Saturday, September 26, 2015

जनांचा राम जनांचाच रहावा...



वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे कि राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही पुष्कळ संशोधन करण्याचे प्रयत्न झाले आहेत. रामायणातील ग्रह-नक्षत्रस्थितीनुसार प. वि. वर्तकांनी रामजन्माची तारिख इसपू ४ डिसेंबर ७३२३ अशी काढली होती. कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलिकडे नेत नाहीत. भारतीय पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत. पण अलीकडेच इंस्टिट्यूट ओफ सायंटिफ़िक रिसर्च ओन वेदाज या संस्थेने प्ल्यनेटोरियम संगणक प्रणाली वापरत रामाचा जन्म इसपू १० जानेवारी ५११४ रोजी झाल्याचा दावा केला आहे. हे विधान शास्त्रीय वाटत असल्याने, संगणक-प्रणालीवर आधारित असल्याने रामकाळ पुरातन आहे असे सिद्ध झालेच आहे असे समजून "वैदिक" आनंद वाढला असल्यास आश्चर्य नाही. पण हे "संशोधन" प्रसिद्ध होताच वैदिक गोटातुनच वैदिक ज्योतिषवेत्ते श्री. नर्तक गोपाळ देवी दासी यांनी रामायणातीलच ग्रह-नक्षत्र पुराव्यांवरूनच १० जानेवारी ही तारिख चुकीची आहे असे दाखवून देत  संगणक प्रणालीत काहीतरी विसंगती आहे असे प्रतिपादन केले आहे. म्हणजे रामायणातील एकाच उल्लेखावरून केली गेलेली गणिते वेगवेगळे निष्कर्श देतात हे कसे याचे उत्तर मिळत नाही.

असो. भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलिकडे जात नाहित हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खो-यातील काही लोकांनी गंगेच्या खो-यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पुर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी. बी. लाल यांनी केलेली उत्खनने त्यासाठी अभ्यासयोग्य आहेत. रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पुर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते. तरीही आपण या तारखेच्या दाव्याचा रामायणातीलच प्रमाणांच्या आधारावर पुनरावलोकन करु.

पहिली अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आता जे वाल्मिकी रामायण आपल्यासमोर आहे त्यातील बालकांड व उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असे बव्हंशी विद्वानांनी मान्य केले आहे. यातील रामाचे दैवतीकरण, जे अन्य कांडांत आढळत नाही ते या दोन्ही कांडांत असून भाषाशैलीही वेगळी आहे. शिवाय रामायणाचे अखेरचे संस्करण इसवी सनाच्या चवथ्या शतकात झाले अशीही विद्वमान्यता आहे.

रामाचा जन्म पुनर्वसू नक्षत्रावर पाच ग्रह उच्चीचे असतांना चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी माध्यान्ही झाला असे प्रक्षिप्त व उत्तरकालीन रचना असलेल्या बालकांडात नमूद आहे. जानेवारी महिन्यात चैत्र येवू शकत नाही हे उघड आहे. म्हणजेच प्रक्षिप्त असलेल्या बालकांडातील एक तर तिथीच चुकीची आहे किंवा १० जानेवारी ५११४ ही तारिख तरी समूळ चुकीची आहे. म्हणजे, तिथी बरोबर असेल तर १० जानेवारी ही तारिख येणार नाही आणि तिथीच चुकीची असेल तर, कितीही काटेकोर असले तरी, संगणकीय उत्तरांना अर्थच राहणार नाही. ही गफलत आधी विचारात घ्यायला हवी आणि म्हणूनच वैदिक ज्योतिषीही ही तारीख मान्य करत नाहीत.

