Thursday, November 28, 2013

वडार समाजाचा इतिहास



वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषाभेदामुळे या समाजाला वेगवेगळी नांवे मिळालेली दिसतात. उदा. महाराश्ट्रात वडार म्हणत असले तर कर्नाटकात त्यांनाच वड्डर म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला वड्डोल्लु वा ओड्डर असे म्हटले जाते तर तमिळनाडूत ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणुन ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यात त्यांना ओड अथवा ओडिया म्हणून ओळखले जाते.

मूळ व मूळस्थान:

आजवर जे लिखित संदर्भ सापडलेले आहेत त्यावरून ओडिसा हे वडारी समाजाचे मुलस्थान आहे असे विविध संशोधकांनी सिद्ध केले आहे.  १८७१ सालच्या जनगणणेच्या अहवालात "देशाच्या विविध भागात सापडणारे वड्डा(र) हे मुळचे ओडिसा व आंध्र प्रांतातील आहेत." असे नमूद करुन व्यवसायानिमित्त ते इतरत्र पांगले असे नोंदले आहे. "वड्डा" या शब्दाचा शब्दश: अर्थ होतो "ओड्र देशाचा. म्हणजे ओडिसाचा" असे १९०९ मद्धे थर्स्टनने नोंदवले आहे. ओड शब्दातुनच ओडिया, ओड्ड, वोडे, वडार, वड्डर, ओटन, वोड्डे ई. हे शब्द प्रांतनिहाय प्रचलित झाले.  ओडिया लोक राजपुतानामार्गे पंजाबमद्धे विस्थापित झाले असे हयवदन राव यांनी पुराव्यांनी दाखवून दिले आहे. (१९२७) हे झाले इंग्रजकाळातील वडार समाजाबाबतचे संशोधन.

आपण अजून मागे गेल्यास "ओड" "आंध्र" ही नांवे औंड्र या पुरातन मानववंशापासुन आली आहेत असे दिसून येते. औंड्र हा भारतातील एक पुरातन मानवगण आहे. या गणाचे वास्तव्य प्राचीन काळापासुन ओडिसा, आंध्र व काही प्रमाणात महाराष्ट्र हे राहिले आहे. ऐतरेय ब्राह्मणानुसार हे विश्वामित्राचे पुत्र होते व त्याने "शूद्र व्हाल व दक्षीणेत राज्ये वसवाल" असा शाप दिला होता. महाभारतानुसार औंड्र, पुंड्र हे बळीराजाचे पूत्र होते. त्यांनी स्थापन केलेली राज्ये त्यांच्या नांवावरुन ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील साडेचारशे वर्ष सत्ता गाजवणारे सातवाहन घराणेही औंड्र उर्फ आंध्र जातीचे होते.

थोडक्यात ओड उर्फ वड्डर, ओडर, वडार यांचे मुळ औंड्र या अतिप्राचीन मानवगणात जाते. ती ओळख व नांवाची खुण वडार समाजाने जतन करुन ठेवली आहे.

महाभारत व ऐतरेय ब्राह्मणातील अतिशयोक्तीचा भाग सोडून दिला तरी हा एक पुरातन मानवगण होता याबाबत शंका राहत नाही. आजचे वडार हे याच मानवगणाचे अंश होत असे म्हनणे वावगे होत नाही. औंड्र/पुंड्र हे मानवगण शिवभक्त होते त्यामुळेच कि काय आंढ्र-ओडिसामद्धे आजही विपूल प्रमाणात पुरातन शिवमंदिरे आढळतात.

मुळ व्यवसाय:

वडारांच्या व्यवसायाचे मूळ शोधायला गेलो तर आपल्याला लाखो वर्ष मागे जावे लागते. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली, त्यातील एक म्हणजे पाषाणयुग अथवा अश्मयुग होय. आदीमानवाने पाषाणांपासुन विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली तेथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून हातकु-हाड, तासण्या, पाटे-वरवंटे ई. बनु लागले तर गारगोट्यांपासुन बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. हे काम कष्टाचे असणार यात शंका नाही. जेथे उत्तम प्रतीचा दगड मिळत असे तेथे अशी हत्यारे व अन्य मानवोपयोगी वस्तु बनवण्याचे लघुत्तम कारखानेच सापडले आहेत. महाराष्ट्रात धुळे, नेवासे, बोरी, चिरकी येथे अशी हत्यारनिर्मिती केंद्रे उत्खननांत सापडली आहेत. याचा अर्थ असा होतो कि पुरातन काळीच दगडापासून उपयुक्त वस्तु बनवू शकणारा वर्ग उदयाला आला होता. किंबहुना याला आद्य व्यवसाय म्हणता येईल.

