Showing posts with label तत्वद्न्यान. Show all posts
Showing posts with label तत्वद्न्यान. Show all posts

Thursday, August 21, 2025

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

 


ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप काय, नैतिकतेचा पाया कोणता, वेळ आणि अवकाशाचे मुळ काय, ज्ञान म्हणजे काय आणि त्याची मर्यादा काय, मृत्यू म्हणजे काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवाचे अन्तिम ध्येय/साध्य काय असे काही प्रश्न आहेत ज्यावर जगातील असंख्य तत्वचिंतकांनी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात कधी बीज रुपात तर कधी सविस्तर चर्चा केलेली आहे. परंतु हे प्रश्न आजही समाधानकारक रीतीने सुटले आहेत असे नाही. किंबहुना त्यामुळे तत्वज्ञान हा विषयच अप्रस्तुत आहे की काय असे अनेकांना वाटू लागते. पण हे विषय अखिल मानवजातीसाठी अनावर कुतूहलाचा विषय असल्याने त्यावर चर्चा अथवा चिंतन करत राहणे मानवजातीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. एवढेच नव्हे तर जागतिक मानव आज ज्या भयकारी मानसिकतेतून जात आहे ती अवस्था दूर करायला प्रश्नांची निर्विवाद उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
खरे तर हेच मानवाला प्राचीन काळापासून भेडसावणारे मुख्य प्रश्न आहेत. असे असले तरी तत्वज्ञही त्या त्या काळाची आणि समाजव्यवस्थेची अपत्ये असल्याने त्यांच्या चिंतनाला आणि शोधलेल्या उत्तरांना अपरिहार्यपणे त्या कालमर्यादा आणि समाजविचार चौकटीचा प्रादुर्भाव होणे सहज शक्य आहे. त्यामुळे काही मते किंवा विचार आणि निष्कर्षही दुषित होणे स्वाभाविक आहे. खरा प्रश्न हा आहे की कालचौकट आणि समाजनिरपेक्ष तत्वज्ञान मांडता येईल की नाही हा. यावर विचार केला तरच आपण वरील उपस्थित झालेल्या प्रश्नांवर उत्तरे शोधु शकू.
पूर्वीचे जीवन तुलनेने खूप संथ होते. त्यांना त्यांच्या आकलन मर्यादेत येतील अशी तात्कालिक उत्तरे तत्वज्ञांनी शोधली व ती त्या त्या स्थितीत लोकांना पटलीही. किंवा त्या उत्तरांच्या विरोधात नवी तत्वद्न्याने निर्मानही केली. पण आजच्या जगाचा वेग भयावह झाला आहे आणि त्यावर नवे तत्वज्ञान मांडले न गेल्याने मानसिक कुंठाही तेवढ्याच जटील झाल्या आहेत.
आधुनिक काळात सापेक्षतावादाचा सिद्धांत विश्वोत्पत्तीशास्त्रात लोकप्रिय असला तरी लघुत्तम पातळीवरील (क्वांटम) पातळीवर हा सिद्धांत लागू पडत नाही अये आधुनिक भौतिकी विज्ञानातील शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले आहे. मी माझ्या नितीशास्त्र या पुस्तकात यावर उहापोह केलेला आहे. सापेक्षवादाआला उत्तर निरपेक्षतावाद हे आहे हे मी त्यात दाखवून दिलेले आहे. मानवी जगच सापेक्ष दृष्टीने भोवतालच्या आणि आकाशात दूरवर पाहत असलेल्या भूतकालीन विश्वाकडे पाहत असतो त्यामुळे वर्तमानकालीन विश्व कोणत्या अवस्थेत आहे हे त्याला समजू शकण्याची सुतराम शक्यता नाही हेही एक वास्तव आहे. भविष्य तर माणसाच्या आकलनात आलेले नाही. माणसाला भविष्य वर्तवता आले तरी ते भौतिक भविष्य असते, मानवी जगाचे नाही ही सुद्धा एक मानवी मर्यादा आहे. भौतिक घटना गणिती नियमाने होतात तशा मानवी जगातील नाही. त्याचेही गणित असू शकेल पण ते गणित आपल्याला अजून गवसलेले नाही. त्यामुळे मानवी भवितव्य हे सध्या तरी अनिश्चितता आणि संभाव्यतेच्या तत्वावर सांगता येते. थोडक्यात ते अंदाज असतात. ते कधी उत्स्फूर्ततावादातून येतात तर कधी ठोकताळ्यांवर आधारित असतात. अनिश्चितता मात्र कायम राहते. आणि अनिश्चितता हीच अशी गोष्ट आहे जी माणसाला आजन्म छळत राहते. अगदी पुराकथा जरी पाहिल्या तरी देव घ्या की तपस्वी घ्या, अनिश्चिततेला आव्हान देऊ न शकल्याने त्यांच्याही जीवनात अनपेक्षित उलथापालथी झालेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. पण आता हा वेग प्रचंड वाढला आहे आणि त्यातूनच सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रश्नांनी वर डोके काढले आहे आणि मानवी मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे.
नियती किंवा दैव हे या अनिश्चिततेवरील उत्तर मानून एक सोपी पळवाट काढण्याची एक मानवी प्रवृत्ती आहे. जगभरच्या पुराकथा शेवटी हेच उत्तर देतात. हीच त्याची/तीची नियती होती आणि ही नियती किंवा दैव कोणी ठरवले तर आकाशस्थ देवतांनी किंवा अदृश्य शक्तींनी. माणसाने शोधलेले हे सोपे आणि सहज पटणारे आणि माणसाला श्रद्धाशील करणारे तत्व होते यात शंका नाही. पण आजही आधुनिक मानव म्हणा किंवा तत्वज्ञ म्हणा याविषयी निर्विवाद भाष्य करू शकलेला नाही. थोडक्यात अनिश्चिततेचे तत्व आजही तत्वज्ञानाला आणि म्हणून सर्व मानवजातीला आव्हान देत आहे हे आपल्या लक्षात येईल.
खरे तर जोवर अनिश्चिततेच्या प्रश्नाला समाधानकारक आणि सार्वकालिक उत्तर मिळत नाही तोवर सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधनकारक उत्तर मिळू शकणार नाही हेही उघड आहे. किंवा असेही असू शकेल की जोवर वर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही तोवर अनिश्चिततेचे तत्वही अनुत्तरीत राहील हेही निश्चित. म्हणजेच दोन्ही बाजू सुटत नाहीत तोवर माणसाला समाधानकारक उत्तर मिळणार नाही आणि त्याचे नैतिक प्रश्नही सुटणार नाहीत हे उघड आहे. ते प्रश्न सुटणार नाहीत तोवर तुकड्या-तुकड्याने संलग्न प्रश्नाची उत्तरे ही असमाधानकारक आणि अनुपयुक्त असतील हेही उघड आहे. कारण येथे समग्र दृष्टीची गरज आहे, तुकड्या तुकड्यातील नाही.
कारण मुळात देव किंवा नियती अशी काही गोष्ट अस्तित्वात असते काय या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. यालाच आनुषंगिक प्रश्न म्हणजे ईश्वर आहे की नाही हा. मग इतर प्रश्न येतात. आज जगात नास्तिक लोकांची संख्या वाढत असली तरी त्यामागील प्रेरणा निश्चियपणे सांगता येईल असेही नाही. थोडक्यात आजचे मानवी जग हे अजूनही अनुत्तरीत प्रश्नांवर हेलकावे खात आहे. म्हणून ते दिवसेंदिवस अधिक अस्थिर, पलायनवादी आणि असंयमी झाले आहे व हा वेग वाढत जाणार हेही निश्चित आहे. जसे विज्ञान वेगाने पुढे जात आहे तेवढेच मानवी मूल्यांचे प्रश्न जटील होताहेत हे आपल्या लक्षात येईल.
या जागतिक अगतिकतेतून माणसाला कसे बाहेर काढायचे हा आजच्या तत्वद्न्यांसमोर आहे. देव धर्म हे या मानसिक कुचंबनेला प्रभावी उत्तरे उरलेली नाहीत आणि नव्या जगासाठी नवे सक्षम आणि सर्वोपयोगी तत्वज्ञान जन्माला घालता येत नाही. त्यामुळेच मी वर उपस्थित केलेले प्रश्न आजही सोडवता आलेले नाहीत. भविष्यात यावर उत्तरे शोधता आली नाहीत तर माणूस अधिकधिक असंयमी, अविचारी आणि अविवेकी होत जाण्याचा धोका आहे. विज्ञान हे मानवाला सहाय्यकारी बनले असले तरी त्याची मानसिक प्रश्नांत भरच घालत आल्याचे आपल्याला दिसून येईल. यावर आजच्या मानवाला गंभीर विचार करावा लागणार आहे.
-संजय सोनवणी

Saturday, October 14, 2023

कृत्रिम बुद्धीमत्तेची भीती का?

