Thursday, April 26, 2012

पाणिनी नेमका कोण. कुठला व कधीचा? (भाग २)




पाणिनीचा नेमका काळ ठरवण्यासाठी पाश्चात्य विद्वानांनी भरपुर प्रयत्न केलेले आहेत. त्यात फ़्रेडरिक म्यक्समुल्लर, प्रो. वेबर, थियोडोर गोल्डस्टकर, जेम्स अल्विस हे प्रमुख आहेत. या विद्वानांच्या प्रकांड पांडित्याबद्दल शंका घेत येत नाही. परंतु दुर्दैवाने या विद्वानांचेही पाणिनीच्या काळाबाबत एकमत होवू शकलेले नाही. प्रो. वेबर हे पाणिनीचा काळ इसवी सन १४० हा मान्य करतात तर गोल्डस्टकर यांच्या मते पाणिनीचा काळ हा निश्चयाने बुद्धपुर्व, म्हणजे इसपु आठव्या शतकाच्या आसपास जावु शकतो. म्यक्समुल्लर हाच काळ सनपुर्व ४५० मानतात. ही मतांतरे होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य म्हणजे संस्क्रुत सहित्यात कालोल्लेख व तेही बरोबर असे जवळपास नाहीतच. त्यामुळे ग्रंथार्गत प्रमाणे व पुर्वाचार्यांचे केलेले नामोल्लेख यावरुन हे काळ अंदाजावे लागतात. दुसरे असे कि अनेक लेखकांची नांवे समान आहेत. उदा आपल्याला किमान तीन कात्यायन माहित आहेत. वार्तिका लिहिणारा कात्यायन व प्राक्रुत प्रकाश लिहिणारा वररुची हे एकच असे मानण्याचा जसा प्रघात आहे तसेच या दोन्ही वेगळ्या व्यक्ती आहेत असाहे मतप्रवाह आहे. शुल्बसुत्रे लिहिणारा, वार्तिका लिहिणारा आणि श्रौतसुत्रे लिहिणारा कात्यायन एकच कि ही वेगवेगळी तीन स्वतंत्र व वेगवेगळ्या काळात झालेली व्यक्तिमत्वे अहेत हाही विवाद आहे व प्रत्येक संशोधकाने आपले मत सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे. हीच बाब पतंजलीची. महाभाष्य लिहिणारा पतंजली, योगदर्शन लिहिणारा पतंजलि व आयुर्वेदाचार्य पतंजलि हेही वेगळे कि एकच याबाबतही विवाद आहेत. एवढेच नव्हे तर अनेक लेखकांनी आपल्या क्रुती पुर्वी होवून गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नांवावर खपवली गेल्याची अनेक उदाहरणे असल्याने असा विवाद उत्पन्न होणे स्वाभाविक आहे.


पाणिनीच्या काळाचा विचार करतांना पाणिनीला उत्तरकालीन वा पुरातन मानणा-या विद्वानांनी नेमका काय विचार केला आहे हे आपण आधी पाहुयात.


१. प्रो. अल्ब्रेख्त वेबर: उन्नाडी सुत्रांचा थेर कछ्छायानाने आपल्या "संधीकप्प" या इसपुच्या सहाव्या शतकातील पाली व्याकरणात उपयोग केला व नंतर पाणिनीने अष्टाध्यायीत उनाडी व्याकरणीय सुत्रे घेतली आहेत यावरुन पाणिनी हा कछ्छायनाच्या उत्तरकालीन ठरतो. पाणिनीच्या व्याकरणात "यवनानी" लिपीचा उल्लेख आहे, तसेच स्तुप, स्थविर, चीवर यांचाही उल्लेख आहे. ह्यु-एन-त्संगची कथा (जी मी आधी दिलेली आहे.) तिचा आधार घेत व कथासरित्सागरचा हवाला देत वेबर यांना पाणिनी हा बुद्धानंतर ५०० वर्षांनी झाला असावा असे अनुमान काढले आहे. म्हणजे हा काळ इसवी सन १४० हा येतो.



