Thursday, November 3, 2016

संघाचे स्वप्न काय? हिंदू राष्ट्र की वैदिक राष्ट्र?


हिंदू राष्ट्र हा स्थापनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख उद्देश्य व कळीचा मुद्दा राहिलेला आहे. हिंदुत्व, हिंदुत्ववाद, हिंदू राष्ट्रवाद, हिंदुंच्या तथाकथित गौरवशाली इतिहासाबद्दल वारंवार बोलणे, लिहिणे हा संघी विद्वानांचा आजतागायत नित्यक्रम राहिलेला आहे. पुर्वी जनसंघ व आता भारतीय जनता पक्ष आपले अंतिम उद्दिष्ट साकार करण्यासाठी स्थापन केलेले राजकीय हत्यार आहे. आज प्रचंड बहुमताने याच पक्षाचे सरकार आहे. राज्यसभेत अद्यापी पुरेसे बहुमत नसल्याने त्यांना आपला अजेंडा सर्वस्वी राबवता येत नसला तरी त्या अजेंड्याचे सुतोवाच सत्तेत आल्याआल्या स्मृती इराणी, सुषमा स्वराज इत्यादिंनी केलेच होते. हे सुतोवाच होते वैदिक विज्ञान, गणित, संस्कृत भाषा इत्यादिंचा अभ्यासक्रमात समावेश करणे. ही पहिली पायरी होती. त्याला विरोध झाल्याने हा अजेंडा पिछाडीवर गेला. पंतप्रधान मोदींनी प्राचीन काळी भारतात प्लास्टिक सर्जरी कशी प्रगत अवस्थेत होती याचे गौरवगान करून आपण संघाच्या पठडीतून पंतप्रधान होऊनही कसे सुटलेलो नाहीत हे सिद्ध करत जगात हसू करून घेतले. त्याहीपेक्षा मोठे हसू झाले ते वैदिक विमान प्रकरणात. गोहत्याबंदीही आली. अखलाख व नंतर काही मुस्लिमांना गोमांस खाल्ल्याच्या नुसत्या संशयाने ठार मारले गेले तर अलीकडेच गुजरात व आंध्रमद्धे गोहत्या केल्याच्या संशयाने दलितांना अमानुष मारहाण केली गेली. शंकराचार्य ते साधू-साध्व्या, महंत इत्यादि अधूनमधून हिंदुंना चिथावणीखोर भाषणे देत हिंडतात. यावरून सध्याच्या सरकारची वाट कोणत्या दिशेने सुरु आहे याची कल्पना येईल.

संघाचे स्वप्न साकार होईल कि नाही यावर चर्चा करण्यापुर्वी संघाचे हिंदुत्व म्हणजे काय हे खोलात जाऊन पहायला हवे. सर्वसामान्य हिंदू "हिंदू" या शब्दाने हुरळून अनेकदा धर्मरक्षणाच्या नांवाखाली संघाच्या छावणीखाली नकळत जातात. त्यांना वाटते संघाचे पवित्र कार्य हे हिंदुंच्या भल्यासाठी व मुस्लिमांच्या व अन्य धर्मियांच्या विरोधात आहे. मुस्लिमांपासून आपण आपला धर्म वाचवायला हवा या काल्पनिक भयगंडाने ते झपाटलेले असतात. साथीला संघीय कपोलकल्पित इतिहासही असतोच. एकंदरीत ते ब्रेनवाश्ड होऊन जातात आणि स्वतंत्र विचार करायची बुद्धी जागेवर रहात नाही. त्यासाठी प्रथम संघाचा आणि हिंदू धर्माचा काय संबंध याच प्रश्नाचा निकाल लावला पाहिजे. संघ आणि हिंदू यांचा मुळात संबंधच काय हा प्रश्न विचारला तर अनेकांच्या भिवया विस्फारू शकतात.

संघाने आजवर हिंदू धर्माची मुळातच व्याख्या केलेली नाही. का असे कोणी विचारलेलेही नाही. हिंदुस्तानात जन्माला आलेले जेही धर्म आहेत त्याचे अनुयायी म्हणजे हिंदू असा एक भ्रम ते तयार करतात. त्यासाठी घटनाही वेठीला धरतात. "हिंदू ही एक जीवनपद्धत आहे" अशी सर्वोच्च न्यायालयाने केलेली तशी अत्यंत भोंगळ असलेली व्याख्याही कधी कधी सोयीसाठी ते मान्य करतात. कारण जीवनपद्धत म्हटले कि त्याचा धर्माशी काहीएक संबंध रहात नाही. पण सोयीच्या वेळीस हिंदू हा त्यांच्या दृष्टीने धर्मच असतो. खरे म्हणजे हिंदू धर्माची व्याख्या होत नाही असे नसून ती जर करायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न अंगलट येऊन आपले पितळ उघडे पडेल अशी भिती त्यांना वाटते व या त्यांच्या भितीचा अनुभव मी गेला अनेक काळ घेत आहे. त्याबाबत पुढे. पण हिंदू धर्माची व्याख्या का होत नाही? प्रत्येक धर्माची स्वत:ची अशी परंपरा असते, मान्य कर्मकांडे असतात व त्यावरून त्याची व्याख्या व्हायला हरकत नाही. तरीही काही व्याख्या करायचे प्रयत्नच केले गेले नाहीत असेही नाही. त्या व्याख्या आपण जरा नजरेखालून घालुयात व त्यातीलही भोंगळपणाही समजावून घेऊयात.

खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय (व व्यक्तीही) अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण हा कायदा केवळ दत्तक, वारसा, विवाह, घटस्फोट आदि बाबतींपुरता मर्यादित आहे. त्यामुळे हा कायदाधर्माची व्याख्या होऊ शकत नाही.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पितृभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.
ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. ही व्याख्या राष्ट्रवादाला डोळ्यासमोर ठेवत बनवलेली आहे. ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम
अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या व्याख्येवर आक्षेप घेतात तो असा: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" ते पं. दिनदयाळ उपाध्यायांचे "एकात्म मानव दर्शन" यातील लेख हे संघाचे मुख्य तत्वज्ञान आहे. हे समग्र वाचले असता, जरी त्यात हिंदू धर्माची व्याख्या केली नसली तरी हिंदू धर्म म्हणजे त्यांना काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होते. वेद हे त्यांच्या दृष्टीने हिंदू धर्म/संस्कृतीचे मुलस्त्रोत आहेत. त्यांच्या मते चातुर्वर्ण्य व जातिव्यवस्था या शास्त्रशुद्ध असून प्रत्येक वर्णाने व जातीने आपापले काम चोख केले तरच समाजाचा गाडा सुरळीत चालू राहील. आधुनिक कालातील व्यवसायाधिष्ठित समाजविभागणीपेक्षा जातीव्यवस्था जास्त शास्त्रीय आहे. वैदिक संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. वेदांमद्ध्ये सर्व ज्ञान आहे. वेदाधार हाच हिंदूंचा मुलाधार आहे. ऋग्वेदातील वचनांप्रमाणे सारे एकजीव, एक विचाराचे होऊन गौरवशाली जीवन जगायला हवे. संघाची "समरसता" किंबहुना याच वचनावर आधारित आहे.

संघवादी विद्वान, कथित संशोधक आर्य हे भारतातीलच असून येथुन ते जगभर पसरले अशी मांडणी करण्यात व्यस्त असतात. अलीकडे श्रीकांत तलागेरी व कल्याणरमण यात आघाडीवर आहेत. यांची मांडणी अशी कि वैदिक आर्य हे भारतातीलच. त्यांनी सिंधू संस्कृतीची स्थापना केली. वेदकाळ हा सिंधुपुर्व असून वैदिक आर्य भारतातून युरोपपर्यंत पसरले व आर्यभाषांचा प्रसार केला. घग्गर नदी म्हणजेच ऋग्वैदिक सरस्वती असून तिच्याच काठावर वेद रचले गेले म्हणून सिंधू संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती म्हणायला हवे. यासाठी त्यांनी अनेक कोलांटउड्या घेतल्या आहेत. थोडक्यात भारतात भाषेसहित जेही काही पुरातन आहे, समृद्ध वारशाचे अंग आहे, ते वैदिकांनी निर्माण केले आहे. सबब भारतीय संस्कृती ही वैदिकांची देणगी आहे. पण या मतांचा सविस्तर उहापोह येथे घेत न बसता वरील बाबींवरून काय लक्षात येते, ते पाहुयात.

टिळकांनी त्यांच्या व्याख्येत वेद व वेदमान्यता घेतल्याने काय समस्या निर्माण होतात हे दा. न. शिखरेंनी दाखवून दिलेलेच आहे. इतरांच्या बव्हंशी व्याख्यांत वसंघीय समजुतींत वेदांतील चातुर्वर्ण्य त्यांना मान्य आहे. वेदांत सर्व ज्ञान-विज्ञान असून वेद हेच हिंदू धर्माचा मुलाधार आहेत असेही त्यांचेच मत आहे. हे जर खरे मानले तर ८०% हिंदू हिंदुच ठरत नाहीत याचे कारण म्हणजे त्यांना मुळात वेदांचा धार्मिक अधिकारच नाही. एवढेच काय वेदोक्त संस्कारही वैदिक तत्वज्ञान नाकारते. वेदोक्त प्रकरणावरुन शाहू महाराजांना केवढा संघर्ष करावा लागला हे आपल्याला माहितच आहे. जर सारे एकाच धर्माचे तर धर्मग्रंथांचे व धार्मिक संस्कारांचे अधिकार सर्वांना सारखे असले पाहिजेत वसर्व वैदिक देवता सर्वांना प्रिय राहून अन्य वेदपुर्व देवता विसर्जित व्हायला हव्या होत्या असे कोणीही म्हणेल. पण तशी स्थिती नाही.

