Friday, August 19, 2022

रहस्यमय तिबेटचे व्यापारी मार्गांवर स्वामित्व!


 


तिबेटचा इतिहास हा खूप रहस्यमय आणि गूढ मानला जातो. हिमालयाच्या उत्तरेस हिमालयाच्या आणि कुनलुनच्या पर्वतरांगांनी वेढलेलेअल्पाईन काळात भूहालचालींनी निर्माण झालेलेअत्युच्च व विस्तीर्ण तिबेटचे पठार आहे. त्याचे क्षेत्रफळ २० लाख चौ. किमी. असून सरासरी उंची ४,२५० मी. आहे. त्याला जगाचे छप्पर’ म्हणतात. जगातील अनेक महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान या पठारावर आहे. सिंधूसतलजत्सांगपो (ब्रह्मपुत्रा)कालीगंडककोसीइरावतीसॅल्वीनमेकाँगयांगत्सी व ह्वांग हो या नद्या याच पठारावर उगम पावतात. इतर जगापासून हा विस्तृत भूप्रदेश तुटलेला असल्यामुळे साहजिकच तेथील धर्म व लोकजीवन हे रहस्यमय वाटल्यास आश्चर्य नाही. पण इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकात तिबेट हा महासत्ता बनला होता व चीनपासूनही खंडणी वसूल करत होता आणि याचे कारण म्हणजे तिबेटचे मध्य आशिया आणि लदाखमधून जाणा-या व्यापारी मार्गांवर असलेले स्वामित्व आणि त्यामुळे वाढलेले सामर्थ्य. नेपाळ हा देशही बराच काळ त्यांच्या ताब्यात होता.

चिनी इतिवृत्तकार तिबेटमधील चारसहा भटक्या टोळ्यांचा उल्लेख करतात. या टोळ्या पशुपालनावर उपजीविका करीत आणि त्यांना चिअँग म्हणत. चिअँग जमातीचे वर्चस्व इ.स. पू. २०० च्या सुमारास तिबेटवर होते. त्यांनी चीनच्या ईशान्येकडील काही मुलूख पादाक्रांत करून बॉन या नावाचा निसर्गपूजेवर आधारित धर्म प्रचारात आणला. निसर्गपूजेबरोबरच हे लोक भुताखेतांची आराधना करीत. ह्या जमातीने आपल्या राज्याच्या सीमा हिमालयाच्या पायथ्यापासून कोकोनार सरोवरापर्यंत वाढविल्या. यातील एक कर्ता पुरुष पुग्याल हाच तिबेटचा पहिला राजा असावाअसे तिबेटी दंतकथा सांगतातपरंतु बौद्ध धर्माच्या इतिवृत्तानुसार न्यात्‌रीत्सेन पो (न्यात्रीसेनपो) हाच ऐतिहासिक दृष्ट्या पहिला राजा होय.  याच घराण्याचा बत्तीसावा राजा  साँगत्सेन गाम्पो (सातवे शतक) हा पराक्रमी होता. त्याने राज्यविस्तार केला. तसेच बौद्ध धर्माच्या अध्ययनाकरिता आपल्या एका मंत्र्यास हिंदुस्थानला धाडले. त्याच्याच कारकीर्दीत तिबेटमध्ये बौद्धमठजोखांगचे प्रसिद्ध देवालय व पोताला राजवाडा यांच्या बांधकामास सुरुवात झाली. त्याने चीनवर स्वारी करून तेथील राजकन्येबरोबर विवाह केलाशिवाय नेपाळी राजकन्येशीही त्याने लग्न केले होते.

याच काळात उत्तर भारतात कनौज येथे हर्षवर्धन राज्य करत असताना त्याने चीनच्या दरबारी आपले शिष्टमंडळ व्यापार वाढवण्यासाठी पाठवले होते. यावर तांग घराण्याचा राजा तायझोंग याने हर्षाच्या दरबारी आपलेही एक शिष्टमंडळ वांग झुआन्त्सो याच्या नेतृत्वाखाली पाठवले. पण वांग कनौज येथे पोचेपर्यंत हर्षाचा मृत्यू झाला होता आणि अर्जुन नावाच्या त्याच्या एका मंत्र्याने उठाव करून सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली होती. हर्षाच्या मृत्यूबाबत अनभिद्न्य वांग सन ६४८ मध्ये कनौज येथे पोचला पण अर्जुनाने या तीस सदस्यांच्या शिष्टमंडळावर हल्ला चढवला. त्यामुळे वांगला जीव वाचवून तिबेटला पळून जावे लागले. त्याने तेथे ७००० नेपाळी आणि १२०० तिबेटी सैन्य जमा केले आणि कनौजवर स्वारी केली. त्यात त्याने कनौज उध्वस्त तर केलेच पण अर्जुनालाही ठार मारले. तेथून त्याने मगध प्रांतावर स्वारी केली आणि दोन हजार कैदी व बुद्धाचा एक पवित्र अवशेष सोबत नेला. तिबेटने आपल्याला या युद्धात मदत केली म्हणून चीनचा राजा तायझोंग एवढा खुश झाला कि त्याने तिबेटचा राजा साँगत्सेन गाम्पोचा भव्य पुतळा उभारला. पण चीन-तिबेटची ही मैत्री फार काळ टिकली नाही. त्यात तिबेटचे अरबांशीही युद्ध सुरु झाले आणि दुसरीकडे चीन. त्यामुळे अविरत संघर्षानंतर सन ७०७ मध्ये पुन्हा एकदा शांततेचा तह झाला आणि या तहाचे प्रतीक म्हणून सन ७१० मध्ये चिनी राजकन्या जिन्चेंग तिबेटचा राजा ख्रिडे-त्झुंग-बृत्सान याला विवाहात दिली गेली होती. त्याच वर्षी जिन्चेंग तिबेटमध्ये आली. ही राजकन्या काही वर्ष तिबेटमध्ये आपल्या पतीबरोबर राहिल्यानंतर झाबुलीस्तानचा राजा तेगिन झिबिल याच्याकडे तिचा तातडीचा संदेश आला म्हणूण त्याने चीनचा राजा हुएनत्संगकडे सन ७२४ मध्ये एक शिष्टमंडळ पाठवले.

