Tuesday, January 29, 2013

"तत्वचर्चा"


"मी भुतकालातील सर्व महनियांबद्दल आदर बाळगतो, पण कोणाही एकाचा असा प्रभाव माझ्यावर नाही. मी सर्वांतील चांगले पहात माझे म्हणून जे आहे तेच विकसित करण्यासाठी मी अखंड प्रयत्नरत असतो. मला यशाची अपेक्षा नाही म्हणुन अपयशाचीही पर्वा नाही. माझा कोणी गुरु नाही कि माझा कोणी शिष्य नाही. कोणी मला प्रिय नाही कि कोणी माझा शत्रू नाही.

"कोणाचाही जयजयकार करणा-या झुंडीत मी सामील होवू शकत नाही कि कोणी सरसकट ज्याचा तिरस्कार करतो त्याचा तिरस्कारही मी करत नाही. मनुष्य हा मुळात अध:पतनशील प्राणी असून जेही त्या अध:पतनातुन उत्थान करण्याचा यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करत असतात त्या सा-यांबाबत मला अतीव प्रेमादर आहे.

"छोट्या माणसांच्या सह-अस्तित्वाखेरीज मोठी माणसे कदापि घडू शकत नाहीत यावर माझा विश्वास आहे. मी छोट्या माणसांना सलाम करतो कारण मोठी म्हणवली गेलेली सर्वच माणसे ही या सर्वच छोट्या माणसांच्या जीवनस्वप्नांचा एकत्रीत प्रकट उद्गार असतो असे मी मानतो. मोठी माणसे जग घडवत नाहीत तर शेवटी छोटीच माणसेच जग घडवत असतात. छोट्या माणसांच्या अस्तित्वाखेरीज मोठ्यांचे मोठेपण अस्तित्वात येवूच शकत नाही.

"मी अनिवार जिज्ञासेने अविरत झपाटलेलो असतो. मला अनंत प्रश्न पडत असतात आणि मी प्रश्नांशी अडखळुन थांबत नाही तर माझ्या परीने प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मला जाणीव आहे कि मला सापडलेली उत्तरे अंतिम नाहीत कारण आजवर कोणालाही अंतिम असे उत्तर सापडलेले नाही.

"मला अज्ञाताचा आणि चिरंतनाचा सोस आहे म्हणून मी वास्तवातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करत नाही किंवा ते दुर्लक्षणीय आहेत वा निरर्थक आहेत असेही मानत नाही. अज्ञाताचा मार्ग हा वास्तवातुनच जात असतो असे मी मानतो आणि वास्तव स्वच्छ केल्याखेरीज अज्ञाताचा मार्गही सोपा होत नाही हेही जाणतो.

"इतरांबद्दलची द्वेषभावना हीच सर्व सामाजिक समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे जीवनस्पर्धा निकोप न होता स्पर्धेचा अर्थच निरर्थक बनतो आणि कोणाच्याही प्रगतीची वा यशाची संभावनाच नष्ट होत जाते असे मी मानतो.

"स्वत:ला अथवा स्वत:च्या समाजाला मोठा मानल्याने कोणीही मोठा ठरत नसतो तर मोठेपण हे इतरांच्या मान्यतांवरच अंतत: अवलंबुन असते. मोठ्या माणसाचे पहिले लक्षण हे कि तो स्वत:ला कधीही मोठा मानत नाही."



(माझ्या "तत्वचर्चा" या संवादात्मक पुस्तकातून.)

7 comments:

  1. बाप्पा -आप्पा आप्पा ,पहिलं बसून घ्या बर -२०१४ ला काय विशेष ?
    आप्पा - निवडणुका असणार तुमच्या - ते जाऊ दे -अहो काय सांगू सगळी पाठ धरल्ये. बसलो तरी त्रास - उभा राह्यलो तरी त्रास !- २०१४ कुणी पाहिलंय !
    बाप्पा - अहो ,आप्पा - सांगतोय ते फारच गंभीर !तुम्ही ब्लोग वाचत नाही का संजयचा हल्ली ,रेकॉर्ड २० वेळा मी मला माझा असे ब्रीथलेस लेखन झाले आहे.
    जमेल का तुम्हाला ? सरळ मोजतच गेलो - आपल्याला काय उद्योग आहे.कुठे कान्हे मोजत बसायचे तर कुणाच्या वेलांट्या शोधत बसायचे.
    मराठीचा मास्तर म्हटल्यावर सवयच लागलेली -ह्रस्व नि दीर्घची -हेच आपले करीयर गेले ४० वर्ष - अजून बोलावणी येतात प्रूफ रीडिंग साठी .
    आतलं मर्म समजावून घ्यायचं का आपल वय राहिलंय ?
    आपल मर्म एकच - रोज खडू घासत नी फळे पुसत एक तारीख गाठायची.

