Tuesday, August 25, 2015

मानव संस्कृतीचे अपराधी....आयसिस!




आयसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला आहे तो समस्त मानवजातीला काळीमा फासणारा आहे यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल.

त्याहीपेक्षा आयसिसने पुरातन मानवी सांस्कृतिक ठेव्यांना नष्ट करण्याचा जो चंग बांधला आहे तो आजच्या सर्व मानवी जातीला हादरवुन सोडणारा आहे. खरे तर हा भाग पुरातन काळापासून (इसपू ५०००) सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध. मेसोपोटेमियन, असिरियन, ब्यबिलोनियन,सुमेरियन अशा अनेक महान संस्कृत्या येथे उदयाला आल्या. या संस्कृत्या तत्कालीन ज्ञात जगाशी व्यापारी वत्यामुळेच सांस्कृतिक नाळ जोडून होत्या. सिंधू संस्कृतीशीही त्यांचा व्यापार चाले. भारतिय व्यापा-यांनी तेथे वसाहतीही वसवल्या होत्या. भारतियांना ते लोक "मेलुहा" देशाचे म्हणत. या विविध काळात जन्माला आलेल्या संस्कृत्या अत्यंत सहिष्णू होत्या. त्याच भुमीत अत्यंत असहिष्णू, विध्वंसक  व हिंसक  तांडव गेली अनेक दशके उफाळलेले असावे आणि आयसिसने या पुरातन सांस्कृतिक ठेव्यांना नष्ट करायचा चंग बांधावा ही अत्यंत शरमेची बाब  आहे.

ताजी घटना अशी कि आयसिसने सिरियातील पामिरा येथील पुरातन बल शामिन हे मंदिर तहस नहस करून टाकले. जागतिक वारसा म्हणून या मंदिराला युनेस्कोने घोषित केले होते. मुळात हे मंदिर अवशेषरुप उरले असले तरी त्या अवशेषांतुनही त्याची भव्यता व कलात्मकता उर दडपवत होती. पामिरा हे  नगर अठराव्या शतकात प्रवाशांनी शोधले होते. दुस-या महायुद्धनंतर याचे शिस्तबद्ध उत्खनन करत वाळवंटाखली जवळपास गाडले गेलेले हे नगर नव्या सुर्यप्रकाशात आणले गेले होते. हे नगर आणि तेथील भव्य मंदिर आता स्मृतिशेष झाले आहे.

मार्च १५ मध्ये खोस्राबाद येथील राजा सार्गो याने वसवलेले सनपुर्व ७२१ मधील नगर उध्वस्त केले. हे नगर इराकमधील. येथे अनेक राजवाडे होते. एके काळी ही असिरियाचे राजधानी होती. या नगराला भरभक्कम तटबंदी होती. हेही नगर लुटारुपणे उध्वस्त केले गेले आहे.  बगदादपासून १८० मैलांवर  असलेले हत्रा हे एक असेच पुरातन अवशेषग्रस्त नगर. हे एके काळी व्यापाराचे मोठे केंद्र होते. तेही आयसिसने नष्ट केले. या नगरातील राजप्रासाद अत्यंण्त भव्य व कलात्मक वास्तुरचनेने शोभित. पण आता हेही स्मृतिशेष.

Khorsabad

याहीपेक्षा मानवी संस्कृतिच्या इतिहासातील अनमोल ठेव्यांचा विध्वंस निमरुद येथे केला गेला. टायग्रिस नदीच्या काठी वसलेले हे शहर असिरियन साम्राज्याची दुसरी राजधानी होती. सनपुर्व नवव्या शतकात राजा असूर नसिरपालाच्या कारकिर्दीत हे नगर अत्यंत भरभराटीला आले होते. ब्रिटिश पुरातत्वविदांनी टॆकाडाखाली गाडले गेलेले हे नगर विसाव्या शतकाच्या आरंभी शोधले. प्रसिद्ध लेखिका अगाथा ख्रिस्तीही या उत्खनन मोहिमेच्या वेळेस प्रत्यक्ष हजर होत्या. येथे हस्तीदंतापासून बनवलेल्या हजारो कलात्मक प्रतिमा ववस्तू मिळाल्या. येथील मुर्त्या तर अत्यंत प्रमाणबद्ध  नेत्रदिपक अशा होत्या. मार्च २०१५ मध्येच आयसिसने अक्षरश: बुलडोझर फिरवुन हे नगर, त्यातील प्रतिमा नष्ट करुन मानवतेच्या उरावर गंभीर घाव घातला.