पुढे शेतीचा शोध लागला. माणुस स्थिर झाला. घरे बांधु लागला. उत्तरेत गाळाच्या मातीचे प्रमाण जास्त असल्याने घरबांधणीसाठी दगडाऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या वीटांचा तर काही ठिकाणी लाकडाचा उपयोग होऊ लागला. सिंधू संस्कृतीतील सर्व घरे आपल्याला वीटांत बांधलेली दिसतात तर दगडाचा उपयोग फारच कमी व मर्यादित दिसतो. मात्र दक्षीणेत वेगळी स्थिती होती. दक्खनचे पठार व सह्याद्री बेसाल्ट जातीच्या पाषाणाच्या विपूलतेसाठी प्रसिद्ध आहे. पाषाणकार्यात तरबेज लोक दक्षीणेतच अधिक प्रमाणात विकसीत होणे स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वसत्या दक्खनेत त्यामुळेच बनल्या असाव्यात.

जाते हे साध्या प्रकारचे दळण्याचे यंत्र. याचा शोध इसपू १००० च्या आसपास लागला. नेवासे येथे असे पुरातन जाते मिळुन आले आहे. पाटा-वरवंट्यावर धान्य बारीक करण्याऐवजी लोक जात्यांचा वापर करु लागले. वडार समाजातील एक शाखा त्यात प्राविण्य मिळवून एक पोटजात बनली.

वडार समाज हा मुळचा पाथरवट समाज. पत्थरांशी नाळ जोडलेला. घरे-नगर-किल्ले यांची बांधकामे ते लेण्यांची रचना-खोदकाम यात निष्णात. महाराष्ट्रात आजवर हजारापेक्षा अधिक लेणी सापडलेली आहेत. सातवाहन काळात लेणी खोदण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु झाली. बौद्ध-शैव-जैन लेण्यांची समृद्धता पाहून आजही चकित व्हायला होते. खडकाच्या अखंडतेचे अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे हे आजही सोपे काम नाही. त्यावेळीस मर्यादित साधनांच्या मदतीने असे शिक्ल्पवैभव निर्माण केले गेले ते या वडार समाजाच्या पाषाणकौशल्याने.

सातवाहन काळात वडारांना सेल वढकी अथवा वढकी असे म्हटले जात असे.अनेक शिलालेखांत ही नांवे पाथरवटाचा पर्यायवाची म्हणून हा शब्द आला आहे. किल्ल्यांची रचनाही याच काळात सुरु झाली. त्यासाठी लागणारे पत्थर घडवणे, गवंड्यांच्या मदतीने त्यांची रचना करत अभेद्य असे बुरुज व तटबंद्या निर्माण करणे या कामात मध्ययुगापर्यंत हा समाज अग्रेसर होता.

कामाचे स्वरूप असे असल्याने हा समाज साहजिकच एक काम संपले कि दुस-या कामासाठी दुसरीकडे विस्थापित होत होता. भटकेपण या समाजाला चिकटले ते या समाजाची अपरिहार्यता म्हणुन. पाषाणकार्यात अनेक प्रकार आल्याने त्या त्या कामात प्राविण्य मिळवणा-यांच्या पोटजाती बनु लागल्या. मण्ण अथवा माती वडार हे मृत्तिकाकार्यात कुशल. गाडीवडार हे दगडाची खाण करुन दगड वाहण्यात तसेच विहिरी-तळी खोदणारे, पाथरवट हे लेणी-मंदिरे ई. कामांत कुशल. कल्ल वडार हे जाती, पाटे, वरवंटे यात कुशल.

मुळात या व्यवसायात जितके कौशल्य हवे असते तितकेच ते काम कष्टाचेही. मोठमोठे पाषाणखंड तोडुन चिरे घडवणे ते दगडी वस्तु बनवण्यासाठी शारीरिक शक्तीचीही तेवढीच आवश्यकता. त्यामुळेच कि काय महाबली बजरंग या समाजाचे आराध्य न बनता तरच नवल. या समाजात स्त्रीयांनाही बरोबरीचे स्थान. स्त्रीया पुरुषांइतकीच कष्टाची कामे करत असत.

या समाजाने आजवर निर्माण झालेल्या महाकाय वास्तू, लेणी, किल्ले, वाडे, सामान्य घरे ते रस्ते, तळी, विहीरींच्या निर्मितीचे काम केले आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास वडार समाजाचा इतिहास गौरवशाली आहे, अत्यंत मोलाचा आहे...किंबहुना आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो तो याच समाजाने बांधकाम केलेल्या वास्तुंच्या अवशेषांतुन. त्यांचे कौशल्य किती उच्च दर्जाचे होते याचे पुरावे तर ठायी ठायी मिळतात. दुर्दैवाने ज्या राजांनी अथवा धनिकांनी बांधकामे करवून घेतली त्यांच्या नोंदी मिळत असल्या तरी वडा-यांबाबतच्या नोंदी मिळत नाहीत. याचे कारण म्हणजे आपल्याकडे तशी प्रथा नाही. निर्माणकर्त्यांची नांवे सहसा कोठेही मिळत नाहीत. पण काहीही असले तरी समाजसंस्कृती घडवण्यात या समाजाचा मोठा वाटा होता हे नाकारता येत नाही.

