Saturday, May 17, 2014

निवडणूक आणि मी ...आपण!

अर्थशास्त्रातील एक मुलभूत सिद्धांत असा आहे कि आपल्या गरजा नेमक्या काय आहेत हे कधीच ठरवता येत नाही, त्यामुळे गरजा निर्माण करुन त्यांची आवश्यकता पटवून द्यावी लागते.

मतदारही असाच एक ग्राहक असतो. खरे तर संकल्पनात्मक दृष्ट्या तो जरी मतदाता असला तरी संभाव्य अपेक्षेतील शासकीय संकल्पनांचा नकलत ग्राहक बनत असतो. त्याला नेमके काय हवे आहे हे त्यालाच माहित नसते. त्यासाठी गरज निर्माण करून ती आपणच पुर्ण करू शकतो याचा विश्वास दिला कि मतदार बरोबर त्याच गरजेला शरण जातो.

हे एक मानसशास्त्रीय युद्ध असते. ते मानसशास्त्रीय संकल्पनांवरच खेळले जाते...कधी जाणतेपणे तर कधी अजाणतेपणे. हे युद्ध कधी मोठे असते तर कधी छोटे...पण ते युद्धच असते हे खरे. आणि युद्धात असतात तसे येथेही मतदारांचे आणि मते घेऊ इच्छिना-यांचे अनेक भावनिक पक्ष असतात. हे पक्ष खरे तर या युद्धात ग्राहकच असतात, तरीही यातला सर्वात दुर्बल घटक म्हणजे भावनिक होणारा मतदार हाच मतांच्या बाजारपेठेत हरवून गेलेला ग्राहक असतो. तो कोणाची तरी हिरीरीने तळी उचलत राहतो. तेथे विचार, भवितव्यातील परिणाम याबाबत तात्विक विचार असतोच असे नाही. लाटेवर स्वार होणे किंवा लाटेला विरोध करणे एवढेच काय तो आपल्या दुबळेपणात करू शकतो.

पण हा बाजार आहे याचे भान मात्र सुटलेले असते. मते घेणा-यांना त्याची ब-यापैकी जाणीव असते, पण मतदात्यांना त्याची जाणीव असतेच असे नाही.

आतापर्यंत भारतातील अनेक निवडनूका कधी कृत्रीम तर कधी अनपेक्षित घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या लाटांवरच झालेल्या आहेत. कधी लाटांना विरोध करणारे प्रबळ ठरल्याने लाटा अयशस्वीही ठरलेल्या आहेत तर कधी त्या अत्युच्च यशाचे शिखर गाठणा-याही ठरलेल्या आहेत.

आताची लाट ही विशेष आहे. या लाटेला जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या आशा-आकांक्षांचे जेवढे संदर्भ आहेत तेवढेच धार्मिक संदर्भही आहेत. भौतिक विकासाच्या अपेक्षांच्या ओझ्याबरोबरच जातीय/धर्मीय आकांक्षांचे प्रतिबिंब या निवडणूकीत पडल्याचे दिसते. ते आधी नसे असे नाही, पण यावेळेस दोहोंचेही अगदी आकर्षक प्यकेज बनले आणि ते मतदात्यांना एक भावनिक लाट क्रमश: उत्पन्न करत विकलेही गेले. विक्रयकलेचा, सामाजिक मानसशास्त्राला कालसुसंगत ओळखत त्याचा अत्यंत शिस्तबद्ध वापर केला जाण्याचा हा अभूतपुर्व नमुना आहे याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

यातून खरेच काय घडेल हे आज तरी सांगता येणार नाही. पण धर्मप्रधानता येणार याबाबत शंका राहू नये अशी कृती आजच घडलेली आहे. मी हिंदू आहे त्यामुळे मला त्याचे दु:ख असायचे कारण नाही, पण देशाचा कारभार हिंदू पद्धतीत छुप्या अजेंड्यावर चालणार याची खंत नक्कीच आहे.

खरे तर हे लिहिण्याचे कारण नव्हते. पण आज अनेक मित्रांनी फोन करुन, पोक करुन, अथवा मला उद्देशून पोस्टस व प्रतिक्रियाही लिहिल्यामुळे माझी मते मांडणे भाग पडले. मी रा. स्व. संघाच्या विचारधारेचा विरोधक असल्यामुळे त्या विचारधारेचा मी नेहमीच विरोध केलाय आणि करत राहील. रा. स्व. संघाची वैदिक विचारधारा मला कधीही मान्य होणे शक्य नाही.

