Friday, March 21, 2014

केसांत माळूनी चांद!

केसांत माळूनी चांद 
उभी ती रात्र
शिरशिर उरी...हुरहूर उरी
अन मोहोरलेले गात्र!


6 comments:

  1. सत्य हा निरीश्वरवादाचा कणा !

    -माधव गवाणकर

    शहीद भगतसिंग यांचा आज (२३ मार्च) ८३ वा स्मृतिदिन. 'मी नास्तिक का आहे?' हा आजही पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध असलेला लेख लिहून भगतसिंग यांनी निरीश्वरवाद आणि देशप्रेम यांची सांगड घातली होती.. आस्तिकता संस्कारांनी दृढ होते, तसे निरीश्वरवादी भूमिकेमागे काही संस्कार असू शकतात का? नास्तिक म्हणजे कठोर, जगाशी फटकून वागणारे ही प्रतिमा कितपत योग्य आहे? या प्रश्नांचा सर्वमान्य उदाहरणांमधून घेतलेला हा वेध.. काहीसा आत्मपर आणि व्यक्तिगतही, पण अनेकांना आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारा..
    ''सर, तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे, की 'देव' अस्तित्वात नाही?''.. माझाच एक शिष्य गणेश सकपाळ उत्सुकतेनं विचारत होता. ''गेली पस्तीस र्वष तरी निरीश्वरवादावर मी ठाम आहे.''.. खरं ते मी त्याला सांगितलं. नास्तिक हा खरं बोलतो म्हणून तर त्याचा इतका राग काही लोक करतात, पण भाविक विरुद्ध नास्तिक असा काही वैरभाव नाही आणि असू नये. माझे बहुतेक मित्र श्रद्धाळू आहेत. त्यांच्या भावना मी कधी दुखावल्या नाहीत. माझ्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांना त्यांनी कधी दुखापत केली नाही. 'म्हातारपण आलं की, देव आठवेल' असं एखादा दोस्त म्हणायचा, पण तसंही होत नाही. 'नास्तिक' समाजाच्या सर्व स्तरांवर दिसतो आहे. डॉ. श्रीराम लागूंसारखे वलय असलेले कलाकार नास्तिक आहेत. माझ्यासारखे सामान्य कॉलेज शिक्षकही निरीश्वरवादी आहेत.
    कोवळ्या वयात खरं तर आपल्यापकी बहुतेक जण 'चिकित्सक' असतात. बंडखोरी उफाळत असते, पण 'व्यवस्था' आपल्याला फार उसळू देत नाही. चारचौघांसारखं जगणं सोपं असतं. माणसं सोप्या गोष्टी पटकन आत्मसात करतात. प्रवाहाच्या विरोधात पाणी कापणं अवघड. नास्तिक नेमकं तेच करतो. घरात वाद होतात. माझ्याही झाले. मात्र, माझे मुद्दे खोडणं वडिलांना शक्य होत नसे. तेही शिक्षक होते.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  2. या नास्तिकतेच्या 'ठिणग्या' कशा पडतात? 'वाचन' हा घटक मला महत्त्वाचा वाटतो. तेव्हा तरी होता. 'मी नास्तिक का आहे?' या भगतसिंग यांच्या पुस्तिकेचा अनुवाद माझ्यावर फार प्रभाव टाकून गेला होता. त्या काळात आमचे समाजवादी शिक्षकही निरीश्वरवादीच होते. गोरेगावला, मुंबईत मृणाल गोरे आणि आम्ही गवाणकर एकाच इमारतीत राहायचो. मृणालताईंच्या घरी देवघर नव्हतं. देव न मानता बाईमाणूस आयुष्याची लढाई राजकारणासह एकटीनं लढतं हे जवळून पाहणं हासुद्धा एक संस्कारच म्हणायचा.