 



कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) हा जगभरच्या गंभीर चर्चेचा विषय बनलेला आहे. ए.आय. आता आपल्या दैनंदिन जीवनात घुसलेले असून आता तर ते मशीन लर्निंग, डीप लर्निंग सारख्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातही पाय रोवू लागले आहे. त्यामुळे अचूक विश्लेषण आणि वेगवान निर्णय व त्याची अंमलबजावणी मानवी नियंत्रणाशिवायही साध्य करणे माणसाला जमू लागले आहे. माहितीच्या अवाध्वाय ढिगा-याचे क्षणात विश्लेषण करून निर्णय घेण्यास योग्य ठरतील असेच विश्लेषण प्राप्त करण्याचे कार्य साध्य करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) सोपे बनत चालले असून किचकट निर्णय प्रक्रिया त्यातल्या त्यात सुलभ बनवणेही शक्य होत आहे. ए.आय. मानवाप्रमाणेच सद्न्यात्मक विश्लेशन करून निर्णयसुद्धा घेऊ शकेल या दिशेने आता वेगाने वाटचाल होते आहे. संगणक शास्त्रातील कृत्रिम बुद्धीमत्ता ही एक शाखा असून प्राथमिक गणना करण्यापासून ते ए.आय. पर्यंत घेतलेली ही झेप मानवी बुद्धीचेच एक प्रकट पण कृत्रिम रूप आहे. रोबोटिक्स (यंत्रमानव) ही कृत्रिम बुद्धीच्याच पायावर निर्माण झालेली आंनी वेगाने वाढत असलेली शाखा आहे. आता तर जटील शस्त्रक्रियाही रोबोटिक्सच्या मार्फत केल्या जातात मानवी श्रमिक/कामगारांची जागा रोबोटिक्स आणि व्यवस्थापनातील साधे अकाउंटीग ते विश्लेषणही आता ए.आय.च करू लागल्याने याही क्षेत्रात मानवी आवश्यकता कमी होत चालली आहे. यामुळे संपूर्ण मानवजातच धोक्यात आली असून त्यामुळे अनेक नैतिक/सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवतील अशी भीती विचारवंत व्यक्त करत आहेत. आता शालेय निबंध, प्रबंध ते कादंब-याही Chatbot सारखी ए.आय. साधने लिहू शकत असल्याने जगातील अनेक शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यावर ए.आय. बंदी घातलेली आहे. ए.आय. व रोबोटिक्समुळे जगातील आर्थिक आणि सामाजिक फेररचना होणार याबाबत मात्र शंका बाळगायचे कारण नाही. आणि माझ्या मते भीतीही बाळगण्याचे कारण नाही, कारण जगाच्या रचनेत बदल घडवू शकणारा हा पहिलाच क्रांतीकारक शोद्झ नाही.

ए.आय. मुळे उडू शकणा-या हाहा:काराबाबत चर्चा करणारे तेच लोक आहेत ज्यांचा या ज्ञानात भर घालण्यात काहीही वाटा नाही. शेतीचा शोध लागून भटका माणूस स्थिर आणि अधिक सुसंस्कृत बनला ही आद्य क्रांती मात्र आपण विचारात घेत नाहे. जगण्याचे म,आर्ग मात्र बदलले होते. जुन्यालाच चिकटून बसणारे लोक आपसूक मागे फेकले जातात हाही जगाचा इतिहास आहे. औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग सुरु झाले आणि पूर्वी जी उत्पादने हातांनी प्राथमिक यंत्रांच्या सहाय्याने केली जात तीच स्वयंचलित यंत्रांमार्फत होऊ लागली. त्याचा सुरुवातीला जगातील अनेक अप्रगत व्यवस्थांना जोरदार फटका बसला. बेरोजगारीचा विस्फोट झाला. भारतासारखा पारंपारिक उत्पादन व्यवस्थेत कुशल असलेला देश हा हा म्हणता दरिद्री झाला. पण काही काळात भारत तसेच जगही सावरले आणि नव्या बदलाशी जुळवून घेत यंत्रयुगाची क्लास धरली आणि प्रगत राष्ट्रात जरी समावेश नाही झाला तरी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली.

नंतर आले संगणक युग. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल असा आधी फार मोठा गैरसमज पसरलेला होता. संगणकीकरणास विरोध करणा-या संघटना जगभर होत्या. विचारवंतांनी तेंव्हाही सामाजिक व आर्थिक नितीमत्तेबद्दल प्रश्न उठवले होते. संगणक आले. त्याने एका क्षेत्रात जशी बेरोजगारी वाढवली तशीच अन्य क्षेत्रात फार मोठ्या रोजगाराची निर्मितीही केली. रोजगाराचे स्वरूप बदलले एवढेच. पण जशी भीती व्यक्त केली जात होती तसा हाहा:कार उडाला नाही. उलट मानवी जीवन अधिक सुलभ झाले. आर्थिक अधोगती न होता प्रगतीच झाली. प्रगतीचे वितरण समान प्रमाणात झाले नाही असा आक्षेप घेतला जातो, पण कोणतीही अर्थव्यवस्था आजवर संपत्तीचे समान वितरण करू शकलेली नाही हेही एक वास्तव आहे. या क्रांतीत जे सहभागी होऊ शकले नाहीत ते मागेच राहिले व त्यांची प्रगत वर्गाच्या तुलनेत अधिक अवनती झाली असेही चित्र आहे. पण ही अवनती जर सापेक्ष दृष्टीने पाहिले तर त्यांच्या पूर्वीच्या अवनतीपेक्षा बरी होती असेच चित्र दिसते. म्हणजे संपत्तीचा काही का होईना हिस्सा त्यांच्याही वाट्याला आला. आपण गेल्या सत्तर वर्षातील गरिबीच्या उत्पन्न मर्यादेची आकडेवारी पाहिली तर गरीबचेही उत्पन्न वाढले आहे असेच चित्र दिसेल.

आता कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा यंत्रमानव आलेले आहेत व ते जगाचे एकंदरीत रूप बदलणार आहेत हे वास्तव आहे. रोजगार व नैतिकतेचे सापेक्ष निर्देशांक तर बदलणार आहेतच पण मानवी कार्याच्या एकुणातील दिशाही बदलणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी बुद्धीमत्तेची जागा घेईल ही एक व्यर्थ अशीच भीती आहे कारण मानवात विकसनशील बुद्धीसोबतच प्रतिभा व कल्पकता वावरत असते आणि यामुळेच मनुष्य संवेदनशीलही आहे. हे कार्य ए.आय. करू शकत नाही. पण कृत्रिम बुद्धिमत्ता बोजड कामात वेळ वाया घालवत मग निर्णय घेतल्या जाणा-या किंवा उत्पादनपद्धतीत आमुलाग्र बदल घडवेल. मानवाची निर्णयक्षमता विचार-अभ्यास प्रक्रिया अधिक गतिमान करू शकेल. आणि या सोबतच अनेक नवे व्यवसाय/उद्योग निर्माण होत जातील आणि एकुणातील मानवजात बेरोजगार झाली आहे असे चित्र निर्माण होणार नाही. यंत्रमानव जरी अगदी स्वयंपाकघरात घुसले तरी त्यांची व्यवस्था पहायला मानवच लागतील. शेती ते सर्व कारखाने यंत्रमानव नियंत्रित करू लागले तर काय ही भीती नाका-या लोकांनी निर्माण केलेली आहे. प्रत्यक्षात मानवी श्रम अजून कमी करून मानवी बुद्धीमत्तेला ही प्रगती अधिक वाव देऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे.

