Saturday, December 10, 2022

जागतिकीकरण आणि आपण

  

 



आधुनिक काळात जागतिकीकरण हा परवलीचा शब्द बनलेला आहे. यामुळे जग हे एक ग्लोबल खेडे बनले आहे असे सातत्याने म्हटले जाते. जागतिकीकरणाचे भले-बुरे परिणामही नेहमी चर्चेत असतात. जागतिकीकरणामुळे स्थानिक संस्कृती प्रदूषित होत आहेत असेही प्रचार केले जातात. पण जागतिकीकरण नवीन नाही हे मात्र लक्षात घेतले जात नाही. पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुष्कीच्या मार्गाने व नंतर सागरी मार्गानेही सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन रेशमी/सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, चीन अशा वेगवेगळ्या जात व तिकडुन सोने, रेशीम, घोडे, ते मद्यादि अगणित वस्तु भारतात येत असत. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. किंबहुना परस्पर संपर्कामुळे तसे होणे अपरिहार्यच होते. यात धार्मिक संकल्पनांचीही उधार-उसनवारी होती. उदा. सूर्य पुजा ही भारतियांनी पश्चिम आशियातुन मगी लोकांकडुन घेतली. पारशी, बौद्ध, इस्लाम इत्यादी धर्म युरेशियासहित आफ्रिकाभर पसरले ते या व्यापारी मार्गांवरून सुलभ झालेल्या दळणवळनातून. अगदी येशू ख्रिस्तही व्यापारी तांड्यांसोबत भारतात आला होता असे वीरचंद गांधींसारखे विद्वान म्हणतात. बौद्ध भिक्षुंनी व्यापारी मार्गांवर तांड्यांसोबत जातच मध्य आशिया ते चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरवला. वैद्न्यानिक संकल्पना, मुलभूत औषधी व खगोल विज्ञान ते अनेक शास्त्रीय संकल्पना सर्वत्र पसरायला सहाय्य मिळाले ते या व्यापारी मार्गांचेच. वनस्पती-प्राणी ते वस्त्र-प्रावरणाच्या शैलीही यामुळे पसरल्या. स्थानिक शिल्पकला, वास्तुकला यावरही मोठा प्रभाव पडला.

हे येथेच थांबले नाही. संपर्कामुळे व अपरिहार्य गरजेपोटी परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. सैनिकी हालचालींनाही व्यापारी मार्गांनी साथ दिली. अलेक्झांडरचे भारतापर्यंत आलेले आक्रमण असो कि चंगेझखानाचे संपूर्ण आशीयावरचे आक्रमण, तेही या मार्गांनीच झाले. खरे तर व्यापारी मार्ग हे जागतिक इतिहासाचे सक्रीय साक्षीदार राहिलेले आहेत.

जगभर अनेक संस्कृत्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी झाल्या. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला. ही सांस्कृतिक सरमिसळ सातत्याने होत राहिलेली आहे. यालाच आपण जागतिकीकरण म्हणतो.

 म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि जौद्योगिकरणापुर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे अठराव्या शतकानंतर तो वाढला. संगणक व माहितीजालाच्या क्रांतीनंतर तर तो वेग एवढा वाढला आहे कि एखाद्याला भोवळच यावी. जागतीकीकरण हे मानवी विकासात जसे सहायक झालेले आहे तसेच ते कधी कधी संस्कृतीप्रवाहाला रोखणारेही झालेले आहे. असे असले तरी जागतिकीकरणाचे महत्व कमी होत नाही. ते मानवी जगाला नवीनही नाही. जोवर मानवात आर्थिक आणि राजकीय/धार्मिक प्रेरणा जिवंत आहेत तोवर मनुष्य नवनव्या बाजारपेठा शोधतच राहणार व त्यात विक्रेय अशा वस्तूंचे उत्पादन (व सेवाही) निर्माण करताच राहणार. मानवाचा हाच इतिहास राहिलेला आहे आणि आज काही नवे होत आहे असे नाही याचेही आपल्याला भान असले पाहिजे. राजवट कोणाची आहे त्यावर व्यापार वाढतो किंवा थांबतो असे साधारणपणे मानले जाते. व्यत्ययाचे असे क्षण येत असले तरी लोक नव्या व्यवस्थांशीही जुळवून घेतात ते केवळ गरजेपोटी.

