Wednesday, November 20, 2013

अंतरीच्या कविता




"अंतरीच्या कविता" हा संजय ऐलवाड यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला पहिला-वहिला कवितासंग्रह. चपराक प्रकाशनाने शानदार समारंभात प्रसिद्ध केलेला. हा संग्रह उल्लेखनीय अशासाठी आहे कि कवीने आपल्या जगण्याचा भवताल अत्यंत उत्कटतेने आपल्या कवितांतून व्यक्त केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून धडपड करत मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील एकुर्का या छोट्या खेड्यातुन पुणे गाठणारा हा तरुण. व्यसनी वडिलांमुळे घरातील पडझड, आईला होणारी मारहाण, तरीही नेटाने ती ओढत असलेला संसाराचा गाडा इत्यादि दु:खद परिस्थितीने संजयला साहित्याकडे वळवले. आपल्या वेदना कवितेत अभिव्यक्त करत राहिला. कविता ही तशीही मानवाच्या वेदनांचा हुंकार असते. ती वेदनांना मायेची पाखर देते. संजय कवितेत रमत गेला. त्याचे पुस्तक झाले.

संजयच्या भाषेत अर्थातच मराठवाडी गोडवा आहे. "बाप" या कवितेत संजय म्हणतो:

"मह्या मायेच्या डोळ्यात
काहुरांनी काला केला
ओसाडल्या दाही दिशा
बाप बांधावरी मेला"

वेदनांचा पसारा हा असा छळत असतांना माणुसकीचे, भवतालाच्या वेदनांचे भानही संजयला सुटत नाही. "कायदा" या कवितेत संजय म्हणतो:

"घुमटावरच्या पारव्याने
गाभारातल्या देवाला प्रश्न केला
का नाही कायदा आम्हासाठी?
नाही तर आम्हीही केली असती फिर्याद
काळजात बाण मारुन जीव घेणा-या पारध्यावर..."

तर "अस्तित्व" या कवितेत संजय म्हणतो:

"...आणि याच समाजात
कोलमडुन पडणारे वृक्ष
दिसतात पावलोपावली
सुकलेल्या झाडाचं जीवन असं
कधी दारिद्र्य तर कधी गरीबी..."

आज शिक्षणामुळे आजवर मूक राहिलेल्या समाजांतील तरुणांना अभिव्यक्त व्हावेसे वाटत आहे. कविता, नाटक, कथा, कादंब-या यातुन ते आपले हृद्गत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, कोणत्याही प्रस्थापित कवीच्या प्रभावाखाली न येता, स्वत:ची शैली बनवत व्यक्त करु लागले आहेत. आपल्या व्यवस्थेत सर्वांना व्यासपीठ मात्र मिळत नाही हे दुर्दैव. अनेकजण लेखन मधेच सोडुन देतात ते प्रकाशकांच्या अभावामुळे. शहरी प्रकाशक शक्यतो प्रसिद्ध लेखकांनाच प्राधान्य देतात...आणि प्रसिद्ध व्हायला आधी प्रकाशक नको का? एकंदरीत आपला साहित्यव्यवहार संकुचित आहे. सामाजिक जाणीवांचे भान असणारे प्रकाशक फारच म्हणजे फारच कमी आहेत. चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील अशाच दुर्मीळ प्रकाशकांपैकी एक. त्यांनी हा संग्रह प्रकाशित करून उद्या भवतालातून बाहेर पडुन वैश्विकतेचा प्रवास करु शकेल अशा कवीला प्रकाशात आणले आहे.

रसिकांनी संजयचा हा कवितासंग्रह अवश्य वाचावा...व एका संवेदनशील कवीच्या भवतालाच्या वेदना व आशांचा पट अनुभवावा!

अंतरीच्या कविता
संजय ऐलवाड
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ५०/-

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...