म्हणजेच एक तर ८०% लोक हिंदू नाहीत किंवा ते उर्वरित २०% लोक तरी हिंदू नाहीत. काहीतरी एक असले पाहिजे. बरे, हिंदू नांव विदेशी आक्रमकांनी दिले असे तेच म्हणत असतात. संघाला तर विदेशी आक्रमकांचा (म्हणजे मुस्लिमांचा) प्रचंड तिटकारा असुनही हिंदू हे नाव ते "अभिमानाने" कसे घेतात? ते कसे चालते? त्याला नेमके काय कारण आहे?

येथे जरा सावरकरांची जरा मदत घेऊ. ते म्हणतात "बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. तर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. -  (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९)

या विधानात सावरकर शब्दच्छल करीत जैन, बौद्ध, शीख या धर्मांनाही हिंदुच संबोधत आहेत ही बाब गैर व अनैतिहासिक असली तरी ती येथेच सोडून देवू. या विधानातील सनातन किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म ही धर्मनांवे विचारात घेऊ. सनातन धर्म हा वेदाधारितच असतो हे आपल्याला माहितच आहे. श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म असे म्हटले तर प्रचंड विरोधाभास निर्माण होतो.

श्रुति-स्मृति म्हणजे वेद व मनुस्मृती ते अनेक स्मृत्या. यातील धर्म काय आहे? यातील धर्म हा यज्ञांचा धर्म आहे. सर्व कर्मकांडे यज्ञाभोवती फिरतात. यात वर्णधर्म आहे. यातील सर्व धार्मिक कर्मकांडे हिंदू करतात (म्हणजे मुर्तीपुजा वगैरे) त्यापेक्षा टोकाची वेगळी आहेत. हिंदू ज्या देवी-देवता पुजतात त्यातील एकाही दैवताचे नांव ऋग्वेदात मिळत नाही. पुराणोक्त धर्म म्हणजे पुराणांतील कथा / गाथा नव्हेत. तंत्रोक्त आगमिक धर्म म्हणजे पौराणिक धर्म. पुराणांत पुजादि धार्मिक कार्यांसाठीचे मंत्र अथवा विधी नाहीत. जे आहेत ते तंत्र परंपरेतून आलेले आहेत. वैदिक त्रैवर्णिकांसाठी मात्र  वेदोक्त मंत्र व विधी असतात.  म्हणजेच श्रुति-स्मृतिचा धर्म वेगळा आहे तर पुराणोक्त धर्म वेगळा आहे. विधीही सर्वस्वी वेगळे आहेत. आणि या श्रुती-स्मृत्योक्त धर्माचे नांव काय? तर सावरकरच सांगतात कि त्याचे नांव सनातन अथवा वैदिक धर्म. थोडक्यात वैदिक आणि हिंदू (अथवा आगमिक/तंत्रोक्त/पुराणोक्त) हे धर्म  वेगळे आहेत, ही बाब धार्मिक परंपरांनीच स्पष्ट केली आहे.

थोडक्यात सावरकर वैदिक धर्म, हिंदू धर्म, बौद्ध व जैनादि धर्म या सर्वच धर्मांना एकत्रीत रित्या हिंदू हे नांव देतात. पण हे धर्म वेगळे आहेत याची त्यांना चांगली जाण आहे. संघालाही ती जाण आहे. हिंदू हे नांव वापरून वैदिक धर्माचे अतोनात स्तोम माजवत हिंदुंची दिशाभूल करायचा हा प्रकार आहे.  वेद हे ज्यांचे धार्मिक वाड्मय नाही, ज्यांच्या धर्माशी वैदिक वाड्मयाचा दुरान्वयानेही संबंध नाही ते वैदिक धर्माला आपला धर्म कोणत्या आधारावर मानणार होते? हा धोका त्यांनाही माहित असावा म्हणून ते हिंदुत्वाबाबत बोलत असले तरी गाभा हा वैदिकच असतो. त्यामुळेच ते सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती न म्हणता "वैदिक आर्यांनी निर्माण केलेली" व म्हणजेच वैदिक संस्कृती म्हणतात. वैदिक चातुर्वर्ण्याचे शास्त्रशुद्ध गुणगाण गातात. आणि नेमके हेच हिंदुंच्या लक्षात न आल्याने त्यांची प्रचंड गफलत झाली आहे. संघाच्या छुप्या डावाला ते बळी पडलेले आहेत. हिंदुत्वाच्या नांवाखाली आपण वैदिक अजेंडा राबवत आहोत हे त्यांना न समजल्याने ते स्वत:ची ओळख विसरत स्वत:ची फरफट करून घेत आहेत. अकराव्या शतकानंटर ही स्वतंत्र ओळख विसरण्य़ाची प्रक्रिया कशी व कोणत्या स्थितीत झाली याची मिमांसा मी "जातीसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात केली आहेच!

