Monday, August 29, 2011

पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (2)

पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास...!

समाज जेंव्हा प्रतिगत्मतेकडे वातचाल करु लागतो तेंव्हा तो सर्वस्वी स्वीकारला जातो असे होत नाही. विरोधी मतप्रवाहही जन्म घेत जातात आणि समाजाला ते गहन निद्रेतुन जागे करत राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात नाथ संप्रदायाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जातीभेदातीत व्यवस्थेला या संप्रदायाने पाठबळ दिले. ते अर्थातच सांप्रदायिक पातळीवरच होते, पण सर्वांना दिक्षेचा आणि मोक्षाचा अधिकार आहे हे तत्व त्यांनी प्रसारित केले. या संप्रदायाचा उगम महाराष्ट्रात झाला नसला तरी नवनाथांपैकी किमान तीन नाथांच्या समाध्या महाराष्ट्रात आहेत. यावरुन महाराष्ट्रात नाथसंप्रदायाचा बराच प्रसार झाला असावे असे दिसते. द्न्यानेश्वरांचे ज्येष्ट बंधु निव्रुत्तीनाथांनी गहिनिनाथांकडुनच दिक्षा घेतली तर निव्रुत्तीनाथांनी तीच दीक्षा द्न्यानेश्वरांना दिली. द्न्यानेश्वरांचा वारकरी संप्रदायाशी कितपत थेट संबंध होता हे सिद्ध व्हायचे असले तरी ते नाथपंथीय तत्वद्न्यानाचे खंदे समर्थक होते हे त्यांच्या अम्रुतानुभव या अनुपम रचनेवरुन स्पष्ट होते. वर्णव्यवस्थेने नाकारल्यामुळे नाथ संप्रदायाचे तत्वद्न्यान त्यांना जवळचे वाटले असणे स्वाभाविक आहे. चक्रधरांनी प्रवर्तीत केलेला महानुभाव पंथ हाही समतेचे तत्वद्न्यान प्रचलित करत होता. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची मुहुर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्रात एक नवी सामाजिक चळवळ निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी विट्ठल या अवैदिक देवतेची निवड केली ही एका अर्थाने धार्मिक क्रांतीच होती. या संप्रदायात स्त्री-शुद्र-शुद्रातीशुद्र हा भेद नसल्याने चोखोबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, तुकाराम, एकनाथ, शेख मोहम्मद असे असंख्य विविध जातीतील संतकवी निर्माण झाले व ते आपल्या आध्यात्मिक ते सामाजिक संवेदना अभिव्यक्त करु लागले. यात स्त्रीयांनाही समान स्थान असल्याने जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई अशा समाजाने/धर्माने त्याज्य ठरवलेल्या स्त्रीयांनाही अभिव्यक्त होता आले. खरे तर वारकरी संप्रदायाचे हे फार मोठे यश होते. प्रतिगामी महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा मिळण्याची ही फार मोठी संधी मात्र धर्ममार्तंडानी गमावली असे म्हनावे लागते. त्यामुळे वारकरी चळवळीचे यश विशिष्ट मर्यादेतच राहीले. जातीव्यवस्थेच्या बेड्या त्यांना तोडता आल्या नाहीत.