पुराकथा:

भारतातील प्रत्येक समाजाचा स्वत:चा असा पुरा-इतिहास आहे व तो त्यांनी पुराकथांतून जपला आहे. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा, सामाजिक अवस्थेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराकथा निर्माण झाल्या. वडार समाजही त्याला अपवाद नाही.
वडार समाजातही अनेक पुराकथा आहेत.येथे आपण काही मोजक्या पुराकथांचा मागोवा घेऊ.

१. शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला आले. नेमका तेंव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उष्म्यामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घर्मबिंदूंतून कुदळ-फावड्यासहित एक माणुस निर्माण केला. पार्वतीच्या घर्मबिंदूंतून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहिर खोदायला सांगितली. जोडप्याने काही वेळात विहिर खोदली. विहिरीतील पाणी पिउन शिव-पार्वती तृप्त झाले. त्यानंतर शिव-पार्वतीने जोडप्याला अमूल्य उपहार दिले. पण जोडपे खूष झाले नाही. यावर शिव संतप्त झाला व त्याने शाप दिला कि "तुम्हाला पोट भरण्यासाठी घामच गाळावा लागेल..."

आपले काम कष्टाचे आहे या जाणीवेतून ही शापकथा कधीतरी निर्माण केली गेली हे उघड आहे. पण त्याच वेळीस आपली निर्मिती शिव-पार्वतीपासून झाली आहे हा शैव असण्याचा अभिमानही त्यातून जपला गेला आहे.

२. प्रचंड दुष्काळ पडल्याने भगिरथाचे भाऊ पाण्याच्या शोधात पृथ्वी खोदू लागले. खोदत खोदत ते पार पाताळापर्यंत जाउन पोचले. तेथे एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते...पण या खोदाईने त्यांची समाधी भंग पावली त्यामुळे ते संतप्त झाले. मुनीने त्यांना केवल कृद्ध नजरेने जाळुन टाकले. व "तुमचे वंशज खोदकामच करत राहतील..." असा शाप दिला. इकडे आपले भाऊ दिसत नाहीत म्हटल्यावर भगिरथ त्यांना शोधत पाताळात येऊन पोहोचला. आपले भाऊ जळून खाक झालेले आहेत हे पाहून तो दुक्खी झाला व मुनीची करुणा भाकली. मुनी म्हनाला, "जर तू गंगा पाताळात आणली तर गंगेच्या स्पर्शाने तुझे भाऊ जीवंत होतील." भगिरथाने पुढे गंगा पृथ्वीवर आणली व त्याचे भाऊ जीवंत झाले. हेच आपले पुर्वज होत असे ही पुराकथा सूचित करते.

३. रासमाल या ग्रंथात वडारांसंबंधी एक कथा येते. गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्त्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रीयांपैकी जस्मा या सुंदर स्त्रीवर सिद्धराजाचे मन गेले. पण ती त्याला वश होईना. एकदा कामातूर सिद्धराज तिला महालात नेण्याचा हट्ट करू लागल्यावर जस्मा पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला व आदवे यणा-या वडारांनअ ठार मारले. मग जस्माने आत्महत्या केली. मरतांना तिने सिद्धराजाला शाप दिला कि, "तुझ्या तलावात कधीही पाणी साठनार नाही." आणि वडारांना ती म्हणाली कि, "यापुढे वडारांत सुंदर स्त्रीया निपजनार नाहीत."

वडार स्त्रीया मुळातच पुरुषांइतकीच कष्टाची कामे  उन्हातान्हात करत आल्या असल्याने तसेही सुखवस्तू नागरस्त्रीयांत असणारा नाजूकपणा त्यांच्यात असणे अशक्यच होते. मानवी मन हे अत्यंत गहन आहे आणि ते आपल्या वास्तवाचे कारण शापकथांत-पुराकथांत शोधत असते आणि मनाची समजूत काढून घेत असते. सर्वच मानवी समुदायांनी अशाच पद्धतीने पुराकथांची निर्मिती केली आहे हे आपल्या लक्षात येईल.

