Showing posts with label साहित्य संमेलन. Show all posts
Showing posts with label साहित्य संमेलन. Show all posts

Sunday, February 4, 2018

सर्ववादी विचार: आदिवासी धनगर साहित्य संमेलन




गेल्या वर्षी सोलापुरमध्ये पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्रातील संख्येने मोठा असलेला आणि तरीही नागरी जीवनात न रुळलेला, बव्हंशी दुरच राहिलेल्या मूक समाजाला पहिल्यांदाच आवाज फुटला. शिवाय हे संमेलन केवळ धनगर जमातीपुरते मर्यादित नव्हते तर धनगरांनी भरवलेले सर्व समाजांसाठीचे संमेलन असे त्याचे व्यापक रुप असल्याने महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहांनीही त्याची अत्यंत सकारात्मक दखल घेतली. या संमेलनात विविधांगी चर्चा तर झाल्याच पण भविष्याचे दिग्दर्शनही मिळाले. एका अर्थाने धनगर समाजाचा आत्मविश्वास, मनोबल आणि स्व-वेदनांची जाणीव वाढण्यात मदत तर झालीच पण आपल्यासमोर व्यापक समाजनिर्मितीसाठी कोणत्या जबाबदा-या आहेत याचेही भान आले. यंदाच्या वर्षातच धनगर अणि इतर भटक्या विमुक्त समाजांवर २६ पीएचडीचे संशोधनात्मक प्रबंध लिहिण्याचे प्रस्ताव माझ्या मार्फत गेलेत. स्वत:हुन पाठवले गेलेले अजुन खुप असतील. किंबहुना या समाजावर संशोधन करणे आपले उत्तरदायित्व आहे याचे भान यामुळे मोठ्या प्रमाणात जागृत झाले. समाजांचे सर्वांगीण सर्वेक्षण, अध्ययन केल्याखेरीज या वंचित समाजांसमोरील समस्या सुटणार नाहीत हे उघड आहे. किंबहुना या समाजातुन किंवा या समाजांवर साहित्य निर्मिती करायची तर पार्श्वभुमीची साधने हाताशी येण्यात या संशोधनांची मदत होईल हे नक्कीच.

धनगर समाज हा एक राष्ट्रीय आदिम पशुपालक समाज असल्याने या समाजाची स्वत:ची अशी साहित्य आणि धर्म संस्कृती आहे. देशात प्रांत आणि भाषापरत्वे या समाजाला वेगवेगळ्या नांवांनी ओळखले जात असले तरी पशुपालक संस्कृतीचे अपत्ये हीच त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र मुलत: चरावू कुरणांचाच प्रदेश असल्याने येथील आद्य वसाहतकार हे धनगरच होत हे पुरातत्वीय पुराव्यांनीही सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संस्थापक सातवाहन याच समाजातुन आले. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जीवावर शक अधिपती नहपानाचा प्रचंड मोठा पराभव करुन महाराष्ट्राचा आद्य स्वातंत्र्य लढा जिंकला आणि त्या स्वातंत्र्य संग्रामातील जयाच्या स्मरणार्थ आजही महाराष्ट्रासहित जेथे जेथे सातवाहनांचे राज्य होते तेथे "गुढीपाडवा" म्हणून तो साजरा केला जातो. असे असले तरीही धनगर आपल्या रानोमाळ मेंढरे घेऊन फिरण्याच्या पेशामुळे राजसत्ता त्यांचा असल्या तरी नागरी संस्कृतीपसुन व म्हणूनच इतिहासापासुनही दूर राहिले. आपल्या ओव्यांत त्यांने आपला इतिहास जपला खरा पण ओव्यांतही नंतर भर पडत गेल्याने जुने भाग हळु हळू विस्मरणात गेले. किंबहुना वर्तमानाचा वसा ठेवतांना त्यांनी इतिहासाकडे एवढे लक्ष दिले नाही. इतिहासाचा दुराभिमान त्यामुळे या समाजात कधी आलाही नाही. विठोबा, खंडोबा, जोतिबा, बिरोबा इत्यादि दैवते त्यांचीच असली तरी त्यांवरही त्यांनी कधी स्वामित्व अधिकार दाखवला नाही. नागरी समाज हा शेवटी त्यांच्यातुनच व्यवसाय बदलुन आला असल्याने मुळचा एकपनाची जाण असल्याने त्यांनी "आमचा इतिहास आणि आमची दैवते का हिसकावता?" असा उद्दाम प्रश्न त्यांनी कधी विचारला नाही. आणि नागरी समाज मात्र त्यांना क्रमश: विसरत गेला. किंबहुना धनगर समाजाबाबत नागरी समाजात घोर अज्ञान आहे. आधुनिकीकरणाच्या कालात त्यांचा आदिम व्यवसाय, मेंढीपालन’ हिरावला गेला तरी कोणी त्यांना पर्याय द्यायला हवा होता असे म्हणत सामोरा आला नाही. तरीही या समाजाने कधी तक्रार केली नाही. जेंव्हा केली तेंव्हा हा भोळा समाज निव्व्व्ळ आश्वासनांनाही भुलत गेला आणि आशेवर आपला काटेरी मार्ग जगत राहिला हा धनगरांचा वर्तमान आहे.

असे असुनही धनगरांनी आपली व्यापक भुमिका सोडली नाही. सर्वसमावेशकता आणि आपल्या हिताबरोबरच सर्वांचे कल्याण हीच भुमिका कायम ठेवली. साहित्य संमेलन करीत असतांना संमेलनातुन साहित्य, समाज व्यवहार आणि भविष्याची आव्हाने हेच विषय प्राधान्याने चर्चीले जातात. यंदा लातूर येथे आदिवासी धनगर साहित्य परिषदेचे जयसिंग तात्या शेंडगे व अभिमन्यु टकले आणि लातूर येथील अण्णाराव पाटील आणि संभाजी सूळ यांच्या सहयोगातुन गेल्या वर्षीपेक्षाही भव्य संमेलन १० व ११ फेब्रुवारीला भरवले जात आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर या संमेलनाचे उद्घाटक असतील तर प्रसिद्ध लेखिका सौ. संगीता धायगुडे संमेलनाध्यक्ष असतील. अहिल्यादेवींची स्फुर्ती असल्याने महिलाशक्तीची जाण या संमेलनात आवर्जुन ठेवण्यात आली आहे. संमेलनात इतिहास, साहित्य, वर्तमानातील समस्या-आव्हाने, माध्यमे इत्यादि अनेक विषयांवर व्याख्याने होणार असून प्रसिद्ध अभ्यासक यशपाल भिंगे, रामहरी रुपनर, प्रसिद्ध पत्रकार राजेंद्र हुंजे, घनशाम पाटील, अक्षय बिक्कड, राजा कांदळगांवकर, आनंद कोकरे, सौ. विद्या बयास, उज्वला हाके, डॉ. संगीता चित्रकोटी असे अनेक दिग्गज बोलणार आहेत. कवी संमेलनही आहेच.

आज वास्तव हे आहे की धनगरांवर अथवा धनगरांनी लिहिलेले साहित्य आज अत्यंत कमी आहे. साहित्यिक तयार करणे हा हेतू ठेवून धनगर साहित्य परिषदेची यंदा सुरुवात झाली. कोणत्याही समाजात किती निकोप साहित्यिक-विचारवंत आणि तत्वज्ञ-संशोधक आहेत त्यावरुन कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो. हे साहित्यिक तयार व्हावेत यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, प्रेरणा देणे हा सध्या साहित्य संमेलनाचा हेतू आहे आणि तो सफलही होतांना दिसतो आहे. आज अनेक कवी, कादंबरीकार, पत्रकार, संशोधक या मूक समाजातुन धडपड करत अभिव्यक्त होत आहेत. या अभिव्यक्तीचा एक दिवस मोठा विस्फोट होईल आणि प्रत्येक मूक देशवासी बोलायला सुरुवात करील याची मला खात्री आहे.

