Saturday, March 4, 2023

विचार आणि भाषा!

 विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत.


पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषा ही कृत्रीम अवस्था आहे. मनुष्याने ती गरजेसाठी पुराकाळापासून विकसीत केलेली आहे. त्याची, पुराकाळातील माणसाची, अभिव्यक्ती आपण आजच्या परिप्रेक्षात समजावून घेऊ शकण्यात तोकडे पडतो ते त्यामुळेच. पुरातन मानव मिथ्गकांतुनच जगाकडे पहात होता. शब्दांत (भाषेत) उतरलेली मिथके आणि त्याला अभिप्रेत मिथके यात पुरेसे साम्य असण्याची शक्यता नाही, कारण कोणत्या शब्दाने त्याला काय अभिप्रेत होते हे आपण नीट समजावून घेऊ शकत नाही, घ्यायचे झाले तर खुप प्रयास करावे लागतात, थोडे आदिम बनावे लागते. कारण आपले विचार, आजचे, वरकरणी भाषेत झाले आहेत असे वाटले तरी अगणित विचार भाषाविहिन असतात, आणि त्यांना आपण सुप्त पण परिणामकारक (व्यक्तित्वावर) विचार म्हणतो.

भाषा ही माणसाची नैसर्गिक आणि मुलभूत गरज आणि उपज आहे असे मानशास्त्रज्ञही मानतात. भाषेचा प्रवास हा विलक्षण आहे. तो प्रत्येक काळात, प्र्तत्येक मानवी समुहाच्या आणि व्यक्तीकेंद्रित संस्कृतीचा उद्गार आहे. एक उदाहरण देतो, कारस्थान हा शब्द एकोणिसाव्या शतकापर्यंत, खटपटी-लटपटी करुन बुद्धीमानता दाखवत यश मिळवणारा/री यंना उद्देशुन वापरला जाइ. आता मी कोणाला कारस्थानी म्हटले तर तो माझा गळाच आवळायला धावेल.

इतिहासात अनेक शब्द आणि संज्ञांचे असे झाले आहे, याला कारण शब्द हे काळाप्रमाणे, त्या काळच्या सांस्कृतिक गरजांप्रमाणे अर्थ बदलत जातात, वेगवेगळ्या छटा धारण करत जातात किंवा भाषेतुनच बाद होत जातात. जसे जाते, उंबरा, उखळ ई अनेक शब्द मराठीतुन बाद होत चालले आहेत. किंवा उद्या हे शब्द राहतीलही कदाचित पण त्या शब्दांनी निर्दिष्ट होणारे अर्थ वेगळे असतील.
हा भाषेचा प्रवास पिढी-दर-पिढी बदलत जातो, आणि तीच भाषेची गंमत आहे. आता आपण प्राचीन काळात जाऊ. गो, म्हणजे गाय, या शब्दातुन गाय, आकाश, ढग, नदी, झरे ई अनेक अर्थ परिस्थितीजन्य भेद दाखवतात. यात त्या काळच्या माणसाने कशी कल्पना केली असेल हे आपण (समजायचे असेल तरच) समजु शकतो. पण पर्यायी शब्दांची अडचणही एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायची सवय लावत असेल असेही आहे.

शब्द किंवा भाषा ही नेहमीच तोट्की असते. नवीन शब्द निर्माण करण्यात आजचा आधुनिक माणूस कमी पडतो असे म्हटले जाते., व्याकरणाची मोडतोड करत व्यामिश्र नि गुंतागुंतीचा, विद्यमान भाषेत न मांडता येणारा विचार, मांडायचा तर भाषेला आहे तशी वापरुन ते साध्य करता येत नाही.

थोडक्यात विचार भाषेत येत नसून भाषा हे विचारांचे माध्यम आहे. म्हणजेच आपण नकळत विचार भाषेत अनुवाद करुन मांडतो. नि म्हणूनच विचार हे मुलार्थाने कधीही मांडता येत नाहीत, तीच भाषेची सर्वात मोठी अडचण आहे. भाषेच्या उपयुक्ततेसहित ही सर्वात मोठी असलेली भाषेची अडचण समजावून घेता आली पाहिजे, रुढ व्याकरण अथवा शब्दमाला यापार जात व्यक्त व्हायला हवे!

- संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...