वारकरी संप्रदायाचे दुसरे अपयश म्हणजे हा संप्रदाय तत्वद्न्यानात्मक पातळीवर बव्हंशी परलोकवादीच राहीला. संसार करुन परमार्थ साधता येतो हा आद्य संत नामदेवांचा संदेश त्यांनी पाळला परंतु सांसारिक उदासीनता संसारात असुनही संपवता आली नाही हे आपण बहुतेक संतचरित्रांवरुन पाहू शकतो. दुसरे असे की समांतर वा पर्यायी सामाजिक विचारधारा त्यांना निर्माण करता आली नाही. राजकारणाबद्दल तर क्वचितच भाष्ये आढळतात...त्यामुळे तसे तत्वद्न्यान निर्माण करता आले नाही. मुळात या संप्रदायाचा उद्देशच पारमार्थिक असल्याने, इहवाद/अर्थवाद/नवनिर्मिती याबाबतही समाजदिग्दर्शन आढळत नाही.
असे असले तरी मुक जनतेला अभिव्यक्त होण्याची अभुतपुर्व संधी वारकरी संप्रदायाने दिली. आपली गा-हाणी मांडण्याची संधी मिळाली. वारीपुरता का मर्यादित असेना, समतेचा आनंद समाजाला लुटता आला.
पण नेहमी सुटणारा मुद्दा हा आहे कि सनातनी धर्मव्यवस्थेची या चळवळीबद्दल काय भुमिका होती? द्न्यानेश्वरांनी अन्य कोणालाही (आजतागायत) साध्य न झालेली काव्यात्मकतेची उंची गाठत तत्वद्न्यानाचा अभुतपुर्व सोपान रचला पण त्यांना उशिरा का होईना न्याय देण्याची बुद्धी धर्ममार्तंडांना झाली नाही. चोखोबाचा म्रुत्यु वेठबिगारी करतांना झाला...म्हणजे राज्यसत्ताही संत आणि वारक-यांच्या भावना समजावून घेण्यात अपेशी ठरले.
किंबहुना तसा प्रयत्नही वारकरी संप्रदायाकडुन झालेला दिसत नाही. किंबहुना राजसत्ता आणि धर्मसत्ता या सामाजिक आक्रिशापासुन दुरच राहिल्या वा त्यांना या चलवळीला महत्व देण्याची गरज भासली नाही. उलट या धर्मसत्तांनी चक्क वारक-यांचे आराध्य तेच विट्ठल मंदिर बळकावले आणि वारक-यांच्या हाती धत्तुरा दिला. नामदेव शिंपी असुनही त्यांच्या कुटुंबियांना विट्ठलाला नैवद्य दाखवण्याचा अधिकार होता. आता त्यावर पुरेपुर अधिकार धर्ममार्तंडांहाती आहे. विट्ठलाचे महती वाढवली वारक-यांनी आणि त्याच विट्ठलाचे अपहरण केले बडव्यांनी. वारकरी संप्रदायाने आजतागायत याबाबत सवाल केलेला नाही. हे वारकरी संप्रदायाचे वर्तमानातीलही अपयशच होते.
थोडक्यात नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे मध्ययुगातील पुरोगामित्वाचे चेहरे मानले तरी त्यांच्या मर्यादा होत्या हे उघड आहे.
बरे संप्रदायांचे यशापयस आपण बाजुला ठेवु...व्यक्तिगत पातळीवर तरी काही वेगळेपण मांडणारे चिंतनात्मक लेखन या काळात दिसते काय तर त्याचेही उत्तर नकारार्थी आहे.

