भारतात राष्ट्रवादाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यात भारतात सांस्कृतिक अथवा धर्मवादी राष्ट्रवाद कि घटनात्मक राष्ट्रवाद असा वाद जास्त चर्चेत राहिलेला आहे. र्त्यासठी आपण आधी या दोन राष्ट्रवादांची चर्चा करु.
सांस्कृतिक राष्ट्रवाद:
एक संस्कृती व त्या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व भुगोल व तीत राहणारी माणसे यांचे मिळून राष्ट्र अशी थोडक्यात ही संकल्पना आहे. यात हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) धर्माचे प्राबल्य मुळ केंद्रबिंदू असून हा राष्ट्रवाद हिंदुत्ववादी राष्ट्रवाद बनतो. यात अन्य धर्मियांना दुय्यम स्थान द्यावे असे गोळवलकरवादी विचार जसे आहेत तसे वेळोवेळी बदललेले सावरकरी विचारही आहेत. हे दुय्यम स्थान कायद्याने अथवा वर्तनातून द्यावे असे सूचन यात आहे. किंबहुना सांस्कृतिक राष्ट्रवादाची ती पुर्वअट आहे.
सांस्कृतिक एराजकारणातील मोठी खोट ही आहे कि जीही कोणती संस्कृती केंद्रबिंदू मानायची, मग ती वैदिक असो कि हिंदू, ती नेमकी कोणती? करण दोन्ही धर्मात कालौघात चढौतार आलेले आहेत...उत्थाने व अध:पतनेही झाली आहेत. कोणत्या काळातील संस्कृती अणि कोणती संस्कृती आदर्श मानायची?
बरे, भारत हा खंडप्राय देश आहे. येथे प्रत्येक प्रांतात स्वत:ची स्वतंत्र छाप असणारी संस्कृती आहे, भाषा आहे. तीची स्वतंत्र अनेक वैशिष्ट्येही आहेत. धर्मापुरते बोलायचे तर उत्तरेतील वैदिक धर्म दक्षीणेपेक्षा वेगळा तर हिंदू धर्मही वेगळा. मग कोणत्या प्रदेशातील, नेमक्या कोणत्या काळातील संस्कृती आदर्श मानत त्यावर आधारित "समरस" राष्ट्रवाद आणयचा?
कशी समरसता येईल?
बरे संस्कृती बदलत असते. प्रवाही असते. या प्रवाहीपणाचे भान सांस्कृतिक अथवा धार्मिक राष्ट्रवादात आहे काय? संस्कृती अथवा धर्म हे शब्द राष्ट्रवादाशी भाबडेपणे संलग्न करणे सोपे आहे व तशाच भाबड्यांनी "गौरवशाली संस्कृती" च्या नांवाखाली ती डोक्यावर घेणेही सोपे असते. पण त्यातील मुख्य समस्या ही आहे कि तिच्या अंमलबजावणीत लोकशाही हाच मुख्य अडथळा असतो. आपली लोकशाही असे राष्ट्रवाद मान्य करत नाही. त्यासाठी राष्ट्रघटनाच बदलणे अपरिहार्य ठरते. सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवादाचा हा एक अपरिहार्य भाग आहे. त्याखेरीज विशिष्ट संस्कृती, ती कोणती हे ठरवणार कोण हे माहित नाही, लादण्याची शक्यताच निर्माण होत नाही. सध्या शक्षणिक अभ्यासक्रमात कोणती संस्कृती घुसवायचे प्रयत्न होत आहेत हे पाहिले कि सांस्कृतिक वैदिककेंद्री राष्ट्रवाद हाच सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे असे ठळकपणे दिसते.
घटनात्मक राष्ट्रवाद:
आपली घटना इहवादी आहे. स्वातंत्र्य-समता-बंधुता या तत्वांना उदात्त मानणारी आहे. कोणताही धर्म मानणे अथवा न मानणे हे ती नागरिकांवर सोडुन देते व वर्तन मात्र घटनात्मक व कायद्यांच्या चौकटीतच असेल असे स्पष्ट करते. ती मानवी स्वातंत्र्य मानते त्याच वेळेस ते अनिर्बंध होणार नाही याचीही काळजी घेते. घटना प्रवाही असून कालसुसंगत असे आवश्यक बदलही ती लोकशाही पद्धतीने स्विकारते. अनेक दुरुस्त्या झाल्या आहेत. अनेक नवे कायदे बनले आहेत तर अनेक रद्दबातलही झालेले आहेत.
घटनेला मानवी चेहरा आहे, विशिष्ट संस्कृती अथवा धर्मलोलुपांचा लालसी चेहरा तिला नाही. ती इहवादी आहे. माणसाचे लौकिक जीवन सुखकर व्हावे हा तिचा उद्देश आहे, पारलौकिक नाही, व सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था ते सामान्य नागरिक त्यासाठी कटीबद्ध रहावेत अशी रास्त अपेक्षा त्यात आहे. जे नाहीत त्यांसाठी कायद्याचा आसुड आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद हा पक्षपाती असणार हे उघड आहे. कोण संस्कृतीप्रमाने वागतो आणि कोण नाही हे कोण ठरवणार? उदाहरणार्थ गोमांस. वैदिक संस्कृतेत एके काळी ते त्याज्ज्य नव्हते. नंतर त्यांनी मांसभक्षणच (काही वैदिक समाज अपवाद) सोडून दिले. पण गोमांस खाणा-या अनेक हिंदू जाती/जमाती आजही आहेत. अन्य धर्मीयही आहेत. गोमांसावर बंदी आणने हा कोणता सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे? कोणत्या काळातील व कोठली आणि कोणाची संस्कृती याला प्रमाण मानली गेली? एखाद्या प्राण्याल, तो दुर्मिळ होत आहे हे लक्षात आले तर त्याच्या हत्येवर अणि त्याचे मांस खाण्यावर बंदी घालणे वेगळे आणि सांस्कृतिक कारणासाठी बंदी घालणे वेगळे.
हे एक उदाहरण झाले. अशी अनेक देता येतील. सांस्कृतिक राष्ट्रवाद तुम्हाला तुमचा धर्म - संस्कृती पाळू देत नाही तर जेही कोणी सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रणेते असतील त्यांचीच इच्छित संस्कृतीच पाळण्याची हुकुमशाही आणली जाते. नव्हे तिची चुणूक आम्ही पाहिलेलीच अहे...पाहत आहोत.
आम्हा नागरिकांना पुन्हा एकदा विचार करायला हवा...तो हा कि आम्ही आमचे राष्ट्र कसे घडवू इच्छितो. आम्हाला नेमका कोणता राष्ट्रवाद हवा आहे हे आम्हीच ठरवायचे आहे. आम्हाला परिवर्तनशील राहणारी इहवादी (सेक्क्युलर) घटनात्मक राष्ट्रवाद हवा कि माणसाच्या आशा-आकांक्षांचा बट्ट्याबोळ करत त्याला माथेफिरु बनवणारी सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवाद यावर सर्वांनीच गंभीरपणे आणि सातत्याने विचार करायला हवा.