३. थियोडोर गोल्डस्टकर: यांनी आपल्या "Panini: His Place in Sanskrit Literature" या ग्रंथात पणिनीने आपल्या अष्टाध्यायीत शाक्यमुनीचा उल्लेख केलेला नाही. स्थविर, चीवर हे शब्द त्याने श्रमणांसाठी वापरले असून ती परंपरा बुद्धपुर्वकालीन आहे. स्तुप हा शब्द त्याने बुद्धिष्ट स्तुपांसाठी वापरला नसून वैदिक अर्थाचा "मातीचा ढीगारा" या अर्थाने वापरलेला असू शकतो. "यवन" हे भारताला प्राचीन काळापासुन माहित असुन पाणिनी हा मुळात गांधार देशातला असल्याने त्याचा यवनांशी व त्यांच्या लिपीशी परिचय असने स्वाभाविक आहे. यवन शब्द बुद्ध साहित्यातही येतो तसेच तो अशोकाच्या शीलालेखांतही येतो. त्यामुळे यवन शब्द आला म्हणुन त्याला बुद्धोत्तर कालात ढकलता येत नाही. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख आलेला आहे. "यवनांनी अयोध्या जिंकले" अशा अर्थाचे एक विधान व्याकरणाचा एक नियम समजावुन सांगतांना केलेले आहे. ग्रीक राजा मिन्यंडर हा एकमेव ग्रीक राजा होता जो अयोध्येपर्यंत पोहोचला होता,. यावरुन पतंजली हा इसपु १८० मद्धे झाला असुन पाणिनी त्याच्याही आधी झाला असल्याने व स्थविर, चीवर, भिक्षुणी ज्या बुद्धकाळपुर्वीही अस्तित्वात होत्या व तो शाक्यमुनीचा उल्लेख करत नसल्याने पाणिनीचा काळ हा सनपुर्व आठवे शतक हा असू शकतो.



जवळपास ३२ विद्वानांनी आजवर विविधांगांनी पाणिनीचा काल थरवायचा प्रयत्न केला आहे. मी येथे फक्त जुन्यात जुना काळ कोणता दिला गेला आहे व अर्वाचीन काळ कोनता दिला आहे याबाबतची विवेचनेच येथे वाचकांच्या सोयीसाठी घेतली आहेत. अन्य विद्वानांनीही चर्चेसाठी वरीलच बव्हंशी मुद्दे घेतले असून प्रत्येकाने काढलेल्या काळात थोडफार फरक आहे. उदा. म्यक्समुल्लर पाणिनीचा काळ इसपु ३५० हा घेतात. असो. आपण या व त्या अनुषंगाने येणा-या मुद्द्यांवर चर्चा करुयात.



१. थेर कछ्छ्यायन हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. याने बुद्धाच्या आद्न्येवरुन पालीचे व्याकरण लिहिले. याचा काळ निश्चित असुन तो सरासरी इसपु. ६०० हा येतो. त्याचे "संधीकप्प: हे व्याकरण आठ अध्यायात रचले आहे. या व्याकरणावर आधारीत पुढे ४१ पाली व्याकरणे रचली गेली. या व्याकरणात कोठेही पाणिनीचा उल्लेख येत नाही, तसेच पाणिनीच्याही व्याकरणात शाक्यमुनीचा उल्लेख येत नाही. परंतु केवळ यावरुन कोणाचेही पौर्वापौर्य ठरवणे धाडसाचे आहे. कारण कछ्छ्यायन हा बुद्धाचा प्रमुख शिष्य होता तर पाणिनी हा वैधर्मी, म्हणजे शैव संप्रदायी होता. त्यामुळे एकमेकांचा उल्लेख न करणे हे स्वाभाविक असेच मानता येईल.

२. परंतु स्थविर, भिक्षुणी, स्तुप हे शब्द मात्र विचारात घ्यायला हवेत. हे खरे आहे कि बुद्धापुर्वीही श्रमण धर्म अस्तित्वात होता. त्यामुळे अष्टाध्यायीत स्थविर, चीवर, ई. शब्द डोकावले म्हणजे ती बुद्धाच्या समकालीन वा उत्तरकालीन रचना आहे असे मानता येत नाही.

परंतु स्तुपाचा उल्लेख झटकावुन लावता येत नाही. वैदिक संस्क्रुतानुसार स्तुप म्हणजे केवळ मातीचा ढीगारा. या शब्दाचा वैदिक वाड:मयात क्वचित उल्लेख आहे. परंतु व्याकरणात हा शब्द जेंव्हा येतो तेंव्हा तो बराच प्रचलित असला पाहिजे. त्यामुळे पाणिनी हा बुद्धोत्तर काळातील आहे असे म्हणता येवू शकते. परंतु हा ठाम निष्कर्ष देणारा पुरावा नव्हे. म्हणजे स्तुपांची निर्मिती बुद्धोत्तर काळात मोठ्या प्रमाणवर झाली असली तरी त्याआधी "स्तुप" ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती असे असेही विधान करता येत नाही. शिवाय "स्तुप" हा शब्द नवनिर्मित नाही हेही उघड आहे.

