Showing posts with label इतिहास हा मार्गांचा. Show all posts
Showing posts with label इतिहास हा मार्गांचा. Show all posts

Friday, December 23, 2022

रेशीम मार्गावरील जगप्रसिद्ध प्रवासी!


 




रेशीम मार्गावरून इस्तंबूलपासून चीनपर्यंत प्रवास करणारे असंख्य व्यापारी होऊन गेलेत. दुर्दैवाने त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल काही लिहून ठेवले असले तरी ते आज अभावानेच आपल्याला उपलब्ध आहे. भारतातून रेशीम मार्गावरूनच चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरला असला तरी त्या बौद्ध भिक्षुंनी प्रवासवर्णने लिहिलेली नसल्याने या मार्गावरील त्यांच्या आठवणी व निरीक्षणे उपलब्ध नाहीत. सातव्या शतकातील प्रसिद्ध चीनी विद्वान ह्यु-एन-त्संग याचा मात्र अपवाद. बौद्ध धर्माबाबत अपार आस्था असल्याने हा रेशीम मार्गाने प्रवास करत भारतात आला होता. चीनला परत गेल्यानंतर चीनी सम्राट तायझोंगच्या  इच्छेनुसार आपले प्रवासवर्णनही लिहले. त्याचे हे लेखन आजही इतिहासकार आणि पुरातत्वविदांसाठी इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा भरण्यासाठी उपयुक्त ठरते आहे.

 

त्यानंतर काही काळातच इत्सिंग हा चीनी भिक्षुही भारतात आला आला होता. त्याने प्रवासात लिहिलेल्या दैनंदिन्याही नंतर प्रसिद्ध करण्यात आल्या. रेशीममार्गावरील व भारतातील राज्ये, तेथील समाजजीवन व एकंदरीत धार्मिक स्थिती यावर त्यातून मोठा प्रकाश पडतो.

 

पण रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणा-या इटालियन मार्को पोलोची कहानी मात्र विलक्षण अशी आहे. मार्को पोलो मुळचा व्हेनिस शहरातील. त्याचे वडील निकोलो व चुलते माफ्फेओ हे दोघेही व्हेनिसमधील नामांकित व्यापारी होते. व्यापारानिमित्त ते व्होल्गा नदीखोऱ्यापासून इस्तंबूलपर्यंत प्रवास करीत असत. मार्को आपल्या आईच्या पोटातच होता तेंव्हाही निकोलो व माप्फ्फेओ बंधू व्यापारासाठी बाहेर पडलेले होते. जागतिक व्यापारी पटलावर काही बदल होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे त्यांनी ठरवले.  

 

रोमन काळापासून चीन, भारतादी अतिपूर्वेकडील आशियाई देशांशी ज्या खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, तो मार्ग अब्बासी खिलाफतीच्या कालखंडात यूरोपियनांसाठी बंद झाला होता. पण चंगीझखानाचा नातू हूलागूखान याने बगदादची अब्बासी खिलाफत नष्ट केल्यावर, म्हणजे १२५८ नंतर, हा मार्ग पुन्हा यूरोपियन व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. या संधीचा फायदा घेऊन १२६० मध्ये निकोलो व माफ्फेओ यांनी साहस करून मध्य आशियातील बूखारा गाठले. बूखारा हे त्यावेळेसही मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते. तेथे कुब्लाईखानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबरच ते चीनला गेले. मध्ययुगीन काळात चीनमध्ये जाणारे ते पहिले यूरोपीय व्यापारी होते.

 

पेकिंगमध्ये त्यांनी कूब्लाईखानाची भेट घेतली. त्याने निकोलो व माफ्फेओ यांचे स्वागत केले आणि काही काळ त्यांना ठेवूनही घेतले. जवळपास पंधरा वर्षांच्या नंतर १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीला परतले. तोवर निकोलोच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता तर पंधरावर्षीय मार्कोच्या दृष्टीने  पिताही हयात नव्हता. पण बापाला पाहून पोरक्या मार्कोला बरे वाटले असल्यास नवल नाही.

 

चीनमधून निघताना कुब्लाईखानाने पोपला उद्देशून चीनमध्ये १०० ख्रिस्ती मिशनरी पाठवावेत या अर्थाचे निकोलोकडे दिलेले होते. पण पोप चौथा क्लेमेंट याच्या मृत्यूमुळे आणि नवीन पोपच्या निवडणुकीच्या विलंबामुळे ते पोहोचते करू शकले नाहीत.

 

प्रवास आणि व्यापाराची वृत्ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १२७१ साली पोलो बंधू सतरा वर्षांच्या मार्कोसह पुन्हा चीनकडे व्यापारासाठी निघाले. ते एकर येथून जेरूसलेमला आले. तेथून ते उत्तरेकडे प्रवास करीत सिरियाच्या किनारी आले. त्याच ठिकाणी त्यांना आपला मित्र दहावा ग्रेगरी हा पोप म्हणून निवडला गेल्याची बातमी समजली. त्यामुळे ते परत रोमला आले. १२७१ मध्ये पोपचा निरोप घेऊन ते निघाले. पोपने मिशन-यांची पुरेशी व्यवस्था केली नाही. त्यांच्याबरोबर अवघे दोनच मिशनरी आर्मेनियाच्या सरहद्दीपर्यंत आले. पुढे प्रवास करायची त्यांची हिम्मत झाली नाही. आयाश येथून इराणच्या आखातावरील हॉर्मझ या बंदरात आले. तेथून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी रेशीम मार्गाने जावयाचे ठरविले.

 

इराणचे दुष्कर असे वाळवंट ओलांडून ते अफगाणिस्तानातील बाल्ख शहरी आले. येथून ते ऑक्ससमार्गे वाखान येथे आले. नंतर पामीर पठार ओलांडून ते थंड वाळवंट काश्गर, यार्कंद, खोतानमार्गे लॉप नॉर सरोवराच्या किनाऱ्याशी आले. नंतर पुढे पुन्हा गोबीचे वाळवंट  लागले. ते पार करून १२७५ मध्ये ते चीनमधील शांगडू शहरी दाखल झाले.

 

मार्कोने चीनमध्ये मंगोल भाषेचा अभ्यास केला. मार्कोची हुषारी, विशेषत: त्याचे भाषाप्रभुत्व, बहुश्रुतता आणि नम्रता या गुणांनी कूब्लाईखान खूष झाला. १२७७ मध्ये खानाने मार्कोची नागरी सेवेत नेमणूक केली. अंगच्या गुणांमुळे थोड्याच अवधीत कूब्लाईखानाच्या तो खास मर्जीतील समजला जाऊ लागला. त्याला खानाने अनेक देशांत आपला राजकीय प्रतिनिधी म्हणूनही पाठवले. त्याने तिबेट, ब्रह्मदेश, कोचीन, श्रीलंका, ईस्ट इंडीज बेटे, भारत इ. भागांना भेटी दिल्या. त्याच्या प्रवासवर्णनात उत्तर भारत वगळता कन्याकुमारी, भारताचा प. किनारा, रामेश्वर ते अंदमान-निकोबारपर्यंतच्या प्रदेशाचे सखोल विवेचन आलेले आहे. एका परकीयाच्या नजरेतून तेराव्या शतकातील भारत पाहणे एक मनोद्न्य अशी बाब आहे.

 

सतरा वर्षे चीनमध्ये काढल्यानंतर पोलोंना मायदेशाची ओढ लागली परंतु कूब्लाईखान त्यांना सोडण्यास राजी नव्हता पण त्याच सुमारास तशी एक संधी चालून आली. इराणचा प्रदेश कूब्लाईखानाच्या भावाचा नातू ऑर्गून याच्याकडे होता. त्याची मंगोल वंशातील पत्नी मरण पावली. त्याला दुसरा विवाह करायचा होता पण आपली दुसरी पत्नीही त्याच वंशातील करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने आपल्या दूतास खानाकडे पाठविले. तेव्हा कूब्लाईखानाने कोकचीनया राजकन्येस इराणला पाठविण्याचे ठरविले. या कामगिरीवर जाण्यास पोलोंखेरीज इतर कोणीही माहितगार व्यक्ती नव्हती. त्यामुळे कूब्लाईखानाने पोलोंना मायदेशी जाण्याचे परवानगी दिली व आपलीही कामगिरी पार पाडायला सांगितले. पोलोंबरोबर त्याने फ्रान्स, स्पेन येथील राजांना आणि पोपला मैत्रीपूर्ण संदेशही पाठविले.

