Tuesday, September 13, 2011

महार कोण होते?

महार कोण होते?

महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असे:

१. महार समाजाला गांवकुसाबाहेरचे वास्तव्य होते.
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणा-या जाणा-यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवुन ठेवणे हे त्यांचे कार्य होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
७. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. 
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणुन आधी महारांनाच प्राधान्य दिले होते.
९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटील वा नगराध्यक्षाला ते देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपुर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
१०. महार समाज अस्प्रुष्य गणला गेलेला होता.
११. महारांवर शेतसारा/खजीना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा/संदेशादिंचे दळनवळनाचेही काम होते.
१२. महारांना वतनाच्या स्वरूपात बर्याच जमिनी दिल्या गेलेल्या आहेत ते या सेवांचा अतिरिक्त मोबदला म्हणून.  

असो, हे मुद्दे वाढत जातील. येथे मला सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे. यासाठी पुर्वी अनेक विद्वान व डा. इरावती कर्वेंसारख्या विदुषिंनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.

"म्रुताहारी" (म्हणजे म्रुत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणुन) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: म्रुत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे म्रुताहारी बुद्ध धर्माच्या द्न्यात इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मुळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.

महाआहारी (खुप खाणारे) असणा-या लोकांना महार म्हणु लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रोबेर्टसन) मद्धे दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही.

दुसरे असे कि महार एक जात म्हणुन कोनत्याही स्म्रुती/पुराणांमद्धे उल्लेखिलेली नाही. अस्प्रुष्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्म्रुत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्म्रुतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्प्रुष्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार व विष्णुस्म्रुतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्प्रुष्य आहे. त्यामुळे मुलात जन्मभुत अस्प्रुष्यता भारतात नेमकी कधी आणि का आली असे सांगता येत नाही.
 
वर्णसंकरातुन अस्प्रुष्य जातींचा विकास झाला हे मनुस्म्रुतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्म्रुतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल ई. भारतात अस्प्रुश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही.
 
याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्म्रुतीकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्प्रुष्य बनवले गेलेले दिसते, त्याचेही विश्लेषन येथे आपल्याला करावयाचे आहे.
 
मग प्रश्न असा उद्भवतो कि "महार" ही मुळात जात होती काय?

महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?

त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक द्रुष्टीक्षेप टाकुयात. महारांमद्धे आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे ई. आडनावे आढळतात.

या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतुन कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले.
 
त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातुन विकसीत झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महलक्ष्मी ई.) त्याचवेळीस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्प्रुष्तेचा काळात अन्य मंदिरांत स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहु शकतो. धनगर समाजानेही आपली अस्प्रुष्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहे.
 
म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या-त्या व्यवसाय-सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास होवू लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकातील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.
 
आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत हे आपणास माहितच आहे. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीत असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
 
त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णीत केलेली महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासुन घेवुयात.

अ. महार हे ग्रामरक्षक होते...चो-या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपु शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भुमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इ.स. च्या पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातुन जातांना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे.

म्हणजेच गावाचे/व्यापा-यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.

या दोन मुद्द्यांवरुन मला स्पष्ट दिसते कि "महार" हा शब्द  सातवाहन कालीन प्राक्रुत महारक्खित-महारक्ख या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे.
 
आणि हीच सद्न्या महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोनतीही नाही हे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुनच सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकिय अस्थिरता, धामधुम आणि कधी पुर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जीवंत राहुच शकत नव्हती.

उदय

महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतु समाजेतिहासाचा अंदाज घेतला तर जेंव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेंव्हाच हा समाज आपल्याच समाजातुन लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभुत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रु सैन्यावर तुटुन पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासुनची आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशीरा लागेल म्हणुन कधीतरी रक्षकांनी गाव/शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: क्रुषिप्रधान होती व शत्रु नगर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणा-या रक्षकांची वसती केली गेली असावी असे मला वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भुषवत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणुन ओळखली जावु लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती-स्म्रुती-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
 
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवुन ठेवले असेल याचे हेच कारण आहे कि परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी द्न्यात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.

१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमने/पर-आक्रमने यात तर वाटेत येतील त्या गावांत लुटालुट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहुन गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जीवाचा धोका पत्करुन उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहीली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागलेले आहे.
 
२. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालुन करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत द्न्यात इतिहासातही दिसत नाही.

३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत एवढ्या त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.

४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मद्धेच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.

५. महार समाजावर अस्प्रुष्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असुनही आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.

६. अस्पृश्यातीची करणे दुष्काळात पसरलेल्या रोगाराई असावी असे मानायला पुष्कळ जागा आगे. सन १०३२ ते १६३० या कालात भारतात २५० लहान-मोठे भयंकर दुष्काळ पडून गेले. मृत जनावरांना हलवताना  त्यांनाही रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांचा स्पर्श टाळण्याची प्रथा पडून ती  कायम झाली असण्याची शक्यता आहे.  
 
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती क्रुतद्न्य असले पाहिजे हे लक्षात येइल.

अवनती कशी व का झाली?

महार समाजाला नेमके कधी अस्प्रुष्य ठरवले गेले याबाबत इतिहास मुक आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो. तसा अल्प प्रयत्न मी येथे करत आहे.

१. गावाचे रक्षण करणा-यांना, आणि जे आधी सर्वच समाजघटकांतुन आले होते त्यांना आरंभापासुन अस्प्रुष्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
 
२. ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेंव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करना-या महाराष्ट्रातील महारांना अस्प्रुष्य मानले जात असण्याची शक्यता नाही. किंबहुना ८व्या शतकापर्यंतच्या स्म्रुतीही महारांचा अस्प्रुष्य म्हणुन निर्देश करत नाहीत.
 
असे असले तरी महार समाजाची हळुहळु सामाजिक पातळीवर अवनती होत गेली, त्यांना सर्व जबाबदा-या पुर्ववत तर ठेवल्याच, पण त्यांत अमानुष वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल.
यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.

१. अखिल समाजाची आर्थिक अवनती:  दुष्काळ आमी स्थानिक अराजक, परकिय आक्रमणे यामुळे राष्ट्रीय व्यापार कोसळला. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली.

यादवकालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले स्थैर्य पहातो. परंतु तरीही आंतरराज्यिय व्यापार मात्र उत्तरेकडील धुमधामीने संपत गेला.
 
अस्थैर्याच्या कालात व्यापाराला फटका बसतो तसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो. उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात. जेवढी मागणी तिही स्थानिक, वा परिसरातील, तेवढेच उत्पादन करु लागतात. सेवा क्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो. महार समाजा हा सेवाघटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे.
 
इ.स. ११-१२ व्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरु झालेली दिसते. ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली, आणि तिचा फटका सर्वच घटकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे. कारण वस्तु निर्मात्यांना किमान एक द्रुष्य अस्तित्व असते. ते भौतिक गरजांची पुर्ती करत असतात. म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतार शेतीउपयोगी वस्तुंचे निर्माण/दुरुस्त्या करत असतो. परंतु ग्रामरक्षण ही अद्रुष्य सेवा असते. भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकुणातीलच आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव होते. हे समाजमानसशास्त्र येथे समजावुन घ्यायला हवे. त्यामुळे शेतीउत्पादनातील (जेही काही असेल ते) सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी आपण बिदरच्या बादशहाने विठु महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतुनही पाहु शकतो. (खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे मला नाईलाजाने म्हनावे लागते.)
 
व्यापार थांबल्याने व्यापरी तांड्यांचे रक्षण आपसुक थांबले. म्हनजे तोही उत्पन्नाचा स्त्रोत संपला.
म्हनजे अल्प बलुते, अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनुपजावु इनामी जमीनी यातुन होणारा एकत्रित पर्रिणाम म्हनजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जावुन पोहोचणे. बाकी अलुतेदार/बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजमानसशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे.

आरंभकाळ

१. चरितार्थासाठी आहे त्या जबाबदा-या पार पाडत मिळेत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणुन अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्क्रुत माणुसही करतो. गावाच्या एकक उत्पन्न घतकातुन मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते. अशा स्थितीत गाव पातळीवर कोनती कामे मिळनार?

