Friday, October 11, 2024

अरबांचे पलायन!



बोलन खिंडीतून उतरलेल्या मोहम्मद कासीमची धाड अर्थातच सर्व प्रथम देबल बंदरावर पडली. कारण अरब कैदीही तेथीलच तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण त्याला वाटले होते तेवढ्या सहजपणे सिंधचा राजा दाहीरला त्याला जिंकता आले नाही. बंदर जिंकण्यासाठी तब्बल सात दिवस त्याला संघर्ष करावा लागला. राजपुत्र जयसिंहानेही या युद्धात प्रचंड पराक्रम गाजवला. बंदर जिंकल्यानंतर दाहीरने माघार घेतली खरी पण कासीम सिंधू नदी ओलांडण्याच्या बेतात असताना दाहीरने सर्व शक्ती एकवटून कासीमच्या सैन्यावर अरोर येथे हल्ला केला. येथे मात्र दाहीरचा समूळ पराभव झाला. दाहीरचा शिरच्छेद करण्यात आला. सिंध राज्याचा हा अस्तच होता.
युद्धानंतर दाहीरची पत्नी लाडी हिच्याशी कासीमने जबरदस्तीने विवाह केला तर दाहीरच्या सूर्या व प्रेमल या दोन्ही राजकन्यांना भेट म्हणून खलीफाकडे पाठवून दिले असे चचनामा या तत्कालीन ग्रंथावरून दिसते. दाहीरचा पुत्र जयसिंह मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याने आधी कांग्रा राज्यात आश्रय घेतला असला तरी शेवटी काश्मिरनेच त्याला आश्रय देण्याचे धैर्य दाखवले. कासीमचे सिंध-मकरान प्रान्तात अरबांचे बस्तान बसले. देबल बंदर व बोलन खिंडही ताब्यात आल्याने व्यापारी मार्ग अरबांच्या ताब्यात गेले. अर्थात कासीमचे विजय सोपे मात्र नव्हते. त्याला एतद्देशीय सत्तांच्या कडव्या विरोधाला सामोरे जावे लागले.
सिंधमध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर कासिमने उत्तरेकडे आपला मोहरा वळवला पण मकरानमध्ये (बलोचीस्तान) व उत्तरेकडे मोहरा ओलांडल्यानंतर पख्तुनीस्तानादि भागांतील टोळ्यांनीही अरबांना कसून विरोध तर केलाच पण सिंधमध्ये असतांना जाटांनीही त्याला पुष्कळ उपद्रव दिला. तत्कालीन इतिहासकार अल बालाधुरीनुसार सिंध जिंकल्यावर कासिमने हिंदच्या राजांना इस्लाम स्विकारायचा फतवाच काढला होता. शिवाय त्याने उत्तरेतील राजांविरोधात सैन्यही पाठवले. सौराष्ट्रच्या (वल्लभीचे मैत्रक) राज्याने कासीमशी तह करुन टाकला. मिड लोक तर आधीच शरण आलेले होते. फतव्यांपाठोपाठ कासिमचे दहा हजारांचे सैन्य कनोजकडे वाटचाल करु लागले. कनोजला तेंव्हा राजा हरचंदर राज्य करत होता. त्याला कासिमची शरण येण्याची आज्ञा मिळताच त्याने कडवे उत्तर पाठवले. त्या उत्तरात तो म्हणाला, “वकीलांना कैद करण्याची आमच्यात प्रथा नाही, अन्यथा तुझा माज तुझ्या वकीलांना दंडबेड्या ठोकून उतरवला असता. तू तुझ्या अमीराकडे परत जा आणि त्याला सांग की रणमैदानावरच आमची शक्ती तुला पहायला मिळेल." या उद्दाम उत्तरामुळे कासिमला संताप आला असला तरी त्याच्या सेनापतींची कनौजविरुद्ध काहीही करण्याची हिंमत झाली नाही.
काश्मिरने दाहिरपूत्र जयसिंहाला आश्रय दिला असल्याने त्याने आपला मोहरा काश्मिरकडे वळवणे स्वाभाविकच होते. काश्मिरवर स्वारी करण्यासाठी स्वत: मोहम्मद कासिम खलिफाचीच येथील रजवाड्यांना शरण येण्याची आज्ञा घेऊन निघाला होता. पण तो काश्मिरच्या तत्कालीन सीमांपर्यंतच, म्हणजे पंजाबमधील जालंधरपर्यंतच, पोहोचू शकला. तेंव्हा काश्मिरच्या सीमा जालंधरपर्यंत विस्तारलेली होती. त्याला तेथेच काश्मिरच्या चंद्रापीडाच्या सैन्याच्या कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागला. चंद्रापीडाने आपल्या युद्ध कौशल्याने कासिमला तेथेच रोखले आणि त्याला आपली दिशा वळवायला भाग पाडले. काश्मिर जिंकुन घेता येईल आणि काश्मिरच्या राजा चंद्रापीडाने आश्रय दिलेल्या दाहिरचा राजपुत्र जयसिंहालाही पकडता येईल हे कासिमचे दिवास्वप्नच ठरले. अन्यत्र विजयी ठरलेल्या कासिमला तेथे माघार घ्यावी लागल्याने ती मोहिम त्याने तेथेच सोडली आणि तो हिमाचल प्रदेशातील कांग्रा राज्याकडे वळाला. हे राज्य अरब दस्तावेजांत अल-किराज म्हणून उल्लेखले गेले आहे.