 

मग मार्को पोलो आपला पिता, चुलता, राजकन्या कोकचिन आणि प्रशियाचे दूत यांच्यासह १२९२ मध्ये चिंगज्यांग (झैतून) बंदरातून निघाला. वाईट हवामानास तोंड देत मलॅका सामुद्रधुनीतून निकोबार बेटे, श्रीलंका, भारत या मार्गाने अडीच वर्षांनी ते इराणला पोहोचले. प्रवासकाळात त्यांच्याबरोबर असलेले प्रशियाचे दोन दूत मरण पावले. त्याच काळात त्यांना कूब्लाईखानाच्या मृत्यूची वार्ता समजली. ज्याच्यासाठी भावी वधू म्हणून  कोकचिनला घेऊन चालले होते  त्या ऑर्गूनचाही त्याच सुमारास मृत्यू झाला. शेवटी तोड म्हणून कोकचीनचे लग्न ऑर्गूनच्या मुलाशी लावण्यात आले.

१२९५ मध्ये परतल्यावरही मार्को अनेक राजकीय कामगि-यांत व्यस्त होताच. १२९८ मध्येच व्हेनिस आणि जिनेव्हामध्ये युद्ध पेटले. या युद्धात मार्कोने भाग घेतला. या युद्धात मार्कोला युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन जिनेव्हातील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याच्याबरोबर पीसा येथील रुस्टीचेल्लो नावाचा एक लेखकही बंदी होता. मार्कोने त्याला आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला. त्याने या वृत्तांतावर आधारित द बुक ऑफ मार्को पोलो हे पुस्तक तुरुंगातून सुटल्यानंतर तयार केले. थोड्याच कालावधीतच सर्व यूरोपभर या पुस्तकाची प्रसिद्धी झाली.

युरोपियन जगताला तेंव्हा सुदूर पूर्वेकडील जगाबद्दल विशेष ज्ञान नव्हते. या पुस्तकात मार्कोने पाहिलेले देश, तेथील लोक व समाजजीवन, पशुपक्षी इत्यादींची वर्णने आहेत. त्याने लिहिलेली आशियाई देशांची वर्णने यूरोपात विशेष लोकप्रिय ठरली. ख्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे मार्को पोलोच्या पुस्तकाची एक लॅटिन आवृत्ती होती. नवे जग शोधण्यासाठी मार्को पोलोची मदत होईल यावर त्याचा विश्वास होता. व्हेनिस येथे मार्को पोलोचे निधन झाले. एक साहसी प्रवाशी म्हणून मार्कोची जगाच्या इतिहासात नोंद झाली.

 

-संजय सोनवणी

 

Saturday, December 10, 2022

जागतिकीकरण आणि आपण

  

 



आधुनिक काळात जागतिकीकरण हा परवलीचा शब्द बनलेला आहे. यामुळे जग हे एक ग्लोबल खेडे बनले आहे असे सातत्याने म्हटले जाते. जागतिकीकरणाचे भले-बुरे परिणामही नेहमी चर्चेत असतात. जागतिकीकरणामुळे स्थानिक संस्कृती प्रदूषित होत आहेत असेही प्रचार केले जातात. पण जागतिकीकरण नवीन नाही हे मात्र लक्षात घेतले जात नाही. पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुष्कीच्या मार्गाने व नंतर सागरी मार्गानेही सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन रेशमी/सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, चीन अशा वेगवेगळ्या जात व तिकडुन सोने, रेशीम, घोडे, ते मद्यादि अगणित वस्तु भारतात येत असत. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. किंबहुना परस्पर संपर्कामुळे तसे होणे अपरिहार्यच होते. यात धार्मिक संकल्पनांचीही उधार-उसनवारी होती. उदा. सूर्य पुजा ही भारतियांनी पश्चिम आशियातुन मगी लोकांकडुन घेतली. पारशी, बौद्ध, इस्लाम इत्यादी धर्म युरेशियासहित आफ्रिकाभर पसरले ते या व्यापारी मार्गांवरून सुलभ झालेल्या दळणवळनातून. अगदी येशू ख्रिस्तही व्यापारी तांड्यांसोबत भारतात आला होता असे वीरचंद गांधींसारखे विद्वान म्हणतात. बौद्ध भिक्षुंनी व्यापारी मार्गांवर तांड्यांसोबत जातच मध्य आशिया ते चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरवला. वैद्न्यानिक संकल्पना, मुलभूत औषधी व खगोल विज्ञान ते अनेक शास्त्रीय संकल्पना सर्वत्र पसरायला सहाय्य मिळाले ते या व्यापारी मार्गांचेच. वनस्पती-प्राणी ते वस्त्र-प्रावरणाच्या शैलीही यामुळे पसरल्या. स्थानिक शिल्पकला, वास्तुकला यावरही मोठा प्रभाव पडला.

हे येथेच थांबले नाही. संपर्कामुळे व अपरिहार्य गरजेपोटी परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. सैनिकी हालचालींनाही व्यापारी मार्गांनी साथ दिली. अलेक्झांडरचे भारतापर्यंत आलेले आक्रमण असो कि चंगेझखानाचे संपूर्ण आशीयावरचे आक्रमण, तेही या मार्गांनीच झाले. खरे तर व्यापारी मार्ग हे जागतिक इतिहासाचे सक्रीय साक्षीदार राहिलेले आहेत.

जगभर अनेक संस्कृत्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी झाल्या. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला. ही सांस्कृतिक सरमिसळ सातत्याने होत राहिलेली आहे. यालाच आपण जागतिकीकरण म्हणतो.

 म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि जौद्योगिकरणापुर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे अठराव्या शतकानंतर तो वाढला. संगणक व माहितीजालाच्या क्रांतीनंतर तर तो वेग एवढा वाढला आहे कि एखाद्याला भोवळच यावी. जागतीकीकरण हे मानवी विकासात जसे सहायक झालेले आहे तसेच ते कधी कधी संस्कृतीप्रवाहाला रोखणारेही झालेले आहे. असे असले तरी जागतिकीकरणाचे महत्व कमी होत नाही. ते मानवी जगाला नवीनही नाही. जोवर मानवात आर्थिक आणि राजकीय/धार्मिक प्रेरणा जिवंत आहेत तोवर मनुष्य नवनव्या बाजारपेठा शोधतच राहणार व त्यात विक्रेय अशा वस्तूंचे उत्पादन (व सेवाही) निर्माण करताच राहणार. मानवाचा हाच इतिहास राहिलेला आहे आणि आज काही नवे होत आहे असे नाही याचेही आपल्याला भान असले पाहिजे. राजवट कोणाची आहे त्यावर व्यापार वाढतो किंवा थांबतो असे साधारणपणे मानले जाते. व्यत्ययाचे असे क्षण येत असले तरी लोक नव्या व्यवस्थांशीही जुळवून घेतात ते केवळ गरजेपोटी.