पण वर्तमानकालीन ज्ञानयुगतही सांस्कृतिक इतिहासाच्या विश्लेशनात कमी पडल्याने असे करत असतांना आपण आपल्याच वेदपुर्व काळापासून चालत आलेल्या वैदिकेतर "सिंधू" (हिंदू/आगमिक)) धर्माचे, आपल्या देवी-देवतांचे राजरोस अपहरण होऊ देत आहोत याचे त्यांना भान नाही. हे नवे धार्मिक दास्य आहे हेच मुळात त्यांना समजत नाही.

वैदिकांना हिंदू हवेत ते त्यांच्या वर्चस्वासाठी व स्वत:चे अजेंडे राबवण्यासाठी हे हिंदुंना अद्याप समजलेलेच नाही. आणि याच मुळे संघाने कधीही हिंदू धर्माची व्याख्या केली नाही. तशी ती व्याख्या होते, पण केली तर आपणच वेगळ्या धर्माचे ठरतो याची त्यांना आंतरिक जाण आहे. जाण नाही ती हिंदुंना अशी ही शोचणीय परिस्थिती आहे.

म्हणजेच संघाला जे हिंदू राष्ट्र हवे आहे ते खरे तर वैदिक राष्ट्र आहे, वेद आणि स्मृत्यांचे तत्वज्ञान लादता येईल असे राष्ट्र हवे आहे. यात स्वातंत्र्य नाही. शूद्र म्हणजे जे वैदिक धर्म पाळत नाहीत किंवा वैदिक धर्मकक्षेबाहेरचे, म्हणजेच अवैदिक लोक अशी व्याख्या विद्वानांनी केलेली आहे. त्याही थोडक्यात पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी,  Indian Caste System, edited by R.K. Pruthi, Discovery Publishing House, 2004, page 72.
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." - वि. का. राजवाडॆ, (राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना.)
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे व तीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर, (Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.)

वरील विद्वत्मते पाहिल्यावर लक्षात येईल कि जे वैदिक नव्हते ते वैदिकेतर लोकांना (व जे आपल्या सेवेत घेतलेले पण अन्यधर्मीय) ते सरसकट शूद्र म्हणत होते. अंगविज्जा या दुस-या
शतकातील महाराष्ट्री प्राकृत ग्रंथातही त्रैवर्णीक नसलेले भारतातील इतर सर्व, त्यात शक, हुण कुशाणही आले, शूद्र आहेत असे नोंदवलेले आहे. वरील व्याख्यांवरुनही दोन धर्म स्वतंत्र असल्याचे स्पष्ट दिसत असतांना संघ हिंदू नांव वापरत वैदिक अजेंडा कसा राबवत आहे हे लक्षात यावे. शूद्र हा एकंदरीत समाजाचा हिस्सा असला तरी तो वैदिक धर्मीय नाही याची जाण पुरुषसुक्ताला जशी आहे तशीच मनुस्मॄतीलाही. जी बंधने शुद्रांवर आहेत ती वैदिकांच्या सेवेत गेलेल्या तत्कालीन सेवक वर्गावर. हे अधिक स्पष्ट समजावून घेण्यासाठी या लिंकवरील लेख वाचा http://sanjaysonawani.blogspot.in/2015/12/blog-post_54.html व http://sanjaysonawani.blogspot.in/2016/12/blog-post_4.html

चातुर्वर्ण्य हा वैदिक धर्माचा गाभा आहे हे तर उघडच आहे व तो विषमतामुलक व उतरंडीचा आहे. पण गंमत म्हणजे चवथा वर्ण हा मुळात वर्णच नाही व दुसरा वर्ण राजन्य तो तर नंतरच्या वैदिक धर्मशास्त्रांतुनही गायब आहे. वैदिकांच्या सेवक वर्गावर बंधने असू शकतात हे मान्य केले तरी स्वधर्मीय क्षत्रीय (?) व वैश्यांवरही क्रमश: बंधने आहेतच. खरे म्हणजे स्मृती या हिंदुंसाठी नसून वैदिकांनी त्यांच्या स्वधर्माचे नियमन करण्यासाठी निर्माण केल्या. पण गेल्या अज्ञानयुगात हिंदुंची गफलत होऊन एक धार्मिक गोंधळ निर्माण होत हिंदू वैदिकांच्या दास्यात नकळत सापडले. संघाचे कार्य हे या दास्याला चिरंजीवी करायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

