Showing posts with label One World One Nation. Show all posts
Showing posts with label One World One Nation. Show all posts

Friday, November 16, 2012

एक जग:एक राष्ट्र (३)


राष्ट्र: राष्ट्रवाद आणि विश्ववाद

राष्ट्र म्हणजे नेमके काय यची सर्वमान्य होईल अशी व्याख्या आजही अस्तित्वात नाही. तरीही आपण राष्ट्राबाबत (व राष्ट्र-राज्याबद्दल) वेळोवेळी केल्या गेलेल्या काही व्याख्या पाहुयात.

१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)

२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."

३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ. "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेले व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब. "सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क. समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."

४. विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionery.)

५.  राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."

६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.

७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.

अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने (मीही या लेखमालेत राष्ट्र हा शब्द राष्ट्र-राज्य या अर्थानेच वापरला आहे.) राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो...

१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो.  भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात भाषा, वंश व संस्कृत्यांचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्क्रुतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. याचे मुख्य कारण वांशिक सिद्धांताविषयकच्या तत्कालीन अज्ञानात होते असेही आपण आता म्हणु शकतो. पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश संकल्पना राबवता आलेली नाही.

२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुणच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या त्या कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृत्यांचे अवशेष शोधावे लागतात. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर)  आहे. थोडक्यात संस्कृत्या या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पदत नाही.

३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म प्रस्थापित करण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हनजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. (यावर आपण स्वतंत्र विचार नंतर करणार आहोत.) शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत.

धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरनांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घतल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.

४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लोर्ड अक्टन (Lord Acton) म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." आणि ते खरेच आहे.

इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.

या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वल्ड स्पेंग्लर म्हणतो ते मान्य करावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक काल्पनिक भावना आहे. ही भावना नैसर्गिक नसून ती जोपासावी लागते. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भदकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.

राष्ट्र ही कृत्रीम भावना आहे. दुस-या महायुद्धानंतर वसाहतींना स्वतंत्र होण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग झाला आहे. साम्राज्यवादी शक्तींशी मुकाबला करणे राष्ट्रवादामुळेच शक्य झाले आहे हे राष्ट्रवादाचे ऐतिहासिक कार्य दृष्टीआड करता येत नाही. तरीही ही नव-स्वतंत्र राष्ट्रे नंतर साम्राज्यवादी शक्तींचेच हस्तक बनली हे वास्तव नाकारता येत नाही. स्वतंत्र धोरणे, संपुर्ण राष्ट्रहित, आर्थिक स्वयंपुर्णता व अन्य राष्ट्रांशी समान पातळीवरील स्पर्धा करु शकणारी राष्ट्रे आज जगात नाहीत म्हटले तरी चालेल. सर्वच राष्ट्रे परावलंबी असून परस्पर सहकार्य (मग त्यासाठी आमिषे, दडपण, प्रत्यक्ष कृती ई. मार्ग वापरोत) असल्याखेरीज कोणतेही राष्ट्र आज आपले अस्तित्व टिकवू शकत नाही. अशा स्थितीत विश्ववाद जोपासत जगाची नवी संरचना करणे आवश्यक आहे. ते कसे शक्य आहे व तसे झाले तर मानवी अस्तित्व नेमके कोणत्या स्थितीत परिवर्तीत होवू शकते यावर पुढे आपण विचार तर करुच पण अडथळ्यांचे कोणती शर्यत सुजाण मानवी समुदायाला जिंकावी लागणार आहे त्यावरही चर्चा करू.  

Thursday, November 8, 2012

एक जग:एक राष्ट्र (२)


राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे.....?