येथे माझ्या कोणाही मित्रांनी वाचलेय कि नाही माहित नाही, पण माझी "गुडबाय प्राईममिनिस्टर" नांवाची एक कादंबरी होती. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कालाच्या सरत्या वर्षात ती
सटायर मी लिहिली होती. त्यात मी गांधी यांची प्रचंड खिल्ली उडवली होती. कादंबरी प्रसिद्ध झाली, कोंग्रेसवाल्यांनी माझ्यावर प्रचंड टीका केली...मी टीकेची पर्वा करण्याचे कारण नव्हते. पण दुर्दैवाने त्यांची श्री पेरंबुदूर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिषण हत्या झाली. कोणी मेल्यानंतर त्यावर टीका करू नये. तोवर कादंबरीच्या तीन-साडेतिनशे प्रती बाजारात संपलेल्या होत्या. मी उर्वरित सर्व प्रती मागवून घेतल्या....त्या पुन्हा कधीच बाजारात गेल्या नाहीत.

त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींबद्दलही अशीच सटायर लिहायचे मनात आले होते. पण "गुडबाय..." बाजारात आल्यानंतर राजीवजींची हत्या झाली...पुन्हा असला प्रयोग नको म्हणून मी हस्तलिखित अर्धवट सोडून दिले. ही माझी अंधश्रद्धा असेल...पण मी तसा वागलो हे मात्र खरे.

साहित्यकाराची भुमिका वेगळी असते. चिंतकाची भुमिका वेगळी असते. जोवर आपण मतदार असतो तेंव्हा आपली भुमिका वेगळी असते. मतदान ज्या क्षणी संपते त्याक्षणी आपण बाजारु युद्धातून बाहेर पडलेलो असतो आणि सर्वांचे कल्याण व्हावे असे सरकार यावे एवढीच भावना मनात असते. पण आम्ही मतदाराच्या भुमिकेतून बाहेर पडतच नाही. त्याच उन्मादाला कवटाळून बसतो. खरे तर प्रत्येक निवडणूक ही मतदाराची परिक्षा असते आणि त्यालाही आपापल्या पातळीवर विकासाचेच कार्य करत रहावे लागते हे विसरत असतो. शासनच कल्याण करू शकते, आमची काहीच जबाबदारी नाही, या दुर्बळ भावनेतून भारतीय बाहेर कधी पडतील ते पडोत.

असो. ज्या सर्वांनी माझ्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा केली होती त्यांना हे उत्तर आहे.

13 comments:

  1. You forgot to mention many things such as voter didn't have any better choice.
    People who were in power lost touch with public. Current government if makes pro Hinduism agenda too much then they will rightly critisised. Yes, complete elation by common people is wrong which is there today.

    ReplyDelete
  2. Very very nice article! Thanks!

    ReplyDelete
  3. रा. स्व. संघ., विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इ. संघटना भारतीय जनता पक्षाच्या अगदी जवळच्या संघटना आहेत. परधर्म द्वेष, चातुर्वर्नाचे समर्थन ह्या संगठना करीत असतात. मुस्लिम द्वेष आणि ख्रिश्चन द्वेष हा यांच्या सैनिकांमद्द्ये ठासून भरलेला असतो. मोदींना सुद्धा रा. स्व. संघाचे प्रमुख संघ प्रचारक मानले जाते. हिंदुत्वाच्या नावाखाली परधर्मीय भरडले जाणार नाहीत याची हमी मोदींना द्यावी लागेल. भारतीय जाती-धर्मातील सलोखा राखण्याची जिम्मेदारी आता मोदींवर येवून पडली आहे. यावर कठोर अनुशासन व्हावयास हवे, अन्यथा भारतीय जनता खूप हुशार आहे, ती जशी एखाद्या पक्षाला डोक्यावर घेवून नाचते तशीच ती सरकारने चुकीचे निर्णय घेतल्यास डोक्यावरून जमिनीवर आपटायला कमी करीत नाही. अशी परिस्थिती मोदी कशी हाताळणार आहेत यावरच पुढचे भवितव्य अवलंबून असेल. विकासाच्या नावाने लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे, हे त्यांनी कदापि विसरता कामा नये. शेवटी "उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये" हीच अपेक्षा!