संघाला भारतीय घटना मान्य नाही हे जगजाहीर आहे. याचे कारण लोकशाहीचे मुल्यच त्यांना मान्य नाही. घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता या महनीय मुल्यांचा स्विकार जो केला आहे तोही त्यांना मान्य नाही. समतेऐवजी ज्यात व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्वच उरत नाही अशी समरसता त्यांना हवी आहे. "आपल्याकडेही जाती बनल्या पण एक जातीने दुस-या जातीशी संघर्ष करण्याचा विचार केला नाही. वर्णांची संकल्पना ही विराट पुरुषाच्या चारी अंगांशी केली गेली. या चार अंगांत, म्हणजे डोके, हात, मांड्या व पाय, यात संघर्ष नसून एकात्मता आहे. परस्परपुरक असणे व एकात्म असणे हेच जीवन व्यवहाराचे मानदंड असून ते साधणे व परस्पर संघर्ष टाळण्याची वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे" असे दीनदयाळ उपाध्याय (एकात्म मानव दर्शन) म्हणतात. त्यांना वर्णीय उतरंडीच्या विषमत: व जातनिहाय उच्चनीचता मान्य आहे. गोळवलकर गुरुजीही वर्णव्यवस्था आणि जन्माधारित जातिव्यवस्थेचे खंदे समर्थक होते. थोडक्यात घटनेची मुलतत्वेच मान्य नाहीत. याबद्दल आजकाल प्रकट बोलणे टाळले जात असले तरी हे तत्वज्ञान वरीष्ठ संघ सेवकांना चांगलेच पाठ असते व मान्यही असते. हे तत्वज्ञान आम्हाला आज मान्य नाही असे संघाने कधी घोषितही केलेले नाही.

संघाला हिंदू राष्ट्र आणायची किती इच्छा आहे हे आपण, मागचे संदर्भ वजा केले तरी, आजही प्रबळ इच्छा आहे व ती रेटण्यासाठी सुरुवातीचे काही मार्ग वापरले जात आहेत हे आपण हिंदुत्ववाद्यांच्या (पक्षी वैदिकवाद्यांच्या) उन्मादावरून पाहू शकतो. अलीकडे गोहत्या व गोमांसबंदीबाबतच्या उन्मादात लोक ठार मारले गेले किंवा जीवघेण्या मारहाणीचा, विशेषत: दलितांना, सामना करावा लागला. गोमुत्र व गोमयाची तरफदारी केंद्रीय मंत्रीही करू लागले. वायफळ दाव्यांचा वर्षाव झाला. खरे तर वैदिक एके काळी गोमांसभक्षक होते हे गवालंभ अथवा गोमेध यज्ञाच्या वर्णानावरुनच सिद्ध होते. शुलगवात बैलाचा बळी निहित आहे. मधुपर्कादि असंख्य संदर्भ वैदिकांच्या गोमंसभक्षणाकडे निर्देश करत असतांनाही ते नुसते नाकारायचीच सध्या प्रथा पडली आहे. एवढेच नव्हे तर गोहत्या करणा-यास वेदांत देहदंडाची शिक्षा सांगितले आहे हे तर दडपुन सांगितले जाऊ लागले. रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यमद्ध्ये अशी माहिती प्रसिद्ध झाली होती. खरे तर वेदात असली कसलीही आज्ञा नाही अथवा विधानही नाही. वैदिक गोमांस खात होते तर खात होते. ते कबूल करायला लाजायचे काय कारण? कोणी काय खावे वा काय खाउ नये याचे बंधन असू शकत नाही. वैदिकांने नंतर कृषीवलसंस्कृतीशी संपर्क आल्यानंतर नाईलाजाने गोमांसभक्षण सोडून दिले. पण आता त्याचे स्तोम का माजवले जावू लागले याची कारणे वैदिक सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