 

म्हणजेच उद्याचे जग अधिकाधिक बुद्धीमान लोकांचे असेल तर जे फक्त श्रम देऊ शकतात त्यांचाच वाटा कमी होत जाईलपण संपणार नाही. अशा लोकांच्या जीवनासाठी नवी व्यवस्था होईल व कदाचित ती आताच्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली असेल. आणि समजा वाईट झाली तरी कोणालाही खंत करत बसण्याचे कारण नसेल कारण आजवर व्यवस्था बदलल्या तेंव्हाही सामाजिक उलथापालथ झालेली आहे व तिची खंत कोणी केलेली दिसत नाही. तेंव्हा या नव्या क्रांतीने काहीतरी भयंकर घडणार आहे ही भीती निरर्थक आहे.

 

ज्ञान हाच उद्याच्या जगाचा पाया असणार आहे हे कोणीही विसरून चालणार नाही. आता ज्ञान” कशाला नेमके म्हणायचे यावर ज्ञानात्मक चर्चा अभिप्रेत आहे. जुने विचार येथे कुचकामी ठरणार आहेत. मानवी जग बदलत राहिलेले आहे. ते बदलत राहणार. ते या पृथ्वीवर असेतोवर तरी. त्यामुळे नैतिकतेच्या आजच्या कल्पना उद्यावर लादून चालेल काय हा खरा प्रश्न आहे. कालच्या नैतिकता आजच ढासळून पडलेल्या आपल्याला पहाव्या लागत असतील तर आजच्या नैतिकता उद्यावर लादून कसे चालेल? आणि उद्याचा मार्ग रोखून कसे चालेल?

-संजय सोनवणी 

आमचे तत्वज्ञान काय?

 कोणतेही नवे तत्वज्ञान जन्माला येते तेंव्हा भवतालाचा त्यावर अपरिहार्य प्रभाव असतो. भवताल जेवढा उद्रेकी तेवढेच तत्वज्ञान तीक्ष्ण असते. अस्तित्ववाद जेंव्हा पाश्चात्य जगात जन्माला आला त्याला दुस-या महायुद्धातील उध्वस्त राष्ट्रे, समाजव्यवस्थेची, हिंसेची आणि त्यातूनच निर्माण झालेली मानवी जगाकडे उपहासाने पाहण्याची मानसिकता होती. तो उध्वस्त मनांचा उद्गार होता. ते स्वाभाविक तत्वज्ञान होते. तत्वज्ञान हे नेहमीच समुहाचा मानसिक उद्गार असते. मांडणारा एक असेल कि अनेक. दोन्ही महायुद्द्धांनी पाश्च्यात्य जगाची मानसिकता बदलवली आणि तीच मानसिकता श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा अवाढव्य प्रयत्न अनेक मार्गांनी झाला.

भारतीय त्या मानाने नशीबवान होते खरे. युद्धे झाली जगभर पण त्याचे परिणाम जीवन-मृत्युच्या तांडवी संघर्षरुपात त्यांना भोगावे लागले नाहीत. महात्मा गांधींनी युद्ध केले पण ते मानवी प्रवृत्तीविरोधात शांततामय मार्गाने. जो देश कधीच अखंड नव्हता त्याला स्वातंत्र्याच्या उर्मीने पेटवून उठवत पण मानवतेची कास न सोडता एक देश म्हणून अस्तित्व दिले. भारतीय तत्वज्ञान यावर आधारित पुढे जात एक ठसा उमटवू शकत होते पण भारतीय लेखक-कवींनी काही काळ सोडला तर त्याचा आधार घेत अजरामर कलाकृती निर्माण करण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. उलट पाश्चात्य तत्वज्ञानावर आधारित आपले पोरकट सृजन करत राहिले. उसने तत्वज्ञान कधीही कोणाच्या अंतरात सृजनाचे महामेरू जन्माला घालू शकत नाही. भारतीय साहित्याचे तेच झाले.
प्रश्न गांधींचा नव्हता. प्रश्न भारतीय विचारप्रणालीचा होता. हिंसा कि अहिंसा हा सनातन प्रश्नाचा होता. शाश्वत समाजव्यवस्थेचा होता. आज आम्ही ना अरत्र ना परत्र या अवस्थेला आलो आहोत कारण अनुकरण नेमके कशाचे करायचे हेच आम्हाला समजलेले नाही. आम्हाला आमची अशी व्यवस्था निर्माण करण्यात घोर अपयश आले असेल तर आज आमचे काहीच नाही असे वाटण्याची वेळ आली आहे कारण आम्ही जे अनुसरायचे त्यापासूनच फारकत घेतलेली आहे. आमचे काहीच उरलेले नाही...उरले असतील तर फार दूरच्या भूतकाळाचे वांझ विलाप जे आजच्या काळाशी सुसंगत नाहीत. आणि जे सुसंगत आहेत त्यांना आम्हीच नाकारण्याचा प्रमाद करत आहोत.
आम्हाला आमचे तत्वज्ञान आणि अभिव्यक्ती हवी आहे!
-संजय सोनवणी
All reactions:
Maharudra Mangnale, Rajesh Khanke and 35 others

Wednesday, February 15, 2023

मला काहीच व्हायचे नाही...

 मला तसं काहीच व्हायचं नव्हतं. त्यामुळे काहीच न झाल्याचे सुखही नाही किंवा दु:खही नाही. मला चालायचच होतं असही नाही....वाटलं तर चाललो....थांबलो तर थांबलो....मी मलाच स्वत:चा नियंत्रक होऊ दिले नाही त्यामुळे इतर कोणालाही माझा नियंत्रक कसा होऊ देईल? अगदी देवालाही नाही कि ईश्वरालाही नाही.

आणि एखाद्या दिशेने, बेभान, यशासाठी दौडत राहिल्याने यश मिळते, सुख मिळते यावर ज्यांचा विश्वास असेल त्यांचा असेल....
माझा माझ्यावर सोडला तर दौडण्यावर नाही कि थांबण्यावरही कधीच विश्वास नव्हता.
हो....मी कधी कधी चाललो....
सुखद हवेसोबत...निर्झरांच्या कलकलाटासोबत....पाखरांच्या चिवचिवाटासोबत
आणि माणसाच्या अनंत काळाच्या साकळलेल्या वेदनांसोबत...
घोंगावत्या वादळांसोबत....
कधी कधी थांबलो...
फक्त पाहत विश्वाचे अनुपम विभ्रम....
त्याचाच एक हिस्सा बनत.
मला काहीच व्हायचे नाही...कोणीही बनायचे नाही....!
-Sanjay Sonawani

Tuesday, October 4, 2022

स्वातंत्र्य

 संस्कार माणसाचे स्वातंत्र्य संकुचितच नव्हे तर अनेकदा चिरडुनही टाकतात हे सत्यच आहे. माणसाचे स्वातंत्र्य तो बोलायलाही शिकला नसतो तेंव्हापासुनच हिरावले जाण्याची सुरुवात होते. मानसिक पारतंत्र्यात वाढायची सवय झालेले आपली मुले/नागरिक तसेच परतंत्र रहावेत आणि त्यांना त्यात पारतंत्र्याचाही आभास होऊ नये अशा दक्षता घेतात. पण हे जगभर होते. पारतंत्र्य ही आपली मानसिक गरज बनून जाते ती अशी.

