Sunday, July 8, 2012

दैवी कण अस्तित्वात असुच शकत नाहीत...!




सध्या सर्वत्र दैवी कण (God particle) सापडल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय भौतिकविद ते वेदज्ञ आपापली बहुमोल मते मांडतांना दिसत आहे. हिग्ज-बोसान कणांना सामान्य जनता दैवी कण म्हणते. सर्न ल्यबोरेटरीने नुकतेच हिग्ज-बोसान (वा त्यासारखा) कण  Large Hadron Collider particle accelerator मद्धे अल्पांश कालासाठी निर्माण झाल्याचा दावा केला आहे.या दाव्याची सत्यता ९९.९९९% आहे असेही घोषित करण्यात आले आहे. यामुळे विश्वनिर्मितीचे महाविस्फोट सिद्धांताचे मोडेल सिद्ध होत असून त्यावरील सर्व आक्षेपांना कायमची तिलांजली मिळेल अशी आशा अर्थातच शास्त्रज्ञांना आहे.

आधी हे दैवी कण म्हणजे काय संकल्पना आहे हे समजावुन घेवुयात. द्रव्याला वस्तुमान असते हे आपल्याला माहितच आहे. परंतु द्रव्याला वस्तुमान नेमके कशामुळे मिळते हा शास्त्रज्ञांसमोरील प्रश्न होता. महाविस्फोट सिद्धांतानुसार जवळपास १६ अब्ज वर्षांपुर्वी शुण्यवत आकारात सर्व मुलद्रव्ये आणि प्रेरणा (forces) एकवटलेल्या होत्या आणि काही कारणांमुळे महाविस्फोट होवून द्रव्य व प्रेरणांनी स्वतंत्र मार्ग पकडले. त्यातुनच आज आपण पाहतो ते विश्व बनले. हे विश्व स्थिर नसुन ते अत्यंत वेगाने विस्तार पावत आहे असेही हा सिद्धांत मानतो. असे असले तरी दोन गुढे सुटत नव्हती ती ही कि गुरुत्वाकर्षण ही एकमेव प्रेरणा ऋणात्मक कशी आणि द्रव्याला वस्तुमान कसे प्राप्त होते ही.

हिग्ज आणि बोस यांनी स्वतंत्रपणे द्रव्याला वस्तुमान प्राप्त होण्यासाठी एखादा अल्पांश काळासाठी निर्माण होणारा मुलकण कारणीभुत असावा आणि द्रव्याला वस्तुमान देवून त्याचे अन्य गुणधर्माच्या कणात रुपांतर होत असावे असा सिद्धांत मांडला. अशा कणाच्या अस्तित्वाखेरीज द्रव्याला वस्तुमान असुच शकत नाही सबब विश्वच निर्माण होवू शकत नाही. या कणाच्या शोधासाठी १९६४ पासुन वेग आला असला तरी त्याला आता सर्न येथील कृत्रीम महाविस्फोटामुळे तो सापडला असल्याचा दावा होतो आहे.

खरोखर असा मुलकण अस्तित्वात असू शकतो काय? मुळात महाविस्फोट सिद्धांत खरा आहे काय?

मी माझ्या २००७ मद्धे "अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या पुस्तकात विश्वनिर्मितीचा स्वतंत्र नवा सिद्धांत मांडला आहे. त्यातील काही इंग्रजी अनुवादित प्रकरणे या ब्लोगवर उपलब्ध आहेत. या सिद्धांताचा सारांश असा कि अवकाश हेच एकमेव आद्य मुलतत्व असून निरपेक्ष काळाच्या सहास्तित्वात ते पुर्ण ऋणात्मक असते व अवकाश-काळ या राशींतील गुणात्मक विभेदामुळे जेंव्हा ऋणात्मक उर्जा सर्वोच्च (अवकाश-कालाच्या सममुल्यात) पातळी गाठते तेंव्हा तेवढ्याच मुल्याचा धनात्मक उर्जा मुक्त होवू लागतात. या उर्जा उत्सर्जनाच्या ० बिंदुपासुनच सापेक्ष काळाची निर्मिती होते व धनात्मक उर्जा पातळ्या गुणधर्मात्मक स्वतंत्र अवकाश खंड निर्माण करत जातात. या व्यस्त स्थितीत, जी अब्जांश सेकंद एवढीच टिकते, या काळात कृत्रीम धनात्मक प्रेरणा निर्माण होतात आणि त्यांना संतुलित करण्यासाठी (असंतुलनातील संतुलन) तेवढ्याच कृत्रीम ऋणात्मक प्रेरणा निर्माण होतात...त्यातील गुरुत्वाकर्षण हे सर्वात महत्वाचे.

गुरुत्व ही कृत्रीम प्रेरणा असून धनात्मक प्रेरणा वजा ऋणात्मक प्रेरणा म्हणजेच गुरुत्वाकर्षण होय.

द्रव्य म्हणजे अन्य काहीएक नसुन गुणधर्मयुक्त अवकाश (Modified space)  आणि द्रव्याला लाभणारे वस्तुमान म्हणजे गुणधर्मयुक्त (धनात्मक उर्जा व प्रेरणा यांचा समुच्चय) अवकाशाला संतुलनासाठी आपसुक लाभत जाणारी ऋणात्मक प्रेरणा.

अवकाश=द्रव्य.

अवकाश द्रव्याच्याच सममुल्याचे असुन महाविस्तारासाठी अतिरिक्त अवकाश असुच शकत नाही.

थोडक्यात द्रव्याला लाभणारे वस्तुमान हे अवकाशाचे गुणधर्मयुक्त होता तत्क्षणीचे आहे...कारण अवकाशाचे गुणधर्मयुक्त द्रव्यात रुपांतरच मुळात द्रव्याला वस्तुमान देण्याचे कार्य आहे.