आधीच आपापल्या व्यवसायांत सुस्थिर असलेलल्या जातीघटकांच्या व्यवसायात त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते.
इतर जाती घटकही पुरेशा उत्पन्ना अभावी अर्धवेळ शेतमजुर असल्याने तेथेही अप्वाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळने शक्य नव्हते.

ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जावू शकत नव्हते. यात दुसरी अडचण अशी होती कि पगारी सैनिक हा प्रकार शिवकाळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता.

पर्याय

१. गाव सोडुन रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतांत जाणे. हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जातीघटकांनीही अवलंबिला आहे.

२. गावातच मिळेल ती, कमी प्रतीची का असेनात, कामे प्राप्त करणे. होय. हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला. ग्रामरक्षनाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे, म्रुत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावातील मयतांची सरणे रचने वा खड्डॆ खोदने अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणुनच करायला मिळाली ती क्रमश:: स्वीकारत जाणे. महारांनी जगण्यासाठी ही सुद्धा कामे करायला सुरुवात केली.

३. इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्या-सुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळु लागली होतीच. त्यांची तिव्रता पाच शाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षांमुळे वाढु लागली. त्यात अवर्षनांनीही भर घातली होती हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरुन कळते. भल्या भल्यांना आपल्या पोरी कुनबिणी/बटक्या म्हणुन विकायची वेळ आली होती. गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यश: झाल्या होत्या. अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी म्रुताहार सुरु केला असेल तर त्यात कसलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महारांच्या म्रुताहाराचे कारण त्यांच्या संस्क्रुतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेतकामे, रस्ते साफ करणे, मढी उचलणे,त्यांची विल्हेवाट लावणे, उकिरडे साफ करणे, अशी हलकी (तरी समाजोपयोगी) कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते.
 
जेंव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेंव्हा म्रुत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल.

कारण अखिल समाजच जेंव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटला जातो तेंव्हा तो अधिकाधिक क्रुपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्याय्य वाटा इतरांना देण्यात कुचराई करु लागतो हे एक वास्तव आहे. दुष्काळ पडला म्हणुन धान्याची कोठारे राजाद्न्या टाळत भुकेल्यांसाठी खुले करणारा दामाजीपंत जेंव्हा एखादाच असतो तेंव्हा तशाच दामाजिपंताला राकक्रिधापासुन त्याच्या सुटकेसाठी दंड भरणारा एखादाच विठु महार असतो.
 
एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम अशी बनुन जाते.

परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापुन उरायला लागली होती. पैठण, काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपुर अपहरण करुन स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरु केली. ज्या बाबी मुळ धर्मात कोठेही निर्दिष्टच नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली. एका परीने एक ब्राह्मननिष्ठ नवाच धर्म या काळात नव्याने निर्माण झाला. या काळात पुर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच. सरदारक्या, पाटिलक्या, सरंजामे, देशमुख्या ई. ची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढाओढ जेंव्हा लागली तेंव्हा ब्राह्मण तरी का म्हणुन मागे राहतील? परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे-देणे राहिले नाही. जहागीर मोगलाईत मिळो कि आदिलशाहीत कि निजामशाहीत...त्यांना जहागिर्यांशिच मतलब उरले. त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला. सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही.
 
अशा स्थितीत, जो समाज एवढा हवालदिल झालेला, आर्थिक द्रुष्ट्या पुर्णपणे नागवला जावुनही त्याच जबाबदा-या झेलणारा...त्याची काय अवस्था झाली असेल?

१३व्या ते १५व्या शतकाच्या दर्मयान त्यांना क्रमश: अस्प्रुष ठरवण्यात आले असावे असे मला उपलब्ध पुराव्यांवरुन अंदाजिता येते. उदा. चोखा मेळा या महान संतास विट्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्प्रुष्य मानत नव्हते आणि अगदी द्न्यानेश्वरही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात. 

 महारांना ५२ हक्कांची सनद १४७५ साली बेदरचा बहामणी बादशहा महंमदशहा (दुसरा) याने दामाजीपंत, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वतनदार व १२ बलुतेदारांच्या साक्षीने विठ्या महार यास पातशहाच्या व दामाजीपंतांच्या कामी पडला म्हणुन लिहुन दिली. (पुर्ण सनदेसाठी पहा-"शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, ले. अनिल कोठारे.) हिंदु धर्मांधांनी एक महार ब्राह्मण दामाजीच्या कामी आला हे नाकारण्यासाठी "झाला महार पंढरीनाथ"चा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे.
 
