा जोती होणे नाही!" ही विजय कुंजीर लिखित प्रदिर्घ मुखपृष्ठ कथा वाचली. हा "लेख" नसून एक पुर्वग्रहदुषित मनाने लिहिलेली "दीर्घकथा"च आहे हेही लक्षात आले. असे असले तरी या कथेतून चुकीचा संदेश जात असल्याने तिचे परिक्षण करणेही तेवढेच गरजेचे आहे. कुंजीरांचे एकुणातच संपुर्ण "सत्यशोधक" हे नाटक (छापिल आणि रंगसंहिता) आणि या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे व त्यांची सावित्रीबाईंची प्रमुख भुमिका साकारणारी कन्या पर्ण पेठे यांच्यावर मुख्य आक्षेप असून अन्य कलावंत (जवळपास ५०) सफाई कर्मचारी असून त्यांना मुख्य भुमिका का दिल्या नाहीत यावरही आक्षेप आहे. खरे तर अतुल पेठे यांनी स्वत: दिग्दर्शन न करता ते एखाद्या बहुजनीय दिग्दर्शकाला का दिले नाही असाही आरोप त्यांना करता आला असता, तो बहुदा त्यांच्याकडुन सुटलेला दिसतो.
सत्यशोधक हे नाटक मी पाहिले आहे. कुंजीर दावे करतात त्याप्रमाणे हे नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांची महत्ता त्यांच्या तोंडुन वदवण्यासाठीचा खटाटोप म्हणजे हे नाटक आहे हे धादांत असत्य आहे. पण हे नातक म्हणजे ब्राह्मणी कावा आहे, हे  नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांचे असून व पर्यायाने ब्राह्मणी वर्चस्ववाद निर्माण करण्याची ही चाल आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला झाल्यानंतर मराठा जातीवादाचा निषेध करण्यासाठी हे नाटक आले असाही कुंजीरांचा तर्क आहे. गोपुंच्या फुलेंना फुलेवाड्यासमोरील चार पेठा दिसल्या परंतु मिशनरी शाळेत त्यांच्यावर झालेले ख्रिस्ती संस्कार कसे दिसले नाहीत? फुले अकराव्या वर्षी स्वत:ला हिंदु कसे म्हणवुन घेवू शकतात असे प्रश्नही कुंजीर उपस्थित करतात व "हिंदु" हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक आहे असेही सुचवतात. कथा प्रदिर्घ असली तरी कुंजीर याच्या एकुणातील मतांचा सारांश त्यांच्याच शब्दांत द्यायचा तर "कोणत्याही अन्वयार्थांनी, चिकित्सेने नाटक न पाहता, नाटक म्हणुन नाटक पाहिले तर काय दिसते, तर फुल्यांनी लोकहितवादी ते टिळकांपर्यंतच्या सर्व पुणेरी बामणांची केलेली प्रशंसा." सत्यशोधक नाटक फुले हे ब्राह्मणांना किती जवळचे होते...नव्हे ते बामनांमुळेच घडले असे ठसवण्यासाठी आहे असाही कुंजीरांचा तर्क आहे. अशा प्रकारे कुंजीरांनी मार्क्सवाद ते गो.पु. देशपांडेंच्या जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटीतील अध्ययन-अध्यापनाला वेठीला धरत हे नाटक म्हणजे खरे फुले मांडणारे नाही तर ते फुलेंचे बामणीकरण करण्याचे षड्यंत्र आहे असा कुंजीरांचा तर्क दिसतो. फुले-सावित्रीबाईच्या तोंडी दिलेल्या बामणी भाषेबाबतही कुंजीर यांना आक्षेप असून त्याबाबतही प्रदिर्घ खल त्यांनी केला आहे. गोपुंचे नाटक म्हणजे ब्राह्मणांध वासनेचा नग्न आविष्कार आहे असा शेराही ते मारायला विसरत नाहीत. असो. कुंजीरांनी अजुनही बरेच तारे तोडलेले आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे नाटक कशाशी खातात हे कुंजीरांना