असो. यावर नंतर चर्चा करता येईल. आता आपण दैवी कणांकडे वळुयात. पाश्चात्य जगावर मुळात ग्रीक तत्वज्ञानाची प्रचंड छाप आहे. मुलत: त्यांचे तत्वज्ञान हेच जडवादी आहे. त्यामुळे द्रव्य व प्रेरणा यांची मुलभुत निकड त्यांना, अगदी विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेतही जाणवने स्वाभाविक आहे असेच म्हणता येते. महाविस्फोट सिद्धांतातही द्रव्य, प्रेरणा (विद्युत्चुंबकीय, दुर्बळ आण्विक, प्रबळ आण्विक आणि गुरुत्वीय) या मुळातच शुन्यरुप स्वरुपात एकवटलेल्या होत्या असे मानले जाणे स्वाभाविक होते. त्या शुन्यवत असोत कि अजुन कोणत्या रुपात, त्या मुळात निर्माणच कशा झाल्या याबद्दल हा सिद्धांत मुक आहे.

दुसरे असे कि महाविस्फोट व्हायला नेमके काय कारण घडले? ते कारण अंतर्गत होते कि बाह्य? अंतर्गत होते असे मानले तर ते अनंत काळ सुप्त का राहिले आणि जागे कोणत्या प्रेरणेने झाले? त्या प्रेरणेचे नेमके स्वरुप काय होते आणि नंतर ती कोठे गेली? समजा बाह्य प्रेरणांमुळे महाविस्फोट घडला असे मान्य केले तर मग ती नेमकी प्रेरणा (Force) कोणती होती? कोठे होती? आणि ती विश्वनिर्मितीपुर्वी नेमके काय करत होती आणि कोठे होती? आणि महविस्फोटापासुन विश्व निरंतर विस्तारच पावत आहे तर तो अचाट वेगाचा (प्रकाशवेगापेक्षा थोडा कमी वेग) विस्तार पचवायला एवढे रिक्त अवकाश कसे उपलब्ध होते?

या प्रश्नांची उत्तरेच मुळात महाविस्फोट सिद्धांत देत नाही. आपण सुक्ष्मभौतिकी (Quantum) घेवू कि गुरुत्वाकर्षन. प्रत्येक प्रेरणा वा द्रव्य हे कणांपासुनच बनले आहे असे महत्वाचे गृहितक या सिद्धांतांत आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या (मग ते Z कण असोत कि W) कणांमुळेच प्रेरणांचे वहन होते, भले त्यांचे आयुष्य काहीही असो. गुरुत्वाकर्षणाचे वहनही कणांमुळेच होते अशी मान्यता आहेच! प्रकाशही तरंगमय आहे कि पुंजरुप (Quantum) यावरील विवद अद्याप शमायचा आहे.

कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कण (Particle)  प्रदान करण्याचे वाहक असतात याच समजामुळे द्रव्याला वस्तुमान प्रदान करणाराही एखादा कण असलाच पाहिजे या अट्टाहासातुन सर्नची प्रयोगशाळा उर्जेचा अमाप व्यय करत त्या "दैवी" कणाच्या शोधात व्यस्त आहे. आता तर तो जवळपास सापडल्याचा दावाही होत आहे. दैवतवादी मंडळींनाही शास्त्रज्ञाबरोबरच अशा "दैवी" कणाच्या शोधामुळे आनंदही होत आहे...पण हा एक भ्रमच आहे. कारण प्रयोगशाळेत कृत्रीम बाह्य प्रेरणांचा मारा करत कृत्रीम स्थितीत कथित महाविस्फॊट ज्या स्थितीत झाला तशीच स्थिती अत्यंत अदखलपात्र गौण उर्जेच्या पातळीवर आणि जे विश्व बनलेलेच आहे, त्याच्या सर्व संदर्भ-उपस्थितींत केला तर, जेंव्हा संदर्भ सापेक्ष चौकटीच अस्तित्वात नव्हत्या तशी परिस्थिती अस्तित्वात असणारच नसेल तर त्या हाड्रोनने  अब्जांश सेकंदांसाठी का होईना जो कण निर्माण केला, ज्याला आपण दैवी कण म्हणतो, ज्याने द्रव्याला वस्तुमान दिले असे म्हणतो, तो कण मुळात कधीही अस्तित्वात असू शकत नाही. कारण कण (Particle) हे कोणत्याही प्रेरणेचे वहन करत नसुन प्रेरणा या कधीही तरंगरुपी, कणरुप वा पुंजरुप नसतात. त्या सापेक्ष काल-स्थितीतील निरपेक्ष काळाच्या सहास्तित्वातील असंतुलनातील संतुलन साधण्यासाठी निर्माण झालेल्या कृत्रीम प्रेरणा असतात.

मी नेहमी एक उदाहरण देतो. पृथ्वीवर पहिला जीव उत्पन्न झाला ती कृत्रीम परिस्थिती निर्माण करण्यासाठी एक प्रयोगशाळा उभारा. तशीच द्रव्ये आणि टोक्सिक वातावरण बनवा...त्या काळी ज्याही रासायनिक क्रिया/प्रतिक्रिया घडल्या असतील त्या कृत्रीमपणे घडवा...

जसा दैवी मुलकण शोधला तसा दैवी जीवसृष्टीचा आद्य बंध शोधा...

फार धक्कादायक नि:ष्कर्ष निघतील...

प्रयोग होतच रहायला हवेत. विज्ञान असेच पुढे जात राहील. एक दिवस...कदाचित लवकरच...सर्नच घोषित करेल कि दैवी कण अस्तित्वात नाहीत...

कारण दैवी कण अस्तित्वातच नाहित!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...