अवनतीचा कालखंड

मध्ययुगात, विशेषत: बाराव्या शतकानंतर, वेठबिगारीची प्रथा सुरु झाली. वेठ म्हणजे राजसत्तांनी फुकटपणे निर्मानकर्त्यांना आपली कामे करण्यासाठी जवळपास फुकटात राबवून घेणे होय. एक शिवराय आणि संभाजीराजांचा काळ सोडला तर ही प्रथा इंग्रजांचे राज्य येईपर्यंत सुरु होती. यामुळे वडा-यांपासून ते चांभार, लोहार, मातंग ई. निर्माणकर्ते समाजघटक पुरते नागवले जायला सुरुवात झाली. म्हणजे कौशल्यांत कमी पडायचे तर नाही पण मोबदला काहीच नाही. यामुळे इतर समाजांप्रमाणेच वडार समाजावर औदासिन्य न येते तरच नवल. त्यात आधी व्हायची तशी भव्य कामे होईना झाली कारण राजकीय अस्थिरता. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकत आणि दुस-या सहस्त्रकात हा खूप मोठा फरक दिसून येतो. शिवाय मुस्लिम राजवटीत तर आपण बांधून घेतलेल्या वास्तूसारख्या दुस-या वास्तू पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून निर्माणकर्त्यांचे हात तोडने ते ठार मारणे असे उद्योग करत. हे आपण ताजमहालाच्या बाबतीतील दंतकथांत पाहु शकतो. याची परिणती कौशल्ये विकसीत करणे सोडा, आहे ती कौशल्येही मागे सारली जाऊ लागली. वडार समाजही त्यात मागे राहिला नाही.

पुढे आले इंग्रजांचे राज्य. ही एक वेगळीच आफत ठरली. त्यांनी अनेक क्षेत्रंत आधुनिक तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली. परंपरागत कौशल्ये मागे पडू लागली. त्यांचे वास्तुरचना शास्त्र आल्याने वडा-यांचा रोल फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणने एवढ्यापुरताच मर्यादित झाला. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण दगडाचे असल्याने त्यांचे आयुष्य मोठे...फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी भटकंती. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, तळी-विहीरी खोदने एवढेच सामान्य दर्जाचे काम वडा-यांना उरले. पिढ्या-दर-पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एके काळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले-वास्तू-मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या उदरात जायला लागल्या.

याची अपरिहार्य परिणती म्हणजे ढासळलेली आर्थिक स्थिती. बकालपणा. यातुनच येणारे वैफल्य. त्यातून या समाजाला उदरभरणासाठी व्यवस्थेचे कायदेही मोडावे लागले. इंग्रज सरकारने सारी जमात गुन्हेगारांच्या यादीत घालून टाकली. दमन करना-या इंग्रजी राजवटीत ते अपरिहार्यच होते. आपण स्थानिक लोकांच्या कला-कौशल्यांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा अंत घदवत आहोत याची जाण परकी सत्तांना येणे शक्यच नव्हते.

आज तरी परिस्थिती काय आहे? स्वातंत्र्य आले आहे पण भटक्या समाजांना स्थिर करण्यासाठी आपले सरकारही कृतीहीन आहे. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. प्रचंड इतिहास असलेला हा समाज आज आधुनिक तंत्रज्ञाने आल्याने कोणाच्या खिजगणतीतही नाही. आपल्या आस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करत आहे.  त्याला सुयश लाभो या शुभेच्छा!



10 comments:

  1. फारच उत्तम माहिती

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर ,शिवाजी महाराजाच्या काळात वेठबिगारी नव्हती ,त्याचा काही उदाहरण

    ReplyDelete
  3. आजच्या समाजाला माहीत नसलेली अनमोल आणि अत्यंत महत्त्वाची अशी उपयुक्त माहिती तीही अत्यंत तपशीलवार दिली त्याबद्दल आपले शतशः आभार सर.वडर, वैदू कैकाडी इत्यादी समाज खऱ्या अर्थाने आद्य तंत्रज्ञ, संशोधक आहेत पण काळाच्या ओघात आणि जातीप्रथेत कुठच्या कुठे फेकली गेली. सर माझी एक विनंती आहे की आपण असाच तपशीलवार लेख कैकाडी जातीवर लिहावे. आम्हाला आमचाच इतिहास माहीत नाही. क्रुपया एक लेख लिहून उपक्रुत करावे.

    ReplyDelete
  4. Prasent suryamsapu ksatriya vadiyaraju

    ReplyDelete
  5. धन्यवाद सोनवणे सर तुम्ही दिलेल्या माहीत बदल

    ReplyDelete
  6. Thanks sar Tumi dilayalaya mahiti bhadhl

    ReplyDelete
  7. धन्यवाद 𝓙𝓪𝔂 𝓿𝓪𝓭𝓪𝓻 𝓙𝓪𝔂 𝓫𝓪𝓳𝓻𝓪𝓷𝓰

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...