Saturday, December 1, 2012

संभाजी...मृत्युंजय पण हतबल!


(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वाचकांसाठी मी तो येथे चर्चेकरिता उपलब्ध करुन देत आहे.)


छत्रपती संभाजी महाराज आज आठवात आहेत ते विविध कारणांनी. त्यांच्यावर बखरी ते नाटक-कादंब-यांत आरंभकाळात बरेचसे विपर्यस्त लिहिले गेले असा आरोप आजही होतो. त्या विपर्यस्त लेखनाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचेही रुप दिले जाते. कधीकधी बखरकारांनी सुडबुद्धीने संभाजी महाराजांविरुद्ध बखरकारांनी लिहिले असेही दावे सिद्ध केले जातात. महाराष्ट्रात मुळात इतिहासलेखनाला जातीयवादी संदर्भ प्राय: असल्याने सामान्य वाचकाला कोणाचा दावा खरा व कोणाचा खोटा हे ठरविता येणे जवळपास अशक्य असेच असते. या परिप्रेक्षात कोणी समाजगट संभाजीराजांना "धर्मवीर" म्हणवून गौरवतो तर कोणी "शाक्तवीर" म्हणुन गौरवतो. शंभुराजांनी हिंदू धर्मासाठी प्राण दिले हे नाकारणारा, ब्राह्मनांनी मनुस्मृतीनुसार संभाजी राजांना छळ करत ठार मारायला लावले असे मानणारा एक वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच संभाजी हे कट्टर हिंदू धर्माभिमानी होते असे मानणाराही मोठा वर्गही महाराष्ट्रात आहे. या दोन्ही पक्षांच्या विरोधाभासी समजुती या इतिहासाला मारक आहेत एवढेच मी येथे नमूद करुन ठेवतो.

बखरींतुन व लोकसमजुतींतुन रुजलेले संभाजी महाराज हे कवि-नाटक-कादंबरीकारांना नेहमीच एक आव्हान वाटत आले आहे. एका स्वप्रयत्नांनी सार्वभौम स्वराज्य स्थापन करणा-या शिवरायांचे पुत्र, पिता-पुत्रातील कलह, दुरावा...पण परस्परांबद्दलची ममता, पुत्राचा व्यसनाधिनतेकडे ओढा, पित्याच्या मृत्युनंतर संघर्ष करत सत्ता मिळवणे, त्याच्याविरुद्ध होणारी कट-कारस्थाने...अनेकांना देहांत प्रायश्चिते, मोगल, पोर्तुगीझ, सिद्दी, स्वकीय...सर्वच आघाड्यांवर उडालेला संघर्ष, त्याचे शाक्त पंथावरील प्रेम...आयुष्यातील खरी-खोटी प्रेमप्रकरणे...तरीही निकराचा पराक्रमी योद्धा...अत्यंत धाडसाने कृर मृत्युला सामोरा जाणारा मृत्युंजय  योद्धा...या व अशा अनेक बाबींमुळे संभाजी महाराजांवर लिहायला प्रतिभावंतांना आव्हान वाटले नसते तरच नवल. आजतागायत संभाजी महाराजांवर जेवढ्या कलाकृती निर्माण झाल्या तेवढ्या अन्य कोणावरही नाहीत हे येथे लक्षात घ्यायला हवे. शंभुराजांवर आजतागायत तब्बल ४८ व किमान १२ अप्रकाशित अशी एकुण ६० नाटके लिहिली गेली आहेत. १२ कादंब-या, काही खंडकाव्येही त्यांच्यावर लिहिली गेली. यावरुन साहित्यकारांसाठी "संभाजी" हे केवढे आव्हानात्मक व्यक्तिमत्व  साहित्यकारांना वाटले असेल याची कल्पना येते. नाटक-काव्य-कादंबरीकारांकडुन आपण निर्भेळ इतिहासाची अपेक्षा करु शकत नाही. कारण प्रत्येक साहित्यकार हा उपलब्ध इतिहास-माहितीचा आपापल्या मगदुरानुसार उपयोग करत आपापल्या नायकांचे चित्रण करत असतो. इतिहास संशोधन जसजसे पुढे जाते, नवीन पुरावे पुढे येतात तसतसे इतिहासकार (आणि साहित्यकारही) त्या-त्या काळात आपापली मते बदलत पुढे जात असतात.

पण आपल्याकडे दुर्दैवाने कादंबरी-नाटकांतील इतिहासालाच "इतिहास" मानण्याची एक परंपरा आहे. युरोपात शेक्सपियरने ज्युलियस सीझर वा क्लीओपात्राबद्दल नाटके लिहिली म्हणुन लोक त्यात इतिहास शोधत बसले नाहेत तर मानवी मनाच्या व्यामिश्रतेच्या गारुडात अडकत नाटककाराच्या प्रतिभेला सलाम देत राहिले. रोम वा इजिप्तने ही नाटके इतिहासाला सोडुन आहेत म्हणुन अभ्यासक्रमातुन काढली वा त्यांवर बंदी घातल्याचे उदाहरण नाही. पण आपल्याकडे मात्र ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे साहित्यिक चित्रण हे बव्हंशी वादग्रस्त राहिले आहे. आपला समाज आजही पुरानपंथी मानसिकतेत जगतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणुणच कदाचित खरा इतिहास वा वर्तमानही आपल्या हाती लागलेला नसावा.

संभाजी महाराजांवरचे आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांनिशी खोडुन काढायचे ऐतिहासिक कार्य वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, सदाशिव आठवले या व अन्य काही इतिहास संशोधकांनी केले. शंभुराजांच्या चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे दूर करने हे महत्वाचे कार्य या संशोधकांकडुन झाले. शंभुराजांचे धवल चारित्र्य प्रकाशात आनण्याचे महनीय कार्य त्यांच्याकडुन झाले व शंभुराजांना न्याय मिळाला याबद्दल हे इतिहासकार व अलीकडच्या काही दशकांतील कादंबरीकारही त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.

परंतू इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते किंवा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. या लेखाचे प्रयोजन हे मुकर्रबखानाने १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे "बेसावध" संभाजीराजांना व कलशाला पकडले ते ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची झालेली हत्या या काळात मराठे नेमके काय करत होते याबाबत चर्चा करणे हे आहे. याचे कारण म्हणजे छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात काहीच लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे व तदनुषंगिक उपस्थित होणा-या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. या उत्तरांतुन अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची मला जाणीव आहे...पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे मला आवश्यक वाटते.

मराठी रियासत भाग दोनमद्धे येणारा कालक्रम असा...

१)  २१–४-१६८०  रोजी राजारामास गादीवर बसवण्यात आले
(२)  ६-५-१६८०   राजारामाचे मंचकारोहण
(३)  १८-६-१६८०  संभाजी रायगडावर आला
(४)  २०-७-१६८०  संभाजीने मंचकारोहण केले
(५)  १६-१-१६८१    संभाजीचा राज्याभिषेक

हा झाला संभाजी राजे छत्रपती बनले तो कालखंड. शिवाजी महाराजांचा ३ एप्रिल रोजी मृत्यु झाल्यानंतर संभाजी महाराजांना पन्हाळ्यावरच कैद करण्याची मुत्सद्द्यांची योजना होती, पण ती फलद्रुप झाली नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्युची बातमी त्यांना देण्यात आली नव्हती. अंत्यसंस्कारही परस्पर उरकले गेले. राजाराम महाराजांचे मंचकारोहणही केले गेले. दरम्यान संभाजी महाराजांनी सासरे पिलाजी शिर्के यांना पन्हाळ्याचे खबरदारीस नेमून म्हाळोजी घोरपडे यांस सरनौबती देवून मग रायगडास प्रतापगडमार्गे गेले. यात जवळपास तीन महिन्यांचा कालावधी गेल्याचे दिसते. संभाजी महाराज रायगडावर आले तेंव्हा संभाजी महाराजांसोबत दोन हजारांचे सैन्य होते असे म्हणतात. तत्कालीन राजकीय परिस्थिती पहाता संभाजी महाराजांसोबत एवढे अल्प सैन्य असावे हे संभवनीय वाटत नाही. १८ जुनला शंभुराजे रायगडावर आले. कार्यभार हाती घेत त्यांनी राजारामास प्रथम नजरकैदेत टाकले. मोरोपंत व अण्णाजींना आणि अन्य अनेक मंत्र्यांनाही कैदेत टाकले. सोयराबाईंना त्यांनी लगोलग कैदेत टाकले असावे. सोयराबाईंचा मृत्यु वीषप्रयोगाने अथवा भिंतीत चिणुन मारुन झाला याबाबत कोलाबा ग्यझेटियर (१८८३) ठाम आहे. मराठी बखरीही वेगळे सांगत नाहीत. सोयराबाईंनी संभाजी महाराजांच्या हत्येचा दुसरा कट उघडकीस आल्यानंतर विष घेवून आत्महत्या केली असे मत कमल गोखलेंनी व्यक्त केले आहे. यात अस्वाभाविक असे काही नसून सत्तासंघर्षातील एक अपरिहार्य भाग म्हणुन याकडे पहाता येते. राजाराम महाराजांचे संभाजीराजांच्या अनुपस्थितील मंचकारोहण हेच  मुळात वादग्रस्त/आक्षेपार्ह आहे. संभाजी महाराजांना शिवराज्याभिषेकसमयी युवराज्याभिषेक झाला होताच. त्यामुळे तेच स्वराज्याचे उत्तराधिकारी होते. अशा स्थितीत, राजारामांचा मंचकारोहण समारंभ होणे याचाच अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना छत्रपती पदावरून डावलायचे होते. या विचारांमागील मुत्सद्द्यांची अथवा सोयराबाईंची कारणे काहीही असोत, विधीवत युवराज बनलेल्या युवराजाला पित्याच्या मृत्युनंतर राज्याभिषेक/सत्ता नाकारणे हे धर्मशास्त्रानुसारही पातकच होते! परंतु असे घडले आहे हे उघड आहे. अन्यथा संभाजीराजांना वगळुन राजारामांचे मंचकरोहन झालेच नसते.

येथे गैरसमज नको म्हणुन एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती ही कि मंचकारोहण म्हणजे राजा म्हणुन अधिकृतपणे सत्तासुत्रे ताब्यात घेणे. आणि राज्याभिषेक म्हणजे विधीवत प्रजेतर्फे परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणुन सत्ता स्वीकारणे. तसा दोहोंत फारसा (धार्मिक विधी वगळता) फरक नाही. संभजी महाराजांना अगदी पित्याच्या मृत्युचे खबरही लागू न देता परस्पर राजाराममहाराजांचा मंचकारोहण समारंभ उरकला गेला याचा एवढच अर्थ निघतो कि संभाजी महाराज छत्रपती असू नयेत असे मानणारा मोठा गट अस्तित्वात होता व तो नंतरही कार्यरत राहिला. असो.

यानंतरची संभाजी महाराजांची ९ वर्षांची कारकीर्द अत्यंत वादळी राहिलेली आहे. गृहकलह ते अनेक आघाड्यांवरील सातत्याची युद्धे हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव राहिलेला दिसतो. परंतु आपल्याला येथे त्याबाबत तपशीलात येथे जायचे नसून १ फेब्रुवारी ते ११ मार्च हा काळच आपल्या चर्चेचा गाभा राहणार असल्याने तिकडेच वळुयात!