आपला वायव्य प्रांत प्राचीन काळापासून विविध सत्तांच्या तडाख्यातून गेला आहे. तरीही तेथे तक्षशिलेसारखी रेशीम मार्गावरची महत्वाची व्यापार केंद्रे होतीच. तक्षशिला आज आपल्याला माहित असते ती तेथील प्राचीन विद्यापीठामुळे. पण या विद्यापीठाला दान देणारे बव्हंशी मार्गावरून व्यापार करणा-या व्यापारी श्रेण्या असत. त्या काळात नाणी पाडण्याचे अधिकारही श्रेण्यांना असत असे देशभरात सापडलेल्या नाण्यांवरून लक्षात येते. तक्षशिलेच्या गांधार प्रांतात श्रेण्यांना गांधारी प्राकृतात नेगम अथवा नेकम असे म्हणत असत. या नाण्यांवरील छाप खरोस्टी लिपीतील आहेत.  नंतर मात्र शक, ब्यक्ट्रियन अशी तत्कालीन परकीय सत्तांनी पाडलेली नाणी दिसतात. याचा अर्थ वायव्य प्रांत परकीय अमलाखाली गेलेला होता. पण व्यापार थांबला असे मात्र दिसत नाही. तक्षशिला काबुल-कंदाहार पासून बाल्खपर्यंत येथून जसा व्यापार केला जाई तसाच गिलगिटच्या दिशेने मिंटाका मार्गाने मध्य आशियाशी व्यापार होत असे. त्यामुळेच ते या मार्गांवरील महत्वाचे केंद्र होते आणि त्यामुळेच ते भरभराटीला आलेले होते हे आजही तेथे सापडलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. सहाव्या शतकात मात्र हुणांच्या आक्रमणात हे शहर व तक्षशिलेच्या विद्यापीठासहित पूर्ण उध्वस्त करण्यात आले. तरीही व्यापारी गप्प बसले नाहीत. त्यांनी पुरुषपूर (सध्याचे पेशावर) हे व्यापाराचे केंद्र बनवले व व्यापार पुन्हा भरभराटीला आणला. थोडक्यात आपत्ती व्यापाराला आणि म्हणून जागतिकीकरणाला थांबवू शकत नाही. किंबहुना मानवी दुर्दम्य आकांक्षा त्याला सर्व आपत्तींवर मात करायला शिकवत असतात.

सध्या चीन पुरातन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करत आहे. भारताशी त्याचे झालेले सारे संघर्ष हे केवळ पुरातन व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झाले व होत आहेत हे सहज लक्षात येते. भारतही मध्य आशियाशी खुश्कीच्या मार्गाने कसे व्यापारी संबंध वाढवता येतील या प्रयत्नात आहे. पूर्वेशी जोडले जाण्यासाठी स्टिलवेल मार्ग बांधायचा प्रयत्नही त्यासाठीच आहे परंतु त्यात दुर्दैवाने अद्याप यश आलेले नाही. असे असले तरी चीनला जोडणा-या चौदा हजार फुट उंचीवरील नथू-ला खिंडीसाठी १९६७ साली झालेल्या लढ्यात भारतीय सैन्याने ही खिंड राखली. आता ही खिंड चीनशी व्यापारासाठी काही प्रमाणात खुली आहे.

खरे तर जागतिकीकरण हे एकतर्फी असू शकत नाही. ते तसे असणे हा जागतीकीकरण या शब्दाचा अवमान आहे. पण भारताच्या दृष्टीने पाहिले तर सध्याचे जागतिकीकरण ब-याच अंशी एकतर्फी आहे असे आपल्या लक्षात येईल. प्राचीन व्यापार हा दुहेरी होता. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ होती. आयातही त्यामुळे परवडणारी व भारताच्या श्रीमंतीत भर घालणारी होती. त्याच बरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानही स्वेच्छेचा मामला होता. आता तशी स्थिती राहिली आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही.

आता व्यापारी मार्गांवरच अवलंबून राहिले पाहिजे अशी स्थिती नाही. त्यामुळे भौगोलिक कारणांमुळे आशियाशी आपण सरळ जोडले जावू शकत नाही. हे वास्तव मान्य करूनही आपण उत्पादन व व्यापार वाढवू शकतो. त्यासाठी भारतीय लोकांना आपले प्राचीन काळी अस्तित्वात असलेली, जिवंत असलेली विजीगिषु, उत्पादक आणि व्यापारी वृत्ती जागृत करावी लागेल. नोक-यांची मानसिकता सोडून उत्पादक मानसिकता जोपासावी लागेल. तरच जागतिकीकरण ख-या अर्थाने भारताला देणा-यांच्या बाजूचेही बनवेल. अन्यथा आज आपली अवस्था केवळ घेणा-यांच्या बाजूची आहे तशीच राहील. ज्ञानात असो, संस्कृतीत असो कि उत्पादकतेत असो, आमचे आज जगाला भरीव योगदान काय हा प्रश्न आजच्या नव्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आम्हाला पडला पाहिजे. पण आम्ही वृथाभिमानाच्या वांझ गप्पा करत वर्तमान व भविष्य खराब करत राहण्यात जोवर धन्यता मानत राहू तोवर जागतिकीकरणात ख-या अर्थाने आपले स्थान निर्माण करू शकणार नाही हेही तेवढेच खरे!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...