स्वातंत्र्य:समता:बंधुता या महनीय तत्वांची देणगी जगाला दिली ती फ्रेंचांनी. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीची व प्रबोधनकाळाचीही पार्श्वभुमी होती. धर्मसत्ता आणि राजसत्तांतील युती व संघर्षही जगाने या काळात पाहिले. पोपने धर्मसत्ताच सर्वोपरी असून पोपचे आदेश न मानल्यास राजांनाही धर्मातुन काढुन टाकण्याचा अधिकार आहे असे दावे सुरु केले आणि संघर्ष सुरू झाला. त्यात पोपच्या पदासाठीच धर्मांतर्गत संघर्ष सुरु झाल्याने पोपही कमकुवत बनला याचा फायदा युरोपियन राज्यकर्त्यांने उचलला. याच काळात सरंजामदारांचेही वर्चस्व जवळपास जगभर वाढल्याचे आपल्याला दिसते. सरंजामदारांशिवाय राज्यही करता येत नाही पण त्यांचे वर्चस्वही हटवता येत नाही अशा पेचात तत्कालीन राज्यव्यवस्था सापडल्याचे आपल्याला दिसते. सरंजामशाहीमुळे राज्यसत्ता दुर्बळ ठरु लागल्याने औद्योगिकरण व व्यापार यामुळे धनाढ्य बनलेल्या वर्गाला प्रबळ राज्यसत्तेची गरज भासू लागली होती. सरंजामशाहीच्या तसेच अनियंत्रित राजेशाहीच्या तत्वांनाही छेद देईल असे नवे तत्व या वर्गाला हवे होते.

अशा वेळीस राष्ट्रवादाचे तत्व पुढे आणले गेले. एक वंश, एक प्रदेश, एक धर्म, समान इतिहास, परंपरा आणि हितसंबंध या मुलतत्वांवर प्राथमिक राष्ट्रवाद अस्तित्वात आला. मध्ययुगाच्या अखेरीस युरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वरील तत्वांना सुसंगत ठरेल अशी परिस्थितीही होती. प्रादेशिक निष्ठा महत्वाच्या बनल्यामुळे मातृभुमी...पितृभुमी या उदात्त दृष्टीने आपल्या भौगोलिक प्रदेशाकडे पाहिले जावू लागले. यातुन समाजाचे अंतरंग व बहिरंगही बदलू लागले. त्यामुळे राष्ट्रवादावर उभारलेली, पण इश्वरदत्त मानली गेलेली राजसत्ता राष्ट्रनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली.

यातुन पुर्वी जी सातत्याने सीमा बदलत असनारी, प्रादेशिक अभिमानाचा विशेष जोर नसणारी व्यवस्था स्थिर होत विशिष्ट भौगोलिक सीमांतर्गतचे आपले भावनिक अधिष्ठाण असनारे राष्ट्र व त्याचा अनिवार अभिमान असा राष्ट्रवाद अस्तित्वात आला. पण सर्वच राष्ट्रे (युरोप) महत्वाकांक्षी असल्याने आंतरराष्ट्रीय कलहांचे रुप बदलले. आपापल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी संफ़्घर्ष सुरु झाला. त्यासाठी इतर राष्ट्रांचे हितसंबंध धोक्यात आले तरी चालतील ही भावना प्रबळ झाली. परस्परांत युद्धे वाढु लागली. त्यामुळे राष्ट्रभावनाही प्रबळ होत गेल्या. युद्धात हार झाली कि सामर्थवाढीचे उद्योग व पुन्हा सुडासाठी युद्धे असा क्रमच बनला. सत्ता संपादन, रक्षण आणि प्रादेशिक विस्तार ही राज्यांची प्रमूख वैशिष्ट्ये बनली.

यातुनच प्रजेचाही राज्यव्यवस्थेत वाटा असला पाहिजे या भावनेतून राजसत्तेचे एकहाती नियंत्रण कमी करत लोकशाहीची स्थापना अपरिहार्य वाटु लागली. शासन हे प्रजेचे प्रजेतर्फे चालवले जाणारे असावे कारण राजा नव्हे तर प्रजा सार्वभौम आहे या तत्वाचा प्रभाव वाढत होता. इंग्लंडमद्धे अशा रीतीने लोकशाहीची स्थापना झाली. लोकशाहीसोबतच राज-सत्ता, हुकुमशाही सत्ता, लष्करी सत्ताही काही राष्ट्रांत होत्या वा तशा सत्ता आनण्याचे प्रयत्नही सुरु होते. उदा. नेपोलियनने फ्रांसमद्धे लष्करी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.

