Saturday, December 17, 2016

अतिरेकी मक्तेदारी

अतिरेकी मक्तेदारीवादी भांडवलशहा हळू हळू सर्वच क्षेत्रांचे स्वामित्व घेत चालले आहेत. किंबहुना सरकारे व जनताही नियंत्रित करणे हाच त्यांचा अंतिम हेतू आहे. स्पर्धा संपवण्यासाठी ते आज ज्या गतीने कार्यरत आहे ती गती पाहता जगात मोजकेच उद्योगसमूह राहतील जे जगावरच नियंत्रण आणतील अशी चिन्हे दिसत आहेत. जागतीक शेतीही यातुन सुटणार नाही. राजकीय नेते हे फक्त त्यांचे छुपे प्रवक्ते बव्हंशी बनलेलेच आहेत व उद्या ती प्रक्रिया किती उघड होईल याची चुणुक भारतीय पंतप्रधानांनी दाखवलेली आहे. ट्रंपही त्याला अपवाद नाही. असे अनेक राष्ट्रप्रमूख आज आहेत. हा त्यांचा दोष नसून जी व्यवस्था विकराळ होत सर्व मुल्ये गिळंकृत करत चालली आहे त्या व्यवस्थेचा आहे व याचे जन्मदाते मक्तेदारीयुक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने झपाटलेले उद्योगसमूह आहेत. नेता कोणताही असो त्याला जनतेच्या नव्हे तर यांच्या तालावर नाचण्याशिवाय व त्यांचीच उद्दिष्टे साकार करण्याखेरीज पर्याय नाही. विचारधारांना येथे काहीएक अर्थ राहत नाही. मानवी स्वातंत्र्याचा संकोच अपरिहार्य आहे. मानवतावादी स्वतंत्रतावाद ऐकून घेण्याच्या स्थितीत नागरिकही नसावेत, सामाजिक लादलेल्या विपन्नतेचेही समर्थन करणारे लोक वाढावेत म्हणजे त्यांचे ब्रेन कंडिशनिंग करण्यात ते यशस्वी होत आहेत व त्यांची संख्या वाढतच जाईल अशी चिन्हे आहेत.


एक दिवस, सारे उद्योगसमूह एका छत्राखाली आणण्याच्या आकांक्षेने झपाटलेला कोणतेही मार्ग वापरून जागतिक सत्तेचे नियंत्रण करू शकतो. हे अशक्य नाही. अर्थकारण नियंत्रित केले की मनांवरचे नियंत्रणही सहज होते हे त्यांना पक्के माहित आहे. हा एका अर्थाने आर्थिक साम्राज्यवाद आहे व त्याला राजकारणी आडवे येऊ शकत नाहीत एवढे ते दुर्बल होत चालले आहेत. या आर्थिक हुकुमशाहीशी कसे लढायचे हा आमच्यासमोरचा प्रधान विषय राहिला पाहिजे!

3 comments:

  1. संजय सर ,
    "अतिरेकी मक्तेदारी"- या मथळ्यातच आपला रोख कुठे आहे आणि कल कुठे आहे हे ते समजते . आपण सर्वानी एक गोष्ट विसरता कामा नये की भारतात समाजवाद हा एकेकाळी लोकप्रिय झाला होता ,पण त्यालाही घराणेशाहीचे ग्रहण लागत आज त्याची पार दैना झाली आहे .
    एकेकाळी पं.नेहरू आणि अनेक देशांचे प्रमुख रशियाच्या प्रचाराला बळी पडून कम्युनिस्ट विचारसरणीच्या आहारी गेले होते
    वाढता इस्लामवाद , ढासळती अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे वादातीत वाढणारे वर्चस्व यामुळे गोरबाचेव्ह यांच्या काळात रशियाने विचारपूर्वक मुस्लिम आधिपात्याचे देश स्वतः पासून तोडले आणि सुटसुटीत असा रशिया निर्माण झाला -- अशा रीतीने कम्युनिझमचा पराभव झाला - ते सहाजिक होते .
    आज नवनवीन प्रकारे नवीन उद्योजक पुढे येत आहेत. माध्यम वर्गातून उद्योजक पुढे येत आहेत त्यांना सर्व जगाचा कॅनव्हास मिळाला आहे . भारतात अशी यशस्वी अनेक उदाहरणे आहेत , अगदी ताजे म्हणजे पेटीएम !येणारा काळ अजूनही अनेक यशस्वी उद्योजक निर्माण करेल !
    आपण जो निराशाजनक सूर भांडवल दारांविषयी लावला आहे तो अनावश्यक आहे !
    आजच्या नगरपालिकेच्या निवडणुका काय सांगतात ?
    चंदिगढ काय सांगते ?
    बहुजनांपर्यंत आज भाजपने जम बसवला आहे हे निश्चित! हा भांडवलदारांचा पक्ष आहे . इथे अनेक उत्तम प्रवक्ते आहेत विनय सहस्त्रबुद्धे सारखे नियोजक आहेत आणि फडवणीस सारखे कुशल नेते आहेत . या भांडवलदारी पक्षाला धर्माचा आधार मिळाला आहे . आणि नरेंद्र मोदी सारखा धाडसी नेता मिळाला आहे .अशा लोकांना चितपट करणे अवघड असते ,कारण त्यांच्यामागे भांडवलदार तर असतातच पण कुशल संघटकांची फळी असते , प्रचारकांची फौज असते आणि धर्माचे राजकारण हे तर आपल्याला अयोध्येमुळे चांगलेच माहीत झाले आहे. गोध्रामुळे मोदी निर्माण झाले . ते आता सहजासहजी आपली पकड सोडणार नाहीत हे नक्की . संघ त्यांच्यामागे पूर्ण ताकतीने उभा आहे .समाजवाद हा विस्कळीत झाला आहे आणि निधर्मी काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे . रिपब्लिकन पक्षाचे तुकडे तुकडे झाले आहेत , आणि त्यांना कसे वापरायचे हे इतर पक्षांना उत्तम समजले आहे . त्यामुळे तीही भीती आता कोणाला वाटत नाही . भारतात कधीही बोल्शेव्हिक क्रान्ति होणार नाही हेही सर्वजण समजून आहेत . या घटकेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे भाजप आहे आणि त्यांच्यामागचा विचार म्हणजे आरएसएस हे सर्व जाणून आहे .
    करीना कपूरच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले जाते यातही बराच अर्थ आहे ,

    ReplyDelete
  2. लेख अतिशय सावध पण कौतुकास्पद. पण आगाशेसरांना हे ही माहित आहे की, क्रियेची प्रतिक्रिया सुरुच असते. आज भाजपचे सरकार ही क्रियेची प्रतिक्रियाच आहे. लोकांना नवनवी आश्वासने दाखवावीच लागणार, प्रगतीच्या दिशेचे सुतोवाच करावेच लागणार. आयकर खात्याच्या धाडीही मोठया प्रमाणात पडत आहेत. लोक मनोमन सुखावतही आहेत. किंवा आणखी काही जनतेच्या मनातील निर्णय घेण्याचा हे सरकार प्रयत्न करेल. कारण या पक्षाला तसा फार मोठा राज्यस्तरीय/प्रादेशिक/तालुकास्तरीय जातीय आधार नाही. त्यामुळे त्यांना जनअनुनयाशिवाय पर्यायही नाही. मासबेस पक्का करण्यासाठी काही धाडशी धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दाखवावेचतर लागणार. रियलइस्टेट हार्ड कॅश यावर या गोष्टी हलवाव्याच लागतील. ज्या जनतेच्या मनातील आहेत. फार शेतकरी अनुनयी हे सरकार राहणार नाही. कारण आतापर्यत अनेक गैरफायदे बागायतशेतकरी गटांनी भारतीय तसेच महाराष्टीय राजकारणात घेतल्याचे सर्वांना माहित आहे. एक पॅरालल इकॉनॉमीच उभी आहे. आता अशा बलदंड शेतकऱ्यांकडील हा taxless excess पैसा कोण/कसा गोळा करणार, त्याला आळा कसा घालता येईल हे ही पक्षीय धोरणात कधी छुपे/उघड पध्दतीने व्यक्त होत राहील. असे अनेक घटक आहेत की जे नेस्तनाबूत करावे लागतील. एक बर आहे की, संघाचं धोरण याबाबत जागृत आहे. अर्थात त्यांच्या तो या राजवटीत प्रयत्न आहे. हिंदुवाद हा तर आश्रय/शिडी आहेच. पण त्यामागे अनेक जुने नव्या पध्दतीचे विचार तरुण पिढी कार्यरत आहे.जे हिंदूवादापेक्षा विकासाकडे जाऊ इच्छितात. काँग्रेस किंवा इतरपाटीकडे यापैकी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले ना कार्यकर्ते ना जनतेच्या अधिक सोयी नव्या आकांशा फुलविणारे धोरण. त्यामुळे सध्या तरी भाजपची लाट ओसरली नाही. सांताक्लॉज पोतडीतून काही तरी नवीन वस्तु काढतोच. व जुन्या विसरायला लावतो. असे काहीही फारसे इतरांकडे नसल्याने जनतेच्या अपेक्षा त्यांच्याकडे सध्यातरी नाहीत. धन्यवाद.