संभाजी महाराज संगमेश्वर येथे पकडले गेले तेथपासुनचा रियासतीनुसार आलेला कालक्रम असा:

(१)  १-२-१६८९    संगमेश्वर मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराज व कवि कलशास शेख निजाम यांनी ( जवळच्याच खटोले गावी ) पकडले.
(२)९-२-१६८९  राजारामाचे मंचकारोहण रायगडावर
(३ शेख निजाम याने संभाजी महाराज व कलुशास १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले.
(४) ११-३-१६८९  संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
(५) २५-३-१६८९  झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा
(६) ५-४-१६८९ रायगड सोडून राजारामाचे प्रतापगडास आगमन
(७) ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण
(८) ३-११-१६८९  रायगड किल्ला झुल्फिकारखानास हस्तगत  

संभाजीमहाराजांविषयी जेधे शकावली आणि करीनामध्ये आलेली माहिती खालीलप्रमाणे :-

१) जेधे शकावली

(१) वैशाख शुध ३ त्रितीयेस राजारामास आनाजी पंत सुरणीस यांनी मंचकी बैसवीले
(२) आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी राजे रायेगडास आले राज्य करू लागले राजाराम कैदेत ठेविले
(३) श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे मंचकाराहोन जाले
(४) माघ सुध ७ रायेगडी संभाजी राजे सिव्हासनी बैसले
(५) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
(६) फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किल्लेदार चांगोली काटकर व येसाजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्य भाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
(७) फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरच्छेद केले
(८) चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकारखानास पाठऊन रायगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले.

२)  जेधे करीना

(१) ..... शेख निजाम यास फौजेनसी राजश्री संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतांस जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते बाहेर काढून मंचकावारी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्ल संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले.

शकावली व रियासती तसेच मुस्लिम साधनांतील माहितीनुसार वर येणारा कालक्रम बरोबर आहे असे दिसते.

वरील घटनाक्रमावरुन पहिली ठळक नजरेत भरणारी बाब म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले असतांनाही मंत्री व अन्य सरदारांनी राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मंचकारोहन केले. म्हणजे ही सुटका संभाजी महाराजांच्या अटकेनंतर दोनेक दिवसांतच झाली असण्याची शक्यता आहे. मंचकारोहनचा सरळ अर्थ असा कि राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात आले. या समारंभास अर्थातच सर्व मंत्री व महत्वाचे सरदार हजर असले पाहिजेत. १ फेब्रुवारीला संभाजी महाराजांना झालेल्या अटकेची बातमी रायगडावर पोहोचायला फार तर दोन दिवस लागले असतील. संभाजी महाराजांबरोबर संगमेश्वरला असलेले बव्हंशी सैनिक व सेनानी पळुन रायगडावरच आश्रयाला गेले होते. त्यानंतर लगोलग राजाराम महाराजांची सुटका केली गेली. सर्व मुत्सद्दी व सरदारांच्या उपस्थितीत राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारंभ झाला.

याचा अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात मंत्रीगण व सरदारांना अधिक रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी व सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांना कडेलोट करण्यात आले. सिदोजी फर्जंद हा संभाजी महाराजांचा विश्वासु अधिकारी होता. त्याने संभाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांना अंजदीव द्वीपाच्या ताब्याबाबतची पाठवलेली दोन पत्रे (२४ डिसेंबर १६८४ व १० मार्च १६८५ ) उपलब्ध आहेत.

म्हणजेच राजा म्हणुन राजाराम महाराजांनी कार्यभार तर घेतलाच पण संभाजी महाराजांच्या विश्वासु अधिका-यांना ठार मारले व ज्यांना संभाजी महाराजांनी अटकेत टाकले होते त्या मानाजी मोरे व सरकारकुनांना मुक्त केले व स्वतंत्र कारभार सुरु केला.  बखरकार संभाजी महाराजांवर अन्याय करतात हे खरे मानले तरी राजाराम महाराजांचे हे दिलेले दोन हुकुम (बखरकार राजाराम महाराजांचे पक्षपाती असल्याचा आरोप खरा मानला तरी) तत्कालीन वास्तवाकडे बोट दाखवतात. तेंव्हा संभाजी महाराज हयात होते. कैदेत असले तरी त्यांना अद्याप औरंगजेबाच्या गोटात पोहोचवण्यात आले नव्हते. संगमेश्वर ते अकलुजच्या मार्गाच्या अधे-मधेच ते असतांना हा मंचकारोहण समारंभही उरकला गेला होता. यावेळी मुकरबखानाची सेना होती अवघी तीन हजार. तो संभाजी महाराजांना घेवून चालला होता मराठ्यांच्या मुलुखातुन...रायगडावर मात्र धामधुम होती ती संभाजी महाराजांचे निकटवर्तीय विश्वासू अधिकारी संपवायची व ज्यांना कैदेत टाकले होते त्यांना सोडवायची.

हे सगळे संभाजी महाराज अटक झाल्यापासुन अवघ्या नऊ दिवसांत झाले आहे हे विशेष. वरील निर्नय तात्काळ घेणा-या राजाराम महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिलेला दिसत नाही. त्याची कसलीही नोंद नाही.झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा २५-३-१६८९ रोजी पडलेला आहे. संभाजी महाराजांची हत्या तत्पुर्वीच झालेली होती.  तोवर रायगडाच्या भवताली शत्रुचे अस्तित्वही नव्हते. त्यामुळे मोगलांच्या कोकणातील प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही या म्हनण्यात तथ्य नाही.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुकर्रबखान अवघ्या तीन हजार सैन्यानिशी संभाजी महाराजांना घेवून घाटावर औरंगजेबाकडे निघाला होता. वाटेत अन्यही असंख्य किल्ले सह्याद्रीच्या रांगांत मराठ्यांकडे होते व प्रत्येक किल्ल्यावर सैन्य-शिबंदी होतीच. शिवाय हा मुलुख मराठ्यांच्या पायतळी भिनलेला. रुळलेला. मराठे त्यात गनीमी काव्यासाठी प्रसिद्ध. तरीही संगमेश्वर ते घाटमाथा या वाटेत मराठ्यांनी स्वयंस्फुर्तीने का होईना संभाजी राजांच्या मुक्ततेसाठी मुकर्रबखानावर एकही हल्ला चढवला नाही. एक-दोन अयशस्वी हल्ल्यांचे दावे केले जातात पण त्याला एकही पुराव्याचा आधार आजतागायत मिळालेला नाही. खरे तर एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या काळात, जेंव्हा मुकर्रबखान संभाजीराजांना घेवून घाटावर पोहोचत होता त्या काळात संभाजीराजांना मूक्त करण्याची संधी मराठ्यांकडे अनायसे होती. मराठे गांगरुन गेले होते, त्यामुळे असे काही करण्याची बुद्धी त्यांना सुचली नाही असे दावे केले जातात, पण त्यांना अर्थ नाही याचे कारण म्हणजे शिवकाळापासुन असे अनेक अनपेक्षीत प्रसंग मराठ्यांनी अनुभवले होते. खुद्द शंभुकाळातही मराठ्यांनी अनेक तातडीच्या मोहिमा करुन शत्रुला माती चारली होती. त्यामुळे शंभुराजांच्या अटकेमुळे मराठ्यांची मती गुंग झाल्याने त्यांना काही सुचेना झाले या दाव्यात अर्थ नाही.

आणि ज्या मराठ्यांची मती गुंग झाली ते मात्र राजारामांचा मंचकारोहण समारंभ ९ फेब्रुवारीलाच करुन मोकळे होतात...याचा अर्थ काय?
वास्तव एवढेच आहे कि शंभुराजांना मराठेशाहीने वा-यावर सोडुन दिले होते. १ ते १५ फेब्रुवारीच्या काळात शंभुराजे मुकर्रबखानाचे कैदी होते व प्रवासात होते. या कालात शंभुराजे व मुकर्रबखानात काय बोलाचाली झाल्या याचे कसलेही संदर्भ आज आपल्याला उपलब्ध नाहीत. परंतु शंभुराजे व कलश आपल्या सुटकेचा प्रयत्न होईल या आशेत नक्कीच असनार. मुकर्रबखानाला रायगडावरील बातम्या मिळत असाव्यात अथवा त्याला त्या थेट औरंगजेबाकडुन कळवल्या जात असाव्यात. त्यामुळे राजाराम महाराजांच्या मंचकारोहनाची बातमी त्याला मिळाली असणार व त्याने ती, हिणवण्यासाठी का होईना, शंभुराजांना दिली असनार. याला पुरावा नसला तरी औरंगजेबाचे तरबेज हेरखाते व खुद्द अनेक मराठे सरदार त्याचे खबरे बनले असल्याने असंभवनीय म्हनता येत नाही.

काय वाटले असेल शंभुराजांना? सुटकेची आशा वाटेतच मावळली असनार...स्वत: असहाय्य...कैदी...

आता महत्वाचा दुसरा मुद्दा असा, कि समजा मराठ्यांना युद्ध करुन संभाजी राजांना सोडवणे अशक्य होते. पण तरीही तह-तडजोडीचा मार्ग उपलब्ध होता. सर्वनाशे समुत्पन्ने...हा शिवरायांनी जयसिंगाच्या वेळीस घालून दिलेला आदर्श मावळ्यांसमोर होताच. शंभुराजे कदाचित तोही मार्ग अवलंबत काव्याने आपली सुटका करुन घेवू शकत होते. शंभुराजांनी औरंगजेबाशी उद्धटपणे वर्तन न करता शांत डोक्याने व मुत्सद्दीपनाने वागुन आपली सुटका साधुन घ्यायला हवी होती असेही काही जसवंत मेहतांसारख्या इतिहासकारांचे मत आहे.

पण प्रश्न असा आहे कि आता शंभुराजे तहाची बोलणी मुळात कोणाच्या जीवावर करणार होते? ९ फेब्रुवारीला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी स्वराज्याच्या वतीने संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी वा अन्य कोणतेही तह करण्याचे अधिकार आता सरळ राजाराम महाराजांकडे आले होते. संभाजी महाराजांच्या हाती, आता ते राजेच उरले नसल्याने, काही उरलेलेच नव्हते, हे येथे लक्षात घ्यायला हवे. शंभुराजे राजेच नव्हते तर ते काय स्वत:साठी वा स्वराज्यासाठी बोलणी करणार...आणि केली तरी औरंगजेब काय ऐकून घेणार?

त्यामुळेच किल्ल्यांची व खजिन्याची औरंगजेबाची मागणी याबाबत फारसी साधनांनी जे लिहुन ठेवले आहे ते विश्वसनीय मानता येत नाही. शंभुराजांनी किल्ले द्यायचे ठरवले असते तरी त्यांना एकही किल्ला देता आला नसता...खजिन्याची गोष्ट तर दुरच राहिली. कारण त्यांचा अधिकारच नष्ट झाला होता.. पुन्हा जिंकून घेवून  देतो असे शंभुराजे म्हणाले असते तरी त्याचाही काही उपयोग नव्हता. औरंगजेबाला शंभुराजांची विकल परिस्थिती (जी कदाचित कुटील बुद्धीने त्यानेच निर्माण केली असेल...) माहित असने स्वाभाविक आहे कारण त्याचे हेर रायगडापर्यंतही कसे प्रवेशले होते हे शंभुराजांच्या अटकपुर्व काळापासुनही सिद्ध होते. राहिली धर्मांतराची गोष्ट...औरंगजेब त्या क्षणी तेवढेच करवून घेवू शकला असता. नव्हे तसा प्रयत्न त्याने केलाही...

आणि आपले उरलेले एकमेव स्वत्व म्हणजे आपला स्वाभिमान आणि धर्म हे कळुन चुकलेल्या शंभुराजांनी धैर्याने परधर्म नाकारला आणि कृरातिकृर मृत्युचा सामना केला.

अटकेआधी...