    'साठय़े कॉलेजा'त तत्त्वज्ञान शिकताना 'चार्वाक' जिवलग मित्रासारखा वाटू लागला होता. म्हणजे, नास्तिकाची जडणघडण ही ग्रंथ, शिक्षण आणि आसपासची आदरणीय बुद्धिवादी माणसं यांच्यातून होते. ज्यांच्या नावे आता समाजसेवा करणारं 'ट्रस्ट' आहे, ते डॉ. पी.व्ही. मंडलिक करडी शिस्त, सडेतोडपणा आणि निर्भयता यासाठी प्रसिद्ध, तेसुद्धा सुधारक!
    नास्तिक हा कठोर, अरसिक असेल असंही कुणाला वाटत असेल. प्रत्यक्षात, मी पाहिलेले निरीश्वरवादी कलागुणी, चोखंदळ आणि समाजभान असलेले होते. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे 'पुलं' आणि सुनीताबाई! काही तारे दुरून प्रकाश देतात तसं त्यांचंच जीवन आम्हा चाहत्यांच्या दृष्टीनं ठरलं. 'पुलं'चं पत्र आलं, तरी त्यात एक 'विचार' असायचा व तो 'नाटकी' नसायचा.
    नास्तिक हा कसलंच 'बंधन' नसल्यामुळे व्यसनांत बुडालेला, नतिकतेशी संबंधच नसलेला सो कॉल्ड पापी वगरे असणार, असा अपप्रचार होऊ शकतो. अर्थातच वस्तुस्थिती अशी नाही. ना.ग. गोरे, एस.एम. जोशी, प.बा. सामंत यांचं स्वच्छ, निष्कलंक जीवन तर आपण अभ्यासू शकतोच, पण कोकणात जी साधीसुधी निरीश्वरवादी माणसं मी पाहिली, तीही कुटुंबवत्सल व देहदानासारख्या विचारातून शेवटपर्यंत समाजजाणीव ठेवणारी, विधायक दृष्टिकोन असलेली अशीच होती व आहेत. कुणी वाचनसंस्कृती वाढावी म्हणून धडपडतो. कुणी दत्तक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण भरून देतो. मुक्ता आणि अनीश पटवर्धनसारखं जोडपं दीर्घकाळ 'अंधश्रद्धा निर्मूलना'चं समाजोपयोगी काम निष्ठेने करतं. डॉ. प्रकाश साठय़े बुद्धिप्रामाण्यवाद मानसशास्त्राशी जोडून चिंतन, लेखन करतात. खूप छान माणसं आहेत ही सगळी! मग कसं म्हणावं की, नास्तिक म्हणजे वाईट?..
    निरीश्वरवादी स्वत:चे अनुभव तपासत असतो. मीही तेच केलं. देवभक्त आजीचे अखेरच्या काळात अर्धागवातामुळे झालेले हाल, श्रद्धाळू वडिलांचं निराश, चिडचिडं, हतबल जीवन, लहान मुलांसाठी शिक्षण व बालसाहित्यातून आयुष्य वेचणाऱ्या आईची, आशा गवाणकरांची कॅन्सरमुळे झालेली दुर्दशा, आमच्या गोतावळ्यातील एका प्रसिद्ध संगीतकाराचा अपघातात झालेला भयानक अंत, अगदी लहान मुलांना होणारे असाध्य आजार, शोषणाची, विषमतेची अखंड सुरू असलेली साखळी या सगळ्या अनर्थाचा अर्थ आम्ही बुद्धिवादी लावत आलो. जगात न्याय व नतिक नियंत्रण नाही याची खात्री पटली. आपला समाज सत्याला इतकं का घाबरतो? आपल्या आजच्या शिक्षणव्यवस्थेत निरीश्वरवाद कुठं व कितपत आहे? उदबत्त्या विकायला माझ्याकडे आलेला एक चिमुकला विक्रेता माझ्या घरात देव्हाराच नाही हे पाहून अगदी चकित झाला होता. बारावी उत्तीर्ण होऊन आलेल्या मुलामुलींना मी वर्गात सहज 'नास्तिक' शब्दाचा अर्थ विचारला. त्यांना तो सांगता आला नाही. ही ग्रामीण वस्तुस्थिती आहे.
    पुढे चालू...