हे सारे होत असले तरी म्हणुन साम्राज्यवाद संपला असे नव्हे. माणसाला मानवी स्वातंत्र्याबद्दल अजून खूप शिकायचे होते. आजही शिकला आहे असे नाही. सम्राटांचा साम्राज्यवाद जावून आता राष्ट्रांचा साम्राज्यवाद सुरु झाला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढणारे उत्पादन विकण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती तसेच आपल्या देशाला लागणारी स्वस्त साधनसामुग्रीही स्वस्तात व सातत्याने मिळवण्याची गरज होती. त्यातुन वसाहतवाद पुढे झेपावला. आफ्रिका, आशिया, अमेरिकादि खंडांवर यूरोपियनांनी कब्जा मिळवत वसाहतवादी साम्राज्ये स्थापन केली. अमेरिकेने पहिले स्वातंत्र्ययुद्ध छेडुन स्वातंत्र्य मिळवले व एक नवीनच राष्ट्र संकल्पनेचा पाया घातला. त्याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत त्यामुळे येथे एवढेच.

पहिले महायुद्ध हे वर्चस्ववादाच्या भावनेने गाठलेल्या टोकाचे फळ होते. या युद्द्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वामुळे अनेक छोटे प्रदेश अस्मितेच्या बळावर राष्ट्र म्हणुन उदयाला आले. ही छोटी राष्ट्रे आर्थिक व लश्करी दृष्ट्या कमकुवत असल्याने यूरोपातील अंतर्गत संबंध तणावाचे बनू लागले. यातुन राष्ट्रवाद सौम्य न होता टोकाचा वाढत गेला. जर्मनीत नाझी तर इटलीत फ्यसिस्ट पक्षांची सरकारे केवळ अतिरेकी राष्ट्रवादाच्या परिणती होत्या. त्यात साम्यवादी सत्तांचाही उदय रशियाच्या रुपाने झाला होताच. शासनाची पद्धत कोणतीही अस्ली तरी राष्ट्रवाद हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा मुलभुत गाभा होता. त्यातुनच विनाशक दुसरे महायुद्धही घडले. जगाचा नकाशा बदलला. आजवर जागतीक घडामोडींपासून अलिप्त असनारे "स्वतंत्र जग" अमेरिका या युद्धात पडले व त्यातुनच एक बलाढ्य जागतीक सत्ता
म्हणुन उदयाला आले. या युद्धातुन नवी राष्ट्रे निर्माण झाली. बव्हंशी स्वतंत्र होवून तर इस्राएलसारखी नवनिर्मिती म्हणुन.

हा सिलसिला पुढेही चालु राहिला. साम्यवादी जग विरुद्ध भांडवलशाहीवादी जग असा नवा संघ्र्ष सुरु झाला. त्यातुनहे अनेक राष्ट्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण करत अमेरिका व रशियाने जगाचा नकाशा स्थिर राहु न देण्याचा निर्धार केला. भारतानेही ७१च्या युद्धातुन बांगलादेशाची निर्मिती घडवली. पुढे सोव्हिएट रशियाही कोलमडला व पुन्हा अनेक राष्ट्रे स्वतंत्रपणे जगाच्या नकाशावर आली....

सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वतंत्र राष्ट्र म्हणुन उदयाला येण्याची आकांक्षा असणारे, त्यासाठी संघर्ष करणारे अनेक समाजगट जगात आजही आहेत. तज्ञ म्हनतात त्याप्रमाने प्रत्येक राज्य हे राष्ट्र राज्य आहे असे नाही व त्याशी सहमत व्हावे लागते. लष्करी अथवा पोलिसी बळावर अशी स्वातंत्रे नाकारली जातात. एका अर्थाने प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राज्यात समतेचे व स्वातंत्र्याचे मूलतत्व पाळतेच असा दावा करता येत नाही.