आपला वायव्य प्रांत प्राचीन काळापासून विविध सत्तांच्या तडाख्यातून गेला आहे. तरीही तेथे तक्षशिलेसारखी रेशीम मार्गावरची महत्वाची व्यापार केंद्रे होतीच. तक्षशिला आज आपल्याला माहित असते ती तेथील प्राचीन विद्यापीठामुळे. पण या विद्यापीठाला दान देणारे बव्हंशी मार्गावरून व्यापार करणा-या व्यापारी श्रेण्या असत. त्या काळात नाणी पाडण्याचे अधिकारही श्रेण्यांना असत असे देशभरात सापडलेल्या नाण्यांवरून लक्षात येते. तक्षशिलेच्या गांधार प्रांतात श्रेण्यांना गांधारी प्राकृतात नेगम अथवा नेकम असे म्हणत असत. या नाण्यांवरील छाप खरोस्टी लिपीतील आहेत.  नंतर मात्र शक, ब्यक्ट्रियन अशी तत्कालीन परकीय सत्तांनी पाडलेली नाणी दिसतात. याचा अर्थ वायव्य प्रांत परकीय अमलाखाली गेलेला होता. पण व्यापार थांबला असे मात्र दिसत नाही. तक्षशिला काबुल-कंदाहार पासून बाल्खपर्यंत येथून जसा व्यापार केला जाई तसाच गिलगिटच्या दिशेने मिंटाका मार्गाने मध्य आशियाशी व्यापार होत असे. त्यामुळेच ते या मार्गांवरील महत्वाचे केंद्र होते आणि त्यामुळेच ते भरभराटीला आलेले होते हे आजही तेथे सापडलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. सहाव्या शतकात मात्र हुणांच्या आक्रमणात हे शहर व तक्षशिलेच्या विद्यापीठासहित पूर्ण उध्वस्त करण्यात आले. तरीही व्यापारी गप्प बसले नाहीत. त्यांनी पुरुषपूर (सध्याचे पेशावर) हे व्यापाराचे केंद्र बनवले व व्यापार पुन्हा भरभराटीला आणला. थोडक्यात आपत्ती व्यापाराला आणि म्हणून जागतिकीकरणाला थांबवू शकत नाही. किंबहुना मानवी दुर्दम्य आकांक्षा त्याला सर्व आपत्तींवर मात करायला शिकवत असतात.

सध्या चीन पुरातन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करत आहे. भारताशी त्याचे झालेले सारे संघर्ष हे केवळ पुरातन व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झाले व होत आहेत हे सहज लक्षात येते. भारतही मध्य आशियाशी खुश्कीच्या मार्गाने कसे व्यापारी संबंध वाढवता येतील या प्रयत्नात आहे. पूर्वेशी जोडले जाण्यासाठी स्टिलवेल मार्ग बांधायचा प्रयत्नही त्यासाठीच आहे परंतु त्यात दुर्दैवाने अद्याप यश आलेले नाही. असे असले तरी चीनला जोडणा-या चौदा हजार फुट उंचीवरील नथू-ला खिंडीसाठी १९६७ साली झालेल्या लढ्यात भारतीय सैन्याने ही खिंड राखली. आता ही खिंड चीनशी व्यापारासाठी काही प्रमाणात खुली आहे.

खरे तर जागतिकीकरण हे एकतर्फी असू शकत नाही. ते तसे असणे हा जागतीकीकरण या शब्दाचा अवमान आहे. पण भारताच्या दृष्टीने पाहिले तर सध्याचे जागतिकीकरण ब-याच अंशी एकतर्फी आहे असे आपल्या लक्षात येईल. प्राचीन व्यापार हा दुहेरी होता. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ होती. आयातही त्यामुळे परवडणारी व भारताच्या श्रीमंतीत भर घालणारी होती. त्याच बरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानही स्वेच्छेचा मामला होता. आता तशी स्थिती राहिली आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही.

आता व्यापारी मार्गांवरच अवलंबून राहिले पाहिजे अशी स्थिती नाही. त्यामुळे भौगोलिक कारणांमुळे आशियाशी आपण सरळ जोडले जावू शकत नाही. हे वास्तव मान्य करूनही आपण उत्पादन व व्यापार वाढवू शकतो. त्यासाठी भारतीय लोकांना आपले प्राचीन काळी अस्तित्वात असलेली, जिवंत असलेली विजीगिषु, उत्पादक आणि व्यापारी वृत्ती जागृत करावी लागेल. नोक-यांची मानसिकता सोडून उत्पादक मानसिकता जोपासावी लागेल. तरच जागतिकीकरण ख-या अर्थाने भारताला देणा-यांच्या बाजूचेही बनवेल. अन्यथा आज आपली अवस्था केवळ घेणा-यांच्या बाजूची आहे तशीच राहील. ज्ञानात असो, संस्कृतीत असो कि उत्पादकतेत असो, आमचे आज जगाला भरीव योगदान काय हा प्रश्न आजच्या नव्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आम्हाला पडला पाहिजे. पण आम्ही वृथाभिमानाच्या वांझ गप्पा करत वर्तमान व भविष्य खराब करत राहण्यात जोवर धन्यता मानत राहू तोवर जागतिकीकरणात ख-या अर्थाने आपले स्थान निर्माण करू शकणार नाही हेही तेवढेच खरे!

-संजय सोनवणी

Friday, November 25, 2022

घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!

 घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!

 


व्यापारी मार्गावरून बहुमूल्य आणि जीवनोपयोगी वस्तूंचा जसा व्यापार केला जात असे तसाच प्राण्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर होई. प्राचीन काळात सर्वप्रथम ज्या प्राण्याचा व्यापार सुरु झाला तो प्राणी म्हणजे घोडा. खरे तर या प्राण्याच्या उत्पत्तीचा इतिहास किमान पाच कोटी वर्ष मागे जातो. त्याच्यात विविध भागात क्रमविकास झाला तशाच अनेक जातींचे घोडेही नामशेष झाले. मानवाच्या रानटी अवस्थेत घोडे भक्ष्य म्हणून मारले जात असत. अजूनही दुष्काळात काही देशांत ते खाण्यात येतात. घोड्याच्या कातड्यापासून तंबू, पेहेरावाचे कपडे, सरंजाम इ. करीत असत. पण पुढे घोड्याचे अन्यही उपयोग लक्षात आले. वेगवान सवारी, मालवाहतुक, रथासारख्या वाहनांना वेगाने ओढून नेणे आणि त्याचा युद्धातील उपयोग यामुळे हा प्राणी सर्वत्र लोकप्रिय झाला असला तरी त्याला माणसाळवले गेले ते मात्र खूप उशीरा. तेही मध्य आशियात. कुत्रा, उंट व गाय मात्र त्याच्या खूप पूर्वीच मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती.

मध्य आशियात स्टेपेसारख्या विशाल गवताळ प्रदेशामुळे तेथे जंगली घोड्यांचे अस्तीत्व पुरातन काळापासून होते. मध्य आशियातील भटक्या पशुपालक टोळ्यांनी त्याला  प्रथम माणसाळवले असे उपलब्ध पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. घोडा हा लवकरच भटक्या पशुपालकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. इतका कि अश्वांसहितची अनेक मानवी दफने मध्य आशियात मिळून आलेली आहेत. त्याला धर्म व खाद्य जीवनातही तितकेच महत्वाचे स्थान मिळाले. मध्य आशियातील अनुकूल हवामानामुळे व चा-याच्या उपलब्धतेमुळे घोड्यांची संख्याही अवाढव्य होती. मध्य आशियातून व्यापारी मार्गावरून व्यापार करणा-या अन्य प्रदेशातील व्यापा-यांच्याही लक्षात त्यांचे महत्व आले आणि त्यांनी घोड्यांचा वाहतुकीसाठी जसा वापर सुरु केला रसा मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यापारही सुरु केला. विविध भागात घोड्यांच्या पैदाशीही सुरु झाल्या. मानवाच्या उन्नतीशी त्याने लवकरच नाते जुळवले. इसवी सनपूर्व १५०० पर्यंत घोडे पार सुमेरपर्यंत पोचल्याचे उल्लेख मिळतात. इतकेच काय सनपूर्व १४०० मध्ये किक्कुली नावाच्या मित्तानी येथील एका प्रशिक्षकाने घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी एक पुस्तिकाच लिहिली.   

भारतात मोठ्या प्रमाणावर घोड्यांची पैदास करण्यासाठी उपयुक्त हवामान नसल्याने घोडे नेहमी आयात केले जात. स्थानिक प्रजातीही पुढे विकसित झाल्या असल्या तरी खोरासान, मर्व व बुखारा येथून अफगाण व्यापा-यांकरवी आयात केलेले घोडे हाच भारतीय सैन्य दळांचा मुख्य स्त्रोत राहिला.

