Friday, August 9, 2013

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ...






संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संजय सोनवणी यांचा अर्ज दाखल


पुणे: मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवि व संशोधक संजय सोनवणी यांनी सासवड येथे भरत असलेल्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुणे येथे दाखल केला. उमेदवारी अर्जावर सूचक म्हणुन प्रसिद्ध समिक्षक शंकर सारडा यांनी स्वाक्षरी केली असून अनुमोदक म्हणून प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके, प्रकाशक अनिल कुलकर्णी, जालिंदर चांदगुडे, अशोक सातपुते आदिंनी स्वाक्ष-या केल्या आहेत.


उमेदवारी जाहीर करण्यामागील आपली भुमिका स्पष्ट करतांना संजय सोनवणी यांनी सांगितले कि, "जागतिकीकरणाची प्रक्रिया गेल्या दोन दशकांत गतिमान झालेली असल्याने सामाजिक व सांस्कृतीक संदर्भही वेगाने बदलत आहेत. एकार्थाने ही सांस्कृतीक पडझडीची अवस्था असून ती थांबवत नवसांस्कृतीक अभिरचना करणे हे मराठीतील आजच्या व भविष्यातील तरुण साहित्यिकांसमोरील आव्हान आहे. त्यासाठी आजच्या सर्वच समाजघटकांतील तरुणांना लिहिते करणे, तदनुषंगिक चिंतनाला नवे आयाम पुरवणे आवश्यक झाले आहे. आजही फार मोठ समाजघटक साहित्यिक प्रेरणांपासून दूर आहे व त्या घटकांचे चित्रण करण्यापासून सध्याचे प्रथितयश साहित्यिक दूर राहण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीने आजवर जेवढी समाज-व्यापकता व गतीशीलता दाखवायला हवी होती ती दिसत नाही. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य-सौहार्दमय वातावरण निर्माण करण्याचे मी प्रयत्न करत आहे व यानिमित्ताने त्या प्रयत्नांना गती देता येईल व सर्वसमावेशकताही वाढवता येईल याचा मला विश्वास आहे.
https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/?ui=2&ik=5b59f8c075&view=att&th=140637008a0fb63e&attid=0.7&disp=inline&realattid=1442900275955236864-7&safe=1&zw&sadnir=1&saduie=AG9B_P-ipY594kCDzIlGRrDPigZq&sadet=1376062546683&sads=5LsGOcahPrdLQcwOCEMfhiCpHrs
"मी सोशल मिडियात गेली अनेक वर्ष सक्रीय आहे. त्यामुळे आजच्या तरुणंच्या, वाचकांच्या साहित्य-संस्कृतीबाबतच्या प्रखर पण विखुरलेल्या भावनांशी, आशा-आकांक्षा व स्वप्नांशी माझा निकटचा परिचय आहे. आज साहित्यव्यवहारात कसलेही स्थान नसलेला पण साहित्य संस्कृतीचा मुलभूत पाया असलेला युवावर्ग साहित्य संमेलनेही बव्हंशी साहित्यबाह्य चर्चांनीच गाजत असल्याने त्यापासून दूर राहण्याचाच अधिक प्रयत्न करतो. त्याच्या साहित्य जाणीवा वाढवाव्यात व त्याला अभिव्यक्त होऊ द्यावे यासाठी प्रयत्न होत नाहीत. प्रकाशक म्हणुन मी असंख्य नवीन लेखकांना संध्या दिल्या, पण त्या पुरेशा नाहीत. त्यासाठी एक नवीन व्यवस्थेला जन्म द्यावा लागेल.  शिक्षण हक्कामुळे शिक्षितांची संख्या वाढत आहे, पण त्यांच्यात साहित्याबाबत आस्था निर्माण  व्हावी यासाठी विपूल प्रमाणात दर्जेदार बाल-किशोर सहित्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लेखकांची एक फौजच निर्माण व्हायला हवी...बाल-किशोर, रहस्य-थरारादि साहित्य लिहिणा-या साहित्यिकांना त्यासाठी प्रतिष्ठा मिळायला हवी तरच वाचनाकडे लोक अधिक वळतील.

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी साहित्यविश्वाला व एकुणतीलच मराठी भाषकांत नवी चेतना निर्माण करणारी बाब ठरेल. मराठीची पुरातनता, तिचे शब्दवैभव, तिचे लालित्य आणि ज्ञानभाषा असण्याची अलौकिक क्षमता लक्षात घेता अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठी व्यापक जनमतही आवश्यक असल्याने या निवडणुकीत हा एक कळीचा मुद्दा बनवला जाणार आहे.

"अ. भा. मराठी साहित्य संमेलन हे एकुणातच साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे."
संजय सोनवणी यांचे आजवर ८० ग्रंथ प्रकाशित झाले असून सामजिक, ऐतिहासिक, थरार, तत्वज्ञान, वैज्ञानिक व समाजशास्त्रीय संशोधने, कविता, किशोरसाहित्य पटकथा व नाटके या विविध साहित्यप्रकारांचा त्यात समावेश आहे. ...आणि पानिपत, सव्यसाची, शून्य महाभारत, कल्की, यशोवर्मन, काळोख, नीतिशास्त्र, अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती, क्लिओपात्रा अशी त्यांची अनेक पुस्तके गाजलेली असून त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रवासी, संतप्त सूर्य व पर्जन्यसूक्त हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह असून पर्जन्यसूक्त हा कवितासंग्रह इंग्रजीत मान्सून सोनाटा या नांवाने प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी आजवर सामाजिक, शिक्षण व अर्थशास्त्रावरही शेकडो लेख लिहिले असून ते महत्वाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. www.sanjaysonawani.blogspot.com हा त्यांचा मराठीत सर्वाधिक लोकप्रिय असलेला ब्लोग आहे.

कायद्यांचा दुरुपयोग करून दडपशाही: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका!

   या आठवड्यातच आमदार संजय गायकवाड यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकातच शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल प्रकाशक श्री. प्रशांत ...