किंबहुना मानवी संस्कृतीचे जे संस्थापक होते त्यांनाच पुन्हा नवी मानवतावादी संस्कृती उभारण्यासाठी पुढे यावे लागेल आणि ती जबाबदारी धनगर खुषीने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ही समाधानाची बाब आहे. आज महाराष्ट्रात (किंवा देशात) जातीय अस्मितांचा विस्फोट झाला आहे आणि त्या खोट्या अस्मितांतून नवा उज्ज्वल इतिहास घडण्याऐवजी द्वेषाचा, हिंसेचा आणि तिरस्काराचा इतिहास घडवला जातो आहे. मानवी संस्कृतीच्या उत्थानास हे सारे हानीकारक आहे. धनगर मात्र समाज जोडण्याची भुमिका घेत वैचारिक, साहित्यिक आणि प्रबोधनाची क्रांती करायला पुढे सरसावला आहे. त्याला सर्व समाजांचा नुसता पाठिंबा नव्हे तर सहकार्यही अभिप्रेत आहे.

भविष्यात या मुक समाजातुन श्रेष्ठ कवी-लेखक, चिंतक व संशोधक यांचे मोहळ उठेल हा नुसता आशावाद नाही तर तसे परिश्रमपुर्वक प्रयत्नही होत आहेत. धनगरांचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जेवढी गरज आहे तेवढाच राजकीय इतिहासही. सातवाहनांच्या अभ्यासाकडे तर सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. अहिल्यादेवी होळकर देशाला वंदनीय असल्या तरी त्यांचेही साधार असे एकही चरित्र आजवर कोणी लिहिलेले नाही. त्यामुळे अहिल्यादेवींचे अनेक पैलु जसे अज्ञात आहेत तसेच मल्हारराव, यशवंतराव, तुकोजीराजे, तुळसाबाई व भिमाबाईचा साद्यंत इतिहास सर्व पैलुंवर अभ्यास करीत लिहिला जाण्याची गरज आहे. अभिनिवेश नसलेला प्रामाणिक इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी कोणी पुढे नाहीच आले (येण्याची शक्यता तशी कमीच आणि जे येतात ते इतिहासाच्या नांवाखाली गांवगप्पाच लिहितात किंवा विद्रुपीकरण करतात हा अनुभव आहे.) तर स्वत:च धनगरांनाच पुढे यावे लागेल.

कोणत्याही महान कादंबरीकाराला आव्हान असे धनगरांचे जीवन आहे. त्यावर कादंब-या मात्र अभावानेच आहेत. ज्या आहेत त्यात धनगर दुय्यमच असतात. त्यामुख्ळे त्यांचे जीवन, व्यथा, वेदना, आकांक्षा आणि स्वप्ने आजवर चित्रितच झालेली नाहीत. हे जीवन जगणारे मेंढपाळ आनंद कोकरेंसारखे उमेदीचे लेखक मला दिसतात. असे जेही आहेत त्यांनी पुढे यायला हवे. लिहायला हवे. जगाला आपले जगणे सांगायला हवे. यशपाल भिंगे, शिवाजी दळनर यांसारखे अनेक विद्वान वक्तेही आहेत. समाजाला नवी दिशा देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जयसिंग तात्या शेंडगे आणि अभिमन्यु टकले पायाला भिंग-या बांधुन महाराष्ट्रभर जागृती करत आहेत. खरे तर त्यांचे प्रयत्न नसते तर धनगरांचे साहित्य संमेलन कदापि झाले नसते. आण्णाराव पाटील व संभाजी सुळांनी यंदा लातुरचे यजमानपद घेतले आहे. अमोल पांढरे यांनी या दोन्ही संमेलनांसाठी जे कष्ट उपसलेत त्यांनाही तोड नाही. अखेर असंख्य हात लागुन हे संमेलन होतेय. पुढील वर्षासाठीही काही आमंत्रणे आताच येवू लागलीत. "इवलेसे रोप लावियेले दारी..." भविष्यात याचा वेलू गगनावरी जाईल, मुक समाज बोलका होईल...एवढेच नव्हे तर सामंजस्य, मानवता आणि जातवादी न होता "सर्ववादी" विचारांची पायाभरणी करीत तो आदर्श भारतीय समाजाला देतील याचा मला विश्वास आहे.

-संजय सोनवणी

Friday, January 13, 2017

सोलापुरात उमटला मुक समाजाचा साहित्यिक आवाज!

Image may contain: 6 people, people standing

"आवाज उद्याचा...उद्गार उद्याचा" हा नारा देत भारतातील पहिले "आदिवासी धनगर सहित्य संमेलन" ७ व ८ जानेवारीला पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही आम्ही नवविचारांनी नवे आशय देवू शकतो हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वैशिष्ट्य होते. या संमेलनात विविध विचारप्रवाहच नव्हे तर समाजघटकही वक्त्यांच्या रुपात सहभागी होते. या विविध विचारप्रवाहांना गंभीरतापुर्वक समजावून घेणा-या हजारावर श्रोत्यांची दोन दिवस सलग उपस्थिती हेही एक वैशिष्ट्य होते. भुतकाळ समजावून घेत वर्तमानाचे विश्लेशन करत भविष्याच्या दिशा ठरवणे हे साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य असते. ते या संमेलनत एवढे प्रकर्षाने दिसले कि प्रस्थापित साहित्य संमेलनांनाही त्याची दखल घेणे भाग पडले.

या पहिल्यवहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. हा एक ऐतिहासिक बहुमान माझ्या वाट्याला आला. आदिम समाजाशी आधुनिक युगातही नाळ घट्ट करत त्यांच्या भावविश्वात सहित्यिक दृष्टीकोनातुनही मला जोडून घेता आले. या समाजाला साहित्याची, नवविचारांची भूक आहे याची तीव्र जाणीव या सम्मेलनाने झाली. अनेक वक्ते असे होते कि त्यांना कधी जाहीर बोलण्याची संधीही मिळाली नव्हती. पण त्यांच्या भाषणांत जो गंभीर अभ्यास, विश्लेशनात्मक पद्धती व भविष्याच्या दिशांचा विचार उमटत होता ते पाहून अशा व्यासपीठाची तीव्र गरजही लक्षात आली. प्रस्थापितांनी ज्यांना कधी जवळ केले नाही, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय बनू शकतो याचा विचार केला नाही त्यांनी स्वत:चे विश्व बनवण्यासाठी कष्ट उपसले तर काय चूक हा प्रश्नही माझ्या मनात उपस्थित झाला होता. या संमेलनाने ती वाट करून दिली. रानावनांत खुल्या आभाळाखाली वाढलेली, बहरलेली धनगर संस्कृती नव्या युगावर धनगरांचेच पुर्वज मौर्य व सातवाहनांप्रमाणे नव्या युगावरही आपला ठसा उमटवायला सज्ज झाल्याचे चित्र ठळक झाले ही या संमेलनाची फलश्रुती होती.

महाराष्ट्राला संस्कृती दिली ते ४३० वर्ष राज्य करणा-या सातवाहन घराण्याने. हे घराणे पुढे आले ते धनगरांतूनच. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा मराठीतील आद्य महाराष्ट्री प्राकृतातील काव्यसंग्रह. त्यातील जनजीवनाचे लोभस चित्रण हा आजही जागतिक वाड्मयात चर्चेचा व अभ्यासाचा विषय. आजच्या मराठीचा हा आद्य स्त्रोत. एका धनगरानेच मराठी साहित्य संस्कृतीचा पाया घातला. पण त्याची जाण मराठी सारस्वताने कधी ठेवली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने तर कधी त्याचा नामोल्लेखही केला नाही. पण सोलापुरमधील ग्रंथदिंडीत मानाने विराजमान होती "गाथा सप्तशती". एवढेच नव्हे तर ग्रंथदालनाचेही नांव होते "हाल सातवाहन ग्रंथनगरी." हालाच्याच पावलावर पाऊल ठेवत धनगरी ओव्या आजपर्यंण्त कालौघातील भाषाबदल पचवत आजवर पोहोचले. आता पुन्हा नव्या स्वरुपात नवा साहित्य-उद्गार निघेल याची ग्वाही या संमेलनाने दिली. मीही माझ्या भाषणात, "जरी प्रस्थापित मराठी साहित्यातून धनगरांना अदृष्य ठेवण्यात आले असले तरी धनगर साहित्याची स्वतंत्र शैली निर्माण करणार..." असे सांगितले. हे उद्गार वृत्तपत्रांचे मथळे बनले. एकविसशे वर्षांनंतर हाल सातवाहनाचा जयजयकार महराष्ट्र भुमीवर निनादला.