आता आपण मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे वळू. तो म्हणजे संघाचा हिंदू राष्ट्राचे (पक्षी वैदिक राष्ट्राचे) स्वप्न साकार होईल काय? खरे तर संघाला नुसते हिंदू राष्ट्र नको आहे तर अखंड हिंदुस्तान हवा आहे. म्हणजेच पाक/बांगला/ब्रह्मदेश/अफगाणिस्तानसहितचा हिंदुस्तान. हे तर दिवास्वप्न आहे हे उघड आहे. बरे हे अखंड अथवा सध्याचे हिंदुराष्ट्र त्यांना शक्यतो मुस्लिमविरहित अथवा मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देवून हवे आहे. गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, "The non-Hindu people of Hindustan must either adopt Hindu culture and language, must learn and respect and hold in reverence the Hindu religion, must entertain no idea but of those of glorification of the Hindu race and culture ... In a word they must cease to be foreigners, or may stay in the country, wholly subordinated to the Hindu nation, claiming nothing, deserving no privileges, far less any preferential treatment—not even citizens' rights." (We, or Our Nation defined (1938)) विधान स्वयंस्पष्ट आहे. या मताशी असहमती अद्याप संघाने दाखवलेली नाही हेही येथे उल्लेखनीय आहे. हीच गत ख्रिस्त्यांसाठी आहे हेही उघड आहे. दलितांबाबत संघाचे विचार वरकरणी सौम्य भासत असले तरी मनुस्मृतीचा गवगवा करत, तीच प्राचीन कालची आदर्श समाजपद्धती आहे असे विधान करत घटनेला विरोध दाखवला आहे. (६ फ़ेब्रुवारी १९५०, Organiser) म्हणजेच दलितांचे स्थान त्यांच्या दुष्टीने काय हे लक्षात घ्यायला हरकत नाही. खरे तर मनुस्मॄती  जशीच्या तशी वैदिक धर्मियांसाठी राबवावी. त्यांच्या सेवेत जाणा-या शुद्रांवर त्यांनी स्मृतींची बंधने टाकावीत. शूद्रांच्या राज्यांत निवास करू नये. शुद्र राजांना (सत्ताधीशांना) आपल्या, यज्ञ सोडा, श्राद्ध कार्यक्रमांतही बोलावू नये. ब्राह्मणाने ब्राह्मणांना घालून दिलेले नियम पाळावेत. त्यांना सेवात्याज्ज्य असल्याने सर्व नोकरी-धंदे सोडुन द्यावेत. वेदाध्ययन व त्याचे वैदिकांना शिक्षण देत बसणे एवढाच उद्योग करावा. हे यांना चालणार आहे काय? सरसकट शुद्रांसाठी स्मृत्यांतील नियम लिहिले गेले आहेत या भ्रमातून वैदिकांनी व संघानेही बाहेर यावे.

आता हे वरकरणी हिंदू पण प्रत्यक्षात वैदिक राष्ट्र बनवायचे तर प्रथम संघप्रणित पक्षाला राज्य घटना बदलावी लागेल हे तर उघड आहे. घटना बदलायची तर दोन्ही सभागृहांत भाजपला (वा त्या वेळी असेल त्या पक्षाला) प्रचंड बहुमत असले पाहिजे. सध्या लोकसभेत बहुमत आहे व त्याचा वापर संघाचा अजेंडा राबवण्यासाठीच सुरुवातीला करण्याचा प्रयत्न झाला व आजही तो कोणत्या ना कोणत्या रुपात होतो आहे हे आपण पाहतोच आहे. राज्यसभेत भाजपला सध्या बहुमत नसले तरी उद्या ते मिळणारच नाही असेही नाही. लाटेवर स्वार होणे हा भारतीय जनमानसाचा स्वभाव आहे हे आपण गेल्या जवळपास सर्वच निवडणुकांत पाहिले आहे. आजवर तरी संघाच्या आणि भाजपा सरकारच्या अजेंड्याला रेटण्याचे जेही प्रयत्न झालेत त्याला बुद्धीजीवी वर्गाने प्रचंड विरोध केला आहे. असे असले तरी कन्हय्याकुमारवरील खटले थांबले नाहीत किंवा वेमुलाला मरणोत्तरही न्याय मिळालेला नाही. संघवादी साधु-साध्व्यांच्या, संभावित गोरक्षकांच्या भुमिकांवरही सरकार कठोर भुमिका घेतांना दिसत नाही. थोडक्यात सरकारच अप्रत्यक्षपणे आपला अजेंडा गैरसरकारी गुंडांकडून राबवायचा प्रयत्न करतो आहे कि काय अशी शंका येण्यास पुरेसा वाव आहे. याचे कारण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही हळु हळु बंधने येत आहेत. ही बंधने कायद्याचीच आहेत असे नसून उन्मादाने एकवटलेल्या संघपरिवाराच्या ( वा संघविचारकांच्या) दहशतीचीही आहेत. शिवाय बदलत्या स्थितीचा फायदा लाटू पाहणारे काही पुरोगामी म्हणवणारे पण बाजू बदललेल्या विचारवंतांच्या संभ्रमकारी लेखनातुनही गोंधळ उडवून दिला जात आहे.