    बाप्पा - मी माझ्या - - - महामानव मानतो ! म ची बाराखडीच लावल्ये संजयने .पण लिहिलंय मात्र ओघवत बर का !
    आप्पा - म्हणजे आपल्या काळात - काकाच्या काकूने काकाचे कोरे कागद कोऱ्या कात्रीने कराकरा कापले- तसच ना ?
    बाप्पा - हेच तर तुमच चुकत ! त्याला काहीतरी अर्थ आहे का ? ते आपल बडबड वाक्य झाल.
    आप्पा - मग मी सांगतो ते वाक्य ! - म चच ना ? ते बघा कस वाटतंय
    " महाजनो येन गतः स पंथः "
    आमच्या संजयने नुसत्या एका म मध्ये सगळ जगाच सत्य सांगितलाय - बोला आता.
    बाप्पा - ते आमच्या वेळेच वाक्य आहे .उत्तम मार्ग कोणता / तर महाजन म्हणजे थोर लोक किंवा अनेक लोक ज्या मार्गाने जातात तो रस्ता योग्य !असा डबल अर्

    अप्पा - पण प्रथमपुरुषी एकवचनी आहे का ?अहो मग ते तसेच असणार.
    ,मन्वंतर,मर्त्य,मतमतांतर,मौलिक,मैत्र ,महाअनुभूती ,मौखिक,मूलतः अशी चवडच लावत गेला असेल !
    बाप्पा - तुम्ही पुस्तीचे मास्तर होता सुरवातीच्या काळात त्याचा अजून परिणाम आहे हो तुमच्यावर !
    संजय पुस्तिका लिहितोय ,त्यातला उतारा दिलाय त्याने ! तो काय करतो नि काय करत नाही त्याची लिस्टच आहे बघा आप्पा.
    म्हणजे कुणाला चिंता नको वाटायला कि हा दिवसभर करतो काय.
    तुम्ही कधी तुमच्या शेजाऱ्याला किंवा सासऱ्याला सांगितलय अस ? याने सगळ्याना एकजात जाहीर करून टाकलय !

    आप्पा - मग मस्तच की हो .
    बाप्पा - तोच तर फुटाणा झालाय .
    आप्पा - का बरे ? अस कस - तो हाडाचा तत्व चिंतन करणारा आहे बर का ! फुटाणा कसा होईल.
    बर एक सांगा - ब्लोग वर हल्ली जाहिराती असतात का ? कारण सकाळी वर्तमानपत्र वाचताना हल्ली हा घोळ ठरलेला आहे.
    जाहिरात आणि बातमी एकाच मख्खपणे शेजारी शेजारी चिकटून दिसतात एकमेकाला- फ्रंट पेजला - ती वाचताना एकत्र वाचली जाते.बाप्पा - नि मग सगलाय गोंधळ !
    थंडीत ओठाना अमुक क्रीम लावा - - असे सुषमा स्वराज म्हणाल्या -- जाहिरात आणि बातमी -असा भास होतो.
    बाप्पा - संजयच्या ब्लोग वर जाहिराती - अशक्य ! जाज्वल्य नि परखड लिखाण असते !बाकी कशाला थाराच नाही .
    आप्पा - अहो मी वाचतोय ते काय आहे ? या ब्लोग वर मी मी किती झालय ?
    याला तत्व चर्चा म्हणायचं का मीपणा - सांगा आता बाप्पा तुम्हीच !
    बाप्पा - भगवत गीतेत सुद्धा संजय बोलतो तेंव्हा संजय उवाच अस म्हटलं आहे.त्यात मीपणा आहे का ?
    स्वतः श्रीकृष्ण पण इतकेवेळा बोलला नाहीये कि मी असा आहे नि मी तसा आहे .
    आप्पा - अहो बाप्पा , उभे राहून राहून पाय दुखायला लागले माझे.
    आणि असेच तुमचे पुराण चालणार असेल तर यापुढे हाक मारत जाऊ नका मला .
    बाप्पा - इतका राग बरा नाही.आपल वय बघा आप्पा .२०१४ जवळ आले - तुमचे मत महत्वाचे आहे.!
    आप्पा - बास का ! म्हणजे हरदासाची कथा मूळ पदावर आलीच !

    ReplyDelete
    Replies
    1. "मी" आप्पा आणि बाप्पांचे "माझ्या" वतीने त्यांच्या खेळकर विनोदबुद्धीचे अभिनंदन करतो.....
      -"मी"

      Delete
  2. मान गये उस्ताद !