३. पाणिनी यवनानी लिपीचा उल्लेख करतो तसेच लिपिकार अशा शब्दाचाही प्रयोग करतो त्यावरुन पणिनीला लेखनाची कला माहित असावी असे गोल्डस्टकर यांचे मत आहे. त्याबाबत आपण नंतर विवेचन करु. पाणिनी हा गांधार देशातील शलातुर गांवचा (आधुनिक लाहोर) निवासी होता असे मानले जाते. ते खरे आहे असे मानले तर गांधार हा सीमावर्ती प्रदेश असल्याने त्याचा यवनांशे संबंध येणे स्वाभाविक आहे. जेम्स अल्विस यांच्या मते राजा दारियसच्या समकालात कधीतरी पाणिनी होवून गेला असावा. पर्शियनांनाही तेंव्हा यवनच संबोधले जात असे. पर्शियन लोकांना लेखनाची कला अवगत होती. इसपु सहाव्या शतकातील दारियसचा लेख प्रसिद्धच आहे. त्यामुळे पाणिनीचा परिचय यवनी लिपीशी होणे स्वाभाविक आहे असे मानता येउ शकते. परंतु याचा दुसरा अर्थ मग असा होतो कि भारतात कोनतीही लिपीच अस्तित्वात नव्हती...किंवा ज्या लिप्या होत्या त्या पाणिनीय संस्क्रुत लिप्यांकित करण्याएवढ्या समर्थ नव्हत्या. अल्विस यांच्या मते पाणिनीने आपले व्याकरण लिहुनच काढले असले पाहिजे. म्यक्स्मुल्लर या मताला दुजोरा देत नाही. त्याच्या मते भारतीयांना लिप्याच माहित नव्हत्या. असो.



यवनानी या शब्दावरुन जास्तच चर्चा झडली आहे हे मात्र खरे. यवन, यवनानी, योन हे शब्द पाली साहित्यात जसे येतात तसेच उत्तरकालात सिद्ध झालेल्या महाभारतातही येतात. त्यामुळे यवनी लिपीशी भारतीयांचा (व्यापार व भौगोलिक सन्निध्याच्या कारणाने) परिचय झाला असने स्वाभाविक मानता येते. त्यासाठी पाणिनीचा जन्म शलातुरलाच झाला असला पाहिजे असे मानण्याचे खरे तर कारण नाही. आणि ज्याही कोणत्या काळात पाणिनी झाल त्या काळात एतद्देशीय लिपीच नव्हती या मतातही अर्थ नाही. भारतीयांना लिपी ही सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन माहिती आहे. त्यामुळे "यवनानी" या शब्दावरुन पाणिनीचा काळ ठरवता येत नाही.



४. कथा सरित्सागरात येणारी कथा (मुळ ब्रुहत्कथा आज संपुर्ण उपलब्ध तर नाहीच पण त्यातील कथांचे ब-यापैकी संकलन सोमदेवाने इसच्या अकराव्या- बाराव्या शतकात केलेले आहे. त्यामुळे त्याने उल्लेखित केलेली कात्यायन-वररुचीची कथा नेमकी कधी लिहिली गेली याचा अदमास लागत नाही. मुळ ब्रुहत्कथा आज उपलब्धच नाही. त्यामुळे या कथेतील जरी वररुची तथा कात्यायन हा जरी सातवाहनाच्या समकालीन असला तरी प्राक्रुत प्रकाश लिहिणारा वररुची व वार्तिका लिहिणारा कात्यायन एकच व्यक्ती होत असे मानता येत नाही. या मताला एकही विद्वानाचे समर्थन नाही. सोमदेवाने आपल्या कथा संकलित करतांना वेगवेगळ्या व्यक्तींचे साधर्म्य कल्पिले व त्यांना एकच व्यक्ती मानले आहे असेच स्पष्ट दिसते.



५. पाणिनीचा काळ ठरवण्यासाठी विद्वानांनी कात्यायन व पतंजलि यांच्याही काळाची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते काय हा मुख्य प्रश्न चर्चीला गेला आहे. कात्यायनाच्या वार्तिका म्हणजे पाणिनीचेच व्याकरण दुरुस्त करत त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कात्यायन हा पाणिनीनंतर झाला असावा असेही मत व्यक्त केले जाते. पतंजलीच्या महाभाष्यात अष्टाध्यायीबरोबरच वार्तिकांवरही भाष्य असल्याने तो अर्थातच उत्तरकालीन ठरतो. पतंजलीचा काळ हा इसपु १८० असावा हे गोल्डस्टकर यांचे मत आपण पाहिलेच आहे. येथे विचारात घ्यायची बाब अशी कि कथासरित्सागरानुसार कात्यायन व पाणिनी समकालीन होते. या कथेतील (शिवाचे वरदान) ही भाकडकथा वा वेबर म्हणतात तशी (Ghost story) जरी मानली तरी समकालीन व्यक्तींनी त्यांच्या लेखनावर टीका करणे वा त्याच्या विचाराचे पुढे प्रवाहन करणे अशक्य नाही. अर्थात हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा दोघे नुसते समकालीन नव्हेत तर निकट परिचित असायला हवेत. कथा सरित्सगरानुसार दोघे एकाच गुरुचे शिष्य होते. त्यामुळे त्या कथेतील दंतकथा वगळत पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते असे म्हणता येते.



६. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख येतो हे खरेच आहे. परंतु तो राजा नेमका कोण हे नांव येत नाही कारण व्याकरणाचा एक नियम निरुपित करण्यासाठी त्याने ते विधान सिद्ध केले आहे. त्यात कोनाचे नांव असण्याची आवश्यकता नाही. परंतु अल्विस मात्र त्यावरुन असे निश्चित क्रण्याचा प्रयत्न करतात कि शेवटच्या मौर्य राजाचा पतंजली हा समकालीन होता. (इसपु १८०) हा तर्क कुतर्क म्हणावा एवढा चुकीचा आहे. तेच विधान "यवनांनी अयोध्या जिंकली" या विधानाबाबत म्हणता येते, कारण मग पातंजलीने आपले नियम सिद्ध करण्यासाठी पुरातनही उदाहरणे घेतली आहेत. त्यावरुन पतंजलीलाही मग पुरातन ठरवावे लागेल. थोडक्यात पतंजलीने केलेले हे फक्त दोन ऐतिहासिक उल्लेख पतंजली त्यांच्या समकालीन होता हे सिद्ध करत नाही.



७. वेबर यांनी ज्या तर्कावर पाणिनीचा काळ सन १४० काढला आहे त्यावर तर अल्विस यांनी हल्लाच चढवला आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कारण युवान श्वांगने दिलेली पाणिनीची कथा, जी त्याने सहाव्या शतकात शलातुर येथे ऐकली, तिचा पाणिनीच्या कालनिश्चितीसाठी काही उपयोग नाही असे त्यांचे मत आहे. या संपुर्ण कथेचे परिशिलन केल्यानंतर माझेही मत तसेच बनले आहे. परंतु पाणिनी, जरी गांधार देशाचा मुलनिवासी नसला तरी त्याने बरच काळ तेथे व्यतीत केला असावा असे फारतर म्हणता येईल.



वरील विवेचनावरुन पाणिनीचा काळ नक्की होत नाही हे तर स्पष्ट आहे. परंतु ते खरेच अशक्य आहे काय? अशा कोणत्या बाबी आहेत ज्या या सर्वच विद्वानांच्या नजरेतुन सुटल्या आहेत?



होय. सुटल्या आहेत. कदाचित भारतीय संस्क्रुती व धर्मेतिहासाचे आकलन कमी पडल्याने तसे झालेले असु शकते. असो.

अष्टाध्यायीची समग्र रचना ज्या पाणिनीच्याच १४ शिवसुत्रांवर (यांनाच महेश्वर सुत्र असेही म्हणतात) आधारीत आहे त्याचा आरंभीचा श्लोक खालीलप्रमाणे आहे.

"न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम I

उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम II



( शिवाच्या वैश्विक न्रुत्यानंतर सनकादि ऋषिंना आशिर्वाद देण्यासाठी शिवाने १४ वेळा डमरु वाजवला व त्यातुन जे विभिन्न ध्वनी उत्पन्न झाले त्याधारित हे शिवसुत्र आहे.)

१.अ इ उ ण्


२. ऋ ऌ क्


३. ए ओ ङ्


४. ऐ औ च्


५. ह य व र ट्


६. ल ण्


७. ञ म ङ ण न म्


८. झ भ ञ्


९. घ ढ ध ष्


१०. ज ब ग ड द श्


११. ख फ छ ठ थ च ट त व्


१२. क प य्


१३. श ष स र्


१४. ह ल्




हे ते १४ ध्वनी होत ज्याच्या आधारावर पाणिनीय व्याकरणाची रचना झाली आहे.

पणिनीचा काळ ठरवण्यासाठी व तो मुळचा कोठला होता हे शोधण्यासाठी हे सुत्र अत्यंत महत्वाचे आहे. ते कसे हे आपण पुढील प्रकरणात पाहुयात.








No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...