यानंतर मोसुल येथील पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन ठेवेही नष्ट केले गेले. तेल शेख हमाद, मारी, दुरा युरोपा, सालाहदिनचा किल्ला ई. जवळपास अन्य दहा पुरातन ठेव्यांना असेच नष्ट करण्यात आले. थोडक्यात आयसिसने पुरातन इतिहासाचे अनमोल ठेवे नष्ट करत संपुर्ण मानवी संस्कृतीशी अक्षम्य असा द्रोह केला आहे. बामियानच्या बुद्धप्रतिमा तोफगोळ्यांनी उध्वस्त करुन टाकणा-या तालिबान आणि आयसिसमद्धे काहीएक फरक नाही.

जगात युध्ये होत असतात. राजकीय व धार्मिक वर्चस्वाचे रक्ज्तरंजित संघर्ष जगाला नवे नाहीत. संस्कृतीला अवरुद्ध करणारे हे विनाशक प्रवाह असतात. मुर्त्यांचे आयसिसला वावडॆ आहे. या मुर्त्या शिल्लक राहिल्या तर मुर्तीपुजकांचा धर्म पुन्हा डोके वर काढू शकतो हा त्यांचा वेडपट तर्क आहे. जगात असंख्य धर्म आले आणि गेले. टिकले ते त्या लोकांनी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेले वास्तु व प्रतिमांचे जग. असिरियनांचा, मेसोपोटेमियनांचा धर्म जगातुन कधीच संपला. धर्म मानवनिर्मित असलेली एक काल्पनिक श्रद्धा-संकल्पना आहे. कालौघात त्यात बदल होणे अपरिहार्य असते. पण कोणा धर्मग्रंथात कोणत्यातरी एका काळात अमुक लिहिले म्हणून आम्ही आजही त्याचे शब्दश: पालन करु असे म्हणत मानवाच्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या अनमोल ठेव्यांना नष्ट करू म्हणत उन्मादी हिंसेने-विध्वंसकतेने तशी कृती करणारे माणूस म्हणायच्या योग्यतेचे कसे असतील?

आयसिस या पुरातन ठेव्यांना नष्ट करत असतांना काही बहुमोल वस्तुंची तस्करी करुन आपल्या दहशतवादी कारवायांसाठी धन मिळवते असाही आरोप आयसिसवर आहे. त्यात तथ्य नसेल असे नाही. पण असे सांस्कृतिक ठेवे विकणे आयाबहिणी विकण्यासारखे लाजीरवाने आहे हे आयसिसला कळायचा मार्ग नाही. किंबहुना  जगातील सर्वच्विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांना मानवी व्यवहारांतुन दुर करणे गरजेचे बनून जाते ते यामुळेच!

सद्दाम हुसेनवर  रासायनिक अस्त्रे आहेत असा आरोप करत त्याच्यावर युद्ध लादत, खुनशी फाशी देणारे अमेरिकन व युरोपियन जग या सांस्कृतिक वारशाच्या विनाशाबाबत गप्प आहे. आयसिसच्या नंगानाचाला मात्र उत्तर देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघही भुमिकाहीन आहे असेच सध्याचे चित्र आहे. यामुळे आयसिसला मदत पुरवणारे नेमके कोण आहेत हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तेलाच्या झपाट्याने उतरत असलेल्या किंमती व त्यामुळे निर्माण होत असलेला  आर्थिक दहशतवादही आपल्याला समजावून घ्यावा लागेल. काट्याने काटा काढायचा असा डाव जर अमेरिकी-युरोपिय जग खेळत असेल तर जसे तालिबान अमेरिकेवर उलटले तसेच एक दिवस आयसिसही यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही हे त्यांना समजावून घ्यावे लागेल.

दरम्यान जे अलौकिक सांस्कृतिक ठेवे आयसिसने नष्ट केले ते मानवी जगाला आहे त्या स्वरुपात पाहण्यास उपलब्ध नाहीत. पहायचे ते चित्रांतुन. आयसिस व तिचे पडद्याआडचे समर्थक मानवघाती म्हणुनच भविष्यात ओळखले जातील हे मात्र निश्चित!

9 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Dangerous! ISIS is a worlds richest terrorist group.