या राष्ट्रांच्या इतिहासावरुन स्पष्ट दिसते कि ब-याचशा राष्ट्राची सीमा ती राष्ट्रे म्हणुन स्थापन झाली तेंव्हापासुन तशीच राहिली आहे असे म्हणता येत नाही. भारतानेही राष्ट्र म्हणुन असलेली सीमा स्थापनेपासून दोनदा गमावली आहे. विभाजनवादी संकल्पना बाळगणारे खलिस्तानवादी असोत कि काश्मिर असो...भारतात अस्तित्वात आहेतच. त्यासाठी त्यांचा संघर्षही सुरु आहेच. जगात अनेक ठिकाणी असे घडते आहे व जगाची शांतता अधुन-मधुन ढवळुन निघते आहे. व याचीच परिणती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधात अविश्वासाचे व असुरक्षिततेचे वातावरण वाढत आहे...आणि लष्करी शक्ती हरप्रकारे वाढवण्याच्या प्रचंड स्पर्धेत सारीच मानवजात आज पडली आहे. यातून तिसरे महायुद्ध होईल कि काय अशी भिती वारंवार व्यक्त होत असते...ती भिती अनाठायी आहे असे म्हनता येत नाही. याचे कारण म्हणजे गेल्या शतकात धार्मिक मुलतत्ववादाचा उदय आणि त्याच वेळीस बलाढ्य राष्ट्रांचा लष्करी शक्तीमुळे उदयाला आलेला सर्वाधिकारीपणा. मानवी मूल्यांची व्याख्या बलाढ्यांनीच करणे हा पुरातन नियम आजही लागू होतो आहे. आखाती देशांत निर्माण केला गेलेला संघर्ष या वर्चस्वतावादाचीच अनेकांपैकी एक परिणती होती.

अशा स्थितीत आज "राष्ट्र" या संकल्पनेची अपरिहार्यता मुळात आहे काय यावर विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रवाद म्हणजे नेमके काय व तो कोठुन येतो आणि या संकल्पनेची मानव जातीला आज उपयुक्तता आहे काय हेही समजावून घेण्याची आवश्यकता आहे. "राष्ट्र-राज्यांचे ऐतिहासिक कार्य संपले आहे..." असे काही विचारवंतांना का वाटते तेही समजावुन घ्यायला हवे.

(क्रमश:)

Wednesday, November 7, 2012

एक जग:एक राष्ट्र (१)




व्यवस्थांचा धावता इतिहास...

मानवी इतिहासात पार मागे डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येते की जगभरच्या मानवी समाजांत असंख्य स्थित्यंतरे झालेली आहेत. अनेक नव्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत व त्या कालौघात कोलमडुन नव्या व्यवस्था अवतरल्या आहेत. सध्याचे मानववंशशास्त्र सांगते कि मनुष्य हा प्रथम आफ्रिका खंडात अवतरला व तेथुन तो सर्वत्र पसरला. आज तरी हा सिद्धांत मान्य असल्याने तो गृहित धरुयात. अधिक पुरातन काळी सर्वच खंड एकत्र जोडले गेले असल्याने अथवा हिमयुगात गोठलेल्या समुद्रपृष्ठावरुन चालत जाणे सहज शक्य असल्याने मानवी वितरण सर्वत्र झाले असावे असे अंदाज आहेत. मनुष्य सर्वत्र पसरला हे वास्तव मान्य करून पुढे जावूयात.