    विवेक पाठक, औरंगाबाद

    ReplyDelete
  4. प्रिय संजयजी
    मुझे लगता है कि देश का यह पहला चुनाव था जिसमें कोई जातीय और धार्मिक लहर नहीं थी. लोग कांग्रेस से पूरी तरह निराश थे और तथाकथित सेकुलर दलों के पास उनके प्रश्नों के उत्तर नहीं थे. यह चुनाव पूरी तरह से लोगों की आशा आकांक्षाओं पर हुआ मतदान है जिसमे देश का सबसे काबिल नेता चुना गया है. देश बदल गया है किन्तु हमारे चश्मे अभी भी पुराने है. जिस दिन वे चश्मे हम बदल लेंगे, यह सच्चाई हमको भी दिख जायेगी.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  5. संजय सोनवणी सर,

    रा. स्व. संघाचे वर्चस्व सतत मोदींवर राहणार आहे, असे आजच्या घडीला वाटते आहे आणि हेच कृत्य यांचा विनाश करील अशी ही संभावना दिसते आहे. मोदींनी संघापासून चार हात दूर राहणेच सोयीस्कर ठरेल, वाजपेयी संघाचा हस्तक्षेप टाळत असत. संघाची ढवळाढवळ भारतीय जनता पक्षाला महागात पडण्याचीच जास्त शक्यता वाटते आहे. राममंदिर जन्मभूमी वाद, हिंदुत्व, मुस्लिमद्वेष या सारख्या भोंगळ प्रश्नांना बगल देणेच भारताच्या हिताचे ठरेल अशी आशा वाटते.

    प्रदीप सहस्त्रबुद्धे

    ReplyDelete
  6. उपरोक्त चिंतने जरी योग्य वाटत असली तरी रा.स्व.संघ किंवा त्यासोबतच्यासंघ्ज्ञटना हया जरी आथौडॉक्स / तयांचे हितसंबध ज्यात संरक्षण , व्यवसाय / नाईजास्तव तसे राजकीय धोरण स्वीकारणाऱ्या वाटत असल्या तरी सुधारणा मग त्या आर्थिक , सामाजिक, तंत्रज्ञानात्मक, वैज्ञानिक असोत त्याबाबत त्यातली नवी आग्रही पिढी ही सुधारणांबरोबरच आहे. नवेपण जपण्याबरोबरच आहे. प्रस्थापि त राजवटीविरुध्द बंडखोरच जास्त वाटतात. फार भावूक आहेत. राजकीय/ आर्थिक धोरणात हितसंबध राज्यांचे संबध कार्यक्षता होणारा विकास यांचे सतत ते पुनर्विलोकनच करतील यांत शंका नाही. परंतू वारंवार कित्येक वर्षे एकाच सत्तेला आणखी किती दिवस द्यायचे, हितसंबंधाचा छुपा अजेंडा काय मागच्या राजवटीकडे नव्हता काय, पण नवीन सरकारवरही काम करुन दाखवण्याचे प्रचंड दडपण आहे. एवढा मोठा देश प्रचंड काम आहे.तरी या निमित्ताने महाराष्ट्राला काही रेल्वे किंवा इतर काही विषयासंदर्भात काही नव्या धोरणाचा आग्रह धरणे इन्प्फ्रास्टक्च्रर मजबुतीची प्रगतीची अतिशय सुसंधी वाटते. भारत विषयकही विकासाचे नवीन धोरण किंवा ही महत्वाची पावले उचलली जाण्याची शक्यता वाटते. केवळ पाच वर्षाच्या तुलनेत किती अवजड वाटते. आहे ृ एखादा सी.ए/ आय.एृ.एस .व्हायला चार पाच वर्ष लावतो. हा तर प्रचंड महाकाय देश आहे. परंतू या मंडळींना आपण शुभेच्छा दिल्याच पाहिजे. अभय,वांद्रे , मुंबई