तेंव्हा कांग्रा भागात किरा वंशीय राज्यकर्ते राज्य करत होते. कांग्रा राज्यानेही काही काळ जयसिंहाला आश्रय दिला होता, पण तेथील राजाच्या जानकी नामक लंपट बहिणीने त्याला एके रात्री आपल्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले आणि ते पाप उघडकीला येईल या भितीने आपल्या भावाकडे जयसिंहानेच आपल्याशी अतिप्रसंग केला असा आरोप केल्याचे समजताच जयसिंह तेथून कसाबसा सटकला आणि पुन्हा काश्मिरच्या राजाच्या आश्रयाला गेला अशी माहिती चचनामा देतो, पण ही माहिती कितपत विश्वसनीय आहे याबाबत शंका आहे. पण कांग्रावर कासिमने आक्रमण केले हे मात्र खरे. हे छोटे राज्य कासिमच्या आक्रमणासमोर टिकाव धरु शकले नाही. पण कासिमसारख्या बलाढ्य व कूशल सेनानीला सीमेवरच हरवून अन्यत्र वळायला भाग पाडने हे काश्मीरचा राजा चंद्रापीडाचे मोठेच साहसी कार्य होय.
कासीमने मर्यादित का होईना यश मिळवले आहे आणि यापेक्षा तो अधिक काही साध्य करू शकत नाही हे लक्षात येताच सन ७१५ मध्ये कासिमला अरबस्तानात परत बोलावले गेले. नंतर तिकडेच काही काळातच त्याचा मृत्यू झाला. भारतात तो केवळ चार वर्षच राहिला पण येथील उत्तरपूर्व भागातील सामाजिक जीवनाची व राजसत्तांची पुरती नासाडी झाली. त्याचा मृत्युही नेमका कसा झाला याच्या दोन हकीकती आहेत. अल-बालाधुरी म्हणतो की मोहमद कासिम इराकच्या अमीराशी (गव्हर्नरशी) झालेल्या कौटुंबिक झगड्यात मारला गेला तर चचनाम्यानुसार कासिमने दाहिरच्या ज्या सुर्या आणि प्रेमल या दोन कन्यांना बंदी बनवून खलिफाला भेट म्हणून पाठवल्या होत्या त्यांनी खलिफास "आमचा कौमार्यभंग आधीच खुद्द कासिमनेच केला असून उष्टावलेल्या आम्ही तुम्हाला पाठवण्यात आलो आहोत." असे खोटेच सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या खलिफा लेमान बिन अब्द अल मलिकने त्याला गायीच्या चामड्यात शिवून घेऊन गुदमरवून आत्महत्या करायला भाग पाडले. यातील दोन्ही घटनात खरी कोणती हे सांगणे अशक्य आहे, पण नंतर त्या दोघींचे काय झाले याचीही माहिती दुर्दैवाने मिळत नाही.
दाहीरपुत्र जयसिंह कासिम परत जाईपर्यंत तरी काश्मिरमध्येच राहिला असे दिसते. कासिम परत गेल्यानंतर जयसिंहाने आपल्या राज्यात परत जाऊन कासिमच्या आज्ञेनुसार इस्लाम स्विकारुन हुल्लीशाह हे नाव धारण करत खलीफाचा मांडलिक म्हणून आपली सत्ता स्थापित केली. अर्थात खलीफाने जुनैद या राज्यपालाची नियुक्ती केल्यानंतर मात्र जुनैदने त्याच्याशी कुरापत काढून त्याच्याशी युद्ध केले व त्याला जिवंत पकडून नंतर त्याची हत्या केली. अशा रीतिने सिंध प्रांतावर अरबांची सार्वभौम सत्ता स्थापित झाली.
अरबांनी सिंध प्रांताची अतोनात लुट केली याचेही अनेक दाखले आहेत. पण नंतर काश्मीरच्या सत्तापदी ललितादित्य मुक्तापीड हा समर्थ शासक आला. त्याने मात्र अरब आक्रमक हे या भूमीला धोका आहेत हे ओळखले. त्याने अरबांना पळवून लावण्यात त्याने नुसते यश मिळवले नाही तर त्यांचा पाठलाग करत राज्यपाल जुनैदला ठार मारले आणि तुर्कस्थानपर्यंत काश्मीरचे साम्राज्य पसरवले. हा रोमहर्षक इतिहास पुढील लेखात.
-संजय सोनवणी
May be an image of 1 person and text
Like
Comment
Send
Share

अरबांचे पलायन!

बोलन खिंडीतून उतरलेल्या मोहम्मद कासीमची धाड अर्थातच सर्व प्रथम देबल बंदरावर पडली. कारण अरब कैदीही तेथीलच तुरुंगात ठेवण्यात आले होते. पण त्य...