पुरातन मनुष्य ही भटकंती का करत होता? उत्तर सोपे आहे. अर्थातच अन्नाच्या शोधासाठी. आदिमानव हा प्रामुख्याने अन्नसंकलक मानव होता. अन्नासाठी एका प्रदेशातून दुस-या प्रदेशात जाणे आवश्यक होते. तो टोळीमानव होता. सर्वच मानवी समाज टोळ्यांत विभक्त झालेला होता. पुढे तो शिकारी मानव बनला. त्यानंतर त्याला पशुपालनाचा शोध लागला आणि पशुपालक मानव भूतलावर अस्तित्वात आला. सर्वच टोळ्या पशुपालक वा शिकारी बनल्या असे नव्हे. काही अन्नसंकलकच राहिल्या तर काही शिकार हेच मुख्य उपजीविकेचे साधन मानत राहिले. त्यासाठी भटकणे भाग होते. सध्याच्या अरण्यतील शिकार संपली कि दुस-या अरण्याच्या शोधात भटकणे सुरुच होते. या काळात विशिष्ट भुमीबद्दलची ओढ अथवा मालकीहक्काची संकल्पना निर्माण होणे शक्य नव्हते. जेथे मुबलक अन्न उपलब्ध आहे त्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यापुरते मानवी टोळ्यांत संघर्षही होत. या संघर्षात जो हरेल त्याला गुलाम करणे अथवा हुसकुन लावणे आणी पराजिताच्या स्त्रीयांना मात्र ताब्यात घेणे हे सर्रास प्रकार होत असत.

त्याहीपुढच्या टप्प्यात त्याला शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध ही मानवी इतिहासातील सर्वात महत्वाची क्रांती मानली जाते. या क्रांतीने मानवी व्यवस्था व मानसिकता बदलवायला फार मोठा हातभार लावला. अर्थात सुरुवातीची शेती ही तात्पुरती व भटक्या स्वरुपाची होती. नंतर मात्र मनुष्य जलाशये, नद्या, ओढे असलेल्या व सुपीक जमीनींच्या क्षेत्रांत स्थिर होवू लागला. स्थिर झाल्याने त्याला निवा-यांची आवश्यकता भासली तसेच शेतीसाठी उपयुक्त उपकरणांच्या शोधांचीही. मानसाने आपली कल्पकता व बुद्धीमत्ता पणाला लावत लाकुड, दगड, चर्म, तांबे ते लोह ई. नैसर्गिक संसाधनांना आपल्या उपयुक्ततेत बदलवले.

या स्थिरतेमुळे भुमीवरील मालकीची संकल्पना विकसीत झाली. परंतु कोणती जमीन कोणाची व का हे ठरवण्यासाठीचे कसलेही नियम आरंभी नव्हते. त्यामुळे त्यात व्यवस्था आणने भाग होते. यातुनच आरंभिक गणसत्ता अस्तित्वात आल्या. टोळीसत्ता ते गणसत्ता हा प्रवास मानवाने केला तो त्याच्या तातडीच्या निकडीपोटी. त्यामुळे आपले जीवित, वित्त, भुमी आणि स्त्रीया याच्या रक्षणाची हमी त्याला मिळनार होती. ही सुरक्षा दोन पातळीवरची...स्वगणांतर्गतची आणि गणबाह्यही...होती. अर्थत हे गण टोळ्यांतुनच निर्माण झाले असल्याने अल्पसंख्य असत. स्थिरतेचा एक तोटा म्हनजे लोकसंख्येची वाढ. त्यामुळे अधिकाधिक उपजाऊ भुमीची गरज भासणे स्वाभाविक होते. त्यातून गणांत युद्धे होत असत व गणांतील सर्वच लढु शकणारे लोक युद्धांत भाग घेत असत. या युद्धांत अनेक गण नष्टही होत वा गुलाम बनवले जात. बौद्ध जातकांत दास हा एक वर्ग आहे. तो पराजित गणांतील गुलाम केला गेलेला वर्ग होय. जगभर अशी स्थिती निर्माण झाली. ग्रीकांनी जी नगरराज्ये बनवली ती एकार्थाने (सर्वस्वी जशीच्या तशी नसली तरी) गणराज्येच होती. गणांना आपापल्या गणांचा केवढा अभिमान असे हे आपण पुन्हा बौद्ध जातकांत पाहू शकतो. शाक्य गण हा सर्वात श्रेष्ठ आहे अशी शाक्य गणाची धारणा होती. सिंधु संस्कृतीही ग्रीकांप्रमाणेच नगरराज्यांची बनली असावी असा अदमास काढता येतो. अर्थात त्यासाठी सबळ पुरावा नाही.