दुसरे म्हणजे ग्रहांची समस्या. भारतियांनी राशी व ग्रह हे ग्रीकांकडून घेतले. वेदांमद्ध्ये ग्रहांचा निर्देश नाही. वैदिक साहित्यात नाक्षत्र कालगणना आहे. ग्रहाधारित पंचांग प्रथम "यवनजातक" या अनुवादित पुस्तकातून प्रथम आपल्याकडे आले ते इसवी सनाच्या दुस-या शतकात. रामायणातीत तिथी ही ग्रह-नक्षत्राधारित आहे. भारतियांना ग्रह-राशीच इसवी सनापुर्वी माहित नव्हत्या तर "पाच ग्रह उच्चस्थानी असता..." हा उल्लेखच उत्तरकालीन आहे, ग्रीकांशी संपर्क आल्यानंतरचा आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच ही तिथी "बनवण्यात" आली असून ती मुळात वाल्मिकीची नाही. बनावट तिथीवरून शोधलेली कोणतीही प्रमाणे बनावटच असणार हे उघड आहे.

याशिवायचे महत्वाचे प्रमाण म्हणजे रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणुसच कोठे होता? युगसंकल्पना मोहक असली तरी भ्रामक ठरते ती यामुळेच.

आता आपण रामसेतुकडे वळू. रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा तरंगत्या पाषाणांचा पूल वानरसेनेने बांधला अशी एक श्रद्धा आहे. श्रद्धेचे वास्तवाशी काही घेणेदेणे असतेच असे नाही. हा वालुकाष्मांनी बनलेला पुल मानव निर्मित नाही. मानारच्या उथळ सामुद्रधुनीतुन जाणारी ही रांग एके काळी श्रीलंका भारतीय उपखंडाशी जोडला होता असे दर्शवते. नासानेसुद्धा २००२ साली हा पट्टा नैसर्गिक आहे, मानवनिर्मित नाही असेच म्हटले होते. कार्बन डेटींगनुसार या सेतूचे वय साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणने मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरेल हे उघड आहे.

आता आपण खुद्द रामायणातील विसंगत्यांचा वेध घेऊयात. रामायणाच्या उपोद्घातातच, एकदा नारदमुनी भेटायला आले असता वाल्मीकी त्यास विचारतात कि, "हे मुनिश्रेष्ठा, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवचनी आणि कोपला असता देवांतही भिती उत्पन्न करणारा असा गुणसंपन्न पुरुष कोण आहे?" यावर नारदमुनी म्हणतात, "इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राम हा तुम्ही विचारता तसा आदर्श पुरुष आहे." वाल्मीकींच्या विनंतीवरुन नारदाने रामचरित्र सांगितले. नंतर क्रौंचवधाची घटना घडली व आदिकाव्य जन्माला आले. तदनंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मीकीने रामकथा लिहायला घेतली. या काव्याचे मुळचे नांव "पौलत्स्यवध" असे होते. यावरून एक बाब दिसते ती अशी कि वाल्मीकीला नारदाने सांगेपर्यंत रामकथा माहितच नव्हती. पण प्रत्यक्ष रामायणात वाल्मीकी हेही एक प्रत्यक्ष घटनांत भाग घेणारे पात्र आहे. म्हणजे वाल्मीकीला राम माहितच आहे. असे असतांनाही उपोद्घातातील कथा येते ही मोठी विसंगती नाही काय? मुळच्या वाल्मीकी रामायणातही फार मोठे फेरबदल केले आहेत याचेच ही विसंगती म्हणजे निदर्शक आहे.

शिवाय रावणाची लंका कोणती यावरही अनेक विद्वानांनी संशोधन केले आहे. माधवराव किबे यांचे म्हणने असे आहे कि रामायणातील लंका ही श्रीलंका नव्हे कारण रामायणाचा सारा अभ्यास केल्यानंतर रामाचा एकुण प्रवास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त झाल्याचे दिसत नाही. विंध्य पर्वताच्या अमरकंटक शिखराच्या आसपास छत्तीसगड भागातच ही लंका वसली असावी. या भागातील अनेक आदिवासी जमाती स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेतात हेही येथे उल्लेखनिय आहे. पुरातत्ववेत्ते एच. डी. सांकलियाही रामायणातील लंका ही विंध्य पर्वतराजीतील एखाद्या मोठ्या तलावापारची वा नदीपारची नगरी असावी असे मत व्यक्त करतात. आपली मते सिद्ध करण्यासाठी त्यांनी रामायणांतर्गतच येणा-या वर्णनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे रावणची लंका नेमकी कोणती हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो हेही येथे लक्षात घ्यायला पहिजे.