माहित आहे काय? हा प्रश्न मी विचारतो कारण माझी स्वत:ची मराठी ७ व इंग्रजी दोन नाटके प्रसिद्ध आहेत. मी स्वत: तीन चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे मला या विषयाचे बेसिक तरी ज्ञान आहे. एकोणिसाव्या शतकातील बोली काय अथवा लिखित काय, भाषा आजच्या एकातरी प्रेक्षकाला समजली असती काय? खुद्द शेक्सपियरची मुळ नाटके आताच्या भाषेत सादर केली जातात. लिखित संहिता आणि रंगसंहिता यात नेहमीच फरक असतो. "सत्यशोधक" हे नाटक आहे, फुलेंचे चरित्र नव्हे याचे भान कुंजीरांना दिसत नाही. नाट्य सादरीकरणावर अपरिहार्यपणे येणारी वेळेची व रंगमंचीय अवकाशाची मर्यादाही कुंजीरांना समजत नाही. हे नाटक एका बामणाने लिहिले व बामणाने दिग्दर्शित केले...त्यांची कन्या सावित्रीबाईंच्या भुमिकेत असावी याचाच जर पोटशुळ उठला तर नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा असा विषांध होणारच. एक नाटक म्हणुन सर्वांगाने ते उत्कृष्ठ आहे याबाबत सर्वच रंगकर्मी सहमत आहेत...पण त्याबाबत एक अवाक्षरही कुंजीरांनी काढु नये याचे नवल वाटते.
प्रत्येक नाटककार आपला नायक व नायिका आणि कथावस्तु निवडतो तेंव्हा तो त्याच्या व्यक्तिगत प्रतिभेचा व तिच्या आविष्काराचा प्रश्न असतो. दिग्दर्शकही रंग-संहिता बनवतो तेंव्हा तोही मुळ संहितेत सादरीकरणाच्या दृष्टीने त्यात बदल करत असतो. एक सलग आशय पोहोचवण्याचे कार्य अभिनेत्यांमार्फत तो करत असतो. नाटक म्हनजे रुक्ष परिसंवाद नव्हे. शेवटी ती कला आहे. आजवर म. गांधींवरील वगळता सर्वच चरित्र चित्रपट साफ कोसळले कारण दोन-तिन तासाच्या चित्रपटांत सारे काही आलेच पाहिजे हा बाष्कळ खटाटोप. कुंजीरांनी या नाटकातील एकही प्रसंग खोटा आहे असे पुराव्यासह विधान केलेले नाही, मात्र त्या प्रसंगांतुन अकारण बामण माहात्म्य फुलेंच्या तोंडुन वदवले आहे हा त्यांचा खरा आक्षेप दिसतो. फुलेंचे पात्र अत्यंत पांचट..पोकळ आहे असे त्यांचे निरिक्षण आहे. असे असेल तर कुंजीरांनी स्वत:च नाटक लिहावे व त्यांना हवेत तसे फुले सादर करावेत. व्यक्तिगत मत म्हणजे सत्य नसते हे या "सत्यशोधका"ला समजलेले दिसत नाही.
एकीकडे गोपुंनी या नाटकात बामणांवर यथेच्छ टीका केली आहे असेही ते म्हणतात, पण त्यांना ती गोपुंची बचावात्मक चाल वाटते हा तर एक मोठा विनोदच आहे. म्हणजे टीका केली तर तो लेखकाचा नाईलाज...पण एकुणात बामणमाहात्म्य म्हणजे "सत्यशोधक" नाटक. हिंदु हे धर्मासाठी सरसकट नांव अस्तित्वात आले त्याला आता हजार बाराशे वर्ष होवून गेलीत हे कुंजीरांना माहित नसावे. वयाच्या अकराव्या वर्षी फुले लग्नाच्या वरातीतुन बाहेर काढल्यावर "ते हिंदु आपणही हिंदु..." असे विधान फुले करतीलच कसे हा कुंजीरांचा प्रश्नच मुळात अज्ञानमुलक आहे. हिंदु हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक नाही. फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला...सत्यशोधक धर्म नाही हेही कुंजीर विसरलेले दिसतात. महात्मा फुलेंची बंडखोरीची झेप कुंजीरांच्या आवाक्यात आलेली दिसत नाही.