हे वातावरण गतीमान होत जाण्याची बरीच शक्यता आहे. संघ "वैदिक" शब्द न वापरता हिंदू शब्द का वापरतो हे देवभोळ्या व सांस्कृतिक इतिहासाचे कसलेही भान न ठेवलेल्या हिंदूंना (ज्यांना आपण आज बहुजन म्हणतो) समजलेले नाही. उलट हेच वैदिक धर्माचे, ते वैदिक धर्माचे नसल्याने कसलेही वैदिक धर्माधिकार प्राप्त नसतांना अथवा त्या धर्माचे कसलेही ज्ञानही नसतांना त्यांचे संरक्षक व त्यांच्या हितासाठीचे योद्ध्ये बनलेले आहेत. त्यामुळे समस्या अधिक गहन झाली आहे. संघ म्हणतो तसे "हिंदू राष्ट्र" होण्यात आपलीच गुलामगिरी आहे याचे त्यांना भान नाही ही अशी शोचणीय अवस्था आहे. रा. स्व. संघ जेही राष्ट्र बनवू पाहतोय ते हिंदू राष्ट्र नसून वैदिक राष्ट्र असणार आहे हे त्यांना समजावून सांगायची नितांत गरज आहे. पण तसा वैचारिक फोर्स आज तरी नाही हे वास्तव मान्य करायला हवे.

असे असले तरी संघाला (भाजपाला) दोन्ही सभागृहात प्रचंड बहुमत मिळाले तरी राज्यघटना त्यांना रद्दबातल करावी लागेल. बहुमत असले तरी ते लगोलग शक्य आहे काय यावरही आपण विचार करायला हवा.

भाजपाचे सारेच खासदार मुळात संघविचाराचे नाहित हे वास्तव आधी आपल्याला पहायला हवे. मोदींच्या विकासाच्या लाटेवर आरुढ होण्यासाठी अन्य विचारांचेही अनेक लोक आपापले पक्ष सोडून भाजप दरबार दाखल झालेत. सहयोगी पक्षही आहेत. न्यायसंस्थाही स्वतंत्र आहे तसेच सैन्यदलांच्याही भुमिकांचा मोठा प्रभाव देशाचे पुर्ण भविष्य व दिशा बदलणा-या निर्णयावर अथवा त्या दिशेने पाऊल उचलतांना करावा लागेल हे उघड आहे. मुस्लिम-ख्रिस्ती व दलित समुदाय तसेच अन्य विवेकी हिंदू-अहिंदू समुदायांची, माध्यमांचीही भुमिका यात विचारात घ्यावी लागेल. केवळ राक्षसी बहुमत आहे म्हणून घटनेलाच रद्दबातल ठरवत राष्ट्राला "हिंदू" राष्ट्र घोषित करता येण्याचा प्रवास तसा सोपा नाही. त्यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकते. किंबहुना ती यादवीची स्थिती असेल. आणि ती संघालाही परवडण्यासारखी नाही.

मग ते काय करतील हा महत्वाचा प्रश्न आहे. आपला अजेंडा राबवत नेण्याचे, कसोशीने सातत्यपुर्वक रेटत राहण्याचे कसब संघात आहे हे सर्वांना माहितच आहे. अभ्यासक्रमात ते, पुर्ण बहुमत असले तर, वैदिक ज्ञानाचा व संस्कृतचा समावेश करतील ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. याला जो काही विरोध होईल तो ते रेटुनही नेतील. यातुनच पुढची पिढी वैदिकाश्रयी घडवण्याचा ते प्रयत्न करतील जो आजवर वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत ते करीतच आले आहेत. मुस्लिमांवर अनेक निर्बंध घालत जात अथवा त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचेही प्रयत्न यातुनच होण्याचीही शक्यता आहे, जे आजही अल्प-स्वल्प प्रमाणात सुरु आहेतच. पण त्यांच्याशी होणारा दुजाभाव वाढवत नेत त्यांना भयभीत करत एकाकी पाडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. त्यातून तणावाचे वातावरण निर्माण करत धार्मिक आणीबाणी आणण्याचाही पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो. पण याही स्थितीत अराजकच संभवणार असल्याने हिंसाचार होण्यापलीकडे फार काही साध्य होईल असे नाही.