खरे म्हणजे मूळ रामकथा ही एक वीरकाव्य (पवाडा) अथवा लोककथा स्वरुपात जनमानसात लोकप्रिय होती असे आता अनेक विद्वान मानतात. तिची विविध प्राकृत संस्करणेही वेगवेगळ्या भागांत प्रचलित होती. वाल्मीकीने त्यांचे संकलन करत आपल्या प्रतिभेने इसवी सनाच्या दुस-या किंवा तिस-या शतकात रामकथा पाच कांडांत फुलवली. या कांडांत राम दैवी अवतार असल्याचे कसलेही सुचन नाही. "पौलत्स्यवध" या नांवावरुन त्यात रावणाच्या मृत्युच्या घटनेपाशीच ही कथा संपत होती असे दिसते. गुप्तकाळात वैष्णव संप्रदायाला जोर चढल्यानंतर त्याला बालकांड व उत्तरकांड जोडण्यात आले व रामाचे दैवतीकरण करण्यात आले.

अन्य भागांतही महाकाव्य स्वरुपात प्राकृत भाषांतही व जैन-बौद्ध धर्मिय साहित्यातही रामकथा प्रचलित होती. पण प्रत्येक ठिकाणी रामकथेने वेगवेगळी रुपे घेतली. ती त्यांना उपलब्ध असलेल्या मुळ वीरकाव्याच्या प्रादेशिक/भाशिक रुपांतरांच्या आधारावर वेगवेगळी बनली. उदाहरणार्थ बौद्धांच्या अनामकजातकात सीतात्यागाचा उल्लेख नाही. जैन रामायणातही वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक प्रसंग आहेत. शिवाय वाल्मिकी रामायणाचेही अनेक पाठभेद आहेत. सध्या भांडारकर प्राच्य विद्यामंदिराने तयार केलेले रामायणाचे एक प्रमाणित संस्करण उपलब्ध आहे.

वरील सारांशरुपाने केलेले विवेचन पाहता, बालकांडातील तिथी प्रमाण मानून जी तारीख काढण्यात आलेली आहे ती विश्वसनीय ठरत नाही. राम ही अगदी ऐतिहासिक व्यक्ती होती असे गृहित धरले तरी ती मुळात महाकाव्यातून नव्हे तर लोककाव्यातून लोकप्रिय झालेली व्यक्ती आहे हे स्पष्ट दिसते. लोकप्रिय लोककथांवर/जनकाव्यांवर महाकाव्याचे साज आपापल्या प्रतिभेने महाकवींनी चढवले आहेत, पण काल्पनिकतेत सत्य व कथेचे मूळ हरवून जाते. त्यामुळेच विविध रामकथांत विसंगत्या व कथावस्तुत फरक दिसतात. राम ही सर्व भारतियांत सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे हे सत्यच आहे. जवळपास प्रत्येक गांवात वनवासाच्या काळात राम-सीता येवून गेलेले असतात. सीता न्हाण्याही असतात. महिलांच्या ओव्यांतुनही राम-सीता असतात. राम-सीतेची ही लोकप्रियता संस्कृतातून प्राकृतात आलेली नसून प्राकृत लोकसाहित्यातुनच आलेली आहे असे स्पष्टपणे म्हणता येईल. आपापले अजेंडे राबवण्यासाठी रामकथेचा गैरवापर करत स्युडो-सायंसचा वापर करत रामाचा काळ कितीही मागे न्यायचा प्रयत्न केला तरी तो विश्वसनीय असू शकणार नाही, कारण ज्या पायावर हे प्रयत्न होतात तेच मुळात ठिसूळ आहेत. जनांचा राम जनांचाच रहावा...त्याला अजेंड्याचे आयुध म्हणून वापरू नये एवढेच या निमित्ताने म्हणता येईल!

-संजय सोनवणी

(आज महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.)

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...