गणराज्ये अथवा नगरराज्यांतुनच पुढे राजा व राज्य ही संकल्पना माणसाने विकसीत केली. निवडक ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याने कारभार करणारा राजा हा ईश्वराचे प्रतीक बनून सत्ताधारी बनवला गेला ते कारभाराच्या सुलभतेसाठी. गणराज्यव्यवस्था निर्णयप्रक्रियेत अडचणीची ठरु लागणे व अतिरिक्त महत्वाकांक्षा यातुन राजव्यवस्था आकाराला आली असे ढोबळमानाने म्हणता येते. ही एकार्थाने अल्पनियंत्रीत एकव्यक्तिकेंद्रीत व्यवस्था असते. राजा ही सर्वोच्च व्यक्ती असते. मुलकी अधिकारी, सैनिक व सैनिकी अधिकारी त्यांच्या मार्फत तो सत्ता गाजवत असतो. निर्णयप्रक्रियाही वेगवान असते. अधिकचे प्रदेश जोडुन घेण्यासाठीची आक्रमकता हा राज्यांचा मुलभूत हेतू असतो. गनराज्यव्यवस्था हळुहळु संपत गेली आणि राजेशाहीने त्याची जगभर जागा घेतली. (अपवाद आहेत. जगात आफ्रिका, आशिया ते अमेरिका खंडात अद्यापही टोळीव्यवस्थाच प्राधान्याने होती.)

राजेशाही नेहमीच उन्मुक्त महत्वाकांक्षेला जन्म देते. आक्रमकता ही साम्राज्यवादात बदलते. राजेशाही व्यवस्थेकडुन साम्राज्यवादाकडे जगानेही प्रवास केला. भारतात नंद घराण्याने साम्राज्यवादाचा पाया घातला. बिंबीसाराने प्रथम साम्राज्य निर्माण करायला सुरुवात केली. (इसपु. ४९९). पुढे नंद, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, सातवाहनादि राजांनी साम्राज्ये स्थापन केली. एकार्थाने साम्राज्य या संकल्पनेचा विकास भारतातच आधी झालेला दिसतो. चीनमद्धे पहिला सम्राट क्विन शि ह्युंगाई झाला तो सनपुर्व २२१ मद्धे. यानंतर ज्याला आपण जागतीक परिप्रेक्षातील साम्राज्यवादाची सुरुवात प्रथम अलेक्झांडर द ग्रेटने सुरु केल्याचे पाहतो. संपुर्ण जग जिंकुन ग्रीकांच्या अंमलाखाली आनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. पुढे साम्राज्यवादाची धुरा लोकशाहीवादी रोममधील ज्युलियस सीझरने उचलली. परंतु तो हयातीत सम्राट बनू शकला नाही. (मृत्यु-इसपु ४४) परंतु खरे साम्राज्य काय असते हे जगाला दाखवून दिले, व संपुर्ण पृथ्वी नसली तरी जगातील एकमेव अवाढव्य साम्राज्य बनण्याचा रोमनांनी सन्मान पटकावला. उत्तर आफ्रिका, युरोपचा बराच भाग, मध्यपुर्व ते आशिया खंडाचाही बराचसा भाग रोमनांनी अंकित केला. हे साम्राज्य प्रदीर्घकाळ (चार शतके) टिकले पण त्याचा
अंतर्गत ओझ्यानेच पुढे अंतही झाला. या साम्राज्याच्या अंताची विविध कारणे आहेत, परंतू आपण पुढे चर्चेच्या ओघात त्याबद्दल बोलुयात.

जगात पुढेही अनेक भागांत अनेक साम्राज्ये निर्माण होत गेली. खलिफात अथवा इस्लामी साम्राज्ये सातव्या शतकापासून जगभर सत्ता स्थापन करण्यासाठी स्पर्धेत उतरली. तेराव्या शतकात भारतातही इस्लामी साम्राज्य स्थापन झाले. सोळाव्या शतकापासून इंग्रज, फ्रेंच, स्प्यनिश व डचही साम्राज्यस्थापनेच्या कामाला लागले. सर्वाधिक यश अर्थातच इंग्रजांना मिळाले. जवळपास विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्रजांनी जगाच्या बहुतांश भागावर राज्य केले.