    ReplyDelete
  7. आप्पा - काय हो बाप्पा ? इतके गुलालाने माखलेले कसे काय ?
    बाप्पा - काय सांगू आप्पा तुला !वैताग आलाय ! जिकडे तिकडे एकाच आवाज !टीव्ही ;लावला तरी तोच चेहरा ,पेपर उघडला तरी तेच , आणि रस्त्यावर पाहिले तरी तेच !
    आप्पा - म्हणजे चराचरात म्हणायचय का तुला ? भगवन्तासारख !
    बाप्पा - जळी स्थळी काष्ठी पाषाणी !ही नजरबंदी आहे !मला एक सांग , लोक इतके वैतागलेले की गाढवं जरी उभी केली असती भाजपने तरी त्यांच्या गळ्यात यशाची माळ टाकली असती लोकांनी इतकी परिस्थिती बिकट !त्या निलेकणी ने "आधार आधार " करत मस्त धंदा केला आणि सर्वांची फजिती केली आणि गेला काँग्रेस मध्ये आणि लोकांनी आपटवला ! ती प्रिया दत्त , संजयचे किती कौतुक ! लोकाना सहन झाले नाही !भारताविरुद्ध बंदुका वापरणाऱ्या लोकांशी याचे संबंध ! लोक कसे सहन करणार ?
    आप्पा - पण म्हणजे हा राग त्या काँग्रेस वर आहे तर ?त्यात संघ किंवा
    मोदींचे काहीच क्रेडीट नाही?
    बाप्पा - तसे नाही , लोकांनी ३ वेळा निवडून दिलेला , दंगली दाबून टाकून विकासाची कास धरणारा नेता हा प्रचार लोकाना आवडला ! एक सांगतो तुला , हे सेक्युलर प्रकरण काही नवीन पिढीच्या गळी उतरत नाही हे सत्य आहे ,आज तरुण पिढी देशांतर करते , फिरून येते , तिकडचा नीट नेटकेपणा बघते ,आणि त्या तरुण लोकाना वाटते की आपल्याकडेच इतका ढिसाळपणा का ?इतके लाड का ?मुसलमान सगळीकडे आहेत , इंग्लंड अमेरिकेत आहेत ,चीन रशियात आहेत तिथे कुणी त्यांचे भरमसाठ आपल्या सारखे लाड करत नाहीत !म गांधी भगतसिंग याना प्यारे असलेले वन्दे मातरम म्हनायलासुद्धा लाज वाटावी ?
    आप्पा - म्हणजे या सेक्युलर पणाची लक्तरे निघाली थोडक्यात !
    बाप्पा - खरे सांगू का ! फाळणी झाली , वाटणी झाली , तुमचे तुम्हाला दिले आणि आतातरी आमच्याकडे तुम्ही शांततेने रहा इतके म्हनायचासुद्धा आपल्याला हक्क नाही हे तरुण पिढीला सहन होत नाहीये !हा संदेश कोन्ग्रेसला समाजालाच नाही !
    आप्पा - म्हणजे तुला मोदी पटला असेच ना ?
    बाप्पा - मी तसे म्हणतच नाही , पण हिंदू असून हिंदुत्व न मानणाऱ्या असंख्य लोकांनी मोदीची लाट निर्माण केली हे मान्यच केले पाहिजे - त्यांना हिंदू अजेंडा नको आहे आणि सेक्युलर तर त्याहून नको आहे !आणि आता एक नवी लाट सुरु होईल प्रसार माध्यमांची - ती म्हणजे , मोदी संघाच्या हातातले खेळणे आहेत !पण एक गोष्ट आपण विसरतो ! आपण स्थिर असतो आणि राजकारणात बजबजपुरी दूर होते त्यावेळेस लगेच अमेरिके सारखी राष्ट्रे मोदीना सुद्धा जवळ करतात ,त्याना आमच्या लोकशाहीच्या निरोगीपणाचा साक्षात्कार होतो !
    आप्पा - आज पर्यंत मोदी आणि मंडळीना शिव्या घालणारे परदेशी त्यांचे गोडवे गावू लागतात !
    बाप्पा - आजपर्यंत एकेक आठवले की ,लालू नितीश मुलायम यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करत किती घाण केली ?यांची राजनीती धड समाजवादी नाही , एकीकडे कोन्ग्रेस विरोध आणि एकीकडे पोकळ समाजवाद याच्या तिढ्यात ते जे अडकले ते शेवटी आझम खान सारख्या लोकांबरोबर वहावत गेले !
    आप्पा - त्याच त्याच बाता मारत काँग्रेसने इतकी वर्षे लायसन राज केले आणि
    प्रचंड भ्रष्टाचार केला - सगळे जग नानावि क्षितिजे शोधत आपल्या उंबरठ्यावर येत व्यापारीकारानाची नवी संधी शोधत आहे आणि कोन्ग्रेस आपल्याच लोकाना हजार प्रकारे छळत दाबून टाकत आहे !
    बाप्पा - सिब्बल चिदम्बरम मनमोहन असोत किंवा सोनिया राहुल प्रियांका असोत , दिखावू प्रगतीमुळे लोक फासत नाहीत , त्यातच मुस्लिम समाजाच्याकडे त्यांच्या मुल्ला मौलाविंकडे जाउन सेक्युलर पानाची चर्चा लोकांच्या जिव्हारी लागली !