संस्कृती हीच मुळात कृत्रीम बाब आहे. कारण ती नैसर्गिक गोष्टींना सोयीनुसार बदलवून बनवलेली असते. पुर्ण निसर्गवादी राहता आले तर कदाचित स्वतंत्र असण्याचा अनुभव तरी येईल, पण पुन्हा (संस्कारांनी विशिष्ट धारणांचे बनल्यामुळे) त्यांना पुन्हा नैसर्गिकपणा "शिकवावा" लागेल. मग तोही तेवढाच कृत्रीम होण्याचा धोका नाही काय? मला वाटते "उत्स्फुर्ततावाद" स्वत:हुन समजुन घेणे, तसे वागणे कदाचित मानवी प्रेरणांना बदलवू शकेल...पण दुस-यांना बदलवण्याचा प्रयत्न करणे चुकीचेच ठरेल. कारण त्यामुळे तेही पुन्हा बदलवण्यचे संस्कारच असतील.
मला येथे ग्रीकांचा नियतीवाद आठवतो. चुकीचा असेल, पण ज्याची त्याची एक नियती असते हे क्षणभर मान्य केले तर अमूक तशा अवस्थेत (वैचारिक/सामाजिक) का आहे हे प्रश्न छळत नाहीत. आपल्याला करावे वाटते ते करत रहावे, सांगत रहावे...पण त्यामुळे अमुक एक परिणाम होईल याची अपेक्षा करण्यात काय अर्थ? शेवटी ज्याची त्याची "मर्जी"... म्हणजेच स्वातंत्र्य....
बदल हा स्वेच्छेचा विषय असतो. कोणी जग बदलवू म्हणत असेल तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो. महान नेते, अवतार, धर्मसंस्थापकही त्यांच्या अनुयायांना पुर्णतया बदलू शकले नाहीत हा आम्हा मानवांचाच इतिहास आहे. बदलाचा प्रयत्न करावा वाटणे ही व्यक्तीची स्वेच्छा आहे. स्वीकारायचे अथवा नाही, नाकारायचे तर काय नाकारायचे ही व्यक्तींची स्वेच्छा आहे. या स्वेच्छेला नमस्कार करुन आपापले स्वेच्छेचे कार्य करत रहावे, बदलावे वाटले तर बदलावे....ज्याला बदलावे वाटेल तोच बदलणार आहे. कृत्रीमतेचा सोस सोडला तर हे संस्कार आणि संस्कृत्यांचे सोसही किमान कमी तरी होतील.
माणसाला संपुर्ण स्वातंत्र्य देता / घेता येत नसेल तर किमान बाह्य बंधनांची संख्या तरी कमी करता यायला हवी. व्यक्तीला त्याच्या उत्स्फुर्ततेने जगता यायला हवे.

Saturday, August 13, 2022

विश्वात मानव एकटाच?

  




आपल्याला ज्ञात असलेला जीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमात्र ग्रह आहे. विश्वात अन्यत्र कोठे पृथ्वीसदृश्य ग्रह आहेत काय याचा आधुनिक विज्ञान शोध घेते आहे. असे काही ग्रह दूरच्या आकाशगंगांत सापडले असले तरी तेथे जीवसृष्टी आहे कि नाही, तेथे वातावरण आहे कि नाही, असल्यास त्याचे स्वरूप नेमके काय आहे याचा तपास अद्याप आपल्याला लागलेला नाही कारण ती आपल्या विज्ञानाची आजची मर्यादा आहे. प्रकाशाचा वेग ही मर्यादा असल्याने आणि या तारे व आकाशगंगा आपल्यापासून काही कोटी ते अब्जावधी प्रकाशवर्ष दूर असल्याने आणि अदयाप मानवाला प्रकाशाचा वेग गाठता येणे आज तरी सर्वस्वी अशक्य आहे. समजा तसा वेग गाठता जरी आला तरी प्रकाशवेगाच्या स्थितीत मानवी काळ आणि शरीर-भौतिकीत नेमकी काय तोडमोड होणार याचे भाकीतही वर्तवता येणे अशक्य आहे. समजा सारे अडथळे ओलांडून आपण विश्वाच्या या अथांग पसा-यात कोणा एका ग्रहावर जीवसृष्टीच्या शोधात निघालो तरी इप्सित स्थळी पोचेपर्यंत कैक पिढ्या अंतराळातच खपतील हे अजून वेगळेच. आणि समजा ज्याही पिढीचे लोक जीवसृष्टी असलेल्या ग्रहावर प्रत्यक्ष पोचतील तेंव्हा तेथे कोणत्या प्रकारच्या जीवसृष्टीशी मानवाचा सामना होईल? तेथील जीवसृष्टी जगण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच वातावरण असावे लागेल ही संकल्पना कदाचित उध्वस्तही होइल! तेथील वातावरण अत्यंत वेगळे व मानावासाठी विषारी किंवा अत्यंत प्रतीकुलही असू शकेल. बरे, मानवी डोळ्यांना दिसू शकणारी ती जीवसृष्टी असेल कि वेगळ्याच, माणसाला आज अज्ञात अशा, तत्वांनी बनलेली आणि म्हणून पाहण्यासाठी मानवी डोळा नव्हे तर विशिष्ट तत्वांनीच बनलेल्या डोळ्यांची आवश्यकता असेल? ते जीव प्रगत असतील कि उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यावर असतील? कि मानव तेथे पोचायला कोट्यावधी किंवा अब्जावधी वर्ष निघून गेल्यामुळे तेथील जीवसृष्टी उत्क्रांत होत तोवर नष्टही झालेली असेल? समजा ते जीव हयात असले आणि मानवापेक्षा अधिक तंत्र-प्रगत असले तर ते मानवाचे स्वागत कसे करतील? मानव त्यांच्यापासून शिकायचा प्रयत्न करेल कि त्यांच्यावरच मानवी वृत्तीनुसार कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत शेवटी नष्ट होईल? कि त्यांच्यापासून काही नवे शिकून पृथ्वीच्या दिशेने तीच अनंताची यात्रा करेल? आणि तो निघाला तेंव्हापासून अब्जावधी वर्षानी परतेपर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीची अवस्था काय असेल? पृथ्वीवर मानव तेंव्हा असेल कि तोही नष्ट झालेला असेल? मग हे परत आलेले जीव नेमके काय करतील?

       प्रश्न अनेक आहेत. काही प्रश्न तार्किक आहेत तर काही कल्पनात्मक आहेत. शेवटी या सर्व संभावना आहेत. आज तरी माणूस विश्वात एकाकी आहे अशीच भावना वैद्न्यानिक जगात व्याप्त आहे. तरीही त्याची अनावर जिज्ञासा विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी आहे काय याचा शोध सुरूच आहे. हजारो विज्ञान कथा-कादंब-या व चित्रपटही परग्रहवासी या संकल्पनेभोवती फिरतांना आपल्याला दिसतात. मानवी तत्वज्ञानावरही या एकाकीपणाची आणि म्हणूनच वैश्विक तादात्म्याची छाया आहे. एक कि अनेक या वादातून तत्वज्ञान पूर्वीच गेलेले आहे व शेवटी अद्वैत (एकमेवत्व) काही वेळा जिंकले आहे.

       एरिक वोन डॉनिकेनसारखे विक्षिप्त संशोधक मात्र या स्थितीवर वेगळाच तोडगा काढतांना आपल्याला दिसतात. मनुष्य हा पृथ्वीतलावरील एकमेवद्वितीय असा बुद्धिशाली प्राणी. तो या पृथ्वीतलावरचा असूच शकत नाही. अवकाशस्थ महाप्रगत मानव (देव) आपल्या अवाढव्य अंतराळयानात बसून पृथ्वीवर आले. पृथ्वीवरील नाझ्काच्या रेषा असोत कि पि-यामिड, महरौलीचा न गंजणारा लोहस्तंभ असो कि कैलासासारख्या अद्भुत लेण्या...म्हणजे पुरातन मानवाने एवढ्या प्रगत आणि आज अज्ञात असलेल्या तंत्रज्ञानाचा जो आविष्कार दाखवला आहे तो केवळ या एलीयंसमुळे. मानव हा एलीयांस आणि येथील माकडांचा संकरीत उपज असावा असाही तर्क अनेकांनी केलेला आहे. पुराकथाही त्यासाठी वेठीस धरल्या गेल्या आहेत. शेवटी देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव असा संदेश यात अनुस्यूत आहे. अद्भुताची ओढ असलेल्या मानवावर अशा संकल्पनांचे प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनीही पृथ्वीवर माणूस उपराच!नावाचे पुस्तक लिहून या सिद्धांताची पाठराखण केल्याचे आपल्याला दिसते. हे जगभर झाले. डॉक्यूमेंट-या जशा निघाल्यात तसे चित्रपटही निघाले. हे दावे अनेकदा लबाड्या करून केले गेले असल्याने अद्याप तरी या सिद्धांताला सिद्ध करू शकेल असा एकही पुरावा मात्र प्राप्त झालेला नाही. फार फार तर त्याला आपण वास्तव सांगत असल्याचा दावा करणारी अद्भुतरम्य कथा म्हणू शकतो. मनोरंजन करून घेण्यापलीकडे त्यांचे काही विशेष मोल नाही.