या संमेलनात विविध परिसंवादांतील सहभागी सिद्धराम पाटील, सौ. संगीता चित्रकुटे, विकास पांढरे, सुभाष बोंद्रे, सारख्या विविध वक्त्यांनी धनगरी समाजाचे साहित्य व माध्यमांतील चित्रण समाधानकारक का नाही यावर अत्यंत अभ्यासपुर्ण चर्चा केल्या. परिसंवादांचे अध्यक्ष असलेल्या घनश्याम पाटील, सचीन परब यांच्यासारख्या महनीय अभ्यासक वक्त्यांनी त्यात अधिक आशय भरत चर्चांना निर्णायक स्वरुप दिले. प्राचार्य शिवाजी दलनर, डा. यशपाल भिंगेंने इतिहास व वर्तमानातील आव्हानांवर गांभिर्यपुर्वक विचार मांडले. अगदी आरक्षणावरही मुद्देसुद चर्चा झाल्या. कोणावरही टीका अथवा आगपाखड न करता एका संवेदनशील विषयावर चर्चा झाली हे विशेष. अन्यथा वाद आणि साहित्य संमेलन हे समीकरणच बनलेल्या काळात "निर्विवाद" झालेले हे एकमेव साहित्य संमेलन म्हणावे लागेल. अगदी समारोप सत्राचे अध्यक्ष व राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही राजकारणाला नव्हे तर साहित्य प्रेरणांना आपल्या भाषणात महत्व दिले हे महत्वाचे आहे.

हे साहित्य संमेलन भरवण्याचा विचार येणेच मुळात क्रांतीकारी होते. डा. अभिमन्यू टकले, जयसिंगतात्या शेंडगे, छगनशेठ पाटील यांनी नुसती कल्पना माम्डुन न थंबता हे संमेलन प्रत्यक्ष नेटकेपने होईल यासाठी अविरत कष्ट उपसले. अमोल पांढरे यांनी गेले तीन-चार महिने रात्रंदिवस मेहनत घेतली. संमेलनात एकदा निवेदन करत असतांना त्यांच्या आनंदाश्रुंचा बांध फुटला. एवढी ध्येयावरील अविचल निष्ठा आजकाल दुर्मिळ झाली आहे. पण एक इतिहास घडला तो या चौघांमुळे व त्यंना साथ देणा-या समाजबांधवांमुळे हे साहित्य इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल हे मात्र नक्कीच.

धनगरांचे स्वतंत्र संमेलन भरवणे म्हणजे जातीवाद नव्हे काय असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देई कि "मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे!" आणि खरेच संमेलनात जवळपास ४०% वक्ते हे अन्य समाजांतील होते. कसलाही भेदभाव अथवा कोणा जातीचे माहात्म्य गाण्याचा प्रयत्नही नव्हता. सर्वच वक्ते समरसून तळमळीने बोलले. आज महाराष्ट्रातील गढूळलेल्या जातीय वातावरणात सर्वैक्याचा संदेश देणारे हे संमेलन घडले हे या संमेलनाचे सर्वात मोठे यश होय. धनगरांनी भरवलेले सर्व जातीय संमेलन हेच त्याचे स्वरुप राहिले. यासाठी अखिल धनगर बांधव कोटीश: अभिनंदनास पात्र आहेत यात शंका नाही.

आता मुक समाजही बोलू लागले. राज्यकर्ते असोत कि समाजातील वर्चस्वतावादी घटक...ते जर घाबरत असतील तर संख्येला नव्हे तर विचारांना. समाज विचार करणारा व्हावा हे त्यांना मान्य नसते. धनगरच काय अन्य भटक्या विमुक्तांकडे, ओबीसेंकडे पाहण्याची जी साहित्य-उदासिनता आली आहे ती यातुनच! आता ते होनार नाही. अनेक समाजबांधवही आता आपला साहित्य उद्गार काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुस-या आदिवासी धनगर साहित्य संमेलनासाठे लातूर शहराने निमंत्रण दिल्याचे श्री. संभाजी सूळ यांनी घोषित केले आहे. हा प्रवाह फोफावत एका नदाचे रुप घेईल...सारे बांधव साहित्य-विचारी होत प्रगल्भ भारताच्या दिशेने वाट चालतील याचा मला विश्वास आहे. त्यातच माझी कृतार्थता आहे.

येळकोट येळकोट जयमल्हारच्या घोषात भंडारा उधळत या संमेक्लनाचे अभिनव व खास धनगरी सांस्कृतिक पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन झाले. हा येळकोट साहित्याच्या विशाल वैश्विक प्रांगणात असाच निनादत राहील व नव्या पिढ्या अत्यंत सक्षमतेने आपल्या संवेदनांना...विचारांना मूक्त आवाज देत राहतील याचा मला विश्वास आहे.

Thursday, January 5, 2017

सर्वैक्याच्या दिशेने...

(पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष संजय सोनवणी यांच्या अध्यक्षीय भाषणाचा सारांश.........)
मित्रहो,
सोलापुरात सुरू होणा-या पहिल्याच आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलेलो आहोत. आदिम काळापासून मुक राहिलेल्या या समाजाचा साहित्यिक उद्गार प्रथमच नागरी संस्कृतीच्या प्रांगणात उमटत आहे. साहित्य धनगरांना नवीनं नाही. किंबहुना साहित्य-कला संस्कृतीचा पायाच धनगर-गवळी आदि पशुपालक समाजाने घातला आहे. मराठीतील, (महाराष्ट्री प्राकृतातील) पहिले काव्य संकलन केले ते हाल सातवाहनं या राजानेच. सातवाहन घराणे धनगर होते. हालाचे हे काव्य संकलन "गाथा सप्तशती" या नावाने जगविख्यात आहे. या संकलनात इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील जनजीवनाची, मानवी भावभावनांची जेवढी वेधक काव्यमय वर्णने मिळतात तेवढी नंतरच्या साहित्यातुनही मिळत नाहीत. हाल सातवाहन स्वत: कवि, त्याच्या स्वत:च्या गाथाही या संकलनात आहेत. कविकुलगुरु म्हणवल्या गेलेल्या कालिदासास कोण विसरेल ? तोही धनगर समाजातुनच आलेला कवी. भटक्या जीवनातून जे धनगर व गोपालक नागरी संस्कृतीत आले ते राजे, कवी तसेच विद्वान म्हणून आपल्याला प्रतिष्ठा मिळवतांना दिसतात. चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, हरीहर-बुक्क हे भारताची संस्कृती प्रतिष्ठित करणारे सम्राट याच जमातीतून आलेले. रोज खुल्या आभाळाखाली, गिरी-कंदरांत मेंढरे अथवा अन्य पशुंसोबत भटकंती असल्याने जगण्याच्या अविरत झुंजीतून पराक्रमही धनगरांच्या रक्तात भिनलेला आहे. त्याचे दर्शन वेळोवेळी इतिहासात झालेले आहे. अलीकडचेच उदाहरण म्हणजे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर, तुळसाबाई होळकर व आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भिमाबाई होळकर. यादी खूप मोठी आहे. एवढे सम्राट, महाकवी व समाजधुरिण देणारा बहुसंख्य समाज मात्र आपल्या आदिम काळापासून चालत आलेल्या पेशातच रमल्यामुळे तो आज नागरी संस्कृतीपासून दुरच राहिल्याचे दिसत आहे. तो आपली निसर्गाची ओढच जपतच राहिला आहे. त्याचवेळी नागरी शैलीचे अंधानुकरण न करता आपल्या कला संस्कृतीचीही जपणुक करत राहिला आहे.
धनगरांची जीवनशैली जशी स्वतंत्र आहे, तशीच त्यांची साहित्यशैलेही. ग. दि. माडगुळकर म्हणाले होते, "धनगरांची कला ही अनगड हि-यासारखी आहे. त्याला पैलू नसतील पण ते खरे हिरे आहेत. ते उकिरंड्यावर पडण्यासाठी नाहीत, मयूर सिंहासनावर चमकण्यासाठी आहेत. धनगर अडाणी असेल पण त्याला अक्षरातील नादब्रह्माची ओळख आहे. म्हणून हे काव्य माळरानावर जसे आहे, तसेच ते सर्वत्र गेले पाहिजे. महाराष्ट्र शारदेच्या व्यासपीठावर याला मानाचे पान मिळायला पाहिजे." धनगरी ओव्या, लोककथा सुंबरानातून मांडल्या जाताहेत गेली हजारो वर्ष. मौखिक परंपरेन या ओव्या-कथा पुढच्या पिढीत प्रवाहित होत राहिल्या आहेत. नवीन पिढ्या त्यात आपल्या कल्पनांचे भर घालत राहिल्या आहेत. त्या लिखित स्वरुपात न आल्याने भाषेचे विविध टप्पे आपल्याला माहित होत नाहीत. पण प्रवाहीपणाच भाषेला जीवंत ठेवतो. यात त्यांच्या धर्मकल्पना, दैवतकथा विपुलतेने येतात. प्रदेशनिहाय धनगरी बोलीही वेगळ्या. अलीकडे या समृद्ध साहित्याला ग्रंथबद्ध करायचे काम होत आहे. पण ते पुरेसं नाही. गुंथर सोंथायमर, सरोजिनी बाबर ही या प्रयत्नातील खूप मोठी नांवे.
धनगरांची नृत्यशैलीही आगळी वेगळी. त्याला गजानृत्य म्हणतात. थोडक्यात डोगर-द-यांत, माळरानांवर राहुन त्यांनी स्वत:च्या वेगळ्या धर्मश्रद्धा, कर्मकांडे, गीतकाव्य व नृत्यशैल्यांना जपले आहे. आद्य कवी हाल सातवाहनही ग्रामीण जीवनातील मुक्ततेला आपल्या काव्यात वाव देतो. किंबहुना स्वातंत्र्य हा धनगरांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे जो त्यांच्या काव्यातून उमटत आला आहे. मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला जे मुख्य कारण होणार आहे ते म्हणजे हालाची गाथा सप्तशती आणि सातवाहनांचे प्राकृतातील शिलालेख. मराठी भाषेचा उदयकालच त्यांच्यापासून सुरु होतो हे आपण येथे लक्षात घ्यायला पाहिजे.
धनगरांचा इतिहास मानवी संस्कृती जेवढी प्राचीन आहे तेवढाच प्राचीन आहे. धनगर-गोपाळांतीलच काहींनी शेतीचा शोध लावला. अनेक धनगर-गोपाळ शेतीकडे वळाले. स्थिर झाले. त्यातुनच अनेक व्यवसाय विकसित झाले. भारतात व्यवसायांच्या पुढे जाती बनल्या. नागरी जीवन सुरु झाले ते सिंधू संस्कृतीपासूनच. पशुपती शिव हा सर्वांचाच त्यामुळेच आराध्य राहिला. धनगरांच्या विठोबा, खंडोबा, बिरोबा, म्हस्कोबा, धुळोबा, जोतिबा इत्यादि अनेक देवता शिवाशीच अभिन्न नाते सांगतात ते यामुळेच. पण मोठा समाज नागरी जीवनाकडे वळाला व पुढे वेगवेगळ्या जातीनामांनी ओळखला जाऊ लागला तरी हे लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे सर्वांचेच पुरातन पुर्वज पशुपालकच होते. ज्यांनी आपल्या आदिम व्यवसायाचा त्याग केला नाही, आजवर पशुपालकाचेच जीवन जगत आले, त्यांच्याबाबत सर्वांनी कृतज्ञ रहायला हवे.
कृतज्ञ रहा म्हणने ठीक आहे, पण तसे चित्र नाही. नागरी समाजाने धनगर समाजावर नको तेवढे अतिक्रमण केले. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक देवतांचे बाह्य स्वरुप बदलता आले नसले तरी कृत्रीम कथा निर्माण करून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मौर्य, सातवाहन हे धनगरांतून आलेले सम्राट, पण त्यांच्या जन्माबाबत एवढ्या बनावट कथा रचल्या कि सत्य हाती लागुच नये. थोडक्यात ते धनगर होते हे अमान्य करण्यासाठीच बनावट कथा बनवल्या गेल्या. अन्यथा एवढ्या परस्परविरोधी कथा बनवण्याचे कारण काय ? चंद्रगुप्ताच्याच जन्माविषयी किमान सोळा कथा आपल्याला सापडतात. पण त्याच्या गुरुबाबत तो कोण होता, कोणत्या जातीचा होता हे मात्र ठाम माहित असते. असे कसे हा प्रश्न इतिहासकारांनीही विचारला नाही, कारण त्यांना उत्तर द्यायचे नव्हते. सातवाहनांचेही असेच झाले. अलीकडच्या काळातील मल्हारराव, यशवंतराव यांचे पराक्रम व त्यांचे मुळ लपवता येणे तर शक्य नाही म्हणून कल्पोपकल्पित कथा निर्माण करून बदनाम केले गेले. भिमाबाई होळकरांनी १८१७ पासून तब्बल दीड वर्ष इंग्रजांशी स्वातंत्र्याचा अथक लढा दिला, पुढे त्या फितुरीने कैद झाल्या व मरेपर्यंत तब्बल ३६ वर्ष आयुष्य कैदेत घालवले. त्यानंतर १८५७ घडले. एवढे असुनही भारतीय इतिहासाने त्यांची आद्य महिला क्रांतीकारक म्हणून दखल घेतली नाही. दखल घेतली ती पाश्चात्य इतिहासकारांनी. यशवंतरावांच्या पत्नी महाराणी तुळसाबाईंनी यशवंतरावांच्या निधनानंतर १८११ ते १८१७ पर्यंत इंग्रजांनी घोर प्रयत्न करुनही इंदौर संस्थानात पायसुद्धा ठेवू दिला नाही. त्या तर मराठी जनतेला माहितही नाहीत, कारण त्यांच्यावर लिहिलेच गेले नाही. आणि नागरी शैलीत इतिहास मांडायची, कथा-कादंब-या लिहिण्याची रीत धनगरांना माहित नाही. त्यामुळे प्रतिवाद करायला अथवा पुराव्यानिशी सत्य मांडायला येणार कोण? यामुळे दुर्लक्षाचे वातावरण कायम राहिले.
तसाही भारतीय समाज इतिहास लेखन व जतनाबाबत उदासीन. शास्त्रशुद्ध इतिहास लिखानाची सुरुवात आपल्याकडे इंग्रजकाळानंतर लडखडत सुरु झाली. तत्कालीन वरिष्ठ नागरी समाजांनी आपापले इतिहास शोधायला सुरुवात केली. प्रसंगी त्यातही अनेकदा खोटेपणा, स्वत:ला उंचावण्यासाठी इतरांना दोष देणे अशा लबाड्या केल्या. मग जे नागरी समाजाबाहेरचे घटक होते त्यांना मुळात असले काही होतेय, याची जाणच नसल्याने लबाड्या काही काळ पचुनही गेल्या. अशा स्थितीत त्यांच्या इतिहासाकडे कोण लक्ष देणार ? कोण त्यांना त्यांचे श्रेय देण्याचा उदारपणा दाखवणार ? आपल सामाजिक वास्तव आपल्याला समजावून घ्यावे लागते. मुक, बुजरा व अशिक्षित धनगर समाज आपला इतिहास जगण्याच्या लढाईत विसरुन गेला होता. असे बव्हंशी बहुजनीय जातींबाबत झाले. एवढे कि आपल्याला इतिहासच नाही असे त्याला वाटु लागले. पण ते वास्तव नाही. एखाद्या खेड्यातील थोरल्या भावाने काबाडकष्ट करत लहान्याला शहरात शिकायला पाठवावे, लहान्याने स्वत:ला प्रगत समजत थोरल्याला मात्र नंतर टाळत रहावे...किंबहुना विसरुनच जावे असा प्रकार घडलेला आहे. या विस्मरणाच्या गर्तेतून बाहेर पडणे आवश्यक होते.
पण अलीकडे धनगर जमात आपल्या कोषातून बाहेर पडू पहात आहे. आपल्या इतिहासाबाबत तो कधी नव्हे एवढा सजग झाला आहे. या सजगतेत अभिनिवेश नाही. जातीय अहंकाराचे पुटे त्याला चढलेली नाहीत. स्वत:चा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे व ती सर्वच मानवी घटकांसाठी आवश्यक आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ निकोप इतिहासातून समजतो. संस्कृतीला दिलेल्या योगदानातुन समजतो व भवितव्याच्या उज्ज्वल दिशा त्यातुनच उलगडत जातात. डा. गणेश मतकर, मधुकर सलगरे ते तरुण पिढीचे होमेश भुजाडे असा हा स्वशोधनाचा प्रवास धनगर समाजाने केला आहे. हा प्रयत्न पुरेसा नाही हे उघड आहे. अजुनही इतिहासाची असंख्य दालने अंधारात आहेत. विविधांगाने चिकित्सा करण्याची ऐतिहासिक दृष्टी मिळवायची आवश्यकता आहे. ते कार्य नवीनं पिढी धनगर इतिहास परिषदेच्या माध्यमातून करेल असा मला विश्वास आहे.
साहित्य हा कोणत्याही संस्कृतीचा प्राण असतो. आपण मराठी साहित्य पाहिले तर त्यात धनगरी जीवनाचे चित्रण अभावानेच आढळेल. त्यांची स्वप्ने, जीवनशैली, सुख-दु:खे व संघर्षाची परिमाने नागरी समाजापेक्षा अत्यंत वेगळी असुनही, साहित्त्यिक प्रेरणांना आव्हान देणारी असुनही अन्य साहित्यिकांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. हे चित्र समाधानकारक नाही. एक मोठा आदिम संस्कृतीला येथवर घेऊन येणारा समाजघटक साहित्यात मात्र अदृष्य असावा हे अनाकलनीय आहे. किंबहुना आपल्या साहित्यिकांची दृष्टी एवढी विशाल नाही याचेच हे द्योतक आहे. अलीकडे धनगर समाजातुन नवे कवी, कथाकार व कादंबरीकार उदयाला येत आहेत हे खरे आहे. सुरेश पां. शिंदे यांची "मेंढका" व शिवाजीराव ठोंबरे यांची "डोंगरापल्याड" या कादंब-या धनगरांच्या भटक्या जीवनातील आशय समृद्धपणे मांडतात. हाल-अपेष्टा व थोडीबहुत वाट्याला येणारी सुखेही समर्थपणे मांडतात. पण मुख्य प्रवाहाने या कादंब-यांची दखल घेतली असल्याचे आपल्याला पहायला मिळत नाही. ही वृत्ती मराठी साहित्यसृष्टीने सोडली पाहिजे. अधिकाधिक साहित्य निर्माण व्हावे, वाचले जावे व धनगरी जीवनाशी सर्वांनीच साहित्यातून तरी जोडले जायला हवे. आपल्या मुळ संस्कृतीच्या प्रेरणा कोठून आल्या हे आधुनिक समाजाला त्याशिवाय समजणार नाही.
धनगर समाज आपल्या परंपरागत व्यवसायातुन फेकला जायची परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर तर त्याला अधिकच हवालदिल केले. चरावू कुरणे हाच ज्या संस्कृतीच्या जगण्याचे साधन तीच हिरावली गेली. भारतात ब्रिटिश काळापुर्वी २२% क्षेत्र हे चरावू कुरणांचे होते. सरकारी धोरणे, लबाड राजकारणी यामुळे महाराष्ट्रात आज अवघे १.८% क्षेत्र हे चरावु कुरणांचे उरले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेत मोलाचे भर घालणारा उद्योगही संपण्याच्या बेतात आहे. जे किमान ४०% धनगर आजही मेंढपाळीवर कसेबसे अवलंबून आहेत तेही भविष्याच्या प्रश्नाने ग्रासले आहेत. एक जगण्याचे साधन हिरावून घेतांना पर्याय द्यायला हवा याचे भान कोणत्याही सरकारने ठेवले नाही. त्यामुळे मिळेल त्या अन्य क्षेत्रांत जगण्यासाठी धनगर बांधव प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना एक दिशा व मार्गदर्शन नसल्याने जी ससेहोलपट होते आहे ती पाहून कोणाचेही अंत:करण हेलावल्याखेरीज राहणार नाही. पण हा समाज आजही तेवढाच दुर्लक्षित आहे जेवढा होता. साहित्य काय व माध्यमे काय, तीही त्यांच्याबाबत उदासीनच राहिली असावीत हे दुर्दैवच आहे. बहुतेकांच्या दृष्टीने हा समाजच अस्तित्वात नाही एवढे घोर दुर्लक्ष या समाजाप्रत आहे.
पण हे साहित्य संमेलन हे विराट भविष्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. या मुक बांधवांचा साहित्यिकच नव्हे तर आत्मोद्गार आपल्याला ऐकण्याची ही संधी आहे. धनगर बांधव हा सर्वांचाच आहे, राहणार व सर्वांच्या हातात हात घालून प्रगती करणार याची ग्वाही म्हणजे हे संमेलन आहे. धनगर समाज म्हणजे आजवर नागरी समाजाने अव्हेरलेला थोरला भाऊ. धाकट्या भावाला थोरल्याच्या जवळ घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. या संमेलनात आयोजित विविध परिसंवादांतून व्यापक विचारमंथन होईल, सकारात्मकतेच्या दिशेने सर्वच जातील ही अपेक्षाही आहे. आजच्या जातीय गढूळ वातावरणात भरणारे हे संमेलन म्हणजे सर्वैक्याची घोषणा करणारे महत्वाचे सकारात्मक पाऊल आहे. डॉ. अभिमन्यू टकले, छगनशेठ पाटील, अमोल पांढरे, जयसिंगतात्या शेंडगे व त्यांच्या सहका-यांचे मी त्यासाठी आभार मानतो.
धन्यवाद.