सध्याचे जे धृवीकरण संघ घडवत आहे ते उन्मादाचे ध्रुवीकरण आहे. कदाचित ही त्यांची चाचणी प्रयोगाची चाल आहे. त्यांच्या उन्मादी वक्तव्यांना "उथळ, मुर्ख, बावळट" असल्या शेलक्या विशेषणांनी दुर्लक्षित ठेवणे परवडणारे नाही याचे भान आपल्याला असायला हवे. थोडक्यात आज जे चाचणी प्रयोग चाललेत ते आताच समूळ उखडून टाकण्याचे प्रयत्न करावे लागतील व त्यात सातत्य ठेवावे लागेल. यावर अंकुश बसला नाही तर हे चाचणीप्रयोग देशभरात व्यापक व अधिक हिंसक व दडपशाहीच्या रुपात राबवले जातील याची नोंद आपण मनोमन केली पाहिजे. त्याची परिणती अराजक, सर्वव्यापी हिंसाचार व शेवटी राष्ट्राचे तुकडे पडण्यात होईल. संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न, जर त्यांचा प्रतिरोध आजच पुरेशा पद्धतीने होत राहिला नाही तर ते शांतपणे त्यांच्या ध्येयाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकतच जातील व ते स्वप्न साकार करायचा प्रयत्न करतील. त्यासाठी देश विखंडित झाला तरी त्यांची हरकत असेल असे मला वाटत नाही हे सावरकरांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेकडे पाहता दिसते.  सावरकरांनी केवळ हरिसिंग हिंदू आहे म्हणून त्याला काश्मिर भारतात विलीन न करता स्वतंत्र राष्ट्र ठेवत नेपाळच्या राजाची मदत घेत भारतीय संघराज्यावर स्वारी करत जिंकून घ्यायचा सल्ला दिला होता. हाच सल्ला त्यांनी त्रावणकोरच्या महाराजांना व अन्य हिंदू संस्थानिकांना दिला होता. म्हणजे हिंदू बहूल भांगांचे एकेक स्वतंत्र हिंदू राष्ट्र व मुस्लिम बहुलांची नवी पाकिस्ताने (शत्रू राष्ट्रे) अशी स्थिती संघाला जर प्रेय वाटली तर काय बिकट स्थिती होईल याची आपण कल्पना करू शकतो.

धर्माधारित राष्ट्र हा मानवतेला शाप आहे. कोणता धर्म चांगला कोणता वाइट हा विषयच नसून मुळात धर्म हा राज्यसंस्थेच्या नियमनाचा विषयच नाही व नसावा. घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेचे स्वरूप अत्यंत विचारपुर्वक इहवादी (सेक्युलर) ठेवले आहे. गांधी-नेहरूंचा द्वेष करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना ही इहवादी संकल्पना मान्य असण्याची शक्यता नाही. मुळात संघ धर्मवादी आहे व ते त्याने कधी लपवलेलेही नाही. खरे तर संघर्ष धर्मवाद कि इहवाद असा आहे. थोडक्यात आपल्याला घटनात्मक कायद्याचे राज्य हवे कि धर्माचे राज्य हवे यातील आपली निवड आहे. आपण ती केलेली आहे. चिरंतन घटनात्मक कायद्याच्या राज्याची आपली निकड आहे. आज अनेक संघी मित्र व्यापक भुमिका घेतात, पण ती संघाची भुमिका नाही. व्यक्तीगत स्तरावर प्रत्येक जण मानवी भाव-भावनांनी गजबजलेला असतो व मानवी मुल्ये कोठेतरी समजत असतात. समजत नाही ते उन्माद्यांना, ब्रेनवाशिंगला बळी पडलेल्यांना.

हिंदू राष्ट्र ही इसिसी महत्वाकांक्षा आहे. मुस्लिम तर सोडाच पण तमाम हिंदुंना वैदिकांचे गुलाम करण्याची ही महत्वाकांक्षा आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना अनेक भोळसट हिंदुंना आकर्षक वाटते हे खरे असले तरी त्यांना त्यामागील वैदिक अजेंडा अजून नीट समजायचा आहे. भारताचे ज्यामुळे तुकडेच पडणार आहेत असा हा अजेंडा आहे. तो पुरेपुर राबवणे नजिकच्या भविष्यात सहजशक्य नसले तरी आताचे उन्माद, वल्गना अशाच सुरु राहिल्या तर एका पिढीनंतर याचा भयावह उद्रेक दिसू लागेल. याचा आपण वेळीच विचार करायला हवा.

(Article is published in "Media Watch" Dipavali issue editedby Mr. Avinash Dudhe)

3 comments:

  1. I agree with you,but can you suggest any alternative? please suggest some practical solution to counter the present aggressive religious attitude of Muslims and Christians.
    2.I experience that when these two community get slightest majority,they push their religious agnda,in that case,there is nobody to save people like us who are non Muslims or Christian(I don't dare to call them Hindu )

    ReplyDelete
    Replies
    1. I completely agree with your statement.
      What about dalit and those who are trying to evoke ambedkar ideology?
      Even these people are also trying to subjugate the ideaa of being one now a days..!



      Delete
    2. I agree with you Chandu...
      But hatred is never a solution.

      We need to show them that we can be bad but we don’t want to become.
      We can hit but we will not… We need to change their mind by showing them how we want to with them without hate for them and also expect same.

      We don’t hit our child for his every mistake but we show him to behave or you will get hit..

      Hope our 'we can do but don’t want to do' behavior help them to understand and they behave better

      Delete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...