    ReplyDelete
  3. आपल्या ब्लोगवर ज्या चर्चा आप्पा बाप्पा च्या नावाने चालतात त्यामुळे
    पूर्वीच्या दैनिक सकाळ मधील आप्पा बाप्पा या सदराची आठवण होते.
    सामाजिक जाणिवांचे भान ठेवून गुंफलेले हे लिखाण आपल्याला जसे आनंद देते तसेच आत्तापर्यंत तरी त्यांनी सर्वांचे मनोरंजनच केले आहे.
    अजून अनेक जण असेच सहभागी झाले तरी आनंदच आहे.
    शेवटी ब्लोग वर काय ठेवायचे हा हक्क ब्लोग च्या मालकाचा असतोच !
    धन्यवाद !

    ReplyDelete
  4. जय भवानी , जय शिवाजी !
    शेवटी पसार झाला ,
    पाय लावून पळाला
    घाबरला !
    आता आपण त्याचे टेन्शन घ्यायला नको.
    अनानिमास ने पलायन केले.
    पुढच्या १२ पिढ्या तो कुणाला त्रास्देणार नाही !

    त्याच्या आईनेच त्याला थोबाडले असणार !
    जय शिवाजी ! जय भवानी !

    ReplyDelete
  5. संजय सर ,
    आपण मांडलेले पुढील मत हे अतिशय महत्वाचे आहे.
    इतिहासातील थोर लोकांच्या थोरपणाबद्दल थोडेसे लिहावेसे वाटते - या संदर्भाने !
    ते असे -

    सर आपले बहुमोल मत आपण द्यावे ही नम्र विनंती !
    ते मला मार्गदर्शक ठरेल !

    आपण लिहिता - " छोट्या माणसांच्या सह अस्तित्वाखेरीज मोठी माणसे - - "
    कोणताही लढा असो , नवनिर्मिती असो , शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती असो,म.गांधींची चळवळ असो-
    कधी नवीन शिल्प असो, नाट्यलेखन असो ,त्यात छोट्या माणसानी सर्वस्व झोकून दिलेले असते,

    आपले जीवन ओवाळून टाकलेले असते.मोठ्ठ्यांचे स्वप्न ते आपले स्वप्न असे म्हणत
    आपल्या खाजगी आशा आकांक्षा या त्या थोर लोकांच्या महत्वाकांक्षांशी एकरूप केलेल्या असतात ! त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक आयुष्यात
    त्यामुळे जरी खडतर प्रसंग आले तरी त्यांना त्याची फिकीर नसते !

    एक त्रयस्थ म्हणून बघताना मला असे अनेक जण स्वात्र्यन्त्तोत्तर काळात पुस्तकरूपाने भेटले की ज्यांचा भ्रम निरास झाला होता - झाला आहे !.
    त्यांच्या वयाचा एक मुख्य कर्तृत्वाचा भाग त्यांनी या थोर लोकांसाठी खर्च केलेला होता, आणि आता ?- भ्रमनिरास !
    हा भ्रम निरास स्वार्थ साधता आला नाही म्हणून आहे का ? तर - नाही ! तसे नसून यांचे दुःख वेगळेच आहे.
    या नेत्यांच्या स्वात्र्यन्त्तोत्तर काळातील पुढील वागण्याने हे छोटे छोटे लढवय्ये अंतःकरणात आतल्या आत पराभूत झाले.
    याच नेत्यांच्या वागण्यातील फरक या छोट्या कार्य कर्त्यांना असे सुचवू लागला की खरे काय ?
    नेता तोच ! पण - शब्द बदलू लागले ! वाक्य रचना अवघड होत गेली .शाब्दिक कसरत सुरु झाली ! वागण्या बोलण्यात ताळमेळ उरला नाही !]तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या , केवळ राजकारण नव्हे !
    आर .के .स्टुडियो,शांताराम , या संस्था म्हणून लोक मानत असत !.
    कोणतेही उत्सव घ्या - आपला गणपती उत्सव घ्या ! पूर्वी मेले होत असत ! आत्ताचे रूप आपणास कुठे घेऊन चालले आहे ?
    राष्ट्र सेवा दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (तात्विक मतभेद बाजूला ठेवत )-स्काउट,होमगार्ड,-
    आम्ही स्वतः स्वच्छ रस्ते अभियान मध्ये भाग घेतलेला मला या ठिकाणी आठवतो.
    कष्टाची कमाई करून चीन युद्धात दिवाळीत मदत फंड निर्माण केलेला आठवतोय !
    आता देखाव्याचे युग आले.
    सांगायचा मुद्दा असा आहे की -
    छ.शिवाजी महाराजांच्या बालपणातील सवंगडी आणि नंतरचे सहभागी ,आणि त्या नंतरचे राजकारण यात हा मुद्दा पण महत्वाचा ठरतो का ?
    शेलारमामा, तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर ,असे अनेक जण ज्या निष्ठेने लढले त्याना बाकीचे राजकारण कुठे समजत होते ? पण त्यांच्या घरातील समस्या आणि घडणारे राजकारण याचा नंतर मेळ बसला नसेल तर ते दुःख त्यांनी कसे पचवले असेल ?
    देशप्रेम,गद्दारी ,देशाभिमान आणि फंद फितुरीचे दुष्टचक्र - हा ताण त्यांनी कसा सहन केला असेल.'
    अनेक उभी राहिलेली साम्राज्ये - मग ते रोमन असो,चंद्रगुप्ताचे असो वा अशोकाचे ,
    मुघल असो वा विजय् नगरचे - मराठ्यांचे असो वा म्हैसूर चे !
    अनेक संस्था आणि त्यांचा उदय आणि अंत हा या दृष्टीने तपासण्या सारखा आहे !.