महात्मा फुलेंनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडुन हल्ले चढवले. परंतु ब्राह्मणांचा द्वेष केल्याचे उदाहरण वा तसे विद्वेषमुलक लेखन तरी कुंजीरांनी उद्गृत करायला हवे होते, पण ते तसे त्यांनी केलेले नाही कारण त्यांना "कुंजीरांचे फुले" रंगवायचे आहेत. आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हनवुन भांडारकरांची स्वाक्षरी घेनारे, छ. शिवाजी महाराजांवरील पवाड्यात सुधारणा सुचवल्या म्हणुन त्यांचे आभार मानणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे होते हा जावईशोध लावत त्यांचा उग्र अवतार या नाटकात दिसत नाही...म्हणजे बामनांना पुरेशा शिव्या दिल्या नाहीत याबाबत कुंजीरांना संताप आलेला दिसतो.
म. फुले हे शेवटी हाडामांसाचे माणुस होते. त्यांनाही व्यथा-वेदना होत्या. नाटकात प्रसंग कसे लिहावे लागतात व कसे सादर करावे लागतात हे कुंजीरांना माहितच नसल्याने सावित्रीबाईंवर सनातन्यांनी शेणगोळे फेकल्यानंतर फुलेंचे बामण मित्र त्यांच्या घरात येवून निषेध करतो असे सांगतात...कुंजीरांच्या मते हा प्रसंग अन्यत्र घडवायला हवा होता...त्याला जाहीर निषेधसभेचे रुप द्यायला हवे होते असे सुचवत आपले नाट्यविषयकचे अज्ञान दर्शवतात.
एवढेच नव्हे दक्षीणा प्राइझ कमिटीने मराठी भाषेला पारितोषिक द्यायला हवे असे फुले सुचवतात, याबाबत तर कुंजीरांनी अकारण गदारोळ केला आहे. म्हणजे फुलेंनी असे सुचवलेच नव्हते असे कुंजीरांना म्हणायचे आहे काय... तर तसेही नाही. पुढे फुलेंच्या तोंडी कालीदास ते शुद्रक या नाटककारांची नांवे यतात...म्हणजे फुले मिशन शाळेत न शिकता महामहोपध्यायांच्या अबक पाठशालेत शिकले कि काय असा प्रेक्षकांचा समज होवू शकतो...असे एक वावदुक विधानही ते करतात. याचा अर्थ कुंजीरांचा फुलेंच्या ज्ञानावरच आक्षेप आहे. फुलेंना हे कवी माहितच नव्हते व एका इंग्रजी लेखकाने सांगेपर्यंत संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती हे फुलेंना माहित असण्याचे कारणच नाही असा कुंजीरांचा तर्क खरे तर फुलेंचा अवमान करणारा आहे. अजुन म्हणजे फुलेंच्या तोंडी फक्त संस्कृत नाटककारच का? फारसी हीही एके काळी राजभाषा होती...मग त्या भाषेतील एखाद्या लेखकाचा उल्लेख का नको...असे लिहितांना कुंजीरांनी कोणते फारसी महान लेखक तोवर झाले होते व लोकप्रिय होते हे सांगण्याचेही कष्ट घेतले असते तर बरे झाले असते.
हीच बाब बळी-वामनाची. म. फुलेंनी बळीची संकल्पना आपल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात बंड करतांना वापरली. भारताचा इतिहास हा वर्ण-जाती संघर्षाचा इतिहास आहे असे फुले नाटकात म्हणतात. "भारताला इतिहासच नाही" अशी हेगेलची साक्ष काढत कुंजीर म्हणतात कि एकोणिसाव्या शतकातील फुल्यांच्या तोंडी दिलेले संवाद विसाव्या शतकातील सिद्धांतांनी जर माखलेले असतील तर ते खरे फुले नाहीत. येथे कुंजीरांचा भयंकर गोंधळ उडालेला आहे. कुंजीरांना एवढे तरी समजायला हवे कि वर्तमानात नाटक आणत असता...लेखक वर्तमानात जगत असतां चरित्र नायकाचे काही विचार आधुनिकतेशी नाळ जोडनारे वाटले तर त्याचे प्रतिबिंब लेखनात उमटत असते. असे छ. शिवाजी महाराज ते अन्यही ऐतिहासिक पुरुषांवरील कलाकृतींमद्धे आपण पाहतो. आपण नाटकाचे समिक्षण करत आहोत कि नाटकात ऐतिहसिक चरित्रांत असते तशी वस्तुनिष्ठता शोधत आहोत याचे भान कुंजीरांनी बामण्द्वेषाच्या विखारात गमावले आहे. त्यांनी बामणी साहित्य व नाटकांवर ज्या भाषेत टीका केली आहे ती कोणत्याही विचारवंताला शोभणारी नाही.