Monday, September 23, 2013

साहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय?


"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे?" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली आहे. साहित्यिक (साहित्यासंदर्भात...व्यक्तिगत नव्हे) वाद-विवाद, साहित्यसंकल्पनांबद्दल घनघोर चर्चा, सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडत चिंतनात्मक मंथन साहित्य संमेलनामुळे घडावे अशी अपेक्षा ठेवावी अशी आजकाल परिस्थिती उरलेली नाही. उलट साहित्यबाह्य कारणांनीच साहित्य संमेलने गाजत आली आहेत. साहित्य जाणीवा त्या वादांत वाहून गेलेल्या दिसत आहेत. तरीही यंदाचे संमेलन सर्वच उमेदवारांच्या समजुतदारपणामुळे आतापर्यंत तरी कसल्याही वादाच्या भोव-यात सापडलेले नाही हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

असे असले तरी साहित्य संमेलनाकडूनच्या अपेक्षा उरतातच. या निवडणुकीच्या निमित्ताने मी जेवढ्या मतदारांशी आणि वाचकांशी संपर्क साधू शकलो त्यावरून साहित्य संमेलनांबाबत केवळ वाचकच नव्हे तर अनेक मतदारच उदासीन असल्याचे चित्र दिसून आले आणि याचे कारण ज्यासाठी म्हणून संमेलन हवे तेच संमेलनात नेमके होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. यातील सर्वात चिंतीत करणारी बाब म्हणजे तरुणांना तर साहित्य संमेलनाचे कसलेही आकर्षन उरलेले दिसत नाही. एक तर त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसे अवकाश सम्मेलन उपलब्ध करून देवू शकलेले नाही. ते नसेल तर नसो पण किमान युवा साहित्यिकांच्या प्रेरणांना, नवनवीन साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचे व त्यावर व्यापक चर्चा घडवण्यातही संमेलन आजवर पुढाकार घेवू शकलेले नाही. साहित्य संमेलनातून काहीतरी दिशादर्शक प्रेरणा मिळाव्यात अशा लेखकांच्या अपेक्षा असतील तर त्यांना वावगे कसे म्हणता येईल?

आणि तरुण लेखकच जर साहित्य संमेलनापासून काही मिळू शकण्याच्या स्थितीत नसतील तर ते तिकडे का फिरकतील?