पहिले खरे पुरोगामी: शिवाजी महाराज

सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी घडवलेली क्रांती अद्भुत...अभूतपुर्व वाटते याचे कारण मुळात या सामाजिक स्थितीत आहे. त्यांनी राजकीय क्रांती तर केलीच पण त्याला सामाजिक आणि धार्मिक क्रांतीचेही परिमाण होते. स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजाला त्यांनी जाग आणली. समाजासाठी सत्ता असते हे त्यांनी प्रथम सिद्ध करुन दाखवले आणि तसेच उदात्त आचरण केले. नवनिर्मिती...मग ती शेतीची असो कि उद्योगधंद्यातील...कशी विकसीत होइल याचे भान त्यांनी प्रथमच दाखवले. स्वातंत्र्याचा श्वास काय असतो हे त्यांनी सातत्याने गुलामीत/अस्थिरतेत काही शतके जगणा-या प्रजेला क्रुतीने दाखवून दिले. धर्मसत्तेला धुडकावत समुद्रबंदी तोडली हे तर फार मोठे क्रांतीकार्य होते. बाटलेल्यांना स्वधर्मात त्यांनी घेतले आणि स्म्रुतीसम्राटांची वाचा बंद केली. समाजातील सर्वच घतक, मग ते ब्राह्मण असोत कि अगदी महार-मातंग, त्यांनी स्वराज्ज्याच्या प्रयत्नांत सामील करुन घेतले. महार सैनिकांनी पराक्रम गाजवला तर त्यांची सन्मानाने मिरवणुक काढण्याची प्रथा आणली. त्यांना वतने दिली, किल्लेदा-याही दिल्या तर अल्पांश असल्या तरी पाटीलक्याही दिल्या. आज हे प्रयत्न अत्यल्प वाटत असले तरी तत्कालीन एकुणातील सामाजिक परिस्थितीत त्याचे महत्व वेगळेच आहे. त्यांनी वेठबिगारीही बंद केली आणि उत्पादन/सेवांना उचित मोबदला हा न्याय्य सिद्धांत अस्तित्वात आनला. त्यांच्या मागे समाज प्राणपणाने उभा राहीला तो उगाचच नाही. स्त्रीयांचा आणि परधर्मियांच्या धार्मिक भावनांचा सन्मान हे एक त्यांच्या क्रांतीचे एक वैशिष्ट्य होते. पुर्वी तसे नव्हते. राजकीय तत्वद्न्यान तर पुर्णतया स्वतंत्र होते. युद्धशास्त्रातही त्यांनी मोलाची भर घातली. राज्याभिषेक करुन घेवुन (त्याबाबतचे वाद विवाद येथे अभिप्रेत नाहीत....त्यांनी अनेक शतकांनंतर एक भारतीय राज्याभिषेक करवुन घेवु शकतो हे सिद्ध केले...हे महत्वाचे) एतद्देशीय सत्तेचे उद्गाते ठरले आणि त्यासाठे त्यांनी धर्ममार्तंडाचाही विरोध पत्त्करला. महाराजांबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. येथे एकच सांगतो की गत सहस्त्रकातील पहिले ख-या अर्थाने पुरोगामी क्रांतीकारक हे शिवाजी महाराज आहेत याबाबत दुमत होवू शकत नाही.
असे असले तरी ही क्रांती अल्पजीवी ठरली याचा खेद आहेच. संभाजी महाराज व नंतर राजाराम महाराज यांना ती गती वा स्थीतीही सांभाळता आली नाही हे त्यांच्या गौरवशाली जीवनाकडे/क्रुतींकडे अत्यादरपुर्वक पाहुनही लक्षात येते. राज्यलोभाचा मुळ मानवी स्वभाव आडवा यावा आणि तिस-याच पीढीत स्वराज्य मोगलांचे मांडलिक व्हावे हा खेदकारी चमत्कार मराठी मानसाने दाखवुन प्रतिगामीतेची मुलभुत चाहुल दिली. याचसाठी अट्टाहास होता का हा प्रश्न शिवाजी महाराजांना पडला नसेल तरच नवल.
बरे, तरीही, या अत्यंत उलाढालीच्या काळात धर्ममार्तंडांची द्रुष्टी बदलली का, तर याचेही उत्तर नकारार्थी येते.
खरे तर भारतीय इतिहासात धर्ममार्तंडांनी एखादी निर्णायक भुमिका बजावली याचे उदाहरण मिळत नाही. असलीच तर ती नकारार्थीच आहे. हा वर्ग एवढा अतिरेकी का होत गेला याचे उत्तर स्माजशास्त्रद्न्यांनी शोधायलाच हवे. मी येथे धर्ममार्तंड हा शब्द जाणीवपुर्वक वापरत आहे. सर्वसामान्य ब्राह्मणांना उद्देशुन नाही हेही येथे लक्षात घ्यावे. एक राजा जनमानसाचे स्वप्न म्हणुन जागत होता आणि त्याच वेळीस धर्म/अर्थ/काम/मोक्षाच्या शिदो-या घेवून बसलेला हा धर्मनियमांचा कर्ता-करविता समाज कोठे होता, हा प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे, आणि कितीही कोलांटउड्या मारल्या तरी त्याचे सक्षम उत्तर मिळत नाही.
म्हणजे पहिली पुरोगामी क्रांती फसली का याचे उत्तर सत्तालोभात जाते तसेच आणि तेवढेच प्रतिगामी विचारधारांकडेही जाते.



1 comment:

  1. तुमचे विवेचन मला तर्कशुद्ध वाटते. आपल्या दुर्दैवाने आपल्याला एकच शिवाजीमहाराज लाभले. भारताच्या इतर भागांना एकही लाभले नाहीत याचा आनंद मानावा काय?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...