    ReplyDelete
  3. 'स्कूल' हा शब्द आपण 'विचार' या अर्थाने घेतला, तर महाराष्ट्रात निरीश्वरवादी 'स्कूल' दिसत नाही. तरुण वयात डॉ. दाभोलकर, प्रा. श्याम मानव, डॉ. अवचट, वाईचे डॉ. अभ्यंकर अशा अनेक विचारवंतांच्या पुस्तकांचा पगडा आमच्यावर होता. तसं लेखन आता नव्यानं झालं, तरी 'मीडिया'ला ते कितपत सोयीचं ठरेल? असा प्रश्न पडतोच. अंधविश्वास घरोघरी नेण्याचं काम रोज दृश्यमाध्यमं करत आहेत. त्यावर कसलंच नियंत्रण राहिलेलं नाही. भ्रामक विद्या आकर्षक रूपात मांडून त्याचं मार्केटिंग मोठय़ा प्रमाणावर केलं जातंय, पण निरीश्वरवादासारख्या उपेक्षित विचाराच्या संदर्भात किती कार्यक्रम होतात? काही नाही! तेव्हा 'अन्याय' इथंही आहे.
    'नास्तिकता' ही एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला तुम्ही डळमळीत असता. हळूहळू ठाम होता. 'अमक्या दिवशी दुपारी दोन वाजता मी नास्तिक झालो बरं का' असं सांगता येत नाही. आईने मला विचारांचं, आचरणाचं, अभ्यासाचं, अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य दिलं, त्यामुळे मी मनमोकळेपणाने निरीश्वरवाद स्वीकारून कृतीत आणू शकलो. त्यामुळे, मी थोडा 'अलिप्त' झालो, पण माणूसघाणा झालो नाही. माझी विनोदी नाटय़छटांची पुस्तकं नास्तिक मिस्कील असतो हे सिद्ध करायला पुरेशी आहेत. तेव्हा खेळकरपणा नाहीसा होण्याचं कारणच नाही. पसा व वेळ यांची बचत पारंपरिक जीवनातील कर्मकांड, उधळपट्टी यापासून दूर राहिल्यामुळे आपोआप होतेच. हा फायदाच नाही का? मुख्य म्हणजे माझ्या बहुतेक इच्छा जीवनात पूर्ण झाल्या. माझ्या मर्जीने, आवडीने जीवनशैली आखता आली. संयम, निव्र्यसनीपणा आणि इतरांचा विचार करण्याची सवय लागली. यात वाईट काय आहे? मित्रांनो, हाडामांसाच्या खऱ्या माणसाचे अस्सल प्रश्न हे नास्तिकालाच खऱ्या अर्थाने जाणवतात. काल्पनिक बठक असलेली भारतीय व्यवस्था हे प्रश्न सोडवू शकलेली नाही. रोजच्या बातम्या वाचल्या तरी व्यवस्थेचा बेशिस्त भोंगळपणा लगेच आणि वारंवार लक्षात येईल. आमचा तरुण वर्ग पुराणकथा रंगवून सांगतो, पण चीनकडे भारताचा बळजबरीने जिंकून घेतलेला भूभाग मात्र परत मागत नाही. चंगळवादाला, निष्क्रियतेला, स्वार्थाला, भ्रष्टाचाराला जे देशभर उधाण आलंय, त्यामुळे वेगळ्या, 'सत्यवादी' व्यवस्थेची गरज खऱ्या देशभक्तांच्या लक्षात येईलच. दांभिकता हा या व्यवस्थेचा कणा आहे, तर सत्य हा निरीश्वरवादाचा कणा आहे. मात्र, नास्तिकता हा अहंकाराचा विषय नाही!
    'ईश्वर नाही' ही भावना मुळात शोकात्म आहे. पाश्चात्त्य, आधुनिक अस्तित्ववादही तीच भावना व्यक्त करतो. मात्र, नास्तिकता व्यक्तीला निराधार करत नाही. जीवनाच्या अपूर्णतेची जाणीव देऊन उलट अधिक सजग, बलशाही आणि कार्यतत्पर करते.
    मी केलेल्या या मांडणीच्या संदर्भात मतभेद, वेगळे विचार असू शकतात. अधिक चर्चा व्हावी. आपल्या मराठी वाचकमित्रांच्या मतमतांतराचं स्वागत! मात्र, सत्याचा द्वेष करणं कमी होत गेलं, तर या महा(न) राष्ट्राची घोडदौड कुणीही रोखू शकणार नाही.
    माझ्या आयुष्यात खरोखरच मी एकही उपास केलेला नाही. माझा जुना रंगीत टी.व्ही. मी गरीब, वृद्ध कॅन्सरग्रस्त स्त्रीला भेट देतो, तेव्हा त्यामागे 'पुण्यसंचय' असा विषय नसतो, तर केवळ माणुसकी असते. त्या बदल्यात मला काही साधायचं नसतं. माणसाची हाक माणसाने ऐकली असती, तर इच्छामरण, दयामरण या संदर्भातले आवश्यक कायदेही झाले असते. विवेकाचं भान ठेवत मानवी हक्कांचं रक्षण करायचं असेल, तर तिथेही 'माणूस' हाच घटक महत्त्वाचा ठरेल, देव नाही!
    'आकाश' असं काही वेगळं नसतं, पण मनाचं म्हणून एक आभाळ मानता येईल. आज मी ते थोडं मोकळं केलं..
    समाप्त.
    ...............................................................................................