       असे असले तरी मानवाला अद्भुताची आवड पुरातन काळापासूनच आहे. त्याचे देव हे नेहमीच अधिक काळ जगणारे अथवा अमर्त्य असतात. त्यांची कृत्ये, त्यांचे राग व द्वेष हे कल्पनातीत प्रलयंकारी असतात. त्यांच्यात अगणित दिव्य्य शक्ती वास करत असतात. असे असले तरी ते देव-देवी दिसतात माणसासारखेच. हो, अन्य प्राणीही देव मानले गेलेत पण त्यांच्यावर मानवी गुण-दोषांचे आरोपण आहेच. ही निर्मिती, देवांची अथवा धर्माची, मानवाने जगण्यातील अनिश्चितता आणि मृत्यूचे असलेले निरंतर भय, यातून केली असे मानले जाते. देव-देवता या भयावरील उतारा ठरल्या. अतिप्राचीन काळातील उत्खननांत मिळाली आहेत ती बहुढंगी दफने. मृतांबद्दलच्या श्रद्धा व त्यांचे मृत्युनंतरचे जीवन सुखकर व्हावे म्हणून मृतांसोबत त्याच्या आवडीच्या वस्तू व प्राणीसुद्धा गाडायची प्रथा आपल्याला जगभर दिसते. इजिप्तमधील अजस्त्र पि-यमिड ही मुळात दफनस्थानेच आहेत. फार कशाला ज्याला आपण जगातील आदिम धर्मग्रंथ म्हणू शकू तो बुक ऑफ डेडसहा पि-यमिडसच्या भिंतींवर कोरलेला ग्रंथ मृताची यात्रा सुखकर पार पडो या बाबतच्या प्रार्थनांनी व मंत्रांनी भरलेला आहे. म्हणजे आदिम कला या मृत्योत्तर जगासाठी अवतरल्या असेही आपल्याला म्हणता येईल. विदर्भातील महापाषाणयुगातील वर्तुळाकार दफने हाही एक पुरावा आपल्याकडीलच आहे. थोडक्यात एकाकीपणा आणि मृत्युभय यातून मानवी कला, तत्वज्ञान, धर्म इत्यादी आविष्कारांना महत्व आले व ते सतत सुप्त पातळीवर मानवी मनावर राज्य करत असते हे आपल्या लक्षात येईल.

       म्हांजेच एकीकडे विद्न्यानही अंतता: याच मानवी प्रेरणांनी व्यापलेले असल्याने विश्वात कोठे जीवसृष्टी आहे काय याचा शोध सुरु आहे. विश्वात आपण एकाकी आहोत ही भावना कोठेतरी त्रस्त करत आहे. ही केवळ मानवी जिज्ञासा आहे असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. पृथ्वीचा कधीतरी नाश होईल”  या संकल्पनेचा पगडा त्यांच्यावर असावा अशी शंका येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच डॉ. स्टीफन हॉकिंग्ज यांनी मानवाला शंभर वर्षात मंगळावर स्थलांतरीत व्हावे लागेल.अशी भविष्यवाणी केलीच होती. हा फार तर वैद्न्यानिक मनातील सुप्त भावनेचा प्रकट उद्गार म्हणता येईल.

       मानवाची स्वभाववैशिष्ट्ये, कल्पना, ज्ञान-विज्ञानाच्या संकल्पना या शेवटी तो पृथ्वीसापेक्ष वातावरणात आणि तत्वांच्या प्रभावात निर्माण झालेल्या आहेत. त्याची सारी सामर्थ्ये पृथ्वीवरील प्राकृतिक प्रभावांच्या मर्यादेत आहेत. ती तशीच्या तशी अन्यत्र असतील व अशा ठिकाणी मानव अथवा जीवसृष्टी असू शकतील अशी त्याची स्वाभाविक कल्पना आहे. माणसाचा शोध असीम आहे हीसुद्धा त्याची सापेक्षतेतील सीमित मर्यादा आहे. विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी असेल अथवा नसेल, देव असतेल अथवा नसतील, पण मानवी कल्पनासृष्टीत (जे एका परीने दुसरे विश्वच असते) मात्र काहीही संभव आहे. कधी त्या कल्पना तर्कशुद्ध गणिती पद्धतीने मांडल्या जातात किंवा पुराणकथास्वरूपात वावरत राहतात. आणि यालाच आपण मानवी जीवन म्हणतो!

-संजय सोनवणी

 

Sunday, April 3, 2022

"अथातो ज्ञानजिज्ञासा"


