Saturday, August 30, 2014

इतिहास-मागास

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो.

अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

अलीकडेच दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादी, पुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पडले. खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजे, तरच इतिहासाचे आकलन सम्म्रुद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते.

खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असते, मग जे सामोरे येईल ते किती का कटु असेना, त्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईना, मुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतात, मग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.

वाचकांचाही द्रुष्टीकोन सहसा असाच जातीय परिप्रेक्षातीलच असल्याने व श्रद्धा वा समजुतींना नवीन पुराव्यांच्या परिप्रेक्षात चिकित्सकपणे व उदारपणे पाहण्याची मनोव्रुत्तीच नसल्याने इतिहासावरुन आपल्याकडे वारंवार वादंगे होत असतात.

डा. बाबासाहेबांच्या रिडल्समुळे असेच झंझावात महाराष्ट्रात उठले होते. राम आणि क्रुष्ण हे साक्षात इश्वरी अवतार असल्याने त्यांची चिकित्साच केली जावु शकत नाही असा पवित्रा सनातन्यांनी जसा घेतला तसाच श्रद्धाळु समाजानेही घेतला हे वाचकांच्या स्मरणात असेलच. खरे तर विद्वेषरहित चिकित्सेमुळे मानवी द्रुष्टीकोनाला नवीन आयाम मिळतात व आपलीच प्रगल्भता वाढत असते हे आपला समाज लक्षातच घेत नाही हे एक दुर्दैवच आहे.

आपला देश मागास आहे कारण आम्ही अजुनही इतिहास-मागास आहोत. आम्ही स्वजातींच्या-स्वप्रांताच्या पलिकडे जाऊन इतिहासाचा विचार करु शकत नाही. त्यामुळे खरे तर आम्हाला इतिहासच नाही. जी आहेत ती नुसती स्वभ्रम जोपासणारी मिथ्थके आहेत. त्यामुळे आम्ही आमच्याच इतिहासाबाबत नेहमीच संभ्रमात असतो.

आणि तरीही विगत गौरवाने आम्ही केवढे भारावलेले असतो...

मग तो कितीही खोटा आणि पोकळ का असेना!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...