    ReplyDelete
  8. "लोकांना म्हणजेच प्रजेला आपण काही देत असतो त्याची त्यांना किंमत नसते , त्याना मागू द्या , झगडू द्या , म्हणजे त्याना किंमत कळेल ! " हा सत्तेतील बहुतेकांचा होरा असतो !
    कुणालाही आयते दिले की त्याची किंमत नसते - हा सर्वदूर सर्वमान्य असा सत्तेचा सिद्धांत आहे -
    त्यात सरंजामशाहीची सावली दिसते हेपण खरे आहे !समाजकारण आणि समाज सुधारणा करण्याचे राजकारण हे सत्र आहे असे मानले तर वरील सिद्धांतात अर्थ नक्कीच आहे !
    भारतात लोकसंख्येची अडचण सर्व समस्या अजूनच भडक करते , त्यातच बाहेरून येणारा घुसखोरांचा लोंढा समस्या तीव्र करतो -धार्मिक दुही अजूनच क्लेश वाढवते !तुम्ही कोण , आम्ही कोण हा प्रश्न धर्म जाती आणि प्रांत या स्तरावर अजूनच परिस्थिती गंभीर करतो
    जातींची उतरती मांडणी आणि उच्च नीचतेच्या प्रस्थापित कल्पना आणि रोजचे जीवन यामुळे आधुनिक भारतात देखील अजूनही सर्वात खालची जात देखील कुणातरी पेक्षा आपल्याला
    श्रेष्ठ मानत असते , ही श्रेष्ठत्वाची ओढ कर्तृत्वाशी संलग्न नसून जन्माशी जोडली आहे , आणि अगदी खालच्या जातीनाहि आज जाती पंचायत मान्य आहे ,
    त्याना त्यात सुरक्षितता दिसते हे दुर्दैव !
    जिथे ब्राह्मण पुरोहित वर्गाचा शिराकावही नाही आणि ब्राह्मण संस्कारांचा प्रभावही नाही अशा नैतिकतेच्या आणि स्वघोषित उच्च नीचतेच्या रुढीमध्ये हिंदू समाज स्वजातीयांकडूनच भरडला जात आहे !प्रत्येक जात ही आपले अस्तित्व येनकेन प्रकारेन नाइलाज म्हणून नव्हे तर अभिमानाने टिकवू पहाते !अगदी ढोर न्हावी महारापासून ते माळी मराठा ब्राह्मणापर्यंत ही गोष्ट लागू आहे .
    इतर धर्मही या जातिभेदाला टाळू शकत नाहीत ,शीख , ख्रिश्चन ,मुसलमान सर्व आपापल्या पूर्वाश्रमीच्या जाती राखून हम सब एक है ही घोषणा ओरडत असतात - यासारखा दुसरा दांभिकपणा कुठेही नसेल , सर्व नैतिकता कोळून प्यायलेल्या अमेरिकेत आणि युरोपातही असाच दांभिकपणा आहे आणि आमच्या धर्मात व्याज घेण्यास बंदी आहे असे मिरवणाऱ्या मुस्लिम देशात पण हा दांभिकपणा ठासून भरला आहे !

    ReplyDelete
  9. 'संविधानाच्या चौकटीत' संविधानविरोधी कारभार?