भारतात घोड्यांचा प्रवेश मध्य आशियातून अफगाणिस्तान मार्गे आलेल्या आर्य म्हणवून घेणा-या लोकांमुळे झाला असे साधारणपणे मानण्यात येते. ही घटना इसपू बाराशे ते इसपू एक हजारच्या दरम्यानची आहे. भारतीयांना अश्वाचा परिचय झाला तो असा. तत्पूर्वीच्या सिंधू संस्कृती काळात भारतात घोड्याचे अस्तित्व सापडून येत नाही. सिंधू संस्कृतीचे लोक जरी मध्य आशिया ते सुदूर मेसोपोटेमिया पर्यंत व्यापार करत असले व त्यांना अश्व माहित असला तरी भारतात तत्कालीन स्थितीत घोड्यांची पैदास करण्यात सिंधू संस्कृतीच्या लोकांनी रस घेतला नाही. पण वैदिक लोक हे मुळचे मध्य आशियातील असल्याने त्यांचे जीवन घोड्याभोवती फिरताना दिसते. अश्वांना उद्देशून ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. एवढेच काय “अश्वमेध” यद्न्याच्या रूपाने त्यांनी त्याला आपल्या धार्मिक व खाद्य जीवनातही सामाविष्ट करून घेतले. वैदिक आर्य युद्ध प्रसंगी घोडे जुंपलेला रथ वापरीत.  अश्वारोही व घोडदौडीला ऋग्वेदात ‘आजी’ हा शब्द वापरला आहे. वैदिक लोक वायव्य भारतात प्रथम स्थायिक झाल्याने त्या भागातील  भारताच्या वायव्य सरहद्दीवरील कांभोज, केकय, गांधार, आरह सिंधुदेश, पारसीक या भागात घोड्यांची पैदास सुरु झाली व तेथील घोडे उत्तम प्रतीचे मानले जात असत. कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात या प्रदेशातील घोड्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. स्वात खो-यातील दफनांच्या जनुकीय विश्लेषणातून त्या लोकांचे मध्य आशियाशी असलेले मुळचे जैविक नाते स्पष्ट झालेले आहे.

पुढील काळात हत्तीदलाएवढेच महत्व अश्वदलाला आले. तरीही भारतातील घोड्याची गरज आयातीद्वारेच भागवावी लागे. किंबहुना युरोपात व आफ्रीकेतही घोड्यांचा प्रसार झाला तो पुरातन मार्गांवरील व्यापारामुळेच. मध्य आशिया हा भारताचा प्रमुख अश्व-पुरवठादार बनला. व्यापा-यांचा त्यात लाभच होता. ते अश्वांच्या मोबदल्यात येथून विविध प्रकारची वस्त्रे पुढील व्यापारासाठी घेऊन जात असत. अफगाणिस्तानातील अश्व-व्यापारी बुखारा येथून घोडे घेऊन येत असत. बुखारा हे रेशीम मार्गावरील अत्यंत महत्वाचे व्यापारी शहर तर होतेच पण घोड्यांच्या उत्पत्तीस्थानाला लागुनच असल्याने घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणे सोपे जात असे. येथे चीन ते युरोपपर्यंतचे व्यापारी घोडे खरेदी करत असत. या सर्व काळात सातत्याने युद्धे होत असल्याने घोड्यांची गरजही सर्वत्र मोठ्या प्रमाणात भासत असल्याने घोड्यांचा व्यापारही तेजीत असे. घोड्यांबरोबरच उंट, खेचरे, अशा ओझेवाहू प्राण्यांचाही व्यापार केला जात असे.

तेराव्या शतकात घोड्यांच्या व्यापारात पूर्व इराणमधील खोरासान प्रांतातील भटके लोकही सहभागी झाले. या भागातही घोड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असे. चेंगीझखानाच्या हल्ल्यांमुळे व्यापारावर अवकळा आली असली तरी इराणमधील इल्खानीद घराण्याने रेशीम मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग बांधला. खोरासानमधून काश्गरपासून येणारा व पुढे थेट इस्तंबूलपर्यंत जाणारा थेट रेशीम मार्ग होता. येथूनच बुखारा, हेरात, काबुल, कंदाहार मार्गे थेट दिल्लीपर्यंत जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग होताच. हेरात हेही घोड्यांच्या पैदासीचे केंद्र म्हणून तोवर उदयाला आलेले होते. किंबहुना घोडे-बाजार हा बरकत देणारा महत्वाचा व्यापार बनला होता. वायव्य व उत्तर भारतात अफगाणी घोडेव्यापारी घोड्यांचे मोठे बाजार भरवत असत अशा नोंदी मिळतात. अरबी घोड्यांचे महत्वही याच काळात वाढत गेले. गझनी व खिलजी घराण्यांनी या व्यापारावर पूर्ण नियंत्रण आणून आपला आर्थिक स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न केला. इस्लामी सत्ता भारतात कायम झाल्यानंतर खोरासान हेच घोड्यांचे मुख्य पुरवठादार बनले. अल्लाउद्दिन खिलजीने तर घोडे व्यापा-यांसाठी विशेष हुकुमनामा जारी केला होता. त्याच्या आदेशानुसार सर्व स्थानिक व बाहेरून येणा-या व्यापा-यांचे नाव-पत्ते नोंदवणे सक्तीचे तर केलेच पण घोड्याचा दर्जा व किमती ठरवण्याचा अधिकारही शाही चाकरांकडे गेला. यात जोही कोणी नियमभंग करेल त्याला शिक्षांचीही तरतूद केली. यावरून घोड्यांचा व्यापार किती मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि त्यात लबाडीही कशी घुसली असेल याची कल्पना येते. सैन्यदले, खाजगी रक्षक आणि सामान्य नागरिकांची मागणीही किती मोठ्या प्रमाणात वाढली असेल हेही लक्षात येते.

घोडे हे मोगल सैन्याचे बलस्थान होते. घोड्यांमुळेच मोगल सत्ता विस्तारली असे काही इतिहासकार मानतात. त्यामुळे मुघलांनी अश्वबाजाराला प्राथमिकता तर दिलीच पण घोड्यांच्या पैदाशीकडेही लक्ष पुरवले. खुश्कीच्या मार्गासोबतच सुरत, खंबायतसारख्या बंदरावरूनही घोडे भरलेली जहाजे येत असत. घोड्यांचे महत्व एवढे वाढले कि भारतातील परंपरागत हत्तीदल पार मागे फेकले गेले.

युद्ध ही व्यापारासाठी एक महत्वाची संधी असते हे विधान घोड्यांचा जो व्यापार होत राहिला त्यावरून खरे वाटते. भारतात आधी घोडा आला तोच “वैदिक” आर्यांमुळे. व्यापारी मार्गांवरून जी मानवी स्थलांतरेही झाली त्यातील नोंदले गेलेले हे पहिले स्थलांतर. पुढेही मध्य आशियातून शक, हूण, कुशाण व मोगलांची आक्रमणे झाली. या आक्रमणामध्ये घोड्यानी मोठी भूमिका अदा केल्याचे आपल्याला दिसते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी घोडे हे व्यापाराचे आणि युद्धांचेही महत्वाचे साधन राहिलेले आहे.

 

-संजय सोनवणी

Friday, November 11, 2022

समरकंद: व्यापारी मार्गावरील पुरातन शहर!