या सनदेत महार अस्प्रुष्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्वाचे आहे. पण या सनदेत महारांना जे अधिकचे हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाची आहे त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकुन रहावी यासाठी आहे. या सनदीमुळे ,अहारांचे तात्कालिक स्थितीत हित झाले असेल, पण दुरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील बेडी बनली हे मी आधीच म्हटलेले आहे.

या सनदेची पार्श्वभुमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नांशी संबंधीत असतात...भविष्यात मंगळावरुन कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रतुय्त्तर देण्याची मागणी कोणी करत नाही...केली तरी त्याला वेडगळ म्हटले जाते. उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेंव्हा मी म्हणतो तेंव्हा मला मुर्खातच काढले जाते. असो. पण कोणत्याही मागण्या या त्या कालसापेक्षच असतात हेच काय ते वास्तव आहे.
 
या सनदेनुसार गावातील म्रुत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा. कातडीवरील मांगांचा. (मांग समाज कातडी कमावुन स्वतंत्र उपजिविका करतच होते. त्यांच्याबद्दलही नंतर लिहायचेच आहे...पण ते नंतर...) बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत. ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे. पण म्रुत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिक्रुत आणि राजाद्न्येप्रमाने झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घदली ती म्हणजे महार समाज अस्प्रुष्य ठरवण्यात आला.

पुन्हा सांगतो, तत्पुर्वी, अगदी बेदरच्या बादशहाने सनद देईपर्यंत महार हा अस्प्रुष्य आहे अशी नोंद नाही. कोणत्याही (अगदी १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या) स्थलपुराणांतही महार अस्प्रुष्य आहेत याची नोंद नाही. अंत्यज म्हणजे महार नव्हेत.
 
परंतु दुर्दैवाने वंशपरंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीण वाटणा-या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्प्रुश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करुन टाकला.

तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेंव्हा महार होते काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. तेच काय अन्य काही अस्प्रुष्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या. कारण त्याला प्रतिरोध करण्यआसाठी जी आर्थिक, मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय? त्यांच्या लढवैय्या परंपरांचा राजकीय उपयोग करुन घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या. शिवाजी महाराजांचा अल्प काळ एवढाच अपवाद करता येतो...आणि तोही अल्प स्थितीत महार समाजाला थोडा आत्मभान देनारा ठरला. परंतु महार समाजाला (आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना) वेठबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली. चोखा मेळ्यचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतांनाच मरण पावला हे सर्वद्न्यात आहेच. शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच, आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत, वेठबिगारी बंद होती. अन्यत्र ती कायम राहीली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली.
 
वेठबिगारी ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातुन तसेच नंतर उद्दामतेतुनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत. ही तर काही ब्राह्मनांनी निर्माण केली नाही. ती केली तत्कालीन शासक समाजांनी. पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजुनच अवनती घडत गेली. हा महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भिषण अध:पतन आहे.
 
या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकुणातील समाजाचा, गावांचा, शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता, त्याला ढासळलेल्या सामाजिक/आर्थिक स्थितीमुळे हीण दर्जाची कामे करायला भाग पडले. धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का मारुन अमानवी धर्माचे एक जागतीक उदाहरण घालुन दिले. एक पराक्रमी, लढवैय्या समाज रसातळाला नेवुन पोहोचवला. याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही. आज तरी जे गाव-खेडे जतन करुन आहेत त्यांने तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे...

हा मला उमगलेला इतिहास आहे. तो अगदीच पुरावाहीण नाही, पण सर्वत्रच पुरावे उपलब्ध नसल्याने मला तर्काचा आधार घ्यावा लागलेला आहे. यात काही चुक असेल तर ती दुरुस्त करत पुढे जाण्यासाठी मला विचारवंत/अभ्यासुंनी मदत करावी वा स्वत: यात नवीन संशोधन करावे हे माझे विनम्र आवाहन आहे.


एस.एस. रामदास: एक शोकांतिका

  एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी               शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...