हिटलरही संपुर्ण जगावर नाझी (थर्ड राईश) साम्राज्य गाजवण्याच्या महत्वाकांक्षेने झपाटलेला होता. पण विसाव्या शतकात सर्वांचीच साम्राज्ये मिटली व एक नवी जागतीक व्यवस्था आकार घेवू लागली.

टोळीव्यवस्थेतुन गणराज्य व्यवस्था अथवा नगरराज्य व्यवस्था, त्यातुन राजेशाही व नंतर साम्राज्यशाही असा प्रवास जगाने केला. या प्रदिर्घ काळात कोणत्याही गणाची, राज्याची, अथवा साम्राज्यांची सीमा सुनिश्चित अशी नव्हती. त्यांत वारंवार बदल घडणे अपरिहार्य होते. मानवी भावना या आपला प्रदेश, भाषा, संस्कृती व धर्माशीच अधिक घट्ट राहिलेल्या आपल्याला दिसतात. पण त्यातही एकवाक्यता होती असे म्हनता येणार नाही. म्हणजे धर्मांतरे मोठ्या प्रमाणावर झाल्याने धर्म हाच सर्वांना जोडनारा एक समान धागा सर्वांसाठी होताच असे नाही. धर्मांतरितांना धर्मातील मुळ लोक समानता प्रदान करणे शक्य नव्हते हे आपण भारतातील अशरफ (उच्च) आणि अजलफ (हीण) मुस्लिम अशा वाटणीतुन सहज बघु शकतो.अमूक प्रदेशाची अमुक एक व अविकृत अशी संस्कृती आहे ही भावना असली तरी तसा दावा कोणत्याही संस्कृतीला करता येणार नाही एवढी सांस्कृतीक सरमिसळ पुरातन काळापासुन व्यवस्था बदलांमुळे व बदललेल्या राज्यव्यवस्थांमुळे झालेली आहे.

टोळीव्यवस्था, गणराज्य/नगरराज्य व्यवस्था व साम्राज्यव्यवस्था हा प्रवास जवळपास प्रत्येक आधीच्या व्यवस्थेच्या नाशातुन घडत गेला. त्यामुळे नवीन अभिनव व्यवस्था निर्माण होणे स्वाभाविकच होते व तशी ती झालीही. तिला आपण आज "राष्ट्र" व्यवस्था म्हणतो. याचा अर्थ राष्ट्र (नेशन) ही संकल्पना आधी उदयाला आली नव्हती असे नाही. चवदाव्या शतकात समान भाषा बोलणारे, एकाच समान कायद्यांतर्गत येणारे म्हणजे नेशन अशी व्याख्या करत प्यरिस विद्यापीठात विद्यार्थ्यांची "नेशन" म्हणुन विभागणी करण्यात आली. आधुनिक अर्थाच्या "राष्ट्र" या संकल्पनेचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीमुळे झाला. विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना जगभर स्वीकारली गेली.

असे असले तरी राष्ट्र म्हणजे नेमके काय? राष्ट्राची निर्मिती नेमकी कशी होते? नेमक्या कोणत्या मुलतत्वांनी मिळुन राष्ट्र बनते? इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, वंश, प्रादेशिकता व सामाजिक तत्वज्ञानाचा त्यात नेमका कसा प्रभाव असतो? असे अनेक प्रश्न राष्ट्र व राष्ट्रभावना या संकल्पनेशी जोडले गेले आहेत व त्यावर एकोणिसाव्या शतकातील अर्न्स्ट रेनानपासून ते कार्ल मार्क्सनेही सैद्धांतिक उपपत्त्या मांडल्या आहेत. त्यावर आपण पुढील भागात चर्चा करुयात.  

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...