    ReplyDelete
  3. इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना '' आपल्या '' इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं.
    आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे.
    इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना जीव वाचला तर परागंदा व्हावं लागतं. ती माणसं शेजारच्या देशात पोचतात.
    अशा रीतीनं अनेक लोक जॉर्डनमधे पोचले. ते मुसलमान होते. त्याना चर्चमधे आश्रय मिळाला. तिथंच ते सध्या रहात आहेत. ही माणसं पुन्हा इराकमधे परतणं शक्य नाही. त्यांची घरं, किडुकमिडूक, जगण्याची साधनं इत्यादी सारं नष्ट झालंय. जॉर्डनमधेच ती वाढतील. कशीबशी जगत रहातील.
    यातले काही लोक ख्रिस्ती होत आहेत.

    ReplyDelete
  4. मी भारतीय यांनी दिलेली माहिती चित्त थरारक आहे . त्याचा परिपाक मुस्लिम लोक ख्रिश्चन होण्यात होत असेल तर ते आणखीनच गंभीर ठरते
    आज रशिया आणि चीन इथे शांतता आहे , तिथेही मुस्लिम समाजाची टक्केवारी नोंद घेण्या इतकी आहे , तिथेही इसीस ने पाय रोवले तर ?अमेरिका त्याना शस्त्र पुरवठा तत्पर असेलच !
    नेटवर यांची माहिती भयानक आहे . इसीस हि अल कायदा ची पुढची आवृत्ती म्हणता येईल . पण धड तसेही म्हणता येत नाही .
    पाकिस्तान याचा कसा फायदा घेतो तेही बघण्यासारखे ठरेल
    जगाची फेर रचना करायचा विचार बडी राष्ट्रे करत आहेत आणि त्यात अशा संघटनांचा अमेरिका कसा वापर करून घेते ते काळच ठरवेल
    महान ज्योतिषी अविनाश पाटसकर या विषयावर प्रकाश टाकतील हे नक्की .

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार आदरणीय आडनाव भगिनी, ज्योतिष्य म्हणजे भविष्य असा गैरसमज आपण करून घेतला आहे, तिरक्या किवा कुचक्या पायावर बांधलेल्या इमारतीचे भविष्य काय हे कोणीही बिगारी सांगू शकतो. म्हणून ज्योतिष्य म्हणजे पायाचा अभ्यास करणे हे आहे. शिवाय असा पाया असल्यास तो दुरुस्त सुद्धा करता येतो. त्यात मी महान वगैरे काही नाही हेही तुम्ही वाचलेच असेल.

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. अविनाश काका , आपण निराश होऊ नका , जगात हे असे चालणारच . अनेक लोक त्यांचा संयम संपला की असे वागतात , पण ती वेळ आपण का आणावी , आपणही जर सकस अभ्यासपूर्ण लिहित गेलो तर ? अनेकांनी मी भारतीय आणि लिहा वाचा आणि अगदी आप्पा बाप्पा यांचेसुद्धा कौतुक केले आहे . संजय सरानीही कधीकधी यांचे काही निमित्ताने कौतुक केले आहे .
    आपणच जर रटाळ बोलू लागलो तर सभेतून लोक उठून जातात , लिहिण्याच्या बाबतीत लोक बटबटीत प्रतिक्रिया देतात . आपण समजूतदार आहात आणि सिनियर आहात . आपला जन्म आनंद आणि ज्ञान वाटण्यासाठी आहे , लोकांनी शिव्या दिल्या तर आपण सुविचारांनी त्यांचे तोंड बंद करावे अशी आपल्या पाटसची रीतभात आहे . आपला भीमा साखर कारखाना काय सांगतो ?आता अनेक शिक्षण संस्था आपल्याकडे येत आहेत ,आपण पुण्याच्या लोकाना सुसंस्कृत संदेश देऊ या !
    काका ! माझे चीमुरडीचे हे बोबडे बोल आपणास दुखवणार नाहीत असे वाटते .

    ReplyDelete
  7. आयसिस ने आपल्या नावातील 'इराक अँडी सिरिया' हे काढून टाकले आहे. त्यांच्या इस्लामिक स्टेट मध्ये पूर्ण जगच आहे. त्यात भारत आलाच. पाक व अफगानी तालिबान यांना एकत्र येण्याचे आवाहन आय एस ने केले आहे. आय एस कधीही पाकिस्तानात पाय रोवू शकतो. म्हणजे हा धोका भारता साठी पण आहे.
    आशियावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी त्यांनी भारत व पाकिस्तानवर हल्ले करण्याची योजना आखली आहे. त्यातून अमेरिकेला इशारा द्यायचा आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...