    मी गेली चाळीस वर्षे रा. स्व. संघाच्या एकूणच विचारसरणीचा व कार्याचा अभ्यासक आहे. संघाची काही वैशिष्टय़े आहेत. १) उद्दिष्टपूर्तीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करणे, २) शत्रू-हितशत्रूंना अनुल्लेखाने मारणे, ३) आपले उद्दिष्ट प्रत्यक्ष प्रदर्शित न करता विविध उपशाखा (विहिंप, बजरंग दल, हिंदू सेना इ.)द्वारे प्रगट करणे, ४) अप्रत्यक्ष दहशत निर्माण करणे, ५) तथाकथित शिस्तीच्या व संस्काराच्या नावाखाली संघविषयक अज्ञानी बहुजनांमध्ये स्वत:विषयी आकर्षण निर्माण करणे, ५) सुप्तपणे वर्णश्रेष्ठत्व जपणे.
    नरेंद्र मोदी हे प्रथमत: रा. स्व. संघाचे कट्टर समर्थक व प्रचारक आहेत. भाजप हा स्वतंत्र राजकीय विचारांचा पक्ष नसून रा. स्व. संघाची राजकीय शाखा आहे. म्हणजेच रा. स्व. संघ हा भाजपचा रिमोट कंट्रोल आहे. नरेंद्र मोदी यांची मुलाखत (लोकसत्ता, २३ एप्रिल) वाचल्यानंतर संघविषयक अज्ञान असलेला वाचक सकृद्दर्शनी प्रभावित होईल. अटलबिहारी वाजपेयींसारखाच राज्य कारभार करू, असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यांनी हेही सांगावयास हवे होते की, वाजयेपी यांनी गुजरात दंगलीच्या काळात नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळा म्हणून सुनावले होते. मात्र, नरेंद्र मोदी आजही राजधर्मानुसार गुजरात दंगलीची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास राजी नाहीत. ते मुलाखतीतही म्हणाले व पूर्वीही म्हणाले होते की, सत्तेत आल्यास भारतीय संविधानाच्या मर्यादेतच राजकारभार करू. भारतीय संविधान कोणी बदलवू शकत नाही, हे नरेंद्र मोदी जाणत नसतील, असे म्हणणे धाडसाचे होईल. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनीच भारतीय संविधानाविषयी अखेरच्या भाषणात जे सांगितले, ते लक्षात घेतले तर संविधानांतर्गत संविधानविरोधी कारभार करता येतोच कसा? contd....