प्रज्ञा असल्याखेरीज ज्ञानाची पायरी गाठता येणे अवघड असते. प्रज्ञा म्हणजे, मला वाटते ते असे- जीवन्/निसर्ग्/विश्व यातील गुढे उलगडण्याची अनावर जिज्ञासा. बादरायणांनी "अथातो ब्रह्मजिज्ञासा" अशीच ब्रह्मसुत्रांची सुरुवात केलेली आहे. म्हणज ब्रह्माबाबतची गुढे उलगडण्याची जिज्ञासा असेल तरच पुढील वाचावे असा त्या सूत्राचा मतितार्थ आहे. येथे "ब्रह्म" शब्द स्रुष्टीचे/विश्वाचे धर्म मूलकारण या अर्थाने येतो. जिज्ञासेचा विस्तार प्रज्ञेचाच आधारे होवु शकतो असे मला वाटते...आणि प्रज्ञा ही जिज्ञासेशिवाय अस्तित्वात असु शकते काय? कि दोन्ही एकाकार, परस्परावलंबी आहेत?
समजा नसल्या तरी जिज्ञासा हीच मानवी ज्ञानाला पुढे नेणारी बाब आहे हे तर नक्कीच. आहे त्या उपलब्ध ज्ञानाला मानवी सुखांसाठी प्रायोजित उपकरणांमद्धे बदलवणे वेगळे आणि आहे त्या ज्ञानाला आव्हाने देत बौद्धिक झेप घेणे वेगळे. दोहोंमागील प्रेरणा वेगळ्या आहेत. एक प्रेरणा तात्काळ अर्थक्रांती/सूखक्रांती घडवू शकण्याची संभावना बाळगते तर प्रज्ञात्मक जिज्ञासु प्रेरणा आहे त्या ज्ञानधारांनाच क्रांतिक रुप देत मानवी जीवनाला अधिकात अधिक अर्थ देण्याची संभावना बाळगते. भौतीक सुख मिळणे जेवढे आवश्यक आहे त्याहीपेक्षा अधिक बौद्धिक सूख मिळणेही मानवी समाजाच्या एकुणातील मानसिक संवर्धनासाठी आवश्यक असते.
आहे त्या ज्ञानाचे खंडन/मंडन करत अत्यंत अकल्पनीय ज्ञानधारांना जन्म देणे आणि मानवी मन सतत " या निशां सर्वभुतानां तस्यात जागर्ति संयमी" या उक्तीनुसार मानवी मन जागे कसे राहील याची काळजी वाहणे हे प्रज्ञेचे कार्य असते जे जिज्ञासेशिवाय अशक्यच आहे. मानवी समाज इतिहासकाळात अनेकदा अंधारयुगात गेला आहे. जेंव्हा मानवी जिज्ञासा धर्मांनी वा राजसत्तांनी रोखली तेंव्हा तेंव्हाच अशी अंधारयुगे आली आहेत...
आणि आज आपण तर माहितींच्या अवाढव्य ढगांमुळे निर्मित माहितीच्या अंधारात तर आलेलो नाहीत ना? माहितीलाच ज्ञान समजण्याची घोर चूक आपण करत तर नाही आहोत ना?
माहिती वाईट असते काय? नक्कीच नाही. पण ती जेवढी सोपी आणि उथळ होत जाते तेवढेच माहितीचे मूल्य कमी होत जाते. उपलब्ध माहितीचे मूल्यांकन कसे करावे हे प्रज्ञेखेरीज होवु शकत नाही. ज्या काळात माहिती मिळवणे अवघड होते, त्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असोत कि Dr. आंबेडकर, आदी शंकराचार्य असोत, म. फुले, रा. गो. भांडारकर असोत कि धर्मानंद कोसंबी, यांनी प्रज्ञा व ज्ञानात्मकतेची जी झेप गाठली होती ती आज कोठे गेली? कारण माहिती कोणती, कोठली आणि कशी विश्लेषनात्मक पद्धतीने वापरत सिद्धांत साधावेत याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. आणि ती मिळवण्यासाठीची अपार जिज्ञासाही त्यांच्याकडे होती. आज माहितीचा महापूर आहे...कोणती माहिती सत्य कोनती असत्य हे मात्र शोधण्याचा, विश्लेषण करण्याचा महामूर कंटाळा आहे...मग प्रज्ञात्मक ज्ञानाची प्राप्ती होवून नवविचारांचे सर्जन कसे होणार?
रिचर्ड बर्टनचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. हा अभिनेता रिचर्ड बर्टन नव्हे...जीवावरची संकटे पेलत या माणसाने, जेथे गैरैस्लामी प्रवेशु शकत नव्हता त्या मक्का-मदिनेला जीवावरची संकटे पेलत भेट दिली...अरेबियन नाईट्सचा हजारो पानी अब्यासपुर्ण टीपांसहित अनुवाद करत इस्लाम्/अरबी जग जगापुढे आणले. (बर्टन यांनी भारताला भेट देवून त्यावरही खूप लिहिले आहे.) याला मी "अथातो ज्ञानजिज्ञासा" असे म्हणतो.
मग आपण कोठे आहोत? इतिहासलेखनही उथळ, एकतर जातीयवादी/धर्मवादी वा वंशवादी द्रुष्टीने आजच्याही काळात होत असेल तर आपण ज्ञानात कोणती गुणात्मक प्रगती केली हा प्रश्न उभा राहतो. आपले इतिहास लेखन हे प्राय: सोयिस्करच इतिहाससामग्री वापरुन वा आळसाने सर्व उपलब्ध संदर्भही न तपासुन केले जात असेल तर याला जिज्ञासा अथवा प्रज्ञा म्हणता येत नसून निव्वळ बनचुकी हमाली आहे असे म्हणता येते.
थोडक्यात, क्षेत्र कोणतेही असो, च्यनेलवरील उथळ पण बौद्धिक वाटना-या चर्चा काय, किंवा वृत्तपत्रीय विश्लेषणे काय, किंवा संशोधनात्मक म्हटले जाणारे ग्रंथ काय, अपवाद सोडले तर स्वत:च्य प्रज्ञेच्या दिवाळखो-या काढत, प्रसंगी लबाड्या करत असतात आणि वाचकांना स्वांतसुखाय वातावरणात नेत एका मानसिक नशेत नेत त्यांचाही बौद्धिक विकास खंडित करत असतात.
एकुणातील समाजाच्या प्रज्ञेचा...अपार जिज्ञासेचा मार्ग, विचारकलहाचा सृजनात्मक मार्ग यामुळे कुंठित होतो याचे भान आपल्याला येणार काय? आम्ही प्रश्न विचारायला शिकणार काय? अथातो ज्ञानजिज्ञासा...असे म्हणनार आहोत काय?

Monday, October 1, 2018

मानवी स्वातंत्र्य

मानवी स्वातंत्र्य हे सर्वोपरी असुन सरकार हे त्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी असते, त्या स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी नाही.
मानवी प्रतिभेचा आणि विचारांचा उत्कट आविष्कार स्वातंत्र्याशिवाय शिवाय असंभाव्य आहे.
जेही नागरिक इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न करतील त्यांना दंड देणे आणि दुर्बलांचे उत्थान होईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे,
पण सरकार लोकांच्या हिताचे काय आहे हे परस्पर स्वत:ला अधिक अक्कल असल्याप्रमाणे लोकांच्या वतीने ठरवू शकत नाही.
स्वहित लोकांनीच आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवले पाहिजे. पण इतरांचे अहित न होऊ देता. तेवढ्यापुरतेच सरकार हस्तक्षेप करु शकले पाहिजे.
भारत स्वतंत्र देश नाही.
येथील नागरिक स्वतंत्र नाहीत.
कारण दुर्दैव हे आहे की लोकांच्या हिताचे काय आहे हे ठरवायचा अधिकार लोकांनीच त्यागलेला आहे आणि ज्यांना त्यांच्या मतीमंदत्वाकडे दुर्लक्ष करत तात्पुरत्या लाभांकडे लक्ष ठेवत निवडून दिले आहे ते व्यापक समाजहित करतील ही अपेक्षाच व्यर्थ आहे.
हे एक त्यांच्या अविरत अहिताचे हेच एकमेव कारण आहे. असे लोक आजन्म गुलामच राहणार आणि व्यवस्थेचे शिकार अथवा तात्पुरते लाभार्थी होत राहणार हे उघड आहे.
परवशता परकी सत्तांचीच नसते तर स्वकीय आपल्याच नागरिकांना अधिक परवश करतात आणि परिस्थितीच्या वांझ लाटा निर्माण करत त्याचे आत्मबळ हिरावून घेतात.
स्वातंत्र्य फक्त राजकीय नसते.
स्वातंत्र्य फक्त सामाजिक नसते.
स्वातंत्र्य व्यक्तीगतही असते.
स्वातंत्र्य आर्थिकही असते.
आम्ही कोणत्या स्वातंत्र्यात जगत आहोत?
आमच्यावर हे कडवे नियंत्रण असनारे कायदे-नियम बनवणारे कोण आहेत?
ज्या घटनेने "स्वातंत्र्य" हे मुलतत्व मानले ती घटना कोठे आहे?
की हे मर्यादितांनी अमर्यादांवर सत्ता गाजवायचे स्वातंत्र्य आहे?
आम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने शोधावा लागेल.

Monday, March 5, 2018

गुलामी की स्वातंत्र्य?


Image result for freedom or slavery


किमान विचारवंतांनी तरी कोणत्याही गोटात जाऊ नये. गेले तर तो गोटच त्यांच्या विचारपद्धतीवर नकळत बंधने घालतो. ही बंधने अनेकदा क्रूर असतात. त्या बंधनाबाहेर पडले की हेत्वारोप सुरु होतात. काहींना तर संपवण्यात येते. थोडक्यात विचारवंताला परतंत्र करणे हेच काम प्रत्येक गोटाचे असते (मग त्या गोटाची विचारधारा कोणतीही का असेना.) मग विचारवंतांसाठी गोट (छावण्या) की छावण्यांसाठी विचारवंत हा प्रश्न निर्माण होत अंततोगत्वा विचारवंत हा त्या छावणीचाच गुलाम बनुन जातो. तेथे विचारच संपतात हे ओघाने आलेच.
खरे तर प्रत्येकाने स्वतंत्र विचारवंत (फ्री थिंकर) रहायला हवे. कोणत्याही गोटासाठी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र विचारांत वृद्धी करण्यासाठी आणि एकुणातीलच मानवजातीच्या हितासाठी ती खर्च करावी. कोणतेही "गोट" हे शेवटी आपल्यातीलच ’माणुस’ बदलला, छावनी-विचाराला छेद देऊ लागला की आपले सुळे काढून नृशंसत्व दाखवतातच. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. तरीही अशा विचारवंतांना शहाणपण येते असे नाही. या छावणीतुन त्या छावणीत जाणारे दिसतच असतात. मग "झुंडीचे गुलाम विचारवंत" असे एकुणात त्यांना स्वरुप येते आणि यात हत्या होत असेल तर ती विचारप्रक्रियेची, नव तत्वज्ञानाची. छावण्यांचे काही बिघडत नाही कारण नवनवे विचारक बकरे त्यांना लाभतच जात असतात.
छावण्यांना नवे असे काहीही नकोच असते, मग ती छावणी प्रतिगामी असो की पुरोगामी. त्यांना प्रत्येक विचार त्यांच्याच पुर्वनिर्धारीत चौकटीतच छाटुन बसवायचा असतो. त्यांना विचार हवा असतो पण त्यांच्या ठरवलेल्या तत्वज्ञानाच्या मर्यादेत. विचारवंतांना ते दास्य स्विकारावे लागते आणि हे दास्य प्रसिद्धी अथवा पैशांच्या मोहाने ज्यांना हवे आहे त्यांना मग विचारवंत कसे म्हणता येईल?
गुलामांकडून नववैचारिकता कशी अपेक्षिता येईल? आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल? कोणत्याही छावणीला मानवतेशी फार घेणेदेणे असते असे नाही. फार तर तोंडी लावायला शोषित, वंचित, मानवता हे शब्द कामाला येतात पण त्यांचे हित हा त्यांचा अंतिम उदेश्य असतो असे दिसलेले नाही.
पण ज्याला त्याला त्याच्या छावण्या लखलाभ असे म्हणतांना किमान विचारवंतांनी तरी गोट/छावण्यांचा मोह सोडला पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र आणि दबावविरहित ठेवायला हवेत. आणि सर्व प्रकारच्या छावण्यांच्या त्यागातुनच ते होऊ शकेल. भारतीयांना नवविचारांची गरज आहे. छावण्यांच्या मोहात न पडता सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र विचारांचा परिपोष कसा होईल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. छावण्या म्हणजे शेवटी रानटी झुंडीच असतात हे प्रत्येक नव-विचारकांनी लक्षात घेतले पाहिजे.
गुलामी की स्वातंत्र्य हा निर्णय त्यांनीच करायचा आहे.