औरंगजेबाचे हेरखाते प्रबळ होते. मराठ्यांच्या गोटातील खडा-न-खडा माहित्या त्याच्याकडे जमा होत असत. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणुन काम करत होते. रायगडावरुन संभाजी महाराज कलशासाठी शिर्क्यांसोबतचा तंटा मिटवायला गेले आहेत ही बातमी त्याला फारच वेगाने समजलेली दिसते. असदखानाला औरंगजेब लिहितो कि...."मुकर्रबखानास पन्हाळा घ्यायला पाठवले आहे. त्यास ताबडतोब कळवा कि  त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालुन जावे. तो जहागिरदार एकटाच रायरीवरुन खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्याशी भांडण देणे हे आहे....." (रुकायत-ई-आलमगिरी)

म्हणजे औरंगजेब संभाजी महाराजांच्या हालचालींची प्रत्येक खबर ठेवत होता. एवढी संवेदनशील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती याचाच अर्थ असा कि रायगडावरही घरभेदे होते. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने ई. मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती व तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते. येथे हे नमूद केले पाहिजे कि शिर्क्यांशी कलह झाला होता तो कलशामुळे. त्यामागील नेमके कारण इतिहासाला अज्ञात आहे. कलशाचा कारभार चोख होता व त्यामुळेच शंभुराजांचा त्याच्यावर अधिक विश्वास होता असे मत अलीकडचे इतिहासकार व्यक्त करतात. कलशामुळेच न्यायाधिश प्रल्हादपंत व सरकारकुन यांना १६८८ मद्धे कैद झाली कारण ते शिर्क्यांच्या बाजुने होते असेही इतिहासावरुन कळते. १६८८ च्या आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शिर्के आणि कलशात तीव्र झगडा झाला आणि कलश पळून खेळणा किल्ल्याच्या आश्रयाला गेला होता, शंभुराजांनी जातीने खेळण्यावर जावून कलशाला मदत पुरवली होती. येथे आश्चर्य या बाबीचे वाटते कि तोवर मोगली फौजा कोल्हापुर परिसरात आल्या असुनही आपल्या एका मंत्र्याच्या आपल्याच निकटतम नातेवाईकाशीच्या भांडनात शंभुराजे व्यग्र का राहिले हा. पण हा प्रश्नच आहे. याचे उत्तर कदाचित आपल्याला कधीही मिळणार नाही.

असो. खेळण्यावरुन शंभुराजे संगमेश्वराला आले १ फेब्रुवारीला...किंवा तत्पुर्वी तीन दिवस आधी. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या सोबत फक्त ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरी आहे हे संभाजी महाराजांना माहित असावे. पण तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे हा महत्वाचा प्रश्न उद्भवतो. मोगल येथवर येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असे वाटत नाही कारण शिवाजी महाराजांच्या निधनापासुन अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता. बरे खुद्द कोकनात महाराजांचे शत्रू कमी नव्हते. अचानक हल्ला कोठुनही व कोणाकडुनही होवू शकत होता. त्यात ही तुकडी होती फक्त भालाइतांची. मोठ्या लढाईला अनुपयुक्त. त्यांच्या सोबत सरसेनापती म्हाळोजी व संताजी घोरपडॆ हे पितापुत्र व खंडोजी बल्लाळही होते. (यात जेधे शकावली समजा फारशी विश्वसनीय धरता येत नसली तरी संताजी राजांसोबत होता हे स्पष्ट दिसते.) असे सेनानी बरोबर असतांना त्यांचे सैन्य मात्र बरोबर नव्हते, असे कसे? संगमेश्वरचा परिसर हा दुर्गम असल्याने तेथे शत्रुची धाड पडणे अशक्य होते असे मत जे काही इतिहासकार व्यक्त करतात ते मुर्खांच्या नंदनवनात निवास करत असतात. रायगड अभेद्य असुनही तेथील सैन्यसंख्या ही कधी ही पाच हजाराच्या खाली नसे. संगमेश्वर तर भूइसपाटीवर...अरण्याने वेढलेले एवढेच...पण दुर्गम नव्हे. मग सोबत सैन्य कमी ठेवण्याचा निर्णय कोणाचा होता? स्वत: राजांचा कि सेनापतींचा?

हा मराठी इतिहासातील एक गहन प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीगत रक्षक दलच मुळात किमान दोन हजार लढवैय्या अंगरक्षकांचे असे. संभाजी राजे अभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या जिवितरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी सेनापती व मंत्रीमंडलाची होती. संभाजीराजेंवरील सर्व आक्षेप क्षणभर मान्य जरी केले तरी या जबाबदारीतुन त्यांची मुक्तता होवू शकत नव्हती. नावडत्या राजाला पदच्य़ुत करण्याच्या घटना भारतीय इतिहासालाही नवीन नव्हत्या व नाहीत. आवडते व नावडते पुन्हा परिस्थितीसापेक्ष असते. परंतु येथे काहीतरी विलक्षण घडलेले दिसते. एक विलक्षण कट शिजला होता आणि त्याची परिणती कशी करायची हे आधीच ठरलेले होते. अन्यथा शंभुराजे खेळणा किल्ल्यावर गेलेत ही बातमी औरंगजेबाला समजते...तो तातडीने मुकरब्खानाला आज्ञा पाठवून शंभुराजांवर चालुन जायला सांगतो....

मुकर्रबखान आज्ञा मिळताच पन्हाळ्यावरुन संगमेश्वरला एक हजार पायदळ आणि दोन हजार घोडदळ घेवून निघतो...

मुकर्रबखान एवढे सैन्य घेवून निघतो...सत्तर मैलांचे (१२२ किमी) अंतर तो तीन दिवसांत काटतो....

मुकर्रबखानाच्या वेगाला दाद दिली पाहिजे. पण या अंतरात कितीक मराठी किल्ले होते. पण त्याला अडवण्याचा कोठेही प्रयत्न नाही. ते जावूद्यात...पण एवढे सैन्य कोठेतरी चालुन जाते आहे हे मराठ्यांच्या एरवी तरबेज मानल्या गेलेल्या हेरखात्याला तर सोडा पण सामान्य गांवक-यांच्याही लक्षात येत नाही! कितीही आडवळणाच्या बिकट मार्गाने मुकर्रबखान संगमेश्वरपर्यंत पोहोचला असला तरी ते कोणाच्याही लक्षात येत नाही, शंभुराजांना सावध केले जात नाही याचा अर्थ काय होतो?

अचानक हल्ला

मुकर्रबखानाने दोन हजार घोडदळ व हजार पदाती यांच्या बळावर एक फेब्रुवारीला संभाजी महाराजांच्या तळावर अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे राजांचे अल्पसे सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही. ते पळुन गेले. सोबतचे मुख्य सेनानीही पळुन गेले. कलशानेच तेवढा काय एकट्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला...अटक झाले ते संभाजी महाराज आणि कवि कलश व काही वरकड लोक. यात संताजीचे नांव दिसत नाही म्हणजे तेही पळुन जाण्यात यशस्वी झाले असे दिसते. ही पळालेली मंडळी सरळ आसपसच्या किल्ल्यांच्या आश्रयाला निघुन जाण्यात व मग रायगडावर पोहोचण्यात यशस्वी झाली.

आता संभाजी महाराज मद्याच्या वा कवि कलशाच्या अनुष्ठानाच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचे म्हणणे मान्य करताच येत नाही. संभाजी राजांना मुकर्रबखान एवढ्या जवळ येवून ठेपला आहे ही माहिती सेनानींना, भालाइतांना नसणे वा ती माहिती राजांना दिली न जाणे, अशी वस्तुस्थिती असेल तर संभाजी राजे कसल्याही बाबींत समजा व्यस्त असते तरी कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहर्यपणे अटळ बनली होती.

दुसरी बाब अशी कि राजांच्या सैन्याने कितपत प्रखर प्रतिकार केला? एकंदरीत उपलब्ध माहितीवरुन कसलाही प्रतिकार झाल्याचे दिसत नाही. राजांचे सैनिक लगोलग पळुन गेल्याचेच दिसते. अगदी संताजी सारखा पुढे नांवारुपाला आलेला योद्धाही. पळुन जाणा-या मराठी सैन्याचा पाठलाग करण्याच्याही भानगडीत मुकर्रबखान पडला नाही. त्याचे लक्ष फक्त संभाजी राजांना जीवंत कैद करणे हाच होता. सारे सैन्य डोळ्यादेखत पळुन गेल्यावर संभाजी राजे हतबल झाले असणे स्वाभाविक होते. कलश हा प्रतिकार करत असतांना मोगलांचा बाण लागुन जखमी झाला होता व लगोलग पकडलाही गेला होता. मुकर्रबखानाच्या इखलासखान या मुलाने संभाजीराजांना हवेलीत घुसुन पकडुन केस धरुन ओढत मुकर्रबखानासमोर आणले अशी माहिती तेथे हजर असलेला लेखक साकी मुस्तैदखान देतो. म्हणजे संभाजीराजांच्या रक्षनाचा, त्यांना लगोलग सुरक्षीत ठिकाणी हलवण्याचा कसलाही प्रयत्न केला गेला नाही. अल्प असले तरी, आपल्या राजाच्या रक्षणाबाबत सैनिक स्वत:हुन दुर्लक्ष करतील असे संभवत नाही. मग पळुन जायचे आधीच ठरले होते कि काय? त्यामुळेच कसलाही रक्तपात न होता ते सहजी पळु शकले असतील काय?

यामुळेच संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो.
.
खरे तर रायगडावर व सह्यद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्य दोनेक दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता तीन-चारशे किलोमीटर दुर अकलुजला. संगमेश्वरपासुन  राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर गनीमी काव्यात तरबेज असलेल्या मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. कि त्यांनी तसा काही प्रयत्न करुच नये अशी काही आज्ञा तर नसेल?

आपल्या राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते...आणि फक्त चार-पाचशे भालाइत? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेले असतांना? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात...एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने काही कारणास्तव दिली नाही. अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरे हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता...तोही तीन दिवस चाललेला....त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही.

दुसरा म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले...पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते असे मुळीच म्हणता येत नाही. राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्फिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात....त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?

असे का घडले असावे?

या संदर्भात ग्यझेटियर ओफ बोम्बे- पूना (१८८५) म्हणते "The Marathas made no effort to rescue Sambhaji. Kalusha's oppression and Sambhaji's misconduct had made them hateful to the bulk of tho people, and even had his army been disposed to undertake any enterprise in his favour..."

संभाजी महाराज व कवि कलश प्रजेत अप्रिय होते म्हणुन मराठ्यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला नाही असा वरील विधानाचा मतितार्थ आहे. अलीकडच्या इतिहासकारांना वरील विधान सहसा मान्य होणार नाही. संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष होते व अगदी संगमेश्वरीही त्यांनी निवाडे केल्याचे सज्जड पुरावे त्यांनी दिलेले आहेत. संभाजी महाराजांच्या नैतीक वर्तनावरही उभी केली गेलेली प्रश्नचिन्हे आता समाजमनातून पुसली गेली आहेत. त्यामुळे संभाजी महाराज प्रजेत अप्रिय असतील असे वाटत नाही. मग असे का?

संभाजी महाराज योगायोगाने मोगलांच्या हाती लागलेले नाहीत. गणोजी शिर्क्याने शंभुराजांना पकडुन दिले हे मतही अत्यंत अवास्तव असेच आहे. रायरीवरुन राजे खेळण्याला गेलेत ही माहिती मुळात आधीच औरंगजेबाला होती. परततांना ते संगमेश्वर मार्गेच रायगडावर जाणार हे उघड होते. त्यासाठी औरंगजेबाला गणोजीची मुळात गरज नव्हती.

त्यामुळे रायगडाकडेच रोख वळवावा लागतो. राजाराम महाराज नजरकैदेत होते. म्हणजे इतर मंत्रीगण-सरदार त्यांना भेटु शकत होते. खुद्द संभाजी महाराजांचे रायगडावरील वास्तव्य अत्यंत कमी काळासाठी राहिले. पन्हाळा व संगमेश्वर हीच त्यांच्या निवासाची महत्वाची मूख्य स्थाने होती. (कोलाबा ग्यझेटियर-१८८३) अशा स्थितीत रायगडावरील अंतस्थ घटना राजांपर्यंत पोहोचण्याचे साधन नव्हते असे म्हटले तरी चालेल. तसाही शिवाजी महाराज, मंत्री व हंबीरराव मोहिते वगळले तर बव्हंशी सरदार शंभुराजांना सिंहासनाचे वारस मानायला तयार नव्हते. त्याची परिणती शंभुराजांवर दोनदा वीषप्रयोग करण्यात झाली. दुस-यांदा वीषप्रयोग झाल्यानंतर संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो, सोमाजी, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी प्रभु, सोमाजी नाईक बंकी वगैरे  २०-२५ लोक मारले. या संदर्भात मराठा सरदारांची काय भुमिका होती? काय भावना होती? याबाबत तपशील आज तरी आपल्याला उपलब्ध नाही.