प्रस्तूत लेख (त्याचे पुस्तकही होणार आहे ही माहिती शेवटी टिपेत दिली आहेच.) म्हणजे जड भाषेत लिहिलेला उथळ लेख होय.  मार्क्स, हेगेल, फृइडची नांवे टाकली म्हणजे विद्वान होता येत नसते. त्यापेक्षा "या नाटकात असत्य घटनांची रेलचेल आहे" असे विधान पुराव्यांनिशी पटवले असते तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. पण तसे केले तर उघडे नाही पडणार?

Monday, January 9, 2012

"सत्यशोधक": एक अलौकिक नाट्यानुभव!

पुणे विद्यापीठातील खेर वाड्मय ग्रुहातील नाट्यग्रुहात "सत्यशोधक" हे गो. पु. देशपांडे लिखित नाटक पहायला जातांना मी खरे तर साशंक होतो. या नाटकाचे दिग्दर्शक जरी अतुल पेठेंसारखे प्रतिभाशाली रंगकर्मी असले तरी निर्मिती होती पुणे महानगरपालिका युनियनची आणि यातील जवळपास ९५% कलाकार होते सफाई कामगार. हे नाटक अत्यंत प्रायोगिक आणि प्राथमिक-प्रचारकी थाटाचे असनार अशी जणु काही माझी खात्रीच होती. परंतु प्रथमच मी पुरता गंडलो. जसा प्रयोग सुरु झाला...माझे पुर्वग्रह कोसळुन पडले. पहिल्या क्षणापासुन मी नाटकात रममाण झालो...अनेकदा रडलोही...
"सत्यशोधक" हे रुढार्थाने नाटक नाही. तो आहे सत्यशोधकी नाट्यमय जलसा. या जलशात महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाईंचे जीवनचरित्र पोवाडे, अखंड, निवेदने आणि प्रत्ययकारी प्रसंगांतुन सादर होते. ज्यांना महात्मा फुले संपुर्ण माहित आहेत आणि ज्यांना अगदी जुजबी माहित आहेत त्या सर्वांना सर्वस्वी भारावुन टाकणारा हा प्रयोग!
ज्या काळात जातीयता, अंधश्रद्धा, स्त्रीयांवरील (मग त्या ब्राह्मण का असेनात) आणि शुद्राती-शुद्रांवरील अत्याचार कळसाला पोहोचले होते त्या काळात समाज सुधारणा, शिक्षणाची महत्ता, स्त्री शिक्षणाचा महनीय उद्गार आणि प्रत्यक्ष कार्य, मराठी भाषेची महत्ता, ब्राह्मण विधवा गर्भवतींसाठी आश्रम चालवण्याचे अपरंपार साहस...एवढेच नव्हे तर अशाच एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेण्याचे साहस आणि मानवतेबद्दलची अपरंपार करुणा, सनातन्यांचा (मग त्यात न्या. रानडे आले तसेच विष्णुशास्त्री चिपळुनकरही आले) दांभिकतावाद या सर्वांचे प्रत्यकारी दर्शन या प्रयोगातुन होते. महात्मा फुल्यांच्या हत्त्येचा प्रयत्न आणि हत्यारेच त्यांचे विद्यार्थी बनत सत्यशोधकीय चळवळीचे खंदे पाईक होतात हा प्रसंग तर हेलावुन टाकणारा.