    ReplyDelete
  10. ते पाहण्यापूर्वी डॉ. आंबेडकर संविधानाच्या पहिल्या काही वर्षांतील वाटचालीविषयी काय म्हणतात, ते थोडक्यात पाहू. 'आपल्या संविधानाबद्दल पुष्कळसे लोक अतिउत्साही दिसतात. खरोखरच या गोष्टीची मला भीती वाटते, परंतु मी तसा नाही. ज्याला संविधान नष्ट करून त्याचा नवीन मसुदा तयार करावासा वाटतो अशा लोकांमध्ये सामील होण्याची माझी खरोखरच तयारी आहे, परंतु आपण हे विसरतो की, आपले संविधान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वैध तरतुदींचा तो केवळ सांगाडा आहे. या सांगाडय़ाचे मांस आपण ज्याला संवैधानिक नैतिकता म्हणतो त्यामध्ये आढळते.' (२२ डिसेंबर १९५२, पुणे) संविधान ही दुधारी तलवार आहे, याची डॉ. आंबेडकरांना पूर्ण कल्पना होती. गेल्या ६२ वर्षांच्या काळात भारतीय संविधानाच्या सांगाडय़ास हात न लावता मांस बदलविण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या सत्ताकाळात 'संविधान समीक्षा समिती' नियुक्त करण्यात आली होती, हे विसरता येत नाही. तथापि, स्पष्ट बहुमत नसल्याने तो मनसुबा पूर्ण होऊ शकला नाही. भारतीय संविधानातील ३४० व ३४१ या आरक्षणविषयक व अन्य आरक्षणविषयक तरतुदींना रा. स्व. संघाचा नेहमीच विरोध राहिलेला आहे आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले आरक्षणविरोधी आंदोलन अ. भा. विद्यार्थी परिषदेत अहमदाबादेत पहिल्यांदा केले होते. मंडल आयोगाच्या (ओबीसी आरक्षण कलम ३००) शिफारशींविरोधात दिल्लीत अ. भा. विद्यार्थी परिषदेत आंदोलन केले होते, तर मंडलचा प्रभाव नष्ट करण्यासाठीच अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती.
    विशेष आíथक क्षेत्रासारखे (सेझ) शेती-शेतकरी-आदिवासी-बहुजन-विरोधी कायदे लोकसभेमध्ये मंजूर झाले. तेही संविधान कायम ठेवून, परंतु याच संविधानातील समताधिष्ठित तरतुदींची ऐशीतैशी करून भारतीय संविधानातील स्टेट सोश्ॉलिझमच्या तरतुदीवर आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. उलट, त्याविरोधात जाऊनच अनेक कायदे करण्यात आले. स्टेट सोश्ॉलिझमच्या तरतुदीवर अंमलबजावणी केली असती तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली नसती. उलट, शेतकरीही अंबानी-अदानींइतके सुखी होऊ शकले असते.
    उपरोक्त विवेचन लक्षात घेतले तर आणि मोदी ज्या रा. स्व. संघाचे कडवे समर्थक आहेत त्या संघाची संविधानविरोधी विचारसरणी लक्षात घेतली, तर मोदी संविधानांतर्गत राहूनही संघाच्या उद्दिष्टांना पूर्ण करू शकतील! प्रचारकाळात सत्तास्वार्थपूर्तीसाठी कोणती विधाने मोदींनी केली, हे महत्त्वाचे नसून भविष्यात स्पष्ट बहुमत घेऊन नेमका कसा कारभार करतील, हे येणारा काळच जाणो. रा. स्व. संघाचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिखित 'दी बंच ऑफ थॉट्स' या ग्रंथातील विचार नरेंद्र मोदींना मंजूर नसतील तरच काही चांगल्या अपेक्षा करता येतील, अन्यथा भारताचे भवितव्य कठीण असेल.

    - प्रा. जैमिनी कडू, नागपूर

    ReplyDelete
  11. रा. स्व. संघ आणि विध्वंस!

    एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.

    □ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.

    □ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.

    □ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार.

    □ रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.

    □ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.

    □ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    □ समाजामध्ये जातीय तणाव निर्माण करण्यात ते आघाडीवर असतात, ते कधी शिवरायांच्या तर कधी बाबासाहेबांच्या पुतळ्यांना चपलाचे हार स्वयंसेवकांकरवी घालत असतात.

    □ ब्राह्मणांच्या हितापलीकडे यांना काहीही दिसत नाही, जातीव्यवस्था टिकून राहावी म्हणून कधी आदिवाशींमध्ये जाऊन तर कधी समरसता मंच सारख्या संघटना तयार करून जातीयवादाला खतपाणी घालीत असतात.

    □ "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" असा प्रचार करून संघीय विष समाजामध्ये भिणविण्याचा अविरत प्रयत्न करीत असतात.

    □ धर्मनिरपेक्ष राज्यघटना मोडीत काढून त्याजागी त्यांना विषमतावादी मनुस्मृतीचे राज्य देशामध्ये आणावयाचे आहे, म्हणूनच राज्यघटना समीक्षेचा आग्रह ते नेहमी धरत असतात.

    □ "एक खोटी गोष्ट शंभर वेळा जर ऐकविली तर ती खरी वाटू लागते" या तंत्राचा वापर करून समाजात बहुजन नेत्यांसंबंधी धडधडीत खोटे विचार पसरवित असतात.