 


मध्य आशियात रेशीम मार्गावर असल्याने भरभराटीला आलेली अनेक प्राचीन शहरे आहेत. सध्या उझबेकीस्थानात असलेले समरकंद हे शहर त्यातीलच एक. व्यापाराचे मुख्य केंद्र बनल्याने ते अत्यंत भरभराटीला आलेले होते. इसवी सनपूर्व सातव्या शतकापासून सलग रीत्या मानवी वसाहत राहिलेलेही हे मध्य आशियातील एकमेव नगर. हे शहर व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होतेच पण येथे अनेक वस्तूंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असून त्या पूर्वेला चीन ते पश्चिमेला युरोपपर्यंत वितरीत होत. या नगराला प्राचीन काळापासून असंख्य परकीय हल्लेही सोसावे लागले. तेराव्या शतकातील चेंगीझखानाने तर हे नगर पूर्ण उध्वस्त करून टाकले होते. त्यामुळे येथील ऐतिहासिक वास्तुरचनेचे महत्वाचे नमुने अवशेषग्रस्तही झाले होते. पण तरीही हे शहर लवकरच राखेतून भरारी घेत उभे झाले आणि प्रतिष्ठेच्या जुन्या शिखरावर पोहोचवले.

मध्य आशिया तसा प्राचीन काळापासून भटक्या टोळ्यांनी व्यापलेला विस्तीर्ण प्रदेश. कोठे स्थायिक होणे येथील जमातींच्या रक्तातच नव्हते. पण जसा मध्य आशियातून व्यापारी मार्गाने युरोप आणि चीनमधील विस्तेर्ण प्रदेशात व्यापार सुरु झाला तसे काही लोक बदलत्या काळाची चाहूल घेत स्थिर झाले. आपापली कौशल्ये वापरत व्यापार आणि उत्पादनात पडू लागले. ताजिकी जमातीचे लोक येथील स्थानिक लोक असले तरी समरकंद शहर सांस्कृतिक समन्वयाचे आणि वैचारिक घुसळनीचेही महत्वाचे केंद्र बनले. येथे मिळालेल्या लिखित व पुरातत्वीय पुराव्यांनुसार तिथे हिंदू, बौद्ध, मुस्लीम, पारशी, ज्यू, ख्रिस्ती इत्यादी अनेक धर्म तेथे एकत्र सुखनैव नांदत होते. तेथे मिळालेल्या भित्तीचित्रावर हिंदू पुराणकथांचा मोठा प्रभाव आहे. तेथे मिळालेली म्युरल्स आणि अन्य वस्तूंवरून तत्कालीन समाजजीवनाचेही दर्शन घडते. विवाहाच्या मिरवणुकी कशा असत, राजदूत कशा भेटी अर्पण करत, राजनैतिक समारंभ कसे होत, चीनी राजकन्येला नौकेतून कसे नेले जाई इत्यादी सामाजिक/राजकीय घटनांचे चित्रण या मध्ययुगीन म्युरल्समध्ये आढळते. त्यावरून येथील समाज हा बहुढंगी संस्कृतींचे कसे मिश्रण होता याचा आपल्याला अंदाज येतो. ठीकठीकानचे व्यापारी तेथे येत असल्याने हे सांस्कृतिक संमिलन होणेही तेवढेच स्वाभाविक होते. अर्थात वैभावाहे माहेरघर असल्याने अनु सत्ताधा-यांचेही ते लक्ष्य बनले हेही तेवढेच खरे.

समरकंद हे कालौघात अनेक सत्तांच्या अंमलाखाली होते. प्रारंभ काळी हे शहर एकीमेनीद या पर्शियन साम्राज्याचा भाग होते. सोग्दियान संस्कृतीचा भाग असलेल्या या महत्वाच्या शहरावर अलेक्झांडरने सनपूर्व ३२९ मध्ये हल्ला केला आणि आपल्या सत्तेखाली आणले. अलेक्झांडरच्या हल्ल्यात या शहराला मोठी क्षती पोचली असली तरी झपाट्याने हे शहर सावरले. पण आता या शहरावर ग्रीक शैलीचा अपरिहार्यपणे प्रभाव पडला. स्थानिक उत्पादकांच्या उत्पादन शैलीतही लक्षणीय फरक पडला. मध्य आशियाला ग्रीक शैली माहित झाली ती या आक्रमणामुळे असे मानले जाते. भारतातील वायव्य प्रांतामध्येहे त्याचे आक्रमण झालेले असल्याने तिकडेही हे शैली प्रचारात आली. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर काही काळ त्याने नेमलेल्या छत्रपांनी राज्य केले खरे पण नंतर आली कुशाणांची सत्ता. पण याही सत्तेचा इसवी सनाच्या तिस-या शतकात अस्त झाल्यावर दोनेक शतके हे शहर तर राहिले पण त्याचे वैभव हरपले. मध्य आशियातील भटकी जमात श्वेत हुणांच्या आक्रमणाने स्थिती अजून बिकट केली खरी पण संरक्षणासाठी समरकंद भोवती चार पदरी दगडी तटबंदी उभारायलाही सुरुवात झाली. नगरात प्रवेश करायला फक्त चार दरवाजे ठेवण्यात आले. व्यापारी अजूनही जीवावरचे धोके पत्करत, प्रसंगी आक्रमकांना खंडण्या देत का होईना पण व्यापार करतच राहिले.

आठव्या शतकात काश्मीरचा सम्राट ललितादित्याने हे नगर अरबांच्या अधिपत्याखालून सोडवले आणि व्यापार मुक्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे फार काळ त्याच्या सत्तेखाली राहिले नाही. चीन-अरबांची युद्धे सुरु झाली आणि व्यापारी मार्गावर स्वामित्व कोणाचे याचा निर्णय युद्धातूनच घ्यायची पुन्हा सुरुवात झाली. पण या शहराच्या अस्तित्वाला सर्वात मोठा धक्का बसला तो चेंगीझखानाच्या स्वारीचा. त्याच्या अंमलदारांनी येथे प्रचंड लुट केली आणि सैन्याचे पगार भागवले. येथले किमान तीस हजार उद्यमी गुलाम केले. पण सन १२२७मध्ये या जगज्जेत्या पण क्रूरकर्म्याचा मृत्यू झाला. आशिया खान्दावाराचेच संकट तात्पुरते का होईना निवळले. समरकंदने पुन्हा भरारी घेतली. तेराव्या शतकाच्या उत्तरकाळात जगप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलोने या शहराला भेट दिली होती. त्याने “भव्य व सुंदर शहर” असे या शहराचे वर्णन केले. चौदाव्या शतकात येथे आलेल्या इब्न बतुतानेही “जगातील उत्कृष्ठ शहर. पानचक्क्यांनी या शहरातील उद्यानांना कसे पाणी पुरवले जात असे याचेही वर्णन त्याने करून ठेवले आहे. थोडक्यात विध्वन्सामागून पुन्हा नव्याने उभे राहण्याची मानवी चिवट प्रवृत्ती येथेही जिवंत दिसते ती मुख्यता: आर्थिक प्रेरणांतून!

इसवी सन १३७० मध्ये बंद करून सत्तेवर आलेल्या तैमुरलंगने मात्र हे शहर आपली राजधानी बनवले. पुढच्या ३५ वर्षांच्या काळात त्याने समरकंद शहराची अविरत नवी बांधकामे व पुनर्रचना करून त्याचे वैभव वाढवले. स्थानिक अर्थव्यावास्थाहे त्यामुळे सुधारली. शत्रूशी क्रूर असलेला तैमुरलंग मात्र कलाकार, कास्तकार आणि वास्तुरचनाकारांबद्दल तसेच व्यापा-यांबद्दल उदार होता. आपापली कौशल्ये वाढवावीत यासाठी तो उत्तेजन देत असे कारण व्यापार व उत्पादनातून येणारे वैभव त्याला अर्थात मोह घालत होते.  त्याने व्यापाराला उत्तेजन देत अनेक सवलतीही बहाल केल्या. रस्त्यांच्या दुरुस्त्या केल्या. व्यापारी जेथे थांबे घेत तेथे तेथे त्याने सराया बांधल्या. देशोदेशीच्या विद्वानांनाही तेथे निमंत्रण देत समरकंद ज्ञान-विद्न्यानाचेही केंद्र कसे होईल हे आवर्जून पाहिले.