    ReplyDelete
  3. अभय पवार सर , मला नेहमी जाणवते की आपण नियमित संजय सरांच्या ब्लॉग वर लिहीत असता , सहभागी होऊन प्रतिक्रिया देत असता , स्वतंत्रपणे आपले विचार मांडत असता ! आपले अभिनंदन !
    पण ,
    वाईट इतकेच वाटते की अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल असे लोक या ब्लॉगवर लिहितात , खरेतर , अजूनही भरघोस विचार मंथन झाले पाहिजे . हा ब्लॉग म्हणजे "अरे ला कारे"करत भांडणे करणारा वर्ग नाही हे आपण अनेकदा संयत प्रतिक्रिया देत सिद्ध केले आहे . पण, भूतकाळ आठवला की अनेक हिडीस नोंदींचा मी साक्षीदार आहे ते सांगावेसे वाटते
    . यापूर्वी अविनाश पाटसकर ,आप्पा-बाप्पा,शर्मा,मी भारतीय,अशोक बुद्धिवंत ,लिहा वाचा ,अमित ,नीरज,असे अनेक सुंदर लिहिणारे लोक या ब्लॉगवर होते पण ते हल्ली लिहितच नाहीत - असे का झाले आहे ?- खरेतर हा ब्लॉग अतिशय महत्वाचा आहे - इथे काही झाले तरी प्रत्येकाने ४ ओळी लिहिलेच पाहिजे
    . पूर्वी संभाजी ब्रिगेड आणि मोहरीर - पाटील यांनी इथे अनेक वेळा भडक लिखाण केले , पण उरले कोण ? संजय सर !!!- कधीही अपशब्द न लिहिता , सर्वाना शक्यतो बरोबर घेऊन जाणारे सर त्यामुळेच वाचनीय होत असतात - कधीकधी एकदम - सरस्वती नदी ,शिवशक्ती , गणपती - विघ्नकर्ता की विघ्नहर्ता अशी सुंदर विषयांतर करत ते अनेक विषयांना स्पर्श करतात.
    संजय सरांचे अभिनंदन !
    आरक्षण आणि आंबेडकर यांचे आरक्षणा बद्दलचे मत यावर त्यांनी लिहावे ही विनंती .
    कारण व्यक्तिशः मला आरक्षण अजिबात मान्य नाही - हे खरे आहे की आरक्षणामुळे अनेक मागासलेले आणि पददलित समाजाच्या मुख्य धारेत आले आहेत , पण त्यातून त्यांचा जो क्रिमी लेयर तयार झाला आहे त्यामुळे हे नवे ब्राह्मण तयार झालेकी काय असे वातावरण झाले आहे . त्यामुळे डॉ आंबेडकर यांनी जो आरक्षण हा मर्यादित काळासाठी असावे हा विचार मांडला होता त्याबद्दल चारचा झाली पाहिजे असे वाटते ! संजय सर ?

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...