Tuesday, May 9, 2017

जय अज्ञानवाद!

भारतात वेगवेगळ्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्याने भारतियांचे काय हित केले ते प्रश्न अलाहिदा. आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत. बहुदा हे समजुनच भारतात एकमेवाद्वितीय असा तत्वज्ञानाचा पंथ अस्तित्वात आला होता आणि त्याचे नांव होते "अज्ञानवाद". म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मूक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले. जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते. काय होते या पंथाचे तत्वज्ञान?

१. दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील जानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच!

२. कलुषित मनाच्या माणसांना जास्त काळ संसार बंधात रहावे लागते. मग ज्ञानामुळे मोक्ष कसा मिळणार?

३. ज्ञानच नसले तर अभिमान आणि द्वेष निर्माण होत नाहे व मोक्ष पटकन मिळतो.

४. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा निर्माण झाल्या कि ओघाने कर्म आलेच! मनाच्या प्रेरणांमुळे निर्माण होणा-या कर्माचे परिणाम हे तीव्र असतात. ते लोकांना लाभकारकच असतील असे नाही. आणुइ लाभ म्हणजे काय हे कोणी ठरवायचे?

५. मनाच्या प्रेरणेवाचून केवळ शरीराने घडणा-या नैसर्गिक आपसूक होणा-या कर्मांचे परिणाम फार वाइट अथवा दु:खदायक नसतात. प्रेरणेने होणारी कर्मे मात्र दु:खदायकच होण्याची शक्यता असते.

६. मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते? प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल.  

७. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की "मला दिव्य ज्ञान झाले आहे." पण याला प्रमाण काय? ते खरे मानायचे निकष कोणते? आणि ते कोणी ठरवायचे? थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग ह उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट?

तर हा झाला अज्ञानवाद. फारसा माहित नसलेला पण भारतियांनी पुरेपूर आपल्या हाडीमांसी रुजवलेला. हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच! कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार? प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार? कशाला? कोणी सांगितली नसती उठाठेव? दृष्टीआड ते सृष्टीआड हा आपला मुलमंत्र आहे की काय? 

अज्ञानाची आस ही अशी आहे. अज्ञानातील जगण्यात आम्ही संतुष्ट आहोत. म्हणजे अज्ञानवाद्यांच्या मतानुसार आम्ही मोक्षप्राप्तीला खरे लायक आहोत. 

जय अज्ञानवाद!

Monday, May 8, 2017

भांडवलदरांची मोठी बाजारपेठ!

१९७९ सालची गोष्ट. नासाने अवकाशात सोडलेली स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार होती. गांवाकडे अफवांचा बाजार जोरात होता. ती नेमकी कोठे पडणार हेही पाहित नव्हतं. गांवाकडे ही स्कायलॅब पडून सारे मरणार ही अफवा एवढी जोरदार होती कि अनेकांनी आहे नाही ते विकुन जीवाची मुंबई करण्याचा चंग बांधला. आवडीचे सारे खाऊन घ्यायचे ठरवले. थोडक्यात भयलाटच उसळली होती. वृत्तपत्रांशिवाय काही कळण्याचे साधन नव्हते. गांवात एकच पेपर येई. त्यात रोज बातम्या आणि अन्य अफवा असतच. सारे जगणे त्या मरणाच्या भयाभोवती फिरत होते. अखेर नासाच्या शास्त्रज्ञांनी स्कायलॅब दूर समुद्रात पाडली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
कयामत येणार, जजमेंटचा दिवस जवळ आला आहे अशा अफवा भिंतींवर रंगवलेल्या तुम्हीही पुर्वी पाहिल्या असतील. शंभर वर्षात पृथ्वीवरून स्थलांतर करावे लागेल असे आता शास्त्रज्ञही सांगू लागलेत. आधार काय तर तो काही नाही. पण भयनिर्मितीचे धंदे नेहमीच जोमात असतात. असंख्य उत्पादने आपण या कोणत्या ना कोणत्या कृत्रीम भयापोटीच विकत घेत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही. पन्नाशी ओलांडलेले आयुर्वेदाचे नुस्खे अभ्यासत बसतात...वापरतातही नि त्यांची उपयोगिता सांगत बसतात. आम्हीच तुमचे तारणहार, विरोधी पक्षाहाती सत्ता दिली तर तुमचे वाटोळे पक्के असे राजकीय पक्षही बजावण्यात वस्ताद असतात! भयभीत माणुस ही भांडवलदारांची सर्वात मोठी बाजारपेठ असते. धर्मांनी याचा सर्वात जास्त वापर केलाय! सर्वात मोठे भय तर मृत्युचे. त्याचा व्यापार इस्पितळेही कसा करतात हा अनुभव सर्वांना आहेच!
भयभीत माणसाला काहीही बरे करू शकत नाही. बव्हंशी आजार याच मानसिकतेतून उद्भवतात हे आपल्या लक्षातही येवू नये एवढी आपली व्यवस्था चतूर असते. भयापासून दूर राहणे, अकारण चिंता करत दिवस वाया न घालवणे हे अधिक श्रेय:स्कर नाही काय?

Saturday, November 26, 2016

भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे!

एक मुक्तीदाता...एक तारणहार...या संकल्पनेने मानवी मनावर पाशवी गारुड केले आहे आणि यातच त्याच्या स्वनिमंत्रित गुलामीची बीजे आहेत. दगडालाही शेंदूर फासत त्याच्यातही एकमात्र ईश्वर शोधणारे कमी नसतात. भारत तर अशांचा मुकूटमणी. अशा समाजात स्वतंत्र विचार, लोकशाहीची मुल्ये ख-या अर्थाने रुजू शकत नाहीत.

ख-या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, ते सुटुच नयेत यासाठी थिल्लर प्रश्नाभोवती राष्ट्रीय अस्मितांना चेतवले जाते तेंव्हा राष्ट्राने आपला आत्मा हरवला आहे असे समजायला हरकत नाही. मुक्तीदाता कोणीही नसतो हे भान नसणे हे स्वत:च गुलामीसाठीच जन्माला आलेल्यांना समजणे शक्यच नसल्याने त्यांचे उन्माद हेच जणुकाही राष्ट्रवादाचे उद्गार बनतात. आपल्या जहरी उद्गारांच्या समर्थनार्थ हवे ते मार्ग वापरणे ओघाने आले.

