"जग
बदल घालूनी घाव" अण्णा भाऊ म्हणाले होते. जगात कोणी शोषित, वंचीत आणि
पिडीत राहणार नाही यासाठी त्यांचे तगमग होती. आम्ही उलटी सुरुवात केली.
आम्ही घाव घातले पण याच शोषित-वंचितांच्या स्वप्नांवर. आशा आकांक्षांवर.
आम्ही जग बदलले...पण कसे? जगाला निर्दय, सवेंदनहीण आणि उथळ बनवले. दीड
दिवसांची शाळा न शिकता जीवनाच्या शाळेत अण्णा भाउंनी ज्ञानार्थीच रहात
साहित्यात उंच झेपा घेतल्या. जगभरच्या २७ भाषांत त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले. त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरच्या वंचित-शोषितांच्या स्वातंत्र्याची कामना केली.
टिळकही खरे हाडाचे ज्ञानार्थी. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संग्राम केला, पण त्यांची ज्ञानतृष्णा त्याहीपेक्षा मोठी होती. त्या काळी संदर्भग्रंथ मिळवणे हे अत्यंत वेळखाऊ व किचकट काम असतांनाही "गीतारहस्य" सारख्या नीतिशास्त्रातील एक जागतिक दर्जाचा ग्रंथ लिहिला. ते गणिताचे व संस्कृतचे पंडितही होते. अण्णा भाऊ आणि टिळक हे समाजाच्या दोन टोकातून आलेले, वेगळ्या संस्कारांत वाढलेले...दृष्टीकोणही त्यामुळे वेगळे. पण म्हणून टिळकांबाबतचा आदर व्यक्त करतांना अण्णा भाऊ कोठे संकोच करत नाहीत. याला मानवतेची विश्वव्यापकता म्हणतात.
आज आमच्या पिढ्या संगणकयुगात आल्यात. इंटरनेट हातातल्या मोबाईलवर आलेय. म्हणजे जागतीक ज्ञान हातात आलेय. पण ते तेथेच आहे. त्या आधुनिक साधनांचा वापर आमच्या पिढ्या ज्ञानासाठी करत नाहीत तर उथळ सवंगपणासाठी करतात. जशी संगत तसा माणूस बनतो हे सत्य लक्षात घेतले तर या सवंगपणात वाहून जाणारी पिढी भावी ज्ञानात काय भर घालणार? चकचकीत प्रतिष्ठांच्या मागे लागलेले, जीवन हरपून बसलेले कोणत्या प्रकारची जीवनशैली घडवणार?
थोडक्यात आम्ही उथळ आणि म्हणुणच नालायक पिढ्या घडवायचा चंग बांधला आहे. जग आम्ही बदललेय पण ते सवंगपणात बदलवले आहे. त्याला ठोस आधार नाही. मग हा देश कसा महासत्ता होणार?
असेच जर असेल तर मग विगतातील महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करण्याचा आम्हाला कोणी अधिकार दिला, जर आम्हाला त्यांच्यापासून काही चांगले घ्यायचेच नसेल तर?"
(काल ५१२ खडकी येथे लो. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात बोलतांना मी. )