राजाराम महाराजांचे छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळातच मंचकारोहण झाले होते. बव्हंशी सरदारांचा त्यांना पाठिंबा होता असे म्हणता येते. त्या वेळीस राजारामांचे वय अवघे दहा वर्ष होते. ते त्यामुळे आपल्या मर्जीत राहतील असा कयास मुत्सद्दी व सरदारांचा असू शकेल. मराठा सरदारांना जहागिरदा-या-वतनदारीचे पुनरुज्जीवन हवे होते, त्यासाठी ते राजारामांच्या गोटात गेले कि अन्यही कारणे होती?

शंभुराजे पकडले गेले तेंव्हा राजारामांचे वय होते १९ वर्ष. म्हणजे ते स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते. सर्वांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कल आपल्या बाजुने आहे हे समजल्यावर कोणताही राजकीय मुत्सद्दी जी हालचाल करील तीच त्यांनी केली असली तर नवल नाही. संभाजी महाराज विषप्रयोग करुनही मारले गेले नाहीत म्हटल्यावर संधीची वाट पहात त्यांना संपवणे हेच कटकर्त्यांचे ध्येय असनार हे उघड आहे.  ही आयती संधी त्यांना औरगजेबामुळे व शिर्क्यांमुळेही मिळाली. मुकरबखान आयता पन्हाळ्याच्या परिसरात होताच. कलशामुळे शिर्क्यांशी कलह सुरु होताच. संभाजी महाराजांना कसल्याही वास्तवाची माहिती न देता बेसावध ठेवता येणे मुत्सद्द्यांना सहज शक्य होते. खेळण्यावरुन संगमेश्वरी येत असतांना राजांसोबत एवढे कमी सैन्य ठेवले जाणे, तेही सेनापतीही सोबत असतां एरवी कसे शक्य झाले असते? राजाराम महाराजांना हा कट माहित नसेल का? किंबहुना त्याला मुक संमती असेल का? नसती तर मग मंचकारोहण होताच त्यांचे राजादेश वेगळे झाले नसते काय?

शंभुराजांच्या मुक्ततेसाठी शक्य असतांनाही एकही प्रयत्न केला गेला नाही हे वरील विवेचनावरुन स्पष्टच आहे. ते सोडा, औरंगजेबाच्या दरबारी एकही वकील अथवा मुत्सद्दी तह/तडजोड/खंडणी इ. बोलणी करायलाही आला नाही. औरंगजेबाच्या तळावर हल्ला करणे तर खुप दुरची गोष्ट. काही इतिहासकार म्हनतात कि औरंगजेबाची एकुण फौज पाच लाखांची होती, पण ते वास्तव नाही. औरंगजेबाची फौज दोन लाख एवढीच होती व विविध मोहिमांवर ती विखुरलेली होती. (औरंगजेबांच्या बुणग्यांनाही सैन्य समजायचे असेल तर गोष्ट वेगळी.) १ फेब्रुवारी ते ११ मार्च एवढा काळ हाती असतांना सर्व मराठी फौजा एकत्र होत विविध बाजुंनी औरंगजेबाच्याही छावणीवर हल्ला चढवू शकत होत्या. संताजी-धनाजीने नंतरच्या काळात तसे यशस्वीरित्त्या करुन दाखवलेच आहे.

परंतु एकुण घटनांवरुन संभाजी राजांची अटक व नंतर हत्या या बाबी मराठ्यांनी अत्यंत सहज घेतल्याचे दिसते. संभाजी महाराजांच्या कृर हत्त्येने समग्र मराठे पेटुन उठले व स्वातंत्र्याचा लढा सुरु केला या आपल्याला हव्याशा वाटना-या मतांनाही अर्थ नाही कारण राजाराम महाराज सुरक्षितपणे जिंजीला पोहोचेपर्यंत औरंगजेबाशी मराठ्यांनी मुळात लढा सुरुच केला नाही. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तब्बल एक वर्षांनी म्हणजे मार्च १६९० मद्धे संताजी-धनाजीने हा लढा सुरु केला.

मला असे वाटते संभाजी महाराजांना आपल्याला सर्वांनी त्यागल्याचे अटकेच्या काही दिवसांतच समजुन चुकले असावे म्हणुन ते मृत्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले. एक निधड्या छातीचा, कोणाला प्रिय वाटो कि अप्रिय, मनसोक्त जीवन जगत अतीव धैर्याने मृत्युला सामोरा जानारा असा पुरुष झाला नाही. काय वाटले असेल त्यांना जेंव्हा स्वकियच शत्रु झालेले वारंवार पाहुन?


39 comments:

  1. fascinating, copying my comment from facebook, which was written before reading this "lekh"
    मुद्दा अगदी बरोबर आहे. मराठे (मराठा जातीचे लोक आणि इतर जातीचे मराठी लोक) हे आपापसात विखुरलेले, एकमेकाशी भांडणारे, स्वार्थासाठी (अगदी अल्पश्या) फंद फितुरी करणारे होते, असे खेदाने नमूद करावे लागते. मराठे मंडळी स्वताची सुरक्षितता बघत मवाळ भूमिका घेत परिस्थितीचा अंदाज घेत असावेत असे मला वाटते. खुद्द संभाजी महाराजांनी छ. शिवाजी महाराजांशी भांडण आणि नंतर फितुरी केली होती, ही गोष्ट पण साजुकपणे लपविली जाते. बीग्रेडी लपवतात कारण ह्या गोष्टीत त्यांना मराठ्यांचा (आता जात अपेक्षित आहे) तेजोभंग दिसतो तर हिंदुत्ववाडी लपवतात कारण त्यांना संभाजी महाराज हा औरंगजेबाशी हिंदू धर्मासाठी लढलेला योद्धा म्हणून एक हिरो हवा आहे.
    गम्मत अशी की आपण आपल्या सर्व महापुरुषांचे माणसातून उचलून देव करून टाकले आहेत. ही माणसे होती आणि त्यांनी लोकोत्तर कार्य केले आणि काम करताना त्यांनी काही चुका पण केलेल्या असू शकतात, ह्याला ह्या अतिरेकी भक्तांच्या विचारसरणीत काहीही थारा नाही.
    - कोहम

    ReplyDelete
    Replies
    1. संभाजी राजे महाराजांचा पक्ष सोडून परकीयांना मिळाले हि गोष्ट लपवताना कोणाला बघितले नाही . बहुतेक त्यांनी फितुरी हा शब्द वापरला नाही जो तुम्हाला इथे योग्य वाटला .

      Delete
  2. वस्तुनिष्ठ आणि तत्कालीन परिस्थितीची अचूक ओळख करून देणारे विश्लेषण. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. ११-३-१६८९ संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत>>>>>> वध हा शब्द नजरचुकीने की जाणीवपूर्वक.खून/हत्या असा एखादा शब्द वापरता येणार नाही का ?

    ReplyDelete
    Replies
    1. The word "vadh" has been used by Riyasat and since I have taken the reference I have no liberty to change the same. Thanks.

      Delete
    2. ्वध,हत्या,खून एकाच अर्थाचे शब्द आहेत..वध या शब्दात मंगलकारक हत्या असा बोध नाही.

      Delete
    3. कमालच म्हणायची बाई! गांधींच्या खुनाला "खून" म्हणू नका, "वध" म्हणा असा गोड हट्ट काही अति(वि?)शिष्ट मंडळी का धरतात बरे?

      Delete
  4. गांधी हत्या ही एका माणसाची हत्या असेल पण त्यापेक्षा तो एका विचार प्रणालीची हत्या करण्याचा दुबळा प्रयत्न होता.
    तसे करण्याची काहीच गरज नव्हती.
    कारण त्यांच्या घरचेच लोक त्यांच्या अर्थकारणाची,त्यांच्या विचारांची ,गांधी वादाची क्रूर चेष्टा करत होते ,
    त्यांच्या जीवाचे रक्षण हीच त्यांना प्रचंड शिक्षा झाली असती.
    फ्रीडम एत मिड नाईट -सांगते की ते म्हणे दंगे थोपवायला पाकिस्तानात जाणार होते.

    स्वतः गांधी सांगत होते की कॉंग्रेस चे ऐतिहासिक कार्य संपले आहे आता तिचे विसर्जन करा .
    आता सामाजिक कार्य करा.-सर्वोदय करा.-पण लक्षात कोण घेतो ? असो.

    दुसरे असे कि संभाजीच्या काळापासूनच ब्राह्मण चौकडीचे राजकारण सुरु होते का ?
    छत्रपती शाहूने त्यामुळेच शहाणपणाने आणि सावधपणे वारे कसे वाहतील ते ओळखून सत्ता अधिकार -( वडीलाना ब्राह्मणानी वाचवले नाही.)हे लक्षात ठेऊन,
    एक प्रकारे ब्राह्मणांना - पेशव्यांना हे राज्य सोपवले असा अर्थ लागतो का ?

    ReplyDelete
    Replies
    1. परदेशातले विविध लढे सुध्दा गांधीजींची प्रेरणा घेत असतात . गांधीजींच्या जीवाचे रक्षण हीच त्यांना शिक्षा वगैरे हास्यास्पद आहे .
      पहिल्या शाहूंचे बालपण , संगोपन , जे काही झाले असेल ते शिक्षण , विवाह औरंगजेबाच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्याच छावणीत झाले . त्यांची मुक्तता झाल्यावर ते औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शनाला गेले होते असेही कुठेतरी वाचल्याचे स्मरते (बहुधा जयसिंग पवारांच्या लेखात ). यामुळेच त्यांनी पेशव्यांना राज्य सोपवले कि काय ? (तुमच्या युक्तिवादावर याच पातळीचा युक्तिवाद होऊ शकतो )

      Delete
  5. असे म्हटले जाते कि वयस्कर गांधी हे काँग्रेस ला अवघड झाले होते.(गांधी चित्रपट आणि फ्रीडम आट मिड नाईट )
    ब्यारीस्तर जिनांना अखंड भारताचे पंत प्रधान करण्यास निघालेले गांधी त्यांना नको होते.
    त्यांच्या तत्वांची त्यांच्याच पक्षाने उडवलेली खिल्ली आपल्या डोळ्यासमोर आहे.
    त्या अर्थाने गांधीना त्यांच्याच लोकांनी मरणप्राय यातना दिल्या म्हणजेच त्यांच्या विचारांचा पराभव !
    म्हणूनच त्यांच्या जीवाचे रक्षण हि त्यांना शिक्षा ठरत गेली असती.
    मी त्यांच्या खुनाचे समर्थन केलेले नाही.उलट त्याला दुबळा प्रयत्न म्हटले आहे !

    तसेच त्या लेखाचा थोडासा भाग - आशय - ब्राह्मणांनी सम्भाजीवर कुरघोडी केली .असा दिसला.म्हणून मी विचारले कि
    ज्याला मुघल कैदेत अनेक व्यसने मुद्दाम लावली गेली त्याने पुढील कारकीर्द ब्राह्मणांच्या मदतीने घालवण्याचा समयोचित ( ? )निर्णय घेतला का ?
    असा धाडसी निर्णय घेण्याला छ्त्रपतींचेच रक्त अंगात असावे लागते ! औरंगजेबाने त्यांना वडिलांच्या ममतेने जपले होते.( ? )
    असे समजून ते त्याच्या समाधीच्या दर्शनाला गेले असे आपले म्हणणे आहे का ?
    नशीब माझे - इथे दादोजींचा काही विषय येत नाही !
    आपण कै . शेजवलकर यांचे संभाजी वरील लेख वाचावेत हि विनंती.

