"आजच्या सर्वांचेच पुर्वज आदिम काळातील
आदिवासी आहेत. शेतीच्या शोधाने माणूस स्थिर
झाला आणि नागर संस्कृती आकाराला येवू लागली.
नागर संस्कृतीत सामील होनारे बव्हंशी लोक हे
इहवादी, भोगवादी आणि चंगळवादीही होते. परंतु याच समाजातील एक घटक असाही होता जो अरण्याशी, साध्या जगण्याशी असलेली नाळ तोडू इच्छित नव्हता. त्याने गहन अरण्यांतच निसर्गासोबत जगणे-राहणे व तल्लीन होणे पसंत केले. काही पशुपालनाचे आदिम पेशे सांभाळत रानोमाळ भटकंती करत राहिले. धनगरादि काही पुरादिम जमातींना शासन एकीकडे भटके आदिवासी मानते, पण त्यांना आदिवासींच्या सोयी-सवलतींपासून वंचित ठेवते ही विसंगती आहे. ज्यांना दिल्यात त्याही त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीत. एकंदरीत अनास्थाच आहे.
"नागरी संस्कृती ही मुळात कृत्रीमतेच्या पायावर
उभी आहे. तिचे साहित्य-कलाविश्व हे नजाकतीने भरलेले असेल पण त्यात आदिवासींच्या कलांचा जोम आणि जोश नाही. नागर संस्कृतीचे जीवनविचार आणि आदिवासी संस्कृतीचे जीवनविचार यात फार अंतर राहणे स्वाभाविकच होते. परंतू अलीकडे आदिवासी संस्कृतीचेही नागरीकरण होत आहे. एकीकडे जगभर एक मतप्रवाह आहे कि आदिवासींच्या जीवनपद्धतीत आधुनिक नागरी संस्कृतीने हस्तक्षेप करु नये. आणि दुसरा मतप्रवाह आहे कि आधुनिक ज्ञान-विज्ञान आणि राजव्यवस्था यात त्यांना सहभागी करून घेतलेच पाहिजे. आपल्या देशत यावर फारसा मुलगामी विचार झालेला नाही.
"दुसरे असे कि लोकसंख्या विस्फोटामुळे अरण्ये
आकुंचित होत गेलेली आहेत. आदिवासींच्या नैसर्गिक अधिवासांना आकुंचित केले गेले आहे. खाणी, धरणे, तदनुषंगिक प्रकल्प यामुळे त्यांच्या जीवनकेंद्रांवरच नागरी संस्कृतीने घाला घातला आहे. आधुनिक वनकायद्यांमुळे अरण्य हेच हजारो वर्ष ज्यांच्या जीवनाचा आधार त्या आदिवासींचे मुलभूत अधिकारच नाकारले गेलेले आहेत. एकीकडे प्रशासन व दुसरीकडे नक्षलवादी या कचाट्यात आदिवासी सापडला आहे.
"आदिवासींबाबतच्या नागर समाजाच्या धारणा
पोकळ व सिनेमाधारित असल्याने त्या अत्यंत खोट्या आहेत. मधुकर रामटेकेंचे "आम्ही माडिया" हे कथन वाचतांना ते प्रकर्षाने जाणवते. आदिवासी साहित्याचा पहिला उद्गार म्हणून वाल्मिकीकडे पाहिले जाते. आता असंख्य आदिवासी प्रतिभाशाली लोक लिहिताहेत...पण मुख्य प्रवाहात त्याची निरलस दखल घेतली जात नाही. खरे आदिवासी जीवन, त्यांचे जीवनविषयक विचार आम्हा नागरजनांना समजून घ्यावे वाटत नाहीत. डा. तुकाराम रोंगटे यांनी आदिवासी साहित्याचा चिंतनशील अभ्यास करून आम्हा नागरजनांसमोर एक जळजळीत वास्तव मांडले आहे. त्याचे आम्ही स्वागत करायला हवे!"
- "आदिवासी साहित्य: चिंतन आणि चिकित्सा" या
डा. तुकाराम रोंगटे लिखित ग्रंथाच्या प्रकाशन
समारंभात मी मांडलेले काही मुद्दे. हा कार्यक्रम
विद्यापीठात, नामदेव सभागृहात झाला.
अध्यक्षस्थाने डा. नागनाथ कोतापल्ले होते. डा.
श्रीपाल सबनिस, डा. अविनाश आवलगांवकर, डा.
संजय लोहकरे यांचीही भाषणे या प्रसंगी झाली.