महात्मा फुलेंचे विचार या प्रयोगातुन मांडतांना ते कोठेही प्रचारकी होणार नाही, प्रसंगांतुनच ते कसे ठळक होतील याची विलक्षण काळजी पेठे यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रयोगाची नाट्यात्मक उंची कल्पनातीत वाढते. मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनी. तिला तिचा बाप शाळेत घालायला घेवुन येतो तेच एका गोणीत घालुन...का तर कोणी पाहिले तर दगडं पडतील...हीच मुक्ताबाई पुढे भारतातील पहिली स्त्रीवादी, महार-मांगांची वेदना मांडणारी भाष्यकार बनली...वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी... श्रेया मोरे या अवघ्या तीन-साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरडीने ही भुमिका असल्या झोकात वठवली आहे कि तिच्या अभिनयावर टाळ्यांचा वारंवार कडकडाट होत होता. या नाटकातील प्रत्येक प्रसंगाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे...
ओंकार गोवर्धन यांनी महात्मा फुलेंची भुमिका अत्यंत तडफेने आणि समरस होवुन केली आहे. अत्यंत स्पष्ट उच्चार, ह्रुदयाला थेट हात घालणारी संवादफेक आणि मुखाभिनय उत्क्रुष्ट, पण मी अधिक प्रभावित झालो ते सावित्रीबाईंच्या भुमिकेतील पर्ण पेठेंचे. (या अतुल पेठेंच्या कन्या आहेत हे मला नंतर कळाले.) देहबोली, मुखबोली, सनातन्यांचा हल्ला होत असुनही ठेवलेला निर्धार, महात्मा फुलेंना अनिवार निराशेतही प्रेरणा देणारी युगमाता, विधवांचे केशवपन व्हायचे त्याला विरोध करण्यासाठी न्हाव्यांचा घडवुन आनलेला एकमवद्वितीय बहिष्कार...या अभिनेत्रीला उज्ज्वल भवितव्य आहे.
शाहीर सदाशिव भिसे, रमेश पारसे, दत्ता शिंदे डा. दिपक मांडे, प्राजक्ता पाटील, सावित्री भिसे चेतन पारसे.......सर्व कलाकारांची नांवे घेतांना मी थकेल पण त्यांच्या अभिनयाची तारीफ करतांना थकणार नाही. प्रोफेशनल कलाकारांनीही तोडात बोट घालावे असा उत्क्रुष्ठ अभिनय आणि सामुहिक म्हणुन दिसणारी एकाकारता याचा वेगळाच अनुभव हा प्रयोग देतो हेच काय ते खरे.

नाण्याची दुसरी बाजु

प्रयोग उंचीचा झाला तरी सर्वच प्रेक्षक त्या उंचीचे नसतात. फुले दांपत्यावरील नाटक आहे, त्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यातील फरक सुस्पष्ट केलेला आहे, म. फुलेंनी प्रसंगी पुरोगामी ब्राह्मणांची मदत घेतली आहे आणि केलेलीही आहे हे दाखवणे स्पष्टपणे नाकारणारे काही बहुजनीय नवसनातनी प्रेक्षकही या प्रयोगाला होतेच! एकतर हे नाटक लिहिले ते गो. पु. देशपांडे नामक ब्राह्मणाने. दिग्दर्शन केले ते अतुल पेठे नामक ब्राह्मणानेच...म्हणुन या नाटकावर ब्राह्मणवादी तत्वांचा प्रभाव पडला असा निष्कर्ष या नवसनातन्यांनी काढला. त्यावर एवढा उत्क्रुष्ठ नाट्यानुभव घेतल्यानंतरही असे टुक्कार आक्षेप घेतले. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य एकच असा हट्ट धरायचा प्रयत्नही केला. (म्हणजे यांना महात्मा फुलेच मान्य नाहीत असाच एक अर्थ!)