सन १५०० मध्ये बुखारा येथे खानात स्थापन करणा-या उझबेकी मुहम्मद शायबानी खान याने समरकंद जिंकून घेतले आणि बुखा-याच्या स्वामित्वाखाली आणले. बुखारा हेही महत्वाचे व्यापारी शहर असल्याने व त्याची ती राजधानी असल्याने समरकंदचे महत्व कमी होऊ लागले. अठराव्या शतकानंतर तर समरकंद जवळ जवळ ओस पडले असे म्हटले तरी चालेल. हे शहर काही काळ रशियन अम्मलाखालीही गेले होते. नंतर ते सोव्हिएत रशियाचा भाग बनले आणि त्याच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या उझबेकिस्तान देशात आले. १८८८ मध्ये रेल्वेने जेंव्हा हे शहर जोडले गेले तेंव्हाच पुन्हा एकदा या प्राचीन व्यापारी नगरात जीव भरला जावू लागला. आताही समरकंद हे रेशीम व रेशीमवस्त्राच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

व्यापारी मार्गावरच्या या पुरातन शहराचा इतिहास रोचक आहे. या शहराचे अनेकदा सत्ता जशा बदलल्या तसे उत्थान पतन होत राहिले. रानटी हल्ले हे नेहमीच सुव्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला मारक असतात. अडीच हजार वर्षांचा सलग इतिहास या शहराला आहे कारण व्यापारी मार्ग नेहमीच साहसी व्यापा-यांनी भरलेला असे. व्यापाराकडे पाहायची उदार दृष्टी ज्या सत्ताधा-यांकडे असते त्यांच्याच काळात अर्थव्यवस्थेला गती येते. स्थैर्य लाभते. उत्पादन व कला-कौशल्य आणि ज्ञान-विद्न्यानही नवी शिखरे गाठते. समरकंद जेंव्हाही असे उदार दृष्टिकोनाचे सत्ताधारे होते तेंव्हा तेंव्हा या सर्वच क्षेत्रात आघाडी घेताना दिसते. तसा मध्य आशीया हा शेतीसाठी फारसा उपयुक्त नव्हता. पशुपालन करणा-या आपापसात अविरत  झगडना-या टोळ्यांचा हा प्रदेश. पण साहसी व्यापारी या भागातून प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशातून जेंव्हापासून व्यापारासाठी सुदूर मार्गक्रमण करू लागले तसे तसे स्थानिक लोकही आपले दृष्टीकोन बदलू लागले. त्यांनीही विविध संस्कृत्यापासून शिकत आपली संस्कृती बदलवली, वैशिष्ट्यपूर्ण केली. जागतिक व्यापाराचे हे मोठे योगदान आहे!

 

-संजय सोनवणी

  


Friday, October 28, 2022

रेशीम मार्ग: रोगांच्या साथी आणि विज्ञानाचाही प्रसार



प्राचीन व्यापारी मार्गांनी दूरच्या संस्कृतींना नुसते जोडले नाही तर परस्परावलंबी बनवण्याताही मोठा हातभार लावला. एका ठिकाणच्या माहित नसलेल्या वस्तू, शोध, संकल्पना दुस-या ठिकाणी पसरू लागल्या. सांस्कृतिक व सामाजिक जीवनमान त्यामुळे प्रभावित होणे स्वाभाविक होते. ही नुसती व्यापार व त्यामुळे आर्थिक समृद्धीत होणारी भरभराट नव्हती तर प्रादेशिक जाणीवा अधिक व्यापक होण्यात हातभार लावणारी घटना होती. ज्ञान, विज्ञान, पुराकथा, नवे शोध यांचा प्रसार व्यापारी संपर्कामुळे सहज शक्य झाला. राजा-महाराजा अथवा धर्म-संस्थापकांनी संस्कृती पसरवण्यात जेवढा हातभार लावला नसेल तेवढा हातभार व्यापा-यांनी लावला असे म्हणावे लागते ते केवळ त्यामुळेच! आर्थिक प्रेरणा या नेहमीच जगण्याच्या अन्य प्रेरणांवर मात करत असतात आणि जगभर ते घडल्याने आजचे आधुनिक जग अस्तित्वात आले आहे.

व्यापारी मार्गांमुळे एरवी अपरिचित वृक्ष, फुलझाडे, खाद्य वनस्पती व पिकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला. उदाहणार्थ भाताची उत्पत्ती प्रथम दक्षिण भारतात होऊन, खाद्यान्न म्हणून वापरात येऊन ते पुढे उत्तर भारतमार्गे आधी पश्चिमेकडे इराण व पूर्वेकडे चीनमध्ये पसरले ते केवळ व्यापारी संपर्कामुळे. आज भात हे जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. मुळचा अमेरिकेतील पेरू देशातील बटाटा भारतात आला तो पोर्तुगीज व्यापा-यांच्या माध्यमातून. अशी फार मोठी खाद्यान्नांचीही देवघेव झालेली आहे. रेशीम भारतातून चीनमध्ये गेले कि चीनमधून भारतात आले हा वाद असला तरी मुळात रेशमाने चीनला आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवण्यात मोठा वाटा उचलला. युरोप-इजिप्तपर्यंत रेशमी वस्त्रे वापरणे ही फ्याशन बनली. तसेच अलंकारांचेही झाले. वनस्पतीविस्तार  कधी जाणीवपूर्वक घडला तर कधी माल वाहतुकीसाठी जे पशु वापरले जात त्यांच्या माध्यामातुनही असे प्रसार घडले. सुदूर पश्चिम ते पूर्वेकडील चीनपर्यंतचे जग कवेत घेणा-या रेशीम मार्ग म्हणून ख्याती मिळवलेले सारेच व्यापारी मार्ग हे जगाची जीवनवाहिनी बनले.

 पण रेशीम मार्ग हे फक्त समृद्धीचे मार्ग नव्हते. या मार्गांवरून अवांछित किटाणू, सुक्ष्मजीवही प्रसार पावत राहिले. त्यातून अनेक पशु व मानवांना  होणारे आजारही पसरले.  हे आजार जेथे पसरले तेथे ते नवीनच असल्याने त्यावरचे उपायही लोकांना माहित नसत त्यामुळे मृत्यूदरातही वाढ होत असे. शेवटी औषधेही आयात करूनच अशा आजारांवर नियंत्रण आणायचे प्रयत्न होत. या सर्वात भयंकर होती ती आशियाभर पसरलेली प्लेगची साथ.  मानवी इतिहासात आजवर तीन मोठ्या प्लेगच्या साथी पसरल्याचे नोंद आहे. संपूर्ण युरेशियात सन १३४३ ते १३५१ या काळातील साथ एवढी महाभयंकर होती कि त्यात जवळपास दीड कोटी नागरिक मरण पावले. “काळा मृत्यू” या नावाने कुप्रसिद्ध ठरलेली ही साथ सर्वत्र पसरायला कारण झाले ते व्यापारी मार्ग व त्यावरूनच झालेला रोगवहन करणा-या उंदरांचा झालेला प्रसार.  

चवदाव्या शतकातील आजपेक्षा लोकसंख्या खूप कमी व विखुरलेली होती. लोक शक्यतो आरोग्यदायी जीवन जगात असत. स्थानिक साथी आटोक्यात ठेवण्याच्या उपचारपद्धती त्यांनी अनुभवातून विकसित केलेल्या होत्या. पण या प्लेगच्या अकस्मात व अपरिचित साथीने एवढ्या झपाट्याने फैलाव केला कि प्लेग म्हणजे मृत्यू हे समीकरण फिट झाले. या रोगाचे कारणच माहित नसल्याने उपचारांचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. जे थातूर-मातुर उपचार केले जात त्याचा उपयोगही होत नसे. ही साथ कधी एकदाची जाईल याची वाट पाहणे एवढेच सर्व युरोप व आशीया खंडात राहणा-या लोकांच्या हाती राहिले. पण या साथीने एक क्रांती केली व ती म्हणजे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सर्व सत्तांसाठी ऐरणीवर आला. तरीही साथी येतच राहिल्या. मग जहाजातून अथवा व्यापारी मार्गांवरून येणा-या परकी तांड्यांमधील लोकांना किमान ४० दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले. त्याशिवाय कोणालाही नगरात प्रवेश दिला जात नसे. या साथीने व्यापारावरही विपरीत परिणाम झाला. पण या मार्गांचा उपयोग वैद्यकीय शास्त्र सर्वत्र पसरन्यातही झाला. मध्य आशियातील बौद्ध मठांनी भारतीय वैद्यक शास्त्र मोठ्या जोमाने या काळात पसरवले. यामुळे प्लेगवर उपाय सापडले नसले तरी नव्या संशोधनाच्या दिशा ठरू लागल्या.

