Saturday, December 14, 2013

जादू-टोणा विरोधी कायदा....

भारतीय दंडविधानानुसार फक्त पिडितच तक्रार करू शकतो. (खून-अपहरनाचा अपवाद). त्रयस्थाला पिडितातर्फे तक्रार करता येत नाही. जादु-टोणाविरोधी कायद्यात पिडिताची नेमकी काय व्याख्या केली आहे हे जरी स्पष्ट नसले तरी फार तर पिडितांचे नातेवाईक तक्रार करु शकतील. (अप्रत्यक्ष प्रभावित असल्याने.) अंधश्रद्धा निर्मुलन समितीला वा तत्सम अन्य कोणालाही बाधित/पिडित नसल्याने कोणाच्याही वतीने तक्रार करता येणार नाही. ते Law of Equity च्या विरोधात जाईल. सध्याच्या विधेयकात ज्या बाबी दंडार्ह ठरवल्या आहेत त्या बाबींसाठी पिडिताचीच तक्रार ग्राह्य धरणे संयुक्तिकच आहे. फार तर अंधश्रद्धा निर्मुलन समित्या किंवा जागरुक नागरिक पिडिताला तक्रार दाखल करण्यासाठीचे मार्गदर्शन करु शकतील...मदतही करु शकतील.

मग आता प्रश्न असा निर्माण होईल कि या कायद्याची गरजच काय होती? शारीरीक/मानसिक इजा पोहोचवनारी अंधश्रद्धेची(ही) सारीच कृत्ये दंडार्हच होती. फार तर शिक्षा पुर्वी कमी असेल. तशीही महत्तम शिक्षा कोणत्याही आरोपात क्वचितच व अपवादात्मक दिली जाते.

त्यामुळे आताचा जादु-टोनाविरोधीचा कायदा पांगळा म्हणण्यात अर्थ नाही. मुळात त्याची गरज होती काय हा खरा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. खरे तर या कायद्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीतील एक प्रकारे हवाच काढून घेतली आहे. मुळ प्रश्न याने सुटेल काय? हा गहन प्रश्न आहे. अंधश्रद्धेचे पिडित स्वत: कितपत तक्रारदार बनतील हाही एक प्रश्न आहे. माझ्या मते असे घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण आपण अंधश्रद्धाळू आहोत हे जर शिक्षित मान्य करत नसतील तर अशिक्षित मान्य करतील याची संभावना अत्यल्प आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची काटेकोर व्याख्या करण्यात समाजशास्त्रीय तसेच मानसशास्त्रीय अडचनी आहेत. उदा. ज्योतिष. ज्योतिष ही श्रद्धा कि अंधश्रद्धा? याबाबत गोंधळ आहेच. या कायद्याने बगाडाला बंदी आहे कि नाही हे स्पष्ट नसले तरी मोहर्रमच्या स्वत:ला शारिरीक हानी पोचवणा-या बाबींना बंदी नाही म्हणजे त्यालाही नसावी. संतांनी खरोखरच चमत्कार केले ही श्रद्धा कि अंधश्रद्धा कि वास्तव? हभपंपुढे याबाबत चर्चा करायचीही हिंमत सरकार करणार नाही मग कायद्यात त्याचे काय प्रतिबिंब उमतनार. संतांचे चमत्कार मान्य केले तर सोनवणीचे चमत्कार अमान्य करायला अडचण का असावी? हा शुद्ध दांभिकपणा आहे.

म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले ही अंधश्रद्धा समजायची नाही...त्याबाबतची प्रवचने लोकांनी "निर्मळ" मनाने ऐकायची...आणि स्वत: मात्र जीवनात अंधश्रद्धा जपायच्या नाहीत. सर्व संतांबाबत असेच म्हणता येईल. पण ते मात्र प्रवचनकारांना सांगायची मोकळीक द्यायची आणि त्याला अंधश्रद्धेच्या परिघातून बाहेर काढायचे, हे काय आहे?

आता "भोंदूबाबा" याची तरी नेमकी काय व्याख्या आहे? वरचे उदाहरण घेतले तर हे हभपही भोंदु बाबाच ठरतात कारण ते जे विज्ञानदृष्ट्या अशक्य आहे त्याचाच प्रचार करतात. हा भोंदुपना नाही काय? आजतागायत जे भोंदू बाबा पकडले गेलेत ते गांवा-खेड्यातले. शहरांतेल किती भोंदूवर कारवाई झाली हाही संशोधनाचा विषय आहे. कार्यालये थाटून बसलेले भोंदू कायद्याच्या कचाट्यात येत नाहीत...आले तर तोडपानी करुन सुटतात हा आजवरचा इतिहास आहे. सत्य साईबाबाचे काय झाले? पंतप्रधानांपासून अगदी सचिनसारखा क्रिकेटपटू त्याच्या कच्छपी होता. ती अंधश्रद्धा नव्हती काय?

थोडक्यात मला वाटते जादू-टोना विरोधी कायदा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत सातत्याने समाजाचे प्रबोधन करणे हाच यथोचित मार्ग आहे. कोणालाही (स्वत:लाही) इजा अथवा आर्थिक नुकसान पोचवनार नाही अशा श्रद्धांना विरोध न करता हानिकारक सर्वच बाबींना विरोध करत रहावे लागेल.  


अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...