    ReplyDelete
  4. आप्पा -मीपणाचे विसर्जन हे आपल्या इथल्या लोकप्रिय विचारसरणीचे मर्म आहे , शरण जाणे आणि अर्पित भावनेनी कर्म करणे , फळाची अपेक्षा न धरणे अशी आपली कमीअधिक प्रमाणात जीवनमूल्ये आहेत
    बाप्पा -अहं ला आपल्या तत्वज्ञानात अंतिम सत्य शोधण्यातला अडथळा मानले जाते जैन बौद्ध आणि तथाकथित हिंदू असाच विचार करत मोक्षाचा मार्ग शोधत असतात आणि आपण एकप्रकारे मानसिक विकृतीलाच निमंत्रण देत असतो !जन्मभर आपण अंतिम सत्य शोधण्याचा आव आणत एक पूर्ण फसवे जीवन जगत असतो !
    आप्पा -ऐहिक सुख विषासमान आणि त्यावाचून तर करमत नाही अशामुळे आपण जन्मभर भांबावलेले आयुष्य स्वीकारत जगतो . इथे अहम्पनाचा त्याग हि साधनेची पहिली पायरी धरली जाते
    पण
    बाप्पा -नास्तिक विचारसरणीत माझ्या कल्पने प्रमाणे अहं =इगो ला सकारात्मक महत्व आहे ,
    आपले कर्तृत्व हाच आपला जीवनाधार आहे ऐहिक जीवन सुखी करणे आणि समाजातील सर्व थराना
    बरोबर घेऊन समान संधीसह संपत्तीचे आणि वस्तूंचे समान वाटप होणे असे काहीतरी समाजवादात अपेक्षित आहे त्याउलट भांडवल शाहीत योग्यतेप्रमाणे संधी आणि संपत्तीची निर्मिती असा क्रम असतो अशी माझी समजूत आहे त्यातच भांडवल शाहीतील कल्याणकारी समाजरचनेत काही टक्के संपत्तीचे वितरण (पुढील अनर्थ टाळण्यासाठी )करणे हा एक अजून प्रकार असतो !