प्लेगच्या साथीनंतर व्यापारी मार्गांमुळे संपूर्ण युरेशियात पसरलेली दुसरी साथ म्हणजे देवीची साथ. देवीचा विषाणूजण्य रोग आधी कोठे जन्माला आला याचे निश्चित पुरावे उपलब्ध नसले तरी इसपूच्या तिस-या शतकात हा रोग अस्तित्वात होता याचे मात्र पुरावे मिळालेले आहेत. व्यापारामुळे या रोगाचा प्रसार व्हायला मोठा हातभार लागला. सहाव्या शतकानंतर जसा रेशीम मार्गांवर व्यापार वाढू लागला तसा हा रोग पसरण्याचे प्रमाण वाढले. आठव्या शतकापर्यंत हा रोग पार जपानमध्येही पसरला. सातव्या शतकापर्यंतच या रोगाला कोविडप्रमाणेच जागतिक साथीचे रूप लाभले. व्यापारी मार्गांनी असे काही रोग पसरवण्याचे दुष्परिणाम घडवले तसेच वैद्यकीय विज्ञान प्रगत करण्याचेही मार्ग उघडले. ही साथ ऐन भरात असताना आजच्या लशीची पूर्वज म्हणता येईल अशी प्राथमिक लस निघाली जिला “टिका” म्हणत.  ही लस भारतीयांनी विकसित केली व रेशीम मार्गावरून प्रवास करणा-या व्यापा-यानी ती जगभर नेली. मुस्लीम संशोधक व व्यापा-यांनीही अशाच पद्धतीच्या काही लसी शोधल्या पण त्या एवढ्या प्रभावी नव्हत्या. अठराव्या शतकात एडवर्ड जेन्नर यांनी पहिली शास्त्रशुद्ध लस बनवली त्याला अर्थात विज्ञानाचे ही परंपरा कारण ठरली. आज जगात देवीचा रुग्ण मिळणे दुरापास्त आहे.

व्यापारी मार्गांमुळे साथी पसरल्या तशी वैद्यकीय ज्ञानाची दालनेही उघडली. पारंपारिक वनौषधीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची सुरुवात अरबांनी मध्ययुगातच सुरुवात केली. संपूर्ण युरेशियातून प्रादेशिक ज्ञान जमा करत प्रयोग करण्याचे श्रेय त्यांना जाते. किमयागार (पा-यापासून सोने बनवणे) नावाची एक अत्यंत शोधक पण लालची असणारी मानवी प्रजातीही त्या काळात फोफावत होती. बगदाद व कैरो अशा प्रयोगांचे केंद्रस्थान बनले. हे लोण रेशीममार्गानेच सर्वत्र पसरले. किमयागार प्रत्यक्ष सोने कधीही बनवू शकले नाहीत पण औषधी व रसायनशास्त्रातले अनेक शोध त्यातूनच लागत गेले. अरबांनी ग्रीको-रोमन ते चीनी व भारतीय वनस्पती विज्ञानाला एकत्र करत औषधी शास्त्रात प्रगती केली. वनस्पती व तीचे औषधी उपयोग यावरील संशोधन वाढले. विविध औषधी वनस्पतींचा रेशीम मार्गांवरून होणारा प्रसारही त्यामुळे वाढला. रेशीम मार्गावरील बुखारा, मर्व, गुंदीशापूर, गझनी यासारखी शहरे ज्ञानाची केंद्रे बनत गेली. तत्कालीन वैद्य राझी, बहु-शाखीय विद्वान इब्न बतुता, वनौषधीतद्न्य इब्न अल-बैतर यासारख्या विद्वानानी ग्रंथ लेखनही केले. राझीचे ”औषधांवरील ग्रंथ” (किताब अल-हावी) हा तर कोशात्मक आहे. चीनी औषधीज्ञानही याच काळात युरोपपर्यंत पसरले. भारतीय वैद्यक ज्ञानही या काळात परम्परावादीच राहिले असले तरी त्याचाही उपयोग झाला. रेशीम मार्गावरील सत्ताधारी विद्वानांचा आदर करीत. त्यासाठी अशा विद्वानांना आर्थिक सहाय्यही देत. यामुळे वनस्पतीमधील औषधे घटक अलग करत त्यांना मानावे आरोग्यासाठी वापरण्याची एक रीत प्रस्थापित व्हायला मदत झाली. सर्वच विद्वानांनी आजची मानवी संस्कृती घडवन्याला व प्रगल्भ करण्याला मोठा हातभार लावला. आजचे औषधी विज्ञान हे या आशिया-युरोपभरच्या शास्त्रज्ञानी अविरत केलेल्या ज्ञानकेंद्री प्रयत्नांच्या पायावर उभे आहे. आजचे रसायन शास्त्र हे किमयागारांनी केलेल्या अगणित प्रयोगांचे व निष्कर्षांचे आधार घेताच विकसित झालेले आहे. व्यापारी मार्ग आपत्तीचे कारण जसे बनले तसेच ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचेही ते असे.

 

-संजय सोनवणी

Friday, October 14, 2022

भारताचे पूर्वेचे द्वार: आसाम


 


आसाम हे भारताचे पूर्वेचे द्वार आहे अशी प्राचीन मान्यता आहे. एके काळी कामरूप व प्राग्ज्योतीष नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश भारतातून पूर्वेकडे जाणा-या व्यापारी मार्गांच्या जाळ्याने भरलेला होता. चीन, म्त्यानामार ते पार थायलंडमधील संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ येथे पहायला मिळतो ते या व्यापारी मार्गांवरून झालेल्या सांस्कृतिक देवान-घेवाणीमुळे तसेच मानवी स्थलांतरांमुळे. येथील स्थापात्यावाराही पौर्वात्य शैलीचा प्रभाव आहे. येथून नेपाळ, तिबेट, चीन व दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांशी व्यापारी संपर्क होत होता. नैऋत्य चीनच्या भागातून अनेक रानाती टोळ्या येथे वसल्या असल्याचा उल्लेख मध्ययुगातील एका अरबी व्यापा-याने करून ठेवला आहे. आता स्मृतीन्तही धूसर झालेला दक्षिण रेशमी मार्गही शेवटी आसाममार्गेच एकीकडे पाटलीपुत्र तर दुसरीकडे ब्रह्मदेश येथे पोचत होता.  भारतातून महत्वाच्या व्यापारी शहरांशी हे मार्ग जोडलेले असल्याने हिमालयातील व पश्चिमोत्तर भारतातील मार्ग जसे आर्थिक समृद्धीचा ओघ भारतात आणत होते तसेच आसाममधून जाणारे मार्गही वैभवाचा मार्ग बनलेले होते. असे असले तरी आसाममधल्या प्राचीन मार्गांचे व्हावे तसे संशोधन अद्याप झालेले नाही हे एक कटू वास्तव आहे.