       या शिष्टमंडळाने चीनच्या राजाला कळवले की, चीनची राजकन्या तिबेटचा त्याग करून (म्हणजे पतीला सॊडून) काश्मीरमध्ये आश्रय घेऊ इच्छिते. राजकन्या जिन्चेंगने काश्मीरच्या राजाकडे आधीच गुप्तपणे दोन चिनी दूत पाठवले असून त्यांच्या मार्फत पाठवलेल्या संदेशात काश्मीर आणि चीनच्या स्नेहार्द संबंधांचे गुणगाण केले. "मला तिबेटचा त्याग करायचा असून काश्मीरमध्ये आश्रय घ्यायचा आहे. आपण माझा स्विकार कराल काय?" या तिच्या प्रश्ना्वर काश्मीरच्या राजाने (तारापीडाने) उत्तर दिले की "राजकन्येतू खुशाल येथे ये. तुला हवी ती मदत आणि सहकार्य आम्ही करु." तिला उत्तर पाठवून त्याच वेळीस काश्मीरच्या राजाने झाबुलीस्तानच्या राजाला कळवले की “चीनची राजकन्या तिबेटचा त्याग करू इच्छिते आणि माझ्या राज्यात शरणार्थी म्हणून येवू इच्छितेपण तिबेटी सैन्य तिचा पाठलाग करण्याची शक्यता आहे. जर तिबेटी सैन्याने तिला अटकाव करण्यासाठी पाठलाग सुरु केला तर त्यांना रोखण्यासाठी माझ्याकडे पुरेसे सैन्य नाही. त्यामुळे झाबुलीस्तानच्या राजाने आपल्याला काही सैन्यशक्तीची मदत करावी." या प्रकरणात जिंचेंगचे शेवटी काय झाले हे इतिहासाला माहित नाही. तारापीडाचा या घटनेनंतर मृत्यू झाला आणि त्याचा धाकटा भाऊ ललितादित्य महान सत्तेत आला.

ललितादित्य मुक्तापिडाने भारतातून व बाल्खमधून अरबांना हाकलून परत येताना गिलगीट बाल्टीस्तान व लदाखही आपल्या स्वामित्वाखाली आणले. तिबेटी सत्तेला हे मोठे आव्हान होते. ललितादित्याच्या मृत्युनंतर काही काळात लदाख, बाल्टीस्तान आणि गिलगिट स्वतंत्र झाले. खरे तर तिबेटमधील सीमावर्ती अनेक राज्ये स्वतंत्र बनली. चंगेजखानाने चीन जिंकून आपले साम्राज्य प्रस्थापित करून सारे प्रांत एका छत्राखाली आणल्यानंतर आता तिबेटवर खंडणी देण्याची वेळ आली. पण चंगेजखान क्रूर असला तरी व्यापारी मार्ग व व्यापार सुरक्षित असावेत यासाठी त्याने व्यापारी मार्गांच्या सुधारणांवर खूप लक्ष दिले. चंगेजखानाच्या मृत्युनंतर त्याचा नातू गोदान याने तिबेटमध्ये आपली सत्ता स्थापन केली. विखुरलेली राज्ये पुन्हा आपल्या स्वामित्वाखाली आणली. पंधराव्या शतकात मंगोलियाने तिबेटवर आक्रमण करून आपली सत्ता आणली. थोडक्यात तिबेट अशांत राहिला. लदाखमधील राजवटी पुन्हा स्वतंत्र झाल्या.

लदाख आणि तिबेटमधील व्यापारी संबंध पूर्वापार होते. लदाख हा नैसर्गिक मिठाचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातक होता. पश्मीना लोकरीतही त्यांची मक्तेदारी होती. शिवाय कस्तुरी, चहा, काश्मीरमधून येणारे केशर व शाली इत्यादीचा मोठा पुरवठा लदाखमधून होत असे. तिबेट स्वाभाविकपणे त्यांचा मोठा आयातदार होता. लेहवरून ल्हासाला जाणारा व्यापारी मार्ग हा चांग चेन्मो खो-यातून जाई गारटोकच्या दिशेला वळत असे. गारटोक हे खेडेसदृश असले तरी त्याच्या स्थानामुळे ते व्यापाराचे पुरातन केंद्र होते. हा मार्ग युद्धासाठी सैनिकी हालचालींना सुद्धा वापरला गेला आहे. त्यातील काश्मीरचा सेनानी जोरावरसिंगची तिबेटवर स्वारी हा हाही एक इतिहास आहे. नंतर तिबेटला साम्यवादी चीनने अक्षरश: गिळंकृत केले. भारताशी सीमा संघर्ष सुरु झाल्यानंतर लेह-ल्हासा हा व्यापारी मार्ग बंद केला गेला. मध्य आशिया आणि तिबेटशी होणारा व्यापार थांबल्याने काश्मीर-लदाखची अर्थव्यवस्था गडगडने स्वाभाविक होते. त्यामुळेच जोरावरसिंगने लदाख पुन्हा जिंकून काश्मीर राज्याला जोडले व तिबेटवर स्वारी केली. तो थरारक इतिहास आपण पुढेल भागात पाहूयात.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...