Friday, December 9, 2022

मिथके जेंव्हा इतिहास बनू लागतात...


 

वेडात दौडले वीर मराठे सात” वरून अनेक अंगाने वाद सुरु आहेत. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर तथ्य वेगळेच असल्याचे लक्षात येते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.' (सभासद बखर) या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत त्या युद्धात आणखी सहा वीरांना वीरमरण आलेअशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत. त्यामुळे केवळ सात वीर बहलोलखानाच्या फौजेवर चालून गेले आणि बलिदान दिले ही कथा कितीही प्रेरणादायी वाटत असली तरी त्यात ऐतिहासिक तथ्य असल्याची शक्यता दिसत नाही. परंतु इतिहास हा आपल्याकडे नेहमीच वादाचा विषय होताना दिसतो.

 असे घडले...” ही हकीगत सांगतो तो इतिहास अशी आपण इतिहासाची साधारण व्याख्या करतो. पण जे सांगितले जाते त्याचे अनेक पदर असतात. जे सांगितले जाते ते खरेच तसेच्या तसे घडले होते हे ठामपणे सांगता येतेच असे नाही. अगदी पुरावे असले तरी त्या पुराव्यांचे आकलन इतिहासकारपरत्वे वेगळे असते. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. पुन्हा पुराव्यांची विश्वासार्हता काय हा प्रश्न असतोच. अनेक पुरावे बदलले जातात किंवा अडचणीचे पुरावे नष्ट केले जातात. इतिहासाच्या अनेक बाबींकडे तर साफ दुर्लक्ष केले जाते. सध्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या नादात तर अनेक इतिहास पुसूनच टाकायचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना आपल्याला दिसतात. त्यातील भयावहता आपल्या लक्षात अजून आलेली नाही.

बव्हंशी इतिहास हा जेत्यांचासत्ताधा-यांच्या वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. आपल्याला आवडतो तोच खरा इतिहास असा समाज असणारे सामाजिक वर्ग असल्याने समाजमनही एकाच आणि समान इतिहासाकडेही वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे इतिहासावरून असंख्य सामाजिक संघर्ष निर्माण होतात. इतिहासाने आपल्याला डावलले आहे अथवा आपल्यावर अन्याय केला आहे असे वाटणारे समाजघटकही संघर्षरत होतात. आपलाच इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यात अनेकदा अभिनिवेश असतो आणि पुराव्यांची सोयीनुसार मोडतोड करत आकलन केले जाते आणि नवाच इतिहास लिहिला जातो. पण तो काय आणि अगदी इतिहासकार म्हणून गांभीर्याने लिहिणा-या अभ्यासक/संशोधक इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास काययात फार फरक नसतोच.

शिवायभारतीय इतिहासातून सुटून गेलेल्या अनेक बाबी आहेत. आपला इतिहास हा बव्हंशी राजकीय व धार्मिक इतिहास आहे. त्यात सामाजिक  व आर्थिक इतिहासाचा क्वचितच समावेश असतो. इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची जी कालरेखा गृहीत धरून इतिहासाची जी मांडणी केलेली आहे तीच संशयास्पद असल्याने इतिहासरचनाही विस्कळीत व चुकीची झाली आहे. त्यामुळे भारतीय धर्मेतीहासाची रचनाच साफ बदलून गेलेली आहे. उदा. इसपू. १२०० च्या आसपास भारतात प्रवेशलेल्या वैदिक धर्मापासूनच भारतिय धर्मांचा इतिहास सुरु होतो या मताचा मोठा पगडा इतिहासकारांवर आहे. त्यातून येथील प्राचीन लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) आणि समणव्रात्ययती  या वैचारिक संस्कृतीज्यातून जैनआजीवक आणि बौद्ध हे धर्म निर्माण झाले त्यांच्याही मुळांचा इतिहास झाकोळला गेला आहे किंवा दुषित झाला आहे हे आपल्या लक्षात येईल. वैदिकाश्रयी इतिहासरचना हा भारतीय इतिहास लेखनातील फार मोठा दोष आहे. त्यामुळे आपल्याला सत्याच्या किमान जवळ जाणारा इतिहास मिळत नाही.

असे असले तरी इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो हे अमान्य करता येत नाही. किंबहुना इतिहास आपली समाजमानसिकता ठरवण्यात मोठा वाटा उचलत असतो. कोणात गर्व,  स्वाभिमान तर कोनात न्यूनगंड निर्माण करण्याचे कार्यही इतिहास करतो. हे अनेक इतिहास-लबाडांना माहित असल्याने ते इतिहासाचा आपला वर्चस्वतावाद रेटण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात. अनेकदा वदंताच इतिहास बनवला जातात. नव्हे त्याच सत्य असून तोच इतिहास आहे असा ग्रह करून दिला जातो. अगदी राम किंवा कृष्ण यांचा पुराकथांना अपरिवर्तनीय ऐतिहासिक सत्य मानत त्यावरूनही सामाजिक संघर्ष पेटवले जातात थोडक्यात इतिहास हा कसा सांगितला गेला आहेकोणी आणि कोणत्या हेतूने सांगितला आहे याचाच पगडा इतिहासावर आहे आणि यावर आधारित असलेले समाजाचे आकलन आहे. आणि असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

जे तटस्थपणे इतिहास लिहिण्याचा आपापल्या आकलनानुसार प्रयत्न करतात त्यांचेही अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांनारुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहितसंपुर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

मागे दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादीपुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पाडले होते. महाराष्ट्रात इतिहासावरून आजही कटू संघर्ष सुरूच आहेत. आंदोलने झालेली आहेत. किंबहुना इतिहासाच्या स्वार्थी आकलनातून आणि त्याच्या अतिरेकी अस्मितांच्या अवडंबरातून सामाजिक दुरावे वाढण्यास हातभारच लागलेला आहे. आणि त्याचा नकळत दबाव इतिहासकारांवर येतो आणि त्याचे लेखनस्वातंत्र्य नकळत हिरावले जाते.

 खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजेतरच इतिहासाचे आकलन समृद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते. आपल्याला जसा आवडतो तोच आणि तसाच इतिहास या आग्रहामुळे आणि मागणी तसा पुरवठा करू पाहणा-या “राजकारणी” इतिहासकारांमुळे इतिहासाचे काय होते हे आपण सहज पाहू शकतो.


खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असायला हवेमग व्यक्तीगत आकलन भिन्न का असेना. जे सामोरे येईल ते सत्य किती का कटु असेनात्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईनामुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतातमग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.

आपला बहुतेक इतिहास मिथकेदंतकथा आणि आत्मप्रौढी किंवा न्युनगंडात्मक आणि बचावात्मक पद्धतीने लिहिला गेला असल्याने आपल्या इतिहासाचे सर्वांगीण तथ्यात्मक दर्शन घडेल आणि त्याच पद्धतीने आकलन करून घेतले जाईल अशी स्थिती नाही. आपला अगदी मध्ययुगीन इतिहाससुद्धा सत्याचे केवळ धूसर दर्शन घडवतो तर मग प्राचीन इतिहासाची बाब वेगळी. मिथकांना काटेकोरपने वगळत अथवा त्यांची नि:पक्ष चिकित्सा करत तटस्थ इतिहास मांडायची आपल्या इतिहासकारांना मुळात सवयच नाही. त्यामुळे आपल;याला निखळ इतिहास आहे कि नाही हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...