Friday, August 23, 2013

तू जीवंत होशील तेंव्हा...

माझ्या कवितांतले
गूढगुंजन
सृष्टीच्या अंत:करणात 
हेलकावणारे
विमूक्त शब्दस्वर
नि
चिरंतनाची अनिवार ओढ
आता सारे काही संपले आहे...
बहुदा माझी कविता
ओंकारेश्वर पुलावर आताही 
तशीच अश्राप नि नि:ष्पाप
अभागी बालकाप्रमाणे
रक्तसड्यात
चिरंतन मृत्यूत पहुडली आहे...

राक्षसी गिधाडांच्या
क्रूर सावल्या
ओठंगून आलेल्या
रक्तसड्यात हैदोस घालणा-या
त्या हैवानी सावल्या
दाटावून आलेल्या
आमचे सूर्य अचानक
गेले तरी कोठे?
कोणत्या
प्रेरणांनी आमचे रक्त एकाएकी
बर्फगार गोठले तरी कसे?
सूर्यांनाही आग लावू म्हणनारे आम्ही
कालांधाराचे
दूत बनलो तरी कसे?

कविते तुला कधी
आजवर तडफड माहित नव्हती
निरागस बालकाप्रमाणे
एकदा छातीवर गोळ्या झेलुनही
कधीतरी पुढे
मस्तकातही घ्याव्या लागतील
याची जाणीवच तुला नव्हती
एवढी अडाणी तू
विश्वाची करू नवी स्नेहल रचना
या स्वप्नात धूंद असणा-या कविते...
आता तुझा खात्माच झालाय कि गं...

रक्तपिपासुंच्या जगात
कवितांना स्थान नसते
आणि कवितांच्या जगात
नराधमांना स्थान नसते
....

कविते...
तू जीवंत होशील तेंव्हा मी असेल...नसेल
नाही माहित
परंतू होते तुझेही अस्तित्व
धरातलावर
एकेकाळी बलशाली
प्रेरक
आणि चिंतक...
एवढे तरी मी
अखेरच्या क्षणापर्यंत
आकांतोद्रेकाने
ओरडून सांगत राहील
एवढेच वचन तुला
ओंकारेश्वर पुलावरील
तुझ्या अश्राप
कलेवराला स्मरून...!

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...