    ReplyDelete
  6. प्रत्येक गोष्टीचे श्रेय स्वत:कडे घेण्यासाठी एवढा अट्टाहास कशासाठी? ब्राह्मण जातीला एवढी असुरक्षितता कशासाठी वाटते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात कायस्थ प्रभूंनी देखील खूप मोठे योगदान दिले आहे. इतरही अनेक जाती आहेत. पण त्या सर्वांनी कधीही आमच्यामुळेच शिवाजी महाराज मोठे झाले असा आव आणला नाही आणि तसा प्रचारही केला नाही. याउलट बाजीप्रभू आणि मुरारबाजी सारखे लोक आमच्याच जातीतले म्हणून निर्लज्जपणे मिरवायलाही ब्राह्मणाना लाज वाटत नाही. इतर कुठल्याही जातीतला महापुरुष मोठा झाला की लगेच आमच्याचमुळे तो मोठा झाला असे सिद्ध करण्याची अहमहमिका यांच्यात चालू होते. शिवाजी महाराजांपासून ते फुले, आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत हेच चालू आहे. जेव्हा ह्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा त्याचा वापर करून स्वत:च्या तुंबड्या ह्यांनी भरून घेतल्या. आता इतर जाती पुढे येऊ लागल्या तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली म्हणून हे असले धंदे चालू केले ह्यांनी.

    स्वत:च्या पोरांना अमेरिकेला पाठवायचे आणि इतरांना हिंदुत्वाच्या नाहीतर मराठीच्या नावाखाली इथेच अडकवून ठेवायचे ही ह्यांची चाल आहे. बहुजनांना इतिहासात गुंतवून ठेवायचे आणि स्वत:च्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करायचे हा डाव आता फार काळ चालणार नाही. स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची ताकद आता आमच्यात आली आहे. बळी राजा वामनाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणार आहे. त्याची सुरुवात झालीच आहे. आता वामनाला पाताळात गाडायला फार वेळ लागणार नाही.

    ReplyDelete
  7. देवा रे देवा !
    कसल्या गोष्टींचे श्रेय ?
    राजा शिवाजी हा उत्तम राजा होता.स्वयंभू होता.त्याला जातीच्या चक्रव्युहात अडकवू नका .
    मुद्दा असा आहे कि बाळाजी विश्वनाथला पेशवेपद का दिले गेले.
    एक कळसूत्री बाहुली हवी होती म्हणून - का त्याच्यात काही गुण होते म्हणून.
    ते गुण इतर लोकात पण होतेच कि -बहुजानात ! नाही का ?-मग पळी पंचपात्र घेऊन आलेल्या या भटाला इतक काय महत्व ?
    आणि ज्यांनी हे महत्व दिले ते तर एकदम खानदानी रक्ताचे होते,राजघराण्यातले - ते अशी येरागबाळ्याची चूक करणार नाहीत.आपण तर त्यांच्यापुढे अगदीच पामर !
    त्यांच्या निर्णयात फार मोठा अर्थ असेल , दूरदृष्टी असेल ! का नाही ?
    ब्राह्मण कधीच असुरक्षित नसतो ! लोकांना शहाणे करून सोडणे हे त्यांचे ध्येय -पण त्यांनी शिक्षणांची दुकाने नाही मांडली - चुकलच नाही का ! इकडे ९६ कुळी मिशीला पीळ देत एकीकडे कुणबी म्हणून जातीचा दाखला घ्यायला रांगेत उभे राहतात.

    तुमच्या कडे यादी आहे का हो की कुठल्या को.ब्राह्मणाने तुम्ही म्हणता तसे श्रेय लाटले इतर जातीचे !आम्हालापण ऐकायला आवडेल - त्यात काय लपवायचं!
    फुले आबेडकर आणि सुभाषचंद्र हे को.ब्रा .मुळे मोठे झाले? ह्या तुमच्या उद्गाराचे तर हसूच आले.कोण आणि कधी असे म्हणाले ?
    इतर जाती पुढे येऊ लागल्या आणि वाळू सरकू लागली ?- को.ब्रा चा मी ठेकेदार नाही. मी कर्तुत्वाचा भाट आहे.

    अमेरिकेत जाणे म्हणजे कर्तृत्व हा जावई शोधच आहे. आय.टी.लेबर म्हणतात त्याला. इतर कामगारासारखेच तेपण. त्यात कसलं आलंय कर्तृत्व?थोडासा बारा पगार असतो म्हणे त्यांना !.

    बहुजन ब्राह्मणांचे ऐकतात का ! ही पण एक बातमीच झाली कि हो ! " ते बहुजनांना इतिहासात गुंतवून ठेवतात " म्हणजे काय ? बहुजन काय त्यांच्या भोवती कोंडाळे करून कथा ऐकतात का ? - एक होता राजा- त्याच नाव होते शिवाजी - बोला हर हर महादेव - असे का ? कमाल आहे तुमच्या कल्पकतेची.- मस्तच ! वामनाला पाताळात ? बापरे !
    तुम्हाला को.ब्रा.भारतात अडकवून ठेवतात ? छे छे - असं नका करू - तुम्ही खुशाल जा अमेरिकेत - तिथेपण आरक्षण मागा - त्यांना विचारा -तुम्ही शिवाजीला ओळखता ?आंबेडकर ? म,फुल्यांना ? नाही ? कमाल आहे ! ते ग्रेट होते - आम्ही म्हणतोय न - म्हणजे होते. आम्ही त्यांच्या नावाने त्यांच्यातल्या लोकांना नोकऱ्या देतो , फक्त त्यांच्याच लोकांना !
    नाही समजल ?अजून सोपे करून सांगतो -फक्त ब्राह्मण सोडून सगळे सच्चे हिंदू- सच्चे भारतीय !नाही समजल ?असे कसे काय ?ते तुम्हाला नाही समजणार !काय म्हणता तुमच्या इथे असले लाड होणार नाहीत ?खामोश !आपली जबान सांभाळा -अमेरिकेत आरक्षण झालेच पाहिजे.नाहीतर तिथला वामन आम्ही पाताळात गाडू !जर्मनीतला पण गाडू ,इंग्लंड मध्ये गाडू .मग देताय कि नाय नोकऱ्या आमच्या बहुजनांना ?असो !
    अजून एक गोष्ट राहिली सांगायची अहो आम्ही आमच्या मर्जीने भारतात आहोत.भेटू इथेच कधीतरी.नाही का ?
    आमच्या दिवाणखान्यात भिंतीजवळ सुबक पुतळ्याच्या रुपात साक्षात छ.थोरले महराज आहेत,समोर डॉ .आंबेडकर आणि फोटोशेजारी म.फुले म.गांधी आणि सुभाषचंद्र आहेत.
    आतल्या खोलीत संत तुकाराम आणि माउली आहे.सरस्वती - लक्ष्मी आणि बाप्पा गणपती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि त्यावर साक्षात विठोबा-रखुमाई आहेत ! त्यांचे पसायदान किती सुंदर !
    जे खळांची व्यंकटी सांडो - त्या सत्कर्मी रती वाढो - भूतां परस्परे जडो - मैत्र जीवांचे - असे ते म्हणत
    अजून काय हवाय आपल्याला.एवढी शिदोरी पुरे आहे

    आमीबी जग हिंडून आलो बगा पण असा देशच नाय गावला .लय भारी आपला देश !. ही मायभूमी हाय आपली .- कर्म भूमी हाये !जन्म भूमी बी हाये .फिरायला इतर देश आहेतच की ,पण आपला तो भारतच !इथ थोड दमादमान २-४ जयंत्या नि पुनतिथ्यांना वारडायाच बेंबीच्या देठापासून - मग वरसभर कोण हात लावत नाय बागा -उरलेले दिवस त्या जानव्याच्या नावाने बोंब मारायची बोलावण आलकी -इतका सोपा कारबार करून टाकलाय मस्तच कि रे गाड्या ! ! !

    तुमीबी उगा आपलं त्रास करून घेऊ नका !.वामन गाडला जाईलच ! त्याच काय नवीन खूळ धरलय आजकाल ?काय तरीच आपलं !
    पण तेव्हढे इतर देशात पण आरक्षणाच बघा ना राव !
    नाय काय हाये - आमची हि पोर जागा मिळवतात बगा या रिजर्व कोट्यातून पण पुढे सरकायची बोंब - त्याच पण बगा न राव !
    परीक्षा हव्यात कुणाला. नाय का ?

    ReplyDelete
  8. हा हा हा... शेपटीवर पाय दिल्यावर फणा काढत नाही तो कोब्रा कसला? ब्राह्मण लोकांना शहाणे करून सोडतो? मग फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचे आयुष्य व्यर्थच गेले म्हणायचे. या सर्वांनी उगाच जनतेला शहाणे करण्यात आपापली आयुष्ये खर्ची घातली. तुमच्या घरात (की आर्यावर्तात?) या सर्व महामानवांचे नुसतेच पुतळे आहेत. पण त्याच महामानवांनी सांगितलेले तत्वज्ञान मात्र तुमच्या पचनी पडलेले दिसत नाही. नाहीतर लगेच आरक्षण हा फेवरेट विषय सुचला नसता. महामानवांचे नुसते पुतळे आणि चित्र घरी असून उपयोग नसतो. त्यांचे विचार समजून घेणे हे महत्वाचे असते. असो. ब्राह्मणांनी इतर जातींबरोबर काय केले त्याची यादी इतकी मोठी आहे की त्याखाली तुमचा जीव गुदमरून जाईल. म्हणूनच फक्त निवडक उदाहरणे देत आहे.

    लोकहितवादी गोपाळराव देशमुख यांनी शतपत्रात म्हटले आहे, "ब्राह्मणाशिवाय अन्य वर्गाने विद्या करू नये अशी समजूत आहे. संस्कृत विद्या एकीकडेच आहे. परंतु एखादा मराठा अगर इतर जातीचा कारकून ब्राह्मणांनी पाहिला की त्यांच्या अंगाचे तिळपापड होतात. त्यांनी असा नेम केला की दुसऱ्या जातीने शिकू नये. हल्ली बहुधा सर्व रोजगार ब्राह्मणांनी बळकावले आहेत. एकीकडे भटांनी धर्म व दुसरीकडे गृहस्थांनी रोजगार अशा दोन्ही बाजू धरून इतर लोकांस आत येऊ देऊ नये अशी शक्कल केली होती. आता जर कोणी शूद्र जातीचा कारकून झाला तर सर्व ब्राह्मण त्याच्याकडे डोळे वटारून पाहतात. त्यांस असे वाटते की आमचा धर्म लिहिणे पुसणे करावयाचा असून कुणबी आमचा वृत्तीछेद करतात."

    पुढे जेव्हा महात्मा फुले यांच्यामुळे ब्राह्मणेतर तरुण सरकारी नोकरीत प्रवेश करू लागले आणि ब्राह्मणी वर्चस्वाला शह देऊ लागले तेव्हा ह्या विभागातील ब्राह्मण ओरडू लागले की ब्राह्मणेतर ब्रिटीश सरकारकडे नोकऱ्यांची भीक मागतात! ते देशभक्त नव्हेत!

    ReplyDelete
  9. कोल्हापूरमध्ये संस्थानाच्या शासनात चित्पावन ब्राह्मणांनी एकच गर्दी केली होती. १८९४ मध्ये कोल्हापूर राज्यकारभारामध्ये साठ ब्राह्मण तर अकरा ब्राह्मणेतर होते. सर्व वर्तमानपत्रे व नियतकालिके ब्राह्मणांच्या मालकीची होती.
    टिळक आणि त्यांचे मित्र यांनी पुणे येथे बुडत असलेली पुना सिल्क कंपनी शाहू महाराजांनी विकत घ्यावी असा प्रयत्न केला. परंतु दिवाण सबनीस (कायस्थ) यांनी महाराजांना अडवले. ब्राह्मणांनी सबनीस हे स्वार्थी असल्याचा आरोप महाराजांकडे केला. पण तिकडे शाहूंनी दुर्लक्ष केले. तेव्हा नरसोबावाडी येथे पवित्र स्थळी सबनीस यांना व त्यांच्या कुटुंबियांना प्रवेश देण्याचे ब्राह्मण पुरोहितांनी नाकारले. 'केसरी' ने म्हटले की ,"ज्याला आपली स्वत:ची म्हणून स्वतंत्र इभ्रत आहे असा दिवाण संस्थानात असावा लागतो." एका नामांकित संस्थानाचा दिवाण कायस्थ प्रभू असणे हाच 'केसरी' ला खरा अडथळा वाटत होता.
    महाड येथील कायस्थ प्रभूंनी शंकराचार्यांची पाद्यपूजा पुराणोक्त पद्धतीने करायला साफ नकार दिला कारण शंकराचार्यांनी त्यांना वेदोक्त पद्धतीने पाद्यपूजा करायला नकार दिला होता.