हे राष्ट्राच्या मुळांचेच वधक असतात. सर्जनाचे कृत्य यांच्याकडून होऊ शकत नाही. विध्वंस हेच त्यांना सृजन वाटावे अशा पद्धतीने यांची मानसिकता बनवण्यात आली असते. संधी मिळताच ती उफाळते. एकामागोमाग एक अशी कृत्ये घडू लागतात. अशा रितीने कि मागचे कृत्य सौम्य वाटावे. बुजगावण्यांनाही शेताचे मालक आहोत असे वाटावे अशी स्थिती यातुनच निर्माण होते. राष्ट्राचे मारकच लोकांना राष्ट्रभक्ती शिकवू लागतात.

नादानांची क्रांती आत्मघातकी असते हे आम्हाला विसरून चालणार नाही.

भारत दुर्दैवाने आज तरी अशा स्थितीत आहे.  

Monday, November 14, 2016

ज्ञान म्हणजे काय? (५)

माहितीतून ज्ञान येते कि उत्स्फुर्त कल्पनाशक्तीने अचानक सुचवलेल्या एखाद्या संकल्पनेमुळे विशिष्ट-ज्ञानाकडे जायचा प्रवास सुरु होतो? माहितीतून येणा-या ज्ञानात स्वत:च्या प्रतिभेची भर घातल्या खेरीज ती माहिती म्हणजे एक प्रकारचा सचलेला माहितीचा अस्ताव्यस्त ढीग होय. त्या माहितीला सुसंगत क्रमात घेत त्याचे विश्लेशन करत त्या माहितीला एका तर्कसीमेपर्यंत नेता आले तर माहितीचे विशिष्ट ज्ञानात रुपांतर झाले असे म्हणता येईल. ही तर्कसीमा ही त्या व्यक्तीचा वकूब ठरवेल हेही तेवढेच खरे. कारण तर्क संपला असे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडले तरी तो म्हणजे तर्काचाही अंत नाही. तर्क त्याहीपुढे जाऊ शकतो व ही प्रक्रियाही सतत सुरु राहणे ज्ञानाच्या विश्वात गरजेचे असते.

मी नीतिशास्त्रावर लिहितांना उत्स्फुर्ततावादाचा पुरस्कार केला होता. प्रत्येक माणसात उत्स्फुर्तपणे घोंगावणा-या स्वतंत्र कल्पनांचा गोंगाट असतोच. त्यातील कोणती उपयुक्त व कोणती अनुपयुक्त हे सर्वांना ठरवता येतेच असे नाही. तसेच अशा उत्स्फुर्त संकल्पना धुसर असल्याने त्या स्मृतीत दिर्घकाळ राहतील असेही नाही. उत्स्फुर्तपणे सुचलेल्या संकल्पनांवर बाह्य घटकाचा प्रभाव नसतोच असे नाही. अनेक संकल्पना अव्यवहार्य वाटल्याने अनेकजण सुचताच तशाच सोडुनही दिल्या जातात. काही लोक मात्र संकल्पनांचा उपयुक्ततेचा विचार न करता पाठपुरावा करतात व त्यातून एखादा सिद्धांत, कविता, साहित्यकृती अथवा शोध निर्माण करतात. नाविण्याचा जन्म उत्स्फुर्ततावादातून होतो. हा उत्स्फुर्ततावाद माहित्यांचे संकलन करतांनाही अचानक जागा होऊ शकतो व एखाद्या घटनेचे नवे अन्वयार्थ व्यक्तीला लागतात. त्यातून नवनिर्मिती घडू शकते.

जी संकल्पना सुचते ती अव्यवहार्य असतेच असे नाही. अनेक संकल्पना काळापुढच्या असल्याने त्या आजच्या वर्तमानात अव्यवहार्य वाटल्या तरी त्या अनुपयुक्त आहेत असेही म्हणता येत नाही. अनेक संकल्पना बाळबोध असतात हेही खरे. पण त्यामुळे चिंतीत होण्याचे कारण नाही. प्रत्येक संकल्पनेचे स्वत:चे असे महत्व असतेच. त्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतर बाद होऊ शकतात. त्या निरर्थक आहेत असे दिसू शकते. तरीही त्या महत्वाच्याच असतात कारण कोणत्या संकल्पना टाकवू आहेत हे त्याशिवाय कळत नाहीत. शिवाय आजच्या प्रयोगांतून टाकावू वाटलेल्या संकल्पना वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या परिस्थितीत प्रयोग केल्याने वास्तवात येणारच नाहीत असे नाही. ज्यूल्स व्हर्नने आपल्या वैज्ञानिक कादंब-यांत मांडलेल्या संकल्पना नंतर प्रत्यक्षात, वेगळ्या पद्धतीने, अधिक शास्त्रुशुद्धतेने प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या हा इतिहास आहे. अकल्पनीय, प्रसंगी हास्यास्पद वाटणा-या संकल्पनांचेही असेच असते.

संकल्पनेच्या बीजाशिवाय प्रत्यक्ष वृक्ष वाढणार नाही हे तर आहेच. माणसाला संकल्पना सुचतात, अचानक काहीतरी सुचून जाते ही प्रक्रिया नेमकी का आणि कशी घडते हे अद्याप उलगडायचे आहे. मानवी मनात अमर्याद असलेली कुतुहलाची सुप्त शक्ती त्यामागे काम करत असू शकते. भवतालही या प्रक्रियेत हातभार लावू शकतो. संकल्पनांचे प्रकार अनंत आहेत असे म्हटले तरी चालेल. त्यावर मर्यादाही अनंत आहेत हेही खरे. मनातील पुर्वग्रह, एखाद्या तत्वाच्या प्रेमात पडणे अथवा त्याचाच सुप्त अथवा जागृत प्रभाव व्यक्तीच्या मनावर असणे या अनेकदा मर्यादा बनून जातात व त्या आज आपण मान्य केलेल्या अगदी शास्त्र सिद्धांतांवरही असतात. आजही आपण विश्वाचा विचार सापेक्षवादी चौकटीत करतो पण निरपेक्षवादी (जेथे चौकटच नसेल) स्थितीतील विश्व कसे असू शकेल येथवर आपली मजल गेली नाही. मी विश्वरचनेचा सिद्धांत मांडतांना निरपेक्षवादाचा विचार केला आहे, पण अजून तरी माझे म्हणने काहींना (म्हणजे ज्यांनी वाचले आहे त्यातील) स्विकारणीय नाही.  ते तसे कदाचित असेलही, पण हाही एक विचार आहे व तो अर्धवट सोडून देणे योग्य नाही असे मला वाटते. अनेक सिद्धांतांचा मृत्यू अशा वातावरणामुळे झाला आहे हेही आपण पाहू शकतो.

आव्हानच दिले जाऊ शकत नाही असे कोणतेही सिद्धांत असू शकत नाहीत. एकाच उपलब्ध संदर्भचौकटीत ते निर्विवाद वाटले तरी अन्य संदर्भचौकटींत ते तसे असतीलच असे नाही. इतिहासाचेही वेगळ्या प्रकारे असेच असते. समजा उद्या सिंधू लिपी निर्विवाद वाचली गेली (एखादा रोझेटा स्टोन सापडल्याने) तर आज त्या संस्कृतीबाबतचे आजवरच्या सर्व विद्वानांचे आकलन ढासळून टाकू शकते. एखादी अजून पुरातन संस्कृती परिसरातच अथवा अन्यत्र उजेडात येऊ शकते. अनेक कोडी सोडवत नवीन कोडी उभी राहू शकतात. थोडक्यात ही प्रक्रिया निरंतर आहे.

त्यामुळे विशिष्ट-ज्ञानाचा प्रवासही त्या विशिष्टतेच्या मर्यादेत पुर्ण होऊ शकत नाही. मग ज्ञान म्हणता येईल असे मुलतत्व कोठे राहते?

 मग ज्ञानाचा काही अंतिम थांबा आहे काय? असल्यास तो नेमका कोनता? सर्व विशिष्ट-ज्ञानांचे ध्येय एकच असले तर असा Grand Unified Knowledge चा एकच एक असा टप्पा असु शकतो काय आणि असल्यास त्याची काही रुपरेषा तरी आज आपल्याला गवसू शकते काय हे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

आपल्याला विचार करतच रहावा लागेल. 

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...