खरे तर मुळात महात्मा फुलेंवर या तोडीचे नाटक लिहिणे आणि हवे तसे सादर करणे (मग भले महात्मा फुलेंचे विचार ते मांडोत वा हवे त्या पद्धतीने मोडतोड करत मांडोत...) कोणी अडवले आहे वा होते? महात्मा फुले ते बाबासाहेब यांचे विचार मोडतोड करत मांडणे हा या चलवळे म्हनवणा-या चळवळघातक्यांचा उद्योग गेली अनेक वर्ष चालु आहे. त्यामुळेच या महामानवांची आणि सावित्रीबाईंचे खरी कामगिरी आजही लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही.
खरे तर महात्मा गांधींवर, ज्या इंग्रजांशी आजन्म लढले ते महात्मा गांधी यांच्या जीवनावर अविस्मरणीय चित्रपट बनवनारे रिचर्ड अन्टनबरो आणि महात्मा गांधींची भुमिका साकारनारे बेन्ज किंग्जले यासारखे दिग्गज इंग्रज अभिनेते असावेत हा जसा काव्यगत न्याय आहे आणि महानतेला महान म्हणना-या संस्क्रुतींचे एक आदर्श प्रतिनिधित्व करनारी घटना आहे, तिचे स्वागत न करता, आपली अर्धवट अक्कल पाजळणा-या या बहुजनवादी म्हणवणा-या संस्क्रुतीचा मी निषेधच करेन!
एका जातीचे लोक जोवर दुस-या जातींच्या महनीयांना स्वीकारत नाहीत...त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे पवाडे मुक्तकंठाने गात नाहीत, अन्य समाजांशी एकरुप होत नवी संस्क्रुती घडवण्याचा प्रयत्न करत नाहीत तोवर गतकाळातील महामानवांची स्वप्ने पुर्ण करत आपण एक अविक्रुत संस्क्रुती कशी निर्माण करणार?
"सत्यशोधक" हे ख-या अर्थाने निरोगी मन:स्वास्थ्य असलेल्या मराठी समाजाचे एक अप्रतीम प्रतीक आहे. सफाई कामगारांनी यात ९५% भुमिका वठवाव्यात याचा एकच अर्थ मी समजतो...या अत्यंत दुर्लक्षीत घटकाने शहराची...आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी सफाई करण्याचा जसा अविरत संघर्ष मांड्ला आहे तसाच तो आपल्या मनावर बसलेल्या घाणीचीही सफाई करायचा चंग बांधला आहे. मी त्यांना नुसत्या शुभेछ्छा देत नाही तर मी त्या सर्वांचाच ऋणी आहे...आणि आम्हालाही अजुन आणि अजुन काम करण्याची प्रेरणा देणारी ही घटना आहे. पण ज्यांनी आपल्या मनावर घानीचे पुटांमागुन पुटे चढवण्याचाच चंग बांधला आहे अशा मनोरुग्नांची मी फक्त कीव करु शकतो.
प्रा. हरी नरके यांनी हा नाट्यप्रयोग पुणे विद्यापीठात घडवुन आणला. खरे तर पुणे विद्यापीठात नाट्यप्रयोग होण्याची ही पहिलीच घटना. क्रुतीशील विचारवंत काय करु शकतो याचे हे एक उदाहरण...एवढेच नव्हे तर हा प्रयोग पाहुन पेठेंना पुढच्या चार प्रयोगांची निमंत्रणे मिळाली. कोणी म्हणेल...पेठेंना यातुन केवढा अर्थलाभ झाला असेल...माफ करा...पुणे विद्यापीठातील एवढ्या मोठ्या संचातील प्रयोग हा फक्त दहा हजार रुपये मानधनावर झाला...मी अतुल पेठेंना त्यांच्या निरपेक्ष कलासेवेबद्दल धन्यवाद देतो...त्यात काम करणा-या कलावंतांकडुन अपार कष्ट घेत एवढा अविस्मरणीय नाट्यानुभव निर्माण केला या स्रुजनाबद्दल पुन्हा त्यांचे कौतुक करतो...
आणि प्रत्येकाने हा प्रयोग पहावा...अशी मनापासुन विनंती करतो. कोणास अभिनंदन करायचे असेल तर त्यासाठी अतुल पेठे यांचा भ्रमणध्वनी क्र. ९४२२३१९७१७ हा आहे.

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...