    काही थोर समाज सुधारक ब्राह्मण वगळल्यास सर्व साधारणपणे ब्राह्मणांचा दृष्टीकोण सामाजिक व धार्मिक समतेच्या बाबतीत प्रतिकूल व ताठर आहे ह्याविषयी जयप्रकाश नारायण म्हणतात, "समाजव्यवस्थेला धक्का पोचत नसला की हवी ती विचारांची बंडखोरी ब्राह्मण वर्ग चालू देई. परंतु सामाजिक सुधारणांच्या प्रत्येक चळवळीला ब्राह्मण वर्गाने कसून विरोध केलेला आहे. समाजातील विषमता मऊ बिनबोचक व्हावी म्हणून ब्राह्मणांचे प्रयत्न असत ही समजूत चुकीची आहे. उलट सामाजिक भेद दृढ आणि कठोर व्हावेत अशीच त्यांची शिकवणूक होती. ही विधाने बंडखोर ब्राह्मण व्यक्तींना उद्देशून नसून ब्राह्मण वर्गाला उद्देशून केली आहेत."

    वर उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी एकही ९६ कुळी नाही. एक ब्राह्मण आहे आणि इतर कायस्थ आहेत. शिवाय प्रबोधनकार यांचा उल्लेख तर करायलाच हवा. या सर्वांनी कधी आरक्षण मागितले नाही. पण त्याचा ब्राह्मण वर्गासारखा बडेजाव देखील मिरवला नाही. इतरांना कधी हिणवून दाखवले नाही. ब्राह्मण वर्गाप्रमाणे स्वत:च्या नसलेल्या अकलेचा तोरा मिरवला नाही. कधी इतरांना शूद्र घोषित केले नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे "गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा सनातन धर्म" त्यांनी पाळला नाही.

    श्रद्धांचा पराभव झाल्याशिवाय समाजात बदल घडून येत नाहीत. जातीची लेबले ब्राह्मणांनी इतरांना लावली की तो न्याय आणि तेच इतरांनी ब्राह्मण जातीबरोबर केले की तो अन्याय? हा दुटप्पीपणा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरक्षण देखील संपणार नाही.

    ReplyDelete
  10. संजयजी,
    अतिशय वेगाने उत्तरे आणि प्रत्युत्तरे झाली - आनंद झाला.आणि खूप शिकायला मिळाले.
    समाजात किती अंडर करंट चालू आहेत ते समजते.

    मला एक समजले नाही की डॉ .आंबेडकर यांनी त्या वेळेस आरक्षणाला "तात्पुरती व्यवस्था "असे स्वरूप का दिले ?
    कायम स्वरूप का नाही केले?.म्हणजे या बामनानी आरक्षणा बाबत ओरडण्याचा प्रश्नच आला नसता .

    म्हणून हा मुद्दा मांडावासा वाटतो. १९५५-६५ -७५ सालापर्यंत सर्वत्र ब्राह्मण शिक्षक दिसत असत-शहरात -खेडेगावात -उन्हा तान्हात -पावसापाण्यात -अपुऱ्या पगारावर अर्धपोटी असा हा शिक्षक.
    विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना दसऱ्याला सोने आणि संक्रांतीला तिळगुळ द्यायला जायचे-अजूनही ते रस्त्यात भेटले की ( अजून तरी ) त्यांना वाकून नमस्कार केला जातो. अग ए ,ते बघ -आपले जोग सर,ते बघ गुप्ते सर - अय्या , त्या बघ आपल्या गणिताच्या बर्वे बाई असे सांगणे असते.
    सांगण्याचा हेतू हा की समाजात मार्ग दाखवण्याचे काम निश्चितच राजर्षी शाहू , म.फुले आंबेडकर , आगरकर यांनी केले पण
    विद्या दानाचे अमोल कार्य सामान्य ब्राह्मण वर्गाने तितक्याच निष्ठेने केले असे मला वाटते.

    माझ्या आजोबांनी तर एकाचवेळी पोस्त मास्तर आणि शाळा हेड मास्तर अशी कामे केली-संध्याकाळी पाठांतर वर्ग असे-,सकाळी व्यायाम वर्ग सगळे आल इन वन चालायचे.
    त्यांना काय माहित कि आपल्या नंतर असापण एक लोंढा येणार आहे कि जो आपल्याला नावे ठेवत फक्त ब्राह्मणांना शिव्या घालत राहील.व्यक्तीसापेक्ष जगणे नाहीच !
    जातीवर तुमचे जगणे मरणे ठरणार .
    एकटा ब्राह्मण माणूस मनोभावे कुणाच्या अध्यात मध्यात न पडता समाजसेवा भावाने आपली नोकरी सांभाळत जीवन जगूच शकत नाही का ?

    तात्पर्य, आपल्या सर्व लिखाणाचा मुख्य राग ब्राह्मणांवर दिसतो आहे.
    तुम्ही म्हणता तसे काही लोकांनी जातीच्या नावाखाली लाभ उठवला असणारच !
    आज तेच काम सरकारी हुकुमाने चालले आहे.काही लोक जातीच्या नावाने लाभ उठवत आहेत.

    असे का बरे ?

    ReplyDelete
  11. असे का बरे ?

    तुम्ही म्हणता कि श्रद्धांचा पराभव झाल्याशिवाय समाजात बदल घडून येत नाहीत.
    माझ्या आईच्या पोटात ९ महिने राहून मी पहिला श्वास घेतला - ती माझे सर्वस्व - ती माझे श्रद्धा स्थान - त्या श्रद्धा स्थानात बदल कसा होणार ? त्याचा पराभव कसा होणार ?
    एकीकडे तुम्ही म्हणता कि श्रद्धांचा पराभव झाला पाहिजे ! तुम्ही शिकवाल का तुमच्या मुलाला कि बेटा तो अफझलखान आला होता न छात्रापतीना भेटायला , तो फार गुणी होता ,या बामणांनी सगळ्यांना काहीबाही सांगून त्याला बदमान केला ! तो तर भाऊ भाऊ म्हणून महाराजांना मिठी मारायला आला होता आणि हार्टफेल मुळे मेला .सांगाल का असे ? महाराज ढसाढसा रडले .जिजाऊ १० दिवस जेवल्या नाहीत अतीव दुःखाने -मग महाराजांनी त्याची कबर बांधली .मग त्या जेवल्या - शिकवाल का असे तुम्ही - हा सर्व धर्म बंधुभाव ?

    बाबासाहेबांनी काय ते स्वतः वेडे होते म्हणून आरक्षणाची " मुदत " ठरवून दिली होती ? ते इतके महान द्रष्टा होते की पुढची धोक्याची घंटा तेंव्हाच त्यांच्या मनात वाजली असेल. जी मुदत ठरवण्यात आली होती ती तर कधीच उलटून गेली आहे - आता त्यांच्या स्मृतीला वंदन करून असे म्हणायचे का कि बाबासाहेब , मार्ग दाखवा ! . . .साहेब तुम्ही काय योजले होते आणि काय झाले ! एक गेला दुसरा आला ! तो जातीने ब्राह्मण होता - आणि हा सरकारी ब्राह्मण !

    एक प्रकारे त्यांनी मागासलेल्या हिंदू जातींचे संरक्षण केले .५० % हिंदू समाजाचे ! ते त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत.त्यामुळे अनेक मागास कुटुंबे उच्च वर्गीयांच्या म्हणजेच
    (मुख्यत्वे ब्राह्मण आणि मराठा उच्च वर्ण समजले जातात-)त्यांच्या जोखडातून मुक्त झाले वा होऊ घातले.
    तसे पहिले तर शहरात आज काल जातपात विचारली जात नाही -एक संपूर्ण दिवस तुम्ही घ्या - मंडई ,ब्यांक,दुकाने,शाळा,हॉटेल,रेल्वे,एसटी ,मंदिर,थेटर ,बाग बगीचा, डॉक्टर,कटींगच दुकान ,दूधवाला -
    कुठेही आपण हा इश्यू करत नाही पण खेडेगावात चित्र वेगळे असू शकते. कारण समाज एकमेकाला जवळून ओळखतो.प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीची बातमी व्हायला वेळ लागत नाही.

    महात्मा फुले यांचे कार्य तर अफाट आहे.पण त्यांनी धर्मांतर का केले नाही हे मला एक कोडेच आहे.
    मी आत्ता समाजात जितकी लग्न कार्ये बघतो त्यात अंतरपाट धरायला खरेतर एक अस्पृश्य ठेवायला काय हरकत आहे ?
    आणि कुठलेही धार्मिक विधी संस्कृत मधून का करायचे ?
    जी बहुजनांना समजते अशी भाषा वापरली गेली पाहिजे.
    आज वास्तू शास्त्र या नावाखाली अनेक इतर जातीच्या समाजात वेगवेगळी चक्रे,आणि मंत्र तांब्याच्या किंवा इतर धातूवर कोरून पुरले जातात -घरात अनेक मंत्राने सिद्ध केलेली चक्रे , पिर्यामिड ,
    इत्यादी ठेवले जातात.तसेच अनेक औषधांच्या रुपात अनेक जप सुचवले जातात.असले उपाय कदाचित मागल्या दराने या हिंदू ब्राह्मणांचा चंचू प्रवेश असू शकतो.
    लाफिंग बुद्धा किंवा तत्सम पुतळे , कारंजी असे प्रकार सुचवण्यात येतात.मी एके ठिकाणी गेलो होतो त्या बाई नवबौद्ध - पण एका ब्राह्मणा कडून आग्नेय दिशेला अग्नी ,ईशान्येला ईश्वर वगैरे समजावून घेत होत्या.मला फार आश्चर्य वाटले -त्या पण त्या ब्राह्मणाला कुबेर स्थान -ब्रह्म स्थान समजावून सांगत होत्या - दोघांचेही -ती बौद्ध असून ब्राह्मणाला मान देत होती आणि या ब्राह्मणाला पण तिची दक्षिणा चालत होती !
    समाज प्रबोधन म्हणजे काय ? तर असे प्रकार बंद झाले पाहिजेत.

    ReplyDelete
  12. संजयजी,
    तुमच्या चर्चेचा विषय आहे संभाजीराजे आणि वाद काय चाललाय ? कोकणस्थ !
    तुमचे दुसरे स्फुट लेखन पण आले - हाराकिरी - (त्यावर मी मत प्रदर्शन केले आहेच- तिथे पण हे घुसतील मनुवाद,को.ब्रा .वगैरे ओरडत-) यांचे आपले चालूच ! शिळ्या कढीला उत !
    हीच शक्ती वाचनात वापरली तर निदान आवाका तरी वाढेल.तेच वापरून वापरून गुळगुळीत झालेले शब्द परत परत ऐकायला मजा नाही येत !
    काय म्हणावे यांना ?
    असो.
    महाराष्ट्रात को.ब्रा.चे लोकसंख्येत प्रमाण कितीसे आहे ? ब्राह्मण च २ % -२.५ %- शंभरात २ ते अडीच फक्त ?
    सरकारी आकडेवारी सांगते कि सर्व ब्राह्मण मिळून २.५ % त्यात कोब्रा देशस्थ कऱ्हाडे सर्व आले.
    म्हणजे कोब्रा फार तर ०.५ % ! शंभरात किंवा २०० मध्ये एखादा !.बहुतेक मुंबई पुणे किंवा कोकणात -त्यातून भारताबाहेर गेलेले किती ?