आज आपण पाहतो कि सर्वशिक्षण अभियानामुळे शिक्षितांचे प्रमाण जवळपास सर्वच समाजघटकांत वाढू लागले आहे. या समाजांतील सर्जनशील प्रतिभा लिहू लागल्या आहेत, अभिव्यक्त होवू लागल्या आहेत. एका अर्थाने हे नवजागृतीचे वारे आहे. स्वागतार्ह आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वच समाजघटकांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असलेले आपल्याला ठळकपणे दिसते. त्यातून निर्माण होत असलेल्या आजवर अपरिचित असलेल्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. त्यांवर उत्तर शोधणे हे सर्वच प्रतिभाशालींचे काम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नवप्रतिभांना जातीय अथवा वर्गीय चौकटीत न अडकावणे यासाठी संपुर्ण साहित्यविश्वानेच सजग रहायला हवे. परंतू आपण पाहतो कि दुर्दैवाने या दिशेने आजवर प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे एकुणातील साहित्य विश्व (वैचारिक/तात्विक मतभेदांसहित) किमान साहित्यएकतेच्या मूल्यावर एकसूत्रात येणे शक्य झालेले नाही. उलट आज बहुतेक जाती/समाजांची स्वतंत्र साहित्य संमेलने भरत आहेत. शहर/प्रांतनिहाय साहित्य संमेलनांना प्रोत्साहन दिले पाहिजे हे खरे पण जातीय साहित्य संमेलने ही पुरोगामी महाराष्ट्राचे कोणते चित्र स्पष्ट करते?

मराठीत एके काळी उच्चभ्रू साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य इ. अशी एक विभागणी नकळत का होईना पण झाली होती. एका अर्थाने साहित्य क्षेत्रातही वर्णव्यवस्थेने प्रवेश केल्याचे ते एक दर्शन होते. पण ही विभागणी पुढे धुसर होण्याऐवजी अधिक कठोर कप्पेबंद होत गेल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. साहित्य हे निखळ साहित्य असून त्यात असे भेदाभेद करून मग त्याचे मूल्यमापण करू नये याबाबत अनेक साहित्यिक/समिक्षक आग्रही असतात. असे असले तरी प्रत्यक्षात ही विभागणी एकुणातच मराठी साहित्याला हानीकारक आहे याबाबत दुमत नसावे. त्या आधारावरच साहित्यिकाचा दर्जा ठरवणे हे तर अधिक हानीकारक आहे. पण यावर जी चर्चा साहित्य संमेलनांतील एखाद्यातरी चर्चासत्रांतून गंभीरपणे केली जायला हवी होती तशी झालेली नाही, हे दुर्दैव नव्हे काय?

बरे, हे येथेच थांबत नाही. साहित्यिकांची जात व प्रांतही साहित्य संमेलनात अनेकदा कळीचा मुद्दा बनत आले आहेत. हे मुद्दे जिंकतातच असे नसले तरी ते रेटले जातात हा सर्वांचाच अनुभव आहे. साहित्याला जात/धर्म/प्रांत नसेल तर साहित्यिकाला हे मुद्दे का लागू व्हावेत? परंतू ते अनेकदा फायद्याचेच जात असल्याने ते वापरले जातातच हेही एक दुर्दैवी वास्तव आहे. यातून साहित्याचे आणि अनेक साहित्यिकांचे एकुणात किती नुकसान होते याचा लेखाजोखा साहित्यिकांनीच मांडायला हवा. पण त्यासाठी जरा निरपेक्ष बनावे लागेल. ते आजच्या परिस्थितीत शक्य आहे कि नाही? मला वाटते शक्य आहे. हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ विदर्भातील लेखकांना पुणे सहजी जवळ करत नाही अशी वैदर्भियांची, मराठवाडियांची तसेच खानदेशी लेखकांचीही तक्रार असते. जे डोक्यावर घेतले गेले ते त्यांच्या अथक प्रयत्न आणि साहित्यनिष्ठेमुळे. पण अनेकजण प्रतिसादांच्या अभावी मधेच गळून पडतात ती संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वाची एकुणातच हानी होतेय याकडे साहित्य संमेलनांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी असंख्य युवा-साहित्यिकांची आहे.

परप्रांतातील मराठी भाषक आणि लेखकांची समस्या तर याहून गंभीर आहे. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत  कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करने काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२)

यातील खंत आजही दूर झालेली नाही. किंबहूना परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परप्रांतांत मराठी भाषकांसाठी (गोवा अपवाद) एकाही मराठी साहित्य मंडळाचे सम्मृद्ध ग्रंथालय नाही. इमारतींची तर बाबच दुर्मिळ. बडोद्याला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून येणारे फिरते पेटी ग्रंथालय सोडले तर काही सुविधा नाही. तीच बाब छत्तीसगढची. येथे भाड्याच्या खोलीत मराठी साहित्य परिषदेचा कारभार चालतो. गुलबर्ग्याच्या ग्रंथालयात ५०-६० ग्रंथ आहेत. खरे तर महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय दरवर्षी ३-४०० ग्रंथांच्या जवळपास तेवढ्याच प्रती विकत घेऊन महाराष्ट्रातील ग्रंथालयांना वातते. त्यात परप्रांतीय ग्रंथालयांचाही समावेश करने अशक्य आहे काय? मराठी साहित्य संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांना अनुदान देतांना परप्रांतीय मराठी लेखकांना प्राधान्यक्रमाने प्रथम पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देता येणे अशक्य आहे काय? ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती देणेही अशक्य नाही. पण त्यासाठी मराठी भाषेच्या वृद्धीची तळमळ व कळकळ लागते. ती आजवर तरी दिसलेली नाही.

हे असे चित्र असेल तर मग परप्रांतांतील मराठी भाषकांच्या गळचेपीबद्दल काय बोलावे? गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोवेकर मराठी बांधव संघर्ष करीत आहेत. पण त्याबाबत मराठी भाषक व महाराष्ट्र सरकार तर उदासीन आहेच, पण खुद्द अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही उदासीन असावे हे मात्र अनाकलनीय व मराठीच्या एकुणातील विकासासाठी हानीकारक आहे. बेळगांव-निपाणीबाबत एवढी वर्ष नियमीत ठराव केले जातात....काय झाले त्यांचे?

थोडक्यात मराठीचे व मराठी साहित्यविश्वाशी निगडित असंख्य प्रश्न आहेत. ते चर्चेत आणने संबंधितांना खरे तर अडचणीचे ठरणारे नसून ते सतत चर्चेत ठेवले तर मराठीच्या एकुणातील संवर्धनासाठी उपयोगाचेच होईल. पण तसेही होतांना आपल्याला दिसत नाही. आजच्या प्रत्यक्ष समस्यांबाबत साहित्य संमेलनांची अशी उदासीनता असेल तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत मराठी साहित्य संमेलन काय भूमिका घेणार आहे? मराठीचा जागर देश-विदेशात व्हावा ही सर्व साहित्यप्रेमी मराठी भाषकांची वाजवी अपेक्षा आहे. पण जेथून चिंतनाचे आणि परिवर्तनाचे धुमरे फुटावेत ते साहित्य संमेलनच त्याबाबत उदासीन असेल तर साहित्य संमेलन म्हणजे तीन दिवसांची जत्रा आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गणपती ही जनधारणा नुसती ठळक होत जाणार नाही तर एक दिवस ती सर्वस्वी बाद ठरतील.

तसे होऊ नये. ते मराठी भाषेच्या, साहित्याच्या आणि समाज-स्पंदनांना जाणवून घेत अभिव्यक्त होत राहणा-या प्रतिभावंतांच्या हिताचे नाही. साहित्य संमेलन हे मुठभरांचे असते या भ्रमातून सर्वच मराठी रसिकांनी बाहेर यायला हवे आणि त्यात कालानुरुप बदल घडवण्यात हातभार लावला पाहिजे. हे खरेच "अखिल भारतीय" आणि "सर्व मराठी साहित्य-रसिकांचे चिंतन-शिबीर" व्हावे यासाठी हातभार लावला पाहिजे.