    □ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

    प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

    ReplyDelete
  12. अशी अनेक पत्रे येणार हे आता उघड आहे , कारण काँग्रेस च्या राज्यात पद्धतशीर प्रचार करण्यात कोणीही कोणतीही कसर सोडली नाही आणि वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर हा प्रभाव पाडण्यात काँग्रेस यशस्वी ठरले ,पण -
    भाजप आणि मित्र पक्षात निवडून आलेले सरमिसळ असलेले लोक आणि त्यांची जात पाहिली तर काय दिसते ?सर्व जातीचे उमेदवार आहेत !आज इतक्या प्रचंड बहुमताने भाजप आला आहे त्यालापण काहीतरी अर्थ आहेच ना ? ही अपेक्षा भाजपला सुद्धा नव्हती - म्हणजेच समाजाला या तुमच्या सारख्या बडबडीचा राग आणि कंटाळा आला आहे ! हे उघड आहे ! फक्त ब्राह्मण आणि सवर्णाना मोदी ना आणि भाजपला निवडून आणणे शक्यच नव्हते ,पण ते जिंकून आले हे सत्य आहे
    मग आत्म परीक्षण करताना काय दिसते ? आपण आज पर्यंत फसत होतो का मोदी नी आपल्यालाफसवले - समजुतीचा घोटाळा नेमका काय आहे ?
    मोदी हे मुस्लिमाना काबूत ठेवून आहेत , हे अभ्यास करण्या सारखे आहे !नितीश ,मुलायम आणि लालू या तथाकथित समाजवादी लोकांनी मुस्लिमांच्या पाठ्राखानीचे राजकारण केले , आणि
    आझम खान आणि अबू आझमी सारखे नेते जन्माला आले ,
    काँग्रेस ने शाही इमाम यांच्या बरोबर सेक्युलर मतांची चर्चा केली हे विधान किती धादांत
    खोटे वाटते ? पण हीच गोष्ट संघ परीवाराबाबत बोलताना अनेक प्रमोद शिंत्रे असाच ओरडा करत राहणार आणि प्रा कडू तीच तीच झिजलेली रेकोर्ड वाजवत राहणार
    त्याना हे समजत नाही , आता तरुण वर्ग सर्व भेद विसरून भाजप च्या मागे उभा आहे म्हणून तर मोदी पंतप्रधान झाले , सर्व दिव्ये पार करत , अगदी खाजगी टीका सहन करत , त्यांनी सर्व पक्षाना चारही मुंड्या चीत केले , सर्व पक्ष का हरले याचे रहस्य काय आहे ? अचानक संघ परिवाराची सर्वाना मते पटली ? , आणि संघाची धोरणे आवडली असे नाही ! आज मोदी यांची तीन टर्म ची कारकीर्द , चौहान यांची कामगिरी , अमित पटेल यांचे संघटना कौशल्य - यांनी बाजी मारली !
    आपली लोकशाही इतकी परिपक्व असेल असे खुद्द जनतेलाही माहित नव्हते , मोदी भाषणे करत विचार मांडत गेले आणि सर्वाना ते आवडले ! युपी बिहारचे पानिपत होत लालू आणि मुलायम यांची जिरली हे केव्हढे परिवर्तन आहे !
    समाजवादी लोकांनी भारताचे सर्वात जास्त नुकसान केले आहे आणि काँग्रेस ने त्याना सांभाळून घेत , परमीट राज करून देशाचे अनन्वित नुकसान केले आहे !
    मुक्त अर्थ व्यवस्था वगैरे नुसते बोलणे आणि एकीकडे परमीत राज यामुळे अर्थ व्यवस्था दारुण पातळीला गेली !आता वारे बदलतील !

    ReplyDelete
  13. स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

    स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.........
    'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे. या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे-वाईट केले? तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’ जो धर्म जाती-जातींत विभागाला गेला आहे तो धर्म चांगला कसा असेल? ज्या धर्मात कुणाला तरी सेवाकर्म करायला लावून शुद्र ठरविले जात असेल तो धर्म गर्व मिरविनार्यांचा आधारस्तंभ कर्मवादाचा सिद्धांत कसा होऊ शकतो? त्या धर्मात कुठले माणूसपण आहे? या धर्मात जातिभेदाला ग्रंथित केले आहे. त्याचा कुठला आलाय गर्व? माझ्या समस्त कथित 'गर्व' वाल्या तरुण हिंदू मित्रांनो, बघा बरं सापडतात का या प्रश्नांची उत्तरे! या प्रश्नांची उत्तरे तुम्ही ठाऊक असूनही दिली नाहीत तर म्हणू का वेताळासारखे- तुमच्याच डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायाशी लोळण घेतील? तेंव्हा म्हणाल का,'गर्व से कहो हम हिंदू है?

    विकास विवेक पाठक (सिडको-औरंगाबाद)

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...