    आप्पा -आपल्याकडील आध्यात्मिक बैठक अत्यंत घातक असून ती कोणत्याही ऐहिक प्रगतीला मारकच ठरत आलेली आपण बघतोच आहोत
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजकाल माणसाना सहनशक्तीचे वावडे आहे त्यामुळे
    "सर्व तात्काळ " असे आयुष्य झाले आहे पूर्वीच्या भारतीय तत्व ज्ञानात उपजतच सहनशीलतेला खतपाणी घातले जात असे याउलट नवश्रीमंत आधुनिक शहरी संस्कृतीत सर्व झटपट घडावे अशी अपेक्षा असते
    बाप्पा -आधुनिक समाज जीवनात जाहिरात आणि चंगळवाद यांचा अतिरेक झालेला आढळतो आणि त्यामुळेच अत्यंत प्राथमिक गोष्टींची जबाबदारी घेण्याचे आपण नाकारत असतो . सुसंस्कृतपणा शून्याच म्हणावा लागेल आणि त्यास काय कारणे आहेत तेपण शोधले पाहिजे
    आप्पा -समाजमनात धर्माचा पगडा खूपच असल्यामुळे आपले कोण आणि परके कोण याचे संस्कार हे सर्वार्थाने जात धर्म आणि प्रांत अशा क्रमाने मनात असतात
    या सर्वांचाच आढावा घेण्याची वेळ आली आहे

    ReplyDelete
  5. आस्तिकता ही उत्क्रांतीमधील एक पायरी आहे विश्वाच्या निर्मिती आणि "मी कोण " या प्रश्नाला बौद्धिक उत्तरे शोधण्याच्या पद्धतीमधील तो अनिवार्य भाग होता आणि त्याचे पर्यवसान नास्तीकतेत होणे हे त्या भावनेच्या साखळीतील अंतिम वळण आहे , त्यामुळे तेथून परत मागे फिरत उलटा विचार करणे हे निसर्गाच्या विरुद्ध असेल
    आस्तिकता हि वैचारिक मंथनाचे सार नसून भावनेच्या आहारी जाउन सत्य शोधनाला लावलेले कुलूप म्हणता येईल कारण जितके अन्याय आस्तीकतेमुळे झाले आहेत तितके इतर अन्य कोणत्याही विषयामुळे खचितच झाले असतील समाजाला एका वेगळ्या रचनेचा अपरिहार्यपणे आस्तीकातेचा बळी होत स्वीकार करावा लागला . देव आला स्वर्ग नरक आले पुनर्जन्म आला आणि पाप पुण्य आले त्याबरोबर त्याचा हिशोब ठेवणारा वर्ग आला पुण्याचा संचय आणि पापाचा नाश यावर उपाय तोडगे आले आणि पूजाविधी आले आणि राजापासून रंका पर्यंत सार्वजन पुजारी वर्गाचे दास झाले - आणि एका अगणित अत्याचाराची आणि पिळवणुकीची मालिका सुरु झाली आणि धार्मिक दहशतवाद सुरु झाला
    पहिला प्रयत्न केला चार्वाकाने आणि त्यापूर्वी सांख्यांनी पण डाळ शिजली नाही !
    बाहेरून मुसलमान आक्रमणे झाली ,अनेक मूर्ती भंगल्या अनेक विटंबना झाल्या पण धार्मिक लोकांना असे वाटले नाही की असा अशक्त धर्म फेकून द्यावा असे अशक्त देव फेकून द्यावेत ! चारही वर्णाना असे नाही वाटले !राजा क्षत्रिय , पण त्यानेसुद्धा हा दैवी कोप मानला !सामाजिक संकटांची आणि राजकीय पराभवाची संगती लावायची मुभा पुजारी वर्गाला दिल्यावर दुसरे काय होणार ?
    नंतर आले इंग्रज आणि आधुनिक ज्ञान आणि ते शिकून घेत एक मध्यम वर्ग तयार झाला आणि आजवर तोच समाजाचे राजकीय आणि वैचारिक नेतृत्व करत आहे आणि तेच आहेत जुन्या धर्माचे सर्वेसर्वा ब्राह्मण !त्यांनी आपणहून एकदातरी ओरडून सांगायला हवे होते की बाबानो आम्हीच तुमचे अपराधी आहोत , गुन्हेगार आहोत !जी गोष्ट खोटी होती त्यावर आमच्या शंभर पिढ्या जगल्या , उतल्या मातल्या , आता आम्ही तुमची क्षमा मागतो !
    पण असे झाले नाही !

    ReplyDelete
  6. आप्पा इतके शहाणे कधीपासून झाले ?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...