-संजय सोनवणी


Thursday, September 12, 2013

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?.....प्रा. हरी नरके

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.
अखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते? १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.
आजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.
या मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते? या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.
अध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.
मराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय? भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय? मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे?
या मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची? असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत? समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती  आहेत? त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी?प्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
.............................................................................................
---- प्रा. हरी नरके

मी निवडून येईल याचा मला ...

मी निवडून येईल याचा मला विश्वास आहेच. निवडून आल्यानंतर मी एक अनौपचारिक अशी अध्यक्षीय समिती स्थापन करणार आहे. तीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सर्व घटकसंस्था आणि जगभरातील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांतील (किंवा बाह्य) निवडक प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्या माध्यमातून खालील उपक्रम राबवणार आहे...

१. देशांतर्गत व बाहेरही विखुरलेल्या मराठी भाषकांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडत राहणे. सर्व मराठी भाषक साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना अ.भा. मराठी साहित्य
संमेलन, भविष्यात का होईना, आपले वाटेल याची सकस पायाभरणी करणे.

२. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि डा. आ. ह. साळुंखे समितीने सुचवलेल्या सांस्कृतीक धोरणावर व्यापक अंमलबजावणी व्हावी यासाठी या समितीचा व जनसामान्यांचा दबावगट निर्माण करणे. प्रसंगी ठिकठिकाणी आंदोलने करने. सीमाभागातील लेखकांना प्रोत्साहन देणे.

३. मराठीतील सर्व साहित्य प्रवाहांना किमान एकमेकांशी चांगली ओळख व्हावी, सैद्धांतिक आणि वैचारिक देवाणघेवाण व्हावी यासाठी प्रयत्न करणे. आज अनेक साहित्त्यिक-विचारवंत आपापल्या परीने महान सांस्कृतीक कार्य घडवत असतात पण त्यांना व्यापक मान्यता/प्रसिद्धी मिळत नाही...त्यासाठी माध्यमांनाही सजग करणे. चळवळींची वैचारिक व्यापकता वाढवणे.

४. परप्रांतीय/विदेशांत स्थायिक पण मराठी मातीच्या साहित्यिकांना (त्यांनी अभिव्यक्तीचे माध्यम अन्य भाषा निवडले असले तरी...उदा. आताच्या पिढीचे हर्षवर्धन देशपांडे आणि अन्य अनेक) योग्य तो मानसन्मान मिळायला हवा यासाठी प्रयत्न करणे.

५. आज ब्लोग हे अभिव्यक्तीचे तरुणाईचे महत्वाचे साधन आहे आणि अनेक मराठी ब्लोगलेखक तसेच मराठी संकेतस्थळांवर अत्यंत सातत्याने प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण लिहिणारे अनेक लेखक आहेत. छापील पुस्तके ज्यांची तेच लेखक असे मानायची प्रथा आता कालबाह्य झाली आहे. अशा सर्व लेखकांनाही मराठी साहित्य संस्कृतीत सामावून घेण्याची आणि त्यांना यथोचित सन्मान देण्याची आज गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिलालेख ते ताम्रपट ते हस्तलिखित पोथ्या ते छापील शब्द ते संगणकीय अभिव्यक्ती असा आपण प्रवास केला आहे. विज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे तो वेग पाहता सध्याच्या संगणकांची जागा क्वांटम संगणक घेतील यात शंका नाही. आपल्याला काळाबरोबरच नव्हे तर काळाच्याही पुढे रहावे लागणार आहे. आपल्याला तशी मानसिकता बनवावी लागणार आहे.

६. आज आपण विज्ञानयुगात आहोत पण अखिल भारतीय म्हणवणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुनाट आहे. ती On-Line करावी व सर्वच वाचक/लेखक/पत्रकार/संपादकादिंना मतदान करता यावे यासाठी मी आग्रही तर आहेच पण ते प्रत्यक्षातही आणेल.

आणि हा प्रयत्न आपण सर्वांने मिळून करायचा आहे. एका रात्रीत काही होत नसते. सातत्यपूर्ण प्रयत्न आपण सर्वांनाच मिळून करावे लागतील. मी माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न करीतच आहे आणि भविष्यातही आपणा सर्वांच्या मदतीने करीतच राहील!

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

पुणे: 11: - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कार नसून साहित्य-संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एका सूत्रात बांधत पुढील दिशादर्शक कार्य करण्यासाठी असते. साहित्य संमेलन हा केवळ उत्सव नसून व्यापक विचारमंथनाचे शिबीर आहे व ते वर्तमान व भविष्यातील साहित्यिक व साहित्यरसिकांसाठीचे एक उर्जाकेंद्र बनावे यासाठी आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत अशी आपली भूमिका साहित्यिक संजय सोनवणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.

कायदे केल्याने अनैतिक गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही. निर्भयावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर कायदे कठोर केले गेले हे खरे असले तरी महिलांवरील अत्याचार कमी न होता वाढतच आहेत. मुळात हा प्रश्न समाज-संस्कृतीचा असून समाजाच्या नैतिक धारणांना आकार देण्याचे कार्य आपल्या साहित्यिकांना करावे लागणार आहे. आज ग्रामीण भागातून स्वतंत्र प्रतिभेचे अनेक लेखक कवी लिहिते झालेले आहेत परंतू त्यांना सामावून घेणारे व्यापक व्यासपीठ नसल्याने उपेक्षेने कंटाळून हे क्षेत्र सोडणा-यांचीही संख्या वाढते आहे. त्यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या सर्वच घटकसंस्थांना क्रियाशील करण्याची गरज आहे असेही सोनवणी म्हणाले.

परराज्यांत व विदेशातही मराठी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या साहित्य व्यवहाराशी य सर्वांनाच आत्मियता वाटावी यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. बेळगांव-निपाणी भागातील मराठी भाषकांना एवढी झळ बसत असुनही त्याचे पडसाद साहित्य जगतात उमटत नाहीत. एवढेच काय या भागातील एकही नांव साहित्य संमेलनाच्या मतदार यादीत नाही. गोवेकर मराठी भाषकांची मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी जुनी मागणी आहे पण तिला महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण अध्यक्ष झाल्यास एक अनौपचारिक अध्यक्षीय समिती स्थापन करून सर्व घटक संस्थांच्या प्रत्येकी किमान दोन प्रतिनिधींचा त्यात समावेश करून एक दबाव गट निर्माण करू. ही समिती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि शासनाने स्वीकारलेले सांस्कृतीक धोरण कटाक्षाने राबवावे यासाठीही जनांदोलन करेल असेही सोनवणी पुढे म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया सुलभ व व्यापक पायावर व्हावी यासाठी online मतदानाची सुविधा निर्माण करावी यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत असेही संजय सोनवणी म्हणाले.

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको
(04-09-2013 : 00:09:33)
औरंगाबाद : साहित्यामध्ये कोणीही स्पर्धक असू शकत नाही. कारण, प्रत्येकाची लेखनशैली वेगळी असते. साहित्य क्षेत्रात प्रांतवाद असता कामा नये; कारण हे क्षेत्र वैश्‍विक असण्याची गरज आहे, असे संजय सोनवणी म्हणाले. सोनवणी हे सासवड येथील नियोजित ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत.
३ सप्टेंबर रोजी सोनवणी येथे आले असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आज सर्वच जातीची साहित्य संमेलने भरत आहेत. मात्र, त्यातून जातिभेद नष्ट होण्याचे स्वप्न दुभंगत आहे. त्यामुळे शक्य तेवढय़ा समाजातील साहित्याची दखल घेण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे केवळ सन्मान मिळविण्यापुरते नाही, तर कार्य करण्यासाठीही आहे.
साहित्य संमेलन केवळ उत्सव न बनता त्यातून सामाजिकता, संस्कृती पुढे जायला हवी. साहित्य संमेलन व्यापक होण्याची गरज आहे; ते तरुण वर्गाला साहित्य चळवळीत आणण्याचे माध्यम बनले पाहिजे, असेही सोनवणी म्हणाले.
आज एका शहरातील साहित्य चळवळीविषयी दुसर्‍या शहरात ना माहिती होते ना त्याची देवाण-घेवाण. ही देवाण-घेवाण होण्याची गरज आहे. तसेच जेव्हा सांस्कृतिक, सामाजिक पडझड होते तेव्हा केवळ निषेध केला जातो.
मात्र, केवळ निषेध न करता आज नीतिमूल्ये रुजविण्याची गरज आहे, असेही सोनवणी म्हणाले. काळानुसार भाषा बदलली पाहिजे. व्यक्त होण्यासाठी जे सोपे वाटेल त्याचा वापर व्हावा. ठराविक शब्दांचा आग्रह धरण्याऐवजी सोपे शब्द वापरले जावेत, अशी सूचना त्यांनी केली.
ऑनलाईन पद्धत हवी
आज नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुन्याच पद्धतीने होत आहे. त्याऐवजी यंदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर व्हावा, असे ते म्हणाले.(लोकमत ब्युरो)

Wednesday, September 4, 2013

साहित्यिकांसह .....


साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

प्रतिनिधी | Sep 04, 2013, 08:01AM IST


EmailPrintComment
साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

औरंगाबाद - साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूठभर लोकांचा सहभाग असतो. बारा कोटींच्या महाराष्ट्रात साहित्यिकांसह सामान्यांनाही मतदानाचा हक्क द्यायला हवा. बदल स्वीकारून मतदान ऑनलाइन घेण्यात यावे, अशी मागणी सासवड येथील 87 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार संजय सोनवणी यांनी केली.

मंगळवारी शहरात आले असता त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीची पद्धत स्वीकारली असल्याने गळा काढून काहीही होणार नाही. परंतु लोकशाहीत बदलाला नेहमी वाव असतो. प्रत्येक पद्धत परिपूर्ण असतेच असे नाही. सध्याचे युग इंटरनेट असल्याने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतानादेखील ऑनलाइन मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. निवड ही र्मयादित न राहता व्यापक असावी. लोकांना काय वाटते ही भावना लोकशाहीमध्ये महत्त्वाची आहे. ऑनलाइन पद्धतीसाठी येणारा खर्चदेखील कमी आहे. त्यामुळे यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. आपल्याकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे समजले जाते. मात्र ते पद मानाचे नसून कार्यकर्त्या म्हणून काम करण्यासाठी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अभिजात दर्जासाठी जनमताच्या रेट्याची गरज
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पण जनमतांचा रेटा वाढल्याशिवाय ही मागणी पूर्ण होणार नाही. मराठी भाषा पुरातन आणि स्वतंत्र आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी तामिळ, मल्याळम भाषिकांप्रमाणेच मराठीप्रेमींच्या जनआंदोलनाची गरज आहे. तसेच जागतिकीकरणामुळे मराठी भाषिकांचेही सामाजिक सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत. मराठी साहित्य या दूरगामी बदलांना कवेत घेत त्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहिले तरच सध्याची सांस्कृतिक गोंधळाची अवस्था दूर होईल, असे मतही या वेळी सोनवणी यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी
राज्याचे सांस्कतिक धोरण ठरवण्यासाठी राज्याने डॉ आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अनेक शिफारशी केल्या असून तो अहवाल सरकारने स्वीकारला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न झालेले नाहीत. या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. सोनवणी गेल्या 37 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात असून 24 वर्षांपासून ते प्रकाशकांचे कामदेखील करत आहेत.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-sahitya-sammelan-election-aurangabad-4365491-NOR.html

Sunday, August 25, 2013

साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा सन्मान नव्हे...जबाबदारी!- संजय सोनवणी



सासवड: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा उत्सव नसून साहित्य-संस्कृतीविषयक मुलगामी चिंतन व मंथन घडवून आणनारे शिबीर असून या संमेलनाचे अध्यक्षपद हा केवळ सन्मान नाही तर साहित्य संस्कृतीला दिशा देत मार्गदर्शक कार्यकर्त्याप्रमाणे राबण्यासाठी मराठी भाषकांनी सोपवलेले जबाबदारीचे पद आहे असे प्रतिपादन सासवड येथील नियोजित ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवार प्रसिद्ध साहित्यिक, कवि व संशोधक संजय सोनवणी यांनी केले. क-हा नदीपूजन आणि आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रचाराची सुरुवात करतांना त्यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. संत सोपानदेवांच्या समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अरूण जगताप, शिवसेनेचे सासवड शहर प्रमुख श्री अभिजित जगताप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे पदाधिकारी श्री. प्रदीप जगताप व अन्य उपस्थित होते.

"साहित्य संमेलन हे एकुणातीलच साहित्य-संस्कृतीला नव-उर्जा देणारे, प्रेरक आणि दिशादर्शक असायला हवे. आपण काय कमावले व काय गमावले यावर सखोल चिंतन संमेलनाच्या माध्यमातून अभिप्रेत आहे. तरुणांना या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यावे लागणार आहे." असेही सोनवणी म्हणाले.

सोनवणी पुढे म्हणाले कि "जागतिकीकरणाच्या लाटेनंतर परंपरागत संस्कृती आणि जागतीक संस्कृतीचे प्रवेशत असणारे वेगवान प्रवाह यांतील आंतरसंघर्षामुळे आपण सारेच एकार्थाने सांस्कृतीक पडझडीच्या कालखंडात येऊन ठेपलो आहोत. आजचा तरुण वर्ग मालिकांच्या वा जाहिरातींच्या कचकड्याच्या जीवनदर्शनाला संस्कृती समजू लागल्याने व त्याच वेळीस कठोर वास्तव अनुभवास येत असल्याने अस्वस्थ आहे. त्याला सांस्कृतिक व भावनिक आधार देवू शकेल असे साहित्य क्वचितच दिसते. दुसरीकडॆ सर्व समाजांमद्धे आज शिक्षणामुळे अभिव्यक्तीचीही आस बळावत आहे...पण तिला दिशा देवू शकेल आणि त्या अभिव्यक्तीला वैश्विक साहित्याचे रूप देवू शकेल असे सकारात्मक सांस्कृतीक व सामाजिक वातावरण आपल्यात आज तरी नाही. आपल्याला संस्कृतीचीच एकुणातच फेरमांडणी करावी लागनार आहे.

"मी क-हा पूजन करीत आहे याचे कारण सर्वच जागतिक संस्कृत्या नदीकाठीच बहरल्या. नद्यांचे मानवावर अनंत उपकार आहेत. पण आज जवळपास सर्वच नद्या मानवी अतिक्रमणामुळे प्रदुषित झाल्या आहेत. त्याहीपेक्षा मोठा गंभीर धोका म्हनजे प्रदुषित झालेली आपली संस्कृती. ती कशी स्वच्छ करायची याचे आव्हान आपल्यासमोर आहे. डा. दाभोळकरांची हत्या असो कि महिला छायाचित्रकारावरील अलीकडचाच बलात्कार, आपण किती टोकाचे प्रदुषित झालो आहोत एक चिन्ह आहे व तो आपणा सर्वांना एक धोक्याचा इशारा आहे. तो समजावून घेतला नाही व त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले नाहीत तर आम्हाला साहित्य-संस्कृतीबद्दल बोलायचा अधिकार नाही.

"महात्मा फुलेंच्या स्वप्नातील एकमय समाज साकारणे हे आजही आमच्यापुढे आव्हान आहे. साहित्य हे कार्य समर्थपणे करू शकते पण त्यासाठी सर्व साहित्य प्रवाहांना एका ध्येयाच्या दिशेने नेणे व नवविचारांना प्रोत्साहन देणे ही कार्ये आम्हा सर्वांनाच करावी लागतील."

या प्रसंगी संजय सोनवणी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी जनांदोलन उभे करण्याची आवश्यकता प्रतिपादन करत शासकीय मराठी सोपी केली नाही तर ती लोकप्रिय राजभाषाही बनू शकणार नाही असेही मत प्रतिपादित केले. श्री. अरुण जगताप यांनी सोनवणींच्या परखड भुमिकेचे स्वागत केले. येते संमेलन त्यांच्या विचारांवर नक्कीच लक्ष देईल असेही ते म्हणाले. 

ऐसे केले या गोपाळे....

शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र   आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...