फुटीरतावादी बोडो अतिरेक्यांनी ६८ आदिवासींचे निघृण हत्याकांड घडवले आणि निरपराधांच्या रक्ताचे टिळे आपल्याही भुमीला लागले. शेजारच्या देशातील हत्याकांडांवर खुष होणा-यांनी याची अधिक गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.
बोडोल्यंडला स्वायत्त करा या मागणीपासून सुरु झालेला हा प्रवास बोडोल्यंडला स्वतंत्र देशाचे अस्तित्व द्या या मागणीपर्यंत पोहोचला. आसाम-भुतान सीमेवर बोडो अतिरेक्यांचे अड्डे आहेत. भुतानी सैन्याने अनेकदा ते अड्डे उध्वस्त करायचा प्रयत्न केला असला तरी त्यात यश आले नाही. १९९२ पासून आजवर या अतिरेक्यांनी हजारो आदिवासी, निमलष्करी जवानांची हत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे बोडो हेही आदिवासीच आहेत. जवळपास ९०% बोडो हे हिंदू आहेत तर ख्रिश्चन ९.४०% आहेत. बाकी बोडो आपला आदिम आदिवासी धर्म पाळतात. या फुटीरतावाद्यांना चीनचा सक्रीय पाठिंबा आहे हे कधीच लपून राहिले नाही. उत्तर-पुर्वबाबत असंवेदनशील असलेल्या भारतीयांना तेथील घटनांशी विशेष देणे-घेणे नसते. उदा. २६/११ झाल्यावर काही दिवसांतर ग्वहत्ती येथे स्फोटांत ५० नागरिक ठार झाले होते, पण माध्यमांनी त्याची यत्किंचितही दखल घेतली नव्हती. सरासरी प्रत्येक महिन्यात आजवर छोटी-मोठी हत्याकांडे होत आली आहेत. "न्यशनल डेमोक्रटिक फ्रंट ओफ बोडोल्यंड" ही संघटना भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेली आहे, पण त्याचा विशेष उपयोग झालेला नाही. तेथे आदिवासी कोब्रा फोर्स ही प्रतिदहशतवादी संघटनाही आहे व या दोघांतही अनेकदा संघर्ष झालेला आहे.
आसाममद्धे संथाल, उराऊं आणि आणि मुंडा या आदिवासी जमाती प्रमूख असून हे चहामळ्यांवर काम करण्यासाठी ब्रिटिशकाळात आजुबाजुच्या राज्यांतून आले व तेथेच स्थायिक झाले. यांना बोडो क्षेत्रांतून हुसकावने हे त्यांचे उद्दिष्ट आहे. स्थलांतरीत मुस्लिमही त्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत. एन.डी.एफ़ बी. ही संघटना ख्रिस्ती प्रभावाखालील असल्याचे मानले जाते. त्याला तोंड द्यायला हिंदु आधिक्य असलेली बोडो लिबरेशन टायगर्स फोर्स ही फुटीरतावादी दहशतवादी संघटना निघाली होती, पण २००३ मद्ध्ये या संघटनेने शरणागती पत्करली.
यातून लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे उर्वरीत भारतीय आणि उत्तरपुर्व व पुर्वांचल यात एक राष्ट्र म्हणून भावनिक, सांस्कृतिक धागा जोडण्यात आम्हा नागरिकांना अपयश आले आहे. २००२ मद्ध्ये माझी अरुणाचल प्रदेशच्या एका मंत्र्यांशी दिल्लीत भेट झाली होती. त्यांनी तेथील नागरिक भारताला आपले मानत नाहीत ही खंत व्यक्त केली होती. पर्यटनांसाटही आम्हाला जग दिसते पण आम्ही तिकडे सहसा फिरकत नाही. तेथील पुण्या-मुंबईत शिकायला येणा-या विद्यार्थ्यांना "चिंकी" म्हणुन हिणवले जाते. ट्र्यफिक पोलिस तर चक्क त्यांच्याकडे पासपोर्ट मागतात! हे चित्र खेदजनक आहे.
बोडो दहशतवाद्यांचा निषेध करत असतांना आम्ही आमच्या जबाबदारीत कोठे कमी पडतो याचे भान ठेवायला पाहिजे.