 

अर्थात प्राकृतिक उत्पातांमुळे या मार्गांवरही संकटे कोसळली होती याचे उल्लेख चीनी साधनांनी जपून ठेवलेले आहेत. मध्ययुगात या भागात वारंवार झालेल्या भूकंपांमुळे भूस्खलन होऊन अनेक रस्ते बंद पडले होते याच्या नोंदी उपलब्ध आहेत. भूकंपांमुळे पर्वतांच्या उंची कमी होणे, नद्यांचे प्रवाह बदलने अथवा पूर्णपणे अडवले जाणे यामुळे शक्यतो नद्यांच्या बाजूनेच जाणारे मार्गही नष्ट होणे शक्य आहे. तसाही हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. भूकंपाची आपत्ती आसामवर पुन:पुन्हा ओढवते. गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले१९५० चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि १८९७ चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता. दक्षिण रेशीममार्ग का विस्मरणात गेला याची कारणे या प्राकृतिक उत्पातात आहेत. असे असले तरी व्यापार मात्र थांबला नाही. साहसी व्यापा-यांनी नव्या वाटा शोधल्या व जोखीम पत्करत आपले उद्योग सुरूच ठेवले. लोकांचेही येणे जाणे सुरूच राहिले. चीनचा युनान भाग लगतच असल्याने दुर्गम भागांतूनही नवे मार्ग काढले गेले असे दिसते.

 

आसामचा इतिहासही रंजक आहे. इथे पुराश्मकालापासून मानाच्वी वस्त्या असल्याचे पुरावे मिळाले आहेत. कालिकापुराण  योगिनीतंत्र  या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतातते दानव व असुर होते असे उल्लेख आहेतमार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्‌ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरकनरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारतभागवतात येतातशांखायन गुह्यसंग्रह  रामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहेनरकभगदत्तमाधवजितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केलेअसे वंशावळींवरून दिसते.  परंतु चवथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहेया शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापलेअसा अंदाज आहेया वंशातील महेंद्रवर्मन (४५०८०) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले. प्रसिद्ध चीन्वे प्रवासी ह्यु-एन-त्संग हाही सम्राट हर्षवर्धनाच्या काळात कामरूप येथे आला होता. त्याने आसामचे मनोद्न्य वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. येथे सर्वत्र प्रवेशलेली वैदिक संस्कृती मात्र शिरकाव करू शकली नाही याचे कारण येथील समाजावर असलेला तंत्रांचा आणि शाक्त पुजाविधीन्चा अमिट असा प्रभाव. पुढे येथे ब्रह्मदेशातून आलेल्या स्थलांतरितानी सत्ता स्थापन केली व “आहोम” घराणे सत्तेवर आले. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोम जमातीचा नायक सुकाफा पतकाई पर्वतरांगा ओलांडून सध्याच्या लखिमपूरसिबसागर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात आलातेथील स्थानिक वन्य जमातींना जिंकून आहोमांनी राज्यविस्ताराला सुरुवात केली. नंतर त्यांचे राज्य जवळपास एकोणीसाव्या शतकापर्यंत कायम राहिले. आसाम हे नाव “आहोम” याचाच अपब्रांश आहे असे भाषाविद मानतात. आसाम हे बनाव प्रचलित झाल्यावर जुने कामरूप हे नाव पूर्ण मागे पडले. यांच्याही कारकिर्दीत पूर्व-पश्चिमेचा व्यापार अव्याहत सुरु होता. इतका कि आसाम हा आपल्या व्यापारे भागीदार बनावा यासाठी इस्ट इंडिया कंपनीने विशेष प्रयत्न केले आणि पुढे तर आहों राजांची सत्ताच बरखास्त करून टाकली.

 

आसाममधून एकट्या चीनला जाणारे किमान पाच मार्ग होते. शिवाय नागा डोंगररांगांतून अनेक मार्ग म्यानमारवरून चीनला जात असत. सिचुआनमार्गे भूतान आणि तिबेटला जाणारेही मार्ग होते. चीनमधून रेशीम वस्त्रे आयात करण्याऐवजी ती आपणच का निर्माण करू नये असा विचार आसामी लोकांच्या मनात आला आणि त्यांनीही रेशमी वस्त्रांचे उत्पादन सुरु केले. काही विद्वानांच्या मते रेशीम उत्पादन हे पूर्वीपासून आसामी लोकांना माहित होते व ते पट्ट या नावाने त्याचे उत्मादन घेत. आजही आसामी लोक रेशमी कपड्यांना पट्ट असेच संबोधित करतात. या वस्त्रांची स्पर्धा चिन्यांना सहन न झाल्याने चीनी सम्राट अस्वस्थ झाल्याचेही उल्लेख मिळतात. किंबहुना “चीनापट्ट” नावाचे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात उल्लेखलेले वस्त्र हे आसामध्ये बनवले जात असावे असा विद्वानांचा तर्क आहे. शिवाय उत्कृष्ठ रेशीम फक्त सुवर्णकुडम गावी मिळते असेही अर्थशास्त्रात नोंदवले आहे. हे सुवर्णकुडम म्हणजे आसाममधील सोनकुडीह हे गाव आहे असे विद्वान मानतात. म्हणजे रेशीम उत्पादानासाठे आसाम देशात प्रसिद्ध होते. बाणभट्टाच्या हर्षचरितमध्ये आसामचा राजा हर्शाला रेशमी वस्त्रे उपहार देतो असे उल्लेखलेले आहे. अर्थात रेशीम उत्पादनाची सुरुवात कोठेही झालेली असो, पण रेशमाने जगाच्या व्यापारावर अधिराज्य निर्माण केले होते यात कसलाही संशय नाही.

 

भारत हा चीनमधील चौकोनी बाम्बुन्चाही मोठा आयातदार होता. या बाम्बुन्ना चीनी क्वियांग म्हणत. या बाम्बुन्चा उल्लेख रामायणातही आलेला आहे. आसामही बाम्बुन्च्या उत्पादनात सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेला आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना पोकळ बांबूमधून स्फोटक दारू (सोरा)  वापरून क्षेपणास्त्रे डागन्याचा शोध प्रथम आसाममध्ये लागला व तो व्यापा-यांकरावी चीनमध्ये पोचला असेहे मानणारा आज मोठा विद्वत्वर्ग आहे. जगभरात शोध पसरले त्यात व्यापारे मार्गांचा जसा वाटा आहे तसाच अनेक साथरोग पसरन्यातही या मार्गांचा हातभार लागलेला आहे असे आपल्याला इतिहासात डोकावले कि लक्षात येते.

इशान्य भारतातील सर्वच राज्यांचा सिचुआन, युनान, ते दक्षिणपूर्वेच्या भागांशी संबंध होता. त्यामुळे वांशिक मिश्रण होणेही स्वाभाविक होते. आसाममधील आहोंम हे ताई गटाशी संबंधित होते. आसाममधील भातशेतीतही त्यांनी अभिनव पद्धती आणल्या. ताई लोक थायलंड ते युनानपर्यंत पसरलेले आहेत. हे लोक ब्रिटीश काळापर्यंत तिबेटमधून भारतात येणारे मार्ग वापरत होते. नथू-ला खिंडीमार्गे जसा एक मार्ग होता तसेच भूतानमधून येणारेही दोन मार्ग होते. त्यामुळे या लोकांचे प्राबल्य इशान्य भारतात असणे स्वाभाविक आहे. अर्थात हा प्रवास एकेरी नसतो. भारतातुनाही पूर्वेकडे अनेक स्थलांतरे झालेली आहेत. म्यानमारचे राजे स्वत:ला बुद्धाच्या शाक्य वंशाचे समाजात असत. त्यांच्या मते त्यांचे पूर्वज भारतातून येऊन इरावती नदीच्या खो-यात वसले होते. दावत बॉन्ग राजांनी नागा राजकन्यांशी विवाह केले होते असेही इतिहासावरून दिसते. युनान (दक्षिण चीन) मध्येही उत्तरपूर्वेतील अनेक जमाती स्थलांतरीत झाल्या. एका अर्थाने आसाम व पूर्वोत्तर भागातील राज्ये ही संस्कृती संगमाचा एक महत्वाचा सेतू बनली यात शंका नाही.

 

-संजय सोनवणी

जनकोजी शिंदे

       दत्ताजी शिंदेचा बुराडी घाटावर मृत्यू झाला याच्या पेशवे दरबारीही तीव्र प्रतिक्रिया उमटली . तरीही १४ मार्चपर्यंत अब्दालीला रोखण्या...