    इतका छोटा समाज सर्व महाराष्ट्राचे वाटोळे कसा करू शकेल ?
    ते अशक्य आहे.
    तसे असेल तर - ते इतके महान किंवा इतके भयानक आहेत ?
    आज अनेक गोष्टीत को.ब्रा.वर अलिखित बहिष्कार - मज्जाव आहे तरी ते इतके महत्वाचे कसे ? त्यांची सगळीकडून मुस्कुटदाबी केली आहे तरी असे कसे ? त्यांची घरेदारे जाळली -राख रांगोळी केली तरी यांची शिरजोरी संपत नाही ! सगळीकडे यांचाच दबदबा - ही कुठली जादू या समाजाकडे आहे ?
    अभ्यासण्याचा भाग असा आहे की सर्वाना ब्राह्मण द्वेष पसरवतो कोण ते समजून चुकले आहे.ग्रामीण अर्थकारणात ब्राह्मण शून्य झाला आहे.कूळ कायद्याने त्याची सर्व शक्ती खलास झाली , सावकारी कायद्यामुळे ते गलितगात्र झाले !
    पण मराठा समाज हा मुख्यत्वे इतर समाजावर उस कापणी तोडणी इत्यादी कामासाठी अवलंबून आहे.सध्याचे कृषिमंत्री यांनी सरळ सांगितले कि उसाच्या सिझन मध्ये आम्ही दुष्काळी रोजगार हमी योजना बंद करणार.कारण आम्हाला पुरेसा कामगार हाताशी मिळत नाही.कृषिमंत्री असे बोलू शकतो ?
    म्हणजे या असंघटीत मजुरांना उसाच्या कामाशिवाय पर्याय नाही . ही एक गुलामगिरी आणि हुकुमशाहीच झाली - नाही का ? लोक काय करत आहेत ? कामाला लागा .
    खरेतर आपला लढा ब्राह्मण - ब्राह्मणेतर असा असता कामा नये.

    ReplyDelete
  13. आपल्याला लढाई जिंकायची आहे ती इतर लोकांशी .
    आज फक्त ५०० रुपये देऊन बांगला देशातून कुणीही इथे येऊ शकतो.
    कुंकू लावून हिंदू म्हणून झोपडपट्टीत जागा मिळवू शकतो.भ्रमात राहू नका.शेजारी देशातून आपल्याकडे माणसांचा पूर येतो आहे.
    अर्ध शिक्षित,चांभार , सुतार ,लोहार , शिंपी सर्व प्रकारचे लोक .त्यात ब्राह्मण नाहीत. कोकणस्थ तर नाहीतच नाहीत .

    काही वर्षात प्रत्येक मंदिराशेजारी एक मशीद उभी असेल.

    त्यांच्या शेतात असेच कामगार हवे आहेत. बांधकाम व्यवसायात असेच कुशल अकुशल लोक हवे आहेत जे न थकता अखंड काम करतात , ते बोनस मागत नाहीत.
    पगारवाढ मागत नाहीत - ते संप करत नाहीत.-त्यांना मेडिकल नको - त्यांना भात हवा -बस्स -तोच त्यांना पोटभर द्या.

    त्यांचा देश महा दरीद्री आहे.भयानक आहे .त्यांना दुप्पट काम करून इथे स्थान निर्माण करायचे आहे.
    मुंबईत सोनार, धोबी , न्हावी ,चांभार ,दूधवाला सगळे असे येत आहेत.
    उस तोडणीला अशी माणसे येत आहेत. साखर कारखान्यात असे लोक येत आहेत.जथ्या जथ्याने !
    स्वस्त आणि मस्त.
    संख्येच्या अर्थकारणात आपला पराभव होतो आहे. आपले लाडावलेले मराठी लेबर खाली खाली ढकलले जात आहे.सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत काम करणारा बांगलादेशी आणि सकाळी ९ ला येऊन दर १५-२० मिनिटांनी तंबाखू आणि २ तासांनी चहा पिणारा आपला मराठी माणूस .अशावेळी खेडेगावातले सहकार सम्राट तुम्हाला दूर ढकलतील .
    साखर सम्राट बांगलादेशींना घरात घेतील.आणि एक दिवस असेच आपण सर्वच बाहेर ढकलले जाऊ.

    आपला महाराष्ट्र धर्म तुम्हाला दोन घास जेऊ घालू शकत नाही.कुठलाही झेंडा आसरा देणार नाही.या भूलथापा मी १९६४ पासून बघत आलो आहे.
    हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज कि जय - ओरडून कोरड पडलेल्या तुमच्या घशात पाण्याचे दोन थेंब तहान भागवायला ते देणार नाहीत.
    उसाकडे धावणारे पाणी पाहत कोरड्या नजरेने टाचा घासत तुम्हाला जीव सोडावा लागेल .
    अजून वेळ गेलेली नाही ! जातीपातीचे राजकारण बंद करा .ब्राह्मण तुमचे शत्रू नाहीत ते असूच शकत नाहीत - त्यांचे तुमचे क्षेत्र वेगळे आहे.
    शिक्षक सम्राट लोकांची पण एक खेळी आहे.
    त्यांना शिक्षण अफाट किमतीत महाग करून पैसे कमवायचे आहेत.बाहेरची पंजाबी बिहारी मुले पैशाच्या थैल्या घेऊन उभी आहेत , त्यात अडचण नको म्हणून ब्राह्मणांना हाकला - बदनाम करा -हा असा पैशाचा ओघ उसातून सुद्धा मिळत नाही.शेतीतून तर नाहीच नाही.

    कोकणस्थ ब्राह्मण कधीतरी हरेल का ?
    प्रत्येक गोष्टीत एकदा ब्राह्मण ,वेद,आणि मनुवाद यांचा उद्धार केल्याशिवाय गाडी पुढे जातच नाही.खेड्यातील अर्थशास्त्र आणि होणारी पिळवणूक आणि को.ब्राह्मण यांचा काहीएक संबंध नाही हे आता बहुजनांना - प्रजेला कळू लागले आहे.आता को.ब्राह्मणांना झोडपायला नवीन वाट शोधा -तोच तुमचा रोजी रोटीचा धंदा असेल तर !
    आम्हाला त्याने काडीचाही फरक पडत नाही.उलट तुमची कीव येते.
    आणि हो -त्या वामनाला गाडायला विसरू नका - !

    ReplyDelete
  14. @ Anonymous... pls do not discuss here on irrelevant subject to the post. There are separate articles on casteism where you may post and I too will be too happy to reply.

    ReplyDelete
  15. तुमच्या लेखनात दोनच महत्वाचे मुद्दे आहेत

    १) आरक्षणाची मुदत
    २) बहुजनांनी टिकवून ठेवलेले ब्राह्मणी वर्चस्व.

    आरक्षण हा मुद्दा आल्यावर मुदतीचा मुद्दा येणारच हे आधीच माहित होते. यावर एक सरळ उपाय असा आहे - ज्या दिवशी मागास वर्गीयांच्या आरक्षणाची गरज उच्चवर्णीयांना मान्य होईल त्या दिवशी आरक्षणाची गरजच राहणार नाही. जोपर्यंत सवर्णांचा "खालच्यांकडे" बघण्याचा दृष्टीकोण बदलत नाही तोपर्यंत आरक्षणाची गरज निश्चितच राहील. आजही कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ब्राह्मण इतरांबरोबर कसे वागतात ते मी स्वत:च्या डोळ्यांनी बघितले आहे. वेळ प्रसंगी मलाही (ते ही माझ्या ब्राह्मण मित्रांकडूनच) अस्पृश्यांसारखी वागणूक मिळाली आहे. जातीय टिप्पण्या सहन कराव्या लागल्या आहेत. हे मी उगाच सांगत नाही. स्वानुभवावरून सांगत आहे. मी तथाकथित पुढारलेल्या जातीचा असूनही माझीच ही अवस्था असेल तर इतरांची काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करवत नाही. इतर कोणत्याही जातींचे-धर्मांचे लोक माझ्याशी असे वागलेले नाहीत. मी स्वत:ही इतरांशी अश्या पद्धतीने वागत नाही. आरक्षणाच्या विरोधात ओरड करणारी हीच वृत्ती आहे.

    बहुजनांनी ब्राह्मणी वर्चस्व अज्ञानामुळे टिकवून ठेवले आहे. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांतून हे अज्ञान निर्माण झाले आहे. ह्या अज्ञानमूलक श्रद्धांचा पराभव झाल्याशिवाय समाजात बदल घडणार नाहीत. जेव्हा बहुजन आणि ब्राह्मण यांचे धार्मिक विधी एकाच भाषेतून एकाच प्रकारचे होतील तेव्हा हे वर्चस्व नष्ट होण्याची सुरुवात होईल. जेव्हा "सुसंस्कृत" म्हणजे चांगले आणि "असंस्कृत" म्हणजे वाईट अशा बाष्कळ संकल्पनांना मूठमाती मिळेल तेव्हा हे वर्चस्व नष्ट होईल.
    ब्राह्मण समाज शत्रू आहे असे मानण्याची काहीच गरज नाही. ब्राह्मणी व्यवस्था हीच शत्रू आहे. "ब्राह्मणी" हा शब्द नाईलाजाने वापरावा लागतो कारण आजही या धर्माचे शंभर टक्के नियंत्रण ब्राह्मणांच्याच हातात आहे..

    आणि सोनवणी साहेब, त्यांनी मंदिर - मशीद हा मुद्दा कशासाठी काढला? मराठीचा मुद्दा कशासाठी काढला? इतर मुद्दे नसले की हमखास हा मुद्दा काढला जातो हे तुम्हालाही माहित आहे. त्याचा तरी गोर गरिबांच्या आयुष्याशी काय संबंध? आणि या लेखाशी काय संबंध? जर मराठा समाजाने महाराष्ट्रात राज्य केले म्हणून मराठा हाच बहुजनांचा शत्रू आहे असे म्हणायचे असेल तर मग केंद्रात गेली साठ वर्षे काश्मिरी पंडितांचे राज्य आहे. मग त्यांना देखील बहुजनांचे शत्रू ठरवायचे का? मी पहिल्या प्रतिक्रियेत जे हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांबद्दल लिहिले होते ते किती तंतोतंत खरे झाले आहे हे तुम्ही स्वत:च बघू शकता. असो. हे विषयांतर झाले आहे हे मलाही मान्य आहे. पण ह्यांना उत्तर देणारे कोणीतरी अस्तित्वात आहे ह्याची जाणीव झाली पाहिजे म्हणून हे करावे लागते. इथे प्रश्न जिंकण्या-हरण्याचा नाही तर स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याचा आहे.
    इथे आरक्षणाचे समर्थन कोण करत आहे आणि विरोध कोण करत आहे हे वाचकांना कळेलच. बहुजनांचे खरे शत्रू कोण आहेत हे त्यातून आपोआपच स्पष्ट होईल.

    ReplyDelete
  16. संजय जी ,
    लेखनातून जर कुणाच्या वैयक्तिक भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून क्षमा मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.
    जाती विषय घेऊन कुणालाही दुखावणे हे पाप आहे.तसे न होण्याची मी दक्षता घेतली होती , तरीपण कुणी हा विषय आपल्या खाजगी
    अनुभवांशी जोडल्यामुळे त्यांना यातना झाल्या असतील तर मी दिलगीर आहे.माझ्या अभ्यासातून जाणवलेल्या भावना मी मांडल्या होत्या !
    आपल्यातल्या कुणालाही नवीन " गोडसे " निर्माण करण्याचे " पाप " माथ्यावर घ्यायचे नाहीये.तशी काळजी आपण सार्वजण घेऊया.
    हा विषय इथेच संपवतो आणि संपतो.
    धन्यवाद

    ReplyDelete
  17. माझ्याप्रमाणेच इतरांनाही भावना आहेत ह्याची जाणीव मला आहे. माझ्याकडून जर कोणाचा वैयक्तिक अपमान झाला असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.