    ReplyDelete
  6. संजय जी ,
    आपली चर्चा आवडली आणि त्यावर कृत्तिका म्याडम यांचे विचार नोंद घेण्याइतपत वाटले.
    आपण वैयक्तिक आयुष्यात पुष्कळ वेळेला काही ठरवतो- काही योजना सुरु करतो !- उदा- १ जानेवारीपासून सकाळी लवकर उठून फिरायला जाणे ,
    किंवा रोज डायरी लिहिणे - पण अशा गोष्टी संपूर्ण "स्व" ने - आत्मारामाने कंट्रोल केलेल्या असतात !
    आणि त्या आत्मारामासाठीच असतात !
    याच गोष्टींचा सामाजिक स्तरावर उपयोग ओळखून ज्या वेळेस कुणी त्याला " चळवळ " या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू पाहातो त्यावेळेस त्यास अनेक गोष्टींची खातरजमा करावी लागते -
    आपण करत असलेल्या सूचनाना धार्मिक रंग नाहीना ?. उदा.सकाळी फिरण्या ऐवजी कुणी प्रामाणिकपणे सूर्य मानास्कार घाला असे सुचवले की लगेच भुवया वाकड्या होण्याची शक्यता असते !-
    ओम सूर्याय नमः म्हणण्यात दुसरा रंग जाणवू लागतो आजकाल ! पूर्वी असे नसे होत ! कालाय तस्मै नमः !
    म.गांधीनासुद्धा त्यांच्या भजनांच्या प्रेमामुळे टीकेचे शरसंधान सहन करावे लागले ! अशा वेळी प्रश्न पडतो की एखादा माणूस आणि त्याची महत्ता आणि तो मांडत असलेल्या विचारांचे
    पोस्ट मार्टेम करण्याचा अधिकार कोणाला आहे ?आणि तो अधिकार त्याने कमावलेला आहे का तो त्यावर लादला गेला आहे का तो स्वघोषित आहे ?

    आजकालचा काळ हा जात आणि धर्म यांचा सतत कोणत्या न कोणत्या रुपात पुरस्कार करण्याचा आहे असे एक गढूळ मत सर्वांचेच झाले आहे !
    त्याला सुरवात कुणी केली हा संशोधनाचा विषय आहे .आर .एस एस का कोन्ग्रेस ?
    गांधीजींचे उपवास हे तंत्र ब्या .जीनाना अजिबात पसंत नव्हते .दुसरे अनेक कोन्ग्रेस नेतेसुद्धा अशा कल्पनांना छुपा विरोध करत असत !.
    पण म.गांधीजींच्या उत्तुंग व्यक्तीमत्वापुढे आणि हट्टी पणामुळे तो विरोध क्षीण होत असे.
    आज प्रत्येक जातीने आणि समाजाने तेच तंत्र अवलंबले आहे - त्यामुळे बुद्ध,हनुमान,शंकर,छ.शिवाजी महाराज,म.फुले,डॉ .आंबेडकर,परशुराम असे ब्रान्ड तयार झाले आहेत
    आणि ते फक्त मुख्यत्वे तेव्हढ्याच जातीच्या विचार पुरस्काराचे काम करतात असा समज झाला आहे - तो फार घातक आहे.
    त्यामुळे हे सर्व थोर लोकनेते त्यांच्या महत्तेपेक्षा खाली ओढले जातात.
    हे आपण थोडेसे समजून घायला पाहिजे !
    जरा कुणी एखादा शब्द जरी चर्चेच्या ओघात निसरडा वापरला तरी हे संभाजी ब्रिगेड किंवा कोकणस्थ ब्राह्मण किंवा बुद्धप्रेमी लगेच त्या लेखकाच्या जिवावर उठल्यासारखे अंगावर येतात !
    सध्या आपल्या ब्लोग वर काही जणांनी एकदम जो विधीनिषेधशून्य आरडा ओरडा चालवला आहे तो अत्यंत आक्षेपार्ह आहे असे वाटते .त्यात स्त्रियाही तितक्याच अभिनिवेशाने सहभागी झाल्या आहेत हे जास्त धोकादायक आहे ! दुःखदायक आहे !
    धन्यवाद !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...