Saturday, March 29, 2014

गुढीपाडवा !

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली. "तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन" अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या "गाथा सप्तशती" सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, "लीलावई" सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या "प्राकृतप्रकाश" या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.

त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही.
संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो स्वातंत्र्यदिन. या विजयाचे स्मरण असलेल्या शालिवाहन (सालाहन) शकाचा वर्षारंभ. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.

आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सतवाहन सम्राट अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. ती सत्ता पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.

कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याचे "कथा सरित्सागर", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण "लीलावई" या काव्यग्रंथात आले आहे.

एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती. क्षहरात घराण्यातील शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या दुर्बल पूर्वजांवर वारंवार आक्रमणे करुन माळव्यापासून दक्षिणेपर्यंत असलेली सातवाहनांची सत्ता निष्प्रभ केली. इतकी की गौतमीपुत्र राजा झाला तंव्हा त्याच्या ताब्यात साताऱ्याचा काही भाग सोडला तर काहीच उरले नाही. कोकण-गोमंतकही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथल्या बंदरांतून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. मध्यभारत ते दक्खनची प्रजा एका अर्थाने गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.

नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.

परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"

एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.

नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मापुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
दुसरे महत्वाचे असे कि "शालिवाहन शक" असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही "सालाहन" अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. ज्या साली शकांचे हनन केले तो म्हणजे सालाहन शक असा त्याचा सरळ अर्थ आहे. परंतू संस्कृतीकरणामुळे सालाहनचे "शालिवाहन" केले गेले व शालिवाहन नांवाचा कोनताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.

"साल" हा शब्द आपल्याकडे आला तो सनपुर्व दुस-या तिस-या शतकात. हा मुळचा पारशी भाषेतील शब्द. अनेक ब्यक्ट्रीयन, शक राजे पारशी धर्माचे होते, सम्राट कनिश्क तर पारशी धर्माचा अभिमनी होता. अहूर माझ्दाची भक्ती करत होता हे त्याच्या राबटक शिलालेखावरुनच सिद्ध होते. त्यामुळे साल हा शब्द आपल्याकडे इस्लामी राजवटीच्या काळात परिचित झाला या मतात अर्थ नाही.

खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...