    ReplyDelete
  18. संजय जी , अतिशय उत्कृष्ठ लेख आहे.तुम्ही इतिहासाकडे एक नवीन दिशा बघायची संधी दिली आहे .मुळात मराठी लोकांनीच संभाजी महाराजांचा बळी घेतला . शंभू राजेंना सोडवण्याचे धाडस हि राजाराम महाराजांनी दाखवू नये ही खरीच खेदाची गोष्ट आहे .दिलेरखानाला जाऊन मिळण्याची अशी शिक्षा त्यांना त्यांच्या स्वतःच्याच लोकां कडून मिळावी हे खरेच दुर्दैव .........असो शंभू राजे रयतेचे राजे होते व त्यांनी खरेच शिवपुत्राची भूमिका निभवूनच ह्या जगाचा निरोप घेतला....

    ReplyDelete
  19. lekhachi suruvat tar khupach surekh aahe jar kahi harkat nasel tar mi ha lekh tumchya navasahit facebook var itaranna mahiti puravnyachya hetune takali tar chalel ka

    ReplyDelete
  20. शंभूराजाना मारण्यात औरंगजेबाचे प्रयोजन काय असावे? त्यांना जिवंत ठेवले असते तर ते आणि राजाराम यांच्यात दुफळी माजून मराठी राज्य लयास गेले असते. इतिहासकार सांगतात कि शाहू महाराजाना पुढे याच कारणासाठी जिवंत ठेऊन नंतर सोडून देण्यात आले.

    ReplyDelete
  21. अतिशय माहितीपूर्ण विश्लेषण! मराठ्यांच्या इतिहासातील एका अत्यंत महत्वाच्या प्रकरणाचा मागोवा घेऊन संभाजी महाराजांच्या अटक आणि हत्या यामागील खरे रहस्य उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  22. namaskaar !!

    https://www.youtube.com/watch?v=e6jeCn1pbNM

    yaa link war kaahi wichar mandale ahet. tya baddal tumche wichar kay ahet? sambhaji maharaja na aurgajebane nahi tar raamdasi lokani marale

    ReplyDelete
  23. स्वत:च्या उन्नती आणि अवनती साठी प्रत्येक माणूस स्वत: जवाबदार असतो. राज्यारोहण झाल्याबरोबर संभाजी राजेंनी विद्रोही सरदाराना माफ केले असते तर (औरंगजेब पर्यंत सर्व मुगल बादशहानी, गादीवर बसल्याबरोबर आपल्या विरुद्ध लढणाऱ्या सरदाराना माफी दिली), त्याच्या प्रती लोकांची निष्ठा वाढली असती. संभाजी राजे तेवढ औदार्य दाखवू शकले नाही. शिवाय योग्य लोकांची निवड करण्यात ही ते अयशस्वी ठरले. हेर खात्याचे महत्व ही त्यांना कळले नाही. हेच त्यांचे दुर्दैव. लेख उत्तम आहे.

    ReplyDelete
  24. Sonawani Sir,
    Thanks a lot for describing the sorrowful death of Shri Sambhaji Maharaj. There are difference of opinions for the arrest & death of his death. you are requested to describe in details , right from his arrest, his inhuman torture till his miserable (but defiantly inspiring) death....................

    ReplyDelete
  25. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  26. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  27. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  29. अभ्यासू विषलेशन sir

    ReplyDelete
  30. औरंगजेबाने संभाजी महाराजांना मुसलमान होण्यास सांगितले याला पुरावा?

    काहीच नाही तर मुसलमान हो हे तर्काच्या आधारे म्हणणे
    ...हे म्हणजे जसे काय औरंगजेब धर्म प्रचारक होता काय....आणि तेवढ्यासाठी एवढी लढाई चाललेली....

    जरी औरंगजेबाने offer केले असे गृहीत धरले तरी

    ...जर स्वकीयांनी संभाजी महाराजांचा त्याग केला तर ते त्याच स्वकीयांच्या धर्मासाठी स्वतःचा बाणा दाखवून हालहाल होऊ देतील हे कशावरून ....स्वकीयांनी जर नाकारले हे समजल्यावर काय मनःस्थिती होऊन जाईल हे नाव विचार केलेलाच बरा.... तरी आता धर्मासाठी मी झुकणार नाही, ...हे न पटणारे आहे....

    ReplyDelete
  31. औरंगजेबाने संभाजी महाराजांना मुसलमान होण्यास सांगितले याला पुरावा?

    काहीच नाही तर मुसलमान हो हे तर्काच्या आधारे म्हणणे
    ...हे म्हणजे जसे काय औरंगजेब धर्म प्रचारक होता काय....आणि तेवढ्यासाठी एवढी लढाई चाललेली....

    जरी औरंगजेबाने offer केले असे गृहीत धरले तरी

    ...जर स्वकीयांनी संभाजी महाराजांचा त्याग केला तर ते त्याच स्वकीयांच्या धर्मासाठी स्वतःचा बाणा दाखवून हालहाल होऊ देतील हे कशावरून ....स्वकीयांनी जर नाकारले हे समजल्यावर काय मनःस्थिती होऊन जाईल हे नाव विचार केलेलाच बरा.... तरी आता धर्मासाठी मी झुकणार नाही, ...हे न पटणारे आहे....

    ReplyDelete
  32. छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वभावातील मूळ फरक अधिरेखित करायला हवा. दोघेही पराकोटीचे स्वातंत्र्य भोक्ते, रयतेचे हितचिंतक, महापराक्रमी, बुध्दिमान पण एक गोष्ट सांगावीशी वाटते शिवाजी महाराजांकडे लोकांना आपलेसे करून घेण्याची जी कला होती तिला त्यांचे शत्रूही वश होत असत आणि कदाचित संभाजी राजांच्या उग्र स्वभावामुळे त्यात बाधा येत असेल.
    तसेच त्याकाळी ब्राम्हण मंत्री व इतर फितूर हत्तीच्या पायी दिल्याने त्यावेळचा
    सोशल मीडिया असणारा ब्राम्हण वर्गाने पण भरपूर विरोधी प्रचार संभाजी महाराज यांच्या विरुद्ध केल्याने त्या काळातील ब्राम्हण मंत्री व सरदार वर्ग विरोधात गेला असेल.

    ReplyDelete
  33. संभाजी महाराज हे छत्रपती होते हे पहाता त्यांच्या मोहीमांदरम्यान किंवा प्रवासादरम्यान अंगरक्षक पकडून किमान 1000 ते1500 कडवे सैनिक नसतील हे पटत नाही, दुसरी गोष्ट कलुषाचे काही लोक असतील किंवा नसतीलही पण माळोजी घोरपडे यांच्याकडे सरसेनापती पद असताना ते छत्रपतीं सोबत हात हालवत रिकामेच आपला मूलाला घेवुन निघाले होते हे काही पटत नाही,नाही म्हटले तरी 500-1000 लोक असतीलच तसेच संगमेश्वर या ठाण्याच्या संरक्षनार्थ काहीतरी शिबंदी ही असणार, असे सर्व मिळून संगमेश्वर मुक्कामी 2500-3000 लढाऊ सैन्य संभाजी महाजांकडे असावे. आता समजा शेख निजाम 5000 हजार सैन्य घेऊन जरी आला असे आपण मानले तरी त्याला गुंगारा देऊन त्याच्या सैन्याला खिंडार पाडून सहज निसटुन जाणे किंवा समोरासमोर दोन हात करणे हे सहज शक्य होते, कारण शिवकाळापासुन मराठ्यांच्या सैन्य हालचाली आणि कारवाया पाहील्या तर ह्या गोष्टी सहज शक्य वाटतात. पण संभाजी महाराजांना झालेली अटक या घटनेत मोठ्या प्रमाणात अगदी संभाजी महाराजांच्या निकटच्या वर्तुळात फितुरी झाली असावी. कारण अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत त्याकाळीही आजच्याप्रमाणे काही प्रोटोकाँल असायचे व ते पाळले जायचे हे नक्की. जसेकी ज्यावेळी छत्रपती हे कोकणच्या भागात असायचे त्यावेळी पश्चिम तटावरून छत्रपतींच्या कोकणातील प्रवासादरम्यान आरमाराच्या लढाऊ गलबतांचा एक सुसज्ज असा बेडा पश्चिम तटावरून छत्रपतींना समांतर प्रवास करत असे हे ध्यानात घ्यावे. आता ज्यावेळी मुकर्रब खान अगदी संगमेश्वरच्या वेशीपर्यंत येईस्तोवर काही कारणांनी संभाजी महाराजांना खबर मिळाली नसली तरी तो आल्यावर तातडीने काही निर्णय घेण्याइतपत वेळ हा नक्की होता. त्यानुसार संताजी व खंडोबल्लाळ व इतर काही महत्वाचे लोक यांनी मोठ्या सैन्यतुकडी सह मुकर्रब खानाच्या वेढ्याला खिंडार पाडुन सरळ न थांबता रायगडाकडे दौड करावी व महाराज वेढ्यातुन निसटुन गेले असा भास निर्माण करायचा ही योजना व खान पाठलागावर निघाला की योग्य वेळी गणपतीपुळे परीसरात उतरून अरमाराच्या मदतीने सागरी किल्ल्याच्या आश्रयाला जायचे हा बेत. पण फितुरी ईतक्या आतपर्यंत झाली होती की संताजी आणि मंडळी भल्या भरधाव वेगाने संगमेश्वर बाहेर पडले व त्यांचा पुरता पाटलाग सुध्दा खानाने सुरू केला नव्हता तरच अर्ध्या घटकेपेक्षा कमी वेळात खानाला ही भुलथाप असल्याची विश्वसनीय खबर मिळाली. आणि पाठलागाच्या तयारीत असलेला खान संताजीच्या मागे गेलेले किरकोळ सैन्य तसेच जाऊ देवुन स्वत: संगमेश्वरात घुसला आणि महाराजांच्या निवासस्थानी उरलेल्या 500 कमीजास्त सैनिकांचा प्रतिकार मोडुन काढत महाराजांना कैद केली. तसेच संगमेश्वर मक्कामी काहीतरी चकमक झाली ही बातमी रायगडापर्यंत पोहचायला किमान दोन किंवा तीन दिवस लागलेच असतील. पण एक गोष्ट शक्य वाटते ती ही की मुकर्रब खान हा महाराज हे अटकेत नसुन वीरगतीस प्राप्त झाले किंवा पळुन जाण्यात यशस्वी झाले अशी काहीतरी बातमी पसरवण्यात यशस्वी झाला असला पाहीजे कारण अटकेच्या दिवसापासुन आठवड्यातच राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आलेले दिसते. कारण पुढे बहाद्दुर गढावर गेल्यावर संभाजीला खरोखरच अटक केलीए हे दाखवण्यासाठी संभाजीराजांची धींड काढण्यात आली होती.हे लक्षात घ्यावे लागेल. तसेच मुकर्रब खान याने राजकैदीघेवुन साधारण आठवडाभराचा प्रवास मराठ्यांच्या भुमीवरून कमीसैन्यासोबत केला होता तो महाराजांच्या अटकेची बातमी किमान आठवडाभर गुप्त ठेवण्यात यशस्वी झाला असला पाहीजे कारण ज्या राजाच्या हत्येनंतर पुरता मुलुख पेटुन ऊठतो त्या राज्याला कैद करून आपल्या जवळुन हे सैन्य घेवून जातय या बातमीने केवळ सैन्यच नाही तर जनतेनेही .मुकर्रब खान आणि त्याच्या सैन्याला जीवंत जाऊच दिले नसते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की फितुरांनी मोठी भुमिका पार पाडल्याचे दिसते, कारण संगमेश्वर येथे नेमके काय घडले हे कळण्यास मार्ग नव्हता महाराज पकडले गेले, मारले गेले, की पश्चिम तटावर ऊतरून पळुन जाण्यात य़शस्वी झालेत हे कळण्यास साधारण आठ दिवस लागल्याचे दिसते व त्यातही महाराज वीरगतीला प्राप्त झाले अशा प्रकारची बातमी बहुदा रायगडावर पोहचली असली पाहीजे कारण अतितातडीने त्याच दिवशी राजाराम राजेंचे मंचकारोहण महाराणी येसुबाई यांनी करवलेले दिसते.
    अंदाज तर अनेक बांधता येतील पण घटना ऐकल्यावर मला जे वाटले ते.
    चुकभुल क्षमा.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...